Tag: AI

  • कोविडनंतर बदललेला भारत : भारतीय अर्थव्यवस्थेचा संकटाकडून संधीकडे झालेला ऐतिहासिक प्रवास

    कोविडनंतर बदललेला भारत : भारतीय अर्थव्यवस्थेचा संकटाकडून संधीकडे झालेला ऐतिहासिक प्रवास

    २०२० सालातील तो काळ आठवतोय? रस्ते ओस पडले होते, कारखाने शांत होते आणि प्रत्येकाच्या मनात भविष्याबद्दल भीती होती. कोविड-19 महामारीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासातील सर्वात मोठा धक्का दिला. उद्योग-व्यवसाय बंद पडले, लाखो लोकांनी नोकऱ्या गमावल्या, पुरवठा साखळी (Supply Chain) विस्कळीत झाली आणि जीडीपीमध्ये मोठी घट झाली. 

    2020 ते 2025 ही सहा वर्षे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी जिद्द, चिकाटी आणि पुनर्रचनेचा काळ ठरली आहेत. गेल्या सहा वर्षांत भारताने केवळ स्वतःला सावरलं नाही, तर जगाला थक्क करणारी प्रगती केली आहे. हा प्रवास नक्की कसा होता? आपण काय कमावलं आणि काय गमावलं? जाणून घेऊया…

    2020–21 या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी जवळपास 7% नी घटला, जी ऐतिहासिक घसरण होती. देशव्यापी लॉकडाउनमुळे विविध वस्तुनिर्मिती आणि सेवा (Product based and Service Based Companies), शिक्षण, शेती या सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला. उत्पादन थांबले आणि ग्राहकांची मागणीदेखील कमी झाली. लघु व मध्यम उद्योग, स्थलांतरित कामगार आणि असंघटित क्षेत्रातील कामगार सर्वाधिक प्रभावित झाले. त्यानंतर सरकारच्या लसीकरण मोहिमेमुळे, प्रोत्साहन पॅकेजेस आणि रिझर्व्ह बँकेच्या अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा (Liquidity) नियंत्रित ठेवण्याच्या उपाययोजनांमुळे अर्थव्यवस्था हळूहळू स्थिर झाली.

    शेती


    संकटाच्या या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला शेती क्षेत्राने आधार दिला. शहरी नोकऱ्या गमावलेल्या कामगारांना ग्रामीण भागाने सामावून घेतले. कोविडनंतर अ‍ॅग्री-टेक (Agri-Tech), डिजिटल बाजारपेठ आणि झालेला लाभ थेट हातात मिळणे यामध्ये वाढ झाली. तरीही हवामान बदल, शेकऱ्यांकडील जमिनीचे लहान लहान तुकडे आणि उत्पन्नातील अस्थिरता ही शेतकऱ्यांसमोरील मोठी आव्हाने आहेत.

    उद्योग


    लघुउद्योगांना मिळणारा पैसा आणि मागणी घटल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांनी डिजिटल पेमेंट्स, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि ई-कॉमर्स (E-Commerce)चा अवलंब करून टिकून राहण्याचा प्रयत्न केला. GST मुळे व्यवहार अधिक औपचारिक झाले. महामारीमुळे MSMEs (Micro, Small & Medium Enterprises) मध्ये डिजिटल परिवर्तनाचा वेग वाढला. IT, औषधनिर्मिती, दूरसंचार आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांनी जलद गतीने पुनरागमन केले. 2022 नंतर कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारली. पायाभूत सुविधांवरील सरकारी खर्चामुळे खासगी गुंतवणुकीला चालना मिळाली. महामारीमुळे जागतिक पुरवठा साखळीतील कमकुवतपणा उघड झाला. त्यानंतर भारताने PLI (Production Linked Incentives) आणि मेक इन इंडिया (Make In India) योजनांद्वारे देशांतर्गत उत्पादन वाढवले. मोबाईल उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स आणि नवीकरणीय ऊर्जा (Renewable Energy) क्षेत्रात वाढ झाली. पायाभूत सुविधांवरील गुंतवणुकीमुळे औद्योगिक उत्पादनाला चालना मिळाली.



    रोजगार आणि AI


    महामारीदरम्यान तरुण आणि असंघटित कामगारांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे लक्षात आले. अनेक शहरी कामगार ग्रामीण भागात परतले. 2023 ते 2025 दरम्यान रोजगार परिस्थितीत हळूहळू सुधारणा झाली. औपचारिक नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आणि गिग इकॉनॉमीचा (उदा. डिलिव्हरी, फ्रीलान्स काम) विस्तार झाला. तरीही नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये उमेदवारांकडे नसणे आणि स्थिर आणि गुणवत्तापूर्ण नोकऱ्यांची कमतरता ही मोठी चिंता आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI – Artificial Intelligence) व्यवसायातील उत्पादकतेचा महत्त्वाचा घटक बनली आहे. कंपन्या ग्राहक सेवा, डेटा विश्लेषण, फसवणूक शोध आणि ऑटोमेशनसाठी AI चा वापर करतात. AI मुळे कार्यक्षमता वाढते, पण एकच काम वारंवार केले जाणाऱ्या आणि कमी कौशल्याच्या नोकऱ्यांना धोका निर्माण होतो. एकूणच भारताच्या कामगारवर्गाचे भवितव्य कौशल्य विकास आणि डिजिटल शिक्षणावर अवलंबून आहे, असे दिसून येते. 

    कोविडनंतरच्या भारतातील नवीन आर्थिक ट्रेंड

    १. सार्वजनिक डिजीटलीकरण –

    यूपीआय (UPI), आधार आणि डिजिटल प्लॅटफॉर्मने आर्थिक समावेशन आणि पेमेंट सिस्टममध्ये बदल घडवून आणले आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये virtual classrooms सारखे बदल पाहायला मिळाले. 

    २. स्टार्टअप आणि इनोव्हेशन (Startups and Innovations)

    एआय(AI), ईव्ही (EV), फिनटेक(FinTech) आणि क्लायमेट टेक (Climate Tech) मध्ये वाढ झाल्याने भारत जागतिक स्तरावर अव्वल स्टार्टअप इकोसिस्टममध्ये स्थान मिळवत आहे.

    ३. हरित ऊर्जा क्रांती

    नवीकरणीय ऊर्जा क्षमता वेगाने वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहने (EV), सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांचा वापर वाढला आहे.

    ४. ग्राहकांच्या वर्तनात बदल

    शहरी ग्राहक डिजिटल सेवा, प्रवास आणि प्रीमियम उत्पादनांवर अधिक खर्च करत आहेत. ग्रामीण भागात फार वेगाने बदल होत नसले तरी ते बंद झालेले नाहीत. 

    कोविडनंतर भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत आणि डिजिटल झाली आहे. मात्र ही वाढ सर्व क्षेत्रांमध्ये समान नाही. पुढील टप्पा सर्वसमावेशक विकास, रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकासावर अवलंबून असेल. योग्य नियोजन केल्यास हे दशक भारताच्या पुढील मोठ्या आर्थिक झेपेची सुरुवात ठरू शकते.

    तुमच्या मते, गेल्या सहा वर्षांत तुमच्या आयुष्यात झालेला सर्वात मोठा आर्थिक बदल कोणता? खाली कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हा ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा!

  • इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट २०२६: जागतिक एआय (AI) क्रांतीचे केंद्र म्हणून भारताचा उदय

    इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट २०२६: जागतिक एआय (AI) क्रांतीचे केंद्र म्हणून भारताचा उदय 

    मानवी संस्कृतीच्या वाटचालीत तंत्रज्ञान जेव्हा केवळ प्रगतीचे साधन न राहता सामाजिक परिवर्तनाचा कणा बनते, तेव्हा खऱ्या अर्थाने नव्या युगाची सुरुवात होते. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे १६ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली ‘इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट’ हा असाच एक ऐतिहासिक टप्पा ठरत आहे. ‘ग्लोबल साऊथ’ (जागतिक दक्षिण) मधील देशांनी आयोजित केलेली ही पहिलीच मोठी जागतिक शिखर परिषद असून, तिने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या समिटने केवळ तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेवर चर्चा न करता, त्याच्या प्रत्यक्ष ‘प्रभावावर’ (Impact) लक्ष केंद्रित करून भारताला एआय क्षेत्रातील जागतिक धोरणकर्ता म्हणून प्रस्थापित केले आहे.

    ‘मानव’ (MANAV) व्हिजन: एआय(AI) चे मानवीकरण

    भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआय (AI) तंत्रज्ञानाला मशीन-केंद्रित चौकटीतून बाहेर काढून ‘मानव-केंद्रित’ बनवण्यासाठी ‘MANAV’ (मानव) हे पाच कलमी सूत्र जगासमोर मांडले:

    १. M (Moral – नैतिक): एआय (AI) प्रणाली पूर्णपणे नैतिक आणि मानवी मूल्यांच्या चौकटीत असणे आवश्यक आहे.

    २. A (Accountable – उत्तरदायी): तंत्रज्ञानाचा वापर करताना त्याचे प्रशासन पारदर्शक आणि उत्तरदायी असले पाहिजे.

    ३. N (National Sovereignty राष्ट्रीय सार्वभौमत्व): प्रत्येक देशाचा आणि नागरिकाचा त्यांच्या स्वतःच्या डेटावर अधिकार असावा, ज्यामुळे ‘डिजिटल वसाहतवाद’ टाळता येईल.

    ४. A (Accessible – सुलभता): एआय (AI) वर काही मोजक्या कॉर्पोरेट संस्थांची मक्तेदारी नसावी; ते समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे.

    ५. V (Valid – वैधता): एआय मॉडेल्स (AI Models) हे कायदेशीररित्या वैध, विश्वसनीय आणि पडताळणीयोग्य असावेत.

    पंतप्रधानांनी एआय (AI)ची तुलना ‘जीपीएस’ (GPS) शी केली; ज्याप्रमाणे जीपीएस रस्ता दाखवते, पण जाण्याची दिशा चालक ठरवतो, तसेच एआय (AI) चे नियंत्रण नेहमी मानवाच्या हातात राहिले पाहिजे. ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ (सर्वांचे कल्याण आणि सर्वांचा आनंद) हाच भारतासाठी एआय (AI) च्या प्रगतीचा बेंचमार्क असेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

    जागतिक दिग्गजांचा भारतावर विश्वास

    या परिषदेत जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रमुखांनी उपस्थित राहून भारताच्या वाढत्या तांत्रिक सामर्थ्याचे कौतुक केले:

    सुंदर पिचाई (Google): पिचाई यांनी ‘इंडिया-अमेरिका कनेक्ट’ या नवीन उपक्रमाची घोषणा केली, ज्यांतर्गत भारत, अमेरिका आणि दक्षिण गोलार्धातील देशांना जोडण्यासाठी नवीन सब-सी (समुद्राखालून) केबल मार्ग तयार केले जातील. यामुळे एआय (AI) डेटा ट्रान्सफरची गती प्रचंड वाढेल. तसेच, भारतीयांच्या कौशल्य विकासासाठी ‘Google AI Professional Certificate’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रमही त्यांनी लाँच केला.

    सॅम ऑल्टमन (OpenAI): ऑल्टमन यांनी नमूद केले की, भारताकडे ‘फुल-स्टॅक एआय (AI) लीडर’ बनण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिभा, धोरणे आणि उत्साह आहे. ओपन-एआय (OpenAI) भारतात आपली व्याप्ती वाढवण्यासाठी भारत सरकारसोबत नवीन भागीदारी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    इमॅन्युएल मॅक्रॉन (फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष): मॅक्रॉन यांनी भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचे (UPI, आधार) कौतुक केले आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी सोशल मीडियावर कडक निर्बंध लादण्याचे आवाहन केले.

    एन. चंद्रशेखरन (टाटा सन्स):  चंद्रशेखरन यांनी एआय (AI) ची तुलना वाफेचे इंजिन, वीज आणि इंटरनेटशी केली. आयटी उद्योगासाठी एआय (AI) हा अडथळा नसून सर्वात मोठी संधी असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

    नंदन निलेकणी (Infosys): निलेकणी यांनी डिप्लॉयमेंट गॅप (Deployment Gap) ही मुख्य अडचण असल्याचे सांगितले. एआय (AI)चा वापर करून जुन्या प्रणालींचे आधुनिकीकरण (Modernization) करणे आता आर्थिकदृष्ट्या अधिक सुलभ झाले आहे, असे त्यांनी नमूद केले.

    तात्विक पाया: तीन सूत्रे आणि सात चक्रं


    तीन सूत्रे

    या शिखर परिषदेची संपूर्ण रचना भारताच्या प्राचीन ज्ञानाला आधुनिक विज्ञानाशी जोडणाऱ्या संकल्पनांवर आधारित आहे. ही परिषद लोक (People), ग्रह (Planet) आणि प्रगती (Progress) या तीन मूलभूत सूत्रांवर उभी आहे.

    या सूत्रांच्या अंमलबजावणीसाठी सात तांत्रिक चक्रं:

    सुरक्षित आणि विश्वासार्ह एआय (AI):

    एआय (AI) सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह असावा यासाठी मजबूत नियम आणि तंत्रज्ञान आवश्यक आहे, जे सर्व देशांना एआय (AI) नियंत्रणात सहभागी होण्यास मदत करतील.

    ह्युमन कॅपिटल (मानव भांडवल):

    एआय (AI) मुळे नोकऱ्या आणि कौशल्ये बदलत आहेत, म्हणून लोकांना नवीन कौशल्ये शिकवून रोजगार संधी समानपणे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

    विज्ञान:

    एआय (AI) विज्ञान संशोधनात मोठी मदत करत आहे आणि त्याचा वापर करून जागतिक स्तरावर सहकार्य व पारदर्शक संशोधनाला चालना देणे हे उद्दिष्ट आहे.

    अनुकूलता, नवीन कल्पकता आणि कार्यक्षमता:

    एआय (AI) मुळे ऊर्जा आणि पर्यावरणावर परिणाम होतो, म्हणून कमी संसाधनात कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक एआय (AI) प्रणाली विकसित करणे महत्त्वाचे आहे.

    सामाजिक सक्षमीकरणासाठी समावेश:

    एआय (AI) सर्व लोकांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित करावा, जेणेकरून सर्व समाजघटकांना त्याचा फायदा मिळेल.

    एआय (AI) संसाधनांचे लोकशाहीकरण:

    एआयसाठी आवश्यक संगणकीय आणि डेटा संसाधने सर्व देशांना परवडणारी आणि उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे.

    आर्थिक प्रगती आणि सामाजिक कल्याण:

    एआय (AI) चा वापर करून अर्थव्यवस्था वाढवणे आणि लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सेवा आणि नवोन्मेषाला चालना देणे महत्त्वाचे आहे.

    स्वदेशी एआय: ‘भारतजेन’ आणि सार्वभौम मॉडेल्स

    इंडिया-एआय मिशन (India AI mission) अंतर्गत भारत स्वतःचे Sovereign AI (सार्वभौम एआय) विकसित करण्यावर भर देत आहे.

    भारतजेन (BharatGen): हा जगातील पहिला सरकारी अर्थसहाय्यित बहुभाषिक एआय (AI) उपक्रम आहे, जो भारताच्या सर्व २२ भाषांना सपोर्ट करतो. हे मॉडेल केवळ भाषांतर करत नाहीत, तर भारतीय संस्कृती आणि स्थानिक संदर्भांचा विचार करून उत्तरे देतात.

    सर्वम एआय (Sarvam AI): या स्टार्टअपचे ‘Sarvam-1’ आणि ‘Bulbul V3’ सारखी मॉडेल्स भारतीय भाषांमधील टेक्स्ट-टू-स्पीच आणि व्हिजन प्रणालीमध्ये क्रांती घडवून आणत आहेत.

    सामाजिक परिणाम आणि जागतिक आव्हाने

    परिषदेचा मुख्य भर एआय (AI) ला सर्वसामान्यांच्या जीवनात आणण्यावर होता. ‘एआय फॉर ऑल’ (AI for ALL), ‘एआय बाय हर’ (AI by HER), आणि ‘युवा-एआय’ (YUVAi) या तीन प्रमुख जागतिक आव्हानांद्वारे (Challenges) सामाजिक परिणाम घडवणाऱ्या स्टार्टअप्स (Startups)ना गौरवण्यात आले. आरोग्य, कृषी, हवामान बदल आणि समावेशकता या क्षेत्रातील १० विजेत्यांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

    सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात नेटवर्क-आधारित ओळख शोधण्याचे तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले, जे नागरिकांना ऑनलाइन फसवणूक आणि ‘डिजिटल अरेस्ट’ सारख्या गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी गेम-चेंजर ठरेल.

    ‘इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ ही केवळ एक तांत्रिक परिषद नाही, तर ती भारताच्या तांत्रिक आत्मविश्वासाचा आविष्कार आहे. या परिषदेने सिद्ध केले की भारत आता केवळ तंत्रज्ञानाचा वापरकर्ता राहिलेला नाही, तर तो जगाला दिशा देणारा निर्माता बनला आहे. सुरक्षित, विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक एआयच्या माध्यमातून भारत केवळ स्वतःचाच नव्हे, तर संपूर्ण जागतिक दक्षिणचा विकास सुनिश्चित करत आहे. ही परिषद ‘विकसित भारत @ २०४७’ या स्वप्नाच्या दिशेने टाकलेले एक निर्णायक पाऊल आहे.

  • कृत्रिम बुद्धिमत्ता: एका चमत्कारिक तंत्रज्ञानाची वाटचाल!

    कृत्रिम बुद्धिमत्ता: एका चमत्कारिक तंत्रज्ञानाची वाटचाल!

    आपल्या सगळ्यांच्याच घरात रिमोटवर चालणारे टीव्ही, आपल्या हातात असलेला स्मार्टफोन, किंवा कार चालवताना मिळणारे मार्गदर्शन, या सगळ्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) हात आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आत्ताच्या युगात आपल्या दैनंदिन जीवनात इतक्या सहजपणे रुतले गेलेलं हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे. सर्वप्रथम, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय ते समजून घेऊ. सोप्या शब्दांत सांगायचं तर, संगणकांना मानवी बुद्धिमत्तेसारखी शिकण्याची, समजण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता देणे हेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे ध्येय आहे. हे ध्येय गाठण्यासाठी विविध तंत्रज्ञानं वापरली जातात, जसे की मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नेटवर्क थिअरी इत्यादी.

    ai

    कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास खूप जुना नाही. १९५० च्या दशकात या संकल्पनेवर पहिली चर्चा झाली. पण त्यावेळी संगणक तंत्रज्ञान इतके विकसित नव्हते, त्यामुळे ही संकल्पना तशीच राहिली. संगणक तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर 1990 च्या दशकात त्यावर पुन्हा संशोधन सुरु झालं. आता या क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. आज robots पासून ते स्वयंचलित गाड्यांपर्यंत, AI सर्वत्र आपले अस्तित्व दाखवत आहे. आत्ता आपण वापरत असलेले Google Assistant किंवा Siri सारखे व्हॉइस असिस्टंट्स, सोशल मीडियावरील व्यक्तिगत पसंतीनुसार दिसणाऱ्या जाहीरती, तुमच्या आवडीनुसार शिफारसी देणारे ऑनलाइन स्टोअर्स हे सगळं AI चीच उदाहरण आहेत.

    आज आपण अनेक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर पाहतो आहोत, जसे की-

    • वैद्यकीय क्षेत्रात: आजारांचं निदान, औषधांचा शोध, शस्त्रक्रिया इत्यादी गोष्टींमध्ये
    • वित्तीय क्षेत्रात: धोका ओळखणं, गुंतवणूक सल्लागार, फसवणूक रोखणे इत्यादी गोष्टींसाठी
    • वाहतूक क्षेत्रात: स्वयंचलित वाहनं, वाहतूक नियंत्रण, अपघात टाळणे इत्यादी गोष्टींसाठी
    • ग्राहक सेवा: चॅटबॉट्स, कस्टमर केअर, वैयक्तिकृत जाहिराती (personalized ads) इत्यादी गोष्टींसाठी

    भविष्य काय:

    AI ची वाटचाल खऱ्या अर्थाने आत्ता कुठे सुरु झाली आहे. भविष्यात AI आपल्या आयुष्याचा अधिकाधिक भाग होणार आहे. स्वयंचलित वाहनं सर्वत्र दिसतील, तुमच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार शिक्षण आणि वैद्यकीय सेवा सर्वसामान्य होईल आणि रोबोट्स आपल्यासोबत सहकारी म्हणून काम करतील. यामुळे आपला वेळ आणि श्रम बचत होईल, नवीन संधी उपलब्ध होतील आणि आपले जीवन सुखदायी बनण्यास मदत होईल.

    तसेच, AI चा वापर योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर झाला तर मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ शकते, काही प्रमाणात बेकारी वाढू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नवीन नोकरीच्या संधी निर्माण होत आहेत. जसे की AI तज्ज्ञ, डेटा सायंटिस्ट, रोबोटिक्स इंजिनिअर इत्यादी. पण दुसरीकडे काही नोकऱ्या संपुष्टातही येऊ शकतात. जसे की कॉल सेंटरमधील ऑपरेटर्स, डेटा एंट्री ऑपरेटर्स इत्यादी. त्यामुळे या नवीन तंत्रज्ञानासोबत जुळवून घेणे आणि नवीन कौशल्य शिकणे गरजेचे आहे.

    artificial intelligence 1680769373

    भविष्यात काय करायचं?:

    कृत्रिम बुद्धिमत्तेच्या फायद्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन ते आपल्या कल्याणासाठी वापरली पाहिजेत. यासाठी खालील गोष्टी महत्वाच्या आहेत:

    शिक्षण आणि प्रशिक्षण: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात आणखी संशोधन आणि विकास करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर समाजाला या तंत्रज्ञानाची माहिती देणे आणि त्याचा योग्य वापर कसा करायचा ते शिकवणेही गरजेचे आहे.
    नियमन: AIचा अयोग्य वापर टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदे आणि नियमावली तयार करणे गरजेचे आहे.
    नैतिकता: AI तयार करताना आणि वापरताना नैतिकतेला प्राधान्य दिले पाहिजे.

    आपण जर जबाबदारीने आणि सुबुद्धीनं कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला तर ते मानवाच्या प्रगतीचं आणि कल्याणाचं एक शक्तिशाली साधन ठरू शकते. ते मानवापेक्षा हुशार होईल का? ही चर्चा अजूनही सुरू आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की, AI आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनणार आहे. हे तंत्रज्ञान आपल्या नशिबाचा खेळ खेळवणार की आपल्या मदतगार ठरणार हे आपल्या हातातच आहे. म्हणून आपण या क्षेत्रात झपाट्याने होणारी प्रगती लक्षात घेऊन त्याचा सावधपणे आणि जबाबदारीने वापर केला पाहिजे.

  • तंत्रज्ञानाच्या वापराने भविष्यातील ‘या’ 5 समस्या होणार दूर!

    तंत्रज्ञानाच्या वापराने भविष्यातील ‘या’ 5 समस्या होणार दूर!

    एकीकडे पाहिलं, तर जगभरात असा एक घटक आहे, ज्याला अन्न, शुद्ध पिण्याचे पाणी किंवा वीज यांसारख्या मूलभूत स्त्रोतांपर्यंत पोहोचता आलेलेच नाहीये. मात्र, यशस्वी व्यवसाय सुरू करताना समाजात बदल घडवून आणू इच्छिणाऱ्या अनेक टेक संस्थापकांसाठी जगाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे बदलणारे उपाय तयार करणे, हे सर्वोच्च प्राधान्य बनले आहे. अशात, या लेखातून आपण अशा ५ समस्या पाहणार आहोत, ज्या तंत्रज्ञानाद्वारे लवकरात लवकर सोडवल्या जाऊ शकतात.

    १. भूकेचा प्रश्न मिटवणे

    जगभरात दोन वेळच्या जेवणासाठी लोक वणवण भटकताना दिसतात. खरं तर, प्रत्येकाला पुरेल इतके अन्न आहे, तरीही जवळपास एक अब्जाहून अधिक लोक दररोज रात्री उपाशी झोपतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर जगात प्रचंड विषमता आहे. अनेक लोकांकडे अन्न पिकवण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी आवश्यक जमीन किंवा पुरेसे उत्पन्न नसते. तसेच, आनुवांशिक अभियांत्रिकी आणि शेती पद्धतीतील प्रगतीमुळे आपल्याला स्वस्त आणि कार्यक्षमतेने पिके वाढवता येतील. याचा अर्थ, प्रत्येकासाठी अधिक उपलब्ध आणि परवडणाऱ्या अन्नाचा स्त्रोत तयार होईल.

    Automation Farming

    २. असाध्य (Incurable) रोगावर तोडगा काढणे

    फक्त जीनोमिक्समुळे (जीनोमिक्स हे एक जैविक क्षेत्र आहे जे जीनोमची रचना, कार्य, उत्क्रांती, मॅपिंग आणि संपादन यांचा अभ्यास करते.) रोगाबद्दलची आपली समज विकसित होत नाहीये, तर आरोग्य सेवेच्या वितरणामुळेही पूर्ण बदल होत आहे. जीवशास्त्राची आपली समज जसजशी सुधारत जाईल, तसतशी आपली औषधे आणि रोग शोधण्याच्या आणि बरे करण्याच्या पद्धतीही वाढतील. जीनोमिक्सचे आपले ज्ञान सतत विकसित होत आहे, जसे की सर्वसाधारणपणे रोगांबद्दलची आपली समज आहे. पुरेशा प्रगतीमुळे, आपण लवकरच इबोला आणि मलेरिया यांसारख्या प्राणघातक रोगांचा नाश करणाऱ्या रोगांवर उपचार शोधू शकू.

    Technology Solving the incurable disease

    ३. स्वस्त आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा देणे

    येत्या काळात आपल्याला नवीन औषधे मिळाली नाही, तरीही नवीन आरोग्यसेवा तंत्रज्ञानामुळे लोकांपर्यंत स्वस्त आणि परवडणारी औषधे पोहोचवण्यात मोठा प्रभाव पडेल. हेल्थकेअर इनोव्हेटर्स हेल्थकेअर गुणवत्ता सुधारण्यासाठी सतत नवीन तंत्रज्ञानावर संशोधन करत आहेत. त्यामुळे आरोग्य क्रांती लवकरच पाहायला मिळू शकते. अशाप्रकारे आपण लवकरच आरोग्य निरीक्षण पद्धती आणि जुनाट आजार शोधण्याच्या नवीन पद्धतींमध्ये झेप घेऊ शकतो.

    Technology Providing cheap and affordable healthcare

    ४. सर्वांना दर्जेदार शिक्षण देणे

    आधीच्या काळात शिक्षण घेणे खूपच कठीण होते. मात्र, आता इंटरनेटमुळे जास्तीत जास्त लोकांना उच्च शिक्षणापर्यंत मजल मारता येत आहे. विद्यार्थी केव्हाही स्वस्त, वैयक्तिक अभ्यासक्रमांमधून कुठेही शिकू शकतात. आता विद्यार्थ्यांना एका जागी बसून शिक्षणाचे चांगले वातावरण मिळते, यामुळे त्यांना उच्च पदवी आणि उत्तम शिक्षणाचा अनुभवही घेता येतो. वर्गातील तंत्रज्ञान (In-Classroom Technology) अपंग विद्यार्थी आणि पारंपारिक वर्गात संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवण्याची संधी देते. विशेष म्हणजे, हे योग्य तंत्रज्ञानाशिवाय खूपच कठीण असते.

    Technology Providing quality education to all

    ५. प्रत्येकासाठी स्वस्त वीज निर्मिती करणे

    सध्या अक्षय ऊर्जेने वेग घेतला आहे. अलीकडेच, सौर ऊर्जा जगातील सर्वात स्वस्त ऊर्जा स्रोत बनली आहे. विकसनशील राष्ट्रांसाठी, जीवाश्म इंधनाला समर्थन देण्यासाठी महागड्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याऐवजी स्वस्त, अक्षय ऊर्जेच्या पर्यायांसह जाणे अर्थपूर्ण आणि फायदेशीर आहे. अक्षय ऊर्जा केवळ उत्पादनासाठी स्वस्तच नाही, तर ती आपल्या पर्यावरणासाठी देखील चांगली आहे, ज्यामुळे भविष्यातील ऊर्जा स्त्रोत म्हणून ती एक चांगला पर्याय बनते.

    Technology Generating affordable electricity for everyone