Category: जिद्द… उत्तुंग यशाची

  • Who is Ram Sutar? | जगातील सर्वात मोठा पुतळा उभारणारे महाराष्ट्र भूषण राम सुतार नेमके आहेत तरी कोण?

    Who is Ram Sutar? | जगातील सर्वात मोठा पुतळा उभारणारे महाराष्ट्र भूषण राम सुतार नेमके आहेत तरी कोण?

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५’ Maharashtra Bhushan Puraskar जाहीर केला आहे. यंदाचा हा पुरस्कार जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ मूर्तिकार डॉ. राम वनजी सुतार यांना प्रदान करण्यात येणार आहे. १९९५ पासून दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार आतापर्यंत पु. ल. देशपांडे, लता मंगेशकर, सुनील गावसकर, बाबासाहेब पुरंदरे, रतन टाटा, डॉ. रघुनाथ माशेलकर,  आशा भोसले, अशोक सराफ यांसारख्या २० दिग्गजांना प्रदान करण्यात आला आहे.

    डॉ. सुतार यांचा या यादीत समावेश होणे, ही केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे. या लेखात आपण त्यांच्या जागतिक शिल्पकलेतील महत्त्वपूर्ण योगदानावर सविस्तर नजर टाकूया.

    शिल्पकलेचा जन्मजात वारसा

    डॉ. राम सुतार (Ram Sutar) यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९२५ रोजी महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील गोंदूर या छोट्या गावात एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. त्यांचे वडील लोहारकाम आणि सुतारकाम करत असत, त्यामुळे लहानपणापासूनच राम सुतार यांना हस्तकलेची गोडी लागली. वडिलांसोबत शेतीची अवजारे तयार करणं, बैलगाड्या बनवणं, भिंतींवर चित्रं काढणं आणि मातीच्या वस्तूंना आकार देणं यामध्ये त्यांची कलात्मकता विकसित होत गेली.

    गावात शिक्षणाची नीट सोय नसल्यामुळे त्यांनी मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण नातेवाईकांकडे राहून पूर्ण केलं. लहानपणापासूनच कलेची आवड असल्याने पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई गाठली. तिथे शिकताना त्यांची शिल्पकलेची प्रतिभा अधिक खुलत गेली. १९५२ साली पदवी संपादन करताना त्यांनी मेयो सुवर्णपदक मिळवलं. याच संस्थेतील शिक्षणाने त्यांचं कौशल्य अधिक विकसित झालं आणि त्यांच्या कारकिर्दीला नवा आयाम मिळाला.

    शिल्पकलेचा वैश्विक प्रवास

    १९५४ मध्ये डॉ. राम सुतार (Ram Sutar) यांनी छत्रपती संभाजीनगर नगर (औरंगाबाद) येथे भारतीय पुरातत्त्व खात्यात नोकरीला सुरुवात केली. त्यांच्याकडे अजिंठा-वेरूळ येथील प्राचीन शिल्पांची देखभाल आणि पुनर्बांधणी करण्याची जबाबदारी होती. या काळात त्यांनी प्राचीन भारतीय शिल्पकलेचा सखोल अभ्यास केला, जो त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला.

    १९६० मध्ये त्यांनी चंबळ नदीवरील गांधीसागर धरणाजवळ चंबळ देवीचे भव्य शिल्प साकारलं. या कलाकृतीमुळे त्यांना संपूर्ण देशभरात ओळख मिळाली आणि एक कुशल मूर्तिकार म्हणून त्यांची प्रतिष्ठा वाढली. यानंतर त्यांच्या कलाकृतींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी वाढू लागली.

    डॉ. सुतार यांनी केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात आपल्या प्रतिभेची छाप सोडली आहे. त्यांनी तयार केलेले पुतळे संसद भवन, राष्ट्रपती भवन, विविध राज्यांच्या विधानसभांमध्ये तसेच अनेक आंतरराष्ट्रीय स्थळी प्रतिष्ठित आहेत. असंख्य मूर्ती आणि पुतळे  घडवून त्यांनी भारतीय शिल्पकलेला जागतिक स्तरावर पोहचवलं आहे.

    स्टॅच्यू ऑफ युनिटी – एक स्वप्नपूर्ती

    डॉ. राम सुतार (Ram Sutar) यांनी साकारलेली स्टॅच्यू ऑफ युनिटी ही त्यांच्या शिल्पकलेतील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध कलाकृती आहे. हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंच पुतळा आहे, जो जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जातो. या भव्य शिल्पामुळे त्यांच्या कलेला जागतिक स्तरावर ओळख मिळाली आणि भारताच्या शिल्पकलेचा गौरव वाढला. हे शिल्प देशाच्या एकतेचं प्रतीक आहे आणि आपल्या ऐतिहासिक वारशाची आठवण करून देतं.

    लहानपणी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची चित्रं पाहून त्यांच्या मनात अशीच भव्य मूर्ती घडवण्याचं स्वप्न निर्माण झालं होतं. स्टॅच्यू ऑफ युनिटी तयार करून त्यांनी हे स्वप्न साकार केलं. या पुतळ्यातील हावभाव आणि बारकावे अत्यंत काळजीपूर्वक घडवले गेले आहेत, ज्यामुळे सरदार पटेल यांचा व्यक्तिमत्त्वाचा भव्यपणा अधिक ठळक झाला. त्यांच्या या अद्वितीय कामगिरीमुळे भारताच्या शिल्पकलेचा नवा अध्याय लिहिला गेला आहे.

    महत्त्वाची शिल्पकृती आणि कारकीर्द

    डॉ. राम सुतार हे प्रसिद्ध शिल्पकार असून, त्यांनी आपल्या कलेत नेहमीच गुणवत्ता आणि नावीन्य जपले आहे. त्यांनी कधीही आपल्या कामाशी तडजोड केली नाही. त्यांचा स्टुडिओ आजही अनेक कलाकार, विद्यार्थी आणि अभ्यासकांसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांची प्रतिभा इतकी अद्वितीय आहे की, त्यांची तुलना जगप्रसिद्ध शिल्पकार मायकेल एंजेलो आणि रोडिन यांच्यासोबत केली जाते.

    त्यांनी ७५ वर्षांच्या कारकीर्दीत जगभर २०० हून अधिक व वेगवेगळ्या शिल्पकृती तयार केल्या आहेत. भारताच्या संसद भवन परिसरात त्यांनी शिवाजी महाराज, महात्मा गांधी, सरदार पटेल, पं. नेहरू, इंदिरा गांधी, भगतसिंग आणि महात्मा फुले यांचे १६ भव्य पुतळे साकारले आहेत.

    डॉ. सुतार यांनी केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही आपली कला पोहोचवली आहे. त्यांनी टोकियो येथे रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा साकारला. तसेच, फ्रान्स, इटली, इंग्लंड, रशिया, अर्जेंटिना आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्येही त्यांच्या शिल्पकृती पहायला मिळतात. विशेष म्हणजे, त्यांनी महात्मा गांधींच्या ४५० हून अधिक मूर्ती जगभर उभारल्या आहेत.

    पुरस्कार आणि सन्मान

    डॉ. राम सुतार यांच्या अद्वितीय शिल्पकलेसाठी त्यांना १९९९ मध्ये पद्मश्री, २०१६ मध्ये पद्मभूषण आणि २०१८ मध्ये टागोर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यांच्या कलेची दखल संपूर्ण जगाने घेतली असून, त्यांनी आपल्या शिल्पकृतींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अमिट छाप उमटवली आहे.

    याशिवाय, फ्रान्समधील इकोले सुपीरियर रॉबर्ट डी सोरबोन विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. त्यांच्या अथक परिश्रमाची आणि कलासाधनेची आणखी एक मोठी पावती म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार

    व्यक्तिगत आयुष्य 

    राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार हे देखील प्रसिद्ध मूर्तिकार आणि वास्तुविशारद आहेत. वडिलांच्या मार्गावर चालत त्यांनीही अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्प पूर्ण केले आहेत. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. आणि राम सुतार फाइन आर्ट्स प्रा. लि. या त्यांच्या कंपन्या आज जगातील सर्वात मोठ्या शिल्पनिर्मिती फर्म्सपैकी एक मानल्या जातात.

    नोएडा आणि गाझियाबाद येथील त्यांच्या अत्याधुनिक स्टुडिओ आणि फाउंड्रीमध्ये जर्मनीतील यांत्रिक रोबोट्स, सीएनसी मशीन यांसारखी आधुनिक साधने वापरून भव्य शिल्पं घडवली जातात. अनिल सुतार यांनी वडिलांसोबत अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करून भारतीय शिल्पकलेचा ठसा आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटवला आहे.

    मित्रांनो, डॉ. राम सुतार यांचा जीवनप्रवास हा सातत्य, मेहनत आणि कलेसाठी समर्पणाचा उत्तम आदर्श आहे. वयाच्या शंभराव्या वर्षातही ते आपल्या कार्यात सक्रिय आहेत, हे त्यांच्या जिद्दीचं आणि कलेवरील प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान होणं, ही केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांना खऱ्या अर्थाने “भारताचे सच्चे शिल्पकार” म्हणता येईल.

    आणखी वाचा:

  • अंध असूनही वयाच्या २३व्या वर्षी उभी केली ५०० कोटींची कंपनी

    अंध असूनही वयाच्या २३व्या वर्षी उभी केली ५०० कोटींची कंपनी

    तो श्रीकांत, ज्याने त्याच्यावर होणाऱ्या भेदभावाविरुद्ध इथल्या सरकारला कोर्टात उभं केलं, तो श्रीकांत ज्याने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना वचन दिलं की, तो देशाचा पहिला अंध राष्ट्रपती बनून दाखवेल, तो श्रीकांत ज्याची चिकाटी आणि जिद्द पाहून रतन टाटा आणि देशातील मोठमोठ्या उद्योजकांनी त्याची पाठ थोपाटली आणि तोच श्रीकांत ज्याने असं कर्तृत्व गाजवलं की, त्याच्या आयुष्यावर चित्रपट सुद्धा आला. त्याने  हे खरं करुन दाखवलं की, स्वप्न पाहण्यासाठी डोळ्यांची गरज नाही, स्वत:वरील विश्वास तुम्हाला तुमचंय इप्सित गाठून देऊ शकतो. आज, नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून त्याच्या या प्रेरणादायी प्रवासावर एक नजर फिरवूया. 

    जन्मजात संघर्ष

    श्रीकांत बोल्ला याचा जन्म 7 जुलै 1991 रोजी आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम जवळील सीतारामपुरम येथे झाला. श्रीकांत जन्मतःच अंध होता, ज्यामुळे त्याच्या जीवनाला सुरुवातीपासूनच आव्हानात्मक वळण मिळाले. त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल होतं. वडील दामोदरराव आणि आई वेंकटम्मा हे साधारण शेती करणारे जोडपं, ज्यांचे महिन्याचं  उत्पन्न केवळ १६०० रुपये होतं. त्यामुळे लहानपणीच त्यांना गरिबीचा सामना करावा लागला. परिस्थिती आधीच हलाखीची होती आणि त्यात अंध मुलाच्या जन्मामुळे त्यांच्या कुटुंबावर अधिकच निराशा पसरली.

    Srikanth Bolla Education 2024 05 0eaebd9d52503763ca585db10d960f22

    गावातील काही लोकांनी सल्ला दिला की , “याला मारून टाका, नाहीतर आयुष्यभर दुःख सहन करावं लागेल. हा मुलगा कामाचा नाही; जन्मतः अंध असणं हे पाप आहे.” परंतु, श्रीकांतच्या आई-वडिलांनी कोणत्याही कथित शुभचिंतकाचं न ऐकता आपल्या मुलाला मोठं केलं. त्यांना विश्वास होता की, एक दिवस हा मुलगा चमत्कार करून दाखवेल.

    सुरुवातीला, वडिलांनी त्याला शेतीची कामे शिकवायचा प्रयत्न केला, पण अंधत्वामुळे त्याला ती कामे करता येत नव्हती. त्यामुळे वडिलांना वाटले की, त्याने शाळेत जाऊन अभ्यास करून नाव कमवावे. त्यानुसार, त्याला शाळेत दाखल करण्यात आले. त्यानेसुद्धा जिद्दीने शिक्षण घेतले. दिसत नसल्यामुळे, तो लहानपणी भावांच्या मदतीने शाळेत जात असे. शाळेतही त्याला नेहमी शेवटच्या बाकावर बसावे लागे. ही सगळी अवहेलना सहन करताना त्याला प्रचंड वाईट वाटत असे. सततच्या अवहेलनांमुळे एकदा त्याने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, वडिलांनी त्याला सांगितले की, शिक्षणाच्या माध्यमातूनच तुझे आयुष्य बदलू शकते. हे ऐकल्यानंतर श्रीकांतने कधीही मागे वळून पाहिले नाही. सगळं सहन करत, प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर त्याने शिक्षण पूर्ण केलं.

    शिक्षण मिळावं म्हणून सरकारला खेचलं कोर्टात 

    श्रीकांतला अंध मुलांच्या शाळेत टाकण्यात आलं. ही शाळा त्यांच्या गावापासून साधारणतः 400 किमी दूर होती, त्यामुळे त्याला  हैदराबादमध्ये जावं लागलं. त्याने हार न मानता मन लावून अभ्यास केला, परिणामी त्याला इयत्ता 10वीमध्ये 96 टक्के आणि 12 वीमध्ये 98 टक्के मार्क्स मिळवले. या गुणांच्या आधारे त्याने  पुढील शिक्षण विज्ञान शाखेत घेण्याचा निर्णय घेतला.

    तरीही, त्याला  विविध महाविद्यालयांमधून प्रवेश मिळवण्यात अडथळे आले, कारण त्या काळात अंध विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शाखेतून शिक्षण घेण्याची व्यवस्था अस्तित्वात नव्हती. पण श्रीकांतची ठाम इच्छा आणि जिद्द त्याला यशस्वी होण्यासाठी प्रेरित करत होती. त्याने आपल्या हक्कासाठी सरकारविरुद्ध कोर्टात केस दाखल केली आणि थेट सरकारलाच कोर्टात खेचलं. हा खटला सुमारे सहा महिने चालला आणि त्यात श्रीकांतला विजय मिळाला. त्यानंतर, त्याने विज्ञान शाखेत प्रवेश मिळवला आणि  विज्ञान शाखेतून अभ्यास करणारा  पहिला  दृष्टीहीन विद्यार्थी बनला. तेव्हा दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शाखेतील पुस्तकं उपलब्ध नव्हती, त्यामुळे श्रीकांतने त्यावर तोडगा काढला. त्याने  विज्ञान शाखेच्या पुस्तकांचे ऑडिओ व्हर्जन तयार करून अभ्यास सुरू केला. श्रीकांतचा हा संघर्ष आणि त्याच्या धाडसाने केवळ स्वतःच्या जीवनातच नव्हे, तर अंध विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या क्षेत्रातही एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.

    All you need to know about Srikanth Bolla

    भारतात उच्चशिक्षण मिळालं नाही म्हणून गाठली थेट अमेरिका

    श्रीकांतने १२ वी नंतर आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अप्लाय केलं. त्यांने देशातील विविध आयआयटी आणि आयआयएम्समध्ये पात्रता परीक्षेचा अर्ज भरला. परंतु, हॉल तिकीट येण्याऐवजी त्याला एक पत्र प्राप्त झालं, ज्यात स्पष्टपणे सांगितलं गेलं की, ‘तुम्ही अंध आहात म्हणून तुम्ही परीक्षेला बसू शकत नाही’. हे ऐकून श्रीकांतला खूप वाईट वाटलं, पण त्याने या अडचणीला नकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी ठामपणे सांगितलं की, ‘आयआयटी मला स्वीकारत नाही, तर मलाही आयआयटीची गरज नाही.’

    आयआयटीने त्याला नाकारलं, पण त्याच्या डोळ्यांत इंजिनिअर होण्याचं स्वप्न अजूनही होतं. त्या नकारानंतर, श्रीकांतने अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच एमआयटी आणि इंग्लंडच्या केंब्रिजमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला आणि चमत्कारिकरित्या, त्याला एमआयटीमध्ये प्रवेश मिळाला. त्यालाच मॅनेजमेंट सायन्समध्ये शिकण्यासाठी स्कॉलरशिपदेखील मिळाली, ज्यामुळे तो एमआयटीमध्ये शिकणारा पहिला आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी बनला. एमआयटी ही अमेरिकेमधील एक अत्यंत प्रतिष्ठित तांत्रिक संस्था आहे.

    श्रीकांतने दिलेल्या संधीचा उत्कृष्ट उपयोग केला आणि एमआयटीमध्ये अत्यंत मेहनतीने अभ्यास केला. अखेर, तो  एमआयटीमधून उत्तीर्ण होणारा पहिला आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी ठरला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला अमेरिकेतील अनेक कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळू लागल्या, पण श्रीकांतने अमेरिकेत काम करण्यासाठी नकार दिला. कारण त्याला आपल्या देशासाठी आणि देशातील लोकांसाठी काहीतरी करायचं होतं.

    असा सुरु केला यशाचा प्रवास 

    वर म्हटल्याप्रामाणे त्याला देशातील अंध, गरीब आणि दुर्बल लोकांसाठी काहीतरी चांगलं करायचं होतं आणि म्हणूनच तो शिक्षण पूर्ण करून मायदेशी परतला. आपल्या कामात गुंतल्यावरच श्रीकांतच्या कार्याची खरी गती सुरू झाली.

    1008738 srikanth bolla

    2012 मध्ये, श्रीकांतने भारतात “बोलंट इंडस्ट्रीज” नावाची ग्राहक खाद्य पॅकेजिंग कंपनी स्थापन केली. या कंपनीत पाने आणि कागदापासून पर्यावरणपूरक म्हणजेच इको-फ्रेंडली पॅकेजिंग तयार केली जाते. सुरुवातीला एकाच ठिकाणाहून सुरू झालेल्या या कंपनीने आज 7 युनिट्स उभारली आहेत. 2012 पासून कंपनीने मासिक 20% दराने वाढ नोंदवली आहे. कंपनीची वार्षिक उलाढाल 200 कोटींवर पोहोचली असून, तिचं मूल्य सुमारे 400 कोटींहून अधिक आहे.

    श्रीकांतच्या कंपनीने अशा प्रकारची प्रगती केली आहे की, 2021 मध्ये फोर्ब्सने त्याला “30 अंडर 30 एशिया” यादीत स्थान दिले. या यादीत स्थान मिळवणारे व्यावसायिक 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात आणि आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करत असतात. श्रीकांतने आपल्या कार्याने एक नवा मानक निर्माण केला आहे आणि त्याची प्रेरणादायक कथा आजच्या युवांसाठी एक आदर्श ठरली आहे.

    श्रीकांतच्या आयुष्यात एक असा टप्पा आला की, त्याला आपल्या व्यवसायासाठी निधी मिळवण्यात अडचणी येत होत्या. या कठीण परिस्थितीत, भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी श्रीकांतच्या कंपनीत 1.3 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीमुळे श्रीकांतच्या व्यवसायात लक्षणीय वाढ झाली. टाटा यांच्यासोबतच सतीश रेड्डी, एसपी रेड्डी, श्रीनी राजू, चलमला सेट्टी आणि रवी मंथ यांच्याही गुंतवणुकीचा फायदा श्रीकांतच्या कंपनीला झाला.

    आज श्रीकांतच्या कंपनीत 1500 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, ज्यात बहुसंख्य कर्मचारी दिव्यांग आहेत. श्रीकांतने आपल्या सहकाऱ्यांसह 8 जणांच्या टीमसह कंपनीची स्थापना केली होती, ज्यामध्ये बेरोजगार आणि अंध व्यक्तींना रोजगार दिला गेला. व्यवसायाच्या वाढीमुळे अन्य लोकांनाही रोजगार मिळाला. 

    पुरस्कार आणि मानसन्मान 

    श्रीकांतला त्याच्या यशाबद्दल त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये प्रतिष्ठित युवा सेवा पुरस्कार मिळाला जो समाजातील युवा वर्गासाठी असामान्य कार्यासाठी प्रदान केला जातो. या व्यतिरिक्त तेलुगु फाइन आर्ट्स सोसायटीचा युवा उत्कृष्टता पुरस्कार, तसेच त्याच्या उद्योजकीय क्षमतांना लक्षात घेऊन २०१५ साली युवा उद्योजक पुरस्कार दिला गेला. 2018 साली समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी बिझनेस लाइन यंग चेंज मेकर पुरस्कार दिला गेला,शिवाय, श्रीकांत भारताच्या अंध क्रिकेट संघातही खेळला आहे, जे त्याच्या विविध अंगभूत गुणांचं द्योतक आहे.

    त्याच्या आयुष्याचा एक प्रसंग येथे विशेष नमूद करावासा वाटतो. तो म्हणजे साल 2006 मध्ये त्या वेळचे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी ‘लीड इंडिया 2020’ सुरू केले, ज्यात तरुणांना मार्गदर्शन करून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याची संधी दिली गेली. श्रीकांतही त्या निवडक तरुणांमध्ये होता. कलाम सर सर्व मुलांशी संवाद साधत होते आणि त्यांना विचारले की, तुम्ही भविष्यात काय करणार आहात? त्या मुलांनी दिलेल्या उत्तरांमध्ये, नववीत शिकणाऱ्या श्रीकांतचे उत्तर राष्ट्रपतींना विशेष लक्षात राहिले. श्रीकांतने सांगितले की तो देशाचा पहिला अंध राष्ट्रपती बनू इच्छितो. श्रीकांतच्या या उत्तरात असणाऱ्या आत्मविश्वासामुळे कलाम सर प्रभावित झाले आणि त्यांनी त्याची प्रशंसा केली.

    Srikant Bolla 6

    श्रीकांतची कहाणी ही खरंच प्रेरणादायी आहे. त्याच्या जीवनातील संघर्ष आणि त्यावर मात करत त्यांनी केलेली प्रगती, आपल्यासाठी एक मोठा धडा आहे. श्रीकांतचे आयुष्य हे एक प्रेरणास्त्रोत आहे, ज्यातून आपल्याला शिकायला मिळते की कोणत्याही परिस्थितीत हार मानू नये आणि नेहमीच आपल्या ध्येयाच्या दिशेने धैर्याने आणि आत्मविश्वासाने वाटचाल करावी.

    आणखी वाचा

  • शार्क टॅंकमधील नमिता थापर, भारतातील एकमेव Phar’Maa’ चा असा आहे प्रवास…

    शार्क टॅंकमधील नमिता थापर, भारतातील एकमेव Phar’Maa’ चा असा आहे प्रवास…

    आता जर का इतिहासात डोकावून पाहिलं तर पैशांचा शोध लागण्यापूर्वी लोक मालाची/वस्तूंची देवाण-घेवाण करून (Barter System Of Exchange) संसाराची गाडी ओढायचे याचा प्रत्यय येतो, त्यामुळे व्यवसाय हा आपल्या जगण्याचा भाग आधीपासूनच होता असं म्हणायला हरकत नाही. तेव्हापासून ते आतापर्यंत भारतीय उद्योजक विश्वात अनेक नावं जोडली गेली आणि त्यांपैकी गाजणारं आणि अनेक लोकांसाठी प्रेरणा बनलेलं एक नाव म्हणजे नमिता थापर होय… 

    काय आहे शार्क टॅंक इंडिया?

    नमिता थापर हे नाव ऐकलं की सर्वात अगोदर डोळ्यांसमोर उभा राहतो तो म्हणजे भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रात बऱ्यापैकी नाव कमावलेला कार्यक्रम; शार्क टॅंक इंडिया (Shark Tank India). तुम्हाला माहिती आहे का? शार्क टॅंक हा काही प्रामुख्याने भारतीय कार्यक्रम नाही. वर्ष 2001 मध्ये जपानमधून या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती, पूढे अमेरिकेमधील ABC वाहिनी आणि नंतर भारतात सोनी वाहिनीवरून याचे प्रक्षेपण व्हायला सुरुवात झाली. या कार्यक्रमात उद्योजक बनण्याची किंवा व्यवसाय वाढवण्याची इच्छा मनात घेऊन आलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना मदत केली जाते आणि भारतात शार्क टॅंक इंडिया म्हटलं की, “So for that reason, I am OUT!!” म्हणणारी नमिता हमखास सर्वांना आठवते.

    80 81 2 sixteen nine 1

    नमिता थापर: बालपण आणि शिक्षण 

    एम्क्युअर फार्मासुटिकल्सची (Emcure Pharmaceuticals) सर्वेसर्वा आणि शार्क टॅंक या  कार्यक्रमामध्ये सर्वांची ‘Pharm’माँ’ बनलेल्या नमिताचा जन्म पुण्यातला. वर्ष 1977 मध्ये सतीश आणि भावना मेहता यांच्या पोटी जन्म घेतलेल्या नमिता यांनी प्राथमिक ते थेट CA पर्यंतचं शिक्षण पुण्यातून पूर्ण केलं आणि पुढे MBA चं शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेच्या दिशेने झेप घेतली, अमेरिकेतील प्रसिद्ध ड्यूक विद्यापीठातून नमिता थापर यांनी सदर पदवी प्राप्त केली असून परदेशातच त्यांच्या हेवा वाटावा अश्या करियरचा श्रीगणेशा झाला होता.

    करियरच्या सुरुवातीला उद्योजिका बनण्याच्या विचार कदाचित नमिता यांच्या मनात नसावा कारण एक किंवा दोन नाही तर तब्बल सहा वर्ष त्यांनी अमेरिकेतील गायडंट कॉर्पोरेशनमध्ये कामाचा पक्का अनुभव कमावला आहे. 

    भारतात परतल्यानंतर एम्क्युअर फार्मासुटिकल्स हा त्यांनी निवडलेला दुसरा पर्याय होय. नमिता थापर यांचे वडील म्हणजेच सतीश मेहता हेच सदर कंपनीचे संस्थापक असल्याने नमिता यांच्यावर कोवळ्या वयातच व्यवसायाचे संस्कार झाले होते, आणि आत्ताच्या घडीला त्या कमावत असलेलं नाव हे याच पक्क्या शिकवणीचा परिणाम म्हणावा लागेल. आपण म्हणतोच ना, ‘जे पेरावं, तेच उगवतं’ नमिता थापर देखील याच उक्तीचं मूर्तिमंत उदाहरण वाटतात. 

    व्यवसाय आणि शार्क टॅंक

    आपल्यापैकी अनेकजण नमिता थापर यांना ओळखतो ते शार्क टॅंकमुळे, त्यामुळे व्यावसायिक क्षेत्रात नसलेल्या नमिता या नेमक्या कोणत्या कारणाने व्यवसायाच्या दिशेने वळल्या असतील आणि शार्क टॅंकपर्यंत नेमकी कशी मजल मारली असेल हे प्रश्नचिह्न कायम राहतंच. तर सहा वर्ष अमेरिकेत नोकरी केल्यानंतर नमिता भारतात परतल्या. सतीश मेहता यांनी वर्ष 1981 मध्ये एम्क्युअर फार्मासुटिकल्सची स्थापना केली होती. सुरुवातीला चीफ फायनान्शिअल ऑफिसर (CFO) म्हणून व्यवसायात उतरलेल्या नमिता यांनी अथक मेहनत, परिश्रम आणि हुशारीच्या जोरावर फक्त काही काळातच कंपनीच्या एक्झिक्युटीव्ह डिरेक्टर (Executive Director) ची धुरा सांभाळायला सुरुवात केली.

    भारताच्या इतिहासाची पानं उलटून पहिली तर घरात चूल आणि मूल सांभाळणाऱ्या महिला दिसतात, मात्र आताच्या घडीला त्याच महिला चूल आणि मुलासोबत स्वतःचे अस्तित्व देखील घडवतात, नव्हे इतरांना प्रोत्साहन देतात. खरोखर आपल्या भारताचं बदलणारं हे चित्र किती मोहक आहे. नमिता थापारच नाही तर त्यांच्यासारख्या अनेक महिलांचा हा प्रवास पहिला कि आपला देश खऱ्या अर्थाने सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहे याची जाणीव होते आणि अभिमानाने उर भरून येतो. 

    namita thapar net worth 01

    शार्क टॅंक इंडिया या कार्यक्रमामुळे भारतीय व्यवसायांना किंवा उद्योगांना खऱ्या अर्थाने नाव आणि दर्जा मिळायला सुरुवात झाली.या कार्यक्रमाच्या माध्यमातून अमन गुप्ता, अनुपम मित्तल, पियुष बन्सल, विनिता सिंग यांच्यासारखे विविध क्षेत्रातील उद्योजक नवख्या व्यवसायांना आर्थिक मदत तसेच मार्गदर्शनही करतात. नमिता थापर यांना कैकवेळा “ये मेरी एक्सपर्टरीज नाही, so for that reason I am out!” या त्यांच्याच वाक्यासाठी टार्गेट केलं जातं, किंवा सोशल मीडियाच्या जगात त्यांच्यावर अनेक मिम्स देखील बनवले जातात. सोशल मीडियावर अशा चर्चा रंगात असल्या तरीही नमिता थापर सलग तीन वर्ष या कार्यक्राचा भाग बनून राहिल्या आहेत आणि ही बाब नरजेआड करता येत नाही. नमिता यांची चालण्या-बोलण्याची पद्धत असुद्या किंवा व्यवसायातील त्याचा दांडगा अनुभव या सर्व घटकांमुळे नमिता अनेक जणांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत एवढं मात्र नक्की. 

    महिला उद्योग आणि नमिता

    वरती म्हटल्याप्रामणे जुन्या भारतात महिलांना घराबाहेर पडत काम करण्याला परवानगी नसायची. जी स्त्री समाजाच्या विरुद्ध जात हे धाडस करू पाहायची तिला वाळीत टाकलं जायचं. महिलांचं काम म्हणजे केवळ घर सांभाळणं एवढ्यापुरतं मर्यादित करण्यात आलं होतं आणि परिणामी इच्छा, आवड आणि कौशल्य असूनही त्या केवळ चार भिंतींच्या आड दडून राहायच्या. शेकडो वर्षांनंतर का होईना पण देश बदलत आहे. नमिता आणि इतर अनेक महिला विविध क्षेत्रांमधून हे बदल घडवून आणत आहेत. 

    शार्क टॅंक इंडिया या कार्यक्रमानंतर नमिता थापर या नावामुळे भारतातील उद्योजक आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात धूम उडाली आहे. स्वतःच्या व्यवसायाला नवीन उंची देण्यासाठी नमिता यांनी HR, डोमेस्टिक मार्केटिंग (Domestic Marketing) आणि फायनान्स (Finance) या क्षेत्रांमध्ये अनेक बदल घडवून आणले. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या कंपनीने आत्तापर्यंत ३००० पेक्षाही अधिक वैद्यकीय प्रतिनिधींच्या द्वारे १ बिलीयन डॉलर्सच्या घरात योगदान दिले आहे. 

    शार्क टॅंक इंडियाच्या माध्यमातून त्यांनी Brandsdaddy, Wakao Foods, Your Foot Doctor, Kabaddi Adda यांसारख्या अनेक स्टार्टअप्सना (Start-Ups) मदत केली. इनक्रेडिबल व्हेंचर्सच्या (Incredible Ventures) अंतर्गत तरुणांच्या मनात व्यवयसायची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुंबई, बंगलोर, पुणे आणि चेन्नई अश्या प्रमुख शहरांमध्ये नमिता मार्गदर्शनपर वर्ग राबवतात. या उपक्रमांमधून नमिता नवनवीन व्यावसायिक कल्पना तरुणांपर्यंत पोहोचवतात. शार्क टॅंकमध्ये त्यांनी केलेल्या गुंतवणुकीचा जर का तुम्ही आढावा घेतला तर त्या नेहमीच नाविण्याच्या शोधात दिसतात. 

    सोशल मीडियावर जरी आपण नमिता यांच्या “I am Out” या वाक्याची खिल्ली उडवत असलो तरीही यातून एक गोष्ट नक्कीच शिकण्यासारखी आहे ती म्हणजे जर का अट्टाहासाने एखादी गोष्ट करूनही त्यातून आपलं नुकसानच होणार असेल तर अशी आव्हानं स्वतःवर ओढवूं घेऊ नये. “ये कचरा नही हैं, It has a lot of Potential” या वाक्याचा देखील नेटकऱ्यांनी चुकीचा अर्थ घेतला होता, मात्र इथे आपण समजून घेतलं पाहिजे कि एखादी गोष्ट जर का इतरांच्या कमी येत नसेल, तर ती कामाची नाही असं होत नाही, आपण स्वतःचे कौशल्य वापरून त्यामधून  नवनिर्मिती नक्कीच घडवून आणू शकतो. नमिता यांच्या सतत हसऱ्या चेहऱ्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जवळपास ६०० कोटी रुपयांची मालकीण असलेल्या नमिता थापर यांना आत्तापर्यंत इकॉनॉमिक टाइम्सच्या (Economic Times) ‘40 under Forty’ Award, Barclays Hurun Next Gen Leader Recognition, Economic Times 2017 Women Ahead List, World Women Leadership Congress Super Achiever Award अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. 

    आणखी वाचा:

  • आठवी नापास ते हजारो कोटींचा मालक. सीबीआय, रिलायन्स चालतात याच्या इशाऱ्यावर- त्रिशनित अरोरा

    आठवी नापास ते हजारो कोटींचा मालक. सीबीआय, रिलायन्स चालतात याच्या इशाऱ्यावर- त्रिशनित अरोरा

    ३० वर्षीय त्रिशनित उद्योजक, एका कंपनीचा मालक आणि लेखक आहे.  त्याची ‘हॅकर टॉक’ आणि ‘हॅकिंग विथ स्मार्टफोन’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 2017 मध्ये त्याचे नाव ‘50 Most Influential Young Indians’ या  GQ मासिकाच्या यादीत नोंदवले गेले. ‘Fortune India’ च्या अंडर 40 यादीत सुद्धा त्याचे नाव आहे. एवढंच काय तर पुढे जाऊन फोर्ब्सच्या प्रतिष्ठित ‘30 अंडर 30’ यादीत सुद्धा त्याने स्थान मिळवले. TAC Security या कंपनीचा तो संस्थापक आहे. ही कंपनी सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करते. विविध कॉर्पोरेट कंपन्या आणि त्यांच्या सायबर सुरक्षेमधील त्रुटी शोधून मार्गदर्शन करणे हे या कंपनीचे मुख्य काम आहे.

    trishneet arora ceo TAC security

    एथिकल हॅकींग म्हणजे नेटवर्क, सिस्टीम इन्फ्रास्ट्रक्चरची सुरक्षा इव्हॅल्युएट करणे. म्हणजे कोणत्याही कंपनीची, संस्थेची सायबर सुरक्षा भेदली जाऊ नये यावर हे हॅकर्स लक्ष ठेवतात. तसेच डेटा चोरी, व्हायरस घुसविणे अशा प्रकारांपासूनही संरक्षण देतात. त्रिशनित भारतीय गुप्तचर संस्था सीबीआय, रिलायन्स, अमूल, पंजाब पोलिस, गुजरात पोलिस, एवन सायकल्स यासारख्या सुमारे ५०० कंपन्यांना ही सेवा त्याच्या कंपनीच्या माध्यमातून देतो आहे. रिपोर्ट्स नुसार दिग्दर्शक सुनील बोहरा त्रिशनितच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यावर काम करत आहेत. हा चित्रपट हंसल मेहतांद्वारा दिग्दर्शित केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. या लेखाच्या माध्यमातून त्रिशनित चा संपूर्ण प्रवास आपण जाणून घेणार आहोत.

    अशी झाली हॅकिंगची सुरुवात

    त्रिशनितचा जन्म 2 नोव्हेंबर 1993 रोजी पंजाबमधील लुधियाना मध्ये झाला. शालेय जीवनापासूनच त्याला संगणकाची आवड होती. तेव्हा त्याला स्वत:चा वैयत्तिक संगणक हवा होता, परंतु मध्यमवर्गीय घरात सहसा एकाच संगणक असतो जो सर्वांच्या कामासाठी वापरला जातो. त्रिशनितचे कुटुंब याला अपवाद नव्हते. त्याला संगणक आणि त्याच्या एकूणच कार्यप्रणाली बद्दल खूप उत्सुकता होती. एकेदिवशी त्याने घरातील संगणकाच्या वायर्स काढून त्याचे निरीक्षण करायला सुरुवात केली. त्याने निर्माण केलेल्या या गोंधळामुळे घरी मॅकॅनिक बोलवावा लागला. त्याच्या दुरुस्तीच्या प्रक्रियेचे त्रिशनितने बारीक निरीक्षण केले आणि त्याचा त्याला पुढे जाऊन फायदा झाला. 

    B 38

    आठवीत नापास झाल्यावर त्याचे मित्रही त्याची चेष्टा करू लागले तेव्हा त्याने शाळा सोडली व बाहेरून बारावीची परिक्षा दिली. एकीकडे एथिकल हॅकींग सुरू होतेच. वयाच्या २१ व्या वर्षी त्याने कंपनी स्थापन केली व अवघ्या दोन वर्षात त्याच्या कंपनीकडे ५०० हून अधिक क्लायंट आले. TAC Security कंपनी सुरु केली तेव्हा तो केवळ 19 वर्षांचा होता.  आश्चर्याची बाब म्हणजे त्यावेळी त्रिशनितच्या आई-वडिलांनी सुद्धा त्याला या गोष्टीसाठी पूर्ण पाठिंबा दिला होता. त्याने सुरुवातीला संगणक दुरुस्त करणे आणि हार्डवेअर दुरुस्त करणे अशी कामे केली.  त्याला 19 व्या वर्षी तब्बल 60,000 रुपयांचा चेक मिळाला. पुढे जाऊन हेच पैसे त्याने आपल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वापरले. जेवढे काही साठवले होते तेवढ्या सर्वच बचतीचा उपयोग कंपनी उभा करण्यासाठी केला गेला असे त्रिशनित सांगतो. 

    TAC सिक्युरिटी सध्या जगभरातील ग्राहकांसह आंतरराष्ट्रीय ख्यातीची सायबर सुरक्षा प्रदान करणारी कंपनी आहे. या कंपनीची सध्याला भारतात 4 आणि दुबईमध्ये 1 अशी 5 कार्यालये आहेत. देशातील प्रमुख कायदे अंमलबजावणी संस्थांसह, TAC सिक्युरिटीचे ग्राहक म्हणून रिलायन्स आणि अमूल देखील आहेत. शिवाय, विविध सध्याच्या डिजिटल व्यवहारांचा कणा असलेली UPI प्रणाली, या तरुण टेक प्रतिभावंताच्या देखरेखीखाली तयार करण्यात आली आहे. त्रिशनित आता त्याचा व्यवसायाची उलाढाल ८ हजार कोटींवर नेण्याची आशा बाळगून आहे.

  • तुम्ही भंगार म्हणून जे फेकून देता, त्यातून ‘तो’ महिन्याला लाखो रुपये कमावतो – प्रमोद सुसरे

    तुम्ही भंगार म्हणून जे फेकून देता, त्यातून ‘तो’ महिन्याला लाखो रुपये कमावतो – प्रमोद सुसरे

    वडील वीटभट्टीवर कामाला. घरी एकरभर शेती आणि त्यावर चालणारे कुटुंब. प्रमोद दहावीपर्यंत शिकला, अभ्यासात जेमतेमच हुशार होता. समोर ध्येय काही नव्हते, पण दहावीला चांगले मार्क मिळाले आणि सायन्सला प्रवेश मिळाला. बारावीला मार्क कमी मिळाले, पण नशिबाने सीईटीच्या मार्कांच्या जोरावर प्रमोदने इंजीनियरिंगला ऍडमिशन घ्यायचं ठरलं. पण त्यासाठी फी भरायला पैसे नव्हते. प्रमोदला डिप्लोमाला टाकले गेले.

    कुटुंबाला मदत होईल म्हणून तो शिकता शिकता पार्ट टाईम जॉब करू लागला. महिना 8000 रुपये पगार त्याला मिळत होता. त्यात फी आणि इतर खर्च भागवून तो घरी देखील पैसे पाठवत होता. तिथे त्याच्या क्रिएटिव्ह आयडियाचा फायदा त्याच्या मॅनेजरला होत होता आणि प्रमोदला मिळत होता, तो तुटपुंजा पगार. मनात खूप वेळा विचार आला, की नोकरी सोडून व्यवसाय चालू करावा, पण घर प्रमोदच्या पगारावर चालायचं. यामुळे तो हे धाडस करू शकत नव्हता. माणूस कशाचेही सोंग आणू शकतो, पण पैशाचे सोंग कधीही आणता येत नाही. शेवटी त्याने निर्णय घेतला, नोकरी करत करत व्यवसाय करायचा.

    turns scrap into swanky furniture

    मग काय, प्रमोदने स्वस्त किंमतीत काही टायर आणि ड्रम विकत घेतले आणि ड्रिल मशीनसह उर्वरित वस्तू सेकंड हँडच्या दुकानातून मिळवून काम सुरू केले. ऑफिसमधून आल्यावर दररोज चार ते पाच तास फर्निचर बनवू लागला.

    The Scrap King
    2021 12 31

    एक ऑर्डर ५० हजार ते एक लाखपर्यंत उत्पन्न देते. आतापर्यंत त्याने २० हुन अधिक हॉटेल्स आणि कॅफेसाठी फर्निचर बनवले आहे. पुणे, मुंबई, सातारा, नाशिक, सांगली इतकंच नव्हे, तर चेन्नई, हैदराबाद, गुजरात, दिल्ली इथपर्यंत प्रमोदच्या ऑर्डर पोचल्या आहेत. मार्च २०२१ मध्ये त्याने पहिली इंटरनॅशनल ऑर्डर मिळवली, साऊथ आफ्रिकेहून. तीही तितक्याच सचोटीने पूर्ण केली. आज तो अमेरिकेसारख्या देशामध्ये देखील आपला व्यवसाय पसरवण्याची स्वप्न बघत आहे. त्यासाठी प्रयत्न करत आहे.

    हा लेख व्हिडिओमध्ये पहा
  • फ्लिपकार्ट: भारतातील ई-कॉमर्सची यशाची कहाणी

    फ्लिपकार्ट: भारतातील ई-कॉमर्सची यशाची कहाणी

    भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. कोणत्याची देशाची युवाशक्ती ही त्या देशाची सर्वांत मोठी शक्ती आणि संपत्ती मानली जाते. आज ट्विटरचे CEO पराग अग्रवाल असो किंवा मायक्रोसॉफ्टचे सत्य नाडेला किंवा गुगलचे सुंदर पिचाई असो… भारतीय तरुण जगात आपला डंका वाजवत आहेत. ही गोष्ट आहे, अशाच २ तरुणांची, ज्यांनी भारतीयांच्या खरेदी करण्याच्या पद्धतीची दिशाच बदलून टाकली. ते दोन तरुण म्हणजे, फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल…

    सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल, आडनावावरून हे दोघे तुम्हाला भाऊ वाटतील, पण हा निव्वळ योगायोग आहे. IIT दिल्लीमधून बी-टेक करणारे हे दोघे मित्र फार मजेशीररित्या एकमेकांना भेटले. डिग्री पूर्ण करून संपूर्ण कॉलेज उन्हाळी सुट्टीसाठी घरी गेलं असताना, आपला अपूर्ण प्रकल्प पूर्ण करत हे दोघे बसले होते. तिथंच या दोघांची भेट झाली. पदवीनंतर दोघेही नोकरीसाठी बेंगलोरला गेले, तिथं त्यांची  मैत्री अजून घट्ट झाली. पुढे सचिनने 2006 मध्ये ॲमेझॉनमध्ये काम करायला सुरुवात केली, तर बिन्नीसुद्धा 2007 मध्ये ॲमेझॉनमध्ये रुजू झाले.

    व्यावसायिक दृष्टिकोन असणाऱ्या दोघांनाही लवकरच Amazon मधील नोकरीचा कंटाळा आला आणि नवनवीन आयडिया त्यांच्या डोक्यात येऊ लागल्या. ई-कॉमर्सची आवड असल्याने त्यांनी अनेक वेबसाईटची तुलना करणारी वेबसाईट बनवायची ठरवली. इतर वेबसाईट पाहत असताना त्याच्या लक्षात आले कि, या वेबसाईट्सची डिझाईन खूपच खराब आहे. त्यांना एक अशी ई-कॉमर्स वेबसाईट बनवायची होती जी ग्राहकांना चांगला अनुभव देईल.

    महिन्याला दोघही आपल्या पगारातून थोडे पैसे बाजूला काढत होते. अखेरीस जराही वेळ न दवडता दोघांनी Amazon सोडले. प्रत्येकी २ लाख गुंतवत त्यांनी २००७मध्ये स्वतःच्या फ्लॅटमधूनच फ्लिपकार्ट ही कंपनी चालू केली. सुरुवातीच्या काळात फ्लिपकार्टने आपले लक्ष फक्त पुस्तकं विकण्यात केंद्रित केले होते. ऑर्डर आल्यानंतर पोस्टाने घरपोच डिलिव्हरी केली जायची. २ महिन्यांनी त्यांना पहिली ऑर्डर मिळाली. या पहिल्या ऑर्डरचा किस्सासुद्धा फार रंजक आहे.

    आजच्या तेलंगणामधील मेहबूबनगरमध्ये राहणारे व्ही. व्ही. के. चंद्रा हे फ्रीलान्स वेब कन्सल्टन्ट होते. त्यांना पुस्तकं वाचायचं भारी वेड होतं. त्यामुळं ते प्रत्येक वेळी ९० किलोमीटरचा प्रवास करून हैद्राबादला जात आणि पुस्तकं खरेदी करत. त्यांना Leaving Microsoft to Change the World हे पुस्तक वाचायचं होतं, पण ते त्यांना कुठंच मिळेना. चंद्रा टेकनॉलॉजिशी संबंधित ब्लॉग इंटरनेटवर लिहित होते. त्यांच्या एका ब्लॉगच्या खाली एक कंमेंट होती. सचिन बंसल यांची. त्या कमेंटमध्ये एक लिंक होती www.flipkart.com. हे काहीतरी वेगळं दिसतंय म्हणून त्यांनी त्या लिंकवर क्लिक केलं, तर त्यांना ऑनलाइन पुस्तक विकणारी साईट दिसली जी संपूर्ण भारतात कुठेही पुस्तकांची डिलिव्हरी करत होती. वेबसाईट अगदी विश्वसार्ह वाटल्यामुळे चंद्रानी त्याच्यावर पुस्तक ऑर्डर केलं. ही ऑर्डर गेल्यावर बंगळुरूमधील २ खोल्यात राहणाऱ्या सचिन आणि बिन्नी बंसल याना खूप आनंद झाला. कारण त्यांच्या व्यवसायासाठी हे पाहिलंच पाऊल होत, पण थोड्याच वेळात त्यांच्या लक्ष्यात आलं की हे पुस्तक कोठेच उपलब्ध होईना. अनेक दुकानदारांशी संपर्क केल्यानंतर एका दुकानात त्यांना एक प्रत सापडली, पण ती खूप जुनी होती आणि तिची पानं पिवळी पडली होती. बिन्नी बन्सल यांनी चंद्राना फोन करून ही सगळी माहिती दिली. त्यावर चंद्रानी ते जसं आहे, तसं देण्यास सांगितल. नंतर २ दिवसांनी चंद्राना पुस्तक मिळालं, तर फ्लिपकार्टला पहिली ऑर्डर पूर्ण केल्याचं समाधान. त्यावर चंद्राना १०% डिस्काउंट मिळाला.

    २००७ ची ती परिस्थिती अशी होती कि, भारतात फक्त ५ कोटी लोकंच इंटरनेट वापरत होती. त्यातही बार्गेनिंग म्हणजेच घासाघीस करणे हा जन्मसिद्ध हक्क समजणाऱ्या भारतीयांना ऑनलाईन शॉपिंग करणे कितपत रुचणार हे अनिश्चित होते. अशा परिस्थितीत फ्लिपकार्टचं हे पाऊल खरंच फक्त धाडसाचं नव्हतं तर क्रांतिकारी होतं.

    सप्टेंबर २००९ मध्ये फ्लिपकार्टने गुंतवणूकदारांकडून १ अब्ज डॉलर्स उभे केले. याबरोबरच २ जणांनी सुरु केलेल्या फ्लिपकार्टमध्ये १५० कर्मचारी भरती झाले.  

    आता फ्लिपकार्ट हे भारतातील पुस्तकप्रेमींसाठी पसंतीचे व्यासपीठ बनत होत, स्टार्टअप त्याचे पुढचे पाऊल टाकण्यासाठी सज्ज होत होतं . नवीन भागीदार आणि अधिक गुंतवणुकीसह, फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स श्रेणीमध्ये प्रवेश करण्यास तयार होत. त्यामुळे त्यांनी 2010 मध्ये मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विकण्यास सुरुवात केली.

    फ्लिपकार्टला अजून ग्राहकांच्या विश्वासाचा खूप मोठा पल्ला गाठायचा होता. भारतामध्ये सुरुवातीला ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी घाबरत होते कारण लोकांची अशी धारणा होती की पेमेंट केल्यानंतर जर प्रॉडक्ट्स मिळाले नाही तर? यावर उपाय काढत फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय सुरू केला. हा पर्याय सादर करणारी पहिलीच ई-कॉमर्स कंपनी होती. घेतलेली वस्तू जर खराब लागली, तर रिटर्न पॉलिसी देऊन फ्लिपकार्टने ग्राहकांचा विश्वास कमावला.

    सप्टेंबर २०१३ मध्ये कंपनीने स्वतःचं अँड्रॉइड ऍप लाँच केलं. डिसेंबर २०१४ पर्यंत कंपनीची मार्केट व्हॅल्यू ११ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली. टाईम मासिकाच्या २०१६ च्या जगातील १०० प्रभावशाली लोकांच्या यादीत सचिन आणि बिन्नी दोघांचाही समावेश करण्यात आला. मार्च २०१७ मध्ये भारतीय ई-कॉमर्स बाजारपेठेतील ३९.५ टक्के हिस्सा एकट्या फ्लिपकार्टच्या होता. 

    मिंत्रा, जबॉंगसारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना विकत घेत फ्लिपकार्टने आपला प्रवास वेगाने चालू ठेवला होता. पण 2018 मध्ये, अमेरिकेची बलाढ्य ई-कॉमर्स कंपनी वॉलमार्टने फ्लिपकार्ट 16 अब्ज डॉलर्सला म्हणजेच एक लाख 7 हजार कोटी रुपयांना विकत घेतले आणि Flipkart मधील सचिन आणि बिन्नी यांचा दशकभराचा प्रवास संपला. दहा वर्षांपूर्वी दोन तरुण ॲमेझॉनच्या ऑफिसमध्ये नोकरी करत होती. पुढच्या दहा वर्षात ॲमेझॉनला याच दोन कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या कंपनीशी टक्कर द्यावी लागेल, असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं.

    सचिन बन्सल यांनी भारतातील वाढत्या फिनटेक स्पेसवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘नवी टेक्नॉलॉजीज’ ही कंपनी सुरू केली, तर बिन्नी बन्सल यांनी त्यांच्या xto10x टेक्नॉलॉजीज नावाच्या उपक्रमाद्वारे  स्टार्टअप संस्थापकांना व्यवसाय वाढविण्यात मदत करणारी टेकनॉलॉजि विकसित केली.

    खरेदीच्या बाबतीत चोखंदळ असणारा भारतीय ग्राहक जोपर्यंत वस्तू हाताळत नाही, पारखत नाही, तोपर्यंत खरेदी करत नाही; अशा आपल्या नागरिकांना इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी करायची सवय लावणारे सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी खऱ्या अर्थाने खरेदीचा नवा पायंडा पाडला.

    असं म्हणतात कि, आपण ज्या लोकांच्या सहवासात असतो, त्याप्रमाणे आपलं करिअर, भविष्य घडत असतं. सचिन आणि बिन्नी या मित्रांची जोडी या असंच काहीसं आपल्याला शिकवून जाते. बिन्नी आणि सचिन यांनी सुरू केलेल्या एका ‘स्टार्टअप’ला मिळालेले हे यश केवळ पैशांच्या मोजमापातच नव्हे, तर सर्वार्थाने अभूतपूर्व आहे. फ्लिपकार्टमुळे भारतात स्टार्टअप संस्कृती वाढण्यास फायदा झाला.

    तर ही होती फ्लिपकार्टच्या संस्थापकांची जीवन कहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि हो जाताना सबस्क्राईब करायला विसरू नका.