समाजामध्ये वावरण्यापेक्षा आजकाल समाज माध्यमांमध्ये वावरणं जास्त महत्वाचं झालंय! दिवसाचा बराच वेळ या समाज माध्यमांमध्ये घालवण्यात आपण गुंग असतो. आपलं दिसणं, आपलं बोलणं, आपलं वागणं, आपलं राहण्याचं ठिकाण, आपण काय खातो, काय पितो, आवडी निवडी या सगळ्या गोष्टींची माहिती या समाजमाध्यमांना आपण वेळच्यावेळी पुरवतच असतो.
फेसबुक! जगातलं सर्वात लोकप्रिय समाज माध्यम. जगभरातील कोट्यावधी लोक या प्लॅटफॉर्मवर आहेत. आपल्यासारखे सर्वचजण मित्रांशी आणि कुटुंबीयांशी डिजिटली कनेक्ट राहण्यासाठी फेसबुकचा वापर करतात, पण एवढ्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर अकाउंट हॅक होण्याची शक्यतासुद्धा तेवढीच जास्त आहे. वर सांगितल्याप्रमाणे आपण दिवसेंदिवस या समाज माध्यमांना वैयक्तिक माहिती पुरवतच असतो. कितीतरी खाजगी गोष्टी आपल्या या अकाउंटवरच असतात. त्यामुळे तुमचं फेसबुक अकाउंट सिक्युअर करणं हे खूप महत्त्वाचं आहे. काही सोप्या सिक्युरिटी टिप्सना फॉलो करुन तुम्ही तुमचे फेसबुक अकाउंट अधिक सुरक्षित ठेवू शकता. त्या टिप्स कोणकोणत्या आहेत जाणून घेऊया.
मजबूत आणि युनिक पासवर्ड वापरा:-
पासवर्ड हे हॅकर्सच्या विरूद्ध तुमच्या सुरक्षिततेचे पहिले पाऊल आहे. त्यामुळे तुम्ही एक मजबूत आणि युनिक असा पासवर्ड निवडणं महत्वाचं आहे, ज्याचा अंदाज लावणं कोणालाही सोपं नसेल. तुमची जन्मतारीख, नाव, कार नंबर इत्यादींचा पासवर्ड म्हणून कधीही वापर करू नका. बरेच लोकं दुसरे पासवर्ड लक्षात राहणार नाहीत म्हणून याच गोष्टींचा वापर करतात. पण याचा अंदाज लावणं हे कोणत्याही सामान्य व्यक्तीसाठीसुद्धा सोप्पं आहे. त्यामुळे नेहमी एखाद्या स्ट्रॉंग पासवर्डचा वापर करा जो लक्षातही राहायला हवा.
Unknown Accounts वरून friend request accept करू नका:-
आपण सगळीकडे ऐकतो, पाहतो की अनोळखी लिंक ओपन करायच्या नाहीत, अगदी त्याचप्रमाणे तुम्ही ओळखत नसलेल्या लोकांच्या friend request देखील स्वीकारू नका, अशी शिफारस खुद्द फेसबुककडूनच केली जाते. Facebook च्या एका सर्व्हेनुसार असं लक्षात आलंय की जर तुम्ही Unknown Accounts वरून friend request accept करत असाल, तर तुमचं खातं हॅक होण्याची शक्यता जास्त असते
संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नका :-
Account सुरक्षित ठेवताना घ्यायच्या काळजीमधील दुसरी टिप म्हणजे फेसबुक युजर्सनी त्यांना मिळालेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. विशेषत: जर तुम्हाला माहीत नसलेल्या लोकांद्वारे ही लिंक आली असेल किंवा एखाद्या अनोळखी ग्रुपमध्ये रँडमली कोणी टाकली असेल तर अजिबात लिंक ओपन करु नका. अशावेळी त्या लिंकवर क्लिक करण्यामुळे तुमचं अकाउंट हॅक होऊ शकतं.
Two-factor authentication (2FA) active करा:-
2FA हा फेसबुकवर असणारा ऑप्शन active करणं account सुरक्षेसाठी फार गरजेचं आहे. हे सुरु करण्यासाठी फेसबुकच्या सेटिंगमधील सिक्युरिटी ऑप्शनमध्ये तुम्हाला जावं लागेल. हे करत असताना तुम्हाला तुमचा registered Mail ID आणि Contact Number verify करावा लागेल. तर या option मुळे तुम्ही Facebook वर registered नसलेल्या डिव्हाइसवरून लॉग इन करताना तुम्हाला तुमच्या ओळखीचं व्हेरिफिकेशन करावं लागेल. यामुळे जर कधी दुसऱ्या कोणी लॉग-इन करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला त्याचं notification सुद्धा येईल.
जर तुम्हीही या चार महत्त्वाच्या स्टेप्स फॉलो केल्या, तर तुमचं फेसबुक अकाउंट हॅकर्सपासून नक्कीच सुरक्षित राहील. अशाच नवनवीन टिप्स ट्रिक्स जाणून घेण्यासाठी “नवी अर्थक्रांती”च्या वेबसाईटला भेट देत रहा.
शेतकऱ्यांना परिस्थितीचा सामना करता यावा तसेच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या घालाव्या लागू नयेत म्हणून सरकारने अनेक वेबसाईट आणि पोर्टल्स उपलब्ध करुन दिलेले आहेत. ज्याद्वारे शेतकऱ्यांना अनेक हिताच्या योजनांची घरबसल्या माहिती घेता येऊ शकते. शिवाय कृषी विभागाचे मार्गदर्शनही मिळवता येऊ शकते.
1. माती आरोग्य कार्ड योजना
मातीचं आरोग्य तपासून पीक घेण्यासाठी शासनाकडून सॉईल हेल्थ कार्ड ही योजना सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कार्ड मिळवण्यासाठी जवळच्या सेतू किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध असेल अशा ठिकाणी जाऊन www.soilhealth.dac.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर या पोर्टलमध्ये आपले स्वतःचे खाते तयार करावे लागते. या कार्डअंतर्गत त्या भागातील प्रयोगशाळेत मातीचे आरोग्य तपासले जाते. त्यावरुन संबंधित शेतातील मातीत कोणते पीक चांगले येऊ शकेल, त्याला पोषक औषधे आणि त्यांचे प्रमाण कसे असावे, याची माहिती मिळवता येते. या सुविधेमुळे शेतकरी आपल्या शेतीला पोषक असे पिक घेऊ शकतात. या संकेतस्थळावर मराठी भाषेसह एकूण 22 भाषांचा पर्याय उपलब्ध आहे.
2. शेतकरी पोर्टल
शेतकरी www.farmer.gov.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर त्यांचे गाव, गट, जिल्हा किंवा तालुका निवडावा लागतो. त्यानंतर आवश्यक त्या पीकासंबंधित माहिती किंवा कीटकनाशके, पीककर्ज यांबाबत सर्व विस्तृत माहिती या वेबसाईटवर मिळते. ही माहिती आपल्याला समजणाऱ्या भाषेतील मजकूर, एसएमएस, ई-मेल किंवा ऑडिओ किंवा व्हिडीओ अशा स्वरुपात दिली जाते. गृहपृष्ठावर देण्यात आलेल्या भारताच्या नकाशाद्वारे सहजपणे या पातळ्यांवर जाता येते. शेतकऱ्यांना विशिष्ट प्रश्न विचारता येतील तसेच प्रतिक्रियाही देता येते.
3. मेरा किसान पोर्टल
हे एक मोबाईल किसान पोर्टल म्हणून परिचित आहे. www.mkisan.gov.in या वेबसाईटवर शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध प्रकारची माहिती मिळवता येते. त्यासाठी अगोदर या संकेतस्थळाचा सदस्य होणं आवश्यक आहे. त्यानंतर शेतकरी थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. तसेच मोबाईल सेवेद्वारे एसएमएसद्वारेही माहिती मिळवू शकतात. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्हीही भाषांचा पर्याय या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
4. पंतप्रधान पीक विमा योजना
शेतकऱ्यांवर विम्याचे कवच असावे यासाठी सरकारने ही योजना सुरु केली. या योजनेतर्गत प्रत्येक पिकावर विमा पद्धत उपलब्ध आहे. www.agri-insurance.gov.in या वेबसाईटवर मेंबर होणं गरजेचे आहे. त्यानंतर विम्यासाठी ऑनलाईन अर्जही करता येतो. स्वत:शी संबंधित सर्व माहिती भरल्यानंतर हिंदी भाषेत पुढील पर्याय उपलब्ध आहेत.
5. पंतप्रधान कृषी विकास योजना
शेतकरी पावसावर अवलंबून असतो. मात्र हे अवलंबित्व कमी करुन प्रत्येक शेतात पाणी पोहचवण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली. शेतात पाणी साठवणे, सिंचन आणि जलसंधारणाचे विविध पर्याय www.pmksy.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सोबतच शासनाच्या या उपक्रमांतर्गत येणाऱ्या सर्व योजनांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
6. राष्ट्रीय शेती बाजार
शेतकऱ्यांना त्यांचा माल आवडत्या बाजारात विकता यावा किंवा ग्राहकांना कोणत्या मालाचा बाजारबाव काय आहे याची घरबसल्या माहिती घेता यावी या उद्देशाने राष्ट्रीय शेती बाजार या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. agmarknet.dac.gov.in या संकेतस्थळावर जाऊन शेती मालाचा सध्याचा बाजारभाव तसेच ग्राहकांनाही ऑनलाईन बाजारभाव पाहता यावा याविषयीचे पर्याय उपलब्ध आहेत. पीक निवडून राज्य, जिल्हा, तालुका आणि जवळची बाजारपेठ निवडणे असे पर्याय या संकेतस्थळावर आहेत.
7. ई-राष्ट्रीय शेती बाजार
राष्ट्रीय शेती बाजार या योजनेप्रमाणेच शेतीमाल विक्री किंवा बाजारात शेतीमाल येण्याची वेळ, बाजारभाव आणि खरेदी विक्री यांची माहिती www.enam.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सध्या या संकेतस्थळावर देशभरातील काही मुख्य बाजारपेठांचा समावेश केला आहे. त्या बाजारपेठेमध्ये सध्या कोणत्या शेतीमालाला काय बाजारभाव मिळत आहे, हे पाहता येते. सोबतच ग्राहकांना देखील या संकेतस्थळाद्वारे खरेदी करण्यासाठी बाजारभावाविषयी खात्रीशीर माहिती मिळवता येते.
8. राष्ट्रीय यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान पोर्टल
शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीची कास धरायला लावणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. www.farmech.dac.gov.in या वेबसाईटला भेट दिल्यानंतर शेतीत आधुनिकीकरण कसं आणावं याबाबत सर्व माहिती उपलब्ध आहे. कोणत्या पिकासाठी कोणत्या यंत्राचा कसा वापर करावा ते या वेबसाईटवर व्हिडीओसह उपलब्ध आहे. यामुळे आधुनिक पद्धतीने शेती करणं सोप आहे…
तुम्हाला आजचा लेख कसा वाटला हे कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.
कल ओळखण्याची गरज काय आहे? याबाबतची माहिती आपण पाहिली. त्यावर अजून थोडे जाणून घेणे गरजेचे आहे. काही लोकांना आयुष्याच्या सूरवातीला असणाऱ्या उपजत क्षमतांची जाणीव झाली. त्यांनी त्यावर काम केले व त्यांना त्या-त्या क्षेत्रात यशस्वी होता आले. काही लोकांना त्यांच्या क्षमताबाबत आयुष्याच्या अगदी शेवटी लक्षात आले, त्यांच्या उपजत क्षमतावर त्यानी काम केले व त्यात त्यांची ओळख निर्माण केली.
तर काही लोक त्यांच्यातल्या उपजत क्षमता न जाणताच मरुन गेले. मात्र त्यांना त्यांच्या आयुष्यात साध्या साध्या गोष्टीसाठी झगडावे लागले, मोठा संघर्ष करावा लागला. मात्र काही लोकांना त्यांच्यातल्या योग्य सुप्त गुणांचा शोध लागला नसला तरी त्यांनी आपल्या क्षमतांवर मात करत जीवनात यश मिळवले.
एखाद्याला लहानापणापासूनच तबला वाजवण्याची आवड असेल, त्याला तबला वाजवण्याचे चांगले प्रशिक्षण मिळाले, तर तो चांगला तबलावादक बनू शकेल. मात्र त्याला सूरवातीच्या काळात नुसते लिहणे वाचणे इतर गोष्टीचे शिक्षण जबरदस्तीने देत गेले तर तो ना चांगला तबला वाजवू शकेल, ना चांगला विद्यार्थी बनू शकेल. लिहता वाचता येणे गरजेचे आहे. त्याची सुध्दा जीवनात एक महत्त्वाची भूमिका आहे.
एक मुलगा कधी विहिरीजवळ गेला नाही, पोहण्याचा आणि त्याचा कधीही संबंध आला नाही. आणि आयुष्याची चाळिशी उलटून गेल्यावर (तो एक गृहस्थ बनल्यावर) त्याने एकदा पोहायचा प्रयत्न करुन पाहिला. काही दिवसातच त्याला उत्तम पोहता सुध्दा येऊ लागले. त्याच्यात जन्मतःच पोहण्याची कला होती. मात्र त्या क्षेत्राचा व त्याचा कधीही संबंध न आल्याने त्याला ते योग्य वयात समजले नाही. चाळीस वर्षे उलटून गेल्यावर समजले तेव्हा तो काहीही करु शकला नाही. हेच जर अगदी लहान वयात समजले असते तर तो उत्तम जलतरणपटू होऊ शकला असता.
गेलेल्या संधीवर रडत बसून चालणार नाही. हा लेख वाचताना कदाचित आपले बरेच वय निघून गेलेले असेल. त्यावर खंत करुन काहीही फायदा होणार नाही. आता सुध्दा वेळ गेलेली नाही. माणूस काय एकच क्षमता घेऊन जन्माला येत नाही. आपल्याकडे असणाऱ्या अनेक क्षमतापैकी आपण सध्या बरेच काही साध्य करु शकू अशा क्षेत्रात काम केल्यास अजूनही यश खेचून आणण्याची जिगर आपल्याकडे नक्कीच आहे. म्हणून आपल्यातल्या क्षमतांचा शोध कायम घेत राहणे गरजेचे आहे. ज्याला आपल्या उपजत क्षमतांचा शोध लागला आहे. त्यांनी त्यावर काम करत राहिले पाहिजे.
आपली अवस्था कस्तुरीमृगासारखी आहे. कस्तुरी ही मृगाच्या नाभीतच असते. मात्र तो मृग संपूर्ण जंगलभर तिच्या शोधात सैरावैरा धावत असतो. विद्यार्थ्यांनी सुध्दा आपल्याला कोणते विषय आवडतात? शिकण्याची कोणती पध्दती आवडते? शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कोणत्या गोष्टी आपण करु शकतो? आपला खरा आनंद कशात आहे? याचा शोध घेत राहिले पाहिजे. पालकांनी यासाठी मुलांना मदत केली पाहिजे. या क्षमता ओळखण्याच्या काही पध्दती आहेत. त्यासाठी काही चाचण्या आहेत. काही परिक्षा आहेत किंवा काही शास्त्रीय पध्दतीने विकसित केलेली तंत्रज्ञाने बाजारात उपलब्ध आहेत. त्यात आपला कल ओळखून आपला मार्ग निवडला पाहिजे. जीवनात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, करिअर प्रत्येक क्षेत्रात करता येते. जीवनात आवश्यक असलेली आर्थिक सुबत्ता आपण सर्व क्षेत्रातून प्राप्त करुन घेऊ शकतो. तेव्हा आपला आनंद शोधा. आपल छंद हेच आपले काम असेल तर आपल्याला त्या कामाचा कधीही कंटाळा येणार नाही.
सध्याच्या काळात डीएमआयटी सारख्या टेस्टच्या माध्यमातून प्रत्येकामध्ये असलेले गुण जाणून घेता येतात. या टेस्टसाठी खर्च जरुर करावा लागतो. मात्र आयुष्यात पुढे वाया जाणारी वर्षे वाचवली जाऊ शकतात. मला लोकसंवाद साधायची उपजत देणगी लाभली आहे, तिचा उपयोग करुन मी आपल्या पर्यंत पोहोचत असतो. अशा या कला व शिकण्याच्या पध्दतीतून ओळखून त्याचा विकास करण्याबाबत ची माहिती उद्याच्या लेखात पाहू या. धन्यवाद.
आयुष्यात पैशाचे योग्य नियोजन नसल्यावर समाजात घडणाऱ्या घटना पहा. मुलगी लग्नाला आली, पैसे नाहीत. मग मित्रांकडे, पाहुण्यांकडे हात पसरतो, जमीन विकतो, कर्ज काढतो, सावकाराकडून पैसे घेतो. अचानक आजारी पडला, अपघात झाला, दवाखान्याचा मोठा खर्च, पैसे नाहीत, काय करायचे? उसने पैसे मागा, जमीन विका, दागिने गहाण टाका. मुलाच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत, कर्ज काढा, जमीन विका. हे सर्व होते, योग्य आर्थिक नियोजन नसल्यामुळे.
आपण बऱ्याचदा पाहतो, म्हसोबाला बोकड कापतो, पाच हजार खर्च, ताईबाईला सवासण्या घालतो, दोन हजार खर्च, सत्यनारायण पुजा घालणे, चार हजार खर्च. असे एका कुटुंबाचे वर्षाला ३० ते ४० हजार रुपये वायफळ खर्च होतात; पण पर्सनल फायनान्स, गुंतवणूक, उद्योग, करिअर प्लॅनिंग, आरोग्य इत्यादी विषयी पुस्तके खरेदी करण्यात एक हजार रुपये तरी आपण खर्च करतो का? जर आपण अर्थसाक्षर होणारच नाही, तर मग आपण श्रीमंत होणार कसे.
आजारपण, अपघात सांगून येत नाही हे आपणास माहीत आहे, मग आपण आरोग्य विमा काय असतो याचा अभ्यास केला आहे का? मुलीच्या लग्नासाठी खर्च येतो माहित आहे, मग तिच्या जन्मापासूनच आपण काही गुंतवणूक का करीत नाही? मुलाच्या शिक्षणाचा मोठा खर्च १२वी नंतर सुरू होतो, मग त्यासाठी आपण काय प्लॅनिंग करतो. आपला महिन्याला येणारा पगार, उत्पन्न सर्व जगण्यावरच खर्च होतो. बचत व गुंतवणूकीच्या नावाने बोंबाबोब चालू असते. महिन्याच्या पगारात घरखर्च चालत नाही, तर बचत काय व कशी करणार. त्यामुळे आर्थिक साक्षरता ही काळाची गरज आहे, नाहीतर महाभयंकर परिणामांना सामोरे जावे लागेल.
आत्महत्या, कर्जाचा बोजा सहन न होणे, खाजगी सावकाराला संपत्ती जाणे, जप्ती, पैशाअभावी उपचार न मिळाल्याने मरण, आर्थिक नियोजन नसल्याने उतारवयात वृध्दाश्रमाची वाट धरायला लागणे अशा अनेक घटना आपण समाजात नेहमी पाहतो. तसेच पैशांअभावी मुलांची करिअर थांबणे, मुलींचं लग्न न होता कुठल्यातरी मुलाबरोबर पळून जाणे अशा नामुष्कीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. ज्यांनी आपल्या जमिनी विकल्या, त्या आर्थिक नियोजन नसल्यामुळेच. आज प्रत्येक महिन्याला १ हजाराची बचत व गुंतवणूक भविष्यात खूप मोठ्या कामाला हातभार लावू शकते. देव, उपासतापास, नवस, राजकारण, साड्या, आहेर, रुसवेफुगवे, मोर्चे, आंदोलने, पक्ष ह्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीने आर्थिक साक्षरतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आर्थिक निरक्षरता ही समाजाला किती महागात पडली आहे, गेल्या ५-६ दशकात समाज कसा गरीब होत चालला आहे हे आपण पाहतच आहोत. त्यामुळे ‘पैशाला पैसा लावावा, पैशाने पैसा वाढवावा.’
तुम्हीही आर्थिक साक्षर व्हा आणि त्यासाठी काय करणार हे आम्हाला नक्की सांगा आणि विषय आवडल्यास लेख लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी नवी अर्थक्रांतीला फॉलो करा.
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विस्डम या मालिके अंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे निर्णयक्षमता नसल्यास खूप मोठे नुकसान होते… करायची सुरवात?
सुनील या ग्रामीण भागातील एक तरुण. शाळेत हुशार होता, ७५ ते ८०% गुण मिळवायचा, १२ वी नंतर बीसीए केले. नोकरी करावी का व्यवसाय, का स्पर्धा परीक्षा द्यावी यात गोंधळलेला होता. दरम्यान बीसीए झाल्यानंतर १-२ वर्ष स्पर्धा परीक्षा देऊन पाहिल्या, परत नोकरीसाठी पुण्याला जाऊन आला. नंतर म्हणाला आता काहीतरी उद्योग व्यवसाय करू. कोणता करावा हे शोधण्यात २-३ वर्षे अजून घालवली. कशात काय ठरत नाही.
घरची स्थिती मध्यमवर्गीय. वडील छोटेसे किराणा दुकान चालवतात. थोडी शेती, त्यात वय वाढत चाललेले, घरच्यांना काळजी वाटू लागली व नातेवाईकांमधीलच एका दहावी नापास झालेल्या मुलीशी फारसा विचार न करता त्याचे लग्न लावून दिले व किराणा दुकान इथून पुढे तूच चालव म्हणून वडिलांनी सांगितले.
अशाचप्रकारे निर्णयक्षमता नसल्यामुळे सुनीलसारख्या लाखो हुशार मुलांचं आयुष्य बरबाद होतं. तुम्हाला आयुष्यात काय करायचंय याचा निर्णय घ्यायला वेळ लावू नका, नाहीतर वेळ व हे जग तुमचा निर्णय घेईल. वेळ व जग ठरवेल तेच आयुष्यभर करण्याची वेळ तुमच्यावर येईल. सुमार बुध्दीचा, पण निर्णयक्षमता असणारा माणूस आयुष्यात धाडसाने पुढे जातो; पण निर्णयक्षमता नसणारा अत्यंत हुशार माणूससुध्दा आयुष्यात खूप मागे पडतो. शेवटी मिळेल ते काम, नोकरी करून जीवन जगायला लागतं. आपलेच शाळेचे मार्कलिस्ट स्वतःच बघत बसतो. तो आपल्या मुलांनाही सांगत नाही, की मला इतके मार्क पडायचे, कारण मुलं म्हणतील की तुम्ही एवढे हुशार होता, तर मग अजून इथेच कसे. हल्लीची मुलं इंटरनेटमुळे इतकी हुशार झालीत, की पहिल्यासारखं लेमन गोळ्या, चॉकलेट देऊन लहान मुलांना भूलथापा द्यायचे दिवस गेले. शेवटी अशा निर्णयक्षमता नसणार्या पण हुशार माणसाचे आयुष्य असेच छोटेमोठे काम, रोजगार, नोकरी करण्यात निघून जाते.
आपण शाळेत इतके हुशार होतो, पण आयुष्यात खूप मागे राहिलो याची खंत त्याच्या मनाला आयुष्यभर लागत असते. त्यामुळे आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याला खूप मोठे महत्व आहे. एकदा गेलेली वेळ परत येत नाही व वेळेनुसार अनेक संधी निघून जातात व शेवटी हताश होण्याशिवाय पर्याय नसतो. लोकांना भेटा, वाचा, निर्णय घेण्यास वेग द्या व आपल्याला सुनील होण्यापासून वाचवा.
तुमच्या आयुष्यात अशी काही घटना घडली असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेल ला आताच सब्स्क्राइब करा
काही दिवसांपूर्वी आमच्या ऑफीसमध्ये व्यवसाय मार्गदर्शन घेण्यासाठी दोन शेतकरी आले होते, एक म्हणजे अनिलराव ते एक मोठे शेतकरी आहेत. तसेच त्यांच्याकडे मळणीयंत्र ट्रॅक्टर व अर्थमुव्हिंग वाहने म्हणजे जेसीबी आहेत. त्यांचे वय अंदाजे ५२ वर्ष आहे आणि गेली ३० वर्षे ते शेती व्यवसाय करतात. परंतु आज त्यांच्या खात्यावर एक रुपयाची सुध्दा बचत होत नाही. उलट त्यांच्या अंगावर जवळजवळ १० ते १२ लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याबाबत विश्लेषण केल्यावर मला असा निष्कर्ष मिळाला की, ते एकप्रकारे पांढरा हत्ती पाळताहेत. म्हणजे त्यांच्याकडील मोठी शेतजमीन, साधने, उपकरणे, यंत्रसामुग्री, वाहने अनेक आहेत परंतु त्यातून त्यांचा फायदाच निघत नाही, फक्त तोटेच होत आहेत. म्हणजे जे काही आहे ते सर्व दाखवण्यापुरतेच आहे.
तर दुसरा कॉल नितीन नावाच्या शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याचा होता. त्यांचे वय ४४ वर्ष आहे. त्यांच्याजवळ केवळ ३ एकरच शेतजमीन आहे, परंतु त्यांच्याजवळ स्वतःची कार आहे, तसेच मुलगा विदेशात चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. गेली १० वर्षे ते व्यवसाय करीत आहेत. यादोन्ही उदाहरणांचे निरीक्षण केल्यावर मला आश्चर्य वाटले. एकीकडे ज्याच्याजवळ मोठी शेतजमीन, अद्ययावत उपकरणे व यंत्रसामुग्री, वाहने आहेत तरीसुध्दा एक रुपयाही नफा नाही, उलट १०-१२ लाखांचे कर्ज आहे. तर दुसरीकडे ३-४ एकरांचीच शेतजमीन असलेला शेतकरी आहे, जो शेती व शेतीपूरक व्यवसाय करतो, परंतु त्यांच्याकडे चांगले उत्पन्न, संपत्ती, वैभव आहे आणि ते ही डोक्यावर एका रुपयाचेही कर्ज नसताना. या दोन्ही उदाहरणांमध्ये प्रचंड विरोधाभास दिसून येतो.
उत्पादकतेचे अर्थशास्त्र :
तुमचे शोरूम, दुकान, व्यवसाय, कारखाना किंवा शेतजमीन कितीही मोठी असली तरीही त्यातून तुम्हाला किती फायदा नफा मिळतो याला खरा अर्थ असतो. यालाच म्हणतात उत्पादकतेचे अर्थशास्त्र. तुमचे कुटुंब परिवार किती मोठा आहे हे महत्वाचे नाही, तर त्यातील किती लोक उत्पादनक्षम आहेत ते महत्वाचे आहे. तुमच्याकडे किती एकर जमीन आहे हे महत्वाचे नाही, तर त्यापैकी किती जमीन तुम्हाला उत्पन्न मिळवून देते याला महत्व आहे. म्हणजे तुमच्याकडे कितीही संसाधने म्हणजे मोठी जमीन, भांडवल आणि मनुष्यबळ इत्यादी गोष्टी असतील, तर त्या उत्पन्न देणाऱ्या असाव्यात. नाहीतर पांढऱ्या हत्तीसारख्या केवळ शोभेसाठी असतील तर तुम्ही कंगाल झाल्यातच जमा असे समजा.
उत्पादकता लेखापरीक्षण (Productivity Audit) :
ज्या ऑडिटमध्ये, मोजमापात्मक व तुलनात्मक मानके/मापदंड आणि वास्तविक घटकांची कार्यक्षमता यांची छाननी आणि मूल्यांकन केले जाते त्यास उत्पादकता लेखापरीक्षण (Productivity Audit) म्हणतात. म्हणजे आपल्या शेतीत किंवा व्यवसायात आपल्याकडील मनुष्यबळ, भांडवल, साहित्य, संसाधने, यंत्रसामुग्री, इ. मधून किती उत्पन्न मिळाले याचे मूल्यांकन आणि विश्लेषणात्मक अभ्यास म्हणजे उत्पादकता लेखापरीक्षण. यासाठी अनेक निकष पडताळून पाहावे लागतात.
i) Personal Audit:
Personal Audit
शेती म्हणा किंवा इतर व्यवसाय. त्यांचे लीडर म्हणून तुम्ही स्वतःचे मूल्यांकन केले पाहिजे. तुम्ही शेतात किंवा व्यवसायात किती काम करता व शेती/उद्योगातील उत्पादनक्षमतेत किती आणि कसे योगदान देता हे पाहणे म्हणजेच स्वतःच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. समजा तुमच्याकडे ३० एकर जमीन आहे, पण खरंच तुम्ही रोज ३० एकर जमिनीकडे जातीने लक्ष देता किंवा काम करता का? की मजुरांवर शेताचे काम सोपवून गावात पुढारीपण करता? एखाद्याने नोकरी सोडून व्यवसाय सुरु केला असेल, तर ज्याप्रमाणे नोकरी करताना १२-१२ तास काम करत होता, तसेच स्वतःच्या व्यवसायातही काम करता का ?
ii) Family Member Audit:
Family member audit
तुमचे सर्व कुटुंबीय तुमच्या शेतीत/व्यवसायात काय योगदान देतात? ते कोणते काम किंवा कोणती जबाबदारी हाताळतात याचे मूल्यांकन करावे. नाहीतर असे व्हायला नको की, तुमचा वेळ पोकळ मोठेपणा/पुढारपण गाजवण्यात जातोय; पोरगं तासनतास मोबाईलमध्ये डोकं घालून नाहीतर कुठल्यातरी पक्षाचा युवानेता बनून फिरतोय, बायको महिलामंडळाची अध्यक्ष म्हणून गजाली मारण्यात आणि चुगल्या करण्यात वेळ वाया घालवतेय आणि शेतात गुडघाभर तण आहे. तुमचा व्यवसाय असो वा शेती घरातल्या प्रत्येकाने त्यासाठी काम केले पाहिजे, आपापले ठळक योगदान दिले पाहिजे. काम न करणाऱ्या पोरांना कंबरड्यात लाथ घालून हाकलून दिले पाहिजे.
iii) Management Audit:
Management Audit
मॅनेजमेंट ऑडिट म्हणजे तुमच्या व्यवसायात अंतर्भूत व्यवस्थापनाच्या पद्धती आणि धोरणे, संसाधनांचा वापर, कामाचे नियोजन, कर्मचारी आणि संस्थात्मक सुधारणा यांचे मूल्यांकन. मानव संसाधनांचा अधिक चांगल्या उपयोग आणि उपलब्ध भौतिक सुविधांची खात्री करुन घेणे, उद्दिष्ट्ये, धोरण, कार्यपद्धती आणि नियोजनातील कमतरता पडताळणे, कार्यपद्धतीची सुधारित पद्धती सुचविणे. उदा. तुमचा जेसीबी ड्रायव्हर असेल, तर तो जेसीबी किती चांगल्या प्रकारे हॅण्डल करतो याची तपासणी करा. तुमची कार्यपद्धती व त्यांचे काम प्रभावी असायला हवे.
iv) Employee Audit:
Employee Audit
आपले कर्मचारी, मजूर आपल्या व्यवसायात/शेतात किती काम करतात आणि ते किती उत्पादनक्षम आहेत हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नाहीतर मालक गावभर फिरतोय आणि मजूर शेतावर टाईमपास करतायत अशी अवस्था नको. असेच चालत राहिले तर कर्ज होणार नाहीतर काय होणार? कोण काम करतो व कोण चुना लावतो याचा तपास करा.
v) Product Audit:
Product Audit
आपली उत्पादने/सेवा किती गुणवत्तापूर्ण आहेत, त्यांना बाजारात किती मागणी आहे आणि त्यांच्या खरेदीसाठी ग्राहक किती उत्सुक आहेत तसेच त्याचे मार्केटिंग कशा प्रकारे केले जात आहेत हे पाहणे महत्त्वपूर्ण आहे. नाहीतर तुम्ही आणि तुमचे कर्मचारी खूप मेहनत घेऊन उत्पादन घेत असाल, परंतु ते दर्जेदार नसेल तर काय फायदा? काय पिकतं यापेक्षा काय विकतं याचा तपास घ्या.
vi) Real Asset Audit:
Real Asset Audit
तुमची जितकी संपत्ती आणि संसाधने आहेत त्याच्या देखभालीसाठी, ती सांभाळण्यासाठी किती खर्च येतो आणि त्यापासून उत्पादन किती मिळते याला रिअल अॅसेट ऑडिट म्हणतात. म्हणजे तुमची १० एकराची जिरायती शेती आहे, ती सांभाळण्यासाठी ५ लाख रुपये खर्च येत असेल आणि त्यांतून १ लाखाचेही उत्पन्न मिळत नसेल तर काय फायदा? यामध्ये अधिक उप्पन्न देणारी, मध्यम उत्पन्न देणारी आणि उत्पन्न न देणारी शेतजमीन, असे तीन गट पडले पाहिजेत.
vii) Machinery Audit:
Machinery Audit
आपल्या व्यवसायात किंवा शेतीसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री आणि वाहने यांच्या खरेदीवर आणि त्यांच्या देखभालीवर (maintenance) एकूण किती खर्च येतो आणि एकूण किती उत्पन्न मिळते याचे ऑडिट केले पाहिजे.
viii) Working Capital Audit:
Working Capital Audit
शेतकरी किंवा व्यावसायिक भांडवल उभारणीसाठी कर्ज घेतात. बँक त्या कर्जाचे हफ्ते व्याजासहित वसूल करते. शेतकरी त्याच्या शेतीसाठी लागणारी यंत्रसामुग्री, वगैरे विकत घेण्यासाठी कर्ज काढतो, व्यावसायिक त्याच्या व्यवसायात भांडवल उभारणीसाठी कर्ज काढतो. आपण आपले भांडवल कशा प्रकारे वापरतो आणि त्या खेळत्या भांडवलातून आपल्याला कितपत फायदा होतो याचेही ऑडिट केले पाहिजे.
आपण काय करावे?:
वरील प्रत्येक लेखापरीक्षणाच्या विश्लेषणानंतर आपल्या व्यवसायाची/शेतीची उत्पादनक्षमता तपासून घ्यावी. तुम्ही शेती करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर त्यांचे अर्थशास्त्रीय विश्लेषण करा. तुमच्या एकूण शेतीपैकी किती जमीन नफा मिळवून देते किंवा व्यवसायाच्या कोणत्या घटकांमधून उत्पन्न मिळते यांचे विश्लेषण करा. नाहीतर पांढरा हत्ती पाळल्यासारखे करू नका. जे फक्त दिखाव्याप्रमाणे, बिनकामाचे ठरते.
जसा पांढऱ्या हत्तीचा उपयोग युध्द, खेळ, भारवहनासाठी करता येत नसतो. तो केवळ दिखाव्यासाठीच बाळगला जातो आणि हत्ती पाळल्याचा बडेजाव करता येतो, परंतु नुसता दिखावा करून उपयोग नाही. तोट्यातली जर्सी गाय पाळण्यापेक्षा, फायद्यातली शेळी कधीची चांगलीच.
ही गोष्ट आहे दोन मित्रांची आणि त्यांच्या मैत्रीची. त्यांच्या मैत्रीची सुरुवात एका हॉस्पिटलमध्ये होते. दोघे एकाच वॉर्डमध्ये असतात. त्यातील एक मित्र असतो रामलाल नावाचा, त्याला पॅरालिसिस झालेला असतो. बिचाऱ्याचे संपूर्ण शरीर अधू झाल्यामुळे तो चालू-फिरू शकत नव्हता. दुसरा जयसिंग. तो बाहेरून तरी धडधाकट वाटायचा. तो रोज त्या खाटेवरच पडून राहिलेल्या रामलालला खिडकीबाहेरील जग दाखवत असे. त्या पेशंटरूममध्ये एक खिडकी होती आणि त्या खिडकीतून जयसिंग बाहेरच्या निसर्गाचं वर्णन करायचा.
निळेशार आकाश, त्या आकाशातून विहार करणारे पक्षी, उंच-उंच हिरवीगार झाडे, खाली बागेत बागडणारी मुले, बाहेरचा सुंदर निसर्ग तो त्याच्या डोळ्यासमोर उभा करायचा. त्याला देखील खूप छान वाटायचं जयसिंग इतकं सुंदर वर्णन करायचा की रामलाल वाटायचं की, कधी एकदा मी बाहेर पडून माझ्या डोळ्यांनी हे सुंदर जग पाहतो. असेच बरेच दिवस या दोघांचे हे वर्णनात्मक खेळ चालू होते. आणि एक दिवस अचानक सका-सकाळी रामलाल पाहतो तर काय? जयसिंग रूममध्ये नव्हताच. रामलालला वाटलं, बहुतेक त्याला डिस्चार्ज मिळाला असेल, पण ‘मग त्याने रात्री मला सांगितलं कसं नाही?’ आता मला बाहेरचं जग कोण दाखवेल? आता बाहेर काय चाललंय ते मी कसं बघू?
तितक्यात तिथे नर्स येते, रामलाल तिला विचारतो, जयसिंगला केव्हा डिस्चार्ज मिळाला. त्यावर ती नर्स म्हणते; डिस्चार्ज! अहो, त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही का/ त्यांच्याकडे शेवटचेच काही दिवस होते. मध्यरात्रीच त्यांचं निधन झालं. आणि हे ऐकल्यावर रामलालच्या पायाखालची जमीनच सरकली. इतके दिवस एकत्र असून देखील जयसिंग काहीच बोलला नव्हता. रामलालला खूप दुःख झाले. इतका आनंदी आणि भला माणूस कसं काय या जगाचा निरोप घेऊ शकतो. आपलं आयुष्य ज्याच्या साथीमुळे व्यवस्थित चालू होतं, तो सहाराच आता मिळणार नव्हता. जयसिंगला माहीत होतं, की आपल्याकडे शेवटचेच काही दिवस राहिलेत, तरीही तो किती आनंदांत जगत होता याच विचारात रामलालचे 3-4 महीने कसे निघून गेले त्याच त्यालाच कळलं नाही. मात्र त्यांच्या अंतर्मनात खिडकीबाहेरील जग पाहण्याची प्रबळ इच्छाशक्ती निर्माण झाली होती. जयसिंगचे बोलणं त्याला सारखं आठवत राहत होतं.
आणि एक दिवस शरीरातील संपूर्ण ताकद एकवटून त्याने हातापायची हालचाल केली. हळूहळू कॉटवरुन पाय खाली ठेवण्याचा प्रयत्न केला. रामलाल रोज खिडकीबाहेर काय चालू आहे हे पाहण्यासाठी धडपडत होता आणि एकदिवस त्याच्या प्रयत्नांना यश आले, संपूर्ण ताकदीनिशी तो दोन्ही पायांवर उभा राहिला. धडपडला आणि समोरच्या कॉटवर जाऊन आदळला. पण पुन्हा उभा राहिला आणि अखेर तो खिडकीजवळ गेला. खिडकीतून बाहेर पाहतो तर काय! जयसिंग सांगत होता त्यातील काहीच तिथे नव्हते. तो नर्सला जोरजोरात हाका मारू लागला. नर्स धावत-पळत आली. ‘नर्स इथं खाली मोठं गार्डन होतं, उंच मोठी-मोठी झाडे होती, कुठं गेलं सगळं, इथे तर आत्ता काहीच दिसतं नाही. २ महिन्यातच सगळं गायब कसं झालं.’ त्यावर नर्स म्हणाली, ‘साहेब मी इथे १० वर्ष झालं काम करतीये आणि राहायला पण इथं जवळच आहे. माझ्या बघण्यात तरी इथं जवळपास कुठेच गार्डन नाही. गार्डन तर सोडा, इथं जास्त झाडेदेखील नाहीत. पहा ना, सगळ्या बिल्डिंगच दिसतायेत.’
त्यावर रामलालला प्रश्न पडतो, मग जयसिंग एवढे दिवस माझ्याशी खोटं का बोलला असेल. पण काही वेळाने रामलालच्या लक्षात येतं, जयसिंगच्या त्या बोलण्यामुळेच मी माझ्या पायांवर उभा राहू शकलो. माझ्यात उभं राहण्याचं बळ आलं ते जयसिंगमुळेच.
मित्रांनो आपल्या वाणीत इतकी ताकद असते ना की, त्यामुळे अशक्यप्राय गोष्टीदेखील शक्य होतात. त्यामुळे कधीकधी कोणाबद्दल पॉझिटिव्ह बोललं किंवा कोणाचं कौतुक केलं तरी काही बिघडत नाही. फक्त संक्रांतीच्या दिवशीच गोड बोलायचं असतं असं काही नाही. एकेक लोक असतात, जे नेहमी negative विचार करतात negative बोलत असतात. आपल्या बोलण्याने जास्त काही फरक नाही पडणार मान्य आहे, मात्र समोरच्या व्यक्तीच्या पाठीवर एक कौतुकाची थाप देखील पुरेशी असते.
बघा आपण लहान असताना चुकीचं बोलल्यावर आई सांगायची; ‘असं बोलू नये, वास्तु नेहमी तथास्तु म्हणत असते.’ मित्रांनो बऱ्याचदा आपण जसं बोलू ना, तसं खरंच घडतं असतं. विलपॉवर का कायतरी म्हणतात ना. तुमच्या बाबतीत देखील कधी असं घडलं असेलच ना! समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे तुम्ही motivated नक्कीच झाला असाल आणि त्याच बोलण्यामुळे तुमच्यात energy आली असेल. काही आठवत असेल, तर कमेंटमध्ये अगदी थोडक्यात आम्हाला सांगा. आणि नेहमी असेच मोटिव्हेटेड रहा आणि दुसऱ्यांना देखील मोटिव्हेट करा.
आपल्याला श्रीकृष्णाचे जीवनचरित्र तर माहितीच आहे.त्याच्या जन्माच्या आधीपासूनच त्याला मारण्यासाठीचे षडयंत्र चालू होते, मात्र तरीही तो त्यातून वाचला. त्यानंतर देखील त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक स्तरावर त्याला मारण्यासाठी अनेक युक्त्या लढवण्यात आल्या. मात्र त्यांना भूल देत तो प्रत्येक संकटातून बाहेर पडला. न डगमगता त्याने प्रत्येक संकटाविरुद्ध प्रतिकार केला. अर्थात तो परमेश्वर होता, पण संकटांविरुद्ध लढण्याचा तो गुण जर आज प्रत्येकाने आत्मसात केला असता, तर सर्वसामान्य माणसाचे होणारे हाल नक्कीच कमी झाले असते.
मित्रांनो साधं आपल्या रोजच्या जीवनातील उदाहरण म्हणजे आपण रस्त्याने चाललोय आणि अचानक एक कुत्रा आपल्याकडे पाहून गुरगुताना दिसतो तेव्हा आपण काय करतो… तिथून धूम ठोकतो. पण त्याच्यासमोरून आपण जर पळ काढला, तर तोही आपल्यामागून भुंकत येतो. मात्र तेच जर हातात एक दगड घेऊन आपण त्याच्या मागे लागलो तर? चित्र उलटं असेल.
मित्रांनो आपल्या आयुष्याचं देखील तसंच आहे, दुःखाला कवटाळत बसलो, तर दुःख अजून मोठं होतं. एक म्हण आहे ‘भित्या पाठी ब्रम्हराक्षस’ या म्हणीनुसार घाबरणाऱ्याच्या पाठीमागेच अनेक वाईट घटना, प्रसंग लागतात. मात्र त्यातून घाबरून पळ न काढता सक्षमतेने, निर्भयपणे आणि सद्सद्विवेकाने तोंड दिले, तरच आपण प्रत्येक संकटातून तारू शकतो.
तुम्हाला माहिती असेल पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर शंकर धोंडियाल यांच्या पत्नीची शौर्यकथा. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यात 29 वर्षीय मेजर धोंडीयाल शाहिद झाल्यानंतर त्यांची पत्नी वीरमरण आलेल्या आपल्या पतीसाठी शोक करत बसली नाही. तर तिनेसुद्धा सैन्यात भरती होण्याचा निर्धार केला. आपल्या पतीला योग्य सन्मान आणि आदरांजली म्हणून तिने अनेक प्रयत्नांती शेवटी सैन्यात भरती होऊन समाजासमोर धैर्याचा एक धडा घालून दिला.
संकटांना मेहनतीने कसं उत्तर द्यायचं? नव्या उमेदीने आयुष्यात कसं सामोरं जायचं? यासाठीचं हे ज्वलंत आणि जिवंत उदाहरण. सुख-दुःखाचा प्रवास कोणाला संपलेला नाही. आयुष्यात संकटं ही येणारच; पण आलेल्या संकटांना न घाबरता, हतबल न होता जिद्धीने जो सामोरे जातो तोच खरा धैर्यवान.
एकदा 12-13 वर्षाच्या मुलाला अभ्यास न झाल्याच्या कारणावरून त्याचे शिक्षक भर खूप ओरडतात. वर्गात उभे करतात आणि त्याच्या हातावर जोराने छडी ने मारण्यासाठी हात वर करतात. आता त्याचा हात लालच होणार, पण त्यांचं लक्ष त्याच्या हाताकडे जातं. शिक्षक छडी खाली टाकतात आणि म्हणतात, “अरे तुला मारून काय फायदा. तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही. त्याला खूप दुःख होतं. माझ्याच हातावर कशी काय रेषा नाही. तो शिक्षकांना विचारतो गुरुजी विद्येची रेषा कुठे असते. गुरुजी सांगतात की बाबा इथे इथे असते. तो तडक शिक्षकांसमोरुन बाहेर जातो आणि चाकूने आपला हातावर रेष ओढतो आणि शिक्षकांना सांगतो, “गुरुजी माझ्या हातावर देवाने रेषा निर्माण केली नसेल, पण मी ती केली.” तो मुलगा दूसरा-तिसरा कोणी नसून व्याकरणाचार्य पाणिनी होता. पुढे जाऊन त्याने व्याकरणाचे गणित अख्ख्या जगासमोर मांडले.
सांगायचं तात्पर्य इतकंच; दुःखाचा, संकटांचा सामना करा. संकटांना नेटाने उत्तर दिले की विजय नक्कीच तुमचा असेल.
सध्याचा काळ हा अगदीच बेभरवशाचा आहे. कोव्हिडनंतर आपण हे नक्कीच शिकलो आहोत की सध्याच्या या वेगाने बदलणाऱ्या जगात कधी काहीही होऊ शकतं. जगभरात अनेक स्थित्यंतरे आणि दळणवळणाची साधनं बदलली आहेत. कम्युनिकेशनचा वेग वाढला आहे आणि जग खूप जवळ आले आहे. स्मार्टफोनच्या एका क्लिकवर आपण जगभरातील माहिती मिळवू शकतो. अशी ही बदललेली जीवनपद्धत जगत असताना रोज थोडा थोडा भविष्याचा विचार करणे जास्त महत्वाचे झाले आहे.
एक काळ होता जेव्हा भविष्याची तरतूद म्हणून लोक संपत्तीचा संचय करायचे एखाद्या जुन्या पेटीमध्ये धन साठवून ठेवायचे. या सगळ्या धन साठवण्याच्या पद्धतीमध्ये मात्र भलतीच रिस्क असायची, हे धन कधी चोरीला जायचे तर कधी नैसर्गिक कारणामुळे गहाळ व्हायचे. लोकांना या गोष्टी लक्षात आल्यानंतर हळू हळू लोक धन हे वस्तू रूपात साठवू लागले त्यामध्ये जमीन किंवा सोने याचा समावेश असायचा. लोकांना जेव्हा कळायला लागलं की या साठवण म्हणून घेतलेल्या वस्तूंची अथवा संपत्तीची किंमत वेळेनुसार वाढते तेव्हा गुंतवूणक ही पद्धत खऱ्या अर्थाने सुरु झाली. गुंतवणूक आणि बचत या दोन्हींकडे त्या काळात एकच नजरेतून पहिले जायचे. जस जसा काळ बदलत गेला तस तसे लोकांना समजले की बचतीपेक्षा गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा जास्त आहे. ज्यामुळे गुंतवणूककडे लोकांचा ओढा जास्त वाढला. जेव्हा तुमच्या उत्पन्नाच्या नफ्यातील काही भाग तुम्ही भविष्यातील काही गोष्टींसाठी बाजूला काढून जपून ठेवता तेव्हा ती बचत होते आणि जेव्हा तुम्ही नफ्याचा काही भाग हा एखाद्या कंपनीचा हिस्सा खरेदी करण्यासाठी वापरता तेव्हा तुम्ही गुंतवणूक करता. तसे पाहायला गेल्यानंतर दोन्हीमधून फायदाच होतो पण गुंवणूकीतून जास्त फायदा होतो, ज्यामुळे आजकाल गुंतवणुकीचा विचार जास्त करतात बचतीपेक्षा. आता दोन्ही गोष्टींमध्ये नेमका फरक कसा पडतो हे आपण पाहूया.
बचतीच्या फायद्यांमध्ये एक फायदा असा आहे जेव्हा आपण बचत करत असतो तेव्हा आपल्याला ५% पर्यंत व्याजदर मिळतो. तसेच बँकेत पैसे ठेवले तर ते पैसे बुडण्याचा धोका कमी असतो. आपल्याला जर अल्पकालावधीसाठी पैसे साठवायचे असतील तर बचतीचा पर्याय एकदम उत्तम आहे. जेव्हा आपण गुंतवणुकीचा विचार करतो तेव्हा त्याच्या फायद्यांमध्ये सगळ्यात मोठा फायदा म्हणजे वेळेनुसार त्यातून मिळणारा परतावा हा बचतीच्या तुलनेत खूप जास्त असतो, आपण असे म्हणू शकतो की दामदुप्पट असतो. गुंतवणुकीतून मिळणारा व्याजदर ७ ते १०% पर्यंत एवढा असतो.
ज्याप्रमाणे गुंतवणुकीमध्ये फायदा जास्त असतो त्याप्रमाणे त्यात जोखीमसुद्धा जास्त असते. गुंतवणुकीचा हा फायदा जेव्हा गुंतवणूक जास्त कालावधीसाठी असते तेव्हा अधिक जास्त होतो. गुंतवणुकीचा विचार करताना आपण म्युचुअल फ़ंड, ट्रेडिंग, स्टॉक मार्केट, रिअल इस्टेट इ. पर्यायांचा विचार नक्की करू शकतो. हे सर्व करत असताना गुंतवणुकीमध्ये जोखीम जास्त असली तरी वेळेसोबत त्यातून मिळणार नफा फार मोठा आहे. ज्यामुळे भविष्यातील अनेक प्लॅन यशस्वी करण्यासाठी तुम्हाला अधिक बळ मिळू शकते. भविष्यातील एखादी मोठी कल्पना किंवा तुमचे एखादे मोठे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी फक्त बचत हा पर्याय खूपच तोकडा पडू शकतो. त्यामुळे गुंतवणूक या पर्यायाचा विचार करून आपण आपली ही मोठी स्वप्नं नक्कीच पूर्ण करू शकतो. आता जोखीमबद्दल बोलायचे झाल्यास गुंतवणुकीमध्ये जसा फायदा जास्त तशी जोखीम जास्त आहे तरीसुद्धा सर्वांचा बारकाईने अभ्यास केला आणि गुंतवणूक नेमकी कुठे, कधी आणि केव्हा करावी हे समजायला लागले तर ही जोखीम आपण नक्कीच कमी करू शकतो.
वेळेनुसार तुमच्या पैशांना योग्य किंमत मिळण्यासाठी गुंतवणूक हा अतिशय योग्य पर्याय आहे. भविष्यात येणारी अनेक संकटे ज्यामुळे खूप मोठ्या खर्चाला आपल्याला सामोरे जावे लागते अशावेळी या गुंवणूकीचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. आयुष्याच्या आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्या व्यवसायात आणि नोकरीमध्ये अनेक मोठे बदल किंवा चांगले वाईट बदल घडू शकतात तेव्हा भविष्य संरक्षित करण्यासाठी वर्तमानात आपण गुंतवणुक नक्कीच केली पाहिजे.
प्रत्येक माणूस जन्माला येतानाच काहीतरी उपजत कौशल्य तसेच आपले स्वतःचे एक वैशिष्ट्य घेऊनच जन्माला येत असतो. निसर्गाने म्हणा की विधात्याने म्हणा त्याला त्याची इतरांहून वेगळी ओळख बनवण्यासाठी दिलेली ती एक देणगी असते. या भूतलावर जन्माला आलेला प्रत्येक माणूस इतराहून काहीतरी नक्कीच वेगळा आहे.
त्याला मिळालेल्या काही पायाभूत बाबी समान आहेत. त्याच्या शरीराची रचना व ठेवण एकसारखीच असते. म्हणजेच काय? तर प्रत्येकाच्या धडाच्या वर डोके आहे. डोक्यात मेंदू आहे, पंच ज्ञानेंद्रिये आहेत, हृदय, यकृत, फुफ्फुसे, हात, पाय अशी अंतर्बाह्य इंद्रिये आहेत. त्यांची जागा ठरलेली आहे. प्रत्येकाचा चेहरा सारखा दिसत नाही, प्रत्येकाच्या अंगात वेगवेगळ्या कला दडलेल्या आहेत, प्रत्येकाच्या डोक्यात वेगळी प्रतिभा आहे. हे असे आहे हेच उत्तम आहे.
एवढ्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येकाला हवी ती गोष्ट प्राप्त करुन घेण्यासाठी लागणारी अमर्याद ऊर्जा प्रत्येकात दडलेली आहे. आपण काहीही करु शकतो. त्यासाठी आपल्याला आपल्या क्षमतांना आव्हान द्यावे लागते, मानसिकता बनवावी लागते, सराव व प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. या गोष्टी वारंवार सिध्द करणारी उदाहरणे आपण आपल्या रोजच्या जीवनात अनुभवत असतो. ज्याला शिक्षक व्हायचे आहे त्याने ठरवून प्रयत्न केले तर तो शिक्षक होतो, ज्याला डॉक्टर व्हायचे आहे तो डॉक्टर होतो. प्रत्येकालाच बिल गेट्स आणि वॉरन बफेट सारखे बनायचे नाही, बिल गेट्स हा बिल गेट्स आहे आणि तुम्ही तुम्ही आहात. दोघांची आपापली वैशिष्टे आहेत.
आता आपल्याला असे वाटू शकते की आपल्याला हवे ते आपण बनू शकतो मग आपला कल ओळखण्याची व त्याप्रमाणे काम करण्याची गरज काय आहे? प्रत्येक गोष्ट आपल्याला शक्य आहेच, मात्र काही गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला जास्त प्रयत्न करावे लागतात, तर काही गोष्टी आपल्याला सहज जमतात. याउलट ज्या गोष्टींसाठी आपल्याला अथक परिश्रम करावे लागतात त्या गोष्टी काहीजण लिलया करुन दाखवतात, तर ज्या गोष्टी आपल्याला अगदी सोप्या वाटतात, त्यात काहीजणांचा कस लागतो. हे असे का होत असावे बरे? तर त्याचे उत्तर आहे की, आपल्याला सर्व गोष्टी साध्य करता येतात, त्यातील काही गोष्टी साध्य करण्यासाठी लागणारे उपजत गुण आपल्यात असतात. काहीजणांचा आवाज जन्मताच चांगला असतो, काहीजणांची शरीरयष्टी उत्तम असते, तर काहीजणांची स्मरणशक्ती अफलातून असते, काहीजण सुंदर व रुपवान असतात, तर काहीजण धाडसी असतात. ज्याचा आवाज चांगला आहे त्याने गायनात, ज्याची शरीरयष्टी चांगली आहे त्याने खेळात, जे सुंदर आहेत त्यांनी मॉडेलिंगमध्ये, तर जे धाडसी आहेत त्यांनी धाडस दाखवता येणाऱ्या क्षेत्रात कामगिरी केल्यास लवकर यश मिळणे स्वाभाविक आहे.
आपल्या क्षमतांवर मात करण्याची ताकद आपल्या निसर्गाने दिली आहे. त्याचा वापर करुन अधिक प्रयत्न करुन आपल्याला आपल्या उपजत गुणांवर मात करुन सुध्दा बऱ्याच गोष्टी साध्य करता येतात. याला जग चमत्कार म्हणते. स्टीफन हॉकिंग जागेवरुन स्वतःहून हलू शकत नाही मात्र त्याने जग हलवणारे संशोधन विकसित केले, मुहम्मद अली त्याच्या लहानपणी अगदीच किडकिडत (कृश) होता त्याने स्वतःच्या क्षमतांना आव्हान दिले आणि सात वेळा बॉक्सिंगचा विश्वविजेता बनला, विल्मा रुडॉल्फला जन्मतःच पोलिओ झाला होता ती स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नव्हती. मात्र प्रयत्नांच्या जोरावर तिने ऑलिम्पिक मध्ये धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली.
अल्बर्ट आईनस्टाईनला शिक्षणात फार गती नव्हती त्याने पुढे जाऊन जगाला परिवर्तनाचा वेगळा आयाम देणारा सापेक्षतावादाचा सिध्दांत दिला या सारखी कित्येक उदाहरणे आहेत. मात्र यासाठी अथक परिश्रम करावे लागतात. त्याउलट सचिनमध्ये उपजतच क्रिकेट होते त्याने क्रिकेट मध्ये करिअर केले तो यशस्वी झाला. विश्वनाथन आनंद बुध्दिबळाचा निर्विवाद बादशहा झाला. हे त्यांच्या योग्य वयात झाले. केएफसीच्या मालकाला त्याच्यातील उद्योजकता माहिती व्हायला वयाची साठ वर्षे उलटून गेली होती. त्यानंतर प्रयत्न करुन त्याने केएफसी नावाचा जगप्रसिध्द ब्रँड बनवला.
काहीजणांचे आयुष्य संपून गेले तरी त्यांना त्यांच्या उपजत प्रतिभेचा शोध लागला नाही, आयुष्यात अनेक ठोकरा खात मरुन गेलेल्या लोकांना त्यांची उपजत प्रतिभा समजली असती तर…? या प्रतिभा ओळखण्याची गरज शिक्षणातून पूर्ण झाली पाहिजे. त्याबद्दल पुढील लेखात जाणून घेऊया. धन्यवाद.