आयुष्यात पैशाचे योग्य नियोजन नसल्यावर समाजात घडणाऱ्या घटना पहा. मुलगी लग्नाला आली, पैसे नाहीत. मग मित्रांकडे, पाहुण्यांकडे हात पसरतो, जमीन विकतो, कर्ज काढतो, सावकाराकडून पैसे घेतो. अचानक आजारी पडला, अपघात झाला, दवाखान्याचा मोठा खर्च, पैसे नाहीत, काय करायचे? उसने पैसे मागा, जमीन विका, दागिने गहाण टाका. मुलाच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत, कर्ज काढा, जमीन विका. हे सर्व होते, योग्य आर्थिक नियोजन नसल्यामुळे.
आपण बऱ्याचदा पाहतो, म्हसोबाला बोकड कापतो, पाच हजार खर्च, ताईबाईला सवासण्या घालतो, दोन हजार खर्च, सत्यनारायण पुजा घालणे, चार हजार खर्च. असे एका कुटुंबाचे वर्षाला ३० ते ४० हजार रुपये वायफळ खर्च होतात; पण पर्सनल फायनान्स, गुंतवणूक, उद्योग, करिअर प्लॅनिंग, आरोग्य इत्यादी विषयी पुस्तके खरेदी करण्यात एक हजार रुपये तरी आपण खर्च करतो का? जर आपण अर्थसाक्षर होणारच नाही, तर मग आपण श्रीमंत होणार कसे.
आजारपण, अपघात सांगून येत नाही हे आपणास माहीत आहे, मग आपण आरोग्य विमा काय असतो याचा अभ्यास केला आहे का? मुलीच्या लग्नासाठी खर्च येतो माहित आहे, मग तिच्या जन्मापासूनच आपण काही गुंतवणूक का करीत नाही? मुलाच्या शिक्षणाचा मोठा खर्च १२वी नंतर सुरू होतो, मग त्यासाठी आपण काय प्लॅनिंग करतो. आपला महिन्याला येणारा पगार, उत्पन्न सर्व जगण्यावरच खर्च होतो. बचत व गुंतवणूकीच्या नावाने बोंबाबोब चालू असते. महिन्याच्या पगारात घरखर्च चालत नाही, तर बचत काय व कशी करणार. त्यामुळे आर्थिक साक्षरता ही काळाची गरज आहे, नाहीतर महाभयंकर परिणामांना सामोरे जावे लागेल.
आत्महत्या, कर्जाचा बोजा सहन न होणे, खाजगी सावकाराला संपत्ती जाणे, जप्ती, पैशाअभावी उपचार न मिळाल्याने मरण, आर्थिक नियोजन नसल्याने उतारवयात वृध्दाश्रमाची वाट धरायला लागणे अशा अनेक घटना आपण समाजात नेहमी पाहतो. तसेच पैशांअभावी मुलांची करिअर थांबणे, मुलींचं लग्न न होता कुठल्यातरी मुलाबरोबर पळून जाणे अशा नामुष्कीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. ज्यांनी आपल्या जमिनी विकल्या, त्या आर्थिक नियोजन नसल्यामुळेच. आज प्रत्येक महिन्याला १ हजाराची बचत व गुंतवणूक भविष्यात खूप मोठ्या कामाला हातभार लावू शकते. देव, उपासतापास, नवस, राजकारण, साड्या, आहेर, रुसवेफुगवे, मोर्चे, आंदोलने, पक्ष ह्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीने आर्थिक साक्षरतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आर्थिक निरक्षरता ही समाजाला किती महागात पडली आहे, गेल्या ५-६ दशकात समाज कसा गरीब होत चालला आहे हे आपण पाहतच आहोत. त्यामुळे ‘पैशाला पैसा लावावा, पैशाने पैसा वाढवावा.’
तुम्हीही आर्थिक साक्षर व्हा आणि त्यासाठी काय करणार हे आम्हाला नक्की सांगा आणि विषय आवडल्यास लेख लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी नवी अर्थक्रांतीला फॉलो करा.
काही दिवसांपूर्वी आमच्या ऑफीसमध्ये व्यवसाय मार्गदर्शन घेण्यासाठी दोन शेतकरी आले होते, एक म्हणजे अनिलराव ते एक मोठे शेतकरी आहेत. तसेच त्यांच्याकडे मळणीयंत्र ट्रॅक्टर व अर्थमुव्हिंग वाहने म्हणजे जेसीबी आहेत. त्यांचे वय अंदाजे ५२ वर्ष आहे आणि गेली ३० वर्षे ते शेती व्यवसाय करतात. परंतु आज त्यांच्या खात्यावर एक रुपयाची सुध्दा बचत होत नाही. उलट त्यांच्या अंगावर जवळजवळ १० ते १२ लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याबाबत विश्लेषण केल्यावर मला असा निष्कर्ष मिळाला की, ते एकप्रकारे पांढरा हत्ती पाळताहेत. म्हणजे त्यांच्याकडील मोठी शेतजमीन, साधने, उपकरणे, यंत्रसामुग्री, वाहने अनेक आहेत परंतु त्यातून त्यांचा फायदाच निघत नाही, फक्त तोटेच होत आहेत. म्हणजे जे काही आहे ते सर्व दाखवण्यापुरतेच आहे.
तर दुसरा कॉल नितीन नावाच्या शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याचा होता. त्यांचे वय ४४ वर्ष आहे. त्यांच्याजवळ केवळ ३ एकरच शेतजमीन आहे, परंतु त्यांच्याजवळ स्वतःची कार आहे, तसेच मुलगा विदेशात चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. गेली १० वर्षे ते व्यवसाय करीत आहेत. यादोन्ही उदाहरणांचे निरीक्षण केल्यावर मला आश्चर्य वाटले. एकीकडे ज्याच्याजवळ मोठी शेतजमीन, अद्ययावत उपकरणे व यंत्रसामुग्री, वाहने आहेत तरीसुध्दा एक रुपयाही नफा नाही, उलट १०-१२ लाखांचे कर्ज आहे. तर दुसरीकडे ३-४ एकरांचीच शेतजमीन असलेला शेतकरी आहे, जो शेती व शेतीपूरक व्यवसाय करतो, परंतु त्यांच्याकडे चांगले उत्पन्न, संपत्ती, वैभव आहे आणि ते ही डोक्यावर एका रुपयाचेही कर्ज नसताना. या दोन्ही उदाहरणांमध्ये प्रचंड विरोधाभास दिसून येतो.
उत्पादकतेचे अर्थशास्त्र :
तुमचे शोरूम, दुकान, व्यवसाय, कारखाना किंवा शेतजमीन कितीही मोठी असली तरीही त्यातून तुम्हाला किती फायदा नफा मिळतो याला खरा अर्थ असतो. यालाच म्हणतात उत्पादकतेचे अर्थशास्त्र. तुमचे कुटुंब परिवार किती मोठा आहे हे महत्वाचे नाही, तर त्यातील किती लोक उत्पादनक्षम आहेत ते महत्वाचे आहे. तुमच्याकडे किती एकर जमीन आहे हे महत्वाचे नाही, तर त्यापैकी किती जमीन तुम्हाला उत्पन्न मिळवून देते याला महत्व आहे. म्हणजे तुमच्याकडे कितीही संसाधने म्हणजे मोठी जमीन, भांडवल आणि मनुष्यबळ इत्यादी गोष्टी असतील, तर त्या उत्पन्न देणाऱ्या असाव्यात. नाहीतर पांढऱ्या हत्तीसारख्या केवळ शोभेसाठी असतील तर तुम्ही कंगाल झाल्यातच जमा असे समजा.
उत्पादकता लेखापरीक्षण (Productivity Audit) :
ज्या ऑडिटमध्ये, मोजमापात्मक व तुलनात्मक मानके/मापदंड आणि वास्तविक घटकांची कार्यक्षमता यांची छाननी आणि मूल्यांकन केले जाते त्यास उत्पादकता लेखापरीक्षण (Productivity Audit) म्हणतात. म्हणजे आपल्या शेतीत किंवा व्यवसायात आपल्याकडील मनुष्यबळ, भांडवल, साहित्य, संसाधने, यंत्रसामुग्री, इ. मधून किती उत्पन्न मिळाले याचे मूल्यांकन आणि विश्लेषणात्मक अभ्यास म्हणजे उत्पादकता लेखापरीक्षण. यासाठी अनेक निकष पडताळून पाहावे लागतात.
i) Personal Audit:
Personal Audit
शेती म्हणा किंवा इतर व्यवसाय. त्यांचे लीडर म्हणून तुम्ही स्वतःचे मूल्यांकन केले पाहिजे. तुम्ही शेतात किंवा व्यवसायात किती काम करता व शेती/उद्योगातील उत्पादनक्षमतेत किती आणि कसे योगदान देता हे पाहणे म्हणजेच स्वतःच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. समजा तुमच्याकडे ३० एकर जमीन आहे, पण खरंच तुम्ही रोज ३० एकर जमिनीकडे जातीने लक्ष देता किंवा काम करता का? की मजुरांवर शेताचे काम सोपवून गावात पुढारीपण करता? एखाद्याने नोकरी सोडून व्यवसाय सुरु केला असेल, तर ज्याप्रमाणे नोकरी करताना १२-१२ तास काम करत होता, तसेच स्वतःच्या व्यवसायातही काम करता का ?
ii) Family Member Audit:
Family member audit
तुमचे सर्व कुटुंबीय तुमच्या शेतीत/व्यवसायात काय योगदान देतात? ते कोणते काम किंवा कोणती जबाबदारी हाताळतात याचे मूल्यांकन करावे. नाहीतर असे व्हायला नको की, तुमचा वेळ पोकळ मोठेपणा/पुढारपण गाजवण्यात जातोय; पोरगं तासनतास मोबाईलमध्ये डोकं घालून नाहीतर कुठल्यातरी पक्षाचा युवानेता बनून फिरतोय, बायको महिलामंडळाची अध्यक्ष म्हणून गजाली मारण्यात आणि चुगल्या करण्यात वेळ वाया घालवतेय आणि शेतात गुडघाभर तण आहे. तुमचा व्यवसाय असो वा शेती घरातल्या प्रत्येकाने त्यासाठी काम केले पाहिजे, आपापले ठळक योगदान दिले पाहिजे. काम न करणाऱ्या पोरांना कंबरड्यात लाथ घालून हाकलून दिले पाहिजे.
iii) Management Audit:
Management Audit
मॅनेजमेंट ऑडिट म्हणजे तुमच्या व्यवसायात अंतर्भूत व्यवस्थापनाच्या पद्धती आणि धोरणे, संसाधनांचा वापर, कामाचे नियोजन, कर्मचारी आणि संस्थात्मक सुधारणा यांचे मूल्यांकन. मानव संसाधनांचा अधिक चांगल्या उपयोग आणि उपलब्ध भौतिक सुविधांची खात्री करुन घेणे, उद्दिष्ट्ये, धोरण, कार्यपद्धती आणि नियोजनातील कमतरता पडताळणे, कार्यपद्धतीची सुधारित पद्धती सुचविणे. उदा. तुमचा जेसीबी ड्रायव्हर असेल, तर तो जेसीबी किती चांगल्या प्रकारे हॅण्डल करतो याची तपासणी करा. तुमची कार्यपद्धती व त्यांचे काम प्रभावी असायला हवे.
iv) Employee Audit:
Employee Audit
आपले कर्मचारी, मजूर आपल्या व्यवसायात/शेतात किती काम करतात आणि ते किती उत्पादनक्षम आहेत हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नाहीतर मालक गावभर फिरतोय आणि मजूर शेतावर टाईमपास करतायत अशी अवस्था नको. असेच चालत राहिले तर कर्ज होणार नाहीतर काय होणार? कोण काम करतो व कोण चुना लावतो याचा तपास करा.
v) Product Audit:
Product Audit
आपली उत्पादने/सेवा किती गुणवत्तापूर्ण आहेत, त्यांना बाजारात किती मागणी आहे आणि त्यांच्या खरेदीसाठी ग्राहक किती उत्सुक आहेत तसेच त्याचे मार्केटिंग कशा प्रकारे केले जात आहेत हे पाहणे महत्त्वपूर्ण आहे. नाहीतर तुम्ही आणि तुमचे कर्मचारी खूप मेहनत घेऊन उत्पादन घेत असाल, परंतु ते दर्जेदार नसेल तर काय फायदा? काय पिकतं यापेक्षा काय विकतं याचा तपास घ्या.
vi) Real Asset Audit:
Real Asset Audit
तुमची जितकी संपत्ती आणि संसाधने आहेत त्याच्या देखभालीसाठी, ती सांभाळण्यासाठी किती खर्च येतो आणि त्यापासून उत्पादन किती मिळते याला रिअल अॅसेट ऑडिट म्हणतात. म्हणजे तुमची १० एकराची जिरायती शेती आहे, ती सांभाळण्यासाठी ५ लाख रुपये खर्च येत असेल आणि त्यांतून १ लाखाचेही उत्पन्न मिळत नसेल तर काय फायदा? यामध्ये अधिक उप्पन्न देणारी, मध्यम उत्पन्न देणारी आणि उत्पन्न न देणारी शेतजमीन, असे तीन गट पडले पाहिजेत.
vii) Machinery Audit:
Machinery Audit
आपल्या व्यवसायात किंवा शेतीसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री आणि वाहने यांच्या खरेदीवर आणि त्यांच्या देखभालीवर (maintenance) एकूण किती खर्च येतो आणि एकूण किती उत्पन्न मिळते याचे ऑडिट केले पाहिजे.
viii) Working Capital Audit:
Working Capital Audit
शेतकरी किंवा व्यावसायिक भांडवल उभारणीसाठी कर्ज घेतात. बँक त्या कर्जाचे हफ्ते व्याजासहित वसूल करते. शेतकरी त्याच्या शेतीसाठी लागणारी यंत्रसामुग्री, वगैरे विकत घेण्यासाठी कर्ज काढतो, व्यावसायिक त्याच्या व्यवसायात भांडवल उभारणीसाठी कर्ज काढतो. आपण आपले भांडवल कशा प्रकारे वापरतो आणि त्या खेळत्या भांडवलातून आपल्याला कितपत फायदा होतो याचेही ऑडिट केले पाहिजे.
आपण काय करावे?:
वरील प्रत्येक लेखापरीक्षणाच्या विश्लेषणानंतर आपल्या व्यवसायाची/शेतीची उत्पादनक्षमता तपासून घ्यावी. तुम्ही शेती करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर त्यांचे अर्थशास्त्रीय विश्लेषण करा. तुमच्या एकूण शेतीपैकी किती जमीन नफा मिळवून देते किंवा व्यवसायाच्या कोणत्या घटकांमधून उत्पन्न मिळते यांचे विश्लेषण करा. नाहीतर पांढरा हत्ती पाळल्यासारखे करू नका. जे फक्त दिखाव्याप्रमाणे, बिनकामाचे ठरते.
जसा पांढऱ्या हत्तीचा उपयोग युध्द, खेळ, भारवहनासाठी करता येत नसतो. तो केवळ दिखाव्यासाठीच बाळगला जातो आणि हत्ती पाळल्याचा बडेजाव करता येतो, परंतु नुसता दिखावा करून उपयोग नाही. तोट्यातली जर्सी गाय पाळण्यापेक्षा, फायद्यातली शेळी कधीची चांगलीच.
ही गोष्ट आहे दोन मित्रांची आणि त्यांच्या मैत्रीची. त्यांच्या मैत्रीची सुरुवात एका हॉस्पिटलमध्ये होते. दोघे एकाच वॉर्डमध्ये असतात. त्यातील एक मित्र असतो रामलाल नावाचा, त्याला पॅरालिसिस झालेला असतो. बिचाऱ्याचे संपूर्ण शरीर अधू झाल्यामुळे तो चालू-फिरू शकत नव्हता. दुसरा जयसिंग. तो बाहेरून तरी धडधाकट वाटायचा. तो रोज त्या खाटेवरच पडून राहिलेल्या रामलालला खिडकीबाहेरील जग दाखवत असे. त्या पेशंटरूममध्ये एक खिडकी होती आणि त्या खिडकीतून जयसिंग बाहेरच्या निसर्गाचं वर्णन करायचा.
निळेशार आकाश, त्या आकाशातून विहार करणारे पक्षी, उंच-उंच हिरवीगार झाडे, खाली बागेत बागडणारी मुले, बाहेरचा सुंदर निसर्ग तो त्याच्या डोळ्यासमोर उभा करायचा. त्याला देखील खूप छान वाटायचं जयसिंग इतकं सुंदर वर्णन करायचा की रामलाल वाटायचं की, कधी एकदा मी बाहेर पडून माझ्या डोळ्यांनी हे सुंदर जग पाहतो. असेच बरेच दिवस या दोघांचे हे वर्णनात्मक खेळ चालू होते. आणि एक दिवस अचानक सका-सकाळी रामलाल पाहतो तर काय? जयसिंग रूममध्ये नव्हताच. रामलालला वाटलं, बहुतेक त्याला डिस्चार्ज मिळाला असेल, पण ‘मग त्याने रात्री मला सांगितलं कसं नाही?’ आता मला बाहेरचं जग कोण दाखवेल? आता बाहेर काय चाललंय ते मी कसं बघू?
तितक्यात तिथे नर्स येते, रामलाल तिला विचारतो, जयसिंगला केव्हा डिस्चार्ज मिळाला. त्यावर ती नर्स म्हणते; डिस्चार्ज! अहो, त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही का/ त्यांच्याकडे शेवटचेच काही दिवस होते. मध्यरात्रीच त्यांचं निधन झालं. आणि हे ऐकल्यावर रामलालच्या पायाखालची जमीनच सरकली. इतके दिवस एकत्र असून देखील जयसिंग काहीच बोलला नव्हता. रामलालला खूप दुःख झाले. इतका आनंदी आणि भला माणूस कसं काय या जगाचा निरोप घेऊ शकतो. आपलं आयुष्य ज्याच्या साथीमुळे व्यवस्थित चालू होतं, तो सहाराच आता मिळणार नव्हता. जयसिंगला माहीत होतं, की आपल्याकडे शेवटचेच काही दिवस राहिलेत, तरीही तो किती आनंदांत जगत होता याच विचारात रामलालचे 3-4 महीने कसे निघून गेले त्याच त्यालाच कळलं नाही. मात्र त्यांच्या अंतर्मनात खिडकीबाहेरील जग पाहण्याची प्रबळ इच्छाशक्ती निर्माण झाली होती. जयसिंगचे बोलणं त्याला सारखं आठवत राहत होतं.
आणि एक दिवस शरीरातील संपूर्ण ताकद एकवटून त्याने हातापायची हालचाल केली. हळूहळू कॉटवरुन पाय खाली ठेवण्याचा प्रयत्न केला. रामलाल रोज खिडकीबाहेर काय चालू आहे हे पाहण्यासाठी धडपडत होता आणि एकदिवस त्याच्या प्रयत्नांना यश आले, संपूर्ण ताकदीनिशी तो दोन्ही पायांवर उभा राहिला. धडपडला आणि समोरच्या कॉटवर जाऊन आदळला. पण पुन्हा उभा राहिला आणि अखेर तो खिडकीजवळ गेला. खिडकीतून बाहेर पाहतो तर काय! जयसिंग सांगत होता त्यातील काहीच तिथे नव्हते. तो नर्सला जोरजोरात हाका मारू लागला. नर्स धावत-पळत आली. ‘नर्स इथं खाली मोठं गार्डन होतं, उंच मोठी-मोठी झाडे होती, कुठं गेलं सगळं, इथे तर आत्ता काहीच दिसतं नाही. २ महिन्यातच सगळं गायब कसं झालं.’ त्यावर नर्स म्हणाली, ‘साहेब मी इथे १० वर्ष झालं काम करतीये आणि राहायला पण इथं जवळच आहे. माझ्या बघण्यात तरी इथं जवळपास कुठेच गार्डन नाही. गार्डन तर सोडा, इथं जास्त झाडेदेखील नाहीत. पहा ना, सगळ्या बिल्डिंगच दिसतायेत.’
त्यावर रामलालला प्रश्न पडतो, मग जयसिंग एवढे दिवस माझ्याशी खोटं का बोलला असेल. पण काही वेळाने रामलालच्या लक्षात येतं, जयसिंगच्या त्या बोलण्यामुळेच मी माझ्या पायांवर उभा राहू शकलो. माझ्यात उभं राहण्याचं बळ आलं ते जयसिंगमुळेच.
मित्रांनो आपल्या वाणीत इतकी ताकद असते ना की, त्यामुळे अशक्यप्राय गोष्टीदेखील शक्य होतात. त्यामुळे कधीकधी कोणाबद्दल पॉझिटिव्ह बोललं किंवा कोणाचं कौतुक केलं तरी काही बिघडत नाही. फक्त संक्रांतीच्या दिवशीच गोड बोलायचं असतं असं काही नाही. एकेक लोक असतात, जे नेहमी negative विचार करतात negative बोलत असतात. आपल्या बोलण्याने जास्त काही फरक नाही पडणार मान्य आहे, मात्र समोरच्या व्यक्तीच्या पाठीवर एक कौतुकाची थाप देखील पुरेशी असते.
बघा आपण लहान असताना चुकीचं बोलल्यावर आई सांगायची; ‘असं बोलू नये, वास्तु नेहमी तथास्तु म्हणत असते.’ मित्रांनो बऱ्याचदा आपण जसं बोलू ना, तसं खरंच घडतं असतं. विलपॉवर का कायतरी म्हणतात ना. तुमच्या बाबतीत देखील कधी असं घडलं असेलच ना! समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे तुम्ही motivated नक्कीच झाला असाल आणि त्याच बोलण्यामुळे तुमच्यात energy आली असेल. काही आठवत असेल, तर कमेंटमध्ये अगदी थोडक्यात आम्हाला सांगा. आणि नेहमी असेच मोटिव्हेटेड रहा आणि दुसऱ्यांना देखील मोटिव्हेट करा.
आपल्याला श्रीकृष्णाचे जीवनचरित्र तर माहितीच आहे.त्याच्या जन्माच्या आधीपासूनच त्याला मारण्यासाठीचे षडयंत्र चालू होते, मात्र तरीही तो त्यातून वाचला. त्यानंतर देखील त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक स्तरावर त्याला मारण्यासाठी अनेक युक्त्या लढवण्यात आल्या. मात्र त्यांना भूल देत तो प्रत्येक संकटातून बाहेर पडला. न डगमगता त्याने प्रत्येक संकटाविरुद्ध प्रतिकार केला. अर्थात तो परमेश्वर होता, पण संकटांविरुद्ध लढण्याचा तो गुण जर आज प्रत्येकाने आत्मसात केला असता, तर सर्वसामान्य माणसाचे होणारे हाल नक्कीच कमी झाले असते.
मित्रांनो साधं आपल्या रोजच्या जीवनातील उदाहरण म्हणजे आपण रस्त्याने चाललोय आणि अचानक एक कुत्रा आपल्याकडे पाहून गुरगुताना दिसतो तेव्हा आपण काय करतो… तिथून धूम ठोकतो. पण त्याच्यासमोरून आपण जर पळ काढला, तर तोही आपल्यामागून भुंकत येतो. मात्र तेच जर हातात एक दगड घेऊन आपण त्याच्या मागे लागलो तर? चित्र उलटं असेल.
मित्रांनो आपल्या आयुष्याचं देखील तसंच आहे, दुःखाला कवटाळत बसलो, तर दुःख अजून मोठं होतं. एक म्हण आहे ‘भित्या पाठी ब्रम्हराक्षस’ या म्हणीनुसार घाबरणाऱ्याच्या पाठीमागेच अनेक वाईट घटना, प्रसंग लागतात. मात्र त्यातून घाबरून पळ न काढता सक्षमतेने, निर्भयपणे आणि सद्सद्विवेकाने तोंड दिले, तरच आपण प्रत्येक संकटातून तारू शकतो.
तुम्हाला माहिती असेल पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर शंकर धोंडियाल यांच्या पत्नीची शौर्यकथा. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यात 29 वर्षीय मेजर धोंडीयाल शाहिद झाल्यानंतर त्यांची पत्नी वीरमरण आलेल्या आपल्या पतीसाठी शोक करत बसली नाही. तर तिनेसुद्धा सैन्यात भरती होण्याचा निर्धार केला. आपल्या पतीला योग्य सन्मान आणि आदरांजली म्हणून तिने अनेक प्रयत्नांती शेवटी सैन्यात भरती होऊन समाजासमोर धैर्याचा एक धडा घालून दिला.
संकटांना मेहनतीने कसं उत्तर द्यायचं? नव्या उमेदीने आयुष्यात कसं सामोरं जायचं? यासाठीचं हे ज्वलंत आणि जिवंत उदाहरण. सुख-दुःखाचा प्रवास कोणाला संपलेला नाही. आयुष्यात संकटं ही येणारच; पण आलेल्या संकटांना न घाबरता, हतबल न होता जिद्धीने जो सामोरे जातो तोच खरा धैर्यवान.
एकदा 12-13 वर्षाच्या मुलाला अभ्यास न झाल्याच्या कारणावरून त्याचे शिक्षक भर खूप ओरडतात. वर्गात उभे करतात आणि त्याच्या हातावर जोराने छडी ने मारण्यासाठी हात वर करतात. आता त्याचा हात लालच होणार, पण त्यांचं लक्ष त्याच्या हाताकडे जातं. शिक्षक छडी खाली टाकतात आणि म्हणतात, “अरे तुला मारून काय फायदा. तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही. त्याला खूप दुःख होतं. माझ्याच हातावर कशी काय रेषा नाही. तो शिक्षकांना विचारतो गुरुजी विद्येची रेषा कुठे असते. गुरुजी सांगतात की बाबा इथे इथे असते. तो तडक शिक्षकांसमोरुन बाहेर जातो आणि चाकूने आपला हातावर रेष ओढतो आणि शिक्षकांना सांगतो, “गुरुजी माझ्या हातावर देवाने रेषा निर्माण केली नसेल, पण मी ती केली.” तो मुलगा दूसरा-तिसरा कोणी नसून व्याकरणाचार्य पाणिनी होता. पुढे जाऊन त्याने व्याकरणाचे गणित अख्ख्या जगासमोर मांडले.
सांगायचं तात्पर्य इतकंच; दुःखाचा, संकटांचा सामना करा. संकटांना नेटाने उत्तर दिले की विजय नक्कीच तुमचा असेल.
एकदा वेस ओलांडली तर घरात अशुभ काही तरी घडू शकतं नक्कीच! हे वाक्य वाचून तुम्हाला वाटेल काय रे बाबा कोणत्या जमान्यात राहत आहेस? पण आपल्या देशात किंबहुना आपल्या समाजात एक काळ असा होता जेव्हा साधी गावची वेस ओलांडणे म्हणजे अशुभ मानले जायचे. काळ बदलला २१ व्या शतकात आज आपण पाहतो तर खूप मोठ्या प्रमाणात दरवर्षी अनेक भारतीय सीमोल्लंघन करताना आपल्याला दिसतात.
पारंपरिक शिक्षणाची चौकट मोडून परदेशगमन करणे हा जणू सध्याचा ट्रेंडच झाला आहे. हे सर्व होत असताना नाण्याची दुसरी बाजूसुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे, या आणि अशा ट्रेंडचा फायदा आणि गैरफायदा घेणारेसुद्धा अनेकजण आपल्याला दिसतील त्यासाठी अनेक गोष्टींचा नीट बारकाईने अभ्यास करणे गरजेचे आहे.
सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भारतातील प्रमाण गेल्या अनेक वर्षांमध्ये वाढलेले दिसते. नेमकी अशी काय कारणं आहेत ज्यामुळे ही गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढताना दिसत आहे. तर याचा थोडा सविस्तर विचार केला असता आपल्या हे लक्षात येईल की भारतातील शिक्षणपद्धती आणि परदेशातील शिक्षणपद्धती यामध्ये असणारा सगळ्यात मोठा फरक. परदेशात मिळणाऱ्या उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे परदेशाबद्दल भारतीय लोकांच्या मनात असलेले आकर्षण. खरंतर फक्त पाठयपुस्तकी ही शिक्षण पद्धत परदेशात मूळातच शिकवली जात नाही.
संशोधन वृत्तीने एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून त्यात आपण आपले मत बनवत ज्ञानार्जन करायचे अशी शिक्षण पद्धत परदेशात पाहायला मिळते. तसेच परदेशात शिक्षण घेत असताना तुम्ही तुम्हाला जो हवा तो कोर्स निवडू शकता आणि त्याचे संपूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला परदेशात मिळते. भारतात अजून अशा प्रकारची स्थिती फार कमी ठिकाणी पाहायला मिळते.
आता नेमके परदेशात शिक्षण घ्यायचे तर त्यासाठी काय काय गरजेचे आहे हे आपण थोडक्यात बघूया. परदेशात शिक्षण घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्ही कोणत्या देशात शिक्षणासाठी जाणार आहात तिथे कोणत्या शहरातील कोणत्या विद्यापीठात तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे हे तुम्हाला निश्चित करावं लागेल. त्यानुसार त्या त्या ठिकाणच्या परदेशी विद्यार्थ्यांसाठी कोणते नियम आणि पॉलिसी आहेत याचा देखील बारकाईने अभ्यास करणे गरजेचे आहे.
सर्वसामान्यपणे SAT, MCAT, LSAT, GMAT, GRE, IELTS आणि TOEFL अशा काही प्रवेश परीक्षा आहे ज्या तुम्हाला चांगल्या मार्काने पास करणे गरजेचे आहे. तसेच त्या त्या विद्यापीठाच्या याव्यतिरिक्त जर काही परीक्षा असतील, तर त्या सुद्धा नीट समजून घ्याव्या लागतील. परदेशात शिक्षण म्हणजे पहिला डोळ्यासमोर प्रश्न उभा राहतो तो आर्थिक. अत्यंत महत्वाची आणि जबाबदारीची ही बाजू आहे. एकदा ठिकाण नक्की झाले की त्या ठिकाणाचे चलन आणि त्याची तुलना भारतीय रुपयासोबत केली असता साधारण अंदाजे खर्च आपण काढू शकतो.
आर्थिक बाजू फार मोठी वाटत असली, तरी अनेक परदेशी विद्यापीठे यासाठी शिष्यवृत्तीदेखील पुरवतात. हे सर्व करताना आपण मात्र चोखंदळपणे नीट सगळ्याचा अभ्यास करून परदेशी शिक्षणाचा पर्याय निवडणे गरजेचे आहे.
परदेशात शिक्षणासाठी वाढणारी मागणी पाहून अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला जातो. खूप प्रकारची आमिषं दाखवून फसवणूक केली जाते या सगळ्याकडे आपण कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. फक्त परदेशात शिक्षण घेणे हा उद्देश न ठेवता त्यासोबतच नोकरीची त्या देशातील संधी पाहणे हे खूप गरजेचे आहे.
अगदी शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही परदेशात शिक्षण घेण्याचे नक्की करता तेव्हा तुमचे ठिकाण पक्के झाल्यानंतर ज्या देशात आणि ज्या शहरात तुम्ही शिक्षण घेणार आहात, काही वर्षे राहणार आहात; तेव्हा त्या शहराची आणि देशाची संपूर्ण माहिती, कायदे आणि जीवनपद्धतीचा काही प्रमाणात अभ्यास करून जाणे गरजेचे आहे. जेणेकरून तिथे गेल्यानंतर तुम्हाला कमीतकमी अडचणींचा सामना करावा लागेल.
परदेशगमन हे कितीही उत्साह वाढवणारे असले, तरी स्वदेस मात्र कधीही विसरू नका. ज्या झाडाची मुळं जमिनीत खोलवर रुजलेली असतात, त्याची कितीही उंच वाढ झाली, तरी ते कधीही कोसळत नाही हे मात्र तितकेच खरे म्हणावे लागेल.
हो हे खरंच आहे; जितके जास्त स्किल्स, तितकी जास्त कमाई. म्हणजे नेमकं काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर स्किल्स म्हणजे कौशल्यं. तुमच्याकडे जितकी जास्त कौशल्ये असतील, तुम्ही तितकी जास्त कमाई करू शकता.
सध्याच्या जगात फक्त शिक्षण आणि डिग्री याचे जास्त महत्व न राहता, किती स्किल्स आहेत याला जास्त किंमत आहे. एक काळ होता जेव्हा आपण विचार करायचो, एकदा डिग्री मिळाली की नोकरी पक्की. पण मित्रांनो आता काळ बदलला आहे. आता कुठल्याही क्षेत्रामध्ये नोकरी करायची असेल, तर तुमच्याकडे स्किल्स असणे महत्वाचे आहे. किमान स्किल्स असतील तर एखाद्या क्षेत्रात त्याआधारे इंटर्नशिप करून तुम्ही तुमचा जॉब पक्का करू शकता. तुम्ही जर आधीपासूनच नोकरी करत असाल तर काही एक्स्ट्रा स्किल्समुळे तुम्ही एक्स्ट्रा इन्कम मिळवू शकता. तुम्ही शिक्षण घेत असाल तर अशा स्किल्सच्या माध्यमातून तुम्ही पार्ट टाईम काम करून किंवा फ्रीलान्स काम करून पैसे कमवू शकता.
मित्रांनो काय करू शकतो हे तर आपण पाहिलं. आता आपण हे पाहणार आहोत यासाठी नेमके मार्ग कोणते कोणते आहेत आणि या सर्व मार्गांचा अवलंब आपण कसा करू शकतो.
इंटरनेटच्या या युगात सध्या रिसोर्स मिळवणे काही अवघड नाही आहे. इंटरनेटचा योग्य आणि पुरेपूर वापर करता आला, तर आपण नुसती कमाई नाही तर एक व्यवसाय उभा करू शकतो. एका सामान्य माणसाच्या दैनंदिन लागणाऱ्या गोष्टींची एक सर्वसामान्य यादी आपण तयार केली, तर त्यात सकाळी उठल्यापासून हेल्थ केअर, मॉर्निंग रुटीन, ब्रेकफास्ट, व्यायाम, जॉब, इव्हिनिंग रुटीन, रात्रीचे जेवण आणि झोपणे यासोबतच सुट्टीच्या दिवशी पर्यटन आणी मनोरंजन या साऱ्या गोष्टी येतात. या गोष्टींचा विचार केला तर फूड, आरोग्य, पैसा, मनोरंजन, पर्यटन, ई-कॉमर्स या सेक्टरमध्ये काम करून, त्याच्याशी संबंधित स्किल्स डेव्हलप करून आपण कमाई करू शकतो.
आता या सर्वसामान्य सेक्टरचा विचार करता नेमके कोणते किमान स्किल्स आपण आत्मसात करणे गरजेचे आहे ते पाहूया. सध्याच्या काळात माणसाचे आयुष्य प्रचंड धकाधकीचे आणि व्यस्त होत चालले आहे. माणूस जगतो कमी आणि ट्रॅफिकमध्ये अडकतो जास्त. अशावेळी सर्व प्रकारचे सण समारंभ यासाठी लागणारी सजावट आणि डेकोरेशन, तसेच भेटवस्तू या सर्व गोष्टींचा आपण घरबसल्या व्यवसाय सुरु करू शकतो.
कोव्हीडनंतर लोक आपले आरोग्य जपण्यासाठी खूप जास्त प्राधान्य देताना आपल्याला दिसतात. अशावेळी योगा आणि जिमचे कौशल्य आत्मसात करून तुम्ही घरबसल्या हेल्दी लाईफसाठी ऑनलाईन क्लास किंवा कन्सल्टंट म्हणून काम करू शकता. यासोबतच फ्रीलान्स क्षेत्र सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशावेळी डिजिटल माध्यमातून वेगवेगळ्या कोर्सची विक्री करून तुम्ही मोठ्या प्रमाणावर इन्कम मिळवू शकता. डिजिटल माध्यमांचा विचार करता डिजिटल मार्केटिंग आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व फिल्डसाठी अनेक मोफत ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत. हे कोर्सेस करून यातील सर्व स्किल्स वापरून आपण आपला एक्स्ट्रा इन्कम सोर्स सुरु करू शकतो. जितके जास्त स्किल्स आपण विकसित करू, तितकी जास्त कमाईची अनेक दारं आपल्यासाठी खुली होणार आहेत. त्यासोबतच तुम्ही वर्तमानात जो जॉब करत असाल किंवा शिक्षण घेत असाल, अशावेळी या स्किल डेव्हलपमेंटमुळे भविष्यात तुम्ही तुमची प्रोफाईल अजून मजबूत करू शकता. मल्टिटास्किंग क्षमता वाढवू शकता.
मित्रांनो तरुण वय हे मोठमोठ्या रिस्क घेण्यासाठीच असते. याच वयात आपण मानसिकरित्या अनेक कौशल्ये विकसित करण्याची आणि आत्मसात करण्याची क्षमता ठेवत असतो. फक्त कमाईसाठी नाही तर व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासासाठी स्किल्स आजमावणे अत्यंत गरजेचे आहे. आपण नेहमी ऐकतो की माणूस आपल्या आयुष्याच्या शेवटर्यंत कायम विद्यार्थी असतो. म्हणूनच सतत शिकत राहणे आणि बदलत्या काळानुसार स्वतःला नेहमी अपडेट ठेवणे ही भविष्याची गरज आहे.
नोकरी किंवा व्यवसाय करत असताना कोणत्या क्षणी आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज भासू शकते हे सांगता येत नाही. असे म्हटले जाते कि, बदलत्या वातावरणानुसार डायनासोर स्वतःला जुळवून घेऊ शकले नाहीत म्हणून ते नामशेष झाले. कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलत्या काळानुसार स्वतःला अपडेट ठेवले तर काळ कोणताही आणि कसाही असला तरी आपण त्यामध्ये तग धरू शकू हे निर्विवाद सत्य आहे.
बाळ मोठं झाल्यानंतर तू काय होणार? हा अगदीच गोड आणि महाभयंकर प्रश्न आपल्याला लहानपणी कितीतरी वेळा आपल्या अनेक नातेवाईकांनी विचारला असेल ना? जणू काही आपल्याला दिलेल्या खाऊच्या बदल्यात त्यांना याचं उत्तर हवंच असायचं. ध्येयासक्ती म्हणजे नक्की काय? हा साधा शब्दसुद्धा न ऐकलेल्या आपल्या कोवळ्या मनातून उत्तराचे किंबहुना भविष्यासाठीचे अनेक हुंकार बाहेर पडतात. पटकन म्हणतो आपण, ‘अहो, मी पोलीस होणार किंवा मी कलेक्टर होणार.’
करिअर म्हणजे नेमकं काय याच्याशी त्या वयात आपल्यला तसे देणेघेणे नसतेच, पण देणेघेणे असते ते आपल्या पालकांना. हो आपण तर मातीचा गोळा असतो, वाढत्या वयानुसार हा मातीचा गोळा घडत असतो, आपला इंटरेस्ट ठरवत असतो आणि या गोळ्याचे म्हणजेच आपले बारकाईने निरीक्षण करण्याची जबाबदारी आपल्या पालकांची असते, जेणेकरून ते आपल्या इंटरेस्टनुसार आपल्याला आकार द्यायला किंवा करिअरसाठी जास्त उपयोगी ठरेल. आयुष्याच्या एका टप्प्यावर करिअर निवडीची वेळ येते, पूर्णवेळ कोणत्या क्षेत्रात राहायचं हे समजण्यासाठी याची खूप मदत होते. याचे आणखी कारण असे आहे की, लहान वयात ग्रास्पिंग क्षमता उत्तम असते. अशा वेळी जे बिंबवले जातं, मुलं त्यानुसार घडत असतात.
अनेकवेळा अनेक कारणांनी अशा पद्धतीची जडघडण करणं प्रत्येक पालकांना शक्य होत नाही. प्रसंग आणि परिस्थिती वेगवेगळी असते, त्यामुळे सगळं जुळून येईलच असे नाही, पण अशात हे काम आपल्या शाळेतील आपले शिक्षक नक्की करू शकतात. किंबहुना त्यांना कोणत्या मुलामध्ये काय क्षमता आहे याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने माहित असते. पालकांना शाळेनंतर करिअरच्या दृष्टीने त्यांची खूप मदत होऊ शकते.
पालक आणि शिक्षक यांची मते काही असली तरी मुलं ठामपणे त्यानुसार योग्य करिअर निवड करू शकत नाहीत. १०वी आणि १२वी नंतर नेमका भेडसावणारा प्रश्न म्हणजे करिअरचं पुढे काय? अशावेळी पहिल्या टप्प्यातील पालकांचा कलचाचणी म्हणजे IQ Test घेण्याकडे कल जास्त असतो. ज्यातून आपल्या पाल्याचा कल नेमका कुठे आहे? त्याची रुची कशात आहे? हे ठरवले जाते. दुसऱ्या टप्प्यातील पालकांनी आधीच आपल्या परंपरागत वर्षानुवर्षे चालत आलेल्या खानदानी व्यवसायासाठी आपल्या मुलाची तयारी करून घ्यायला सुरु केलेले असते. तिसऱ्या टप्प्यातील म्हणजे जास्तीत जास्त पालक तर लाटेवर स्वार होत असतात, म्हणजेच सध्या ट्रेंडिंग करिअर पर्याय काय आहेत, त्यातील एक आपल्या मुलाच्या गळ्यात घालतात आणि आपली जबाबदारी पूर्ण करतात.
पहिल्या टप्प्यातील पालक ठीक आहेत, दुसऱ्या टप्प्यातील पालक तरी बरे म्हणता येतील, पण तिसऱ्या टप्पातील पालकांचा निर्णय म्हणजे सगळ्यात मोठी रिस्क किंबहुना आयुष्याची जोखीम असू शकते. मुलांचं भविष्य एकतर उज्ज्वल होऊ शकतं, नाहीतर आयुष्यभर त्यांचा कोंडमारा होऊ शकतो. म्हणून करिअरची निवड करताना १०वी आणि १२वी च्या टप्प्यावर फार विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे.
मग निर्णय घ्यावा कसा? २१ व्या शतकात संपूर्ण जग एका क्लिकवर तुमच्या हातात आलेले असताना करिअरची अनेक दालनं तुमच्यासमोर आज खुली आहेत. काही वर्षांपूर्वी यासाठी खूप मर्यादा होत्या, पण तो काळ आता नाही राहिला. १०वी आणि १२वी नंतर आपल्या देशातील अलिखित नियमानुसार सर्वजण एकतर पदवीसाठी म्हणजे ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश घेतात किंवा डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्ससाठी ॲडमिशन घेतात, पण ही मळलेली वाट सोडून काही वेगळं करू पाहणाऱ्यांची संख्या खूप आहे. फक्त गरज आहे त्यांना विश्वासात घेण्याची आणि बळ देण्याची.
आधीच सांगितल्याप्रमाणे कलचाचणी हा एक करिअर निवडीसाठी मदत करणारा पर्याय आहे. मग तुम्ही म्हणाल अहो सगळं समजलं, पण ही रिस्क घेण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या? तर त्यासाठी काही मूलभूत गोष्टी आपण विचार घेतल्या पाहिजेत नक्कीच. त्या गोष्टीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा येते, ती त्या मुलाची मानसिक आणि शारीरिक क्षमता आणि इंटरेस्ट काय आहे. दुसरी मूलभूत गोष्ट म्हणजे त्याचा बॅकग्राऊंड म्हणजे त्याच्या परिवाराची स्थिती उदा. भविष्यात त्याच्यावर घराची जबाबदारी किती काळात येऊ शकते. तिसरी आणि सगळयात मूलभूत गोष्ट म्हणजे त्या मुलाच्या घरची आर्थिक परिस्थिती.
या तीन मुलभूत गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. याचा सारासार विचार करून आपण कोणत्याही क्षेत्रातील करिअरसाठी जोखीम उचलू शकतो. शेवटी आपण कितीही विचार केला तरी काही चमत्कार काळाच्या पटलावर कोणत्याही परिस्थितीत घडत असतातच. समोर कोणताच पर्याय नसताना प्रवाहासोबत जाऊन पुढे आपली वेगळी वाट तयार करून ध्रुवताऱ्यासारखे आपले स्थान निश्चित करतात हे मात्र तितकेच शाश्वत सत्य आहे.
बाजी पलटली! हो बाजी पलटतच आहे. खरंतर सर्व भारतीयांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. बातमी अशी आहे की आता भारतीय देत आहेत अमेरिकेतील लोकांना रोजगार. जवळपास ४. २५ लाख अमेरिकन लोकांना, अमेरिकेतील भारतीय कंपन्यांनी रोजगार दिला. आता तुम्ही म्हणाल भारताला याचा काय फायदा? पण जरा निरखून पाहिलं, तर लक्षात येईल भारतातून होणारी निर्यात, आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत भारताचे वाढणारे प्राबल्य आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा वाढत जाणारा दबदबा.
असे म्हंटले जाते २१ वे शतक हे भारताचे आहे. भारताने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात घेतलेली झेप, स्वदेशीचा मोठ्या प्रमाणात केलेला स्वीकार आणि नवउद्योजकांना भारताने दिलेली चालना या सर्व धोरणांमुळे भारतात आणि भारताबाहेर, भारतीयांची झेप वाढलेली आहे. आजपर्यंत अनेक कारणांसाठी अनेक देशांवर अवलंबून असलेल्या भारताने आता मात्र धाडसी निर्णय घ्यायला सुरवात केली आहे.
सध्या भारतीय कंपन्या वेगवेगळ्या देशांमध्ये आपली गुंतवणूक वाढवताना आपल्याला दिसत आहेत आणि भारत सरकार त्यांना शक्य ते सर्व सहकार्य करत आहेत. इतकेच नाही नुकतेच भारतात सुरु झालेले ॲपलचे स्टोअर. याआधीच ॲपलने प्रयत्न सुरु केले होते पण भारताच्या बदललेल्या पॉलिसीज ज्यामध्ये भारता बाहेरून भारतात येणाऱ्या कंपन्यांना त्याचे प्रॉडक्टची काही प्रमाणात निर्मिती भारतात करणे बंधनकारक आहे. या पॉलिसीमळे भारतात औद्योगिकरण वेगाने वाढत आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते आहे. भारतीय व्यावसायिकांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे.
सध्या जगभर अनेक कंपन्या नोकर कपात करताना दिसत आहेत. अशातच अमेरिकेतील भारतीय कंपन्या मात्र मोठ्या प्रमाणात नोकर भरती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत जवळपास ४० अब्ज डॉलर्स इतकी मोठी गुंतवणूकही केली आहे. यामध्ये सर्वाधिक गुंतवणुक ही टेक्सास प्रातांत झाली आहे जवळपास ९.८ अरब डॉलर्सची गुंतवणूक टेक्सास या राज्यात केली आहे. या खालोखाल जॉर्जिया, न्यूजर्सी, मॅसेच्युएटस्, केंटकी, कॅलिफोर्निया, मेरीलँड, फ्लोरिडा आणि इंडियाना या राज्यांचा क्रमांक लागतो. ८५% कंपन्या येत्या काळात अमेरिकेत आणखी गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत. ८३%कंपन्या अमेरिकेत कर्मचाऱ्यांची संख्या आणखी वाढवणार आहेत. या सगळ्यामुळे भविष्यात अमेरिकन बाजारपेठेत भारतीय कंपन्यांचे अधिकार वाढू शकतात. अमेरिकन बाजारपेठांचा लगाम भारतीयांच्या हातात येऊ शकतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भारतीयांना आणि अमेरिकास्थित भारतीयांना याचा खूप फायदा होऊ शकतो.
भारतातून एक्स्पोर्ट होणाऱ्या वस्तू आणि पदार्थांना आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जास्त प्राधान्य मिळेल. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रांमध्ये वाढती मागणी पाहून इतर लहान राष्ट्रांमध्ये भारतीय वस्तूंची मागणी अजून वाढू शकते. भारतात तयार होणाऱ्या कच्च्या मालाचे उत्त्पन्न नक्कीच वाढू शकते. त्यासोबतच तंत्रज्ञानाची देवाणघेवाणही मोठ्या प्रमाणात होऊ शकते.
एका अहवालानुसार १६३ मोठ्या कंपन्यांनी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत या कंपन्यांनी सीएसआरवर १८.५ कोटी डॉलर्स खर्च केले आहेत. अमेरिकेतील विविध संशोधन आणि विकास प्रकल्पांवरही कंपन्यांनी १ अब्ज डॉलरचा निधी दिला आहे. या सगळ्यामुळे अमेरिकेशी भारताचे संबंध अजून जास्त दृढ होणार आहेत. अनेक भारतीय नागरिक अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात IT क्षेत्रात काम करत आहेत त्यांसाठी आंतरराष्ट्रीय संबंध अजून मजबूत होणे फायद्याचे ठरणार आहेत.
एका आकडेवारीनुसार टेक्सास २०,९०६, न्यूयॉर्क १९,१६२, न्यूजर्सी १७,७१३, वॉशिंग्टन १४,५२५, फ्लोरिडा १४,४१८, कॅलिफोर्निया १४,३३४, जॉर्जिया १३,९४५, ओहायो १२,१८८, मोंटाना ९,६०३, इलिनॉएस ८,४५४ इतक्या मोठ्या प्रमाणात नोकर भरती झालेली आढळते. अमेरिकेतील भारतीय राजदूत तरनजित सिंह संधू यांनी वॉशिंग्टनमध्ये एका कार्यक्रमात या अहवालाचे प्रकाशन केले. ज्याला भारतीय कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारताचे हे बदलते चित्र अंतर्गत भारतीय व्यापारासाठी प्रत्यक्षपणे प्रभाव टाकणारे नसले तरी अप्रत्यक्षपणे भारतीय व्यापाराला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बळ देणारे नक्कीच आहे. भारताचा विकसीत राष्ट्राच्या यादीत समावेश होण्याच्या प्रवासाला यामुळे चालना नक्कीच मिळणार आहे. म्हणूनच सध्याच्या या वातावरणात हे आवर्जून म्हणावेसे वाटते बाजी पलटतीये.
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे अती विचाराच्या रोगापासून दूर राहा…
एक पालक त्यांच्या ३२ वर्षीय अविवाहित पदवीधर मुलीला घेऊन एक सायकॉलॉजिस्टला भेटायला गेले. कुटुंब सुशिक्षित मध्यमवर्गीय होतं; पण अतिविचारामुळे मुलीचं नोकरी, व्यवसायाचं सोडा, पण लग्नाचं वयसुद्धा निघून गेलं होतं. त्या सायकॉलॉजिस्टनं त्यांना विचारलं की, ‘इतके वर्ष का नाही आलात भेटायला?’ तर म्हणाले, ‘आम्ही विचार करत होतो जाऊया की नको.’
जगामध्ये जे लोक यशस्वी आहेत, त्यांच्यात आणि अयशस्वी लोकांत शारीरिक, बौध्दिकदृष्ट्या कोणताही फरक नसतो; फरक असतो तो फक्त विचार करण्याच्या पध्दतीमध्ये. ओव्हर थींकिंगमुळे त्या मुलीने आयुष्यातील शिक्षण, नोकरी, व्यवसाय व विवाह अशा २०हून अधिक संधी सोडल्या होत्या. कधी नोकरीचे ठिकाण दूर आहे, पगार कमी आहे, कंपनी चांगली आहे का? व्यवसायात फायदा होईल का? व्यवसाय सेट झाल्यावर लग्न झाल्यानंतर काय उपयोग? सासरचे चांगले असतील का? मुलगा थोडा सावळाच आहे, उंची बसत नाही, आई वडील वयस्कर आहेत, ननंद जरा भांडखोर दिसते असे काहीही अतिविचारी व वेडपट विचार असल्यामुळे आज ३२ वय झाले, तरी लग्न झाले नव्हते. आता सर्व कुटुंबालाच वेड लागायची वेळ येऊन ठेपली आहे.
ज्यांना कुणाला असा ओव्हर थींकिंगचा प्रॉब्लेम आहे, तो लवकर ओळखा, कारण हा पूर्ण आयुष्य बरबाद करणारा खतरनाक विषाणू आहे. याचे सर्वात पहिले लक्षण म्हणजे कोणत्याही गोष्टीला फाटे फोडणे, इतरांना मत विचारणे व त्यावर पुन्हा विचार करणे, नकारात्मक गोष्टींवर जास्त विचार करणे. याचे दुष्परिणाम म्हणजे कोणत्याही अंतिम निर्णयापर्यंत न पोहचणे, त्यामुळे कोणतीही ॲक्शन न घेणे, गोष्टी उगीचच अवघड करणे, सतत भीतीच्या भावनेत राहणे, आत्मविश्वास कमी कमी होत जाणे, डिप्रेशन वाढणे, शारीरिक थकवा वाढणे व हे अती व सतत काही महिने होत राहिल्यास जीवन निरुत्साही होऊन मनोरुग्ण होण्याचीही शक्यता असते.
ज्याला आयुष्यात उद्योजक व्हायचे आहे, यशस्वी व्हायचे आहे, श्रीमंत व्हायचे आहे, त्याने अतिविचाराच्या रोगापासून दूर रहावे. जे काही करायचं आहे, त्याचा थोडा विचार करा, निर्णय घ्या, झटपट कामाला लागा. हातात काम असेल, तर विचार करायला वेळ मिळत नाही. विचार करत बसला की, हाताला काहीही मिळत नाही, मग आयुष्यभर सुशिक्षित बेकार ही पदवी कायम राहते. त्यामुळे अतिविचार करणे टाळा. काय ते लवकर निर्णय घ्या, ठरवा आणि कामाला लागा. स्वत:चे व इतरांचे डोके खाऊ नका. नाहीतर आयुष्यभर बेकारी व अविवाहितपणा तुमच्या नशिबी नक्कीच आहे. म्हणून रतन टाटा म्हणतात, ‘निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणे, हे सुध्दा कधीकधी अधिक बरोबर ठरते. मी आधी निर्णय घेतो, मग तो खरा ठरवतो.’
तुम्हाला आहे का अशी अतिविचार करायची सवय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी वेबसाईटला भेट देत रहा.
तुम्ही आजवर अनेकदा कोका कोलाचा एक घोट तरी घेतला असेलच. इतकंच नाही तर तुमच्या आई बाबांनी, आज्जी आजोबांनी कोका कोला ब्रॅंड माहीत नाही ही शक्य नाहीच.चला तर जाणून घेऊ ह्या जगप्रसिद्ध कोका कोला विषयी बरचं काही…
प्रत्येक गोष्टीला एक इतिहास असतो. एकदा सुरू झालेली गोष्ट लगेच यश मिळवते असे नाही त्यासाठी संयम, कठीण परिश्रम आणि अपयश पचविण्याची ताकद असणे महत्वाचे असते.
तर झालं अस की, 8 जुलै 1831 रोजी जॉन पेंबरटण या अमेरिकन farmactis चा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना संशोधनात रस होता, नवनवीन आणि नावीन्यपूर्ण औषधे तयार करणे हाच त्यांचा छंद होता. 1860 च्या काळात अमेरिकेत Vin Mariani ही वाइन लोकांच्या पसंतीस उतरली होती. आणि जॉन पेंबरटण यांनी ठरवलं की, आपणसुद्धा असच काहीतरी नावीन्यपूर्ण बनवायच. कोला या झाडाच्या पानांपासून बनविलेली ही वाइन अनेक मोठ-मोठ्या उद्योगपतींच्या पसंतीस उतरली होती. एतकचं नाही तर थॉमस एडिसण देखील vin mariani चे सेवन करायचे.
8 मे 1886 रोजी पेंबरटण यांनी आफ्रिकन कोला फ्रूट आणि कोकेन वापरुन एक पेय बनवलं. आणि त्याचे नाव कोका कोला असे ठेवले. आणि कोका कोलाने जगात आपली एक वेगळी ओळख तयार केली. कोलाच्या पानांचा आणि फळांचा वापर हा शारीरिक थकवा घालविण्यासाठी केला जायचा.
शारीरिक आणि मानसिक आजारावरील रामबाण काढा अशी जाहिरात करून कोका कोला विकला जायचा. तो काढा अर्थातच कोका कोला लोकांच्या पसंतीस इतका आला की, कोका कोला शिवाय लोकांना काहीच दिसत नव्हत. अल्पावधीतच कोका कोला लोकांच्या पसंतीस उतरला. अनेकांना कोका कोलाचे व्यसन देखील लागले. त्यात जॉन पेंबरटण काही बाकी नव्हते. त्यांना देखील कोका कोलचे व्यसन लागले.
आणि त्यांनी एसा ग्रिग्स कॅडलर यांना केवळ 2300 डॉलर ने कंपनीचे सगळे हक्क विकले.
आणि त्यांनंतर एसा ग्रिग्स कॅडलर यांनी कोका कोलाची रेसीपी बदलली. कोकेन काढून त्यांनी त्यात साखरेचे प्रमाण वाढविले. आणि त्याचवेळी बाजारात कोका कोलाचा प्रतिस्पर्धी तयार झाला. तो म्हणजे पेप्सी. कोका कोलच्या मागून आलेला पेप्सी ब्रॅंड देखील लोकांच्या पसंतीस उतरला.
जगप्रसिद्ध कोका कोला अनेकदा वादाचा विषय ठरला. कधी अल्कोहोल मुळे तरी कधी प्लॅस्टिकच्या प्रदूषणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला कोका कोला लोकांच्या मनातून काही उतरला नाही