Category: उद्योजकता

  • ६ हजार कोटी दान  करणारा अवलिया : कोण आहेत आर. त्यागराजन?

    ६ हजार कोटी दान  करणारा अवलिया : कोण आहेत आर. त्यागराजन?

    आम्ही बोलत आहोत श्रीराम फायनान्स ग्रुपचे संस्थापक आर. त्यागराजन यांच्याबद्दल. आपल्या जीवनाबद्दल अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या आर. त्यागराजन यांची ही कथा यासाठी विशेष आहे की, जगातील अनेक मोठे उद्योगपती आपल्या संपत्तीच्या जोरावर अब्जावधींचे  इमले बांधत असताना, त्यागराजन यांनी जवळपास ६ हजार कोटींची संपत्ती आपल्या कर्मचाऱ्यांना दान करून जगाला एक नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या जीवनप्रवासावर एक नजर फिरवूया.

    कोण आहेत आर. त्यागराजन?

    त्यागराजन यांचा जन्म २५ ऑगस्ट १९३७ मध्ये  चेन्नईमधील (तत्कालीन मद्रास) एका समृद्ध शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी कोलकत्ता येथून भारतीय सांख्यिकी संस्थेतून गणितात पदव्युत्तर पदवी आणि गणितीय सांख्यिकीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. 1961 साली त्यांनी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड या सामान्य विमा कंपनीत प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आयुष्याची जवळ जवळ वीस वर्षं त्यांनी वेगवेगळ्या संस्थामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले. 

    1974 मध्ये,वयाच्या ३७ व्या वर्षी त्यांनी आपल्या काही मित्रांसह सुरुवातीला श्रीराम चिट्स या व्यावसायिक वित्तपुरवठा व्यवसायाची स्थापना केली, पण नंतर त्यांनी कर्ज आणि विम्याच्या दिशेने प्रवास सुरु केला. त्यागराजन यांनी कधीच धाडस आणि नवकल्पना यांची साथ सोडली नाही. त्यांच्या नेतृत्वाखालील श्रीराम ग्रुपने आर्थिक सेवा क्षेत्रात नवीन संधी ओळखून गुंतवणुकीचे नवीन मार्ग शोधले. यामुळे कंपनीच्या व्यवसायात सातत्याने वृद्धी होत राहिली. श्रीराम समूहात आजच्या घडीला 30 हून अधिक कंपन्या आहेत. त्यातील काहींनी शेअर बाजारात मोठा पल्ला गाठला. आजमितीला श्रीराम फायनान्स लिमिटेडचे बाजारातील भांडवल 8.5 अब्ज डॉलर आहे.

    खराब क्रेडीट स्कोर असलेल्यांना दिले कर्ज

    मुख्यतः बॅंका अशा लोकांना कर्ज देण्यास मनाई करतात ज्यांचा क्रेडिट इतिहास खराब असतो किंवा नियमित उत्पन्न  नसतं. पण त्यागराजन यांनी कुठलाही CIBIL (Credit Information Bureau India Limited) चेक न करता या विशिष्ट लोकांना कर्ज प्रदान केलं, एका मुलाखतीत जेव्हा  त्यांना त्यांच्या या धोरणावर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा  त्यांनी एक महत्वपूर्ण दृष्टिकोन व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट केले की, खराब क्रेडिट इतिहास किंवा नियमित उत्पन्न नसलेल्या व्यक्तींना कर्ज देणे जितके धोक्याचे मानले जाते, तितके ते धोकादायक नाही. या मुद्द्याचा सखोल अभ्यास करून त्यांनी फायनान्स क्षेत्रात प्रवेश केला आणि अशा लोकांना कर्ज देणे सामान्य बाब आहे, असं त्यांनी सिद्ध करून दाखवलं.

    त्यांच्या करिअरची सुरुवात एका सामान्य कर्मचाऱ्याच्या भूमिकेत झाली होती आणि  फायनान्स  क्षेत्रात  त्यांच्या दीर्घकालीन अनुभवाने आणि शिक्षणाने त्यांना कर्ज देण्याच्या धोरणावर एक नवा दृष्टिकोन त्यांनी फायनान्स क्षेत्राला  प्रदान केला, ज्यामुळे नंतर या व्यवसायातील  धोरण अधिक सुसंगत व प्रभावी बनण्यास मदत झाली. त्यांचे नेतृत्व हे कर्मचार्‍यांसाठी प्रेरणादायी होते. त्यांनी आपल्या टीमला सदैव प्रोत्साहन दिले. ‘सामान्य माणूस असामान्य गोष्टी करू शकतो’ हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.

    कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये ६ हजार कोटी रुपये केले दान

    त्यागराजन यांनी आपली संपूर्ण संपत्ती कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये समान प्रमाणात वाटून दिली आहे. ६२१० कोटी रुपयांची एकूण संपत्ती कर्मचाऱ्यांमध्ये वाटून देत, त्यांनी फक्त स्वतःजवळ ५ हजार डॉलर्स, घर आणि कार ठेवली होती. त्यांच्या या निर्णयामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये अत्यंत आनंद आणि प्रेरणा निर्माण झाली.

    आर त्यागराजन यांना २०१३ मध्ये भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मभूषण प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या कामामुळे, भारतातील गरिबांना ट्रॅक्टर आणि इतर वाहने खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणारे श्रीराम फायनान्स एक प्रमुख नाव बनले आहे. 

    व्यक्तिगत जीवन

    हजारो कोटींची संपत्ती असलेले आर. त्यागराजन हे अत्यंत साधे जीवन जगतात. ते स्वतःकडे मोबाईल फोन ही  ठेवत नाहीत, कारण त्यांना लोकांशी प्रत्यक्ष कनेक्ट राहायला आवडते. मोबाईल हा अनावश्यक वेळ खातो असं ते म्हणत असतात. “या उद्योजकाचा साधेपणा आणि जमिनीशी असलेली नाळ त्यांच्याशी संवाद साधताच लक्षात येते. त्यांनी आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कंपनीच्या व्यवस्थापन किंवा नेतृत्वाच्या पदावर स्थान दिले नाही. त्यांचा मोठा मुलगा टी. शिवरामन हा एक यशस्वी इंजिनिअर आहे, तर धाकटा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट असून, श्रीराम ग्रुपमध्ये एक सामान्य कर्मचारी म्हणून काम करतो. कुटुंबाचा व्यवसायात हस्तक्षेप नको म्हणून त्यांनी आपली मुल्ये  ठामपणे पाळली आहेत.

    आर. त्यागराजन हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात जी विनम्रता आणि साधेपणा आहे, ती आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहे.

    आणखी वाचा :

  • व्यवसायच का? नोकरदार आणि व्यावसायिक यातील फरक

    व्यवसायच का? नोकरदार आणि व्यावसायिक यातील फरक

    आपापल्या परीने प्रत्येक जण आपल्याला जमेल तसं परिस्थितीचा विचार करून, उपलब्ध संधींचा विचार करून, घरातून मिळणाऱ्या आर्थिक पाठबळाचा विचार करून स्वतःसाठी एखादं करिअर निवडतो आणि त्यामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी, घडविण्यासाठी प्रयत्न करत असतो. या सबंध करिअरच्या प्रवासात बऱ्यापैकी पिढी ही शिक्षण चालू असताना मला शिक्षण झाल्यावर व्यवसाय करायचा आहे, असे म्हणत नाही; तर एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी घ्यायची आणि आयुष्यात स्थिर व्हायचं असं बऱ्यापैकी जणांचं  म्हणणं असतं. 

    प्रत्येक व्यक्तीची जडणघडण ही त्या व्यक्तीला लाभणारे सामाजिक वातावरण, सहवासात येणारी माणसे, घेतलेले शिक्षण, वाचलेली पुस्तके, ऐकलेली भाषणे व चर्चा, आयुष्यात आलेले प्रसंग व या सर्व घटनांना त्या व्यक्तीने दिलेला प्रतिसाद यांच्याद्वारे झालेली असते त्यामुळे प्रत्येकाचे वेगळे विचार, वेगळे व्यक्तिमत्व आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा व्यक्तीपरत्वे बदललेला असतो. 

    मग या दृष्टिकोनामध्ये नोकरीच्या ऐवजी सुरुवातीपासूनच आपल्याला व्यवसायाच करायचा आहे आणि तो का करावा? ही मानसिकता मनाशी पक्की होणं गरजेचं असतं, याच विषयावर आज आपण बोलणार आहोत की व्यवसायच का ?..

    आणि नोकरी का नको ?

    खरंतर सर्वात आधी, मला कुठेतरी माझी फाईल हातात घेऊन कंपन्यांची दारं भटकत नोकरी मागायची नाही; तर चार लोकांना माझ्या माध्यमातून नोकरी देऊन त्या देणाऱ्यांच्या रांगेत मला यायचं आहे, ही भावना मनाशी पक्की होणं ही खूप प्राथमिक पायरी आहे. कोणताही व्यावसायिक हा आधी त्याच्या मनात उद्योजक म्हणून तयार झालेला असतो, मगच तो जगाच्या समोर त्याचा उद्योग, व्यवसाय आणू शकतो. 

    व्यवसायच का ? 

    अतीव समाधान:

    खरंतर जेव्हा आपण कोणतातरी व्यवसाय करतो त्यावेळी तो व्यवसाय म्हणजे लोकांच्या कोणत्यातरी समस्येचं समाधान असतं. लोकांच्या एखाद्या प्रश्नावर आपण उत्तर शोधलेलं असतं. त्यामुळे कोणाचं तरी जगणं आपल्या काहीतरी करण्यातून सुखकर होणं हे समाधान कोणा दुसऱ्यासाठी आठ तासाची नोकरी करून आणि नऊ ते पाचच्या साच्यात स्वतःला बांधून ठेवून कधीच मिळणार नाही.

    आर्थिक सुबत्ता:

    असं म्हटलं जातं की पैसा हे सर्वस्व नाही, पण आजच्या काळात पैशाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही हेही तितकंच खरं आहे. पैसा हे नक्कीच अंतिम साध्य नाही; परंतु आपल्या जीवनाचं अंतिम साध्य साधण्यासाठी पैसा हे नक्कीच एक उत्तम आणि आवश्यक साधन आहे. कुठंतरी नोकरी करत असताना एका ठराविक Limit पर्यंत आपण कमावू शकतो, पगार घेऊ शकतो परंतु एक व्यावसायिक असताना आपल्या उत्पन्नाला कोणतीच मर्यादा राहत नाही. आपण जितकं काम करू, जितके कष्ट करू, जितका स्वतःच्या व्यवसायाला वेळ देऊ, तितकं आपलं उत्पन्न वाढणार यात शंका नाही. आपण आपल्या कुटुंबाच्या गरजा, आपली इतर अपूर्ण स्वप्नं या आर्थिक उत्पन्नातून नक्कीच पूर्ण करू शकतो.

    स्वतःसाठी वेळ :

    आपण जर नोकरी करत असू तर आपल्या नोकरीच्या वेळी आपल्याला त्या ठिकाणी पोहोचणं हे बंधनकारक असतं. आपली कामाची वेळ संपल्याच्यानंतरच आपण तिथून बाहेर पडू शकतो; परंतु व्यवसायात तुम्ही स्वतः मालक असता, तुमच्यासाठी लोक काम करत असतात, त्यामुळे व्यावसायिक कामांचं योग्य नियोजन करून आपल्याला स्वतःला व्यवसायात किती वेळ द्यायचा आहे, स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यासाठी कोणता वेळ राखीव ठेवायचा आहे हे आपण स्वतः ठरवू शकतो.

    Risk Management:

    जेव्हा तुम्ही एक व्यवसायिक असता तेव्हा रोज नवनवीन आव्हानांना, अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागतं या सर्व समस्या व्यवसायाचे मालक म्हणून तुम्हाला स्वतः त्यात लक्ष घालून सोडवाव्या लागतात. अशावेळी कधी कोणता निर्णय घ्यायचा? काय करायचं?  हे सगळं आपल्याला ठरवावं लागतं. तणावपूर्ण परिस्थिती आपल्याला आपल्या पद्धतीनेच हाताळावी लागते. अशावेळी वेगवेगळ्या अनुभवातून शिकत या अडचणींचा कसा सामना करायचा, अवघड परिस्थिती कशी हाताळायची यामुळे नकळत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो आणि अप्रत्यक्षरित्या Risk Management चं महत्त्वाचं तंत्र आपल्याला अवगत होतं. 

    मग आता व्यवसायाच्या बाबतीत एवढ्या सगळ्या सकारात्मक बाबी असतील तर उशीर कशाला ? आजच आपल्या उद्योजकतेच्या प्रवासाला सुरुवात करा. डोक्यात असणाऱ्या कल्पनेला चांगल्या मार्गदर्शकासमोर मांडा, अनुभवी लोकांचे सल्ले घ्या आणि फक्त सुरुवात करा.. समोरची वाट पावलागणिक आपोआप दिसत जाईल.

  • कमी खर्चात सुरू करता येणारे 10 व्यवसाय

    कमी खर्चात सुरू करता येणारे 10 व्यवसाय

    या लेखात आपण असे दहा व्यवसाय पाहणार आहोत, जे कमी गुंतवणुकीत सुरू करता येतात आणि योग्य व्यवस्थापन केल्यास उत्तम नफा मिळवून देऊ शकतात. या व्यवसाय कल्पना तुम्हाला तुमच्या उद्योजकीय प्रवासाला नवी दिशा देण्यास सहाय्यक ठरतील.

    १) फ्रीलान्सिंग

    फ्रीलान्सिंग व्यवसाय म्हणजे आपले कौशल्य आणि सेवांसाठी स्वतंत्रपणे काम करण्याचे तंत्र. यात आपल्याला एका निश्चित नोकरीची गरज नसते; आपण विविध कंपन्यांसाठी, क्लायंट्ससाठी किंवा व्यक्तींसाठी प्रोजेक्ट्स पूर्ण करतो. फ्रीलांसर म्हणून काम करताना, आपल्याला कामाचे वेळापत्रक आणि कामाचे प्रकार स्वतः ठरवता येतात, ज्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य मिळते.

    तंत्रज्ञानाच्या युगात फ्रीलान्सिंग ही एक मोठी संधी आहे. लेखन, ग्राफिक डिझाईन, डिजिटल मार्केटिंग, वेब डेव्हलपमेंट यांसारखी कौशल्ये वापरून आपण फ्रीलान्सिंगद्वारे पैसे कमवू शकतो. यासाठी आपल्याला इंटरनेट कनेक्शन आणि संगणक एवढीच गुंतवणूक लागते.

    २) घरगुती पदार्थ विक्री

    जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल, तर घरगुती पदार्थ विकणे हा उत्तम व्यवसाय ठरू शकतो. घरच्या घरी पदार्थ तयार करून ते ऑनलाइन किंवा ऑफलाइन विकता येतात. यासाठी कमी खर्चात व्यवसाय सुरू करता येतो.

    घरगुती पदार्थ विक्री व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रथम ठरवा की, कोणते पदार्थ विकायचे आहेत; जसे की, चटणी, लोणचं किंवा स्नॅक्स. नंतर FSSAI परवाना मिळवा आणि आवश्यक उपकरणे व कच्चे साहित्य तयार ठेवा. पॅकेजिंग आकर्षक ठेवा आणि उत्पादनांसाठी योग्य किंमत ठरवा. सोशल मीडियावर प्रमोशन करा आणि ऑनलाइन विक्री प्लॅटफॉर्मचा उपयोग करा. सतत गुणवत्ता राखा आणि ग्राहकांच्या फीडबॅकनुसार सुधारणा करा.

    ३) ऑनलाइन ट्यूशन किंवा क्लासेस

    आजकाल ऑनलाइन शिक्षणाची मागणी खूप वाढली आहे. तुमच्या विषयातील कौशल्ये आणि ज्ञानाचा उपयोग करून तुम्ही ऑनलाइन ट्यूशन किंवा कोचिंग क्लासेस घेऊ शकता. यासाठी जास्त खर्च करण्याची गरज नाही.

    या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या विषयांसाठी ट्युशन द्यायची आहे हे ठरवावे लागेल. यासाठी Zoom, Google Meet सारख्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून डिजिटल मटेरियल तयार करणे आवश्यक आहे. उच्च गुणवत्ता शिक्षण पुरवण्यासाठी सखोल विषयज्ञान आणि नियमित वेळापत्रक तयार करावे. व्यवसाय वाढवण्यासाठी सोशल मीडियावर प्रमोशन करणे, फी स्ट्रक्चर फ्लेक्सिबल ठेवणे, जेणेकरून विद्यार्थ्यांना सोयीनुसार फी भरता येईल, शैक्षणिक क्षेत्रातील नवीन ट्रेंड्सवर आधारित शिक्षण पद्धतीत सुधारणा करणे आणि निरंतर अद्ययावत राहणे आवश्यक आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याची क्षमता असलेल्या या व्यवसायात मोठ्या संधी आहेत.

    ४) ब्लॉगिंग आणि यूट्यूबिंग

    ब्लॉगिंग किंवा यूट्यूबिंग हे व्यवसाय आजच्या काळात लोकप्रिय झाले आहेत, ज्यामुळे अनेक लोक आपल्या आवडीनुसार आणि कौशल्यानुसार कमाई करू शकतात. ब्लॉगिंगमध्ये आपल्याला लेखन, माहितीपूर्ण पोस्ट्स, आणि SEO चा वापर करून आपल्या ब्लॉगची लोकप्रियता वाढवावी लागते, तर यूट्यूबिंगमध्ये व्हिडिओ निर्मिती, संपादन आणि सोशल मीडिया प्रमोशन हे महत्त्वाचे घटक आहेत. दोन्ही व्यवसायांमध्ये सातत्य, दर्जेदार कंटेंट, आणि प्रेक्षकांसोबत उत्तम संवाद आवश्यक असतो. कमी गुंतवणूक आणि स्वातंत्र्यामुळे हे व्यवसाय अनेकांसाठी आकर्षक ठरले आहेत, पण यामध्ये वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी मेहनत आणि चिकाटी लागते.

    5) हस्तकला उत्पादन विक्री

    हस्तकला उत्पादन विक्री व्यवसाय हा एक कल्पकता, कौशल्य आणि परंपरेचा संगम असलेला व्यवसाय आहे. या व्यवसायात हाताने तयार केलेली विविध प्रकारची कला आणि हस्तकला उत्पादने विकली जातात, ज्यामध्ये काठ्यांवरील नक्षी, धातू, माती, लाकूड आणि वस्त्रांवरील कलाकुसर अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. स्थानिक कारागीरांच्या कौशल्याचा उपयोग करून तयार करण्यात आलेली ही उत्पादने विशिष्ट ग्राहक वर्गाला आकर्षित करतात. हस्तकला उत्पादने विक्री व्यवसायातून न केवळ आर्थिक फायदा होतो, तर स्थानिक हस्तकला आणि संस्कृतीचा वारसा जपण्याचेही काम होते.

    ६) ऑफलाइन किराणा दुकान

    छोट्या स्तरावर घरगुती वस्तूंचे दुकान उघडून व्यवसाय सुरू करता येतो. आवश्यक वस्तूंची मागणी नेहमीच असते, त्यामुळे यामध्ये कमी गुंतवणुकीत चांगले उत्पन्न मिळू शकते.ऑफलाईन किराणा दुकान व्यवसाय हा एक पारंपारिक पण स्थिर व्यवसाय आहे, जो आपल्या स्थानिक समुदायातील आवश्यक वस्तूंचा पुरवठा करतो. ग्राहकांना दररोजच्या जीवनातील वस्तू सहज उपलब्ध होतात, त्यामुळे स्थानिक किराणा दुकानांना एक स्थिर ग्राहकवर्ग मिळतो. या व्यवसायात, विविध प्रकारच्या वस्तू जसे की अन्नपदार्थ, घरेलू आवश्यक वस्तूंचा समावेश असतो. दुकानातील मर्चेंडाईझिंग, ग्राहक सेवा आणि स्थानिक बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन व्यवसायाचा विकास करणे आवश्यक आहे. या व्यवसायातील यशासाठी, उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांची निवडकता, योग्य स्टॉक व्यवस्थापन, आणि ग्राहकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

    ७) फोटोग्राफी

    जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड आणि कौशल्ये असतील, तर हाही एक चांगला व्यवसाय आहे. सुरुवातीला एका चांगल्या कॅमेरासोबत ही सेवा देऊ शकता. इव्हेंट फोटोग्राफी, प्रोडक्ट फोटोग्राफी किंवा पोर्ट्रेट फोटोग्राफीद्वारे तुम्ही उत्पन्न मिळवू शकता. फोटोग्राफी व्यवसाय आपल्या क्रिएटिव्ह आणि तांत्रिक कौशल्यांचा उपयोग करून सुंदर आणि संस्मरणीय चित्रे टिपण्यासाठी समर्पित आहे. या व्यवसायात विविध प्रकारच्या फोटोग्राफी सेवांचा समावेश होतो, जसे की; वेडिंग फोटोग्राफी, पोर्ट्रेट फोटोग्राफी, कमर्शियल फोटोग्राफी आणि इव्हेंट फोटोग्राफी. प्रत्येक ग्राहकाच्या आवश्यकता आणि अपेक्षांनुसार, फोटोग्राफर विविध शैली आणि तंत्रांचा वापर करून त्यांच्या दृश्यांना प्रभावशाली आणि अनोख्या स्वरूपात टिपण्याचा प्रयत्न करतो. फोटोग्राफीच्या व्यवसायात क्रिएटिव्हिटी, अचूकता, आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान महत्वाचे असते, जे क्लायंट्सना अत्यंत उत्कृष्ट परिणाम देण्यास मदत करते.

    ८) ड्रॉपशीपिंग

    ई-कॉमर्समध्ये ड्रॉपशीपिंग हा कमी खर्चात केला जाणारा व्यवसाय आहे. यात तुम्ही कोणताही स्टॉक न ठेवता थेट सप्लायरकडून ग्राहकांपर्यंत उत्पादने पोचवता. यासाठी तुम्हाला ऑनलाइन स्टोअर आणि मार्केटिंगवर भर द्यावा लागतो. ड्रॉपशिपिंग व्यवसाय म्हणजे एक प्रकारची रिटेल पद्धत आहे, जिथे विक्रेते उत्पादनांचा स्टॉक ठेवत नाहीत. ग्राहक ऑर्डर दिल्यावर, विक्रेता थेट उत्पादक किंवा होलसेलरकडून उत्पादन खरेदी करतो आणि ते ग्राहकाच्या पत्त्यावर पाठवतो. यामुळे विक्रेत्याला मोठ्या प्रमाणावर स्टॉक खरेदीची आवश्यकता नसते.  .

    ९) फ्लॉवर बुकिंग आणि डेकोरेशन

    फुलांचे बुके तयार करणे, कार्यक्रमांसाठी डेकोरेशन करणे ही कामे कमी गुंतवणुकीत करता येतात. यासाठी सुरुवातीला काही मटेरियल आणि सजावटीच्या वस्तूंची आवश्यकता असते. हा व्यवसाय विशेषतः विवाह, समारंभ, आणि इतर खास प्रसंगांसाठी आकर्षक आणि कलेची भव्यता आणण्यासाठी प्रसिद्ध आहे. या व्यवसायात, विविध प्रकारच्या फुलांचे रंग आणि प्रकार निवडून ग्राहकांच्या अपेक्षांनुसार सुंदर आणि आकर्षक डेकोरेशन तयार केली जाते. या सेवेत फुलांच्या बुकिंगची प्रक्रिया, स्थानिक  फुलांची उपलब्धता, कस्टमायझेशनसाठी विविध पर्याय, तसेच देखावे सजवण्यासाठी आवश्यक सामग्री आणि व्‍यावसायिक अनुभव यांचा समावेश असतो. ग्राहकांच्या खास इच्छांना अनुरूप असलेल्या डेकोरेशनच्या योजना तयार करून, या व्यवसायाने मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे.

    १०) फूड स्टॉल व्यवसाय

    फूड स्टॉल व्यवसाय म्हणजे कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा एक उपयुक्त आणि फायदेशीर व्यवसाय. यामध्ये, स्ट्रीट फूड, फास्ट फूड आणि स्थानिक चव असलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवता येतात. व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य ठिकाण, स्वादिष्ट पदार्थ आणि ग्राहकांसोबत उत्तम संवाद या गोष्टींवर भर देणे आवश्यक असते. तसेच, स्वच्छता आणि आकर्षक स्टॉल व्यवस्थापनामुळे ग्राहकांचा विश्वास मिळवता येतो. मार्केटिंगसाठी सोशल मीडियाचा वापर करून व्यवसायाला अधिक प्रसिद्धी देता येते, ज्यामुळे व्यवसायाची वाढ जलद होऊ शकते.

    आणखी वाचा

  • अशोक लेलँड : भारतीय वाहतूक क्षेत्राचा कणा | The Ashok Leyland Story

    अशोक लेलँड : भारतीय वाहतूक क्षेत्राचा कणा | The Ashok Leyland Story

    भारतात व्यावसायिक वाहने म्हटली की, पहिल्यांदा आठवण होते अशोक लेलँडची. मग ते ट्रक असू दे किंवा बस, अशोक लेलँड ही एक अशी कंपनी आहे जी भारतीय वाहतूक क्षेत्राचा कणा बनली आहे. टाटानंतर भारतातील दुसरी सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या अशोक लेलँडने आज केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही आपला ठसा उमटवला आहे. बस आणि ट्रक निर्मितीमध्ये जगातील अव्वल कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या अशोक लेलँडने तिच्या प्रवासात अनेक ऐतिहासिक टप्पे पार केले आहेत.

    भारतात स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी विविध उद्योगांची स्थापना करण्यात आली. यामध्ये उद्योग, तंत्रज्ञान आणि परिवहन क्षेत्रात विशेष प्रगती झाली. याच महत्त्वाच्या विकासपर्वात “अशोक लेलँड”ने भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात क्रांती घडवली. 1948 साली आजच्या दिवशी या कंपनीची स्थापना झाली होती. त्याचं अनुषंगाने आज या लेखात आपण अशोक लेलँडच्या आतापर्यंच्या प्रवासाचा आढावा घेऊ. 

    स्थापना आणि प्रारंभिक काळ

    7 सप्टेंबर 1948 रोजी, चेन्नई येथे रघुनंदन सरन यांनी अशोक मोटर्सची स्थापना केली. ‘अशोक’ हे नाव त्यांचा मुलगा अशोक सरन यांच्या नावावरून ठेवण्यात आले, सुरुवातीला या कंपनीत ऑस्टिन मोटर्सच्या गाड्यांचे उत्पादन केले जायचे. 

    1950 साली अशोक मोटरने ब्रिटिश लेलँड कंपनीशी करार केला, ज्यामुळे कंपनीचे नाव ‘अशोक लेलँड’ झाले. हा करार फक्त नावापुरता नव्हता, तर दोन्ही कंपन्यांच्या तंत्रज्ञानाचा संगम होता. ब्रिटिश तंत्रज्ञान आणि भारतीय बाजारपेठेची गरज यांचा समन्वय अशोक लेलँडने साधला आणि भारतीय व्यावसायिक वाहन क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाला. 

    स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारताला वाहतूक व्यवस्थेची अत्यंत गरज होती, कारण देशाची अर्थव्यवस्था विकासाच्या टप्प्यावर होती आणि औद्योगिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल करत होती. अशोक लेलँडने या गरजेची जाणीव ठेवून व्यावसायिक वाहतूक साधनांची निर्मिती सुरू केली. सुरुवातीला त्यांनी मालवाहतूक ट्रक्स आणि प्रवासी बस यांचे उत्पादन केले. यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे कंपनीने 6-सिलेंडर इंजिनयुक्त ट्रकची निर्मिती करून भारतीय रस्त्यांवर विश्वासार्हता निर्माण केली. यामुळे अशोक लेलँडने स्वदेशी ऑटोमोबाइल क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण केली.

    उत्पादनातील नाविन्य आणि विकासाचा प्रवास

    1950 आणि 60 च्या दशकात अशोक लेलँडने आपल्या उत्पादनात नाविन्य आणण्यास सुरुवात केली. 1954 साली अशोक लेलँडने आपल्या एन्नोर प्लांटमध्ये पहिला ट्रक तयार केला. ‘कॉमेट 350’ नावाचा हा ट्रक, मंगळूरच्या एका टाइल फॅक्टरीला विकला गेला होता. या क्षणापासून भारतात व्यावसायिक ट्रक निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यावेळी भारतात फक्त परदेशी कंपन्यांचे ट्रक उपलब्ध होते, पण अशोक लेलँडने स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ट्रक निर्माण करून भारतीय ग्राहकांना एक नवीन पर्याय दिला.

    अशोक लेलँड : भारतीय वाहतूक क्षेत्राचा कणा | The Ashok Leyland Story

    त्यानंतर भारत सरकारने अशोक लेलँडला दरवर्षी 1000 ट्रक तयार करण्याचा परवाना दिला आणि या उत्पादनाने भारतीय बाजारपेठेत कंपनीचे स्थान अधिकच मजबूत केले. कंपनीचे ट्रक केवळ भारतीय बाजारातच नव्हे, तर इतर काही देशांमध्येही निर्यात होऊ लागले. अशोक लेलँडच्या यशस्वी प्रवासात भारतीय सुरक्षादलांसाठी वाहनांची निर्मिती हे महत्त्वाचे योगदान होते. 1960 च्या दशकात BSF (सीमा सुरक्षा बल) आणि इतर सुरक्षा दलांसाठी वाहनं तयार करून कंपनीने देशाच्या संरक्षण यंत्रणेतील आपला वाटा उचलला.

    1960 च्या दशकात अशोक लेलँडने भारतीय बस क्षेत्रातही क्रांती घडवून आणली. 1967 साली कंपनीने पहिली ‘डबल डेकर बस‘ बाजारात आणली. यापूर्वी, डबल डेकर बस केवळ युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेतील काही ठराविक शहरांमध्येच पाहायला मिळायच्या. भारतात ही संकल्पना नवीन होती, पण अशोक लेलँडने स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ही बस तयार करून भारताच्या मोठ्या शहरांमध्ये चालू केली.

    मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यासारख्या शहरांमध्ये डबल डेकर बसने लोकांची प्रवाशांच्या प्रवासाचे व्यवस्थापन सुलभ झाले. आजही या शहरांमध्ये डबल डेकर बसची सेवा दिसून येते. 

    तंत्रज्ञानात सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय विस्तार

    1969 साली अशोक लेलँडने आपली आणखी एक महत्त्वाची कामगिरी केली. कंपनीने आपल्या ट्रक आणि बसमध्ये ‘पॉवर स्टीअरिंग‘ तंत्रज्ञानाचा वापर केला. त्या काळात हे तंत्रज्ञान खूपच आधुनिक आणि नवीन मानले जायचे. पॉवर स्टीअरिंगमुळे वाहन चालवणे खूप सोपे झाले, विशेषतः जड वाहने चालवताना ड्रायव्हर्सला अधिक आराम मिळाला. या तंत्रज्ञानामुळे अशोक लेलँडने भारतीय व्यावसायिक वाहन निर्मितीच्या तंत्रज्ञानात नवा मापदंड प्रस्थापित केला.

    1970 आणि 80 च्या दशकात अशोक लेलँडने तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या. 1980 च्या दशकात त्यांनी BS-II इंधन मानकांनुसार ट्रक्स तयार करण्यास सुरुवात केली. तंत्रज्ञानात सतत सुधारणा करण्याची कंपनीची भूमिकाही या काळात दिसून आली. याच काळात कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश केला आणि मध्य पूर्व, आफ्रिका, आशिया आदी देशांमध्ये आपल्या वाहनांची निर्यात सुरू केली.

    1980 साली कंपनीने आपला दुसरा प्लांट होसूर, तमिळनाडूमध्ये सुरू केला. या प्लांटमुळे मोठ्या प्रमाणात वाहने तयार करण्याची क्षमता वाढली. यामुळे कंपनीने मोठ्या आणि जड वाहनांच्या निर्मितीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याचवेळी कंपनीने मल्टी-एक्सेल ट्रक आणि मोठ्या बस तयार करण्यास सुरुवात केली.

    कंपनीने तामिळनाडूमधील नामक्कल येथे देशातील पहिल्या व्यावसायिक वाहन ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली. यामुळे व्यावसायिक वाहन चालवणाऱ्या ड्रायव्हर्सना उत्तम प्रशिक्षण मिळाले आणि भारतीय बाजारपेठेत कंपनीची प्रतिष्ठा वाढली. 

    1990 च्या दशकात भारताच्या उदारीकरणाच्या धोरणामुळे देशातील ऑटोमोबाइल क्षेत्रात स्पर्धा वाढली. परंतु अशोक लेलँडने आपल्या उत्पादनांची गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन कायम ठेवला, ज्यामुळे स्पर्धेचा सामना करण्यास ते सक्षम झाले. याच काळात त्यांनी ‘स्टारलाइन’ बस सादर केली, जी भारतीय बस निर्मिती क्षेत्रातील एक मोठी क्रांती ठरली.

    2007 पासून हिंदुजा समूहाची मालकी 

    2007 मध्ये, हिंदुजा समूहाने अशोक लेलँडमधील इवेकोचा (इंडस्ट्रियल व्हेईकल्स कॉर्पोरेशन) अप्रत्यक्ष हिस्सा विकत घेतला, इवेको ही इटालियन कंपनी आहे जिची स्थापना 1975 मध्ये झाली होती. हिंदुजा समूहाने याच कंपनीचा हिस्सा विका घेतला. आणि त्यांचा हिस्सा  51% वर पोहोचला आणि आज अशोक लेलँड ही हिंदुजा समूहाची एक प्रमुख कंपनी बनली आहे.

    भविष्यात अशोक लेलँड उत्तर प्रदेशात इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांचे उत्पादन करणारा एक प्लांट उभारणार आहे. या प्लांटची  उत्पादन क्षमता प्रत्येक वर्षी 2,500 वाहने एवढी असेल आणि पुढील दशकात ती 5,000 पर्यंत वाढवण्याची योजना आहे. या प्लांटमध्ये मुख्यतः इलेक्ट्रिक बस चे  उत्पादन होईल आणि ते 2025 मध्ये सुरू होईल

    आजची स्थिती आणि रोजगार निर्मिती

    आज कंपनी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे, ज्यामध्ये ऑटोमोबाईल्स, व्यावसायिक वाहने, इंजिन, सेवा आणि वाहन वित्तपुरवठा यांचा समावेश आहे. २०२४ मध्ये कंपनीने ₹ ४५,९३१ कोटी (US$५.५ अब्ज) महसूल मिळवला. कंपनीच्या एकूण मालमत्तेची किंमत ₹ ६७,६६० कोटी (US$८.१ अब्ज) आहे. २०२० पर्यंत कंपनीत ११,४६३ कर्मचारी कार्यरत होते, आज हा आकडा वाढला आहे.

    अशोक लेलँड आज फक्त भारतापुरती मर्यादित नाही. आफ्रिका, युरोप, आशिया आणि मध्य-पूर्वेतही कंपनी आपली उत्पादने निर्यात करत आहे. या देशांमध्ये अशोक लेलँडच्या वाहनांना प्रचंड मागणी आहे. 

    अशोक लेलँडचा प्रवास म्हणजे भारतीय औद्योगिक प्रगतीचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यानंतर सुरू झालेली एक छोटीशी कंपनी आज जागतिक व्यावसायिक वाहन क्षेत्रात एक महत्त्वाचे नाव बनली आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीपासून ते उत्पादन क्षमतेपर्यंत अशोक लेलँडने भारतीय वाहन निर्मिती क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे. 

    आणखी वाचा :

  • How to start your own blog? : स्वत:चा ब्लॉग कसा सुरू करावा?

    How to start your own blog? : स्वत:चा ब्लॉग कसा सुरू करावा?

    ब्लॉग म्हणजे काय ? 

    साध्या सरळ भाषेत सांगायचे झाले, तर ब्लॉग म्हणजे आपले ज्ञान (विचार, कला) इंटरनेटद्वारे इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्याचा वापर केला जातो. त्यालाच ब्लॉग असे म्हणतात. 

    आपल्याला विशिष्ट प्रकारची माहिती शोधायची असेल, तर इंटरनेट हे सर्वात जलद माध्यम आहे. त्याचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेदेखील आहेत. यात एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे वेळ. आपणही वेळेसाठी बांधील असतो आणि प्रत्येकाला फक्त आणि फक्त २४ तास आहेत. मग त्या वेळेचं योग्य व्यवस्थापन व्हावं असं प्रत्येकाला वाटतं ना. मग जिथे जिथे वेळ वाचवता येईल तिथे आपण नक्कीच प्रयत्न करतो. 

    अशा वेळी बऱ्यापैकी वाचक वर्ग कमी वेळात हवी असणारी माहिती एका ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतो. या वाचक वर्गाचा विचार करून आपण निश्चितपणे स्वत:चा ब्लॉग लिहिण्याचा विचार करु शकतो. ब्लॉग लिहायला सुरुवात करण्यासाठी काही प्राथमिक गोष्टींचा अभ्यास करणं सुरुवातीला अपेक्षित असतं. यात सर्वात आधीची आणि महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आवड. आपल्याला लिहिण्याची आवड आहे का ?

    स्वतःचा ब्लॉग सुरु करण्याची अनेक कारणे असू शकतात जसे की, आपल्याजवळ एखादे कौशल्य असेल किंवा आपल्याला एखादी गोष्ट उत्तमरित्या जमत असेल तर किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल लोकांना सांगायचे असेल तर आपण मायक्रो ब्लॉगच्या मदतीने ब्लॉग सुरु करू शकतो आणि सहज लोकांपर्यंत माहिती देखील पोहोचवू देखील शकतो. ब्लॉग सुरू करण्यासाठी ब्लॉगर.कॉम किंवा वर्डप्रेस.कॉम या वेबसाईटचा वापर करता येतो.

    How to start your own blog? : स्वत:चा ब्लॉग कसा सुरू करावा?

    स्वत:चा ब्लॉग सुरू करण्याच्या प्राथमिक पायऱ्या : 

    1.  ब्लॉगचा विषय निवडणे

    ब्लॉग तयार करण्यासाठी सर्वात आपल्याला नक्की कोणत्या विषयावर व्यक्त व्हायचं आहे हे आधी ठरवणं अत्यावश्यक ठरतं. ब्लॉगचा विषय निवडणे महत्वाचे आहे, आपल्याला एखाद्या विषयाची आवड असेल, तर आपण ब्लॉगचा विषय निवडून लेखन केले, तर नक्कीच आपल्या ब्लॉगवर वाचक आकर्षित होतील यात शंका नाही. आपल्या आवडीसंदर्भात, कृती संदर्भात किंवा एखाद्या ठिकाणा संदर्भात ब्लॉगचा विषय निवडावा.

    2.  वेबसाईट डिझाईन

    वेबसाईट डिझाईन हे ब्लॉगचे स्वरूप ठरविते, ब्लॉग किती Professional आहे ते Web Design वरुन कळते. जेवढी आकर्षक वेबसाईट डिझाईन असेल तेवढी लोक जास्त प्रतिसाद देतील, म्हणून वेब डिझाइन सुंदर व आकर्षक असायला हवी. 

    3. डोमेनचे नाव निवडणे

    डोमेन नेम हा वेबसाईटचा पत्ता (Address) आहे, जो लोक आपल्या वेबसाइटला भेट देण्यासाठी Browser च्या URL मध्ये टाईप करतात. डोमेन निवडताना आपला ब्लॉग कशा संदर्भात आहे, त्या संदर्भात डोमेन निवडावेत. डोमेन नाव निवडताना ते लांबलचक नसावे, आणि उच्चार करण्यास सोपे असावे.

    4. Unique Content 

    स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करत असताना कंटेंट अतिशय महत्वाचा भाग आहे. आपला ब्लॉग समजायला सोपा असावा, जास्त किचकट लिहू नये. आपण जेवढा विस्तृत ब्लॉग लिहणार तेवढाच जास्त वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळणार आहे. 

    ब्लॉग सुरू करण्यासाठी पैसे लागतात का?

    नाही, ब्लॉग सुरु करायचा असेल, तर आपण मोफत आणि सशुल्क या दोन्ही माध्यमातून ब्लॉग सुरु करू शकतो. जर आपल्याला मोफत म्हणजेच विनामूल्य ब्लॉग सुरु करायचा असेल, तर आपण ब्लॉगर किंवा वर्डप्रेस या साईटच्या साहाय्याने मोफत ब्लॉग बनवू शकतो. जर सशुल्क ब्लॉग सुरु करायचा असल्यास आपल्याला डोमेन आणि वेब होस्टिंग खरेदी करावी लागेल.  

    आणखी वाचा :

  • घरच्या जबाबदारीसह यशस्वी व्यवसाय: महिलांच्या प्रेरणादायी यशोगाथा | Women Entrepreneurs

    घरच्या जबाबदारीसह यशस्वी व्यवसाय: महिलांच्या प्रेरणादायी यशोगाथा | Women Entrepreneurs

    “नारी समाजस्य कुशलवास्तुकारा” या उक्तीप्रमाणे नारी ही समाजाची कुशल वास्तुकार आहे आणि आपली संस्कृती स्त्रीला देवी मानणारी आहे, आपल्या महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. यातीलच एक क्षेत्र आहे व्यवसाय क्षेत्र.

    आज आम्ही तुम्हाला अशा 5 महिलांचा व्यवसाय प्रवास सांगणार आहोत, ज्यांनी घर-परिवार सांभाळत, छोटे व्यवसाय सुरू केले आणि त्यांना यशस्वी करून दाखवलं. या प्रेरणादायी कहाण्या तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील आणि तुम्हालाही  काहीतरी मोठं करण्याची प्रेरणा देतील.

    १) निर्मला हेगडे 

    निर्मला हेगडे यांचा जीवनप्रवास अनेक भारतीय स्त्रियांच्या प्रवासासारखाच आहे. २२ व्या वर्षी त्यांचे  लग्न झाले आणि त्या कर्नाटकातून मुंबईत आल्या. दोन वर्षांत त्यांनी एका मुलाला जन्म दिला आणि २४ व्या वर्षी त्या आई झाल्या. त्यानंतर घर आणि मुलाची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि या जबाबदारी सांभाळण्यातच त्याचं वय झालं असं त्या सांगत असतात.

    निर्मला यांचं वय ६४ वर्षे आहे, त्या  एक शेफ आहेत आणि त्यांनी या वयात आपल्या स्टार्टअपची सुरुवात केली आहे, आणि त्याचं नाव ठेवलं “आई’ज किचन”’. मुंबईत, निर्मला हेगडे आपल्या मुलासोबत एक फूड किचन चालवतात, जिथून आपण घरच्या स्वादिष्ट जेवणाची ऑर्डर देऊ शकता.

    निर्मला हेगडे यांच्या किचनची सुरुवात लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या बिल्डिंगमधील सुरक्षारक्षकांना जेवण देण्यापासून झाली. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत गार्ड ड्यूटीवरून बाहेर जाऊ शकत नव्हते. निर्मला यांनी स्वतः त्यांच्या जेवणाची जबाबदारी घेतली आणि त्यांना घरगुती चवीचे जेवण देण्यास सुरुवात केली, जेणेकरून गार्ड यांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना उत्तम जेवण मिळावे.

    आई’ज  किचनमध्ये तुम्ही महाराष्ट्रीयन, गोवा आणि कर्नाटकी जेवण ऑर्डर करू शकता. ऑर्डर घेणे, पॅकिंग करणे आणि डिलिव्हरीचे काम गौतमच्या (मुलगा) समर्थनामुळे सुरळीत पार पडते.

    शेवटी, इतरांसाठी त्यांचे काही प्रेरणादायक शब्द आहेत: “तुम्हाला ज्या गोष्टींची आवड आहे, त्या गोष्टींच्या संपर्कात राहण्याचे मार्ग नेहमी शोधा. व्यवसाय करण्यासाठी तुमचे वय कधीही तुम्हाला थांबवत नाही.”

    २) उर्वशी  पाटील 

    नाशिकच्या उर्वशी पाटील यांनी MBA केलं असून, सध्या त्या “MBA दाबेली” नावाने एक लोकप्रिय फूड वॅन चालवतात. लग्नानंतर उर्वशी यांच्याकडे चांगल्या पगाराची नोकरी होती, परंतु गरोदरपणात  त्यांनी ती सोडली. त्यांच्या पतीचा व्यवसाय सुरळीत चालू होता, परंतु अचानक त्यात मोठं नुकसान होऊन तो व्यवसाय बंद पडला. उर्वशी यांना लहान बाळ सांभाळायचं असल्याने नोकरी करणं शक्य नव्हतं. घरात आर्थिक अस्थिरता वाढत होती, त्यामुळे त्यांनी या संकटातून मार्ग काढण्याचा निर्णय घेतला.

    एकदा रस्त्यावरून जाताना उर्वशी यांना एक फूड वॅन दिसली आणि त्यातून त्यांना व्यवसायाची कल्पना सुचली. त्यांनी आधी दाबेली कशी बनवायची हे शिकून घेतलं आणि “MBA दाबेली” या नावाने व्यवसायाची सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या मेहनतीचं फळ मिळू लागलं आणि व्यवसायाने भरभराट घेतली.

    आज उर्वशी पाटील या नोकरीपेक्षा कित्येक पटीने अधिक उत्पन्न मिळवत आहेत. त्यांची दाबेली खाण्यासाठी ग्राहक दूरवरून येतात आणि त्यांच्या वॅनवर नेहमीच गर्दी असते.

    मित्रांनो, ही कहाणी आपल्याला शिकवते की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानता कामा नये. उर्वशी पाटील यांची संघर्षमय वाटचाल आणि जिद्द आपल्याला खूप काही शिकवते. संकटं आणि परिस्थिती आपल्याला कितीही खचवण्याचा प्रयत्न करत असली, तरी त्यावर मात करून यश मिळवणं हेच खऱ्या आयुष्याचं यश आहे.

    ३) चंद्रप्रभा परिहार 

    वयाच्या अशा  टप्प्यावर, जेव्हा बहुतांश लोक निवृत्तीचा विचार करतात, 70 वर्षीय चंद्रप्रभा परिहार आज आपल्या व्यवसायात यशस्वीपणे पुढे वाटचाल करत आहेत. चंद्रप्रभा यांना प्रेमाने ‘आबा’ म्हटलं जातं. मुंबईत राहणाऱ्या आबांनी दीड वर्षांपूर्वी क्रोशिया कलेचा वापर करून बॅग्स, टोप्या, घरातील सजावटीच्या वस्तू आणि राख्या बनवायला सुरुवात केली आणि ‘नेहर’ या नावाने आपल्या ब्रँडची ओळख निर्माण केली.

    आबांनी आपल्या आयुष्यातील 70 वर्षे कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यात घालवली. त्यांना लहानपणापासूनच विणकामाची आवड होती, पण त्या कलेला व्यवसायात रूपांतर करण्याचा विचार त्यांनी कधीच केला नव्हता. त्यांनी 20 वर्षांपूर्वी या कलेत डिप्लोमा घेतला होता, पण कुटुंबाच्या गरजांमध्ये स्वतःचे स्वप्न साकार करण्याची संधी त्यांना कधी मिळाली नाही. मात्र, त्यांच्या सून स्वाती यांनी पाठिंबा दिल्यामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात आणता आले.

    सुरुवातीला, सासु-सुनेच्या जोडीने हे फक्त छंद म्हणून हे सगळं सुरु सुरू केलं. स्वाती नवीन डिझाइन्स शोधून आबांना द्यायची आणि आबा त्या डिझाइन्स बनवून ओळखीच्या लोकांमध्ये वाटायच्या. व्यवसायाचा विचार तेव्हा सुरू झाला जेव्हा आबांच्या भाचीने त्यांच्या बनवलेल्या बॅग्स ऑफिसमध्ये नेल्या आणि सहकाऱ्यांनी अशाच बॅग्स बनवण्याची मागणी केली.

    या मागणीने त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि लवकरच त्यांना ऑस्ट्रेलियातून मोठं ऑर्डर मिळाली. यानंतर स्वातीने कंपनीची अधिकृत नोंदणी केली आणि वेबसाइट व इंस्टाग्राम पेज सुरू केले.

    आज आबा स्वतः प्रत्येक ऑर्डरवर काम करतात आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येत आहेत. तुम्हाला देखील आबांच्या या वस्तू  खरेदी करायच्या असतील , तर त्यांच्या वेबसाइट www.nayher.com वर जाऊन त्यांच्या हातांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करू शकता.

    ४) सायली कासले 

    जर एखाद्या व्यक्तीनं  काही करायचं ठरवलं, तर तिला कोणीही थांबवू शकत नाही, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सायली कासले. घरातूनच व्यवसाय सुरू करणाऱ्या सायली आज जवळजवळ 100 हून अधिक प्रकारचं उत्पादनं विकतात आणि दरमहा 2 लाख रुपयांपर्यंत नफा कमावतात.

    सायली यांचं वय 31 वर्ष  आहे आणि त्या वसई येथे राहतात. त्या आपल्या पतीसोबत ‘स्पृहा घरगुती’ या नावाने स्टार्टअप चालवतात. लॉकडाऊनच्या काळात, जेव्हा सगळं काम घरातून चालू होतं, तेव्हा त्यांनी आपल्या स्पेशल ‘ऑल इन वन’ मसाल्याची निर्मिती करून सोसायटीत विक्री सुरू केली. बघता बघता हा मसाला एकदम हिट प्रॉडक्ट बनला.

    यानंतर केवळ 25 हजार रुपये गुंतवून मोठी चक्की आणि मिक्सर खरेदी केला. त्यानंतर त्यांनी आटा (पीठ), तूप, लाडू अशी उत्पादनं बनवायला सुरुवात केली. आपल्या मेहनत आणि चवीच्या जोरावर त्यांची उत्पादनं लवकरच प्रसिद्ध झाली. आज त्यांची  स्वतःची एक फॅक्टरी आहे आणि अनेक महिला त्यांच्या बनवलेल्या उत्पादनांची विक्री करून आत्मनिर्भर बनल्या आहेत.

    त्यांचा एक सामान्य स्त्री ते बिझनेसवूमन हा प्रवास कित्येक महिलांसाठी प्रेरणादायी आहे.

    ५) कमलजीत कौर

    कमलजीत कौर या मूळच्या पंजाबच्या आहेत, पण आता त्या मुंबईत राहतात. 51 वर्षीय कमलजीत यांनी आपल्या घरातूनच व्यवसायाची सुरुवात केली. कोविड काळात त्यांना संक्रमण झाले होते आणि परिस्थिती गंभीर होती. डॉक्टरांनी जवळजवळ आशा सोडली होती, पण त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. या प्रसंगानंतर त्यांना आपल्या लहानपणीच्या काळाची आठवण झाली, जेव्हा त्या ताजं दूध, घी, आणि मक्खन यांचं नियमित सेवन करत होत्या, ज्यामुळे त्यांची इम्युनिटी मजबूत होती. त्यांना मुंबईत या गोष्टींची कमतरता जाणवली.

    कमलजीत सांगतात की लग्नाआधी लुधियानामध्ये राहात असताना त्या कधीच इतक्या आजारी पडल्या नव्हत्या. पण लग्नानंतर मुंबईत आल्यावर ताजं दूध आणि शुद्ध घी मिळणं थांबलं आणि त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली. या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी शुद्ध देशी घी बनवण्याचा निर्णय घेतला. तीन महिन्यांच्या संशोधनानंतर 2020 मध्ये त्यांनी  ‘किम्मू किचन’ची स्थापना केली .

    सुरुवातीला त्यांनी मुंब्रा (ठाणे) येथेच घी बनवण्यास सुरुवात केली होती, पण दूधाच्या गुणवत्तेची समस्या असल्याने त्यांनी लुधियानामध्ये यासाठी एक युनिट सुरू केलं आणि तिथून मुंबईत घी पाठवण्याचं ठरवलं. आता हे घी लुधियानामधील युनिटमध्ये बनवलं जातं आणि तिथून मुंबईत पाठवलं जातं. कमलजीत सांगतात की कधी त्यांना 100 ऑर्डर मिळतात, तर कधी एकही नाही; पण हे काम करताना त्यांना समाधान मिळतं.

    त्यांचा मुलगा हरप्रीत याने लुधियानामध्ये आधीच असलेल्या सेटअपमध्ये थोडेफार बदल करून त्याचा उपयोग केला गेला. या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी 8 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आणि पहिल्याच वर्षात या व्यवसायातून 20 लाख रुपयांपर्यंतची कमाई झाली. कमलजीत यांची कंपनी 220, 500 आणि 1000 एमएलच्या बाटल्यांमध्ये घी विकते, ज्याची किंमत 399 रुपयांपासून सुरू होते.

    तर, या सर्व महिलांच्या कहाण्या आपल्याला हेच शिकवतात की, ठरवलं तर काहीच अशक्य नाही. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, आव्हानं कितीही कठीण असली, तरी जिद्द, मेहनत आणि समर्पणाच्या बळावर कोणत्याही स्वप्नाला साकार करता येतं.

    आणखी वाचा

  • Apple च्या तिजोरीची  चावी भारतीय व्यक्तीच्या हातात;नवीन मुख्य वित्त अधीकारी असणार केवन पारेख

    Apple च्या तिजोरीची  चावी भारतीय व्यक्तीच्या हातात;नवीन मुख्य वित्त अधीकारी असणार केवन पारेख

    52 वर्षीय केवन पारेख यांनी मिशिगन विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे आणि त्यानंतर शिकागो विद्यापीठातून एमबीए केले आहे. ते आता  थेट CEO टीम कुक  यांना रिपोर्ट करणार आहेत आणि त्यांचा Appleच्या टीममध्ये एक महत्त्वाचा सहभाग असेल.

    Apple ने एका आठवड्यात दुसऱ्यांदा व्यवस्थापनात मोठा बदल केला आहे. iPhone 16 लवकरच बाजारात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या व्यवस्थापनामध्ये हे महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

    लुका मेस्त्री यांच्याकडे आता नवीन जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, केवन पारेख यांनी लुका मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. लुका मेस्त्री गेले काही महिने केवन पारेख यांना ऍपलच्या मुख्य आर्थिक अधिकारी (सीएफओ) पदासाठी तयार करत होते.

    पारेख यांनी यापूर्वी ऍपलमध्ये विक्री आणि विपणन विभाग हाताळले आहेत, त्यामुळे त्यांना ऍपलच्या व्यवसायाचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी याआधी थॉमसन रॉयटर्स आणि जनरल मोटर्ससारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी देखील काम केले आहे. रॉयटर्समध्ये त्यांनी चार वर्षे उपाध्यक्ष पदावर काम केले, तर जनरल मोटर्समध्ये बिझनेस ग्रोथ डायरेक्टर म्हणून ते कार्यरत होते.

    ऍपलचे सीईओ टीम कुक यांनी नवीन सीएफओ केवन पारेख यांच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. टीम कुक म्हणाले की, “केवन पारेख हे ऍपलच्या टीमचा महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल.” लुका मेस्त्री यांनी देखील त्यांच्या नवीन जबाबदारीबद्दल उत्साह व्यक्त केला आहे आणि पारेख यांच्या नेतृत्वाखाली कंपनीला यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

    आणखी वाचा

  • पावेल दुरोव यांना फ्रान्समध्ये अटक: टेलिग्रामशी काय आहे  सबंध?

    पावेल दुरोव यांना फ्रान्समध्ये अटक: टेलिग्रामशी काय आहे  सबंध?

    पोलिसांचा दावा आहे की टेलिग्रामवर क्रिमिनल अ‍ॅक्टिव्हिटीजला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आहे. तथापि, टेलिग्रामकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही टिप्पणी आलेली नाही. याशिवाय, दुरोवच्या अटकेवर फ्रेंच मंत्रालय आणि पोलिसांकडून सध्या कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

    या पार्श्वभूमीवर, रशियन सरकारच्या दडपशाहीला न जुमानता देश सोडून टेलिग्रामच्या माध्यमातून आपले स्वतंत्र तंत्रज्ञान विश्व निर्माण करणारे पावेल दुरोव यांच्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया.

    पावेल दुरोव कोण आहेत?

    पावेल दुरोव हे ३९ वर्षीय रशियन उद्योजक असून त्यांनी २०१३ मध्ये टेलिग्राम अ‍ॅपची स्थापना केली. याआधी त्यांनी २००६ मध्ये ‘व्हीकोंटाक्टे’ नावाचं रशियन फेसबुकसारखं सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म सुरू केलं होतं. मात्र, रशियन सरकारसोबत मतभेद झाल्यानं त्यांनी २०१४ मध्ये रशिया सोडून VK (व्हीकोंटाक्टे) मधील आपला हिस्सा विकला आणि टेलिग्राम सुरू केलं. टेलिग्राम हे अ‍ॅप युजर्सच्या गोपनीयतेला प्राधान्य देतं. यातील संदेश एन्क्रिप्टेड असल्यानं ते सुरक्षित असतात. त्यामुळे अल्पावधीतच टेलिग्रामने मोठी लोकप्रियता मिळवली. आज जगभरात कोट्यवधी लोक हे अ‍ॅप वापरतात.

    २०१३ मध्ये पावेल दुरोव यांनी टेलिग्राम हे मेसेजिंग अ‍ॅप लॉन्च केलं. एन्क्रिप्टेड मेसेजिंग फीचर्सच्या माध्यमातून युजर्सची प्रायव्हसी जपत, हे अ‍ॅप लवकरच लोकप्रिय झालं. काही काळातच व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम,फेसबुक, टिकटॉक आणि वीचॅट सारख्या प्लॅटफॉर्मसाठी टेलिग्राम एक प्रभावी स्पर्धक ठरलं. सध्या जगभरात कोट्यवधी लोक हे अ‍ॅप वापरत आहेत आणि पुढील वर्षभरात हे अ‍ॅप एक अब्ज सक्रिय मासिक युजर्सचा टप्पा पार करेल, असा अंदाज आहे.

    टेलिग्राम रशिया, युक्रेन आणि सोव्हिएत रशियातील इतर राज्यांमध्ये विशेषतः प्रभावी आहे. या अ‍ॅपने त्या भागात महत्त्वपूर्ण माहिती स्त्रोत म्हणून स्थान मिळवलं आहे, विशेषत: युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या संदर्भात. युक्रेन आणि रशियन अधिकारी मोठ्या प्रमाणात या प्लॅटफॉर्मचा वापर करत असून भारतात सुद्धा लाखो युजर्स विशेषतः स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी टेलिग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.

    आव्हानं आणि यश

    रशिया सोडल्यानंतर दुरोव यांनी अनेक देशांत भ्रमंती केली आणि अखेर दुबईत स्थायिक झाले. सध्या तिथेच टेलिग्रामचं मुख्यालय आहे. २०२१ मध्ये त्यांनी फ्रान्सचं नागरिकत्व घेतलं, तसेच ते संयुक्त अरब अमिराती आणि सेंट किट्स अँड नेव्हिसचेही नागरिक आहेत.२०१८ मध्ये रशियाने टेलिग्रामवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला, पण दुरोव यांनी युजर्सच्या प्रायव्हसीसाठी सरकारला संदेश देण्यास नकार दिला. यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं, पण युजर्सचा पाठिंबा कायम राहिला

    पावेल दुरोव यांची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे – ते कोणत्याही दबावाला न झुकता युजर्सची प्रायव्हसी जपण्यावर भर देतात. त्यांच्या या तत्त्वावर टेलिग्रामची उभारणी झालेली आहे, ज्यामुळे आज जगभरात ते एक महत्त्वपूर्ण संवाद माध्यम बनलं आहे.

    आणखी वाचा

  • अनिल अंबानी यांच्यावर SEBI चा 5 वर्षांचा प्रतिबंध

    अनिल अंबानी यांच्यावर SEBI चा 5 वर्षांचा प्रतिबंध

    अनिल अंबानीवर बॅन का?

    निवेशकांचं मोठं नुकसान

    रिलायंस होम फायनान्सने नियमांचे उल्लंघन करून कर्ज वितरण केले. त्यामुळे अनेक उधारकर्ते कर्ज फेडण्यात अपयशी ठरले आणि कंपनीने आपली देयकं चुकवली. RBIच्या नियमांनुसार कंपनीला रिसॉल्यूशन प्रोसेसमधून जावे लागले आणि शेअरहोल्डरांना यात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागले. मार्च 2018 मध्ये रिलायंस होम फायनान्सच्या शेअरचं मूल्य 60 रुपये होतं, तर मार्च 2020 पर्यंत धोखाधडीची माहिती समोर येताच कंपनीच्या शेअरचा मूल्य घटून 0.75 रुपये झाला. सध्या, नऊ लाखांपेक्षा जास्त लोकांनी रिलायंस होम फाइनेंसमध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

    आणखी वाचा

  • केवळ महिलाच भागीदार असणारा “जगातील” एकमेव गृहउद्योग… उलाढाल १६०० कोटी

    केवळ महिलाच भागीदार असणारा “जगातील” एकमेव गृहउद्योग… उलाढाल १६०० कोटी

    साल १९५९. मुंबईतल्या गिरगावमधील एक गुजराती कॉलनी. कॉलनीतल्या ७ गृहिणी दुपारच्या फावल्या वेळेत बसल्या होत्या. वेळेचा सदुपयोग करून काहीतरी गृह उद्योग सुरु करावा असा विचार त्यांच्या डोक्यात सुरु होता. यामागे विचार फक्त एवढाच की वेळही निघून जाईल आणि घरखर्चाला हातभार देखील लागेल. कल्पना सुचली आणि तीला मूर्त रूप देण्यासाठी त्यांनी ठरवलं की घरी बसल्या-बसल्या पापड लाटण्याचा उद्योग सुरु करता येईल. उद्योग तर सुरु करायचा पण, त्यात गुंतवायला काही त्यांच्याकडे पैसे नव्हते.

    शेवटी त्या मदतीसाठी ‘सर्वंटस ऑफ इंडिया’ सोसायटीचे अध्यक्ष छगनलाल पारेख यांच्याकडे गेल्या. पारेख यांनी देखील त्यांना निराश केलं नाही आणि त्यांनी या महिलांना ८० रुपये उसने दिले. या पासून त्यांनी तोट्यात गेलेल्या कंपनीकडून जुनी पापड बनवायची मशीन व काही साहित्य खरीदी केले. 

    यापासूनच १५ मार्च १९५९ रोजी सुरु झाला पापड बेलण्याचा उद्योग, जो पुढे चालून ‘लिज्जत पापड’ म्हणून प्रसिद्धीस पावला. आपल्याला आश्चर्य वाटेल पण उद्योगाची सुरुवात या ७ महिलांच्या घराच्या छतावर करण्यात आली होती. सर्वप्रथम त्यांनी विक्रीसाठी पापड उपलब्ध करून दिले. ते फक्त ४ पॅकेट होते. हळूहळू त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि मग आजूबाजूच्या अनेक महिला देखील त्यांच्या या गृहउद्योगात सामील होऊ लागल्या. तीन महिन्यातच ७ वरून कामगारांची संख्या २५ पर्यंत गेली. तुटलेले पापड या महिला शेजाऱ्यांना मोफत वाटप करत, त्यामुळे शेजारीही सहकार्य करत. 

    पाहता-पाहता वर्ष सरलं. पहिल्या वर्षांअंती त्यांची उलाढाल होती ६१९६ रुपये. या वर्षभराच्या काळात त्यांच्याशी अनेक महिला जोडल्या गेल्या होत्या. काम जोरात सुरु होतं.

    पहिल्या वर्षभरात त्यांना एक महत्वाची अडचण समोर आली होती ती म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांत त्यांना काम बंद ठेवावं लागत असे, कारण पापड वाळतच नव्हते. दुसऱ्या वर्षी मात्र त्यांनी यावर उपाय शोधला. उपाय असा होता की एका पलंगावर त्या पापड वाळत घालत असत आणि खालून स्टोव्हच्या मदतीने उष्णता पुरवीत असत. त्यामुळे ही अडचण देखील दूर झाली होती. 

    दुसऱ्या वर्षी त्यांच्या सोबत १०० ते १५० महिला जुळाल्या आणि तिसऱ्या वर्षी हा आकडा ३०० पर्यंत पोहचला होता. जागा कमी पडू लागली. घरी बसायला देखील जागा नसे. त्यानंतर त्यांनी सहकारी महिलांना घरून काम करण्याचा सल्ला दिला आणि त्यांच्या पापडाचे वजन मोजून त्यांना पैसे देण्यात येत होते. आज आपण ज्याला ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणतो, म्हणजे घरी बसून काम करण्याच्या संस्कृतीची सुरुवात त्यांच्या उद्योगात झाली. एवढा मोठा महिलांचा गट तयार झाला होता. त्याची नोंदणी देखील करायची होती.

    गटाला नेमकं नांव काय द्यावं हे सुचत नव्हतं. मग यावरही एक शक्कल लढविण्यात आली. महिला गटाचं नांव सुचविण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतूनच विजेत्या ठरलेल्या धीरजबेन रुपारेल यांनी सुचवलेलं ‘लिज्जत’ हे नाव गटाला देण्याचं ठरविण्यात आलं. 

    ‘लिज्जत’ या गुजराती शब्दाचा अर्थ ‘चवदार किंवा स्वादिष्ट’ असा. विजेत्या धीरजबेन रुपारेल यांना ५ रुपयांचं बक्षिस देखील देण्यात आलं. जुलै १९६६ मध्ये  ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’ हे नाव अधिकृतरीत्या नोंदविण्यात आलं. पापडाची गुणवत्ता उत्तम असल्याने मागणी मोठ्या प्रमाणात वाढत होती आणि प्रसिद्धी देखील मिळत होती. उद्योग भरभराटीस यायला लागला होता. यात भरीस भर म्हणजे खादी ग्रामोद्योग विभागाच्या अध्यक्षांनी या गृह उद्योगात ८ लाख रुपये गुंतविण्याचा निर्णय घेतला. 

    लिज्जतची गाडी वेगाने चालत होती, ती धावायला लागली. ८० च्या दशकात लिज्जतचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. भारतीय घरांमधल्या किचनमध्ये ‘लिज्जत’ हे न टाळता येण्यासारखं नाव झालं. लिज्जतने ९० च्या दशकात विदेशातही व्यवसाय विस्तारला आणि हि घोडदौड अजूनही सुरु आहे.

    आज विदेशामध्ये देखील लिज्जतची वेगळी ओळख आहे. अनेक वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गटाच्या कामाचा गौरव करण्यात आलाय. सात मैत्रिणींनी एकत्र येत लावलेल्या रोपट्याचे रुपांतर आज लाखो महिलांना रोजगार देणाऱ्या वटवृक्षात झाले आहे. आज 45 हजार महिला कर्मचारी 4.8 अब्ज पापडाची निर्मिती करतात. लिज्जतच्या 17 राज्यात 82 शाखा आहेत. अमेरिका, जपान ते साऊथ आफ्रिका अशा 25 देशात लिज्जतची पापड आणि इतर उत्पादने निर्यात होतात. २००२ मध्ये लिज्जतचा निव्वळ फायदा वार्षिक १० करोड रुपये होता. २००२ साली त्यांना Economics Times तर्फे बिझनेस वूमन ऑफ द ईयर हा पुरस्कार मिळाला. 

    आज लिज्जतमध्ये काम करणाऱ्या अधिकतम महिला गरजू, निरक्षर आहेत. इथे सर्व महिला एकमेकांना बेहन (बेन) या नावाने संबोधतात. आता लिज्जत पापडा सोबतच अप्पालम, मसाला, गव्हाचे पीठ, चपाती, कपड्याची साबण, लिक्विड डिटर्जेंट इत्यादी उत्पादनेदेखील तयार करते.

  • जागतिक उद्योजक दिन – प्रवास उद्योजक बनण्याचा

    जागतिक उद्योजक दिन – प्रवास उद्योजक बनण्याचा 

    मग या सगळ्यासाठी काय करता येईल, कसं उत्तर शोधता येईल. तर मित्रांनो उद्योजक होता येईल, व्यवसायाच्या वाटेवर स्वतःचा एक वेगळा प्रवास सुरू करता येईल. परंतु उद्योजकता ही केवळ ठरवून करायची गोष्ट मुळीच नाही. आज जागतिक उद्योजक दिनाचे औचित्य साधून आपण या दिवसाच्या महत्त्वावर प्रकाश टाकणार आहोत.

    खरंतर आजही अनेक ठिकाणी लोकांची अशीच मानसिकता आहे की, चांगलं शिक्षण घ्यायचं, चांगली नोकरी मिळवायची आणि आयुष्यात स्थिर व्हायचं. सहसा मला फक्त व्यवसाय करायचा आहे, मला उद्योजक व्हायचं आहे असे बोलणारे खूप अपवाद आहेत. गर्दीचा बऱ्यापैकी ओढा हा फक्त नोकरीच्या मागेच आहे, अनेक जण अपघाताने, अनावधानाने व्यवसायात पडतात आणि मग शिकत शिकत, अनुभव घेत, त्यांना त्यात यश मिळतं; पण फक्त मला व्यवसायच करायचा आहे, हा दृष्टिकोन मनात घेऊन व्यावसायिक होणारे उद्योजक हे फार तुरळक. खरंतर या मागची कारणं देखील अनेक आहेत. त्यात प्रामुख्याने सांगायचं झालं तर,

    1. व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ नसणं. 

    2. कुटुंबाचा पाठिंबा नसणं.

    3. नक्की कोणता व्यवसाय करायचा आहे याची स्पष्टता नसणं.

    4. Risk घेण्याचं धाडस नसणं.

    5. अनिश्चितता आणि अनुभवाचा अभाव 

    6. सामाजिक दबाव 

    या सगळ्या गोष्टींना समस्या समजून धाडस न करणारी संख्या मोठीच आहे ; परंतु याच्या विरुद्ध याच मुद्द्यांवर उत्तर शोधून व्यवसायाच्या वाटेवर चालणारे अपवाद हे कायम विलक्षणच ठरतात. जगातील यशस्वी संस्थापकांनी, लहान-मोठ्या उद्योजकांनी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी, स्वत:ची प्रतिभा जगापुढे आणताना काय बरं विचार केला असेल? मुळातच एक गोष्ट स्पष्ट आहे की, आव्हाने स्वीकारण्याची स्वेच्छा असणे आणि उद्योजक होणे या दोन गोष्टींतील सीमारेषा ही अत्यंत पुसट आणि कमी आहे. ही स्वेच्छाच तुमच्या मनातील सर्व भय नष्ट करते आणि त्याच वेळी आपण आकस्मिक संकटांना, अचानक येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी पूर्वतयारी करू शकतो, त्यांना भिडू शकतो. 

    असं म्हणतात की नोकरी हा आठ तासांचा व्यवसाय आहे आणि व्यवसाय ही २४ तासाची नोकरी आहे आणि हे खरंच आहे. परंतु नोकरी आणि व्यवसाय या दोन्हीमधून मिळून सरतेशेवटी मिळणारं समाधान यात कमालीचा फरक आहे हे मात्र विसरता कामा नये. नोकरी करून आपण आपल्या कंपनीच्या मालकाला मोठं करतो, तर तेच स्वतःचा व्यवसाय करून आपण स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या पुढच्या पिढीला अप्रत्यक्षरित्या मोठं करत असतो. फरक जरी एका वाक्यात असला तरी त्यातील गांभीर्य हे फार मोठं आहे. आज भविष्याचा विचार केला तर ८०% परंपरागत नोकरीच्या संधी ह्या एआय (artificial intelligence) व रोबोटमुळे संपणार आहेत. डॉक्टरच्या ऐवजी रोबोट सर्जरी करतील, तर मग कामगार वर्गाचे काय होईल ह्याचा विचार आपण न केलेलाच बरा.

    बऱ्याच जणांचं असंही म्हणणं असतं की माझं वय कमी आहे किंवा आता वय निघून गेलं. अशा तक्रारी करणाऱ्यांना एकच सांगायचं आहे की, शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. संभाजी राजांनी वयाच्या 20व्या वर्षी औरंगजेबाला पाणी पाजलं होतं. बिल गेट्स वयाच्या ३०व्या वर्षी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. तर दुसरीकडे, आर. के. दमाणींनी ४८व्या वर्षी D-Martची, जॉन पेंबरटन यांनी ५५व्या वर्षी कोका-कोलाची सुरुवात केली, तर कर्नल सँडर्स यांनी ६२व्या वर्षी KFCची सुरुवात केली. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या समोर आहेत. उद्योजक बनण्याच्या या प्रवासात वय हा मुद्दा खूप दुय्यम आहे. करण्याची इच्छा असेल, मानसिक तयारी असेल, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जायची तयारी असेल. Roadmap तयार असेल, तर इतर समस्यांना आपण नक्कीच तोंड देऊ शकतो.

  • “रंकाचा राजा’’ संघर्षातून उभारले यशस्वी साम्राज्य, लॅरी एलिसन यांचा प्रेरणादायी प्रवास

    “रंकाचा राजा’’ संघर्षातून उभारले यशस्वी साम्राज्य, लॅरी एलिसन यांचा प्रेरणादायी प्रवास 

    आज आपण अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यांच्यावर “रंकाचा राजा” ही म्हण तंतोतंत लागू होते. या व्यक्तीने आपल्या जीवनातील अनेक आव्हानांवर मात करून यश मिळवले आहे. ती व्यक्ती म्हणजे अमेरिकेचे प्रख्यात उद्योजक आणि ओरॅकल कॉर्पोरेशनचे संस्थापक, “लॅरी एलिसन”.

    लॅरी एलीसन आणि देव यांच्यात काय फरक आहे, यावर एक विनोदी प्रश्न विचारला जातो. उत्तर असं दिलं जातं की, “देवाला आपण लॅरी एलीसन आहोत असं वाटत नाही.” यावरूनच लॅरी एलीसन किती महत्वाकांक्षी व्यक्ती आहेत, याची कल्पना येते.लॅरी एलीसन हे तंत्रज्ञान क्षेत्रातील एक क्रांतिकारी नाव आहे. त्यांनी माहिती साठवणाऱ्या म्हणजेच डेटाबेस क्षेत्रात असा काही क्रांतिकारक बदल घडवला की, मायक्रोसॉफ्ट, आयबीएमसारख्या बलाढ्य कंपन्यांनाही त्यांची धडकी भरली होती. त्यांच्या नेतृत्वात, Oracle ने डेटाबेस व्यवस्थापनाच्या तंत्रज्ञानात अभूतपूर्व प्रगती केली. हे तंत्रज्ञान व्यवसायांच्या आणि उद्योगांच्या केंद्रस्थानी आलं, ज्यामुळे जगभरातील डेटा व्यवस्थापनाचा चेहरामोहरा बदलला.

    आज त्यांचा जन्मदिन… चला तर, त्यांचा आजवरचा जीवनप्रवास पाहूया. 

    बालपण आणि प्रारंभिक जीवन 

    लॅरी एलिसन यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. त्यांचे बालपण आणि प्रारंभिक जीवन संघर्षमयी होते. फ्लॉरेन्स स्पेलमन ही त्यांची १९ वर्षे वयाची आई अविवाहित होती. त्यांच्या जन्मानंतर काही दिवसातच त्यांच्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबाला सोडून दिले. लॅरी नऊ महिन्यांचे असताना त्यांना न्यूमोनिया झाला असताना आपल्याला आपल्या मुलाचा नीट सांभाळ करायला जमणार नाही असं वाटल्यामुळे त्यांच्या आईनं एलिसनला शिकागोमधल्या आपल्या लिलियन नावाच्या आत्याकडे सांभाळायला द्यायचं ठरवलं. लिलियन आणि लुईस एलिसन या नवरा-बायकोनं मग एलिसन नऊ महिन्यांचा असताना त्याला दत्तक घेतलं. त्याच्या नव्या आईने त्यांचं चांगल्या प्रकारे पालनपोषण केले. त्यांनंतर त्यांची खरी आई त्यांना कधीच भेटली नाही. ती त्यांना जेव्हा ते ४८ वर्षाचे झाले आणि जगात त्यांचे बर्‍यापैकी नाव झाले होते तेव्हाच भेटली. अगदी हिंदी सिनेमांत दाखवतात तशी स्टोरी आहे ही…

    लॅरींनी 1962 मध्ये अर्बाना-चॅम्पेन येथील इलिनॉय विद्यापीठात शिक्षणाला सुरुवात केली. मात्र, 1964 मध्ये त्यांच्या सावत्र आई म्हणजेच लिलियन याचं निधन झालं, आईच्या निधनानंतर लॅरी खूपच दुःखी झाले आणि त्यांनी  शिक्षण अर्धवट सोडले. लिलियनशी त्याचं  नातं खूप जिव्हाळ्याचं झालं होतं, परंतु लुई म्हणजेच त्यांचे सावत्र वडील यांच्यासोबत त्यांचे संबंध तणावपूर्ण होते. लुई त्यांना वारंवार म्हणत की, तू आयुष्यात कधीच काही साध्य करू शकणार नाही. त्यांच्या सावत्र वडिलांच्या अशा वागणुकीमुळे लॅरींचा स्वभाव हा लहानपनासुनच जिद्दी बनला आणि आता वडिलांना खोटं ठरवून काहीतरी करून दाखवायचा चंग त्यांनी लहापणापासूनच बांधला.

    कठीण परिस्थितीतही लॅरीने धैर्य आणि जिद्द दाखवून पुढे प्रचंड यश मिळवले,  ते म्हणतात ना परिस्थिती कितीही कठीण असली, तरीही स्वप्नांवर विश्वास ठेवणं महत्वाचं असतं. लॅरीनेही हार मानली नाही. 1966 मध्ये शिकागो विद्यापीठात थोडा काळ शिकून त्यांनी आपल्या इच्छाशक्तीने पुढे पाऊल टाकलं. 

    सुरुवातीचा संघर्ष 

    1960 च्या दशकात संगणकाच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत होती. संगणकाविषयी सर्वत्र चर्चा सुरू झाली होती, आणि अनेक कंपन्यांना त्यांच्या कामांना सुलभ बनवण्यासाठी कुशल प्रोग्रामर्सची आवश्यकता होती. लॅरी यांनी शाळेत प्रोग्रामिंगचे धडे घेतले होते आणि त्यांच्या या आवडीमुळे त्यांनी त्या काळात १९६६ मध्ये, वयाच्या अवघ्या  २२ व्या वर्षी पहिला संगणक डिझाईन केला. त्या काळात संगणक आणि तंत्रज्ञान हे नवीन क्षेत्र होते, पण लॅरींनी याच क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्याचे ठरवले. कॅलिफोर्नियामध्ये येऊन त्यांनी संगणक डिझाईनशी संबंधित छोटे-मोठे काम करून आपले पोट भरायला सुरुवात केली. 

    1973 मध्ये ॲम्पेक्स या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत काम करायला सुरुवात केली, त्या ठिकाणी काम करत असताना त्यांना तेथे नवीन सहकारी एड ओट्स आणि बॉब मायनर भेटले, त्यांच्या सोबतचा त्यांचा अनुभव कमालीचा राहिला,  नवी शिकवण घेतली आणि अनुभव मिळवला. मात्र, त्यांच्या यशाची भूक थांबली नाही. 1976 मध्ये त्यांनी ॲम्पेक्स सोडून प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट्समध्ये काम करण्याचा निर्णय  घेतला आणि उपाध्यक्ष पदावर कार्यरत होत, कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागाचे नेतृत्व केले.

    व्यवसायाची सुरुवात (Oracle ची मुहूर्तमेढ)

    1977 मध्ये, एलिसन यांनी आपले सहकारी  मायनर आणि ओट्ससोबत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज (SDL) ची स्थापना केली, जी सुरुवातीला इतर कंपन्यांसाठी कॉन्ट्रॅक्ट प्रोग्रामिंग करण्यासाठी तयार करण्यात आली होती. मात्र, एलिसन यांना SDL द्वारे काहीतरी मोठं आणि क्रांतिकारक करायचं होतं. त्यांना ब्रिटिश संगणक शास्त्रज्ञ एडगर एफ. कॉड यांनी मांडलेल्या रिलेशनल डेटाबेस मॉडेलने खूप प्रेरणा दिली. या मॉडेलने मोठ्या प्रमाणात डेटाचे कार्यक्षम व्यवस्थापन आणि जलद रिकव्हरी करण्याचे मार्ग दाखवले. एलिसन, मायनर आणि ओट्स यांनी या क्षेत्रात मोठ्या व्यावसायिक संधी ओळखल्या आणि त्यांनी डेटाबेस विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले

    त्यांच्या या प्रयत्नांना अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएकडून (Central Intelligence Agency) करार मिळाला आणि त्यांनी व्यावसायिक रिलेशनल डेटाबेस प्रोग्राम विकसित करण्यास सुरुवात केली. अखेर 1979 मध्ये, रिलेशनल सॉफ्टवेअर इंक. (आता Oracle) ने स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज (SQL) वापरणारा पहिला व्यावसायिक रिलेशनल डेटाबेस प्रोग्राम लॉन्च केला. या अभिनव डेटाबेस प्रोग्रामने त्याकाळात लोकप्रियता मिळवली आणि उद्योगाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला.

    संकटांवर मात

    1982 मध्ये नाव बदलून ओरॅकल सिस्टिम कॉर्पोरेशन (नंतर ओरॅकल कॉर्पोरेशन) ठेवलेली कंपनी आपल्या नाविन्यपूर्ण आणि आक्रमक मार्केटिंगसाठी ओळखली गेली. 1980 च्या दशकात कंपनीची झपाट्याने वाढ झाली, आणि 1986 मध्ये कंपनीने सार्वजनिक होऊन यश मिळवलं. 1987 पर्यंत, ओरॅकल जगातील सर्वात मोठी डेटाबेस-व्यवस्थापन कंपनी म्हणून समोर आली. मात्र, 1990 मध्ये भागधारकाच्या खटल्यामुळे झालेल्या अंतर्गत ऑडिटमध्ये असं लक्षात आलं की कंपनीने आपल्या कमाईचा चुकीचा अंदाज वर्तवला होता, ज्यामुळे स्टॉक बाजारात (share market) मोठी घसरण झाली. ओरॅकलच्या शेअरचा भाव जवळपास ८० टक्क्याहून पडला. 

    संकटातून मार्ग काढण्यासाठी, लॅरी एलिसनने कंपनीच्या व्यवस्थापनाची पुनर्रचना केली आणि 1992 च्या अखेरीस ओरॅकल पुन्हा आर्थिक स्थिरतेत आली. 1990 च्या दशकाच्या मध्यात, एलिसनला नेटवर्क कॉम्प्युटर (NC) नावाचा डेस्कटॉप पीसीचा स्वस्त पर्याय विकसित करून मायक्रोसॉफ्टशी स्पर्धा करण्याची संधी मिळाली. NC ही कल्पना पुढे क्लाउड कॉम्प्युटिंगच्या सुरुवातीची चाचणी होती. परंतु, PC च्या सतत कमी होणाऱ्या किमती आणि NC च्या विकासातील विलंब यामुळे मायक्रोसॉफ्टने बाजारात वर्चस्व गाजवलं. 

    त्यांची ही गोष्ट दाखवते की अपयश ही यशाच्या प्रवासात एक पायरी असते. प्रत्येक आव्हानातून शिकून, नव्या उमेदीने पुढे जाणं हेच खऱ्या उद्योजकाचं वैशिष्ट्य असतं. एलिसनची दूरदृष्टी, त्यांची  चिकाटी आणि त्यांच्या चुका स्वीकारण्याची तयारी हेच त्यांच्या  यशाचं गमक ठरलं.

    यशाच्या शिखरावर

    लॅरी एलिसनने इंटरनेटच्या प्रारंभिक काळात ओरॅकलला यशाच्या शिखरावर नेले. वर्ल्ड वाइड वेब (www) तंत्रज्ञानाशी सुसंगत उत्पादने विकसित करण्यावर भर देऊन, त्यांनी कंपनीची वाढ सुनिश्चित केली. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला, एलिसनने प्रतिस्पर्धी सॉफ्टवेअर कंपन्या खरेदी करण्याचे आक्रमक धोरण अवलंबले, ज्यामुळे ओरॅकलची ताकद अधिकच वाढली.

    पीपलसॉफ्ट (2005), सिबेल (2006), BEA (2008), आणि सन मायक्रोसिस्टम्स (2010) या मोठ्या कंपन्यासह अनेक कंपन्या ओरॅकलमध्ये विलीन झाल्या आणि आज  त्यांच्या दूरदृष्टी आणि धाडसी निर्णयांमुळे ओरॅकल जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात एक अग्रगण्य कंपनी बनली आहे.

    एलिसन हे सिलिकॉन व्हॅलीतील सर्वात विशेष आणि  वेगळ्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते, त्यांचे  उत्तुंग यश जगभरात कौतुकास पात्र ठरले. त्यांच्या व्यवसायातील धाडसी निर्णयांमुळे आणि प्रगतीशील दृष्टिकोनामुळे त्यांचे नाव आज अग्रगण्य उद्योजकांमध्ये गणले जाते. 2010 मध्ये प्रतिष्ठित अमेरिका चषक जिंकणारा संघ उभारून त्यांनी आपले नेतृत्व कौशल्य दाखवले. 2012 मध्ये, त्यांनी हवाईयन बेट लनाईचे 98 टक्के भाग विकत घेऊन, आपले भव्य स्वप्न साकार केले. त्या काळात त्यांची  वैयक्तिक संपत्ती सुमारे $40 अब्ज होती, ज्यामुळे ते  जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले. सप्टेंबर 2014 मध्ये, एलिसनने Oracle चे CEO पद सोडले, परंतु कंपनीच्या प्रगतीसाठी कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) म्हणून योगदान देत राहिले . 

    मित्रांनो, लॅरी एलिसन यांची जीवनकथा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अत्यंत गरिबीतून संघर्ष करत त्यांनी जगातील एक मोठं असणारं साम्राज्य उभं केलं. ‘अम्पॅक्स कॉर्पोरेशन’मध्ये काम करत असताना त्यांना ‘ओरॅकल’ची फक्त कल्पना सुचली होती आणि याच कल्पनेवर त्यांनी मेहनतीने कार्य केलं. आज ‘ओरॅकल’मध्ये १,२२,००० हून अधिक कर्मचारी काम करत असून कंपनीची एकूण संपत्ती ९१ बिलियन डॉलर्स आहे.

    लॅरी एलिसन यांची संपत्ती सुमारे ५६ बिलियन डॉलर्स एवढी असून त्यांनी आपला प्रवास खडतर परिस्थितीतून सुरू केला होता. त्यांच्या या यशस्वी प्रवासामध्ये त्यांनी अनेक आव्हानं पार केली. 

    जगातील सर्वाधिक डेटा साठवणारी कंपनी उभारणारे आणि प्रचंड संपत्तीचे मालक लॅरी एलिसन हे जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असून अमेरिकेत तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. परंतु, एवढी मोठी कंपनी उभी करणारे आणि अफाट संपत्ती कमावणारे लॅरी एलिसन यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. लहानपणी सोडून दिल्या गेलेल्या या मुलाने स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेट्स यांच्या बरोबरीने यश मिळवले. त्यांचा प्रवास हा आपल्यासारख्या लाखो तरुणांना स्वप्न पाहण्याची आणि ते प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा देतो.

    आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत यापेक्षा आपला दृष्टिकोन आणि मेहनत कशी आहे, हेच आपल्या यशाचं खरं कारण असतं, हे लॅरी एलिसन यांच्या जीवनातून शिकायला मिळतं. जर तुम्हाला काहीतरी नवीन वेगळे अविश्‍वसनीय करायचे असेल, तर त्याची तयारी आता आणि लगेच करा असं लॅरी नेहमी सांगत असतात, त्यांच्या या प्रवासातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करावा, कारण शेवटी  यश मिळवण्यासाठी चिकाटी आणि प्रयत्न यांचीच गरज असते.

    आणखीन वाचा:

  • उद्योजकांनो, ‘या’ 5 प्रकारे करा तुमच्या व्यावसायिक मालमत्तेचे संरक्षण, पाचवा मुद्दा सर्वात महत्त्वाचा

    उद्योजकांनो, ‘या’ 5 प्रकारे करा तुमच्या व्यावसायिक मालमत्तेचे संरक्षण, पाचवा मुद्दा सर्वात महत्त्वाचा

    १. धोक्यांचे मूल्यांकन करा
    सर्वात प्रथम, आपल्या मालमत्तेला कोणत्या प्रकारचे धोके असू शकतात, हे समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी, आतील आणि बाहेरील दोन्ही प्रकारच्या धोक्यांचे मूल्यांकन करणारे एक सखोल “जोखीम मूल्यांकन” (Risk Assessment) करा. भौतिक सुरक्षा (जसे की, CCTV वगैरे.), सायबर सुरक्षा, कर्मचारी चोरी आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या गोष्टींचा विचार करा. धोक्यांची जाणीव झाल्यावर, आपण त्यांना रोखण्यासाठी योजना आखू शकता.

    २. प्रवेशावर नियंत्रण ठेवा
    संवेदनशील क्षेत्र आणि माहितीमध्ये प्रवेश मर्यादित करणे, हे आपल्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाचे आहे. यासाठी, RFID कार्ड, पासवर्ड लॉक आणि बायोमेट्रिक स्कॅनर यांसारख्या प्रवेश नियंत्रण उपाययोजना राबवा. यामुळे अनधिकृत प्रवेश आणि चोरी रोखण्यास मदत होईल.

    ३. सुरक्षा प्रणालींमध्ये गुंतवणूक करा
    सीसीटीव्ही कॅमेरे, अलार्म आणि सॉफ्टवेअर यांसारख्या सुरक्षा प्रणाली स्थापित करणे आपल्या व्यावसायिक मालमत्तेसाठी अतिरिक्त सुरक्षा प्रदान करते. या प्रणाली चोरी आणि तोडफोड रोखण्यास मदत करतात आणि सुरक्षा घटना घडल्यास पुरावे देखील देतात. यासोबतच तुम्ही आपल्या स्थानिक व्यावसायिक कुलूप बनवणाऱ्याशी संपर्क करून स्मार्ट किंवा अतिरिक्त टिकाऊ लॉक मिळवू शकता. तुमच्या मौल्यवान मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी गुणवत्तेवर आधारित सुरक्षा (Security) प्रणालींवर गुंतवणूक करणे हा फायद्याचा खर्च ठरतो.

    ४. डेटाचा नियमितपणे बॅकअप ठेवा
    आजच्या डिजिटल युगात, डेटा सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. सायबर हल्ला, हार्डवेअर खराब होणे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे डेटा गमावण्यापासून बचाव करण्यासाठी आपण नियमितपणे डेटा बॅकअप घेणे आवश्यक आहे. ऑफसाईट किंवा क्लाऊड बॅकअप डेटा सुरक्षित ठेवण्यास मदत करतील. विश्वासार्ह बॅकअप घेऊन, तुम्ही खात्री बाळगू शकता की, तुमची महत्त्वाची व्यावसायिक माहिती सुरक्षित आहे.

    ५. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या
    आपले कर्मचारी हे आपल्या मालमत्तेचे रक्षण करण्यातील पहिली पायरी आहेत. त्यांना सुरक्षा प्रोटोकॉल आणि आपत्कालीन प्रक्रियांबद्दल प्रशिक्षण द्या. यामुळे ते सुरक्षा धोक्यांना ओळखण्यास आणि त्यांचा सामना करण्यास सक्षम बनतील. तुमच्या मालमत्तेचे प्रभावीपणे रक्षण करण्यात मदत करण्यासाठी तुमच्या संस्थेमध्ये सुरक्षा जागरूकता संस्कृतीला प्रोत्साहन द्या.

    या सोप्या पद्धतींचा अवलंब करून आपण आपल्या व्यावसायिक मालमत्तेचे रक्षण करू शकता. तसेच, आपल्या यशाची आणि दीर्घकालीन टिकून राहण्याची शक्यता वाढवू शकता.

  • उत्तुंग यश मिळवलेल्या नापास मुलाची गोष्ट !

    उत्तुंग यश मिळवलेल्या नापास मुलाची गोष्ट !

    हळूहळू बार्बराला काळजी वाटायला लागली. कसं होणार आपल्या या मुलाचं? अमेरिकेत म्हणजे, मुलानं लोटून घेतलेलं त्याच्या बेडरूमचं दार (त्याला न विचारता) उघडून आत शिरणं खुद्द त्याच्या आई-वडिलांसाठीही निषिद्ध! शेवटी एके दिवशी बार्बराने लेकाला विचारलं, ‘हे असे तासनतास आत बसून तू काय करतोस?’ तो म्हणाला, ‘लॅपटॉप!’ तेव्हा तिला काय ते कळलं. डेव्हिड रात्रंदिवस त्याच्या लॅपटॉपमध्ये बुडूनच गेला होता जणू. खरंतर त्याला शाळेत जाणंसुद्धा नको वाटे. लहानपणी बर्थडे गिफ्ट म्हणून मिळालेल्या लॅपटॉपशी एकट्यानं झगडून त्यानं बर्‍याच गोष्टी स्वत:च आत्मसात केल्या होत्या. जे समजतं आहे, आवडतं आहे, त्याचा हात धरून पुढे जात राहावं असं त्याला वाटू लागलं होतं. शाळेतल्या भाषा, गणित आणि शास्त्राच्या अभ्यासात त्याचा जीव रमेनासा झाला होता. बार्बरा आपल्या लेकावर लक्ष ठेवून होती. टीनएजर झाल्यावर डेव्हिड जरा खुलला. त्याला मुली आवडायला लागल्या. तो त्यांच्याबरोबर बाहेर जाऊ लागला. पण घरी आला की खोलीचं दार बंद! आणि आतला दिवा रात्रभर जळत!

    ‘टोस्टीटोज’ नावाच्या प्रसिद्ध अमेरिकन बिस्किटांचे पुड्यावर पुडे संपवीत डेव्हिड पहाटेपर्यंत आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनला चिकटलेला असे. बार्बराला आपल्या लेकाची तडफड समजत होती. शेवटी एका सकाळी डेव्हिडनं बार्बराला सांगितलं, ‘मॉम, मला शाळेत जाऊन वेळ वाया नाही घालवायचा. मी उद्यापासून जाणार नाही.’ बार्बरानं विचारलं, ‘मग काय करशील?’ तो म्हणाला, ‘मला आवडतं ते काम करीन.’ आपण आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा निर्णय घेतो आहोत, हे तेव्हा बार्बराला ठाऊक असणं शक्य नव्हतं, पण तिनं आपल्या मुलावर विश्‍वास टाकायचं ठरवलं. ती म्हणाली, ‘नको जाऊस शाळेत. तू घरीच कर अभ्यास.’ वयाच्या पंधराव्या वर्षी डेव्हिड ड्रॉप-आऊट झाला, आणि त्यानंतर दोनच वर्षांनी बार्बरा आणि मायकेल यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. एकटीनं दोन टीनएजर मुलांच्या संगोपनाची कसरत बार्बरानं हिमतीनं सुरू केली. तोवर डेव्हिड आसपासच्या छोट्या कंपन्यांच्या वेबसाइट्स डिझाइन करून द्यायला लागला होता. तो एकटाच बाहेर जाई, काम मिळवी आणि एकट्यानंच ते पूर्ण करी. तो झपाटून गेल्यासारखा त्याचं स्वप्न जगू लागला होता. एवढंच फक्त की, त्या स्वप्नात ‘शाळा आणि इतर मुलांसारखा अभ्यास’ या गोष्टींना जागा नव्हती. काय चाललं आहे, हे बार्बराला कळत नव्हतं, पण आपला मुलगा इतर मुलांपेक्षा वेगळा आहे आणि इतरांचं अनुकरण करण्यापेक्षा आपण आपला नवा रस्ता शोधण्यात तो बुडालेला आहे, हे तिला ठाऊक होतं. डेव्हिडनं घरी अभ्यास करून शाळेच्या परीक्षा देणं (होम स्कूलिंग) नाकारलं आणि तो छोट्या (इंटरनेट) स्टार्ट अप कंपन्यांमध्ये कामाला जाऊ लागला.

    एके दिवशी त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, तो म्हणाला, ‘मी जपानला चाललो.’ ’ बार्बरा म्हणाली, ‘तुझ्या आवडीचं काम आहे ना, जरूर जा!’ साठवलेले सगळे पैसे खर्चून त्यानं टोकियोमध्ये एका खोलीचं आगाऊ भाडं भरून टाकलं आणि सॅक पाठीवर मारून निघाला. हा मुलगा घरूनच काम करत असे, त्यामुळे तो कॅलिफोर्नियात नसून जपानमध्ये आहे, हे तो ज्या कंपनीत काम करत होता, त्यांना तब्बल तीन महिन्यांनी कळलं. भरपूर अनुभव कमावून आणि साठवलेले सगळे पैसे खर्च करून डेव्हिड परत आला, तेव्हा त्याच्या खिशात एकूण पंधरा कंपन्यांच्या ऑफर्स होत्या. त्याचं काम सुरू झालं, बार्बरा सांगते, रोज रात्री घरी येताना हा आमच्या अपार्टमेण्टच्या गेटपासूनच जोरात ओरडायला सुरुवात करी, ‘मॉमऽऽऽ यू नो व्हॉट हॅपण्ड टूडे?????’..मग डिनर टेबलवर त्याची बडबड सुरू होई. तो काय म्हणतो, हे मला काहीही कळत नसे, पण तो त्याच्या आवडीचं काहीतरी करतो आहे, हे दिसत असे त्याच्या चेहर्‍यावर आणि तेवढं पुरेसं होतं माझ्यासाठी.’ पालकांसाठी इंटरनेटवर मेसेज बोर्ड लाँच करणार्‍या अर्बनबेबी नावाच्या स्टार्ट अपमध्ये डेव्हिडनं भलतीच चमक दाखवली. त्या बदल्यात पगारासोबत त्याला कंपनीचे काही शेअर्स मिळाले. ही कंपनी टेकओव्हर केली गेली तेव्हा जवळचे शेअर्स विकून डेव्हिडनं पैसा उभा केला आणि आपली स्वत:ची स्वतंत्र कंपनी सुरू केली. त्या कंपनीच्या अनेक प्रॉडक्टमधले नावारूपाला आलेले एक म्हणजे ‘टम्बलर’ ही ब्लॉग्ज होस्ट करणारी साइट! हे चालू होतं तोवर पंचविशी उलटली तरी ग्रॅज्युएशन सोडा, साधं हायस्कूलही पूर्ण न केलेल्या आपल्या मुलाचं बरं चाललं आहे, इतपत खात्री बार्बराला वाटत होती. अन पंधरा दिवसांपूर्वी डेव्हिड आनंदानं उड्या मारत घरी आला आणि ओरडून म्हणाला, ‘मॉमऽऽऽ यू नो, व्हॉट हॅपण्ड टूडे?????’ बातमी होतीच तशी! याहू या बलदंड कंपनीनं डेव्हिडचे टम्बलर हे अत्यंत लोकप्रिय पोर्टल विकत घेण्यासाठी तब्बल १.१ बिलियन अमेरिकन डॉलर्स मोजले होते आणि त्यातले २५0 मिलियन डॉलर्स व्यक्तिगत डेव्हिडच्या खिशात पडले होते !!!!!

    ही बातमी जाहीर होताच डेव्हिड आणि त्याची मॉम एकदम प्रकाशात आले. ’आय अँम द प्राऊडेस्ट मॉम टूडे’ – न्यूयॉर्क टाईम्स या वर्तमानपत्राला मुलाखत देताना बार्बराला याहून वेगळं काही सुचतच नव्हतं,’’मी काही केलं नाही त्याच्यासाठी.. फक्त त्याला स्वत:ला जे करायचं होतं ते त्याला करू दिलं. त्याच्या वाटेत आले नाही, हेच काय ते माझे कर्तृत्व – बार्बरा पुन:पुन्हा हेच सांगते आहे सगळ्या प्रसारमाध्यमांना. तिचा डेव्हिड सव्वीसावे वर्ष ओलांडता ओलांडता केवळ मिलेनिअर बनला आहे एवढंच नव्हे, तर त्याच्या व्यावसायिक आयुष्यात त्यानं जगाला थक्क करून टाकणारं यशही मिळवलं आहे.

    हे नेमकं कसं झालं, हे बार्बराला अजूनही उमगत नाही….!

    • Gunvant Sarpate

    आणखी वाचा

  • शाळेत जाण्याच्या वयात उभारली कंपनी, टर्नओव्हर आहे तब्बल 100 कोटी रुपये, वाचा प्रेरणादायी कहाणी

    शाळेत जाण्याच्या वयात उभारली कंपनी, टर्नओव्हर आहे तब्बल 100 कोटी रुपये, वाचा प्रेरणादायी कहाणी

    आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडत असतात, ज्या खूपच सामान्य असतात. मात्र, त्यातही दूरदृष्टी असणारे व्यक्ती असं काही शोधतात, ज्यामुळे त्यांच्यासोबतच शेकडो लोकांचं भलं झाल्याशिवाय राहत नाही. असंच काहीसं असामान्य काम केलंय तिलक मेहता नावाच्या मुलानं. हा मुलगा इतर कुणी नसून पेपर एन पार्सल या १०० कोटींची उलाढाल करणाऱ्या कंपनीचा संस्थापक आहे. शाळेत जाण्याच्या वयात तिलकने ही कंपनी कशी उभारली, हेच सांगणारा हा लेख.

    inspiring-story-of-a-young-entrepreneur tilak Mehta

    कुटुंब

    आज तिलक मेहताचे वय १८ वर्षे आहे. सन २००६मध्ये गुजरातमध्ये जन्मलेला तिलक पेपर एन पार्सल (Paper N Parcel) या कुरिअर कंपनीचा संस्थापक आहे. तिलकच्या कुटुंबाविषयी जाणून घ्यायचं झालं, तर तिलकचे वडील विशाल मेहता एक लॉजिस्टिक कंपनीशी जोडलेले आहेत. तिलकची आई काजल मेहता या गृहिणी आहेत. तसेच, तिलकला एक बहीणदेखील असून तिचं नाव तन्वी मेहता असं आहे.

    कशी सुचली कल्पना?

    तिलक मेहता जेव्हा १३ वर्षांचा होता, तेव्हा एकेदिवशी वडिलांच्या थकव्यामुळे त्याला व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवण्याची कल्पना सुचली. तिलक त्याच्या वडिलांना ऑफिसहून घरी परतल्यानंतर जेव्हाही स्टेशनरीचे सामान आणायला सांगायचा, तेव्हा त्याला वाईट वाटायचे. वडिलांचा थकवा पाहून तो सतत त्यांना हे सांगू शकत नव्हता की, त्याला शाळेसाठी स्टेशनरी हवीये. एकदा काय झालं की, तिलक त्याच्या काकांकडे सुट्ट्यांसाठी गेला होता. त्यावेळी घरी परतताना तो त्याची पुस्तके त्यांच्या घरी विसरला. मात्र, काही दिवसांनी परीक्षा सुरू होणार होत्या, त्यामुळे तिलक मेहताला ती पुस्तके हवी होती.

    inspiring-story-of-a-young-entrepreneur tilak Mehta

    जेव्हा त्याने कुरिअर एजन्सीशी संपर्क साधला, तेव्हा समजले की, पुस्तक कुरिअर करण्यासाठी पुस्तकांच्या किमतीपेक्षा जास्त रुपये खर्च होत आहेत. एवढंच नाही, तर इतके सारे रुपये खर्च करूनही त्याचे पुस्तक एका दिवसात पोहोचले नाही. इथेच तिलकच्या डोक्यात व्यवसायाच्या कल्पनेने जन्म घेतला.

    तिलक मेहताने त्याच्या वडिलांसोबत आपल्या व्यवसायाच्या योजनेविषयी चर्चा केली आणि त्याने कुरिअर सर्व्हिस सुरू करण्याची संपूर्ण योजना आखली. वडिलांनी तिलकला पेपर एन पार्सल सुरू करण्यासाठी फंडिंग केलं. त्यानंतर त्याची भेट बँक अधिकारी घनश्याम पारीक यांच्याशी घालून दिली, ज्यांनी तिलकच्या व्यवसायात गुंतवणूक केली.

    तिलक मेहताच्या व्यवसायाची कल्पना ऐकून पारीक यांनी बँकेची नोकरी सोडून थेट पेपर एन पार्सल व्यवसाय जॉईन केला. दोघांनी मिळून २०१८मध्ये पेपर एन पार्सल कुरिअर सर्व्हिस सुरू केली. तिलकने आपल्या कंपनीचे नाव पेपर एन पार्सल ठेवले आणि घनश्याम यांना कंपनीचा सीईओ बनवले. १०० कोटींची वार्षिक उलाढाल करणाऱ्या कंपनीत आजघडीला २००हून अधिक लोक काम करतात. तसेच, तिलक मेहता देशातील सर्वात युवा उद्योजक बनला आहे.

    inspiring-story-of-a-young-entrepreneur tilak Mehta

    कंपनी काय काम करते?

    तिलकची कंपनी ही एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, जी शिपिंग आणि लॉजिस्टिकशी संबंधित सेवा देते. ही कंपनी प्रत्येक प्रकारची गरजेची वस्तू, दैनंदिन आयुष्यातील वापरली जाणारी गोष्ट डिलीव्हर करते. तिलकची कंपनी आपल्या मोबाईल ऍपमार्फत लोकांना डोअरस्टेप सेवा देते. कंपनीत २००हून अधिक कर्मचारी तर आहेतच. शिवाय ३००हून जास्त मुंबईचे डब्बेवालेही कंपनीशी जोडले गेले आहेत. या कर्मचाऱ्यांमार्फत कंपनी दरदिवशी हजारो पार्सल डिलीव्हर करते. यासाठी कंपनी ४० ते १८० रुपये आकारते.

    सन २०१८मध्ये सुरू झालेल्या तिलकच्या कंपनीने ६ वर्षांच्या कालावधीत यशाचे शिखर गाठले आहे. अशाप्रकारे १८ वर्षांच्या वयातच एवढी मोठी कंपनी उभी केल्यामुळे तिलकला सर्वात यशस्वी युवा उद्योजकाचा दर्जाही मिळाला.

    आणखी वाचा

  • फेसबुकद्वारे तुमच्या बिझनेसला करायचंय सुपर बुस्ट, तर Facebookचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहितीच पाहिजेत

    फेसबुकद्वारे तुमच्या बिझनेसला करायचंय सुपर बुस्ट, तर Facebookचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहितीच पाहिजेत

    अनेकांनी फक्त फेसबुकचा वापर करून आपला व्यवसाय शिखरावर नेऊन ठेवला आहे. परंतु अनेक व्यावसायिक असे आहेत, ज्यांनी आपल्या व्यवसायासाठी अद्याप फेसबुकचा वापर सुरूच केला नाहीये. मात्र, त्यांनी जर फेसबुकचा वापर केला, तर त्यांच्या व्यवसायात वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. आजचा हा लेख, त्या लोकांसाठी आहे, ज्यांना आपल्या व्यवसाय अनेक पटींनी वाढवायचा आहे. चला तर, फेसबुकचा वापर करून तुम्ही तुमच्या व्यवसायाला ‘चार चांद’ कशाप्रकारे लावू शकता, हे जाणून घेऊयात…

    Benefits of Using Facebook For Business take a look here

    प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर तुमचा व्यवसाय लहान आहे की मोठा, याने काहीही फरक पडत नाही. प्रत्येक व्यवसाय फेसबुक बिझनेस पेजेसचा फायदा घेऊ शकतो. फेसबुक हे राजकीय तक्रारी, मजेशीर मीम्स, दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यापेक्षा खूप काही आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायाचे फेसबुक पेज तयार करता, तेव्हा तुम्ही सध्याचे आणि भविष्यातील कस्टमर (ग्राहक) शोधताना तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स सुधारू शकता. व्यवसायासाठी फेसबुकचा वापर करणे खूपच सोपे आहे. योग्य स्ट्रॅटेजी (रणनीती) वापरून तुम्ही तुमचा व्यवसाय वेगाने वाढवू शकता.

    फेसबुक बिझनेस पेजची ताकद

    सर्वसाधारणपणे अनेक युजर्स हे दिवसातून एकदा का होईना फेसबुकवर फेरफटका मारतच असतात. दैनंदिन आयुष्यात काय घडतंय, याच्याशी जोडले राहण्यासाठी ते दिवसातून एकदा तरी फेसबुक स्क्रोल करतातच. फेसबुक युजर्सला त्यांच्या मित्र आणि कुटुंबाशी जोडलेले राहायचे असते. तसेच, जगात घडणाऱ्या गोष्टींमधून काही ना काही शिकायचे असते. तसेच, त्यांच्या आवडत्या ब्रँड आणि बिझनेससोबत जोडले राहायचे असते. जर तुम्ही तुमच्या व्यवसायाशी संबंधित काही अनाऊन्समेंट (घोषणा) केल्या असतील, तर त्यादेखील त्यांना जाणून घ्यायच्या असतात.

    चला तर, फेसबुक बिझनेस पेजचे मोठे फायदे काय आहेत? हे आपण जाणून घेऊयात…

    व्यवसायासाठी फेसबुक बिझनेस पेज वापरण्याचे फायदे

    १. ऑनलाईन प्रेझेन्स सुधारणे
    २. डायरेक्ट कस्टमर एंगेजमेंट
    ३. किफायतशीर मार्केटिंग
    ४. ऍनालिटिक्स आणि इनसाइट्स
    ५. जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रवेश मिळतो

    १. ऑनलाईन प्रेझेन्स सुधारणे

    प्रत्येक व्यवसायासाठी फेसबुक पेज असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, फक्त फेसबुक पेज असणे गरजेचे नाही, तर तुम्ही त्यावर दरदिवशी काही ना काही पोस्ट केले पाहिजे. जेणेकरून, तुमच्या ग्राहकांना तुमच्या व्यवसायाशी जोडले जावेसे वाटेल. तुम्ही तुमच्या फेसबुक पेजवर काय पोस्ट करत आहात, हे त्यांना जाणून घ्यायचे असते. तसेच, त्या पोस्टवर कमेंट करून तुम्ही त्याला रिप्लाय (प्रतिसाद) द्यावा असेही त्यांना वाटत असते. अशात, जर ग्राहक तुमच्या पेजवर आले आणि त्यांना कोणतीही पोस्ट दिसली नाही, तर ते तुमच्या पेजला रामरामही ठोकू शकतात. त्यामुळे तुम्ही सातत्याने तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स (ऑनलाईन उपस्थिती) सुधरवणे खूपच गरजेचे आहे.

    Benefits of Using Facebook For Business take a look here

    २. डायरेक्ट कस्टमर एंगेजमेंट

    डायरेक्ट एंगेजमेंट हा एक फेसबुक बिझनेस पेजचा सर्वात मोठा फायदा आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हे इंटरॅक्शन्स सोपे व्हावे या अर्थाने डिझाईन केलेले असतात. विशेष म्हणजे, हे वैयक्तिक आणि बिझनेस या दोन्हींच्या बाबतीत लागू होते. त्यामुळे तुमच्या संभाव्य ग्राहकांना तुमच्याशी जोडून घेण्यासाठी त्यांच्याशी संबंध वाढवा. तुम्ही फक्त तुमच्या ग्राहकांना कमेंट आणि डायरेक्ट मेसेज करू शकत नाहीत, तर तुम्ही त्यांच्यासोबत तुमची मूल्ये, कौशल्य आणि कामाशी संबंधित आकडेवारीही शेअर करू शकता. नियमितपणे टार्गेटेड बातम्यांच्या फीडमध्ये दिसून तुम्ही तुमची कंपनी कशामुळे वेगळी बनते ते हायलाईट करू शकता.

    Benefits of Using Facebook For Business take a look here

    ३. किफायतशीर मार्केटिंग

    आता अनेकांना वाटत असेल की, फेसबुक बिझनेस पेज सुरू करायचं म्हणजे, त्यासाठी कितीतरी रुपये खर्च करावे लागत असणार. मात्र, हा तुमचा गैरसमज आहे. फेसबुक बिझनेस पेज तयार करण्यासाठी एकही रुपया खर्च करावा लागत नाही. ही सुविधा मोफत आहे. मात्र, तुम्ही तिथे तुमच्या मार्केटिंग बजेटवर पैसे खर्च करू शकता. तुमच्या बिझनेस पेजची फॉलोईंग वाढवण्यासाठी आणि सोशल मीडिया स्ट्रॅटेजी कशी विकसित करायची, हे शिकत असताना फेसबुक जाहिरातीचाही विचार करा.

    फेसबुक जाहिरातींद्वारे, तुम्ही फक्त तेव्हाच पैसे भरता, जेव्हा लोक तुमची जाहिरात पाहतात किंवा त्यावर क्लिक करतात. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचे आहे, हे ठरवले की, हे मार्केटिंग सर्वात किफायतशीर ठरते. त्यामुळेच आपल्या टार्गेट मार्केटचा विचार करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही फेसबुक जाहिरात टार्गेटिंगसाठी सर्वात आवश्यक असलेल्या डेमॉग्राफिक्सचा अभ्यास करा.

    Benefits of Using Facebook For Business take a look here

    ४. ऍनालिटिक्स आणि इनसाइट्स

    तुम्ही एकदा फेसबुक बिझनेस पेज सुरू कसे करायचे हे शिकलात, की तुम्हाला प्रभावी अशा इनसाइट्स डॅशबोर्डचा ऍक्सेस मिळेल. तुमच्या साइटला भेट देणाऱ्या आणि तुमच्या पोस्टशी संवाद साधणाऱ्या लोकांचा ट्रेंड तुम्हाला दाखवण्यासाठी फेसबुक तुमच्यापुढे आकडेवारी आणून देते. याद्वारे तुम्ही तुमच्या जाहिरातींवर क्लिक करणाऱ्यांची संख्यादेखील पाहू शकता.

    व्यवसायासाठी फेसबुक वापरण्याचा तुमचा दृष्टीकोन सुधारल्यामुळे हे उपयुक्त आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात कोणत्या गोष्टींची सुधारणा केली जाऊ शकते याबद्दल रियल-टाईम इनसाइट्स मिळतील. शेवटी, सोशल मीडिया मार्केटिंग योजना, सर्व मार्केटिंग स्ट्रॅटेजीप्रमाणे, आपण कालांतराने शिकत असताना बदलू शकता.

    Benefits of Using Facebook For Business take a look here

    ५. जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रवेश मिळतो

    तुम्हाला रंजक बाब सांगतो. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण फेसबुकवर तब्बल तीनश कोटींहून अधिक लोकांचे अकाऊंट्स आहेत. तुमच्या टार्गेट प्रेक्षकांसाठी किंवा त्यांच्यापैकी काहींसाठी तुमच्या ब्रँडशी प्रथमच फेसबुकद्वारे ओळख करून देणे शक्य आहे. याला वर्ड-ऑफ-माऊथ मार्केटिंग म्हणून ओळखले जाते. बरेच लोक पैसे देऊन करणाऱ्या जाहिरातींपेक्षा मित्र, कुटुंब आणि अगदी अनोळखी लोकांच्या शिफारशींवर अधिक विश्वास ठेवतात. सोशल मीडियाच्या शब्दात सांगायचं झालं तर, वर्ड ऑफ माऊथ किंवा माऊथ पब्लिसिटी. म्हणजेच युजरच्या फेसबुक फीड किंवा इनबॉक्समध्ये शेअर्स, कमेंट्स, फॉलो इ. जेव्हा तुम्ही तुमच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये फेसबुकचा वापर करता, तेव्हा तुम्हाला या ऑरगॅनिक आउटरीचचा फायदा होतो.

    Benefits of Using Facebook For Business take a look here

    अशाप्रकारे, फेसबुकचा वापर करून तुम्ही रुळावरून खाली उतरलेल्या तुमच्या व्यवसायाची गाडी पुन्हा रुळावर आणू शकता.

    आणखी वाचा

  • तेजीनं होणार भारताची प्रगती, ७ वर्षांत भारताची अर्थव्यवस्था दुपटीनं वाढून ७ ट्रिलियन डॉलरपार जाणार

    तेजीनं होणार भारताची प्रगती, ७ वर्षांत भारताची अर्थव्यवस्था दुपटीनं वाढून ७ ट्रिलियन डॉलरपार जाणार

    भारताच्या वेगवान अर्थव्यवस्थेबाबत सर्वच बाजूंनी चांगली बातमी येत आहे. सातासमुद्रापार भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं २०२४ साठी भारताचा जीडीपी वाढीचा दर ६.८ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मूडीजनं आपलं रेटिंग ६.१ टक्क्यांवरून ६.८ टक्के केलंय. आता आणखी एका रेटिंग एजन्सीनं भारताच्या विकासाच्या गतीला मान्यता दिली आहे. क्रिसिल रेटिंग एजन्सीनं भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक संकेत दिलेत. CRISIL च्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारताचा जीडीपी ६.८ टक्क्यांच्या वेगाने वाढेल. रेटिंग एजन्सीस भारताचा विकासाचा दर वाढवत असताना आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या चीनची स्थिती मात्र बिकट आहे. आर्थिक मंदी आणि व्यवसायांसाठी प्रतिकूल परिस्थितींचा सामना करत असलेल्या चीननं यावर्षी पाच टक्के आर्थिक वृद्धीचं लक्ष्य ठेवलं आहे.

    रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या मते, पुढील आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी ६.८ टक्के दरानं वाढण्याचा अंदाज आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलनं पुढील आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढीचा दर ६.८ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आणि २०३१ पर्यंत भारत उच्च-मध्यम उत्पन्न असलेला देश बनेल अशी शक्यता व्यक्त केलीये. २०३१ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होऊन ७ ट्रिलियन डॉलर (५८० लाख कोटी) होईल असंही त्यांनी म्हटलंय.

    भारतीय अर्थव्यवस्थेला देशांतर्गत संरचनात्मक सुधारणेमुळे आधार मिळेल. २०३१ पर्यंत भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची क्षमता राखू शकते आणि त्यात सुधारणाही करू शकते. चालू आर्थिक वर्षात अपेक्षेपेक्षा ७.६ टक्क्यांच्या वाढीनंतर, २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताची वास्तविक जीडीपी वाढ ६.८ टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा असल्यातं क्रिसिल रेटिंग्सनं आपल्या ‘इंडिया आउटलुक’ अहवालात म्हटलं आहे.

    ७ लाख कोटींची अर्थव्यवस्था

    रिपोर्टनुसार, पुढील सात आर्थिक वर्षांमध्ये (२०२४-२५ ते २०३०-३१) भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडून सात ट्रिलियन डॉलरच्या जवळपास पोहोचेल. क्रिसिलनं सांगितलं की, या कालावधीत अंदाजे सरासरी ६.७ टक्क्यांची वाढ भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवेल. आर्थिक वर्ष २०३०-३१ पर्यंत, भारताचे दरडोई उत्पन्न देखील उच्च-मध्यम उत्पन्न गटापर्यंत पोहोचेल. भारत सध्या ३.६ ट्रिलियन डॉलरच्या (२९६ लाख कोटी) जीडीपीसह (GDP) जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताच्या पुढे अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी हे देश आहेत.

  • इलॉन मस्कच्या ‘या’ 5 टिप्स ठरतील तुमच्याच फायद्याच्या, शेवटचा सल्ला सर्वात महत्त्वाचा

    इलॉन मस्कच्या ‘या’ 5 टिप्स ठरतील तुमच्याच फायद्याच्या, शेवटचा सल्ला सर्वात महत्त्वाचा

    मस्क हा PayPal, Tesla Motors, आणि SpaceX यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा संस्थापक आहे. मस्क त्याच्या नाविण्यपूर्ण विचारासाठी आणि जोखीम पत्करण्याच्या स्वभावासाठी ओळखला जातो. ज्या व्यक्तीच्या घरी श्रीमंती नांदते अशा मस्कला अनेकदा व्यवसाय चालवण्याबाबत सल्ला विचारला जातो. तेव्हा या लेखातून आपण त्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी सांगितलेल्या ५ महत्त्वाच्या टिप्स कोणत्या आहेत, हे पाहूयात…

    इलॉन मस्कने व्यवसाय सुरू करण्यासाठी सांगितलेल्या ५ टिप्स (Elon Musk’s 5 Best Tips for Running a Business)

    १. तुमच्या कामाप्रती कायम उत्साही राहा

    धनाढ्य इलॉन मस्क (Elon Musk) याच्या मते यशस्वी होण्यासाठी तुम्ही जे काही करत आहात, त्याच्याबद्दल कायम उत्साही असलं पाहिजे. तो म्हणतो, “लोकांनी तेच केलं पाहिजे, ज्याची त्यांना आवड आहे. यामुळे त्यांना इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त आनंद मिळेल.”

    worlds-richest-person-elon-musks-5-best-tips-for-running-a-business

    २. जोखीम पत्करा

    इलॉन मस्क असेही सांगतो की, तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल आणि तुमच्या बँक अकाऊंटमध्ये भर घालायची असेल, तर तुम्ही जोखीम पत्करण्यासाठी तयार असला पाहिजेत. २०१२ सालच्या एका मुलाखतीत मस्क म्हणाला होता की, “प्रत्येकजण एकाच साच्यात बसण्याचा प्रयत्न करत आहे. कारण, जोखीम घेण्याविरूद्ध एक प्रचंड पूर्वाग्रह आहे.” मस्कचा असाही विश्वास आहे की, कोणतीच जोखीम न घेणे, ही सर्वात मोठी जोखीम आहे. विशेषत: अशा जगात जे सातत्याने बदलत आहे. अपयशी ठरण्याची हमी एकमेव स्ट्रॅटेजी देते, ती म्हणजे जोखीम न घेणे.

    worlds-richest-person-elon-musks-5-best-tips-for-running-a-business

    ३. कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा

    इलॉन मस्क हा त्याच्या कामाच्या नैतिकतेसाठी ओळखला जातो. मस्क म्हणतो की, “चिकाटी ही खूप महत्वाची आहे. जोपर्यंत तुम्हाला हार मानायला भाग पाडले जात नाही, तोपर्यंत तुम्ही हार मानू नका.” मस्कचा विश्वास आहे की, यशस्वी होण्यासाठी लोकांना ‘जीवतोड काम’ करावे लागेल. इतरांपेक्षा जास्त मेहनत केल्याने तुमच्या यशाची शक्यता वाढेल.

    worlds-richest-person-elon-musks-5-best-tips-for-running-a-business

    मस्क असेही म्हणतो की, “एकसारख्या कामासाठी जर इतर लोक आठवड्याचे ४० तास कामात घालवत असतील आणि त्याच वेळी तुम्ही आठवड्याचे १०० तास काम करत असाल, तर तुम्हाला माहिती आहे की, त्यांना जी गोष्ट साध्य करण्यासाठी जिथे वर्ष लागतं, ते तुम्ही अवघ्या ४ महिन्यात कराल.” त्यामुळे तुम्ही कठोर परिश्रमासाठी तयार असले पाहिजे. तसेच, तुमचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागेल.

    ४. कायम चिकाटी ठेवा

    इलॉन मस्क आज जगातील दुसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. इथपर्यंत पोहोचण्याच्या त्याचा मार्ग सोपा नव्हता. त्याच्याकडेही अपयशाचा मोठा वाटा होता, पण त्याने चिकाटी दाखवली आणि हार मानली नाही. मस्कने स्थापन केलेल्या Zip2 आणि PayPal या दोन्ही कंपन्यांमधून बाहेर पडल्यानंतर २००८च्या मंदीच्या लाटेत त्याची Tesla आणि SpaceX या दोन्ही कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होत्या. त्यामुळे अनेकांना वाटले की, आता मस्क पुन्हा एकदा अपयशाच्या खाईत लोटला जाईल. पण मस्कने त्याच्या आधीच्या चुकांमधून धडा घेतला आणि आज तो जगातली श्रीमंत व्यक्तींच्या मांडीला मांडी लावून बसला आहे. अशाप्रकारे कोणीही स्वतःचे आर्थिक टप्पे गाठण्यासाठी आणि प्रेरणा शोधण्यासाठी त्याच्या अनुभवातून शिकू शकतो.

    worlds-richest-person-elon-musks-5-best-tips-for-running-a-business

    ५. स्वतःमध्ये गुंतवणूक करत राहा

    इलॉन मस्क याचा एकच सर्वोत्तम सल्ला कोणता असेल, तर तो हा की, “तुम्ही गोष्टी चांगल्या प्रकारे कशा करता येतील याचा सतत विचार करा आणि स्वतःला प्रश्न विचारा.” वयाच्या अवघ्या ८ वर्षापर्यंत मस्क हा दिवसाला तब्बल १० तास वाचन करत होता. त्याची पुस्तक वाचण्याची आवड इतकी प्रचंड होती की, लायब्ररीत वाचण्यासाठी त्याच्याकडील पुस्तके संपली म्हणून त्याने संपूर्ण एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका वाचण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या वयात, मस्क सातत्याने काहीतरी शिकण्यावर आणि स्वत:मध्ये गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित करायचा. त्याने स्वतःला प्रोग्राम करायला शिकवले आणि वयाच्या १२ व्या वर्षी त्याने 500 डॉलर्समध्ये व्हिडिओ गेम लिहिली आणि विकली देखील. पुढे मस्कने पेनिल्व्हेनिया विद्यापीठातून भौतिकशास्त्र आणि अर्थशास्त्रात दुहेरी पदवी घेतली. मस्कने सतत स्वत:मध्ये आणि त्याच्या स्वप्नांमध्ये गुंतवणूक केली. आज पाहा मस्कने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

    worlds-richest-person-elon-musks-5-best-tips-for-running-a-business

    मस्क हा आपल्या काळातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक आहे. मस्कने अनेक व्यवसाय शून्यातून उभे केले आहेत. तसेच, आपली राहण्याची आणि काम करण्याची पद्धत बदलण्यात मदत केली आहे. मस्कचा सल्ला कोणत्याही व्यवसायात लागू केला जाऊ शकतो.

    तुम्ही जर मस्कच्या या टिप्सचे पालन केले, तर तुम्हालाही यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

    आणखी वाचा

  • एकेकाळी ८ हजार पगारावर करायचा काम, पण आता हजारो कोटींमध्ये खेळतो; Zerodha च्या मालकाचा रंजक प्रवास

    एकेकाळी ८ हजार पगारावर करायचा काम, पण आता हजारो कोटींमध्ये खेळतो; Zerodha च्या मालकाचा रंजक प्रवास

    यशाचे शिखर गाठणाऱ्या या स्टार्टअपचे सहसंस्थापक नितीन कामथ यांनी सोमवारी (दि. २६ फेब्रुवारी) धक्कादायक खुलासा केला. त्यांनी सांगितले की, सहा आठवड्यांपूर्वी त्यांना स्ट्रोकचा सामना करावा लागला होता. कामथ यांनी ही माहिती त्यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून दिली. चला तर, नितीन कामथ यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.

    who is Nithin Kamath Zerodha founder know everything about him

    झेरोधा (Zerodha) या स्टार्टअपने ही भारतात ऑनलाईन ट्रेडिंगला लोकप्रिय बनवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. नितीन कामथ यांनी त्यांचा भाऊ निखिलला सोबतीला घेत झेरोधाची स्थापना केली होती. नितीन लाखो युवा उद्योजकांचे प्रेरणास्थान आहेत.

    किती वर्षांचे आहेत झेरोधाचे संस्थापक?

    नितीन कामथ (Nithin Kamat) यांचा जन्म ५ ऑक्टोबर, १९७९ रोजी कर्नाटकाच्या शिमोगा येथे झाला. ४५ वर्षीय नितीन यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये बीईची पदवी घेतली आहे. २००८ मध्ये त्यांनी सीमा पाटील यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. विशेष म्हणजे, सीमा या झेरोधामध्ये क्वालिटी चीफ आहेत. या दाम्पत्याला एक मुलगाही आहे. त्यांची संपत्ती ही जवळपास २.७ अब्ज डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार, 22,526 कोटी रुपये आहे. क्रिकेट आणि फुटबॉलची प्रचंड आवड असलेले नितीन हे Rainmatter नावाच्या एका व्हेंचर कॅपिटल फर्मचेही सह-संस्थापक आहेत.

    who is Nithin Kamath Zerodha founder know everything about him

    काय म्हणाले नितीन?

    ट्विटरचा वापर कोण करत नाही? अर्थातच सर्वजण करतात. नितीनही एक सक्रिय ट्विटर युजर आहेत. ते नेहमी आपले विचार आणि अनुभव लोकांसोबत शेअर करत असतात. विशेष म्हणजे, जेव्हा त्यांना स्ट्रोक आला, तेव्हा त्यांनी याची माहिती देण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला होता. त्यांनी ट्वीट करत म्हटले होते की, “जवळपास सहा आठवड्यांपूर्वी मला अचानक हलका स्ट्रोक आला होता. यामागील कारण, वडिलांचे निधन, व्यवस्थित झोप पूर्ण न होणे, थकवा, शरीरातील पाण्याची कमतरता आणि जास्त काम करणे, यापैकी काहीही असू शकते.”

    कशी झाली सुरुवात?

    नितीन यांनी २०००च्या दशकाच्या सुरुवातीला एक ट्रेडर म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. एक वेळ अशी होती जेव्हा नितीन यांना कॉल सेंटरमध्ये ८ हजार रुपयांच्या मासिक वेतनावर काम करावे लागत होते. त्यावेळी नितीन फक्त १७ वर्षांचे होते. ही त्यांची पहिलीच नोकरी होती. नितीन यांनी त्यांच्या याच पगारासह स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू केली होती. सुरुवातीला एक वर्ष त्यांनी स्टॉक मार्केटला गांभीर्याने घेतले नव्हते. मात्र, नंतर त्यांना कळून चुकले की, यामधून चांगला नफा मिळवला जाऊ शकतो.

    who is Nithin Kamath Zerodha founder know everything about him

    नितीन यांनी २००१ ते २००५ पर्यंत कॉल सेंटरमध्ये काम केले. सन २००५मध्ये त्यांनी आपला एक सल्लागार व्यवसाय सुरू केला. काही वेळानंतर जेव्हा NSEने मोफत ट्रेडिंग प्लॅटफॉर्म लाँच केला, तेव्हा नितीन यांना झेरोधा सुरू करण्याची कल्पना सुचली. कामथ बंधूंनी कोणत्याही फंडिंगशिवाय स्वत:च्या जोरावर २०१० साली बंगळुरूत झेरोधाची सुरुवात केली होती. २०१६ पर्यंत कंपनीच्या ग्राहकांची संख्या ७० हजार एवढी होती. मात्र, डिसेंबर २०१५मध्ये कंपनीने झिरो ब्रोकरेज इक्विटी इन्व्हेस्टिंग सुरुवात केली. त्यानंतर कंपनीच्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली.

    मागील वर्षी मिळाली कोट्यवधींची भरपाई

    नितीन आणि निखिल यांना मागील वर्षी म्हणजेच आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये १९५.४ कोटी रुपयांची भरपाई मिळाली होती. यादरम्यान दोन्ही भावांना प्रत्येकी ७२ कोटी रुपयांचा वार्षिक पगार मिळाला. म्हणजेच दोन्ही भावांना दर महिन्याला ६ कोटी रुपये पगार मिळाला.

    who is Nithin Kamath Zerodha founder know everything about him

    कंपनीचा फायदा

    झेरोधा या कंपनीच्या मागील आर्थिक वर्षातील उत्पन्न हे ३८.५ टक्क्यांच्या वाढीसह ६८७५ कोटी रुपये राहिले होते. हेच उत्पन्न २०२२च्या आर्थिक वर्षात ४,९६४ कोटी रुपये होते. यादरम्यान कंपनीचा नेट प्रॉफिटही ३९% वाढून २९०७ कोटी रुपयांवर पोहोचला. आर्थिक वर्ष २०२२मध्ये हे उत्पन्न २०९४ कोटी रुपये होते. कंपनीचे मूल्य पाहायचे झाले, तर तब्बल ३०००० कोटी रुपये आहे. हा नफा वार्षिक नफ्यापेक्षा जवळपास १० पटींनी जास्त आहे. स्टार्टअप कंपन्यांमध्ये कामथ बंधूंची संपत्ती ही सर्वाधिक आहे.

    आणखी वाचा

  • यशस्वी व्हायचं असेल, तर वेळ काढून मुकेश अंबानींचे ‘हे’ 5 नियम एकदा वाचाच

    यशस्वी व्हायचं असेल, तर वेळ काढून मुकेश अंबानींचे ‘हे’ 5 नियम एकदा वाचाच

    मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मालक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज ही तीच कंपनी आहे, जिने प्रत्येकाला फोन वापरण्याची सवय लावली होती. ही रिलायन्स कंपनी आज भारतातील सर्वाधिक मूल्य असणारी कंपनीही आहे. विशेष म्हणजे, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही १११ बिलियन डॉलर्स एवढी आहे. एवढं मोठं साम्राज्य, कोट्यवधी-अब्जो रुपये एका दिवसात किंवा एका रात्रीत कमावले जात नाहीत. यामागे त्यांचे वडील स्वर्गीय धीरूभाई अंबानी यांची कठोर मेहनत राहिली आहे. त्यांच्यानंतर मुकेश अंबानी यांनी आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे चालवत यशाच्या शिखरावर पोहोचवला आहे. तसं पाहिलं, तर मुकेश अंबानींना हा व्यवसाय वारशात मिळाला आहे, पण त्यांनीही आपलं डोकं लावून आणि कठोर मेहनत घेऊन एक वेगळी ओळख बनवली आहे. त्यामुळे आज आपण या लेखातून यशस्वी बनण्याच्या त्यांच्या ५ नियमांविषयी जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्हीही बिझनेस किंग बनू शकता.

    यशस्वी बनण्यासाठी मुकेश अंबानींचे ५ नियम (Mukesh Ambani’s 5 rules to success)


    १. धैर्यवान बना

    मुकेश अंबानी यांनी यशस्वी बनण्यासाठी सांगितलेला पहिला नियम म्हणजे धैर्यवान बना. व्यवसायात किंवा जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात धैर्याशिवाय कोणीही मोठे यश मिळवले नाहीये. अर्थातच, तुम्ही एखादी मोठी गोष्ट करायला जाता, तेव्हा तुम्हाला थोडी भीती वाटते. मात्र, तुमच्यात दडलेला नायक शोधण्यासाठी तुम्हाला भीतीवर विजय मिळवावाच लागेल. धैर्याने, आत्मविश्वासाने कोणत्याही संकटावर मात करू शकता.

    mukesh-ambani-5-rules-to-become-successful

    २. समस्या शोधा आणि त्यावर तोडगा काढा

    अंबानींचा दुसरा नियम असा की, एक उद्योजक म्हणून, तुम्हाला ज्या समस्येचे निराकरण करायचे आहे ती शोधणे खूप महत्वाचे आहे. अंबानी सांगतात, ममला युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (UDCT) मध्ये प्रोफेसर शर्मा मिळाल्याने मी धन्य झालो. ते नेहमी म्हणायचे की, मी तुम्हाला समस्यांची यादी देणार नाही. तुम्ही जाऊन कोणत्याही गोष्टीवर काम करू शकता. तुम्हाला एखादी समस्या सापडेल आणि मग तुम्हाला सापडलेल्या समस्येच्या आणि त्यावर शोधलेल्या निराकरणाच्या गुणवत्तेवर मी तुम्हाला ग्रेड देईन. त्यामुळे उद्योजकाला हेच नियम लागू होतात की, तो समस्या सोडवत नाही, तर तो प्रथम समस्या शोधतो. एकदा तुम्हाला समस्या सापडली की, तुम्ही ती सोडवता.

    mukesh-ambani-5-rules-to-become-successful

    ३. कठोर मेहनत करा

    अंबानी म्हणतात, तुमचे धावण्याचे शूज घाला, परंतु लक्षात ठेवा की, वैयक्तिक आणि व्यावसायिक यश हे स्प्रिंट (Sprint) नसून एक मॅरेथॉन आहे. आपण एका गतिमान जगात राहत असल्याने भाग्यवान आहोत, जिथे काहीही शक्य आहे. मात्र, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, असे रातोरात यश मिळत नाही. तुम्हाला समर्पित व्हावे लागेल. एकल मनाने राहावे लागेल आणि कठोर परिश्रम करावे लागेल. यातील कोणत्याच गोष्टीला पर्याय नाही. तसेच, हेही लक्षात ठेवा की, जीवनाच्या या मॅरेथॉनमध्ये आपले ध्येय साध्य करणे महत्वाचे आहे.

    mukesh-ambani-5-rules-to-become-successful

    ४. उच्च उद्देशाची सेवा करा

    वडील धीरूभाई अंबानी यांनी १०० डॉलर्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड सुरू केल्याचे मुकेश अंबानी सांगतात. ते म्हणतात, १९८० मध्ये जेव्हा मी व्यवसाय जॉईन केला, तेव्हा कंपनीचे बाजारमूल्य हे ३० किंवा ४० दशलक्ष डॉलर्स होते. पुढच्या ३० वर्षात, या देशाने दिलेल्या संधींमुळे आम्हाला भारतासाठी संपत्ती निर्माण करता आली.

    माझ्या वडिलांचा मोठा विश्वास होता की, कोणताही व्यवसाय ज्याचा एकमेव उद्देश पैसा कमविणे हा आहे तो करणे योग्य नाही. खरं तर, व्यवसाय हा एक मोठा सामाजिक हेतू पूर्ण केला पाहिजे. रिलायन्सने आपले सर्व पैसे भांडवली बाजारातून आणि वैयक्तिक लहान भागधारकांकडून उभे केले, म्हणून आम्ही सामान्य भारतीयांपैकी फक्त रिलायन्समध्ये गुंतवणूक करून दहा लाख करोडपती निर्माण केले आहेत आणि हीच देशासाठी संपत्ती निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. संधी निर्माण झाली की संपत्ती ही येतेच.

    mukesh-ambani-5-rules-to-become-successful

    ५. अपयश स्वीकारा

    अंबानी असेही म्हणतात की, अपयश हे सामान्य असते. सर्व यश पाहून, माझ्या स्वतःच्या बाबतीतही लोक हे पाहत नाहीत की, यशस्वी होण्यापूर्वी मी किती वेळा अयशस्वी झालो आहे. तुम्ही यशस्वी होण्यापासून एक पाऊल दूर आहात. त्यामुळे अपयशाने कधीही निराश होऊ नका. त्याच्याकडून शिका, पण हार मानू नका.

    आणखी वाचा