Category: उद्योजकता

  • New banking rules 2025: सावधान! १ एप्रिलपासून बँकिंगचे नियम बदलले, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

    New banking rules 2025: सावधान! १ एप्रिलपासून बँकिंगचे नियम बदलले, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

    १ एप्रिल २०२५ पासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे आणि त्यासोबतच बँकिंग क्षेत्रात काही महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. हे बदल एटीएम व्यवहार, बचत खाते, मुदत ठेवी (एफडी), क्रेडिट कार्ड फायदे आणि चेक व्यवहार यासारख्या अनेक गोष्टींवर थेट परिणाम करणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी या नव्या नियमांची पूर्ण माहिती करून घेणे आवश्यक आहे, नाहीतर अनावश्यक शुल्क भरावे लागू शकते किंवा काही फायदे गमवावे लागू शकतात.

    नवे नियम ग्राहकांच्या सोयीसाठी असले तरी त्यामध्ये काही बंधने आणि अटी देखील लागू करण्यात आल्या आहेत. एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा, एफडीवरील व्याजदरातील बदल, क्रेडिट कार्डशी संबंधित शुल्क आणि चेक क्लिअरिंगबाबतच्या नव्या अटींचा सरळ परिणाम सर्वसामान्य बँकिंग व्यवहारांवर होणार आहे. या लेखात आपण कोणते नियम बदलले आहेत या विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

    एटीएममधून पैसे काढण्याचे नियम 

    नव्या आर्थिक वर्षापासून एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. यापूर्वी ग्राहकांना दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून महिन्याला ५ वेळा मोफत पैसे काढण्याची सुविधा होती. मात्र, आता ही मर्यादा ३ व्यवहारांवर आली आहे. त्यानंतर जर तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून ५ पेक्षा जास्त वेळा पैसे काढले, तर प्रत्येक वेळी २० ते २५ रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

    जर तुम्ही वारंवार दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असाल, तर तुम्हाला अतिरिक्त खर्च करावा लागेल. त्यामुळे ग्राहकांनी शक्यतो आपल्या बँकेच्या एटीएमचा वापर करावा किंवा डिजिटल पेमेंटच्या पर्यायांचा अधिक विचार करावा. 

    किमान शिल्लक रकमेच्या नियमांत बदल

    स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि कॅनरा बँक यांनी किमान शिल्लक ठेवण्याच्या अटी बदलल्या आहेत. यापूर्वी ग्राहकांसाठी ठराविक किमान रक्कम ठेवण्याचा नियम होता, मात्र आता हा निकष खात्याचे स्थान शहरी, निमशहरी आणि ग्रामीण शाखांनुसार ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक भागातील ग्राहकांसाठी किमान शिल्लक रकमेची मर्यादा वेगळी असणार आहे.

    या बदलामुळे खात्यात आवश्यक शिल्लक न ठेवल्यास ग्राहकांना दंड भरावा लागू शकतो. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी किमान शिल्लक तुलनेने कमी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळेल. मात्र, शहरी आणि निमशहरी भागातील ग्राहकांनी आपल्या खात्यात पुरेशी शिल्लक असल्याची काळजी घ्यावी, अन्यथा दरमहा काही शुल्क कपात होऊ शकते.

    बचत खाते आणि मुदत ठेवीवरील व्याजदरांत बदल

    बँकांनी बचत खाती (Savings Account) आणि मुदत ठेवी (Fixed Deposit) यांचे व्याजदर नव्या नियमांनुसार ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. आता खात्यातील शिल्लक रकमेच्या आधारे व्याजदर ठरेल. म्हणजेच, ज्या ग्राहकांच्या खात्यात जास्त शिल्लक असेल, त्यांना अधिक व्याज मिळेल, तर कमी शिल्लक असणाऱ्यांना तुलनेने कमी व्याजदर लागू होईल.

    या बदलामुळे मोठ्या ठेवींवरील परतावा वाढण्याची शक्यता आहे, तर कमी शिल्लक असणाऱ्या खातेदारांना पूर्वीपेक्षा कमी व्याज मिळू शकते. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या खात्यात जास्तीत जास्त शिल्लक ठेवावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा बदल लोकांना अधिक बचतीसाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने करण्यात आला आहे.

    चेक व्यवहारांसाठी “पॉझिटिव्ह पे” सिस्टीम लागू

    बँका आता ‘पॉझिटिव्ह पे सिस्टीम’ नावाची नवी सुविधा लागू करत आहेत, ज्यामुळे मोठ्या रकमांच्या चेक व्यवहारांची सुरक्षा वाढणार आहे. या प्रणालीअंतर्गत, जर तुम्ही ५,००० रुपयांपेक्षा अधिक रकमेचा चेक दिला, तर तो वटवण्यापूर्वी तुम्हाला बँकेला चेकचा क्रमांक, तारीख, लाभार्थ्याचे नाव आणि रक्कम याची माहिती द्यावी लागेल.

    या नव्या नियमामुळे फसवणूक आणि चुकीच्या व्यवहारांना आळा बसणार आहे. मोठ्या चेक व्यवहारांवर अधिक नियंत्रण राहील, ज्यामुळे चुकीने चेक वटण्याच्या घटना कमी होतील. मात्र, व्यवसाय आणि मोठ्या व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना बँकेला आधी माहिती द्यावी लागेल, त्यामुळे अतिरिक्त काळजी घेण्याची गरज भासेल.

    क्रेडिट कार्डच्या फायद्यांमध्ये बदल

    स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयडीएफसी फर्स्ट बँक आणि ॲक्सिस बँक यांनी त्यांच्या क्रेडिट कार्ड योजनांमध्ये काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. याआधी या कार्ड्सवर टिकर व्हाऊचर, नूतनीकरण फायदे आणि माइलस्टोन रिवॉर्ड्स मिळत होते. मात्र, १ एप्रिल २०२५ पासून काही फायदे बंद होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खर्चावर होईल.

    विशेषतः प्रवासासाठी हे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना पूर्वीइतके फायदे मिळणार नाहीत, त्यामुळे त्यांनी आपल्या खर्चाची पुनर्रचना करावी लागेल. तसेच, इतर बँकाही भविष्यात आपल्या क्रेडिट कार्ड योजनांमध्ये अशा प्रकारचे बदल करू शकतात, त्यामुळे ग्राहकांनी नवीन योजना निवडताना अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

    डिजिटल बँकिंग आणखी सुरक्षित आणि सोयीस्कर

    बँका डिजिटल बँकिंग अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. यात एआय (Artificial Intelligence) आधारित चॅटबॉट्स, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन यांसारख्या आधुनिक सुविधा समाविष्ट केल्या जाणार आहेत. या बदलांमुळे ग्राहकांचा अनुभव अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल.

    ग्राहकांना २४/७ मदतीसाठी एआय चॅटबॉट्स उपलब्ध असतील, त्यामुळे तक्रारी आणि शंका तत्काळ सोडवता येतील. तसेच, डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित होतील, ज्यामुळे हॅकिंग आणि फसवणुकीचा धोका कमी होईल. या सुधारणांमुळे ऑनलाइन बँकिंग अधिक जलद आणि सोपे होणार आहे.

    नवीन आर्थिक वर्षात लागू होणारे बँकिंग नियम ग्राहकांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम करू शकतात. जर तुम्ही नियमितपणे एटीएम वापरत असाल, क्रेडिट कार्डचे फायदे घेत असाल किंवा मोठ्या रकमेचे चेक व्यवहार करत असाल, तर या बदलांची माहिती ठेवणे गरजेचे आहे. यामुळे अनावश्यक शुल्क किंवा इतर अडचणी टाळता येतील.

    योग्य आर्थिक नियोजनासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा जवळच्या शाखेत जाऊन नवीन नियमांची माहिती घ्या. 

    आणखी वाचा

  • Vandana Luthra: २०,००० रुपयांतून सुरू केलेल्या व्यवसायाचं २५०० कोटी रुपयांचं साम्राज्य

    Vandana Luthra: २०,००० रुपयांतून सुरू केलेल्या व्यवसायाचं २५०० कोटी रुपयांचं साम्राज्य

    स्वप्नांना सत्यात उतरवण्याची मेहनत, चिकाटी आणि जिद्द आवश्यक असते ,असं आपण नेहमीच ऐकत आलो आहोत,आणि वंदना लुथरा यांचा यशस्वी प्रवास हे याच गोष्टींचं उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या प्रवासाने हे सिद्ध करून दाखवलं आहे की, एक स्त्री जी कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही, तिच्या परिश्रमाने VLCC सारख्या मोठ्या कंपनीचं साम्राज्य उभं करू शकते. त्यांच्या संघर्षाची, जिद्दीची आणि चिकाटीची कहाणी आज लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

    आजच्या लेखात आपण वंदना लुथरा यांच्या संघर्ष, जिद्द आणि चिकाटीच्या माध्यमातून उभं केलेल्या यशस्वी व्यवसायाचा प्रवास जाणून घेणार आहोत.

    प्रारंभिक जीवन आणि प्रेरणा

    वंदना लुथरा (Vandana Luthra) यांचा जन्म १२ जुलै १९५९ रोजी दिल्लीमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या आई, डॉ. अरुणा सप्रू, या एक समाजसेविका होत्या आणि गरीब, वंचित लोकांसाठी काम करत होत्या. त्यांनी ‘अमर ज्योती‘ नावाची एक आयुर्वेदिक संस्था स्थापन केली, जी गरजूंसाठी मदतकार्य करत होती . या समाजसेवेचा वंदनांच्या मनावर खोल परिणाम झाला आणि लहानपणापासूनच लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा त्यांना आपल्या आईकडून मिळाली.

    वंदना लुथरा यांना शाळेत असतानाच सौंदर्य, आरोग्य आणि फिटनेस या क्षेत्रांची विशेष आवड होती. या क्षेत्रात काहीतरी मोठं करण्याची त्यांची मनोमन इच्छा होती. मात्र, त्या काळात महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करणं आव्हानात्मक होतं . तरीही, वंदनाने कधीही हार न मानता आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचा निर्धार केला.

    दिल्ली विद्यापीठातून समाजशास्त्रात पदवी घेतल्यानंतर वंदनाने भारतात पोषण आणि कॉस्मेटोलॉजीबाबत असलेल्या उदासीनतेची जाणीव केली. यासाठी त्या पुढील शिक्षणासाठी जर्मनीला गेल्या. तिथे त्यांनी पोषणशास्त्र आणि कॉस्मेटोलॉजीचं सखोल शिक्षण घेतलं. जर्मनीत शिक्षण घेत असताना त्यांनी आरोग्य आणि वेलनेस क्षेत्राचं महत्त्व ओळखलं आणि भारतात या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला.

    व्यवसायाची सुरूवात 

    वंदना लुथरा यांनी १९८९ साली भारतात परतल्यावर  केवळ २०,००० रुपयांच्या भांडवलावर दिल्लीत VLCC (वंदना लुथरा कर्ल्स अँड कर्व्स) ची स्थापना केली. सुरुवातीला वजन कमी करण्याच्या उपचारांवर लक्ष केंद्रित करताना, त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आधुनिक उपकरणांचा वापर करून लोकांच्या आरोग्याला प्राधान्य दिलं .सुरुवातीला दिल्लीच्या सफदरजंग एन्क्लेव्हच्या गजबजलेल्या बाजारात पहिले सेंटर सुरू करताना त्यांनी अनेक आव्हानांचा सामना केला, पण त्यांच्या दृष्टिकोनामुळे लोकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी ठरल्या.

    VLCC ने वजन कमी करण्याच्या वैज्ञानिक पद्धतींबरोबर सौंदर्य सेवांची भर टाकून ग्राहकांची मने जिंकली. वेलनेस क्षेत्रात ग्लॅमरच्या पलीकडे जाऊन त्यांनी आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन दिलं . कठोर परिश्रम, नावीन्य, आणि उच्च गुणवत्तेमुळे VLCC आज एक मोठे नाव बनलं आहे, ज्याने देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपलं स्थान निर्माण केलं आहे.

    सुरुवातीचे आव्हान आणि संघर्ष

    वंदनाला सुरुवातीला त्यांच्या व्यवसायासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ९० च्या दशकात महिलांसाठी व्यवसायात यश मिळवणं अत्यंत कठीण होतं. समाजाच्या पुरुषप्रधान मानसिकतेमुळे, त्यांची कल्पनाही लोकांना आवडत नव्हती, आणि त्यातच डॉक्टरांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीला पाठिंबा देण्यास नकार दिला. मात्र वंदनाने हार मानली नाही, कारण त्यांचा विश्वास खूप दृढ होता.त्यांनी त्यांच्या  कामामध्ये सातत्य ठेवलं. त्यांचं ध्येय होतं एक असा व्यवसाय तयार करणं, जो वैद्यकीय दृष्टिकोनातून कार्यरत राहील, पण त्यासाठी वेळ लागणार होता.

    सुरुवातीला ग्राहक मिळवणं देखील त्यांच्यासाठी मोठं आव्हान होतं. पण त्या कधीही मागे ह्टल्या नाहीत . सतत मेहनत करत राहिल्या आणि आपल्या कल्पनांना प्रगल्भतेच्या दिशेने आकार देत राहिल्या . त्यांच्या या परिश्रमांमुळे त्यांनी एक नवा मार्ग तयार केला. याचा परिणाम त्यांच्या व्यवसायातील गुणवत्तेचा आणि कार्यपद्धतीचा विश्वास ग्राहकांमध्ये वाढला, ज्यामुळे त्यांना यश मिळण्यास सुरुवात झाली 

    यशाच्या शिखरावर 

    १९९० च्या दशकात VLCC चं नाव हळूहळू लोकप्रिय होऊ लागलं. २००० च्या दशकात, VLCC चा वार्षिक महसूल ५० कोटींवर पोहोचला. ग्राहक त्यांच्या उच्च दर्जाच्या सेवांसाठी अधिक पैसे देण्यास तयार होऊ लागले. २००५ मध्ये “जस्सी जैसी कोई नहीं” या मालिकेतील नायिका  जस्सीचं मेकओव्हर केल्यानंतर VLCC चं नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचलं आणि ब्रँड अधिक चर्चेत आला.

    २००५ पासून VLCC ने आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार सुरू केला. आज VLCC १२ देशांमध्ये कार्यरत आहे . २००९ मध्ये Shine या प्रसिद्ध  कंपनीने VLCC मध्ये १४.४ कोटींची गुंतवणूक केली, ज्यामुळे कंपनीचा महसूल १२५ कोटींवर पोहोचला. त्यानंतर VLCC ने २०१० मध्ये भारतात आणि भारताबाहेर  १०० सेंटर्स सुरू केले आणि महिलांना ब्युटी उद्योजक होण्यासाठी प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला.

    सप्टेंबर २०१३ मध्ये VLCC ने सिंगापूरमधील Gvig कंपनीचा ताबा घेतला आणि सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादन क्षेत्रात पाऊल ठेवलं . त्यानंतर त्यांच्या  हरिद्वार आणि सिंगापूर येथील GMP सर्टिफाइड प्लांट्समधून स्किन, केस आणि बॉडी केअर उत्पादने तयार होऊ लागली. 2023 पर्यंत, VLCC ने २१० सेंटर्स, १०० प्रशिक्षण संस्था आणि ११ देशांमध्ये विस्तार केला आहे . 

    पुरस्कार आणि सन्मान

     २०१० मध्ये वंदना यांना ‘एंटरप्राइझ एशिया वुमन आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं,, तसेच २०१३ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला. २०१६ मध्ये फोर्ब्स आशियाच्या “५० पॉवर बिझनेसवुमन” यादीत त्यांचं स्थान मिळवणं हे त्यांच्या यशाचं प्रतीक आहे.

    वंदना लुथरा यांनी महिलांच्या सशक्तीकरणावर विशेष लक्ष दिलं. आज VLCC मध्ये ७०% कर्मचारी महिला आहेत. त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन आणि आत्मनिर्भर बनवून, त्यांनी महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. या उपक्रमामुळे फक्त महिलांची आर्थिक स्थितीच  सुधारली नाही, तर कंपनीला देखील अधिक यश प्राप्त झालं.

    मित्रांनो ,वंदना लुथरा यांचा संघर्ष आणि यशाचा हा प्रवास आपल्यला शिकवतो  की, मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास असला की कोणतंही स्वप्न शक्य पूर्ण करता येतं . आणि सोबतच त्यांचा हा  प्रवास आपल्याला दाखवतो की, सुरुवात कितीही छोटी असली तरी प्रामाणिक प्रयत्नांनी मोठं यश नक्कीच मिळवता येतं.

    आणखीन वाचा:

  • Top indian startup success lessons : नवउद्योजकांनो, यशस्वी व्हा! या ५ गोष्टी शिकून घ्या भारतातील टॉप स्टार्टअप्सकडून

    Top indian startup success lessons : नवउद्योजकांनो, यशस्वी व्हा! या ५ गोष्टी शिकून घ्या भारतातील टॉप स्टार्टअप्सकडून

    आज अनेक जण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात. तंत्रज्ञानामुळे व्यवसाय सुरू करणं सोपं झालं असलं तरी त्याला यशस्वीपणे पुढे नेणं मोठं आव्हान असतं. दरवर्षी हजारो स्टार्टअप्स सुरू होतात, पण त्यापैकी फारच कमी दीर्घकाळ टिकतात. मात्र, काही स्टार्टअप्स वेगाने वाढतात आणि उद्योगक्षेत्राला नवी दिशा देतात. अशा यशस्वी व्यवसायांकडून अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकता येतात, ज्या नवउद्योजकांसाठी उपयोगी ठरू शकतात.

    जर व्यवसाय वाढवायचा असेल, तर या गोष्टींचा विचार करणं महत्त्वाचं आहे. या लेखात आपण अशाच यशस्वी स्टार्टअप्सकडून शिकता येणाऱ्या पाच महत्वाच्या गोष्टी आणि त्यांची उदाहरणं समजून घेऊया आणि ते व्यवसायासाठी कसे उपयोगी ठरू शकतात, हे पाहूया.

    १) खऱ्या समस्येवर उपाय शोधा – ग्राहकांच्या गरजा ओळखा

    कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे ग्राहकांच्या समस्येचा अभ्यास करणं. प्रत्येक व्यवसाय हा एखाद्या अडचणीवर उपाय शोधण्यासाठी असतो. जर तुम्ही लोकांच्या मोठ्या समस्येवर सोपा, सहज आणि प्रभावी उपाय दिला, तर तुमच्या व्यवसायाला हमखास यश मिळेल.

    उदाहरणार्थ, Meesho या कंपनीने भारतातील लहान व्यावसायिक आणि गृहउद्योग चालवणाऱ्या महिलांसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली. ऑनलाईन विक्रीसाठी त्यांच्याकडे महागडी वेबसाईट किंवा डिजिटल मार्केटिंगचं ज्ञान नव्हतं. Meesho ने एक सोपा प्लॅटफॉर्म तयार केला, जिथे कोणीही सहजपणे ऑनलाइन विक्रेता बनू शकतो. यामुळे लाखो लघु उद्योजकांना डिजिटल मार्केटमध्ये प्रवेश मिळाला आणि त्यांचा व्यवसाय वाढला.

    जर तुम्ही ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यावर प्रभावी उपाय शोधलात, तर तुमच्या व्यवसायाला निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल. बाजाराचा अभ्यास करा, लोकांना कोणत्या अडचणी येतात हे समजून घ्या आणि त्यावर सोपा, किफायतशीर आणि उपयुक्त उपाय द्या.

    २) छोटी सुरुवात करा, मग हळूहळू विस्तार करा

    अनेक नवउद्योजक सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करतात, पण यामुळे खर्च वाढतो आणि अपयशाची शक्यता अधिक राहते. त्याऐवजी, लहान सुरुवात करून, अनुभव घेत घेत व्यवसाय वाढवणं अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरतं.

    उदाहरणार्थ, Zerodha या भारतातील आघाडीच्या ब्रोकरेज कंपनीने सुरुवातीला काही मोजक्या ग्राहकांसोबत व्यवसाय सुरू केला. त्यांनी पारंपरिक ब्रोकरेज कंपन्यांच्या तुलनेत कमी शुल्कात सोपं आणि किफायतशीर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म दिलं. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यावर त्यांनी हळूहळू आपला व्यवसाय वाढवला. आज Zerodha ही भारतातील सर्वात मोठी ब्रोकरेज कंपनी बनली आहे.

    ३) मजबूत आणि सक्षम टीम तयार करा

    कोणताही मोठा व्यवसाय एकट्याने उभा करता येत नाही. व्यवसायाची वाढ आणि यश हे चांगल्या टीमवर आणि त्यांच्या कौशल्यांवर अवलंबून असतं. विश्वासू, मेहनती आणि कौशल्यपूर्ण लोक सोबत असतील, तर आव्हानं पार करणं आणि संधीच सोन्यात रूपांतर करणं सोपं जातं. 

    उदाहरणार्थ, CRED हा स्टार्टअप त्यांच्या मजबूत टीममुळे यशस्वी झाला. CRED हे क्रेडिट कार्ड धारकांसाठी एक इनोव्हेटिव्ह प्लॅटफॉर्म आहे, त्यांनी कमी वेळात मोठी लोकप्रियता मिळवली. संस्थापकांनी सुरुवातीपासूनच अनुभवी आणि हुशार लोकांची निवड केली, ज्यांनी उत्कृष्ट ॲप डिझाइन, प्रभावी मार्केटिंग आणि ग्राहकांसाठी उपयुक्त योजना तयार केल्या.

    सुरुवातीला थोड्या, पण हुशार लोकांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्यासोबत काम करा. तुमच्या उद्दिष्टांशी जुळणारी, नवे प्रयोग करण्यास तयार असलेली आणि आव्हानांना सामोरे जाणारी टीम निवडा. एक चांगली टीमच तुमच्या व्यवसायाला यशाच्या शिखरावर नेऊ शकते.

    ४) ग्राहकांचा अनुभव सर्वोत्तम ठेवा

    ग्राहक समाधानी असतील, तरच व्यवसाय टिकून राहतो. समाधानी ग्राहक पुन्हा तुमच्याकडे येतात आणि इतरांनाही तुमच्या सेवेची शिफारस करतात. त्यामुळे त्यांचा अनुभव सुखद आणि सोयीस्कर ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे.

    उदाहरणार्थ, Zomato ने ग्राहकांचा अनुभव सर्वोत्तम ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांनी सहज वापरता येणारं आणि वेगवान ॲप, जलद ऑर्डर प्रक्रिया आणि तात्काळ ग्राहकसेवा दिली. यामुळे त्यांचा विश्वास वाढला आणि Zomato एक लोकप्रिय ब्रँड बनला.

    ग्राहकांच्या गरजा समजून त्यांना सर्वोत्तम सेवा द्या. त्यांचे प्रश्न पटकन सोडवा आणि त्यांचा अनुभव चांगला राहील याची काळजी घ्या. यामुळे ग्राहक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुमचा व्यवसाय दीर्घकाळ टिकेल.

    ५) डेटा आणि ग्राहकांचा फीडबॅक वापरा

    बाजार सतत बदलत असतो, त्यामुळे व्यवसायात वेळेनुसार सुधारणा करणं गरजेचं आहे. ग्राहकांचा फीडबॅक आणि डेटा विचारात घेतल्यास तुमची सेवा अधिक चांगली होऊ शकते आणि व्यवसाय अधिक यशस्वी ठरतो.

    उदाहरणार्थ, Swiggy सुरुवातीला फक्त अन्न वितरण सेवा पुरवत होते. मात्र, ग्राहकांच्या मागण्या आणि त्यांच्या खरेदीच्या सवयींचा अभ्यास केल्यावर त्यांना समजले की लोक घरपोच किराणासामानही हवे आहे. त्यानंतर त्यांनी Swiggy Instamart सुरू केलं आणि आता किराणा व इतर वस्तूंच्या डिलिव्हरीमध्येही ते यशस्वी झाले आहेत.

    ग्राहकांचा फीडबॅक आणि बाजारातील डेटा सतत तपासा. गरजेनुसार सेवा सुधारत राहिल्यास तुम्ही स्पर्धेत टिकू शकाल आणि तुमचा व्यवसाय वाढेल.

    मित्रांनो,यशस्वी स्टार्टअप्सकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. व्यवसाय सुरू करताना किंवा वाढवत असताना खरी समस्या ओळखणं, छोट्या प्रमाणावर सुरुवात करून हळूहळू विस्तार करणं, सक्षम टीम तयार करणं, ग्राहकांचा अनुभव उत्तम ठेवणं आणि डेटा व फीडबॅकच्या आधारे सुधारणा करणं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.

    जर तुम्हीही या गोष्टींचा योग्य प्रकारे अवलंब केला, तर तुमचाही व्यवसाय मोठ्या प्रमाणात यश मिळवू शकतो. योग्य नियोजन, मेहनत आणि विचारपूर्वक घेतलेले निर्णय हेच यशस्वी उद्योजकतेचं खरं रहस्य आहे!

    जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आताच Whatsapp वर शेअर करा. 😊

    आणखी वाचा

  • Qimat Rai Gupta: फक्त १०००० रुपयांपासून व्यवसाय सुरू केला, ९७००० कोटी रुपयांचा ब्रँड बनवला…

    Qimat Rai Gupta: फक्त १०००० रुपयांपासून व्यवसाय सुरू केला, ९७००० कोटी रुपयांचा ब्रँड बनवला… 

    यश मिळवण्यासाठी मोठं शिक्षण, मोठं भांडवल किंवा मोठ्या ओळखीचं नेटवर्क लागतं, असं अनेकजण मानतात. पण काही लोक आपल्या मेहनतीच्या जोरावर हे चुकीचं ठरवतात. त्यापैकीच एक नाव म्हणजे ‘हॅवेल्स’ या जगभर प्रसिद्ध असलेल्या इलेक्ट्रिकल ब्रँडचे शिल्पकार किमत राय गुप्ता. 

    केवळ १०,००० रुपयांपासून सुरू केलेला हा व्यवसाय मेहनत, दूरदृष्टी आणि योग्य निर्णयांच्या जोरावर एका मोठ्या ब्रँडमध्ये रूपांतरित झाला. उत्कृष्ट उत्पादने, ग्राहकांचे समाधान आणि सुयोग्य व्यवस्थापन यामुळे हॅवेल्सने विश्वासार्हता मिळवली आणि आज तो जगभर लोकप्रिय ब्रँड म्हणून ओळखला जातो. मात्र, हे यश सहज मिळालं नाही. त्यामागे संघर्ष, कठोर मेहनत आणि ध्येयासाठी दिलेली अनेक वर्षे आहेत. या लेखात आपण त्यांचा हा शून्यातून शिखरापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत.

    बालपण आणि सुरुवातीचा प्रवास 

    किमत राय गुप्ता यांचा जन्म १९३७ साली तत्कालीन अविभाजित पंजाबमधील एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. लहानपणापासूनच भारतीय तत्त्वज्ञान, विशेषतः भगवद्गीतेच्या शिकवणींचा त्यांच्या विचारांवर खोल प्रभाव पडला. शिक्षण घेत असतानाच त्यांना जाणवलं की, परिस्थिती बदलायची असेल, तर स्वतःच स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागेल. घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी मोठं करण्याची जिद्द त्यांच्या मनात होती. त्यांनी निर्धार केला की केवळ शिक्षणावर अवलंबून न राहता, स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन करायचं.

    १९५८ साली, वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून दिल्ली गाठली. त्यांच्याकडे १०,००० रुपये होते आणि मनात असंख्य स्वप्नं आणि पुढे जाण्याची अपार जिद्द होती. दिल्लीत पोहोचल्यावर त्यांनी भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिकल मार्केट, भागीरथ पॅलेसमध्ये गुप्ताजी अँड कंपनी नावाने एक छोटंसं दुकान सुरू केलं. सुरुवातीला व्यवसाय छोटा होता, पण मेहनत, जिद्द आणि योग्य दृष्टिकोन यांच्या जोरावर त्यांनी हळूहळू बाजारात आपली ओळख निर्माण केली.

    व्यवसाय उभारणीची खडतर वाटचाल

    सुरुवातीला किमत राय गुप्तांनी छोटे-छोटे इलेक्ट्रिकल पार्ट्स विकण्यास सुरुवात केली. ते स्वतः दुकानात बसून ग्राहकांशी संवाद साधायचे, त्यांची गरज समजून घ्यायचे आणि अनेकदा त्यांच्यासाठी वस्तू दुरुस्तही करायचे. त्यांच्या मेहनतीमुळे ग्राहकांचा विश्वास वाढू लागला. त्यांनी केवळ व्यापार केला नाही, तर नातेसंबंध जपले आणि विश्वासार्हता निर्माण केली. सातत्यपूर्ण मेहनतीमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला, आणि त्यांचा व्यवसायही विस्तारू लागला.

    १९७१ हे वर्ष किमत राय गुप्ता यांच्या आयुष्याला एक महत्त्वपूर्ण वळण देणारं ठरलं. दिल्लीतील व्यापारी हवेली राम गांधी आर्थिक अडचणीत सापडले होते आणि त्यांना आपली ‘हॅवेल्स’ (Havells) कंपनी विकावी लागणार होती. ही संधी ओळखून किमत राय गुप्तांनी मोठ्या जिद्दीने ७ लाख रुपये उभे करून ‘हॅवेल्स’ विकत घेतली. मात्र, कंपनीची स्थिती अत्यंत खराब होती. उत्पादन, व्यवस्थापन आणि बाजारातील ओळख या सर्वच बाबतीत मोठ्या अडचणी होत्या. पण किमत राय गुप्ता हार मानणारे नव्हते. त्यांनी अपार मेहनत, योग्य नियोजन आणि चिकाटीच्या जोरावर ‘हॅवेल्स’ला पुन्हा उभं करण्याचा निर्धार केला.

    हॅवेल्सचं नव्या दमाचं नवं रूप! 

    किमत राय गुप्तांनी ‘हॅवेल्स’ विकत घेतल्यानंतर तिच्या प्रत्येक गोष्टीत सुधारणा करण्यासाठी अपार मेहनत घेतली. त्यांनी केवळ स्विचेसपुरते उत्पादन मर्यादित न ठेवता विविध उत्पादनांची भर घातली. केबल्स, फॅन्स, लाईटिंग, गिझर, किचन अप्लायन्सेस यांसारख्या अनेक इलेक्ट्रिकल वस्तूंचा समावेश करून कंपनीला नव्या उंचीवर नेलं.

    ते केवळ व्यवसाय वाढवत नव्हते, तर एक विश्वासार्ह ब्रँड तयार करत होते, जिथे गुणवत्ता, ग्राहक सेवा आणि इनोव्हेशन यांचा उत्तम समतोल होता. त्यांनी भारतभर उत्पादन केंद्रं स्थापन केली आणि प्रत्येक ठिकाणी जागतिक दर्जाचं उत्पादन हेच उद्दिष्ट ठेवलं. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे हॅवेल्सने इलेक्ट्रिकल क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. 

    हॅवेल्स भारतातील मार्केट लीडर बनली, पण हे फक्त उत्पादनामुळे झालं नाही. किमत राय गुप्तांनी ब्रँड बिल्डिंग आणि मार्केटिंगलाही तितकंच महत्त्व दिलं. प्रभावी जाहिराती, इनोव्हेटिव्ह कॅम्पेन्स आणि ग्राहकांशी थेट संवाद यामुळे हॅवेल्सची ओळख संपूर्ण देशभर पोहोचली. त्यांच्या योजनाबद्ध धोरणांमुळे हॅवेल्स केवळ एक उत्पादन करणारी कंपनी न राहता घराघरात विश्वासाने वापरण्यात येणारा ब्रँड बनली.

    आजचं हॅवेल्स (Havells)

    आज हॅवेल्स केवळ एक इलेक्ट्रिकल कंपनी नसून भारताच्या औद्यगिक विकासाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. ५०,००० हून अधिक डीलर नेटवर्क, १३ अत्याधुनिक उत्पादन केंद्रं आणि ७० पेक्षा जास्त देशांमध्ये आपली उपस्थिती ठेवत हॅवेल्सने जागतिक स्तरावरही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ग्राहकांचा विश्वास आणि सतत नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब या जोरावर हा ब्रँड प्रत्येक घरात पोहोचला आहे.

    किमत राय गुप्तांनी आपल्या व्यवसायात कुटुंबालाही सहभागी करून घेतलं. १९९२ साली त्यांचा मुलगा अनिल राय गुप्ता कंपनीत सामील झाला. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसायाचे बारकावे शिकत त्याने हॅवेल्ससाठी नव्या युगाची वाट तयार केली. २००७ साली, अनिल राय गुप्तांनी जर्मनीतील प्रसिद्ध ‘सिल्व्हेनिया’ लाइटिंग कंपनीचं अधिग्रहण केलं. हा हॅवेल्सच्या आंतरराष्ट्रीय विस्तारातील सर्वात मोठा टप्पा ठरला. २००८ च्या जागतिक आर्थिक मंदीच्या काळातही त्यांनी हॅवेल्सला स्थिर ठेवत व्यवसाय अधिक मजबूत केला.

    २०१४ साली, वयाच्या ७७व्या वर्षी किमत राय गुप्तांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मात्र, त्यांनी मागे केवळ एक यशस्वी व्यवसाय नाही , तर एक मजबूत मूल्यव्यवस्था आणि लाखो लोकांसाठी प्रेरणादायी वारसा ठेवला. त्यांच्या मृत्युसमयी त्यांची संपत्ती २ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होती. 

    मित्रांनो, हॅवेल्स ही केवळ एक ब्रँडची गोष्ट नाही, तर ती एका सामान्य माणसाच्या स्वप्नाची, त्याच्या परिश्रमांची आणि अपार चिकाटीची कहाणी आहे. किमत राय गुप्ता यांनी एका छोट्याशा दुकानातून सुरू केलेला प्रवास, आज कोट्यवधी ग्राहकांच्या विश्वासाचा आधार बनला आहे. 

    आणखीन वाचा:

  • ॲपलची नोकरी सोडली, लोकांनी वेड्यात काढलं… आज उभा केलाय ९१०० कोटींचा व्यवसाय!

    ॲपलची नोकरी सोडली, लोकांनी वेड्यात काढलं… आज उभा केलाय ९१०० कोटींचा व्यवसाय!

    आजच्या काळात अनेक तरुण मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेत आहेत आणि त्यात मोठे यश मिळवत आहेत. नोकरीची सुरक्षितता सोडून व्यवसायात उतरणं म्हणजे मोठा धोका पत्करणं, पण ज्या लोकांकडे नवीन कल्पना आणि प्रबळ इच्छाशक्ती असते, ते या प्रवासात यशस्वी ठरतात. अशाच एका जिद्दी तरुणाची गोष्ट म्हणजे ‘अपना’ ॲप या कंपनीचे संस्थापक निर्मित पारेख यांची.

    व्यवसाय सुरू करणं सोपं नव्हतं, त्यात अनेक अडथळे होते. पण त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि “अपना” ही कंपनी सुरू केली. आज या कंपनीचं बाजारमूल्य ९१०० कोटी रुपयांपर्यंत वाढलं आहे. निर्मित पारेख यांचा हा प्रवास केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर हजारो तरुणांसाठीही प्रेरणादायी आहे. आजच्या लेखात आपण त्यांच्या या प्रवासाविषयी सविस्तर जाणून घेऊया.

    बालपणापासून तंत्रज्ञानाची आवड

    निर्मित पारेख यांचा जन्म मुंबईतील एका सर्वसाधारण व्यावसायिक कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना तंत्रज्ञानाची विशेष आवड होती. वयाच्या केवळ व्या वर्षीच त्यांनी एक डिजिटल घड्याळ तयार केले, तर १३ व्या वर्षी रोबोटिक्स प्रोग्रामिंग शिकण्यास सुरुवात केली. बालपणातच त्यांनी विविध तांत्रिक प्रयोग केले आणि तंत्रज्ञानाच्या गूढ विश्वात स्वतःला झोकून दिले. नवनवीन शोध लावण्याची त्यांची वृत्ती आणि तंत्रज्ञान समजून घेण्याची उत्सुकता यामुळे ते सतत काहीतरी नवीन शिकत राहिले.

    पुढे शिक्षणासाठी त्यांनी गुजरातमधील प्रसिद्ध निरमा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्रवेश घेतला आणि बी. टेक. पूर्ण केले. या काळात त्यांनी विविध प्रोजेक्ट्सवर काम केले आणि तंत्रज्ञानाचा अधिक मन लावून अभ्यास केला. शिक्षण संपल्यानंतर त्यांनी आपल्या करिअरची स्पष्ट दिशा ठरवली आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याचा निर्धार केला. 

    पहिले स्टार्टअप आणि व्यावसायिक सुरुवात

    निर्मित पारेख यांनी कॉलेजमध्ये असतानाच ‘इंकॉन टेक्नॉलॉजीज’ नावाचे स्टार्टअप सुरू केले, जे पूर व्यवस्थापनासाठी उपाययोजना विकसित करत होते. लहान वयातच मोठ्या समस्यांवर उपाय शोधण्याची त्यांची प्रवृत्ती होती. बी. टेक पूर्ण केल्यानंतर त्यांनी’“क्रक्सबॉक्स’ नावाची दुसरी कंपनी सुरू केली, जी डेटा अ‍ॅनालिटिक्स क्षेत्रात काम करत होती.

    त्यांची मेहनत, कल्पकता आणि तांत्रिक कौशल्य पाहून ‘इंटेल’ या आंतरराष्ट्रीय कंपनीने क्रक्सबॉक्स विकत घेतले आणि त्यांना नोकरीची संधी दिली. इंटेलमध्ये त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आणि डेटा अ‍ॅनालिटिक्स विभागाचे संचालकपद मिळवले. तिथे त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत कंपनीच्या वाढीमध्ये मोठा वाटा उचलला.

    उच्च शिक्षण आणि ॲपलमधील नोकरी

    निर्मित पारेख यांनी पुढे प्रसिद्ध स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले. या शिक्षणामुळे त्यांना जागतिक बाजारपेठ, व्यवसायातील नवे ट्रेंड्स आणि इनोव्हेशन यांचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळाली. एमबीएनंतर त्यांनी ॲपल  कंपनीत प्रवेश केला ,तिथे त्यांनी ‘आयफोन प्रॉडक्ट अँड स्ट्रॅटेजी टीम’ मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. 

    मुंबईतील एका साध्या कुटुंबात जन्मलेले निर्मित ॲपल सारख्या मोठ्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते. मोठ्या पगाराची नोकरी असूनही त्यांना समाधान नव्हते, कारण त्यांची खरी ओढ स्वतःचा व्यवसाय उभा करण्याकडे होती. 

    ‘अपना’ अ‍ॅपची संकल्पना आणि संघर्ष

    अ‍ॅपलमध्ये काम करत असताना, निर्मित पारेख यांनी असंगठित क्षेत्रातील मोठी अडचण ओळखली. ब्लू-कॉलर नोकऱ्यांसाठी कोणतेही प्रभावी व्यासपीठ नव्हते. त्यामुळे कामगार (employee) आणि नियोक्ते (employer) यांच्यात मोठी दरी निर्माण झाली होती. ही समस्या सोडवण्याचा निर्धार करत त्यांनी २०१९ मध्ये ‘अपना’ अ‍ॅप सुरू करण्यासाठी अ‍ॅपलसारखी मोठी नोकरी सोडली. त्यांच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली, काहींनी त्यांना वेड्यात काढले, पण त्यांनी कोणाच्याही मतांची पर्वा न करता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले.

    व्यवसाय सुरू करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मोठ्या कंपनीतील सुरक्षित नोकरी सोडून स्वतःचा मार्ग निर्माण करणे सोपे नव्हते. समाजातील अनेकांनी त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, पण त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ‘अपना’ ला यश मिळवून दिले. 

    यशाच्या शिखरावर 

    कोरोना काळात ‘अपना’ ॲपने मोठी झेप घेतली. अवघ्या २२ महिन्यांत ते १.१ अब्ज डॉलर (९१०० कोटी रुपये) बाजारमूल्य असलेलं युनिकॉर्न स्टार्टअप बनलं! आज अनअकॅडमी, बिगबास्केट, व्हाईटहॅट ज्युनिअर, फ्लिपकार्ट यांसारख्या १.५ लाखांहून अधिक कंपन्या यावर नोंदणीकृत आहेत. लाखो कामगारांना या प्लॅटफॉर्ममुळे रोजगाराच्या संधी मिळाल्या.

    निर्मित पारेख यांची कहाणी चिकाटी, मेहनत आणि दृढ निश्चयाचा एक उत्तम आदर्श आहे. त्यांच्या जिद्दीमुळे आज ‘अपना’ लाखो लोकांचे करिअर घडवत आहे. जर तुमच्याकडे कल्पना, जिद्द आणि मेहनतीची तयारी असेल, तर तुम्हीही मोठं यश मिळवू शकता! 🚀

    आणखीन वाचा:

  • उद्योगविश्वात नवे मापदंड प्रस्थापित करणाऱ्या यशस्वी भारतीय महिला उद्योजिका.

    उद्योगविश्वात नवे मापदंड प्रस्थापित करणाऱ्या यशस्वी भारतीय महिला उद्योजिका.

    आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे आणि उद्योगविश्वही त्याला अपवाद नाही. पूर्वी व्यवसाय किंवा उद्योजकता हे फक्त पुरुषप्रधान क्षेत्र म्हणून पाहिलं जात होतं, मात्र ही संकल्पना आता बदलली आहे. महिलांनी आपल्या मेहनत, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उद्योगजगतात भक्कम पाय रोवले आहेत. त्यांच्या वाढत्या सहभागामुळे देशात नवनव्या संधी निर्माण होत असून, त्यांचं नेतृत्व रोजगार आणि अर्थव्यवस्था वाढवण्यात मोलाचा वाटा उचलत आहे. तसेच, नव्या पिढीतील उद्योजिकांसाठी त्या प्रेरणादायी ठरत आहेत.

    सध्या भारतात सुमारे १४% व्यवसाय महिलांच्या मालकीचे किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली चालवले जात आहेत, आणि हा आकडा झपाट्याने वाढत आहे. कल्पकता, दूरदृष्टी आणि चिकाटीच्या जोरावर अनेक महिला उद्योजिकांनी यशाच्या नव्या वाटा शोधल्या आहेत. केवळ स्वतःपुरते मर्यादित न राहता, त्या इतरांसाठीही रोजगार आणि संधी निर्माण करत आहेत. त्यामुळे महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसाय देशाच्या आर्थिक वाढीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.

    नुकताच जागतिक महिला दिन झाला. त्या निमित्ताने, आज आम्ही तुम्हाला अशाच यशस्वी भारतीय महिला उद्योजिकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या धैर्य, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उद्योगविश्वात नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत.

    सबीना चोप्रा – यात्रा.कॉमच्या सह-संस्थापक

    सबीना चोपड़ा या ‘यात्रा.कॉम’ च्या सह-संस्थापक असून, त्यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. २००६ मध्ये त्यांनी यात्रा.कॉमची स्थापना केली. ट्रॅव्हल आणि बीपीओ क्षेत्रात २५ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या सबीना यांनी आरसीआय इंडिया मध्येही महत्त्वाची भूमिका बजावली. यात्रा.कॉममध्ये कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य ऑपरेटिंग अधिकारी (COO) म्हणून काम करताना त्यांनी कंपनीच्या वाढीत विशेष भूमिका बजावली.

    व्यवसायासोबतच त्या समाजसेवेतही सक्रिय आहेत आणि मुलींच्या शिक्षण व सशक्तीकरणासाठी एनजीओच्या माध्यमातून मदत करतात. त्यांचं ट्रॅव्हल इंडस्ट्रीतील मजबूत नेटवर्क आणि व्यावसायिक कौशल्यामुळे यात्रा.कॉमला मोठं यश मिळालं. भारतीय पर्यटन क्षेत्राला नवीन दिशा देणाऱ्या प्रेरणादायी उद्योजिका म्हणून त्यांची ओळख आहे.

    विनीता सिंग – ‘शुगर कॉस्मेटिक्स’ च्या सह-संस्थापक 

    विनीता सिंग या ‘शुगर कॉस्मेटिक्स’ च्या सह-संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांनी IIT मद्रास आणि IIM अहमदाबादमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. २०१५ मध्ये त्यांनी पती कौशिक मुखर्जी यांच्यासोबत ‘शुगर कॉस्मेटिक्स’ची स्थापना केली. हा ब्रँड विशेषतः तरुण महिलांमध्ये लोकप्रिय असून, भारताच्या सौंदर्यप्रसाधन क्षेत्रात त्याने नवी क्रांती घडवली आहे.

    विनीता सिंग या भारताच्या आघाडीच्या महिला उद्योजकांपैकी एक मानल्या जातात. त्यांचा ब्रँड ‘शुगर कॉस्मेटिक्स’ दर्जेदार आणि ट्रेंडी उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. त्या ‘शार्क टँक इंडिया’ या बिझनेस रियालिटी शोमध्येही शार्क म्हणून सहभागी झाल्या असून, नवउद्योजकांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या कष्ट, मेहनत आणि दूरदृष्टीमुळे त्या आजच्या तरुणींना प्रेरणा देणाऱ्या उद्योजिका ठरल्या आहेत.

    फाल्गुनी नायर – ‘नायका’च्या संस्थापिका 

    फाल्गुनी नायर या ‘नायका’ (Nykaa) या ब्युटी अँड लाईफस्टाईल उत्पादने विकणाऱ्या मोठ्या ऑनलाइन कंपनीच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांनी IIM अहमदाबादमधून शिक्षण घेतलं आणि नंतर कोटक महिंद्रा कॅपिटलमध्ये १८ वर्षे मोठ्या पदावर काम केलं. २०१२ मध्ये त्यांनी आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी नोकरी सोडली आणि ‘नायका’ ची स्थापना केली. आज नायका हा भारताचा सर्वात प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन ब्रँड आहे.

    फाल्गुनी नायर या स्वतःच्या मेहनतीवर अब्जाधीश झालेल्या भारतातील मोजक्या महिलांपैकी एक आहेत. त्यांना २६ वर्षांचा व्यवसायाचा अनुभव आहे. नायका आज केवळ ऑनलाइनच नाही, तर भारतभर अनेक दुकानांतूनही उपलब्ध आहे. त्यांनी महिलांसाठी उच्च दर्जाची सौंदर्य उत्पादने सहज उपलब्ध करून दिली, त्यामुळे नायका हा लोकांचा आवडता ब्रँड बनला आहे.   

    राधिका घई अग्रवाल – शॉपक्लूझच्या सह-संस्थापक

    राधिका घई अग्रवाल या ‘शॉपक्लूझ’ (ShopClues) या लोकप्रिय ई-कॉमर्स कंपनीच्या सह-संस्थापक आहेत. २०११ मध्ये सिलिकॉन व्हॅलीत त्यांनी ही कंपनी सुरू केली आणि काही वर्षांतच शॉपक्लूझ युनिकॉर्न क्लबमध्ये पोहोचले. 

    त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठातून व्यवस्थापन शिक्षण घेतलं, तसेच स्टॅनफोर्ड विद्यापीठात वेब २.० आणि क्रिएटिव्ह रायटिंगचा अभ्यास केला. त्यांच्या दूरदृष्टी आणि कष्टामुळे शॉपक्लूझ भारतातील मोठ्या ऑनलाइन बाजारपेठांपैकी एक बनले. राधिका भारताच्या पहिल्या महिला उद्योजिकांपैकी एक आहेत, ज्यांची कंपनी युनिकॉर्न बनली आहे.

    नमिता थापर – एमक्योर फार्मास्युटिकल्स

    नमिता थापर या एमक्योर फार्मास्युटिकल्स (Emcure Pharmaceuticals) या प्रसिद्ध औषध कंपनीच्या कार्यकारी संचालक आहेत. त्या ‘शार्क टँक इंडिया’ या व्यवसायविषयक कार्यक्रमात ‘शार्क’ म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी फुकुआ स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केलं असून, त्या चार्टर्ड अकाउंटंट देखील आहेत. २००७ मध्ये सीएफओ म्हणून एमक्योरमध्ये प्रवेश केल्यानंतर, त्यांनी कंपनीच्या भारतीय व्यवसाय विभागाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

    त्या इनक्रेडिबल व्हेंचर्स लिमिटेड आणि थापर उद्योजक अकादमीच्या संस्थापक आहेत आणि त्यांनी १०० हून अधिक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांना द इकॉनॉमिक टाइम्स ‘40 अंडर 40’, वर्ल्ड वुमन लीडरशिप काँग्रेस सुपर अचिव्हर अवॉर्ड यांसारखे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. 

    श्रद्धा शर्मा – युवरस्टोरीच्या संस्थापक 

    श्रद्धा शर्मा या ‘युअरस्टोरी’ मीडियाच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. २००८ मध्ये सुरू केलेलं हे व्यासपीठ नव्या स्टार्टअप्स आणि उद्योजकांसाठी एक महत्त्वाचं माध्यम आहे. या माध्यमातून ७०,००० हून अधिक उद्योजकांच्या यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. गेल्या १६ वर्षांपासून स्टार्टअप्स आणि उद्योजकांना मार्गदर्शन करून त्यांना पुढे जाण्यासाठी मदत केली आहे.

    २०२३ मध्ये भारताने G20 अध्यक्षपद स्वीकारल्यावर, ५२० उपक्रमांच्या सह-अध्यक्ष म्हणून त्यांनी नेतृत्व केलं. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे फॉर्च्यून मासिकाच्या ‘40 अंडर 40’ प्रभावी व्यक्तींच्या यादीत तीन वेळा त्यांचं नाव झळकलं. तसेच, त्यांना  २०१८ मध्ये फोर्ब्स पॉवर ट्रेलब्लेझर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भारतीय स्टार्टअप्सच्या वाढीसाठी त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं ठरलं आहे.

    उपासना टाकू – मोबिक्विकच्या सह-संस्थापक

    उपासना टाकू या ‘मोबिक्विक’ या डिजिटल पेमेंट कंपनीच्या सह-संस्थापक आहेत. २००९ मध्ये त्यांनी मोबिक्विकची स्थापना केली. भारतात डिजिटल पेमेंट क्रांतीत त्यांचं मोठं योगदान आहे. मोबिक्विकने ई-वॉलेटच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार सोपे आणि सुलभ केले आहेत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे मोबिक्विक भारतातील प्रमुख फिनटेक युनिकॉर्न कंपन्यांपैकी एक बनली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये, कंपनीने IPO आणत सार्वजनिक लिस्टिंग केली, ज्यामुळे ती आणखी मजबूत झाली. 

    वंदना लुथरा – VLCC हेल्थकेअरच्या संस्थापिका

    वंदना लुथरा या सौंदर्य आणि आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजिका आहेत. १९८९ मध्ये त्यांनी ‘VLCC हेल्थकेअर’ची स्थापना केली, जी आज आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखली जाते आणि त्यांची ही कंपनी  १३ हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. VLCC केवळ सौंदर्य उत्पादनांसाठीच नव्हे, तर आरोग्य सेवांसाठीही प्रसिद्ध आहे.

    वंदना लुथरा या  प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेशी जोडलेल्या आहेत. त्या सौंदर्य आणि निरोगीपणा सेक्टर स्किल कौन्सिलच्या (B&WSSC) अध्यक्ष आहेत. २०१४ मध्ये भारत सरकारच्या पाठिंब्याने त्यांची पहिली अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी सौंदर्य आणि आरोग्य उद्योगात कौशल्य प्रशिक्षणाला चालना दिली असून, त्यांचं योगदान या क्षेत्रात खूप महत्त्वाचं आणि अतुलनीय आहे.

    मित्रांनो, वरील सर्व महिला उद्योजिकांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने उद्योग क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं आहे. संधी शोधून त्यांचा योग्य उपयोग करत त्यांनी अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांचा आत्मविश्वास आणि दूरदृष्टी आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देत आहे.

  • स्मार्ट बचतीसाठी 6 महत्त्वाचे नियम

    स्मार्ट बचतीसाठी 6 महत्त्वाचे नियम

    स्मार्ट बचत म्हणजे फक्त पैसे बाजूला ठेवणं नव्हे, तर त्याचा विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध वापर करणं. बचतीच्या चांगल्या सवयी लावून घेतल्या, तर भविष्यातील आर्थिक संकटांपासून बचाव करता येतो. यासाठी काही सोपे आणि परिणामकारक नियम आहेत. या लेखात आपण असेच सहा महत्त्वाचे नियम जाणून घेऊ, जे तुम्हाला आर्थिक स्थिरता आणि सुरक्षित भविष्य घडवण्यासाठी मदत करतील.

    १. ५०/३०/२० बजेट नियम

    ५०/३०/२० बजेट नियम म्हणजे मिळणाऱ्या पैशांचं योग्य नियोजन करण्याचा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. या नियमानुसार, तुमच्या उत्पन्नाचा ५०% भाग गरजेच्या गोष्टींसाठी वापरावा. यामध्ये घरभाडं, वीजबिल, किराणा सामान आणि दैनंदिन आवश्यक खर्च येतात. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या गरजा व्यवस्थित पूर्ण होतील आणि आर्थिक तणाव टाळता येईल.

    यानंतर, ३०% पैसा तुमच्या आवडीनुसार खर्च करण्यासाठी ठेवा. जसं की हॉटेलिंग, शॉपिंग किंवा मनोरंजन. उरलेला २०% भाग बचतीसाठी ठेवल्यास तुमचं भविष्य सुरक्षित होईल. यामध्ये आपत्कालीन फंड, कर्जफेड आणि गुंतवणुकीचा समावेश असतो. हा नियम पाळल्यास खर्च आणि बचतीचं योग्य संतुलन राखता येईल आणि आर्थिक स्थिरता मिळवणं सोपं होईल.

    २. 1% नियम – मोठी खरेदी करण्यापूर्वी विचार करा!

    कधी कधी महागडी खरेदी करताना घाई करू नये, कारण अशा खरेदीचा विचार न करता घेतलेला निर्णय नंतर पश्चातापाचे कारण ठरू शकतो. 1% नियम यासाठी मदत करतो. या नियमानुसार, जर एखाद्या वस्तूची किंमत तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 1% पेक्षा जास्त असेल, तर ती त्वरित खरेदी न करता किमान 3 दिवस वाट पाहा.

    हे 3 दिवस तुम्हाला शांतपणे विचार करण्यासाठी वेळ देतील. जर तीन दिवसांनीही ती वस्तू गरजेची वाटत असेल, तरच ती घ्या. यामुळे अनावश्यक खर्च टाळता येईल आणि पैसे फक्त आवश्यक गोष्टींसाठीच वापरता येतील. हा नियम पैसे वाचवण्यासाठी आणि आर्थिक शिस्त ठेवण्यासाठी खूप उपयोगी आहे.

    ३. ७२ चा नियम – पैशांची वाढ समजून घ्या!

    तुमची गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील, हे समजण्यासाठी ७२ चा नियम खूप उपयुक्त आहे. यासाठी फक्त ७२ ला तुमच्या गुंतवणुकीवरील वार्षिक व्याजदराने भाग द्या. उदाहरणार्थ, जर तुम्हाला ८ टक्के व्याज मिळत असेल, तर तुमचे पैसे ९ वर्षांत दुप्पट होतील (७२ ÷ ८ = ९).

    हा नियम गुंतवणुकीतील चक्रवाढ व्याजाचे महत्त्व समजायला मदत करतो. योग्य ठिकाणी आणि योग्य व्याजदराने दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास पैसे वेगाने वाढू शकतात. त्यामुळे, भविष्यात चांगला नफा मिळवण्यासाठी आणि स्मार्ट गुंतवणुकीसाठी हा नियम लक्षात ठेवा. 

    ४. ३ पट आपत्कालीन फंड नियम 

    आयुष्यात कधीही अनपेक्षित खर्च येऊ शकतात. अशा वेळी अडचणीत येऊ नये म्हणून किमान ३ ते ६ महिन्यांचे उत्पन्न बाजूला ठेवणं गरजेचं आहे. हा फंड नोकरी जाणं, मोठा आजार उद्भवणं किंवा तातडीच्या स्थितीच्या परिस्थितीत उपयोगी पडतो.

    जर तुमच्याकडे हा फंड असेल, तर अचानक आलेल्या खर्चामुळे तुमचे दैनंदिन जीवन अडथळ्याशिवाय सुरू राहू शकते. म्हणूनच, दरमहा थोडेसे पैसे वाचवून हा फंड तयार करा, जेणेकरून भविष्यात कोणत्याही आर्थिक संकटाला निर्धास्तपणे तोंड देता येईल.

    ५. स्वयंचलित बचत नियम

    बचत करायची आहे, पण प्रत्येक वेळी लक्षात राहत नाही? यावर स्वयंचलित बचत हा उत्तम उपाय आहे. बँकेत ऑटोमॅटिक ट्रान्सफर सेट करा, म्हणजे ठराविक रक्कम दर महिन्याला तुमच्या बचत खात्यात जमा होईल. यामुळे तुम्हाला वेगळे प्रयत्न न करता बचत करता येईल.

    “पैसे खर्च करण्याआधी बचत करा हा नियम पाळल्यास तुम्ही हळूहळू चांगली आर्थिक सवय लावू शकता. यामुळे तुमच्या भविष्यासाठी पैसे साठतील आणि आर्थिक स्थिरता मिळवणं सोपं होईल.

    ६. ‘नवीन वस्तू, जुनी बाहेर’ नियम

    जेव्हा तुम्ही काही नवीन वस्तू खरेदी करता, तेव्हा काहीतरी जुने दान करा, विकून टाका किंवा त्याचा  पूर्ण वापर करा. यामुळे घरात नको असलेल्या वस्तूंचा ढीग जमा होत नाही आणि तुम्ही फक्त आवश्यक गोष्टींवरच खर्च करता.

    हा नियम पाळल्याने घर स्वच्छ आणि व्यवस्थित राहील. अनावश्यक वस्तू काढून टाकल्याने अधिक जागा मिळते आणि खर्चही कमी होतो. त्यामुळे गरजेच्या गोष्टींवरच लक्ष केंद्रित करता येतं. 

    या सहा नियमांचे पालन करून तुम्ही आर्थिक स्थिरता मिळवू शकता. बजेट तयार करणं, शिस्तबद्ध बचत, योग्य गुंतवणूक आणि खर्चावर नियंत्रण ठेवणं या सवयी आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने महत्त्वाच्या ठरतात. विचारपूर्वक निर्णय घेऊन आणि योग्य नियोजनाच्या मदतीने तुम्ही भविष्यासाठी सुरक्षित पायाभूत व्यवस्था उभारू शकता.

    आणखी वाचा:

  • Pulse Candy: कोणतीही जाहिरात न करता ३५० कोटींचा टप्पा गाठलेला यशस्वी ब्रँड!

    Pulse Candy: कोणतीही जाहिरात न करता ३५० कोटींचा टप्पा गाठलेला यशस्वी ब्रँड!

    आजच्या काळात कोणताही नवीन ब्रँड मोठा करण्यासाठी जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च होतात. मोठमोठे सेलिब्रिटी, आकर्षक टीव्ही ऍड्स आणि सोशल मीडियावर महागड्या मार्केटिंग मोहिमांचा वापर केला जातो. मात्र, Pulse कँडीने हे सर्व नियम मोडून एक नवा इतिहास रचला. कोणतीही जाहिरात न करता, केवळ आपल्या अनोख्या चवीच्या जोरावर या ब्रँडने ३५० कोटींचा टप्पा ओलांडला.

    ही कँडी २०१५ मध्ये बाजारात आली आणि काही महिन्यांतच ती सर्वाधिक विक्री होणाऱ्या कँडींपैकी एक बनली. तिच्या यशामागे प्रचंड मेहनत, एक अनोखी रणनीती होती, ज्यामुळे या साध्या वाटणाऱ्या कँडीला FMCG (Fast-moving consumer goods) क्षेत्रात सर्वात मोठा ब्रँड बनवलं. चला तर मग, या लेखात आपण Pulse च्या या अद्भुत यशामागची कारणे जाणून घेऊया!

    बाजारातील संधी ओळखून नवा प्रयोग

    २०१५ मध्ये भारताच्या ₹ ८,००० कोटींच्या कँडी मार्केटमध्ये प्रामुख्याने गोडसर कँडीजचा दबदबा होता. मात्र, भारतीय चविष्ट खाद्यसंस्कृती पाहता, आंबट-तिखट चव असलेल्या कँडीची मागणी असू शकते, हे DS ग्रुपने (Rajnigandha आणि Pass Pass फेम) अचूक ओळखलं. लोकांना लहानपणीची आठवण करून देणारी, कैरीवर मीठ-मिरची लावून खाल्ल्याचा स्वाद देणारी कँडी बाजारात नव्हती. याच संधीचा फायदा घेत त्यांनी Pulse कँडी तयार केली. ही कॅंडी चॉकलेट किंवा गोडसर मिठाईसारखी नव्हती, तर भारतीय चवीशी एकरूप झालेली होती. Pulse लाँच होताच ग्राहकांनी ती उचलून धरली. चटकदार चव आणि योग्य किंमत यामुळे लोक स्वतःच या कँडीची जाहिरात करू लागले.

    शून्य जाहिरात खर्च, तरीही अफाट लोकप्रियता!

    Pulse च्या चटपटीत आणि वेगळ्या चवीनं लोकांना लगेचच आकर्षित केलं. एकाने खाल्ल्यानंतर दुसऱ्यालाही खायला दिली, मित्रांनी एकमेकांना सांगितलं, कुटुंबात आणि नातेवाईकांमध्येही चर्चा सुरू झाली. हळूहळू “वर्ड ऑफ माऊथ” हेच Pulse चं सर्वात प्रभावी मार्केटिंग ठरलं. केवळ चवीच्या जोरावर ही कँडी घराघरात पोहोचली आणि भारतीय कँडी मार्केटमध्ये नवा ट्रेंड निर्माण केला.

    टीव्ही ऍड्स, सोशल मीडिया मार्केटिंग, सेलिब्रिटी प्रमोशन यांसारख्या विविध मार्गांचा वापर करून कंपन्या आपली उत्पादने लोकप्रिय करतात. मात्र, Pulse कँडीसाठी कंपनीने जाहिरातीवर एकही रुपया खर्च केला नाही. ना कोणतीही जाहिरात मोहीम राबवली, ना मोठ्या ब्रँड्सप्रमाणे सेलिब्रिटींच्या मदतीनं प्रमोशन केलं. तरीही ही कँडी तुफान गाजली आणि संपूर्ण भारतभर पोहोचली.

    DS ग्रुपची अनोखी मार्केटिंग युक्ती

    DS ग्रुपला मार्केटिंगचं तंत्र चांगलंच ठाऊक होतं. रजनीगंधा आणि पास पाससारख्या यशस्वी उत्पादनांचा अनुभव त्यांच्याकडे होता. त्यांनी ओळखलं की लोकांना Pulse कँडीची चव आवडतेय आणि तिची मागणी वाढतेय. ही उत्सुकता टिकून राहावी आणि कँडीला अधिक महत्त्व मिळावं, म्हणून त्यांनी सुरुवातीला Pulse मर्यादित प्रमाणातच बाजारात आणली.

    Pulse प्रथम केवळ गुजरात आणि राजस्थानमध्ये लाँच करण्यात आली. लोकांनी ही कँडी शोधायला सुरुवात केली. विक्रेत्यांनी स्टॉक मर्यादित ठेवल्यामुळे ती मिळवण्यासाठी स्पर्धा वाढली. त्यामुळे Pulse ही सामान्य कँडी न राहता, एक एक्सक्लुझिव्ह प्रॉडक्ट वाटू लागली. या रणनीतीमुळे कँडीची लोकप्रियता झपाट्याने वाढली आणि Pulse एक मोठा ब्रँड बनला.

    ८ महिन्यांत १०० कोटींची विक्रमी विक्री

    Pulse हा केवळ महिन्यांत १०० कोटींची विक्री करणारा भारतातील सर्वात वेगाने वाढणारा FMCG ब्रँड ठरला. यामागे काही महत्त्वाची कारणे होती. कँडीची किंमत फक्त रु. असल्यामुळे कोणालाही सहज खरेदी करता येत होती. हिरवट-पिवळ्या आकर्षक पॅकेजिंगमुळे ती लगेचच लक्ष वेधून घेत होती. 

    Pulse ची मागणी इतकी वाढली की दुकानांमध्ये ती मिळवण्यासाठी रांगा लागत होत्या. काही किरकोळ विक्रेत्यांनी तर Pulse मिळवण्यासाठी वेटलिस्ट तयार केली होती, तर काहींनी जास्त किमतीला विकायला सुरुवात केली. लोकांमध्ये निर्माण झालेल्या या क्रेझमुळे Pulse कँडीच्या लोकप्रियतेला अधिकच गती मिळाली आणि ती भारतभर गाजली.

    भारतातून परदेशापर्यंत पोहोचलेली Pulse!

    २०१८ पर्यंत Pulse भारतातील २० लाखांहून अधिक दुकानांमध्ये उपलब्ध झाली. प्रवासी भारतीय ही कँडी परदेशात घेऊन जाऊ लागले आणि हळूहळू ती अमेरिका आणि दुबईतही प्रसिद्ध झाली. या लोकप्रियतेला आणखी चालना देण्यासाठी DS ग्रुपने संत्री, अननस आणि पेरू असे नवीन फ्लेवर्स सादर केले. मात्र, कच्चा आंबा हा मूळ फ्लेवर सर्वाधिक विकला गेला.

    २०१९ मध्ये कंपनीने  बाजारात फॅमिली पॅक्स आणि गिफ्ट पॅक्स आणले, ज्यामुळे विक्रीत मोठी वाढ झाली आणि Pulse ने तब्बल ३५० कोटींचा टप्पा पार केला. इतकंच नाही तर, कँडी मार्केटमध्ये ४८% मार्केट शेअर मिळवत Pulse ने नवा विक्रम प्रस्थापित केला. हे यश केवळ उत्कृष्ट चवीमुळे नव्हतं, तर त्यामागे बाजारपेठेचा सखोल अभ्यास आणि योग्य व्यूहरचना होती. ग्राहकांच्या आवडी समजून DS ग्रुपने नेमकी त्याच चवीची कँडी बाजारात आणली आणि इतिहास घडवला. 

    मित्रांनो, Pulse कँडीचे यश हे उत्तम मार्केटिंग आणि ब्रँडिंगचं उदाहरण आहे. योग्य नियोजन, उत्कृष्ट चव आणि प्रभावी वितरण यांच्या जोरावर जाहिरात न करता देखील एखादं उत्पादन मोठं होऊ शकतं, हे Pulse ने सिद्ध केलं आहे. आजही ती बाजारात तितकीच लोकप्रिय असून, नव्या ब्रँड्सच्या स्पर्धेत टिकून आहे.

  • Referrush Success Story: लकवा झाला… पण आज कमवतो रोज दीड लाख रुपये!

    Referrush Success Story: लकवा झाला… पण आज कमवतो रोज दीड लाख रुपये!

    यशाचा मार्ग कधीच सोपा नसतो. त्यात मेहनत, संघर्ष आणि जिद्द असते. प्रत्येकजण या मार्गावर यशस्वी होतोच असं नाही, पण काही जण अपयशाला न जुमानता पुढे जातात आणि स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात. विक्रम पै हे या गोष्टीचं उत्तम उदाहरण आहे.

    बंगळुरूमधील हा तरुण उद्योजक आज ReferRush या प्रसिद्ध ई-कॉमर्स रेफरल सेल्स प्लॅटफॉर्मचा संस्थापक आणि सीईओ आहे. पण त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. गेल्या सहा वर्षांत त्याने पाच व्यवसाय सुरू केले, पण त्यातला एकही यशस्वी झाला नाही. त्यामुळे त्याला तब्बल दोन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावं लागलं. तरीही त्याने हार मानली नाही. प्रत्येक अपयशातून शिकत, जिद्दीने पुढे जात अखेर ReferRush हा यशस्वी व्यवसाय उभारला. आज तो केवळ एक यशस्वी उद्योजक नाही, तर चिकाटी आणि मेहनतीचं उत्तम उदाहरण आहे. या लेखात आपण त्याच्या संघर्षमय प्रवासावर एक नजर टाकूया.  

    सुरुवातीचा संघर्ष आणि सलग अपयश

    बंगळुरूमध्ये जन्मलेल्या विक्रमने शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोठ्या आत्मविश्वासाने आणि उत्साहाने उद्योजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्याची स्वप्नं मोठी होती, यशस्वी होण्याची जिद्दही होती. मात्र, व्यवसायाच्या वाटचालीत अनेक अडथळे आले. अनुभव आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्याने सुरू केलेले एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच व्यवसाय अपयशी ठरले. सततच्या अपयशामुळे मोठं आर्थिक संकट कोसळलं. त्याला जवळपास दोन कोटी रुपयांचं नुकसान झालं. परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत गेली. मित्रांनी दुरावा निर्माण केला, नातेवाईक टीका करू लागले आणि आईचाही त्याच्यावरचा विश्वास कमी झाला. एका क्षणाला परिस्थिती अशी आली की, खिशात फक्त ४,००० रुपये उरले. कर्मचाऱ्यांना पगार देणेही शक्य नव्हते. काही जणांनी त्याची थट्टा केली. “एलन मस्क बनायचा प्रयत्न करतोय का?” असे टोमणे मारले.

    सततच्या तणावाचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर झाला. मानसिक तणावामुळे शरीर साथ सोडू लागलं. अखेर त्याला लकवा झाला आणि त्याचे चालणे, बोलणेही कठीण झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यासारखी वाटू लागली. तो खचला, रडला, पण हार मानली नाही. डोळ्यांतले स्वप्न जिवंत ठेवत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. या कठीण काळात स्वतःशीच लढण्याचा निर्धार केला आणि नव्या उर्जेने पुन्हा उभं राहण्याचा निश्चय केला.

    ReferRush ची स्थापना आणि पहिलं यश

    अनेक अपयशांनंतरही विक्रमने हार मानली नाही. नव्या उमेदीनं त्याने ReferRush या रेफरल मार्केटिंग प्लॅटफॉर्मची सुरुवात केली. सुरुवातीला हा व्यवसायही अपयशी ठरेल, असं अनेकांना वाटत होतं. पण यावेळी विक्रम मागे हटणार नव्हता. ReferRush व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांच्या माध्यमातून नवीन ग्राहक मिळवण्यासाठी मदत करतं. ग्राहक कंपनीच्या उत्पादनांची माहिती इतरांना सांगतात आणि त्याबदल्यात त्यांना कमिशन मिळतं. त्यामुळे कंपन्यांना विश्वासार्ह ग्राहक मिळतात, तर ग्राहकांनाही घरबसल्या कमाईचा पर्याय उपलब्ध होतो. हळूहळू हा व्यवसाय स्थिरावत गेला आणि ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला.

    सुरुवातीला पहिल्या एक लाख रुपयांसाठी तब्बल चार महिने लागले. पण विक्रमने मेहनत आणि जिद्द कायम ठेवली. त्याच्या प्रयत्नांचा परिणाम दिसू लागला आणि आज ReferRush दररोज १.५ लाख रुपये कमवतो. अपयशाच्या काळात खचून न जाता ज्या चिकाटीने विक्रमने प्रयत्न सुरू ठेवले, त्याच जिद्दीमुळे त्याला यशाचा हा टप्पा गाठता आला.

    निखील कामतकडून ReferRush ला फंडिंग – यशाच्या नव्या पर्वाची सुरुवात

    विक्रमच्या अथक मेहनतीला अखेर मोठं यश मिळालं. त्याच्या ReferRush या रेफरल मार्केटिंग स्टार्टअपने उद्योगविश्वात ठसा उमटवायला सुरुवात केली होती. याच प्रवासात, भारतातील नामवंत उद्योजक निखील कामत यांच्या कंपनीने ReferRush ला इनिशिएटिव्ह फंडिंगसाठी निवडलं. तब्बल २,४०० कंपन्यांमधून ReferRush ची निवड होणं हे विक्रमसाठी एका मोठ्या यशाचं प्रतीक होतं. यामुळे केवळ आर्थिक पाठबळच नाही, तर या प्लॅटफॉर्मच्या भविष्यासाठीही एक मजबूत दिशा मिळाली. आता त्याला ठाम विश्वास आहे की, लवकरच प्रत्येक ई-कॉमर्स ब्रँड आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी ReferRush चा वापर करेल.

    विक्रमच्या मते, त्याचा संपूर्ण प्रवास हा शिकण्याचा होता. सुरुवातीची पाच वर्षं त्याने प्रयोग आणि चुका यातून शिकण्यात घालवली. अपयश आलं तरीही आत्मविश्वास कधीही गमावला नाही. व्यवसायात संकटं आली, आर्थिक तोटा सहन करावा लागला, शारीरिक आणि मानसिक त्रासही सोसावा लागला. पण तरीही तो जिद्दीने लढत राहिला. त्याच्या मते, “जर तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण होत असतील, तर तुम्ही तुमचं स्वप्न नक्कीच साकार करू शकता.”

    आज विक्रमच्या संघर्षाची कहाणी हजारो तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अपयशाला घाबरून थांबण्यापेक्षा त्यातून शिकून पुढे जाणं हेच यशाचं खरं रहस्य आहे. विक्रमने ते करून दाखवलं. 

    आणखी वाचा:

  • जाणून घ्या विमा क्षेत्रातील डिजिटल क्रांतीचे शिल्पकार वरुण दुआ यांचा प्रवास | Acko General Insurance

    जाणून घ्या विमा क्षेत्रातील डिजिटल क्रांतीचे शिल्पकार वरुण दुआ यांचा प्रवास | Acko General Insurance

    यश मिळवायचं असेल; तर जिद्द, मेहनत आणि योग्य दिशा असणं गरजेचं असतं. जिद्द मेहनतीला साथ देते, तेव्हा कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येतं. भारतीय विमा क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवणारे अग्रगण्य युवा उद्योजक वरुण दुआ हे या गोष्ट्टीचं उत्तम उदाहरण आहेत. पारंपरिक विमा क्षेत्रातील जटिल प्रक्रिया सोप्या आणि सुलभ करण्याचं त्यांनी स्वप्न पाहिलं. त्यांच्या दूरदृष्टीमुळे विमा घेण्याची संकल्पना आणि प्रक्रिया संपूर्ण बदलली.

    ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी Acko General Insurance या पूर्णतः डिजिटल विमा कंपनीची स्थापना केली. पारंपरिक विमा कंपन्यांमध्ये अनेक टप्पे, कागदपत्रांची आवश्यकता आणि वेळखाऊ प्रक्रिया असते. याउलट, Acko ने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विमा प्रक्रिया सुलभ केली. ग्राहकांना जलद आणि पारदर्शक सेवा मिळावी यासाठी कंपनीने डिजिटल माध्यमातून थेट विमा पॉलिसी देण्याचा निर्णय घेतला. 

    वरुण दुआ यांचा प्रवास संघर्ष, नाविन्य आणि चिकाटीने भरलेला आहे. त्यांनी कठोर परिश्रम, नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विमा क्षेत्रात नवी क्रांती घडवली. चला, त्यांच्या जीवनप्रवासाचा आणि उद्योजकीय यशाचा आढावा या लेखातून घेऊया.

    प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

    वरुण दुआ यांचा जन्म १९८१ मध्ये दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील चंदर मोहन दुआ हे सरकारी कंपनीत अधिकारी होते, तर आई रश्मी दुआ या सरकारी शाळेच्या प्राचार्या होत्या. शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या या कुटुंबात वरुण यांना लहानपणापासूनच नवीन गोष्टी शिकण्याची आवड होती, ज्यामुळे त्यांचा अभ्यासात चांगला सहभाग असायचा.

    त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील वांद्रे-जुहू परिसरातील शाळेत झालं. पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली आणि त्यानंतर MICA (Mudra Institute of Communications, Ahmedabad) मधून मार्केटिंग आणि कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. या शिक्षणामुळे त्यांना मार्केटिंग आणि ब्रँडिंग यांचं सखोल ज्ञान मिळालं, जे त्यांना पुढे विमा क्षेत्रात नवे प्रयोग करण्यासाठी उपयोगी ठरलं.

    करिअरची सुरुवात

    MICA मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वरुण दुआ यांनी आपल्या करिअरची सुरुवात Leo Burnett या जगप्रसिद्ध जाहिरात कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून केली. त्यांच्या कुटुंबाला नेहमीच त्यांच्यासाठी स्थिर आणि सुरक्षित नोकरी हवी होती, म्हणूनच त्यांनी सुरुवातीला नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मार्केटिंग आणि ब्रँडिंग क्षेत्रातील आपल्या ज्ञानाचा उपयोग करत त्यांनी पुढे टाटा AIG लाइफ इन्शुरन्स आणि फ्रँकलिन टेम्पलटन इन्व्हेस्टमेंट्स यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम केलं. या कंपन्यांमध्ये काम करत असताना त्यांना विमा उद्योगातील कार्यपद्धती, ग्राहकांच्या गरजा आणि उद्योगाच्या मर्यादा यांची सखोल माहिती आणि समज मिळाली.

    या अनुभवातून त्यांना लक्षात आलं की विमा खरेदी प्रक्रिया अत्यंत जटिल, वेळखाऊ आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे ग्राहकांसाठी त्रासदायक आहे. अनेक ग्राहकांना विमा पॉलिसी समजण्यात अडचण येत होती, तर काहींना क्लेम प्रक्रिया खूप वेळ घेणारी आणि कठीण वाटत होती. ही समस्या सोडवण्यासाठी काहीतरी नवीन आणि ग्राहकांसाठी सुरळीत प्रक्रिया निर्माण करणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी परंपरागत विमा उद्योगाला डिजिटल युगाशी जोडण्याचा संकल्प केला आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा दृढ निश्चय केला.

    व्यवसायाची सुरुवात आणि सुरुवातीचा संघर्ष 

    २०१६ मध्ये वरुण दुआ यांनी ACKO General Insurance ची स्थापना केली. ही भारतातील पहिली पूर्णतः डिजिटल विमा कंपनी आहे. “शून्य कमिशन, शून्य कागदपत्रे” या संकल्पनेने सुरू झालेल्या ACKO ने “फुल पैसा वसूल” या मोहिमेच्या माध्यमातून लोकांचं लक्ष वेधून घेतलं.

    ACKO ने विमा क्षेत्रात एक नवा बदल घडवला. पारंपरिक विमा कंपन्यांच्या जटिल आणि वेळखाऊ प्रक्रियांमुळे ग्राहकांना अडचणी येत होत्या. मात्र, ACKO ने डिजिटल आणि सोपी विमा सेवा उपलब्ध करून हे आव्हान सोडवलं. मोठ्या खर्चाशिवाय, त्यांनी परवडणाऱ्या आणि सहज समजणाऱ्या विमा पॉलिसी ग्राहकांसाठी तयार केल्या. AI आणि डेटा-ड्रिव्हन तंत्रज्ञानाचा वापर करून, त्यांनी विमा मंजुरी आणि क्लेम प्रक्रिया जलद आणि पारदर्शक केली.

    ACKO ने ओला, अमेझॉन, रेडबस, बायजूस यांसारख्या मोठ्या ब्रँडसोबत भागीदारी करून विमा सेवा अधिक सोपी केली. त्यांच्या उत्तम ग्राहक सेवेमुळे, ACKO भारतातील युनिकॉर्न कंपन्यांपैकी एक बनली आहे. आज ACKO फक्त वाहन आणि आरोग्य विमाच नाही, तर जीवन विमाही प्रदान करते, त्यामुळे ग्राहकांचा विश्वास आणि कंपनीचा विस्तार सातत्याने वाढत आहे.

    ACKO चा यशस्वी प्रवास

    ACKO ने आपल्या अभिनव दृष्टिकोनामुळे कमी वेळात मोठं यश मिळवलं. २०१८ मध्ये IRDAI कडून अधिकृत परवानगी मिळवल्यानंतर, कंपनीने वेगाने विस्तार केला. २०२१ मध्ये $२५५ मिलियन गुंतवणूक फंड उभारून, त्यांनी डिजिटल विमा क्षेत्रात आपलं स्थान अधिक मजबूत केलं. या यशामुळे २०२४ मध्ये ACKOचे मूल्यांकन $१.१ अब्ज डॉलर्स (सुमारे ९,००० कोटी रुपये) ओलांडले आणि कंपनीने भारतातील टॉप युनिकॉर्न स्टार्टअप्समध्ये स्थान मिळवलं.

    ACKO चे संस्थापक वरुण दुआ यांनी २०२३ मध्ये शार्क टँक इंडिया या प्रसिद्ध रियॅलिटी शोच्या सीझन मध्ये परीक्षक म्हणून सहभाग घेतला. अनेक तरुण उद्योजकांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांना आर्थिक मदतही दिली. त्यांची व्यवसायवाढीतील दूरदृष्टी आणि ग्राहक-केंद्रितता ACKO च्या यशाचा मुख्य आधार आहे.

    आणखीन वाचा:

  • Shiv Nadar Success Story | केवळ लाखभर रुपये गुंतवून सुरु केलेला व्यवसाय आज पोहोचलाय सात समुद्रापार

    Shiv Nadar Success Story | केवळ लाखभर रुपये गुंतवून सुरु केलेला व्यवसाय आज पोहोचलाय सात समुद्रापार

    या जगात वावरणाऱ्या कुणालाही मेहनतीशिवाय फळ मिळालेलं नाही, त्यामुळे जर का कुणाच्या यशाकडे पाहत अचंबित होत असाल, तर त्यामागे असणाऱ्या खडतर वाटचालीकडे सुद्धा नक्कीच लक्ष द्या. आज आम्ही देखील अशाच एका खेडेगावातून आलेल्या बिझनेस महारथीची गोष्ट तुमच्यासमोर उलगडून दाखवणार आहोत… 

    शिव नादर : जन्म आणि शिक्षण

    तुम्ही HCL Technologies या कंपनीबद्दल ऐकून आहात का? याच कंपनीचे मालक म्हणजे शिव नादर, ज्यांचा जन्म १४ जुलै १९४५ रोजी तामिळनाडू मधल्या तुतीकुडी जिल्ह्यातील मूलयपोजी नावाच्या एका छोट्या गावात झाला. दक्षिण भारतातील एका लहानशा गावात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले शिव नादर हे आत्ताच्या घडीला भारतीय  IT क्षेत्रातील दिग्गजांपैकी एक बनले आहेत. बालपणापासूनच शिक्षणाची आवड असलेल्या शिव नाडार यांनी शिक्षणात बाजी मारत इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची (Electrical and Electronics Engineering) पदवी मिळवली. पदवी मिळवल्यानंतर आपण जसं नोकरी करण्याचा निर्णय घेतो, त्याप्रमाणेच  शिव नाडार यांनी देखील नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि वयाच्या २२व्या वर्षी पुण्यातील वालचंद ग्रुप ऑफ इंजिनियरिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. 

    नोकरी ते व्यवसायाचा प्रवास:

    अनेकवेळा आपण एखादं काम करत असतो, मात्र त्यात खुश असत नाही किंवा आपल्या इच्छा-आकांशा पूर्ण न झाल्याने केलेल्या कामातून म्हणावा तसा आनंद मिळत नाही. शिव नाडार यांच्या बाबतीतही काही अंशी असंच घडलं. त्यांना नेहमीच स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची तीव्र इच्छा होती. जेव्हा आपण मनात तीव्र इच्छा बाळगतो तेव्हा कितीही खडतर प्रवास करण्याची, मेहनत घेण्याची आपली तयारी असते. शिव नाडार याच विचारसरणीचे असल्याने कामाच्या अनुभवाची पुंजी सोबत घेऊन त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय पक्का केला. या प्रवासात त्यांना काही मित्रांची सोबत लाभली जे देखील चौकटीच्या बाहेर जात  काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात होते. समविचारी माणसांनी एकत्र येणं हा त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला आणि वर्ष १९७६ मध्ये पाच मित्रांनी सोबत येऊन मायक्रोकॉम्प नावाची कंपनी उभारली, ही कंपनी त्या काळात कॅल्क्युलेटर विकण्याचे काम करायची. 

    काही वर्षांच्या मेहनतीनंतर याच कंपनीचं  रूपांतर हिंदुस्थान कम्प्युटर्स लिमिटेडमध्ये (Hindustan Computers Limited) करण्यात आलं, ज्याला आपण HCL Technologies म्हणून ओळखतो. काही कारणास्तव त्यावेळी IMB सारख्या दिग्गज कंपनीला भारतातून काढता पाय घ्यावा लागला होता आणि हीच संधी नादरआणि समूहासाठी महत्वाची ठरली. व्यावसायिकाचे सर्व गुण घेऊन जन्मलेल्या नादर यांनी मिळालेल्या संधीचं सोन्यात रूपांतर केलं आणि IMB च्या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढली. केवळ १,८७,ooo रुपयांच्या गुंतवणुकीमधून सुरु झालेल्या HCL ला पुढे राज्य सरकारकडून २० लाख रुपयांची आर्थिक मदत पुरवण्यात आली आणि बदल्यात सरकारने कंपनीचा २६ टक्के वाटा मिळवला. 

    वर्ष १९७८ मध्ये HCL कडून पहिला वाहिला पर्सनल कंप्युटर (Personal Computer/ PC) बाजारात आणण्यात आला आणि हा अनोखा बदल संपूर्ण बाजारपेठेसाठी महत्वाचा ठरला. HCL Technologies यशाची शिखरं काबीज करत असतानाच शिव नादर यांनी फार इस्ट कम्प्युटर्स (Far East Computers) नावाची आणखीन एक कंपनी सुरु करत आंतराष्ट्रीय व्यवसायाचा श्रीगणेशा केला. १९८० मध्ये याच कंपनीच्या माध्यमातून नाडार सिंगापूरमध्ये IT Hardware विकायचे. तुम्हाला माहिती आहे का त्यावेळी फक्त एक वर्षाच्या व्यवसायातून शिव नादर यांच्या कंपनीचे मूल्य ३ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले होते. देशात आणि परदेशात नाव कमावत असलेल्या नादर यांनी इथून मात्र कधीच मागे वळून पाहिलं नाही. वर्षांची  मेहनत आणि कष्टांच्या जोरावर त्यांनी  जागतिक पातळीवरील ‘फोर्ब्स’ (Forbes) च्या यादीत अनेकवेळा नाव पटकावलं. शिव नादर यांची मेहनत आणि सोबत असेल्या मंडळींची साथ यामुळे आज HCL ला केवळ एक कंपनी म्हणून नाही, तर ब्रँड म्हणून ओळखलं जातं.

    फोर्ब्सच्या यादीनुसार शिव नादर हे भारतातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांची एकूण संपत्ती ३३.६ बिलियन डॉलर्सच्या घरात पोहोचली आहे. आशिया खंडात श्रीमंत व्यक्तींमध्ये नादर यांचा ९ वा, तर जागतिक स्तरावर ४५ वा क्रमांक लागतो म्हणूनच शिव नादर हे नाव आज केवळ भारताच्या व्यावसायिक क्षेत्रातच नाही, तर जगभरात पसरलं आहे. तसेच त्यांच्या नेतृवाखाली HCL ने जगभरातील ४४ विविध देशांमध्ये विस्तार केला आहे. कैक वर्ष मेहनत केल्यानंतर काही काळापूर्वीच त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र ते नेहमी म्हणतात की, “प्रत्येक माणसाने लक्ष ठरवण्यासाठी स्वप्न पाहिलं पाहिजे, कारण स्वप्न  पाहिल्याशिवाय लक्ष ठरवता येत नाही आणि ज्याने लक्षच ठरवलेलं नाही, तो यश संपादन करू शकत नाही.” नादर हे अध्यक्षपदावरून बाजूला झाल्यानंतर आता त्यांची मुलगी रोशनी नादर-मल्होत्रा कंपनीच्या अध्यक्षपदाची जवाबदारी सांभाळते, तसेच शिव नादर हे आजही व्यवस्थापकीय संचालक म्हणून कायम कार्यरत आहेत. 

    शिव नादर यांनी लहानपणी हलाखीचे दिवस सोसले होते, घरची आर्थिक परिस्थिती काही खास चांगली नव्हती.  मात्र कधीही त्यांनी स्वतःच्या परिस्थितीला दोष दिला नाही, याउलट सतत मेहनत करत परिस्थितीवर मात करण्याची जिद्ध उराशी बाळगली. शिक्षण घेत असताना त्यांना अनेक  हालअपेष्टा सोसाव्या लागल्या तरीही खचून न जाता एका शाळेतून दुसऱ्या शाळेत बदली करत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण संपलं तरीही समोर उभी ठाकलेली आव्हानं काही संपण्याचं नाव घेत नव्हती. हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करत इथवर आल्यांनतर, नोकरीमधून काहीशी रक्कम मिळायची. मात्र मिळणाऱ्या पैशांकडे दुर्लक्ष करत स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेणं देखील सोपं नव्हतं. सर्वात महत्वाचं म्हणजे त्याकाळात भारतात कम्प्युटर्स बद्दल अधिक माहिती उपलब्ध नव्हती,लोकांना माहिती नसलेल्या वस्तूची विक्री करणं आणि स्पर्धात्मक वातावरणात नवख्या माणसाने व्यवसाय सुरु करणं  ही वाटते तेवढी साधी आणि सोपी गोष्ट नाही. 

    शिशिव नादर यांचे सामाजिक कार्य:

    अझीझ प्रेमजी, कुमार मंगलम बिर्ला, मुकेश अंबानी यांच्यासोबत शिव नादर यांना आधुनिक भारतातील एक दानशूर व्यक्ती म्हणून ओळखलं जातं, कारण या दिग्गज उद्योगपतीने नेहमीच स्वतःजवळ असलेली धनाची पुंजी गरजू माणसांसाठी खुली केली आहे. विद्याज्ञान, शिव नादर युनिव्हर्सिटी, शिव नादरस्कुल, किरण नादर म्युझियम ऑफ आर्टस् अशा एक ना अनेक माध्यमांमधून त्यांनी समाजापर्यंत वेळोवेळी मदत पोहोचवली आणि म्हणूनच हुरून इंडिया फिलोनत्रोफीच्या (Hurun India Philanthropy List) यादीत शिव नाडर यांचं नाव पाहायला मिळतं. एवढंच नाही तर आत्तापर्यंत त्यांनी शिव नादर फाउंडेशनतर्फे शिक्षण तसेच आरोग्य क्षेत्रांना आर्थिक मदत पोहोचवून महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. 

    आणखीन वाचा:

  • फेकून दिलेल्या नारळाच्या कवट्यांपासून लाखोंची कमाई | Success story of a young woman from Kerala.

    फेकून दिलेल्या नारळाच्या कवट्यांपासून लाखोंची कमाई | Success story of a young woman from Kerala.

    मारिया कुरियोकोस ही मुळची केरळच्या त्रिशुरची. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर ती स्पेनला शिकायला गेली. 2017 मध्ये तिला नोकरी लागली; पण 2019 मध्ये तिने नोकरी सोडून दिली. तिला स्वतःच असं काहीतरी करायचं होत. थोडं संशोधन केल्यावर तिला समजलं, की लोकं नारळाच्या कवट्या फेकून देतात; पण त्यापासून अनेक उपयोगी वस्तू बनू शकतात. मग तिने नारळाच्या कवट्या Recycle करायला सुरुवात केली आणि त्यापासून सजावटीचे सामान बनवले.

    2019 मध्ये मारियाने Thenga Coco नावाने व्यवसाय सुरू केला. ती नारळाच्या कवट्या रिसायकल करून त्यापासून बाऊल, कँडल होल्डर तसेच प्लांट हँगर्स अशा विविध प्रकारच्या वस्तू बनवते.

    सुरूवातीला तिने 150 किचन बाऊल बनवले. ते एका इव्हेंटमध्ये तसेच तिच्या मित्रपरिवाराला विकले. 60 रुपयाला एक बाऊल असा व्यवसाय तिने सुरुवातीला केला. त्यातून तिला 9000 रुपये मिळाले. मग तिने 1500 रुपयांची ड्रिलिंग मशीन घेतली. एकूण 4000 गुंतवणुकीतून हा व्यवसाय सुरू केल्याचं मारिया सांगते. आता तिच्याकडे महिला कामाला आहेत ज्या तिला हे प्रोडक्ट्स बनवायला मदत करतात. कोविड-19 मध्ये तिने तिचा व्यवसाय ऑनलाईन नेला, तेव्हा तिच्या व्यवसायाला खरी प्रसिद्धी मिळाली. त्यांचे जास्त ग्राहक हे मुंबई, दिल्ली आणि बंगलोर सारख्या शहरातून आहेत, जिथे लोकं इकोफ्रेंडली प्रोडक्ट्सबद्दल जास्त जागरूक आहेत.

    तसेच ती आता युरोप, अमेरिकेतसुध्दा आपले प्रोडक्ट्स निर्यात करते. तिला विदेशातूनदेखील अनेक ऑर्डर्स मिळतात.

    पहिल्या वर्षी त्यांचा वार्षिक टर्नओव्हर 20 लाख रुपये होता, तर दुसऱ्या वर्षी तो 50 लाख रुपये इतका झाला. मागच्या आर्थिक वर्षात त्यांचा टर्नओव्हर 1 कोटींपेक्षा जास्त झाला आहे. 

    Thenga Coco : 

    Thenga Coco हा केरळमधील एक स्वदेशी ब्रँड आहे. मल्ल्याळम भाषेत थेंगा या शब्दाचा अर्थ नारळ असा होतो. या ब्रँडमध्ये कचरा मानला जाणाऱ्या नारळाच्या कवट्यांवर पुनर्प्रक्रिया व त्याचे पुनरुत्पादन केले जाते. ही कंपनी नारळाच्या कवचापासून टिकाऊ, पर्यावरणपूरक हस्तनिर्मित वस्तू बनवते. केरळमध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या या उद्योगाने अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. याशिवाय, कंपनी भविष्यात नारळाच्या कवट्यांपासून खेळणी आणि दागिने तयार करण्याचा विचार करत आहे, जे प्लास्टिकच्या खेळण्यांना सुरक्षित पर्याय ठरू शकतात. 

    थेंगा कोकोचे उत्पादन केवळ पर्यावरणपूरक नसून, हे महिलांना आर्थिक स्वावलंबनही प्रदान करते. कंपनीत 80% कर्मचारी महिला आहेत आणि त्यांच्या हातांनी ह्या वस्तू तयार केल्या जातात. ही उत्पादने स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध आहेत. कंपनीत 18 कर्मचारी आहेत, त्यातील 12 महिला असून, त्यांना लवचिक कामाच्या वेळा दिल्या जातात जेणेकरून त्या घरगुती जबाबदाऱ्यांसह काम करू शकतील.

    आणखी वाचा :

  • भारतीयांच्या आवडत्या नूडल्स Brand कडून शिकण्यासारखे मार्केटिंगचे धडे…

    भारतीयांच्या आवडत्या नूडल्स Brand कडून शिकण्यासारखे मार्केटिंगचे धडे… 

    कोणताही व्यवसाय म्हटला की, तुम्ही तुमची उत्पादनं लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहचवता आणि ते ग्राहकांना कसं आणि किती आकर्षित करतं याची भूमिका खूप महत्त्वाची असते. चांगल्या मार्केटिंग तंत्राचा वापर करणारी उत्पादनं ग्राहकांना लवकर आकर्षित करतात. आज आपण अशाच एका लोकप्रिय Brand ची Marketing टेक्निक पाहणार आहोत. 

    भारतात मॅगी नूडल्स एक लोकप्रिय आणि सर्वसामान्यांच्या आवडीचा खाद्यपदार्थ आहे. 1980 च्या दशकात भारतीय बाजारात प्रवेश केल्यानंतर, मॅगी नूडल्सचा केवळ एक Brand म्हणून राहण्यापेक्षा, भारतीयांच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनली. त्यांच्या यशाचे रहस्य त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये दडलेले आहे.

    मॅगीने ग्राहकांच्या आवडी लक्षात घेऊन उत्पादनं तयार केली, स्थानिक चवींवर जोर दिला आणि विविधता आणली. त्याचबरोबर, सोशल  मीडिया, इमोशनल मार्केटिंग आणि क्रीडा-सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे ब्रँडची लोकप्रियता वाढवली.

    चला तर मग पाहूया भारतात सर्वात लोकप्रिय असणाऱ्या मॅगी या नूडल्स ब्रँड कडून शिकण्यासारखे काही मार्केटिंगचे धडे :

    1. जाहिरातींमध्ये भावनांचा वापर :

    जेव्हा जेव्हा आपण मॅगी बद्दल बोलतो तेव्हा आपल्या मनात चवदार नूडल्स बनवणाऱ्या आईची प्रतिमा येते. मॅगी हे अनेक वर्षांपासून कौटुंबिक खाद्य म्हणून सादर केले जाते आणि त्यांच्या जाहिरात कॅम्पेनमुळे त्यांना त्यांची ही प्रतिमा टिकवून ठेवण्यास खूप मदत झाली आहे.

    2. लहान आणि अर्थपूर्ण tagline चा वापर :

    कोणत्याही मार्केटिंग मोहिमेत टॅगलाइन्सचा महत्त्वाचा भाग असतो. मॅगी अनेक वर्षांपासून लहान आणि आकर्षक टॅगलाइन वापरत आहे. “स्वाद भी, स्वास्थ्य भी”चे उदाहरण घ्या, ही टॅगलाइन मोठ्या संख्येने ग्राहकांना आकर्षित करू शकते, कारण नूडल्स ही अशी गोष्ट आहे जी लोक खाणे टाळतात कारण ते आरोग्यास चांगलं नाही; परंतु मॅगीच्या या tagline मुळे त्यांचे नूडल्स आरोग्यास चांगले आहेत हे लोकांच्या मनात आपसूकच ठसवले जाते. 

    3. प्रत्येक प्रकारचे मार्केटिंग :

    प्रिंट जाहिराती, होर्डिंगपासून सोशल मीडियापर्यंत, मॅगीच्या जाहिराती सर्वत्र आहेत. मॅगीवरील बंदी हटवल्यानंतर मॅगीने आपली मार्केटींगमधील गुंतवणूक सुमारे 96 टक्क्यांपर्यंत वाढवली. ही साधी गोष्ट नाही. अगदी चित्रपट आणि अनेक टीव्ही शोमध्ये मॅगीचे प्रायोजकत्व दिसून येते. अनेक ब्रँड सहसा मार्केटिंगच्या एका मार्गावर लक्ष केंद्रित करण्याची चूक करतात. जे धोकादायक देखील असू शकते, म्हणून नेहमी शक्य तितक्या विविध प्रकारच्या मार्केटिंगचे प्रकार वापरणं गरजेचं आहे. ज्यामुळे अनेक प्रकारच्या ग्राहकांपर्यंत तुमचे उत्पादन पोहोचण्यास मदत होईल. 

    4. विक्री 

    मॅगीच्या पॅकेटच्या मागील बाजूस एक रेसिपी मॅन्युअल आहे. जेव्हा एखादी व्यक्ती पहिल्यांदा मॅगी बनवते किंवा ती कशी बनवायची हे तिला माहित असतेच असे होत नाही. तेव्हा या पाककृती खूप मदत करतात. पॅकेजिंगमध्ये उत्पादनाबद्दल योग्य ज्ञान देणे हा देखील एक खूप चांगला आणि अर्थपूर्ण धडा आहे. त्याचबरोबर मॅगी २ मिनिटात बनते हे त्यांच्या प्रत्येक जाहिरातीतून ग्राहकांच्या मनावर ठसवलं जातं. खरं बघायला गेलं तर मॅगी बनायला २ मिनिटांपेक्षा जास्तच वेळ लागतो, पण आमची रेसिपी कमी वेळात बनते ही भावना ग्राहकांच्या गळी उतरण्यात कंपनी यशस्वी ठरली आहे.    

    5. सेलिब्रेटींच्या शक्तीला कमी लेखू नका :

    अमिताभ बच्चनपासून ते माधुरी दीक्षितपर्यंत, मॅगीने त्यांच्या जाहिरातींमध्ये भारतातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींचा वापर केला आहे. नूडल्समध्ये नंबर १ ब्रँड बनण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे, कारण भारतातील

    आणखी वाचा

    जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल, तर ती तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा. यामुळे त्यांनाही उपयुक्त माहिती मिळेल.

  • Success Story: २००० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय, आज आहे २,६०,००० कोटींची कंपनी | Dilip Shanghvi

    Success Story: २००० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय, आज आहे २,६०,००० कोटींची कंपनी | Dilip Shanghvi

    असं म्हटलं जातं की, श्रीमंत घरात जन्मलेल्या लोकांना मोठा व्यवसाय उभारण्याची अधिक संधी असते, सर्वसामान्य लोकांना व्यवसाय उभा करणं अवघड जातं. अनेक व्यक्ती स्वप्नं पाहतात, मोठे विचार मनात ठेवतात, पण त्यांच्या वास्तविक गरजांनी ती स्वप्नं धूसर होत जातात. आपण हे लक्षात ठेवायला हवं की, जर तुमच्यात स्वप्नं पाहण्याची क्षमता आणि ती पूर्ण करण्याची मेहनत घेण्याची इच्छाशक्ती असेल, तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता.

    देशातील वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सन फार्माचे संस्थापक दिलीप संघवी यांचं जीवन हे याचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी सुरुवात केली इतरांच्या औषधांचा व्यवसाय करून आणि त्याच अनुभवातून त्यांनी स्वतःचा औषध व्यवसाय सुरू केला. ना त्यांच्यामागे व्यापाराची कौटुंबिक पार्श्वभूमी, ना त्यांच्याकडे मोठी आर्थिक ताकद होती. पण त्यांचं धाडस आणि जिद्द यामुळेच त्यांनी ‘फार्मा किंग’ म्हणून स्वतःचा ठसा निर्माण केला.

    प्रारंभिक जीवन

    दिलीप संघवी  यांचा जन्म १ ऑक्टोबर १९५५ रोजी गुजरातमधील अमरेली या छोट्या गावात एका मारवाडी कुटुंबात झाला. त्यामुळे व्यापाराची मूलभूत समज त्यांच्याकडे बालपणापासूनच होती. त्यांच्या वडिलांचा एक छोटा औषध विक्रीचा व्यवसाय होता आणि संघवी लहानपणापासूनच वडिलांना या व्यवसायात मदत करत असत. ही मदत त्यांच्यासाठी फक्त कुटुंबाला दिलेला हातभार नव्हता, तर औषध उद्योगातील प्राथमिक अनुभव घेण्याची एक महत्त्वाची संधी होती. वडिलांना व्यवसायात केलेल्या मदतीमुळे औषध विक्रीच्या विविध बाजू समजून घेण्याची क्षमता त्यांच्यात विकसित झाली. 

    संघवी यांनी कोलकात्यातील भवानी पूर एज्युकेशन सोसायटी कॉलेजमधून वाणिज्य विषयात पदवी प्राप्त केली. औषध निर्मितीचा कोणताही औपचारिक अभ्यास न करता, त्यांनी वडिलांच्या व्यवसायात काम करत करत औषध बाजारातील विविध संधींची जाण मिळवली. औषध विक्रीच्या व्यवसायात असताना संघवींना हे लक्षात आलं की जेनेरिक औषधांची मागणी भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यांनी विचार केला, की जर मी इतरांनी तयार केलेली औषधे विकू शकतो, तर मी स्वतःची औषधे का बनवू नये?

    या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी औषध निर्मिती क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, ज्यातून पुढे ‘सन फार्मास्युटिकल्स’ या यशस्वी कंपनीची स्थापना झाली. त्यांच्या लहानपणी घेतलेल्या अनुभवांनी आणि औद्योगिक दृष्टिकोनाने त्यांना औषध उद्योगात एक महत्त्वपूर्ण स्थान मिळवून दिलं

    सन फार्माची सुरुवात आणि विस्तार 

    १९८२ साली वडिलांकडून २००० रुपये उसने घेऊन सन फार्माची सुरुवात संघवींनी गुजरातमधील वापी येथे केली. सुरुवातीला कंपनीने मनोरुग्ण आणि हृदयविकाराशी संबंधित औषधे तयार करण्यावर लक्ष केंद्रित केलं. उत्पादनांची विविधता कमी होती, पण संघवी यांनी नेहमी गुणवत्तेला प्राधान्य दिलं,  ज्यामुळे कंपनीची औषधं बाजारात लोकप्रिय होऊ लागली.

    १९९७ मध्ये, कंपनीच्या स्थापनेनंतर १५ वर्षांनी, संघवी यांनी अमेरिकेतील कॅराको फार्मास्युटिकल्स नावाची एक फार्मा कंपनी विकत घेतली, ज्यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत प्रवेश मिळाला. यानंतर २००७ मध्ये, त्यांनी इस्रायलमधील टारो फार्मा ही कंपनी विकत घेतली, ज्यामुळे कंपनीचे जागतिक स्तरावरील स्थान आणखी बळकट झाले. त्यानंतर, २०१४ मध्ये त्यांनी रॅनबॅक्सी कंपनी विकत घेतली. हे अधिग्रहण भारतीय औषध उद्योगात एक मोठा टप्पा होता, कारण यामुळे सन फार्मा भारतातील सर्वात मोठी औषध निर्मिती कंपनी बनली. यामुळे जागतिक बाजारातही सन फार्माचे स्थान मजबूत झाले.

    संघवी यांनी केलेली या कंपन्यांची खरेदी फक्त व्यवसाय वाढवण्यासाठी नव्हे, तर संशोधन आणि विकास वाढवण्यासाठी देखील होती. त्यांनी अमेरिका, युरोप आणि इतर विकसित बाजारांमध्ये विस्तार केला, ज्यामुळे कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर एक विश्वासार्ह ब्रँड बनली.

    यशाच्या शिखरावर 

    दिलीप संघवी यांनी भारतीय औषध उद्योगात केवळ व्यावसायिक यश मिळवलं नाही, तर औषध निर्मितीची गुणवत्ता वाढवून आणि किफायतशीर औषधांचा पुरवठा करून एक महत्त्वपूर्ण सामाजिक योगदान दिलं  आहे. त्यांचा दृष्टिकोन व्यावसायिकतेच्या पलिकडे जातो, जो समाजाभिमुख आहे, त्यांच्या या कार्यामुळे  अनेकांना योग्य आणि परवडणारी औषधे उपलब्ध झाली आहेत.

    संघवी यांनी फार्मास्युटिकल उद्योगाला नवी दिशा दिली, विशेषतः भारतात जेनेरिक औषधांची क्रांती आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. औषधांच्या किमती कमी करून त्यांनी केवळ भारतीय ग्राहकांना नाही, तर जागतिक स्तरावरही आरोग्यसेवा परवडणारी बनवली आहे.

    त्यांच्या उल्लेखनीय यशासाठी आणि योगदानासाठी दिलीप संघवी यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. २०१६ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार प्रदान केला, जो देशातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. याशिवाय, संघवी हे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सन्मानित झाले आहेत. फोर्ब्सच्या यादीत त्यांनी अनेक वेळा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून स्थान मिळवलं  आहे. २०१५ मध्ये त्यांना फोर्ब्सने भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित केलं, तेव्हा त्यांची संपत्ती $१७.५ बिलियन इतकी होती. सध्या फोर्ब्सनुसार, दिलीप संघवी यांची एकूण संपत्ती २९.८ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास २.५० लाख कोटी रुपये इतकी आहे. सन फार्मा जगातील पाचवी सर्वात मोठी जेनेरिक कंपनी असून कंपनीत जवळपास ४१००० कर्मचारी कार्यरत आहेत. 

    दिलीप संघवी यांचा जीवनप्रवास हा चिकाटी, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय यांचा अद्भुत संगम आहे. त्यांनी अत्यंत साध्या परिस्थितीतून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली आणि आज ते जागतिक स्तरावरील एक प्रमुख उद्योगपती म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जीवनातून शिकण्यासारखे खूप काही आहे – विशेषत: उद्योजकतेत टिकून राहण्यासाठी आणि सातत्याने नवनवीन संधी शोधण्यासाठीची त्यांची क्षमता प्रेरणादायी आहे.

    आणखी वाचा

  • 5 लाखांचं लोन घेऊन सुरु केला कपड्यांचा व्यवसाय… आज आहे १५० कोटींची उलाढाल…

    5 लाखांचं लोन घेऊन सुरु केला कपड्यांचा व्यवसाय… आज आहे १५० कोटींची उलाढाल…

    असं म्हणतात की; प्रयत्नांना मेहनतीची जोड असली की, तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मध्य प्रदेशातील दमोह या छोट्या शहरात राहणाऱ्या एका सामान्य व्यक्तीने जगभरातील फॅशन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करून हे वाक्य सिद्ध केलं आहे. ही कहाणी आहे राज नवानी यांच्या संघर्षाची, जी प्रत्येक नवउद्योजकासाठी प्रेरणादायी ठरेल. राज नवानी यांनी 1995 साली एका छोट्या कपड्यांच्या दुकानातून आपल्या व्यवसायाचा प्रवास सुरू केला आणि आज त्यांचा ब्रँड ‘नोस्ट्रम’ हा 150 कोटींची उलाढाल असलेला प्रतिष्ठित ब्रँड बनला आहे. चला तर जाणून घेऊया त्यांचा प्रेरणादायी प्रवास.

    एका छोट्या दुकानातून प्रवास सुरू

    राज नवानी यांचा प्रवास मध्यप्रदेशातील एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातून सुरू झाला. 1995 साली, त्यांनी केवळ 5 लाख रुपयांचं कर्ज घेऊन दमोह येथे ‘सॉरी मॅडम’ नावाचं  कपड्यांचं दुकान उघडलं. हे दुकान त्याच्या आगळ्यावेगळ्या नावामुळं त्या काळात स्थानिक लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालं, परंतु ते एवढ्यावर समाधानी नव्हते. फॅशन क्षेत्रात काहीतरी मोठं आणि वेगळं करण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती. 

    राज नवानी यांचं कुटुंब आधीपासूनच व्यवसायात असल्यामुळे व्यवसायात त्यांना लहानपणापासूनच  प्रेरणा मिळत होती. त्यांनी बायोलॉजीमध्ये पदवी घेतली, परंतु त्यांना शिक्षणात फारसा रस नव्हता. त्यांचं संपूर्ण लक्ष त्यांच्या वडिलांच्या व्यवसायात लागून होतं. ‘जय जवान, जय किसान’ या त्यांच्या वडिलांच्या कपड्यांच्या दुकानात काम करताना त्यांनी व्यवसायातील बारकावे शिकले आणि  वयाच्या अवघ्या  23व्या वर्षी, नवानी यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं  धाडस केलं. त्यांनी फॅशन उद्योगात नवीन कल्पना आणि नवतंत्रज्ञान वापरण्याची सुरुवात केली, ज्यामुळे लवकरच त्यांची ख्याती दमोहच्या बाहेर पसरू लागली .

    ‘सॉरी मॅडम’ ते ‘नोस्ट्रम’

    1995 मध्ये “सॉरी मॅडम” या नावाने सुरू झालेला त्यांचा प्रवास 2000 च्या दशकात एका प्रतिष्ठित ब्रँडकडे वळला. ‘नोस्ट्रम फॅशन प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने त्यांनी आपल्या ब्रँडचं एकप्रकारे पुनरुत्थान केलं  आणि त्याच्या भविष्यासाठी एक स्पष्ट दिशा ठरवली.

    राज नवानी यांच्या दूरदृष्टीमुळे ‘नोस्ट्रम’ ब्रँड फक्त स्थानिक बाजारपेठेपुरता मर्यादित न राहता, संपूर्ण देशभरात आपली छाप सोडू लागला. उत्कृष्ट डिझाईन, ग्राहकांच्या आवडीनुसार उत्पादनं तयार करणं आणि त्यांच्या गरजांचा सखोल अभ्यास यामुळे ‘नोस्ट्रम’ लवकरच राष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झाला. आज ‘नोस्ट्रम’ ब्रँड देशभरातील 1500 पेक्षा जास्त मल्टी-ब्रँड आउटलेट्स आणि 100 शॉप-इन-शॉप (SiS) ठिकाणी उपलब्ध आहे.

    कोट्यवधींची उलाढाल

    राज नवानी यांच्या यशाचं मुख्य कारण म्हणजे त्यांची मेहनत, चिकाटी आणि व्यावसायिक कौशल्य. 2023-24 या आर्थिक वर्षात ‘नोस्ट्रम’ कंपनीची उलाढाल 150 कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. त्यांचा ब्रँड आता विविध नामांकित फॅशन शोमध्ये सहभागी होतं आहे आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पेहरावात तो दिसून येतो.

    राज नवानी यांना त्यांच्या कंपनीची उलाढाल पुढच्या दोन वर्षांमध्ये 500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचवायची आहे. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी ते व्यवसायात सतत नवतंत्रज्ञानाचा वापर करत असतात आणि  एवढंच नाही, तर त्यांनी त्यांच्या व्यवसायाद्वारे 250 पेक्षा अधिक लोकांना रोजगार देण्याचंही महान कार्य केलं  आहे.

    नवउद्योजकांसाठी प्रेरणा

    राज नवानी यांचा प्रवास हा प्रत्येक नवउद्योजकासाठी एक प्रेरणा आहे. आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी त्यांनी घेतलेलं कष्ट, केलेली मेहनत आणि त्यांची चिकाटी ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली ठरली आहे. आपल्या स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकानं राज नवानी यांच्या प्रवासातून शिकायला हवं. 

    आणखी वाचा

  • बिझनेसमध्ये पार्टनर गरजेचा आहे का? | Why is a partner necessary in business?

    बिझनेसमध्ये पार्टनर गरजेचा आहे का? | Why is a partner necessary in business?

    व्यवसाय म्हटलं की अनेक गोष्टी आल्या. प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करण्याच्या आधीही बरीच पूर्वतयारी गरजेची असते. बिझनेस आयडियापासून ते प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करेपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय एक व्यावसायिक म्हणून आपल्याला घ्यावे लागतात.भांडवल, कच्चा माल, यंत्रं, कर्मचारी, ग्राहक, बाजारपेठ, बँका अशा अनेक घटकांचा समावेश करून त्यांच्या साहाय्याने व्यवसाय उभा राहतो. या सर्वांच्या बरोबरीने व्यवसायातील अतिशय महत्त्वाचा असणारा एक घटक म्हणजे आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्याबरोबर व्यवसाय करायला व सर्व आघाड्यावर तोंड द्यायला तयार असणारा आपला व्यावसायिक भागीदार अर्थात आपल्या व्यवसायाचा बिझनेस पार्टनर होय.

    बिझनेस पार्टनर निवडताना काय काळजी घ्यावी? 

    • व्यवसायात भागीदार असावाच का? 
    • असला तर तो का असावा? 
    • नसला तर तो का नसावा? 

    पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणे चांगले नसल्याचा सल्ला अनेक अनुभवी लोकांनी दिला आहे. तरीसुध्दा पार्टनर घ्यावाच का? 

    असे अनेक प्रश्न व्यवसायिकाला पडू शकतात. खरंतर बिझनेसमध्ये पार्टनर असणे गरजेचे आहे का, हे बिझनेसच्या प्रकारावर आणि त्याच्या गरजांवर अवलंबून असते; परंतु या सगळ्यात एक महत्त्वाची बाब  म्हणजे व्यवसायात पार्टनर न घेता फार मोठे संघटन तुम्हाला उभे करता येत नाही. एकटा व्यक्ती फक्त एक प्रोप्रायटर होऊ शकतो. त्याची मजल पुढे जाऊन एकल व्यक्ती कंपनी (One Person Company – OPC) पर्यंतच जाऊ शकते आणि भारतात कायदा असे सांगतो की, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप अथवा पब्लिक लिमिटेड कंपनी स्थापन करण्यासाठी एकापेक्षा जास्त व्यक्तींची गरज आहे.

    प्रोप्रायटर किंवा एकल व्यक्ती कंपनी फार मोठी Growth करू शकत नाही. त्यामुळे मोठा व्यवसाय करायचा असला, तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा एलएलपी सुरू करणे गरजेचे ठरते. त्यानंतरच बँका व इतर कंपन्या आपल्यासोबत (अर्थात कंपनीसोबत) मोठे व्यवहार करायला तयार होतात. म्हणून आपल्याला मोठा व्यवसाय करायचा असेल तर पार्टनर हा घ्यावाच लागेल; कारण ती व्यवसायाची गरज आहे. काहीजण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करताना घरातील व्यक्तींची (विशेष करून बायको अथवा नवरा, भाऊ, आई, वडील, मुलगा) नावे व्यवसायात सहभागी करतात. जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. मात्र अशा कंपनीत केवळ नावालाच असणारे डायरेक्टर (संचालक/पार्टनर) काही काम करू शकत नाहीत किंवा कंपनीच्या वाढीसाठी प्रयत्न करत नाहीत, कारण त्यांना काम कसे करायचे हे माहिती असतेच असे होत नाही. त्यामुळे फायदा जरी घरातच राहिला, तरी कंपनी मोठी होत नाही. त्यामुळे हा फायदा व व्यवसायाचा विस्तार कमी प्रमाणात असतो.

    त्याउलट एखादा अनुभवी काम करणारा संचालक (तो घरातला नसला तरीही) पार्टनर म्हणून घेतला, तर कंपनीची वाढ मोठ्या प्रमाणात होऊ शकते, कारण तो प्रत्यक्ष आपल्या कामांनी कंपनीच्या वाढीसाठी प्रयत्न करतो. त्यामुळे फायद्याचे वाटे झाले, तरीसुध्दा चांगले उत्पन्न मिळते. कंपनी झपाट्याने वाढल्यामुळे अनेक ग्राहक जोडले जातात. गुणवत्तेचा पार्टनर घ्यायचा की, केवळ नावालाच पार्टनर घेऊन स्वतः काम करायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. कारण आपण स्वतः किती काम करू शकतो हे आपल्यालाच चांगले माहिती असते.

    पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करण्याचे काही फायदे:

    1) नवीन कौशल्यं : 

    पार्टनरमुळे तुमच्या जोडीला नवीन कौशल्यं आणि अनुभव मिळतात, ज्यामुळे कामकाज अधिक प्रभावीपणे आणि उत्तम पद्धतीने पार पाडले जाऊ शकते.

    2) भांडवल वाढ : 

    पार्टनरमुळे आर्थिक गुंतवणुकीचा भार एकट्याच्या खांद्यावर न येता, तो दोन किंवा अधिक लोकांमध्ये विभागला जातो.

    3) निर्णय घेण्यात मदत : 

    पार्टनरमुळे निर्णय घेण्यात वेगवेगळी मतं आणि दृष्टीकोन मिळतात, ज्यामुळे योग्य निर्णय घेणे सोपे होते

    4) Networking :

    प्रत्येक पार्टनरकडे त्याच्या स्वतःच्या व्यावसायिक संपर्कांचे जाळे असते, जे बिझनेसला नवीन ग्राहक, सप्लायर्स किंवा इतर व्यवसायिक संधी मिळवून देऊ शकते.

    5) जोखीम वाटप :

    पार्टनरमुळे बिझनेसची जोखीम अनेकांमध्ये वाटली जाते, त्यामुळे जोखीम कमी होते. आर्थिक नुकसान किंवा बिझनेसच्या अडचणींमध्ये सर्व पार्टनर्स एकत्र येऊन त्या समस्येचा, अडथळ्यांचा सामना सोबतीने करू शकतात.

    व्यवसाय मोठा करायचा म्हटलं की, पार्टनर हा घ्यावाच लागतो, कारण कायद्याने ते बंधनकारक आहे. मग तो पार्टनर नावापुरताच असावा की, प्रत्यक्ष काम करणारा असावा याबाबत जरी कायद्याने कोणतेही बंधन घातले नसले, तरी पार्टनरला फायद्यातील वाटा हा ठरल्याप्रमाणे तुम्हाला द्यावाच लागतो. 

    दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की, कंपनीचे मालक म्हणून कंपनीत येणारा सगळा नफा घरी न्यायचा नसतो किंवा कंपनी तोट्यात चालायला लागली म्हणून घरातील सगळ्या गोष्टी दाव्यावर लावून कंपनीबरोबर स्वतःचे वाटोळेदेखील करून घ्यायचे नसते ही पक्की खूणगाठ प्रत्येक व्यावसायिकाने स्वत:च्या मनात बांधून ठेवली पाहिजे. तुम्ही जरी कंपनीचे मालक असलात तरी तुमचा पगार आधी ठरवा. तेवढेच पैसे महिन्याच्या शेवटी सर्व कर्मचाऱ्यांच्या पगाराबरोबर आपल्या घरी न्या. तुमच्या पार्टनरलासुध्दा हेच नियम लागू करा. ही विचारांची स्पष्टता जर तुमच्यात आणि तुमच्या पार्टनरमध्ये असेल तरंच ही व्यवसायातील भागीदारी दीर्घकाळ टिकेल व व्यवसाय मोठा होईल.

    जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आताच Whatsapp वर शेअर करा. 😊

    आणखी वाचा

  • सोशल मीडियामध्ये व्यवसाय संधी | Business Opportunities in Social Media

    सोशल मीडियामध्ये व्यवसाय संधी | Business Opportunities in Social Media

    स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे म्हणजेच स्वयंरोजगाराचे बरेच फायदे आहेत. स्वयंरोजगार ही स्वतःला विकसित करण्याची, नवीन ज्ञान संपादन करण्याची निरंतर प्रक्रिया असते. ही प्रक्रिया तुम्हाला नोकरी करून कधीच आत्मसात होणार नाही. 

    आपण जर सोशल मीडियाचे जाणकार आहात व आपणास काहीतरी नावीन्यपूर्ण असा व्यवसाय करायचा असेल, तर सोशल मीडिया कन्सलटंट हा व्यवसाय एक चांगला पर्याय आहे. 

    सोशल मीडिया कन्सलटंट म्हणजे काय ?

    सोशल मीडिया कन्सलटंट म्हणजे असा एक व्यक्ती जो व्यवसायांना किंवा व्यक्तींना त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर योग्य प्रकारे त्यांचा Presence निर्माण करण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करतो. 

    यामध्ये – 

    • सोशल मीडिया अकाउंट्स तयार करणे
    • पोस्ट्सचे नियोजन करणे
    • टार्गेट ऑडियन्सशी संवाद साधणे
    • ब्रँड प्रमोशन करणे, ट्रॅफिक वाढवणे 
    • व्यवसायाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी रणनीती तयार करणे यांचा समावेश असतो. 

    सोशल मीडिया कन्सलटंटचे मुख्य काम व्यवसायाचे ब्रँडिंग इमेज सुधारण्याचे असते, तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून विक्री किंवा लोकप्रियता वाढवण्याचे असते.

    आज कोणताही व्यावसायिक किंवा कंपनी, मग ती मोठी असो वा लहान त्यांचे ऑनलाईन अस्तित्व वाढवण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळे एक सोशल मीडिया कन्सलटंट म्हणून पार्ट टाईम किंवा फुलटाईममध्ये पैसे कमवण्याची उत्तम संधी आहे, परंतु या व्यवसायात येण्याअगोदर काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.

    सोशल मीडिया कन्सलटंट बनण्यासाठी आवश्यक बाबी : 

    1. सोशल मीडिया कन्सलटंटला प्रत्येक सोशल मीडिया टूलच्या साधक बाधक गोष्टींबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे. हे ज्ञान केवळ फेसबूक किंवा ट्विटरपुरते मर्यादित नसावे. त्यांनी नफा मिळवण्याच्या व व्यवसायाच्या गुंतवणुकीवर परतावा (ROI) देण्याच्या धोरणांमध्येदेखील सर्जनशील असावे. 
    2. एक सोशल मीडिया तज्ज्ञाने योग्य डावपेच आखण्याइतपत विश्लेषणात्मक असावे. तसेच चांगले परिणाम मिळवण्यासाठी त्यामध्ये वेळोवेळी योग्य बदल करण्याचे कौशल्यही आत्मसात करावे.
    3. एक सोशल मीडिया तज्ज्ञाने योग्य डावपेच आखण्याइतपत विश्लेषणात्मक असावे. तसेच चांगले परिणाम मिळवण्यासाठी त्यामध्ये वेळोवेळी योग्य बदल करण्याचे कौशल्यही आत्मसात करावे.
    4. एक सोशल मीडिया सल्लागार म्हणून आपल्या ग्राहकाचा व्यवसाय, त्यांचे संभाव्य ग्राहक, सोशल मीडिया प्रेझेन्स, सध्याची वर्तमान सोशल मीडिया धोरणे व संबंधित इतर माहिती असणे आवश्यक असते. 
    5. ग्राहकाची सोशल मीडिया रणनीती, त्यांच्या कमजोर बाबी व अन्य समस्या निवारणाबद्दल नि:पक्षपाती मत तयार करण्यासाठी सोशल मीडिया सल्लागाराकडे विशेष कौशल्य असावे लागते.
    6.  सोशल मीडियाद्वारे व्यवसायवृध्दीचे धोरण तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले पाहिजे. 
    7. एक सल्लागार म्हणून सोशल मीडियावरील फॉलोअर्सच्या डेटाचे विश्लेषण करता आले पाहिजे. 
    8. सोशल मीडिया सल्लागार हे आपल्या ग्राहकाच्या सोशल मीडिया उपक्रमांमध्ये विविध डावपेच आखत व सतत नवीन प्रयोग करत असतात. त्यामध्ये सोशल मीडियामधील सध्याचे ट्रेंडस व बदलांचे परीक्षण करणे, प्रभावी ऑनलाईन मार्केटिंगचे धोरण बनवताना सोशल मीडिया माध्यमांचा व आपल्या मार्केटिंग ज्ञानाचा प्रभावी वापर करणे या गोष्टींचा समावेश असतो. 
    9. मार्केटिंग योजनांमध्ये विविध तंत्राचा कसा वापर करावा याचे व्यवस्थापन करणे शिकले पाहिजे. 
    10. ग्राहकाच्या फायद्यासाठी त्यांच्या व्यवसायातील सर्वोत्तम योजनांचे मूल्यांकन व त्यांची अंमलबजावणी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सोशल मीडिया सल्लागाराचे असते. 
    11. ऑनसाईट कामकाजाच्या माध्यमातून ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा पुरवणे, त्यांच्या गरजा समजून घेणे हे कौशल्य विकसित करावे लागते. 

    एक परिपूर्ण सोशल मीडिया सल्लागार होण्यासाठी वरील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. 

    सध्याच्या काळात आपल्या व्यवसायास ऑनलाईन अस्तित्व प्रदान करण्यासाठी उद्योजक सोशल मीडियाचा चांगल्यापैकी उपयोग करतात. परिणामी आजच्या काळात अनेक उद्योजक कंपन्याचे ऑनलाईन किंवा सोशल मीडिया Presence प्रभावशाली करण्यासाठी त्यांना सोशल मीडिया सल्लागारांची गरज असते. त्यामुळे सोशल मीडिया सल्लागार म्हणून व्यवसाय करण्यासाठी एक उत्तम संधी आहे. संधीचा फायदा अवश्य घ्या आणि करिअरच्या दृष्टीकोनातून याचा नक्की विचार करा. 

    आणखी वाचा :

  • मुंबईची झोपडपट्टी ते दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय | The richest Indian in Dubai – Rizwan Sajan’s

    मुंबईची झोपडपट्टी ते दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय | The richest Indian in Dubai – Rizwan Sajan’s 

    भारतात अनेक उद्योगपती आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीने एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. काहींच्या हातात वारसा संपत्ती नसली तरी, त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कमावले आहे. अशाच एका यशस्वी उद्योगपतीची गोष्ट आज आम्ही सांगणार आहोत, जो मुंबईतील घाटकोपरच्या झोपडपट्टीत राहत होता आणि छोट्या-छोट्या नोकऱ्या करीत जीवनाची गाडी पुढे नेत होता. आज तो दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीयांमध्ये गणला जातो आणि त्यांचा व्यवसाय केवळ दुबईतच नाही, तर इतर अनेक देशांमध्येही पसरलेला आहे.

    सुरुवातीचे दिवस आणि संघर्ष

    रिझवान साजन यांचा जन्म मुंबईच्या घाटकोपरमधील एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांचं कुटुंब झोपडपट्टीत राहायचे. आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं फार कठीण होत होतं. त्यामुळे, साजन यांनी लहानपणापासूनच कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावण्याचं ठरवलं  होतं. त्यांनी शाळेतील पुस्तकं विकणं, सणासुदीच्या वस्तू विकणं, घरोघरी जाऊन दूध विकणं अशी छोटी छोटी कामं लहानपणीच  करण्यास सुरुवात केली. 

    वयाच्या अवघा १६व्या वर्षीच रिझवान साजन एक मोठा धक्का बसला,त्यांच्या वडिलांचं अचानक निधन झालं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण आर्थिक जबाबदारी साजन यांच्यावर आली आणि याचा परिणाम  म्हणून त्यांना शिक्षण मधूनच सोडावं  लागलं. काही काळ त्यांनी एक छोटा व्यवसाय सुरू केला, ज्यात ते फाईल बॉक्सेस बनवायचे. सुरुवातीला या व्यवसायात थोडंफार  यश मिळाले, पण पुरेसं नव्हतं. 

    कुवेतमध्ये मिळाली सुवर्णसंधी

    रिझवान साजन यांचे काका तेव्हा कुवैतमध्ये नोकरी करत होते, कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी साजन यांनी आपल्या काकांकडे कुवेतमध्ये नोकरीसाठी विचारणा केली. त्यांच्या काकांनी त्यांना एका बांधकाम साहित्याच्या दुकानात नोकरी मिळवून दिली. ही संधी साजन यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण वळण ठरली. त्यांनी या नोकरीत एक विक्रेता म्हणून काम सुरू केलं, आणि त्यांच्या मेहनतीने त्यांना त्या ठिकाणी लवकरच व्यवस्थापकाची पदवी मिळाली. 

    १९९० साली  पुन्हा त्यांच्या  जीवनाला एक  जोरदार  धक्का मिळाला . कुवेतमध्ये भीषण आखाती युद्ध सुरू झालं आणि त्यांना  कुवेत सोडावं लागलं आणि पुन्हा भारतात परतावं  लागलं. परत आल्यावर त्यांनी काही नोकऱ्या करून पहिल्या, पण यश मिळवण्यासाठी त्यांच्या मनात काहीतरी मोठं करण्याची इच्छा होती. काही काळ भारतात राहिल्यानंतर त्यांनी दुबईला जाण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना दुबईत बांधकाम उद्योगात मोठी संधी दिसत होती.

    The richest Indian in Dubai - Rizwan Sajan's 

    दुबईत ‘डॅन्यूब ग्रुप’ची स्थापना 

    १९९३ मध्ये दुबईला गेल्यावर रिझवान साजन यांनी ‘डॅन्यूब’ नावाची ट्रेडिंग फर्म सुरू केली. हि कंपनी कुवेतमधून बांधकाम साहित्य खरेदी करायची  आणि दुबईमध्ये त्याची विक्री करायची. दुबईमध्ये बांधकाम उद्योगाची प्रचंड वाढ होत होती, आणि त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला जोरदार प्रतिसाद मिळाला. साजन यांच्या सर्जनशील स्वभावामुळे  आणि मेहनतीमुळे ‘डॅन्यूब’ ने अवघ्या काही वर्षांतच मोठं यश मिळवलं.

    १९९९ पर्यंत ‘डॅन्यूब’ चा वार्षिक महसूल १६ कोटी रुपये झाला होता, आणि ते १ कोटी रुपयांचा नफा मिळवत होते. पण साजन इथेच थांबले नाहीत. त्यांनी बांधकाम साहित्याबरोबरच गृहसजावट, सॅनिटरीवेअर, इलेक्ट्रिकल उपकरणे यांसारख्या विविध क्षेत्रांत विस्तार केला.

    रिअल इस्टेटमध्ये पाऊल

    २००८ मध्ये जागतिक आर्थिक संकट आलं , पण साजन यांच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही उलट त्यांनी आपला व्यवसाय वाढवण्याचं ठरवलं आणि २०१४ मध्ये ‘डॅन्यूब प्रॉपर्टीज’ नावाची रिअल इस्टेट कंपनी लाँच केली. त्यांचा उद्देश मध्यमवर्गीयांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा होता. ‘डॅन्यूब प्रॉपर्टीज’ ने बाजारात एक क्रांतिकारी योजना आणली — “1% मासिक पेमेंट योजना” या योजनेत खरेदीदारांना घर खरेदीसाठी फक्त 1% रक्कम दरमहा भरण्याची मुभा  होती आणि त्यांना घरमालकीचा हक्क मिळत होता.

    या योजनेने घर खरेदीदारांसाठी घरमालकीचा मार्ग सोपा केला आणि अल्पावधीतच ‘डॅन्यूब प्रॉपर्टीजचं नाव बाजारात लोकप्रिय झालं. या योजनेमुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळाले आणि २०१६ पर्यंत ‘डॅन्यूब’चा वार्षिक महसूल ९००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. साजन यांनी रिअल इस्टेटमध्ये आपले स्थान मजबुत  केलं आणि आज ‘डॅन्यूब ग्रुप’ १६,७०९ कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळवणारी कंपनी आहे. रिझवान साजन यांनी आपल्या अपार मेहनत आणि हुशारीच्या जोरावर ‘डॅन्यूब’ला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं आणि त्यांची उपस्थिती जगभरातील ३० पेक्षा जास्त देशांत आहे.

    रिझवान साजन यांची कहाणी ही एका सामान्य माणसाच्या असामान्य संघर्षाची आणि यशाची कहाणी आहे.

    मुंबईच्या झोपडपट्टीतून सुरु झालेला हा प्रवास दुबईतील यशाच्या शिखरापर्यंत पोहोचला. त्यांनी कठीण परिस्थितीतही हार न मानता स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांच्या जिद्दीने, मेहनतीने बुद्धिमत्तेमुळे ते आज जागतिक स्तरावर यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात . 

    आणखी वाचा

  • ५,००० रुपये उसने घेऊन उभारली १७,००० कोटींची कंपनी: पी. रामचंद्रन यांचा संघर्ष आणि “उजाला” साम्राज्य.

    ५,००० रुपये उसने घेऊन उभारली १७,००० कोटींची कंपनी: पी. रामचंद्रन यांचा संघर्ष आणि “उजाला” साम्राज्य.

    प्रत्येक यशोगाथेमध्ये एक संघर्षाची कथा असते. अनेक वेळा मोठं यश मिळवण्यासाठी आयुष्यात चढ-उतार आणि अडचणी येतात. पण काही लोक असतात, जे या सर्व अडचणींवर मात करून आपला कर्तृत्वाचा ठसा उमटवतात. त्यांचा जीवन प्रवास आपल्याला हे शिकवतो की यश हे फक्त मेहनत, चिकाटी आणि नवकल्पना यावरच आधारित असतं . “उजाला सुप्रीम” या लोकप्रिय ब्रँडचे संस्थापक एम.पी. रामचंद्रन यांची कथा अशीच एक प्रेरणादायक आणि संघर्षपूर्ण गाथा आहे.

    या लेखात आपण त्यांच्या जीवनातील संघर्ष, कठोर परिश्रम, आणि एक मोठं व्यवसाय साम्राज्य उभारण्याचा प्रेरणादायक प्रवास जाणून घेणार आहोत.

    प्रारंभिक जीवन आणि संघर्ष 

    एम.पी. रामचंद्रन यांचा जन्म १९५० साली केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात झाला. त्यांचं बालपण आर्थिक संघर्षात गेलं , त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं . परंतु, त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट शिकली ती म्हणजे आयुष्य आपले  कष्ट आणि इच्छाशक्तीवर अवलंबून असतं .

    शाळेचं शिक्षण पूर्ण केल्यावर रामचंद्रन यांनी एका कंपनीत लेखापाल म्हणून नोकरी केली. मात्र, त्यांना स्वतःचं काहीतरी मोठं साध्य करायचं होतं. हा प्रवास सोपा नव्हता,  त्यांना यश मिळवण्यासाठी काहीतरी वेगळं करायचं होतं. लेखापाल म्हणून काम करत असताना, त्यांच्या मनात एक व्हाईटनर मिश्रण तयार करण्याची कल्पना आली. व्हाईटनर म्हणजे कपड्यांवरील डाग दूर करण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ. त्यांनी त्यांच्या स्वयंपाकघरातच या मिश्रणावर प्रयोग सुरू केले, मात्र त्यात अपेक्षित गुणवत्ता साधता येत नव्हती.

    एके दिवशी, त्यांनी एका रासायनिक उद्योगावरील मासिकात एक लेख वाचला ज्यामध्ये जांभळ्या रंगाच्या वापरामुळे कपडे अधिक स्वच्छ धुतले जाऊ शकतात, असं म्हटलं होतं. हा लेख वाचल्यानंतर त्यांच्या मनात नवीन कल्पना आली. त्यांनी या विचारावर प्रयोग सुरू केले, आणि त्यांना हवे तसे परिणाम मिळाले. स्वयंपाकघरात सुरू झालेला त्यांचा हा प्रयोग आता एका मोठ्या उद्योगात बदलू लागला होता. 

    व्यवसायाची स्थापना 

    १९८३ मध्ये रामचंद्रन यांनी आपल्या पहिल्या मुलीच्या नावावरून “ज्योती लॅबोरेटरीज” हा व्हाईटनर उत्पादन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांना असं वाटलं की एक संस्कृतीप्रधान नाव त्यांच्या व्यवसायाला एक वेगळा आणि भावनिक स्पर्श देईल . त्यामुळे त्यांनी आपल्या नव्या कंपनीचं नाव “ज्योती लॅबोरेटरीज” ठेवलं. आपला व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांनी आपल्या भावाकडून फक्त ५००० रुपयांचं कर्ज घेतलं आणि त्याच तुटपुंज्या भांडवलावर त्यांनी कारखाना सुरू केला.

    ज्योती लॅबोरेटरीजचं पहिलं उत्पादन “उजाला सुप्रीम” हे लिक्विड फॅब्रिक व्हाईटनर होतं. हे एक साधं पण प्रभावी उत्पादन होतं, जे कपड्यांना अधिक पांढरे, स्वच्छ आणि तेजस्वी बनवण्यासाठी वापरलं जातं. रामचंद्रन यांना समजलं होतं की गृहिणी हा त्यांच्या मुख्य ग्राहकवर्ग असेल. त्यामुळे त्यांनी उत्पादन विक्रीसाठी सहा महिलांना कामावर ठेवलं, ज्या घरोघरी जाऊन “उजाला” विकू लागल्या. त्यांच्या विक्रीसाठीचा संदेश सोपा आणि प्रभावी होता- तो म्हणजे “उजल्याचे फक्त चार थेंब वापरून तुमच्या  कपड्यांना चमकदार बनवा”.

    रामचंद्रन यांची ही युक्ती ग्राहकांच्या मनात घर करू लागली, आणि “उजाला”ला पहिल्या वर्षातच चांगला प्रतिसाद मिळाला. वर्षाच्या अखेरीस, ज्योती लॅबोरेटरीजने १४४० रुपयांचा नफा मिळवला आणि विक्रीचा आकडा ४०,००० रुपयांपर्यंत पोहोचला. रामचंद्रन यांच्या दृढनिश्चयाने आणि कल्पकतेने ज्योती लॅबोरेटरीजला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या साध्या पण परिणामकारक मार्केटिंग पद्धतीमुळे, कंपनीला अल्पावधीतच मोठं यश मिळालं. “उजाला”च्या यशामुळे रामचंद्रन यांनी आपल्या व्यवसायाला पुढे नेण्याची प्रेरणा घेतली, आणि पुढील काळात ज्योती लॅबोरेटरीज अनेक यशस्वी उत्पादनांसह एक यशस्वी ब्रँड म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

    व्यवसायातील स्पर्धेवर मात 

    व्यवसाय करताना रामचंद्रन यांना मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागले. रेकिट बेंकीझर कंपनीच्या ‘रॉबिन ब्लू’ या उत्पादनाने भारतीय बाजारात आपली पायाभरणी केली होती. यशस्वी होण्यासाठी रामचंद्रन यांना काहीतरी वेगळं करण्याची गरज होती. त्यांनी पारंपरिक ‘पावडर ब्लू’ ऐवजी ‘लिक्विड ब्लू’ तयार केलं आणि हे उत्पादन फक्त १ रुपयांपासून ४५ रुपयांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध करून दिलं.

    त्यानंतर, त्यांनी “चार बूंदों वाला, आया नया उजाला” ही जाहिरात तयार केली, जी खूपच लोकप्रिय झाली. ही जाहिरात घराघरात पोहोचली आणि प्रत्येक गृहिणीची पसंद बनली. अल्पावधीतच ‘उजाला’ हा एक मोठा ब्रँड बनला, आणि १९९७ मध्ये ‘उजाला’ने १०० कोटी रुपयांच्या विक्रीची यशस्वी कामगिरी केली.

    यानंतर १९९६ मध्ये डेंग्यूच्या प्रादुर्भावामुळे रामचंद्रन यांना मच्छरांपासून संरक्षण देणाऱ्या उत्पादनाची आवश्यकता भासली. त्यामुळे त्यांनी ३५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून ‘मॅक्सो’ हे उत्पादन बाजारात आणले. हे उत्पादन देखील खूप लोकप्रिय ठरलं आणि पुढे ‘मॅक्सो’ हा ३०० कोटी रुपयांचा ब्रँड बनला.

    विस्तार आणि नवा टर्निंग पॉइंट: Henkel AG & Co.ची भागीदारी

    2011 मध्ये ‘ज्योती लॅबोरेटरीज’ने एक मोठं पाऊल उचलत जर्मन FMCG (Fast-moving consumer goods) कंपनी ‘Henkel AG’च्या भारतातील व्यवसायातील ५०.९७% हिस्सेदारी ६१७ कोटी रुपयांना खरेदी केली. ही खरेदी ज्योती लॅबोरेटरीजसाठी एक महत्त्वपूर्ण टर्निंग पॉइंट ठरली, ज्यामुळे कंपनीला भारतीय FMCG उद्योगात आपलं स्थान मजबूत करण्यासाठी भक्कम आधार मिळाला.

    ‘ज्योती लॅबोरेटरीज’ने या संधीचा लाभ घेत आपल्या उत्पादनांना वाढवलं, विक्रीत चांगली वाढ साधली आणि वितरण नेटवर्क अधिक विस्तारित केलं.  या विकासामुळे कंपनीने २०१३ मध्ये १०१७.३८ कोटी रुपयांची विक्री केली आणि ८३.१४ कोटी रुपयांचा नफा कमवला आणि  त्यांची उत्पादने भारतातील 29 लाख दुकांनांमध्ये उपलब्ध झाली.

    आज, ‘ज्योती लॅबोरेटरीज’चा वार्षिक महसूल २७५७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे आणि कंपनी ३६९ कोटी रुपयांचा नफा कमावते आहे. त्यांच्याकडे २३ कारखाने असून २५ हून अधिक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. उजला सुप्रीम, मॅक्सो, एक्सो डिश वॉश, प्रिल डिश वॉश, मिस्टर व्हाईट, आणि मार्गो बॉडी सोप ही त्यांची प्रमुख उत्पादने भारतीय ग्राहकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत.

    ‘ज्योती लॅबोरेटरीज’ने आता राष्ट्रीय स्तरावर आपला व्यवसाय स्थिर केला असून . ‘उजला’ आणि ‘मॅक्सो’ यांसारखी उत्पादने संपूर्ण भारतात लोकप्रिय झाली आहेत. मोठ्या FMCG कंपन्यांशी स्पर्धा करताना ‘ज्योती लॅबोरेटरीज’ने भारतातील FMCG क्षेत्रात आपली खास ओळख निर्माण केली आहे, आणि आता P&G व HUL सारख्या दिग्गज कंपन्यांना थेट स्पर्धा देत आहे.

  • 3 वर्षे शेती करून उभी केली 1200 कोटींची कंपनी जाणून घ्या या “ॲग्री स्टार्टअप” ची कहाणी

    3 वर्षे शेती करून उभी केली 1200 कोटींची कंपनी जाणून घ्या या “ॲग्री स्टार्टअप” ची कहाणी

    अलिकडच्या काळात शेती क्षेत्रात सातत्यानं बदल होत आहेत. अनेक तरुण करिअर म्हणून देखील शेतीकडे पाहू लागले आहेत. बरेचसे शिक्षित तरुण आधुनिक शेतीची माहिती घेऊन शेतीकडे वळत आहेत व पारंपरिक शेतीपेक्षा कित्येक पटींनी अधिक उत्पन्न घेत आहेत. राजस्थानच्या जयपूरमध्ये राहणाऱ्या ऋतुराज शर्मा या 33 वर्षाच्या तरुणाने देखील शेतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. शेतीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधत या तरुणाने करोडो रुपयांची Zettafarms नावाची कंपनी स्थापन केली आहे.  

    गुडगावमध्ये ही कंपनी असून कॉर्पोरेट शेतीमध्ये कार्यरत आहे. कंपनी भाडेतत्त्वावर जमीन घेते आणि त्यात धान्य, फळं आणि भाजीपाला पिकवते. या कंपनीचे संस्थापक ऋतुराज शर्मा यांनी B.Tech आणि MBA केल्यानंतर नोकरीऐवजी स्वत:चं Startup सुरू केलं.  कंपनीचा उद्देश शेती अधिक फायदेशीर बनवणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे आहे. शेतकऱ्यांच्या तांत्रिक आणि आर्थिक समस्या कमी करून आधुनिक शेती पद्धतीचा वापर करून शेतीचे उत्पादन अधिक वाढवणे हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे

    Zettafarms चे काम कसे चालते? 

    Zetta Farms शेतीला एका व्यावसायिक कंपनी प्रमाणे चालवते. एका कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे  फायनान्स, ऑपरेशन्स, IT अशी सर्व खाती या कंपनीत देखील आहेत. मोठ्या प्रमाणावर शेतजमीन भाडेतत्वावर घेऊन सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्यावर शेती केली जाते. कुठले पीक किती प्रमाणात घ्यावे. कुठल्या पिकाला अधिक भाव मिळेल या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच पिके घेतली जातात. शेती करण्यासाठी कंपनीने शेतकऱ्यांनाच नोकरीवर ठेवले आहे, ज्याच्या बदल्यात त्यांना प्रत्येक महिन्याला ठराविक पगार मिळतो. कंपनी कायदेशीर असल्यामुळे शेतकऱ्यांचा PF देखील जमा होतो. याशिवाय कंपनी शेतकऱ्यांना मोफत इन्शुरन्स देखील देते. आज रोजी कंपनीमध्ये जवळपास २९०० कर्मचारी काम करतात.

    Zettafarms चा 15 राज्यांमध्ये विस्तार 

    Zettafarms ही कंपनी करारावर किंवा भाडेतत्त्वावर शेती करते. ज्यामध्ये ते किमान 50 एकर जमीन एका व्यक्तीकडून आणि 100 एकर जमीन एका गटाकडून भाडेतत्त्वावर घेतात. त्यानंतर त्या जमिनीवर ते शेती करतात. झेटाफार्म्स सध्या 15 राज्यांमध्ये 20 हजार एकर जमिनीवर शेती करत असून ६० पेक्षा जास्त पिकांचे उत्पादन घेते. पिकांमध्ये ते गहू, हरभरा, धान, कडधान्ये, भाजीपाला, फळे, चहा आणि कॉफीच्या मळ्यासह सर्व प्रकारची शेती केली जाते.

    ऋतुराजने शेती हा यशस्वी व्यवसाय कसा बनवला?

    ऋतुराज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतीमध्ये व्यवसाय, अर्थशास्त्र, गणित आणि विज्ञान यांचा समावेश केला, तर तो कोणत्याही परिस्थितीत फायदेशीर व्यवसाय आहे. या विचाराने ऋतुराजने शेतीमध्ये पाऊल टाकले. सुरुवातीला ऋतुराजने फक्त 2 एकर शेती करायला सुरूवात केली. हळूहळू भाडेतत्त्वावर आणि करारावर जमीन घेऊन व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. ऋतुराजच्या कंपनीला पहिल्या वर्षी फक्त 1 लाख रुपयांचा नफा झाला, पण नंतर त्यांनी झपाट्याने काम वाढवले. 

    Zettafarms

    Zettafarms चे यशाचे रहस्य काय?

    एका ठिकाणी केवळ एकाच पिकाची शेती हानीकारक असू शकते. या विचारसरणीवर काम करत Zettafarms हे पीक विविधतेवर काम करते. ते वेगवेगळ्या भागात विविध प्रकारची शेती करतात. शेतीसाठी ते नवीन तंत्रज्ञान वापरतात ज्यामध्ये ते माती परीक्षणापासून इतर गोष्टींपर्यंत आवश्यक माहिती गोळा करतात. तंत्रज्ञानामध्ये, ते हवामान apps आणि क्रॉप मॉनिटरिंगसह विविध प्रकारच्या माहितीचे विश्लेषण वापरतात. झेटाफार्म्स गरजेनुसार सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करतात, कुठे ठिबक सिंचनाची गरज भासल्यास तिथेही तेच काम केले जाते. याशिवाय कुठे पाणी कमी असल्यास कमी पाण्यात पिके घेण्याच्या नियोजनावर काम केलं जातं 

    ते संसाधनांचा योग्य वापर करतात. ज्यामुळं उत्पादन वाढते आणि नफाही वाढतो. पीक विविधीकरणाव्यतिरिक्त ते Risk Management वर देखील काम करतात.

    औषधे, खते किंवा किटकनाशके वापरताना ते कीटक व्यवस्थापनाच्या पद्धती देखील अवलंबतात. ज्यामुळं खर्च कमी होतो आणि शेतीमध्ये कमी रसायने वापरली जातात. 

    भविष्यातील वाटचाल : 

    ऋतुराज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतीला ते एक यशस्वी व्यवसाय म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या व्यवसाय मॉडेलद्वारे ते लोकांना सांगू इच्छित आहेत की, शेतीतूनही करोडोंची कमाई केली जाऊ शकते. आयटी, फायनान्स आणि इतर क्षेत्रात काम करणे ज्याप्रमाणे लोक अभिमानाची गोष्ट मानतात, त्याचप्रमाणे लोकांना शेती आणि शेतकऱ्यांबद्दल आदराची भावना निर्माण झाली पाहिजे. 2030 पर्यंत 50 हजार एकरांवर शेती करण्याचे ऋतुराज शर्मा यांचे ध्येय आहे. शेतकरी, जमीनीचे मालक, स्टार्टअप्स, शेती पूरक व्यवसाय आणि शेती उपकरणे पुरवठादार यांना जोडणारे कृषी अर्थव्यवस्थेचे केंद्र बनून झेट्टा फार्म्स कृषी क्षेत्रात स्वतःच्या कार्याने बहुमूल्य योगदान देत आहेत. 

    आणखी वाचा