Author: naviarthkranti

  • पोस्ट ऑफिसच्या 5 सर्वोत्तम बचत योजना: सुरक्षित गुंतवणुकीसाठी उत्कृष्ट पर्याय

    पोस्ट ऑफिसच्या 5 सर्वोत्तम बचत योजना: सुरक्षित गुंतवणुकीसाठी उत्कृष्ट पर्याय

    मित्रांनो, पैशांची बचत आणि गुंतवणूक आपल्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. आपण कामातून कमावलेला पैसा फक्त आजच्याच गरजांसाठी उपयोगी पडत नाही, तर भविष्यातील गरजा आणि अडचणींना तोंड देण्यासाठी सुरक्षित गुंतवणूक करण्याची आवश्यकता असते. गुंतवणूक ही एक जबाबदारी असते ज्यामध्ये आपल्याला दीर्घकालीन स्थैर्य, चांगला परतावा आणि सुरक्षितता यांचा समतोल साधावा लागतो. बऱ्याच जणांना गुंतवणुकीच्या बाबतीत अनेक शंका असतात. पैसा कुठे गुंतवायचा, परतावा किती मिळणार आणि गुंतवणुकीचा धोका किती आहे.

    आपण बऱ्याचदा सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असतो. जिथे आपले पैसे दीर्घकाळ सुरक्षित राहतील आणि त्यावर चांगले व्याज मिळेल. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजना सुरक्षित गुंतवणूक पर्याय ठरतात. पोस्ट ऑफिसच्या या योजना कमी जोखीम असलेल्या असतात आणि सरकारच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे त्या पूर्णपणे सुरक्षित असतात. त्यामुळे तुमच्यासाठी या योजना एक उत्तम पर्याय ठरू शकतात.

    या लेखात आपण पोस्ट ऑफिसच्या पाच प्रमुख योजनांवर नजर टाकूया, ज्या तुमच्या गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय ठरू शकतात.

    1. किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra – KVP)

    किसान विकास पत्र ही एक सुरक्षित आणि आकर्षक गुंतवणूक योजना आहे. या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर तुम्हाला 7.5% वार्षिक व्याज मिळते आणि विशेष म्हणजे 115 महिन्यांनंतर म्हणजेच साधारणपणे 9 वर्षे 7 महिन्यांत तुमची रक्कम दुप्पट होते. ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. 18 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. तसेच, जर एखाद्या अल्पवयीन व्यक्तीला गुंतवणूक करायची असेल, तर त्याच्या पालकांच्या नावावर खाते उघडले जाऊ शकते. किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक केल्याने आपले पैसे दीर्घकाळ सुरक्षित राहतील आणि त्याच वेळी ठरलेला परतावा मिळेल.

    2. नॅशनल सेविंग्ज टाईम डिपॉजिट अकाउंट (National Savings Time Deposit – TD)

    नॅशनल सेविंग्स टाईम डिपॉजिट योजना ही अल्प आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना एक वर्षासाठी 6.9%, दोन वर्षासाठी 7%, तीन वर्षासाठी 7.1% आणि पाच वर्षासाठी 7.5% व्याज मिळते. गुंतवणुकीसाठी किमान रक्कम 1,000 रुपये आहे, जी सामान्य लोकांसाठी अगदी परवडणारी आहे. यामध्ये तुम्ही गुंतवलेले पैसे सहा महिन्यांपूर्वी काढता येणार नाहीत आणि एक वर्षाच्या आत काढल्यास फक्त साध्या बचत खात्याचे व्याज मिळेल. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आणि सुरक्षित परताव्यासाठी ही योजना खूपच फायदेशीर ठरू शकते.

    3. वरिष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizens Savings Scheme – SCSS)

    वरिष्ठ नागरिकांसाठी SCSS योजना विशेषतः उपयुक्त आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी 8.2% व्याज दराने परतावा मिळतो, जो बाजारातील इतर योजनांच्या तुलनेत खूपच आकर्षक आहे. या योजनेत किमान 1,000 रुपये गुंतवून खाते उघडता येते आणि जास्तीत जास्त 30 लाख रुपये गुंतवता येतात. 60 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सर्वात योग्य आहे, तसेच निवृत्ती घेतलेल्या आणि वयाच्या 55 ते 60 वर्षांदरम्यान असलेल्या व्यक्तींनाही ही योजना उपलब्ध आहे. या योजनेचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो, परंतु तो मुदतीनंतर वाढवता येतो. सुरक्षित गुंतवणूक आणि नियमित परताव्याच्या शोधात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरते.

    4. नॅशनल सेविंग्ज सर्टिफिकेट (National Savings Certificate – NSC)

    नॅशनल सेविंग्ज सर्टिफिकेट योजना कमी जोखीम असलेल्या गुंतवणुकीसाठी उपयुक्त आहे. सध्या या योजनेत 7.7% व्याजदर देण्यात येतो. या योजनेत गुंतवलेली रक्कम 5 वर्षांपर्यंत ठेवली जाते, ज्यामुळे तुमच्या गुंतवणुकीसाठी दीर्घकालीन फायद्याचा पर्याय ठरतो. याशिवाय, आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर करसवलत मिळते. कमी जोखीम आणि दीर्घकालीन परतावा देणारी ही योजना सुरक्षित गुंतवणुकीसाठी आदर्श मानली जाते.

    5. पब्लिक प्रॉविडेंट फंड (Public Provident Fund – PPF)

    पब्लिक प्रॉविडेंट फंड ही एक सर्वात लोकप्रिय आणि दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. या योजनेत तुम्ही किमान 500 रुपये गुंतवू शकता, आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये दरवर्षी गुंतवले जाऊ शकतात. 15 वर्षांच्या मुदतीनंतर तुमच्या गुंतवणुकीला 5 वर्षांची वाढ मिळवण्यासाठी संधी दिली जाते. याशिवाय, PPF अंतर्गत तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत करसवलत देखील मिळते. आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही या योजनेतून पैसे काढू शकता किंवा शिल्लक रकमेवर कर्ज घेऊ शकता. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आणि करमुक्त परताव्यासाठी PPF योजना अत्यंत फायदेशीर आहे

    पोस्ट ऑफिसच्या या योजना गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित, लाभदायक आणि दीर्घकालीन परतावा देणाऱ्या आहेत. कमी जोखीम आणि ठरलेला परतावा हवे असल्यास, पोस्ट ऑफिसच्या योजना तुमच्यासाठी योग्य ठरतील. तुमच्या गरजांनुसार योग्य योजना निवडून सुरक्षित गुंतवणूक करा आणि तुमच्या भविष्याच्या आर्थिक स्थैर्यासाठी योग्य पाऊल उचला.

    हे पण वाचा:

  • ना घरच्यांचा आधार, ना समाजाची मदत तरीही उभा केला करोडोंचा व्यवसाय… 

    ना घरच्यांचा आधार, ना समाजाची मदत तरीही उभा केला करोडोंचा व्यवसाय… 

    आपण भारतीय म्हणून एकत्रितपणे जगात भारताचा झेंडा फडकावण्याच्या तयारीत आहोत आणि म्हणूनच इथे आपापसात असलेल्या स्पर्धेला जागा नाही. भातातील अनेक महिला सध्या उद्योजकतेच्या मार्गावर यशस्वीपणे मार्गक्रमण करीत आहेत, पैकी झिवामेच्या सर्वेसर्वा म्हणजेच रिचा कर यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. रिचा कर या केवळ यशस्वी उद्योजिका आहेत म्हणून त्यांचा प्रवास जाणून घ्यावा का? नाही! रिचा यांनी सुरु केलेला व्यवसाय कोणत्या क्षेत्रातील आहे, हा प्रवास खडतर का होता, त्यांनी किती खस्ता खाल्ल्या आहेत हे समजून घेण्यासाठी त्यांचा प्रवास जाणून घेतला पाहिजे. 

    रिचा कर: बालपण आणि शिक्षण

    रिचा कर यांचा जन्म १७ जुलै १९८० रोजी झारखंडमधल्या जमशेदपूर या शहरात झाला. इतर मध्यमवर्गीय घरांप्रमाणेच रिचा यांचे वडील नोकरी करायचे, तर आई घर सांभाळत असे, मात्र तरीही हे कुटुंब शिक्षणाचे महत्व जाणून होतं आणि रिचावर देखील हेच संस्कार करण्यात आले. परिणामी लहानपणापासूनच रिचाला शिक्षणाप्रती आदर वाटायचा आणि म्हणूनच त्यांनी BITS पिलानीमधून पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यावर रिचा यांनी अभियांत्रिकी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर ऍनालिस्ट (Software Analyst) म्हणून कामाला सुरूवात केली. नोकरी पत्करली असली तरीही नेहमीच त्यांच्या मनात Out of the Box जाऊन नाव कमावण्याची इच्छा होती. इतरांप्रमाणे ९ ते ६ काम करून खुश होणाऱ्यांपैकी त्या नव्हत्या आणि म्हणूनच नोकरीसोबत त्यांनी NMIMS मधून MBAची पदवी मिळवली. ही पदवी मिळवल्यानंतर अपेक्षित अनुभव देखील मिळवला. व्यवसाय म्हणजे काय? व्यवसाय कसा करावा? व्यवसाय करताना कोणते धोके येऊ शकतात? अशी बरीच महत्वाची माहिती मिळवून जन्म झाला तो झिवामेचा (Zivame)

    झिवामेचा खडतर प्रवास:

    झिवामेचा प्रवास इतरांपेक्षा खडतर का? कारण झिवामे हा ब्रँड महिलांसाठी बनणाऱ्या अंडरगार्मेंन्ट्सची (Undergarments) ऑनलाईन विक्री करतो. समाज कितीही बदलला असला तरीही काही बदल जोपर्यंत प्रत्येक माणूस मनापासून  समजून आणि उमजून करत नाही तोपर्यंत समाज बदलणार नाही. अंडरगार्मेंन्ट्स म्हटलं की, उगाच शरमेने आपण त्याबद्दल बोलायचे बंद होतो आणि विशेषकरून महिलांच्या अंडरगार्मेंन्ट्स बद्दल कुठेही चर्चा केली जात नाही. अशा प्रकारच्या सामाजिक चौकटीत रिचा यांनी मात्र सर्व बंधनं तोडून पुढे जाण्याचा विचार पक्का केला होता. 

    व्यवसाय म्हटलं की किती पैसे गुंतवले जाणार? गुंतवलेली रक्कम परत मिळेल का? व्यवसाय यशस्वी होईल का? असे प्रश्न उपस्थित केले जातात मात्र रिचा कर यांनी सुरु केलेल्या व्यवसायासमोर असलेली प्रश्नपत्रिका वेगळीच होती. समाजाने या व्यवसायावर प्रश्नचिन्ह उभं करण्याआधीच त्यांच्या घरून आणि दुर्दैवाने त्यांच्या आईकडूनच सर्वात अगोदर या व्यवसायाला नावं ठेवण्यात आली. “मी काय माझी मुलगी ब्रा विकते असं सांगायचं का?” असं म्हणत त्यांनी मुलीच्या स्वप्नांना बळ द्यायच्या जागी उलटं मागे खेचलं. मुलगी समाजाच्या चौकटीबाहेर जात काही तरी वेगळं करू पाहतेय यासाठी तिचं कौतुक करण्याच्या जागी आईकडून लोकं काय बोलतील यावरच जोर देण्यात आला. कुठल्याही मुलीसाठी तिची आई ही आधारस्तंभ असते. असं म्हणतात दोन महिलांचं आपापसात कधीही पटत नाही, मात्र या उक्तीला फोल ठरवणारं एकमेव नातं असतं ते म्हणजे  आई आणि मुलीचं नातं. रिचा कर यांची आईच त्यांच्या विरोधात उभी असल्याने व्यवसायाच्या सुरुवातीलाच त्यांच्यासमोर कष्टांचा डोंगर उभा ठाकला होता. 

    घरातील अडचणी बाजूला सारायचं म्हटलं, तर उंबरठ्याबाहेर देखील अडचणींची भली मोठी रांग लागली होती. भारतात त्यावेळी महिलांच्या अंडरगारमेंट्ससाठी अशाप्रकारचं ऑनलाईन पोर्टल (Online Portal) असू शकतं अशी कल्पना सुद्धा जन्माला आली नव्हती. एकतर या कपड्यांची खरेदी करताना महिला बऱ्यापैकी दुकानात सुद्धा शरमतात आणि या परिस्थितीत अशा कपड्यांची ऑनलाईन विक्री होत असल्याची बातमी अनेकांच्या पचनी पडत नव्हती. महिलांसाठी अंडरगारमेंट्सची खरेदी सोपी व्हावी आणि समाजातील ही  पोकळी भरून निघावी म्हणून रिचा प्रयत्न करीत होत्या. अडचणी भले अनेक होत्या तरीही दृढ आत्मविश्वासाच्या जोरावर रिचा कर यांनी २५ ऑगस्ट २०११ पासून झिवामेच्या नावाने इ-कॉमर्स (E-Commerce) प्लॅटफॉर्मवरून व्यवसाय सुरु केला. 

    झिवामेने गाठलेली उंची:

    सुरुवातीला ज्या व्यवसायाला अनेकांकडून हिणवण्यात आलं किंवा उपेक्षा करण्यात आली तोच व्यवसाय आज दरवर्षी नवीन शिखरं काबीज करतोय. रिचा कर यांच्या व्यवसायाची उलाढाल आज  जवळपास २७० कोटी रुपयांच्या घरात आहे. भारतातील प्रत्येक पिनकोडवर डिलिव्हरी देण्यात हा व्यवसाय सक्षम आहे आणि दर दिवशी या प्लॅटफॉर्मला भेट देणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढतेय. झिवामेकडून अत्ताच्या घडीला ५००० लॉन्जरी स्टाईल (Lingerie Styles), ५० ब्रँड आणि १००० विविध साईझेस उपलब्ध आहेत. 

    एवढंच नाही तर झिवामेमध्ये लवकरच महिलांसाठीचे कपडे, फिटनेस वेअर आणि स्लीपवेअर समाविष्ट करण्यात येणार आहे. .जो व्यवसाय कधी एकेकेकाळी समाजाच्या चौकटीत बसत नव्हता आज त्याच व्यवसायाचा ग्राहकववर्ग या समाजाचा भाग आहे आणि म्हणून  ग्राहकांच्या  मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या रिचा यांचा अभिमान वाटतो. 

    आपली मुलगी किंवा सून जो व्यवसाय करू पाहतेय त्यामुळे आपण समजत तोंड दाखवू शकणार नाही अशा विचारसरणीच्या वातावरणातून उमलू पाहणाऱ्या रिचा इतरांना कायम प्रेरणा देत राहतील. परिवाराचा किंवा समाजतील कोणाचाही आधार नसताना रिचा यांनी केवळ स्वतःच्या मेहनत आणि जिद्धीच्या बळावर अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक गरजेसाठी वेळप्रसंगी त्यांनी स्वतःची जमापुंजी पणाला लावली होती. वर्ष २०१५-१६ मध्ये त्यांना ५४ कोटी रुपयांचं नुकसान सोसावं लागलं होतं तरीही त्या खचून गेल्या नाही. अशा कठीण काळात सुद्धा केवळ ग्राहकांवर विश्वास ठेऊन त्या नेहमी पुढे जात राहिल्या. रिचा त्यांच्या आत्तापर्यंतच्या व्यवसायाबद्ल बोलताना सांगतात की, “ आपण जर का एखादी चांगली गोष्ट करत असू, तर कुणालाही काहीही सिद्ध करून दाखवण्याची गरज नसते. तुम्ही प्रयत्न करत राहा आणि नंतर तुमच्या योग्यतेची साक्ष स्वतः देव देईल.” वर्ष २०१७ मध्ये रिचा कर यांनी कंपनीमधून CEO पदाचा राजीनामा दिला, मात्र तरीही त्या कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या सदस्या आहेत आणि त्यांची नेट वर्थ ७४९ रुपयांच्या आसपास आहे. कंपनीच्या आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये घडलेला सर्वात मोठा बदल म्हणजे वर्ष २०२० मध्ये रिलायन्स रिटेलकडून झिवामेचा ताबा मिळवण्यात आला होता. 

    आणखीन वाचा:

  • बचत छोटी – शक्ती मोठी | आजच करा तुमच्या भविष्याची आर्थिक योजना | Plan Your Financial Future Today.

    बचत छोटी – शक्ती मोठी | आजच करा तुमच्या भविष्याची आर्थिक योजना | Plan Your Financial Future Today.

    पैसा कमावणे ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. पैशांशिवाय माणूस जगू शकत नाही. एक चांगले जीवन जगण्यासाठी जवळ मुबलक पैसा असणे खूप गरजेचे आहे. पण पैसे कमावण्यासोबतच पैशांची बचतही तितकीच महत्त्वाची आहे. अनेक लोकांना पैशाची बचत कशी करावी, हे कळत नाही. त्यामुळे अनेकदा अशा लोकांच्या हातून खूप पैसा खर्च होतो.  पण, हे ही बचत काही एका रात्रीत होणार नाही. त्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. 

    तुमची बचत तुमच्या चेहऱ्यावर दिसत असते. भरपूर बचत गाठीशी असल्यामुळे एक वेगळाच आत्मविश्वास तुमच्या चेहऱ्यावर आणि तुमच्या वागण्याबोलण्यातून जाणवत असतो. उत्पन्न जेमतेम असल्याने बचत करू शकत नाही, असा फार मोठा वर्ग आपल्याकडे आहे. हातातोंडाशी गाठ आहे, अशा उत्पन्न गटातील लोकांना बचत करणे कठीण असते, जीवनावश्यक खर्च एका मर्यादेपेक्षा कमी होऊ शकत नाहीत, म्हणून उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे हाच पर्याय योग्य ठरतो.

    कोण किती कमावतो, यापेक्षा त्याच्या कमाईतून किती प्रमाणात बचत करतो, किती अतिरिक्त खर्च करतो यांसारख्या बाबींवर त्या व्यक्तीची दीर्घकालीन संपत्तीची निर्मिती क्षमता आणि त्याचे आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून असते.

    कमी किंवा योग्य तितकाच खर्च करणे हा बचतीचा मूलमंत्र आहे; परंतु बरेच जण बचतीचा विचार करण्यापेक्षा कुठे, कसा आणि किती खर्च करता येईल याच विचारात जास्त असतात.

    खर्च किती, कसा, कुठे आणि का करावा हा व्यक्तीसापेक्ष प्रश्न आहे. तरीही उत्पन्नाच्या तुलनेत आणि बचतीचे व्यवस्थापन ठरवून केल्यास आर्थिक अडचणी येत नाहीत.

     उदाहरण १ :

    निशा आणि पंकजचा रविवार उजाडला तोच मुळी कागद आणि पेन घेऊन. प्रत्येक खोलीत काय फर्निचर करायचं याचा आराखडा दोघांनी मिळून तयार केला. गेल्या कित्येक महिन्यांत दोघांच्या पगारातले थोडे थोडे करत बरेच पैसे त्यांनी त्यांचे घर सजवण्यासाठी साठवले होते.

    उदाहरण २ :

    रोजंदारीच्या कामावर जाणारा रघू आज खुश होता. गावाकडे असणारी त्याची बायको, मुलं लवकरच त्याच्याबरोबर राहण्यासाठी येऊ शकणार होती. कारण आजच तो एक खोली भाड्याने घेण्यासाठी मालकासोबत व्यवहार करून आला होता. रोजच्या कामाचे मिळणारे पैसे अगदी गरजेपुरते थोडे वापरून बाकीचे पैसे त्याने शेठच्या सांगण्यावरून बँकेत साठवले होते.

    निशा-पंकज असोत की रघू असो, रोजच्या दैनंदिन खर्चाशिवाय अधिकचा खर्च ते करू शकत होते. हे त्यांना कसे सहज शक्य झाले? याचे उत्तर म्हणजे त्यांना मिळणाऱ्या कमाईच्या पैशातून काही पैसे त्यांनी वेगळे काढले होते, बचत केली होती. उत्पन्नातील सर्वच्या सर्व पैसे त्यांनी लगेच खर्च केले नव्हते.

    अविचाराने खर्च करणारी, कोणाच्याही साहाय्याशिवाय लढणारी आणि प्रत्येक गोष्टीची घाई करणारी व्यक्ती लवकर लयास जाते.

    साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर मिळालेले सर्वच उत्पन्न उधळून न देता काही रक्कम हाती राखणे महत्वाचे आहे. हातात आले आणि उडवून लावले असे न करता उत्पन्नातून खर्च वजा जाता जी शिल्लक आपल्याकडे उरते ती रक्कम म्हणजे बचत! बचतीचे हे सूत्र कोणत्याही बाबतीत लागू पडते, पैसा असो, वेळ असो, अन्न धान्य असो की पाणी असो, बचत सर्वव्यापी आहे.

    बचतीची सुरुवात कशी करावी : 

    1. तुमच्या खर्चाची नोंद करा

    पैसे वाचवण्याची पहिली पायरी म्हणजे तुमच्या खर्चाची तुम्हाला चांगली जाणीव असणे. लोक पुरेशी बचत करू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे खर्च केल्यानंतर फारसा पैसा शिल्लक राहत नाही. त्यामुळे तुम्ही एका विशिष्ट महिन्यात खर्च केलेल्या प्रत्येक गोष्टीची काळजीपूर्वक नोंद ठेवणे महत्त्वाचे आहे. 

    2. कर्ज नियोजन

    जेव्हा तुमचे उत्पन्न कमी असते तेव्हा कर्ज सामान्यतः अटळ असते. तुमच्यावर एकूण किती कर्ज आहे, ते कर्ज तुम्ही किती दिवसात आणि कसे फेडणार आहात याचा आराखडा तुमच्याकडे आधीच तयार असणे आवश्यक आहे. नियोजन केलेले असेल तर त्या कर्जाचा अतिरिक्त ताण न येता सुलभरित्या तुम्ही त्या कर्जाची परतफेड करू शकाल.

    3. बजेट तयार करा

    तुमचा पैसा कुठे जात आहे हे एकदा तुम्हाला कळले की, तुम्ही तुमच्या पैशांचे वाटप कसे करायचे यावर विचार  करून निर्णय घेऊ शकता. आपण प्रत्येक खर्चाचे काळजीपूर्वक विश्लेषण करणे आवश्यक आहे. घरभाडे, कर्ज यांसारखे निश्चित खर्च आहेतच; पण जेवण, वाहतूक आणि मनोरंजन यांसारख्या खर्चांवर नियंत्रण ठेवता येवू शकते. 

    4. मोठी बचत करण्यासाठी लहान प्रारंभ करा

    तुमच्या करिअरच्या सुरुवातीला तुमचे उत्पन्न फारसे जास्त नसेल. बर्‍याच वेळा, सर्व खर्चानंतर खूप कमी गुंतवणूक करण्यायोग्य रक्कम उरते. तरीही जमेल तेवढी बचत करत जा. तुम्ही केलेली छोटी सुरुवातच तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकते. जसजसे उत्पन्न वाढते तसतसे गुंतवणुकीचे प्रमाण वाढवता येते.

    5. बचतीची उद्दिष्टे सेट करा

    बचत उद्दिष्टे सेट केल्याने प्रारंभ करणे खूप सोपे होते. प्रत्येक ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल हे ठरवून सुरुवात करा.

    काही अल्प-मुदतीची  उद्दिष्टे (ज्याला साधारणत: 1-3 वर्षे लागू शकतात) उदा. नोकरी गमावल्यास किंवा इतर आणीबाणीच्या परिस्थितीत 6 महिने ते एक वर्षाचा खर्च करण्यासाठी आणीबाणी निधी, सुट्टीसाठी पैसे वाचवणे, नवीन खरेदी करण्यासाठी बचत करणे.

    दीर्घकालीन बचत उद्दिष्टे अनेक वर्षे किंवा अगदी दशके लांब असतात आणि त्यात खालील गोष्टींचा समावेश असू शकतो : निवृत्तीसाठी बचत करणे, तुमच्या मुलाच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसे टाकणे, दुसऱ्या घरासाठी बचत करणे किंवा तुमच्या सध्याच्या घराचे नूतनीकरण करणे.

    6. तुमचे प्राधान्यक्रम ठरवा

    तुम्हाला करावयाच्या प्रत्येक गोष्टीची प्राथमिकता ठरवा. कोणती गोष्ट जास्त गरजेची आहे तिला आधी प्राधान्य द्या. कमी आवश्यक असणाऱ्या बाबी नंतर ठेवा. तुमची उद्दिष्टे ठरवा आणि ती कोणत्या क्रमाने तुम्हाला साध्य करायची आहेत याचे नियोजन करा.

    शिक्षण, घर, वृद्धापकाळ अशा कोणत्याही कारणासाठी तुम्हाला पैसा लागणार नसेल तरीसुद्धा निदान तुमच्या आत्मविश्वासासाठी तरी तुम्ही बचत ही केलीच पाहिजे. तुम्ही किती ताठ मानेने चालता याच्याशी तुमच्या बचतीच्या स्थितीचा खूप जास्त संबंध आहे. तुमच्या बचतीच्या स्थितीवरून तुमची समाजातील पत ठरणार हे मात्र नक्की !

    हे पण वाचा:

  • भारतीयांच्या आवडत्या नूडल्स Brand कडून शिकण्यासारखे मार्केटिंगचे धडे… 

    भारतीयांच्या आवडत्या नूडल्स Brand कडून शिकण्यासारखे मार्केटिंगचे धडे… 

    कोणताही व्यवसाय म्हटला की, तुम्ही तुमची उत्पादनं लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहचवता आणि ते ग्राहकांना कसं आणि किती आकर्षित करतं याची भूमिका खूप महत्त्वाची असते. चांगल्या मार्केटिंग तंत्राचा वापर करणारी उत्पादनं ग्राहकांना लवकर आकर्षित करतात. आज आपण अशाच एका लोकप्रिय Brand ची Marketing टेक्निक पाहणार आहोत. 

    भारतात मॅगी नूडल्स एक लोकप्रिय आणि सर्वसामान्यांच्या आवडीचा खाद्यपदार्थ आहे. 1980 च्या दशकात भारतीय बाजारात प्रवेश केल्यानंतर, मॅगी नूडल्सचा केवळ एक Brand म्हणून राहण्यापेक्षा, भारतीयांच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनली. त्यांच्या यशाचे रहस्य त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये दडलेले आहे.

    मॅगीने ग्राहकांच्या आवडी लक्षात घेऊन उत्पादनं तयार केली, स्थानिक चवींवर जोर दिला आणि विविधता आणली. त्याचबरोबर, सोशल  मीडिया, इमोशनल मार्केटिंग आणि क्रीडा-सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे ब्रँडची लोकप्रियता वाढवली.

    चला तर मग पाहूया भारतात सर्वात लोकप्रिय असणाऱ्या मॅगी या नूडल्स ब्रँड कडून शिकण्यासारखे काही मार्केटिंगचे धडे :

    1. जाहिरातींमध्ये भावनांचा वापर :

    जेव्हा जेव्हा आपण मॅगी बद्दल बोलतो तेव्हा आपल्या मनात चवदार नूडल्स बनवणाऱ्या आईची प्रतिमा येते. मॅगी हे अनेक वर्षांपासून कौटुंबिक खाद्य म्हणून सादर केले जाते आणि त्यांच्या जाहिरात कॅम्पेनमुळे त्यांना त्यांची ही प्रतिमा टिकवून ठेवण्यास खूप मदत झाली आहे.

    2. लहान आणि अर्थपूर्ण tagline चा वापर :

    कोणत्याही मार्केटिंग मोहिमेत टॅगलाइन्सचा महत्त्वाचा भाग असतो. मॅगी अनेक वर्षांपासून लहान आणि आकर्षक टॅगलाइन वापरत आहे. “स्वाद भी, स्वास्थ्य भी”चे उदाहरण घ्या, ही टॅगलाइन मोठ्या संख्येने ग्राहकांना आकर्षित करू शकते, कारण नूडल्स ही अशी गोष्ट आहे जी लोक खाणे टाळतात कारण ते आरोग्यास चांगलं नाही; परंतु मॅगीच्या या tagline मुळे त्यांचे नूडल्स आरोग्यास चांगले आहेत हे लोकांच्या मनात आपसूकच ठसवले जाते. 

    3. प्रत्येक प्रकारचे मार्केटिंग :

    प्रिंट जाहिराती, होर्डिंगपासून सोशल मीडियापर्यंत, मॅगीच्या जाहिराती सर्वत्र आहेत. मॅगीवरील बंदी हटवल्यानंतर मॅगीने आपली मार्केटींगमधील गुंतवणूक सुमारे 96 टक्क्यांपर्यंत वाढवली. ही साधी गोष्ट नाही. अगदी चित्रपट आणि अनेक टीव्ही शोमध्ये मॅगीचे प्रायोजकत्व दिसून येते. अनेक ब्रँड सहसा मार्केटिंगच्या एका मार्गावर लक्ष केंद्रित करण्याची चूक करतात. जे धोकादायक देखील असू शकते, म्हणून नेहमी शक्य तितक्या विविध प्रकारच्या मार्केटिंगचे प्रकार वापरणं गरजेचं आहे. ज्यामुळे अनेक प्रकारच्या ग्राहकांपर्यंत तुमचे उत्पादन पोहोचण्यास मदत होईल. 

    4. विक्री 

    मॅगीच्या पॅकेटच्या मागील बाजूस एक रेसिपी मॅन्युअल आहे. जेव्हा एखादी व्यक्ती पहिल्यांदा मॅगी बनवते किंवा ती कशी बनवायची हे तिला माहित असतेच असे होत नाही. तेव्हा या पाककृती खूप मदत करतात. पॅकेजिंगमध्ये उत्पादनाबद्दल योग्य ज्ञान देणे हा देखील एक खूप चांगला आणि अर्थपूर्ण धडा आहे. त्याचबरोबर मॅगी २ मिनिटात बनते हे त्यांच्या प्रत्येक जाहिरातीतून ग्राहकांच्या मनावर ठसवलं जातं. खरं बघायला गेलं तर मॅगी बनायला २ मिनिटांपेक्षा जास्तच वेळ लागतो, पण आमची रेसिपी कमी वेळात बनते ही भावना ग्राहकांच्या गळी उतरण्यात कंपनी यशस्वी ठरली आहे.    

    5. सेलिब्रेटींच्या शक्तीला कमी लेखू नका :

    अमिताभ बच्चनपासून ते माधुरी दीक्षितपर्यंत, मॅगीने त्यांच्या जाहिरातींमध्ये भारतातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींचा वापर केला आहे. नूडल्समध्ये नंबर १ ब्रँड बनण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे, कारण भारतातील

    आणखी वाचा

    जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल, तर ती तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा. यामुळे त्यांनाही उपयुक्त माहिती मिळेल.

  • लवकर गुंतवणूक का सुरू करावी? | Why start investing early?

    लवकर गुंतवणूक का सुरू करावी? | Why start investing early?

    तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा अधिक मिळवलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही कसा करावा, योग्य आर्थिक नियोजन करून विविध ध्येय कशी साध्य करावी, तुमच्यावर असलेल्या कर्जाचे, तुम्ही काढलेल्या विम्याचे  व्यवस्थापन कसे करावे, सुयोग्य गुंतवणूक करून तुमच्या बचतीच्या पैशाला कसे कामाला लावावे, ही आर्थिक साक्षरता आत्ताच्या काळासाठी नितांत गरजेची आहे.

    भविष्यात अधिकचा नफा मिळविण्याच्या उद्देशाने वर्तमानात केलेले पैशांचे सुयोग्य व्यवस्थापन म्हणजे गुंतवणूक म्हणता येईल.

    जेव्हा एखादी वस्तू किंवा मालमत्ता कमी किमतीत खरेदी करून ठराविक कालावधीनंतर जास्त किमतीला विकून त्यावर मिळणारा भांडवली नफा हा त्या गुंतवणुकीचा सर्वात महत्त्वाचा फायदा होय. 

    अल्पकालीन गुंतवणूक आणि दीर्घकालीन गुंतवणूक अशा दोन प्रकारात आपल्याला गुंतवणूक करता येते.

    गुंतवणूक ही आपले आर्थिक भवितव्य अधिक आणि लवकर  सुरक्षित करण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग असूनही अनेकजण गुंतवणूक उशिरा सुरु करतात. पहिल्यांदाच नोकरीला लागलेले तरुण भविष्याचे नियोजन करण्याऐवजी आधी आपल्या जीवनशैलीत सुधारणा करताना जास्त आढळून येतात. गुंतवणूक सुरु करण्यास खरंतर उशीर कधीच होत नसतो, पण तरीसुद्धा लवकर गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे असतात. याशिवाय आयुष्यात लवकर गुंतवणूक केल्याने तरुण गुंतवणूकदारांना जास्त बचत करता येते, कारण त्यांच्या Professional Life च्या  सुरुवातीला त्यांच्याकडे खूप कमी जबाबदाऱ्या असतात.  

    आपल्या संस्कृतीमध्ये असं म्हणतात की माणसाने जर १ रुपया कमावला तर त्यातले २५ पैसे खर्च करावेत, २५ पैसे दान करावेत, २५ पैसे मुलांसाठी आणि उरलेले २५ पैसे गुंतवणूक करण्यासाठी वापरावेत. म्हणजेच थोडक्यात आपल्या कमाईचा २५% हिस्सा आपण गुंतवणुकीसाठी वापरायला हवा. गुंतवणूक म्हणजे आपल्या भविष्यकाळाची तरतूद असते. बहुतांश लोक लवकर गुंतवणूक करत नाहीत, कारण आयुष्यात लवकर गुंतवणूक करण्याचे महत्त्व त्यांना ठाऊक नसते ; परंतु लवकर गुंतवणूक करणे नेहमीच आपल्या हिताचे ठरते.

    लवकर म्हणजे नक्की कधी?

    वॉरन बफे म्हणतात की ‘मी वयाच्या ११ व्या वर्षापासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. मी तोपर्यंत माझे आयुष्य वाया घालवत होतो.’

    आपण आपल्या पहिल्या पगारापासून आपली गुंतवणूक सुरू करावी याचा अर्थ कमाई सुरू झाल्यावर साधारणतः २२ ते २५ वयोगटाच्या आसपास आपण गुंतवणूक सुरु करायला हरकत नाही.

    तरुण वयात चांगली कमाई होत असताना योग्य बचत न करता खर्चाची सवय लागल्यास पुढील आयुष्यातील आर्थिक जबाबदाऱ्या निभावणे कठीण होते. त्यापेक्षा शुभस्य शीघ्रम् ! आता गुंतवणूक सुरु करा. आपल्याकडे अजूनही वेळ आहे. त्या वेळेचा कसा वापर करायचा हे आपल्या हातात आहे. लवकर गुंतवणूक केल्यास तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. जर आपण लवकर प्रारंभ केला नसेल तर त्याचे दुःख करत बसण्यापेक्षा आता गुंतवणूक सुरू करा.

     म्हातारपणातही ज्यांच्याकडे पैसा आहे, ते तरुण राहतात. याउलट, आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्यक्ती मात्र तरुणपणातच वृद्ध होतात.

    थोडक्यात काय तर जेव्हा आपण कमवायला सुरुवात करू तेव्हा आपल्या उत्पन्नाचा काही भाग हा आपल्याला झेपेल त्या प्रकारात आपण गुंतवलाच पाहिजे, ज्या गुंतवणूक प्रकाराचा आपल्याला भविष्यात लाभ होईल.

    लवकर गुंतवणूक सुरू करण्याचे विविध फायदे :

    1. संपत्ती : 

     लवकर गुंतवणूक केल्याने तुम्हाला तुमच्या संपत्तीला वेळ देऊन ती वाढवता येते. त्यामुळे तुम्ही भविष्यात मोठ्या रकमेचा स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी फायदा मिळवू शकता. भविष्यातील ध्येयनिश्चिती करू शकता. काय योग्य ? काय अयोग्य? हे ओळखून कुठं गुंतवणूक करायची ? कशी आणि किती करायची हे आर्थिक शहाणपण कमी जबाबदारी असलेल्या वयातच येतं.

    2. कम्पाउंड इंटरेस्ट :

    गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम तुमच्या मूळ गुंतवणुकीच्या व्याजावर व्याज म्हणून वाढते, ज्यामुळे तुम्हाला त्याचा अधिक फायदा होतो.

    3. सहनशीलता : 

    लवकर गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला बाजारातील उतार-चढावांशी सामना करण्यासाठी अधिक वेळ मिळतो आणि तुम्ही अधिक शांतपणे गुंतवणूक करु शकता. संयम ठेवायला शिकता येतं. एक गुंतवणूकदार म्हणून आपली Risk Taking Capacity वाढते. त्या तणावाचं योग्य व्यवस्थापन देखील आपल्याला करता येतं.

    4. आर्थिक स्वातंत्र्य : 

    जेव्हा तुम्ही तुमच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी गुंतवणूक, बचत, आणि इतर आर्थिक योजना आखता, आर्थिक ध्येयनिश्चिती करता,  तेव्हा अप्रत्यक्षपणे तुम्ही तुमच्या जीवनात भविष्यातील आर्थिक संकटांची चिंता कमी करत असता.

    सुरुवातीला कमी गुंतवणूक केल्याने तुम्ही भविष्यात आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकता आणि तुमची दिर्घकालीन उद्दिष्टे साध्य करू शकता.

    5. सातत्यपूर्ण बचत :

    लवकर गुंतवणूक सुरू केल्याने तुम्हाला आर्थिक नियोजनाची आणि बचतीची सवय लागते. आपल्या उत्पन्नाच्या काही रकमेची आपल्याला बचत करायचीच आहे ही सवय लागून जाते.

    यामुळे लवकर गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत, जे तुम्हाला भविष्यात मोठ्या लाभाची, मोठ्या परताव्याची संधी देतात. 

    म्हणून आजच श्रीगणेशा करा तुमच्या गुंतवणुकीचा !

    हे पण वाचा

  • तुमचा CIBIL Score तुमचं आर्थिक भविष्य ठरवतो का? | CIBIL Score म्हणजे काय ? | What is CIBIL Score and its importance

    तुमचा CIBIL Score तुमचं आर्थिक भविष्य ठरवतो का? | CIBIL Score म्हणजे काय ? | What is CIBIL Score and its importance

    CIBIL Score म्हणजे Credit Information Bureau (India) Limited Score होय. हा एक 3-अंकी Score आहे जो 300 ते 900 च्या दरम्यान असतो. हा व्यक्तीच्या क्रेडिटच्या  इतिहासावर आणि कर्जफेडीच्या सवयींवर आधारित असतो. ज्या व्यक्तीचा CIBIL Score जितका जास्त, तितकी त्या व्यक्तीची Credit पात्रता चांगली मानली जाते.

    जर CIBIL 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज देताना अशा व्यक्तीस प्राधान्य देतात. कमी स्कोअर असलेल्यांसाठी कर्ज मिळवणे कठीण होऊ शकते किंवा उच्च व्याजदर भरावा लागू शकतो.

    CIBIL Score चांगला ठेवण्यासाठी वेळेवर कर्जाची परतफेड करणे, क्रेडिट कार्डचा योग्य वापर करणे आणि अधिक कर्ज किंवा क्रेडिटची गरज न ठेवणे हे महत्त्वाचे आहे.

    जास्त Score म्हणजे त्या व्यक्तीची क्रेडिट क्षमता चांगली आहे आणि कमी Score म्हणजे ती व्यक्ती वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड व्यवस्थित आणि वेळेवर करत नाही.

    CIBIL Score ची भूमिका : 

    कर्ज प्रक्रियेत CIBIL Score खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. जर हा Score चांगला असेल, तर कर्ज मंजूर होण्यास शक्यतो कोणतीही अडचण येत नाही; पण जर हा Score कमी असेल तर कर्ज मिळणे कठीण होते. चांगल्या CIBIL Score सह कमी व्याजावर कर्ज मिळण्याचीही शक्यता असते. 300 ते 550 चा CIBIL Score कमकुवत मानला जातो. तर 550 ते 650 सरासरी, 650 ते 750 चांगला आणि 750 ते 900 सर्वोत्तम मानला जातो. 

    CIBIL Scoreची मुख्य भूमिका खालीलप्रमाणे आहे :

    1. कर्ज मंजुरीसाठी महत्त्वाचा आधार: जेव्हा तुम्ही गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा कार कर्जासाठी अर्ज करता, तेव्हा बँक तुमचा CIBIL Score  तपासते. चांगला Score असल्यास कर्ज मंजूर होण्याची शक्यता अधिक असते.

    2. व्याजदर ठरवण्यासाठी: जास्त CIBIL Score असलेल्या व्यक्तींना कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते, कारण बँकांना अशा व्यक्तींवर जास्त विश्वास असतो की, ते वेळेवर परतफेड करतील.

    3. क्रेडिट कार्ड मंजुरी: क्रेडिट कार्ड देणाऱ्या कंपन्या देखील तुमचा CIBIL Score पाहून तुमच्यासाठी योग्य कार्ड मंजूर करतात. चांगला स्कोर असल्यास जास्त क्रेडिट Limit मिळते.

    4. Risk Management: कर्ज देणाऱ्या संस्थांना तुमचा CIBIL Score पाहून ठरवता येते की, तुम्ही त्यांच्या दृष्टीने जोखीम आहात की नाही. कमी Score असणाऱ्या व्यक्तींना कर्ज देणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे त्यांना कर्ज नाकारले जाते किंवा जास्त व्याजदर दिला जातो.

    5. करिअर: काही क्षेत्रांमध्ये, विशेषतः आर्थिक सेवांमध्ये, बहुतांश कंपन्या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांचा CIBIL Score तपासतात. चांगला Credit Score म्हणजे त्या व्यक्तीची आर्थिक शिस्त आणि जबाबदारी दर्शवत असते. 

    6. इतर फायदे: जास्त CIBIL Score असणाऱ्या व्यक्तींना कधी कधी विशेष ऑफर, जास्त क्रेडिट लिमिट किंवा कमी प्रोसेसिंग फी सारखे अनेक फायदे मिळतात.

    1. तुम्ही तुमचा CIBIL Score कसा तपासू शकता: 

    Step 1: CIBIL वेबसाइटला भेट द्या.

    Step 2: मुख्य पानावर ‘Get Your CIBIL Score’ किंवा ‘Free CIBIL Score’ या पर्यायावर क्लिक करा.

    Step 3: तिथे तुम्हाला तुमची व्यक्तिगत माहिती भरावी लागेल, ज्यामध्ये नाव, जन्मतारीख, ईमेल, मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड क्रमांक असतो.

    Step 4: या प्रक्रियेनंतर तुम्हाला तुमचा CIBIL Score दिसेल. सुरुवातीला कदाचित एकदा नोंदणी करावी लागू शकते. काहीवेळा, हे मोफत असते, तर काहीवेळा वार्षिक Subscription

     शुल्क भरावे लागते.

    2. मोबाईल अ‍ॅप्सद्वारे CIBIL Score तपासणे

    तुम्ही विविध अ‍ॅप्स वापरून देखील CIBIL Score तपासू शकता :

    Paytm :

    • Paytm अ‍ॅप उघडा आणि Loans & Credit Cards किंवा CIBIL Score पर्यायावर जा.
    • आपले KYC डिटेल्स किंवा पॅन कार्ड नंबर भरून Score तपासा.

    Bajaj Finserv:

    • Bajaj Finserv अ‍ॅपवर नोंदणी करा.
    • Check your CIBIL Score या पर्यायावर जा आणि पॅन कार्ड आणि इतर माहिती भरून तपासणी करा.

    BankBazaar:

    • BankBazaar अ‍ॅप किंवा वेबसाईटवर जा.
    • CIBIL Score मोफत तपासण्याचा पर्याय निवडा आणि त्यानुसार आपली माहिती भरा.

    बँक किंवा वित्तीय संस्थांमधून बर्‍याच बँका आणि वित्तीय संस्थाही मोफत किंवा सवलतीच्या दरात CIBIL Score तपासण्याची सेवा देतात.

    तुम्ही तुमच्या नेट बँकिंग खात्यात लॉगिन करून देखील काही बँकांच्या सेवा वापरून CIBIL Score तपासू शकता

    उदा.

    • HDFC Bank
    • ICICI Bank
    • SBI (State Bank of India)

    3. विनामूल्य क्रेडिट रिपोर्ट्स मिळवण्यासाठी इतर पर्याय :

    • भारतात, तुम्ही TransUnion CIBIL कडून वर्षातून एकदा मोफत क्रेडिट रिपोर्ट मिळवू शकता. तुम्हाला या अहवालात तुमचा CIBIL Score  तसेच इतर क्रेडिट माहिती दिसेल.
    • CIBIL वेबसाइटवर जा आणि Free Annual Credit Report पर्यायावर क्लिक करा.

    आवश्यक माहिती भरून नोंदणी करा. यानंतर तुम्हाला तुमचा क्रेडिट रिपोर्ट आणि CIBIL Score दिसेल.

    तुमचा CIBIL Score हा तुमच्या आर्थिक स्थैर्याचा आणि जबाबदारपणाचा आरसा आहे. तो फक्त कर्ज मिळवण्यासाठीच महत्त्वाचा नाही, तर तुमची आर्थिक शिस्त आणि विश्वासार्हता याचेही प्रतीक आहे. त्यामुळे नियमितपणे क्रेडिट कार्डच्या देयकांचे वेळेवर पेमेंट, कर्जाचे नियोजनबद्ध पुनर्भरण आणि खर्चाचे शिस्तबद्ध व्यवस्थापन याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. CIBIL स्कोअर चांगला ठेवणे म्हणजे तुमच्या आर्थिक भवितव्यासाठी उत्तम तरतूद करण्यासारखे आहे.

    आणखी वाचा:

  • Success Story: २००० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय, आज आहे २,६०,००० कोटींची कंपनी | Dilip Shanghvi

    Success Story: २००० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय, आज आहे २,६०,००० कोटींची कंपनी | Dilip Shanghvi

    असं म्हटलं जातं की, श्रीमंत घरात जन्मलेल्या लोकांना मोठा व्यवसाय उभारण्याची अधिक संधी असते, सर्वसामान्य लोकांना व्यवसाय उभा करणं अवघड जातं. अनेक व्यक्ती स्वप्नं पाहतात, मोठे विचार मनात ठेवतात, पण त्यांच्या वास्तविक गरजांनी ती स्वप्नं धूसर होत जातात. आपण हे लक्षात ठेवायला हवं की, जर तुमच्यात स्वप्नं पाहण्याची क्षमता आणि ती पूर्ण करण्याची मेहनत घेण्याची इच्छाशक्ती असेल, तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता.

    देशातील वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सन फार्माचे संस्थापक दिलीप संघवी यांचं जीवन हे याचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी सुरुवात केली इतरांच्या औषधांचा व्यवसाय करून आणि त्याच अनुभवातून त्यांनी स्वतःचा औषध व्यवसाय सुरू केला. ना त्यांच्यामागे व्यापाराची कौटुंबिक पार्श्वभूमी, ना त्यांच्याकडे मोठी आर्थिक ताकद होती. पण त्यांचं धाडस आणि जिद्द यामुळेच त्यांनी ‘फार्मा किंग’ म्हणून स्वतःचा ठसा निर्माण केला.

    प्रारंभिक जीवन

    दिलीप संघवी  यांचा जन्म १ ऑक्टोबर १९५५ रोजी गुजरातमधील अमरेली या छोट्या गावात एका मारवाडी कुटुंबात झाला. त्यामुळे व्यापाराची मूलभूत समज त्यांच्याकडे बालपणापासूनच होती. त्यांच्या वडिलांचा एक छोटा औषध विक्रीचा व्यवसाय होता आणि संघवी लहानपणापासूनच वडिलांना या व्यवसायात मदत करत असत. ही मदत त्यांच्यासाठी फक्त कुटुंबाला दिलेला हातभार नव्हता, तर औषध उद्योगातील प्राथमिक अनुभव घेण्याची एक महत्त्वाची संधी होती. वडिलांना व्यवसायात केलेल्या मदतीमुळे औषध विक्रीच्या विविध बाजू समजून घेण्याची क्षमता त्यांच्यात विकसित झाली. 

    संघवी यांनी कोलकात्यातील भवानी पूर एज्युकेशन सोसायटी कॉलेजमधून वाणिज्य विषयात पदवी प्राप्त केली. औषध निर्मितीचा कोणताही औपचारिक अभ्यास न करता, त्यांनी वडिलांच्या व्यवसायात काम करत करत औषध बाजारातील विविध संधींची जाण मिळवली. औषध विक्रीच्या व्यवसायात असताना संघवींना हे लक्षात आलं की जेनेरिक औषधांची मागणी भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यांनी विचार केला, की जर मी इतरांनी तयार केलेली औषधे विकू शकतो, तर मी स्वतःची औषधे का बनवू नये?

    या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी औषध निर्मिती क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, ज्यातून पुढे ‘सन फार्मास्युटिकल्स’ या यशस्वी कंपनीची स्थापना झाली. त्यांच्या लहानपणी घेतलेल्या अनुभवांनी आणि औद्योगिक दृष्टिकोनाने त्यांना औषध उद्योगात एक महत्त्वपूर्ण स्थान मिळवून दिलं

    सन फार्माची सुरुवात आणि विस्तार 

    १९८२ साली वडिलांकडून २००० रुपये उसने घेऊन सन फार्माची सुरुवात संघवींनी गुजरातमधील वापी येथे केली. सुरुवातीला कंपनीने मनोरुग्ण आणि हृदयविकाराशी संबंधित औषधे तयार करण्यावर लक्ष केंद्रित केलं. उत्पादनांची विविधता कमी होती, पण संघवी यांनी नेहमी गुणवत्तेला प्राधान्य दिलं,  ज्यामुळे कंपनीची औषधं बाजारात लोकप्रिय होऊ लागली.

    १९९७ मध्ये, कंपनीच्या स्थापनेनंतर १५ वर्षांनी, संघवी यांनी अमेरिकेतील कॅराको फार्मास्युटिकल्स नावाची एक फार्मा कंपनी विकत घेतली, ज्यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत प्रवेश मिळाला. यानंतर २००७ मध्ये, त्यांनी इस्रायलमधील टारो फार्मा ही कंपनी विकत घेतली, ज्यामुळे कंपनीचे जागतिक स्तरावरील स्थान आणखी बळकट झाले. त्यानंतर, २०१४ मध्ये त्यांनी रॅनबॅक्सी कंपनी विकत घेतली. हे अधिग्रहण भारतीय औषध उद्योगात एक मोठा टप्पा होता, कारण यामुळे सन फार्मा भारतातील सर्वात मोठी औषध निर्मिती कंपनी बनली. यामुळे जागतिक बाजारातही सन फार्माचे स्थान मजबूत झाले.

    संघवी यांनी केलेली या कंपन्यांची खरेदी फक्त व्यवसाय वाढवण्यासाठी नव्हे, तर संशोधन आणि विकास वाढवण्यासाठी देखील होती. त्यांनी अमेरिका, युरोप आणि इतर विकसित बाजारांमध्ये विस्तार केला, ज्यामुळे कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर एक विश्वासार्ह ब्रँड बनली.

    यशाच्या शिखरावर 

    दिलीप संघवी यांनी भारतीय औषध उद्योगात केवळ व्यावसायिक यश मिळवलं नाही, तर औषध निर्मितीची गुणवत्ता वाढवून आणि किफायतशीर औषधांचा पुरवठा करून एक महत्त्वपूर्ण सामाजिक योगदान दिलं  आहे. त्यांचा दृष्टिकोन व्यावसायिकतेच्या पलिकडे जातो, जो समाजाभिमुख आहे, त्यांच्या या कार्यामुळे  अनेकांना योग्य आणि परवडणारी औषधे उपलब्ध झाली आहेत.

    संघवी यांनी फार्मास्युटिकल उद्योगाला नवी दिशा दिली, विशेषतः भारतात जेनेरिक औषधांची क्रांती आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. औषधांच्या किमती कमी करून त्यांनी केवळ भारतीय ग्राहकांना नाही, तर जागतिक स्तरावरही आरोग्यसेवा परवडणारी बनवली आहे.

    त्यांच्या उल्लेखनीय यशासाठी आणि योगदानासाठी दिलीप संघवी यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. २०१६ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार प्रदान केला, जो देशातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. याशिवाय, संघवी हे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सन्मानित झाले आहेत. फोर्ब्सच्या यादीत त्यांनी अनेक वेळा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून स्थान मिळवलं  आहे. २०१५ मध्ये त्यांना फोर्ब्सने भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित केलं, तेव्हा त्यांची संपत्ती $१७.५ बिलियन इतकी होती. सध्या फोर्ब्सनुसार, दिलीप संघवी यांची एकूण संपत्ती २९.८ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास २.५० लाख कोटी रुपये इतकी आहे. सन फार्मा जगातील पाचवी सर्वात मोठी जेनेरिक कंपनी असून कंपनीत जवळपास ४१००० कर्मचारी कार्यरत आहेत. 

    दिलीप संघवी यांचा जीवनप्रवास हा चिकाटी, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय यांचा अद्भुत संगम आहे. त्यांनी अत्यंत साध्या परिस्थितीतून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली आणि आज ते जागतिक स्तरावरील एक प्रमुख उद्योगपती म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जीवनातून शिकण्यासारखे खूप काही आहे – विशेषत: उद्योजकतेत टिकून राहण्यासाठी आणि सातत्याने नवनवीन संधी शोधण्यासाठीची त्यांची क्षमता प्रेरणादायी आहे.

    आणखी वाचा

  • 2025 मध्ये Google AdSense मधून पैसे कसे कमवायचे? | How to Make Money with Google AdSense in 2025?

    2025 मध्ये Google AdSense मधून पैसे कसे कमवायचे? | How to Make Money with Google AdSense in 2025?

    आजकाल ऑनलाईन अर्निंग करण्यासाठी अनेकजण ब्लॉग किंवा वेबसाईट सुरू करतात, परंतु त्यातून पैसे कसे मिळवायचे हे अनेकांना माहित नसतं. ब्लॉग किंवा वेबसाईटद्वारे पैसे कमवण्याचे बरेच मार्ग आहेत, जसं की; गुगल ॲड्स, ॲफिलिएट मार्केटिंग, जाहिराती, स्पॉन्सरशिप, प्रॉडक्ट्सची विक्री इत्यादी. परंतु या सगळ्यांमध्ये Google AdSense हा एक अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाचा मार्ग. आज आपण या लेखात Google AdSense म्हणजे काय, ते कसं कार्य करतं, AdSense ची मान्यता कशी मिळवायची आणि त्यातून पैसे कसे कमवायचे हे सविस्तरपणे समजून घेऊया

    Google AdSense म्हणजे काय?

    Google AdSense ही एक Google द्वारे चालवली जाणारी जाहिरात सेवा आहे. हा एक Advertise प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये ब्लॉग किंवा वेबसाईटवर विविध स्वरूपाच्या जाहिराती, जसं की इमेज, व्हिडिओ, बॅनर जाहिराती दाखवण्यात येतात. जेव्हा तुमच्या ब्लॉगला Google AdSense चे अप्रूवल मिळतं, तेव्हा तुमच्या कंटेंटशी संबंधित जाहिराती Google तुमच्या वेबसाईटवर दाखवतं. वेबसाईटवर आलेले व्हिजिटर्स जेव्हा जाहिरातींवर क्लिक करतात, तेव्हा तुम्हाला पैसे मिळतात.

    Google AdSense कशाप्रकारे कार्य करते?

    Google AdSense च्या कार्यप्रणालीमध्ये काही महत्त्वाचे टप्पे आहेत. सर्वप्रथम, तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉगला पात्रतेसाठी Google द्वारे एक मूल्यांकन केलं जातं. जर तुमची वेबसाईट पात्र असेल, तर तुम्हाला एक अकाउंट अप्रूव्ह केलं जातं. एकदा अप्रूवल मिळाल्यानंतर, Google तुम्हाला एक कोड प्रदान करतं . हा कोड तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर टाकावा लागतो. या कोडच्या माध्यमातून जाहिराती तुमच्या ब्लॉगवर दिसायला लागतात, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्लिकवर CPC (Cost Per Click) प्रमाणे पैसे कमवू शकता. वेबसाईटवरील ट्रॅफिक जितके जास्त असेल, तितके अधिक पैसे कमवता येतील. त्यामुळे, जाहिरातींवर जेवढे अधिकाधिक व्हिजिटर क्लिक करतात आणि तुमची कमाई वाढते.

    YouTube आणि AdSense

    फक्त ब्लॉगच नाही, तर YouTube चॅनलद्वारे सुद्धा Google AdSense च्या मदतीने कमाई करता येते. तुम्ही जेव्हा तुमच्या YouTube चॅनलवरील व्हिडिओमध्ये जाहिराती दाखवता आणि त्यावर लोक क्लिक करतात, तेव्हा तुम्हाला CPC च्या आधारावर पैसे मिळतात.

    AdSense ची मान्यता कशी मिळवायची?

    AdSense चे अप्रूवल मिळवण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे . तुमच्या वेबसाईटवर जरा युनिक आणि माहितीपूर्ण कंटेंट असणं महत्वाचं आहे. तसेच, तुमच्या वेबसाईटवर Contact Us, About Us, Privacy Policy, Terms & Conditions सारखी पेजेस तयार करणं  आवश्यक आहे. यानंतर Google AdSense च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला एक नवीन खातं तयार करावं लागेल. तुमची वेबसाईट Google च्या अटींनुसार योग्य असल्यास, तुम्हाला अप्रूवल मिळतं आणि जाहिराती वेबसाईटवर दिसायला लागतात. या प्रक्रियेत थोडा वेळ लागू शकतो, पण योग्य पद्धतीने काम केल्यास तुम्हाला यश निश्चित  मिळेल.

    Google AdSense ही ब्लॉग आणि वेबसाईटद्वारे पैसे कमवण्याची एक सोपी व प्रभावी पद्धत आहे. जर तुमच्याकडे ब्लॉग किंवा न्यूज वेबसाईट असेल किंवा तुम्ही जर उत्तम लिहणारे असाल, तर तुम्ही स्वतःची वेबसाईट सुरु करून योग्य पद्धतीने AdSense द्वारे पैसे कमवू शकता.

    Google AdSense मधून किती पैसे कमावता येतात?

    यावर कोणतीही मर्यादा नाही. तुमच्या वेबसाईटवरील ट्रॅफिक आणि जाहिरातींवर क्लिक होण्याच्या प्रमाणावर हे अवलंबून असतं. युनिक कंटेंट, योग्य पेजेस (About Us, Privacy Policy), आणि नियमित ट्रॅफिक मिळणारी वेबसाईट Google AdSense च्या मदतीने तुम्ही ऑनलाईन पैसे कमविण्याच्या प्रवासाची सुरुवात करू शकता.

    मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर लेख वाचायला आवडतील, हे सांगायलाही विसरू नका. 

    आणखी वाचा:

  • Gen Z म्हणजे काय? या लोकांची नोकरी टिकत का नाही?

    Gen Z म्हणजे काय? या लोकांची नोकरी टिकत का नाही?

    जगामध्ये प्रत्येक कालखंडात एकाचवेळी किमान ३-४ पिढ्या आढळून येतात. 21 व्या शतकात १९९५ आणि २०१० दरम्यान जन्माला आलेली पिढी म्हणजे Gen Z. इंटरनेटला ओळखून असणारी पहिली पिढी असे या पिढीला संबोधले तरी काही गैर नाही. या पिढीला ‘डिजिटल नेटिव्ह’ असेही म्हणतात.

    आत्ताचा काळ वेगाने बदलत आहे व त्यानुसार तंत्रज्ञानही. या तंत्रज्ञानाशी मैत्रीपूर्ण नाते असलेली पिढी म्हणजे जनरेशन झेड. ही पिढी म्हणजे १९९५ नंतर जन्मलेली १२ ते १८ वयोगटातील मुले. त्यांची इंटरनेट, मोबाइल, सोशल मीडियाशी खूपच मैत्री आहे. दीर्घकाळ ऑनलाइन असणारी ही पिढी. इतरांच्या तुलनेत तंत्रज्ञान विश्वाच्या अधिक जवळ दिसून येते.

    Gen z पिढीची वैशिष्ट्ये :

    तंत्रज्ञानाचा अंगीकार : 

    Gen Z ची पिढी लहानपणापासूनच स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि इंटरनेटशी जोडलेली आहे. ते डिजिटल युगात वाढलेले असल्यामुळे तंत्रज्ञानाचा चांगला वापर करत आहेत.

    सामाजिक जाणीव :

    या पिढीतील लोक सामाजिक प्रश्नांबद्दलसुद्धा जागरूक असतात. पर्यावरण, समानता, मानसिक आरोग्य यांसारख्या मुद्द्यांबद्दल ही पिढी विचारशील दिसून येते. समाजाबद्दल असलेली आंतरिक ओढ या पिढीमध्ये दिसून येते.

    मल्टी-टास्किंग कौशल्य : 

    या पिढीने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याची सवय लावून घेतली आहे. त्यामुळे ते अभ्यास, करिअर आणि वैयक्तिक जीवन यांचा समतोल साधण्यात यशस्वी झालेले दिसतात.

    स्वतंत्र विचारसरणी : 

    Gen Z स्वतःच्या निर्णयांवर भर देणारी, स्वत:वर विश्वास असणारी, आत्मविश्वासाने भरलेली पिढी आहे. ते स्वतःच्या आवडीनुसार करिअर निवडण्याचे धाडस करत आहेत, ते धाडस यशस्वी करूनही दाखवत आहेत तसेच पारंपारिक नोकऱ्यांच्या ऐवजी फ्रीलान्सिंग आणि स्टार्टअपमध्ये त्यांचे स्वारस्य दाखवत आहेत.

    वैश्विक दृष्टिकोन : 

    सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील विविध संस्कृतींशी जोडले गेल्यामुळे त्यांची विचारसरणी आणि दृष्टिकोन अधिक व्यापक आणि जागतिक झालेला दिसतो.

    अर्थपूर्ण कामे : 

    या पिढीला केवळ पैशासाठी काम करणे आवडत नाही, तर त्यांना त्यांचे काम अर्थपूर्ण आणि सामाजिक बदल घडविणारे असावे असे वाटते.

    निर्णयक्षमता : 

    तंत्रज्ञान आणि माहितीच्या प्रचंड उपलब्धतेमुळे, Gen Z जलद निर्णय घेण्यास सक्षम आहे. ते लवकर माहिती मिळवणे आणि त्यावर प्रक्रिया करून तितक्याच तात्काळ निर्णय घेण्यावर भर देतात.

    व्यक्तिमत्त्व विकास : 

    सोशल मीडियाच्या युगात, स्वतःचे “व्यक्तिमत्त्व” कसे सादर करावे हे Gen Z चांगले जाणते. Instagram, Facebook, LinkedIn यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर स्वतःची ओळख आणि वैयक्तिक ब्रँड विकसित करण्यास ही पिढी अधिक महत्त्व देते.

    विविधतेचा स्वीकार : 

    Gen Z पिढी विविधतेबद्दल अधिक संवेदनशील आहे. जात, लिंग, लैंगिकता आणि सामाजिक स्थिती याबद्दल त्यांची विचारसरणी अधिक समर्पक आणि आधुनिक आहे.

    उद्योजकता : 

    ही पिढी पारंपारिक 9-5 च्या नोकरीपेक्षा उद्योजकतेवर भर देते. अनेक Gen Z युट्युबर, इन्फ्लुएन्सर, फ्रीलान्सर तसेच स्टार्टअप फाउंडर्स आहेत. त्यांना स्वतःचे काहीतरी निर्माण करण्याची आवड आहे.

    मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता : 

    मानसिक आरोग्य हा विषय Gen Z साठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ते ताणतणाव, चिंता आणि मानसिक आजार यांबद्दल खुलेपणाने बोलतात आणि मदत घेण्यासही तत्पर असतात.

    इको-फ्रेंडली दृष्टिकोन : 

    पर्यावरण आणि शाश्वत मूल्ये याबद्दल ही पिढी अधिक जागरूक आहे. ते पर्यावरण रक्षणासाठी शाश्वत उत्पादनांचा वापर, प्लास्टिकचा कमी वापर आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या वापराला प्राधान्य देताना दिसून येतात.

    सतत शिकण्याची वृत्ती : 

    Gen Z पिढीला सतत नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वतःला अद्ययावत ठेवण्याची इच्छा दिसते. ऑनलाईन कोर्सेस, ट्यूटोरियल्स आणि व्हिडिओंच्या माध्यमातून ते नियमितपणे स्वतःला Improve करत आहेत.

    या पिढीची नोकरी टिकत का नाही ?

    Gen Z at Workplace ने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात सांगितले गेले आहे कि Gen Z पिढीतील ४५% तरुण २ वर्षेही नोकरीच्या एका जागी टिकत नाहीत. याला विविध कारणेदेखील आहेत. मुळात, प्रत्येकाची वेगवेगळी कारणे आहेत. तर ५१ टक्के लोकांना नोकरी गमावण्याची भीती आहे. ही चिंता त्यांच्या करिअरच्या संभाव्यतेपर्यंत विस्तारित आहे. कारण 40 टक्के लोकांना नोकरी मिळाल्यानंतरही त्यांच्या पसंतीच्या क्षेत्रात पद कायम ठेवण्याची चिंता आहे.

    या अहवालामध्ये आणखी काही बाबी मांडण्यात आल्या आहेत. अहवालामध्ये असणाऱ्या ७७% तरुणांनी कमर्शिअल ब्रँड तसेच त्यांच्या पदाला जास्त किंमत दिली आहे. तर या ७७% तरुणांमधील ४३% तरुण अनुभव तसेच Improvement आणि Growthच्या संधीला जास्त महत्व देत असतात. अहवालात सादर असलेल्या तरुणांपैकी ७२% तरुण वेतनाच्या रक्कमेपेक्षा Job Satisfaction ला जास्त महत्व देतात, तर ७८% तरुण नोकरी बदलत आहेत कारण त्यांना आणखी पुढे जायचे आहे. HR प्रोफेशन मधील ७१% तरुणांचे असे सांगणे आहे, कि नोकरी बदलण्याचे प्रमुख कारण वेतन हेच आहे. त्यामुळे तरुणाईतील २५% लोक नोकरी बदलताना विशेष लक्ष त्यांच्या पगारावर देतात. अशा लोकांना स्वतःमध्ये राहायला जास्त आवडते. 

    आणखी वाचा:

  • किती सबस्क्राइबर्स नंतर कोणते YouTube प्ले बटण?

    किती सबस्क्राइबर्स नंतर कोणते YouTube प्ले बटण?

    आजच्या युगात, सोशल मीडिया हे एक महत्त्वाचे साधन बनलं आहे, ज्याचा वापर लोक आपले विचार आणि क्रिएटिव्हिटी प्रदर्शित करण्यासाठी करतात. यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर दररोज कोट्यवधी व्हिडिओ आणि रिल्स शेअर केल्या जातात. विशेषत: तरुण पिढीमध्ये रिल्स आणि व्हिडिओ बनवण्याची प्रचंड क्रेझ आहे, ज्याचं  मुख्य कारण म्हणजे प्रसिद्धी आणि आर्थिक फायदा. जितके जास्त व्ह्यूज, तितकी जास्त कमाई हे या सोशल जगातील साधं गणित आहे. त्यात यूट्यूब सर्वांत प्रभावी प्लॅटफॉर्मपैकी एक आहे, जिथं लाखो लोक आपली प्रतिभा वापरून दररोज कमाई करत आहेत.

    आज आपण या लेखात यूट्यूबवरून कमाई कशी केली जाते, यूट्यूब प्ले बटन म्हणजे काय, ते किती प्रकारचे असतात आणि यूट्यूबवर उत्पन्नाचे इतर स्रोत कोणते आहेत, या गोष्टींचा सविस्तर उहापोह करणार आहोत.

    यूट्यूब प्ले बटन्स

    यूट्यूबकडून कंटेंट क्रिएटर्सना त्यांच्या सब्स्क्रायबर्सच्या संख्येनुसार बक्षीस म्हणून विविध प्रकारचे प्ले बटन्स दिले जातात. या बटन्समुळे क्रिएटर्सना आणि त्यांच्या चॅनल्सना उत्साह मिळतो. यूट्यूबने 2010 पासून या रिवॉर्ड सिस्टमला सुरुवात केली. सुरुवातीला यूट्यूबमार्फत फक्त सिल्व्हर आणि गोल्डन प्ले बटन दिलं जात होतं. मात्र, यूट्यूबवर युजर्सच्या वाढत्या संख्येमुळे आता पाच वेगवेगळ्या पद्धतीचे प्ले बटन्स दिले जातात. हे बटन्स यूट्यूब क्रिएटर्सच्या यशाचे प्रतीक मानले जातात.

    सिल्व्हर प्ले बटन

    सिल्व्हर प्ले बटन हे यूट्यूबवरील पहिलं रिवॉर्ड आहे, जे एखाद्या चॅनलने १ लाख सब्स्क्राईबर्स पूर्ण केल्यावर  दिलं जातं. यासाठी क्रिएटर्सला १ लाख सब्स्क्राईबर्स झाल्यानंतर यूट्यूबकडे अर्ज करावा लागतो, त्यानंतर हे सन्मानचिन्ह दिलं जातं.

    गोल्डन प्ले बटन

    गोल्डन प्ले बटन हे यूट्यूबवर १० लाख सब्स्क्राईबर्स पूर्ण झाल्यावर दिलं जातं. हा  यूट्यूबवर एक महत्त्वाचा टप्पा आहे, १० लाख सब्स्क्राईबर्स साध्य करणं क्रिएटरच्या प्रतिभेचं आणि मेहनतीचं मोठं उदाहरण असतं.

    डायमंड प्ले बटन

    जेव्हा एखादं यूट्यूब चॅनल १ कोटी सब्स्क्राईबर्स टप्पा पूर्ण करतो, तेव्हा त्यांना डायमंड प्ले बटन दिलं जातं. हे एक मोठं लक्ष्य आहे, जे सहजासहजी कोणालाही गाठता येत नाही. ज्यामुळे डायमंड प्ले बटन यूट्यूबवर मोठ्या यशाचं प्रतीक मानलं जातं.

    रूबी प्ले बटन

    रूबी प्ले बटन हे 5 कोटी सब्स्क्राईबर्स पूर्ण केल्यानंतर दिलं जातं. यूट्यूबवर फार कमी क्रिएटर्स या टप्प्यापर्यंत पोहोचतात, त्यामुळे हे बटन एक अतिशय दुर्मिळ आहे.

    रेड डायमंड प्ले बटन

    यूट्यूबवर मिळणारं सर्वांत मोठा रिवॉर्ड म्हणजे रेड डायमंड प्ले बटन, जे 10 कोटी सब्स्क्राईबर्स पूर्ण झाल्यावर दिलं जातं. हा एक असामान्य टप्पा असून, आजवर जगातील फक्त १० चॅनेल्सनाच हे बटन मिळालं आहे. 

    प्ले बटन्स मिळवण्याची प्रक्रिया

    प्ले बटन्स आपोआप मिळत नाहीत. तर जेव्हा एखाद्या यूट्यूब चॅनलने दिलेला सब्स्क्राईबर टप्पा पूर्ण केला, तेव्हा त्यांना प्ले बटन मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो. हा अर्ज चॅनलच्या सेटिंग्समधूनच केला जातो. यूट्यूबकडून दिल्या गेलेल्या अटी आणि शर्थींना पूर्ण केल्यावरच हे बटन्स मिळतात.

    यूट्यूबवर कमाई कशी होते?

    यूट्यूबवरील कमाई मुख्यतः व्हिडिओवर लागलेल्या जाहिरातींमधून होते. जेव्हा एखादा युजर एखादा व्हिडिओ पाहतो, तेव्हा त्याला जाहिराती दाखवल्या जातात, त्या जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक हिस्सा यूट्यूब  क्रिएटर्सला देत असतं. एकूण व्ह्यूज, व्हिडिओची लांबी, कोणकोणत्या देशात व्हिडीओ बघितला जातो आणि कन्टेंट कोणत्या विषयावरील आहे अशा गोष्टींवर यूट्यूबच्या जाहिरातीमधून मिळणारी रक्कम अवलंबून असते. ज्या क्रिएटर्सकडे सिल्व्हर बटन आहे, त्यांची कमाई महिन्याला जवळपास 1 ते 2 लाखांपर्यंत पोहोचू शकते, तर गोल्डन बटनधारकांची कमाई यापेक्षा अधिक असते.

    यूट्यूब क्रिएटर्सना जाहिरातीशिवायही अनेक मार्गांनी कमाई करता येते. यामध्ये ब्रँड प्रमोशन, स्पॉन्सरशिप, एफिलिएट मार्केटिंग आणि प्रोडक्ट प्लेसमेंट यांचा समावेश होतो. काही वेळा मोठ्या कंपन्या आणि ब्रँड्स यूट्यूबर्सला त्यांच्या प्रोडक्ट्सचं प्रमोशन करण्यासाठी पैसे देतात.

    यूट्यूब हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून, हे अनेकांसाठी एक प्रभावी करिअर बनलं आहे. यूट्यूबच्या माध्यमातून लाखो लोक त्यांच्या क्रिएटिव्हिटीच्या जोरावर मोठ्या प्रमाणावर कमाई करत आहेत.

    मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर लेख वाचायला आवडतील, हे सांगायला ही विसरू नका. 

    आणखी वाचा