Author: naviarthkranti

  • Kisan Card: काय आहे किसान क्रेडिट कार्ड योजना? कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती

    Kisan Card: काय आहे किसान क्रेडिट कार्ड योजना? कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती

    सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड (KCC), जी शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक भांडवल उपलब्ध करून देते. या योजनेद्वारे शेतकरी कमी व्याजदरात कर्ज घेऊ शकतात आणि त्याचा उपयोग बियाणे, खते, कीडनाशके, शेती उपकरणे आणि इतर कृषी संबंधी गरजांसाठी करू शकतात. अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढवली, ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त २ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.

    या योजनेचे विविध फायदे असून, अल्प व्याजदर, परतफेडीवर सवलत आणि त्वरित निधी उपलब्ध होणे हे योजनेचे मुख्य आकर्षण आहेत. मात्र, अनेकांना या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, पात्रता निकष कोणते आहेत याची पुरेशी माहिती नसते. या लेखात किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि योजनेचे संपूर्ण फायदे समजून घेऊया.

    काय आहे किसान क्रेडिट कार्ड योजना ?

    शेतीसाठी आवश्यक भांडवल मिळावे आणि पेरणीपूर्व अडचणींवर मात करता यावी, यासाठी भारत सरकारने १९९८ मध्ये किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज मिळते, जे खते, बियाणे, कीटकनाशके तसेच शेतीच्या इतर गरजांसाठी वापरता येते. गरज पडल्यास शेतकरी या कार्डद्वारे रोख रक्कमही काढू शकतात, ज्यामुळे शेतीचा खर्च सहज भागवता येतो.

    ही योजना वेळोवेळी सुधारली गेली आहे. २००४ मध्ये यामध्ये गुंतवणूक कर्ज, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन आणि पशुपालन यांसारख्या उपक्रमांचा समावेश करण्यात आला.२००६-०७ मध्ये व्याज अनुदान योजना (ISS) सुरू करण्यात आली, ज्यामुळे अल्पकालीन कृषी कर्ज शेतकऱ्यांना केवळ ७% व्याजदराने मिळू लागले आणि आर्थिक ओझे कमी झाले. २०१२ मध्ये डिजिटल युगाची कास धरत इलेक्ट्रॉनिक किसान क्रेडिट कार्ड (e-KCC) सुरू करण्यात आले, ज्यामुळे व्यवहार अधिक सोपे, वेगवान आणि पारदर्शक झाले. तसेच आता योजेनची मर्यादा वाढवली गेली, ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त २ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. 

    अर्ज करण्याची प्रक्रिया आणि फायदे 

    किसान क्रेडिट कार्ड योजना सरकारी आणि खासगी बँकांमार्फत राबवली जाते. राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs), सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे कार्ड मिळू शकते. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या अधिकृत बँकेत जाऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरावा लागतो. अर्ज मंजूर झाल्यानंतर किसान क्रेडिट कार्ड दिले जाते, ज्यामुळे शेतकरी आपल्या गरजेनुसार ठराविक मर्यादेत कर्ज घेऊ शकतात.

    किसान क्रेडिट कार्डमुळे शेतकऱ्यांना सहज आणि कमी व्याजदरात कर्ज मिळते. हे कर्ज खते, बियाणे, कीटकनाशके आणि शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी वापरता येते. गरज भासल्यास शेतकरी या कार्डद्वारे रोख रक्कम काढू शकतात, त्यामुळे तातडीच्या खर्चासाठी मदत होते. व्याज अनुदान योजनेमुळे कर्जाचा आर्थिक बोजा कमी होतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळते आणि शेतीची उत्पादकता वाढते.

    निकष आणि आवश्यक कागदपत्रे 

    या योजनेत अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे लागते , मात्र कमाल वयाची कोणतीही मर्यादा नाही. या योजनेत 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते, आणि हे कर्ज पाच वर्षांच्या आत परतफेड करता येते. किसान क्रेडिट कार्डाची वैधता देखील पाच वर्षे असते.

    किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे काही आवश्यक कागदपत्रे असावी लागतात. ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, वीज बिल किंवा पाणी बिल यापैकी कोणतेही एक कागदपत्र लागते. तसेच, शेतकऱ्याने जमिनीचा मालकी हक्क किंवा भाडेकराराचे दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे. जर जमीन स्वतःच्या नावावर असेल, तर खतौनी, जमाबंदी किंवा पट्टा यासारखे कागदपत्र चालतात. जर शेतकरी भाडेकरू असेल, तर वैध भाडेकराराची कागदपत्रे द्यावी लागतात.

    मित्रांनो, किसान क्रेडिट कार्ड योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आर्थिक मदत योजना आहे. या जर तुम्ही सुद्धा शेतकरी असाल आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर आपल्या जवळच्या बँकेत जाऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करा आणि कमी व्याजदरात कर्ज मिळवण्याची ही संधी गमावू नका. 


    आणखी वाचा:

  • उद्योगविश्वात नवे मापदंड प्रस्थापित करणाऱ्या यशस्वी भारतीय महिला उद्योजिका.

    उद्योगविश्वात नवे मापदंड प्रस्थापित करणाऱ्या यशस्वी भारतीय महिला उद्योजिका.

    आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे आणि उद्योगविश्वही त्याला अपवाद नाही. पूर्वी व्यवसाय किंवा उद्योजकता हे फक्त पुरुषप्रधान क्षेत्र म्हणून पाहिलं जात होतं, मात्र ही संकल्पना आता बदलली आहे. महिलांनी आपल्या मेहनत, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उद्योगजगतात भक्कम पाय रोवले आहेत. त्यांच्या वाढत्या सहभागामुळे देशात नवनव्या संधी निर्माण होत असून, त्यांचं नेतृत्व रोजगार आणि अर्थव्यवस्था वाढवण्यात मोलाचा वाटा उचलत आहे. तसेच, नव्या पिढीतील उद्योजिकांसाठी त्या प्रेरणादायी ठरत आहेत.

    सध्या भारतात सुमारे १४% व्यवसाय महिलांच्या मालकीचे किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली चालवले जात आहेत, आणि हा आकडा झपाट्याने वाढत आहे. कल्पकता, दूरदृष्टी आणि चिकाटीच्या जोरावर अनेक महिला उद्योजिकांनी यशाच्या नव्या वाटा शोधल्या आहेत. केवळ स्वतःपुरते मर्यादित न राहता, त्या इतरांसाठीही रोजगार आणि संधी निर्माण करत आहेत. त्यामुळे महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसाय देशाच्या आर्थिक वाढीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.

    नुकताच जागतिक महिला दिन झाला. त्या निमित्ताने, आज आम्ही तुम्हाला अशाच यशस्वी भारतीय महिला उद्योजिकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या धैर्य, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उद्योगविश्वात नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत.

    सबीना चोप्रा – यात्रा.कॉमच्या सह-संस्थापक

    सबीना चोपड़ा या ‘यात्रा.कॉम’ च्या सह-संस्थापक असून, त्यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. २००६ मध्ये त्यांनी यात्रा.कॉमची स्थापना केली. ट्रॅव्हल आणि बीपीओ क्षेत्रात २५ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या सबीना यांनी आरसीआय इंडिया मध्येही महत्त्वाची भूमिका बजावली. यात्रा.कॉममध्ये कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य ऑपरेटिंग अधिकारी (COO) म्हणून काम करताना त्यांनी कंपनीच्या वाढीत विशेष भूमिका बजावली.

    व्यवसायासोबतच त्या समाजसेवेतही सक्रिय आहेत आणि मुलींच्या शिक्षण व सशक्तीकरणासाठी एनजीओच्या माध्यमातून मदत करतात. त्यांचं ट्रॅव्हल इंडस्ट्रीतील मजबूत नेटवर्क आणि व्यावसायिक कौशल्यामुळे यात्रा.कॉमला मोठं यश मिळालं. भारतीय पर्यटन क्षेत्राला नवीन दिशा देणाऱ्या प्रेरणादायी उद्योजिका म्हणून त्यांची ओळख आहे.

    विनीता सिंग – ‘शुगर कॉस्मेटिक्स’ च्या सह-संस्थापक 

    विनीता सिंग या ‘शुगर कॉस्मेटिक्स’ च्या सह-संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांनी IIT मद्रास आणि IIM अहमदाबादमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. २०१५ मध्ये त्यांनी पती कौशिक मुखर्जी यांच्यासोबत ‘शुगर कॉस्मेटिक्स’ची स्थापना केली. हा ब्रँड विशेषतः तरुण महिलांमध्ये लोकप्रिय असून, भारताच्या सौंदर्यप्रसाधन क्षेत्रात त्याने नवी क्रांती घडवली आहे.

    विनीता सिंग या भारताच्या आघाडीच्या महिला उद्योजकांपैकी एक मानल्या जातात. त्यांचा ब्रँड ‘शुगर कॉस्मेटिक्स’ दर्जेदार आणि ट्रेंडी उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. त्या ‘शार्क टँक इंडिया’ या बिझनेस रियालिटी शोमध्येही शार्क म्हणून सहभागी झाल्या असून, नवउद्योजकांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या कष्ट, मेहनत आणि दूरदृष्टीमुळे त्या आजच्या तरुणींना प्रेरणा देणाऱ्या उद्योजिका ठरल्या आहेत.

    फाल्गुनी नायर – ‘नायका’च्या संस्थापिका 

    फाल्गुनी नायर या ‘नायका’ (Nykaa) या ब्युटी अँड लाईफस्टाईल उत्पादने विकणाऱ्या मोठ्या ऑनलाइन कंपनीच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांनी IIM अहमदाबादमधून शिक्षण घेतलं आणि नंतर कोटक महिंद्रा कॅपिटलमध्ये १८ वर्षे मोठ्या पदावर काम केलं. २०१२ मध्ये त्यांनी आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी नोकरी सोडली आणि ‘नायका’ ची स्थापना केली. आज नायका हा भारताचा सर्वात प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन ब्रँड आहे.

    फाल्गुनी नायर या स्वतःच्या मेहनतीवर अब्जाधीश झालेल्या भारतातील मोजक्या महिलांपैकी एक आहेत. त्यांना २६ वर्षांचा व्यवसायाचा अनुभव आहे. नायका आज केवळ ऑनलाइनच नाही, तर भारतभर अनेक दुकानांतूनही उपलब्ध आहे. त्यांनी महिलांसाठी उच्च दर्जाची सौंदर्य उत्पादने सहज उपलब्ध करून दिली, त्यामुळे नायका हा लोकांचा आवडता ब्रँड बनला आहे.   

    राधिका घई अग्रवाल – शॉपक्लूझच्या सह-संस्थापक

    राधिका घई अग्रवाल या ‘शॉपक्लूझ’ (ShopClues) या लोकप्रिय ई-कॉमर्स कंपनीच्या सह-संस्थापक आहेत. २०११ मध्ये सिलिकॉन व्हॅलीत त्यांनी ही कंपनी सुरू केली आणि काही वर्षांतच शॉपक्लूझ युनिकॉर्न क्लबमध्ये पोहोचले. 

    त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठातून व्यवस्थापन शिक्षण घेतलं, तसेच स्टॅनफोर्ड विद्यापीठात वेब २.० आणि क्रिएटिव्ह रायटिंगचा अभ्यास केला. त्यांच्या दूरदृष्टी आणि कष्टामुळे शॉपक्लूझ भारतातील मोठ्या ऑनलाइन बाजारपेठांपैकी एक बनले. राधिका भारताच्या पहिल्या महिला उद्योजिकांपैकी एक आहेत, ज्यांची कंपनी युनिकॉर्न बनली आहे.

    नमिता थापर – एमक्योर फार्मास्युटिकल्स

    नमिता थापर या एमक्योर फार्मास्युटिकल्स (Emcure Pharmaceuticals) या प्रसिद्ध औषध कंपनीच्या कार्यकारी संचालक आहेत. त्या ‘शार्क टँक इंडिया’ या व्यवसायविषयक कार्यक्रमात ‘शार्क’ म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी फुकुआ स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केलं असून, त्या चार्टर्ड अकाउंटंट देखील आहेत. २००७ मध्ये सीएफओ म्हणून एमक्योरमध्ये प्रवेश केल्यानंतर, त्यांनी कंपनीच्या भारतीय व्यवसाय विभागाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

    त्या इनक्रेडिबल व्हेंचर्स लिमिटेड आणि थापर उद्योजक अकादमीच्या संस्थापक आहेत आणि त्यांनी १०० हून अधिक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांना द इकॉनॉमिक टाइम्स ‘40 अंडर 40’, वर्ल्ड वुमन लीडरशिप काँग्रेस सुपर अचिव्हर अवॉर्ड यांसारखे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. 

    श्रद्धा शर्मा – युवरस्टोरीच्या संस्थापक 

    श्रद्धा शर्मा या ‘युअरस्टोरी’ मीडियाच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. २००८ मध्ये सुरू केलेलं हे व्यासपीठ नव्या स्टार्टअप्स आणि उद्योजकांसाठी एक महत्त्वाचं माध्यम आहे. या माध्यमातून ७०,००० हून अधिक उद्योजकांच्या यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. गेल्या १६ वर्षांपासून स्टार्टअप्स आणि उद्योजकांना मार्गदर्शन करून त्यांना पुढे जाण्यासाठी मदत केली आहे.

    २०२३ मध्ये भारताने G20 अध्यक्षपद स्वीकारल्यावर, ५२० उपक्रमांच्या सह-अध्यक्ष म्हणून त्यांनी नेतृत्व केलं. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे फॉर्च्यून मासिकाच्या ‘40 अंडर 40’ प्रभावी व्यक्तींच्या यादीत तीन वेळा त्यांचं नाव झळकलं. तसेच, त्यांना  २०१८ मध्ये फोर्ब्स पॉवर ट्रेलब्लेझर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भारतीय स्टार्टअप्सच्या वाढीसाठी त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं ठरलं आहे.

    उपासना टाकू – मोबिक्विकच्या सह-संस्थापक

    उपासना टाकू या ‘मोबिक्विक’ या डिजिटल पेमेंट कंपनीच्या सह-संस्थापक आहेत. २००९ मध्ये त्यांनी मोबिक्विकची स्थापना केली. भारतात डिजिटल पेमेंट क्रांतीत त्यांचं मोठं योगदान आहे. मोबिक्विकने ई-वॉलेटच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार सोपे आणि सुलभ केले आहेत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे मोबिक्विक भारतातील प्रमुख फिनटेक युनिकॉर्न कंपन्यांपैकी एक बनली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये, कंपनीने IPO आणत सार्वजनिक लिस्टिंग केली, ज्यामुळे ती आणखी मजबूत झाली. 

    वंदना लुथरा – VLCC हेल्थकेअरच्या संस्थापिका

    वंदना लुथरा या सौंदर्य आणि आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजिका आहेत. १९८९ मध्ये त्यांनी ‘VLCC हेल्थकेअर’ची स्थापना केली, जी आज आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखली जाते आणि त्यांची ही कंपनी  १३ हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. VLCC केवळ सौंदर्य उत्पादनांसाठीच नव्हे, तर आरोग्य सेवांसाठीही प्रसिद्ध आहे.

    वंदना लुथरा या  प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेशी जोडलेल्या आहेत. त्या सौंदर्य आणि निरोगीपणा सेक्टर स्किल कौन्सिलच्या (B&WSSC) अध्यक्ष आहेत. २०१४ मध्ये भारत सरकारच्या पाठिंब्याने त्यांची पहिली अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी सौंदर्य आणि आरोग्य उद्योगात कौशल्य प्रशिक्षणाला चालना दिली असून, त्यांचं योगदान या क्षेत्रात खूप महत्त्वाचं आणि अतुलनीय आहे.

    मित्रांनो, वरील सर्व महिला उद्योजिकांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने उद्योग क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं आहे. संधी शोधून त्यांचा योग्य उपयोग करत त्यांनी अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांचा आत्मविश्वास आणि दूरदृष्टी आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देत आहे.

  • अर्थसंकल्प २०२५-२६: महाराष्ट्राच्या प्रगतीला दिशा देणारे १० महत्त्वाचे निर्णय

    अर्थसंकल्प २०२५-२६: महाराष्ट्राच्या प्रगतीला दिशा देणारे १० महत्त्वाचे निर्णय

    महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. हे त्यांचे ११ वे अर्थसंकल्पीय सादरीकरण असून, ते माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांच्या विक्रमाच्या जवळ पोहोचले आहेत. शेषराव वानखेडे यांनी आपल्या कार्यकाळात 13 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता.

    या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. शहरी आणि ग्रामीण भागाचा समतोल विकास साधण्यासोबतच अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. विविध क्षेत्रांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या असून, राज्याच्या प्रगतीला चालना देणारे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

    या अर्थसंकल्पातील 10 महत्त्वाचे निर्णय कोणते आहेत, यावर या लेखात सविस्तर नजर टाकूया.

    १. राजकोषीय तूट आणि राज्याची आर्थिक स्थिती

    अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याची राजकोषीय तूट कमी करण्यावर विशेष भर दिला आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राज्याची तूट 1 लाख 36 हजार 235 कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही तूट नियंत्रित ठेवण्यासाठी आणि राज्याची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना सुचवल्या आहेत.

    राज्याचा आर्थिक वाढीचा दर अंदाजे ९.७% राहू शकतो. त्यामुळे सरकारने खर्च नियंत्रणासोबतच विकास प्रकल्पांसाठी योग्य निधी वाटप करण्यावर भर दिला आहे. आर्थिक शिस्त पाळत राज्याच्या प्रगतीला गती देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.

    २. औद्योगिक विकास आणि गुंतवणूक

    महाराष्ट्र सरकारने राज्यातील उद्योगांना गती देण्यासाठी महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली आहे. दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये ६३ कंपन्यांसोबत सामंजस्य करार केल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. या करारांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार असून, उद्योग क्षेत्राचा अधिक विस्तार होईल.

    भारताच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा १५.४% वाटा असून, राज्याच्या निर्यात क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. नव्या धोरणांमुळे निर्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महाराष्ट्र देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल. तसेच, या करारांमुळे विविध उद्योगांत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार असून, राज्याची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.

    ३. महिला सक्षमीकरण

    महिला सक्षमीकरण हे सरकारच्या महत्त्वाच्या उद्दिष्टांपैकी एक आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत ३३,२३२ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. या योजनेमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील, ज्यामुळे त्यांचे आर्थिक स्थैर्य वाढेल.

    यासोबतच, महिलांच्या सुरक्षा, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकार विशेष धोरणे राबवणार आहे. यामुळे महिलांच्या जीवनमानात सुधारणा होईल आणि त्यांना उद्योग, व्यवसाय आणि इतर क्षेत्रांमध्ये अधिक संधी मिळतील, ज्यामुळे समाजात त्यांची भूमिका अधिक बळकट होईल.

    ४. कृषी क्षेत्रातील नवकल्पना आणि सुधारणा

    महाराष्ट्र सरकारने कृषी क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यभर कृषी तंत्रज्ञान केंद्रे उभारली जाणार असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली जाईल. यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवणं सोपं होईल आणि त्यांचं उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

    तसेच, राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान २.० सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत ५,८१८ गावांमध्ये जलसंधारण प्रकल्प राबवले जातील, ज्यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल. हे उपक्रम राज्यातील कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

    ५. पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक क्षेत्र

    महाराष्ट्र सरकारने लॉजिस्टिक धोरण २०२४ लागू केले असून, त्याअंतर्गत १०,००० एकर क्षेत्रावर लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. यामुळे राज्यातील मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढेल आणि ५ लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच, रस्ते, बंदरे, विमानतळ आणि रेल्वे यांसारख्या पायाभूत सुविधांच्या सुधारणा केल्या जातील, ज्यामुळे वाहतूक आणि व्यापार अधिक सुलभ व वेगवान होईल.

    ६. शहरी विकास आणि स्मार्ट सिटी योजना

    महाराष्ट्रातील शहरांच्या विकासासाठी स्मार्ट सिटी योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. या योजनेत पाणीपुरवठा सुधारणा, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, जलसंधारण आणि अन्य पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. यामुळे शहरातील नागरिकांना उत्तम सुविधा मिळतील आणि त्यांचं जीवनमान अधिक चांगलं होईल.

    शहरी भागांचा वेगाने होणारा विस्तार लक्षात घेऊन ३ लाख कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखण्यात आली आहे. यामुळे नव्या निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांना चालना मिळेल, स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि शहरांचा सर्वांगीण विकास साधता येईल.

    ७. समुद्रकिनारा विकास आणि आपत्ती व्यवस्थापन

    समुद्राच्या पातळीतील वाढता धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने किनारी विकास योजना हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत ८,४०० कोटी रुपये खर्च करून किनारी भागांचे संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजना राबवल्या जातील. यामुळे पूर, चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी किनारी भाग अधिक सुरक्षित होईल आणि स्थानिक नागरिकांचे जीवनमान सुधारेल.

    ८. ऊर्जा क्षेत्रात सुधारणा

    महाराष्ट्र सरकारने ऊर्जा क्षेत्र मजबूत करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २१,५३४ कोटी रुपये खर्च केले जाणार असून, पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीला चालना दिली जाईल. तसेच, राज्यातील वीज पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, ज्यामुळे नागरिकांना अखंड आणि विश्वासार्ह वीज सेवा मिळू शकेल.

    ९. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन

    महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी महत्त्वाची योजना सुरू केली आहे. याअंतर्गत छत्रपती संभाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांसाठी २२० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे राज्यातील ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण होईल आणि महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक ओळख अधिक भक्कम होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

    १०. शेती सुधारणा आणि सिंचन धोरण

    महाराष्ट्र सरकारने शेतीसाठी सिंचन योजनेचा विस्तार करण्यासाठी ४,५०० कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना सोयीस्कर आणि योग्य पाणीपुरवठा तसेच आधुनिक सिंचन साधने उपलब्ध करून दिली जातील. या उपाययोजनांमुळे शेतीचे उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होईल .

    सरकारने शहरी आणि ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, कृषी सुधारणा आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर दिला आहे. या उपाययोजनांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल आणि नागरिकांचे जीवनमान उंचावेल. तसेच, उद्योग, रोजगार आणि शेती क्षेत्राला गती मिळेल, ज्यामुळे राज्याच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळेल. या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र अधिक समृद्ध आणि विकसित राज्य बनेल, अशी आशा व्यक्त करूया.

  • १३ व्यवसायांत अपयश, डोक्यावर ८७ लाखांचे कर्ज, पण जिद्दीने उभारला कोट्यवधींचा व्यवसाय!

    १३ व्यवसायांत अपयश, डोक्यावर ८७ लाखांचे कर्ज, पण जिद्दीने उभारला कोट्यवधींचा व्यवसाय!

    यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम जितके महत्त्वाचे असतात, तितकंच महत्त्वाचं असतं संकटांचा जिद्दीने सामना करणं. कोणत्याही व्यवसायात अपयश हे अपरिहार्य असतं, पण जो अपयशाने खचून जात नाही आणि त्याचा धैर्याने सामना करतो तो एक दिवस नक्कीच यश प्राप्त करतो. व्यवसायाच्या वाटचालीत अनेक अडथळे येतात, अनेकदा सर्व काही नियोजनानुसार होत नाही, पण खचून जाण्याऐवजी उभं राहून संघर्ष करणं हेच यशाचं खरं गमक असतं.

    “डोसा क्रश” या फूड स्टार्टअपचे संस्थापक अंचल कुमार चौरसिया हे या गोष्टीचं उत्तम उदाहरण आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी व्यवसायात एक-दोन नव्हे, तर तब्बल १३ वेळा अपयश अनुभवलं. त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाच्या सुरुवातीला अपेक्षित यश मिळाल नाही. पण त्यांचा आत्मविश्वास डगमगला नाही. अपयशाने खचण्याऐवजी त्यांनी त्यातून शिकण्याचा आणि अधिक जोमाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

    आजच्या लेखात आपण अंचल कुमार चौरसिया यांचा हा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. 

    प्रारंभिक जीवन 

    अंचल कुमार चौरसिया यांचा जन्म ११ मे १९९३ रोजी मध्यप्रदेशमधील जबलपूर येथे झाला. त्यांचं बालपण अत्यंत साध्या आणि संस्कारक्षम वातावरणात गेलं. लहानपणापासूनच ते अभ्यासू आणि कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांच्या कुटुंबात आई-वडील आणि दोन बहिणी होत्या. घरातील सर्वांनी शिक्षणाला महत्त्व दिलं, त्यामुळे अंचल यांनीही शिक्षणात चांगली प्रगती केली.

    त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र, त्यांना सुरुवातीपासूनच नोकरी करण्याची इच्छा नव्हती. स्वतःचा व्यवसाय सुरू करून यश मिळवायचं, हे त्यांचे ध्येय होतं. मोठ्या उद्योगपतींच्या यशोगाथांनी त्यांना नेहमीच प्रेरित केलं. त्यामुळे पदवी शिक्षण पूर्ण होताच त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

    अपयशाची कहाणी

    अंचल कुमार यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी २००९ मध्ये आपला पहिला व्यवसाय सुरू केला. मात्र त्यात अपयश आलं. त्यानंतर मोबाईल शॉप्स, पोल्ट्री फार्म यांसारखे अनेक व्यवसाय उभारले. मात्र, प्रत्येक वेळी काही काळाने व्यवसाय अडचणीत येत होत्या आणि त्यांना तो व्यवसाय बंद करावा लागायचा. सतत अपयश पदरी पडत असतानाही त्यांनी धीर सोडला नाही, पण आर्थिक नुकसान वाढत गेलं. अखेर, १३ व्यवसाय अपयशी ठरल्यानंतर त्यांच्यावर ८७ लाख रुपयांचं कर्ज झालं आणि त्यांची संपूर्ण आर्थिक घडी विस्कटली.

    या संघर्षमय काळात त्यांच्या कुटुंबावर आणखी मोठं संकट कोसळलं. ते म्हणजे त्यांच्या बहिणीच्या लग्नाच्या अवघ्या दोन दिवसांनी त्यांच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. या धक्क्याने अंचल कुमार पूर्णतः खचले, पण त्यांच्या आईने त्यांना आधार दिला. आईच्या विश्वासामुळे त्यांनी पुन्हा प्रयत्न सुरू ठेवले आणि अपयशावर मात करण्याचा निर्धार केला. मात्र, दुर्दैवाने वडिलांच्या निधनानंतर अवघ्या सहा महिन्यांत त्यांच्या आईचंही निधन झालं. एकाच वर्षात दोन्ही पालकांना गमावल्यामुळे त्यांचं मानसिक आणि आर्थिक संतुलन पूर्णतः ढासळलं होतं.

    पुन्हा उभारणी आणि मोठे यश

    आधीच कर्जात बुडालेल्या अंचल यांना आता कोणीही कर्ज देण्यास तयार नव्हतं. त्यांनी इंदोर येथे एक कॅफे सुरू केला. पण तिथेही त्यांना यश मिळालं नाही. याआधी १३ व्यवसाय अपयशी ठरले होते, त्यामुळे त्यांच्याकडे गमावण्यास काहीच उरलं नव्हतं.  त्यांनी पुन्हा एकदा मेहनतीने फंड गोळा करण्यास सुरुवात केली. आर्थिक अडचणी, सामाजिक दबाव आणि स्वतःच्या अपयशांचा सामना करताना त्यांच्यातील जिद्द मात्र कायम राहिली. हळूहळू त्यांच्या प्रयत्नांना यश मिळायला लागलं. 

    शेवटी, २३ जुलै २०१९ रोजी त्यांनी जबलपूर येथे “डोसा क्रश” या ब्रँडचं पहिलं आउटलेट सुरू केलं. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याने त्यांचा हा प्रयत्न अत्यंत यशस्वी ठरला. त्यांच्या स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पदार्थांनी ग्राहकांना आकर्षित केलं आणि अल्पावधीतच त्यांचा ब्रँड लोकप्रिय होऊ लागला. केवळ तीन महिन्यांत त्यांनी दुसरं आउटलेट सुरू केलं, आणि त्यानंतर परिस्थिती सुधारत गेली. वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी ३ लाख रुपये प्रति फ्रँचायझी दराने नवीन शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे, त्यांनी “डोसा क्रश” या ब्रँडला नव्या जोमाने बाजारात विस्तारायला सुरुवात केली आणि त्याच्या यशस्वी प्रवासाची सुरुवात झाली.

    डोसा क्रश: एक लोकप्रिय फास्ट फूड ब्रँड

    “डोसा क्रश” ही एक फास्ट फूड फ्रँचायझी आहे, जी पारंपरिक दक्षिण भारतीय पदार्थांना आधुनिक ट्विस्ट देऊन ग्राहकांसमोर सादर करते. या ब्रँडची खासियत म्हणजे दर्जेदार आणि स्वादिष्ट पदार्थ परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करून देणं. त्यामुळे ग्राहकांना उत्तम चव आणि उत्कृष्ट गुणवत्ता एकाच ठिकाणी मिळते. आज “डोसा क्रश” केवळ दक्षिण भारतीय पदार्थांपुरता मर्यादित न राहता, चायनीज, कॉन्टिनेंटल आणि फास्ट फूडमध्येही विस्तारली आहे. 

    नवीन उत्पादने आणि आव्हाने

    डोसा क्रश नेहमीच नाविन्यपूर्ण पदार्थ ग्राहकांसमोर आणत आहे. त्यांनी जैन अमेरिकन डोसा, चीज डोसा, पिझ्झा उत्तप्पम आणि स्प्रिंग रोल डोसा यांसारखे नवे आणि आकर्षक पदार्थ सादर केले आहेत, जे ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहेत.

    कोविड महामारीच्या काळात “डोसा क्रश” च्या अनेक शाखांना स्थलांतर करावं लागलं. मात्र, आधीच अनेक अपयशांचा सामना केलेल्या अंचल कुमार यांच्यासाठी ही परिस्थिती नवीन नव्हती. त्यांनी पुन्हा नव्याने उभारी घेतली आणि व्यवसाय वाढवला. आज छिंदवाडा, सागर, डिंडोरी यांसारख्या मध्य प्रदेशातील शहरांसह त्यांच्या अनेक  ठिकाणी शाखा सुरू आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे आणि ग्राहकांच्या प्रतिसादामुळे आज “डोसा क्रश” चा वार्षिक व्यवसाय १.५ ते २ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

    मित्रांनो, अंचल कुमार चौरसिया यांचा प्रवास सोपा नव्हता. सततच्या अपयशांमुळे आर्थिक अडचणी वाढल्या, मानसिक ताण वाढला, पण त्यांनी परिस्थितीसमोर हार मानण्यापेक्षा आपल्या चुका सुधारण्यावर भर दिला. प्रत्येक अपयशातून शिकत राहिले, नव्या संकल्पना मांडत राहिले आणि अखेर यश संपादित केले. 

    त्यांचा हा प्रवास प्रत्येक तरुण उद्योजकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवलं की अपयश म्हणजे अंत नसतो, तर तो नव्या संधीचा आरंभ असतो. योग्य दिशा, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर कोणताही स्वप्नवत वाटणारा प्रवास यशस्वी होऊ शकतो. 

    आणखी वाचा:

  • महिलांना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणारी ‘लखपती दीदी’ योजना काय आहे? 

    महिलांना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणारी ‘लखपती दीदी’ योजना काय आहे? 

    महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा सगळ्या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय यश मिळवलं आहे. मात्र, आजही अनेक महिला आर्थिक मदतीअभावी आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. काहींना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा असतो, तर काहींना कौशल्य विकसित करून स्वावलंबी व्हायचं असतं. पण यासाठी लागणाऱ्या भांडवलाचा अभाव अनेक महिलांसाठी मोठी अडचण ठरतो.

    याच गोष्टीची दखल घेत केंद्र सरकारने ‘लखपती दीदी’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे त्या आपल्या कौशल्यांचा विकास करून अर्थपूर्ण उपजीविकेच्या संधी निर्माण करू शकतात. 

    एकीकडे राज्यात ‘लाडकी बहीण’ योजनेचं कौतुक होत असताना, महिलांना आर्थिक स्वावलंबन देणारी ‘लखपती दीदी’ योजना सुद्धा त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. पण ही योजना नेमकी काय आहे? तिचा लाभ कोण आणि कसा घेऊ शकतो? योजनेचे स्वरूप काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या लेखात जाणून घेऊया…

    ही योजना नेमकी आहे तरी काय?

    ‘लखपती दीदी’ योजना म्हणजे महिलांसाठी स्वावलंबनाची नवी संधी आहे. ही योजना विशेषतः महिला बचत गटांशी जोडलेल्या महिलांसाठी आहे. सुरुवातीला त्यांना विविध कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जातं, जसं की व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी, व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील संधी कशा ओळखायच्या. यामुळे महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्याचं मार्गदर्शन मिळतं.

    प्रशिक्षणानंतर, या महिलांना १ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज दिलं जातं. याचा उपयोग त्या टेलरिंग, डबे बनवणे, किराणा दुकान, शेतीपूरक उद्योग किंवा इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी करू शकतात. या कर्जावर कोणतंही व्याज नसल्यामुळे महिलांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक ताण न येता  स्वतःचा व्यवसाय उभा करता येतो.

    या योजनेचा उद्देश काय आहे?

    ‘लखपती दीदी’ योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हा आहे. केवळ घराची जबाबदारी न निभावता, महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, उत्पन्न वाढवावं आणि आत्मनिर्भर बनावं, असा या योजनेचा हेतू आहे. महिलांनी समाजात आत्मविश्वासाने उभं राहावं आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावं, हा या योजनेमागील सरकारचा मुख्य उद्देश आहे.

    या योजनेद्वारे सरकारने तीन कोटी महिलांना संधी देण्याचा निर्धार केला आहे. व्यवसायाच्या माध्यमातून या महिलांनी दरवर्षी किमान एक लाख किंवा त्याहून अधिक उत्पन्न मिळवून यशस्वी उद्योजिका बनावं,असा प्रयत्न आहे. यामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होईल आणि त्या आपल्या कुटुंबाच्या तसेच देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतील.

    या योजनेत सहभागी होण्यासाठी काय करावं लागतं?

    जर तुम्ही महिला बचत गटाची सदस्य असाल आणि स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असेल, तर ‘लखपती दीदी’ योजना तुमच्यासाठी आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी सरकारकडून प्रथम कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणात व्यवसाय सुरू करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, बाजारपेठेची समज कशी वाढवावी, आणि यशस्वी व्यवसाय कसा चालवावा याबाबत मार्गदर्शन केलं जातं.

    प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, महिलांना आपला उद्योग सुरू करण्यासाठी एक आराखडा (बिझनेस प्लान) तयार करून सरकारकडे अर्ज करावा लागतो. अर्जाची तपासणी झाल्यानंतर, सर्व अटी पूर्ण करणाऱ्या महिलांना ५ लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज दिलं जातं. यासाठी अर्जदार महिला वय १८ ते ५० वर्षांच्या दरम्यान असावी, तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा कमी असावं, आणि घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. तसेच, अर्जदार महिला बचत गटाशी जोडलेली असणं आवश्यक आहे.

    अर्ज करताना काय कागदपत्रं लागतात?

    • आधार कार्ड
    • पॅन कार्ड
    • बँक पासबुक
    • उत्पन्नाचा दाखला
    • पासपोर्ट साइज फोटो
    • मोबाईल नंबर

    या योजनेत महिलांना कोणतेही व्याज न लागणारं कर्ज मिळतं आणि त्यासोबत मोफत कौशल्य प्रशिक्षणही दिलं जातं. त्यामुळे महिलांसाठी ही एक मोठी संधी आहे. सरकारची थेट मदत मिळत असल्यामुळे उद्योजिका होण्याचं त्यांचं स्वप्न आता सहज पूर्ण होऊ शकतं.

    आणखी वाचा :

  • Inspiring Journey of Sagar Gupta | २२ व्या वर्षी ६०० कोटींचा व्यवसाय

    Inspiring Journey of Sagar Gupta | २२ व्या वर्षी ६०० कोटींचा व्यवसाय

    आजकाल बहुतेक तरुण नोकरीच्या शोधात असतात आणि शिक्षण पूर्ण करून चांगल्या पगाराची नोकरी मिळवून आयुष्य सेटल करावं अशी त्यांची इच्छा असते. मात्र काही तरुण या पारंपारिक विचारांना तडा देत पूर्णतः स्वतःच्या हिंमतीवर वाटचाल करण्याचा निर्णय घेतात. ते नवा विचार, नव्या दृष्टिकोनातून कार्य करत, आपल्या कष्टांवर विश्वास ठेवून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवतात. नोएडातील सागर गुप्ता हा याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. त्याने पारंपारिक मार्गापेक्षा वेगळं काही करण्याचा ठरवलं आणि त्यासाठी लागणारी मेहनत, दूरदृष्टी आणि आत्मविश्वास याचा त्याने वापर केला.

    केवळ २२ व्या वर्षी सागरने आपल्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात केली. आपल्या कौशल्यावर आणि दूरदृष्टीवर विश्वास ठेवून, त्याने चार वर्षांच्या कालावधीत आपल्या व्यवसायाला ६०० कोटी रुपयांच्या टर्नओव्हरपर्यंत पोचवलं. त्याचा हा प्रवास सिद्ध करतो की, आपल्या मेहनतीला जर योग्य दिशा मिळाली, तर काहीही शक्य आहे.

    आजच्या लेखात आपण सागर गुप्ताच्या याच प्रेरणादायक प्रवासावर एक नजर टाकणार आहोत.

    सुरुवातीचे दिवस व शिक्षण

    सागर गुप्ताचा जन्म आणि शिक्षण दिल्लीमध्येच झाले. लहानपणापासूनच त्याला शिक्षणात आवड होती. त्याने श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बी.कॉम. केलं. त्याच्या वडिलांची इच्छा होती की, सागर चार्टर्ड अकाउंटंट बनावा. यासाठी त्याने सीए परीक्षेची तयारी सुरू केली आणि कोचिंग घेतलं, परंतु नियतीने त्याच्यासाठी वेगळा मार्ग ठरवला होता.

    सागरला सीए होण्यापेक्षा व्यवसायात अधिक रुची होती. वडिलांचा व्यवसाय असल्यामुळे, शिक्षण घेत असतानाच त्याला उद्योग क्षेत्राची गोडी लागली. 

    सुरुवातीचे दिवस व शिक्षण

    २०१७ मध्ये सागरने आपल्या वडिलांसोबत एलईडी टेलिव्हिजन उत्पादन क्षेत्रात प्रवेश केला. भारतात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होत होती, पण चीनच्या कंपन्यांचं उत्पादन बाजारात वर्चस्व गाजवत होते. अशा स्पर्धात्मक बाजारात आपलं स्थान निर्माण करणं हे एक मोठे आव्हान होतं. सागरने एक धाडसी निर्णय घेतला आणि ‘एक्का इलेक्ट्रॉनिक्स’ ही कंपनी सुरू केली. त्याला ठाऊक होतं की, या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काहीतरी वेगळं आणि उत्तम करावं लागेल.

    सागरच्या कुटुंबात कोणीही मोठा व्यावसायिक नव्हतं, त्यामुळे व्यवसायाच्या तांत्रिक आणि व्यावसायिक बाबतीत त्याला कमी अनुभव होता. पण त्याने मेहनत, योग्य नियोजन, आणि बाजारपेठेचं  बारकाईने निरीक्षण केलं आणि ‘एक्का इलेक्ट्रॉनिक्सला यशाच्या मार्गावर नेलं. अनेक अडचणी येत होत्या, पण सागरने प्रत्येक अडचणीला संधी मानून त्यावर काम केलं.

    त्याला एक मोठं आव्हान होतं, ते म्हणजे चीनच्या उत्पादनांच्या तुलनेत भारतीय उत्पादने महाग होती. चीनच्या कंपन्यांची उत्पादने स्वस्त आणि सहज उपलब्ध होती, तर भारतीय ग्राहकांना स्थानिक उत्पादनांचा स्वीकार करवून घेणं खूप कठीण होतं. पण सागरने ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचा लाभ घेत, उत्पादनांची गुणवत्ता वाढवली आणि विश्वासार्हता निर्माण केली. यामुळे त्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला आणि त्याने भारतीय बाजारपेठेत आपलं स्थान निर्माण केलं.

    एक्का इलेक्ट्रॉनिक्स – विस्तार आणि यश

    आज ‘एक्का इलेक्ट्रॉनिक्स’ कंपनी एलईडी टीव्ही, स्मार्टवॉच, इअरफोन, हेडफोन, वॉशिंग मशीन यासारखी विविध उत्पादने तयार करते. भारतातील १०० हून अधिक व्यावसायिक या कंपनीकडून उत्पादने घेत आहेत. कंपनीने आपली गुणवत्ता, विश्वसनीयता आणि इतर गुणात्मक वैशिष्ट्यांमुळे बाजारात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे.

    कंपनीचे मुख्य उत्पादन केंद्र सोनीपत, हरियाणा येथे स्थित आहे, जिथे १,००० हून अधिक कुशल कामगार आणि अभियंते कार्यरत आहेत. कंपनीत दर महिन्याला लाखाहून अधिक एलईडी टीव्हीचे उत्पादन केले जाते. २०२२-२३ मध्ये कंपनीने ६०० कोटी रुपयांचा महसूल गाठला, जो त्याच्या व्यवसायातील मोठ्या यशाचं प्रतीक आहे.

    Sagar Gupta started Ekkaa Electronics Industries with his father at the age of 22

    सागर आणि त्याच्या वडिलांनी आता नोएडामध्ये १,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करून नवीन उत्पादन सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुरुवातीला ४०० कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत. या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन प्रक्रियेचे सुधारणा केली जाईल. ‘एक्का इलेक्ट्रॉनिक्स’ने देशांतर्गत उत्पादनाला चालना दिली आहे, आणि आज भारतात तयार होणारी उत्पादने जागतिक दर्जाची बनली आहेत. त्यामुळे, त्यांची उत्पादने आता परदेशी कंपन्यांना टक्कर देत आहेत.

    मित्रांनो, सागर गुप्ता याचा प्रवास हा केवळ एक व्यवसायिक यशोगाथा नाही, तर तो अनेक तरुणांसाठी एक प्रेरणा आहे. त्याने सिद्ध केलं आहे की योग्य संधीचा लाभ घेतल्यास आणि कठोर परिश्रम केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येतं.

    आणखी वाचा:

  • ATM कार्डशिवाय ATM मधून पैसे कसे काढायचे? जाणून घ्या!

    ATM कार्डशिवाय ATM मधून पैसे कसे काढायचे? जाणून घ्या!

    आजच्या डिजिटल युगात प्रत्येक क्षेत्रात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. बँकिंग प्रणालीही याला अपवाद नाही. बँकेत जाण्याची गरज न पडता, मोबाईलद्वारे अगदी सहज बँकिंग करता येते. इंटरनेटच्या मदतीने आपण बिले भरू शकतो, ऑनलाइन शॉपिंग करू शकतो आणि एका क्लिकवर पैसे ट्रान्सफरही करू शकतो. पण, तुम्ही बाहेर असाल आणि अचानक रोख रकमेची गरज भासली, पण तुमच्याकडे ATM कार्ड नसेल, तर काय कराल?

    काळजी करू नका! आता नवीन तंत्रज्ञानामुळे UPI-आधारित कार्डलेस कॅश विथड्रॉल ही सुविधा काही प्रमुख बँकांच्या ATM मध्ये सुरू करण्यात आली आहे. SBI, HDFC, आणि PNB यांसारख्या प्रमुख बँका ही सेवा पुरवत आहेत. या सुविधेच्या मदतीने तुम्ही BHIM, Google Pay, PhonePe, Amazon Pay, Paytm यांसारख्या UPI ॲप्सचा वापर करून सहज पैसे काढू शकता.

    आजच्या लेखात आपण या सुविधेचा वापर कसा करायचा ते सविस्तर समजून घेऊया!

    UPI द्वारे ATM मधून पैसे कसे काढायचे?

    जर तुमच्याकडे ATM कार्ड नसेल आणि तुम्हाला अर्जंट पैसे काढायचे असतील, तर घाबरू नका! UPI-सक्षम ATM चा वापर करून तुम्ही सहज पैसे काढू शकता. फक्त खालील स्टेप्स फॉलो करा. 

    UPI वापरून ATM मधून पैसे काढण्याची प्रक्रिया

    १. जवळच्या UPI सुविधा असलेल्या ATM मध्ये जा.
    २. ATM स्क्रीनवर “UPI Cash Withdrawal” हा पर्याय निवडा.
    ३. काढायची रक्कम टाका (कमाल ₹ ५००० पर्यंत).
    ४. स्क्रीनवर QR कोड दिसेल.
    ५. तुमच्या मोबाईलमधील UPI ॲप उघडा आणि QR कोड स्कॅन करा.
    ६. UPI पिन टाका आणि “Proceed” वर टॅप करा.
    ७. ATM मधून पैसे मिळतील!

    ही प्रक्रिया पूर्णतः सुरक्षित आहे कारण यामध्ये कार्डशिवाय व्यवहार केला जातो, म्हणजेच कोणतेही ATM कार्ड वापरण्याची गरज नाही. तसेच, OTP शिवाय ट्रान्झॅक्शन होत असल्याने फसवणुकीचा धोका कमी होतो. ही पद्धत वेगवान आणि सोपी असल्यामुळे काही सेकंदांतच तुम्हाला हवी ती रक्कम मिळते. त्यामुळे ATM कार्ड हरवले तरी चिंता नाही, UPI ATM द्वारे पैसे काढणे सोपे, सुरक्षित आणि जलद झाले आहे. 

    UPI म्हणजे काय?

    UPI (Unified Payments Interface) म्हणजे डिजिटल पेमेंट करण्याची एक सोपी आणि वेगवान प्रणाली आहे. याच्या मदतीने तुम्ही एका बँक खात्यातून दुसऱ्या बँकेत क्षणात पैसे ट्रान्सफर करू शकता. खास गोष्ट म्हणजे, UPI वापरून तुम्ही QR कोड, मोबाईल नंबर किंवा UPI ID द्वारे सहज व्यवहार करू शकता.

    UPI मुळे पैसे पाठवणे, ऑनलाइन खरेदी करणे आणि कार्डशिवाय ATM मधून पैसे काढणे अगदी सोपे झाले आहे. तुम्ही कुठूनही आणि केव्हाही पेमेंट करू शकता, त्यामुळे रोख पैशांची गरज कमी होते आणि व्यवहार अधिक सुरक्षित आणि सोपे होतात.

    UPI-आधारित कार्डलेस व्यवहाराचे फायदे

    UPI-आधारित कार्डलेस कॅश विथड्रॉल ही डिजिटल बँकिंगमधील मोठी क्रांती आहे. ही सेवा सुरक्षित, सुलभ आणि वेगवान आहे. कार्ड चोरी किंवा फ्रॉडचा कोणताही धोका नाही, कारण यात कोणतेही ATM कार्ड वापरण्याची आवश्यकता नसते. तसेच, OTP शिवाय ट्रान्झॅक्शन पूर्ण करता येत असल्यामुळे प्रक्रिया अधिक सुरक्षित होते. काही सेकंदांत पैसे काढण्याची सुविधा मिळते आणि २४ तास केव्हाही व्यवहार करता येतो, त्यामुळे रोख पैशांची गरज भासली, तरी कोणतीही अडचण येत नाही.

    ही सुविधा वापरून तुम्ही स्मार्ट आणि सुरक्षित बँकिंगचा अनुभव घेऊ शकता. त्यामुळे पुढच्या वेळी ATM कार्ड विसरले तरी काळजी करू नका, तुमच्या मोबाईलमधील UPI ॲप तुमच्या मदतीला येईल!

    आणखी वाचा:

  • स्मार्ट बचतीसाठी 6 महत्त्वाचे नियम

    स्मार्ट बचतीसाठी 6 महत्त्वाचे नियम

    स्मार्ट बचत म्हणजे फक्त पैसे बाजूला ठेवणं नव्हे, तर त्याचा विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध वापर करणं. बचतीच्या चांगल्या सवयी लावून घेतल्या, तर भविष्यातील आर्थिक संकटांपासून बचाव करता येतो. यासाठी काही सोपे आणि परिणामकारक नियम आहेत. या लेखात आपण असेच सहा महत्त्वाचे नियम जाणून घेऊ, जे तुम्हाला आर्थिक स्थिरता आणि सुरक्षित भविष्य घडवण्यासाठी मदत करतील.

    १. ५०/३०/२० बजेट नियम

    ५०/३०/२० बजेट नियम म्हणजे मिळणाऱ्या पैशांचं योग्य नियोजन करण्याचा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. या नियमानुसार, तुमच्या उत्पन्नाचा ५०% भाग गरजेच्या गोष्टींसाठी वापरावा. यामध्ये घरभाडं, वीजबिल, किराणा सामान आणि दैनंदिन आवश्यक खर्च येतात. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या गरजा व्यवस्थित पूर्ण होतील आणि आर्थिक तणाव टाळता येईल.

    यानंतर, ३०% पैसा तुमच्या आवडीनुसार खर्च करण्यासाठी ठेवा. जसं की हॉटेलिंग, शॉपिंग किंवा मनोरंजन. उरलेला २०% भाग बचतीसाठी ठेवल्यास तुमचं भविष्य सुरक्षित होईल. यामध्ये आपत्कालीन फंड, कर्जफेड आणि गुंतवणुकीचा समावेश असतो. हा नियम पाळल्यास खर्च आणि बचतीचं योग्य संतुलन राखता येईल आणि आर्थिक स्थिरता मिळवणं सोपं होईल.

    २. 1% नियम – मोठी खरेदी करण्यापूर्वी विचार करा!

    कधी कधी महागडी खरेदी करताना घाई करू नये, कारण अशा खरेदीचा विचार न करता घेतलेला निर्णय नंतर पश्चातापाचे कारण ठरू शकतो. 1% नियम यासाठी मदत करतो. या नियमानुसार, जर एखाद्या वस्तूची किंमत तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 1% पेक्षा जास्त असेल, तर ती त्वरित खरेदी न करता किमान 3 दिवस वाट पाहा.

    हे 3 दिवस तुम्हाला शांतपणे विचार करण्यासाठी वेळ देतील. जर तीन दिवसांनीही ती वस्तू गरजेची वाटत असेल, तरच ती घ्या. यामुळे अनावश्यक खर्च टाळता येईल आणि पैसे फक्त आवश्यक गोष्टींसाठीच वापरता येतील. हा नियम पैसे वाचवण्यासाठी आणि आर्थिक शिस्त ठेवण्यासाठी खूप उपयोगी आहे.

    ३. ७२ चा नियम – पैशांची वाढ समजून घ्या!

    तुमची गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील, हे समजण्यासाठी ७२ चा नियम खूप उपयुक्त आहे. यासाठी फक्त ७२ ला तुमच्या गुंतवणुकीवरील वार्षिक व्याजदराने भाग द्या. उदाहरणार्थ, जर तुम्हाला ८ टक्के व्याज मिळत असेल, तर तुमचे पैसे ९ वर्षांत दुप्पट होतील (७२ ÷ ८ = ९).

    हा नियम गुंतवणुकीतील चक्रवाढ व्याजाचे महत्त्व समजायला मदत करतो. योग्य ठिकाणी आणि योग्य व्याजदराने दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास पैसे वेगाने वाढू शकतात. त्यामुळे, भविष्यात चांगला नफा मिळवण्यासाठी आणि स्मार्ट गुंतवणुकीसाठी हा नियम लक्षात ठेवा. 

    ४. ३ पट आपत्कालीन फंड नियम 

    आयुष्यात कधीही अनपेक्षित खर्च येऊ शकतात. अशा वेळी अडचणीत येऊ नये म्हणून किमान ३ ते ६ महिन्यांचे उत्पन्न बाजूला ठेवणं गरजेचं आहे. हा फंड नोकरी जाणं, मोठा आजार उद्भवणं किंवा तातडीच्या स्थितीच्या परिस्थितीत उपयोगी पडतो.

    जर तुमच्याकडे हा फंड असेल, तर अचानक आलेल्या खर्चामुळे तुमचे दैनंदिन जीवन अडथळ्याशिवाय सुरू राहू शकते. म्हणूनच, दरमहा थोडेसे पैसे वाचवून हा फंड तयार करा, जेणेकरून भविष्यात कोणत्याही आर्थिक संकटाला निर्धास्तपणे तोंड देता येईल.

    ५. स्वयंचलित बचत नियम

    बचत करायची आहे, पण प्रत्येक वेळी लक्षात राहत नाही? यावर स्वयंचलित बचत हा उत्तम उपाय आहे. बँकेत ऑटोमॅटिक ट्रान्सफर सेट करा, म्हणजे ठराविक रक्कम दर महिन्याला तुमच्या बचत खात्यात जमा होईल. यामुळे तुम्हाला वेगळे प्रयत्न न करता बचत करता येईल.

    “पैसे खर्च करण्याआधी बचत करा हा नियम पाळल्यास तुम्ही हळूहळू चांगली आर्थिक सवय लावू शकता. यामुळे तुमच्या भविष्यासाठी पैसे साठतील आणि आर्थिक स्थिरता मिळवणं सोपं होईल.

    ६. ‘नवीन वस्तू, जुनी बाहेर’ नियम

    जेव्हा तुम्ही काही नवीन वस्तू खरेदी करता, तेव्हा काहीतरी जुने दान करा, विकून टाका किंवा त्याचा  पूर्ण वापर करा. यामुळे घरात नको असलेल्या वस्तूंचा ढीग जमा होत नाही आणि तुम्ही फक्त आवश्यक गोष्टींवरच खर्च करता.

    हा नियम पाळल्याने घर स्वच्छ आणि व्यवस्थित राहील. अनावश्यक वस्तू काढून टाकल्याने अधिक जागा मिळते आणि खर्चही कमी होतो. त्यामुळे गरजेच्या गोष्टींवरच लक्ष केंद्रित करता येतं. 

    या सहा नियमांचे पालन करून तुम्ही आर्थिक स्थिरता मिळवू शकता. बजेट तयार करणं, शिस्तबद्ध बचत, योग्य गुंतवणूक आणि खर्चावर नियंत्रण ठेवणं या सवयी आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने महत्त्वाच्या ठरतात. विचारपूर्वक निर्णय घेऊन आणि योग्य नियोजनाच्या मदतीने तुम्ही भविष्यासाठी सुरक्षित पायाभूत व्यवस्था उभारू शकता.

    आणखी वाचा:

  • Pulse Candy: कोणतीही जाहिरात न करता ३५० कोटींचा टप्पा गाठलेला यशस्वी ब्रँड!

    Pulse Candy: कोणतीही जाहिरात न करता ३५० कोटींचा टप्पा गाठलेला यशस्वी ब्रँड!

    आजच्या काळात कोणताही नवीन ब्रँड मोठा करण्यासाठी जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च होतात. मोठमोठे सेलिब्रिटी, आकर्षक टीव्ही ऍड्स आणि सोशल मीडियावर महागड्या मार्केटिंग मोहिमांचा वापर केला जातो. मात्र, Pulse कँडीने हे सर्व नियम मोडून एक नवा इतिहास रचला. कोणतीही जाहिरात न करता, केवळ आपल्या अनोख्या चवीच्या जोरावर या ब्रँडने ३५० कोटींचा टप्पा ओलांडला.

    ही कँडी २०१५ मध्ये बाजारात आली आणि काही महिन्यांतच ती सर्वाधिक विक्री होणाऱ्या कँडींपैकी एक बनली. तिच्या यशामागे प्रचंड मेहनत, एक अनोखी रणनीती होती, ज्यामुळे या साध्या वाटणाऱ्या कँडीला FMCG (Fast-moving consumer goods) क्षेत्रात सर्वात मोठा ब्रँड बनवलं. चला तर मग, या लेखात आपण Pulse च्या या अद्भुत यशामागची कारणे जाणून घेऊया!

    बाजारातील संधी ओळखून नवा प्रयोग

    २०१५ मध्ये भारताच्या ₹ ८,००० कोटींच्या कँडी मार्केटमध्ये प्रामुख्याने गोडसर कँडीजचा दबदबा होता. मात्र, भारतीय चविष्ट खाद्यसंस्कृती पाहता, आंबट-तिखट चव असलेल्या कँडीची मागणी असू शकते, हे DS ग्रुपने (Rajnigandha आणि Pass Pass फेम) अचूक ओळखलं. लोकांना लहानपणीची आठवण करून देणारी, कैरीवर मीठ-मिरची लावून खाल्ल्याचा स्वाद देणारी कँडी बाजारात नव्हती. याच संधीचा फायदा घेत त्यांनी Pulse कँडी तयार केली. ही कॅंडी चॉकलेट किंवा गोडसर मिठाईसारखी नव्हती, तर भारतीय चवीशी एकरूप झालेली होती. Pulse लाँच होताच ग्राहकांनी ती उचलून धरली. चटकदार चव आणि योग्य किंमत यामुळे लोक स्वतःच या कँडीची जाहिरात करू लागले.

    शून्य जाहिरात खर्च, तरीही अफाट लोकप्रियता!

    Pulse च्या चटपटीत आणि वेगळ्या चवीनं लोकांना लगेचच आकर्षित केलं. एकाने खाल्ल्यानंतर दुसऱ्यालाही खायला दिली, मित्रांनी एकमेकांना सांगितलं, कुटुंबात आणि नातेवाईकांमध्येही चर्चा सुरू झाली. हळूहळू “वर्ड ऑफ माऊथ” हेच Pulse चं सर्वात प्रभावी मार्केटिंग ठरलं. केवळ चवीच्या जोरावर ही कँडी घराघरात पोहोचली आणि भारतीय कँडी मार्केटमध्ये नवा ट्रेंड निर्माण केला.

    टीव्ही ऍड्स, सोशल मीडिया मार्केटिंग, सेलिब्रिटी प्रमोशन यांसारख्या विविध मार्गांचा वापर करून कंपन्या आपली उत्पादने लोकप्रिय करतात. मात्र, Pulse कँडीसाठी कंपनीने जाहिरातीवर एकही रुपया खर्च केला नाही. ना कोणतीही जाहिरात मोहीम राबवली, ना मोठ्या ब्रँड्सप्रमाणे सेलिब्रिटींच्या मदतीनं प्रमोशन केलं. तरीही ही कँडी तुफान गाजली आणि संपूर्ण भारतभर पोहोचली.

    DS ग्रुपची अनोखी मार्केटिंग युक्ती

    DS ग्रुपला मार्केटिंगचं तंत्र चांगलंच ठाऊक होतं. रजनीगंधा आणि पास पाससारख्या यशस्वी उत्पादनांचा अनुभव त्यांच्याकडे होता. त्यांनी ओळखलं की लोकांना Pulse कँडीची चव आवडतेय आणि तिची मागणी वाढतेय. ही उत्सुकता टिकून राहावी आणि कँडीला अधिक महत्त्व मिळावं, म्हणून त्यांनी सुरुवातीला Pulse मर्यादित प्रमाणातच बाजारात आणली.

    Pulse प्रथम केवळ गुजरात आणि राजस्थानमध्ये लाँच करण्यात आली. लोकांनी ही कँडी शोधायला सुरुवात केली. विक्रेत्यांनी स्टॉक मर्यादित ठेवल्यामुळे ती मिळवण्यासाठी स्पर्धा वाढली. त्यामुळे Pulse ही सामान्य कँडी न राहता, एक एक्सक्लुझिव्ह प्रॉडक्ट वाटू लागली. या रणनीतीमुळे कँडीची लोकप्रियता झपाट्याने वाढली आणि Pulse एक मोठा ब्रँड बनला.

    ८ महिन्यांत १०० कोटींची विक्रमी विक्री

    Pulse हा केवळ महिन्यांत १०० कोटींची विक्री करणारा भारतातील सर्वात वेगाने वाढणारा FMCG ब्रँड ठरला. यामागे काही महत्त्वाची कारणे होती. कँडीची किंमत फक्त रु. असल्यामुळे कोणालाही सहज खरेदी करता येत होती. हिरवट-पिवळ्या आकर्षक पॅकेजिंगमुळे ती लगेचच लक्ष वेधून घेत होती. 

    Pulse ची मागणी इतकी वाढली की दुकानांमध्ये ती मिळवण्यासाठी रांगा लागत होत्या. काही किरकोळ विक्रेत्यांनी तर Pulse मिळवण्यासाठी वेटलिस्ट तयार केली होती, तर काहींनी जास्त किमतीला विकायला सुरुवात केली. लोकांमध्ये निर्माण झालेल्या या क्रेझमुळे Pulse कँडीच्या लोकप्रियतेला अधिकच गती मिळाली आणि ती भारतभर गाजली.

    भारतातून परदेशापर्यंत पोहोचलेली Pulse!

    २०१८ पर्यंत Pulse भारतातील २० लाखांहून अधिक दुकानांमध्ये उपलब्ध झाली. प्रवासी भारतीय ही कँडी परदेशात घेऊन जाऊ लागले आणि हळूहळू ती अमेरिका आणि दुबईतही प्रसिद्ध झाली. या लोकप्रियतेला आणखी चालना देण्यासाठी DS ग्रुपने संत्री, अननस आणि पेरू असे नवीन फ्लेवर्स सादर केले. मात्र, कच्चा आंबा हा मूळ फ्लेवर सर्वाधिक विकला गेला.

    २०१९ मध्ये कंपनीने  बाजारात फॅमिली पॅक्स आणि गिफ्ट पॅक्स आणले, ज्यामुळे विक्रीत मोठी वाढ झाली आणि Pulse ने तब्बल ३५० कोटींचा टप्पा पार केला. इतकंच नाही तर, कँडी मार्केटमध्ये ४८% मार्केट शेअर मिळवत Pulse ने नवा विक्रम प्रस्थापित केला. हे यश केवळ उत्कृष्ट चवीमुळे नव्हतं, तर त्यामागे बाजारपेठेचा सखोल अभ्यास आणि योग्य व्यूहरचना होती. ग्राहकांच्या आवडी समजून DS ग्रुपने नेमकी त्याच चवीची कँडी बाजारात आणली आणि इतिहास घडवला. 

    मित्रांनो, Pulse कँडीचे यश हे उत्तम मार्केटिंग आणि ब्रँडिंगचं उदाहरण आहे. योग्य नियोजन, उत्कृष्ट चव आणि प्रभावी वितरण यांच्या जोरावर जाहिरात न करता देखील एखादं उत्पादन मोठं होऊ शकतं, हे Pulse ने सिद्ध केलं आहे. आजही ती बाजारात तितकीच लोकप्रिय असून, नव्या ब्रँड्सच्या स्पर्धेत टिकून आहे.

  • Referrush Success Story: लकवा झाला… पण आज कमवतो रोज दीड लाख रुपये!

    Referrush Success Story: लकवा झाला… पण आज कमवतो रोज दीड लाख रुपये!

    यशाचा मार्ग कधीच सोपा नसतो. त्यात मेहनत, संघर्ष आणि जिद्द असते. प्रत्येकजण या मार्गावर यशस्वी होतोच असं नाही, पण काही जण अपयशाला न जुमानता पुढे जातात आणि स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात. विक्रम पै हे या गोष्टीचं उत्तम उदाहरण आहे.

    बंगळुरूमधील हा तरुण उद्योजक आज ReferRush या प्रसिद्ध ई-कॉमर्स रेफरल सेल्स प्लॅटफॉर्मचा संस्थापक आणि सीईओ आहे. पण त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. गेल्या सहा वर्षांत त्याने पाच व्यवसाय सुरू केले, पण त्यातला एकही यशस्वी झाला नाही. त्यामुळे त्याला तब्बल दोन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावं लागलं. तरीही त्याने हार मानली नाही. प्रत्येक अपयशातून शिकत, जिद्दीने पुढे जात अखेर ReferRush हा यशस्वी व्यवसाय उभारला. आज तो केवळ एक यशस्वी उद्योजक नाही, तर चिकाटी आणि मेहनतीचं उत्तम उदाहरण आहे. या लेखात आपण त्याच्या संघर्षमय प्रवासावर एक नजर टाकूया.  

    सुरुवातीचा संघर्ष आणि सलग अपयश

    बंगळुरूमध्ये जन्मलेल्या विक्रमने शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोठ्या आत्मविश्वासाने आणि उत्साहाने उद्योजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्याची स्वप्नं मोठी होती, यशस्वी होण्याची जिद्दही होती. मात्र, व्यवसायाच्या वाटचालीत अनेक अडथळे आले. अनुभव आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्याने सुरू केलेले एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच व्यवसाय अपयशी ठरले. सततच्या अपयशामुळे मोठं आर्थिक संकट कोसळलं. त्याला जवळपास दोन कोटी रुपयांचं नुकसान झालं. परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत गेली. मित्रांनी दुरावा निर्माण केला, नातेवाईक टीका करू लागले आणि आईचाही त्याच्यावरचा विश्वास कमी झाला. एका क्षणाला परिस्थिती अशी आली की, खिशात फक्त ४,००० रुपये उरले. कर्मचाऱ्यांना पगार देणेही शक्य नव्हते. काही जणांनी त्याची थट्टा केली. “एलन मस्क बनायचा प्रयत्न करतोय का?” असे टोमणे मारले.

    सततच्या तणावाचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर झाला. मानसिक तणावामुळे शरीर साथ सोडू लागलं. अखेर त्याला लकवा झाला आणि त्याचे चालणे, बोलणेही कठीण झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यासारखी वाटू लागली. तो खचला, रडला, पण हार मानली नाही. डोळ्यांतले स्वप्न जिवंत ठेवत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. या कठीण काळात स्वतःशीच लढण्याचा निर्धार केला आणि नव्या उर्जेने पुन्हा उभं राहण्याचा निश्चय केला.

    ReferRush ची स्थापना आणि पहिलं यश

    अनेक अपयशांनंतरही विक्रमने हार मानली नाही. नव्या उमेदीनं त्याने ReferRush या रेफरल मार्केटिंग प्लॅटफॉर्मची सुरुवात केली. सुरुवातीला हा व्यवसायही अपयशी ठरेल, असं अनेकांना वाटत होतं. पण यावेळी विक्रम मागे हटणार नव्हता. ReferRush व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांच्या माध्यमातून नवीन ग्राहक मिळवण्यासाठी मदत करतं. ग्राहक कंपनीच्या उत्पादनांची माहिती इतरांना सांगतात आणि त्याबदल्यात त्यांना कमिशन मिळतं. त्यामुळे कंपन्यांना विश्वासार्ह ग्राहक मिळतात, तर ग्राहकांनाही घरबसल्या कमाईचा पर्याय उपलब्ध होतो. हळूहळू हा व्यवसाय स्थिरावत गेला आणि ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला.

    सुरुवातीला पहिल्या एक लाख रुपयांसाठी तब्बल चार महिने लागले. पण विक्रमने मेहनत आणि जिद्द कायम ठेवली. त्याच्या प्रयत्नांचा परिणाम दिसू लागला आणि आज ReferRush दररोज १.५ लाख रुपये कमवतो. अपयशाच्या काळात खचून न जाता ज्या चिकाटीने विक्रमने प्रयत्न सुरू ठेवले, त्याच जिद्दीमुळे त्याला यशाचा हा टप्पा गाठता आला.

    निखील कामतकडून ReferRush ला फंडिंग – यशाच्या नव्या पर्वाची सुरुवात

    विक्रमच्या अथक मेहनतीला अखेर मोठं यश मिळालं. त्याच्या ReferRush या रेफरल मार्केटिंग स्टार्टअपने उद्योगविश्वात ठसा उमटवायला सुरुवात केली होती. याच प्रवासात, भारतातील नामवंत उद्योजक निखील कामत यांच्या कंपनीने ReferRush ला इनिशिएटिव्ह फंडिंगसाठी निवडलं. तब्बल २,४०० कंपन्यांमधून ReferRush ची निवड होणं हे विक्रमसाठी एका मोठ्या यशाचं प्रतीक होतं. यामुळे केवळ आर्थिक पाठबळच नाही, तर या प्लॅटफॉर्मच्या भविष्यासाठीही एक मजबूत दिशा मिळाली. आता त्याला ठाम विश्वास आहे की, लवकरच प्रत्येक ई-कॉमर्स ब्रँड आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी ReferRush चा वापर करेल.

    विक्रमच्या मते, त्याचा संपूर्ण प्रवास हा शिकण्याचा होता. सुरुवातीची पाच वर्षं त्याने प्रयोग आणि चुका यातून शिकण्यात घालवली. अपयश आलं तरीही आत्मविश्वास कधीही गमावला नाही. व्यवसायात संकटं आली, आर्थिक तोटा सहन करावा लागला, शारीरिक आणि मानसिक त्रासही सोसावा लागला. पण तरीही तो जिद्दीने लढत राहिला. त्याच्या मते, “जर तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण होत असतील, तर तुम्ही तुमचं स्वप्न नक्कीच साकार करू शकता.”

    आज विक्रमच्या संघर्षाची कहाणी हजारो तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अपयशाला घाबरून थांबण्यापेक्षा त्यातून शिकून पुढे जाणं हेच यशाचं खरं रहस्य आहे. विक्रमने ते करून दाखवलं. 

    आणखी वाचा: