Author: naviarthkranti

  • सोशल मीडिया फॉर बिझनेस ग्रोथ

    सोशल मीडिया फॉर बिझनेस ग्रोथ

    डिजिटल मार्केटिंगच्या विश्वात

    सोशल मीडिया, वेबसाईट, डिजिटल प्रोग्रॅमिंग हे रोजच्या जीवनाचे भाग बनले आहेत. अशा काळात प्रत्येक उद्योजकाच्या पोटात भीतीचा गोळा आणणारी गोष्ट म्हणजे ज्याला डिजीटल जगाशी जोडता येणार नाही त्या उद्योजकाचा व्यवसाय कालबाह्य ठरणार आहे. पानपट्टी, टॅक्सी, रिक्षा, किराणा दुकाने सुध्दा ऑनलाईन व्हायला लागली आहेत.

    डिजीटल उपकरणांमुळे जग एकदम जवळ आले. त्यात प्रचंड बदल झाले. या आभासी जगाशी आपल्याला जुळवून घेण्यासाठी तयार राहणे गरजेचे आहे. या नव्या डिजीटल जगात हौस – नवसे – गवसे यांची संख्या सुध्दा प्रचंड प्रमाणात वाढली आहे. म्हणून आपला व्यवसाय डिजीटल करण्याआधी आपल्याला डिजीटल मार्केटिंगची पायाभूत माहिती असणे गरजेचे आहे. आपण जर या क्षेत्राशी संपूर्णपणे अनभिज्ञ असू तर भरल्या बाजारात आपल्याला ठगवणाऱ्यांची संख्या कमी नाही. तेव्हा जाणकार बनण्यासाठी आपल्याला डिजीटल मार्केटिंग कळणे, त्याच्या सेवा कुणाकडून घ्यायच्या कोणावर विश्वास ठेवायचा हे शिकणे सुध्दा गरजेचे आहे.

    गेल्या पाच वर्षात जेवढे बदल आपण पाहिलेले आहेत. तेवढे बदल संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात घडून आलेले नाहीत. गेल्या काही वर्षात आपल्याला वस्तू खरेदी करण्यासाठी किराणा दुकान, सुपर मार्केट व मॉलमध्ये जाणे भाग होते. आता मात्र घरबसल्या फ्लिककार्ट, स्नॅपडील सारख्या कंपन्यांना हव्या त्या वस्तूची ऑर्डर द्या. दुसऱ्या दिवशी ती वस्तू आपल्या दारात येऊन उभी असते. त्याचे पैसेसुध्दा वस्तू हातात मिळाल्यावरच द्यायचे आहेत. पैशासाठी नोटा किंवा रोख रक्कमेचे निम्याहून अधिक व्यवहार इतिहासजमा झाले आहेत. मोबाईलचा रिचार्ज करणारी दुकाने बंद व्हायला लागली आहेत. कारण प्रत्येकजण आपल्या मोबाईल मधून रिचार्ज करु लागला आहे.

    सायबर कॅफेत बसण्यासाठी तरुणाई रांग लागलेली असायची त्या ठिकाणी आता सायबर कॅफे औषधाला सुध्दा सापडणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. डाटा सेवेवर पैसे कमावणाऱ्या टेलिकॉम कंपन्यामध्ये जास्तीत जास्त डाटा व इंटरनेट स्पीड देण्याची जणू काही स्पर्धाच चालू झालेली आहे. प्रत्येकाच्या हातात डिजीटल उपकरणे आलेली आहेत. ती कमालीची स्वस्त व खिशाला परवडणाऱ्या दरात तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. बातम्या वाचण्यासाठी वर्तमान पत्र किंवा टीव्ही वर अवलंबवून राहावे लागत नाही.

    अशा परिस्थितीत जगाची विभागणी एका न दिसणाऱ्या रेषेने दोन भागात झाली आहे. त्यातील पहिल्या भागाला वास्तव जग (Real World) म्हणतात. तर दुसऱ्या भागाला आभासी जग (Virtual World) म्हणतात. खऱ्याखुऱ्या जगात जगण्यासाठी या आभासी जगाचा आधार घेणे अपरिहार्य आहे. म्हणून या नव्या जगाशी जोडून राहण्यासाठी डिजीटल मार्केटिंगची माहिती व त्याचा वापर करुन आपला व्यवसाय वाढवणे ही प्रत्येक लहान मोठ्या उद्योजकाची गरज बनली आहे. तेव्हा आपण या डिजीटल दुनियेत प्रवेश करण्यासाठी तयार होऊया.

  • स्टीव्ह जॉब्सचे प्रचंड गाजलेले प्रेरणादायी भाषण मराठीत…!!

    स्टीव्ह जॉब्सचे प्रचंड गाजलेले प्रेरणादायी भाषण मराठीत…!!

    जगातल्या सर्वोत्तम गणल्या जाणाऱ्या महाविद्यालयांपैकी एक अशा महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात तुमच्यासोबत बोलायची संधी मला मिळते आहे, हा मी माझा बहुमान समजतो. मी महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण करू शकलो नाही. आता सत्य सांगायला हरकत नाही, पण महाविद्यालयीन दीक्षांत समारंभ इतक्या जवळून मी पहिल्यांदा पाहतो आहे.

    steve-jobs-inspirational-speech-marathi-2

    आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील तीन गोष्टी सांगणार आहे, बस्स. काही प्रचंड कहाणी नाही. फक्त तीन छोट्या गोष्टी

    पहिली गोष्ट आहे ठिपके जुळवण्याच्या संदर्भातली… मी रीड कॉलेजमधून सहा महिन्यांतच बाहेर पडलो होतो, पण त्या आधी मी जवळपास १८ महिने कॉलेजमध्येच ड्रॉप इन म्हणून घुटमळत होतो. मग मी बाहेर पडलो तरी का? 

    याची सुरुवात खरं तर माझ्या जन्माच्या आधीपासूनची आहे. माझी आई ही एक तरुण, अविवाहित महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती. आणि तिने मला दत्तक द्यायचे ठरवले. तिची फार इच्छा की, मी पदवीधर पालकांकडे दत्तक म्हणून जावे, त्यामुळे अखेर एका वकील दाम्पत्याची त्याकरिता निवड झाली. सारे कसे सुरळीत चालू होते आणि अचानक माझ्या जन्माच्या वेळी त्या दोघांनी ठरवले की त्यांना मुलगी हवी आहे. त्यामुळे वेटिंग लिस्टवर असलेल्या माझ्या आई-बाबांना रात्री अचानक फोन गेला की, ‘‘मुलगा झालाय. तुमची अजूनही त्याला स्वीकारण्याची तयारी आहे का?’’ ते म्हणाले, ‘‘अर्थातच.’’ अर्थात, नंतर माझ्या आईला कळले की माझ्या दत्तक आईने पदवी पूर्ण केली नव्हती आणि वडिलांनी तर शाळेच्या पुढेही मजल मारली नव्हती. तिने मग दत्तक कागदपत्रे साईन करायला नकार दिला. मग मला ‘महाविद्यालयीन शिक्षणापासून दूर ठेवले जाणार नाही’ या आश्वासनावरच तिने कागदांवर सह्या केल्या.

    १७ वर्षांनंतर मी खरंच कॉलेजला गेलो. मूर्खासारखे मी स्टॅन्फोर्डसारखे महागडे कॉलेज निवडले आणि माझ्या दत्तक पालकांची मध्यमवर्गीय कमाई माझ्या शिक्षणावरच खर्च होऊ लागली. सहा महिन्यांतच त्याची किंमत मला उमगेनाशी झाली. माझ्या आयुष्यात मला काय करायचे आहे याची सुतराम कल्पना नव्हती आणि कॉलेजचे शिक्षण मला याचे उत्तर शोधण्यात मदत करत नव्हते आणि मी इथे आईबाबांची आयुष्यभराची कमाई उडवण्यात गुंतलो होतो. म्हणून मी कॉलेजमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि सुस्कारा सोडला. अर्थात, त्या वेळी हा छातीत धडकी भरवणारा निर्णय होता. पण आता वाटते की कदाचित हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला निर्णय असेल. हा निर्णय पक्का झाल्याक्षणीच मी ज्या वर्गाबाबतीत उत्साही नव्हतो, तिथे जाणे बंद करून टाकले आणि ज्या वर्गामध्ये मला जाण्यात रस होता त्या वर्गाना नियमितपणे जाऊ लागलो.

    Young-steve-jobs

    हे सगळेच काही स्वप्नवत नव्हते. डोर्म मिळायची नाही, म्हणून मित्रांच्या रूम्सवर जमिनीवर झोपावे लागे. कोकच्या रिकाम्या बाटल्या देऊन मी ५ सेंट्स जमा करत असे आणि त्यातून जेवणाची तजवीज करत असे. दर रविवारी ७ मैल चालत जात असे, ‘हरे राम हरे कृष्ण’चे व्यवस्थित जेवण खायला मिळावे म्हणून. पण मला ते आवडत होते. माझी अंत:प्रेरणा आणि माझे कुतूहल यांनी मला जे काही सापडले, ते पुढे आयुष्यात अनमोल ठरले. आता हेच पाहा ना, रीड कॉलेजमध्ये त्यावेळेला बहुधा सर्वोत्तम असे कॅलिग्राफीचे (सुलेखन) वर्ग चालत. संपूर्ण परिसरात प्रत्येक भित्तीपत्रकावर, इतकेच काय अगदी खणांवरदेखील सुंदर कॅलिग्राफी केलेली आढळे. मी तसाही ड्रॉप आऊट होतो आणि मला हे कसे करतात हे जाणून घ्यायचे होते, त्यातच मला माझे नियमित वर्ग करणे जरूरीचे राहिले नव्हते. कॅलिग्राफीच्या वर्गात मी सेरिफ आणि सान्स सेरिफ फॉण्ट्सविषयी शिकलो. त्याच्याच बरोबर दोन अक्षरांमध्ये कीती जागा असावी, अक्षरे सुशोभित कशी करावी याचेही ज्ञान मिळत होते. ते सारेच फार सुंदर, ऐतिहासिक आणि कलात्मकरीत्या हळुवार होते. कदाचित शास्त्राच्या चिमटीत पकडण्यापलीकडले… मी त्याने भारावून गेलो…

    या सगळ्याचा माझ्या आयुष्यात दुरान्वयानेही काही प्रत्यक्ष लाभ होईल असं मला स्वप्नातही वाटलं नसतं. पण दहा वर्षांनंतर जेव्हा आम्ही पहिला मॅकीन्टोश कम्प्युटर बनवत होतो, हा सगळा काळ माझ्या मदतीला आला. आम्ही त्या सगळ्याचा वापर मॅकीन्टोशमध्ये केला. सुंदर टायपोग्राफी असलेला तो पहिला कम्प्युटर होता. जर मी महाविद्यालयातून त्या विषयांच्या जंजाळातून बाहेर पडलो नसतो, तर मॅकीन्टोशमध्ये विविध टाईप फेसेस आणि प्रमाणबद्ध फॉन्ट्स दिसले नसते आणि विंडोजवाल्यांनी जर मॅकीन्टोश जसाच्या तसा कॉपी केला नसता, तर आज जगातल्या कुठल्याच पीसीवर ते दिसले नसते. मी महाविद्यालयातून बाहेर पडलो नसतो, तर या कॅलिग्राफीच्या वर्गात कसा पोहोचलो असतो; आणि अर्थात, आज पीसीवर जे सुंदर टाइप फॉन्ट्स दिसतात ते कसे दिसले असते… ‘कनेक्ट द डॉट्स’ अर्थात हे ठिपके जोडणे… आज १० वर्षांनंतर मागे वळून बघताना सोप्पे जाते. तेव्हा हे कळत नव्हते.

    पुन्हा. हे ठिपके तुम्ही भविष्यात बघून नाही जोडू शकत. ते फक्त मागे वळून बघताना जोडलेले दिसतात. म्हणूनच ते पुढे जाऊन जोडले जातील, यावर विश्वास ठेवावा लागतो. तुम्हाला कशावर तरी विश्वास ठेवावाच लागतो. तुमचे मन, आतला आवाज, भाग्य, नशीब, कर्म. काहीतरी. या विचार पद्धतीने मला कधीच दगा दिलेला नाही आणि त्यामुळेच माझ्या आयुष्यात बराच बदल घडलेला आहे. 

    माझी दुसरी गोष्ट आहे प्रेम आणि तोट्याविषयी.

    मी फार नशीबवान आहे. मला काय करायला आवडते हे मला फार आधीच उमगले होते. मी २० वर्षांचा असतानाच मी आणि वोझने (स्टीव्ह वॉझनियाक) मिळून घरच्या गॅरेजमध्ये ॲपल कम्प्युटर्सची सुरुवात केली. आम्ही खूप मेहनत केली. दहा वर्षांत गॅरेजमधल्या आम्हा दोघांपासून सुरू झालेली ॲपल २ बिलियन डॉलर्स आणि ४००० कामगारांची कंपनी झाली होती. आम्ही वर्षभरापूर्वीच आमचे सर्वोत्तम काम बाजारात आणले होते. मॅकीन्टोश कम्प्युटर! मी तेव्हा फक्त ३० वर्षांचा होतो. आणि अचानक मी माझ्या कंपनीतून हाकलला गेलो. तुम्ही स्वत: स्थापन केलेल्या कंपनीतून तुम्ही स्वत: हाकलले कसे जाऊ शकता? खरं सांगायचं झालं तर जसं ॲपल वाढत होतं, त्याच्याबरोबर मला गुणी वाटणाऱ्या काही मंडळींना मी नोकरीवर ठेवले. काही वर्षे ठीक गेली, पण नंतर आमच्या दृष्टिकोनात फरक पडू लागले. अखेर भांडणे झालीच… बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी पण त्यांचीच पाठराखण केली. साहिजकच वयाच्या तिसाव्या वर्षी मी अक्षरश: हाकलला गेलो… आणि तेही अतिशय सार्वजनिक पद्धतीने… माझ्या आयुष्याचा जो केंद्रबिंदू होता, तोच गायब झाला. मी उद्ध्वस्त झालो.

    काही महिने नक्की काय करावे हेच सुचेना. मला जणू माझ्या आधीच्या कार्यकुशल उद्योजकांचा विश्वासघात केल्यासारखे वाटत राही. जणू आधी धावणाऱ्याने माझ्या हातात दिलेले निशाण मी पाडून बसलो होतो. मी डेव्हिड पेकार्ड, बोब नोईस यांना भेटलो. आणि अशा पद्धतीने घोळ घातल्याबद्दल त्यांची माफी मागितली. मी एक मोठे सार्वजनिक अपयश बनलो होतो आणि सिलिकॉन व्हॅलीतून पळून जाण्याचे विचार मनात घोळू लागले होते, पण हळूहळू एक गोष्ट जाणवायला लागली. माझे अजूनही माझ्या कामावर प्रेम होते… ॲपलमधल्या घटनांनी त्यात तीळभरही फरक पडला नव्हता. मला नाकारण्यात आले होते… पण माझे प्रेम संपले नव्हते.. म्हणूनच, मी पुन्हा सुरुवात करण्याचा निश्चय केला.

    तेव्हा तसे वाटले नसेल कदाचित, पण ॲपलमधून हाकलले जाणे ही माझ्या आयुष्यातली सर्वाधिक चांगली घटना ठरली. यशस्वी असण्याचे सगळे दडपण गळून पडले. त्याची जागा एखाद्या नवोदिताच्या खांद्यावर असलेल्या हलकेपणाने घेतली. कशाचीही खात्री नव्हती. याच स्थितीमुळे मी माझ्या आयुष्यातल्या सर्वाधिक सृजनात्मक कालखंडात प्रवेश केला.

    त्यानंतरच्या ५ वर्षांत मी ‘नेक्स्ट’ नावाची कंपनी स्थापन केली, ‘पिक्सार’ नावाची दुसरी कंपनीही उभारली आणि एका अशा भन्नाट स्त्रीच्या मी प्रेमात पडलो जिच्याशी मी लग्न केले. ‘पिक्सार’ने जगातली पहिली ॲनिमेटेड फिल्म ‘टॉय स्टोरी’ बनवली आणि आज ती जगातली पहिल्या क्रमांकाची ॲनिमेशन कंपनी आहे. गंमत म्हणजे, पुढे ‘नेक्स्ट’पण ‘ॲपल’ने विकत घेतली. आणि आम्ही ‘नेक्स्ट’मध्ये बनवलेले तंत्रज्ञान आज ‘ॲपल’च्या कामाला येते आहे. आणि ‘ॲपल’च्या यशाला ते कारणीभूत ठरते आहे.

    मला खात्री आहे की मी जर ‘ॲपल’मधून हाकलला गेलो नसतो, तर हे कधीच घडले नसते. औषधाची चव घेणे कठीण असते, पण रुग्णाला त्याचीच गरज असते. कधी आयुष्याने डोक्यात दगड घातलाच, तर निराश होऊ नका. मला खात्री आहे की जर माझे माझ्या कामावर प्रेम नसते, तर मी अशा पद्धतीने काम करत राहू शकलो नसतो. आपले प्रेम कशावर आहे याचा शोध घेत राहा. हे केवळ तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते तुमच्या कार्यक्षेत्रातही. तुमच्या आयुष्यातला एक मोठा भाग तुम्ही काम करण्यात व्यतीत करणार आहात, आणि उत्तम काम करण्याकरिता तुम्ही जे करताय त्यावर तुमचे प्रेम असणे आवश्यक आहे. जर ते तुम्हाला अजून सापडले नसेल, तर मग शोधात राहा. स्वत:ची समजूत घालून नका घेऊ. हृदयाच्या इतर गोष्टीप्रमाणेच जेव्हा तुम्हाला ते सापडेल, तेव्हा ते तुम्हाला आपोआप जाणवेल आणि एखाद्या सुंदर नात्याप्रमाणे वर्षे जशी सरकत जातील, तसतसा तुमचा त्यातला रस वाढतच राहील. म्हणून म्हणतो. शोधत राहा. स्वत:ची समजूत घालून नका घेऊ.

    माझी तिसरी गोष्ट मृत्यूविषयी आहे.

    मी १७ वर्षांचा होतो तेव्हा एक वाक्य वाचले होते. ‘जर तुम्ही रोज आपले आयुष्य आजचा दिवस शेवटचा असं समजून घालवलात, तर कमीत कमी एक दिवस तुमची समजूत खरी ठरेल.’ या वाक्याने माझ्यावर खूप परिणाम केला होता. तेव्हापासून जवळपास ३३ वर्षे मी रोज सकाळी उठतो आणि आरशात पाहून स्वत:ला विचारतो- ‘‘जर आज मला मरण यायचे असेल, तर आज जे मी करतो आहे तेच मला करायला आवडेल का?’ जर माझे उत्तर बरेच दिवस ‘नाही’ असेल, तर मला कळते की काहीतरी बदल करायची गरज आहे.

    मला लवकरात लवकर कधीही मृत्यू येऊ शकतो ही कल्पना मला माझ्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेताना खूप कामाला येते. कारण आपल्या बाह्य अपेक्षा, सारा अहंकार, लाज किंवा अपयशाची भीती हे सारं सारं मरणाच्या भीतीमध्ये नष्ट होतं. आणि जे महत्त्वाचं आहे, तेवढंच उरतं. तुम्ही मरणार आहात हे लक्षात ठेवणे म्हणजे तुम्ही काहीतरी गमावू शकता या भीतीपासून मुक्ती असं मी समजतो. तुम्ही आधीच इतके नागवे झालेले असता, की हृदयाचं सोडून दुसऱ्या कुणाचं ऐकण्याचं तुम्हाला कारणच राहत नाही.

    Steve Jobs' Cancer Treatment

    साधारण वर्षांपूर्वी मला कॅन्सर असल्याचे निदान झाले. सकाळी ७.३० वाजता माझा स्कॅन झाला आणि स्वादुपिंडापाशी मला भला मोठा ट्युमर असल्याचे स्पष्ट झाले. मला स्वादुपिंड शरीरात कुठे असते हेही ठाऊक नव्हते. डॉक्टर म्हणाले हा जवळपास असाध्य अशा स्वरूपाचा कॅन्सर आहे आणि मी काही सहा महिन्यांपेक्षा जास्त जगणार नाही. डॉक्टरने मला घरी जाऊन साऱ्या गोष्टींची आवराआवर करायला सांगितले, म्हणजे दुसऱ्या शब्दात तो मला मृत्यूसाठी तयार राहायला फर्मावत होता. याचाच दुसरा अर्थ म्हणजे पुढच्या दहा वर्षांत तुम्ही आपल्या मुलांना ज्या चार युक्तीच्या गोष्टी सांगणार होता, त्या सांगायला आता तुमच्याकडे फक्त सहा महिने आहेत. याचाच दुसरा अर्थ म्हणजे सगळी बटणं लावून तयार राहा. निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. त्या निदानासोबत मी एक दिवस घालवला. त्या दिवशी संध्याकाळी माझी बायोप्सी झाली. त्यांनी माझ्या घशावाटे आणि पोटातून आतड्यात एन्डोस्कोप घुसवला, माझ्या स्वादुपिंडात सुई खुपसून त्यांनी तिथल्या पेशी काढल्या. मला अर्थात भूल दिली होती, पण माझी पत्नी म्हणाली की, जेव्हा डॉक्टर्सनी त्या पेशी सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्या, तेव्हा ते आनंदाने रडू लागले. माझा कॅन्सर अतिशय दुर्मिळ असला, तरी शस्त्रक्रियेने तो बरा करता येण्यासारखा होता. माझ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि मी आता ठणठणीत बरा आहे.

    ही माझी मृत्यूशी झालेली सर्वात जवळची आणि बहुधा अजून दोन दशक तरी टिकेल अशी ओळख. आत्ता मी याविषयी एवढ्या अधिकारवाणीने बोलतो आहे, त्याचं कारण या एका उपयुक्त कल्पनेचं या अशा ओळखीत झालेलं रूपांतर.

    मरण कुणालाच नको असतं. अगदी ज्यांना स्वर्ग हवा असतो त्यांचीही त्याकरिता मरण्याची तयारी नसते. तरीही मरण हे आपल्या सगळ्यांना एकत्र करणारच आहे. कोणालाही ते चुकलेले नाही. आणि हे खरंच अगदी बरोबर आहे, कारण मरण हा जीवनाचा सर्वात छान शोध आहे. तो जीवनातल्या बदलाचा शिल्पकार आहे. तोच जुन्याला दूर करून नव्याची वाट मोकळी करतो. आज, कदाचित तुम्ही चर्चेत आहात, पण उद्या तुम्ही हळूहळू म्हातारे व्हाल आणि दूर सारले जाल. नाट्यमय वाटले, तरी हेच सत्य आहे.

    तुमच्याकडे अगदी मर्यादित वेळ आहे, म्हणूनच दुसऱ्या कोणाचं आयुष्य जगत तो फुकट घालवू नका. दुसऱ्यांच्या विचारावर आधारलेल्या निष्कर्षांचं जोखड आपल्या आयुष्यावर मिरवू नका. दुसऱ्यांच्या मतांच्या गलबल्यात आपला आतला आवाज दबून जाऊ नये याची काळजी घ्या. आणि सर्वात महत्त्वाचे, आपले हृदय आणि अंत:प्रेरणा यांचं ऐकायचं धाडस सदैव दाखवा. त्यांना जवळपास नेहमीच तुम्हाला काय बनायचे आहे, याची कल्पना असते. बाकी सगळे दुय्यम आहे.

    जेव्हा मी तरुण होतो त्या वेळी होल अर्थ कॅटलॉग नावाचे मासिक प्रसिद्ध होत असे- जणू आमच्या पिढीचे बायबलच. इथून जवळच मेन्लो पार्क इथे राहणारा स्टेवर्ट ब्रांड नावाचा इसम ते काढत असे आणि त्याने आपल्या कवीप्रवृत्तीने ते मासिक सजवले होते. ही गोष्ट १९६० ची, पर्सनल कम्प्युटर किंवा डेस्कटॉप पब्लिशिंगच्या खूप आधीची. साहजिकच, हे मासिक पूर्णपणे टाईपरायटर, कात्री आणि पॉलोराईड कॅमऱ्याने बनवले जाई. जणू पेपरबॅक फॉर्ममधले गुगल. आणि तेही गुगल येण्याच्या ३५ वर्षे आधी. खूप आदर्शवादी, नेटके आणि नव्या कल्पनांनी भारलेले.

    स्टेवर्ट आणि त्याचे सहकारी भरपूर वर्षे त्या मासिकाचे अंक काढत राहिले आणि जेव्हा त्याचा प्रवास संपला तेव्हा त्यांनी त्याचा शेवटचा अंक काढला. सत्तरीची मध्यान्ह चालू होती आणि मी तुमच्याच वयाचा होतो. त्या शेवटच्या अंकात शेवटच्या पृष्ठावर एक गर्द रानातल्या रस्त्याचे चित्र होते. त्याच्या खाली लिहिले होते. 

    भुकेलेले राहा… वेडे राहा… STAY HUNGRY, STAY FOOLISH

    (मूळ भाषणाची तारीख- १२ जून २००५)
    (शब्दांकन – अमोल कडू)
    १६ एप्रिल २०१० – लोकप्रभा

     

  • शिक्षण अर्धवट राहिलं, पण स्वप्नं पूर्ण केली! देशातील पहिला केबल टीव्ही चॅनेल सुरु करणाऱ्या सुभाष चंद्रांची    कहाणी

    शिक्षण अर्धवट राहिलं, पण स्वप्नं पूर्ण केली! देशातील पहिला केबल टीव्ही चॅनेल सुरु करणाऱ्या सुभाष चंद्रांची कहाणी

    The Dropout Who Became a Billionaire: Subhash Chandra's Journey to Success

    हरियानाच्या आदमपूर शहरात, १९५० साली एक सर्वसाधारण व्यापारी कुटुंबात जन्म झाला सुभाष चंद्रा गोयल यांचा. लहानपणापासूनच कौटुंबिक दुकानात हातभार लावत कष्टाचे संस्कार व कौटुंबिक व्यावसायिकतेचे धडे घेतले. सुभाष चंद्रा अर्धवट शिक्षण घेऊन घराबाहेर पडले, तेच मुळी उराशी आणखी एक स्वप्न घेऊन. नोकरी करायची नाही तर काहीतरी उद्योग धंदाच करायचा. त्या दिशेने त्याने पावले टाकायला सुरुवात केली. ऐन तिशीत असताना ते एका पॅकेजिंगच्या औद्योगिक प्रदर्शनाला गेले. तेव्हाच त्यांच्या मनात आपणही पॅकेजिंग कंपनी सुरु करायची असा विचार आला. देशात त्याकाळी ॲल्युमिनिअम ट्यूबची चलती होती. पण भविष्यात ॲल्युमिनिअम नव्हे, तर लॅमीनेटेड ट्यूबची चलती असेल हे हेरून त्यांनी एस्सेल प्रोपॅक नावाने कंपनी सुरु केली. टूथपेस्ट, औषधे, सौंदर्य प्रसाधने, अन्न पदार्थ आणि दैनंदिन वापराच्या वस्तूसाठी आवश्यक अशा पॅकिंगची निर्मिती त्यांनी सुरु केली. आशियातील ती सर्वाधिक मोठी कंपनी तर आहेच, पण जगातली ती दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. 2019 मध्ये द ब्लॅकस्टोन ग्रुपने कर्जबाजारी एस्सेल ग्रुपच्या मालमत्ता विक्रीदरम्यान कंपनीचे अधिग्रहण केले होते आणि ऑक्टोबर २०२० मध्ये कंपनीचे नाव बदलून ईपीएल लिमिटेड असे करण्यात आले.

    The Dropout Who Became a Billionaire: Subhash Chandra's Journey to Success

    परदेशी पर्यटन करताना एका ॲम्युझमेंट पार्कमध्ये फिरताना त्यांना भारतात आशिया खंडातली सर्वात मोठी मनोरंजन नगरी उभारायची कल्पना सुचली आणि मुंबईजवळ त्यांनी ६४ एकर जागेवर १९८८ मध्ये एस्सेल वर्ल्ड उभे केले. नंतर जवळच वॉटर किंग्डमही उभारले. देशातील लाखो लोक त्यांच्या मनोरंजन नगरीला भेट देतात.

    एकदा ते मुंबईच्या दूरदर्शन केंद्रावर आपल्या मित्राला भेटायला गेला. त्या काळात दूरदर्शनवर केवळ संध्याकाळी काही रटाळ कार्यक्रम असायचे. तेव्हाच त्यांना २४ तास चालणारी वाहिनी काढायची कल्पना सुचली. तेव्हा सर्वच अनुभवी लोकांनी त्यांना वेड्यात काढले. कमावलेले सारे काही ते एका फटक्यात गमावणार असाच त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांचा अंदाज होता, पण सुभाष चंद्रांना स्वतःवर विश्वास होता. त्या क्षेत्रातील कोणताही अनुभव गाठीशी नसताना त्यांनी २ ऑक्टोबर १९९२ रोजी झी टीव्ही हे देशातील पहिलं २४ तास चालणारं टीव्ही चॅनेल सुरु केलं. सुरुवातीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, तरीही सुभाष यांनी जिद्द आणि नावीन्यतेने झी टीव्हीला यशस्वी केले. मनोरंजनापासून बातम्यांपर्यंत विविध प्रकारचे कार्यक्रम, प्रादेशिक भाषांमधील वाहिन्या, तसेच आंतरराष्ट्रीय विस्तार यामुळे ‘झी’ लवकरच घराघरात पोहोचली. नंतर त्यांनी २४ तास बातम्या देणारी झी न्यूझ वाहिनी सुरु केली. आणि मग एकामागून एक प्रमुख भाषेतील वाहिन्या काढायचा सपाटाच लावला. सुभाष चंद्राना प्रचंड यश मिळालं. त्यांच्या त्या एका कल्पनेमुळे देशातील लाखो लोकांना रोजगार मिळाला.

    त्यानंतर सुभाष चंद्रांनी ‘प्ले विन’ लॉटरी नावाने ऑनलाइन लॉटरी सुरु केली. तिलाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. नंतर डिश टीवी, सिटी केबल, फन सिनेमा नावाने चित्रपटगृहंही सुरु केली. गोल्ड रिफायानिंग कंपनीही काढली. डीएनए नावाने इंग्रजी वृत्तपत्र सुरु केले. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातही मुसंडी मारली. हे सर्व व्यवसाय एस्सेल ग्रुपच्या नावाखाली एकत्र आणले. त्यांच्या नेतृत्वाखाली हा समूह भारतातील एक प्रमुख मीडिया घराणे बनले.

    The Dropout Who Became a Billionaire: Subhash Chandra's Journey to Success

    ज्या क्षेत्रात पहिले कोणीही नव्हते त्या क्षेत्रात नव्यानेउद्योग उभारून सुभाष चंद्रांनी जगासमोर एक अचंबित करणार आदर्श उभा केला. देशातील २१ राज्यातील ११ लाख गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी एकल विद्यालय फाउंडेशन स्थापना केलीय. दूरचित्रवाणी क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच इतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांचे कार्य गौरवले गेले.

    2019 मध्ये कर्जफेडीच्या समस्येत अडकलेल्या झी एंटरटेनमेंटच्या दोन स्वतंत्र संचालकांनी एस्सेल ग्रुपच्या इतर कंपन्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने झी एंटरटेनमेंटच्या मुदत ठेवीचा वापर केल्याच्या आरोपाखाली सेबीने त्यांच्यावर कारवाई केली होती. आणि त्यांना संचालक मंडळातून बाहेर पडावे लागले.

    आणखी वाचा

  • औंढा नागनाथजवळ उभी राहतेय भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय वेधशाळा

    औंढा नागनाथजवळ उभी राहतेय भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय वेधशाळा

    या प्रकल्पाला १७ फेब्रुवारी २०१६ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने लायगो इंडिया प्रकल्पास तत्त्वत मंजुरी दिली होती. महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथजवळील दुघाळा परिसरातील जागा अधोरेखित करण्यात आली, तेथे फारशी झाडे नाहीत. सुमारे १७४ एकर जागा महाप्रकल्पासाठी अधिग्रहित करून प्रशासकीय इमारतही उभी राहिली. मात्र, सन २०२० मध्ये आलेल्या करोनामुळे प्रकल्पाची अंतिम मंजुरी लांबत गेली. अमेरिकेमध्ये दोन लायगो वेधशाळा यापुर्वीपासून गुरुत्वीय लहरींचा वेध घेत आहेत. त्यामुळे भारतात होणारी ही अमेरिकेबाहेरील पहिली व जगातील तिसरी वेधशाळा ठरणार आहे. सध्या केवळ अमेरिकेतील वॉशिंग्टन व लुईझियानामध्ये या प्रयोगशाळा आहेत.

    India's First International Observatory Stands Tall Near Aundha Nagnath

    लायगो वेधशाळेने २०१६ साली दोन मोठ्या कृष्णविवरांच्या टकरीतून निर्माण झालेल्या गुरूत्वीय लहरींचा पहिल्यांदाच शोध लावला होता. या संशोधनाला २०१७ सालचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. जेव्हा ही वेधशाळा २०२५ मध्ये कार्यान्वित होईल. त्याचे व्यवस्थापन ‘आयुका’कडे असेल, असे पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्टॉनॉमी अ‍ॅन्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (आयुका)चे संचालक सोमक रायचौधरी यांनी सांगितले. भविष्यात वेध घेतल्या जाणाऱ्या गुरूत्वीय लहरींचे मुळ शोधण्यासाठी या नवीन अत्याधुनिक वेधशाळेची मदत होणार आहे. लहरींच्या संशोधनासाठी उच्च कौशल्याची गरज असते. त्यासाठी या क्षेत्रातील संशोधकांना उच्च स्तरीय प्रशिक्षण देता येणार आहे.

    दुघाळा परिसरामध्ये उभारली जाणारी ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळा सुमारे १७१ हेक्टर क्षेत्रावर उभारली जाणार आहे. यामध्ये १२१ हेक्टर जमीन वन विभागाची आहे. गुरुत्वीय लहरींचा अभ्यास या प्रयोगशाळेच्या माध्यमातून केला जाणार असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञ या ठिकाणी थांबणार आहेत. या प्रयोगात गांधीनगरची प्लाझ्मा संशोधन संस्था, पुण्यातील आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र व खगोलभौतिक केंद्र (आयुका), इंदोरचे राजा रामण्णा प्रगत तंत्रज्ञान केंद्र या संस्थांची भूमिका लायगो इंडिया प्रकल्पात महत्त्वाची ठरणार आहे. लायगो

    ११ फेब्रुवारी २०१६ रोजी भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी लायगो (Laser Interfrometer Gravitaional Wave Observatroy)चे कार्यकारी संचालक प्रो. डेविड रिट्झ यांनी गुरुत्त्वीय लहरी सापडल्याची घोषणा केली आणि आइन्स्टाइन यांच्या व्यापक सापेक्षतावादाच्या सिद्धांताला अजून एकदा प्रबळ पुष्टी मिळाली. १९१६ साली आइन्स्टाइन यांनी या लहरी अस्तित्त्वात असाव्यात असे भाकीत त्यांच्या व्यापक सापेक्षतावादाच्या (General Relativiry) सिद्धांताच्या आधारे केले होते. त्याचा भक्कम पुरावा लायगो प्रकल्पामुळे मिळाला आहे. या गुरुत्त्वीय लहरी अतिसूक्ष्म व अतिक्षीण असल्याकारणाने त्यांचा शोध हा अतिशय अवघड, किचकट पण महत्त्वपूर्ण मुद्दा असतो. पण या क्षेत्रात गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या एलएससीच्या (LIGO scientific collaboration) एक हजारांहून अधिक सदस्यांनी एकत्र येऊन हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. अभिमानास्पद बाब म्हणजे यामध्ये ६० हून अधिक भारतीयांचा सहभाग होता. गुरुत्वतरंग शोधण्याच्या प्रयत्नांना नव्वदच्या दशकात जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्यात अमेरिकेबरोबर इटली, ऑस्ट्रेलिया व अन्य काही देशांचाही सहभाग होता. संयुक्तरीत्या लायगो प्रकल्प राबविण्यात येणार होता. मात्र ऑस्ट्रेलियाने त्यातून माघार घेतली आणि भारताला आयती संधी मिळाली. भारतीय वैज्ञानिकांनीही त्या संधीचे सोनेच केले. या यशात पुण्यातील ‘आयुका’सह अनेक वैज्ञानिक संस्थांमधील वैज्ञानिकांचा मोठा वाटा आहे. आता भारतामध्येही लायगो उपकरण बसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेव्हा भारतीय वैज्ञानिकांना आधीच मिळालेल्या या अनुभवाचा फायदा त्यात नक्कीच होईल असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

    India's First International Observatory Stands Tall Near Aundha Nagnath

    वॉशिंग्टन व लुईझियाना येथे असलेल्या लायगो प्रयोगशाळांमधून २०१५ मध्ये सप्टेंबर महिन्यात प्रथमच गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाचा पुरावा शोधला गेला. त्यावेळी लायगोने पकडलेल्या गुरुत्वीय लहरी १.३ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या दोन प्रचंड वस्तुमानाच्या कृष्णविवरांच्या विलयातून तयार झाल्या होत्या. त्यानंतर त्याच वर्षी तीन महिन्यांनी म्हणजे २६ डिसेंबरला गुरुत्वीय लहरींचा आणखी एक संदेश टिपण्यात लायगो प्रयोगशाळांना यश आले होते. दोन कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झालेल्या या गुरुत्वीय लहरी होत्या. विशेष म्हणजे ही घटना १.४ अब्ज प्रकाशवर्षे दूरवर घडली होती. वॉशिंग्टन व लुईझियाना येथील प्रयोगशाळांचे एकमेकांपासूनचे अंतर ३००० कि.मी आहे. ही उपकरणे ६६० दशलक्ष प्रकाशवर्षे दूर असलेल्या कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झालेल्या गुरुत्वीय लहरी शोधू शकतात.

  • भारतीय नारी, भल्याभल्यांवर भारी! भारताची ही ‘ट्रॅक्टर क्वीन’ आहे 23 हजार कोटींची मालकीण – मल्लिका श्रीनिवासन

    भारतीय नारी, भल्याभल्यांवर भारी! भारताची ही ‘ट्रॅक्टर क्वीन’ आहे 23 हजार कोटींची मालकीण – मल्लिका श्रीनिवासन

    भल्याभल्यांना लाजवेल अशी कामगिरी करून दाखवणाऱ्या मल्लिका श्रीनिवासन (Mallika Srinivasan) या भारताचे अब्जपती आणि TVS मोटर्सचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांच्या पत्नी आहेत. त्यांनी आपल्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट म्हणझेच टॅफे (TAFE) कंपनीला यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे. इतकेच नाही, तर त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे की, महिलादेखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यश मिळवू शकतात.

    Success Story of Mallika Srinivasan Every Indian Should Read

    मल्लिका श्रीनिवासन या देशातील त्या निवडक महिला उद्योजकांपैकी एक आहेत, ज्यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळेच त्यांना ‘ट्रॅक्टर क्वीन’ म्हणूनही ओळखले जाते. त्या देशातील दुसऱ्या आणि जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या ट्रॅक्टर उत्पादक ब्रँड टॅफेच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन आहेत. टॅफे हा ब्रँड मोठा होण्यात मल्लिका यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांनी या कंपनीला तंत्राची जोड दिली आणि कंपनीला यशाच्या पायऱ्या चढण्यात मदत केली. आजघडीला कंपनीची वार्षिक उलाढाल ही १० हजार कोटींपेक्षाही जास्त आहे.

    कौटुंबिक व्यवसायात कधी घेतली उडी?

    सन १९५९मध्ये चेन्नई येथे जन्मलेल्या मल्लिका श्रीनिवासन या शालेय जीवनापासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांनी मद्रास विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले होते. तसेच, यूएसए येथील पेन्सिल्वानिया विद्यापीठाच्या वॉर्टन स्कूलमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले होते. परदेशातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर मल्लिका पुन्हा भारतात आल्या. त्यांनी आपल्या वडिलांच्या देखरेखीखाली १९८६मध्ये कौटुंबिक व्यवसायात उडी घेतली. या कंपनीची सुरुवात मल्लिका यांचे आजोबा एस अनंतरामाकृष्णन यांनी केली होती. त्या टॅफेच्या जनरल मॅनेजर म्हणून कंपनीशी जोडल्या गेल्या होत्या. जेव्हा त्यांनी कंपनीत प्रवेश केला, तेव्हापासूनच महत्त्वाचे बदल होण्यास सुरुवात झाली.

    Success Story of Mallika Srinivasan Every Indian Should Read

    टॅफेचा प्रवास

    ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट (Tractors and Farm Equipment) म्हणझेच टॅफेची (TAFE) सुरुवात १९६०मध्ये चेन्नई येथे झाली होती. कंपनीची स्थापना जरी १९६०मध्ये झाली असली, तरीही यामध्ये महत्त्वाचे आणि मोठे बदल घडवून आणण्याचा विडा मल्लिका श्रीनिवासन यांनीच उचलला. त्यांनी कंपनीला तंत्राची जोड देऊन तिचा विस्तार केला. त्यामुळेच टॅफेचे प्रोडक्ट भारतीय शेतकऱ्यांची पहिली पसंत बनले आहेत. टॅफे ही ट्रॅक्टर बनवणारी जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीकडे जवळपास १६०० डीलर्सचं नेटवर्क आहे. तसेच, कंपनी जगातील जवळपास १०० देशांमध्ये व्यापार करत आहे. एवढंच नाही, तर टॅफे फक्त ट्रॅक्टर बनवण्यापर्यंत मर्यादित राहिली नाहीये. ही कंपनी बॅटरी, डिझेल इंजिन, जेनेसेट, गियर पार्ट्स, पॅसेंजर व्हेइकल, हायड्रॉलिक पंप्स आणि फार्म मशिनरीही तयार करते.

    Success Story of Mallika Srinivasan Every Indian Should Read

    कौटुंबिक व्यवसायाला मिळवून दिला फायदा

    टॅफेला यशाच्या पायऱ्या चढण्यासाठी भाग पाडण्यात मल्लिका श्रीनिवासन यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्याच नेतृत्वाखाली टॅफेने फ्रेंच कंपनी फॉरेसियाला विकत घेण्यासाठी ४०० कोटींचा करार केला. त्यांनी कंपनीची क्षमता वाढवण्यासाठी अमेरिकन ऍग्रो कंपनी AGCO शी मिळून काम करण्यास सुरुवात केली. कंपनीने AGCOसोबत मिळून तुर्की येथेही आपला प्लान्ट सुरू करत जगातील अनेक भागात ट्रॅक्टर पोहोचवणे सुरू केले. कालांतराने व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यासाठी टॅफेने अनेक कंपन्या आपल्यात जोडल्या. टॅफे कंपनीने आयशर लिमिटेडचे ट्रॅक्टर, इंजिन आणि गियर्स विभाग विकत घेतले. त्यामुळेच भारतात कृषी यंत्र व्यवसायात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.

    पद्मश्री पुरस्काराने सन्मान

    टॅफेच्या यशाचा डंका जगभरात गाजवल्यानंतर ६४ वर्षीय मल्लिका श्रीनिवासन यांना ‘ट्रॅक्टर क्वीन’ या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांना ट्रेड आणि इंडस्ट्रीतील यशामुळे जानेवारी २०१४मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. त्या अशा निवडक महिलांपैकी एक आहेत, ज्यांचे नाव दिग्गज उद्योगपतींमध्ये घेतले जाते.

    Success Story of Mallika Srinivasan Every Indian Should Read

    भारतातील ८३ व्या श्रीमंत व्यक्ती

    प्रसिद्ध उद्योगपती असण्याव्यतिरिक्त मल्लिका श्रीनिवासन या एनजीसीओ, टाटा स्टील आणि टाटा ग्लोबल बेवरेजेस बोर्डाच्या सदस्या आहेत. तसेच, चेन्नईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) आणि हैदराबादच्या इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या (ISB) कार्यकारी बोर्डाच्याही सदस्या आहेत. त्यांनी अलीकडेच, स्विगी बोर्डातील स्वतंत्र संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. स्विगीची व्हॅल्यू ही जवळपास ६८९१८ कोटी रुपये इतकी प्रचंड आहे. तसेच, मल्लिका श्रीनिवासन यांच्या संपत्तीविषयी बोलायचं झालं, तर त्यांची एकूण संपत्ती २.८४ बिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास २३,६२५ कोटी रुपये आहे. अशाप्रकारे, फोर्ब्सनुसार त्या भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ८३व्या क्रमांकावर आहेत.

    Success Story of Mallika Srinivasan Every Indian Should Read

    आणखी वाचा

  • नोकरदार ते उद्योजक बनणं हा प्रवास तितका सोपा नाही.

    नोकरदार ते उद्योजक बनणं हा प्रवास तितका सोपा नाही.

    जर

    • तुम्ही तुमच्या नोकरीत समाधानी नसाल किंवा तुम्हाला पगार मनासारखा मिळत नसेल किंवा
    • तुम्ही तुमच्या नोकरीत समाधानी नसाल किंवा
    • करिअरमध्ये हवी तशी प्रगती होत नसेल किंवा
    • नाईलाज म्हणून न आवडणारी नोकरी करावी लागत असेल किंवा
    • तुम्ही अशी नोकरी करत असाल, जी आयुष्यभर करत राहण्याची
    • तुमची अजिबात ईच्छा नाही किंवा
    • बॉसचा वैताग आला असेल किंवा
    • तुम्हाला जाणवत असेल; आपण इतर सहकाऱ्यांपेक्षा चांगलं काम करू शकतो, पण संधी मिळत नाही किंवा
    • बऱ्याच दिवसांपासून एखादी बिझनेस आयडिया डोक्यात घोळत असेल किंवा
    • स्वतःचं उद्योग साम्राज्य उभं करायचं असं स्वप्न असेल किंवा
    • आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण करण्याची ईच्छा आणि मनासारखं जगण्याचं स्वातंत्र्य हवं असेल किंवा

    बिझनेस करून भरपूर पैसे कमवावेत असं वाटत असेल, तर योग्य वेळी हे पुस्तक तुमच्या हाती पडलं आहे याची खात्री बाळगा मी जेव्हा असे नोकरदार बघतो, जे त्यांच्या नोकरीत, त्यांच्या आयुष्यात अजिबात सुखी नाहीत, तेव्हा मला प्रचंड दुःख होतं, वाईट वाटतं. शिक्षण संपलं की कुठेतरी नोकरी बघायची, नोकरी मिळाली की लग्न व्हावं म्हणून कर्ज काढून घर घ्यायचं. घर घेतलं की लग्न करून संसाराच्या रहाटगाडग्यात गुंतून राहायचं हेच त्यांचं आयुष्य बनून जातं. अनेकांच्या बाबतीत घरची आर्थिक परिस्थिती बिकट असते, कुटुंबाची जबाबदारी उचलता यावी म्हणून त्यांना नोकरी करावी लागते. काहीजण असेही असतात की, त्यांना वेगळं काहीतरी करायची इच्छा असते, परंतु ‘काही तरी कामधाम कर’ हा घरातल्यांचा पिच्छा सुटावा म्हणून नाईलाजास्तव नोकरी करतात. नंतर ही सगळी मंडळी आयुष्यातील अनेक वर्ष बँकेचे हप्तेच फेडत असतात. ५० हजार पगार असला, तरी त्यातील २५-३० हजार हप्त्यांवरच खर्च होत असतात.

    कभी किसी को मुकम्मल जहां नही मिलता,
    कहीं जमी तो कहीं आसमान नही मिलता…

    या काव्यपंक्तीप्रमाणे आयुष्यात आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतातच असं नाही. अनेकदा तडजोड स्वीकारावी लागते. नाईलाज म्हणून स्वीकारलेले काम नीरस वाटू लागते. कधीकधी काम वेळेवर पूर्ण होत नाही, त्यामुळे वरिष्ठांची बोलणी खावी लागतात. बॉससोबत नेहमीच ‘पंगा’ होत राहतो. त्यामुळे कामाची लय बिघडते. कधी सहकाऱ्यांसोबत वाद होतात. रोजचे काम करताना ना आनंद वाटत असतो, ना काही वेगळे शिकायला मिळाल्याचे समाधान. प्रत्येक महिन्याच्या शेवटी हातात येणारा पगाराचा चेक आणि आठवड्याच्या शेवटी एक किंवा दोन दिवसांची सुट्टी यासाठी ही मंडळी आठवड्याचे ५ दिवस खाली मान घालून निमूटपणे काम करत असतात. जिथं काम करायला आवडत नाही, तिथं जावं लागतं; ज्यांच्यासोबत पटत नाही, अशा लोकांसोबत काम करावं लागतं.

    खरंतर ही सगळी मंडळी खूप मेहनत करत असतात. आपल्या आस्थापनेसाठी आयुष्यातील बहुतांश वेळ देत असतात. घाण्याला लावलेल्या बैलासारखे राब राब राबत असतात, पोटाला चिमटा काढत असतात, ऑफिसमध्ये १० ते १२ तास धडपडत असतात, पण दिवसाच्या शेवटी पुरते थकलेले असतात. आयुष्यातील इच्छा, आकांक्षा आणि उद्देशच ते हरवून बसलेले असतात. पैशांच्या मागे लागतात आणि जगणं विसरतात. चाकोरीबद्ध आयुष्य त्यांना जग वाटायला लागतं आणि ते तिथेच थांबतात.

    गेली बरीच वर्षं मी या सर्वांसाठी काहीतरी ठोस उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. या अनेक वर्षांच्या अभ्यासातून आणि अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट झाली की; ही सर्व लोकं जी या दुष्टचक्रात अडकली आहेत आणि ज्यांना यातून बाहेर पडायचं आहे, त्यांनी ‘नोकरीतून उद्योजकतेकडे’ जायची गरज आहे. उद्योजक होणं हा एक चांगला आणि शाश्वत मार्ग असू शकतो. यामुळे स्वातंत्र्य, अर्थपूर्ण आयुष्य आणि बऱ्यापैकी चांगलं आर्थिक उत्पन्न मिळू शकते.

    हे जरी खरं असलं तरीसुद्धा, नोकरदार ते उद्योजक बनणं हा प्रवास तितकासा सोपादेखील नाही. सुरुवातीच्या काळात या नवउद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यातील बऱ्याच अडचणींतून मी सुद्धा गेलेलो आहे.

    त्यामुळेच या उद्योजकांची मदत व्हावी म्हणून मी नोकरीतून उद्योजकतेकडे जाण्यासाठी चार सोप्या पायऱ्या विकसित केल्या आहेत. या पायऱ्या इतक्या सोप्या आहेत की कोणीही यांचा सहजपणे वापर करू शकतं.

    त्यासाठी तुमच्याकडे उद्योजकतेचं ज्ञान असलंच पाहिजे असं काही नाही. या पायऱ्या वापरून तुम्ही तुमच्या नोकरीला आणि बॉसला ‘टाटा-गुडबाय’ म्हणू शकता आणि आपलं स्वप्नातीत आयुष्य जगू शकता. ते कसं करायचं हे या लेखांमध्ये आपण समजून घेणार आहोत.

    करूया सुरुवात…!

  • जो जमेल, जो मिळेल; तो धंदा, न लाजता करा

    जो जमेल, जो मिळेल; तो धंदा, न लाजता करा

    गेली अनेक वर्षे मुंबईत व्यवसाय करीत असताना अनेक व्यापारी समाजांशी संबंध आला. व्यावसायिक क्षेत्रांमध्ये आपल्या माणसांना व समाजाला वरती आणण्यासाठी ५% चा सामाजिक नियम अनुभवला. या समाजात ज्याला व्यवसायात भरभरून यश मिळाले, पैसा मिळाला, नाव मिळाले ते आपल्या फायद्याच्या ५% इतकी रक्कम किंवा वेळ आपल्या समाज बांधवांच्या उद्धारासाठी देऊ करतात. हाच विचार पुढे घेऊन जाताना २०१४ पासून आपल्या माणसांसाठी त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी माझ्या फायद्यातील ५% व उपलब्ध वेळेतील ५% वेळ देऊन मराठी उद्योजकता चळवळ सुरु केली. त्यामध्ये प्रत्येक मराठी माणसाला करता येतील, अशा हजारो बिझनेस आयडिया तसेच प्रेरणा देणारे शेकडो संशोधनपर लेख लिहिले. वेळ मिळेल तसा महाराष्ट्रभर अनेक व्यापारी संस्था, विद्यालये व संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात व्याख्याने दिली. या लेखांचे आज २५ लाख वाचक असून त्यातून प्रेरणा घेऊन सुमारे १८ हजार तरुणांनी आपला व्यवसाय सुरु केला.

    माकडासमोर केळी आणि दोन हजारांची नोट ठेवली, तर माकड केळी उचलतं. माकडाला हे माहित नसतं की, दोन हजारांत अनेक केळी विकत घेता येतात. केळी घेऊन तात्पुरती भूक भागवणे हा एकच मार्ग त्याला माहित असतो. मराठी माणसाचेही तसेच आहे. मराठी माणूस उद्योग करून लाखो रुपये कमावण्याऐवजी, काही हजारांची नोकरी मिळवण्यास प्राधान्य देतो. आपल्या ज्ञानाचा उपयोग करून उद्योग करावा, लाखो करोडो रुपये कमवावेत व इतरांना आपल्याकडे नोकरीसाठी ठेवावे असे कोणालाच वाटत नाही. आज महाराष्ट्राचा भूमिपुत्र गरिबी व कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालाय. कमी शिकलेले लोक उद्योग करतात व उच्च शैक्षणिक पात्रता आणि प्रतिभा असणारे त्यांच्या हाताखाली नोकरी करतात. त्यामुळे आपण आपल्या विचारसरणीत क्रांतीमय बदल घडवून आणला पाहिजे.

    सध्या अनेक तरुण बेरोजगार आहेत, त्यामुळे लग्नं जुळत नाहीत, त्यामुळे त्यांच्यात मानसिक तणाव दिसून येतो. काहीजण या तणावावर मात करुन पुढे जातात, तर काहीजण व्यसनाचा आधार घेतात. उमेदीचा काळ अशा गोष्टींमुळे वाया गेल्याने नंतर त्यांच्या आयुष्यात संघर्ष सुरु होतो. त्यामुळे मुलांना बिनकामाचे शिक्षण देण्यापेक्षा व्यवसायाभिमुख व कौशल्य प्रदान करणारे शिक्षण दिले पाहिजे. हल्लीच्या मुलांमध्ये नवीन शिकण्याची वृत्ती, धाडस व उच्च क्षेत्रात झेपावण्याचे बळ आहे, त्याची जाणीव त्यांना होणे गरजेचे आहे.

    आजकाल अनेक चांगली शिकलेली मुलं, गृहिणी, व्हीआरएस घेतलेले लोक भेटतात. प्रत्येकाकडे काहीतरी अनुभव, ज्ञान, वेळ व मेहनत करण्याची तयारीही असते पण; नेमकं काय करायचं, कोणता व्यवसाय निवडायचा, तो कसा एकत्र करायचा, ग्राहक कुठून मिळतील, नेमकी प्रक्रिया कशी असेल, व्यवसाय करण्यासाठी कोणत्या मूलभूत गोष्टींचे ज्ञान आवश्यक आहे हे सर्व प्रश्न त्यांच्या डोक्यात असतात. या जगात अगणित संधी आहेत, पण बऱ्याच जणांना याची माहिती नसते. या सर्वांसाठी ही लेखमाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल. या लेखमालेतील बिझनेसच्या १०१ भन्नाट आयडिया वाचून अनेकांचा निश्चितच फायदा होईल. या सर्व लेखांचे संकलन असलेले पुस्तक नवी अर्थक्रांती प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. https://shop.naviarthkranti.com इथून आपल्याला ते विकत घेता येईल.

    कोणताही व्यवसाय एकदम करोडोंचा होत नसतो. गाड्या, फॅक्टरी, कार्यालये ही काही अल्पावधीत होणारी गोष्ट नसते. प्रत्येकाला आपली आपली एखादी ‘भन्नाट बिझनेस आयडिया’ शोधावी किंवा निवडावी लागेल व त्या दृष्टीने व्यवसायाचे मार्गक्रमण करावे लागेल. तुम्हीही तुमच्या परीने ५% चा नियम आपल्या समाजाच्या उद्धारासाठी स्वतःला लागू करा. “घेणाऱ्याने घेत जावे व घेता घेता घेणाऱ्याचे हात घ्यावे.” माझ्या असंख्य वाचक बांधवाना त्यांच्या व्यावसायिक यशासाठी हार्दिक शुभेच्छा…! लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरो…! हीच माझी प्रार्थना…! शक्य असल्यास आपला अनुभव मला जरूर कळवावा. आपल्याला हे पुस्तक आवडलं, तर आपण हे पुस्तक आपल्या मित्रमंडळीना, नातेवाईकांना अवश्य वाचायला द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.

    शेवटी एवढंच सांगतो, वडापावची गाडी टाका, रेस्टॉरंट टाका, फर्निचर बनवा, गवंडीकाम करा, वायरमन व्हा, ड्रायव्हर व्हा, भाजी विका, इडली सांबार विका, दूध घाला, पेपर टाका; जो जमेल, जो मिळेल तो धंदा न लाजता करा. धन्यवाद.

    टीप : या लेखांत दिलेले आकडे हे केवळ संदर्भासाठी आहेत. आपली कल्पना, नियोजन, व्यवस्थापन, जोखीम घेण्याची, गुंतवणूक करण्याची क्षमता यावर व्यवसायाची वाढ अवलंबून असते.

  • बचत व गुंतवणुकीची ठळक वैशिष्ट्ये

    बचत व गुंतवणुकीची ठळक वैशिष्ट्ये

    • बहुतेक लोक FD आणि Insurance (Money back) यांना गुंतवणूक समजतात.
    • सोन्याचे दागिने व राहते घर यांचे सध्याचे बाजारमूल्य कितीही जास्त असले तरी ते आभासी आहे. त्याचा फारसा काही उपयोग नसून त्याने फक्त मानसिक समाधानच लाभू शकते.
    • महागाईवर मात करणारा परतावा मिळाला पाहिजे हे अनेकांना माहित नाही.
    • म्युच्युअल फंड हा विमा प्रकार असून SIP ही पॉलिसी आहे असे अनेकांना वाटते.
    • आपल्याकडे किती रकमेची, कोणत्या कंपनीची आणि किती वर्षाची विमा पॉलिसी आहे, तसेच कोणत्या म्युच्युअल फंडामध्ये आपली किती रक्कम आहे हे अनेकांना अंदाजेही सांगता येत नाही. आपल्या विमा रकमेवर मिळत असणारा परतावा ६% पेक्षाही कमी आहे हे अनेकांना माहित नाही.
    • फारच थोड्या लोकांनी योग्य रकमेचा, योग्य मुदतीचा आणि योग्य वर्षांचा मुदत विमा (Term Insurance) व आरोग्यविमा (Mediclaim) घेतला आहे. यामध्ये भरत असलेल्या हप्त्यांचा उपयोग न होण्यातच आपला खराखुरा फायदा आहे, हे त्यांच्या लक्षातच येत नाही.
    • अनेक लोक भविष्यकाळातील तरतुदीबद्दल जागरूक नाहीत, तर अनेकजण मुलांवर अवलंबून आहेत.
    • गुंतवणूक साधनांची वेगवेगळ्या प्रकारांत विभागणी करायची असते हे कित्येकांना माहित नाही.
    • येथील बहुतेक लोकांना व्याज करपात्र, तर लाभांश आणि मुळातून STT कापला असेल, तर दीर्घमुदतीचा भांडवली नफा करमुक्त असतो याची माहिती नाही.
    • सोन्याचे दागिने घेण्याऐवजी शुध्द स्वरूपातील सोने, गोल्ड ETF अथवा गोल्ड Bonds मध्ये गुंतवणूक करणे अधिक फायद्याचे याची लोकांना जाणीव नाही.
    • Taxfree bonds हे ८०/सी ची सवलत देतात असे बरेचजण मानतात, तर ५४/ईसी बॉण्ड्स, Infrabonds, PMS, Corporate FD’s यांविषयी फारच थोड्या लोकांना माहिती आहे.
    •  पूर्णपणे आर्थिक नियोजन करणारे लोक नगण्य आहेत.

    या सर्व गोष्टी विचारात घेऊन एकच निष्कर्ष काढता येईल की, आपल्याकडे गुंतवणूक संस्कृती रुजलेली नाही. असे होण्याचे महत्वाचे कारण असे की, आपण आपले जे पैसे बचत खाते, मुदत ठेवी, पोस्टाच्या योजना, पीपीएफ आणि मनी बॅक पॉलिसीमध्ये टाकले आहेत, सोन्याचे दागिने केले आहेत त्यालाच गुंतवणूक असे समजत आहोत, परंतु ही गुंतवणूक नसून बचत आहे. बचत आणि गुंतवणूक यांचा एकमेकांशी सबंध असला तरी या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. ढोबळमानाने असे म्हणता येईल की, उत्पन्नातील असा भाग जो गरजांसाठी खर्च न करता साठवून ठेवला आहे किंवा वेगवेगळे खर्च केल्यावर जी रक्कम शिल्लक राहते ती म्हणजे बचत; तर गुंतवणूक म्हणजे अशी ठरवून केलेली प्रक्रिया ज्यामध्ये आपण आधिक फायदा मिळवण्यासाठी पैसे गुंतवले आहेत. हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण बचत व गुंतवणुकीची ठळक वैशिष्ट्ये पाहूया :-

    • बचतीमध्ये आपण पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवतो, त्यामुळे नजीकच्या काळात वापरू शकतो. उदा. बचत खाते, मुदत ठेव, परावर्तित ठेव, आवर्ती ठेव; तर गुंतवणूकीत आपण पैसे अशा साधनांमध्ये ठेवतो की, ज्यापासून भविष्यात आर्थिक लाभ होऊ शकेल. उदा. समभाग, यूनिट, फ्यूचर, सोने, चांदी, वस्तू, बाजारपेठ, स्थावर मालमत्ता इत्यादी.
    • बचत ही अल्पकालीन क्रिया असून तिची सुरुवात कधीही करता येते, तर गुंतवणूक ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे, त्यामुळे तिची सुरुवात जितक्या लवकरात लवकर करू तेवढे चांगले.
    • बचतीचे पैसे नजीकच्या काळात वापरू शकतो, तर गुंतवणुकीचा भविष्यकाळात उपयोग होतो.                     
    • बचत ही सवय, तर गुंतवणूक ही प्रक्रिया आहे.
    • बचत ही सुरक्षित असून त्यावर मिळणारा लाभ अल्प आहे, तर गुंतवणुकीत जोखीम जास्त असून, जेवढी जोखीम जास्त, तेवढा मोठा फायदा किंवा तोटा होण्याची शक्यता असून क्वचित प्रसंगी मुद्दल गमावण्याचा धोकाही आहे.
    • बचतीत सुरक्षितता असल्याने त्याचा आढावा घ्यावा लागत नाही, तर गुंतवणुकीचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यातील बदलांबद्दलचा निर्णय त्वरित घ्यावा लागतो.
    • बचतीची साधने आपणास निष्क्रिय बनवतात, तर गुंतवणुकीची साधने स्वातंत्र्याचा अनुभव देतात.
    • बचतीचे पैसे अडीअडचणीच्या काळात उपयोगी पडतात, तर गुंतवणुकीच्या  साधनांतून दीर्घ काळासाठी संपत्ती निर्माण करण्यासाठी नियमित प्रयत्न करावे लागतात.
    • बचत ही भीतीपोटी केली जाते, तर गुंतवणूक आत्मविश्वासपूर्वक करावी लागते.
    • बचतीचे पैसे त्वरित उपलब्ध होतात, तर गुंतवणुकीतील पैसे मिळवण्यासाठी काही कालावधी द्यावा लागतो.
    • बचतीसाठी फारशा ज्ञानाची गरज नसते, तर गुंतवणुकीसाठी सखोल ज्ञान व नियोजनाची गरज असते, तज्ञांची मदत घ्यावी लागते अथवा स्वतः तज्ज्ञ व्हावे लागते.
    • बचतीमुळे पैशाचे रक्षण होते, तर गुंतवणुकीमुळे योग्य उत्पन्न व चांगला परतावा मिळण्याची शक्यता असल्याने चलनवाढीवर मात करता येते.

    वरील सर्व विवेचनावरून अशी समजूत होऊ शकते, गुंतवणूक चांगली व बचत वाईट किंवा बचत चांगली आणि गुंतवणूक वाईट; परंतु यामधील कोणतीही एक गोष्ट पूर्ण बरोबर व दुसरी गोष्ट पूर्ण चूक असे नसून आपली अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीची ध्येयं पूर्ण करण्यासाठी बचत आणि गुंतवणूक या दोघांची आपल्या आयुष्यात फार महत्वाची भूमिका आहे. जर बचत आणि गुंतवणूक यांचा समतोल आपण साधू शकलो, तर आणि तरच भविष्यातील वाढत्या गरजा व चलनवाढ यांच्याशी सामना करू शकू. दुर्दैवाने आपल्या शालेय शिक्षणात बचत आणि गुंतवणूक यांतील फारच थोड्या गोष्टींचा स्पर्श होतो, तरीही इतर अनेक गोष्टी आपण जीवनात करून पाहतो, चूकतो, धडपडतो, पडतो, पुन्हा उठून उभे राहतो. आपले ज्ञान आणि अनुभव यांची सांगड घालून पैशांच्या सर्व बाजूंचा विचार करून, व्यावहारिक व व्यावसायिक दृष्टिकोन बाळगू शकलो, तर आपल्या स्वकष्टार्जित व वडिलोपार्जित संपत्तीचा सांभाळ करू शकू. तेव्हा पैशाच्या सर्व पैलूंचा विचार करूया, माहिती घेऊया, जागरूक राहूया, नियोजन करूया आणि स्वतःबरोबरच इतरांनाही अर्थसाक्षर करूया.

  • नोकरीतून उद्योजकतेकडे : मनोगत

    नोकरीतून उद्योजकतेकडे : मनोगत

    आज जगातील एक तृतीयांश लोकसंख्येच्या मूलभूत गरजासुद्धा पूर्ण होत नाहीत, तर ग्रामीण भारतातील कोट्यावधी लोकांचे मासिक उत्त्पन्न ५००० रुपयांपेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत, मानवी संस्कृतीशी निगडित विविध समस्यांवरील उपाय शोधण्यासाठी उद्योजक महत्वपूर्ण भूमिका निभावू शकतात.

    ३२.२४ लाख कोटी रुपये (४५० अब्ज डॉलर्स) सकल राज्य उत्पादन (जीएसडीपी) असेलली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. देशाच्या एकूण जीडीपीतील १५ टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. देशातील उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. भारतातील एकूण विदेशी गुंतवणुकीपैकी (एफडीआय) ३० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येते. देशातील सर्वाधिक कोट्याधीश आणि अब्जाधीशसुद्धा महाराष्ट्रातच राहतात. एवढं सगळं असूनही या उद्योग क्षेत्रात सदैव आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात मराठी उद्योजक मात्र जितका दिसायला हवा तितका दिसत नाही. आपल्याकडे अशी म्हण आहे की, अंथरूण पाहून पाय पसरावे; पण अंथरुणच मोठं घ्या असं कुणीही सांगत नाही. अगदी प्राचीन काळापासून देशांतर्गत आणि देशाबाहेर व्यापार केला जातो आहे, पण ‘मोठा झाल्यावर तू व्यवसाय कर’ किंवा ‘मोठा बिझनेसमन हो’ असं आपल्यापैकी किती जणांना त्यांच्या पालकांनी सांगितले? बोटावर मोजण्याइतके असतील. परंतु आजकालच्या नोकरदारांमध्ये, तरुण पिढीमध्ये उद्योजकता हे करिअरचे क्षेत्र म्हणून निवडण्याचे प्रमाण वाढते आहे. आयुष्यभर दुसऱ्याच्या हाताखाली ‘नोकरी’ करत राहण्याची मध्यमवर्गीय मानसिकता आता बदलत आहे.

    जगातील लाखो लोक नोकरीला लाथ मारून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची, प्रचंड पैसा कमवायची स्वप्नं रोज बघत असतात. आपल्याला कोणीही बॉस नसेल, स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतील, काम करण्याचं कोणतंही बंधन नसेल यामुळे नोकरी सोडायचा विचार जरी आकर्षक वाटत असला, तरी वास्तव स्वप्नापेक्षा पूर्णपणे वेगळं असू शकतं. पूर्ण विचार न करता नोकरी सोडण्यामुळे वेळ आणि पैसा वाया जाऊ शकतो, मानसिक त्रास होईल तो वेगळाच.

    डोक्यात आयडिया आली किंवा एखाद्या मित्राने सांगितलं किंवा कुठेतरी अमुक अमुक धंदा जोमात आहे, अशी बातमी वाचली/बघितली आणि बिझनेस करायचा म्हणून कसलाही विचार न करता सरळ नोकरी सोडली, याला निव्वळ मूर्खपणा म्हणतात. व्यवसाय सुरु करणं एकवेळ सोपं आहे, पण तो यशस्वीपणे चालवणं तितकंच अवघड. त्यामुळे पूर्वतयारी केल्याशिवाय व्यवसायात उतरणे धोक्याचे ठरू शकते. ही पूर्वतयारी कशी करायची हे चार सोप्या पायऱ्यांमध्ये या पुस्तकात सांगितले आहे. त्याचसोबत गुंतवणूकदार कसे शोधायचे, कमी खर्चातील मार्केटिंगच्या पद्धती, व्यवसाय नोंदणीचे प्रकार आणि कंपनीचं नाव, लोगो, टॅगलाईन बनवताना काय काळजी घ्यावी याचीही माहिती दिली आहे.

    प्रत्येकाला पैसा कमवायचा असतो, श्रीमंत व यशस्वी व्हायचं असतं, त्यासाठी नोकरी करून काही होणार नाही, हेही कळतं, पण व्यवसायात उतरताना भीती व संकोच असतो. जवळ बुद्धी व कौशल्य असते, पण योग्य मार्गदर्शनाअभावी धाडस होत नाही. हे पुस्तक अशा लोकांसाठी आहे, जे सध्या नोकरी करत आहेत, पण त्यांच्या मनात स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा आहे. हे पुस्तक अशा उद्योजकांनासुद्धा उपयुक्त ठरेल, जे सध्या त्यांच्या व्यवसायात अनेक आव्हानांचा आणि अडचणींचा सामना करत आहेत. यातील संकल्पना समजून घेऊन, त्यावर आवश्यक कृती करून, सर्व प्रकारच्या भीतीवर मात करून, सावधपणे एकेक पाऊल पुढे जात राहिले पाहिजे. अनेक वर्ष नोकरीत अडकून पडलेल्या नोकरदारांमध्ये दडलेला उद्योजक जागरूक व्हावा यासाठी त्यांना नोकरीतून उद्योजकतेकडे नेणाऱ्या एका सेतूची गरज आहे असा सेतू बनवण्याचा हा प्रयत्न आहे. रामायणात वानरांनी समुद्रात एक एक दगड टाकून रामसेतू बनवला आणि प्रभू रामचंद्रांनी लंकेमध्ये प्रवेश करुन रावणावर विजय मिळवला. त्याप्रमाणे ह्या सेतूवरुन असंख्य श्रीराम प्रवास करोत आणि आपल्या आयुष्यात यशस्वी होवोत याच सदिच्छा…

  • १. नोकरी करावी की व्यवसाय?

    १. नोकरी करावी की व्यवसाय?

    वयाची १८-२२ वर्षे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी का व्यवसाय करावा हा कोड्यात टाकणारा प्रश्न सर्व तरुणांना पडत असतो, कारण आईवडिलांवर अवलंबून राहण्याचे सोडून स्वतःच्या कर्तृत्वाने जगात आपला ठसा उमटवण्याचे हे वय असते. उमेद असते, आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी हवे ते करण्याची तयारी असते; पण आपल्याला काय हवे हे मात्र समजत नाही.

    महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरुन एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर पुढे काय करणार? नोकरी की व्यवसाय? ह्या प्रश्नाला मिळालेली काही उत्तरे.

    • १. नोकरी करणार कारण घरची परिस्थिती व वातावरण व्यवसायाला अनुकूल नाही, शिवाय भांडवलसुध्दा नाही.
    • २. काही काळ नोकरी करणार, मग स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरु करणार आहे. काही दिवस नोकरी केली तर, भांडवल उभारणी करता येईल.
    • ३. व्यवसायच करणार आहे काहीतरी. काहीही झाले तरी व्यवसायच करायचा.

    आता वरील तीनही प्रकारच्या तरुणांच्या मताचे विश्लेषण करुया. पहिल्या प्रकारात एकतर त्या तरुणाला नोकरीच करायची असते, मात्र व्यवसाय न करण्याची काही कारणे तो पुढे करत असतो. नोकरीची सुरूवात सुध्दा अगदी तुटपुंज्या उत्त्पन्नावर होते, मग पुढे त्या उत्त्पन्नात फार वेगाने वाढ होते असेही काही नाही. असे तरुण जीवनभर rat race मध्ये अडकून पडतात. नोकरी, पगार, घर, घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण, आरोग्य असे नेहमीचे प्रश्न सोडवतंच आयुष्य पुढे सरकत असते, त्यात फार उल्लेखनीय असे काही घडत नाही, पण ह्या चक्रात अडकलेला माणूस सहजासहजी बाहेर पडत नाही. हा निर्णय घेण्याची काही कारणे आहेत, त्यामध्ये जोखीम घेण्याचे धाडस नसणे, इच्छाशक्तीचा अभाव व न्यूनगंड ही काही महत्वाची कारणे आहेत, यावर थोड्याफार प्रयत्नांनी मात करता येते.

    दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तींना काही काळ नोकरी करुन भांडवल उभे करायचे असते. काही प्रमाणात उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावायचा असतो. ह्या व्यक्तींना कमी प्रमाणात जोखीम घ्यायची असते. हेही थोड्याफार फरकाने पहिल्या प्रकारच्या व्यक्तीसारखी सुरवात करतात. मग पगार, संसाराचे प्रश्न व कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे rat race मध्ये अडकतात व बाहेर पडायची इच्छा असून बाहेर पडत नाहीत व पहिल्या प्रकारच्या व्यक्तीप्रमाणे यांचेपण आयुष्य फिरत राहते. स्वतः पैसे कमावणे हा भांडवल उभे करण्याचा केवळ एकमेव मार्ग नाही. इतर अनेक मार्गांनी भांडवल उभे करता येते. भांडवल निर्मितीचे इतर मार्ग पुढे आपण पाहणार आहोत. भांडवलाच्या इतर पर्यायांनी जीवनात वेगाने पुढे जाण्याचा मार्ग सापडेल.

    तिसऱ्या प्रकारचे तरुण हे काहीसे ठाम, पण द्विधा मनस्थितीत असतात. या तरुणांना अधिक खोलात जाऊन प्रश्न विचारले तेव्हा समजले की, काहीतरी व्यवसाय करायचा म्हणजे कोणता व्यवसाय करावा याचा पुसटसा अंदाजही यांनी बांधलेला नसतो. इच्छाशक्ती असते मात्र दिशा घ्यायला वेळ लागतो. सांगणारेही कुणी नसतात. मग स्वतःच्या अंदाजावर पुढे जाण्याचा प्रयत्न चालू होतो. हे तरुण खूप काही करण्याची उमेद ठेवतात. पुढे जाऊन त्यांना हवे करुनही दाखवतात.

    मी काही जणांना पाहिजे तेवढे भांडवल देतो, तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहात, असा प्रश्न विचारला की मग त्यांच्याकडे काही उत्तर नसते. भांडवल, मनुष्यबळ, प्रशिक्षण याचा पुरवठा बाहेरुन करता येतो. त्याचे असंख्य मार्गसुध्दा आहेत. व्यवसाय करण्यासाठी लागणारी वृत्ती स्वतःतच असायला हवी किंवा तिची जोपासना स्वतःहून करायला हवी, मग व्यवसाय यशाच्या शिखरावर नेता येईल.

    नोकरी करताना उत्पन्नाच्या, खर्चाच्या मर्यादा पडतात. त्याउलट व्यवसायामध्ये २४ तास झोकून देऊन काम करता येते. शेकडो माणसांना काम देता येते. ती माणसे तुमच्यासाठी काम करत असतात. सुरूवातीची काही वर्षे संघर्ष केला की, मनाप्रमाणे उत्पन्न व पाहिजे तेवढा वेळ व्यवसायातून प्राप्त करता येतो. उत्पन्नात होणारी वाढ ही बांबूच्या रोपट्याप्रमाणे वेगाने होत असते. मनसोक्त जगण्याचा, स्वतःच्या स्वप्नांसाठी काम करण्याचा आनंद घेत व्यवसाय करणे हे नोकरीपेक्षा सरसच.

    भारत हा तरुणांचा देश आहे. जगातील सर्वात जास्त तरुणांचा हा देश म्हणजे प्रत्येकाचे लक्ष आकर्षित करुन घेत असतो, पण इथल्या तरुणाईला या गोष्टीची कितपत जाणीव आहे हे जाणून घ्यावे लागेल. या तरुणाईची अवस्था कस्तुरीमृगासारखी आहे. कस्तुरी ही मृगाच्या नाभीत असते. मृग कस्तुरी शोधण्यासाठी सर्व जंगलभर सैरावैरा धावत असतो, पण त्याला स्वतःच्या नाभीत असलेल्या कस्तुरीची जाणीव कधीच होत नाही. आपल्यातल्या अपार शक्तीची जाणीव फार कमी तरुणांना आहे.