Author: naviarthkranti

  • रुबाबदार आयुष्य जगा : आरोग्यसंपन्न जगा

    रुबाबदार आयुष्य जगा : आरोग्यसंपन्न जगा

    काल झोपताना त्याने उद्याच्या दिवसात करावयाच्या सर्व कामांची यादी केली, ती त्याची नेहमीची सवयच होती. पण नेहमीप्रमाणे व्यायामासाठी वेगळा वेळ काढायचं त्याच्याकडून राहूनच गेलं. खरंच आपण आपल्या आरोग्याला किती साधारण स्थान दिलंय नाही का? खरंच आपल्या आयुष्यात आरोग्याचं महत्व तितकं साधारण आहे का? गांभीर्याने स्वतःला प्रश्न विचारला तर नाही हेच उत्तर येईल. मुळात आरोग्याशिवाय माणसाला काय करणं शक्य आहे हाच सर्वात मोठा कळीचा मुद्दा आहे. 

    चार दिवानांचं घर जरी आपल्याकडे असलं; पण मणक्यात गॅप असला, तर चटईवर झोपायला लागतं. दहा साखर कारखान्यांचे Shares आपल्याकडे असतील; पण डायबिटीस असेल, तर तो डॉक्टर चमचाभर सुद्धा साखर खाऊ देत नाही. घरी हरभऱ्याची एकरभर शेती आहे; पण ते चणे खायला तोंडात दातच नसतील, तर करणार काय? तोंडासमोर पंचपक्वानांची मेजवानी आहे, पण पचनसंस्थाच जर काम करत नसेल, तर कोणाला दुःख सांगणार…

    बोध हाच की चांगलं आरोग्य नसणं हे दात नसलेल्या वाघासारखं आहे. अर्थहीन. तरुणपणी पैसा कमावण्यासाठी आपण शरीराची ओढाताण करतो आणि म्हातारपण आलं की हेच शरीर जपण्यासाठी कमावलेलं धन खर्च करतो. मेहनत करू नका असं अजिबात म्हणायचं नाहीये, पण या कष्टमय प्रवासात शरीराशी मात्र कधीच तडजोड करू नका, कारण हे शरीर जर आपल्यावर रुसलं, तर समोर असणारं स्वर्गसुख देखील व्यर्थ ठरतं. आपल्या शरीरातील अवयवांची जर किंमत काढायला आपण गेलो, तर ती शेकडो कोटींच्या घरात जाईल. खिशात जर पाचशेच्या चार नोटा असल्या, तर आपण किती वेळा चाचपडून पाहतो, मग एवढी कोट्यावधींची शरीररुपी संपत्ती आपल्याजवळ असताना आपण त्याची किती काळजी घेतो. खूप कमी, खरच खूप कमी. का? कारण ते मोबदल्याशिवाय मिळालंय. या शरीरासाठी आपण कोणते पैसे मोजले नाहीत. आपल्या आई-वडिलांना आपण त्याचं भाडंही देत नाही. म्हणजे फुकटच मिळालेली चीजवस्तू. साधं एक उदाहरण पाहा. आपण आपला चष्मा जास्त जपतो, की डोळे जास्त जपतो? 90% वाचकांचे उत्तर चष्मा हेच असेल. तो चष्मा ठेवायचं खोकं वेगळं, त्याला पुसण्याचा रुमाल वेगळा. ती काच स्वच्छ करायला liquid वेगळं. आणि त्या चष्म्याच्या कितीतरी पटीने महाग असणारे आपले डोळे. त्यांचं काय… ॐ दुर्लक्षाय नमः फक्त एकदा ओल्या पाण्याचा हात फिरवला, की झाले आमचे डोळे स्वच्छ. किती मोठी शोकांतिका. पण याच शोकांतिकेवर वेळ जायच्या आधी विचार व्हायला हवा. आपल्या आरोग्यासाठी आपणच जागं व्हायला हवं. चांगल्या करिअरसाठी जसे आपण झगडतो ती धडपड चांगल्या आरोग्यासाठी देखील व्हायलाच हवी. उत्तम आरोग्याला आपण जर अलंकार मानत असू, तर त्या अलंकाराची बडदास्त देखील आपणच ठेवायला हवी ना!

    सुदृढ शरीराच्या महत्त्वावर रामदास स्वामी फार सुंदर म्हणतात

    “शक्तीने पावती सुखे | शक्ती नसता विटंबना ||

    शक्तीने नेटका प्राणी | वैभव भोगता दिसे ||”

    आणखी वाचा

  • “रंकाचा राजा’’ संघर्षातून उभारले यशस्वी साम्राज्य, लॅरी एलिसन यांचा प्रेरणादायी प्रवास 

    “रंकाचा राजा’’ संघर्षातून उभारले यशस्वी साम्राज्य, लॅरी एलिसन यांचा प्रेरणादायी प्रवास 

    आज आपण अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यांच्यावर “रंकाचा राजा” ही म्हण तंतोतंत लागू होते. या व्यक्तीने आपल्या जीवनातील अनेक आव्हानांवर मात करून यश मिळवले आहे. ती व्यक्ती म्हणजे अमेरिकेचे प्रख्यात उद्योजक आणि ओरॅकल कॉर्पोरेशनचे संस्थापक, “लॅरी एलिसन”.

    लॅरी एलीसन आणि देव यांच्यात काय फरक आहे, यावर एक विनोदी प्रश्न विचारला जातो. उत्तर असं दिलं जातं की, “देवाला आपण लॅरी एलीसन आहोत असं वाटत नाही.” यावरूनच लॅरी एलीसन किती महत्वाकांक्षी व्यक्ती आहेत, याची कल्पना येते.लॅरी एलीसन हे तंत्रज्ञान क्षेत्रातील एक क्रांतिकारी नाव आहे. त्यांनी माहिती साठवणाऱ्या म्हणजेच डेटाबेस क्षेत्रात असा काही क्रांतिकारक बदल घडवला की, मायक्रोसॉफ्ट, आयबीएमसारख्या बलाढ्य कंपन्यांनाही त्यांची धडकी भरली होती. त्यांच्या नेतृत्वात, Oracle ने डेटाबेस व्यवस्थापनाच्या तंत्रज्ञानात अभूतपूर्व प्रगती केली. हे तंत्रज्ञान व्यवसायांच्या आणि उद्योगांच्या केंद्रस्थानी आलं, ज्यामुळे जगभरातील डेटा व्यवस्थापनाचा चेहरामोहरा बदलला.

    आज त्यांचा जन्मदिन… चला तर, त्यांचा आजवरचा जीवनप्रवास पाहूया. 

    बालपण आणि प्रारंभिक जीवन 

    लॅरी एलिसन यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. त्यांचे बालपण आणि प्रारंभिक जीवन संघर्षमयी होते. फ्लॉरेन्स स्पेलमन ही त्यांची १९ वर्षे वयाची आई अविवाहित होती. त्यांच्या जन्मानंतर काही दिवसातच त्यांच्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबाला सोडून दिले. लॅरी नऊ महिन्यांचे असताना त्यांना न्यूमोनिया झाला असताना आपल्याला आपल्या मुलाचा नीट सांभाळ करायला जमणार नाही असं वाटल्यामुळे त्यांच्या आईनं एलिसनला शिकागोमधल्या आपल्या लिलियन नावाच्या आत्याकडे सांभाळायला द्यायचं ठरवलं. लिलियन आणि लुईस एलिसन या नवरा-बायकोनं मग एलिसन नऊ महिन्यांचा असताना त्याला दत्तक घेतलं. त्याच्या नव्या आईने त्यांचं चांगल्या प्रकारे पालनपोषण केले. त्यांनंतर त्यांची खरी आई त्यांना कधीच भेटली नाही. ती त्यांना जेव्हा ते ४८ वर्षाचे झाले आणि जगात त्यांचे बर्‍यापैकी नाव झाले होते तेव्हाच भेटली. अगदी हिंदी सिनेमांत दाखवतात तशी स्टोरी आहे ही…

    लॅरींनी 1962 मध्ये अर्बाना-चॅम्पेन येथील इलिनॉय विद्यापीठात शिक्षणाला सुरुवात केली. मात्र, 1964 मध्ये त्यांच्या सावत्र आई म्हणजेच लिलियन याचं निधन झालं, आईच्या निधनानंतर लॅरी खूपच दुःखी झाले आणि त्यांनी  शिक्षण अर्धवट सोडले. लिलियनशी त्याचं  नातं खूप जिव्हाळ्याचं झालं होतं, परंतु लुई म्हणजेच त्यांचे सावत्र वडील यांच्यासोबत त्यांचे संबंध तणावपूर्ण होते. लुई त्यांना वारंवार म्हणत की, तू आयुष्यात कधीच काही साध्य करू शकणार नाही. त्यांच्या सावत्र वडिलांच्या अशा वागणुकीमुळे लॅरींचा स्वभाव हा लहानपनासुनच जिद्दी बनला आणि आता वडिलांना खोटं ठरवून काहीतरी करून दाखवायचा चंग त्यांनी लहापणापासूनच बांधला.

    कठीण परिस्थितीतही लॅरीने धैर्य आणि जिद्द दाखवून पुढे प्रचंड यश मिळवले,  ते म्हणतात ना परिस्थिती कितीही कठीण असली, तरीही स्वप्नांवर विश्वास ठेवणं महत्वाचं असतं. लॅरीनेही हार मानली नाही. 1966 मध्ये शिकागो विद्यापीठात थोडा काळ शिकून त्यांनी आपल्या इच्छाशक्तीने पुढे पाऊल टाकलं. 

    सुरुवातीचा संघर्ष 

    1960 च्या दशकात संगणकाच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत होती. संगणकाविषयी सर्वत्र चर्चा सुरू झाली होती, आणि अनेक कंपन्यांना त्यांच्या कामांना सुलभ बनवण्यासाठी कुशल प्रोग्रामर्सची आवश्यकता होती. लॅरी यांनी शाळेत प्रोग्रामिंगचे धडे घेतले होते आणि त्यांच्या या आवडीमुळे त्यांनी त्या काळात १९६६ मध्ये, वयाच्या अवघ्या  २२ व्या वर्षी पहिला संगणक डिझाईन केला. त्या काळात संगणक आणि तंत्रज्ञान हे नवीन क्षेत्र होते, पण लॅरींनी याच क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्याचे ठरवले. कॅलिफोर्नियामध्ये येऊन त्यांनी संगणक डिझाईनशी संबंधित छोटे-मोठे काम करून आपले पोट भरायला सुरुवात केली. 

    1973 मध्ये ॲम्पेक्स या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत काम करायला सुरुवात केली, त्या ठिकाणी काम करत असताना त्यांना तेथे नवीन सहकारी एड ओट्स आणि बॉब मायनर भेटले, त्यांच्या सोबतचा त्यांचा अनुभव कमालीचा राहिला,  नवी शिकवण घेतली आणि अनुभव मिळवला. मात्र, त्यांच्या यशाची भूक थांबली नाही. 1976 मध्ये त्यांनी ॲम्पेक्स सोडून प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट्समध्ये काम करण्याचा निर्णय  घेतला आणि उपाध्यक्ष पदावर कार्यरत होत, कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागाचे नेतृत्व केले.

    व्यवसायाची सुरुवात (Oracle ची मुहूर्तमेढ)

    1977 मध्ये, एलिसन यांनी आपले सहकारी  मायनर आणि ओट्ससोबत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज (SDL) ची स्थापना केली, जी सुरुवातीला इतर कंपन्यांसाठी कॉन्ट्रॅक्ट प्रोग्रामिंग करण्यासाठी तयार करण्यात आली होती. मात्र, एलिसन यांना SDL द्वारे काहीतरी मोठं आणि क्रांतिकारक करायचं होतं. त्यांना ब्रिटिश संगणक शास्त्रज्ञ एडगर एफ. कॉड यांनी मांडलेल्या रिलेशनल डेटाबेस मॉडेलने खूप प्रेरणा दिली. या मॉडेलने मोठ्या प्रमाणात डेटाचे कार्यक्षम व्यवस्थापन आणि जलद रिकव्हरी करण्याचे मार्ग दाखवले. एलिसन, मायनर आणि ओट्स यांनी या क्षेत्रात मोठ्या व्यावसायिक संधी ओळखल्या आणि त्यांनी डेटाबेस विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले

    त्यांच्या या प्रयत्नांना अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएकडून (Central Intelligence Agency) करार मिळाला आणि त्यांनी व्यावसायिक रिलेशनल डेटाबेस प्रोग्राम विकसित करण्यास सुरुवात केली. अखेर 1979 मध्ये, रिलेशनल सॉफ्टवेअर इंक. (आता Oracle) ने स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज (SQL) वापरणारा पहिला व्यावसायिक रिलेशनल डेटाबेस प्रोग्राम लॉन्च केला. या अभिनव डेटाबेस प्रोग्रामने त्याकाळात लोकप्रियता मिळवली आणि उद्योगाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला.

    संकटांवर मात

    1982 मध्ये नाव बदलून ओरॅकल सिस्टिम कॉर्पोरेशन (नंतर ओरॅकल कॉर्पोरेशन) ठेवलेली कंपनी आपल्या नाविन्यपूर्ण आणि आक्रमक मार्केटिंगसाठी ओळखली गेली. 1980 च्या दशकात कंपनीची झपाट्याने वाढ झाली, आणि 1986 मध्ये कंपनीने सार्वजनिक होऊन यश मिळवलं. 1987 पर्यंत, ओरॅकल जगातील सर्वात मोठी डेटाबेस-व्यवस्थापन कंपनी म्हणून समोर आली. मात्र, 1990 मध्ये भागधारकाच्या खटल्यामुळे झालेल्या अंतर्गत ऑडिटमध्ये असं लक्षात आलं की कंपनीने आपल्या कमाईचा चुकीचा अंदाज वर्तवला होता, ज्यामुळे स्टॉक बाजारात (share market) मोठी घसरण झाली. ओरॅकलच्या शेअरचा भाव जवळपास ८० टक्क्याहून पडला. 

    संकटातून मार्ग काढण्यासाठी, लॅरी एलिसनने कंपनीच्या व्यवस्थापनाची पुनर्रचना केली आणि 1992 च्या अखेरीस ओरॅकल पुन्हा आर्थिक स्थिरतेत आली. 1990 च्या दशकाच्या मध्यात, एलिसनला नेटवर्क कॉम्प्युटर (NC) नावाचा डेस्कटॉप पीसीचा स्वस्त पर्याय विकसित करून मायक्रोसॉफ्टशी स्पर्धा करण्याची संधी मिळाली. NC ही कल्पना पुढे क्लाउड कॉम्प्युटिंगच्या सुरुवातीची चाचणी होती. परंतु, PC च्या सतत कमी होणाऱ्या किमती आणि NC च्या विकासातील विलंब यामुळे मायक्रोसॉफ्टने बाजारात वर्चस्व गाजवलं. 

    त्यांची ही गोष्ट दाखवते की अपयश ही यशाच्या प्रवासात एक पायरी असते. प्रत्येक आव्हानातून शिकून, नव्या उमेदीने पुढे जाणं हेच खऱ्या उद्योजकाचं वैशिष्ट्य असतं. एलिसनची दूरदृष्टी, त्यांची  चिकाटी आणि त्यांच्या चुका स्वीकारण्याची तयारी हेच त्यांच्या  यशाचं गमक ठरलं.

    यशाच्या शिखरावर

    लॅरी एलिसनने इंटरनेटच्या प्रारंभिक काळात ओरॅकलला यशाच्या शिखरावर नेले. वर्ल्ड वाइड वेब (www) तंत्रज्ञानाशी सुसंगत उत्पादने विकसित करण्यावर भर देऊन, त्यांनी कंपनीची वाढ सुनिश्चित केली. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला, एलिसनने प्रतिस्पर्धी सॉफ्टवेअर कंपन्या खरेदी करण्याचे आक्रमक धोरण अवलंबले, ज्यामुळे ओरॅकलची ताकद अधिकच वाढली.

    पीपलसॉफ्ट (2005), सिबेल (2006), BEA (2008), आणि सन मायक्रोसिस्टम्स (2010) या मोठ्या कंपन्यासह अनेक कंपन्या ओरॅकलमध्ये विलीन झाल्या आणि आज  त्यांच्या दूरदृष्टी आणि धाडसी निर्णयांमुळे ओरॅकल जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात एक अग्रगण्य कंपनी बनली आहे.

    एलिसन हे सिलिकॉन व्हॅलीतील सर्वात विशेष आणि  वेगळ्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते, त्यांचे  उत्तुंग यश जगभरात कौतुकास पात्र ठरले. त्यांच्या व्यवसायातील धाडसी निर्णयांमुळे आणि प्रगतीशील दृष्टिकोनामुळे त्यांचे नाव आज अग्रगण्य उद्योजकांमध्ये गणले जाते. 2010 मध्ये प्रतिष्ठित अमेरिका चषक जिंकणारा संघ उभारून त्यांनी आपले नेतृत्व कौशल्य दाखवले. 2012 मध्ये, त्यांनी हवाईयन बेट लनाईचे 98 टक्के भाग विकत घेऊन, आपले भव्य स्वप्न साकार केले. त्या काळात त्यांची  वैयक्तिक संपत्ती सुमारे $40 अब्ज होती, ज्यामुळे ते  जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले. सप्टेंबर 2014 मध्ये, एलिसनने Oracle चे CEO पद सोडले, परंतु कंपनीच्या प्रगतीसाठी कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) म्हणून योगदान देत राहिले . 

    मित्रांनो, लॅरी एलिसन यांची जीवनकथा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अत्यंत गरिबीतून संघर्ष करत त्यांनी जगातील एक मोठं असणारं साम्राज्य उभं केलं. ‘अम्पॅक्स कॉर्पोरेशन’मध्ये काम करत असताना त्यांना ‘ओरॅकल’ची फक्त कल्पना सुचली होती आणि याच कल्पनेवर त्यांनी मेहनतीने कार्य केलं. आज ‘ओरॅकल’मध्ये १,२२,००० हून अधिक कर्मचारी काम करत असून कंपनीची एकूण संपत्ती ९१ बिलियन डॉलर्स आहे.

    लॅरी एलिसन यांची संपत्ती सुमारे ५६ बिलियन डॉलर्स एवढी असून त्यांनी आपला प्रवास खडतर परिस्थितीतून सुरू केला होता. त्यांच्या या यशस्वी प्रवासामध्ये त्यांनी अनेक आव्हानं पार केली. 

    जगातील सर्वाधिक डेटा साठवणारी कंपनी उभारणारे आणि प्रचंड संपत्तीचे मालक लॅरी एलिसन हे जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असून अमेरिकेत तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. परंतु, एवढी मोठी कंपनी उभी करणारे आणि अफाट संपत्ती कमावणारे लॅरी एलिसन यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. लहानपणी सोडून दिल्या गेलेल्या या मुलाने स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेट्स यांच्या बरोबरीने यश मिळवले. त्यांचा प्रवास हा आपल्यासारख्या लाखो तरुणांना स्वप्न पाहण्याची आणि ते प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा देतो.

    आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत यापेक्षा आपला दृष्टिकोन आणि मेहनत कशी आहे, हेच आपल्या यशाचं खरं कारण असतं, हे लॅरी एलिसन यांच्या जीवनातून शिकायला मिळतं. जर तुम्हाला काहीतरी नवीन वेगळे अविश्‍वसनीय करायचे असेल, तर त्याची तयारी आता आणि लगेच करा असं लॅरी नेहमी सांगत असतात, त्यांच्या या प्रवासातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करावा, कारण शेवटी  यश मिळवण्यासाठी चिकाटी आणि प्रयत्न यांचीच गरज असते.

    आणखीन वाचा:

  • स्वतःमध्ये बदल घडवून मग हक्काने म्हणा ‘मेरा भारत महान’

    स्वतःमध्ये बदल घडवून मग हक्काने म्हणा ‘मेरा भारत महान’

    देश परकीय राजवटीतून मुक्त होऊन आज 77 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे भारतमातेच्या जयघोषात आजचा संपूर्ण दिवस भरून जाईल यात शंका नाही. मात्र उद्याचं काय? आजच्या रॅलीमध्ये हातात झेंडा घेऊन गेल्यानंतर उद्या तोच झेंडा रस्त्यावर पडलेला तर दिसणार नाही ना? दरवर्षीप्रमाणे आजही भाषण ऐकताना “अनेकांनी प्राणांची आहुती दिली आणि म्हणून आपल्याला आजचा सूर्य स्वतंत्रतेत अनुभवायला मिळतोय” हे वाक्य आपल्याला  रटाळ वाटेल, कारण “स्वातंत्र्य” या शब्दाची खरी ओळख गेल्या 77 वर्षात आपल्याला पटलेलीच नाही. आपण केवळ परकीयांच्या गुलामगिरीतूनच मोकळे झालेलो नाही, तर लोकशाहीमध्ये वावरणारे सर्वात भाग्यवान देशवासी आहोत. आपल्यावर कोणीही कसल्याही प्रकारची सक्ती करू शकत नाही याचे महत्त्व काय हे जो पिंजऱ्यात जखडलेला आहे त्यालाच कळेल. मात्र मिळालेलं स्वातंत्र्य उपभोगताना आपण मानसिकदृष्टया अजूनही मागासलेले आहोत याची जाणीव काही केल्या होत नाहीये.

    गेल्या 77 वर्षांत नक्कीच आपण अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. भारताचा इतिहास हा एकेकाळी वैभवशाली होता. असं म्हणतात, इथून सोन्याचा धूर निघायचा मात्र केवळ इंग्रजच नाही, तर अनेक परकीय आक्रमकांनी अनेकवेळा भारताला लुबाडलं, लुटून नेलं आणि तरीही आज भारत स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा आहे. आज आपल्या देशातून सोन्याचा धूर निघत नसला तरीही भारताच्या अंतराळवीरांनी चंद्राला गवसणी घातली आहे, इथे अनेक राज्यांमध्ये आज मेट्रोच्या वेगवान गतीने प्रवास केला जातो, भारताच्या सीमेवर उभ्या असलेल्या सेनेच्या वाकड्यात जाण्याची हिंमत जगभरातील कोणतीही ताकद करत नाही किंवा करणार नाही, आपली अर्थव्यवस्था दरदिवशी सकारात्मक प्रगती करतेय, दूरसंचार क्रांती विविध क्षेत्रांना एका धाग्यात जोडून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. हे आणि असे अनेक बदल पाहिले की सोन्याचा धूर पुन्हा निघायला जास्ती वेळ जाणार नाही यावर विश्वास बसतो. 

    मात्र चौफेर नजर फिरवल्यास प्रश्न पडतो की भारतात वावरणारा प्रत्येक माणूस सामान स्वातंत्र्य अनुभवत आहे का? पूरग्रस्त भागांमध्ये लोकं तेवढ्याच आनंदाने आजचा दिवस साजरा करत असतील का? सोशल मीडियाने जरी संपूर्ण देशाला एकत्र जोडलेलं असलं तरीही तुटलेल्या तारा आणि भंग झालेल्या कनेक्शनमुळे किती लोकं कोपऱ्यांमध्ये अडकून पडलेली असतील? धरतीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरच्या भागात आजही कोणीतरी जीव मुठीत धरून तर बसलेलं नसेल ना? लोकशाहीच्या राज्यात कुणावर धर्म बदलण्याची सक्ती केली जात नसेल ना? सरकारने अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या तरीही भारतात आजही अनेक गावांमध्ये शिक्षणाचा अभाव आणि वैद्यकीय सुविधांची कमतरता यांमुळे स्वतःच्या घरात प्रसूतीची पीडा सोसणारी बाई आढळतेच. भारताच्या कितीतरी गावांची नावं देखील आपल्याला माहिती नाही, त्यांचा उल्लेख नकाशात नाही स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर देखील जिथे बालविवाह, स्त्रीभ्रूणहत्या, बलात्कार, बालमजुरी असे कितीतरी माणुसकीला काळिमा फासणारे प्रकार घडतात. शिक्षणाची इच्छा मनात बाळगून स्वतःच्या आई-वडिलांची नजर चोरून पावसाचं पाणी अंगावर सोसत जाणाऱ्या लहानग्यांच्या आणि अनेक पीडितांच्या डोक्यावर खरंच स्वातंत्र्याचा सूर्य उगवला आहे का असा प्रश्न पडतो. 

    म्हटलं तर भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. येणाऱ्या काळात भारतातील तरुणांच्या मेहनतीवर इतर जगभरातील देश चालणार आहेत मग याच हुशारीचा उपयोग भारतालाच करवून दिला तर? तरुणपिढी देशाच्या भक्कम पाया आहे, मात्र हीच वयातील मुलं सोशल मीडियाचा गैरवारपर करताना किंवा संध्याकाळच्यावेळी मित्रांसोबत गप्पाष्टके करताना आढळतात.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इथे कामाच्या संधी नाही म्हणत परदेशात जाणारे अनेक असतील पण मी माझ्या देशात राहून स्वतःसाठी तसेच इतरांसाठी देखील नोकरीच्या संधी तयार करेन असं देशाचा तरुण का म्हणत नाही? गावातील लोकं अशिक्षित आहेत, त्यांना स्वच्छतेचं महत्त्व माहिती नाही, कामाच्या शोधात शहरात येऊन ते शहराला मळवून टाकतायत असं म्हणत आपणच सुशिक्षित लोकं भारत सोडून परदेशी जातो. अशावेळी प्रश्न उभा राहतो की ज्या देशाला नावं ठेऊन, अशिक्षित म्हणत आपण अर्ध्यावर सोडून आलो त्याच भारताच्या स्वातंत्र्यदिनादिवशी “भारत माता की जय” म्हणावं तरी का? परदेशात ट्रॅफिकचे नियम किती कडक आहे हे सांगताना आपण थकत नाही, मात्र उठायला उशीर झाल्याने वाया गेलेला वेळ भरून काढताना ट्रॅफिक नियम मोडणारे देखील आपणच असतो. गावाकडून आलेली लोकं बेशिस्त आहेत, त्यांना स्वच्छतेचं महत्त्व माहिती नाही असं म्हणत स्वतःचं घर नीटनेटकं ठेऊन तोच कचरा बाहेर नेऊन टाकणारे देखील आपणच असतो. रस्त्याने चालताना खाल्लं जाणाऱ्या केळ्याची साल कचरापेटीत टाकणं आपल्याला शक्य होत नाही आणि दिवसभर उन्हात भूक आणि तहान विसरून केवळ दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून तडफडणारा कचरा कर्मचारी आपल्याला मळकट वाटतो. 

  • ‘मार्केटिंग’ म्हणजे काय आणि मार्केटिंगचे प्रकार

    ‘मार्केटिंग’ म्हणजे काय आणि मार्केटिंगचे प्रकार

    इंटरनेटच्या आधारे चालणाऱ्या या माध्यम स्वरूपात काही क्षणांमध्ये अनेक लोकांपर्यंत पोहोचता येतं. तुमचा व्यवसाय काय आहे, कोणासाठी आहे, त्याची किंमत काय इत्यादी सर्व महत्वाच्या गोष्टी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं हे एक सर्वोत्तम साधन म्हणावं लागेल. सोशल मीडियाच्या मदतीने व्यवसाय वाढवत असताना मार्केटिंग स्ट्रॅटेजी पक्की असली पाहिजे असं म्हणतात, मात्र मार्केटिंग म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय? हे जाणून घेऊया…

    मार्केटिंग म्हणजे काय?

    एखादा विक्रेता जेव्हा त्याच्याजवळ असलेल्या सेवा आणि उत्पादनांचा प्रचार करतो तेव्हा त्याला मार्केटिंग करणं असं म्हणतात किंवा आपला ग्राहकवर्ग कोणता आहे, त्यांची गरज काय आहे हे ओळखून त्यांना आपल्या उत्पादनांकडे आकर्षित करणं याला मार्केटिंग म्हटलं जाऊ शकतं. तुमच्याजवळ असलेली वस्तू ग्राहकांच्या मनात उतरावी, त्यांच्या पसंतीस यावी आणि त्यांना वाटावं की आपली गरज इथेच पूर्ण होऊ शकते आणि त्यांना ती खरेदी करण्याची इच्छा व्हावी म्हणजेच सोप्या शब्दांत मार्केटिंग होय. वर्तमानपत्रांमध्ये तुम्ही जाहिराती पाहिल्याच असतील जिथे डोळ्यांना भावणाऱ्या शब्दांमध्ये प्रॉपर्टीची जाहिरात केली जाते. ती जाहिरात वाचून आपल्या मनात देखील असंच एखादं घर असावं अशी इच्छा निर्माण होते आणि यालाच आपण मार्केटिंगची जीत म्हटली पाहिजे. 

    व्यवसाय म्हटलं की मार्केटिंग हा त्याचा अविभाज्य भाग ठरतो, कारण मार्केटिंगमध्ये एखादा उपक्रम यशस्वी बनवण्याची किंवा मुळापासून उखडून टाकण्याची ताकद असते. यामध्ये सर्वात अगोदर तुम्ही वावरत असलेल्या बाजाराचा अभ्यास केला जातो, या अभ्यासामधून ग्राहकांची गरज ओळखायला मदत होते आणि सोबतच आपले प्रतिस्पर्धी कोण आहेत याचं ढोबळ चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. हा अभ्यास झाल्यानंतर आपण कोणत्या गोष्टी विकणार आहोत, त्याची किंमत किती असेल, त्याचं पॅकेजिंग कसे असेल, देवाण-घेवाणीमधून आपण जास्तीत जास्त विक्री करून महसूल कसा उभा करू शकतो याची आखणी केली जाते. 

    मार्केटिंगमधल्या 4Ps कोणत्या?

    १) Product: कोणत्याही प्रकारचे मार्केटिंग कॅम्पेन सुरु करण्याअगोदर विक्रेत्याला तो विकत असलेल्या वस्तू किंवा सेवेबद्दल माहिती असली पाहिजे, कारण संपूर्ण कॅम्पेन याच उत्पादन किंवा सेवांवर अवलंबून असते. आपण विकत असलेल्या वस्तू ग्राहकांना कशाप्रकारे मदत करतील, आपण बाजाराची गरज पूर्ण करणारी वस्तू बाजारात विकत आहोत का याची माहिती विक्रेत्याला असली पाहिजे. 

    २) Price: विक्रेता विकत असलेल्या वस्तूची किंमत म्हणजे प्राईस. यामध्ये युनिटची किंमत, वितरणाचा खर्च, विपणनाचा खर्च इत्यादी घटक ग्राह्य धरले जातात. ग्राहकांकडून त्या वस्तूसाठी किती प्रमाणात मागणी आहे किंवा प्रतिस्पर्धी तीच वस्तू कोणत्या किमतीत विकतोय यांवर वस्तूची किंमत ठरते. 

    ३) Place: विक्रेता उत्पादन किंवा सेवा कशाप्रकारे ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहे याचा विचार देखील विपणनात केला जातो. आधी बऱ्यापैकी वस्तूंची विक्री प्रत्यक्षात व्हायची, मात्र आता सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या जगात ऑनलाईन देखील वस्तू विकल्या जातात. 

    ४) Promotion: विक्रेता विकत असलेली वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे प्रमोशन. जाहिरात, जनसंपर्क, सोशल मीडिया इत्यादींच्या मदतीने वस्तूंचा प्रचार केला जातो. 

    मार्केटिंगचे प्रकार किती आहेत?

    १) ब्लॉग मार्केटिंग: संबंधित ग्राहकांपर्यंत ब्लॉगिंगच्या माध्यमातून आवश्यक माहिती पोहोचवणे म्हणजे ब्लॉग मार्केटिंग होय. यामध्ये विक्रीसाठी निवडलेल्या वस्तूंची विशिष्ट माहिती दिली जाते. 

    २) इंटरनेट मार्केटिंग: आजच्या जगात अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इंटरनेटशिवाय चांगला पर्याय उपलब्ध नाही आणि म्हणूनच उत्तमरित्या इंटरनेटचा वापर करून विपणन केल्यास आर्थिक फायदा होऊ शकतो. 

    ३) प्रिंट मार्केटिंग: आपण जरी इंटरनेटच्या युगात वावरत असलो तरीही वर्तमानपत्र आणि मासिकांचा वाचकवर्ग आजही अफाट आहे आणि परिणामी लक्षवेधी छायाचित्रे, दर्जेदार लिखाण केल्यास वाचकांच्या मनात जागा निर्माण करता येते. 

    ४) सोशल मीडिया मार्केटिंग: सोशल मीडियाचा वापर किती प्रमाणात केला जातो याबद्दल विशेष काही नमूद करण्याची गरज नाही. लाखो, कोट्यवधी लोकं दर दिवशी हातात मोबाईल घेऊन वावरत असतात आणि म्हणूनच तांत्रिक जगात वावरत असताना सोशल मीडिया मार्केटिंग हा पर्याय उपयुक्त ठरतो. Instagram, Facebook, Twitter  यांसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ग्राहकांना आकर्षित करण्यात मदत करतात. 

    ५) व्हिडिओ मार्केटिंग: कदाचित तुम्हाला सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेल्या ‘Reels’ बद्दल माहिती असेल. व्हिडीओ मार्केटींगद्वारे अगदी ३० सेकंदांमध्ये अत्यावश्यक माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाऊ शकते आणि तांत्रिक घटकांमुळे अधिक आकर्षकदृष्ट्या आपली गोष्ट मांडता येते. 

    ६) SEO मार्केटिंग: Pay-Per-Click या संकल्पनेवर आधारित चालणाऱ्या या उपक्रमात स्पर्धात्मक जगात वावरणाऱ्या इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या पुढे स्वतःला ठेवण्यासाठी सर्च इंजिनला पैसे दिले जातात. वाचकांनी अधिकाधिक लक्ष द्यावे, कंपनीची साईट उघडून बघावी म्हणून SEOची प्रक्रिया वापरली जाते. 

    मार्केटिंगची मदत घेतल्यामुळे तुम्ही कोणती उत्पादने विकत आहात याची सविस्तर माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात मदत मिळते. जास्तीत-जास्त लीड्स मिळवल्यामुळे दीर्घकाळासाठी ब्रॅण्डची विक्री वाढते. सध्या आपण शर्यतीच्या जगात वावरत आहोत. जिथे मार्केटिंगमधून मिळणाऱ्या मदतीची गरज सर्वाधिक आहे. अनेकवेळा तुम्ही मार्केटिंगच्या मदतीने स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करू शकता, ज्यामधून नफा वाढतो.

    आणखीन वाचा:

  • यशस्वी जीवनाचा मूलमंत्र; चिकाटी आणि सातत्य 

    यशस्वी जीवनाचा मूलमंत्र; चिकाटी आणि सातत्य 

    एखादं लहान मूल जेव्हा जन्माला येतं, तेव्हा ते लगेच चालायला शिकत नाही. अनेकदा चालण्याच्या प्रयत्नात ते धडपडतं, पण पडल्यावरदेखील ते चालणं सोडत नाही. सरतेशेवटी त्याच्या प्रयत्नांना यश मिळतं आणि ते मूल चालायला शिकतं. त्या लहान मुलाला कोणी चालण्याचे धडे दिलेले असतात का? तर नाही. ते स्वतःच शिकतं आणि प्रयत्न करायला लागतं. सांगायचं काय, ‘तर केलं तर नक्की होतं.’ process खूप महत्वाची आहे. त्या process मध्ये टिकून राहणं त्याहून जास्त महत्वाचं. जो थांबणार त्याचा शेवट निर्विवाद आहे आणि जो टिकून राहणार, त्याचं यश सुद्धा हमखासच. टिकून राहणं आणि करत राहणं एवढीच समज घ्यायची. आयुष्याचा प्रवास, यशाचा प्रवास हा कमी अधिक प्रमाणात सारखाच. वेगळं काय तर प्रवासाचे टप्पे आणि येणारे थांबे. फक्त करत राहायचं आणि लढत राहायचं. 

    कोणत्याही कामात सातत्य ठेवण्याची काही महत्त्वाचे कारणे आहेत :

    प्रगती: सतत प्रयत्न केल्याने आपण हळूहळू, परंतु निश्चितच प्रगती करतो. सातत्यामुळे आपल्याला आपल्या कामात सुधारणा दिसून येतात. आपणच आपल्यात बदल अनुभवतो. 

    निपुणता: सातत्याने एकाच कामात गुंतलेले राहिल्यास त्या क्षेत्रात निपुणता आणि कौशल्य वाढते. त्या कामाचं सुयोग्य तंत्र आपल्या लक्षात येते आणि ते काम आपल्या अंगवळणी पडतं.

    आत्मविश्वास: नियमितपणे प्रयत्न केल्याने आत्मविश्वास वाढतो, कारण यशाची शक्यता वाढते आणि आपण आपली क्षमता ओळखतो. ते काम आपण करू शकतो हा विश्वास आपल्याला वाटतो.

    अनुकूलता: सातत्याने काम केल्याने मन आणि शरीर त्या कामाशी अनुकूल होते, ज्यामुळे कामात वेग येतो आणि कार्यक्षमतेत वाढ होते. कामाचा वेग आणि अचूकता अधिकाधिक वाढते.

    लक्ष्य प्राप्ती: सातत्यामुळे आपण आपल्या ठरवलेल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याची शक्यता अधिक असते. आपल्याला आपलं ध्येय अधिकाधिक जवळ दिसू लागतं. त्या ध्येयप्राप्तीची खात्री वाटू लागते.  

    समयसूचकता : नियमितपणे आणि सातत्याने काम केल्याने वेळेत काम पूर्ण करण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे इतर कामांसाठी वेळ उपलब्ध होतो. आपण स्वत: आपली personal life आणि corporate life मध्ये प्रामाणिक आणि punctual राहायला लागतो. 

    कौशल्य विकास : सातत्यामुळे आपण आपले कौशल्यं आणि तंत्र अधिकाधिक सुधारू शकतो. नियमित सराव आणि प्रयत्न केल्याने कोणत्याही गोष्टीत निपुणता मिळते.

    ध्यान आणि एकाग्रता : सातत्यामुळे आपल्या कामावर लक्ष केंद्रित राहते. मन एकाग्र होते. यामुळे विचलित न होता आपले उद्दिष्ट साध्य करण्याची क्षमता विकसित होते.

    स्वयंशिस्त: सातत्याने काम केल्याने आपल्यात स्वयंशिस्त येते, काटेकोरपणा येतो. जी फक्त कोणतेही उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच नाही, तर आपले जीवन अधिक अनुशासित आणि परिणामकारक बनविण्यासाठी आवश्यक आहे.

    आत्मसंतोष: सातत्याने प्रयत्न करून जेव्हा आपण आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचतो, तेव्हा त्यातून मिळणारी आत्मसंतोषता आणि अतीव आनंद खूप महत्त्वाचा असते.

    सातत्य ठेवल्यामुळे होणारे फायदे खालीलप्रमाणे : 

    आव्हानं ओळखण्याची क्षमता: सातत्याने काम करत राहिल्याने कोणत्या ठिकाणी अडचणी येतात किंवा समस्या उद्भवतात, हे ओळखणे सोपे होते. यामुळे त्या समस्यांवर उपाय शोधणे व त्या सोडविणे अधिक सोपे होते.

    दृढ इच्छाशक्ती: सातत्याने प्रयत्न करत राहिल्यामुळे इच्छाशक्ती मजबूत होते, जे अडचणींचा सामना करण्यासाठी महत्त्वाचे असते.

    संयम आणि सहनशीलता: सातत्य हे संयम आणि सहनशीलता वाढवते. यामुळे आपल्याला तात्काळ यश न मिळाल्यास निराश न होता पुढे जाण्याची प्रेरणा मिळते.

    शारीरिक व मानसिक आरोग्य: नियमित व्यायाम किंवा योगासारख्या सातत्याने केलेल्या गोष्टींमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते.

    विश्वासार्हता: सातत्यामुळे आपली विश्वासार्हता वाढते. इतर लोक आपल्यावर विश्वास ठेवतात आणि आपली जबाबदारी स्वीकारतात.

    दीर्घकालीन यश: सातत्य हे दीर्घकालीन यशाचा पाया बनते. सातत्याने मेहनत घेतल्यास आपण आपल्या क्षेत्रात दीर्घकालीन यश मिळवू शकतो.

    कुटुंब व समाजातील नाते: सातत्याने दिलेला वेळ आणि प्रयत्न कुटुंब व सामाजिक नात्यांना बळकटी देतो. नियमित संवाद आणि सहभागामुळे नाते अधिक घनिष्ट होते.

    चांगल्या सवयींची निर्मिती: सातत्याने काहीतरी करत राहिल्यामुळे चांगल्या सवयी निर्माण होतात, ज्या आपले जीवन सुधारण्यात मदत करतात.

    आणखीन वाचा

  • ऑलिम्पिक गाजवणारा बीडचा शिलेदार : अविनाश साबळे

    ऑलिम्पिक गाजवणारा बीडचा शिलेदार : अविनाश साबळे

    बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा गावातील एका साधारण शेतकरी कुटुंबात  १३ सप्टेंबर १९९४ ला जन्मलेल्या अविनाशची घरची परिस्थिती तशी जेमतेमच. त्याचे आई वडील वीटभट्टी कामगार होते. आईवडिलांचा संघर्ष आणि घरातील दारिद्र्य उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या अविनाशची स्वप्नं मात्र छोटी नव्हती. सुरुवातीच्या काळात त्याच्याकडे प्राथमिक सुविधा नसताना, त्याने विविध खेळांमध्ये भाग घेतला. अविनाशला लहानपणापासून धावण्याचा सराव होता. घरापासून शाळा लांब असल्याने तो धावत शाळेमध्ये जायचा.  ग्रामीण भागात संसाधनांची कमतरता असताना, अविनाशने मातीच्या रस्त्यावर आणि साध्या साधनांवर प्रशिक्षण घेतले. त्याच्या पदरी कित्येक वेळा निराशा आणि अपयश आले; पण त्याचा आत्मविश्वास आणि चिकाटीने त्याला कायम पुढे जाण्यासाठी प्रेरित केले. 

    अविनाशने आपल्या शालेय जीवनात धावण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्यात यशही मिळवले. १२ वी झाल्यानंतर तो भारतीय लष्करामध्ये भरती झाला. तिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आणि धावण्यासाठीप्रोत्साहित केले. २०१८ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अविनाशने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्य पदक जिंकले. त्यानंतर २०१९ साली जागतिक क्रीडा स्पर्धेत त्यांनी नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. 

    गरीब परिस्थितीचे चटके सोसत त्याने आज बीड ते पॅरिस ऑलिम्पिक असा संघर्षमय प्रवास पूर्ण केला. फायनलमध्ये पदक जरी मिळाले नसले तरी कोणत्याही प्रकारची खेळाची पार्श्वभूमी नसताना अविनाशने घेतलेली एवढी मोठी झेप ही निःसंशय कौतुकास्पद आहे. 

    मंजिल उन्हीं को मिलती है;
    जिनके सपनो में जान होती है; 
    पंख से कुछ नहीं होता; 
    हौंसलों से ही उड़ान होती है।

    जय हिंद

    आणखी वाचा:

  • भारताला अंतराळात घेऊन जाणारे शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. विक्रम साराभाई…

    भारताला अंतराळात घेऊन जाणारे शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. विक्रम साराभाई…

    आनंदाची बाब म्हणजे भारताने पुन्हा एकदा प्रगतीचा मार्ग पकडला आहे. वर्ष १९६३ मध्ये भारताकडून पाहिलं रॉकेट लॉंच करण्यात आलं होतं. तेव्हापासून ते आत्तापर्यंतच्या प्रवासात अनेक चढ-उतार सर करत आपण चांद्रयान-२ ची मोहीम यशस्वी करून दाखवली. प्रत्येक भारतीयासाठी चांद्रयानाची मोहीम श्वास रोखून धरणारीच होती. भारताच्या अंतराळ प्रवासात अनेक बुद्धिवंतांनी योगदान दिलं आणि यातीलच म्हत्त्वाचे नाव म्हणजे विक्रम साराभाई. एवढं महत्त्वाचं का? जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. 

    विक्रम साराभाई कोण आहेत?

    विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे (Indian Space Research Programme) जनक म्हणून ओळखलं जातं आणि आज विक्रम साराभाई यांची १०५वी जयंती आहे. वर्ष १९१९ मध्ये विक्रम साराभाई यांचा जन्म गुजरातमधील एका श्रीमंत कुटुंबात झाला. त्यांचे वडील अंबालाल साराभाई हे एक प्रसिद्ध उद्योगपती होते, तर आई सरला देवी मॉंटेसरी शिक्षण पद्धतीवर आधारित द रिट्रीट नावाची शाळा चालवायच्या. 

    विक्रम साराभाई यांच्या जन्माचा काळ पारतंत्र्याचा असल्याने त्यांच्या घरी सतत स्वातंत्र्यसैनिकांची ये-जा असायची, परिणामी महात्मा गांधी, रवीन्द्रनाथ टागोर, सरोजिनी नायडू, मौलाना आझाद यांच्याशी साराभाईंनी बालपणीच संवाद साधला होता. विक्रम साराभाई यांचं प्राथमिक शिक्षण घरीच झालं, सोबत अशा दिग्गजांचा सहवास लाभला म्हणूनच लहानग्या विक्रम यांच्यात देशभक्तीचं बाळकडू तेव्हाच रुजलं होतं.  

    कळत्या वयात अहमदाबादच्या गुजरात कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्चशिक्षणासाठी त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळवला आणि  १९३९ साली रसायन आणि भौतिकशास्त्रात पदवी मिळवल्यानंतर बी.ए. आणि एम.ए.च्या पदव्या देखील पदरात पडून घेतल्या. विक्रम साराभाई यांचा शैक्षणिक प्रवास मात्र इथेच थांबत नाही, दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी भारतात परतलेल्या विक्रम साराभाई यांनी वर्ष १९४० मध्ये पीएच. डी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून डॉक्टरेट मिळवली आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी ही पदवी डॉ. सी. व्ही. रमन यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली होती. 

    विक्रम साराभाई यांचा वैज्ञानिक प्रवास:

    वर्ष १९४७ रोजी भारत देश इंग्रजांच्या जुलुमी राजवटीतून मुक्त झाला आणि त्यानंतर विक्रम साराभाई यांच्या वैज्ञानिक प्रवासाची खरी सुरुवात देखील झाली. स्वतःच्या राहत्या घरातील एका खोलीमधून विक्रम साराभाई यांनी भौतिक संशोधन प्रयोगशाळेचा श्रीगणेशा केला होता. या जागेचे ऐतिहासिक महत्त्व देखील अपार आहे, कारण इथूनच अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे काम सुरु झाले होते. विक्रम साराभाई भौतिक प्रयोगशाळेची गरज जाणून होते, म्हणूनच मित्रांच्या आणि पालकांच्या साहाय्याने त्यांनी अहमदाबाद एज्युकेशन सोसायटीच्या एम्. जी. सायन्स इन्स्टिट्यूटमधे भौतिकशास्त्राची प्रयोगशाळा उभारली, हीच अहमदाबादची फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी होय. विक्रम साराभाई काही काळ इथे प्राध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळत होते आणि त्यानंतर संचालक म्हणून देखील कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रयोगशाळेमध्ये किरणविज्ञान, अवकाशविज्ञान आदींवर संशोधन केलं जायचं. 

    इस्रोची सुरुवात:

    कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण आज जगभरात नाव गाजवणाऱ्या ISRO ची सुरुवात विक्रम साराभाई यांनी वयाच्या २८व्या वर्षी केली होती. आपल्याला ज्या वयात नेमकं काय करिअर निवडावं याची खात्री नसते किंवा आपण तारुण्याच्या ओघात वहावत जात असतो. त्याच वयात साराभाईंनी ISROची निर्मिती केली होती. सरकार दरबारी पायऱ्या झिजवून, सरकारला भौतिकशास्त्राचे महत्त्व पटवून देत साराभाई यांनी भारतीय अंतराळ संशोधन समितीची (INCOSPA) निर्मिती केली, ज्याचे नाव पुढे बदलून भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच  ISRO असे करण्यात आले. 

    भारताकडून आर्यभट्ट नावाचा पहिला अंतरिक्ष उपग्रह अवकाशात सोडण्यात आला होता, ज्याची रचना अहमदाबाद रिसर्च सेंटरमध्ये करण्यात आली होती. आर्यभट्टच्या यशस्वी उड्डाणानंतर अनेक उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आणि या सर्वांमध्ये विक्रम साराभाई यांचा वाटा महत्वाचा होता. 

    पहिले रॉकेट लॉंच:

    वर्ष १९६३ मध्ये केरळमधील थुंबा नावाच्या गावातून चर्चची जमीन विकत घेण्यात आली, जिथे नंतर थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशनची (TERLS) स्थापना करण्यात आली. याच ठिकाणी भारताचं पहिलं रॉकेट लाँच करण्यात आलं होतं. आज याच लॉंचिंग स्टेशनला विक्रम साराभाई अंतराळ केंद्र म्हणून ओळखलं जातं. डॉ. अब्दुल कलाम देखील त्यांच्या यशाचे श्रेय डॉ. विक्रम साराभाई यांनाच देतात, डॉ. अब्दुल कलाम म्हणतात की, “मी शिक्षणात कधीच गुणवान नव्हतो. केवळ माझी मेहनत बघून डॉ. साराभाई यांनी मला पुढे जाण्याची प्रेरणा दिली.”

    विविध संस्थांची स्थापना:

    डॉ. विक्रम साराभाई यांनी विविध संस्थांच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट असो किंवा टेक्स्टाइल रिसर्च असोसिएशन साराभाई यांनी नेहमीच देशाला नवीन दिशा  दाखवण्याचा प्रयत्न केला. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) व्यतिरिक्त ऑपरेशन रिसर्च ग्रुप, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन आणि पत्नी मृणालिनी साराभाई यांच्या सहकार्याने त्यांनी दर्पण ॲकॅडमी फॉर परफॉर्मिंग आर्ट्सची स्थापना केली.

  • पुरेशी झोप घे रे पाखरा!

    पुरेशी झोप घे रे पाखरा!

    शरीराच्या योग्य कार्यासाठी आणि मानसिक संतुलनासाठी पुरेशी झोप अत्यावश्यक आहे. झोप कमी झाल्यास त्याचा आपल्या आरोग्यावर आणि कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पुरेशी झोप घेतल्याने ऊर्जा वाढते, एकाग्रता टिकवून ठेवता येते आणि मानसिक आरोग्य सुधारण्यात मदत होते.

    निरोगी जीवनशैलीसाठी झोपेचे महत्त्व अपार आहे. झोप ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी आपल्या शरीराला नवीन ऊर्जा प्रदान करते. मानवी शरीराला किमान ७ तास झोप आवश्यक असते, चांगली आणि पूर्ण झोप आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग झोपेच्या महत्त्वाबद्दल अधिक जाणून घेऊया.

    1. शारीरिक बांधणी 

    रात्रीच्या झोपेमध्ये आपल्या शरीराची एकप्रकारे पुनःबांधणी होते. हॉर्मोनल संतुलन राखणे, ताणतणाव कमी करणे, आणि शरीरातील पेशींना कार्यन्वित करणे हे झोपेमुळे शक्य होते. पुरेशी झोप न मिळाल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि रोगप्रतिकारक प्रणाली कमजोर होते.

    २. मानसिक स्वास्थ्य

    झोपेमुळे मेंदूला आराम मिळतो आणि नवीन माहिती आणि अनुभवांच्या प्रक्रियेत मदत होते. कमी झोपेमुळे तणाव, चिंता आणि डिप्रेशन यांसारख्या मानसिक आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. चांगली झोप मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक आहे, जी स्मरणशक्ती आणि निर्णयक्षमता सुधारण्यासाठी मदत करते.

    ३. भावनिक संतुलन

    योग्य झोपेमुळे भावनिक संतुलन राखले जाते. झोप न मिळाल्यास चिडचिडेपणा, अस्वस्थता आणि भावनिक असंतुलनाची समस्या उद्भवते. योग्य झोपेमुळे भावनिक स्थिरता आणि आनंदाची भावना वाढते.

    ४. शारीरिक आरोग्य

    झोपेचा आपल्या शारीरिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. झोपेच्या अभावामुळे वजन वाढणे आणि मोटापा यांसारख्या समस्या उद्भवतात.

    ५. उत्पादनक्षमता आणि कार्यक्षमता

    चांगली झोप आपली उत्पादनक्षमता आणि कार्यक्षमता वाढवते. नीट झोप घेतल्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणे, निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे सोपे होते. झोपेच्या अभावामुळे कार्यक्षमतेत घट येते आणि चुका होण्याची शक्यता वाढते.

    ६. रोगप्रतिकारक शक्ती

    झोपेमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. नीट झोप घेतल्याने सर्दी, खोकला आणि इतर संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होतो. कमी झोपेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते आणि आपण लवकर आजारी पडतो.

    ७. त्वचेचे आरोग्य

    चांगली झोप आपली त्वचा ताजेतवानी आणि निरोगी ठेवते. झोपेच्या अभावामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे, त्वचेवर सुरकुत्या आणि मुरुमांसारख्या समस्या उद्भवतात.

    मित्रांनो चांगली झोप आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी पुरेशी आणि गुणवत्तायुक्त झोपेची गरज आहे. पुरेशा  झोपेमुळे आपण निरोगी, ताजेतवाने जीवन जगू शकतो.

  • आर्थिक स्वातंत्र्याची पहिली पायरी: आर्थिक ध्येयनिश्चिती  

    आर्थिक स्वातंत्र्याची पहिली पायरी: आर्थिक ध्येयनिश्चिती  

    याच विषयावर आज आपण बोलणार आहोत, की नेमकं आर्थिक ध्येय म्हणजे काय? आणि हे आर्थिक ध्येय कसं ठरवायचं? 

    आर्थिक ध्येय म्हणजे आर्थिक स्वप्न किंवा उद्दिष्टे जे तुम्ही तुमच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी किंवा साध्य करण्यासाठी ठरवता. हे ध्येयं तुम्हाला तुमचे आर्थिक निर्णय घेण्यात मदत करतात आणि तुमच्या भविष्याच्या योजना निश्चित करण्यात मदत करतात. 

    आर्थिक ध्येयांमध्ये खालील गोष्टींचा समावेश असू शकतो :

    1. Savings: विशिष्ट रक्कम सेव्ह करणे.

    2. निवृत्ती नियोजन: निवृत्तीनंतरच्या आपल्या खर्चांसाठी निधी जमा करणे.

    3. कर्ज फेडणे: कर्जमुक्त होण्यासाठी ठराविक वेळेत कर्ज फेडणे.

    4. घर खरेदी: प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आयुष्यात एकदा तरी आपलं स्वतःचं  घर व्हावं. स्वतःचे घर खरेदी करणे हे नक्कीच एक चांगलं आर्थिक ध्येय असू शकतं. 

    5. आपत्कालीन निधी: अडचणी कधीच सांगून येत नाहीत. कधी कोणती परिस्थिती समोर उभी राहील याचा आपण अंदाज लावू शकत नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत उपयोगात येणारा निधी तयार करणे गरजेचे आहे. 

    6. शिक्षण: स्वतःच्या किंवा मुलांच्या शिक्षणासाठी निधी जमा करणे.

    7. गुंतवणूक: संपत्ती वाढवण्यासाठी विविध ठिकाणी गुंतवणूक करणे.

    आर्थिक ध्येय असणे तुम्हाला तुमच्या आर्थिक वाटचालीसाठी एक स्पष्ट दिशा देतं आणि तुम्हाला त्वरित निर्णय घेण्यासाठी सहाय्यक ठरतं.

    आर्थिक ध्येयांचे अधिक तपशीलवार उदाहरणे आणि महत्त्व समजून घेण्यासाठी खालील मुद्दे विचारात घेता येऊ शकतात

    आर्थिक ध्येयांचे प्रकार :

    1. लघुकालीन ध्येये (Short-term Goals) :

    • महिन्याकाठी बचत: दर महिन्याला ठराविक रकमेची बचत  करणे.
    • कर्जाची नियमित हप्त्यांनी परतफेड: क्रेडिट कार्ड बिल, वैयक्तिक कर्ज किंवा शैक्षणिक कर्जाची हप्त्यांनी फेड करणे.
    • आपत्कालीन निधी निर्माण: आकस्मिक खर्चांसाठी निधी तयार ठेवणे.

    2. मध्यमकालीन ध्येये (Medium-term Goals) :

    • वाहन खरेदी: काही वर्षात नवीन किंवा वापरलेले वाहन खरेदी करणे.
    • शिक्षण खर्च: स्वतःच्या किंवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी निधी गोळा करणे.
    • घरगुती सुधारणा: घराच्या देखभाल, दुरुस्ती किंवा सजावटासाठी निधी जमा करणे.

    3. दीर्घकालीन ध्येये (Long-term Goals) :

    • निवृत्ती नियोजन: निवृत्तीनंतरच्या खर्चांसाठी दीर्घकालीन गुंतवणूक योजना तयार करणे.
    • घर खरेदी किंवा बांधकाम: आपले स्वतःचे घर खरेदी करणे किंवा बांधणे.
    • वारसा योजना: मुलांसाठी, नातवंडांसाठी किंवा परोपकारी कार्यांसाठी संपत्ती राखणे.

     आर्थिक ध्येयांचे महत्त्व :

    • आर्थिक शिस्त: आर्थिक ध्येय ठरवल्याने आपल्याला खर्चावर नियंत्रण मिळवता येते आणि बचतीसाठी प्रेरणा मिळते.
    • निश्चिंतता: ध्येयांची पूर्तता केल्यामुळे भविष्यातील अनिश्चितता कमी होते आणि मानसिक शांतता मिळते.
    • प्रगतीचे मापन: आपले आर्थिक प्रगती किती झाली आहे हे आपल्याला  मोजता येते.
    • प्राथमिकता निश्चिती: कोणते खर्च महत्त्वाचे आणि कोणते टाळता येतात हे ओळखता येते.
    • Financial Planning : आर्थिक ध्येयांमुळे योजनाबद्ध गुंतवणूक आणि बचत करण्यास मदत होते.

     आर्थिक ध्येय कसे ठरवावेत:

    • करता येण्याजोगे : ध्येय वास्तववादी आणि साध्य करता येण्याजोगे असावे.
    • Relevant: ध्येय आपल्या आयुष्याशी संबंधित आणि महत्त्वाचे असावे.
    • Time-bound (कालबद्ध): ध्येय साध्य करण्यासाठी ठराविक वेळ आणि काळ निश्चित करणे.

    2. प्राथमिकता ठरवा : तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांनुसार ध्येयांची प्राथमिकता ठरवा व त्यानुसार त्यांच्या पूर्ततेला सुरुवात करा. 

    3. गुंतवणुकीची योजना : ध्येय साध्य करण्यासाठी योग्य गुंतवणूक योजना ठरवा.

    4. सल्ला घ्या : आर्थिक तज्ञांचा तसेच या क्षेत्रात सखोल माहिती आणि ज्ञान असणाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या आणि तुमच्या ध्येयांसाठी योग्य आर्थिक साधनांचा वापर करा.

    आणखी वाचा :

  • स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर क्रांतिदिनाचे महत्त्व काय?

    स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर क्रांतिदिनाचे महत्त्व काय?

    भारत आणि भारताचा  स्वतंत्रता संग्राम येणाऱ्या अनेक वर्षांसाठी प्रत्येकाच्या मनात घर करून राहील असा दैदिप्यमान आहे. भारताला परकीयांच्या जाळातून मोकळं करण्यासाठी कित्येक आहुती स्वातंत्र्य देवतेच्या यज्ञ कुंडात अर्पण झाल्या आणि त्यानंतर मिळालं ते आज आपण उपभोग घेत असलेलं स्वातंत्र्य. भारताच्या इतिहासातील या पर्वाचे अनेक टप्पे आणि कोपरे आहेत आणि आज आपण यातीलच क्रांती दिवसाचं पान उलघडणार आहोत… 

    आपण क्रांती दिवस का साजरा करतो?

    भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात डोकावण्याआधी आपण इतिहास म्हणजे काय हे जाणून घेऊया. इतिहास या शब्दाची संस्कृत भाषेत अतिशय उत्तम फोड करण्यात आली आहे, इति-ह-आस इति इतिहास शब्दः म्हणजेच काय तर जे घडलं, जसं घडलं त्याची मांडणी म्हणजे इतिहास होय. भारताचा इतिहास खूपच जुना आहे, प्रत्येक टप्प्यावर हा इतिहास बदलत जातो आणि प्रत्येकाचं स्वतःचं असं एक महत्व आहे. पैकी एक म्हणजे भारताचा स्वातंत्र्यसंग्राम. परकीयांच्या आक्रमणानंतर स्वतःच्याच भूमीत माणसं दबली जात होती आणि हीच राजवट दूर करण्यासाठी भारतीयांनी स्वतंत्रता मोहीम सुरु केली, यात अनेक ज्ञात-अज्ञात कुटुंब पणाला लागली, कितीतरी चुली कायमच्या विझल्या गेल्या. 

    भारत स्वतंत्रता संग्रामाचे दोन विभाग पडतात, एक म्हणजे अहिंसावादी आणि दुसरा हिंसावादी. वेगळ्या शब्दांत मांडायचं तर सशस्त्र क्रांती आणि विनाशस्त्र क्रांती. दोन वेगळ्या विचारांची ही माणसं जरी त्या-त्या विचारसरणीला धरून लढत असली तरीही त्यांचा उद्देश मात्र एकच होता. अहिंसावादी गटाचे नेतृत्व महात्मा गांधी करायचे. गांधीजींच्या मते हातात शस्त्र घेऊन केलेल्या युद्धात अनेक निष्पाप बळी जात असत. ते नेहमी म्हणायचे की अस्त्र-शस्त्राविना देखील क्रांती घडवता येते आणि म्हणून त्यांनी मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन असे कैक मार्ग देखील स्वीकारले होते. यापैकी भारत छोडो आंदोलन हे महात्मा गांधींकडून उचलण्यात आलेलं सगळ्यात शेवटचं पाऊल होतं. 

    आजच्या दिवशीच म्हणजे 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनात सदर आंदोलनाची घोषणा केली होती. गांधीजींकडून इंग्रजांना हद्दपार करण्यासाठी केलेला हा सर्वात मोठा प्रयत्न म्हटला जातो, कारण यावेळी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकासाठी हा क्षण ‘करो या मरो’ असाच होता. देशभरातून महात्मा गांधींना प्रचंड प्रतिसाद मिळाला. भारतीय लोकं त्याकाळी महात्मा गांधींना एका नेत्याच्या रूपात पाहायचे, गांधीजी एखादी गोष्ट सांगतायत म्हणजे ती बरोबरच असेल याची त्यांना खात्री वाटायची. एकार्थी काय तर गांधीजी भारतीयांसाठी अंधारात दिसणाऱ्या दिव्याप्रमाणे होते आणि म्हणून लोकांनी दरवेळीप्रमाणे या वेळी देखील गांधीजींना सोबत केली.

    भारत छोडो आंदोलनात अरुणा असफ अली यांची भूमिका फारच महत्वाची ठरते. त्याकाळी अरुणाबाई भूमिगत होऊन वावरत होत्या आणि सदर आंदोलनात त्यांनी देशातील तरुणांना एकत्र करत आंदोलनाचा भाग बनवलं होतं. एवढंच नाही तर अरुणाबाईंनी या आंदोलनात गोवालिया टँक मैदानावर भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याचे धाडस केलं होतं. अरुणा असफ अली यांच्या धाडसी स्वभावामुळे आजही ग्रँड ओल्ड लेडी म्हणत त्याच्या कार्याचा गौरव केला जातो. 

    भारतमातेला परकीयांच्या जुलुमापासून मुक्त करण्यासाठी उठलेल्या लाटेला रोखणं इंग्रजांसाठी कठीण झालं होतं आणि म्हणूनच चळवळीस सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींसह काँग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी ‘9 ऑगस्ट’ हा ‘ क्रांती दिवस’ म्हणून साजरा केला जातो.