Author: naviarthkranti

  • अशोक लेलँड : भारतीय वाहतूक क्षेत्राचा कणा | The Ashok Leyland Story

    अशोक लेलँड : भारतीय वाहतूक क्षेत्राचा कणा | The Ashok Leyland Story

    भारतात व्यावसायिक वाहने म्हटली की, पहिल्यांदा आठवण होते अशोक लेलँडची. मग ते ट्रक असू दे किंवा बस, अशोक लेलँड ही एक अशी कंपनी आहे जी भारतीय वाहतूक क्षेत्राचा कणा बनली आहे. टाटानंतर भारतातील दुसरी सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या अशोक लेलँडने आज केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही आपला ठसा उमटवला आहे. बस आणि ट्रक निर्मितीमध्ये जगातील अव्वल कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या अशोक लेलँडने तिच्या प्रवासात अनेक ऐतिहासिक टप्पे पार केले आहेत.

    भारतात स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी विविध उद्योगांची स्थापना करण्यात आली. यामध्ये उद्योग, तंत्रज्ञान आणि परिवहन क्षेत्रात विशेष प्रगती झाली. याच महत्त्वाच्या विकासपर्वात “अशोक लेलँड”ने भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात क्रांती घडवली. 1948 साली आजच्या दिवशी या कंपनीची स्थापना झाली होती. त्याचं अनुषंगाने आज या लेखात आपण अशोक लेलँडच्या आतापर्यंच्या प्रवासाचा आढावा घेऊ. 

    स्थापना आणि प्रारंभिक काळ

    7 सप्टेंबर 1948 रोजी, चेन्नई येथे रघुनंदन सरन यांनी अशोक मोटर्सची स्थापना केली. ‘अशोक’ हे नाव त्यांचा मुलगा अशोक सरन यांच्या नावावरून ठेवण्यात आले, सुरुवातीला या कंपनीत ऑस्टिन मोटर्सच्या गाड्यांचे उत्पादन केले जायचे. 

    1950 साली अशोक मोटरने ब्रिटिश लेलँड कंपनीशी करार केला, ज्यामुळे कंपनीचे नाव ‘अशोक लेलँड’ झाले. हा करार फक्त नावापुरता नव्हता, तर दोन्ही कंपन्यांच्या तंत्रज्ञानाचा संगम होता. ब्रिटिश तंत्रज्ञान आणि भारतीय बाजारपेठेची गरज यांचा समन्वय अशोक लेलँडने साधला आणि भारतीय व्यावसायिक वाहन क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाला. 

    स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारताला वाहतूक व्यवस्थेची अत्यंत गरज होती, कारण देशाची अर्थव्यवस्था विकासाच्या टप्प्यावर होती आणि औद्योगिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल करत होती. अशोक लेलँडने या गरजेची जाणीव ठेवून व्यावसायिक वाहतूक साधनांची निर्मिती सुरू केली. सुरुवातीला त्यांनी मालवाहतूक ट्रक्स आणि प्रवासी बस यांचे उत्पादन केले. यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे कंपनीने 6-सिलेंडर इंजिनयुक्त ट्रकची निर्मिती करून भारतीय रस्त्यांवर विश्वासार्हता निर्माण केली. यामुळे अशोक लेलँडने स्वदेशी ऑटोमोबाइल क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण केली.

    उत्पादनातील नाविन्य आणि विकासाचा प्रवास

    1950 आणि 60 च्या दशकात अशोक लेलँडने आपल्या उत्पादनात नाविन्य आणण्यास सुरुवात केली. 1954 साली अशोक लेलँडने आपल्या एन्नोर प्लांटमध्ये पहिला ट्रक तयार केला. ‘कॉमेट 350’ नावाचा हा ट्रक, मंगळूरच्या एका टाइल फॅक्टरीला विकला गेला होता. या क्षणापासून भारतात व्यावसायिक ट्रक निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यावेळी भारतात फक्त परदेशी कंपन्यांचे ट्रक उपलब्ध होते, पण अशोक लेलँडने स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ट्रक निर्माण करून भारतीय ग्राहकांना एक नवीन पर्याय दिला.

    अशोक लेलँड : भारतीय वाहतूक क्षेत्राचा कणा | The Ashok Leyland Story

    त्यानंतर भारत सरकारने अशोक लेलँडला दरवर्षी 1000 ट्रक तयार करण्याचा परवाना दिला आणि या उत्पादनाने भारतीय बाजारपेठेत कंपनीचे स्थान अधिकच मजबूत केले. कंपनीचे ट्रक केवळ भारतीय बाजारातच नव्हे, तर इतर काही देशांमध्येही निर्यात होऊ लागले. अशोक लेलँडच्या यशस्वी प्रवासात भारतीय सुरक्षादलांसाठी वाहनांची निर्मिती हे महत्त्वाचे योगदान होते. 1960 च्या दशकात BSF (सीमा सुरक्षा बल) आणि इतर सुरक्षा दलांसाठी वाहनं तयार करून कंपनीने देशाच्या संरक्षण यंत्रणेतील आपला वाटा उचलला.

    1960 च्या दशकात अशोक लेलँडने भारतीय बस क्षेत्रातही क्रांती घडवून आणली. 1967 साली कंपनीने पहिली ‘डबल डेकर बस‘ बाजारात आणली. यापूर्वी, डबल डेकर बस केवळ युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेतील काही ठराविक शहरांमध्येच पाहायला मिळायच्या. भारतात ही संकल्पना नवीन होती, पण अशोक लेलँडने स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ही बस तयार करून भारताच्या मोठ्या शहरांमध्ये चालू केली.

    मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यासारख्या शहरांमध्ये डबल डेकर बसने लोकांची प्रवाशांच्या प्रवासाचे व्यवस्थापन सुलभ झाले. आजही या शहरांमध्ये डबल डेकर बसची सेवा दिसून येते. 

    तंत्रज्ञानात सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय विस्तार

    1969 साली अशोक लेलँडने आपली आणखी एक महत्त्वाची कामगिरी केली. कंपनीने आपल्या ट्रक आणि बसमध्ये ‘पॉवर स्टीअरिंग‘ तंत्रज्ञानाचा वापर केला. त्या काळात हे तंत्रज्ञान खूपच आधुनिक आणि नवीन मानले जायचे. पॉवर स्टीअरिंगमुळे वाहन चालवणे खूप सोपे झाले, विशेषतः जड वाहने चालवताना ड्रायव्हर्सला अधिक आराम मिळाला. या तंत्रज्ञानामुळे अशोक लेलँडने भारतीय व्यावसायिक वाहन निर्मितीच्या तंत्रज्ञानात नवा मापदंड प्रस्थापित केला.

    1970 आणि 80 च्या दशकात अशोक लेलँडने तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या. 1980 च्या दशकात त्यांनी BS-II इंधन मानकांनुसार ट्रक्स तयार करण्यास सुरुवात केली. तंत्रज्ञानात सतत सुधारणा करण्याची कंपनीची भूमिकाही या काळात दिसून आली. याच काळात कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश केला आणि मध्य पूर्व, आफ्रिका, आशिया आदी देशांमध्ये आपल्या वाहनांची निर्यात सुरू केली.

    1980 साली कंपनीने आपला दुसरा प्लांट होसूर, तमिळनाडूमध्ये सुरू केला. या प्लांटमुळे मोठ्या प्रमाणात वाहने तयार करण्याची क्षमता वाढली. यामुळे कंपनीने मोठ्या आणि जड वाहनांच्या निर्मितीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याचवेळी कंपनीने मल्टी-एक्सेल ट्रक आणि मोठ्या बस तयार करण्यास सुरुवात केली.

    कंपनीने तामिळनाडूमधील नामक्कल येथे देशातील पहिल्या व्यावसायिक वाहन ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली. यामुळे व्यावसायिक वाहन चालवणाऱ्या ड्रायव्हर्सना उत्तम प्रशिक्षण मिळाले आणि भारतीय बाजारपेठेत कंपनीची प्रतिष्ठा वाढली. 

    1990 च्या दशकात भारताच्या उदारीकरणाच्या धोरणामुळे देशातील ऑटोमोबाइल क्षेत्रात स्पर्धा वाढली. परंतु अशोक लेलँडने आपल्या उत्पादनांची गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन कायम ठेवला, ज्यामुळे स्पर्धेचा सामना करण्यास ते सक्षम झाले. याच काळात त्यांनी ‘स्टारलाइन’ बस सादर केली, जी भारतीय बस निर्मिती क्षेत्रातील एक मोठी क्रांती ठरली.

    2007 पासून हिंदुजा समूहाची मालकी 

    2007 मध्ये, हिंदुजा समूहाने अशोक लेलँडमधील इवेकोचा (इंडस्ट्रियल व्हेईकल्स कॉर्पोरेशन) अप्रत्यक्ष हिस्सा विकत घेतला, इवेको ही इटालियन कंपनी आहे जिची स्थापना 1975 मध्ये झाली होती. हिंदुजा समूहाने याच कंपनीचा हिस्सा विका घेतला. आणि त्यांचा हिस्सा  51% वर पोहोचला आणि आज अशोक लेलँड ही हिंदुजा समूहाची एक प्रमुख कंपनी बनली आहे.

    भविष्यात अशोक लेलँड उत्तर प्रदेशात इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांचे उत्पादन करणारा एक प्लांट उभारणार आहे. या प्लांटची  उत्पादन क्षमता प्रत्येक वर्षी 2,500 वाहने एवढी असेल आणि पुढील दशकात ती 5,000 पर्यंत वाढवण्याची योजना आहे. या प्लांटमध्ये मुख्यतः इलेक्ट्रिक बस चे  उत्पादन होईल आणि ते 2025 मध्ये सुरू होईल

    आजची स्थिती आणि रोजगार निर्मिती

    आज कंपनी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे, ज्यामध्ये ऑटोमोबाईल्स, व्यावसायिक वाहने, इंजिन, सेवा आणि वाहन वित्तपुरवठा यांचा समावेश आहे. २०२४ मध्ये कंपनीने ₹ ४५,९३१ कोटी (US$५.५ अब्ज) महसूल मिळवला. कंपनीच्या एकूण मालमत्तेची किंमत ₹ ६७,६६० कोटी (US$८.१ अब्ज) आहे. २०२० पर्यंत कंपनीत ११,४६३ कर्मचारी कार्यरत होते, आज हा आकडा वाढला आहे.

    अशोक लेलँड आज फक्त भारतापुरती मर्यादित नाही. आफ्रिका, युरोप, आशिया आणि मध्य-पूर्वेतही कंपनी आपली उत्पादने निर्यात करत आहे. या देशांमध्ये अशोक लेलँडच्या वाहनांना प्रचंड मागणी आहे. 

    अशोक लेलँडचा प्रवास म्हणजे भारतीय औद्योगिक प्रगतीचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यानंतर सुरू झालेली एक छोटीशी कंपनी आज जागतिक व्यावसायिक वाहन क्षेत्रात एक महत्त्वाचे नाव बनली आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीपासून ते उत्पादन क्षमतेपर्यंत अशोक लेलँडने भारतीय वाहन निर्मिती क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे. 

    आणखी वाचा :

  • How to start your own blog? : स्वत:चा ब्लॉग कसा सुरू करावा?

    How to start your own blog? : स्वत:चा ब्लॉग कसा सुरू करावा?

    ब्लॉग म्हणजे काय ? 

    साध्या सरळ भाषेत सांगायचे झाले, तर ब्लॉग म्हणजे आपले ज्ञान (विचार, कला) इंटरनेटद्वारे इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्याचा वापर केला जातो. त्यालाच ब्लॉग असे म्हणतात. 

    आपल्याला विशिष्ट प्रकारची माहिती शोधायची असेल, तर इंटरनेट हे सर्वात जलद माध्यम आहे. त्याचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेदेखील आहेत. यात एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे वेळ. आपणही वेळेसाठी बांधील असतो आणि प्रत्येकाला फक्त आणि फक्त २४ तास आहेत. मग त्या वेळेचं योग्य व्यवस्थापन व्हावं असं प्रत्येकाला वाटतं ना. मग जिथे जिथे वेळ वाचवता येईल तिथे आपण नक्कीच प्रयत्न करतो. 

    अशा वेळी बऱ्यापैकी वाचक वर्ग कमी वेळात हवी असणारी माहिती एका ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतो. या वाचक वर्गाचा विचार करून आपण निश्चितपणे स्वत:चा ब्लॉग लिहिण्याचा विचार करु शकतो. ब्लॉग लिहायला सुरुवात करण्यासाठी काही प्राथमिक गोष्टींचा अभ्यास करणं सुरुवातीला अपेक्षित असतं. यात सर्वात आधीची आणि महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आवड. आपल्याला लिहिण्याची आवड आहे का ?

    स्वतःचा ब्लॉग सुरु करण्याची अनेक कारणे असू शकतात जसे की, आपल्याजवळ एखादे कौशल्य असेल किंवा आपल्याला एखादी गोष्ट उत्तमरित्या जमत असेल तर किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल लोकांना सांगायचे असेल तर आपण मायक्रो ब्लॉगच्या मदतीने ब्लॉग सुरु करू शकतो आणि सहज लोकांपर्यंत माहिती देखील पोहोचवू देखील शकतो. ब्लॉग सुरू करण्यासाठी ब्लॉगर.कॉम किंवा वर्डप्रेस.कॉम या वेबसाईटचा वापर करता येतो.

    How to start your own blog? : स्वत:चा ब्लॉग कसा सुरू करावा?

    स्वत:चा ब्लॉग सुरू करण्याच्या प्राथमिक पायऱ्या : 

    1.  ब्लॉगचा विषय निवडणे

    ब्लॉग तयार करण्यासाठी सर्वात आपल्याला नक्की कोणत्या विषयावर व्यक्त व्हायचं आहे हे आधी ठरवणं अत्यावश्यक ठरतं. ब्लॉगचा विषय निवडणे महत्वाचे आहे, आपल्याला एखाद्या विषयाची आवड असेल, तर आपण ब्लॉगचा विषय निवडून लेखन केले, तर नक्कीच आपल्या ब्लॉगवर वाचक आकर्षित होतील यात शंका नाही. आपल्या आवडीसंदर्भात, कृती संदर्भात किंवा एखाद्या ठिकाणा संदर्भात ब्लॉगचा विषय निवडावा.

    2.  वेबसाईट डिझाईन

    वेबसाईट डिझाईन हे ब्लॉगचे स्वरूप ठरविते, ब्लॉग किती Professional आहे ते Web Design वरुन कळते. जेवढी आकर्षक वेबसाईट डिझाईन असेल तेवढी लोक जास्त प्रतिसाद देतील, म्हणून वेब डिझाइन सुंदर व आकर्षक असायला हवी. 

    3. डोमेनचे नाव निवडणे

    डोमेन नेम हा वेबसाईटचा पत्ता (Address) आहे, जो लोक आपल्या वेबसाइटला भेट देण्यासाठी Browser च्या URL मध्ये टाईप करतात. डोमेन निवडताना आपला ब्लॉग कशा संदर्भात आहे, त्या संदर्भात डोमेन निवडावेत. डोमेन नाव निवडताना ते लांबलचक नसावे, आणि उच्चार करण्यास सोपे असावे.

    4. Unique Content 

    स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करत असताना कंटेंट अतिशय महत्वाचा भाग आहे. आपला ब्लॉग समजायला सोपा असावा, जास्त किचकट लिहू नये. आपण जेवढा विस्तृत ब्लॉग लिहणार तेवढाच जास्त वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळणार आहे. 

    ब्लॉग सुरू करण्यासाठी पैसे लागतात का?

    नाही, ब्लॉग सुरु करायचा असेल, तर आपण मोफत आणि सशुल्क या दोन्ही माध्यमातून ब्लॉग सुरु करू शकतो. जर आपल्याला मोफत म्हणजेच विनामूल्य ब्लॉग सुरु करायचा असेल, तर आपण ब्लॉगर किंवा वर्डप्रेस या साईटच्या साहाय्याने मोफत ब्लॉग बनवू शकतो. जर सशुल्क ब्लॉग सुरु करायचा असल्यास आपल्याला डोमेन आणि वेब होस्टिंग खरेदी करावी लागेल.  

    आणखी वाचा :

  • शिक्षक दिन 5 सप्टेंबरला का साजरा करतात? | Why Teachers Day Celebrated On 5th September

    शिक्षक दिन 5 सप्टेंबरला का साजरा करतात? | Why Teachers Day Celebrated On 5th September

    प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाची भूमिका ही अनन्यसाधारण महत्त्वाची असते. एखादी व्यक्ती जेव्हा यशस्वी होते, तेव्हा तिच्या मागे नेहमी कोणत्या-न-कोणत्या मार्गदर्शकाचा हात असतो, भूमिका असते. हा मार्गदर्शक म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्याला वळण देणारा, चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायला शिकवणारा शिक्षक.

     भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. हा स्मरणोत्सव आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती (दुसरे राष्ट्रपती), भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. देशाच्या शिक्षणाला आकार देण्यात त्यांनी कायम मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या योगदानामुळे अनेकांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली आणि म्हणूनच ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन सबंध देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. 

    खरंतर चांगल्या शिक्षकाचा सन्मान हा त्या संस्कृतीचा आणि त्यांच्याकडे असलेल्या अगाध ज्ञानाचा सन्मान असतो. कोणत्याही समाजाचा विकास होण्यासाठी शिक्षकाची भूमिका देवदूतासारखी असते. एक चांगला शिक्षक हजारो चांगले विद्यार्थी घडवू शकतो. हेच चांगले विद्यार्थी पुढे देशाचे सुजान नागरिक बनतात आणि प्रतिनिधित्व करतात. एक चांगला माणूस घडण्यासाठी त्यामागे एक चांगला शिक्षक कायम उभा असतो. 

    शिक्षकांचा सन्मान करण्याची शिक्षक दिनाची ही परंपरा तशी जुनीच. 

    शिक्षक म्हणजे काय? 

    शि म्हणजे शील 
    क्ष म्हणजे क्षमा
    क म्हणजे कला

    ज्याच्याकडे शील, क्षमा आणि कला यांचा त्रिवेणी संगम आहे तो म्हणजे शिक्षक. शिक्षक हे एका अर्थाने भावी पिढीला घडविणारे शिल्पकारच आहेत. आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने जीवनातील अंधार दूर करणारे मार्गदर्शकच. चुकल्यावर रागावणारेही शिक्षकच आणि पाठीवर कौतुकाची थाप मारणारेदेखील तेच. आपल्यापेक्षाही जास्त आपल्याला ओळखणारे आपले शिक्षक. आपल्यातील चांगल्या गुणांची पारख करून आपल्याला योग्य दिशा दाखविणारे आणि आपल्या जीवनाला ज्ञानाच्या प्रकाशाने तेजोमय करणारे हे आपले शिक्षक. 

    तुम्हाला अजून कोणत्या विषयाची माहिती वाचायला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

  • भारतीय फुटबॉलचा नायक : सुनील छेत्री Real Life Story of Football Legend Sunil Chhetri

    भारतीय फुटबॉलचा नायक : सुनील छेत्री Real Life Story of Football Legend Sunil Chhetri

    यानंतर, जेव्हा भारताचा केनिया सोबत सामना होतो, तेव्हा मैदान हजारो प्रेक्षकांनी गच्च भरलेलं असतं आणि ‘इंडिया इंडियाचा’ जयघोष देत असतं.ते ट्विट होतं नुकत्याच निवृत्ती घेतलेल्या भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीचं. 

    आज आपण याच  “कॅप्टन फॅनटेस्टीक” चा  प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. सुनील छेत्रीचा जन्म ३ ऑगस्ट १९८४ रोजी सिकंदराबाद येथे झाला. लहानपणापासूनच मैदानी खेळांकडे आकर्षण असलेल्या सुनीलने  सुरुवातीला स्पोर्ट कोट्यातून चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा म्हणून हौसेखातर फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली, परंतु फुटबॉलने त्याच्या हृदयात घर केलं आणि मग पुढे त्यानेही स्वतःला या खेळात झोकून घेतलं.

    त्याने आपल्या करिअरची सुरुवात २००२ मध्ये कोलकत्याच्या मोहन  बागान क्लबपासून  केली आणि पुढे आपल्या मेहनतीच्या बळावर 2005 साली पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारतीय संघात पदार्पण केलं. त्याच्या खेळातील कौशल्यांमध्ये कमालीची स्पष्टता होती. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे लवकरच तो  संघातील एक प्रमुख खेळाडू बनला. सुनीलच्या प्रतिभेने भारताला नेहरू कप, SAFF चॅम्पियनशिप, AFC चॅलेंज कपसह अनेक विजय मिळवून दिले. सातत्याने गोल करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे तो जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय गोल स्कोररपैकी एक ठरला.

  • अंध असूनही वयाच्या २३व्या वर्षी उभी केली ५०० कोटींची कंपनी

    अंध असूनही वयाच्या २३व्या वर्षी उभी केली ५०० कोटींची कंपनी

    तो श्रीकांत, ज्याने त्याच्यावर होणाऱ्या भेदभावाविरुद्ध इथल्या सरकारला कोर्टात उभं केलं, तो श्रीकांत ज्याने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना वचन दिलं की, तो देशाचा पहिला अंध राष्ट्रपती बनून दाखवेल, तो श्रीकांत ज्याची चिकाटी आणि जिद्द पाहून रतन टाटा आणि देशातील मोठमोठ्या उद्योजकांनी त्याची पाठ थोपाटली आणि तोच श्रीकांत ज्याने असं कर्तृत्व गाजवलं की, त्याच्या आयुष्यावर चित्रपट सुद्धा आला. त्याने  हे खरं करुन दाखवलं की, स्वप्न पाहण्यासाठी डोळ्यांची गरज नाही, स्वत:वरील विश्वास तुम्हाला तुमचंय इप्सित गाठून देऊ शकतो. आज, नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून त्याच्या या प्रेरणादायी प्रवासावर एक नजर फिरवूया. 

    जन्मजात संघर्ष

    श्रीकांत बोल्ला याचा जन्म 7 जुलै 1991 रोजी आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम जवळील सीतारामपुरम येथे झाला. श्रीकांत जन्मतःच अंध होता, ज्यामुळे त्याच्या जीवनाला सुरुवातीपासूनच आव्हानात्मक वळण मिळाले. त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल होतं. वडील दामोदरराव आणि आई वेंकटम्मा हे साधारण शेती करणारे जोडपं, ज्यांचे महिन्याचं  उत्पन्न केवळ १६०० रुपये होतं. त्यामुळे लहानपणीच त्यांना गरिबीचा सामना करावा लागला. परिस्थिती आधीच हलाखीची होती आणि त्यात अंध मुलाच्या जन्मामुळे त्यांच्या कुटुंबावर अधिकच निराशा पसरली.

    गावातील काही लोकांनी सल्ला दिला की , “याला मारून टाका, नाहीतर आयुष्यभर दुःख सहन करावं लागेल. हा मुलगा कामाचा नाही; जन्मतः अंध असणं हे पाप आहे.” परंतु, श्रीकांतच्या आई-वडिलांनी कोणत्याही कथित शुभचिंतकाचं न ऐकता आपल्या मुलाला मोठं केलं. त्यांना विश्वास होता की, एक दिवस हा मुलगा चमत्कार करून दाखवेल.

    सुरुवातीला, वडिलांनी त्याला शेतीची कामे शिकवायचा प्रयत्न केला, पण अंधत्वामुळे त्याला ती कामे करता येत नव्हती. त्यामुळे वडिलांना वाटले की, त्याने शाळेत जाऊन अभ्यास करून नाव कमवावे. त्यानुसार, त्याला शाळेत दाखल करण्यात आले. त्यानेसुद्धा जिद्दीने शिक्षण घेतले. दिसत नसल्यामुळे, तो लहानपणी भावांच्या मदतीने शाळेत जात असे. शाळेतही त्याला नेहमी शेवटच्या बाकावर बसावे लागे. ही सगळी अवहेलना सहन करताना त्याला प्रचंड वाईट वाटत असे. सततच्या अवहेलनांमुळे एकदा त्याने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, वडिलांनी त्याला सांगितले की, शिक्षणाच्या माध्यमातूनच तुझे आयुष्य बदलू शकते. हे ऐकल्यानंतर श्रीकांतने कधीही मागे वळून पाहिले नाही. सगळं सहन करत, प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर त्याने शिक्षण पूर्ण केलं.

    शिक्षण मिळावं म्हणून सरकारला खेचलं कोर्टात 

    श्रीकांतला अंध मुलांच्या शाळेत टाकण्यात आलं. ही शाळा त्यांच्या गावापासून साधारणतः 400 किमी दूर होती, त्यामुळे त्याला  हैदराबादमध्ये जावं लागलं. त्याने हार न मानता मन लावून अभ्यास केला, परिणामी त्याला इयत्ता 10वीमध्ये 96 टक्के आणि 12 वीमध्ये 98 टक्के मार्क्स मिळवले. या गुणांच्या आधारे त्याने  पुढील शिक्षण विज्ञान शाखेत घेण्याचा निर्णय घेतला.

    तरीही, त्याला  विविध महाविद्यालयांमधून प्रवेश मिळवण्यात अडथळे आले, कारण त्या काळात अंध विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शाखेतून शिक्षण घेण्याची व्यवस्था अस्तित्वात नव्हती. पण श्रीकांतची ठाम इच्छा आणि जिद्द त्याला यशस्वी होण्यासाठी प्रेरित करत होती. त्याने आपल्या हक्कासाठी सरकारविरुद्ध कोर्टात केस दाखल केली आणि थेट सरकारलाच कोर्टात खेचलं. हा खटला सुमारे सहा महिने चालला आणि त्यात श्रीकांतला विजय मिळाला. त्यानंतर, त्याने विज्ञान शाखेत प्रवेश मिळवला आणि  विज्ञान शाखेतून अभ्यास करणारा  पहिला  दृष्टीहीन विद्यार्थी बनला. तेव्हा दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शाखेतील पुस्तकं उपलब्ध नव्हती, त्यामुळे श्रीकांतने त्यावर तोडगा काढला. त्याने  विज्ञान शाखेच्या पुस्तकांचे ऑडिओ व्हर्जन तयार करून अभ्यास सुरू केला. श्रीकांतचा हा संघर्ष आणि त्याच्या धाडसाने केवळ स्वतःच्या जीवनातच नव्हे, तर अंध विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या क्षेत्रातही एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.

    भारतात उच्चशिक्षण मिळालं नाही म्हणून गाठली थेट अमेरिका

    श्रीकांतने १२ वी नंतर आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अप्लाय केलं. त्यांने देशातील विविध आयआयटी आणि आयआयएम्समध्ये पात्रता परीक्षेचा अर्ज भरला. परंतु, हॉल तिकीट येण्याऐवजी त्याला एक पत्र प्राप्त झालं, ज्यात स्पष्टपणे सांगितलं गेलं की, ‘तुम्ही अंध आहात म्हणून तुम्ही परीक्षेला बसू शकत नाही’. हे ऐकून श्रीकांतला खूप वाईट वाटलं, पण त्याने या अडचणीला नकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी ठामपणे सांगितलं की, ‘आयआयटी मला स्वीकारत नाही, तर मलाही आयआयटीची गरज नाही.’

    आयआयटीने त्याला नाकारलं, पण त्याच्या डोळ्यांत इंजिनिअर होण्याचं स्वप्न अजूनही होतं. त्या नकारानंतर, श्रीकांतने अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच एमआयटी आणि इंग्लंडच्या केंब्रिजमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला आणि चमत्कारिकरित्या, त्याला एमआयटीमध्ये प्रवेश मिळाला. त्यालाच मॅनेजमेंट सायन्समध्ये शिकण्यासाठी स्कॉलरशिपदेखील मिळाली, ज्यामुळे तो एमआयटीमध्ये शिकणारा पहिला आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी बनला. एमआयटी ही अमेरिकेमधील एक अत्यंत प्रतिष्ठित तांत्रिक संस्था आहे.

    श्रीकांतने दिलेल्या संधीचा उत्कृष्ट उपयोग केला आणि एमआयटीमध्ये अत्यंत मेहनतीने अभ्यास केला. अखेर, तो  एमआयटीमधून उत्तीर्ण होणारा पहिला आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी ठरला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला अमेरिकेतील अनेक कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळू लागल्या, पण श्रीकांतने अमेरिकेत काम करण्यासाठी नकार दिला. कारण त्याला आपल्या देशासाठी आणि देशातील लोकांसाठी काहीतरी करायचं होतं.

    असा सुरु केला यशाचा प्रवास 

    वर म्हटल्याप्रामाणे त्याला देशातील अंध, गरीब आणि दुर्बल लोकांसाठी काहीतरी चांगलं करायचं होतं आणि म्हणूनच तो शिक्षण पूर्ण करून मायदेशी परतला. आपल्या कामात गुंतल्यावरच श्रीकांतच्या कार्याची खरी गती सुरू झाली.

    2012 मध्ये, श्रीकांतने भारतात “बोलंट इंडस्ट्रीज” नावाची ग्राहक खाद्य पॅकेजिंग कंपनी स्थापन केली. या कंपनीत पाने आणि कागदापासून पर्यावरणपूरक म्हणजेच इको-फ्रेंडली पॅकेजिंग तयार केली जाते. सुरुवातीला एकाच ठिकाणाहून सुरू झालेल्या या कंपनीने आज 7 युनिट्स उभारली आहेत. 2012 पासून कंपनीने मासिक 20% दराने वाढ नोंदवली आहे. कंपनीची वार्षिक उलाढाल 200 कोटींवर पोहोचली असून, तिचं मूल्य सुमारे 400 कोटींहून अधिक आहे.

    श्रीकांतच्या कंपनीने अशा प्रकारची प्रगती केली आहे की, 2021 मध्ये फोर्ब्सने त्याला “30 अंडर 30 एशिया” यादीत स्थान दिले. या यादीत स्थान मिळवणारे व्यावसायिक 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात आणि आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करत असतात. श्रीकांतने आपल्या कार्याने एक नवा मानक निर्माण केला आहे आणि त्याची प्रेरणादायक कथा आजच्या युवांसाठी एक आदर्श ठरली आहे.

    श्रीकांतच्या आयुष्यात एक असा टप्पा आला की, त्याला आपल्या व्यवसायासाठी निधी मिळवण्यात अडचणी येत होत्या. या कठीण परिस्थितीत, भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी श्रीकांतच्या कंपनीत 1.3 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीमुळे श्रीकांतच्या व्यवसायात लक्षणीय वाढ झाली. टाटा यांच्यासोबतच सतीश रेड्डी, एसपी रेड्डी, श्रीनी राजू, चलमला सेट्टी आणि रवी मंथ यांच्याही गुंतवणुकीचा फायदा श्रीकांतच्या कंपनीला झाला.

    आज श्रीकांतच्या कंपनीत 1500 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, ज्यात बहुसंख्य कर्मचारी दिव्यांग आहेत. श्रीकांतने आपल्या सहकाऱ्यांसह 8 जणांच्या टीमसह कंपनीची स्थापना केली होती, ज्यामध्ये बेरोजगार आणि अंध व्यक्तींना रोजगार दिला गेला. व्यवसायाच्या वाढीमुळे अन्य लोकांनाही रोजगार मिळाला. 

    पुरस्कार आणि मानसन्मान 

    श्रीकांतला त्याच्या यशाबद्दल त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये प्रतिष्ठित युवा सेवा पुरस्कार मिळाला जो समाजातील युवा वर्गासाठी असामान्य कार्यासाठी प्रदान केला जातो. या व्यतिरिक्त तेलुगु फाइन आर्ट्स सोसायटीचा युवा उत्कृष्टता पुरस्कार, तसेच त्याच्या उद्योजकीय क्षमतांना लक्षात घेऊन २०१५ साली युवा उद्योजक पुरस्कार दिला गेला. 2018 साली समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी बिझनेस लाइन यंग चेंज मेकर पुरस्कार दिला गेला,शिवाय, श्रीकांत भारताच्या अंध क्रिकेट संघातही खेळला आहे, जे त्याच्या विविध अंगभूत गुणांचं द्योतक आहे.

    त्याच्या आयुष्याचा एक प्रसंग येथे विशेष नमूद करावासा वाटतो. तो म्हणजे साल 2006 मध्ये त्या वेळचे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी ‘लीड इंडिया 2020’ सुरू केले, ज्यात तरुणांना मार्गदर्शन करून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याची संधी दिली गेली. श्रीकांतही त्या निवडक तरुणांमध्ये होता. कलाम सर सर्व मुलांशी संवाद साधत होते आणि त्यांना विचारले की, तुम्ही भविष्यात काय करणार आहात? त्या मुलांनी दिलेल्या उत्तरांमध्ये, नववीत शिकणाऱ्या श्रीकांतचे उत्तर राष्ट्रपतींना विशेष लक्षात राहिले. श्रीकांतने सांगितले की तो देशाचा पहिला अंध राष्ट्रपती बनू इच्छितो. श्रीकांतच्या या उत्तरात असणाऱ्या आत्मविश्वासामुळे कलाम सर प्रभावित झाले आणि त्यांनी त्याची प्रशंसा केली.

    श्रीकांतची कहाणी ही खरंच प्रेरणादायी आहे. त्याच्या जीवनातील संघर्ष आणि त्यावर मात करत त्यांनी केलेली प्रगती, आपल्यासाठी एक मोठा धडा आहे. श्रीकांतचे आयुष्य हे एक प्रेरणास्त्रोत आहे, ज्यातून आपल्याला शिकायला मिळते की कोणत्याही परिस्थितीत हार मानू नये आणि नेहमीच आपल्या ध्येयाच्या दिशेने धैर्याने आणि आत्मविश्वासाने वाटचाल करावी.

    आणखी वाचा

  • काय आहे विपश्यना ध्यान पद्धती?

    काय आहे विपश्यना ध्यान पद्धती?

    गौतम बुद्ध यांनी सुमारे २५०० वर्षांपूर्वी शोधून काढलेले हे आत्मनिरीक्षण आणि सजगतेचे तंत्र म्हणजेच विपश्यना. याच तंत्राचा प्रसार आचार्य सत्यनारायण गोयंका हे व्यापारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने  आधुनिक काळात प्रभावीपणे केला. त्यांनी विपश्यना ध्यानाचा प्रचार करताना आत्मशुद्धी आणि शांततेवर भर दिला. विपश्यना म्हणजे वास्तवाचं तटस्थ निरीक्षण, ज्यामुळे आपले विचार, भावना आणि अनुभव यांचे मूल्यांकन करता येते.

    आचार्य गोयंका यांनी शिकवलेले विपश्यना तंत्र हे कोणत्याही धर्म, जाती किंवा सांप्रदायिक बंधनातून मुक्त आहे. त्याचा उद्देश व्यक्तीला मानसिक आरोग्य आणि आंतरिक शांती मिळवून देणे आहे. विपश्यना ध्यानाद्वारे मनाची शांतता, तणावाचे नियमन, चिंता आणि नैराश्यावर मात करता येते. नियमित सरावाने व्यक्तीला स्वतःच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतात, ज्यामुळे तणावपूर्ण परिस्थितीतही सकारात्मक दृष्टिकोन ठेवता येतो.

    या लेखात आपण विपश्यना काय आहे आणि या  ध्यानाच्या नियमित सरावामुळे तणावमुक्त जीवन जगण्याची आणि मानसिक स्थैर्य टिकवण्याची कला कशी आत्मसात करता येते, याबद्दल जाणून घेणार आहोत. विपश्यना ध्यान हे केवळ मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेच नव्हे, तर समग्र जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक प्रभावी साधन आहे.

    काय आहे विपश्यना?

    विपस्सना (पाली) किंवा विपश्यना (संस्कृत) ही गौतम बुद्धांनी शोधून काढलेली आणि शिकवलेली एक प्राचीन ध्यान पद्धती आहे. आजच्या काळात, ही पद्धत जागतिक स्तरावर विपश्यना या नावाने प्रचलित आहे. ‘विपस्सना’ या पाली शब्दाचा अर्थ ‘स्वतःच्या आत खोलवर पाहणे’ असा होतो. बुद्धांनी या ध्यान पद्धतीच्या आचरणातून सत्य आणि अंतर्ज्ञान शोधले आणि याचा वापर करून त्यांनी आत्मबोध साधला असे म्हटले जाते.

    विपश्यना  ध्यानामुळे आपल्याला मनाच्या गाभ्यात डोकावण्याची आणि आपल्या विचारांचा सखोल अभ्यास करण्याची क्षमता मिळते. या पद्धतीतून मनाला शांती, संतुलन, आणि अंतर्गत समजूत मिळते. गौतम बुद्धांनी या ध्यान पद्धतीद्वारे दुःख, तणाव आणि अशांततेतून मुक्तीचा मार्ग दाखवला. विपश्यना केवळ ध्यान न राहता, ती एक जीवनशैली आहे ज्यातून आपण आत्म-शुद्धीकरण आणि सत्याच्या शोधाकडे प्रवास करतो.

    आनापान ही विपश्यना ध्यानाच्या अभ्यासाची प्रारंभिक पायरी आहे. आनापान म्हणजे श्वासोच्छवासाचे निरीक्षण करणे, जसे ते आत येते आणि बाहेर जाते. यामुळे मनाची एकाग्रता वाढवण्यास मदत होते. श्वासोच्छवासाचे निरीक्षण हे ध्यानासाठी आवश्यक आहे कारण ते नेहमी उपलब्ध असते. याशिवाय, श्वसनाच्या लयीचा मनाशी घनिष्ठ संबंध असतो. जेव्हा मनात राग, भीती, वासना, मत्सर किंवा इतर नकारात्मकता येते, तेव्हा श्वासोच्छवासाची लय वेगवान आणि स्थूल होते. नकारात्मकता कमी होताच, श्वासोच्छवासाची लय सामान्य होते.

    आनापान केल्यावर आपलं स्थूल मन नासिकांच्या द्वारावंर नैसर्गिकरित्या सुक्ष्म झालेलं असतं आणि याच सुक्ष्म मनाच्या आधारे अवयवांची संवेदना जाणवायला सुरुवात होते. सुरुवातीला संवेदना सुद्धा स्थूल स्वरूपाच्या असतात. उदा. हात पाय अवघडणं, कपड्यांचा किंवा वाऱ्याचा स्पर्श, घामाची जाणीव, खाज येणं, शरीरावर रोमांच येणं अशा वेगवेगळ्या संवेदना जाणवतात. या संवेदनांकडे केवळ पाहायचं, अनुभवायचं आणि मनात नोंद ठेऊन त्यांवर कुठल्याही प्रकारची शारीरिक अथवा मानसिक प्रतिक्रिया द्यायची नाही आणि बघता बघता संवेदना सुक्ष्म होतात. संपूर्ण शरीरभर या सुक्ष्म संवेदना जाणवायला सुरुवात होते. यांचेच साक्षी भावाने आणि तटस्थ भावाने निरीक्षण सुरु ठेवायचं म्हणजेच संवेदना वाईट आणि चांगली न मानता फक्त संवेदना आहे, उत्पाद होऊन पुन्हा नष्ट होईल असा भाव ठेवायचा आणि बघता बघता यातून मनस्थैर्य जाणवायला सुरुवात होते आणि ध्यान प्राप्त व्हायला लागते.

    पुनरुज्जीवन आणि प्रसार

    मुळची भारतीय असलेली ही साधना गौतम बुद्धांच्या महानिर्वाणानंतर काही वर्षांनी लोप पावली होती. मात्र गुरुशिष्य परंपरा असलेली ही साधना तिच्या मूळ स्वरुपात म्यानमारमधील काही अनुयायांनी आपल्या नियमित सरावाने जपून ठेवली होती. सत्यनारायण गोयंका हे मूळचे भारतीय व्यापारी त्या काळात म्यानमार मध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या व्यापारातील अपयशामुळे त्यांना नैराश्य आले आणि विविध आजारांनी ते ग्रसित झाले. तेव्हा एका मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी म्यानमारमधील “आचार्य सयाग्यी यू बा खिन” हे निवृत्त सेनेतील अधिकारी यांच्याकडे विपश्यना साधनेचे शिक्षण घेतले आणि  जवळपास चौदा वर्ष साधनेचा नियमित सराव करून ते भारतात वास्तव्यास आले आणि भारतासोबत  जगभरात या साधनेचा प्रसार केला. गोयंका यांच्या नेतृत्वाखाली लाखो लोकांनी विपश्यना ध्यान पद्धतीच्या माध्यमातून आत्मशांती आणि मानसिक समतोल साधला. १९६९ मध्ये आचार्यपद स्वीकारल्यानंतर त्यांनी बिहारच्या बुद्धगया येथे पहिले विपश्यना शिबिर आयोजित केले. याच वर्षी ३ ते १४ जुलै दरम्यान मुंबईतील एका धर्मशाळेत त्यांनी पहिल्या विपश्यना शिबिराचे आयोजन केले, ज्यामुळे विपश्यना ध्यानाची लोकप्रियता भारतभर वाढू लागली.

    १९७६ साली गोयंका यांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे ‘विपश्यना विद्यापीठ’ स्थापन केले. हे केंद्र जगभरातील साधकांसाठी महत्त्वाचे ध्यानस्थळ बनले. पुढे १९८५ साली त्यांनी इगतपुरी येथेच ‘विपश्यना संशोधन केंद्र’ उभारले. ज्यामुळे विपश्यना ध्यानावर आधारित संशोधन व अध्यापनाला एक नवे व्यासपीठ मिळाले.

    गोयंका यांच्या कार्याचा सन्मान म्हणून, भारत सरकारने त्यांना २०१२ साली सामाजिक सेवेसाठी ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले. गोयंका यांनी विपश्यना साधनेला समाजातील सर्व थरांपर्यंत पोहोचवून एक शांत, तणावरहित, आणि समतोल समाज निर्माण करण्यासाठी अमूल्य योगदान दिले. त्यांच्या या कार्यामुळे विपश्यना ध्यानाला जागतिक स्तरावर मान्यता व लोकप्रियता प्राप्त झाली.

    विपश्यनेचे मानसिक आरोग्यासाठी फायदे

    १) ताण-तणाव कमी करणे

    विपश्यनेचा प्रमुख फायदा म्हणजे तणाव कमी होणे. शरीरातील संवेदनांबद्दलची जागरूकता वाढवल्याने व्यक्ती मानसिक तणावाची ओळख करून त्यावर सकारात्मक उपाय करू शकते. यामुळे मन:शांती आणि मानसिक स्थिरता मिळते, जी रोजच्या जीवनातील तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त ठरते.

    २) चिंता व्यवस्थापन

    चिंता बहुतेकदा मनातील अनावश्यक विचारांमुळे, भूतकाळातील घटना पुन्हा पुन्हा आठवून किंवा भविष्याची सतत काळजी करून निर्माण होते. विपश्यना साधनेतून वर्तमान क्षणात तटस्थ राहण्याची कला शिकता येते, ज्यामुळे चिंता कमी होते आणि मनाला शांती अनुभवता येते.

    ) आत्म-जागरूकता

    विपश्यना साधना आत्म-शोधासाठी एक प्रभावी मार्ग आहे. या पद्धतीद्वारे व्यक्ती स्वतःला जसे आहे तसे स्वीकारण्याचे शिकतात, त्यांच्या विचारांचे, भावना आणि संवेदनांचे आकलन करून त्यावर कोणतीही निर्णयशुद्ध प्रतिक्रिया न देण्याची कला शिकतात. यामुळे आत्म-सन्मानात वृद्धी होते आणि एक सकारात्मक आत्म-प्रतिमा निर्माण होऊ शकते.

    ४) भावनिक नियमन

    विपश्यनाद्वारे, व्यक्ती त्यांच्या भावनांचे निरीक्षण आसक्ती किंवा घृणेशिवाय करण्यास शिकतात. यामुळे भावनिक बुद्धिमत्ता सुधारते, ज्यामुळे व्यक्तींना त्यांच्या भावनांना अधिक संतुलित आणि सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देता येतो.

    5) सुधारित एकाग्रता

    विपश्यना साधना एकाग्रतेला तीक्ष्ण करण्यावर जोर देते. अभ्यासक किंवा साधक जसजसे संवेदनांचे निरीक्षण करण्यात अधिक कुशल होतात, तसतसे त्यांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता नैसर्गिकरित्या वाढते. याचा फायदा काम आणि नातेसंबंधांसह जीवनाच्या विविध पैलूंमध्ये होऊ शकतो.

    विपश्यना कोण करू शकतो?

    विपश्यना ही दुःख मुक्तीची साधना आहे, म्हणून यात जात, पात, धर्म, लिंग, देश, विदेश असा भेद राहत नाही. हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, यहूदी–सर्व धर्मांच्या लोकांना या साधनेचा लाभ घेता येतो. यात कुठल्याही धर्माची विशेषता नसून, ती फक्त एक साधना आहे जी आपल्या जीवनाला सुलभ बनवण्यास मदत करते.

    महाराष्ट्रात, भारतात आणि भारताबाहेर विपश्यना केंद्र आहेत, ज्यात विविध शिबिरे घेतली जातात. १० दिवसीय शिबीर हे नवीन साधकांसाठी असते. यात साधकांना सर्व नियमानुसार पालन करणे बंधनकारक असते. आपल्याला गूगलवर विपश्यना सर्च करून फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर शिबीर केंद्रातून फोन येतो आणि ते विचारपूस करतात. यानंतर आपण दहा दिवसांच्या शिबीरात प्रवेश घेऊन साधना शिकू शकतो.

    या शिबीरासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत. हे शिबीर पूर्णतः मोफत आहे. तथापि, साधक इच्छुक असल्यास, आपल्या सोयीनुसार दान देऊ शकतो.

    मित्रांनो, आजच्या युगात ध्यानाचे महत्व अत्यंत वाढले आहे. जीवनाच्या गतीमुळे आणि ताण-तणावामुळे ध्यान एक महत्त्वाचं साधन ठरलं  आहे. ध्यान आपल्याला मानसिक शांतता, आत्मसमर्पण आणि एकाग्रता साधायला मदत करते. यामुळे आपले मन शांत आणि केंद्रित राहते, ज्यामुळे दैनंदिन आव्हानांचा सामना करणे सोपे जाते.

    आणखी वाचा:

  • घरच्या जबाबदारीसह यशस्वी व्यवसाय: महिलांच्या प्रेरणादायी यशोगाथा | Women Entrepreneurs

    घरच्या जबाबदारीसह यशस्वी व्यवसाय: महिलांच्या प्रेरणादायी यशोगाथा | Women Entrepreneurs

    “नारी समाजस्य कुशलवास्तुकारा” या उक्तीप्रमाणे नारी ही समाजाची कुशल वास्तुकार आहे आणि आपली संस्कृती स्त्रीला देवी मानणारी आहे, आपल्या महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. यातीलच एक क्षेत्र आहे व्यवसाय क्षेत्र.

    आज आम्ही तुम्हाला अशा 5 महिलांचा व्यवसाय प्रवास सांगणार आहोत, ज्यांनी घर-परिवार सांभाळत, छोटे व्यवसाय सुरू केले आणि त्यांना यशस्वी करून दाखवलं. या प्रेरणादायी कहाण्या तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील आणि तुम्हालाही  काहीतरी मोठं करण्याची प्रेरणा देतील.

    १) निर्मला हेगडे 

    निर्मला हेगडे यांचा जीवनप्रवास अनेक भारतीय स्त्रियांच्या प्रवासासारखाच आहे. २२ व्या वर्षी त्यांचे  लग्न झाले आणि त्या कर्नाटकातून मुंबईत आल्या. दोन वर्षांत त्यांनी एका मुलाला जन्म दिला आणि २४ व्या वर्षी त्या आई झाल्या. त्यानंतर घर आणि मुलाची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि या जबाबदारी सांभाळण्यातच त्याचं वय झालं असं त्या सांगत असतात.

    निर्मला यांचं वय ६४ वर्षे आहे, त्या  एक शेफ आहेत आणि त्यांनी या वयात आपल्या स्टार्टअपची सुरुवात केली आहे, आणि त्याचं नाव ठेवलं “आई’ज किचन”’. मुंबईत, निर्मला हेगडे आपल्या मुलासोबत एक फूड किचन चालवतात, जिथून आपण घरच्या स्वादिष्ट जेवणाची ऑर्डर देऊ शकता.

    निर्मला हेगडे यांच्या किचनची सुरुवात लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या बिल्डिंगमधील सुरक्षारक्षकांना जेवण देण्यापासून झाली. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत गार्ड ड्यूटीवरून बाहेर जाऊ शकत नव्हते. निर्मला यांनी स्वतः त्यांच्या जेवणाची जबाबदारी घेतली आणि त्यांना घरगुती चवीचे जेवण देण्यास सुरुवात केली, जेणेकरून गार्ड यांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना उत्तम जेवण मिळावे.

    आई’ज  किचनमध्ये तुम्ही महाराष्ट्रीयन, गोवा आणि कर्नाटकी जेवण ऑर्डर करू शकता. ऑर्डर घेणे, पॅकिंग करणे आणि डिलिव्हरीचे काम गौतमच्या (मुलगा) समर्थनामुळे सुरळीत पार पडते.

    शेवटी, इतरांसाठी त्यांचे काही प्रेरणादायक शब्द आहेत: “तुम्हाला ज्या गोष्टींची आवड आहे, त्या गोष्टींच्या संपर्कात राहण्याचे मार्ग नेहमी शोधा. व्यवसाय करण्यासाठी तुमचे वय कधीही तुम्हाला थांबवत नाही.”

    २) उर्वशी  पाटील 

    नाशिकच्या उर्वशी पाटील यांनी MBA केलं असून, सध्या त्या “MBA दाबेली” नावाने एक लोकप्रिय फूड वॅन चालवतात. लग्नानंतर उर्वशी यांच्याकडे चांगल्या पगाराची नोकरी होती, परंतु गरोदरपणात  त्यांनी ती सोडली. त्यांच्या पतीचा व्यवसाय सुरळीत चालू होता, परंतु अचानक त्यात मोठं नुकसान होऊन तो व्यवसाय बंद पडला. उर्वशी यांना लहान बाळ सांभाळायचं असल्याने नोकरी करणं शक्य नव्हतं. घरात आर्थिक अस्थिरता वाढत होती, त्यामुळे त्यांनी या संकटातून मार्ग काढण्याचा निर्णय घेतला.

    एकदा रस्त्यावरून जाताना उर्वशी यांना एक फूड वॅन दिसली आणि त्यातून त्यांना व्यवसायाची कल्पना सुचली. त्यांनी आधी दाबेली कशी बनवायची हे शिकून घेतलं आणि “MBA दाबेली” या नावाने व्यवसायाची सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या मेहनतीचं फळ मिळू लागलं आणि व्यवसायाने भरभराट घेतली.

    आज उर्वशी पाटील या नोकरीपेक्षा कित्येक पटीने अधिक उत्पन्न मिळवत आहेत. त्यांची दाबेली खाण्यासाठी ग्राहक दूरवरून येतात आणि त्यांच्या वॅनवर नेहमीच गर्दी असते.

    मित्रांनो, ही कहाणी आपल्याला शिकवते की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानता कामा नये. उर्वशी पाटील यांची संघर्षमय वाटचाल आणि जिद्द आपल्याला खूप काही शिकवते. संकटं आणि परिस्थिती आपल्याला कितीही खचवण्याचा प्रयत्न करत असली, तरी त्यावर मात करून यश मिळवणं हेच खऱ्या आयुष्याचं यश आहे.

    ३) चंद्रप्रभा परिहार 

    वयाच्या अशा  टप्प्यावर, जेव्हा बहुतांश लोक निवृत्तीचा विचार करतात, 70 वर्षीय चंद्रप्रभा परिहार आज आपल्या व्यवसायात यशस्वीपणे पुढे वाटचाल करत आहेत. चंद्रप्रभा यांना प्रेमाने ‘आबा’ म्हटलं जातं. मुंबईत राहणाऱ्या आबांनी दीड वर्षांपूर्वी क्रोशिया कलेचा वापर करून बॅग्स, टोप्या, घरातील सजावटीच्या वस्तू आणि राख्या बनवायला सुरुवात केली आणि ‘नेहर’ या नावाने आपल्या ब्रँडची ओळख निर्माण केली.

    आबांनी आपल्या आयुष्यातील 70 वर्षे कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यात घालवली. त्यांना लहानपणापासूनच विणकामाची आवड होती, पण त्या कलेला व्यवसायात रूपांतर करण्याचा विचार त्यांनी कधीच केला नव्हता. त्यांनी 20 वर्षांपूर्वी या कलेत डिप्लोमा घेतला होता, पण कुटुंबाच्या गरजांमध्ये स्वतःचे स्वप्न साकार करण्याची संधी त्यांना कधी मिळाली नाही. मात्र, त्यांच्या सून स्वाती यांनी पाठिंबा दिल्यामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात आणता आले.

    सुरुवातीला, सासु-सुनेच्या जोडीने हे फक्त छंद म्हणून हे सगळं सुरु सुरू केलं. स्वाती नवीन डिझाइन्स शोधून आबांना द्यायची आणि आबा त्या डिझाइन्स बनवून ओळखीच्या लोकांमध्ये वाटायच्या. व्यवसायाचा विचार तेव्हा सुरू झाला जेव्हा आबांच्या भाचीने त्यांच्या बनवलेल्या बॅग्स ऑफिसमध्ये नेल्या आणि सहकाऱ्यांनी अशाच बॅग्स बनवण्याची मागणी केली.

    या मागणीने त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि लवकरच त्यांना ऑस्ट्रेलियातून मोठं ऑर्डर मिळाली. यानंतर स्वातीने कंपनीची अधिकृत नोंदणी केली आणि वेबसाइट व इंस्टाग्राम पेज सुरू केले.

    आज आबा स्वतः प्रत्येक ऑर्डरवर काम करतात आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येत आहेत. तुम्हाला देखील आबांच्या या वस्तू  खरेदी करायच्या असतील , तर त्यांच्या वेबसाइट www.nayher.com वर जाऊन त्यांच्या हातांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करू शकता.

    ४) सायली कासले 

    जर एखाद्या व्यक्तीनं  काही करायचं ठरवलं, तर तिला कोणीही थांबवू शकत नाही, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सायली कासले. घरातूनच व्यवसाय सुरू करणाऱ्या सायली आज जवळजवळ 100 हून अधिक प्रकारचं उत्पादनं विकतात आणि दरमहा 2 लाख रुपयांपर्यंत नफा कमावतात.

    सायली यांचं वय 31 वर्ष  आहे आणि त्या वसई येथे राहतात. त्या आपल्या पतीसोबत ‘स्पृहा घरगुती’ या नावाने स्टार्टअप चालवतात. लॉकडाऊनच्या काळात, जेव्हा सगळं काम घरातून चालू होतं, तेव्हा त्यांनी आपल्या स्पेशल ‘ऑल इन वन’ मसाल्याची निर्मिती करून सोसायटीत विक्री सुरू केली. बघता बघता हा मसाला एकदम हिट प्रॉडक्ट बनला.

    यानंतर केवळ 25 हजार रुपये गुंतवून मोठी चक्की आणि मिक्सर खरेदी केला. त्यानंतर त्यांनी आटा (पीठ), तूप, लाडू अशी उत्पादनं बनवायला सुरुवात केली. आपल्या मेहनत आणि चवीच्या जोरावर त्यांची उत्पादनं लवकरच प्रसिद्ध झाली. आज त्यांची  स्वतःची एक फॅक्टरी आहे आणि अनेक महिला त्यांच्या बनवलेल्या उत्पादनांची विक्री करून आत्मनिर्भर बनल्या आहेत.

    त्यांचा एक सामान्य स्त्री ते बिझनेसवूमन हा प्रवास कित्येक महिलांसाठी प्रेरणादायी आहे.

    ५) कमलजीत कौर

    कमलजीत कौर या मूळच्या पंजाबच्या आहेत, पण आता त्या मुंबईत राहतात. 51 वर्षीय कमलजीत यांनी आपल्या घरातूनच व्यवसायाची सुरुवात केली. कोविड काळात त्यांना संक्रमण झाले होते आणि परिस्थिती गंभीर होती. डॉक्टरांनी जवळजवळ आशा सोडली होती, पण त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. या प्रसंगानंतर त्यांना आपल्या लहानपणीच्या काळाची आठवण झाली, जेव्हा त्या ताजं दूध, घी, आणि मक्खन यांचं नियमित सेवन करत होत्या, ज्यामुळे त्यांची इम्युनिटी मजबूत होती. त्यांना मुंबईत या गोष्टींची कमतरता जाणवली.

    कमलजीत सांगतात की लग्नाआधी लुधियानामध्ये राहात असताना त्या कधीच इतक्या आजारी पडल्या नव्हत्या. पण लग्नानंतर मुंबईत आल्यावर ताजं दूध आणि शुद्ध घी मिळणं थांबलं आणि त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली. या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी शुद्ध देशी घी बनवण्याचा निर्णय घेतला. तीन महिन्यांच्या संशोधनानंतर 2020 मध्ये त्यांनी  ‘किम्मू किचन’ची स्थापना केली .

    सुरुवातीला त्यांनी मुंब्रा (ठाणे) येथेच घी बनवण्यास सुरुवात केली होती, पण दूधाच्या गुणवत्तेची समस्या असल्याने त्यांनी लुधियानामध्ये यासाठी एक युनिट सुरू केलं आणि तिथून मुंबईत घी पाठवण्याचं ठरवलं. आता हे घी लुधियानामधील युनिटमध्ये बनवलं जातं आणि तिथून मुंबईत पाठवलं जातं. कमलजीत सांगतात की कधी त्यांना 100 ऑर्डर मिळतात, तर कधी एकही नाही; पण हे काम करताना त्यांना समाधान मिळतं.

    त्यांचा मुलगा हरप्रीत याने लुधियानामध्ये आधीच असलेल्या सेटअपमध्ये थोडेफार बदल करून त्याचा उपयोग केला गेला. या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी 8 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आणि पहिल्याच वर्षात या व्यवसायातून 20 लाख रुपयांपर्यंतची कमाई झाली. कमलजीत यांची कंपनी 220, 500 आणि 1000 एमएलच्या बाटल्यांमध्ये घी विकते, ज्याची किंमत 399 रुपयांपासून सुरू होते.

    तर, या सर्व महिलांच्या कहाण्या आपल्याला हेच शिकवतात की, ठरवलं तर काहीच अशक्य नाही. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, आव्हानं कितीही कठीण असली, तरी जिद्द, मेहनत आणि समर्पणाच्या बळावर कोणत्याही स्वप्नाला साकार करता येतं.

    आणखी वाचा

  • Apple च्या तिजोरीची  चावी भारतीय व्यक्तीच्या हातात;नवीन मुख्य वित्त अधीकारी असणार केवन पारेख

    Apple च्या तिजोरीची  चावी भारतीय व्यक्तीच्या हातात;नवीन मुख्य वित्त अधीकारी असणार केवन पारेख

    52 वर्षीय केवन पारेख यांनी मिशिगन विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे आणि त्यानंतर शिकागो विद्यापीठातून एमबीए केले आहे. ते आता  थेट CEO टीम कुक  यांना रिपोर्ट करणार आहेत आणि त्यांचा Appleच्या टीममध्ये एक महत्त्वाचा सहभाग असेल.

    Apple ने एका आठवड्यात दुसऱ्यांदा व्यवस्थापनात मोठा बदल केला आहे. iPhone 16 लवकरच बाजारात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या व्यवस्थापनामध्ये हे महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

    लुका मेस्त्री यांच्याकडे आता नवीन जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, केवन पारेख यांनी लुका मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. लुका मेस्त्री गेले काही महिने केवन पारेख यांना ऍपलच्या मुख्य आर्थिक अधिकारी (सीएफओ) पदासाठी तयार करत होते.

    पारेख यांनी यापूर्वी ऍपलमध्ये विक्री आणि विपणन विभाग हाताळले आहेत, त्यामुळे त्यांना ऍपलच्या व्यवसायाचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी याआधी थॉमसन रॉयटर्स आणि जनरल मोटर्ससारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी देखील काम केले आहे. रॉयटर्समध्ये त्यांनी चार वर्षे उपाध्यक्ष पदावर काम केले, तर जनरल मोटर्समध्ये बिझनेस ग्रोथ डायरेक्टर म्हणून ते कार्यरत होते.

    ऍपलचे सीईओ टीम कुक यांनी नवीन सीएफओ केवन पारेख यांच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. टीम कुक म्हणाले की, “केवन पारेख हे ऍपलच्या टीमचा महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल.” लुका मेस्त्री यांनी देखील त्यांच्या नवीन जबाबदारीबद्दल उत्साह व्यक्त केला आहे आणि पारेख यांच्या नेतृत्वाखाली कंपनीला यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

    आणखी वाचा

  • वयाच्या ११ व्या वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये उतरून जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार बनलेले वॉरन बफे

    वयाच्या ११ व्या वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये उतरून जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार बनलेले वॉरन बफे

    कुठलाही कायदा न मोडता, करचुकवेगिरी न करता, नैतिकतेच्या मार्गाने यशाचं शिखर सर करणाऱ्या फार कमी व्यक्ती असतात. त्यांपैकी एक व्यक्ती असणं आणि त्याच्याही पुढे जाऊन, मिळवलेल्या संपत्तीपैकी ९० टक्के संपत्ती फारसा गाजावाजा न करता समाजाला परत देणं, हेच बफेंच्या यशाचं वेगळेपण आहे. 

    ‘समभागधारक हेच कंपनीचे मालक’ अशी सर्वस्वी वेगळी समीकरणं प्रमाण मानून, यशाच्या वाटेवरून एकटं चालत न जाता आपल्या सहकारी आणि कर्मचाऱ्यांनाही यशाचं क्षितिज दाखवणाऱ्या बफेंकडून आपल्याला शिकण्यासारख्या असंख्य बाबी आहेत. 

    जगभरात गुंतवणूक गुरू म्हणून प्रसिद्ध असलेले वॉरन बफे यांचा आज जन्मदिवस. जगातील कोट्यवधी लोक शेअर बाजारातून पैसे कमविण्यासाठी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा अवलंब करतात. गुंतवणुकीबाबत त्यांनी केलेले मार्गदर्शन आजही अतिशय प्रभावी ठरते. वॉरन बफे हे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांपैकी एक मोठे नाव आहे. त्यांच्या गुंतवणुकीचा जगभरातील शेअर बाजारावर परिणाम होतो.  जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत ते आजही सातव्या स्थानावर आहेत. 

    बफे यांना आपल्या युवा अवस्थेतच Business आणि Investing विषयी आवड निर्माण झाली आणि त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षापासूनच गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. कोलंबिया बिजनेस स्कूलमधून ते पदवीधर झाले जिथे ते बेंझामिन ग्रॅहम यांच्याकडून गुंतवणुकीचे तत्त्वज्ञान आणि व्हॅल्यू इन्वेस्टिंगच्या कन्सेप्टविषयी बरेच काही शिकले. ओरॅकल ऑफ ओमाहा म्हणून ओळखले जाणारे वॉरन बफे आत्तापर्यंतच्या सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक समजले जातात. 

    वॉरन बफे यांचे 5 गुंतवणूक मंत्र : 

    1. गुंतवणुकीकडे दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा : 

    शेअर्स विकत घेतल्यानंतर एका दिवसात किंवा फार कमी वेळात विकण्यापेक्षा चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून त्यामध्ये तुमची गुंतवणूक दीर्घकाळ टिकवून ठेवणे चांगले. शेअर मार्केटमधील दीर्घकालीन गुंतवणूक शेवटी जास्त परतावा देते, परंतु त्यासाठी तुम्ही योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

    2. रातोरात श्रीमंत होण्याचा विचार करू नका : 

    बाजारात लवकरात लवकर श्रीमंत होण्याची हाव तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. चांगला Portfolio तयार करणे ही एक मोठी प्रक्रिया आहे. यासाठी खूप संयम लागतो. बाजारातून चांगल्या परताव्यासाठी तुम्ही अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी ज्यांचे Business Model तसेच त्यांचे व्यवस्थापन चांगले आहे.

    3. ध्येय ठेवून गुंतवणूक करा : 

    ध्येयाशिवाय केलेली गुंतवणूक अनेकदा फायदेशीर नसते. तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेला पैसा हुशारीने गुंतवा. त्या गुंतवणुकीत पैसा कसा वाढणार आहे हे समजत नसेल, तर त्यापासून दूर राहणेच बरे.

    4. वैविध्य समजून घ्या : 

    ‘जवळची सर्व अंडी एका टोपलीत ठेवू नये’ हे सूत्र गुंतवणुकीलाही लागू केले पाहिजे. तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी असलेली रक्कम वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वितरित करावी. संपूर्ण पैसा एकाच ठिकाणी गुंतवू नका, सर्वांमध्ये समतोल ठेवा.

    5. रास्त भावाने करा शेअर्सची खरेदी : 

    एखादी कंपनी उत्तम दर्जाची उत्पादने बनवत आहे किंवा ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देत आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. वॉरन बफे असे सांगतात, एखाद्या मोठ्या कंपनीचे शेअर्स मोठ्या किंमतीला खरेदी करण्यापेक्षा चांगल्या कंपनीचे शेअर्स वाजवी किंमतीला विकत घेणे कधीही चांगले.

    वॉरन बफे यांचा हा प्रसिद्ध विचार प्रत्येक गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीने कायम लक्षात ठेवला पाहिजे.

     

  • 29 ऑगस्ट – राष्ट्रीय क्रीडा दिन 

    29 ऑगस्ट – राष्ट्रीय क्रीडा दिन 

    आपल्या भारत देशाला क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा लाभलाय. भारतीय क्रीडा विश्वातील एक प्रेरणादायी आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचं नाव आजही तितक्याच आदराने घेतलं जातं. 

    आज 29 ऑगस्ट म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिन. हॉकीचे सार्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा गौरव म्हणून त्यांचा जन्मदिवस दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून संबंध देशभर आजही साजरा केला जातो. या क्रीडा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपतींच्या हस्ते या दिवशी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्काराचे वितरण करण्यात येते. याशिवाय खेळातील आजीवन कामगिरीसाठी ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार 2002 पासून देण्यात येतो. 

    हॉकीच्या मैदानात ध्यानचंद यांनी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केली आहे. मेजर ध्यानचंद यांचा हॉकी खेळ म्हणजे चेंडू आणि स्टीक यांचा सुंदर मिलाप होता. त्यांच्या कारकीर्दीत भारताने ऑलम्पिक स्पर्धेत सलग तीन वेळा सुवर्ण कामगिरी अनुक्रमे 1928, 1932 आणि 1936 झाली नोंदविली आहे. 1956 साली सरकारने ध्यानचंद यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवित केले. 

    ध्यानचंद यांनी 1926 ते 1948 दरम्यान 400 हून अधिक सामने खेळले आहेत. यात त्यांनी जवळपास 1000 गोल करण्याचा पराक्रम केला आहे. त्यांनी आपला शेवटचा आंतराष्ट्रीय सामना 1948 साली खेळला. हॉकीच्या मैदानात त्यांनी केलेल्या अभूतपूर्व कामगिरीसाठी त्यांना सन्मानित करण्यासाठी 2012 पासून भारत सरकारने त्यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला.