Author: naviarthkranti

  • यंत्रांनाच देव मानणारा भक्त – बाबा कल्याणी

    यंत्रांनाच देव मानणारा भक्त – बाबा कल्याणी

    Baba Kalyani

    नवनिर्मितीचा ध्यास आणि नवनव्या आव्हानांना सामोरे जाण्याची चिकाटी याच्या जोरावर “भारत फोर्ज‘ या वाहनांच्या सुट्या भागाचे उत्पादन घेणाऱ्या कंपनीने जागतिक स्तरावर वर्चस्व निर्माण केले. त्याचे प्रणेते आहेत अर्थातच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष बाबा कल्याणी. कारखाना म्हणजे देवालय, मशिन म्हणजे देव आणि उत्पादन म्हणजे देवाची भक्ती अशी त्यांची श्रद्धा आहे. या श्रद्धेच्या जोरावरच त्यांनी भारत फोर्जला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन पोचविले. त्यांच्या नेतृत्वाखालील कल्याणी उद्योगसमूहाने आज ऑटोमोबाइलबरोबरच तेल व नैसर्गिक वायू,ऊर्जा, बांधकाम, खाण, रेल्वे इंजिन, जहाज व विमान, युद्धसामग्री अशा विविध क्षेत्रांत डौलाने आपला झेंडा फडकाविला आहे. 1972 मध्ये सेल्स इंजिनिअर या पदापासून त्यांची भारत फोर्जमधील कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. सरव्यवस्थापक ते व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष अशी त्यांची कारकीर्द बहरत गेली आणि कंपनीही. आज त्यांच्या कुशल नेतृत्वामुळेच कंपनीची आर्थिक उलाढाल 2.5 अब्जच्या घरात जाऊन पोचली आहे.

    >> संस्कारांचे बाळकडू

    वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षीच बाबांना बेळगावच्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाठविण्यात आले. वास्तविक हे वय खेळण्या-बागडण्याचे; पण याच वयात त्यांना सर्व बालसुलभ गोष्टी बाजूला ठेवून लष्कराच्या कडक शिस्तीत वावरावे लागले. बेळगावचे हे सैनिक स्कूल देशातील नामांकित शाळांपैकी एक. आर. एस. मणी हे त्यावेळी या शाळेचे प्राचार्य होते. ऑक्‍सफर्डमध्ये शिक्षण झालेले प्राचार्य मणी कडक शिस्तीचे. त्यांचा हात पाठीवरून फिरला आणि बाबांचे आयुष्यच बदलून गेले. बाबांनी शिस्त, वेळेचे महत्त्व आणि व्यक्तिमत्त्व विकास ही त्रिसूत्री आयुष्यभर जपली.

    गुजरातमधील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी अँड सायन्सेस या महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. येथे त्यांनी चमक दाखवताना सातत्याने पहिला-दुसरा क्रमांक राखला. येथील शिक्षण संपवून त्यांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील बोस्टन येथील एमआयटी महाविद्यालयात प्रवेश घेतला. अगदी त्या काळातही तेथील प्रवेशासाठी अत्यंत कठीण असणारी प्रवेश परीक्षा द्यावी लागायची. बाबांनी ही कठीण परीक्षा अगदी सहज दिली. एमआयटीमधील पदवी पाच सेमिस्टरची होती; पण बाबांनी कठोर मेहनत, नावीन्याचा ध्यास आणि शिस्तीचे संस्कार याच्या जोरावर तीन सेमिस्टरमध्येच पदवी पूर्ण केली. त्याच काळात तेथील “सिप्को‘ या कंपनीचे अध्यक्ष चार्ल्स स्मिथ यांनी “इलेक्‍ट्रो केमिकल‘ मशिनचे नवे तंत्र विकसित केले होते. बाबांचा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा शोधनिबंधही याच विषयावर होता. त्यामुळे चार्ल्स स्मिथ हे त्यांचे प्रेरणास्थान बनले. अमेरिकेत त्यांनी त्यांच्याकडे पाच ते सहा महिन्यांचा अनुभव घेतला. याच अनुभवाच्या शिदोरीवर त्यांनी “भारत फोर्ज‘ कंपनीला यशोशिखरावर पोचविले.

    Bharat Forge

    बाबांचे अमेरिकेत शिक्षण सुरू असतानाच इकडे पुण्यात “भारत फोर्ज‘च्या उभारणीचे काम वेगाने सुरू झाले होते. 1964-65चा तो काळ होता. बाबा सुटीला पुण्यात आले, की त्यांचा पूर्ण वेळ या प्लॅंटवरच जात असे. तेथे सुरू असलेल्या यंत्रजोडणीच्या कामात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या या जिद्दी वृत्तीमुळेच भारत फोर्जमधील यंत्रांना आकार मिळाला आणि त्यांच्या आयुष्यालाही!

    अमेरिकेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते थेट भारत फोर्जमध्येच दाखल झाले. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे एकवीस वर्षे. अवजड उद्योगात आधुनिक तंत्राचा वापर कसा करता येईल, याचे बाळकडू त्यांना अमेरिकेतील शिक्षणात मिळाले होते. त्यामुळेच ‘भारत फोर्ज‘ला अत्याधुनिक बनविण्याचा ध्यासच त्यांनी घेतला. 1971 मध्ये सेल्स इंजिनिअर पदापासून त्यांच्या कारकीर्दीला प्रारंभ झाला. गतिमान आयुष्य आणि झपाटून काम करण्याची जीवनशैली त्यांना अमेरिकेतील शिक्षणात मिळाली होती. याच गुणांच्या आधारावर त्यांनी भारत फोर्जमधील कामाला प्रारंभ केला. वेळेचे महत्त्व, कमालीची शिस्त आणि गुणवत्तेत तडजोड न करण्याची भूमिका या त्रिसूत्रीचा त्यांनी स्वतः तर अवलंब केलाच; पण कंपनीतील प्रत्येकाला त्याचा अवलंब करण्यास भाग पाडले.

    bharat-forge-dispatches-16-kalyani-m4-armoured-vehicles-to-indian-army-

    बाबांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या वर्षभरातच ते कंपनीचे सरव्यवस्थापक बनले. नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून घेण्यासाठी, त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी परदेशात पाठविले. बाबांच्या नेतृत्वाखाली कंपनीने जेवढ्या ऑर्डरी होत्या त्या तर वेळेत पूर्ण केल्याच; पण त्यापेक्षाही अधिक उत्पादन घेतले. त्यामुळे त्यांनी हे जादाचे उत्पादन निर्यात करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या सरव्यवस्थापक पदाच्या काळातच भारत फोर्जने आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करण्यास सुरुवात केली.

    भारत फोर्जला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवतानाच त्यांनी दोन विदेशी कंपन्या खरेदी केल्या व त्या यशस्वीपणे चालवूनही दाखविल्या. त्यापैकी एक कंपनी होती जर्मनीतील सीडीपी फोर्जिंग नावाची. त्यानंतर तेथेच आणखी एक कंपनीही त्यांनी खरेदी केली. या कंपनीत वाहनांसाठी लागणारे सुटे भाग ऍल्युमिनिअमपासून तयार करण्यात येत होते. अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वापरून त्यांनी या कंपनीतही व्यावसायिक यश मिळवून दाखविले. भारत फोर्जचा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी दबदबा निर्माण केला.

    कल्याणी उद्योगसमूहाच्या माध्यमातून इतर अनेक औद्योगिक क्षेत्रांत धवल यश संपादन केले. हे सर्व करतानाच त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली. त्यामुळेच त्यांनी पुण्यात “प्रथम ट्रस्ट‘ नावाची बिगरशासकीय संस्था (एनजीओ) स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी झोपडपट्ट्यांतील मुलांसाठी शाळा सुरू केल्या. नांदेडला अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले. कामालाच देव मानून त्यांनी झपाटून केलेल्या कामामुळेच कल्याणी उद्योगसमूह देशातीलच नव्हे तर जगातील एक नामांकित उद्योगसमूह बनला. याचे सर्व श्रेय जाते ते बाबा कल्याणी यांच्या कल्पकतेला, धडाडीला, कामालाच ईश्‍वर मानण्याच्या त्यांच्या श्रद्धेला.

    – अनिल सराफ, दै. सकाळ

  • पेपर विकणाऱ्या या व्यक्तीला उंदराच्या कार्टूनने  अब्जाधीश बनवलं- वॉल्ट डिज्नी

    पेपर विकणाऱ्या या व्यक्तीला उंदराच्या कार्टूनने अब्जाधीश बनवलं- वॉल्ट डिज्नी

    नमस्कार! नवी अर्थक्रांतीमध्ये आपलं स्वागत आहे… स्टार्टअप आणि उद्योग क्षेत्रातील रंजक आणि उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. तेव्हा चॅनेल आत्ताच सबस्क्राइब करा. 

    वॉल्ट डिज्नी यांचा जन्म ५ डिसेंबर १९०१ मध्ये अमेरिकेतील शिकागोमधील हेर्मोसा इथं झाला. वडिलांचं हातावरचं पोट. शेतात मजुरी करून ते कुटुंबाचं पालनपोषण करत होते. वॉल्ट यांना मोठा भाऊ होता रॉय, जो त्यांचा सर्वात जवळचा मित्र होता. वॉल्ट यांना लहानापासून चित्र रेखाटण्याची आवड होती. एकदा तर त्यांनी आपल्या घरची भिंत चित्रांनी भरून काढली आणि वडिलांचा बेदम मार खाल्ला. त्यांनी एकदा आपल्या शेजारी राहणाऱ्यांच्या घोड्याचं सुंदर चित्र काढलं. ते त्या शेजाऱ्यांना इतकं आवडलं की, त्यांनी ते वॉल्टकडून खरेदी केलं. वॉल्टच्या घराजवळ एक सलून होतं. ती जागा म्हणजे वॉल्टची चित्र रेखाटण्याची हक्काची जागा, कारण तिथल्या मालकाला वॉल्टची चित्र खूप आवडायची. तो ती त्याच्याकडून खरेदी करायचा. वॉल्ट त्याला चित्र विकायचा ते पैशासाठी नाही, तर तो मालक ती चित्रं त्याच्या भिंतीवर फ्रेम करून लावायचा आणि याचा वॉल्टला खूप आनंद व्हायचा.

    वॉल्टच्या वडिलांची खूप इच्छा होती कि आपली मुलं शिकावीत, पण परिस्थितीमुळं त्यांना शिक्षण देणं जमत नव्हतं. मुलांना शिकवलं पाहिजे म्हणून अधिक काम मिळण्यासाठी वॉल्टचं कुटुंब शिकागोला आलं. तिथं तो दिवसा शाळेत जायचा, तर रात्री शिकागो आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन चित्रकला शिकायचा. वडिलांना हातभार लागावा म्हणून वॉल्ट आणि त्याचा भाऊ रॉय वडिलांसोबत सकाळी वर्तमानपत्र टाकायचं काम करत होती. त्यामुळं झालं असं कि वॉल्टचं शिक्षणात लक्ष लागेना, पण काही झालं तरी त्यानं आपली चित्रकला सोडली नाही. आपल्या कल्पनाशक्तीतून तो जे जमेल ते रेखाटायचा.

    म्हणून वॉल्ट यांनी आता ऍनिमेशन मालिका बनवायचं ठरवलं. १९२८ साली मिकी माऊसचा पहिला ॲनिमेटेड बोलपट स्टीमबोट विली प्रदर्शित झाला आणि मिकी जणूकाही सगळ्यांच्या गळ्यातील ताईतच झाला. आता मात्र वॉल्ट डिज्नी हा कलाकार काय आहे, त्याची कल्पनाशक्ती काय आहे हे सगळ्या जगाला कळलं. १९३५ साली मिकीला इंटरनॅशनल सिम्बॉल ऑफ गुडविल म्हणून गौरविण्यात आले. वॉल्टने मिकीला नुसता जन्मच दिला नाही, तर १९४७ पर्यंत त्याला स्वतःचा आवाजही दिला. मिकीमाऊस नंतर त्याची फॅमिली मिनी, डोनाल्ड डक पुढे सिन्ड्रेला, डंबो, बम्पी, हिमपरी आणि सात बुटके यांसारख्या अप्रतिम कलाकृतींची निर्मिती वॉल्ट डिज्नी यांनी केली.

    वॉल्ट डिज्नी यांनी निर्माता म्हणून ५७६, दिग्दर्शक म्हणून ११२ व अभिनेता म्हणूनही १०-१२ फिल्म्सची निर्मिती केली. वॉल्ट यांना जगातील कोणत्याही कलाकाराला मिळाले नसतील इतके पुरस्कार मिळाले. आज चित्रपटसृष्टीत सर्वोत्तम गणल्या जाणाऱ्या ऑस्करसाठी वॉल्ट यांना ५९ वेळा नामांकन मिळालं. तर यापैकी २२ वेळा त्यांना प्रत्यक्ष पुरस्काराने गौरवण्यात आलं. अशा या महान कलाकाराने १५ डिसेंबर १९६६ रोजी जगाचा निरोप घेतला.

    मुलांना परिवारासह डिज्नी कॅरेक्टर्सला भेटता यावे, अशी जागा वॉल्ट शोधत होते. त्यामुळे मुलांना त्यांच्याबरोबर वेळ देता येईल आणि आनंद घेता येईल. यासाठी 1955 मध्ये पहिले डिज्नीलॅँड थीम पार्क तयार झाले. हेच पॉर्क आंतरराष्‍ट्रीय पर्यटन केंद्र ठरले. पहिल्या पार्कच्या यशानंतर दुसरे पार्क बनविण्याचा निर्णय घेतला गेला. वॉल्टचे 1966 मध्ये निधन झाले. त्यानंतर रॉय यांनी हे काम सुरूच ठेवले. 1971 मध्ये फ्लोरिडात दुसरा पार्क तयार झाला. आज जगात सहा डिज्नी थीम पार्क आहेत.

    अनेक अपयश सोसूनही वॉल्ट खचले नाहीत. नकारात्मकता, निराशा या गोष्टींना त्यांनी आपल्यापासून दूर ठेवले. माणूस कितीही कठीण परिस्थितीतून आला, तरी त्याची कला त्याला जगवते आणि ती योग्य दिशेने जोपासली गेली कि ती त्याला योग्य ती कीर्ती मिळवूनच देते. याच उत्तम उदाहरण त्यांनी प्रस्थापित केले. तुम्हीही आपल्या कला जोपासा, त्याला वाढवा काय माहित तुमच्यातील वॉल्ट डिज्नीसुद्धा असाच आकार घेईल.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

    मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

    Balshastri Jambhekar

    एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मराठी समाजमन घडविण्यात बाळशास्त्री जांभेकरांचा फार मोठा वाटा होता. कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले या गावी जन्मलेल्या बाळशास्त्रींनी अनेक विषयांचे अभ्यासक-संशोधक, अध्यापक, उत्कृष्ट लेखक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार म्हणून आपल्या कार्याचा ठसा १८३२ ते १८४६ या काळात उमटवला.

    बाळशास्त्री जांभेकरांना आपण ‘दर्पण’कार जांभेकर म्हणूनच ओळखतो. ब्रिटिश कालखंडात त्यांनी दर्पणच्या संपादनाची धुरा समर्थपणे वाहिली. भविष्यकाळातील या माध्यमाची जबरदस्त ताकद त्यांनी तेव्हाच ओळखली होती. परकी सत्तेला उलथून टाकायचे असेल, तर समाजजागृती घडवायला हवी आणि त्यासाठी लेखणीला पर्याय नाही हे त्यांना फार पूर्वीच समजले होते. बाळशास्त्री कडवे देशाभिमानी होते. त्यांच्या या देशसेवा आणि समाजसेवेच्या जाणिवेतूनच दर्पणसारख्या नियतकालिकाचा जन्म झाला आणि मराठी वृत्तपत्रविश्र्वात नवी पहाट उगवली. दर्पणाचा जन्म होताना गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांचेही सहकार्य बाळशास्त्रींना लाभले. त्या वेळी बाळशास्त्रींचे वय अवघे वीस वर्षांचे होते. एका वृत्तपत्राच्या संपादकाला आवश्यक असणारी भाषेची जाण आणि सामाजिकतेचे भान त्यांच्याकडे होते.

    दर्पणाचा पहिला अंक ६ जानेवारी, १८३२ रोजी प्रकाशित झाला. वृत्तपत्राची किंमत १ रुपया होती. जनसामान्यांसाठी वृत्तपत्राची भाषा मराठी ठेवण्यात आली असली तरी ब्रिटिश शासनापर्यंत आपला आवाज जावा या हेतूने, वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्लिश भाषेत असायचा. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र! या अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ (कॉलम) मराठीत आणि एक स्तंभ इंग्रजीत असे. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी इंग्रजी मजकूर होता. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. दर्पण अशा रीतीने साडे आठ वर्षे चालले आणि जुलै, १८४० ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.

    Darpan News Letter

    आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रातील पहिल्या पिढीतील समाजसुधारक होते. ‘दर्पण’ हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोकशिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला. यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाच्या प्रश्र्नाचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचा करावा लागेल. बाळशास्त्रींनी या विषयांवर विपुल लिखाण केले. त्यामुळे त्यावर विचारमंथन होऊन त्याचे रूपांतर पुढे विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत झाले. ज्ञान, बौद्धिक विकास आणि विद्याभ्यास या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत. उपयोजीत ज्ञानाचा प्रसार समाजात व्हावा, ही त्यांची तळमळ होती. देशाची प्रगती, आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज आहे, तसेच सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याच्या विवेकनिष्ठ भूमिकेसाठी शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराची आवश्यकता आहे, याची जाणीव त्यांना झाली होती. विज्ञाननिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते. थोडक्यात, आजच्यासारखा ज्ञानाधिष्ठित समाज त्यांना दोनशे वर्षांपूर्वीच अपेक्षित होता. त्या अर्थाने ते द्रष्टे समाजसुधारक होते. सार्वजनिक ग्रंथालयांचे महत्त्व ओळखून त्यांनी ‘बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना केली. विविध समस्यांवर सकस चर्चा घडवण्यासाठी ‘नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी’ची स्थापना केली. यातूनच पुढे ‘स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ या संस्थेला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड यांसारखे दिग्गज कार्यरत झाले.

    त्यांच्या विद्वत्तेला जोड होती ती त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची. संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी या त्या काळच्या प्रचलित भाषांवर त्यांचे प्रभुत्व होतेच, याशिवाय ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, बंगाली आणि गुजराती भाषाही त्यांना उत्तम अवगत होत्या. या भाषांसह विज्ञान, गणित, भूगोल, शरीरशास्त्र व सामान्य ज्ञान या विषयांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. आज मराठीतील वृत्तपत्रांचे जनक असा जसा त्यांचा नावलौकिक आहे, तसाच एल्फिन्स्टन कॉलेजमधील नावाजलेले, हिंदीचे पहिले प्राध्यापक असाही त्यांचा लौकिक आहे. त्याचबरोबर रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोधनिबंध प्रसिद्ध झालेले पहिले भारतीय असाही मान त्यांच्याकडे जातो. १८४५ मध्ये त्यांनी केलेले ज्ञानेश्र्वरीचे मुद्रण हे या ग्रंथाचे पहिले मुद्रण मानले जाते. बाळशास्त्रींनी कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही काम पाहिले. तसेच त्यांनी नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, हिंदुस्थानचा इतिहास, शून्यलब्धिगणित आदी ग्रंथांची निर्मिती केली.

    साधारणपणे १८३० ते १८४६ या काळात बाळशास्त्रींनी आपले योगदान महाराष्ट्राला (व भारताला) दिले. या काळात बहुसंख्येने समाज निरक्षर, अंधश्रद्ध व अज्ञानी होता. म्हणूनच अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात, विविध क्षेत्रांत त्यांनी केलेले प्रचंड कार्य मूलभूत , मौल्यवान व अद्‌भूत ठरते. ६ जानेवारी रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. हाच योगायोगाने बाळशास्त्रींचाही जन्मदिवस. त्यांच्या स्मृत्यर्थ हाच दिवस ‘पत्रकार दिन’ म्हणून आज महाराष्ट्रात साजरा केला जातो.

  • ब्लेडचा शोध लावणारे जिलेट कंपनीचे संस्थापक किंग कॅम्प जिलेट यांचा जन्मदिन.

    ब्लेडचा शोध लावणारे जिलेट कंपनीचे संस्थापक किंग कॅम्प जिलेट यांचा जन्मदिन.

    किंग कँप जिलेट हा काही कोणी शास्त्रज्ञ नव्हता. तो होता एका कंपनीत काम करणारा २१ वर्षाचा एक तरुण सेल्समन. घरोघरी फिरून तो विविध प्रकारच्या वस्तू विकायचा. पण त्याच्या डोळ्यात मात्र भव्य स्वप्नं असायची. एक दिवस आपण असा एखादा शोध लावायचा कि संपूर्ण जगात आपलं नाव होईल आणि आपल्याला चिक्कार पैसेही मिळतील. परंतु एका सामान्य माणसासाठी ते एक अशक्य कोटीतलच स्वप्नं होतं. तरीही जिलेट आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करीतच राहिला.

    King-Camp-Gillette

    तब्बल २८ वर्षांनी त्याला यश मिळालं तेव्हा जिलेट हे नाव तब्बल दोनशे देशातील लाखो करोडो लोकांना ठाऊक झालं होतं. वयाच्या ७७ व्या वर्षी १९३२ मध्ये त्याचे निधन झाले तरीही आज ८० वर्षानंतर जिलेट हे नाव जिलेट ब्लेड, जिलेट सेफ्टी रेझर, जिलेट ट्वीन ब्लेड, जिलेट ट्रिपल ब्लेड, जिलेट शेविंग क्रीम, जिलेट ब्रश म्हणून जगातील अब्जावधी लोकांच्या ओठावर रोजच असते. २००५ मध्ये प्रोक्टर एंड ग्याम्बलने जिलेट कंपनी ५७ बिलिअन डॉलरला म्हणजे तब्बल ३ लाख ४२ हजार कोटी रुपयांना खरेदी केली तरी जिलेट हे नाव कायम ठेवले. किंग कँप जिलेटच्या त्या अफाट स्वप्नाला, त्याच्या त्या अविश्वसनीय चिकाटीला माझा त्रिवार सलाम !

    दिवसभर सेल्समन म्हणून पायपिट केल्यानंतर फावल्या वेळात जिलेट काहीतरी संशोधन करत असे. (तुम्ही फावल्या वेळात क्रिकेट बघता ) त्याने तसे बारीक सारीक अनेक शोध लावले. पण त्यापासून त्याला चार पैसे काही गाठीला बांधता आले नाहीत. त्याचं संशोधनाचं ते वेड पाहून एक दिवस त्याच्या मालकाने त्याला एक असा सल्ला दिला कि तू असं काही शोधून काढ कि ज्याची गरज लोकांना रोजच पडेल आणि ते ती वस्तू वापरून फेकून देतील अन त्याला चांगला व्यवसाय करता येईल. त्या कल्पनेने जिलेटला झपाटून टाकलं. रात्रंदिवस तो अशी कोणती वस्तू असेल हाच विचार करू लागला. त्यासाठी त्याने असंख्य वेळा डिक्शनरी चाळून काढली.

    एकदा नेहमी प्रमाणे हातात वस्तरा घेऊन तो दाढी करत होता. अचानक त्याला एक सुंदर कल्पना सुचली. रोज घासून घासून वस्तऱ्याला धार लावत बसण्यापेक्षा आठवडाभर वापरून फेकून देता येईल असे ब्लेड तयार करता येईल का ? त्याला पकडता येईल असे रेझर बनवता येईल का ? त्या कल्पनेने जिलेटला झपाटून टाकलं. रात्रंदिवस तो अशी कोणती वस्तू असेल हाच विचार करू लागला. त्यासाठी त्याने असंख्य वेळा डिक्शनरी चाळून काढली. एकदा नेहमी प्रमाणे हातात वस्तरा घेऊन तो दाढी करत होता. अचानक त्याला एक सुंदर कल्पना सुचली. रोज घासून घासून वस्तऱ्याला धार लावत बसण्यापेक्षा आठवडाभर वापरून फेकून देता येईल असे ब्लेड तयार करता येईल का ? त्याला पकडता येईल असे रेझर बनवता येईल का ? त्या कल्पनेने जिलेटला झपाटून टाकलं. त्या दिवसांपासून त्याने अनेक तज्ञ व्यक्तींना भेटायला सुरुवात केली. प्रत्येकाने त्याच्या कल्पनेला वाटण्याच्या अक्षता लावल्या. तरीही जिलेट खचला नाही. आपली कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा त्याचा विश्वास थोडाही डगमगला नाही. त्याने आणखी पाच वर्ष अनेक तज्ञांच्या गाठी भेटी घेतल्या. शेवटी वयाच्या ४६ व्या वर्षी एकाने त्याला हवे तसे ब्लेड बनवून दिलेच. तेव्हा जिलेटला आकाशाला गवसणी घातल्याचा आनंद झाला.

    secrets-of-the-success-of-king-camp-gillette

    पण त्याचा तो आनंद फार काळ टिकला नाही. कारण मोठ्या प्रमाणावर अशी ब्लेड बनविण्यासाठी त्याच्याकडे भांडवलच नव्हतं. कर्ज काढून त्याने एक मशीन बनवलं तेव्हा इतका खर्च झाला कि तो अक्षरशः कर्जबाजरी झाला. देणेकरी त्याच्या मागे लागले. मित्र त्याच्या रेझरवरून त्याची टिंगल करू लागले. शेवटी एका गुंतवणूकदाराने त्याला कर्ज रोखे काढायचा सल्ला दिला आणि कमी किमतीत स्वतः कर्जरोखे खरेदी करून त्याला भांडवल दिले. जिलेटने मोठ्या प्रमाणावर ब्लेड आणि रेझरची निर्मिती केली. पण त्याची ही कल्पना लोकांना आवडली नाही. फक्त ५० ब्लेड आणि रेझर विकली गेली. तेव्हा त्याने आपल्या प्रोडक्टचे पेटंट रजिस्टर केले आणि बाजारात तुफान जाहिरात करून हजारो दुकानात आपले प्रोडक्ट विकायला ठेवले.

    बघता बघता लाखामध्ये विक्री होऊ लागली. एका देशातून दुसऱ्या देशात करता करता जगातील दोनशे देशातील अब्जावधी लोकांना त्याच्या त्या सुंदर कल्पनेने भुरळ घातली आणि त्याने एका मागून एक अशी ब्रश, क्रीम, सोप अशी प्रोडक्ट बाजारात आणली. त्याच्या प्रत्येक प्रोडक्टचा दर्जा इतका उच्चा होता कि त्यानंतर अनेक कंपन्यांनी आपली प्रोडक्ट बाजारात आणून त्याला शह द्यायचा प्रयत्न केला, पण जिलेट म्हणजे जिलेटच हवं अशी मागणी करणाऱ्या ग्राहकांमुळे जिलेटने आभाळालाच गवसणी घातली. वयाच्या ४९ व्या वर्षी आपलं स्वप्न साकार करणाऱ्या जिलेटची कहाणी आयुष्यात लवकर निराश होणाऱ्या लाखो तरुणांना दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करणारी ठरावी.

    secrets-of-the-success-of-king-camp-gillette

    आणखी वाचा

  • सर आयझॅक न्यूटन, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारे थोर शास्त्रज्ञ यांची जयंती

    सर आयझॅक न्यूटन, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारे थोर शास्त्रज्ञ यांची जयंती

    लहान वयातच त्यांनी लहानशी चक्की (उंदराने चालविलेली), घड्याळे, कंदील यांसारख्या वस्तू बनविल्या होत्या. त्यांना शेतीमध्ये गुंतविण्याच्या दृष्टीने आईने त्यांना शाळेतून काढून शेतावर कामास नेले; परंतु त्यात त्यांचे लक्ष लागेना. मामाच्या व शिक्षकांच्या सल्ल्याने त्यांना १६६० मध्ये परत शाळेत पाठविण्यात आले.

    ते १६६१ मध्ये केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. १६६५ मध्ये बी. ए. पदवी मिळविल्यानंतर दोन वर्षांनी त्यांची ट्रिनिटी कॉलेजचे फेलो म्हणून निवड झाली. जून १६६५ नंतर सु. दीड वर्ष प्लेगच्या साथीमुळे विद्यापीठ बंद राहिल्याने त्या काळात न्यूटन यांना वुल्झथॉर्पमध्ये रहावे लागले. या काळातच त्यांनी त्यांच्या गणित, प्रकाशकी आणि खगोलीय यामिकी या विषयांतील कामगिरीचा पाया घातला.

    १६६८ मध्ये त्यांनी एम्.ए. ही पदवी संपादन केली. त्यांचे गुरू आयझॅक बॅरो यांनी न्यूटन यांची योग्यता ओळखली होती आणि १६६९ मध्ये जेव्हा बॅरो यांनी केंब्रिज विद्यापीठातील आपल्या गणिताच्या ल्यूकेशिअन प्राध्यापकदाचा राजीनामा दिला तेव्हा वयाच्या केवळ सव्वीसाव्या वर्षी न्यूटन यांची त्या पदावर नेमणूक झाली.

    ल्यूकेशिअन प्राध्यापक म्हणून नियमाप्रमाणे त्यांनी आपल्या व्याख्यानांची हस्तलिखिते विद्यापीठाच्या ग्रंथालयात ठेवली. ही व्याख्याने पुढील विषयांवरील होती : प्रकाशकी (१६७०–७३), अंकगणित व बीजगणित (१६७३–८३), Principia या ग्रंथाचा पहिला भाग (१६८४–८५), सूर्यकुलातील ग्रह, उपग्रह, धूमकेतू व भरती-ओहोटी – द सिस्टिम ऑफ द वर्ल्ड – (१६८७). १६८८ ते १६९६ पर्यंत त्यांनी कोणत्या विषयांवर व्याख्याने दिली त्याची नोंद उपलब्ध नाही. १६८९ मध्ये केंब्रिज विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून संसदेत त्यांची निवड झाली व पुढील वर्षी संसद विसर्जित होईपर्यंत ते त्या पदावर राहिले. १७०१ साली त्यांची संसदेत पुन्हा निवड झाली; परंतु राजकारणात त्यांनी कोणताही महत्त्वाचा भाग घेतला नाही.

    १६९० मध्ये संसद विसर्जित झाल्यावर ते केंब्रिजला परतले व काही काळ यांनी गणितावर संशोधन केले; परंतु १६९२–९४ या काळात निद्रानाश व मानसिक त्रास यांमुळे ते आजारी पडल्याने त्यांच्या कार्यात खंड पडला. केंब्रिजमधील जीवनाचा कंटाळा आल्याने ते तेथून बाहेर पडण्याचा विचार करू लागले. १६९६ मध्ये त्या वेळचे अर्थमंत्री चार्ल्स माँटाग्यू यांनी न्यूटन यांची टाकसाळीमध्ये अधीक्षक (वॉर्डन) म्हणून नेमणूक केली व चार वर्षांनी ते तेथील मुख्याधिकारी झाले. अधीक्षक असतानाच ते केंब्रिज येथील प्राध्यापकपदावरही होते; परंतु मुख्याधिकारी झाल्यावर त्यांनी प्राध्यापकपदाचा राजीनामा दिला आणि ते लंडन येथे स्थायिक झाले व टाकसाळीतच मुख्याधिकारी म्हणून त्यांनी मृत्यूपावेतो काम केले.


    गणितशास्त्रातील न्यूटन यांची महत्त्वाची कामगिरी म्हणजे अवकलन व समाकलन यांचा निर्मिती ही होय. अवकलनांकाला त्यांनी ‘फ्लक्शन’ हे नाव दिले होते. अवकलनांक दर्शविण्याकरिता त्यांनी शिरोबिंदूचा उपयोग केला उदा., dक्ष/dट करिता क्षं. न्यूटन यांनी अवकलनाच्या साहाय्याने वक्राची स्पर्शिका काढण्याची पद्धत निश्चित केली. समाकलन या संकल्पनेची मांडणीही त्यांनी केली होती. समाकलनाचा उपयोग त्यांनी वक्राने वेढलेले क्षेत्रफळ व घन आकृत्यांचे घनफळ मिळविण्याकरिता केला. अवकलन व समाकलन यांना जोडणारे कलनशास्त्रातील मूलभूत प्रमेय त्यांनीच मांडले. सांत अंतर कलन या कलनाच्या दुसऱ्या एका शाखेतही त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली.

    Isaac Newton

    कलनशास्त्राचा निर्माता कोण यासंबंधी १७०५ च्या सुमारास न्यूटन आणि जर्मन गणितज्ञ जी. डब्ल्यू. लायप्निट्‌स यांच्यात बराच मोठा वाद निर्माण झाला होता. लायप्निट्‌स यांनी कलनशास्त्राची निर्मिती स्वतंत्रपणे केली असेच सध्या मानण्यात येते. लायप्निट्‌स यांचीच कलनशास्त्रातील संकेतन पद्धती पुढे रूढ झाली कलन. बीजगणितात महत्त्वाचे मानले जाणारे द्विपद प्रमेय न्यूटन यांनी १६६५ च्या सुमारास मांडले बीजगणित. समीकरणाच्या असत् मूलांविषयी त्यांनी विवरण केलेले होते. समीकरणाच्या निर्वाहाचे उपसादन पद्धतीने आसन्नीकरण करण्याची (अंदाजी मूल्य काढण्याची) एक पद्धत त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे समीकरण सिद्धांत. न्यूटन यांनी काही अनंत श्रेढी मांडण्यात यश मिळविले होते. विशेषतः ज्या -१ (क्ष) आणि लॉग (१+क्ष) ही फलने श्रेढी स्वरूपात त्यांनीच मांडून दाखविली श्रेढी.


    गतिकीमधील न्यूटन यांचे गतिविषयक नियम पायाभूत मानले जातात यामिकी. या नियमांच्या साह्याने त्यांनी गॅलिलीओ यांचे खाली पडणाऱ्या पदार्थाच्या गतिविषयीचे सिद्धांत पूर्णावस्थेस नेले.

    न्यूटन यांचे सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी मांडलेला गुरुत्वाकर्षणाचा नियम हे होय गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षणाची थोडीशी कल्पना न्यूटन यांच्यापूर्वीच्या शास्त्रज्ञांनाही होती; पण न्यूटन यांनी आपल्या नियमाद्वारे तिला निश्चित स्वरूप दिले. ‘विश्वातील दोन कणांमधील आकर्षण प्रेरणा ही त्यांच्या वस्तुमानांच्या गुणाकाराच्या समप्रमाणात व त्यांच्यातील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते’ हे त्यांनी स्पष्ट केले.

    न्यूटन यांनी आपले गतिनियम पृथ्वीवरील पदार्थांप्रमाणेच अवकाशातील ग्रह, उपग्रह इत्यादींना लागू केले व त्यातून मिळालेली माहिती योहानेस केप्लर यांच्या नियमानुसार खगोलीय यामिकी मिळणाऱ्या माहितीशी जुळणारी होती. यामध्ये बुध या ग्रहाचा मात्र अपवाद होता. ग्रहगतीतील अनियमितपणाचाही त्यांनी अभ्यास केला. न्यूटन यांनी ‘गोलाची त्याच्या बाहेरील वस्तुमानावरची आकर्षण प्रेरणा त्याच्या केंद्रबिंदूमध्ये केंद्रित झालेली आहे असे मानता येते’ हे सिद्ध केले. त्यांचा हा सिद्धांत ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासात फार महत्त्वाचा ठरला आहे.

    प्रकाशकी हा न्यूटन यांच्या खास अभ्यासाचा विषय होता. जर शुभ्र प्रकाशाचा (उदा., सूर्यप्रकाशाचा) किरण एखाद्या अरुंद फटीद्वारे त्रिकोणी लोलकातून जाऊ दिला, तर त्याचे (दृश्य वर्णपटाच्या) निरनिराळ्या रंगांच्या किरणांमध्ये पृथक्करण होते; तसेच या रंगीत किरणांपैकी एकाच रंगाचा किरण दुसऱ्या लोलकातून जाऊ दिल्यास त्याचे आणखी पृथक्करण न होता फक्त प्रणमन (एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करताना दिशेमध्ये होणारा बदल) होते, असे त्यांनी प्रयोगाद्वारे दाखविले. यावरून शुभ्र प्रकाश हा अनेक रंगांच्या किरणांचे मिश्रण असून या किरणांच्या प्रणमनाची क्षमता (प्रणमनांक) निरनिराळी असल्यामुळेच शुभ्र प्रकाशाचे पृथक्करण होते असे त्यांनी सिद्ध केले.

    त्यांनी वर्णविपथनाचा प्रकाशीय व्यूहांतील विपथन अभ्यास केला व त्यांना असे आढळून आले की, एखादी वस्तू शुभ्र प्रकाशाने प्रकाशित केल्यास भिंगामुळे मिळणाऱ्या त्याच्या प्रतिमेची कडा स्पष्टपणे रेखीव न दिसता नेहमी रंगीत दिसते कारण निरनिराळ्या रंगांकरिता भिंगाचे केंद्रांतर भिन्न असते. हा रंगीत प्रतिमा मिळण्याचा दोष टाळून भिंगाचा दूरदर्शक (प्रणमनी दूरदर्शक) तयार करणे शक्य नाही असा निष्कर्ष त्यांनी काढला (हा निष्कर्ष चुकीचा असल्याचे मागाहून दिसून आले) व त्यामुळे त्यांनी वस्तूपासून येणारा प्रकाश ज्यावर प्रथम पडतो तो मुख्य भाग अंतर्वक्र आरसा असलेला दूरदर्शक (परावर्तनी दूरदर्शक) तयार केला. तथापि अन्वस्तीय (पॅराबोलिक) आरसे तयार करण्याची प्रक्रिया पूर्णावस्थेस जाईपर्यंत या दूरदर्शकाचा पूर्णांशाने उपयोग होऊ शकला नाही.

    सध्या अस्तित्वात असलेले सर्व शक्तिशाली दूरदर्शक (उदा., मौंट विल्सन आणि पॅलोमार वेधशाळेतील ५०८ सेंमी. व्यासाचा दूरदर्शक) परावर्तनी प्रकाराचेच आहेत दूरदर्शक. प्रकाश हा दीप्तिमान पदार्थापासून बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म कणांचा बनलेला असतो असा सिद्धांत न्यूटन यांनी मांडला प्रकाश व या सिद्धांताच्या आधारे त्यांनी परावर्तन, प्रणमन इ. प्रकाशीय आविष्कारांचे स्पष्टीकरण मांडले. मोठ्या केंद्रांतराचे बहिर्गोल भिंग व ते ज्यावर ठेवलेले आहे असा सपाट परावर्तक पृष्ठभाग यांच्यामधील हवेच्या पातळ थराचे विशिष्ट रंगाच्या परावर्तित प्रकाशात निरीक्षण केल्यास एका मध्यवर्ती काळ्या ठिपक्याभोवती एकाआड एक प्रकाशमान व काळी अशी वर्तुळाकार कडी दिसतात. या आविष्काराचे न्यूटन यांनी आपल्या प्रकाशाच्या कण सिद्धांताद्वारे स्पष्टीकरण दिले आणि प्रकाशमान कड्याची त्रिज्या व प्रकाशाचा रंग यांचा संबंध दर्शविणारा नियमही त्यांनी मांडला. हा आविष्कार ‘न्यूटन कडी’ या नावाने ओळखण्यात येतो.

    रॉबर्ट हुक यांनी न्यूटन यांच्या कण सिद्धांतावर बरेच आक्षेप घेतले. नंतरच्या काळात क्रिस्तीआन हायगेन्झ, टॉमस यंग व ऑगस्तीन फ्रेनेल यांनी प्रकाशाचा तरंग सिद्धांत विकसित केला. तथापि न्यूटन यांनी हा साधा तरंग सिद्धांत मान्य केला नाही, कारण या सिद्धांताच्या आधारे प्रकाशाचे रेखीय प्रसारण व ध्रुवण (एकाच विशिष्ट प्रतलात होणारे कंपन) या आविष्कारांचे स्पष्टीकरण करता येत नाही असे त्यांचे मत होते.

    दीप्तिमान पदार्थांपासून प्रकाश कणरूपाने बाहेर पडतो व हे कण मग ईथरमधून ईथर -२ जाताना तरंग निर्माण करतात तसेच अनेक प्रकाशीय आविष्कार (उदा., पातळ पटलांचे रंग) तरंग व कण या दोहोंच्या गुणधर्मामुळे निर्माण होतात असा सिद्धांत त्यांनी आपल्या काही सुरुवातीच्या निबंधात व नंतर Opticks (पहिली आवृत्ती १७०४) या आपल्या ग्रंथात मांडला. तथापि एकोणिसाव्या शतकात तरंग सिद्धांतच ग्राह्य मानला जात होता. विसाव्या शतकात अ‍ॅल्बर्ट आइन्स्टाइन यांनी मांडलेली फोटॉनांची संकल्पना व माक्स प्लांक यांच्या पुंज सिद्धांत यामुळे न्यूटन यांचा सिद्धांत अगदीच चुकीचा नव्हता असे दिसून आले आहे.

    ‘थंड होत असलेल्या पदार्थाचा थंड होण्याचा दर हा त्याच्या व भोवतालच्या तापमानात असलेल्या फरकावर अवलंबून असतो’ हा शीतलीकरणाचा नियम न्यूटन यांच्या नावाने ओळखला जातो.

    न्यूटन यांचा Philosophiae Naturalis Principia Mathematica (इं. शी. मॅथेमॅटिकल प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसॉफी) हा प्रख्यात ग्रंथ १६८७ साली प्रथम प्रकाशित झाला. १७०९ साली रॉजर कोट्‌स यांच्या सहकार्यांने दुसरी आवृत्ती तयार करण्यास न्यूटन यानी संमती दिली व ही आवृत्ती १७१६ मध्ये प्रसिद्ध झाली. हेन्‍री पेम्बर्टन यांच्या सहकार्यांने तयार केलेली तिसरी आवृत्ती १७२६ साली प्रकाशित झाली. यानंतरही या ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या व त्यावरील टीकाग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत. या ग्रंथाच्या पहिल्या भागात गतिकीचा गणितीय दृष्टिकोनातून विकास केलेला आहे, तर तिसऱ्या भागात या गणितीय सिद्धांतांचा उपयोग ज्योतिषशास्त्रीय व भौतिक प्रश्न सोडविण्यासाठी केलेला आहे. दुसऱ्या भागात रोधक माध्यमांतील पदार्थांच्या गतीचे विवरण केलेले असून या भागाचा ग्रंथात समावेश करण्याचा विचार न्यूटन यांनी मागाहून केलेला होता, असे आढळून येते. या ग्रंथामुळे न्यूटन यांची कीर्ती सर्वत्र पसरली व सु. २०० वर्षे वैज्ञानिक जगतात या ग्रंथाचे श्रेष्ठत्व अबाधित राहिले.

    आधुनिक विज्ञानाच्या विकासाला या ग्रंथापासूनच सुरुवात झाली असे मानण्यात येते. Opticks हा त्यांचा दुसरा महत्त्वाचा ग्रंथ १७०४ साली प्रथमतः प्रसिद्ध झाला आणि न्यूटन यांच्या आयुष्यातच त्याच्या तीन आवृत्त्या निघाल्या. त्यांचे शास्त्रीय निबंध आय्. बी. कोएन (१९५८–), सॅम्युएल हॉर्सली (५ खंड, १७७९–८५), डी. टी. व्हाइटहेड (२ खंड, १९६७–६८) इ. लेखकांनी एकत्रित स्वरूपात निरनिराळ्या ग्रंथांच्या रूपाने संपादित केलेले आहेत. रॉयल सोसायटीने न्यूटन यांचा पत्रव्यवहार चार खंडांत प्रसिद्ध केलेला आहे (पहिले तीन खंड १९५९–६१, चौथा खंड १९६७).

    न्यूटन १६७२ पासून रॉयल सोसायटीचे सदस्य होते. १७०३ मध्ये ते सोसायटीचे अध्यक्ष झाले व त्यानंतर मृत्यूपावेती दर वर्षी त्यांची या पदावर निवड झाली. पॅरिस येथील सायन्स अ‍ॅकॅडेमीने १६९९ साली त्यांना सन्मान्य सदस्यत्वाचा बहुमान दिला. १७०५ मध्ये अ‍ॅन राणीने त्यांना नाईट (सर) हा किताब दिला. ते लंडन येथे मृत्यू पावले व विशेष सन्मान म्हणून त्यांचे दफन वेस्टमिन्स्टर अ‍ॅबेमध्ये करण्यात आले.

    संदर्भ : 1. Brewster, D. Memoirs of the Life, Writings and Discoveris of Sir Isaac Newton, 2 Vols., Edinburgh, 1855. (Reprinted, New York, 1965).
    2. More, L. T. Isaac Newton : A Biography, New York, 1934.

    लेखक: मो. वि काळीकर / स. ज. ओक / व. ग. भदे
    स्त्रोत – मराठी विश्वकोश, vikaspedia.in

  • ‘इंटेल’ या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक, प्रसिद्ध उद्योगपती गॉर्डन मूर यांचा जन्मदिन.

    ‘इंटेल’ या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक, प्रसिद्ध उद्योगपती गॉर्डन मूर यांचा जन्मदिन.

    जॅक किल्बीशिवाय इंटिग्रेटेड सर्किट (आयसी) च्या शोधात महत्त्वाचं काम बजावणारा माणूस म्हणजे रॉबर्ट नॉइस (१९२७-१९९०). रॉबर्ट नॉइस फेयरचाईल्ड कंपनीत बऱ्यापैकी रुळला होता. तो कंपनी सोडेल हे कोणाच्याही डोक्यात आले नसते पण १९६८ ला त्याने गॉर्डन मूर सोबत एक अनपेक्षित खेळी खेळली. १९४७ च्या साली बेल लॅब्स मध्ये ट्रान्झिस्टर नावाच्या इलेक्ट्रॉनिक स्विचचा शोध लागला होता. या शोधाने इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात प्रचंड क्रांती घडवून आणली होती. यामुळे संगणकाच्या आकारात आणि किंमतीत प्रचंड मोठा फरक पडणार होता.

    हे ‘भवितव्य’ ओळखल्याने हे ट्रान्झिस्टर्स वापरावेत म्हणून मूर आणि नॉइस यांनी ओरडून ओरडून फेयरचाईल्ड कंपनीला सांगितले होते पण कंपनीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्या दोघांनी वैतागून ती कंपनीच सोडून दिली. स्वतःच्या खिशातून अडीच लाख डॉलर्स गुंतवून ऑर्थर रॉक नावाच्या प्रसिद्ध वित्तसहाय्यकाकडून ३ लाख डॉलर्स घेतले आणि नवी कंपनी सुरु केली.

    गॉर्डन मूर आणि रॉबर्ट नॉइस यांच्या नावावरून सुरुवातीला ‘मूर नॉइस’ ठेवण्याचा विचार होता.पण त्याचा उच्चार ‘मोअर नॉईज’ असा वाटेल अशी त्यांना भीती वाटली! मग त्यांनी वर्षभर ‘एनएम इलेक्ट्रॉनिक्स’ या नावानं त्यांची कंपनी चालवली. त्यानंतर त्यांनी तिचं नामकरण ‘इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स’ असं करायचं ठरवलं. पण दुसऱ्या एका हॉटेलची साखळी चालवणाऱ्या कंपनीनं ते नाव आधीच घेतलं असल्यानं त्यांनी ते त्यांच्याकडून ‘विकत’ घेतलं आणि या लांब नावाचं छोटं स्वरूप (म्हणजे ‘इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स’ ऐवजी ‘इंटेल’) घेऊन ते आपल्या कंपनीला द्यायचं ठरवलं. हीच आजची ‘इंटेल’ होय.इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स’ चे लघुरूप म्हणजे इंटेल. आपल्या आधीच्या फेअरचाइल्ड कंपनीशी स्पर्धा करून आयसी बनवण्याऐवजी त्यांनी संगणकात माहिती साठवण्यासाठी लागत असलेल्या मेमरी चिप्स बनवायचा घाट घातला. लवकरच त्यांनी यात छान यश संपादन केलं. अँडी ग्रोव्हही या दोघांना येऊन सामील झाला.

    खरं तर ज्या कंपनीत आधी हे दोघे काम करत होते त्या फेयर चाईल्ड कंपनीने ‘इंटिग्रेटेड सर्किट’वर बऱ्यापैकी संशोधन केले होते. त्यामुळे याची माहिती नव्याने कंपनी स्थापणाऱ्या मूर आणि नॉइस या दोघांनाही माहित होते. त्यामुळे त्या दोघांनी फेयरचाईल्ड कंपनीचे संशोधन चक्क ढापले आणि आयसीज वापरून कॉम्पुटरची मेमरी बनवण्यास सुरुवात केली. यावर फेयर चाईल्डचा चांगलाच जळफळाट झाला पण काहीच करू शकली नाही. त्याकाळी इंटेलने काढलेल्या ११०३ मॉडेलच्या मेमरी चिपमध्ये १०२४ बिट्स (म्हणजे १ केबी) इतकी माहिती साठवू शकता येई. इतकी माहितीही त्याकाळी ‘प्रचंड’ मानली जाई. इंटेलच्या इंजिनियर्सच्या मते त्या चिपची किंमत १० डॉलर्स इतकी योग्य होती,म्हणजे थोडक्यात १ बिटला एक सेंट अशी किंमत होती. पुढे मुरने आपला एक महत्वाचा सिद्धांत १९६५ सालच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स’ मासिकात मांडला.

    कॉम्प्युटरच्या वेगाच्या संर्दभात गॉर्डन मूरचा एक नियम सांगणे आवश्यक आहे. ‘दर अठरा महिन्यांनी आयसीजची आणि परिणामी कॉम्पुटर्सची क्षमता दुप्पट होत जाईल’ हे त्याचे भाकीत होते. एका स्क्वेअर इंचातील ट्रांझिस्टर्सची संख्या दर अठरा महिन्यांनी दुप्पट होते. मूरने १९६५ साली केलेले हे निरिक्षण मूर लॉ (Moore law) या नावाने प्रसिध्द आहे. याचा दुसरा अर्थ असा की, साधारणपणे दीड वर्षाने प्रोसेसरचा वेग दुप्पट होईल.आश्चर्य म्हणजे मूरचे सुमारे चाळीसवर्षांपूर्वी केलेले भाकीत खरे ठरले आहे. आज आपण २.४ गिगाहर्ट्झचे मायक्रोप्रोसेसर वापरतो. काही वर्षांपूर्वी आपण एक गिगाहर्ट्झ या वेगाचा मायक्रोप्रोसेसर वापरत होतो. तर त्याही आधी आपण पाचशे मेगाहर्ट्झचे प्रोसेसर वापरत होतो. आज हेच भाकीत प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.

    सुरवातीला ही कंपनी कॅल्क्युलेटर्सना लागणाऱ्या मेमरी चिप्स बनवत असे. १९७१ साली इंटेलच्या टेड हॉफनं ‘मायक्रोप्रोसेसर’चा शोध लावला. ठराविक कामे करण्यापेक्षा नवनवीन ‘प्रोग्रॅम लिहून’ या चीपकडून वेगवेगळी कामे करून घेता येतील अशी सोय यात होती. या निर्मितीमुळे इंटेलचा कॉम्प्युटर जगतात प्रवेश झाला. मग इंटेलनं त्या कामात लक्ष घातलं. तरीही पुढची अनेक वर्षे इंटेलचा प्रमुख व्यवसाय मेमरीच्या चिप्स बनवणं हाच होता. पण १९८० च्या दशकात जपानी कंपन्यांनी अतिशय स्वस्त दरात मेमरीच्या चिप्स विकायला सुरुवात केल्यावर इंटेलला काहीतरी वेगळं करणं भाग होतं. त्याच सुमाराला आयबीएमचा ‘पर्सनल कॉम्प्युटर (पीसी)’ जोर धरायला लागला होता. ऐंशीच्या दशकांत “पर्सनल कॉम्प्युटर” तयार झाल्यानंतर मायक्रोप्रोसेसरचा वापर वाढतच गेला. त्यामुळे आता मेमरीच्या चिप्सऐवजी मायक्रोप्रोसेसर वापरून संगणकाचा ‘सेंट्रल प्रॉसेसिंग युनिट (सीपीयू)’ नावाचा भाग बनवण्याकडे इंटेलनं मोहरा वळवला. यालाच आपण संगणकाचा मेंदू असंही म्हणतो. इंटेलची ही चाल कमालीची यशस्वी ठरली, आणि पुढची अनेक वर्षं इंटेलनं अक्षरश: दणाणून सोडली.

    नव्वदच्या दशकांत ऍन्ड्य्रू ग्रोव्ह हा धडाडीचा ‘सीईओ’ कंपनीत जॉईन झाला. तेव्हापासून इंटेलची कॉम्प्युटरविश्वात जवळजवळ मक्तेदारीच तयार झाली. २८६, ३८६, ४८६ या चीप फारशा कुणाला माहीत नाहीत, कारण चिप्सच्या नंबरांमुळे होणाऱ्या कायद्याच्या कटकटी नकोत म्हणून इंटेलने त्यांचं नाव “पेंटियम” ठेवलं. हाच तो जगप्रसिद्ध पेंटियम मायक्रोप्रोसेसर. यामागची गंमतशीर कहाणी अशी की चिप्सना आकड्यांची (४००४, ८०८०, ८०२८६ वगैरे) नावं दिल्याने इंटेलला त्यावर पेटंट्स मिळेनात. कारण आकड्यांवर पेटंट्स मिळत नसतात. म्हणून ‘पेंटियम’ हे नाव निघालं. या चिप्सची ताकद बघा! १९९७ साली बाजारात आलेल्या ‘पेंटियम २’ मध्ये ७५००० ट्रान्झिस्टर्स एका चिपवर होते, आणि ही चिप दर सेकंदाला ४० कोटी आकडेमोडी करू शकत असे! हीच क्षमता आताच्या चिप्समध्ये कैकपटीनं वाढली आहे!

    ‘इंटेल इनसाइड’ या जाहिरात मोहिमेमुळे ‘पेंटियम’ हे नाव कोट्यवधी लोकांना माहीत झाले. त्यानंतर ‘पेंटियम ४’ श्रेणीवर आधारलेले कॉम्प्युटर्सही खूपच लोकप्रिय झाले. कॉम्प्युटरवर आधारित कामे जसजशी वाढत गेली. तसतशी त्याचा वेग वाढण्याची गरजही वाढतच गेलेली दिसते; पण एका कॉम्प्युटरमध्ये एकापेक्षा जास्त मायक्रोप्रोसेसर लावणे किचकट आहे. आज आपण कम्प्युटर विकत घेतो तेव्हा ‘पी-फोर’वाला कम्प्युटर विकत घ्यायचा की पी-फाइव्ह की पी-सिक्स या प्रश्नांनी गांगरून जातो. ही सारी नावं या पेंटियम सीपीयूचीच असतात. पी-४ यातील पी म्हणजे पेंटियम. पण यातल्या ‘पी सिक्स’ सीपीयूची मूळ युक्ती ‘डिजिटल इक्विपमेंट कापोर्रेशन (डेक)’ नावाच्या कंपनीकडून इंटेलनं चोरली असल्याच्या आरोपांनी मोठं वादळचं उभं राहिलं. त्या भानगडीत ‘डिजिटल’नं इंटेलला न्यायालयात खेचून ६०,००,००,००० डॉलर्सची वसुलीही केली !

    पण पुढे एक आणखी गडबड झाली. व्हर्जिनियातील एका प्राध्यापकाने इंटेलला त्यांचा प्रोसेसर एक ठराविक आकडेमोड करताना चुकतोय हे दाखवून दिले, पण ही चूक २७००० वर्षांतून एकदाच होते असं इंटेलचे इंजिनियर पटवून देत होते तरी या प्रसंगाला वेगळेच वळण लागले. पेंटियमवर अनेक जोक्स येऊ लागले, लोक थट्टा करू लागले. त्यामुळे आयबीएमने पेंटियमवर आधारित पीसी बनवणे बंद केले. तेव्हा मात्र इंटेलने सपशेल शरणागती पत्करली. चिपमधील दोष काढून त्याजागी नव्या चिप्स बसवण्यात आल्या यात इंटेलला ४७.५ कोटी डॉलरचा फटका बसला.

    वाढत्या वेगाची गरज भागविण्यासाठी आता इंटेलने नवे ‘कोअर’ तंत्रज्ञान बाजारात आणले आहे. कोअर तंत्रज्ञानामध्ये एक चीपच्या आतच माहितीवर प्रक्रिया करणारे दोन किंवा चार भाग असतात. यामुळे कॉम्प्युटरवर एकाच वेळी अनेक कामे वेगाने करणे शक्य होते. ऍपलच्या संगणकात इंटेलचे प्रोसेसर आधी वापरले जात नव्हते. हा इंटेलसाठी एक धब्बाच होता, पण २००५ साली स्टीव्ह जॉब्जने इंटेलच्या चिप्स बसवणे मान्य केल्याने आधीच दबदबा असलेल्या इंटेलचा मार्केटमधील धाक अजूनच वाढला. कॉम्प्युटर डेलचा असो, वा ऍपलचा… इंटेलच्या चिपशिवाय त्याचे पान हलत नाही.

    आणखी वाचा

  • तंत्रज्ञानाच्या वापराने भविष्यातील ‘या’ 5 समस्या होणार दूर!

    तंत्रज्ञानाच्या वापराने भविष्यातील ‘या’ 5 समस्या होणार दूर!

    एकीकडे पाहिलं, तर जगभरात असा एक घटक आहे, ज्याला अन्न, शुद्ध पिण्याचे पाणी किंवा वीज यांसारख्या मूलभूत स्त्रोतांपर्यंत पोहोचता आलेलेच नाहीये. मात्र, यशस्वी व्यवसाय सुरू करताना समाजात बदल घडवून आणू इच्छिणाऱ्या अनेक टेक संस्थापकांसाठी जगाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे बदलणारे उपाय तयार करणे, हे सर्वोच्च प्राधान्य बनले आहे. अशात, या लेखातून आपण अशा ५ समस्या पाहणार आहोत, ज्या तंत्रज्ञानाद्वारे लवकरात लवकर सोडवल्या जाऊ शकतात.

    १. भूकेचा प्रश्न मिटवणे

    जगभरात दोन वेळच्या जेवणासाठी लोक वणवण भटकताना दिसतात. खरं तर, प्रत्येकाला पुरेल इतके अन्न आहे, तरीही जवळपास एक अब्जाहून अधिक लोक दररोज रात्री उपाशी झोपतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर जगात प्रचंड विषमता आहे. अनेक लोकांकडे अन्न पिकवण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी आवश्यक जमीन किंवा पुरेसे उत्पन्न नसते. तसेच, आनुवांशिक अभियांत्रिकी आणि शेती पद्धतीतील प्रगतीमुळे आपल्याला स्वस्त आणि कार्यक्षमतेने पिके वाढवता येतील. याचा अर्थ, प्रत्येकासाठी अधिक उपलब्ध आणि परवडणाऱ्या अन्नाचा स्त्रोत तयार होईल.

    २. असाध्य (Incurable) रोगावर तोडगा काढणे

    फक्त जीनोमिक्समुळे (जीनोमिक्स हे एक जैविक क्षेत्र आहे जे जीनोमची रचना, कार्य, उत्क्रांती, मॅपिंग आणि संपादन यांचा अभ्यास करते.) रोगाबद्दलची आपली समज विकसित होत नाहीये, तर आरोग्य सेवेच्या वितरणामुळेही पूर्ण बदल होत आहे. जीवशास्त्राची आपली समज जसजशी सुधारत जाईल, तसतशी आपली औषधे आणि रोग शोधण्याच्या आणि बरे करण्याच्या पद्धतीही वाढतील. जीनोमिक्सचे आपले ज्ञान सतत विकसित होत आहे, जसे की सर्वसाधारणपणे रोगांबद्दलची आपली समज आहे. पुरेशा प्रगतीमुळे, आपण लवकरच इबोला आणि मलेरिया यांसारख्या प्राणघातक रोगांचा नाश करणाऱ्या रोगांवर उपचार शोधू शकू.

    ३. स्वस्त आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा देणे

    येत्या काळात आपल्याला नवीन औषधे मिळाली नाही, तरीही नवीन आरोग्यसेवा तंत्रज्ञानामुळे लोकांपर्यंत स्वस्त आणि परवडणारी औषधे पोहोचवण्यात मोठा प्रभाव पडेल. हेल्थकेअर इनोव्हेटर्स हेल्थकेअर गुणवत्ता सुधारण्यासाठी सतत नवीन तंत्रज्ञानावर संशोधन करत आहेत. त्यामुळे आरोग्य क्रांती लवकरच पाहायला मिळू शकते. अशाप्रकारे आपण लवकरच आरोग्य निरीक्षण पद्धती आणि जुनाट आजार शोधण्याच्या नवीन पद्धतींमध्ये झेप घेऊ शकतो.

    ४. सर्वांना दर्जेदार शिक्षण देणे

    आधीच्या काळात शिक्षण घेणे खूपच कठीण होते. मात्र, आता इंटरनेटमुळे जास्तीत जास्त लोकांना उच्च शिक्षणापर्यंत मजल मारता येत आहे. विद्यार्थी केव्हाही स्वस्त, वैयक्तिक अभ्यासक्रमांमधून कुठेही शिकू शकतात. आता विद्यार्थ्यांना एका जागी बसून शिक्षणाचे चांगले वातावरण मिळते, यामुळे त्यांना उच्च पदवी आणि उत्तम शिक्षणाचा अनुभवही घेता येतो. वर्गातील तंत्रज्ञान (In-Classroom Technology) अपंग विद्यार्थी आणि पारंपारिक वर्गात संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवण्याची संधी देते. विशेष म्हणजे, हे योग्य तंत्रज्ञानाशिवाय खूपच कठीण असते.

    ५. प्रत्येकासाठी स्वस्त वीज निर्मिती करणे

    सध्या अक्षय ऊर्जेने वेग घेतला आहे. अलीकडेच, सौर ऊर्जा जगातील सर्वात स्वस्त ऊर्जा स्रोत बनली आहे. विकसनशील राष्ट्रांसाठी, जीवाश्म इंधनाला समर्थन देण्यासाठी महागड्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याऐवजी स्वस्त, अक्षय ऊर्जेच्या पर्यायांसह जाणे अर्थपूर्ण आणि फायदेशीर आहे. अक्षय ऊर्जा केवळ उत्पादनासाठी स्वस्तच नाही, तर ती आपल्या पर्यावरणासाठी देखील चांगली आहे, ज्यामुळे भविष्यातील ऊर्जा स्त्रोत म्हणून ती एक चांगला पर्याय बनते.

  • ‘LinkedIn’ ची सुरुवात कशी झाली?

    ‘LinkedIn’ ची सुरुवात कशी झाली?

    हा प्लॅटफॉर्म  इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतरांशी तुलना केल्यास वेगळा आढळून येतो. काळाच्या ओघात याचे महत्त्व वाढतच चालले आहे. काय आहे यामागची स्टोरी आणि कशी झाली याची सुरुवात हेच जाणून घेऊयात या लेखाच्या माध्यमातून.

    ‘LinkedIn’ ची सुरुवात – 

    ‘LinkedIn’ अधिकृतपणे 5 मे 2003 ला लाँच करण्यात आले, पण त्याची खरी  सुरुवात 2002 मध्येच झाली होती. रीड हॉफमॅन यांनी आपल्या लिविंग रूम मध्ये LinkedIn ची सुरुवात केली.  हॉफमॅन यांच्यासोबत त्यांचे पे-पल आणि सोशल नेट कंपनीतील सहकारी होते. त्यांचा हा प्लॅटफॉर्म सुरु करण्याचा मूळ उद्देश प्रोफेशनल विश्वातील लोकांची एकमेकांशी ओळख व्हावी,  या माध्यमातून ते जोडले जावेत आणि त्यांचा एकमेकांना फायदा व्हावा असा होता. 

    the-story-of-linkdin-reid-hoffman-cofounder-of-linkdin

    चार वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर लिंक्डइनला हळूहळू ओळख मिळून प्रसिद्धी वाढू लागली. 2008 मध्ये लिंक्डइन स्पेन. यु.के आणि फ्रान्समध्ये वापरले जाऊ लागले. त्याच वर्षी त्यांच्या युजर्सच्या आकड्याने उच्चांक गाठला आणि तो 15 मिलियन पर्यंत (१.५ कोटींपर्यंत) पोहोचला. 2011 येईपर्यंत युजर्सचा हा आलेख वेगाने वाढतच गेला आणि कंपनीच्या युझर्सची संख्या 15 पासून 100 मिलियन (१० कोटींपर्यंत) पोहोचली. 2013 मध्ये LinkedIn सुरु करून 10 वर्षे पूर्ण झाली. युजर्सची होत जाणारी वाढ हा योग्य फीचर्स आणि वेळोवेळी केलेल्या बदलांचा परिणाम होता. त्यानंतर त्यांनी नुकतेच ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी आणि चांगल्या जॉब च्या शोधात असणारे तरूण यांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात  केली. यामुळे त्यांच्या यशात आणखी भर पडत गेली.  2016 मध्ये मायक्रोसॉफ्ट ने LinkedIn $26 बिलियन ला विकत घेतले. 2017 मध्ये LinkedIn  ने डेस्क2 साठी नवीन फिचर सुरु केले आणि 2019 मध्ये आणखी काही फीचर्सची वाढ करून LinkedIn ने स्व त:ला परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न केला. 

    LinkedIn ची सध्याची परिस्थिती 

    LinkedIn च्या आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांत प्लॅटफॉर्मची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. हे जागतिक स्तरावर  युझर्सच्या बाबतीत अव्वल आहे, त्यातले बहुतेक व्यावसायिक आहेत. आणि प्रत्येक आठवड्यात दहा लाखांहून अधिक नवीन वापरकर्ते सामील होत आहेत.

    Linkdin

    Linkedin बद्दल महत्त्वाच्या बाबी 

    70% पेक्षा जास्त युजर्स यूएस बाहेरील आहेत.

    90 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते वरिष्ठ-स्तरीय आहेत आणि 63 दशलक्ष निर्णय घेण्याच्या पदांवर आहेत.

    50% पेक्षा जास्त  वापरकर्ते महाविद्यालयीन पदवीधारक  किंवा सुशिक्षित तरूण आहेत.

    24% युजर्स  18-24 वर्षे वयोगटातील लोक आहेत. 

    the-story-of-linkdin-reid-hoffman-cofounder-of-linkdin


    आणखी वाचा

  • भारतीयांची घरं आणि दारं सुरक्षित ठेवण्याच काम यांच्या कुलूपांनी केलं – अर्देशीर गोदरेज

    भारतीयांची घरं आणि दारं सुरक्षित ठेवण्याच काम यांच्या कुलूपांनी केलं – अर्देशीर गोदरेज

    चला तर आजच्या भागात जाणून घेऊ गोदरेजच्या कपाटबंद जन्माची ही कहाणी. 

    अर्देशीर गोदरेज यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच 1868 मध्ये मुंबई प्रांतात बुरजोरजी आणि दोसीबाई गुठरजी या पारशी दाम्पत्त्याच्या पोटी एका सधन कुटुंबात झाला. त्यांना सहा अपत्ये. अर्देशीर सगळ्यात मोठा मुलगा. बुरजोरजी आणि त्यांच्या वडीलांचा बांधकाम क्षेत्रात व्यवसाय होता. १८७१ साली या कुटुंबाने गोदरेज हे आडनाव स्वीकारले.

    लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या अर्देशीरने पुढे जाऊन वकिलीचा अभ्यास केला. वकिलीची पदवी मिळाल्यानंतर त्यांनी अनेक खटले लढवले, अनेक केसेस सोडविल्या. मात्र झांझिबार येथील एका खटल्यादरम्यान त्यांनी आपली वकिली सोडली व ते परत मुंबईत आले.  

    इतर पारशी उद्योजकांप्रमाणे त्यांनाही व्यवसायात आपले नशीब आजमवायचे होतं. मात्र उपजीविकेसाठी त्यांनी एका फार्मसीत सहाय्यक म्हणून काम करायचे ठरवले. तिथे मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर शस्त्रक्रियेसाठी लागणारी सामग्री बनवण्याचा व्यवसाय करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. पारशी समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व “मेरवानजी कामा” यांच्याकडून त्यांनी व्यवसायासाठी कर्ज मागितले. मेरवानजींनी विचारले, “घरी वडिलांना पैसे मागायचे सोडून माझ्याकडे का आला?”  त्यावर अर्देशीर म्हणाले, “मी घरी पैसे मागितले असते, तर वडिलांनी दिले नसते असे नाही, पण वडिलांनी कर्ज म्हणून पैसे दिले नसते, तर मुलासाठी द्यायचे म्हणून स्वखुशीने  दिले असते आणि अर्देशिर यांच्या स्वाभिमानी मनाला ते काही पटणारे नव्हते. १९१८ साली वडिलांचे निधन झाल्यावर ‘त्यांच्या संपत्तीवर माझा हक्क नाही’ असं सांगताना अर्देशीर यांचा हाच करारीपणा पुन्हा एकदा दिसला.    

    ardeshir-godrej-the-lockmaker-of-india

    गोदरेजची ही गाडी केवळ कुलुपांवरच थांबली नाही, तर तिला खूप मोठा पल्ला गाठायचा होता.  १९०१ साली अर्देशीर यांनी तिजोरी बनवायचा निर्णय घेतला. त्यांना इतकी सुरक्षित तिजोरी बनवायची होती कि, जी फोडता येणार नाही आणि आगीपासूनही ती सुरक्षित असेल. डझनभर डिझाइन्स बनवून झाल्यावर 1902 साली गोदरेजची पहिली तिजोरी बाजारात आली आणि प्रत्येक भारतीयाच्या घरात या तिजोरीच्या रूपाने एक सुरक्षारक्षकच अवतरला. मौल्यवान वस्तूंचा तो दणकट पहारेकरी बनला. 

    १९०५ मध्ये भारतभेटीवर आलेल्या इंग्लंडच्या राणीने देखील आपले मौल्यवान सामान सुरक्षित राहण्यासाठी गोदरेजच्या तिजोरीला प्राधान्य दिले आणि ही एक प्रकारे गोदरेजच्या दर्जाला मिळालेली पोचपावतीच ठरली. ही तिजोरी चोरांपासूनच नाही, तर आगीपासूनही सुरक्षित होती. १९४४ साली मुंबईच्या इतिहासातील सर्वात भीषण मुंबई गोदीतील आगीत प्रचंड वित्तहानी आणि जीवितहानी झाली, पण गोदरेज कपाटाच्या तिजोरीतील मौल्यवान वस्तू, कागदपत्रं मात्र आगीच्या झळांपासून सहीसलामत वाचले होते आणि ही घटना गोदरेजसाठी निर्णायक टप्पा ठरली. या घटनेनंतर गोदरेज कपाटांनी भारतीयांच्या मनात जे अढळ स्थान प्राप्त केले ते कायमचे. त्यामुळेच आज कपाट म्हटलं कि डोळ्यासमोर उभे राहते ते केवळ गोदरेजचेच. कपाटाला ‘गोदरेज’ हा जणू प्रतिशब्दच तयार झाला.

    ardeshir-godrej-the-lockmaker-of-india

    अर्देशीर गोदरेज यांचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंध होता. पण त्यांचे स्वदेशीबद्दलचे मत लक्षात घेण्याजोगे होते. केवळ वस्तू स्वदेशी आहे म्हणून तिला चांगले म्हणण्याची सक्ती नको. ती दर्जाच्या बाबतीतही उत्तम असली पाहिजे. असे त्यांचे मत होते. भारतीय घराघरांत दाराला गोदरेज कुलूप आणि आत गोदरेज कपाट हे समीकरण अभेद्य होते.

    1910 मध्ये गोदरेजचा हा सगळा डोलारा धाकटा भाऊ पिरोजशा याला सांभाळायला सांगून अर्देशिर युरोप दौऱ्यावर गेले. युरोपातील नावीन्यपूर्ण गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी गोदरेजमध्ये बदल केले.  1928 साली अर्देशिर यांनी सगळा व्यवसाय धाकट्या पिरोजशाच्या हाती सोपविला आणि ते नाशिकला गेले. 

    भारताच्या इतिहासातील अनेक घडामोडींचा अर्देशिर यांचा गोदरेज ब्रॅण्ड हा साक्षीदार आहे. १९५१ साली स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या लोकशाही निवडणुकांत मतदारांचं बहुमूल्य मत कोणाला मिळाले आहे हे पण सर्वात आधी गोदरेजलाच माहीत होते, कारण ती मते जपून ठेवणाऱ्या मतपेटय़ा गोदरेजच्याच होत्या. या साऱ्याचे रहस्य एकच होते, उत्तम दर्जा. १९५८ साली कंपनीने भारतातील पहिला फ्रिज सुद्धा बनवला होता. 

    ardeshir-godrej-the-lockmaker-of-india

    अर्देशिर यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान हे खूप मोठे होते. स्वदेशी उत्पादनासाठी त्यांनी घेतलेली ठोस भूमिका महत्त्वाची होती. गोदरेजला केवळ कंपनी म्हणून नाही, तर भारतीय ग्राहकांच्या घराघरात नेऊन ठेवण्यापर्यंत विश्वास कमविणारा असा हा ब्रॅंडेड उद्योजक 1936 साली गोदरेजचा बलाढ्य कारभार वयाच्या 68 व्या वर्षी मागे सोडून जगातून निघून गेला. 

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी


    आणखी वाचा

  • 1 जानेवारीला नवीन वर्ष का साजरे करतात? जाणून घ्या इतिहास आणि रहस्ये

    1 जानेवारीला नवीन वर्ष का साजरे करतात? जाणून घ्या इतिहास आणि रहस्ये

    नमस्कार Wishing you a very Happy New Year हो हो आम्हाला माहितीये की New Year सुरु व्हायला काही तास बाकी आहेत पण म्हटलं आता तुम्हाला सगळीकडून New Year Wishes चे Calls, Messages यायला सुरुवात होईल आणि परत तुम्ही Busy होऊन जाल त्यापेक्षा आमच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला Advance मध्ये New Year च्या शुभेच्छा देऊन ठेवलेल्या बऱ्या. काही तासांतच आता नवीन वर्षाला सुरुवात होतीये त्यामुळं आम्ही ठरवलं की नवीन वर्षात पहिला लेख हा नवीन वर्षावरंच बनवला तर तुम्हालाही तो पाहायला आवडेल.

    आता मला सांगा तुम्ही कधी विचार केलाय का, की 1 जानेवारीपासूनच हे नवं वर्ष का सुरू होतं? वर्षात नेहमी 364 किंवा 365 दिवस आणि 12 महिनेच का असतात? वर्षाला 12 महिने देण्यात हिंदू Calendars ची काही भूमिका आहे का? हिंदू, रोमन रिपब्लिकन आणि ग्रेगॅरियन कॅलेंडर केव्हा आलं? अशा काही प्रश्नांची उत्तर आपण या लेखातून जाणून घेऊया.

    Calender च्या बाबतीत बोलायचं झालं तर आधी हिंदू मग रोमन रिपब्लिकन,  ज्यूलियन आणि त्यानंतर ग्रेगॅरियन कॅलेंडर आलं. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया हिंदू Calendars बाबत. हिंदू कॅलेंडरद्वारे तारखांचा वापर भारतात इसवी सन पूर्व 1000 वर्षांपासून केला जातोय. याचा उपयोग हिंदू धार्मिक वर्ष ठरवण्यासाठी केला जातो. हे Calendars 12 चांद्र म्हणजेच Lunar Months वर आधारित आहे. हिंदू कॅलेंडरमध्ये Lunar Year नेहमीच 354 दिवसांचं, तर Solar Year 365 दिवसांचं असतं. प्रत्येक महिन्यात प्रत्येकी 15 दिवसांचे दोन पक्ष असतात. कधी तरी दोन तिथी एकाच दिवशी येतात. अशा परिस्थितीत, वर्षातल्या दिवसांची संख्या संतुलित करण्यासाठी असतो तो अधिक मास.

    हिंदू कॅलेंडरनंतर रोमन रिपब्लिकन कॅलेंडर इसवी सन पूर्व 738 मध्ये प्रचलित झालं. हे कॅलेंडर सुरुवातीला रोममध्ये प्रचलित होतं. त्यापूर्वी ग्रीक Lunar कॅलेंडर इसवी सन पूर्व 800 मध्ये ग्रीसमध्ये प्रचलित होतं. या कॅलेंडरमध्ये 354 दिवसांचं Lunar Year आणि 365 दिवसांचं Solar Year असल्यानं नवीन खगोलशास्त्रीय गणनांऐवजी ती थेट हिंदू कॅलेंडरला धरून केली गेली, असं मानलं जातं.

    सुरुवातीच्या रोमन कॅलेंडरमध्ये 10 महिन्यांचं वर्ष व फक्त 304 दिवस होते. यामध्ये 61 दिवस दुर्लक्षित करण्यात आले होते. त्यामुळे ऋतूंच्या महिन्यात फरक पडत होता. या कॅलेंडरमध्ये मार्टिस, एप्रिलिस, माइस, जुनिस, क्विंटिलीस, सेक्सटिलिस, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर अशी महिन्यांची नावं होती.

    बर्‍याच काळानंतर, इसपू ७१५ ते ६७२ या काळात रोमचा शासक असणाऱ्या नुमा पोम्पीलिअस याने हे कॅलेंडर बदललं. त्यामध्ये जानेवारी हा पहिला आणि फेब्रुवारी हा शेवटचा महिना म्हणून जोडला गेला. पुढे इसवी सन पूर्व 452 मध्ये फेब्रुवारी हा महिना जानेवारी ते मार्च या दोन महिन्यांच्या दरम्यान आणला गेला. इ. स. पूर्व पहिल्या शतकात रोमन कॅलेंडर खूप गोंधळात टाकणारं बनलं होतं. शेवटी, ज्युलियस सीझरने इसवी सन पूर्व 46 मध्ये या कॅलेंडरमध्ये मोठ्या सुधारणा केल्या. त्यामुळे तारखांची नवीन System Generate झाली. या नवीन कॅलेंडरला ‘ज्यूलियन कॅलेंडर’ असं नाव देण्यात आलं. Solar Year ची संकल्पना स्वीकारून ज्युलियसने वर्षातल्या दिवसांची संख्या 445 पर्यंत वाढवली. यामुळेही बराच गोंधळ निर्माण झाला आणि इसवी सन पूर्व 8 पर्यंत त्याचा म्हणावा असा उपयोग होऊ शकला नाही.

    पोप ग्रेगरी यांनी इसवी सण 1582 मध्ये जूलियस सीजरने तयार केलेल्या कॅलेंडरमधील लीप वर्षांची चूक शोधली आणि दर चार वर्षांनी एक Extra Day म्हणजेच Leap Day या Calendars मध्ये Add केला. जूलियस सीजरने ज्याप्रमाणे त्याने केलेल्या Calendars ला नाव दिलं, तसं पोप यांना सुद्धा आपण बनवलेल्या Calendars ला काहीतरी नाव द्यावं असं वाटलं आणि म्हणूनच त्यांनी या कॅलेंडरला नाव दिलं ‘ग्रेगरियन कॅलेंडर’.

    चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा ही हिंदू नववर्षाची सुरुवात मानली जाते. त्याला ‘हिंदू नवसंवत्सर’ असंही म्हणतात. इस्लामिक कॅलेंडरनुसार, हिजरी नवीन वर्ष मोहरम महिन्याच्या पहिल्या दिवशी सुरू होतं, तर आपले ख्रिस्ती बांधव 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरं करतात. धर्मानुसार पाहायला गेलं, तर प्रत्येक धर्माचं नवीन वर्ष हे वेगवेगळ्या दिवशी सुरु होतं, पण उत्सव हा सगळ्यांनी सोबत येऊन साजरा करायचा असतो. त्यामुळे धर्म थोडा बाजूला ठेऊन सर्वजण माणूस म्हणून एकत्र येऊया आणि या नववर्षाचं स्वागत धुमधडाक्यात करूया.