प्रिय गुरुजी,
सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात,
नसतात सगळीच सत्यनिष्ठ,
हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी.
मात्र त्याला हे देखील शिकवा,
जगात प्रत्येक बदमाषागणिक
असतो एक साधूचरित, पुरुषोत्तमही
स्वार्थी राजकारणी असतात जगात,
तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही.
असतात टपलेले वैरी, तसे जपणारे मित्रही,
मला माहित आहे !
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत.........
तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा,
घाम गाळून कमावलेला एकच छदाम,
आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.
हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला,
तुमच्यात शक्ती असती तर .........
त्याला द्वेष मत्सरापासून दूर रहायला शिकवा
आणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला.
गुंडांना भीत जावू नको म्हणावं,
त्यांना नमविणे सर्वात सोपं असतं.
जमेल तेवढं दाखवित चला त्याला,
ग्रंथ भांडाराच अदभूत वैभव.
मात्र त्याबरोबरच,
मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा,
सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला,
पाहू दे त्याला,
पक्षांची अस्मान भरारी ............
सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर ..........
आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं......
शाळेत त्याला हा धडा मिळू दे,
फसवून मिळालेल्या यशापेक्षा,
सरळ आलेल अपयश श्रेयस्कर आहे .
आपल्या कल्पना, आपले विचार,
यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने,
बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी,
त्याला सांगा ................
भल्याशी भलाईनं वागावं,
आणि टग्यांना अद्दल घडवावी .
माझ्या मुलाला हे पटवता आल तर पहा .........
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत,
सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी,
पुढे हेही सांगा त्याला,
ऐकावं जनाच अगदी सर्वांच ...........
पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून,
आणि फोलपट टाकून निव्वळ सत्व तेवढं स्वीकाराव.
जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा,
हसत रहावं उरातल दुःख दाबून,
आणि म्हणावं त्याला
आसवांची लाज वाटू देऊ नको.
त्याला शिकवा .........
तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला,
अन चाटुगिरीपासून सावध रहायला.
त्याला हे पुरेपूर समजवा की,
करावी कमाल कमाई त्याने,
ताकद आणि अक्कल विकून,
पण कधीही विक्रय करू नये,
हृदयाचा आणि आत्म्याचा.
धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर,
कानाडोळा करायला शिकवा त्याला.
आणि ठसवा त्याच्या मनावर,
जे सत्य आणि न्याय वाटते,
त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.
त्याला ममतेनं वागवा,
पण, लाडावून ठेवू नका.
आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
लोखंडाच कणखर पोलाद होत नसतं,
त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य,
अन धरला पाहिजे धीर त्याने,
जर गाजवायच असेल शौर्य .
आणखीही एक सांगत रहा त्याला ..........
आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर,
तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर,
माफ करा गुरुजी,
मी फार बोलतो आहे
खूप काही मागतो आहे.........
पण पहा........
जमेल तेवढ अवश्य कराच,
माझा मुलगा, भलताच गोड छोकरा आहे हो तो !!!
- अब्राहम लिंकन
Leave a Reply