Category: लेख

  • ऑनलाइन पेमेंट करताना भीती वाटते? या टिप्स नक्की फॉलो करा.

    ऑनलाइन पेमेंट करताना भीती वाटते? या टिप्स नक्की फॉलो करा.

    हल्ली एका क्लिकवरुन आपण लाखो रुपयांची उलाढाल करू शकतो. १०-१५ वर्षांपूर्वी तशी परिस्थिती नव्हती. बँकेत दिवसभर रांगेत उभं राहूनही पैसे मिळतीलच याची खात्री नव्हती. पण आत्ता सगळं कसं सोयीस्कर झालंय.

    हल्ली क्षणार्धात एका अकाऊंटवरचे पैसे दुसऱ्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होतात. पण हे ऑनलाइन पेमेंट करायचं म्हणजे अनेकांना जरा risky च काम वाटतं. हा म्हणजे भीती वाटणं सहाजिकच आहे म्हणा, कारण बऱ्याच ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून फ्रॉडच्या फसवणुकीच्या बातम्या कानावर पडत असतात.

    मग अशावेळी आपण काय केलं पाहिजे. चला तर पाहूया…

    बऱ्याचदा आपण एखाद्या कमी विश्वासार्ह किंवा फेक लिंकवर जाऊन वस्तू खरेदी करतो. अरे हा ड्रेस किती सुंदर आहे आणि स्वस्त पण आहे, चला घेऊन टाकू असं म्हणून लगेच ते प्रॉडक्ट आपण खरेदी करतो. आणि यात महिलावर्गाचे प्रमाण थोडे जास्तच असते. मैत्रिणींनो कपड्यांच्या दुकानात गेलात तरी तुम्ही पारखून कपडे विकत घेता, मग ऑनलाइन कपडे घेताना मात्र कशा फसता बरं? कोणतीही वस्तू ऑनलाइन विकत घेताना जिथून तुम्ही ऑर्डर करणार आहात त्या साईटची आधी माहिती घ्या. तिथले  reviews चेक करा. फेसबुकला कोणीतरी काहीतरी टाकलंय, केवळ insta वर फोटो छान दिसतायत म्हणून ऑर्डर करू नका. त्यांची verified website आहे का ते पहा, त्यांचं app आहे का ते पहा. त्यांच्याकडे cash on delivery हा ऑप्शन आहे का ते पहा. अर्धवट महिती शिवाय कधीच, काहीच बूक करू नका आणि payment तर अजिबातच करू नका.    

    दूसरा मुद्दा म्हणजे

    बऱ्याचदा आपल्या फोन मधील नेट संपल्यावर आपण दुसऱ्यांचं वायफाय घेतो. पण हे असं दुसऱ्यांचं वायफाय वापरण्याच्या नादात कधी तुमचा फोन हॅक होईल सांगता सुद्धा यायचं नाही. दुसऱ्याचं वायफाय किंवा सार्वजनिक कॉम्प्युटर वापरल्यामुळे तुमचे डॉक्युमेंट आणि पासवर्ड चोरले जाण्याचीही शक्यता असते. त्यामुळे केवळ आर्थिक व्यवहारच नव्हे, तर स्वतःची जी काही personal कामं असतील ती फक्त स्वतःच्या वायफाय आणि कॉम्प्युटरवरच करावीत.

    कार्ड सेव्ह करू नका:

    ऑनलाईन खरेदी करताना अनेकजण डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करतात. याचं मुख्य कारण म्हणजे कार्डवर मिळणाऱ्या विविध ऑफर्स. एखादे प्रॉडक्ट खरेदी करताना Save card for future किंवा save card details अशा प्रकारचे ऑप्शन असणारी टिकमार्क काढून टाकायची विसरतात किंवा next order च्यावेळी कार्डचे डिटेल्स भरायचा त्रास वाचण्यासाठी save करतात. परंतु हे टाळले पाहिजे, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. याचबरोबर ब्राउझरमध्ये असणारी ऑटोफिल सुविधा देखील आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत बंद केली पाहिजे. यामुळे कदाचित सगळी माहिती भरण्याचे कष्ट करावे लागतील, परंतु ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित होतील.                                                                                                              

    अनेकदा बँक, क्रेडिट कार्ड किंवा इन्शुरन्स कंपनीकडून महत्वाचे मेल येतात. त्यामध्ये एखादी ऑफर किंवा केवायसी संबंधित माहिती विचारली जाते. संबंधित विषयाच्या अधिक माहितीसाठी किंवा ऑफर मिळविण्यासाठी त्यामध्ये एक लिंक दिली जाते. सवलत देणाऱ्या जाहिरातींकडे आपण लगेच attract होतो. पण लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावधान! हा फिशिंगचा प्रकार असू शकतो. हा मेल फसवा असू शकतो. त्यामुळे कोणत्याही मेलमध्ये आलेली लिंक क्लिक करण्यापूर्वी आलेला मेल अधिकृत कंपनीकडून आल्याची खात्री करून घ्या किंवा आलेल्या offer संदर्भात आपल्या बँकेकडे चौकशी करा.                  

    क्यूआर कोड स्कॅन करतानाही आवश्यक ती काळजी घ्या. खात्रीशीर दुकानांमध्येच क्यूआर कोड स्कॅन करा. काहीवेळेस असे देखील घडते की, क्यूआर कोड स्कॅन केल्यास तुमच्या बँक खात्याची संपूर्ण history हॅकरकडे जाऊ शकते. त्यामुळे अनोळखी व संशयित वाटणारा क्यूआर कोड अजिबात स्कॅन करू नका. त्यामुळे एका विशिष्ट रकमेपेक्षा जास्त रक्कमही तुमच्या अकाऊंट मधून कट होऊ शकते.

    तर मग यापुढे ऑनलाईन पेमेंट करताना या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा आणि निश्चिंत राहा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • Wedding Insurance I लग्नाचाही काढता येतो इन्शुरन्स, लग्न लांबणीवर पडल्यास पैसे परत

    Wedding Insurance I लग्नाचाही काढता येतो इन्शुरन्स, लग्न लांबणीवर पडल्यास पैसे परत

    नमस्कार मित्रांनो… आपण नेहमी स्टार्टअप टर्म्स, बिझनेस आयडिया, tech news अशा अनेक विषयांवर बोलत असतो. आज थोडं आपण finance Wedding Insurance विषयावर बोलूया. नुकताच घडलेला एक किस्सा. मागच्या महिन्यात माझ्या एका मैत्रिणीचं लग्न झालं, ती आहे CA. तिचा नवरा देखील CA. आता दोघंही CA म्हणजे बक्कळ पैसा. त्यामुळं लग्नदेखील अगदी धुमधडाक्यात झालं. मात्र लग्नात दुर्दैवाने तिचे ७ लाखांचे दागिने चोरीला गेले. पोलिसांनी चोराला खूप शोधलं, पण अजून काही तो चोर सापडला नाही.

    भरमंडपात 7 लाखांचं नुकसान. बिच्चारी… पण तिला माझ्याइतकं वाटलं नाही. कारण तिने wedding insurance काढला होता. आत्तापर्यंत health insurance, life insurance, home insurance ऐकलं होतं, ही wedding insurance ची नवीन भानगड या चोरीच्या निमित्ताने समजली.

    तर तिच्याशी या विषयावर जरा सविस्तर बोलल्यावर कळलं की, आपण लग्नाचाही insurance काढू शकतो म्हणे. तसं भारतात याचं प्रमाण जास्त नाहीये, मात्र परदेशात जवळपास सगळेच हा Wedding Insurance काढतात.

    साधारणतः लग्नात आपण आधीच वेडिंग हॉलचे, फोटोग्राफरचे, invitation cards, जेवणाचे अशा सगळ्याच गोष्टींचे पैसे आपण आधीच देऊन टाकतो, पण if in case कोणत्यातरी कारणावरून तुमचं लग्न जर postponed झालं तर? किंवा कोणत्यातरी कारणावरून लग्नच cancel झालं तर? देव न करो कोणाच्याही बाबतीत असं न घडो, पण मित्रांनो जरा थोडा डोक्याला ताण द्या आणि विचार करा. जर लग्न cancel झालं, तर तुम्ही आधी दिलेले पैसे तर फुकटच गेले ना. एकदा गेलेले पैसे आपल्याला थोडीच मिळणार आहेत. अशावेळी हा wedding insurance च आपल्याला मदत करतो. तुमचं झालेलं नुकसान हा insurance भरून काढतो.

    Wedding Insurance चं coverage केव्हा आणि कोणत्या निकषांवर मिळू शकतं?

    तर काही गुन्हेगारी घटनांमुळे विवाहस्थळाचे नुकसान झाले असेल किंवा लग्नात दागिने, कपडे किंवा इतर कोणत्याही मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या असतील, तर त्याची भरपाई हा Insurance भरून काढतो. तसेच जर पाऊस, वादळ किंवा भूकंपामुळे लग्नाचा कार्यक्रम रद्द झाला असेल, तर त्याची भरपाईही हा Insurance करतो. आता कंपन्या Wedding Insurance मध्ये वैयक्तिक अपघातांचाही समावेश करत आहेत. आश्चर्य म्हणजे यामध्ये तुम्ही वऱ्हाडी लोकांचाही विमा काढू शकता. मात्र जर तुम्ही स्वतःहून काही कारणास्तव लग्न cancel केलं, तर तुम्हाला Insurance मिळू शकतं नाही. तसेच जर संप, आंदोलन, दहशदवादी हल्ला, नवरा-नवरीचे अपहरण किंवा तुमच्या निष्काळजीपणामुळे एखाद्या वस्तूचे नुकसान झाले असेल तरी तुम्हाला insurance covarage मिळू शकणार नाही. त्यामुळे लग्नकार्यात थोडं सांभाळूनच. 

    तर आता पाहूया हा insurance मंजूर होण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत?

    पहिल्यांदा तुम्हाला लग्नासाठीच्या एकूण खर्चाचा आराखडा कंपनीला द्यावा लागतो. कंपनीला म्हणजे ज्यांच्याकडून तुम्ही Insurance घेतलाय त्यांना. लग्नस्थळाची माहिती किंवा ज्याकाही बुकिंगच्या पावत्या असतील, त्या सगळ्या आधीच कंपनीला द्याव्या लागतात. क्लेमसाठी आगोदरच सर्व documents ची पूर्तता करून अर्ज भरावा लागतो. तसेच सोहळ्यात जर चोरीची घटना घडली, तर पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदवावी लागते. FIR ची कॉपी कंपनीला सादर करावी लागते, तसेच लग्नाचा बेत cancel झाला तर कंपनीचे प्रतिनिधी स्वतः येऊन संपूर्ण शहानिशा करूनच Insurance Coverage मंजूर करतात.  

    या insurance चा खर्च हा, तुम्ही कोणती योजना निवडता यावर अवलंबून असतो. Insurance मध्ये जितक्या जास्त गोष्टी कव्हर केल्या जातील, तितका त्याचा हप्ता वाढत जातो. उदाहरणार्थ, समजा तुम्ही १० लाख रुपयांचा विवाह विमा घेतला असेल तर यासाठी तुम्हाला ७५०० ते १५ हजार पर्यंतचा प्रीमियम भरावा लागेल. लग्नखर्च अगदी १ लाखांचा असो वा ५० लाखांचा. तुम्ही तुम्हाला हवी ती पॉलिसी घेऊ शकता. कोणतेही नुकसान झाले, तर तुम्हाला १०० टक्के रक्कम परत मिळू शकते. ICICI लोम्बार्ड, बजाज Allianz आणि Oriental Insurance सह अनेक कंपन्या wedding insurance ची सेवा पुरवतात. या कंपन्यांकडे वेगवेगळे पॅकेजेस देखील असतात. काही insurance कंपन्यांकडे लग्नाच्या 15 दिवस आधी सुरु होणाऱ्या पॉलिसीदेखील उपलब्ध आहेत, तर काहीकांडे लग्नाच्या २४ तास आधी सुरु होणाऱ्या पॉलिसी देखील उपलब्ध आहेत.

    भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी आधीच खबरदारी घेणं चांगलं असतं. त्यामुळे लग्नाचा बार उडवायचा विचार करत असाल; तर आधी विवाह विमा नक्कीच घ्या!

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा
  • सरकार विकतंय स्वस्तात सोनं | Gold Investment Options in India

    सरकार विकतंय स्वस्तात सोनं | Gold Investment Options in India

    तुम्हाला सोनं खरेदी करायला आवडतं का? आत्ता नुकतीच अक्षय्य तृतीया देखील झाली. या दिवशी तुम्ही काहीतरी सुवर्ण खरेदी केलीच असेल, पण आजकाल सोन्याच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की विचारायची सोय नाही, पण मी आज तुम्हाला अशा एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहे, ज्यातून आपण स्वस्तात सोनं खरेदी करू शकतो (Gold Investment.)

    तुम्हाला माहिती आहे का की, भारत जगातील सर्वांत मोठी सोन्याची बाजारपेठ आहे. भारतातच सर्वांत जास्त दागिने विकले जातात. आपण जन्माला आल्यापासून आपल्या अंगावर सोन्याचा एखादा तरी दागिना असतोच. सोनं भौतिक स्वरूपात म्हणजे दागिने, बिस्किट किंवा नाणी या  स्वरूपात ठेवायला आपल्याला आवडतं, नाही का? पण बदलत्या काळानुसार सोने खरेदी आणि सोन्यातील गुंतवणूक करण्याची पद्धत सुद्धा आता बदलली आहेत. सध्या सोन्यातील गुंतवणुकीचा सुरक्षित आणि चांगला परतावा मिळविण्यासाठी सार्वभौम सुवर्ण रोखे किंवा गोल्ड इटीएफ आणि असे अनेक चांगले पर्याय आहेत.

    2013 मध्ये सोन्याचा दर 28,000 दरम्यान होता, तोच दर आत्ताच्या घडीला ६१८०० रुपये इतका वाढला आहे. आणखी काही वर्षांनी हाच दर लाखांच्या घरात देखील जाऊ शकतो. त्यामुळे सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक वाया जाणार नाही. तर आता बघुयात सोन्यामध्ये गुंतवणुकीचे (Gold Investment) कोणते आधुनिक पर्याय उपलब्ध आहेत ते….

    पहिला पर्याय म्हणजे

    गोल्ड कॉईन :

    आपण दागिने खरेदी करताना त्यावर मेकिंग चार्ज लागतो, पण गोल्ड कॉईन खरेदीवर मेकिंग चार्ज कमी असतो. त्यामुळे दागिन्यांच्या तुलनेत सोन्याची नाणी स्वस्त पडतात. तसेच सोन्याची नाणी दागिन्यांप्रमाणे कालांतराने काळी पडत नाहीत. तसेच गोल्ड कॉइन खरेदीमध्ये भेसळीची शक्यता कमी असते. साधारणत: 0.5 ग्रॅम ते 50 ग्रॅम पर्यंत गोल्ड कॉईन बाजारात उपलब्ध असतात. ही नाणी तुम्ही बँक, सराफा दुकानदार किंवा मुथूट सारख्या वित्तीय कंपनीकडुन खरेदी करू शकता. मात्र बँकेकडून सोन्याची नाणी खरेदी करणे टाळले पाहिजे. कारण तुम्ही ही नाणी बँकेला परत विकू शकत नाही.

    गोल्ड ETF

    गोल्ड ETF म्हणजे Gold Exchange Traded Fund. याला कागदी सोनं किंवा पेपर गोल्डसुद्धा म्हणू शकतो. ही गुंतवणूक शेअर मार्केटशी मिळतीजुळती असते. जसे आपण शेअर खरेदी करतो तसे इथे DMAT अकाऊंट काढून तुम्ही गोल्ड खरेदी करू शकता. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या किंमतीप्रमाणे या फंडची किंमत बदलत असते. यामध्ये प्रत्यक्ष सोने खरेदी आणि देखभाल करण्याची गरज उरत नाही तसेच दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास चांगला परतावाही मिळतो. गोल्ड ईटीएफचा वापर कर्ज घेण्यासाठी सुरक्षा म्हणूनही केला जाऊ शकतो. यामध्ये प्रत्यक्ष सोन्याच्या तुलनेत खरेदी शुल्क कमी आहे, तर १०० टक्के शुद्धतेची हमी दिली जाते.

    गोल्ड म्युच्युअल फंड:

    गोल्ड म्युच्युअल फंड हे सोन्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या गुंतवणूक करतात. ते अशा कंपन्यांच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात ज्या खाणीतून सोने खणणे, त्यावर प्रक्रिया करणे, घडवणे आणि वितरण करणे अशी कामे करतात. याची सुरुवात तुम्ही कमीतकमी 500 रुपयांपासून करू शकता. बाजारातील चढ उतारानुसार तुम्हाला यातून परतावा मिळू शकतो. 

    सोवेरन गोल्ड बॉन्ड:

    केंद्र सरकारने नोव्हेंबर, 2015 साली सोवेरन गोल्ड बॉन्ड या योजनेची सुरुवात केली. यामध्ये तुम्हाला प्रत्यक्षरित्या सोनं मिळतं नाही तर बॉन्ड स्वरूपात सोनं मिळतं. या बॉन्डची एक ठरलेली किंमत असते. यावेळी याची किंमत 5,611 प्रतिग्रॅम इतकी ठरवण्यात आलेली आहे. हे बॉन्ड आठ वर्षांत मॅच्युअर होतात. म्हणजेच त्यानुसार आठ वर्षांनंतर बाँड परत केल्यानंतर तेव्हा सोन्याचा जो भाव असतो, तेवढी रक्कम परत मिळते. दरवर्षी 2.5 टक्के व्याजही तुम्हाला मिळत जातं. हे व्याज दोन भागात सहा-सहा वर्षांच्या फरकाने मिळत जाते. हे बॉण्ड्स तुम्ही बँक, HSCIL ऑफिस, पोस्ट ऑफिस आणि एजंट्सकडून फॉर्म घेऊन विकत घेऊ शकता किंवा RBI ची वेबसाईट आणि बँकांतून ऑनलाईन अर्ज भरून तुम्ही फॉर्म विकत घेऊ शकता.

    या योजनेअंतर्गत तुम्ही वैयक्तिक एका वर्षात एक ग्रॅमपासून ते जास्तीत जास्त चार किलो सोन्यात गुंतवणूक करू शकता. संस्था किंवा कंपन्या 20 किलोपर्यंत गुंतवणूक करू शकतात.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • सुखी व यशस्वी आयुष्याचे तीन स्तंभ

    सुखी व यशस्वी आयुष्याचे तीन स्तंभ

    जन्म आणि मृत्यू या दोन घटनांमधील प्रवास म्हणजे जीवन. प्रत्येकाचं जीवनात सुखी व यशस्वी होणं हे लक्ष्य असतं व प्रत्येकजण त्यासाठी धडपडत असतो, प्रयत्न करत असतो. जीवनात यशस्वी असणं व सुखी असणं हे दोन वेगवेगळे भाग आहेत.

    सुखी असण्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे अर्थ असू शकतात, मग मनुष्य श्रीमंत असो वा गरीब. उदा. आज पैशाला खूप महत्त्व आले आहे. असे म्हणतात की ज्याच्याजवळ पैसा आहे तोच सुखी, परंतु तुम्ही खेड्यापाड्यात जा, गरीब शेतकरी, किंवा जंगलात राहणारा आदिवासी पहा तो देखील आपल्या आयुष्यात सुखी आहे. त्यामुळे प्रत्येकाची आपापली सुखाची व्याख्या व दृष्टिकोन वेगळे असतात. तर यशाची परिभाषा ही समाजाच्या दृष्टीने वेगळी असते, ज्याने स्वत:च्या आयुष्यातील ध्येय प्राप्त केलं, तोच खरा यशस्वी असतो. ध्येयप्राप्ती म्हणजेच यशाचा मार्ग हा थोडा खडतर असतो, परंतु समाजात असे अनेकजण आहेत की, ज्यांनी जीवनात खूप यश मिळवले. जर ते यशस्वी होऊ शकतात तर आपणही होऊ शकतो, तर जीवनात सुखी व यशस्वी होण्यासाठी जीवनाचे कोणते तीन प्रमुख स्तंभ असतात ते आजच्या video मध्ये आपण पाहूया.

    १) Health (आरोग्य) : “Health is Wealth” हा सुविचार आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे. पण आपण खरंच त्याकडे किती लक्ष दिलंय? आम्हाला सांगू नका, तुमचं तुम्हाला माहिती आहेच! जर तुम्ही शारीरिक, मानसिक व बौध्दिकदृष्ट्या सुदृढ असाल, तर तुम्हाला सर्व काही मिळतं, परंतु जर तुम्ही सतत आजारी पडत असाल, विविध विकारांनी ग्रस्त असाल, डॉक्टर आणि महागड्या उपचार पध्दतींच्या अधीन झालेले असाल तर जीवनातील आनंद हरवून गेलेला असतो, जीवन नीरस झालेले असते. जर उत्तम आरोग्य असेल, तरंच तुम्ही आयुष्यातील इतर गोष्टींचा आस्वाद घेऊ शकता. “You can’t enjoy wealth, if you are not good in health.

    २) Wealth (संपत्ती) : जीवनात सुखी व यशस्वी होण्यासाठी जीवनाचा दुसरा प्रमुख स्तंभ म्हणजे संपत्ती. पैसा, संपत्ती तुम्हाला आदर देते आणि प्रतिकूलतेशी लढण्यास सक्षम बनवते. आर्थिक साक्षरता व आर्थिक स्वातंत्र्य असणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आज पैसा असेल, तरच आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात व आपल्या इच्छेनुरूप जीवन जगता येते. चांगल्या आर्थिक स्थितीसाठी तुम्हाला तुमचे ध्येय निश्चित करावे लागेल. वाईट दिवसांसाठी नेहमी पैसे वाचवा करा. गरिबीत तुमच्यासोबत कोणीही नसेल, तेव्हा हा पैसा तुम्हाला उपयोगी पडेल. म्हणून सुखी व समाधानी जीवनासाठी तुमच्याकडे आरोग्यासोबतच संपत्ती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे.

    ३) Relationships (संबंध) : तुमच्याकडे उत्तम आरोग्य व खूप संपत्ती आहे, परंतु तुमचे इतरांशी संबंध चांगले नसतील, तर तुम्हाला समाधान, सुख, यश मिळणे कठीण असते. इतरांशी चांगले संबंध आपले जीवन समृध्द करण्यात मोठी मदत करतात. ते आपल्याला आपलं जीवन आनंदी करण्यात मदत करतात; जीवनात कठीण प्रसंग आल्यास मनावरचे ओझे कमी करतात, मन हलके होते आणि आपले जीवन आनंददायी होते. विशेषतः सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या यशस्वी लोकांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करणे अत्यंत शहाणपणाचे असते, कारण त्यांच्याकडून बरेच काही शिकता येते. त्यांच्या सहवासामुळे सकारात्मक दृष्टिकोन अवलंबता येतो. त्यामुळे पैसा, आरोग्य यासोबतच इतरांशी चांगले संबंध असणे अत्यंत महत्त्वाचे असते. Self centric किंवा egoistic माणसे कधीच आयुष्यात पुढे जात नसतात. याबाबतीत एक मस्त शेर आहे की, “किसीने पूछा हमें उम्र और जिंदगी में क्या फर्क है? तो हमने यूँ जवाब दिया की, जो अपनों के बिना बीती वो “उम्र” और जो अपनों के साथ बीती वो “ज़िन्दगी”

    ४) आपण काय करावे? : आयुष्यात सुखी होण्यासाठी, आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी, यश संपादन करण्यासाठी आयुष्यात उत्तम आरोग्य, संपत्ती कमावण्याचा व आपले नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजातील तसेच आपल्या क्षेत्रातील चांगल्या लोकांशी चांगले संबध प्रस्थापित करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. तसेच जीवनात शिस्त आणि चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. व्यायाम आणि आध्यात्माला महत्व दिले पाहिजे. तरुण वयात कशाला पाहिजे अध्यात्म वगैरे सारखे प्रश्न विचारणाऱ्यांपासून जरा लांबच राहिलं पाहिजे. जर आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडलेले असेल, तर आपल्याकडे आपल्या संपत्तीवर लक्ष केंद्रित करण्याची शारीरिक क्षमता शिल्लक राहत नाही. परिणामी, आपले नातेसंबंध बिघडतात. जर आपण चांगले नातेसंबंध टिकवण्यात अपयशी ठरलात, तर आपली मानसिक स्थिती, आरोग्यावर आणि परिणामी आपल्या श्रीमंतीवर वाईट परिणाम होतो. ज्याच्या आयुष्यात चांगले आरोग्य नाही त्याला शारीरिक आणि मानसिक रोग होतात; ज्याच्या आयुष्यात संपत्ती नाही त्याला दारिद्र्य आणि गरिबीचा रोग होतो आणि ज्याच्या आयुष्यात स्वतःची म्हणावी अशी चांगली माणसे नाहीत, त्याला एकलकोंडेपणाचा रोग होतो आणि त्यातच आयुष्य संपून जाते. त्यामुळं आयुष्यातल्या या तीन महत्त्वाच्या स्तंभांना कसं मजबूत बनवता येईल याचा आत्तापासूनच विचार करायला सुरुवात करा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • तरुण वयातच आर्थिक नियोजनकडे लक्ष द्या I Money Planning for Youngsters

    तरुण वयातच आर्थिक नियोजनकडे लक्ष द्या I Money Planning for Youngsters

    असं म्हणतात की, देशाचे भवितव्य केवळ तरुणांच्या हातात असते. ज्या देशातील तरुण बुद्धीवान, तो देश विकसित. आपला भारत देश विकसनशील देश म्हणून ओळखला जातो, विकसित देश नव्हे. आपल्याला विकसित व्हायचं असेल, तर पहिले तरूणांनी विकसित झाले पाहिजे.

    तरुण वयातच प्रत्येकाने आर्थिक नियोजनाकडे लक्ष दिले पाहिजे. पण आपण तर मज्जा-मस्ती करण्यात, फिरायला जाण्यास, महागड्या वस्तु खरेदी करण्यात पैसा खर्च करतो. तरुण वयात बचत आणि गुंतवणुकीकडे आपण फारसे लक्ष देत नाही. लवकर नोकरी लागूनही फक्त वर्तमानाचा विचार करने ही चुकीची गोष्ट. आर्थिक दृष्टिकोनातून आजच आपण जर उद्याचा विचार केला. तर तुमच्या भविष्यासाठी ते हिताचे ठरू शकते.

    चला तर जाणून घेऊ की, तरुणवयात आर्थिक नियोजन कश्याप्रकारे केले पाहिजे

    Budget :

    आपल्या आर्थिक नियोजनात monthly budget तयार करणे गरजेचे असते. अनेकजण दिवसभरातील कामांचं schedule बनवतात आणि मग त्यानुसार काम करतात. अगदी तसेच आपण आपल्या महिन्याभराच्या पैश्यांचे नियोजन केले पाहिजे. महिन्यात तुम्ही कुठे कुठे किती किती पैसे खर्च केलेत हे त्यात अॅड केले पाहिजे.

    saving :

    अनेकदा महिनाअखेरीस आपल्या हातात काहीच पैसे शिल्लक नसतात. ज्या दिवशी हा दिवस येईल त्या दिवशी तुमची आर्थिक नियोजन अयशस्वी ठरले म्हणून समजा. त्यामुळे तुम्ही जर आधीपासूनच बचत करत असाल, तर अश्या परिस्थितीत ती बचत फायद्याची ठरू शकते. त्यामुळे तरुण वयातच सहसा तुमच्या एकूण पगारातले निदान 2-3 टक्के रक्कम तुम्ही बचत म्हणून बाजूला काढून ठेवली पाहिजे.

    कमाईपेक्षा जास्त खर्च

    महिन्याच्या अखेरीस तुमच्याकडे काहीच उरत नाही याचा अर्थ तुमची आर्थिक परिस्थिती तुमच्या नियंत्रणात नाही. प्रत्येक महिन्याला जसे saving करणं गरजेचं आहे, तसंच खर्च कमी करणं देखील गरजेचं आहे. तरुणपणात आपण  मजामस्ती करण्यात, आवाक्याबाहेरचे महागडे गॅजेट्स खरेदी करण्यात पैसे खर्च करतो. त्यामुळे कमाईपेक्षा जास्त होणारा खर्च त्वरित आवरता घ्या. 

    निश्चित आर्थिक उद्दिष्टे :

    बचत करताना किंवा आर्थिक नियोजन करताना तुमचे आर्थिक उद्दिष्टं स्पष्ट असणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यानुसार budget तयार करणे व बचत करणे सोपे होईल. घर खरेदी करणे असो किंवा गाडी खरेदी करणे असो अथवा अन्य काही अश्यावेळी तुम्हाला अनावश्यक खर्च टाळून जास्तीत जास्त saving केली पाहिजे.

    विमा संरक्षण:

    आर्थिक नियोजन करताना बचतीबरोबरच विमा संरक्षण असणे देखील महत्त्वाचे असते. आत्ता तरुण वयात मला विमा संरक्षणाची काहीच गरज नाही असे म्हणणारे अनेकजण असतात, मात्र हा त्यांचा निव्वळ गैरसमज आहे. वाढता वैद्यकीय खर्च बघता एक छोटासा अपघात झाल्यास तुम्ही केलेली बचत कदाचित पुरेशी नसू शकते. भविष्यात आपत्कालीन वैद्यकीय आणीबाणीमध्ये विमा संरक्षण असेल, तरच आर्थिक अडचणी टाळण्यास मदत होते. यामुळे विमा संरक्षण असणे आज काळाची गरज आहे बनली आहे.

    त्यामुळे मित्रांनो वरील सर्व मुद्दे लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुमचे महिन्याचे आर्थिक नियोजन करा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • तुम्ही पैशाला जपा, पैसा तुम्हाला जपेल

    तुम्ही पैशाला जपा, पैसा तुम्हाला जपेल

    सध्याच्या सुशिक्षित समाजात मर्यादित उत्पन्न विचारात घेता कुटुंबसुद्धा मर्यादित ठेवण्याकडे मोठ्या प्रमाणावर कल दिसून येतो. त्यामुळं कुटुंबात एक किंवा दोनच मुलं असल्याचं दिसून येतं आणि या मुलांची जास्तीत जास्त काळजी घेऊन त्यांना शक्य तेवढ्या सुविधा देण्याकडं पालकांचा प्रयत्न असतो. पण पोटच्या मुलामुलींप्रमाणे आपल्याला आणखी एका गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव असणारे पालक अभावानेच दिसून येतात. हा गोष्ट म्हणजे पैसा.

    पैशाचीसुद्धा मुलांप्रमाणेच जास्तीत जास्त काळजी घेऊन त्याचे योग्य संगोपन करून त्यात वाढ घडवून आणणे गरजेचे असते. विशेष म्हणजे मुले मोठी झाल्यावर नोकरी-व्यवसायामुळे तुमच्यासोबत राहतीलच असे नाही आणि पालक म्हणून त्यांच्या प्रगतीच्या आड न येता त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ देणे योग्य असते, पण पैशाची वेळोवेळी आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं असतं. ती कशी घेता येईल हे आजच्या video मध्ये आपण पाहू ज्यामुळे त्याचे संगोपन केले, तर त्यात वृद्धी तर होईलच आणि आपल्या retirement नंतर तो आपली निश्चितच काळजी घेईल.

    १. Retired Life साठी नियोजन हवं

    समजा, आज तुमचे वय ३० वर्षे आहे. वयाच्या ६०व्या वर्षी नोकरी व्यवसायातून तुम्ही Retire होणार आहात असे गृहीत धरल्यास retirement नंतर आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल; तर आजपासूनच आपल्या पैशाची जपणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपल्याकडे किती पैसे असणे आवश्यक आहे याचा अभ्यास करून त्यानुसार आवश्यक ती गुंतवणूक नियमित करण्यास शक्य तितक्या लवकर सुरुवात करावी. उदाहरणार्थ, सध्या कुटुंबाच्या दरमहा खर्चासाठी ५०,००० रुपये लागत असतील, तर रिटायरमेंटनंतर जरी मुलांसाठीचे काही खर्च कमी झाले तरी वैद्यकीय खर्च या वयात वाढणार आहे. म्हणजेच ३० वर्षांनी आजच्या ५०,००० रुपयांची गरज भागविण्यासाठी आत्ताचा वाढता महागाई दर बघता त्या वेळचे सुमारे अडीच लाख रुपये दर महिन्याला मिळणे आवश्यक ठरेल.

    २. गुंतवणुकीला लवकर सुरुवात व सातत्य आवश्यक

    कमी वयात गुंतवणूक सुरू करणे आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्या गरजांचा आढावा घेऊन त्या नियोजनात सतत सुधारणा करत राहणे गरजेचे असते. आर्थिक नियोजन जितक्या लवकर करू, तितका गुंतवणुकीसाठी जास्त कालावधी मिळत असल्याने कमी गुंतवणूक करून, उद्दिष्टपूर्तीसाठीची तरतूद करणे सोपे होते. नियोजनास उशीर झाल्याने बऱ्याचदा कमी वेळेमुळे पुरेशी तरतूद करणे शक्य होत नाही.

    ३. विम्याचे कवच गरजेचेच :

    या नियोजनात काही कारणाने व्यत्यय आला, तर व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक असते. यासाठी शक्य तितक्या लवकर मुदतीचा जीवन विमा अर्थात टर्म इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी. आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या १५ पट भरेल इतके कवच असलेली टर्म पॉलिसी घ्यावी. सोबतच सुरुवातीस किमान तीन लाखांचे कवच असणारी आरोग्य विमा (मेडिक्लेम) पॉलिसी घ्यावी. पुढे दर पाच वर्षांनी साधारण एक लाखाने तिचे कवच वाढवत न्यावे किंवा टॉप-अप पॉलिसी घ्यावी.

    ४. इच्छापत्र :

    आपले आर्थिक स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने ही रक्कम पूर्णपणे आपल्या नियंत्रणात असणे आवश्यक आहे. मात्र आपल्या पश्चात आपल्या मर्जीनुसार वाटप व्हावे यासाठी वेळीच ‘विल’ म्हणजेच इच्छापत्र तयार करून घ्यावे. अशा रीतीने पैशाचे योग्य ते नियोजन केल्यास सेवानिवृत्तीनंतर आर्थिक स्वातंत्र्य अबाधित राहून आपल्याला सेवानिवृत्तीचा आनंद स्वेच्छेने उपभोगता येईल.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • Toyota ते Tesla अशा जगप्रसिद्ध ब्रँड्सची नावं कशी पडली?

    Toyota ते Tesla अशा जगप्रसिद्ध ब्रँड्सची नावं कशी पडली?

    कुठलंही नाव ठेवताना त्यामागे काही ना काही कारण किंवा अर्थ असतो. जगप्रसिद्ध कार ब्रँड्सच्या नावामध्येसुद्धा काही रंजक गोष्टी लपल्या आहेत. पाहुया अशाच काही कंपन्यांबाबत.

    BMW

    जर्मनीचा BMW हा ब्रँड लक्झरी कोर्समध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. सुरूवातीला ही कंपनी दक्षिण जर्मनीच्या बव्हेरिया (Bavaria) या ठिकाणी विमानांचे इंजिन निर्मिती करत होती. त्यावेळी कंपनीचं नाव Bayerische Motoren Werke असं होतं. त्याचंच संक्षिप्त नाव हे BMW म्हणून ओळखलं जातं.

    BMW

    Fiat

    फियाट ही इटलीची सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. कंपनीनं 1899 मध्ये ट्युरिन येथे वाहन उत्पादन सुरू केलं. या कारखान्याचं नाव इटालियन ऑटोमोबिल्स फॅक्टरी ट्युरिन या नावानं ओळखलं जातं. याला इटालियन भाषेत Fabbrica Italiana Automobili Torino या नावानं संबोधलं जायचं. याचंच संक्षिप्त रूप FIAT हे आहे. १९६०-८० अशी सलग २० वर्षं Fiatजगातील तिसरी सर्वात मोठी कार कंपनी होती. 

    Fiat

    Hyundai

    दक्षिण कोरियाची ह्युंदाई हीदेखील भारतीय बाजारपेठेत सर्वांच्या परिचयाची कंपनी आहे. ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कार कंपनी आहे. कोरियन भाषेत Hyundai चा अर्थ ‘वर्तमान युग’ असा आहे. यावरच कंपनीचं नाव Hyundai असं ठेवण्यात आलं. १९६८ साली चुंग जु-युंग यांनी कोरियातील सेऊलमध्ये कंपनीची स्थापना केली होती.

    Hyundai

    KIA

    किया मोटर्सनं नुकतीच भारतीय बाजारपेठेत एन्ट्री केली आहे. या कारचं नाव दक्षिण कोरियन भाषेतील दोन अक्षरं 起 (ki) और 亞 (a) यांनी बनलं आहे. यातील ‘कि’ चा अर्थ उदय होणं किंवा बाहेर येणं आणि ‘या’ चा अर्थ पूर्व अथवा एशिया असा आहे. कंपनीच्या नावाचा पूर्ण अर्थ Rising From the east असा वाचला जातो.

    KIA

    Rolls-Royce

    Rolls-Royce ही ब्रिटिश वाहन उत्पादक कंपनी आहे आणि अनेक वर्षांपासून लक्झरी कार उत्पादनांसाठी ओळखीची आहे. या ब्रँडचं नाव कंपनीच्या दोन संस्थापकांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. 1884 मध्ये फेडरिक हेनरी रॉयस (rederick Henry Royce) यांनी एका इलेक्ट्रिक/मेकॅनिकल बिझनेसची सुरूवात केली होती त्यानंतर 1904 मध्ये त्यांनी पहिली कार तयार केली. ती कार त्यांनी आपले मित्र चार्ल्स स्टिवर्ट रोल्स (Charles Stewart Rolls) यांना दाखवली. त्यांना ती आवडलीही. त्यानंतर त्यांनी भागीदारी करून Rolls-Royce ही कंपनी सुरू केली. त्यानंतर 1904 मध्ये त्यांनी पहिली कार तयार केली. ती कार त्यांनी आपले मित्र चार्ल्स स्टिवर्ट रोल्स (Charles Stewart Rolls) यांना दाखवली. त्यांना ती आवडलीही. त्यानंतर त्यांनी भागीदारी करून Rolls-Royce ही कंपनी सुरू केली.

    Rolls-Royce

    Mercedes-Benz

    ऑटो सेक्टरमधील जुना ब्रँड म्हणून Mercedes-Benz ची ओळख आहे. यामध्ये त्यांच्या संस्थापकांचं नाव आहे. परंतु हे अर्धसत्य आहे. कार्ल बेंझ हे या ब्रँडचे संस्थापक होते. परंतु Mercedes हे नाव ऑस्ट्रियाचे बिझनेसमन एमिल जेलिनेक यांच्या मुलीच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. याबाबत सविस्तर आपण नंतर चर्चा करू.

    Mercedes-Benz

    Tesla

    इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टेस्लाच्या तोडीस तोड देणारी सध्या दुसरी कंपनी नाही. या ब्रँडच्या नावामागेही एक गोष्ट आहे. याचं नाव सर्बियन शोधकर्ते निकोला टेस्ला यांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. त्यांनी 1884 च्या दरम्यान अमेरिकेत प्रवास केला होता. ते आपल्या उत्कृष्ट इलेक्ट्रिक वर्क्ससाठी प्रसिद्ध होते.

    Tesla

    Datsun

    Datsun ही निस्सान या कंपनीचाच एक ब्रँड आहे. यातील DAT हे नाव त्याचे फायनॅन्सर्स डेन, आओयामा आणि टेकूची यांच्या नावाच्या सुरूवातीच्या अक्षरापासून करण्यात आलं आहे. त्यानंतर कंपनीनं आपली छोटी कार SON च्या आधारावर याचं नाव DATSON हे ठेवलं. परंतु जपानी भाषेत SON चा अर्थ नुकसान असा होतो. म्हणून त्यानंतर त्यांनी या कारचं नाव DATSUN असं केलं.

    Datsun

    Ford

    फोर्ड या कंपनीची स्थापना 1914 मध्ये करणअयात आली. या कंपनीचं नाव त्यांचे संस्थापन Henry Ford यांच्या नावावर ठेवण्यात आलं. Henry Ford हे कंपनीच्या मालकाच्या रुपात जगातील सर्वात धनवान आणि परिचित लोकांपैकी एक होते.

    Ford

    Toyota

    या ब्रँडचंही नाव कंपनीचे संस्थापन Sakichi Toyoda यांच्या नावावर ठेवण्यात आलं. टोयोडा हे वाल बोलण्यात आणि आधिक सुलभ होण्यासाठी याच्या स्पेलिंगमध्ये थोडे बदल करून ते टोयोटा असं करण्यात आलं.

    Toyota

    Skoda

    स्कोडा ही कंपनीदेखील आपल्या प्रिमिअम कार्ससाठी प्रसिद्ध आहे. या ब्रँडचं नाव कंपनीचे संस्थापक Emil Škoda यांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे.

    Skoda

    Volkswagen

    या कंपनीचं मुख्यालय जर्मनीतील वोल्फ़्सबर्ग येथे आहे. १९३७ मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. अडॉल्फ हिटलरनं सामान्य लोकांच्या गरजा पुरवणारी एखादी कार तयार करण्याचे आदेश दिले होते. या दरम्यान अनेक कंपन्या कार उत्पादन करत होत्या. परंतु Beetle नं एक स्वस्त मॉडेल सादर केलं होतं आणि ते हिटलरला आवडलंही. यानंतर या कंपनीला Volkswagen हे नाव देण्यात आलं. Volks आणि wagen याचा जर्मन भाषेत अर्थ जनता आणि वाहन म्हणजेच जनतेचं वाहन असा होतो.

    Volkswagen
  • UPI मधील नवीन बदल: आर्थिक व्यवहार अधिक सोपे आणि सुरक्षित

    UPI मधील नवीन बदल: आर्थिक व्यवहार अधिक सोपे आणि सुरक्षित

    मोबाईलने संपर्क क्षेत्रात ज्याप्रमाणे क्रांती घडवली त्याप्रमाणे युपीआय (UPI) ने आर्थिक क्षेत्रात क्रांती घडवली आहे. एनसीपीआय म्हणजेच नॅशनल पेमेंटस कॉरपोरेशन ऑफ इंडिया हे याचे जनक आहेत. ही एक फायदा मिळवण्याचा हेतू नसलेली कंपनी असून रिजर्व बँक आणि इंडियन बँक असोसिएशन यांनी स्थापन केली आहे.जी देशभरात किरकोळ आर्थिक व्यवहारांची परिपूर्तता करते. ते करत असताना ज्याला पैसे द्यायचे आहेत- त्याची बँक धारकाच्या चेकद्वारे, डेबिट / क्रेडिट कार्डद्वारे, किंवा पेमेंट करण्याच्या प्रणालीतून व्यापाऱ्याच्या खात्यात जमा करते. यासाठी आधी वापरात असलेल्या प्रणालीना कमीअधिक वेळ लागत असे.

    युपीआय (UPI) ही एकमेव अशी प्रणाली आहे जी किमान माहितीच्या आधारे डोळ्याचे पाते लवते न लवते तोच युपीआय ऍड्रेस, टेलिफोन नंबर, क्यू आर कोडद्वारे पेमेंट करण्याची सोय उपलब्ध त्याचप्रमाणे व्यापाऱ्याने विक्रेत्याकडे पैशांची केल्यास त्या व्यवहारास मान्यता देऊन पेमेंट करू शकतो त्यासाठी विशिष्ट मध्यस्ताचाच वापर केला पाहिजे असे नसल्याने, त्याचप्रमाणे सध्या ही सुविधा घेण्यासाठी कोणताही आकार नसल्याने, व्यक्ती आणि व्यापारी याशिवाय मित्र नातेवाईक यांच्यातील आर्थिक व्यवहारही सुरळीत होत असल्याने अत्यंत लोकप्रीय झाली आहे. 30 सप्टेंबर 2023 रोजी –

    ●यासुविधेचे वापरकर्ते 35 कोटी आहेत

    ●10056 कोटी एकूण व्यवहार या माध्यमातून झाले असून अजून अधिक व्यवहार करण्याची याची क्षमता आहे.

    ●जे रुपयांच्या भाषेत 16 लक्ष कोटी रुपयांचे आसपास आहेत

    ●किरकोळ व्यवहारातील याचा वाटा 90% आहे.

    या व्यवहारांवर आता काही शुल्क लावले जाईल असे सुतोवाच वारंवार करून अजूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही तरी अनेकांची मानसिक तयारी अश्या बातम्यांमधून झाली असेलच.

    अलीकडेच या प्रणालीत एनसीपीआय यांनी महत्वाचे बदल केले आहेत त्यामुळे आकर्षक असलेली सुविधा अधिक आकर्षित होण्याची शक्यता आहे त्या कोणत्या ते पाहू

    ★क्रेडिट लाईन : या सुविधेत ग्राहक त्याच्या बँकेने पुरवलेल्या डिजिटल क्रेडिट लाईनचा (एक प्रकराचे कर्ज) वापर करू शकतो. बँक आणि ग्राहक या दोघांच्या दृष्टीने ते सोईस्कर आहे. सुयोग्य ग्राहकांना क्रेडिट लाईन देऊन बँका आपल्या व्यवसायात वाढ करू शकतील. ग्राहकांची गरज भागेल आणि त्यांना क्रेडिट कार्डची जरूर पडणार नाही. रक्कम वापरण्याची पद्धत नेहमीप्रमाणे आहे. याचा क्रेडिट कार्ड व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वाटते. सध्या एचडीएफसी बँक पे झ्याप, भीम, पेटीएम, जी पे यांनी आपल्या ग्राहकांना ही सुविधा देण्याचे मान्य केले आहे त्यामुळे ही अँप वापरणारे लवकरच या सुविधेचा अनुभव घेऊ शकतील.

    ★युपीआय (UPI) लाईट एक्स : ज्या मोबाईलमध्ये निअर फिल्ड कम्युनिकेशन (NFC)सुविधा आहे अशा हँडसेटमधून मर्यादित प्रमाणात ऑफलाईन व्यवहार करता येऊ शकतील. ग्राहकांच्या दृष्टीने ही महत्वपूर्ण सुविधा असून जेव्हा फोन पूर्णपणे ऑफलाईन तेव्हा पिअर टू पिअर व्यवहार नेटवर्क आणि इंटरनेट सुविधेशिवाय करता येईल याचा फायदा अंडरग्राऊंड मेट्रो नेटवर्क किंवा रिमोट नेटवर्क असलेल्या भागातील व्यवहार करताना होईल.

    ★युपीआय (UPI) टॅप अँड पे : याचा वापर एनएफसी सुविधा उपलब्ध असलेल्या छोटया क्रेडिट कार्डधारकांना होऊ शकेल. असे कार्ड मिळवण्यासाठी –

    ●यापद्धतीचे कार्ड देणाऱ्या बँकेत जावे तेथे युपीआय लार्ड ऑनलाईन तयार करणारे मशीन असेल.

    ●त्यात असलेल्या नमुन्यातून आपल्याला पसंद पडणारे कार्ड निवडा.

    ●यात दाखवलेला क्यूआर कोड आपल्या युपीआय आयडीतून प्रामाणित करा यानंतर सदर कार्ड आपल्या युपीआय आयडीला जोडून घ्या.

    ●या सर्व पायऱ्या पूर्ण केल्यावर आपल्याला तात्काळ युपीआय कार्ड मिळेल याचा वापर आपण युपीआय टॅप अँड पे ही सुविधा वापरण्यास करू शकू.

    हॅलो युपीआय (UPI) : ही एक सर्वाना आवडेल अशी नावीन्यपूर्ण योजना आहे. यानुसार आपल्या बोलण्यातून व्यवहार होऊ शकतात. डॉटकडे नोंदणी केलेल्या सर्वच ऑपरेटर्स आपल्या ग्राहकांना इंग्रजी आणि हिंदी भाषेतून संभाषण करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे त्याच्या मदतीने संभाषण ओळखणे, संभाषणात पडलेला खंड ओळखणे, टेक्सचे अंकात / संभाषणात रूपांतर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यांचबरोबर भारत बिल पे यांनी बिल पे ही सुविधा सर्व भारतीय क्रमांकाना उपलब्ध करून दिला असून केवळ संदेशाद्वारे व्यवहाराची खात्री आणि व्यवहार होऊ शकतो जर आपण जर स्मार्टफोनधारक नसाल तरी केवळ मिस कॉल देऊन व्यवहार पूर्ण करू शकतो.

    उपलब्ध होऊ घातलेल्या या सुविधामुळे – (UPI)

    ●डिजिटल व्यवहारात वाढ होईल समाजातील सर्वच घटक त्यात समावले जातील. याचा फायदा ग्राहक व्यापारी सर्वांनाच होईल. व्यवसायवृद्धी होईल.

    ●यासुविधा वापरल्याने रोख व्यवहारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे रोख पैसे बाळगण्याची गरज होणार नाही. सध्याच्या अर्थव्यवस्थेसोबत समांतर अर्थव्यवस्था कार्य करीत असते ती खिळखिळी होईल.

    ●आर्थिक मध्यस्थाच्या व्यवसायात वृद्धी होईल नवनवे व्यवसाय यातून निर्माण होऊ शकतात. आर्थिक महासत्ता बनण्याचे करोडो भारतीयांचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. एनपीसीआय यांनी सतत युपीआयचे वापरकर्ते वाढवेत यासाठी अधिकाधिक प्रयत्न करत असून अधिकाधिक घटकाना सामावून घेण्याचा प्रयत्न करत असून यात युपीआयचा मोठा सहभाग आहे त्यांची सर्वाना बरोबर घेऊन जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्याबरोबर आर्थिक विकास, आर्थिक स्वयंपूर्णता आणि कल्पकता याचा वापर करीत आहे.

    ©उदय पिंगळे

    अर्थ अभ्यासक

    (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेच्या कार्यकारी मंडळात पदाधिकारी असून महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत)

  • Educational Loan कसं घ्यायचं, त्याची प्रोसेस काय?

    Educational Loan कसं घ्यायचं, त्याची प्रोसेस काय?

    नमस्कार मित्रांनो, पैसा हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेकजण खूप सधन असतात, तर काहीजण पैशांच्या अभावामुळे खूप गरिबीत जीवन जगत असतात. पोटाची खळगी भागवण्यासाठी कर्ज घेतात आणि मग त्या कर्जाचे हप्ते भागवण्यातच अर्धं आयुष्य निघून जातं. कर्ज घेणं हे काही गरिबीचं लक्षण नाही, पण ते कर्ज आपण कशासाठी घेतोय हे फार महत्त्वाचं आहे. कर्ज अनेक कारणांसाठी घेता येतं. तुम्ही घर घेण्यासाठी कर्ज घेऊ शकता, गाडी घेण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी, आजकाल तर अगदी लग्न करण्यासाठी सुद्धा कर्ज मिळतं. तसेच तुम्ही शिक्षणासाठी educational loan देखील घेऊ शकता.

    बऱ्याच जणांना educational loan कसं घ्यायचं, त्याची प्रोसेस काय? किंवा ते return कसं करायचं याबद्दल काहीच माहीत नसतं. तर या लेखात आपण जाणून घेऊया educational loan बद्दल.

    पहिल्यांदा बघूया, educational loan ची नेमकी process काय असते?

    तुम्ही कोणत्या course साठी admission घेणार आहात आणि त्यासाठी नेमकी किती फी आहे हे जाणून घेऊन मग त्यावर कोणत्या बँकेचे व्याज कमी-अधिक आहे याची माहिती मिळवली पाहिजे. बँकेतून लोन मंजूर होण्यासाठी 1 ते 4 आठवडे लागू शकतात. तुम्ही जर govt. बँकेतून कर्ज घेणार असाल, तर कर्ज मंजूर होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो. मात्र जर तेच तुम्ही college bank किंवा private बँकेतून कर्ज घेतले तर तुमचे कर्ज लवकर मंजूर होऊ शकते. college बँक म्हणजे college मधील बँका. मात्र या बँका प्रत्येक college मध्ये नाहीत, तर आयआयटी सारख्या मोठ-मोठ्या college मध्येच आपल्याला पाहायला मिळतात. जर तुम्ही college बँकेतून कर्ज घेतले, तर ते तुम्हाला लवकर मिळू शकते. तसेच private बँकेत देखील कर्ज मंजूर होण्याची प्रोसेस govt. बँकेच्या तुलनेत थोडी फास्ट असते. त्यामुळे तुम्ही govt. बँकाना थोडं दुय्यम स्थान देवून college आणि private बँकेतून लोन घेऊ शकता.

    आत्ता जाणून घेऊया की लोनसाठी कोण-कोणती कागद-पत्रे लागू शकतात.

    पहिल्यांदा तर तुम्हाला बँकेतील loan form भरावा लागेल. त्यानंतर college अॅडमिशन letter, college fee structure,  college prospectus, passport size photo, adhar card, pan card, दहावी, बारावी certificate, marksheet, उत्पन्नाचा दाखल ही कागदपत्रे लागतात. तुमच्याकडे ही सगळी कागदपत्रे असतील तर तुम्हाला लवकर लोन मिळू शकते. तसेच तुम्ही निवडलेला course, तुम्ही निवडलेले college, भविष्यातील नोकरीच्या संधी या सर्वांबद्दल तुम्ही किती जागरूक आहात हे तुम्हाला बँकेला पटवून द्यावे लागते. तुम्ही कर्जाची परतफेड वेळेत कशी कराल हेही बँकेला पटवून द्यावे लागते. तुमचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वेळेत तुम्हाला व्याजासहित कर्ज परतफेड करावे लागते.  

    तर ही आहे कर्ज मंजुरीची पूर्ण प्रोसेस!

    पण मित्रांनो, तुम्ही कर्ज घेताय खरे मात्र कोणत्या college मधून तुम्ही शिक्षण घेताय, college तुम्हाला किती टक्के placement देतय, तुमच्या college मध्ये शिक्षणाचा दर्जा कसा आहे हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा असं होतं की आपण कॉलेज करतो मात्र त्या कॉलेजचा आपल्या करियरसाठी म्हणावा तेवढा फायदा होत नाही, मग अशा शिक्षणासाठी कर्ज घेणं जरा जोखमीचंच होऊ शकतं. म्हणून जर तुम्ही चांगल्या कॉलेज मधून शिक्षण घेत असाल, तरच educational loan घ्या. कारण कितीही झालं तरी आपल्या डोक्यावरील कर्जाचा भार लवकरात लवकर उतरवणं थोडं कठीणच. त्यामुळे थोडं सांभाळूनच!

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • अग्रीम कर (Advance Tax)

    अग्रीम कर (Advance Tax)

    आर्थिक वर्ष चालू असताना त्या वर्षीच्या प्रत्यक्ष मिळालेल्या आणि वर्ष संपेपर्यंत मिळू शकणाऱ्या उत्पन्नचा अंदाज बांधून त्यावर एकूण देय असलेल्या आयकराचा अंदाज बांधून जर हा कर ₹10,000/-हून अधिक असेल (आयकर कलम 208 नुसार ) तर आर्थिक वर्षीच्या 31मार्च पर्यंत आयकर नियमानुसार विशिष्ट दिवसापूर्वी आयकर भरावा लागतो. हा आयकर आर्थिक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी भरावा लागत आल्याने त्यास अग्रीम कर (Advance Tax) असे म्हणतात.

    कायदयातील तरतुदीनुसार अंदाजित देय आयकराचा काही प्रमाणात अग्रीम कर सर्वाना भरावा लागतो यातून ज्येष्ठ व्यक्तीना (वय वर्ष 60 किंवा त्याहून अधिक) जर त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नात व्यवसायापासून मिळणारे उत्पन्न नसल्यास त्यांना अग्रीम कर (Advance Tax) भरण्याच्या तरतुदीतून वगळण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ज्यांचा कर ₹10,000/- होतो परंतु निव्वळ उत्पन्न कमी असल्याने आयकर कायद्यातील 87आहे आहे नुसार जुन्या पद्धतीने जास्तीत जास्त ₹12,500/- आणि नवीन तरतुदीनुसार ₹ 25,000/- ची करसुट मिळते अशा सर्वाना अग्रीम कर भरावा लागत नाही.

    Advance Tax
    Advance Tax

    याव्यतिरिक्त अंदाजीत कर लागू असणाऱ्या सर्वांनीच आपल्या मिळालेल्या निव्वळ उत्पन्नाची बेरीज करावी आणि पुढील वर्षातील 31 मार्चपर्यंत मिळण्याची शक्यता असणारे उत्पन्न मोजावे त्यावर नवीन आणि जुन्या पद्धतीने आवश्यक त्या वाजवटी घेऊन किती आयकर लागेल त्याचा अंदाज घ्यावा. त्यात सरचार्ज मिळवावा हा आपला एकूण देयकर असेल. लक्षात घ्या नवीन पद्धतीने आयकर मोजणी केल्यास करदर कमी आहे पण अनेक सवलती सोडून द्याव्या लागतात तर जुन्या पद्धतीत करदर थोडा जास्त असून अनेक सवलती मिळतात आपली करदेयता तपासून सर्वप्रथम कोणती पद्धती स्विकारल्यास कमीत कमी कर द्यावा लागतो ते तपासावे करदात्यांना सध्या या दोन्ही पद्धतीपैकी कोणतीही एक पद्धत निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे ही जमेची बाजू आहे त्यानुसार करदेयता निश्चित झाल्यास आणि ती ₹10000/- हून अधिक असल्यास एकूण अंदाजित अग्रीम कराच्या

    15% अग्रीम कर रक्कम 15 जूनपर्यत

    45% अग्रीम कर रक्कम 15 सप्टेंबरपर्यंत

    75% अग्रीम कर रक्कम 15 डिसेंबरपर्यंत

    100% अग्रीम कर रक्कम 15 मार्चपर्यंत

    भरावी लागेल.

    जे व्यापारी आणि व्यावसायिक आपले उत्पन्न हिशोब न ठेवता आयकर कायद्यातील कलम 44AD, 44ADE, 44AE नुसार (यात कोणते व्यवसाय व्यापार येतात ते तपासावेत ) एकंदर

    उलाढालीवर 50% खर्च वजावट घेतात या सर्वाना आपला अग्रीम कर 15 मार्चपर्यंत पूर्ण भरण्याचे बंधन आहे त्याचप्रमाणे त्याना वरील अग्रीम करदेय तारखेस कर न भरण्याची मुभा आहे. यात कुठेही चूक झाल्यास इतरांना पहिल्या तीन देय तारखाना 15 जून, 15 सप्टेंबर, 15 डिसेंबर, 1% प्रतिमहीना या हिशोबाने तीन महिन्याचे 15 मार्च ही तारीख चुकल्यास 1महिन्याचे दंडव्याज द्यावे लागेल.

    अग्रीम कर (Advance Tax) करदात्यास चलन भरून प्रत्यक्ष बँकेत किंवा बँकेच्या संकेतस्थळावर,अँपवर अथवा आयकर विभागाच्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने भरता येऊ शकतो –

    जर आयकर विभागाकडे अग्रीम कर (Advance Tax) ऑनलाईन भरायचा असेल तर –

    *आयकर विभागाच्या पोर्टलवर जावे.

    *त्यानंतर डाव्या साईडला क्विक लिंकवर क्लीक करून त्यातील 6 व्या क्रमांकावर असलेल्या इ वे बिल या पर्यायावर क्लीक करा.

    *पॅन /टॅन आणि मोबाईल क्रमांक भरा.

    *मोबाइलवर ओटीपी येईल तो योग्य ठिकाणी टाकून कंटिन्यू करा.

    *इनकम टॅक्स हा पर्याय निवडून प्रोसिडवर क्लीक करा.

    *एसेसमेंट इयर म्हणजे चालू आर्थिक वर्षाच्या पुढचे वर्ष निवडून एडव्हान्स टॅक्स (Advance Tax) (याचा कोड 100) निवडून प्रोसिड अशी सूचना द्या.

    *ऍडव्हान्स टॅक्सची (Advance Tax) रक्कम टाकून चलन भरून पेमेंटचा पर्याय निवडा आणि कर भरा.

    *पेमेंट झाल्यावर आपल्याला विभागाकडून पावती मिळेल त्यातील उजव्या बाजूला बिएसआर कोड आणि चलन क्रमांक मिळेल. या पावतीची प्रत जपून ठेवा कारण भविष्यात आयकर विवरणपत्र भरताना या दोन गोष्टी आवश्यक आहेत.

    Income tax Return

    यदाकदाचित चलन भरताना-

    ऐसेसेमेंट इयर चुकीचे टाकले गेल्यास इन्कमटॅक्स पोर्टलवर लॉगइन करून त्यात दुरुस्ती करता येईल. किरकोळ दुरुस्त्या 7 दिवसात तर मोठ्या दुरुस्त्या पुढील 30 दिवसात करता येतात. अग्रीम कर रूपाने किती रक्कम जमा होईल याचा अंदाज सरकार त्यांच्या वार्षिक अंदाजपत्रकात व्यक्त करत असते. आपल्याला अग्रीम कर देय असेल तर तो वेळेत भरून दंडव्याज वाचवावे म्हणजे एकदम एकरकमी कर भरण्याचा ताण आपल्यावर येणार नाही.

    ©उदय पिंगळे

    अर्थ अभ्यासक

    (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारिणीचे पदाधिकारी असून महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत)

    आणखी वाचा