Category: लेख

  • जागतिक उद्योजक दिन – प्रवास उद्योजक बनण्याचा

    जागतिक उद्योजक दिन – प्रवास उद्योजक बनण्याचा 

    मग या सगळ्यासाठी काय करता येईल, कसं उत्तर शोधता येईल. तर मित्रांनो उद्योजक होता येईल, व्यवसायाच्या वाटेवर स्वतःचा एक वेगळा प्रवास सुरू करता येईल. परंतु उद्योजकता ही केवळ ठरवून करायची गोष्ट मुळीच नाही. आज जागतिक उद्योजक दिनाचे औचित्य साधून आपण या दिवसाच्या महत्त्वावर प्रकाश टाकणार आहोत.

    image 5

    खरंतर आजही अनेक ठिकाणी लोकांची अशीच मानसिकता आहे की, चांगलं शिक्षण घ्यायचं, चांगली नोकरी मिळवायची आणि आयुष्यात स्थिर व्हायचं. सहसा मला फक्त व्यवसाय करायचा आहे, मला उद्योजक व्हायचं आहे असे बोलणारे खूप अपवाद आहेत. गर्दीचा बऱ्यापैकी ओढा हा फक्त नोकरीच्या मागेच आहे, अनेक जण अपघाताने, अनावधानाने व्यवसायात पडतात आणि मग शिकत शिकत, अनुभव घेत, त्यांना त्यात यश मिळतं; पण फक्त मला व्यवसायच करायचा आहे, हा दृष्टिकोन मनात घेऊन व्यावसायिक होणारे उद्योजक हे फार तुरळक. खरंतर या मागची कारणं देखील अनेक आहेत. त्यात प्रामुख्याने सांगायचं झालं तर,

    1. व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ नसणं. 

    2. कुटुंबाचा पाठिंबा नसणं.

    3. नक्की कोणता व्यवसाय करायचा आहे याची स्पष्टता नसणं.

    4. Risk घेण्याचं धाडस नसणं.

    5. अनिश्चितता आणि अनुभवाचा अभाव 

    6. सामाजिक दबाव 

    या सगळ्या गोष्टींना समस्या समजून धाडस न करणारी संख्या मोठीच आहे ; परंतु याच्या विरुद्ध याच मुद्द्यांवर उत्तर शोधून व्यवसायाच्या वाटेवर चालणारे अपवाद हे कायम विलक्षणच ठरतात. जगातील यशस्वी संस्थापकांनी, लहान-मोठ्या उद्योजकांनी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी, स्वत:ची प्रतिभा जगापुढे आणताना काय बरं विचार केला असेल? मुळातच एक गोष्ट स्पष्ट आहे की, आव्हाने स्वीकारण्याची स्वेच्छा असणे आणि उद्योजक होणे या दोन गोष्टींतील सीमारेषा ही अत्यंत पुसट आणि कमी आहे. ही स्वेच्छाच तुमच्या मनातील सर्व भय नष्ट करते आणि त्याच वेळी आपण आकस्मिक संकटांना, अचानक येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी पूर्वतयारी करू शकतो, त्यांना भिडू शकतो. 

    image 7

    असं म्हणतात की नोकरी हा आठ तासांचा व्यवसाय आहे आणि व्यवसाय ही २४ तासाची नोकरी आहे आणि हे खरंच आहे. परंतु नोकरी आणि व्यवसाय या दोन्हीमधून मिळून सरतेशेवटी मिळणारं समाधान यात कमालीचा फरक आहे हे मात्र विसरता कामा नये. नोकरी करून आपण आपल्या कंपनीच्या मालकाला मोठं करतो, तर तेच स्वतःचा व्यवसाय करून आपण स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या पुढच्या पिढीला अप्रत्यक्षरित्या मोठं करत असतो. फरक जरी एका वाक्यात असला तरी त्यातील गांभीर्य हे फार मोठं आहे. आज भविष्याचा विचार केला तर ८०% परंपरागत नोकरीच्या संधी ह्या एआय (artificial intelligence) व रोबोटमुळे संपणार आहेत. डॉक्टरच्या ऐवजी रोबोट सर्जरी करतील, तर मग कामगार वर्गाचे काय होईल ह्याचा विचार आपण न केलेलाच बरा.

    बऱ्याच जणांचं असंही म्हणणं असतं की माझं वय कमी आहे किंवा आता वय निघून गेलं. अशा तक्रारी करणाऱ्यांना एकच सांगायचं आहे की, शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. संभाजी राजांनी वयाच्या 20व्या वर्षी औरंगजेबाला पाणी पाजलं होतं. बिल गेट्स वयाच्या ३०व्या वर्षी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. तर दुसरीकडे, आर. के. दमाणींनी ४८व्या वर्षी D-Martची, जॉन पेंबरटन यांनी ५५व्या वर्षी कोका-कोलाची सुरुवात केली, तर कर्नल सँडर्स यांनी ६२व्या वर्षी KFCची सुरुवात केली. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या समोर आहेत. उद्योजक बनण्याच्या या प्रवासात वय हा मुद्दा खूप दुय्यम आहे. करण्याची इच्छा असेल, मानसिक तयारी असेल, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जायची तयारी असेल. Roadmap तयार असेल, तर इतर समस्यांना आपण नक्कीच तोंड देऊ शकतो.

  • रुबाबदार आयुष्य जगा : आरोग्यसंपन्न जगा

    रुबाबदार आयुष्य जगा : आरोग्यसंपन्न जगा

    काल झोपताना त्याने उद्याच्या दिवसात करावयाच्या सर्व कामांची यादी केली, ती त्याची नेहमीची सवयच होती. पण नेहमीप्रमाणे व्यायामासाठी वेगळा वेळ काढायचं त्याच्याकडून राहूनच गेलं. खरंच आपण आपल्या आरोग्याला किती साधारण स्थान दिलंय नाही का? खरंच आपल्या आयुष्यात आरोग्याचं महत्व तितकं साधारण आहे का? गांभीर्याने स्वतःला प्रश्न विचारला तर नाही हेच उत्तर येईल. मुळात आरोग्याशिवाय माणसाला काय करणं शक्य आहे हाच सर्वात मोठा कळीचा मुद्दा आहे. 

    चार दिवानांचं घर जरी आपल्याकडे असलं; पण मणक्यात गॅप असला, तर चटईवर झोपायला लागतं. दहा साखर कारखान्यांचे Shares आपल्याकडे असतील; पण डायबिटीस असेल, तर तो डॉक्टर चमचाभर सुद्धा साखर खाऊ देत नाही. घरी हरभऱ्याची एकरभर शेती आहे; पण ते चणे खायला तोंडात दातच नसतील, तर करणार काय? तोंडासमोर पंचपक्वानांची मेजवानी आहे, पण पचनसंस्थाच जर काम करत नसेल, तर कोणाला दुःख सांगणार…

    Ayurvedic header

    बोध हाच की चांगलं आरोग्य नसणं हे दात नसलेल्या वाघासारखं आहे. अर्थहीन. तरुणपणी पैसा कमावण्यासाठी आपण शरीराची ओढाताण करतो आणि म्हातारपण आलं की हेच शरीर जपण्यासाठी कमावलेलं धन खर्च करतो. मेहनत करू नका असं अजिबात म्हणायचं नाहीये, पण या कष्टमय प्रवासात शरीराशी मात्र कधीच तडजोड करू नका, कारण हे शरीर जर आपल्यावर रुसलं, तर समोर असणारं स्वर्गसुख देखील व्यर्थ ठरतं. आपल्या शरीरातील अवयवांची जर किंमत काढायला आपण गेलो, तर ती शेकडो कोटींच्या घरात जाईल. खिशात जर पाचशेच्या चार नोटा असल्या, तर आपण किती वेळा चाचपडून पाहतो, मग एवढी कोट्यावधींची शरीररुपी संपत्ती आपल्याजवळ असताना आपण त्याची किती काळजी घेतो. खूप कमी, खरच खूप कमी. का? कारण ते मोबदल्याशिवाय मिळालंय. या शरीरासाठी आपण कोणते पैसे मोजले नाहीत. आपल्या आई-वडिलांना आपण त्याचं भाडंही देत नाही. म्हणजे फुकटच मिळालेली चीजवस्तू. साधं एक उदाहरण पाहा. आपण आपला चष्मा जास्त जपतो, की डोळे जास्त जपतो? 90% वाचकांचे उत्तर चष्मा हेच असेल. तो चष्मा ठेवायचं खोकं वेगळं, त्याला पुसण्याचा रुमाल वेगळा. ती काच स्वच्छ करायला liquid वेगळं. आणि त्या चष्म्याच्या कितीतरी पटीने महाग असणारे आपले डोळे. त्यांचं काय… ॐ दुर्लक्षाय नमः फक्त एकदा ओल्या पाण्याचा हात फिरवला, की झाले आमचे डोळे स्वच्छ. किती मोठी शोकांतिका. पण याच शोकांतिकेवर वेळ जायच्या आधी विचार व्हायला हवा. आपल्या आरोग्यासाठी आपणच जागं व्हायला हवं. चांगल्या करिअरसाठी जसे आपण झगडतो ती धडपड चांगल्या आरोग्यासाठी देखील व्हायलाच हवी. उत्तम आरोग्याला आपण जर अलंकार मानत असू, तर त्या अलंकाराची बडदास्त देखील आपणच ठेवायला हवी ना!

    Health insurance

    सुदृढ शरीराच्या महत्त्वावर रामदास स्वामी फार सुंदर म्हणतात

    “शक्तीने पावती सुखे | शक्ती नसता विटंबना ||

    शक्तीने नेटका प्राणी | वैभव भोगता दिसे ||”

    आणखी वाचा

  • “रंकाचा राजा’’ संघर्षातून उभारले यशस्वी साम्राज्य, लॅरी एलिसन यांचा प्रेरणादायी प्रवास

    “रंकाचा राजा’’ संघर्षातून उभारले यशस्वी साम्राज्य, लॅरी एलिसन यांचा प्रेरणादायी प्रवास 

    आज आपण अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यांच्यावर “रंकाचा राजा” ही म्हण तंतोतंत लागू होते. या व्यक्तीने आपल्या जीवनातील अनेक आव्हानांवर मात करून यश मिळवले आहे. ती व्यक्ती म्हणजे अमेरिकेचे प्रख्यात उद्योजक आणि ओरॅकल कॉर्पोरेशनचे संस्थापक, “लॅरी एलिसन”.

    लॅरी एलीसन आणि देव यांच्यात काय फरक आहे, यावर एक विनोदी प्रश्न विचारला जातो. उत्तर असं दिलं जातं की, “देवाला आपण लॅरी एलीसन आहोत असं वाटत नाही.” यावरूनच लॅरी एलीसन किती महत्वाकांक्षी व्यक्ती आहेत, याची कल्पना येते.लॅरी एलीसन हे तंत्रज्ञान क्षेत्रातील एक क्रांतिकारी नाव आहे. त्यांनी माहिती साठवणाऱ्या म्हणजेच डेटाबेस क्षेत्रात असा काही क्रांतिकारक बदल घडवला की, मायक्रोसॉफ्ट, आयबीएमसारख्या बलाढ्य कंपन्यांनाही त्यांची धडकी भरली होती. त्यांच्या नेतृत्वात, Oracle ने डेटाबेस व्यवस्थापनाच्या तंत्रज्ञानात अभूतपूर्व प्रगती केली. हे तंत्रज्ञान व्यवसायांच्या आणि उद्योगांच्या केंद्रस्थानी आलं, ज्यामुळे जगभरातील डेटा व्यवस्थापनाचा चेहरामोहरा बदलला.

    आज त्यांचा जन्मदिन… चला तर, त्यांचा आजवरचा जीवनप्रवास पाहूया. 

    बालपण आणि प्रारंभिक जीवन 

    लॅरी एलिसन यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. त्यांचे बालपण आणि प्रारंभिक जीवन संघर्षमयी होते. फ्लॉरेन्स स्पेलमन ही त्यांची १९ वर्षे वयाची आई अविवाहित होती. त्यांच्या जन्मानंतर काही दिवसातच त्यांच्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबाला सोडून दिले. लॅरी नऊ महिन्यांचे असताना त्यांना न्यूमोनिया झाला असताना आपल्याला आपल्या मुलाचा नीट सांभाळ करायला जमणार नाही असं वाटल्यामुळे त्यांच्या आईनं एलिसनला शिकागोमधल्या आपल्या लिलियन नावाच्या आत्याकडे सांभाळायला द्यायचं ठरवलं. लिलियन आणि लुईस एलिसन या नवरा-बायकोनं मग एलिसन नऊ महिन्यांचा असताना त्याला दत्तक घेतलं. त्याच्या नव्या आईने त्यांचं चांगल्या प्रकारे पालनपोषण केले. त्यांनंतर त्यांची खरी आई त्यांना कधीच भेटली नाही. ती त्यांना जेव्हा ते ४८ वर्षाचे झाले आणि जगात त्यांचे बर्‍यापैकी नाव झाले होते तेव्हाच भेटली. अगदी हिंदी सिनेमांत दाखवतात तशी स्टोरी आहे ही…

    लॅरींनी 1962 मध्ये अर्बाना-चॅम्पेन येथील इलिनॉय विद्यापीठात शिक्षणाला सुरुवात केली. मात्र, 1964 मध्ये त्यांच्या सावत्र आई म्हणजेच लिलियन याचं निधन झालं, आईच्या निधनानंतर लॅरी खूपच दुःखी झाले आणि त्यांनी  शिक्षण अर्धवट सोडले. लिलियनशी त्याचं  नातं खूप जिव्हाळ्याचं झालं होतं, परंतु लुई म्हणजेच त्यांचे सावत्र वडील यांच्यासोबत त्यांचे संबंध तणावपूर्ण होते. लुई त्यांना वारंवार म्हणत की, तू आयुष्यात कधीच काही साध्य करू शकणार नाही. त्यांच्या सावत्र वडिलांच्या अशा वागणुकीमुळे लॅरींचा स्वभाव हा लहानपनासुनच जिद्दी बनला आणि आता वडिलांना खोटं ठरवून काहीतरी करून दाखवायचा चंग त्यांनी लहापणापासूनच बांधला.

    कठीण परिस्थितीतही लॅरीने धैर्य आणि जिद्द दाखवून पुढे प्रचंड यश मिळवले,  ते म्हणतात ना परिस्थिती कितीही कठीण असली, तरीही स्वप्नांवर विश्वास ठेवणं महत्वाचं असतं. लॅरीनेही हार मानली नाही. 1966 मध्ये शिकागो विद्यापीठात थोडा काळ शिकून त्यांनी आपल्या इच्छाशक्तीने पुढे पाऊल टाकलं. 

    Larry Ellison

    सुरुवातीचा संघर्ष 

    1960 च्या दशकात संगणकाच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत होती. संगणकाविषयी सर्वत्र चर्चा सुरू झाली होती, आणि अनेक कंपन्यांना त्यांच्या कामांना सुलभ बनवण्यासाठी कुशल प्रोग्रामर्सची आवश्यकता होती. लॅरी यांनी शाळेत प्रोग्रामिंगचे धडे घेतले होते आणि त्यांच्या या आवडीमुळे त्यांनी त्या काळात १९६६ मध्ये, वयाच्या अवघ्या  २२ व्या वर्षी पहिला संगणक डिझाईन केला. त्या काळात संगणक आणि तंत्रज्ञान हे नवीन क्षेत्र होते, पण लॅरींनी याच क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्याचे ठरवले. कॅलिफोर्नियामध्ये येऊन त्यांनी संगणक डिझाईनशी संबंधित छोटे-मोठे काम करून आपले पोट भरायला सुरुवात केली. 

    1973 मध्ये ॲम्पेक्स या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत काम करायला सुरुवात केली, त्या ठिकाणी काम करत असताना त्यांना तेथे नवीन सहकारी एड ओट्स आणि बॉब मायनर भेटले, त्यांच्या सोबतचा त्यांचा अनुभव कमालीचा राहिला,  नवी शिकवण घेतली आणि अनुभव मिळवला. मात्र, त्यांच्या यशाची भूक थांबली नाही. 1976 मध्ये त्यांनी ॲम्पेक्स सोडून प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट्समध्ये काम करण्याचा निर्णय  घेतला आणि उपाध्यक्ष पदावर कार्यरत होत, कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागाचे नेतृत्व केले.

    व्यवसायाची सुरुवात (Oracle ची मुहूर्तमेढ)

    1977 मध्ये, एलिसन यांनी आपले सहकारी  मायनर आणि ओट्ससोबत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज (SDL) ची स्थापना केली, जी सुरुवातीला इतर कंपन्यांसाठी कॉन्ट्रॅक्ट प्रोग्रामिंग करण्यासाठी तयार करण्यात आली होती. मात्र, एलिसन यांना SDL द्वारे काहीतरी मोठं आणि क्रांतिकारक करायचं होतं. त्यांना ब्रिटिश संगणक शास्त्रज्ञ एडगर एफ. कॉड यांनी मांडलेल्या रिलेशनल डेटाबेस मॉडेलने खूप प्रेरणा दिली. या मॉडेलने मोठ्या प्रमाणात डेटाचे कार्यक्षम व्यवस्थापन आणि जलद रिकव्हरी करण्याचे मार्ग दाखवले. एलिसन, मायनर आणि ओट्स यांनी या क्षेत्रात मोठ्या व्यावसायिक संधी ओळखल्या आणि त्यांनी डेटाबेस विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले

    त्यांच्या या प्रयत्नांना अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएकडून (Central Intelligence Agency) करार मिळाला आणि त्यांनी व्यावसायिक रिलेशनल डेटाबेस प्रोग्राम विकसित करण्यास सुरुवात केली. अखेर 1979 मध्ये, रिलेशनल सॉफ्टवेअर इंक. (आता Oracle) ने स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज (SQL) वापरणारा पहिला व्यावसायिक रिलेशनल डेटाबेस प्रोग्राम लॉन्च केला. या अभिनव डेटाबेस प्रोग्रामने त्याकाळात लोकप्रियता मिळवली आणि उद्योगाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला.

    संकटांवर मात

    1982 मध्ये नाव बदलून ओरॅकल सिस्टिम कॉर्पोरेशन (नंतर ओरॅकल कॉर्पोरेशन) ठेवलेली कंपनी आपल्या नाविन्यपूर्ण आणि आक्रमक मार्केटिंगसाठी ओळखली गेली. 1980 च्या दशकात कंपनीची झपाट्याने वाढ झाली, आणि 1986 मध्ये कंपनीने सार्वजनिक होऊन यश मिळवलं. 1987 पर्यंत, ओरॅकल जगातील सर्वात मोठी डेटाबेस-व्यवस्थापन कंपनी म्हणून समोर आली. मात्र, 1990 मध्ये भागधारकाच्या खटल्यामुळे झालेल्या अंतर्गत ऑडिटमध्ये असं लक्षात आलं की कंपनीने आपल्या कमाईचा चुकीचा अंदाज वर्तवला होता, ज्यामुळे स्टॉक बाजारात (share market) मोठी घसरण झाली. ओरॅकलच्या शेअरचा भाव जवळपास ८० टक्क्याहून पडला. 

    संकटातून मार्ग काढण्यासाठी, लॅरी एलिसनने कंपनीच्या व्यवस्थापनाची पुनर्रचना केली आणि 1992 च्या अखेरीस ओरॅकल पुन्हा आर्थिक स्थिरतेत आली. 1990 च्या दशकाच्या मध्यात, एलिसनला नेटवर्क कॉम्प्युटर (NC) नावाचा डेस्कटॉप पीसीचा स्वस्त पर्याय विकसित करून मायक्रोसॉफ्टशी स्पर्धा करण्याची संधी मिळाली. NC ही कल्पना पुढे क्लाउड कॉम्प्युटिंगच्या सुरुवातीची चाचणी होती. परंतु, PC च्या सतत कमी होणाऱ्या किमती आणि NC च्या विकासातील विलंब यामुळे मायक्रोसॉफ्टने बाजारात वर्चस्व गाजवलं. 

    त्यांची ही गोष्ट दाखवते की अपयश ही यशाच्या प्रवासात एक पायरी असते. प्रत्येक आव्हानातून शिकून, नव्या उमेदीने पुढे जाणं हेच खऱ्या उद्योजकाचं वैशिष्ट्य असतं. एलिसनची दूरदृष्टी, त्यांची  चिकाटी आणि त्यांच्या चुका स्वीकारण्याची तयारी हेच त्यांच्या  यशाचं गमक ठरलं.

    412795243

    यशाच्या शिखरावर

    लॅरी एलिसनने इंटरनेटच्या प्रारंभिक काळात ओरॅकलला यशाच्या शिखरावर नेले. वर्ल्ड वाइड वेब (www) तंत्रज्ञानाशी सुसंगत उत्पादने विकसित करण्यावर भर देऊन, त्यांनी कंपनीची वाढ सुनिश्चित केली. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला, एलिसनने प्रतिस्पर्धी सॉफ्टवेअर कंपन्या खरेदी करण्याचे आक्रमक धोरण अवलंबले, ज्यामुळे ओरॅकलची ताकद अधिकच वाढली.

    पीपलसॉफ्ट (2005), सिबेल (2006), BEA (2008), आणि सन मायक्रोसिस्टम्स (2010) या मोठ्या कंपन्यासह अनेक कंपन्या ओरॅकलमध्ये विलीन झाल्या आणि आज  त्यांच्या दूरदृष्टी आणि धाडसी निर्णयांमुळे ओरॅकल जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात एक अग्रगण्य कंपनी बनली आहे.

    एलिसन हे सिलिकॉन व्हॅलीतील सर्वात विशेष आणि  वेगळ्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते, त्यांचे  उत्तुंग यश जगभरात कौतुकास पात्र ठरले. त्यांच्या व्यवसायातील धाडसी निर्णयांमुळे आणि प्रगतीशील दृष्टिकोनामुळे त्यांचे नाव आज अग्रगण्य उद्योजकांमध्ये गणले जाते. 2010 मध्ये प्रतिष्ठित अमेरिका चषक जिंकणारा संघ उभारून त्यांनी आपले नेतृत्व कौशल्य दाखवले. 2012 मध्ये, त्यांनी हवाईयन बेट लनाईचे 98 टक्के भाग विकत घेऊन, आपले भव्य स्वप्न साकार केले. त्या काळात त्यांची  वैयक्तिक संपत्ती सुमारे $40 अब्ज होती, ज्यामुळे ते  जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले. सप्टेंबर 2014 मध्ये, एलिसनने Oracle चे CEO पद सोडले, परंतु कंपनीच्या प्रगतीसाठी कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) म्हणून योगदान देत राहिले . 

    मित्रांनो, लॅरी एलिसन यांची जीवनकथा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अत्यंत गरिबीतून संघर्ष करत त्यांनी जगातील एक मोठं असणारं साम्राज्य उभं केलं. ‘अम्पॅक्स कॉर्पोरेशन’मध्ये काम करत असताना त्यांना ‘ओरॅकल’ची फक्त कल्पना सुचली होती आणि याच कल्पनेवर त्यांनी मेहनतीने कार्य केलं. आज ‘ओरॅकल’मध्ये १,२२,००० हून अधिक कर्मचारी काम करत असून कंपनीची एकूण संपत्ती ९१ बिलियन डॉलर्स आहे.

    लॅरी एलिसन यांची संपत्ती सुमारे ५६ बिलियन डॉलर्स एवढी असून त्यांनी आपला प्रवास खडतर परिस्थितीतून सुरू केला होता. त्यांच्या या यशस्वी प्रवासामध्ये त्यांनी अनेक आव्हानं पार केली. 

    जगातील सर्वाधिक डेटा साठवणारी कंपनी उभारणारे आणि प्रचंड संपत्तीचे मालक लॅरी एलिसन हे जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असून अमेरिकेत तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. परंतु, एवढी मोठी कंपनी उभी करणारे आणि अफाट संपत्ती कमावणारे लॅरी एलिसन यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. लहानपणी सोडून दिल्या गेलेल्या या मुलाने स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेट्स यांच्या बरोबरीने यश मिळवले. त्यांचा प्रवास हा आपल्यासारख्या लाखो तरुणांना स्वप्न पाहण्याची आणि ते प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा देतो.

    आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत यापेक्षा आपला दृष्टिकोन आणि मेहनत कशी आहे, हेच आपल्या यशाचं खरं कारण असतं, हे लॅरी एलिसन यांच्या जीवनातून शिकायला मिळतं. जर तुम्हाला काहीतरी नवीन वेगळे अविश्‍वसनीय करायचे असेल, तर त्याची तयारी आता आणि लगेच करा असं लॅरी नेहमी सांगत असतात, त्यांच्या या प्रवासातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करावा, कारण शेवटी  यश मिळवण्यासाठी चिकाटी आणि प्रयत्न यांचीच गरज असते.

    आणखीन वाचा:

  • यशस्वी जीवनाचा मूलमंत्र; चिकाटी आणि सातत्य

    यशस्वी जीवनाचा मूलमंत्र; चिकाटी आणि सातत्य 

    एखादं लहान मूल जेव्हा जन्माला येतं, तेव्हा ते लगेच चालायला शिकत नाही. अनेकदा चालण्याच्या प्रयत्नात ते धडपडतं, पण पडल्यावरदेखील ते चालणं सोडत नाही. सरतेशेवटी त्याच्या प्रयत्नांना यश मिळतं आणि ते मूल चालायला शिकतं. त्या लहान मुलाला कोणी चालण्याचे धडे दिलेले असतात का? तर नाही. ते स्वतःच शिकतं आणि प्रयत्न करायला लागतं. सांगायचं काय, ‘तर केलं तर नक्की होतं.’ process खूप महत्वाची आहे. त्या process मध्ये टिकून राहणं त्याहून जास्त महत्वाचं. जो थांबणार त्याचा शेवट निर्विवाद आहे आणि जो टिकून राहणार, त्याचं यश सुद्धा हमखासच. टिकून राहणं आणि करत राहणं एवढीच समज घ्यायची. आयुष्याचा प्रवास, यशाचा प्रवास हा कमी अधिक प्रमाणात सारखाच. वेगळं काय तर प्रवासाचे टप्पे आणि येणारे थांबे. फक्त करत राहायचं आणि लढत राहायचं. 

    image

    कोणत्याही कामात सातत्य ठेवण्याची काही महत्त्वाचे कारणे आहेत :

    प्रगती: सतत प्रयत्न केल्याने आपण हळूहळू, परंतु निश्चितच प्रगती करतो. सातत्यामुळे आपल्याला आपल्या कामात सुधारणा दिसून येतात. आपणच आपल्यात बदल अनुभवतो. 

    निपुणता: सातत्याने एकाच कामात गुंतलेले राहिल्यास त्या क्षेत्रात निपुणता आणि कौशल्य वाढते. त्या कामाचं सुयोग्य तंत्र आपल्या लक्षात येते आणि ते काम आपल्या अंगवळणी पडतं.

    आत्मविश्वास: नियमितपणे प्रयत्न केल्याने आत्मविश्वास वाढतो, कारण यशाची शक्यता वाढते आणि आपण आपली क्षमता ओळखतो. ते काम आपण करू शकतो हा विश्वास आपल्याला वाटतो.

    अनुकूलता: सातत्याने काम केल्याने मन आणि शरीर त्या कामाशी अनुकूल होते, ज्यामुळे कामात वेग येतो आणि कार्यक्षमतेत वाढ होते. कामाचा वेग आणि अचूकता अधिकाधिक वाढते.

    लक्ष्य प्राप्ती: सातत्यामुळे आपण आपल्या ठरवलेल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याची शक्यता अधिक असते. आपल्याला आपलं ध्येय अधिकाधिक जवळ दिसू लागतं. त्या ध्येयप्राप्तीची खात्री वाटू लागते.  

    समयसूचकता : नियमितपणे आणि सातत्याने काम केल्याने वेळेत काम पूर्ण करण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे इतर कामांसाठी वेळ उपलब्ध होतो. आपण स्वत: आपली personal life आणि corporate life मध्ये प्रामाणिक आणि punctual राहायला लागतो. 

    कौशल्य विकास : सातत्यामुळे आपण आपले कौशल्यं आणि तंत्र अधिकाधिक सुधारू शकतो. नियमित सराव आणि प्रयत्न केल्याने कोणत्याही गोष्टीत निपुणता मिळते.

    ध्यान आणि एकाग्रता : सातत्यामुळे आपल्या कामावर लक्ष केंद्रित राहते. मन एकाग्र होते. यामुळे विचलित न होता आपले उद्दिष्ट साध्य करण्याची क्षमता विकसित होते.

    स्वयंशिस्त: सातत्याने काम केल्याने आपल्यात स्वयंशिस्त येते, काटेकोरपणा येतो. जी फक्त कोणतेही उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच नाही, तर आपले जीवन अधिक अनुशासित आणि परिणामकारक बनविण्यासाठी आवश्यक आहे.

    आत्मसंतोष: सातत्याने प्रयत्न करून जेव्हा आपण आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचतो, तेव्हा त्यातून मिळणारी आत्मसंतोषता आणि अतीव आनंद खूप महत्त्वाचा असते.

    image 1

    सातत्य ठेवल्यामुळे होणारे फायदे खालीलप्रमाणे : 

    आव्हानं ओळखण्याची क्षमता: सातत्याने काम करत राहिल्याने कोणत्या ठिकाणी अडचणी येतात किंवा समस्या उद्भवतात, हे ओळखणे सोपे होते. यामुळे त्या समस्यांवर उपाय शोधणे व त्या सोडविणे अधिक सोपे होते.

    दृढ इच्छाशक्ती: सातत्याने प्रयत्न करत राहिल्यामुळे इच्छाशक्ती मजबूत होते, जे अडचणींचा सामना करण्यासाठी महत्त्वाचे असते.

    संयम आणि सहनशीलता: सातत्य हे संयम आणि सहनशीलता वाढवते. यामुळे आपल्याला तात्काळ यश न मिळाल्यास निराश न होता पुढे जाण्याची प्रेरणा मिळते.

    शारीरिक व मानसिक आरोग्य: नियमित व्यायाम किंवा योगासारख्या सातत्याने केलेल्या गोष्टींमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते.

    विश्वासार्हता: सातत्यामुळे आपली विश्वासार्हता वाढते. इतर लोक आपल्यावर विश्वास ठेवतात आणि आपली जबाबदारी स्वीकारतात.

    दीर्घकालीन यश: सातत्य हे दीर्घकालीन यशाचा पाया बनते. सातत्याने मेहनत घेतल्यास आपण आपल्या क्षेत्रात दीर्घकालीन यश मिळवू शकतो.

    कुटुंब व समाजातील नाते: सातत्याने दिलेला वेळ आणि प्रयत्न कुटुंब व सामाजिक नात्यांना बळकटी देतो. नियमित संवाद आणि सहभागामुळे नाते अधिक घनिष्ट होते.

    चांगल्या सवयींची निर्मिती: सातत्याने काहीतरी करत राहिल्यामुळे चांगल्या सवयी निर्माण होतात, ज्या आपले जीवन सुधारण्यात मदत करतात.

    आणखीन वाचा

  • ‘मार्केटिंग’ म्हणजे काय आणि मार्केटिंगचे प्रकार

    ‘मार्केटिंग’ म्हणजे काय आणि मार्केटिंगचे प्रकार

    इंटरनेटच्या आधारे चालणाऱ्या या माध्यम स्वरूपात काही क्षणांमध्ये अनेक लोकांपर्यंत पोहोचता येतं. तुमचा व्यवसाय काय आहे, कोणासाठी आहे, त्याची किंमत काय इत्यादी सर्व महत्वाच्या गोष्टी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं हे एक सर्वोत्तम साधन म्हणावं लागेल. सोशल मीडियाच्या मदतीने व्यवसाय वाढवत असताना मार्केटिंग स्ट्रॅटेजी पक्की असली पाहिजे असं म्हणतात, मात्र मार्केटिंग म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय? हे जाणून घेऊया…

    मार्केटिंग म्हणजे काय?

    एखादा विक्रेता जेव्हा त्याच्याजवळ असलेल्या सेवा आणि उत्पादनांचा प्रचार करतो तेव्हा त्याला मार्केटिंग करणं असं म्हणतात किंवा आपला ग्राहकवर्ग कोणता आहे, त्यांची गरज काय आहे हे ओळखून त्यांना आपल्या उत्पादनांकडे आकर्षित करणं याला मार्केटिंग म्हटलं जाऊ शकतं. तुमच्याजवळ असलेली वस्तू ग्राहकांच्या मनात उतरावी, त्यांच्या पसंतीस यावी आणि त्यांना वाटावं की आपली गरज इथेच पूर्ण होऊ शकते आणि त्यांना ती खरेदी करण्याची इच्छा व्हावी म्हणजेच सोप्या शब्दांत मार्केटिंग होय. वर्तमानपत्रांमध्ये तुम्ही जाहिराती पाहिल्याच असतील जिथे डोळ्यांना भावणाऱ्या शब्दांमध्ये प्रॉपर्टीची जाहिरात केली जाते. ती जाहिरात वाचून आपल्या मनात देखील असंच एखादं घर असावं अशी इच्छा निर्माण होते आणि यालाच आपण मार्केटिंगची जीत म्हटली पाहिजे. 

    960x0 1

    व्यवसाय म्हटलं की मार्केटिंग हा त्याचा अविभाज्य भाग ठरतो, कारण मार्केटिंगमध्ये एखादा उपक्रम यशस्वी बनवण्याची किंवा मुळापासून उखडून टाकण्याची ताकद असते. यामध्ये सर्वात अगोदर तुम्ही वावरत असलेल्या बाजाराचा अभ्यास केला जातो, या अभ्यासामधून ग्राहकांची गरज ओळखायला मदत होते आणि सोबतच आपले प्रतिस्पर्धी कोण आहेत याचं ढोबळ चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. हा अभ्यास झाल्यानंतर आपण कोणत्या गोष्टी विकणार आहोत, त्याची किंमत किती असेल, त्याचं पॅकेजिंग कसे असेल, देवाण-घेवाणीमधून आपण जास्तीत जास्त विक्री करून महसूल कसा उभा करू शकतो याची आखणी केली जाते. 

    मार्केटिंगमधल्या 4Ps कोणत्या?

    १) Product: कोणत्याही प्रकारचे मार्केटिंग कॅम्पेन सुरु करण्याअगोदर विक्रेत्याला तो विकत असलेल्या वस्तू किंवा सेवेबद्दल माहिती असली पाहिजे, कारण संपूर्ण कॅम्पेन याच उत्पादन किंवा सेवांवर अवलंबून असते. आपण विकत असलेल्या वस्तू ग्राहकांना कशाप्रकारे मदत करतील, आपण बाजाराची गरज पूर्ण करणारी वस्तू बाजारात विकत आहोत का याची माहिती विक्रेत्याला असली पाहिजे. 

    २) Price: विक्रेता विकत असलेल्या वस्तूची किंमत म्हणजे प्राईस. यामध्ये युनिटची किंमत, वितरणाचा खर्च, विपणनाचा खर्च इत्यादी घटक ग्राह्य धरले जातात. ग्राहकांकडून त्या वस्तूसाठी किती प्रमाणात मागणी आहे किंवा प्रतिस्पर्धी तीच वस्तू कोणत्या किमतीत विकतोय यांवर वस्तूची किंमत ठरते. 

    ३) Place: विक्रेता उत्पादन किंवा सेवा कशाप्रकारे ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहे याचा विचार देखील विपणनात केला जातो. आधी बऱ्यापैकी वस्तूंची विक्री प्रत्यक्षात व्हायची, मात्र आता सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या जगात ऑनलाईन देखील वस्तू विकल्या जातात. 

    ४) Promotion: विक्रेता विकत असलेली वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे प्रमोशन. जाहिरात, जनसंपर्क, सोशल मीडिया इत्यादींच्या मदतीने वस्तूंचा प्रचार केला जातो. 

    मार्केटिंगचे प्रकार किती आहेत?

    १) ब्लॉग मार्केटिंग: संबंधित ग्राहकांपर्यंत ब्लॉगिंगच्या माध्यमातून आवश्यक माहिती पोहोचवणे म्हणजे ब्लॉग मार्केटिंग होय. यामध्ये विक्रीसाठी निवडलेल्या वस्तूंची विशिष्ट माहिती दिली जाते. 

    २) इंटरनेट मार्केटिंग: आजच्या जगात अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इंटरनेटशिवाय चांगला पर्याय उपलब्ध नाही आणि म्हणूनच उत्तमरित्या इंटरनेटचा वापर करून विपणन केल्यास आर्थिक फायदा होऊ शकतो. 

    ३) प्रिंट मार्केटिंग: आपण जरी इंटरनेटच्या युगात वावरत असलो तरीही वर्तमानपत्र आणि मासिकांचा वाचकवर्ग आजही अफाट आहे आणि परिणामी लक्षवेधी छायाचित्रे, दर्जेदार लिखाण केल्यास वाचकांच्या मनात जागा निर्माण करता येते. 

    ४) सोशल मीडिया मार्केटिंग: सोशल मीडियाचा वापर किती प्रमाणात केला जातो याबद्दल विशेष काही नमूद करण्याची गरज नाही. लाखो, कोट्यवधी लोकं दर दिवशी हातात मोबाईल घेऊन वावरत असतात आणि म्हणूनच तांत्रिक जगात वावरत असताना सोशल मीडिया मार्केटिंग हा पर्याय उपयुक्त ठरतो. Instagram, Facebook, Twitter  यांसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ग्राहकांना आकर्षित करण्यात मदत करतात. 

    ५) व्हिडिओ मार्केटिंग: कदाचित तुम्हाला सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेल्या ‘Reels’ बद्दल माहिती असेल. व्हिडीओ मार्केटींगद्वारे अगदी ३० सेकंदांमध्ये अत्यावश्यक माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाऊ शकते आणि तांत्रिक घटकांमुळे अधिक आकर्षकदृष्ट्या आपली गोष्ट मांडता येते. 

    ६) SEO मार्केटिंग: Pay-Per-Click या संकल्पनेवर आधारित चालणाऱ्या या उपक्रमात स्पर्धात्मक जगात वावरणाऱ्या इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या पुढे स्वतःला ठेवण्यासाठी सर्च इंजिनला पैसे दिले जातात. वाचकांनी अधिकाधिक लक्ष द्यावे, कंपनीची साईट उघडून बघावी म्हणून SEOची प्रक्रिया वापरली जाते. 

    मार्केटिंगची मदत घेतल्यामुळे तुम्ही कोणती उत्पादने विकत आहात याची सविस्तर माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात मदत मिळते. जास्तीत-जास्त लीड्स मिळवल्यामुळे दीर्घकाळासाठी ब्रॅण्डची विक्री वाढते. सध्या आपण शर्यतीच्या जगात वावरत आहोत. जिथे मार्केटिंगमधून मिळणाऱ्या मदतीची गरज सर्वाधिक आहे. अनेकवेळा तुम्ही मार्केटिंगच्या मदतीने स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करू शकता, ज्यामधून नफा वाढतो.

    आणखीन वाचा:

  • ऑलिम्पिक गाजवणारा बीडचा शिलेदार : अविनाश साबळे

    ऑलिम्पिक गाजवणारा बीडचा शिलेदार : अविनाश साबळे

    बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा गावातील एका साधारण शेतकरी कुटुंबात  १३ सप्टेंबर १९९४ ला जन्मलेल्या अविनाशची घरची परिस्थिती तशी जेमतेमच. त्याचे आई वडील वीटभट्टी कामगार होते. आईवडिलांचा संघर्ष आणि घरातील दारिद्र्य उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या अविनाशची स्वप्नं मात्र छोटी नव्हती. सुरुवातीच्या काळात त्याच्याकडे प्राथमिक सुविधा नसताना, त्याने विविध खेळांमध्ये भाग घेतला. अविनाशला लहानपणापासून धावण्याचा सराव होता. घरापासून शाळा लांब असल्याने तो धावत शाळेमध्ये जायचा.  ग्रामीण भागात संसाधनांची कमतरता असताना, अविनाशने मातीच्या रस्त्यावर आणि साध्या साधनांवर प्रशिक्षण घेतले. त्याच्या पदरी कित्येक वेळा निराशा आणि अपयश आले; पण त्याचा आत्मविश्वास आणि चिकाटीने त्याला कायम पुढे जाण्यासाठी प्रेरित केले. 

    अविनाशने आपल्या शालेय जीवनात धावण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्यात यशही मिळवले. १२ वी झाल्यानंतर तो भारतीय लष्करामध्ये भरती झाला. तिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आणि धावण्यासाठीप्रोत्साहित केले. २०१८ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अविनाशने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्य पदक जिंकले. त्यानंतर २०१९ साली जागतिक क्रीडा स्पर्धेत त्यांनी नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. 

    गरीब परिस्थितीचे चटके सोसत त्याने आज बीड ते पॅरिस ऑलिम्पिक असा संघर्षमय प्रवास पूर्ण केला. फायनलमध्ये पदक जरी मिळाले नसले तरी कोणत्याही प्रकारची खेळाची पार्श्वभूमी नसताना अविनाशने घेतलेली एवढी मोठी झेप ही निःसंशय कौतुकास्पद आहे. 

    मंजिल उन्हीं को मिलती है;
    जिनके सपनो में जान होती है; 
    पंख से कुछ नहीं होता; 
    हौंसलों से ही उड़ान होती है।

    जय हिंद

    आणखी वाचा:

  • आर्थिक स्वातंत्र्याची पहिली पायरी: आर्थिक ध्येयनिश्चिती

    आर्थिक स्वातंत्र्याची पहिली पायरी: आर्थिक ध्येयनिश्चिती  

    याच विषयावर आज आपण बोलणार आहोत, की नेमकं आर्थिक ध्येय म्हणजे काय? आणि हे आर्थिक ध्येय कसं ठरवायचं? 

    आर्थिक ध्येय म्हणजे आर्थिक स्वप्न किंवा उद्दिष्टे जे तुम्ही तुमच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी किंवा साध्य करण्यासाठी ठरवता. हे ध्येयं तुम्हाला तुमचे आर्थिक निर्णय घेण्यात मदत करतात आणि तुमच्या भविष्याच्या योजना निश्चित करण्यात मदत करतात. 

    image 2

    आर्थिक ध्येयांमध्ये खालील गोष्टींचा समावेश असू शकतो :

    1. Savings: विशिष्ट रक्कम सेव्ह करणे.

    2. निवृत्ती नियोजन: निवृत्तीनंतरच्या आपल्या खर्चांसाठी निधी जमा करणे.

    3. कर्ज फेडणे: कर्जमुक्त होण्यासाठी ठराविक वेळेत कर्ज फेडणे.

    4. घर खरेदी: प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आयुष्यात एकदा तरी आपलं स्वतःचं  घर व्हावं. स्वतःचे घर खरेदी करणे हे नक्कीच एक चांगलं आर्थिक ध्येय असू शकतं. 

    5. आपत्कालीन निधी: अडचणी कधीच सांगून येत नाहीत. कधी कोणती परिस्थिती समोर उभी राहील याचा आपण अंदाज लावू शकत नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत उपयोगात येणारा निधी तयार करणे गरजेचे आहे. 

    6. शिक्षण: स्वतःच्या किंवा मुलांच्या शिक्षणासाठी निधी जमा करणे.

    7. गुंतवणूक: संपत्ती वाढवण्यासाठी विविध ठिकाणी गुंतवणूक करणे.

    आर्थिक ध्येय असणे तुम्हाला तुमच्या आर्थिक वाटचालीसाठी एक स्पष्ट दिशा देतं आणि तुम्हाला त्वरित निर्णय घेण्यासाठी सहाय्यक ठरतं.

    आर्थिक ध्येयांचे अधिक तपशीलवार उदाहरणे आणि महत्त्व समजून घेण्यासाठी खालील मुद्दे विचारात घेता येऊ शकतात

    finance

    आर्थिक ध्येयांचे प्रकार :

    1. लघुकालीन ध्येये (Short-term Goals) :

    • महिन्याकाठी बचत: दर महिन्याला ठराविक रकमेची बचत  करणे.
    • कर्जाची नियमित हप्त्यांनी परतफेड: क्रेडिट कार्ड बिल, वैयक्तिक कर्ज किंवा शैक्षणिक कर्जाची हप्त्यांनी फेड करणे.
    • आपत्कालीन निधी निर्माण: आकस्मिक खर्चांसाठी निधी तयार ठेवणे.

    2. मध्यमकालीन ध्येये (Medium-term Goals) :

    • वाहन खरेदी: काही वर्षात नवीन किंवा वापरलेले वाहन खरेदी करणे.
    • शिक्षण खर्च: स्वतःच्या किंवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी निधी गोळा करणे.
    • घरगुती सुधारणा: घराच्या देखभाल, दुरुस्ती किंवा सजावटासाठी निधी जमा करणे.

    3. दीर्घकालीन ध्येये (Long-term Goals) :

    • निवृत्ती नियोजन: निवृत्तीनंतरच्या खर्चांसाठी दीर्घकालीन गुंतवणूक योजना तयार करणे.
    • घर खरेदी किंवा बांधकाम: आपले स्वतःचे घर खरेदी करणे किंवा बांधणे.
    • वारसा योजना: मुलांसाठी, नातवंडांसाठी किंवा परोपकारी कार्यांसाठी संपत्ती राखणे.

     आर्थिक ध्येयांचे महत्त्व :

    • आर्थिक शिस्त: आर्थिक ध्येय ठरवल्याने आपल्याला खर्चावर नियंत्रण मिळवता येते आणि बचतीसाठी प्रेरणा मिळते.
    • निश्चिंतता: ध्येयांची पूर्तता केल्यामुळे भविष्यातील अनिश्चितता कमी होते आणि मानसिक शांतता मिळते.
    • प्रगतीचे मापन: आपले आर्थिक प्रगती किती झाली आहे हे आपल्याला  मोजता येते.
    • प्राथमिकता निश्चिती: कोणते खर्च महत्त्वाचे आणि कोणते टाळता येतात हे ओळखता येते.
    • Financial Planning : आर्थिक ध्येयांमुळे योजनाबद्ध गुंतवणूक आणि बचत करण्यास मदत होते.
    1683308255213

     आर्थिक ध्येय कसे ठरवावेत:

    • करता येण्याजोगे : ध्येय वास्तववादी आणि साध्य करता येण्याजोगे असावे.
    • Relevant: ध्येय आपल्या आयुष्याशी संबंधित आणि महत्त्वाचे असावे.
    • Time-bound (कालबद्ध): ध्येय साध्य करण्यासाठी ठराविक वेळ आणि काळ निश्चित करणे.

    2. प्राथमिकता ठरवा : तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांनुसार ध्येयांची प्राथमिकता ठरवा व त्यानुसार त्यांच्या पूर्ततेला सुरुवात करा. 

    3. गुंतवणुकीची योजना : ध्येय साध्य करण्यासाठी योग्य गुंतवणूक योजना ठरवा.

    4. सल्ला घ्या : आर्थिक तज्ञांचा तसेच या क्षेत्रात सखोल माहिती आणि ज्ञान असणाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या आणि तुमच्या ध्येयांसाठी योग्य आर्थिक साधनांचा वापर करा.

    आणखी वाचा :

  • पुरेशी झोप घे रे पाखरा!

    पुरेशी झोप घे रे पाखरा!

    शरीराच्या योग्य कार्यासाठी आणि मानसिक संतुलनासाठी पुरेशी झोप अत्यावश्यक आहे. झोप कमी झाल्यास त्याचा आपल्या आरोग्यावर आणि कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पुरेशी झोप घेतल्याने ऊर्जा वाढते, एकाग्रता टिकवून ठेवता येते आणि मानसिक आरोग्य सुधारण्यात मदत होते.

    gettyimages 920554794 1 1558019750

    निरोगी जीवनशैलीसाठी झोपेचे महत्त्व अपार आहे. झोप ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी आपल्या शरीराला नवीन ऊर्जा प्रदान करते. मानवी शरीराला किमान ७ तास झोप आवश्यक असते, चांगली आणि पूर्ण झोप आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग झोपेच्या महत्त्वाबद्दल अधिक जाणून घेऊया.

    1. शारीरिक बांधणी 

    रात्रीच्या झोपेमध्ये आपल्या शरीराची एकप्रकारे पुनःबांधणी होते. हॉर्मोनल संतुलन राखणे, ताणतणाव कमी करणे, आणि शरीरातील पेशींना कार्यन्वित करणे हे झोपेमुळे शक्य होते. पुरेशी झोप न मिळाल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि रोगप्रतिकारक प्रणाली कमजोर होते.

    २. मानसिक स्वास्थ्य

    झोपेमुळे मेंदूला आराम मिळतो आणि नवीन माहिती आणि अनुभवांच्या प्रक्रियेत मदत होते. कमी झोपेमुळे तणाव, चिंता आणि डिप्रेशन यांसारख्या मानसिक आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. चांगली झोप मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक आहे, जी स्मरणशक्ती आणि निर्णयक्षमता सुधारण्यासाठी मदत करते.

    ३. भावनिक संतुलन

    good night sleep

    योग्य झोपेमुळे भावनिक संतुलन राखले जाते. झोप न मिळाल्यास चिडचिडेपणा, अस्वस्थता आणि भावनिक असंतुलनाची समस्या उद्भवते. योग्य झोपेमुळे भावनिक स्थिरता आणि आनंदाची भावना वाढते.

    ४. शारीरिक आरोग्य

    झोपेचा आपल्या शारीरिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. झोपेच्या अभावामुळे वजन वाढणे आणि मोटापा यांसारख्या समस्या उद्भवतात.

    ५. उत्पादनक्षमता आणि कार्यक्षमता

    चांगली झोप आपली उत्पादनक्षमता आणि कार्यक्षमता वाढवते. नीट झोप घेतल्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणे, निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे सोपे होते. झोपेच्या अभावामुळे कार्यक्षमतेत घट येते आणि चुका होण्याची शक्यता वाढते.

    ६. रोगप्रतिकारक शक्ती

    झोपेमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. नीट झोप घेतल्याने सर्दी, खोकला आणि इतर संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होतो. कमी झोपेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते आणि आपण लवकर आजारी पडतो.

    ७. त्वचेचे आरोग्य

    चांगली झोप आपली त्वचा ताजेतवानी आणि निरोगी ठेवते. झोपेच्या अभावामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे, त्वचेवर सुरकुत्या आणि मुरुमांसारख्या समस्या उद्भवतात.

    मित्रांनो चांगली झोप आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी पुरेशी आणि गुणवत्तायुक्त झोपेची गरज आहे. पुरेशा  झोपेमुळे आपण निरोगी, ताजेतवाने जीवन जगू शकतो.

  • संख्येने कमी मात्र अब्जाधीशांमध्ये अव्वल; काय आहे पारशी समाजाची गोष्ट?

    संख्येने कमी मात्र अब्जाधीशांमध्ये अव्वल; काय आहे पारशी समाजाची गोष्ट?

    पारशी समाजाचा उगम कसा झाला?

    आजच्या घडीला केवळ देशातच नाही, तर विदेशात देखील भारताचे नाव गाजवत असलेली कंपनी म्हणजे टाटा समूह किंवा Tata Group of Industries आणि या कंपनीचे सर्वेसर्वा रतन टाटा. मात्र तुम्हाला माहिती आहे का हे रतन टाटा देखील पारशीच आहेत. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आज भारतीय व्यावसायिक क्षेत्रात सर्वोच्च  कामगिरी बजावणारा हा पारशी समाज मूळचा भारतीय नाही. सध्याच्या काळात जो देश इराण म्हणून ओळखला जातो त्याचं जुनं नाव होतं पर्शिया आणि म्हणून तिथून उगम पावलेले लोक पारशी म्हणून ओळखले जातात. पारशी समाज इ.स पूर्व ७व्या शतकापासून या भागात पाहायला मिळू लागला. मात्र त्यानंतर इराणवर अरबी मुस्लिमांकडून आक्रमणं व्हायला सुरुवात झाली. या भयावह आक्रमणांना तोंड देणं पारशी समाजाला जमणारं नव्हतं म्हणूनच त्यांनी स्थलांतर करायला सुरुवात केली. 

    विविध दिशांना निघालेल्या या जहाजांपैकी कैक जहाजं भारतातील गुजरात राज्याच्या सीमेला येऊन धडकली. परदेशातून आलेल्या या समजाला स्थानिकांशी संवाद मात्र साधता येईना आणि स्थानिक देखील या लोकांबद्दल आणि त्यांच्या भाषेबद्दल अनभिज्ञ होते. परिणामी सर्व खबर स्थानिक राजाच्या कानी घालण्यात आली. आता या अनोळखी लोकांशी संवाद साधायचा तरी कसा या विचारात असलेल्या राजाला अचानक एक कल्पना सुचली, त्याने ताबडतोब एक भरलेला दुधाचा पेला पारशी समूहासमोर आणून ठेवला. या काठोकाठ भरलेल्या पेल्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, की राज्याची लोकं सामावून घेण्याची मर्यादा संपली आहे आणि यात आणखी लोकांना सामावून घेता येणार नाही. 

    राजाच्या या निर्णयावर हताश न होता पारशी लोकांनी संयम बाळगला आणि त्यानंतर पारशी लोकांकडून आलेलं उत्तर सर्वांना अचंबित करणारं होतं. पारशी लोकांनी त्याच दुधाने भरलेल्या पेल्यात काहीशी साखर मिसळली आणि तो पेला पुन्हा राजासमोर ठेवला. राजा या उत्तरावर खुश झाला, तुमच्या समाजामध्ये आम्ही साखरेप्रमाणे विरघळून जाऊ असा मतितार्थ समोर ठेऊन पारशी लोकांनी त्यांच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर या स्वभावाचं उदाहरण प्रस्तुत केलं आणि  सर्वांना क्षणार्धात जिंकूनही घेतलं. बुद्धिमान, हुशार, मेहनती आणि शेतीचा अनुभव असलेल्या पारशी समाजाने दिलेल्या शब्दाचं  पालन केलं. ते राजाच्या छत्रछायेत आनंदाने राहू लागले  मात्र काही काळानंतर आलेल्या दुष्काळाने त्यांना देशाटन करायला भाग पडलं. त्याकाळात आपल्या भारतात विविध राज्यांमध्ये आपापसात युद्धं व्हायची, मात्र पारशी लोकांनी कधीही अशा युद्धांमध्ये भाग घेतला नाही, याउलट नेहमीच सर्व राज्यांशी जुळवून घेत व्यवसाय सुरु ठेवला. 

    45037151 2305641402992949 1628658427641200640 n 1

    इंग्रजांची सत्ता आणि पारशी समाज

    पारशी समाज भारतात मुख्यत्वेकरून दलालीचा व्यवसाय (Brokerage business) करायचा. सर्वांशी जुळवून घेत ते व्यापार वाढवतच होते आणि अशातच व्यापाराच्या उद्देशाने काही मत्सरी पाऊलं भारतात उमटली. साधारण १६०८ साली इंग्रजांनी मसाल्याच्या व्यापाराचे निमित्त साधून भारतीय बाजारात आणि भूमीत प्रवेश मिळवला. भारताचे वैभव पाहून त्यांचे डोळेच दिपले आणि या संधीसाधू माणसांनी भारतावर राज्य करण्याचा निर्णय पक्का केला. काही स्वकीयांच्या धूर्त, फितूर आणि लालची स्वभावामुळे ते यशस्वी देखील झाले. इंग्रजांच्या जुलमी राजवटीखाली भारतीय जनता होरपळून निघत होती, मात्र पारशी समाजाने या संधीचं सोनं करून दाखवलं. सर्वात अगोदर पारशी लोकांनी इंग्रजांची भाषा शिकून घेतली, कारण भाषा हीच संवाद साधण्याचं महत्वाचं साधन आहे. पारशी लोकांनी इंग्रजी भाषेचा अभ्यास केल्याने इंग्रजांना देखील स्थानिकांशी संवाद साधण्यासाठी मदत मिळू लागली. इंग्रजी राजवटीत पारशी लोकं इंग्रजांकडे नोकरी करायचे आणि म्हणूनच त्याकाळात अनेक पारशी लोकं सरकारी कर्मचारी म्हणून पाहायला मिळत. पारशी लोकांच्या या स्वभावगुणांमुळे त्यांनी इंग्रजी राजवटीचा केंद्रबिंदू असलेल्या आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरलेला मुंबई/बॉम्बे मध्ये जम बसवला. 

    Cover2 1

    भारतात इंग्रजी सत्ता असताना घडलेला एक महत्वाचा प्रसंग म्हणजे चीन आणि युरोप यांमध्ये वाढलेला व्यापार. चीन युरोपला मोठ्या प्रमाणात चिनी मातीची भांडी, चहा आणि रेशीम पाठवायचा आणि युरोपकडून देखील या वस्तूंसाठी मागणी वाढत होती. दुसऱ्या बाजूला चीन आणि युरोप यांमधले वृद्धिंगत होणारे संबंध इंग्रजांना रुचणारे नव्हते आणि म्हणूनच त्यांनी पारशी लोकांच्या मदतीने चीनमध्ये अफूची निर्यात सुरु केली. येणाऱ्या  प्रत्येक दिवसासोबत चीनमधून अफूची मागणी वाढू लागली, एक वेळ तर अशी आली होती की चीनमध्ये प्रत्येक ४ पैकी ३ माणसं अफूच्या आहारी गेली होती. अफूच्या व्यापाराने इंग्रजांना काय फायदा झाला? एकतर चीनमधील लोकं अफूच्या नशेत असल्याने युरोपसोबतचा व्यापार कमी झाला आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या निर्यातीमुळे धानाचे पेटारे भरू लागले. 

    पारशी समाज आणि आज

    स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच पारशी समाज भारतात उत्तमरीत्या त्यांचा जम बसवून आहे. इंग्रजांची राजवट असताना देखील त्यांनी अनेक सन्मानित पदं सांभाळली होती. पारशी लोकं त्याकाळी अनेक जहाजांचे मालक होते, डॉक्टर होते आणि सरकारी कचेऱ्यांमध्ये काम देखील करायचे. पारशी लोकांनी जरी भरपूर पैसा कमावला असला तरीही आपण कोणत्या परिस्थितीमधून इथवर आलोय याची जाण त्यांना कायमच होती आणि म्हणूनच कमावलेल्या पैशांमधून त्यांनी मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी हॉस्पिटल्स आणि शैक्षणिक संस्थांची निर्मिती करत समाजाप्रती नेहमीच आपले कर्तव्य निभावलं. स्वातंत्र्योत्तर काळातही आपण जर का यांची संख्या मोजायला गेलो तर ती ०.००५ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही, मात्र भारतीय अब्जाधीशांच्या यादीत तीन ते पाच नावं ही पारशी समाजातील (टाटा, गोदरेज, पूनावाला, मिस्त्री, वाडिया) आहेत.

    एअरलाईन्स, सॉफ्टवेअर, कन्स्ट्रक्शन, फूड, हेल्थ यांसारख्या एक ना अनेक क्षेत्रांमध्ये पारशी समाज अव्वल कामगिरी बजावतोय. देशाची सुरक्षा, मनोरंजन, खेळ किंवा वैज्ञानिक क्षेत्राची समाजातील प्रत्येक क्षेत्रात या लोकांनी नाव कमावलं असल्याने व्यवसायातून झालेली सुरुवात आज अनेक दिशांना पसरलेली आहे. पारशी लोकांची संख्या अत्यंत नगण्य म्हणजे १४२ कोटींच्या देशात फक्त ५७००० असली तरीही सैन्य, मनोरंजन, व्यापार, विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये पारशी नाव कमावताना दिसतात. समाज थोडा असला तरी कर्तबगारांची संख्या खूप मोठी आहे. फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ, जमशेदजी टाटा, रतन टाटा, होमी भाभा, सायरस पुनावाला, आदी गोदरेज, बोमन इराणी अशी अनेक नावं या समाजाच्या कर्तृत्वाचे उदाहरण प्रस्तुत करतात.

    fb52ba bfc2bb9b6d884b34bcd6067456d2940fmv2

    आपण पारशी समाजाकडून काय शिकलो?

    एखादी गोष्ट वाचल्यानंतर आपण त्यातून काय शिकलो याची जाणीव झाली पाहिजे. पारशी समाज हा हातावर मोजण्याएवढा जरी असला तरीही त्यांच्या शांत आणि मेहनती स्वभावामुळे ते अनेकांवर भारी ठरले आहेत. कदाचित त्यांना जन्मजात हा स्वभाव मिळालाही असेल, मात्र तरीही समोर आलेला प्रसंग कशाप्रकारे आपल्या फायद्याचा ठरू शकतो याचे धडे आपण पारशी समाजाकडून गिरवले पाहिजेत. अनेकवेळा फटकळ बोलण्यामुळे मह्त्वाची कामं होता-होता राहतात, मात्र या समाजात जर का टिकून राहायचं असेल आणि चार-चौघांमध्ये वावरायचं असेल तर तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवता आला पाहिजे. सर्वात शेवटी पारशी समाजाकडून शिकण्याची गोष्ट म्हणजे मेहनती स्वभाव, परिस्थिती कितीही बिकट असली तरीही ती केवळ मेहनतीच्या जोरावर बदल घडवता येतात. 

    आणखीन वाचा:

  • हुशारात हुशार माणसाचं सुद्धा डोकं बधिर करणारा ‘ट्रॉली डिलेमा’

    हुशारात हुशार माणसाचं सुद्धा डोकं बधिर करणारा ‘ट्रॉली डिलेमा’

    मात्र कधी विचार केलात का ‘किंमत किंवा व्हॅल्यू’ म्हणजे काय? दुकानात गेल्यानंतर विकत घेतलेल्या हरेक वस्तूसाठी किंमत मोजली जाते आणि म्हणूनच त्या वस्तूच्या किमतीनुसार आपण ती हाताळतो. अगदीच महागडी वस्तू असेल तर तिला जिवापेक्षा जास्त जपलं जातं. नाही का? पण किंमत फक्त विकत घेतलेल्या वस्तूंचीच केली जाते का? नाही!! आपल्या आजूबाजूला वावरणारी मंडळी, आपलं कुटुंब, मित्र परिवार सर्व आपल्यासाठी महत्वाचे असतात आणि म्हणून आपण त्यांची किंमत करतो म्हणजे काय तर त्यांचं आपल्या आयुष्यातील महत्व जाणतो आणि त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, ते आपल्यापासून दुरावणार नाहीत याची काळजी घेतो. दैनंदिन जीवनातील याच घडामोडींच्या आधारे कैक वर्षांपूर्वी ट्रॉली डेलिमाचा सिद्धांत सादर करण्यात आला होता. पण हा संदर्भ नेमका आहे तरी काय हे आज जाणून घेऊया. 

    ट्रॉली डेलिमा म्हणजे काय?

    वर्ष १९६७ मध्ये फिलिप फूट (Philipa Foot) नावाच्या एका फिलॉसॉफरने (Philosopher) हा सिद्धांत मांडला होता. सदर सिद्धांत सामान्य माणसाला समजण्यासाठी फिलिप फूट यांनी एका रेल्वेचं उदाहरण देत एकूण संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात,

    एका वेगाने धावणाऱ्या रेल्वेसमोर जर का पाच माणसं उभी होती म्हणून चालकाने त्यांचा जीव वाचवण्यासाठी रूळ बदलला तर दुसऱ्या रुळावर देखील एक माणूस उभा ठाकला होता. मग अशा कठीण परिस्थितीमध्ये रेल्वे चालकाने काय करावं? साहजिकपणे आपण म्हणू की पाच माणसांचा जीव वाचवण्यासाठी रेल्वेचालकाने एका माणसाचा जीव घ्यावा. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर असंही वाटतं की, जीव हा जीव असतो मग तो एका माणसाचा असो किंवा पाच

    zculq7fmfbt0pdj1g3wq7mu4u86a 1

    या उदाहरणातून आपण काय शिकतो तर आयुष्याच्या प्रवासात काही प्रसंग असेही येतात, जिथे एक योग्य पर्याय निवडला जाऊ शकत नाही. हिंदी भाषेत या प्रसंगाच्या आधारे एक म्हण तयार करण्यात आली आहे ती म्हणजे “आगे कुआं, पीछे खाई” म्हणजे काय तर समोर गेलो तरीही विहिरीत पडू आणि मागे आलो तरीही दरीत कोसळू, एकूण काय तर अशा परिस्थितीत एक सोपा मार्ग निवडला जाऊ शकत नाही. 

    दररोजच्या जीवनात याचा संदर्भ काय?

    जीवन जगात असताना आपण देखील अनेकवेळा अशा ट्रॉली डेलिमाचा सामना करत असतो. विचार करा त्या रेल्वेच्या रुळावर जर का तुमच्या जवळचा कुणीतरी खास व्यक्ती असता, तर तुम्ही कोणाची निवड केली असती, पाच माणसांची की तुमच्या जवळच्या व्यक्तीची? नक्कीच आपण आपल्या जवळच्या व्यक्तीची निवड केली असती आणि तेव्हा आपण एका व्यक्तीचे प्राण वाचवत आहोत की पाच व्यक्तींना जीवनदान देत आहोत असा विचार देखील मनात आला नसता. का? कारण आपल्यासाठी ती जवळची व्यक्ती महत्वाची असते, आपण त्या व्यक्तीची किंमत जाणून असतो. इतिहासाच्या पानांमध्ये डोकावून पाहिलं तर रामायण आणि महाभारतामध्ये देखील या ट्रॉली डेलिमाची उदाहरणं सापडतात. पट्टराणी कैकयीला दिलेल्या वाचनापायी लाडक्या पुत्राला वनवासात जाण्याची आज्ञा न देऊ शकणारा राजा दशरथ असो किंवा कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर स्वतःच्याच परिवारासमोर शत्रू म्हणून धनुष्य घेऊन उभा ठाकलेला अर्जुन असो. ट्रॉली डेलिमाचा एका अर्थाने विचार केल्यास अशा कठीण प्रसंगांमध्ये अनेकवेळा नीती-अनीतीला बाजूला सारत आपल्यासाठी काय महत्वाचं आहे याच्या आधारे निर्णय घेतला जातो. 

    man dressed with arrows his head 1134 485

    याच सिद्धांताचा दुसऱ्या बाजूने विचार करायचा झाल्यास एक खास पैलू उघड होतो. आपल्या मनात अनेक इच्छा असतात, कित्येक गोष्टी साध्य करायच्या असतात, मात्र तरीही आपण त्या करू शकत नाही, कारण आपण त्या इच्छांना महत्व दिलेलं नसतं. ‘मला डॉक्टर व्हायचं आहे’ अशी इच्छा मनात बाळगून वावरणारा कधीही डॉक्टर बनू शकत नाही, मात्र मला डॉक्टर व्हायचं आहे, माझ्यासाठी ही इच्छा पूर्ण होणं महत्वाचं आहे आणि म्हणून मी प्रयत्न करेन असा विश्वास बाळगणाराच यशस्वी होतो आणि म्हणूनच आपलं करिअर घडवताना जे लक्ष साध्य करायचं आहे त्याला महत्व देणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नातेसंबंधाला देखील हाच संदर्भ लागू होतो. नवीन लग्न करून सासरी गेलेली मुलगी जेव्हा सासरच्या घराला महत्व देते, त्यांचा आनंद देखील तिच्यासाठी महत्वाचा ठरतो तेव्हाच ती नवीन घरात रुळते किंवा नवीन संबंध जपू शकते. 

    आणखीन वाचा: