जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासुन शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे; फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता… करायची का सुरुवात?
गरुडाचे जीवनमान ७० वर्षांचे असते, परंतु तो जेव्हा ४०वर्षांचा होतो, तेव्हा त्याला एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो.त्या अवस्थेत त्याच्या शरीराचे 3 महत्वाचे अवयव निष्प्रभ होऊ लागलेले असतात, पंजे लांब आणि लवचिक होतात ज्यामुळे शिकार पकडता येत नाही. चोच पुढील बाजूला वळते, ज्यामुळे भोजन करता येत नाही. पंख जड होतात व छातीस चिकटल्यामूळे पूर्णपणे उघडत नाहीत, त्यामुळे गरुडभरारी सीमित करतात. अन्न शोधणे, सावज पकडणे, अन्न खाणे या तिन्ही क्रिया त्याच्यासाठी अवघड बनून जातात. अशावेळी त्याच्याकडे तीन पर्याय असतात. एक तर प्राण त्याग करणे आणि दुसरा आपली प्रवृत्ती सोडून गिधाडाप्रमाणे मृत अन्नावर गुजराण करणे आणि तिसरा पर्याय असतो आकाशाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून स्वतःला पुनर्स्थापित करणे!
जिथे पहिले दोन पर्याय सोपे व सुलभ आहेत, तिथे तिसरा अत्यंत कठीण आणि दुर्धर. गरुड तिसरा पर्याय निवडतो, एखाद्या उंच पहाडावर जातो. एकांतात आपले घर बनवतो आणि स्वतःच्या पुनर्स्थापनेस प्रारंभ करतो. सर्वप्रथम तो आपली चोच दगडावर मारून मारून तोडून टाकतो. एका पक्षासाठी चोच तोडण्याहून अधिक त्रासदायक दुसरे काय असेल? आणि प्रतीक्षा करतो चोच पुन्हा उगवून येण्याची, तसेच तो आपले पंजे तोडून टाकतो आणि प्रतीक्षा करतो पंजे पुन्हा उगवण्याची. नवीन चोच आणि पंजे आल्यानंतर तो आपल्या जड झालेल्या पंखांना एक एक करन उपसून टाकतो आणि वाट पाहतो नवे पंख फुटण्याची!
१५० दिवसाचा त्रास आणि प्रतिक्षेनंतर त्याला मिळते त्याची गरुडभरारी, यानंतर तो 30 वर्षे जगतो, ताकदीने आणि अभिमानाने!
याच प्रकारे मानवाच्या आत्मविश्वास, सक्रियता आणि कल्पनाशक्ती या तिन्ही शक्ती दुर्बल होऊ लागतात. तेव्हा आपणही भूतकाळात अडकलेल्या बंधक अस्तित्वाचा त्याग करून कल्पनेची मुक्त उड्डाणे घेतली पाहिजेत!
150 दिवस नाही, 60 दिवस द्या स्वतःला पुनरुज्जीवित करण्यासाठी! जे शरीराला मनाला चिकटलेले आहे, ते तोडताना आणि उचकटून काढताना यातना तर होणारच! पण त्यानंतर जी उड्डाणं असतील ती उंच, अनुभवी आणि अनंताकडे झेपावणारी असतील!
दररोज काही चिंतन करत रहा, तुम्ही असे एकमेव व्यक्ती आहेत, जे स्वतःला परिपूर्ण ओळखता आणि तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता, गरज आहे ती लहान लहान गोष्टीतून बदलाची सुरुवात करण्याची.
तुमच्या आयुष्यात असा प्रसंग कधी आलाय का? आणि आला असेल तर तुम्ही त्याला कसे सामोरे गेलात आम्हाला कॉमेंट नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
जगात एकूण 800 कोटी लोक आहेत. यातील फक्त 1 कोटी 40 लाख लोक हे कोट्याधीश आहेत. एका सर्वेक्षणानुसार 90% कोट्याधीश असे आहेत जे स्वतःच्या बळावर यशस्वी झाले आहेत. ज्यांच्याकडे कुठलीही वडिलोपार्जित संपत्ती नाही. शून्यातून स्वतःचे साम्राज्य उभे करणे ही काही सोप्पी गोष्ट नाही, पण मग ही अवघड गोष्ट त्यांनी पूर्ण कशी केली. त्यांच्याकडे अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्यामुळे ही अशक्यप्राय गोष्ट शक्य झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे त्यांच्या सवयी…! काय आहेत त्या सवयी, ज्यामुळे आपणसुद्धा यशाच्या मार्गावरून मार्गक्रमण करू शकतो. चला तर पाहूया.
ध्येयनिश्चिती –
तुमच्या आयुष्याला योग्य दिशा मिळवून देण्यासाठी पाहिल्यांना लागते ती ध्येय-निश्चिती. जर ध्येय निश्चित असेल, तरच तुमची प्रगती वेगाने होऊ शकते; पण जर एखाद्याकडे ध्येयच नसेल, तर तो पुढे जाऊच शकत नाही. कारण त्याला जर आपले अंतिम ध्येचच माहीत नाही, तर तो पुढे जाईल तरी कसा…? म्हणून आत्ताच ठरवा की, तुम्हाला आजपासून पुढे 5 ते 10 वर्षात काय बनायचे आहे, तुम्हाला यशाचा कोणता टप्पा गाठायचा आहे. जगात अशा लोकांची कमी नाहीये, जे फक्त प्राण्यांप्रमाणे जीवन जगतात. प्राण्यांचे कोणतेच स्वप्न नसते की ध्येय नसते, पण जर तुम्हाला हटके आणि जगावेगळे काहीतरी करायचे असेल, तर आजच तुमचे ध्येय निश्चित करा.
शिस्त –
ध्येयनिश्चिती आणि ध्येयप्राप्ती यांच्यामधील पूल म्हणजे शिस्त. शिस्त ही एक अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत यशस्वी बनवू शकते. मग तुमच्यामध्ये टॅलेंट असो वा नसो. प्रत्येक यशस्वी व्यक्ती ही आपल्या दैनंदिन कामकाजाविषयी अतिशय शिस्तप्रिय असते. या व्यक्ती तिच्या आठवड्याचे, महिन्याचे आणि वर्षाचे योग्य नियोजन करतात. त्यामुळे त्यांचे आऊटपुट हे आपल्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तीपेक्षा जास्तच असते, कारण त्यांना आज काय करायचे याचा विचार करण्यासाठी जास्त वेळ वाया घालवावा लागत नाही. त्यांचा प्लॅन हा आधीच ठरलेला असतो.
जोखीम –
आयुष्यात कोणतीच गोष्ट सहजतेने मिळत नाही आणि जर तुमच्या नावाचा उल्लेख यशस्वी लोकांच्या यादीत व्हावा असे तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्यासमोर कष्टाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. तुम्हाला स्वीमर व्हायचे असेल, पण पाण्यात उतरायची भीती वाटते म्हणून तुम्ही पाण्यात उडीच मारली नाही, तर तुम्ही स्विमर बनू शकता का? अर्थातच नाही. म्हणून तुम्ही जे ध्येय निवडले आहे ते पूर्ण करण्यासाठी मार्गात कितीही अडथळे आले तरी मागे हटू नका. जोखीम स्वीकारा आणि कार्य पूर्ण करून दाखवा.
शिकाऊ वृत्ती –
असं म्हणतात की, माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो. तो नेहमी कोणाकडून काही ना काही शिकत असतो. मग त्याचे वय 25 असो, 50 असो किंवा 70. तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं असेल, तर नेहमी अपडेटेड राहिलं पाहिजे आणि त्यासाठी शिकाऊ वृत्ती असणं खुप गरजेचं आहे. जग काळानुसार बदलत असतं आणि या बदलत्या जगानुसार तुम्ही आम्ही देखील बदलणं गरजेच आहे. जर आपण प्रवाहानुसार चाललो तर किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकतो, नाहीतर प्रवाहाबाहेर फेकले जाऊ. त्यामुळे या बदलत्या दुनियेनुसार इतरांकडून नेहमी चांगल्या गोष्टी शिकून स्वतःला जगावेगळे बनविण्यासाठी सज्ज व्हा.
वाचन:
प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन यशप्राप्ती करण्यासाठी आपले आयुष्य खुप छोटे आहे, त्यामुळे यशस्वी व्यक्तींच्या जीवनाचे धडे घेऊन त्यांच्या अनुभवातून गोष्टी शिकल्या पाहिजे आणि यासाठी वाचन हा एकमेव पर्याय आहे. वॉरेन बफे दररोज न चुकता पुस्तकं वाचतात. कारण त्यांना माहीत आहे की; त्यांची संपत्ती हे त्यांचे सर्वस्व नाही, तर नॉलेज हेच सर्वस्व आहे. तुम्हाला जर त्यांच्यासारखे यशस्वी व्हायचे असेल, तर दिवसातून निदान 10 पानं तरी वाचलीच पाहिजे.
मंडळी, आयुष्यात इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं असेल तर या 5 सवयी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत.
“केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे” समर्थ रामदासांनी लिहिलेल्या या ओळी आपल्या सर्वांनाच ज्ञात आहेत. कोणतही काम जर तुम्ही नियमितपणे करायला सुरुवात केली तरच त्याचं इच्छित फळ आपल्याला मिळतं असं समर्थ आपल्या या ओळींतून सांगतात. आजकाल धावपळीच्या जगण्यात आपण रोज काही ना काही समस्यांशी सामना करत असतो. बाहेरील आणि आतील जगातल्या याच समस्यांमुळं सुरु होतं ते विचारांचं अंतर्युद्ध! खूप साऱ्या निरुद्देशी विचारांच्या या भडीमारामुळे आपल्यातील अस्वस्थताही वाढायला लागते मग या अस्वस्थेतेमुळं येणारा राग, चिडचिड हे आपल्या दुःखाचं कारण ठरतात.
“वर्तमानात जगा, भूतकाळाचा किंवा भविष्यकाळाचा जास्त विचार करू नका”, हे वाक्य तुम्ही याआधीही खूप वेळा ऐकलं असेल. पण अतिविचार करणं आपल्या इतकं अंगवळणी पडलेलं असतं की हजार वेळा वाचून सुद्धा हे वाक्य आपल्याला आपल्या रोजच्या जगण्यात उतरवता येत नाही. तुम्ही कधी एखाद्या लहान मुलाचं बारीक निरीक्षण केलंय का? जर केलं असेल तर एक गोष्ट नक्कीच तुमच्या लक्षात आली असेल; ती गोष्ट म्हणजे लहान मुलांच्या मनात फक्त आज असतो.
भूतकाळ किंवा भविष्यकाळाचा कुठलाच विचार नसतो, ते फक्त वर्तमान क्षणात असतात. आपण सगळेच कधीतरी लहान होतोच. आपल्यामध्ये सुद्धा वर्तमान क्षणात जगण्याची आणि अतिविचारांचा ताण सोडून देण्याची क्षमता आहे. हो ना? अतिविचारांच्या याच जाळ्यातून स्वतःला सोडविण्यासाठी सर्वात गरजेचं आहे ते रोज “ध्यान” करणं. रोज कमीत कमी 20 मिनिटे ध्यान केल्याने काय काय सकारात्मक बदल घडायला मदत होतात ते आता आपण पाहूया.
1. दृष्टीकोनात सुधार
अतिविचार तुम्हाला कधीच शांत आणि आनंदी आयुष्य जगू देत नाहीत. दररोजच्या ध्यानामुळे दुःख, राग, भीती या गोष्टींतून बाहेर यायला आणि पर्यायाने वास्तवाची जाणीव व्हायला मदत होते.
2. नकारात्मक विचार कमी करण्यासाठी मदत
बऱ्याचदा, आपण आपल्या आयुष्यातील गोंधळांना जबाबदार असणारे दोष कुणा दुसऱ्यांवर लादण्याच्या प्रयत्नात असतो. काही झाले तरी, दुसऱ्या कुणाकडे बोट दाखवले की अडचणींचा सामना करणे सोपे वाटते. दुसऱ्यांमध्ये दोष पाहणे आणि बोट दाखवणे यांसारख्या नकारात्मक वृत्तींना बाजूला करायला ध्यान मदत करते.
3. मनातील कचरा साफ होतो
अतिविचार हे तुमचं मन तुम्हाला खात असल्याचं लक्षण आहे. तुमच्या अस्वस्थतेच्या मुळाशी जाऊन त्याच्याशी दोन हात करा. ध्यानामुळे मनातील कचरा साफ होण्यासाठी मदत होते. तुमच्या डोक्यातील विचारांना व्यवस्थित मांडणं, योग्य विचारांना प्राधान्यक्रम देणं आणि संपूर्णपणे व्यवस्थित विश्लेषण करणं या गोष्टीसुद्धा ध्यानाने शक्य होतात.
4. आसक्तींपासून मुक्तता
अतिविचार हे तुमच्या – तुमचे शब्द, कृती, कल्पना आणि विचार यांच्याबद्दलच्या – आसक्तीचे प्रकट रुप आहे. आपण लोक आणि नात्यांना इतके चिकटून बसलेले असतो. त्यामुळे इतकी मतं व कारणं तयार होतात, आणि मग आपण अती टीका करायला लागतो किंवा अति चिकित्सक होतो. ध्यानामुळे आसक्ती आणि अतिविचारांच्या गोंधळातून बाहेर पडायला मदत होते.
अशा या ध्यान साधनेमुळे एक आनंदी, समाधानी, प्रेममय जीवन जगण्यास आपल्याला मदत होते, पण ध्यानाचे हे सगळे फायदे तुम्हाला तेव्हाच उपभोगायला मिळतील जेव्हा तुम्ही ते नियमितपणे करण्यास सुरुवात कराल. त्यामुळे ध्यानाने होत आहे रे … आधी केलेच पाहिजे!
आयफोनचा जन्मदाता स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांची ओळख मी तुम्हाला करून देण्याची गरज नाही. महान उद्योजक प्रचलित नियम follow करत नाहीत. ते स्वतःचे वेगळे असे ‘Thumb Rules’ बनवतात.
हे नियम परिस्थितीनुसार बदलता येतात. म्हणजेच ते लवचिक असतात. हे नियम तुम्हाला कुठल्याही चौकटीत अडकवून ठेवत नाहीत, तर योग्य दिशा दर्शवतात, तुम्हाला प्रेरित करतात.मोठ्या कंपन्याच्या वाढीसाठी लागणारी कल्पकता, संस्कृती, बुद्धिमत्ता, संघटन आणि विश्वास या गोष्टींसाठी हेच ‘Thumb Rules’ अनुसरले जातात. व्यवसायात यशस्वी होण्यासाठीचे स्टीव्ह जॉब्स यांचे १० नियम आपण पाहणार आहोत.
नियम १ : गुणवत्तेचा मापदंड निर्माण करा. काही लोकांना अशा वातावरणाची सवयच नसते, जिथे सर्वोत्कृष्टतेची अपेक्षा केली जाते. जर तुम्ही अशाच वातावरणात राहिलात तर तुम्हाला उत्कृष्ट काम करायची सवयच राहणार नाही. त्यामुळे तुम्ही ज्या लोकांसोबत काम करता ते लोक खरंच तुम्हाला वर नेतायेत का याचा विचार करा.
नियम २ : ‘डिजाईन’ हा शब्द म्हटल्यावर डोळ्यासमोर येतो तो एखाद्या गोष्टीचा appearance. पण ‘डिजाईन’ म्हणजे केवळ वस्तू कशी आहे किंवा ती कशी दिसते एवढेच नसून, ती वस्तू कशी काम करते हे सुद्धा आहे.
नियम ३ : तुम्ही कोणतेही काम करत असा ते काम सर्वोत्कृष्ट व्हावे यासाठी गरजेची असते ती एकाग्रता आणि साधेपणा. साध्या सरळ गोष्टीसुद्धा अवघड असू शकतात. तुमच्या विचारांमध्ये सुस्पष्टता येण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, पण त्याची गरज असते. एकदा का तुम्ही हे साध्य केलं की, तुम्ही मोठे पर्वतसुद्धा हलवू शकता.
नियम ४ : जीवनात कुठल्याही टप्प्यावर महत्वाचे असते ते म्हणजे एकीचे बळ. जी गोष्ट एकट्याने साध्य होत नाही ती सगळे सोबत असल्यावर चटकन होते. हेच तत्त्व जर आपण व्यवसायात वापरल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. पण त्यासाठी तुम्हाला फक्त काही चांगल्या सहकाऱ्यांची गरज असते.
नियम ५ : काहीतरी नवीन शोधताना तुमच्या हातून चुका होऊ शकतात. चुका झाल्यातर होऊ द्या. चुका होतायेत म्हणजे तुम्ही काहीतरी नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करताय. झालेल्या चुकांचा स्वीकार करा त्यात कशी सुधारणा करता येईल याचा विचार करा.
नियम ६ : तुम्ही जे काम करताय त्यावर तुमचं प्रेम आहे की नाही यावर अवलंबून असत की तुम्हाला त्या कामात यश मिळेल की नाही. आणि जर अजूनही तुम्हाला अशी गोष्ट मिळाली नसेल, तर खोज जारी रखें।
नियम ७ : जॉब्स म्हणतात मागील ३३ वर्षे रोज सकाळी मी आरशासमोर उभा राहून स्वतःला विचारतो, ‘जर आजचा दिवस माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल, तर आज मी जे करतो आहे, तेच करायला मला आवडेल का?’ जेव्हा बरेच दिवस या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी मिळतं, मी समजून जातो, काहीतरी बदलायची गरज आहे.
नियम ८ : तुमच्याकडे वेळ फार कमी आहे, तेव्हा दुसऱ्या कोणाचेतरी आयुष्य जगणे सोडून द्या. तुम्हाला हा नियम छोटा वाटला असेल पण हा नियम परत एकदा ऐका मग तुमच्या लक्षात येईल की याचा अर्थ किती मोठा आहे.
नियम ९ : लोकांना असं बऱ्याच वेळा वाटत असत की तुमच यश हे तुम्हाला एका रात्रीत मिळालं आहे. पण जर तुम्ही नीट पाहिलंत, तर तुमच्या लक्षात येईल की; एका रात्रीत मिळालेलं यश हे खरतर एका रात्रीत मिळालेलंचं नसतं. त्या यशासाठी अनेक रात्री या जागून काढाव्या लागलेल्या असतात.
नियम १० : (Steve Jobs) जॉब्स यांचा सर्वात famous quote म्हणजे ‘स्टे हंग्री, स्टे फुलीश’ – भुकेलेले राहा, वेडे रहा!
जेव्हा तुम्ही कोणत्याही जटील नियमांचं पुस्तक बाजूला टाकून असे स्वतःचे नियम लिहिता, तेव्हा तुम्ही तुमची मार्गदर्शक तत्व लिहित असता आणि हीच तत्व तुमच्यासाठी एखाद्या होकायंत्रासारखी दिशादर्शकाचं काम करतात.
Procrastination टाळण्यासाठी हा २ मिनिटांचा नियम पाळाच!
Proocrrraaasssttttiiiinnnaaattttiiooon हा शब्द मुळातच इतका रटाळवाना आहे की हा शब्द ऐकूनच आपण कामं उद्यावर ढकलतो. पण कामं उद्यावर ढकलून देण्याची ही सवय आपल्या बऱ्याच जणांना खूप त्रासदायक ठरते. रोज सकाळी उठून व्यायाम करणं असो किंवा रात्री झोपताना निदान १५ मिनिटे पुस्तक वाचन असो प्रत्येक गोष्ट आपण “आजच्या दिवस जाऊ दे यार! उद्यापासून करू” असं करण्यातच घालवतो. असे अनेक उद्या जात राहतात आणि याचा शेवट होतो तो स्वतःलाच दोष देण्यात. इतकी छोटी सवय आपण स्वतःला लावू शकलो नाही? इतकं छोटं काम आपण करू शकलो नाही? स्वतःला दोष देणाऱ्या प्रश्नांची list मग पुढे वाढतच जाते.
पण मग यावर करणार काय? प्रत्येक प्रश्नाला जसं उत्तर असतं तसं याही प्रश्नाला उत्तर असेलच की! चला मग शोधूया या उत्तराला!
आधुनिक युगातील 5 महान dancers and choreographers मध्ये Twyla Tharp यांची गणना केली जाते. 1992 मध्ये त्यांना ‘मॅकआर्थर फेलोशिप’ देण्यात आली जी फक्त त्याच लोकांना देण्यात येते ज्यांनी आपल्या क्षेत्रात खूप मोठं काम केलं. Twyla यांनी आपल्या career चा बराचसा काळ जगभर फिरण्यात आणि आपली कला सादर करण्यात घालवला. त्या त्यांच्या या यशाचे श्रेय देतात रोजच्या जगण्यातील छोट्या छोट्या सवयींना.
Dancing सोबतच Twyla यांना लिखाणाची सुद्धा आवड आहे त्यांनी आत्तापर्यंत बरीचशी पुस्तकं लिहिली आणि यातलं सर्वात गाजलेलं पुस्तक म्हणजे “The Creative Habit” या पुस्तकात त्या लिहितात की: “मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवसाची सुरुवात एका सवयीने करते. सकाळी 5.30 ला उठून मी माझे वर्कआउटचे कपडे, लेग वॉर्मर्स, स्वेट शर्ट आणि टोपी घालते.
मॅनहॅटनमधील माझ्या घरातून बाहेर पडते, टॅक्सी बोलावते आणि जिममध्ये जाऊन तिथे दोन तास workout करते.” आता यात गंमत म्हणजे Twyla ह्या या जिममध्ये जाऊन तिथे दोन तास workout करायला सवय नाही मानत तर त्यांच्या मते खरी सवय आहे रोज घरातून बाहेर पडणं आणि बाहेर पडल्यावर जिमला जाण्यासाठी taxi बोलावणं.” मित्रांनो तुम्ही आम्ही विचार केला की असं वाटत ही एक खूप छोटी गोष्ट आहे पण ही छोटी गोष्टच रोज रोज केल्याने सवय बनून जाते और “अगर एक बार आदत पड़ गयी तो चाहकर भी उसे छोड़ना मुश्क़िल हो जाता है”
आता समजा Twyla यांना Taxi पकडण्यासाठी ३ किलोमीटर चालत जावं लागलं असतं किंवा आपल्याला आज कोणते कपडे घालायचे आहेत याचा विचार करत बसावा लागला असता तर बहुतेक त्या ती taxi पकडूच शकल्या नसत्या कारण सकाळी उठल्या उठल्या ३ किलोमीटर चालणं अवघड आहे. त्यामुळे कोणतीही सवय लावताना ती सुरु करतानाची process ही खूप simple असली पाहिजे. या गोष्टीला आपल्या रोजच्या जीवनात उतरवण्यासाठी आपण पाहूया २ मिनिटांचा नियम.
आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की सुरुवात ही नेहमी सोपी झाली पाहिजे. जेव्हा आपण कोणतीही सवय लावायचा किंवा काही बदल करण्याचा विचार करतो तेव्हा आधी आपण खूप excited असतो; कधी एकदा काम करायला घेतो आणि कधी ते संपवतो असं होतं आपल्याला! हे किती दिवस टिकतं तर फक्त १ दिवस. मग दुसरा दिवस उजाडतो आणि परत आपलं रोजचं जगणं सुरु होतं. पण याच गोष्टी टाळण्यासाठी महत्त्वाचा ठरतो तो २ मिनिटांचा नियम हा नियम काय आहे तर “कोणतीही नवी सवय सुरु करण्यासाठी ती सवय २ मिनिटांत पूर्ण करून झाली पाहिजे” नाही समजलं ना ? सांगतो!
समजा तुम्हाला रोज रात्री झोपायच्या आधी पुस्तक वाचण्याची सवय लावायची आहे. आता तुम्हाला २ मिनिटांचा नियम माहिती आहे तर तुम्ही काय करणार आधी सवय लावणार फक्त १ पान वाचण्याची. दोन मिनिटांत एक पान वाचून झालं की तुम्ही ते पुस्तक ठेऊन द्यायचं. बघा तुमचं target achieve झालं. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी तुम्ही हीच process follow करणार पाचव्या दिवशी तुम्हाला वाटेल की यार आज १ पान वाचण्यापेक्षा आपण २ पानं वाचूया. मग हळूहळू तुम्ही २ पानावरून ३ पानावर, ३ पानावरून ४ वर, ४ वरून पाच, सहा, दहा, वीस, तीस वर जाल आणि पहा आता तुम्हाला पुस्तक वाचनाची सवय लागलीये.
अशाच पद्धतीने तुम्हाला जर रोज जॉगिंग करायची आहे तर तुम्हाला आधी रोज shoes घालण्याची सवय लागली पाहिजे, तुम्हाला जर योगा करायचा असेल तर रोज Yoga Mat अंथरण्याची सवय लागली पाहिजे, जर अभ्यास करायचा असेल तर आधी पुस्तक उघडण्याची सवय लागली पाहिजे. कारण की या सगळ्या सवयी लावणं खूप छोटं काम आहे… पण जेव्हा या छोट्या सवयी लागतील तेव्हाच मोठे बदल घडायला सुरुवात होईल.
जगात असे अनेकजण असतात जे आपल्या कृतीमुळे इतरांच्या लक्षात राहतात. आपल्या सर्वांना कसाब माहितीच आहे, ज्याने शेकडो निष्पाप लोकांचे प्राण घेतले. आणि करकरे, कामटे, साळसकर देखील माहिती आहेत, ज्यांनी अनेक लोकांचे प्राण वाचवले. त्यांचंच नाव अभिमानाने घेतले जातं जे परोपकारी वृत्तीने काम करतात. ना की, कारणं देत फिरतात, किंवा लोकांच्या वाईटाचं काम करतात.
उर्दूमध्ये एक वाक्य आहे, “खुदा भी अपने रहमतों की उस पर बरसात करता हैं, जो जरूरतमंद की मदत के लिए आगे बढ़ता हैं”
मित्रांनो आपल्याला हा सुंदर मानव जन्म मिळाला आहे आणि या जन्मात जर आपण दुसऱ्याच्या उपयोगाला नाही आलो, तर मग सगळंच व्यर्थ आहे. आज मी तुम्हाला जो प्रसंग सांगणार आहे तो आहे, १५ एप्रिल १९१२ रोजीचा. उत्तर अटलांटिक महासागरातला. टायटॅनिक जहाजाच्या विनाशकारी सागरी अपघाताचा.
२,२२४ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांबरोबर निघालेल्या या बलाढ्य जहाजात १४ एप्रिलच्या मध्यरात्री अनेकांचा आक्रोश ऐकू येऊ लागला. हृदय पिळवटून टाकणाऱ्या किंकाळ्यांनी मन सुन्न झालं होतं. मात्र कोणतीच दैवी शक्ती टायटॅनिकला वाचवू शकत नव्हती. ज्यावेळी टायटॅनिक बुडत होतं, तेव्हा तीन जहाजे त्याच्या जवळपास होती. सॅम्पसन, कॅलिफोर्निया, कार्पेथिया.
सॅम्पसन टायटॅनिकपासून केवळ 7 किलोमीटर अंतरावर होते. त्या जहाजातील लोकांनी धोका दर्शविण्यासाठी टायटॅनिकवरून आकाशात उडवलेल्या दारूगोळ्यांना पाहिले, परंतु ते जहाज बेकायदेशीरपणे सीलची शिकार करत होते. जर टायटॅनिकच्या मदतीला गेलो, तर आपण पकडले जावू या विचाराने ते टायटॅनिकच्या उलट दिशेने निघून गेले. ते टायटॅनिकच्या गरजेला धावले नाहीत, कारण त्यांनी केलेल्या पापाच्या विचारात ते गढून गेले होते.
दुसरे जहाज कॅलिफोर्निया नावाचे होते. हे जहाज टायटॅनिक पासून केवळ १४ किलोमीटर अंतरावर होते. पण ते चोहोबाजूंनी हिमनगात वेढलेले होते. जहाजाच्या कॅप्टनने सुद्धा धोक्याचा इशारा बघितला, पण परिस्थिती अनुकूल नाही. आपणच हिमनगात अडकलोय. म्हणून त्याने परत जाण्याचा निर्णय घेतला आणि तो झोपी गेला.
“परिस्थिती योग्य नाही म्हणून मदत करू शकलो नाही” असं सांगण म्हणजे कारणं देणं, जबाबदारी झटकणं. असेल त्या परिस्थितीत स्वतःवरील संकटांशी दोन हात करून आपण इतरांना मदत केली, तरच ती निस्वार्थी भावनेने केलेली मदत म्हणता येईल.
तर तिसरं जहाज होतं कार्पेथिया. जे टायटॅनिकपासून तब्बल 58 किलोमीटर दूर दक्षिण दिशेने धावत होतं. त्यांनी रेडिओवर टायटनिक वरील हलकल्लोळ, रडणे, मदतीचा आक्रोश ऐकला. मन हेलावून टाकणारा तो आवाज ऐकून जहाजाच्या कॅप्टनने गुडघे टेकून ईश्वरचरणी प्रार्थना केली आणि मग पूर्ण वेगाने सभोवतालच्या पसरलेल्या हिमनगातून मार्ग काढत कार्पेथिया टायटॅनिकजवळ पोहोचले आणि त्या भयानक परिस्थितीत सुद्धा प्रयत्नांची शर्थ करून तब्बल ७०५ जणांचे प्राण वाचवून त्या प्रवाशांना कार्पेथियाने जणू नवा जन्मच दिला. त्यामुळे आपण कोणत्या जहाजाचा गुण अंगीकृत करायचा, ते आधी ओळखा आणि मग त्यानुसार पाऊलं टाका.
आपल्याला त्या चिमणीची गोष्ट माहितीच आहे, जिने जंगलात आग लागल्यावर कशाचीही पर्वा न करता, आपल्या छोट्याश्या चोचीतून कित्येक मैल अंतरावरून चोचीत पाणी नेऊन आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. रस्त्यात तिला हत्ती भेटला. हत्ती तिला म्हणाला, “अगं, चिऊताई तुझ्या चोचीतल्या त्या एवढ्याश्या पाण्याने जंगल विझणार आहे का? कशाला उगाच धावपळ करतेस, सोड ते प्रयत्न.” त्यावर ती चिऊताई म्हणाली, “माझ्या प्रयत्नांनी जंगलातील आग विझेल की नाही माहित नाही, पण जेव्हा-केव्हा या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नसून आग विझवणाऱ्यांमध्ये असेल आणि तेच माझ्यासाठी पुरेसं आहे.”
मित्रांनो, समाजात असे अनेकजण आहेत, जे दुःखी आहेत. त्यांचे तुम्ही अश्रू पुसा, ज्यांना मदतीची गरज आहे, अशांसाठी तुम्ही कर्णाचा ‘आहे ते देण्याचा’ गुण अंगी बाणवून घ्या. अडथळे आणि जबाबदारी टाळण्यासाठी कारणं नेहमी असतील, परंतु जी लोकं ती बाजूला सारून पुढे जातात, ती नेहमी जगाच्या हृदयात स्थान मिळवतात.
जर आपण पाण्यात मीठ टाकले तर ते पाणी खारट बनते, मात्र जर त्याच पाण्यात साखर टाकली तर? तर मात्र ते पाणी गोड बनते. नमस्कार, मित्रांनो च्या आजच्या भागात आपले स्वागत आहे तर आज बोलूया संगतीविषयी.
वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. एक दरोडेखोर परमेश्वराच्या नामस्मरणामुळे ऋषी बनला. इतकंच नाही तर त्याने रामायणदेखील लिहीले. त्याचं कारण म्हणजे संगत. माणसाला शिक्षण हे केवळ शाळा-कॉलेजमधून मिळत नाही, तर आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीतून, सहवासातील माणसांच्या अनुकरणातून तो शिकत असतो.
जेव्हा आकाशातून पावसाचा थेंब जमिनीवर येतो तेव्हा तो स्वच्छ आणि निखळ असतो. तोच थेंब जर घाणीच्या पाण्यात पडला, तर त्याला घाणीचे स्वरूप प्राप्त होते आणि जर समुद्रातील शिंपल्यात पडला, तर मात्र त्यातून मोती तयार होतो. संगतीचा परिणाम किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला दिसून येते. शुद्ध, सात्त्विक वृत्तीच्या माणसांच्या सान्निध्यात राहिल्यावर आपल्यावरही त्या चांगल्या संस्काराचा प्रभाव पडतो, पण सध्याच्या युगात चांगल्या गोष्टी कोणत्या आणि वाईट कोणत्या हेच ठरविणे अवघड झाले आहे. संस्कारांचा अभ्यास देणाऱ्या मठामध्येदेखील नको ते धंदे केले जातात.
आपला जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात नसतं, मात्र आपण कोणाच्या संगतीत रहावं हे आपल्या हातात असतं. आपल्या नकळत आपण दुसऱ्यांचे शब्द, त्यांच्या लकबी आत्मसात करत असतो. त्यातल्या त्यात वाईट गोष्टी लगेच आत्मसात होतात.
आपण 4- 5 वर्षाच्या मुलाचं उदाहरण घेवूया. अपशब्द किंवा शिव्या लहान मुलांना शिकवाव्या लागत नाही. कुठून तरी ऐकून ते लगेच शिकतात, आणि प्रसंगी पद्धतशीरपणे त्याचा प्रयोगही करतात. मात्र तेच चांगले श्लोक, विचार त्यांना शिकवावे लागतात, नव्हे तर घोकून घ्यावे लागतात. मात्र ऐनवेळी त्यांना ते सुचतीलच, आठवतील असे नाही. म्हणून तर शालेय जीवनात आपली अधोगती दिसू लागली, की शिक्षिका आपल्या रोजनिशीत शेरा लिहून देतात, ‘आपल्या पाल्याची संगत बदला.’ हा नियम शाळेपुरताच मर्यादित नाही, तर आयुष्यभरासाठीचा आहे.
आपल्या महाभारत आणि रामायणातील व्यक्तिरेखाही खूप काही शिकवून जातात. रामायणातील कैकयीच्या व्यक्तिरेखेत अनेक नकारात्मक छटा दिसतात. कैकयीने आपला पुत्र भरतासाठी, रामाला वनवासाला पाठवले, पण तुम्हाला माहिती आहे का? कैकयी आधी अशी नव्हती. ती रामावर अतिशय प्रेम करायची, भरतापेक्षाही जास्त लाड ती रामाचे करायची, मात्र तीच्या मंथरा नावाच्या दासीमूळे कैकयीचे विचार पालटले. मंथरेने तिचे कुत्सित विचार कैकयीच्या डोक्यात भरले आणि कैकयी तिच्यासारखा विचार करू लागली, केवळ मंथरेच्या सांगण्यामुळेच कैकयीने रामाला वनवासाला पाठविले. कैकयीलाही सगळे वाईटच दिसू लागले. अशी मंथरा प्रवृत्ती केवळ कैकयीच्याच नाही, तर आपल्याही अवती भोवती वावरत असते. तिला वेळीच ओळखून पळवून लावले पाहिजे. कलियुगात मंथरेची रूपे अनेक आहेत. त्यामुळे तिला चार हात लांबच ठेवाल तरच उत्तम!
दुसरे उदाहरण सर्वांच्या लाडक्या कृष्णाचे, महाभारतातील युद्धावेळी दुर्योधन आणि अर्जुन श्रीकृष्णाजवळ युद्धासाठी मदत मागण्यासाठी जातात. त्यावेळी कृष्ण विचारतो, तुम्हाला मी हवा आहे की माझे सैन्य ? दुर्योधन लगेचच सैन्य मागतो आणि अर्जुन खुद्द कृष्णाला मागतो. आणि त्यानंतरचा परिणाम तुम्हाला ज्ञात आहेच. आपण या कालियुगातले अर्जुन आहोत, मात्र अजून आपल्याला श्रीकृष्णाचा शोध घेता आला नाही. आपल्याबरोबर कृष्णासारखी व्यक्ती असायला हवी. जी आपले विचार बदलून चांगल्या कामासाठी आपल्याला प्रवृत्त करेल. या दलदलीच्या युगात वावरत असताना डोळसपणे पहा की, आपण नेमके कोणाच्या सहवासात आहोत? मंथरेच्या की श्रीकृष्णाच्या ? कारण संगत माणसाला घडवत असते.
तुम्हाला आजचा चा लेख कसा वाटला हे कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि नवी अर्थक्रांतीच्या चॅनेलला आताच subscribe करा.
जीवनात सफलता मिळवायची असेल, तर आपल्याकडे आत्मविश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे. माणसाला जगण्यासाठी जसा ऑक्सीजन लागलो, माशाला जगण्यासाठी जशी पाण्याची गरज लागते. तसेच माणसाला स्वाभिमानाने जगायचे असेल, तर आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. मात्र बऱ्याच जणांकडे हा विश्वास नसतो. तो कसा मिळवायचा ते आजच्या गोष्टीत पाहूयात.
गोदावरीच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याश्या, सुख समृद्धीने भरलेल्या गावात सगळेजण अगदी आनंदाने नांदत होते. त्या गावात एक धनाढ्य सावकार होता. धनाजीराव त्याचं नाव. सावकार म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो गावकऱ्यांकडून पैसे बळकवणारा, त्यांना गुलाम म्हणून वागवणारा, त्यांचा छळ करणारा, मात्र धनाजीराव तसा नव्हता. तो गावकऱ्यांवर खूप प्रेम करायचा आणि गावातील लोक देखील त्याला खूप मानायचे. असेच एकदा गावात मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम होता. गाव अगदी गजबजून गेले होते. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते.
गोदावरीकाठी गावातील काही लहान मुलं पकडापकडीचा खेळ खेळत होती. त्यात त्या सावकाराचा मुलगा देखील होता. खेळ ऐन रंगात आला असतानाच काठाजवळून धावताना अचानक तो नदीत पडला. सगळीकडे एकच गोंधळ सुरू झाला. हा हा म्हणता अख्खा गाव नदीकाठी जमा झाला. धनाजीराव आणि त्याची बायको देखील तिथे आली. तिचा आक्रोश सुरु झाला. धनाजीरावचा ‘माझ्या मुलाला कोणीतरी वाचवा रे!’ म्हणून आरडाओरडा करत होता. त्याची ती अवस्था सर्वांचं काळीज पिळवटून टाकत होती. मात्र कोणीच त्या लहानग्याला वाचवायला पुढे गेलं नाही. सगळ्यांनी बघ्याची भूमिका घेतली. काहींना तर पोहता येत असून देखील ते नदीत उतरले नाहीत. त्या गर्दीत एक जलतरणपटू देखील होता. त्याच नाव होतं विकास. मात्र सगळे इतके घाबरले होते, की त्यांच्याकडे बघून विकासचे मन नदीत उतरण्यासाठी धजावत नव्हते.
तितक्यात अचानक कोणीतरी त्याला पाठीमागून नदीत ढकललं. नदीकाठचा गोंधळ अचानक शांत झाला. कोणाला काहीच तर्क लावता येईना. नदीत पडलेला विकास तर पूर्णपणे भांबावून गेला होता, पण काही वेळाने विकास देखील त्या प्रवाहात दिसेनासा झाला. विकास ठीक असेल ना? पाटलाचा पोरगा जिवंत असेल ना? असे असंख्य प्रश्न गावकऱ्यांसमोर होते. आणि काही वेळाने पाण्यात एक हालचाल जाणवली. विकास एका हाताने पाण्याला दूर सारत दुसऱ्या हातात पाटलाच्या मुलाला घेवुन नदीकाठी आला. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. धनाजीरावाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. विकासने मुलाला वाचवलं म्हणून संपूर्ण गाव त्याची शाही मिरवणूक काढत होतं. मात्र त्या तरुणाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हच होतं, त्याला कळत नव्हतं की आपल्याला नदीत कोणी ढकललं.
त्याची नजर शोध घेत होती त्या व्यक्तीचा. मिरवणूक संपली. तो तरुण आपल्या घरी निघाला आणि अचानक रस्त्यात एक 70-80 वर्षाचे आर्मी रिटायर्ड माने आजोबा त्याच्या समोर आले. ते म्हणाले तू सकाळपासून ज्याला शोधतोय तो मीच आहे. त्याला काहीच कळेना. तो माने आजोबांना विचारतो, “तुम्ही मला पाण्यात का ढकललं? त्यावर ते म्हणाले, अरे मला माहीत होतं तुला उत्तम पोहता येतं ते. आणि त्याक्षणी तुझ्या मनात जो गोंधळ चालू होता, तोही मी ओळखला होता. तुझ्यात त्याला वाचवण्याची क्षमता होती मात्र धाडस नव्हतं. मला माहिती होतं जर मी तुला पाण्यात ढकलंल तर 100 टक्के तू स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करणार आणि त्याबरोबरच त्या लेकराला देखील वाचवणार. फक्त गरज होती एका हलक्याश्या धक्क्याची. आणि ते मी केलं. पुढे माने आजोबा विकासला म्हणाले: लेकरा तुला आयुष्यात खूप पुढे जायचं असेल, तर असा स्वतःवरचा विश्वास हरवून बसू नकोस. प्रत्येकवेळी तुला कोणीतरी यशाचा रस्ता दाखवेलच असं नाही. तो तुझा तुलाच शोधावा लागेल.
बऱ्याचदा आपल्याला ही गोष्ट येईल का, आपण ते करू शकतो का असे स्वतःच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. कधी कधी आपण स्वतःवरचा विश्वासच गमावून बसतो. मात्र आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात जे पावलोपावली आपल्याला प्रोत्साहित करत असतात, मार्गदर्शन करत असतात. मित्रांनो तुम्ही जर बघ्याची भूमिका घेवून आयुष्य जगलात, तर कधीच तुमचं कौतुक होणार नाही, असं काहीतरी करा की ज्यामुळे यशस्वी लोकांच्या यादीत तुमचं नाव येईल. मात्र तिथपर्यंत पोहोचण्यासाठी विचारवंताच्या सहवासात राहिलं पाहिजे, स्वतःचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. आपलं रूप, आपली बुद्धी, आपला रंग या गोष्टी आपण जन्मत:च घेऊन येतो. परंतु आत्मविश्वास हा आपल्याला विकसित करावा लागतो आणि प्रत्येकाने तो केलाच पाहिजे.
तुम्हाला आजचा Sunday Motivation चा लेख कसा वाटला हे कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि Sunday Motivation साठी नवी अर्थक्रांतीच्या चॅनेलला आताच subscribe करा.
शाळेत असताना मराठीच्या पेपरमध्ये 5 मार्कांसाठी व्याकरणाचे काही प्रश्न दिलेले असायचे. वर्तमानकाळाचे भविष्यकाळात रूपांतर करा किंवा भविष्यकाळाचे भूतकाळात, वर्तमानकाळात रूपांतर करा. प्रश्नपत्रिकेतला काळ उत्तरपत्रिकेत बदलता येऊ शकतो, मात्र वास्तविक जीवनातला काळ ना पुढे नेता येतो, ना मागे आणता येतो.
प्रत्येकालाच आपण का जगतोय आणि कशासाठी जगतोय हे प्रश्न पडलेच पाहिजेत, कारण त्यामुळेच आपल्याला आपल्या जीवनाचे मर्म कळू शकते. आपलं नशीब बदलण्याची धमक प्रत्येकामध्ये असते, मात्र त्यासाठी तुमच्या मनात प्रचंड इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. एका महाकाय पर्वताच्या टोकावर एक 40-50 वर्षाचा सद्गृहस्थ पर्वत सर करण्याच्या उद्देशाने जातो. थंडी, वारा, ऊन, पाऊस कश्या-कश्याचीही पर्वा न करता तो तो पर्वत पार करतो आणि काही दिवसानंतर सुखरूप पायथ्याशी येतो. पायथ्याशी असलेले सर्वजण अचंबित होतात. ते म्हणतात, “अरे तुला माहीत नाही का या पर्वतावर कोणीच जावू शकत नाही, मग तू कसं काय गेलास.” त्यावर तो गृहस्थ म्हणतो, मला ही गोष्ट माहीतच नव्हती आणि म्हणून मी गेलो. आणि बघा यशस्वी झालो. आयुष्यात यश मिळवत असताना जशी प्रोत्साहन देणारी माणसं असतात, तशीच निरुत्साहित करणारी लोकंदेखील असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर पुढे गेलं पाहिजे. ओम शांती ओम सिनेमात शाहरूख खानचा एक फेमस डायलॉग आहे, ‘अगर आप किसी चीज को पुरी शिद्दत से चाहते हो, तो पूरी कायनात उसे आपसे मिलाने की साजिश मे जुड जाती है.”
प्रत्येकामध्ये आपले आयुष्य बदलून टाकण्याचे सामर्थ्य असते, फक्त त्याला याची जाणीव नसते. गाडीला ५ गियर असतात, जर योग्यवेळी योग्य गियर टाकला तरच गाडी वेगाने पळू शकते. बाकीचे 4 गियर असूनसुद्धा आपण जर पहिल्याच गियरवर गाडी चालवत असू, तर निश्चितच गाडी पुढे जाऊ शकणार नाही. बऱ्याचदा आपल्या बाबतीतही तसेच होते. घोड्याप्रमाणे झापडं लावून तुम्ही काम केलं, तर नक्कीच तुम्हीसुद्धा तुमचे ध्येय गाठू शकाल, कारण शेवटी यश किंवा अपयश हे केवळ आपल्याच हातात असतं.
रेसकोर्सवर घोड्यांच्या तबेल्यात काम करणाऱ्या एका मजुराचा रॉबर्ट नावाचा एक मुलगा असतो. त्याची नववीची परीक्षा चालू असते. एकेदिवशी वर्गशिक्षिका अचानक वर्गात येतात आणि सगळ्या विद्यार्थ्यांना उद्देशून त्या म्हणतात, “मुलांनो “माझे स्वप्न” या विषयावर निबंध लिहा. निबंध मनापासून आणि तुमच्या खऱ्या-खुऱ्या स्वप्नावर लिहा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, याच निबंधावर तुमचा यावर्षीचा निकाल अवलंबून आहे. त्यामुळे निबंध व्यवस्थित आणि विचार करून लिहा. सगळे जण अगदी मन लावून निबंध लिहीत असतात. पेपर जमा करण्याची वेळ येते. घंटा वाजते, पेपर जमा करून सगळे आनंदाने घरी जातात. काही दिवसांनी निकालाचा दिवस येतो. सगळे विद्यार्थी वर्गात उपस्थित असतात. सगळ्यांच्या मनाला धाकधूक लागलेली असते, मला मार्क चांगले पडले असतील ना? मी पास झालो असेल ना? असे अनेक प्रश्न मनात डोकावत असतात. मात्र केवळ रॉबर्टच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकत असतं, कारण आपण निबंध चांगला लिहिलाय त्यामुळे आपण पास होणारच याचा त्याला विश्वास असतो. सगळ्यांचा रिजल्ट जाहीर होतो. वर्गातली सगळी मुलं पास होतात, मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्याला स्वतावर विश्वास असतो, तो रॉबर्ट नापास होतो. ज्या चेहऱ्यावर हास्य खुललेलं होतं, तो चेहरा अचानक चिंताग्रस्त होतो. त्याला काहीच कळत नाही.
तो तडक शिक्षिकेच्या केबिनमध्ये जातो आणि त्यांना म्हणतो, ‘मॅडम, कदाचित तुम्ही माझा पेपर व्यवस्थित तपासला नसेल, कृपया तुम्ही परत चेक करता का? बहुदा चुकून तुम्ही….”
शिक्षिका त्याला मध्येच थांबवत म्हणतात. “अरे चुकून नाही मी पेपर बघूनच तुला नापास केलं. अरे वेड्या तू निबंध काय लिहिलास, तुझं तुला तरी माहिती आहे का? मी रेसकोर्सचा मालक बनेल. २००-३०० घोडे माझ्याकडे असतील, अनेक कामगार माझ्या हाताखाली असतील, मी करोडपती बनेल. अरे हे शक्य आहे का? माणसाने झेपतील अशी स्वप्न बघावी. हे बघ अजूनही वेळ गेली नाही. तू तुझा निबंध बदल, दुसरा निबंध लिहून दे. मी रिजल्ट बदलते.”
त्यावर रॉबर्ट म्हणाला, “नाही मॅडम, तुम्ही तुमच्या खऱ्या स्वप्नावर निबंध लिहायला सांगितला होता, मी तो लिहिलाय आणि मी माझ्या स्वप्नावर ठाम आहे, मी माझे स्वप्न पूर्ण करणारच.”
त्यावर बाई म्हणाल्या, “ठीके, आता तूच ठरव निबंध बदलून पुढच्या वर्गात जायचं की, इथेच बसायचं ते.”
त्यावर रॉबर्ट तो रिजल्ट घेतो आणि रागारागाने निघून जातो.
काही वर्षांनी त्याच शिक्षिका एका मोठ्या रेसकोर्सवर विद्यार्थ्यांची सहल घेऊन जातात. रेसकोर्सचा तरुण मालक अगदी आदराने त्यांचे स्वागत करतो. स्वतः पूर्ण रेसकोर्स त्यांना फिरून दाखवतो आणि त्यांना दुपारच्या जेवणासाठी देखील आग्रह करतो. त्याने केलेला तो कळकळीचा आग्रह त्या शिक्षिका स्वीकारतात आणि विद्यार्थ्यांना घेऊन डायनिंग हॉलमध्ये जातात. त्या हॉलच्या एका भिंतीवर एक फ्रेम अडकवलेली असते. कुतुहलाने त्या शिक्षिका त्या फ्रेमजवळ जातात. त्यात फ्रेमकडे बघतात आणि आश्चर्याने म्हणतात, “अरे या सर्टिफिकेटवर तर माझीच स्वाक्षरी आहे. कोणाचं सर्टिफिकेट आहे हे? रॉबर्ट! अरे हा तर माझाच विद्यार्थी! तुमच्या इथे काम करतो का तो? जरा बोलवा त्याला.”
त्यावर रेसकोर्सचा तो तरुण, उमदा मालक त्यांच्यासमोर जातो आणि म्हणतो मॅडम मीच तो तुमचा विद्यार्थी, रॉबर्ट. मॅडम शॉक झाल्या. त्यावर रॉबर्ट म्हणाला मॅडम, “त्यावेळी जर मी तुमचं ऐकून स्वप्न बदललं असतं, तर कदाचित शाळेच्या परीक्षेत पास झालो असतो; मात्र जीवनाच्या परीक्षेत नापास झालो असतो.”
मित्रांनो, तुम्हाला खरंच एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर स्वस्थ बसू नका. त्यामुळे ध्येयासाठी झपाटून जा. जर तुम्हाला अगदी मनापासून आणि तीव्रतेने वाटत असेल की, ही गोष्ट मला मिळवायचीच आहे आहे, तर नक्कीच ती तुम्ही मिळवाल.”
चित्त स्थिर आणि शांत ठेवणं, दुसऱ्या समोर काहीतरी सिद्ध करण्याची भावना मनातून काढून स्वतःला आवडतील त्या गोष्टी करणं, हे सगळं आपण करतो का? आणि केलं तरी दिवसातून किती वेळ यासाठी आपण देतो? जर तुम्ही हा वेळ स्वतःला देत असाल तर चांगलीच गोष्ट आहे, पण जे देत नाहीत त्यांचं काय? मानसिक शांतता, आत्मिक सुख, समाधान या गोष्टीतरी कशा मिळतील? वाचण्यापुरत्या किंवा ऐकण्यापुरत्याच त्या मर्यादित राहणार नाहीत का? मित्रांनो रोजच्या या धावपळीत वरवरच्या भौतिक सुखांसाठी झगडतांना आपण आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडवून घेतो. हे स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजे ते आजच्या लेखात आपण पाहूया.
स्वतःची काळजी घ्यायला शिका
आपण नेहमी स्वतःच्या शरीराची आणि मनाची काळजी घेत आहोत का? याची खात्री करा. कारण इतर कामं करण्याच्या नादात आपण त्या कामांची किंवा इतरांची काळजी घेत असतो, पण स्वत:कडं मात्र दुर्लक्ष करत राहतो. स्वतःला वेळ देणं म्हणजे काय? तर शांत बसणं, आवडीची गाणी ऐकणं किंवा एखादा आवडीचा पदार्थ बनवणं. थोडक्यात काय तर ज्या गोष्टींतून तुम्हाला आनंद मिळतो, त्या गोष्टी करणं म्हणजे स्वतःला वेळ देणं.
वेळेचे नियोजन
जेव्हा तुम्ही दिवसाच्या कामांचे, आठवड्याच्या कामांचे नियोजन करता, तेव्हा तुमची कामं वेळेत होतात. शिवाय तुम्ही पूर्ण क्षमतेने काम करू शकता. जेव्हा कामं सुरळीत होत असल्याचं तुम्हाला दिसतं, तेव्हा तुमचा ताण कमी होऊन मानसिक शांतता लाभते. याउलट जेव्हा तुम्ही तुमच्या कामांचं योग्य नियोजन करत नाही, तेव्हा मात्र तुम्हाला मानसिक ताण येतो.
सतत शिका
तुम्हाला ज्या क्षेत्रात मोठं व्हायचं आहे आणि ओळख निर्माण करायची आहे ते क्षेत्र निवडा. तुमच्या कौशल्यांवर काम करा आणि ज्ञान वाढवा. पुस्तकं वाचा, ऑनलाइन अभ्यासक्रम घ्या, कार्यशाळेत सहभागी व्हा किंवा वेबिनारमध्ये भाग घ्या. या गोष्टी केल्याने तुमचं मन उत्साही राहील आणि नवीन संधीसुद्धा मिळतील.
ध्येय निश्चित करा
स्वतःसाठी काही स्पष्ट आणि साध्य करण्यायोग्य ध्येय सेट करा. त्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये divide करा आणि त्या दिशेने कार्य करण्याची योजना तयार करा. जर तुमच्याकडे निश्चित ध्येय नसेल, तर तुमच्या डोक्यात बिनकामाचे विचार येतील आणि यामुळे तुम्ही पुन्हा मानसिक शांततेपासून चार हात लांब राहाल.
सजगतेचा सराव करा
मागच्या लेखात पाहिल्याप्रमाणे तुमची सजगता वाढविण्यासाठी ध्यानाचा सराव करा. ध्यान हे सर्वात शक्तिशाली माध्यम आहे, जे तुम्हाला वर्तमानात जगायला शिकवते. जेव्हा तुम्हाला वाटेल की, आपण अतिविचार करायला लागलो आहोत, तेव्हा आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.
चांगली संगत ठेवा
तुम्हाला सहकार्य आणि प्रोत्साहन देणाऱ्या लोकांसोबत रहा. मित्र असो वा कुटुंब वैयक्तिक वाढीस प्रोत्साहन देणाऱ्या लोकांशी संपर्क ठेवा. नकारात्मक लोकांच्या सान्निध्यात राहून आपणही नकारात्मक विचार करायला लागतो आणि परिणामतः आपण आपली शांतता गमावून बसतो.
तर मित्रांनो जर या सहा गोष्टी तुम्ही नियमितपणे केल्या, तर नक्कीच मानसिक शांततेसाठी याचा फायदा तुम्हाला होईल.