शीर्षक वाचून थोडा धक्का लागल्यासारखं वाटू शकतं कारण लहानपणापासून आपल्याला शिकवलं गेलंय की, स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपेचा त्याग करावा लागतो, ध्येयवेड्या व्यक्ती कधीच जास्त झोप घेत नाहीत आणि त्या नेहमी तत्पर असतात. पण वास्तविकता अशी आहे की पुरेशी झोप न घेणं आपल्या शरीरासाठी खूपच घातक ठरू शकतं.
शरीराच्या योग्य कार्यासाठी आणि मानसिक संतुलनासाठी पुरेशी झोप अत्यावश्यक आहे. झोप कमी झाल्यास त्याचा आपल्या आरोग्यावर आणि कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पुरेशी झोप घेतल्याने ऊर्जा वाढते, एकाग्रता टिकवून ठेवता येते आणि मानसिक आरोग्य सुधारण्यात मदत होते.
निरोगी जीवनशैलीसाठी झोपेचे महत्त्व अपार आहे. झोप ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी आपल्या शरीराला नवीन ऊर्जा प्रदान करते. मानवी शरीराला किमान ७ तास झोप आवश्यक असते, चांगली आणि पूर्ण झोप आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग झोपेच्या महत्त्वाबद्दल अधिक जाणून घेऊया.
1. शारीरिक बांधणी
रात्रीच्या झोपेमध्ये आपल्या शरीराची एकप्रकारे पुनःबांधणी होते. हॉर्मोनल संतुलन राखणे, ताणतणाव कमी करणे, आणि शरीरातील पेशींना कार्यन्वित करणे हे झोपेमुळे शक्य होते. पुरेशी झोप न मिळाल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि रोगप्रतिकारक प्रणाली कमजोर होते.
२. मानसिक स्वास्थ्य
झोपेमुळे मेंदूला आराम मिळतो आणि नवीन माहिती आणि अनुभवांच्या प्रक्रियेत मदत होते. कमी झोपेमुळे तणाव, चिंता आणि डिप्रेशन यांसारख्या मानसिक आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. चांगली झोप मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक आहे, जी स्मरणशक्ती आणि निर्णयक्षमता सुधारण्यासाठी मदत करते.
३. भावनिक संतुलन
योग्य झोपेमुळे भावनिक संतुलन राखले जाते. झोप न मिळाल्यास चिडचिडेपणा, अस्वस्थता आणि भावनिक असंतुलनाची समस्या उद्भवते. योग्य झोपेमुळे भावनिक स्थिरता आणि आनंदाची भावना वाढते.
४. शारीरिक आरोग्य
झोपेचा आपल्या शारीरिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. झोपेच्या अभावामुळे वजन वाढणे आणि मोटापा यांसारख्या समस्या उद्भवतात.
५. उत्पादनक्षमता आणि कार्यक्षमता
चांगली झोप आपली उत्पादनक्षमता आणि कार्यक्षमता वाढवते. नीट झोप घेतल्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणे, निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे सोपे होते. झोपेच्या अभावामुळे कार्यक्षमतेत घट येते आणि चुका होण्याची शक्यता वाढते.
६. रोगप्रतिकारक शक्ती
झोपेमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. नीट झोप घेतल्याने सर्दी, खोकला आणि इतर संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होतो. कमी झोपेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते आणि आपण लवकर आजारी पडतो.
७. त्वचेचे आरोग्य
चांगली झोप आपली त्वचा ताजेतवानी आणि निरोगी ठेवते. झोपेच्या अभावामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे, त्वचेवर सुरकुत्या आणि मुरुमांसारख्या समस्या उद्भवतात.
मित्रांनो चांगली झोप आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी पुरेशी आणि गुणवत्तायुक्त झोपेची गरज आहे. पुरेशा झोपेमुळे आपण निरोगी, ताजेतवाने जीवन जगू शकतो.
अखेर, झोपेची गुणवत्ता आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगावर प्रभाव टाकते. नियमित, पुरेशी आणि शांत झोपेचा अनुभव घेतल्यास, आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची स्थिती सुधारते. झोपेच्या अभावामुळे, मानसिक ताण, चिडचिडेपणा, आणि दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. झोपेच्या चांगल्या सवयींमुळे आपल्या कार्यक्षमतेत सुधारणा होते, स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते आणि एकंदर जीवनशैली अधिक आनंददायी बनते. त्यामुळे एकंदरीत, झोपेची महत्ता समजून तिची काळजी घेणे हे आपल्या सर्वांगीण आरोगयासाठी खूप लाभदायक आहे.
भारतातील व्यापारी समाज म्हटलं की हमखास आपल्यासमोर टाटा, गोदरेज, वाडिया अशी अनेक नावं समोर येतात. डोक्यावर टोपी आणि अंगात दिमाखदार सूट घातलेली पारशी लोकं पहिली की हा समाज जन्मजात श्रीमंत असल्याची खात्री पटते. आश्चर्याची बाब म्हणजे या समाजात लाखभर रुपये दर महिना कमावणाऱ्या माणसाला गरीब म्हटलं जातं. पारशी लोकं मुळातच व्यावहारिक ज्ञान अंगीकृत करून जन्म घेत असल्याने की काय पण संख्येने अत्यंत कमी असलेली ही लोकं व्यवहार आणि व्यवसायाच्या बाबतीत सर्वांना मागे टाकतात. असं का? सांगतो, पण त्यासाठीच हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा…
पारशी समाजाचा उगम कसा झाला?
आजच्या घडीला केवळ देशातच नाही, तर विदेशात देखील भारताचे नाव गाजवत असलेली कंपनी म्हणजे टाटा समूह किंवा Tata Group of Industries आणि या कंपनीचे सर्वेसर्वा रतन टाटा. मात्र तुम्हाला माहिती आहे का हे रतन टाटा देखील पारशीच आहेत. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आज भारतीय व्यावसायिक क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी बजावणारा हा पारशी समाज मूळचा भारतीय नाही. सध्याच्या काळात जो देश इराण म्हणून ओळखला जातो त्याचं जुनं नाव होतं पर्शिया आणि म्हणून तिथून उगम पावलेले लोक पारशी म्हणून ओळखले जातात. पारशी समाज इ.स पूर्व ७व्या शतकापासून या भागात पाहायला मिळू लागला. मात्र त्यानंतर इराणवर अरबी मुस्लिमांकडून आक्रमणं व्हायला सुरुवात झाली. या भयावह आक्रमणांना तोंड देणं पारशी समाजाला जमणारं नव्हतं म्हणूनच त्यांनी स्थलांतर करायला सुरुवात केली.
विविध दिशांना निघालेल्या या जहाजांपैकी कैक जहाजं भारतातील गुजरात राज्याच्या सीमेला येऊन धडकली. परदेशातून आलेल्या या समजाला स्थानिकांशी संवाद मात्र साधता येईना आणि स्थानिक देखील या लोकांबद्दल आणि त्यांच्या भाषेबद्दल अनभिज्ञ होते. परिणामी सर्व खबर स्थानिक राजाच्या कानी घालण्यात आली. आता या अनोळखी लोकांशी संवाद साधायचा तरी कसा या विचारात असलेल्या राजाला अचानक एक कल्पना सुचली, त्याने ताबडतोब एक भरलेला दुधाचा पेला पारशी समूहासमोर आणून ठेवला. या काठोकाठ भरलेल्या पेल्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, की राज्याची लोकं सामावून घेण्याची मर्यादा संपली आहे आणि यात आणखी लोकांना सामावून घेता येणार नाही.
राजाच्या या निर्णयावर हताश न होता पारशी लोकांनी संयम बाळगला आणि त्यानंतर पारशी लोकांकडून आलेलं उत्तर सर्वांना अचंबित करणारं होतं. पारशी लोकांनी त्याच दुधाने भरलेल्या पेल्यात काहीशी साखर मिसळली आणि तो पेला पुन्हा राजासमोर ठेवला. राजा या उत्तरावर खुश झाला, तुमच्या समाजामध्ये आम्ही साखरेप्रमाणे विरघळून जाऊ असा मतितार्थ समोर ठेऊन पारशी लोकांनी त्यांच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर या स्वभावाचं उदाहरण प्रस्तुत केलं आणि सर्वांना क्षणार्धात जिंकूनही घेतलं. बुद्धिमान, हुशार, मेहनती आणि शेतीचा अनुभव असलेल्या पारशी समाजाने दिलेल्या शब्दाचं पालन केलं. ते राजाच्या छत्रछायेत आनंदाने राहू लागले मात्र काही काळानंतर आलेल्या दुष्काळाने त्यांना देशाटन करायला भाग पडलं. त्याकाळात आपल्या भारतात विविध राज्यांमध्ये आपापसात युद्धं व्हायची, मात्र पारशी लोकांनी कधीही अशा युद्धांमध्ये भाग घेतला नाही, याउलट नेहमीच सर्व राज्यांशी जुळवून घेत व्यवसाय सुरु ठेवला.
इंग्रजांची सत्ता आणि पारशी समाज
पारशी समाज भारतात मुख्यत्वेकरून दलालीचा व्यवसाय (Brokerage business) करायचा. सर्वांशी जुळवून घेत ते व्यापार वाढवतच होते आणि अशातच व्यापाराच्या उद्देशाने काही मत्सरी पाऊलं भारतात उमटली. साधारण १६०८ साली इंग्रजांनी मसाल्याच्या व्यापाराचे निमित्त साधून भारतीय बाजारात आणि भूमीत प्रवेश मिळवला. भारताचे वैभव पाहून त्यांचे डोळेच दिपले आणि या संधीसाधू माणसांनी भारतावर राज्य करण्याचा निर्णय पक्का केला. काही स्वकीयांच्या धूर्त, फितूर आणि लालची स्वभावामुळे ते यशस्वी देखील झाले. इंग्रजांच्या जुलमी राजवटीखाली भारतीय जनता होरपळून निघत होती, मात्र पारशी समाजाने या संधीचं सोनं करून दाखवलं. सर्वात अगोदर पारशी लोकांनी इंग्रजांची भाषा शिकून घेतली, कारण भाषा हीच संवाद साधण्याचं महत्वाचं साधन आहे. पारशी लोकांनी इंग्रजी भाषेचा अभ्यास केल्याने इंग्रजांना देखील स्थानिकांशी संवाद साधण्यासाठी मदत मिळू लागली. इंग्रजी राजवटीत पारशी लोकं इंग्रजांकडे नोकरी करायचे आणि म्हणूनच त्याकाळात अनेक पारशी लोकं सरकारी कर्मचारी म्हणून पाहायला मिळत. पारशी लोकांच्या या स्वभावगुणांमुळे त्यांनी इंग्रजी राजवटीचा केंद्रबिंदू असलेल्या आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरलेला मुंबई/बॉम्बे मध्ये जम बसवला.
भारतात इंग्रजी सत्ता असताना घडलेला एक महत्वाचा प्रसंग म्हणजे चीन आणि युरोप यांमध्ये वाढलेला व्यापार. चीन युरोपला मोठ्या प्रमाणात चिनी मातीची भांडी, चहा आणि रेशीम पाठवायचा आणि युरोपकडून देखील या वस्तूंसाठी मागणी वाढत होती. दुसऱ्या बाजूला चीन आणि युरोप यांमधले वृद्धिंगत होणारे संबंध इंग्रजांना रुचणारे नव्हते आणि म्हणूनच त्यांनी पारशी लोकांच्या मदतीने चीनमध्ये अफूची निर्यात सुरु केली. येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत चीनमधून अफूची मागणी वाढू लागली, एक वेळ तर अशी आली होती की चीनमध्ये प्रत्येक ४ पैकी ३ माणसं अफूच्या आहारी गेली होती. अफूच्या व्यापाराने इंग्रजांना काय फायदा झाला? एकतर चीनमधील लोकं अफूच्या नशेत असल्याने युरोपसोबतचा व्यापार कमी झाला आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या निर्यातीमुळे धानाचे पेटारे भरू लागले.
पारशी समाज आणि आज
स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच पारशी समाज भारतात उत्तमरीत्या त्यांचा जम बसवून आहे. इंग्रजांची राजवट असताना देखील त्यांनी अनेक सन्मानित पदं सांभाळली होती. पारशी लोकं त्याकाळी अनेक जहाजांचे मालक होते, डॉक्टर होते आणि सरकारी कचेऱ्यांमध्ये काम देखील करायचे. पारशी लोकांनी जरी भरपूर पैसा कमावला असला तरीही आपण कोणत्या परिस्थितीमधून इथवर आलोय याची जाण त्यांना कायमच होती आणि म्हणूनच कमावलेल्या पैशांमधून त्यांनी मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी हॉस्पिटल्स आणि शैक्षणिक संस्थांची निर्मिती करत समाजाप्रती नेहमीच आपले कर्तव्य निभावलं. स्वातंत्र्योत्तर काळातही आपण जर का यांची संख्या मोजायला गेलो तर ती ०.००५ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही, मात्र भारतीय अब्जाधीशांच्या यादीत तीन ते पाच नावं ही पारशी समाजातील (टाटा, गोदरेज, पूनावाला, मिस्त्री, वाडिया) आहेत.
एअरलाईन्स, सॉफ्टवेअर, कन्स्ट्रक्शन, फूड, हेल्थ यांसारख्या एक ना अनेक क्षेत्रांमध्ये पारशी समाज अव्वल कामगिरी बजावतोय. देशाची सुरक्षा, मनोरंजन, खेळ किंवा वैज्ञानिक क्षेत्राची समाजातील प्रत्येक क्षेत्रात या लोकांनी नाव कमावलं असल्याने व्यवसायातून झालेली सुरुवात आज अनेक दिशांना पसरलेली आहे. पारशी लोकांची संख्या अत्यंत नगण्य म्हणजे १४२ कोटींच्या देशात फक्त ५७००० असली तरीही सैन्य, मनोरंजन, व्यापार, विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये पारशी नाव कमावताना दिसतात. समाज थोडा असला तरी कर्तबगारांची संख्या खूप मोठी आहे. फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ, जमशेदजी टाटा, रतन टाटा, होमी भाभा, सायरस पुनावाला, आदी गोदरेज, बोमन इराणी अशी अनेक नावं या समाजाच्या कर्तृत्वाचे उदाहरण प्रस्तुत करतात.
आपण पारशी समाजाकडून काय शिकलो?
एखादी गोष्ट वाचल्यानंतर आपण त्यातून काय शिकलो याची जाणीव झाली पाहिजे. पारशी समाज हा हातावर मोजण्याएवढा जरी असला तरीही त्यांच्या शांत आणि मेहनती स्वभावामुळे ते अनेकांवर भारी ठरले आहेत. कदाचित त्यांना जन्मजात हा स्वभाव मिळालाही असेल, मात्र तरीही समोर आलेला प्रसंग कशाप्रकारे आपल्या फायद्याचा ठरू शकतो याचे धडे आपण पारशी समाजाकडून गिरवले पाहिजेत. अनेकवेळा फटकळ बोलण्यामुळे मह्त्वाची कामं होता-होता राहतात, मात्र या समाजात जर का टिकून राहायचं असेल आणि चार-चौघांमध्ये वावरायचं असेल तर तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवता आला पाहिजे. सर्वात शेवटी पारशी समाजाकडून शिकण्याची गोष्ट म्हणजे मेहनती स्वभाव, परिस्थिती कितीही बिकट असली तरीही ती केवळ मेहनतीच्या जोरावर बदल घडवता येतात.
तर तुम्हाला या पारशी समाजाची गोष्ट कशी वाटली आणि तुम्ही यातून काय शिकलात हे आम्हाला सांगायला विसरू नका…
दररोजच्या बोलण्यात आपण एका शब्दाचा अगदी प्रकर्षाने उपयोग करत असतो, तो म्हणजे महत्व. “तुला माझी किंमत नाहीये!” असं वाक्य आपल्याकडून अगदी सहजपणे बोललं जातं; मात्र या वाक्यामागे अनेक भावना देखील गुंतलेल्या असतात आणि म्हणूनच मनाच्या हळव्या कोपऱ्यातून निघालेलं हे वाक्य खरोखर वजनदार ठरतं.
मात्र कधी विचार केलात का ‘किंमत किंवा व्हॅल्यू’ म्हणजे काय? दुकानात गेल्यानंतर विकत घेतलेल्या हरेक वस्तूसाठी किंमत मोजली जाते आणि म्हणूनच त्या वस्तूच्या किमतीनुसार आपण ती हाताळतो. अगदीच महागडी वस्तू असेल तर तिला जिवापेक्षा जास्त जपलं जातं. नाही का? पण किंमत फक्त विकत घेतलेल्या वस्तूंचीच केली जाते का? नाही!! आपल्या आजूबाजूला वावरणारी मंडळी, आपलं कुटुंब, मित्र परिवार सर्व आपल्यासाठी महत्वाचे असतात आणि म्हणून आपण त्यांची किंमत करतो म्हणजे काय तर त्यांचं आपल्या आयुष्यातील महत्व जाणतो आणि त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, ते आपल्यापासून दुरावणार नाहीत याची काळजी घेतो. दैनंदिन जीवनातील याच घडामोडींच्या आधारे कैक वर्षांपूर्वी ट्रॉली डेलिमाचा सिद्धांत सादर करण्यात आला होता. पण हा संदर्भ नेमका आहे तरी काय हे आज जाणून घेऊया.
ट्रॉली डेलिमा म्हणजे काय?
वर्ष १९६७ मध्ये फिलिप फूट (Philipa Foot) नावाच्या एका फिलॉसॉफरने (Philosopher) हा सिद्धांत मांडला होता. सदर सिद्धांत सामान्य माणसाला समजण्यासाठी फिलिप फूट यांनी एका रेल्वेचं उदाहरण देत एकूण संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात,
एका वेगाने धावणाऱ्या रेल्वेसमोर जर का पाच माणसं उभी होती म्हणून चालकाने त्यांचा जीव वाचवण्यासाठी रूळ बदलला तर दुसऱ्या रुळावर देखील एक माणूस उभा ठाकला होता. मग अशा कठीण परिस्थितीमध्ये रेल्वे चालकाने काय करावं? साहजिकपणे आपण म्हणू की पाच माणसांचा जीव वाचवण्यासाठी रेल्वेचालकाने एका माणसाचा जीव घ्यावा. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर असंही वाटतं की, जीव हा जीव असतो मग तो एका माणसाचा असो किंवा पाच.
या उदाहरणातून आपण काय शिकतो तर आयुष्याच्या प्रवासात काही प्रसंग असेही येतात, जिथे एक योग्य पर्याय निवडला जाऊ शकत नाही. हिंदी भाषेत या प्रसंगाच्या आधारे एक म्हण तयार करण्यात आली आहे ती म्हणजे “आगे कुआं, पीछे खाई” म्हणजे काय तर समोर गेलो तरीही विहिरीत पडू आणि मागे आलो तरीही दरीत कोसळू, एकूण काय तर अशा परिस्थितीत एक सोपा मार्ग निवडला जाऊ शकत नाही.
दररोजच्या जीवनात याचा संदर्भ काय?
जीवन जगात असताना आपण देखील अनेकवेळा अशा ट्रॉली डेलिमाचा सामना करत असतो. विचार करा त्या रेल्वेच्या रुळावर जर का तुमच्या जवळचा कुणीतरी खास व्यक्ती असता, तर तुम्ही कोणाची निवड केली असती, पाच माणसांची की तुमच्या जवळच्या व्यक्तीची? नक्कीच आपण आपल्या जवळच्या व्यक्तीची निवड केली असती आणि तेव्हा आपण एका व्यक्तीचे प्राण वाचवत आहोत की पाच व्यक्तींना जीवनदान देत आहोत असा विचार देखील मनात आला नसता. का? कारण आपल्यासाठी ती जवळची व्यक्ती महत्वाची असते, आपण त्या व्यक्तीची किंमत जाणून असतो. इतिहासाच्या पानांमध्ये डोकावून पाहिलं तर रामायण आणि महाभारतामध्ये देखील या ट्रॉली डेलिमाची उदाहरणं सापडतात. पट्टराणी कैकयीला दिलेल्या वाचनापायी लाडक्या पुत्राला वनवासात जाण्याची आज्ञा न देऊ शकणारा राजा दशरथ असो किंवा कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर स्वतःच्याच परिवारासमोर शत्रू म्हणून धनुष्य घेऊन उभा ठाकलेला अर्जुन असो. ट्रॉली डेलिमाचा एका अर्थाने विचार केल्यास अशा कठीण प्रसंगांमध्ये अनेकवेळा नीती-अनीतीला बाजूला सारत आपल्यासाठी काय महत्वाचं आहे याच्या आधारे निर्णय घेतला जातो.
याच सिद्धांताचा दुसऱ्या बाजूने विचार करायचा झाल्यास एक खास पैलू उघड होतो. आपल्या मनात अनेक इच्छा असतात, कित्येक गोष्टी साध्य करायच्या असतात, मात्र तरीही आपण त्या करू शकत नाही, कारण आपण त्या इच्छांना महत्व दिलेलं नसतं. ‘मला डॉक्टर व्हायचं आहे’ अशी इच्छा मनात बाळगून वावरणारा कधीही डॉक्टर बनू शकत नाही, मात्र मला डॉक्टर व्हायचं आहे, माझ्यासाठी ही इच्छा पूर्ण होणं महत्वाचं आहे आणि म्हणून मी प्रयत्न करेन असा विश्वास बाळगणाराच यशस्वी होतो आणि म्हणूनच आपलं करिअर घडवताना जे लक्ष साध्य करायचं आहे त्याला महत्व देणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नातेसंबंधाला देखील हाच संदर्भ लागू होतो. नवीन लग्न करून सासरी गेलेली मुलगी जेव्हा सासरच्या घराला महत्व देते, त्यांचा आनंद देखील तिच्यासाठी महत्वाचा ठरतो तेव्हाच ती नवीन घरात रुळते किंवा नवीन संबंध जपू शकते.
ट्रॉली डेलिमाचे अनेकविध प्रसंग आपल्या आयुष्यात येतात आणि येत राहतील मात्र अशा कठीण काळात माणूस कसे निर्णय घेतो, कुणाला महत्व देतो यावर पुढील शृंखला अवलंबून असते आणि म्हणूनचअशावेळी सद्सद्विवेकबुद्धीचा नीट वापर करावा. आपल्या निर्णयामुळे काय परिणाम होऊ शकतात याचा विचार करावा. आयुष्याला अवघड डोंगर घाट असं म्हटलं गेलंय त्यामुळे या कठीण प्रसंगांमध्ये आपल्यासाठी महत्वाचं काय हे ठरवता आलं पाहिजे, कारण ज्याला महत्व दिलं जातं किंवा किंमत केली जाते त्याचप्रतीचं आपण प्रामाणिकपणे कार्य करू शकतो.
Struggle शब्दाचा एक लोचा आहे. आपल्याकडे हा शब्द आर्टसला Admission घेणाऱ्या, नाटक -चित्रपट क्षेत्रात Career करू इच्छिणाऱ्या आणि दहा ते पाच ची चाकोरी सोडून वेगळी वाट चोखाळणाऱ्या लोकांना उद्देशून वापरला जातो. मुळात मला असं वाटत की प्रत्येकजण हा त्याच्या / तिच्या पातळीवर एक Struggle करतच असतो. म्हणजे बापाशी बिघडलेले संबंध पूर्ववत करण्यासाठी धडपडणारा पोरगा हा एक Struggle च करत असतो.
नोकरी मध्ये बॉस आपली ठासत आहे हे कळत असून पण नोकरी टिकवण्यासाठी धडपड करणारा मध्यमवर्गीय माणूस पण रोज संघर्ष करीतच असतो. पण कधी कधी हा संघर्ष खुप लांबतो. इतका लांबतो की आता याला शेवटच नाही अस वाटायला लागत. खुप लोक अशावेळेस Give Up करतात. आणि आयुष्यभर ‘काश …’ च मधुन टोचणी देणार फिलिंग घेऊन जगतात. काही लोक मात्र याला अपवाद असतात. ते टिकून राहतात, लढतात आणि जिंकतात पण. अशीच एक हृदयस्पर्शी संघर्षाची कथा आहे आंग ली ची. इंग्रजी चित्रपट पाहणाऱ्या लोकांसाठी हे नाव अपरिचित नाही. Brokeback Mountain, नुकताच येउन गेलेला आणि गाजलेला life of pie असे अनेक चित्रपट आंग ली ने दिग्दर्शित केले आहेत. आज जगातल्या आघाडीच्या दिग्दर्शकांमध्ये त्याचा समावेश होतो. पण इथपर्यंत मजल मारण्यासाठी त्याने जो भावनिक, आर्थिक संघर्ष केला त्याची हि कुठलाही आव न आणणारी, melodramatic नसणारी पण हृदयस्पर्शी कहाणी त्याच्याच शब्दात :
१९७८ मध्ये मी Illinois University मध्ये चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेण्याचा निर्णय पक्का केला. माझ्या वडिलांचा या माझ्या निर्णयाला तीव्र विरोध होता. त्यांनी माझ्या तोंडावर काही आकडेवारी फेकून मारली.: ‘दरवर्षी तुझ्यासारखे ५०००० लोक हे असल कुचकामी शिक्षण घेऊन कॉलेजच्या बाहेर पडतात आणि त्यांच्यासाठी नोकऱ्या किती असतात, तर फक्त २००. ‘तरी त्यांचा हा सल्ला ठोकरून मी अमेरिकेला जाणाऱ्या विमानात बसलो. पण त्यामुळे पिता – पुत्राच्या नात्याला कधीही न भरून येणारा तडा गेला. पुढच्या दोन दशकात आम्ही शंभरहून कमी वाक्य एकमेकांशी बोललो असू.
पण जेव्हा मी माझ शिक्षण संपवून बाहेर पडलो तेव्हा माझ्या वडिलांनी व्यक्त केलेली भीती कीती खरी होती हे मला पदोपदी जाणवायला लागलं. एक चिनी वंशाचा माणूस hollywood मध्ये काहीतरी करून दाखवेल असे कुणालापण वाटत नव्हतं. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतरची पुढची सहा वर्ष ही कधीही संपणार नाही असे वाटणाऱ्या अनिश्चिततेने भरलेली होती. या सहा वर्षांमधला बहुतांश वेळ मी अनेक दिग्दर्शक व संकलक यांचा सहायक म्हणून छोटी मोठी किरकोळ काम करण्यात व्यतीत केला. सगळ्यात वेदनादायक भाग हा मी लिहिलेलं स्क्रिप्ट घेऊन निर्मात्यांचे उंबरठे झिजवणे हा होता. त्याकाळात मला साधारणतः ३० निर्मात्यांकडून नकार मिळाला.
त्याच वर्षी मी ३० वर्षाचा झालो. एक जुनी चिनी म्हण आहे : तिशीत माणूस त्याच्या स्वतःच्या पायावर ठाम उभा असतो अशा अर्थाची. पण मी तर अजूनही धड स्वतःच्या प्राथमिक गरजा पूर्ण करू शकत नव्हतो. या अशा पडत्या काळात माझ्यासमोर फार कमी पर्याय शिल्लक होते. एक तर काही घडेपर्यंत वाट बघत बसायचं अथवा चित्रपट बनवण्याचं माझ स्वप्न सोडून द्याच.
या अनिश्चिततेच्या अंधाराने भरलेल्या काळात मला माझ्या बायकोने पाठबळ दिल. तिने तिची पदवी जीवशास्त्र या विषयातून घेतली होती आणि ती एका प्रयोगशाळेत नोकरी करत होती. पण तिच्या नोकरीमधून मिळणारे उत्पन्न आम्हाला पुरेल एवढे नव्हते. त्याचकाळात आम्हाला एक पुत्ररत्न झाले आणि आमच्या जबाबदाऱ्या अजून वाढल्या. घरात मी पैसे आणू शकत नाही या अपराधी भावनेतून मी घरकामांची जबाबदारी घ्यायला सुरुवात केली. जेव्हा बायको कामावर जायची तेव्हा मी स्वयंपाक , साफसफाई आणि आमच्या मुलाच संगोपन अशी काम करत असे. फावल्या वेळात वाचन आणि संहिता लेखन चालूच होते. रात्रीच जेवण बनवून झाल की मी आमच्या मुलाला, घेऊन घरासमोरच्या पायऱ्यांवर बसून राही. मी माझ्या बायकोची आणि तो त्याच्या आईची वाट बघत.
हे असलं आयुष्य कुठल्याही पुरुषासाठी मानहानीकारकच. माझ्या सासू सासऱ्यांना हे डाचत असावं. त्यांनी माझ्या बायकोला काही पैसे देऊ केले. त्यांच्या मते मी या भांडवलातून एखाद चायनीज हॉटेल सुरु करावं जेणेकरून माझं स्वतःच काही उत्पन्न सुरु होईल. माझ्या बायकोने हे पैसे घ्यायला इन्कार केला. जेव्हा मला याबद्दल कळल तेव्हा मी सुन्न झालो. अनेक रात्री जागून काढल्यावर शेवटी मी निर्णयाप्रत आलो : माझं चित्रपट बनवण्याचं स्वप्न हे पूर्ण होणार नाही. सत्याला सामोरे जाण्याची वेळ आली आहे
जड अंत:करणाने मी जवळच्या एका कॉलेज मध्ये मी Computer Course ला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्यावर मी निराशेच्या गर्तेत बुडून गेलो. माझ्या बायकोला हा माझ्या स्वभावातला फरक जाणवला. कॉम्प्यूटर क्लासचं वेळापत्रक तिने माझ्या बॅगमध्ये पाहिलं. त्या रात्री ती काहीच बोलली नाही.
दुसऱ्या दिवशी ती तिच्या कामाला जायला निघाली. मी सुन्नपणे बसून होतो. ती घराबाहेर पडली. पण अचानक तिच्या मनात काय आल कुणास ठाऊक. घराबाहेरच्या पायऱ्यांवर असताना ती पुन्हा वळली आणि एवढंच म्हणाली, “आंग , तुझ्या स्वप्नांचा विसर पडू देऊ नकोस.” तिच्या या एका वाक्याने जादूची कांडी फिरली. निराशेच्या गर्तेत गटांगळ्या खाणारं माझ स्वप्न पुन्हा जिवंत झालं. त्याचा पुनर्जन्म झाला.
मी ते कॉम्प्यूटर क्लासचं वेळापत्रक बॅगमधून बाहेर काढलं. त्याचे हळूहळू बारीक बारीक तुकडे केले आणि कचऱ्याच्या डब्यात ते फेकून दिले.
अर्थातच एका रात्रीत परिस्थिती बदलली नाही. पण काही दिवसांनी मला माझ्या स्क्रिप्ट साठी finance मिळाला. मी माझ्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. नंतर माझ्या कामाला काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार पण मिळाले. नंतर माझ्या बायकोने माझ्याशी बोलताना कबुली दिली,’ मला नेहमीच असा विश्वास होता की तुझा जन्म हा चित्रपट बनवण्यासाठीच झाला आहे. संगणक क्षेत्रात आधीच खूप लोक काम करत आहेत आणि त्यांना तुझी गरजपण नव्हती.”
स्वप्नांना वयाची, लिंगाची, धर्माची बंधनं कधीच नसतात. त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी कुठल्याही मुहूर्ताची गरज नसते. आंग लि ने २०१३ मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा ऑस्कर पुरस्कार जिंकला. तुमचं स्वप्नं काय आहे ?
रोज क्षणा क्षणाला आपली स्पर्धा सुरू असते. कधी इतरांबरोबर तर कधी स्वतःशीच. पण, प्रत्येक वेळी आपण जिंकूच असे नाही. कधी कधी पराभवही होत असतो. खचून न जाता प्रत्येक क्षणाला सामोरे जाण्यात जास्त यश असते. ‘अपयश ही यशाची पहिली पायरी असते’ याप्रमाणे आपले करिअर सुरू असते. आपण यशाचीच अपेक्षा जास्त ठेवत असतो आणि कधी कधी एखाद्या गोष्टीत मागे पडतो. आता हे मागे पडायचे नसेल, तर काही टीप्स
कामात परफेक्शन हवे
नेहमी आपण स्वतःला सगळ्यांपेक्षा खूप स्मार्ट समजत असतो. आपले शिक्षण सगळ्यांपेक्षा जास्त आहे, असं मानत असतो. जोपर्यंत आपण एखाद्या कामात परफेक्शन आणत नाही तोपर्यंत आपण स्वतःला स्मार्ट समजू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक कामावेळी ओव्हर कॉन्फिडन्स ठेवणे आपल्या नोकरीस घातक असू शकते.
प्रामाणिकपणा
नोकरीच्या ठिकाणी प्रमाणिकपणा असणे अत्यंत महत्त्वाचे असते. कामा संदर्भात नुसतीच आश्वासन नका देऊ, ती पूर्ण करा. कामाचे आश्वसन देऊन ते काम वेळच्या वेळी पूर्ण करून दाखवल्यास बॉसच्या आपल्याबद्दलची चांगली प्रतिमा निर्माण होते. नेहमी आपली बॉसच्या मनात चांगली प्रतिमा उमटवण्यासाठी प्रामाणिकपण गरजेचा असतो.
स्वतःला ठेवा अपडेट
काही वेळा आपण ज्या ठिकाणी काम करतो त्याच ठिकाणी कायस्वरूपी राहण्याचा विचार करत असतो. जरी हा विचार स्वतःला योग्य वाटत असला तरी तो आपल्या करिअरच्या दृष्टीने नुकसानकारक आहे. कारण एकाच जागी काम करत राहिलो तर नवीन गोष्टी कधी शिकता येणार नाही. सध्याच्या जगात स्वतःला अपडेट ठेवणे खूप महत्त्वाचे ठरत आहे.
आत्मविश्वास
आत्मविश्वास बाळगणे महत्त्वाचे ठरते. भले आपण कितीही पदव्या घेतल्या असो, कामाचा कितीही अनुभव असला आणि आपल्यात आत्मविश्वासच नसेल तर पदवीचा, अनुभवाचा काहीही उपयोग नाही. जे कोणते काम हाती घेणार आहोत ते काम पूर्ण करण्याचा आत्मविश्वासा आपल्यात असला पाहिजे. जर आत्मविश्वास नसेल तर, चांगले करिअर घडवता येणार नाही. न्युनंगड कधी बाळगू नये. स्वतःला कधी कोणत्या गोष्टीत कमी समजु नये.
स्टीव्ह जॉब्सनी २००५ साली स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात केलेले भाषण प्रचंड गाजले. हे भाषण म्हणजे त्यांच्या प्रेरणादायी आयुष्याचा गोषवारा आहे… त्याचा केलेला मराठी अनुवाद…
जगातल्या सर्वोत्तम गणल्या जाणाऱ्या महाविद्यालयांपैकी एक अशा महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात तुमच्यासोबत बोलायची संधी मला मिळते आहे, हा मी माझा बहुमान समजतो. मी महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण करू शकलो नाही. आता सत्य सांगायला हरकत नाही, पण महाविद्यालयीन दीक्षांत समारंभ इतक्या जवळून मी पहिल्यांदा पाहतो आहे.
आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील तीन गोष्टी सांगणार आहे, बस्स. काही प्रचंड कहाणी नाही. फक्त तीन छोट्या गोष्टी…
पहिली गोष्ट आहे ठिपके जुळवण्याच्या संदर्भातली… मी रीड कॉलेजमधून सहा महिन्यांतच बाहेर पडलो होतो, पण त्या आधी मी जवळपास १८ महिने कॉलेजमध्येच ड्रॉप इन म्हणून घुटमळत होतो. मग मी बाहेर पडलो तरी का?
याची सुरुवात खरं तर माझ्या जन्माच्या आधीपासूनची आहे. माझी आई ही एक तरुण, अविवाहित महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती. आणि तिने मला दत्तक द्यायचे ठरवले. तिची फार इच्छा की, मी पदवीधर पालकांकडे दत्तक म्हणून जावे, त्यामुळे अखेर एका वकील दाम्पत्याची त्याकरिता निवड झाली. सारे कसे सुरळीत चालू होते आणि अचानक माझ्या जन्माच्या वेळी त्या दोघांनी ठरवले की त्यांना मुलगी हवी आहे. त्यामुळे वेटिंग लिस्टवर असलेल्या माझ्या आई-बाबांना रात्री अचानक फोन गेला की, ‘‘मुलगा झालाय. तुमची अजूनही त्याला स्वीकारण्याची तयारी आहे का?’’ ते म्हणाले, ‘‘अर्थातच.’’ अर्थात, नंतर माझ्या आईला कळले की माझ्या दत्तक आईने पदवी पूर्ण केली नव्हती आणि वडिलांनी तर शाळेच्या पुढेही मजल मारली नव्हती. तिने मग दत्तक कागदपत्रे साईन करायला नकार दिला. मग मला ‘महाविद्यालयीन शिक्षणापासून दूर ठेवले जाणार नाही’ या आश्वासनावरच तिने कागदांवर सह्या केल्या.
१७ वर्षांनंतर मी खरंच कॉलेजला गेलो. मूर्खासारखे मी स्टॅन्फोर्डसारखे महागडे कॉलेज निवडले आणि माझ्या दत्तक पालकांची मध्यमवर्गीय कमाई माझ्या शिक्षणावरच खर्च होऊ लागली. सहा महिन्यांतच त्याची किंमत मला उमगेनाशी झाली. माझ्या आयुष्यात मला काय करायचे आहे याची सुतराम कल्पना नव्हती आणि कॉलेजचे शिक्षण मला याचे उत्तर शोधण्यात मदत करत नव्हते आणि मी इथे आईबाबांची आयुष्यभराची कमाई उडवण्यात गुंतलो होतो. म्हणून मी कॉलेजमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि सुस्कारा सोडला. अर्थात, त्या वेळी हा छातीत धडकी भरवणारा निर्णय होता. पण आता वाटते की कदाचित हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला निर्णय असेल. हा निर्णय पक्का झाल्याक्षणीच मी ज्या वर्गाबाबतीत उत्साही नव्हतो, तिथे जाणे बंद करून टाकले आणि ज्या वर्गामध्ये मला जाण्यात रस होता त्या वर्गाना नियमितपणे जाऊ लागलो.
हे सगळेच काही स्वप्नवत नव्हते. डोर्म मिळायची नाही, म्हणून मित्रांच्या रूम्सवर जमिनीवर झोपावे लागे. कोकच्या रिकाम्या बाटल्या देऊन मी ५ सेंट्स जमा करत असे आणि त्यातून जेवणाची तजवीज करत असे. दर रविवारी ७ मैल चालत जात असे, ‘हरे राम हरे कृष्ण’चे व्यवस्थित जेवण खायला मिळावे म्हणून. पण मला ते आवडत होते. माझी अंत:प्रेरणा आणि माझे कुतूहल यांनी मला जे काही सापडले, ते पुढे आयुष्यात अनमोल ठरले. आता हेच पाहा ना, रीड कॉलेजमध्ये त्यावेळेला बहुधा सर्वोत्तम असे कॅलिग्राफीचे (सुलेखन) वर्ग चालत. संपूर्ण परिसरात प्रत्येक भित्तीपत्रकावर, इतकेच काय अगदी खणांवरदेखील सुंदर कॅलिग्राफी केलेली आढळे. मी तसाही ड्रॉप आऊट होतो आणि मला हे कसे करतात हे जाणून घ्यायचे होते, त्यातच मला माझे नियमित वर्ग करणे जरूरीचे राहिले नव्हते. कॅलिग्राफीच्या वर्गात मी सेरिफ आणि सान्स सेरिफ फॉण्ट्सविषयी शिकलो. त्याच्याच बरोबर दोन अक्षरांमध्ये कीती जागा असावी, अक्षरे सुशोभित कशी करावी याचेही ज्ञान मिळत होते. ते सारेच फार सुंदर, ऐतिहासिक आणि कलात्मकरीत्या हळुवार होते. कदाचित शास्त्राच्या चिमटीत पकडण्यापलीकडले… मी त्याने भारावून गेलो…
या सगळ्याचा माझ्या आयुष्यात दुरान्वयानेही काही प्रत्यक्ष लाभ होईल असं मला स्वप्नातही वाटलं नसतं. पण दहा वर्षांनंतर जेव्हा आम्ही पहिला मॅकीन्टोश कम्प्युटर बनवत होतो, हा सगळा काळ माझ्या मदतीला आला. आम्ही त्या सगळ्याचा वापर मॅकीन्टोशमध्ये केला. सुंदर टायपोग्राफी असलेला तो पहिला कम्प्युटर होता. जर मी महाविद्यालयातून त्या विषयांच्या जंजाळातून बाहेर पडलो नसतो, तर मॅकीन्टोशमध्ये विविध टाईप फेसेस आणि प्रमाणबद्ध फॉन्ट्स दिसले नसते आणि विंडोजवाल्यांनी जर मॅकीन्टोश जसाच्या तसा कॉपी केला नसता, तर आज जगातल्या कुठल्याच पीसीवर ते दिसले नसते. मी महाविद्यालयातून बाहेर पडलो नसतो, तर या कॅलिग्राफीच्या वर्गात कसा पोहोचलो असतो; आणि अर्थात, आज पीसीवर जे सुंदर टाइप फॉन्ट्स दिसतात ते कसे दिसले असते… ‘कनेक्ट द डॉट्स’ अर्थात हे ठिपके जोडणे… आज १० वर्षांनंतर मागे वळून बघताना सोप्पे जाते. तेव्हा हे कळत नव्हते.
पुन्हा. हे ठिपके तुम्ही भविष्यात बघून नाही जोडू शकत. ते फक्त मागे वळून बघताना जोडलेले दिसतात. म्हणूनच ते पुढे जाऊन जोडले जातील, यावर विश्वास ठेवावा लागतो. तुम्हाला कशावर तरी विश्वास ठेवावाच लागतो. तुमचे मन, आतला आवाज, भाग्य, नशीब, कर्म. काहीतरी. या विचार पद्धतीने मला कधीच दगा दिलेला नाही आणि त्यामुळेच माझ्या आयुष्यात बराच बदल घडलेला आहे.
माझी दुसरी गोष्ट आहे प्रेम आणि तोट्याविषयी.
मी फार नशीबवान आहे. मला काय करायला आवडते हे मला फार आधीच उमगले होते. मी २० वर्षांचा असतानाच मी आणि वोझने (स्टीव्ह वॉझनियाक) मिळून घरच्या गॅरेजमध्ये ॲपल कम्प्युटर्सची सुरुवात केली. आम्ही खूप मेहनत केली. दहा वर्षांत गॅरेजमधल्या आम्हा दोघांपासून सुरू झालेली ॲपल २ बिलियन डॉलर्स आणि ४००० कामगारांची कंपनी झाली होती. आम्ही वर्षभरापूर्वीच आमचे सर्वोत्तम काम बाजारात आणले होते. मॅकीन्टोश कम्प्युटर! मी तेव्हा फक्त ३० वर्षांचा होतो. आणि अचानक मी माझ्या कंपनीतून हाकलला गेलो. तुम्ही स्वत: स्थापन केलेल्या कंपनीतून तुम्ही स्वत: हाकलले कसे जाऊ शकता? खरं सांगायचं झालं तर जसं ॲपल वाढत होतं, त्याच्याबरोबर मला गुणी वाटणाऱ्या काही मंडळींना मी नोकरीवर ठेवले. काही वर्षे ठीक गेली, पण नंतर आमच्या दृष्टिकोनात फरक पडू लागले. अखेर भांडणे झालीच… बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी पण त्यांचीच पाठराखण केली. साहिजकच वयाच्या तिसाव्या वर्षी मी अक्षरश: हाकलला गेलो… आणि तेही अतिशय सार्वजनिक पद्धतीने… माझ्या आयुष्याचा जो केंद्रबिंदू होता, तोच गायब झाला. मी उद्ध्वस्त झालो.
काही महिने नक्की काय करावे हेच सुचेना. मला जणू माझ्या आधीच्या कार्यकुशल उद्योजकांचा विश्वासघात केल्यासारखे वाटत राही. जणू आधी धावणाऱ्याने माझ्या हातात दिलेले निशाण मी पाडून बसलो होतो. मी डेव्हिड पेकार्ड, बोब नोईस यांना भेटलो. आणि अशा पद्धतीने घोळ घातल्याबद्दल त्यांची माफी मागितली. मी एक मोठे सार्वजनिक अपयश बनलो होतो आणि सिलिकॉन व्हॅलीतून पळून जाण्याचे विचार मनात घोळू लागले होते, पण हळूहळू एक गोष्ट जाणवायला लागली. माझे अजूनही माझ्या कामावर प्रेम होते… ॲपलमधल्या घटनांनी त्यात तीळभरही फरक पडला नव्हता. मला नाकारण्यात आले होते… पण माझे प्रेम संपले नव्हते.. म्हणूनच, मी पुन्हा सुरुवात करण्याचा निश्चय केला.
तेव्हा तसे वाटले नसेल कदाचित, पण ॲपलमधून हाकलले जाणे ही माझ्या आयुष्यातली सर्वाधिक चांगली घटना ठरली. यशस्वी असण्याचे सगळे दडपण गळून पडले. त्याची जागा एखाद्या नवोदिताच्या खांद्यावर असलेल्या हलकेपणाने घेतली. कशाचीही खात्री नव्हती. याच स्थितीमुळे मी माझ्या आयुष्यातल्या सर्वाधिक सृजनात्मक कालखंडात प्रवेश केला.
त्यानंतरच्या ५ वर्षांत मी ‘नेक्स्ट’ नावाची कंपनी स्थापन केली, ‘पिक्सार’ नावाची दुसरी कंपनीही उभारली आणि एका अशा भन्नाट स्त्रीच्या मी प्रेमात पडलो जिच्याशी मी लग्न केले. ‘पिक्सार’ने जगातली पहिली ॲनिमेटेड फिल्म ‘टॉय स्टोरी’ बनवली आणि आज ती जगातली पहिल्या क्रमांकाची ॲनिमेशन कंपनी आहे. गंमत म्हणजे, पुढे ‘नेक्स्ट’पण ‘ॲपल’ने विकत घेतली. आणि आम्ही ‘नेक्स्ट’मध्ये बनवलेले तंत्रज्ञान आज ‘ॲपल’च्या कामाला येते आहे. आणि ‘ॲपल’च्या यशाला ते कारणीभूत ठरते आहे.
मला खात्री आहे की मी जर ‘ॲपल’मधून हाकलला गेलो नसतो, तर हे कधीच घडले नसते. औषधाची चव घेणे कठीण असते, पण रुग्णाला त्याचीच गरज असते. कधी आयुष्याने डोक्यात दगड घातलाच, तर निराश होऊ नका. मला खात्री आहे की जर माझे माझ्या कामावर प्रेम नसते, तर मी अशा पद्धतीने काम करत राहू शकलो नसतो. आपले प्रेम कशावर आहे याचा शोध घेत राहा. हे केवळ तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते तुमच्या कार्यक्षेत्रातही. तुमच्या आयुष्यातला एक मोठा भाग तुम्ही काम करण्यात व्यतीत करणार आहात, आणि उत्तम काम करण्याकरिता तुम्ही जे करताय त्यावर तुमचे प्रेम असणे आवश्यक आहे. जर ते तुम्हाला अजून सापडले नसेल, तर मग शोधात राहा. स्वत:ची समजूत घालून नका घेऊ. हृदयाच्या इतर गोष्टीप्रमाणेच जेव्हा तुम्हाला ते सापडेल, तेव्हा ते तुम्हाला आपोआप जाणवेल आणि एखाद्या सुंदर नात्याप्रमाणे वर्षे जशी सरकत जातील, तसतसा तुमचा त्यातला रस वाढतच राहील. म्हणून म्हणतो. शोधत राहा. स्वत:ची समजूत घालून नका घेऊ.
माझी तिसरी गोष्ट मृत्यूविषयी आहे.
मी १७ वर्षांचा होतो तेव्हा एक वाक्य वाचले होते. ‘जर तुम्ही रोज आपले आयुष्य आजचा दिवस शेवटचा असं समजून घालवलात, तर कमीत कमी एक दिवस तुमची समजूत खरी ठरेल.’ या वाक्याने माझ्यावर खूप परिणाम केला होता. तेव्हापासून जवळपास ३३ वर्षे मी रोज सकाळी उठतो आणि आरशात पाहून स्वत:ला विचारतो- ‘‘जर आज मला मरण यायचे असेल, तर आज जे मी करतो आहे तेच मला करायला आवडेल का?’ जर माझे उत्तर बरेच दिवस ‘नाही’ असेल, तर मला कळते की काहीतरी बदल करायची गरज आहे.
मला लवकरात लवकर कधीही मृत्यू येऊ शकतो ही कल्पना मला माझ्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेताना खूप कामाला येते. कारण आपल्या बाह्य अपेक्षा, सारा अहंकार, लाज किंवा अपयशाची भीती हे सारं सारं मरणाच्या भीतीमध्ये नष्ट होतं. आणि जे महत्त्वाचं आहे, तेवढंच उरतं. तुम्ही मरणार आहात हे लक्षात ठेवणे म्हणजे तुम्ही काहीतरी गमावू शकता या भीतीपासून मुक्ती असं मी समजतो. तुम्ही आधीच इतके नागवे झालेले असता, की हृदयाचं सोडून दुसऱ्या कुणाचं ऐकण्याचं तुम्हाला कारणच राहत नाही.
साधारण वर्षांपूर्वी मला कॅन्सर असल्याचे निदान झाले. सकाळी ७.३० वाजता माझा स्कॅन झाला आणि स्वादुपिंडापाशी मला भला मोठा ट्युमर असल्याचे स्पष्ट झाले. मला स्वादुपिंड शरीरात कुठे असते हेही ठाऊक नव्हते. डॉक्टर म्हणाले हा जवळपास असाध्य अशा स्वरूपाचा कॅन्सर आहे आणि मी काही सहा महिन्यांपेक्षा जास्त जगणार नाही. डॉक्टरने मला घरी जाऊन साऱ्या गोष्टींची आवराआवर करायला सांगितले, म्हणजे दुसऱ्या शब्दात तो मला मृत्यूसाठी तयार राहायला फर्मावत होता. याचाच दुसरा अर्थ म्हणजे पुढच्या दहा वर्षांत तुम्ही आपल्या मुलांना ज्या चार युक्तीच्या गोष्टी सांगणार होता, त्या सांगायला आता तुमच्याकडे फक्त सहा महिने आहेत. याचाच दुसरा अर्थ म्हणजे सगळी बटणं लावून तयार राहा. निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. त्या निदानासोबत मी एक दिवस घालवला. त्या दिवशी संध्याकाळी माझी बायोप्सी झाली. त्यांनी माझ्या घशावाटे आणि पोटातून आतड्यात एन्डोस्कोप घुसवला, माझ्या स्वादुपिंडात सुई खुपसून त्यांनी तिथल्या पेशी काढल्या. मला अर्थात भूल दिली होती, पण माझी पत्नी म्हणाली की, जेव्हा डॉक्टर्सनी त्या पेशी सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्या, तेव्हा ते आनंदाने रडू लागले. माझा कॅन्सर अतिशय दुर्मिळ असला, तरी शस्त्रक्रियेने तो बरा करता येण्यासारखा होता. माझ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि मी आता ठणठणीत बरा आहे.
ही माझी मृत्यूशी झालेली सर्वात जवळची आणि बहुधा अजून दोन दशक तरी टिकेल अशी ओळख. आत्ता मी याविषयी एवढ्या अधिकारवाणीने बोलतो आहे, त्याचं कारण या एका उपयुक्त कल्पनेचं या अशा ओळखीत झालेलं रूपांतर.
मरण कुणालाच नको असतं. अगदी ज्यांना स्वर्ग हवा असतो त्यांचीही त्याकरिता मरण्याची तयारी नसते. तरीही मरण हे आपल्या सगळ्यांना एकत्र करणारच आहे. कोणालाही ते चुकलेले नाही. आणि हे खरंच अगदी बरोबर आहे, कारण मरण हा जीवनाचा सर्वात छान शोध आहे. तो जीवनातल्या बदलाचा शिल्पकार आहे. तोच जुन्याला दूर करून नव्याची वाट मोकळी करतो. आज, कदाचित तुम्ही चर्चेत आहात, पण उद्या तुम्ही हळूहळू म्हातारे व्हाल आणि दूर सारले जाल. नाट्यमय वाटले, तरी हेच सत्य आहे.
तुमच्याकडे अगदी मर्यादित वेळ आहे, म्हणूनच दुसऱ्या कोणाचं आयुष्य जगत तो फुकट घालवू नका. दुसऱ्यांच्या विचारावर आधारलेल्या निष्कर्षांचं जोखड आपल्या आयुष्यावर मिरवू नका. दुसऱ्यांच्या मतांच्या गलबल्यात आपला आतला आवाज दबून जाऊ नये याची काळजी घ्या. आणि सर्वात महत्त्वाचे, आपले हृदय आणि अंत:प्रेरणा यांचं ऐकायचं धाडस सदैव दाखवा. त्यांना जवळपास नेहमीच तुम्हाला काय बनायचे आहे, याची कल्पना असते. बाकी सगळे दुय्यम आहे.
जेव्हा मी तरुण होतो त्या वेळी होल अर्थ कॅटलॉग नावाचे मासिक प्रसिद्ध होत असे- जणू आमच्या पिढीचे बायबलच. इथून जवळच मेन्लो पार्क इथे राहणारा स्टेवर्ट ब्रांड नावाचा इसम ते काढत असे आणि त्याने आपल्या कवीप्रवृत्तीने ते मासिक सजवले होते. ही गोष्ट १९६० ची, पर्सनल कम्प्युटर किंवा डेस्कटॉप पब्लिशिंगच्या खूप आधीची. साहजिकच, हे मासिक पूर्णपणे टाईपरायटर, कात्री आणि पॉलोराईड कॅमऱ्याने बनवले जाई. जणू पेपरबॅक फॉर्ममधले गुगल. आणि तेही गुगल येण्याच्या ३५ वर्षे आधी. खूप आदर्शवादी, नेटके आणि नव्या कल्पनांनी भारलेले.
स्टेवर्ट आणि त्याचे सहकारी भरपूर वर्षे त्या मासिकाचे अंक काढत राहिले आणि जेव्हा त्याचा प्रवास संपला तेव्हा त्यांनी त्याचा शेवटचा अंक काढला. सत्तरीची मध्यान्ह चालू होती आणि मी तुमच्याच वयाचा होतो. त्या शेवटच्या अंकात शेवटच्या पृष्ठावर एक गर्द रानातल्या रस्त्याचे चित्र होते. त्याच्या खाली लिहिले होते.
हा त्यांचा शेवटचा संदेश होता… भुकेलेले राहा… वेडे राहा… मी सतत स्वत:साठी तेच मागतो आणि आत्ता जेव्हा तुम्ही पदवीधर होऊन बाहेर पडताय.. तेव्हा तुमच्यासाठी पण हीच इच्छा करतो आहे.
भुकेलेले राहा… वेडे राहा!!!
(मूळ भाषणाची तारीख- १२ जून २००५) (शब्दांकन – अमोल कडू) १६ एप्रिल २०१० – लोकप्रभा
गेल्या आठवड्यात प्रताप भेटला. पाठीवर Sack, हातात फोल्डर आणि गळ्यात टाय. चांगला रुबाबदार दिसत होता, पण चेहऱ्यावर हरवल्याचे भाव होते. मी अगदी समोर जाऊन उभा राहिलो तरी लक्ष नव्हतं. थोड बोलणं झाल्यावर लक्षात आले, की त्याने स्वतःचा कुरियरचा व्यवसाय बंद करून एका फायनान्स कंपनीत सल्लागार म्हणून नोकरी धरली आहे. खूप दु:खी वाटत होता. हताश झाला होता.
व्यवसाय का बंद केला विचारले तर म्हणाला, त्याच्या बरोबरचे मित्र चिडवतात. डिप्लोमा इंजिनियर असूनही कुरिअर चालवतो. वेळ पडली तर स्वतः डिलिव्हरी करत हिंडतो. मामा तर म्हणाला, “चांगली नोकरी करायची सोडून लोकांची दारं पुजत फिरतो. भिकेचे डोहाळे लागलेत याला.” आई काही बोलत नाही, पण नुसती रडत असते. मी व्यवसाय नाही, तर काही गुन्हा करतोय असे सगळे वागत होते. व्यवसायाच्या सुरुवातीच्या दिवसात कमावलेले सगळे पैसे पुन्हा व्यवसायातच पुन्हा गुंतवावे लागतात, पण हे सांगून कुणालाही कळत नव्हते. शेवटी बंद केले सगळं आणि सरळ ही नोकरी धरली. पण इथेही लक्ष लागत नाही. नुसती घुसमट होतेय. हे सगळ बोलताना अगदी गुदमरला होता तो. मी थोडा वेळ त्याची सांत्वना केली व निरोप घेतला. त्या रात्री मलाही झोप आली नाही. प्रताप सारखे असे अनेक युवक असतील. स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपडत असतील.
मोठ्ठा उद्योजक व्हायचे ध्येय उरी बाळगून प्रामाणिक प्रयत्न करत असतील. पण जवळच्या लोकांच्या टीका, उद्योगात सतत मिळणारे rejections आणि मानसिक त्रासाला वैतागून स्वतःचे स्वप्न विसरून समाजाला मान्य असणाऱ्या सरळ रस्त्याने आयुष्य जगायला लागत असतील.
तसं टीका आणि नकार हे उद्योजकांसाठी काही नवी बाब नाही. अगदी प्रत्येक उद्योजकाला याला सामोरे जावे लागते, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. आणि अनेक उद्योजकांनी, व्यावसायिकांनी याला सामोरे जाण्याचे मार्ग ही शोधले आहेत. पण नवीन उद्योजकांना ते माहित नसतात आणि मग प्रताप सारखा अनेकांचा बळी जातो. प्रतापला टीकांना आणि नकाराला सामोरे कसे जावे सांगायचे होते, पण त्या वेळी तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि ते ठिकाणही नव्हते. वेळही निघून गेली होती. मला एका गोष्टीची खात्री मात्र आहे. प्रताप नोकरी जास्त दिवस करू शकणार नाही. त्याच्यातला उद्योजक पुन्हा उफाळून येईल आणि पुन्हा तो स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करेल. पण बराच वेळ आणि संधी या प्रवासात वाया जाईल. उद्योग, व्यवसाय करु पाहणाऱ्या अनेक प्रतापांचे नुकसान होऊ नये म्हणून हा एक छोटासा प्रयत्न.
१. टीकेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला.
उद्योजक मित्रांनो शेजारील चित्रात कोणाला जख्ख म्हातारी दिसत असेल, तर कुणाला २० वर्षाची तरुणी. चित्र एकच आहे, पण आपण त्या चित्राकडे कसे पाहतो त्यावर आपल्याला काय बोध होतो ते ठरते. याचाच अर्थ असाही होतो की, आपण जे पाहतो ऐकतो, त्याचा आपण कसा अर्थ लावतो, त्यावर त्या घटनेचा आपल्यावर काय परिणाम होईल हे ठरते. उद्योग करत असताना आपल्यावर टीका करणारे बहुतेक आपले आप्तेष्ट किंवा मित्रपरिवारांपैकी असतात. या व्यक्ती जेव्हा तुमच्या स्थितीकडे पाहतात, तेव्हा ते बाहेरून स्थितीकडे पाहत असतात. तुमची आणि त्यांची परिस्थिती कडे पाहण्याची दिशा परस्पर विरोधी असल्याने, बाहेरून आत पाहणाऱ्यांना जे दिसते आणि तुम्ही ज्याठिकाणी उभे राहून पाहता तिथून तुम्हाला दिसणारे दृश्य (Vision ) यात बराच फरक असतो. आणि खरं म्हणजे तुमच्या स्वप्नाबद्दल सर्वात महत्वाच मत जर कुणाचं असेल, तर ते फक्त तुमचाच असू शकतं.
इतरांच्या नकारार्थी टिप्पण्या ह्या त्यांच्या मर्यादांचे प्रतिबिंब असते, तुमच्या नव्हे. दुसरा महत्वाचा भाग असा की टीका टिप्पणी करणाऱ्यांचा हेतू काय आहे हे ही जाणून घेणे गरजेचे आहे. कुणी तुमच्यावरील अति लोभामुळे आणि काळजीपोटी बोलत असेल, तर कुणी तुमच्याबद्दल असणाऱ्या मत्सरामुळे बोलत असेल. इंग्रजीत एक नवीन शब्द आला आहे Frenimy म्हणजेच मित्राच्या रूपातील वैरी. दोन्हीही परिस्थितीत जर टीका टिप्पणीला घाबरून अथवा वैतागून, जर तुम्ही चुकीचे पाऊल उचलले, तर एक तर आप्तेष्टांचे व स्वतःचे नुकसान कराल किंवा वैऱ्याला अपेक्षित कृती कराल.
२. तुम्ही परिपूर्ण (perfect) नाही याची जाणीव बाळगा.
“Nobody is perfect, if you think you are perfect then you are Nobody”
प्रत्येक व्यक्ती मध्ये दोष असतात त्या प्रमाणे तुमचेही काही दोष असू शकतात. स्वप्नवेडे होऊन मार्गक्रमण करताना स्वतःच्या दोषांकडे दुर्लक्ष होण्याची दाट शक्यता असते. अशावेळेला आपल्यावर होणाऱ्या टीका आणि rejections आपणास आपल्या दोषांची जाणीव करून देऊ शकतात. थोडेसे सिंहावलोकन (Introspection) केल्यास आपणास हे दोष जाणवतात आणि एकदा जाणीव झाली की ते सुधारणे सोपे होते. त्यामुळे टीकांना नकारार्थी घेण्याऐवजी त्यातून सुधारण्याचे धडे शिकणे अधिक फायदेशीर ठरेल. बऱ्याचदा टीकांच्या रुपात आलेल्या सुधारणेच्या सूचना परिस्थितीमुळे लगेच अंगीकारणे शक्य नसते. पण आपणास या सुधारणा करायच्या आहेत हा विचार मनात ठेऊन केलेला प्रवास जास्त यशस्वी ठरतो.
३. सगळ्याच गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नसतात.
अनेकदा सिलेक्टिव्ह लिसनिंग चा वापर अनेक यशस्वी लोकं करतात. याचाच अर्थ आपणास उपयुक्त गोष्टी ऐकणे वर त्यावर अंमलबजावणी करणे आणि ज्या गोष्टी नको असतील त्यांना ऐकणे पण दुर्लक्षित करणे. या युक्तीचा वापर केल्याने आपण स्वतःला निराशेपासून तर वाचवतोच पण अनेक वेळा वादही टाळता येतात. निराशेत अथवा वादावादीत वाय जाणारा वेळ व शक्ती वाचते. अनेकदा एखादी टीका अथवा नकार आपणाला मिळाली की आपण लगेच त्यावर प्रतिक्रिया देतो अथवा तसा सातत्याने प्रयत्न करतो. अनेक अशा परिस्थिती असतात ज्यांचे उपाय काही वेळ जाऊ दिल्यास आपोआपच होतो.
मित्रांनो या जगात काही वेगळं करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना नेहमीच टीकांना आणि नकारांना सामोरे जावे लागले.
जे. के. रोलिंग, हॅरी पॉटरची सुप्रसिद्ध लेखिकेला पहिले पुस्तक प्रकाशित होण्याआधी १२ वेळा नाकारला सामोरे जावे लागले. संत ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना अनेक टीका सहन करतच जगाला ज्ञानेश्वरी द्यावी लागली. संत तुकारामांची गाथा इंद्रायणीत बुडवली गेली. त्यामुळे टीकांना आणि नकारांना घाबरून जाऊ नका. जागरूकपणे जर या टीकांचा स्वीकार करून सुधार घडवले, तर तुमचे स्वप्न सत्यात उतरवणे शक्य आहे
तुमच्या स्वप्नांसाठी हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा, मराठी मुलं उच्चतम स्पर्धेत यशस्वी व्हावीत यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
घरची प्रचंड गरिबी. बुद्धिमत्ता हेच भांडवल. पेड (ता. तासगाव, जि. सांगली) येथे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या युवकाने मोठ्या भावाच्या मदतीने मुंबईची वाट धरली. “जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट’ हे ब्रीद घेऊन व्यवसायात शिरलेले अशोक खाडे यांच्या “फॅमिली’चा विस्तार आज साडेचार हजार कर्मचारी आणि सुमारे साडेपाचशे कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या “दास ऑफशोअर’ कंपनीत झालाय.
वडील चर्मकार. आई, बहीण दुसऱ्याच्या शेतात काम करीत…कधी-कधी आम्हा भांवडांनाही कामाला जावं लागायचं…..आयुष्यानं दिलेल्या चटक्यांच्या आठवणी अशोक खाडे सांगत होते…””सातवीपर्यंत पेडला शिक्षण झालं. पुढील शिक्षणासाठी तासगावला बोर्डिंगमध्ये राहायला लागलो. मी शिकावं म्हणून वडील व मोठ्या भावाचा जीव तुटायचा. माझ्या शिक्षणासाठी घरचे किती कष्ट घेतायेत, याची जाणीव असल्यानं रात्र-रात्र झोप लागायची नाही. बोर्डिंगला पोटभरीचं जेवण मिळायचं नाही. पण मोठं व्हायचं स्वप्न असल्यानं कोणतीही तक्रार नव्हती.
सन 1972 ला चांगल्या गुणांनी अकरावी झालो. त्या वर्षी मोठा दुष्काळ पडला. अंगात घालायला कपडेच नाही, तर पायताण कोठून येणार. आम्हाला शिकविणारे देसाई सर कळवळले. त्यांनी शर्ट व पायजमा घेऊन दिला. अकरावीच्या ऐन परीक्षेला पेनची निफ तुटली. जोशी सरांनी अडचण समजून घेत निफ आणून दिली. साठ टक्के गुण पडले. आज माझ्याकडे हजारो रुपयांचा पेन आहे; परंतु अकरावीतील “त्या’ पेनची किंमत कशालाही नाही. आजही माझ्याकडे तो पेन आहे. वडील बोर्डिंगवर आम्हाला भाकरी घेऊन यायचे आणि म्हणायचे, “राजांनो, गरिबी आणि दुष्काळ मी आणला नाही. तुम्ही धीर सोडू नका. माळावर जोपर्यंत पळस आहे तोपर्यंत आपल्याकडे गरिबी आहे, असे समजू नका. खूप शिका.’ वडिलांचे शब्द काळजाला भिडले,” खाडे म्हणाले.
खाडे कुटुंबीयांनी सन 1975 ला मुंबई गाठली. वैद्यकीय शिक्षण घ्यावे अशी माझी इच्छा होती, असे सांगून खाडे म्हणाले, “”रोजीरोटीसाठी आम्ही तिघेही भाऊ माझगाव डॉकमध्ये नोकरी करायला लागलो. मी डिझाइन विभागात होतो. मोठ्या भावाच्या आग्रहामुळे इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. नोकरी आणि शिक्षण दोन्ही सुरू झाले. सन 1983 मध्ये कंपनीच्याच कामासाठी जर्मनीला जाण्याची संधी मिळाली. नवीन उमेद निर्माण झाली होती. गरिबी तर टोचत होतीच, स्वतःचे काही तरी करायचा ध्यास घेतला. त्यातून सन 1992 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला. अन्य भावांनीसुद्धा राजीनामा दिला. तिघेही एकत्र राहत होतो आणि घरात एक प्रकारचे इंजिनिअरिंगचेच वातावरण होते. गरिबीत आयुष्यभर जगण्यापेक्षा थोडेच आयुष्य जगू; परंतु ते चांगले असेल असा ध्यास घेऊन “दास ऑफशोअर‘ची निर्मिती झाली. मराठी माणूस, त्यातही खाडे आडनाव म्हटल्यावर कोण काम देणार, हा प्रश्न होताच. त्यामुळे तिघा भावांच्या नावांची आद्याक्षरे घेऊन (दत्तात्रय, अशोक आणि सुरेश) कंपनीला “दास’ नाव दिले. नावसुद्धा “के. अशोक’ असे सांगायचो. पहिले काम माझगाव डॉकमध्येच मिळाले. मुंबईतील पहिला स्कायवॉक बांधला. मग मागे वळून पाहिले नाही.”
“दास’ कंपनीने ओएनजीसी, ब्रिटिश गॅस अशा नामवंत कंपन्यांसाठी भरसमुद्रात प्रकल्प बांधणीचे काम केलेय. या समूहाच्या इंजिनिअरिंग, डेअरी, ऍग्रो प्रॉडक्ट्स, रस्ते बांधणी, उड्डाणपूल अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत सात कंपन्या आहेत. अबुधाबीचे प्रिन्स शेख महमंद बिन खलिफा बिन झायर अल नयन यांच्याबरोबर व्यावसायिक भागीदारी केल्याचे खाडे अभिमानाने सांगतात.
वारकरी वृत्तीचे असलेले खाडे यांचा ज्ञानेश्वरीवर गाढा विश्वास. जमशेठजी टाटा, मदर तेरेसा हे त्यांचे आदर्श. एक रुपयातील एक भाग समाजासाठी, एक भाग देवासाठी, एक भाग कामगारांसाठी आणि उर्वरित भाग स्वतःसाठी अशी त्यांनी उत्पन्नाची वाटणी केलीय. वर्षभर बीएमडब्ल्यूमध्ये फिरणारे खाडे पंढरीची पायी वारी करतात. ज्या चित्रा टॉकीज जवळील झाडाला टेकून वडील गटई काम करत होते, त्या झाडाला समोरून जाताना न चुकता नमस्कार करतात. खाडे यांनी मास्टर इन फिलॉसॉफी पूर्ण केले असून, संत ज्ञानेश्वर महाराजांवर पीएचडी करण्याचा विचार आहे.
“दुसऱ्यांवर केलेले उपकार तळहातावर लिहिण्यापेक्षा तळपायावर लिही, की जे फक्त मातीच वाचू शकते’ हे समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे शब्द खाडे यांनी मनात कोरले आहेत.
मराठी असल्याचा त्यांना प्रचंड अभिमान आहे. ‘माझ्या कंपनीत चेहऱ्यावर चिंता असलेला एक ही कर्मचारी दिसणार नाही. ज्या शेतात माझी आई शेतमजूर म्हणून काम करत होती, ती शेती मी विकत घेतली आहे. ज्या गावात दगडू चांभाराचा मुलगा अशी ओळख होती, ते गाव आता “आबा’ म्हणून ओळखत आहे. आजही आम्ही भाऊ एकत्र कुटुंब म्हणून राहतो. एकत्र कुटुंबात जी ताकद आहे, ती कशातच नाही. त्या भक्कम आधारामुळेच आम्ही आयुष्यात काही तरी करू शकलो.”
अशोक खाडेंचा “गुरुमंत्र’ “जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट’ हे ब्रीद लक्षात ठेवा. कष्ट करा. प्रामाणिक कष्टांचे फळ नक्की मिळेल. आईवडिलांना, समाजाला कधी विसरू नका.
वाचक मित्रांनो, तुम्हाला हा लेख कसा वाटला, हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच, तुमच्या जवळच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. याव्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरील लेख वाचायला आवडेल, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
यश हे प्रयत्नानेच मिळवावे लागते. गेलेली वेळ पुन्हा मिळवता येत नाही. साक्षर असलेल्या महाराष्ट्रातील लोकांजवळ आत्मविश्वासाचा अभाव आहे. फक्त थडग्यातील दफन केलेल्या व स्वर्गवासी झालेल्या माणसांनाच समस्या नसतात, बाकी प्रत्येकालाच समस्या असतात. आयुष्यात विविधता आणता येते ती यशस्वी माणसांनाच.
यशामागे परिश्रम आहेत, प्रचंड असा आत्मविश्वास आहे. बिल गेट्सच्या बाबतीत त्याच्या शिक्षकांनी सांगितले होते की, हा मुलगा यशस्वी होणार नाही; परंतु याच बिल गेट्सने संगणकामध्ये क्रांती घडवून आणून अब्जावधी रुपये कमावले.
कर्नल सँडर्स हा उत्कृष्ट स्वयंपाकी होता. आपल्या 65 व्या वाढदिवशी त्याने मित्रांसाठी कोंबडीचे जेवण केले. मित्राने खुश होऊन त्यास एखादे हॉटेल काढ असा सल्ला दिला. याच कर्नल सँडर्सने 299 ठिकाणी नकार पचवला. 300व्या ठिकाणी त्यास चिकन बनवण्याचे काम मिळाले. ते काम मिळताच अडीच वर्षात सँडर्सने 86 देशांत 13,000 हॉटेल्स काढली. त्याची रोजची कमाई 27 लाख डॉलर्स आहे.
सुनीता पंडेर नावाची युवती 30 वेगवेगळ्या प्रकारची विमाने चालवायला शिकली. पॅराशूटमधून जंपिंग केले. नासाच्या परीक्षेत नापास झाली; पण तिने जीव दिला नाही.
यशाच्या पाठी लागणाऱ्या माणसाच्या पाठी पैसा आपोआप येतो. ज्या माणसाला कष्टाची सवय लागलेली असते, अशी माणसे कधीच अयशस्वी होत नाहीत. यशस्वी होण्यासाठी तुमच्या आजूबाजूला जी सामान्य माणसे जे काही करतात ते करायचे टाळा, म्हणजे तुम्ही असामान्य व्हाल. ज्ञान हे कोणत्याही वयात घेता येते. कौशल्य आणणे हे तुमच्या हातात आहे. सवयी बदलल्या की तुम्ही कोणीतरी बनू शकाल. कृती करताना तुम्ही-आम्ही सबबी सांगतो, परमेश्वराने तुम्हाला मन, बुद्धी, आयुष्य दिलेले आहे, तेव्हा तुम्ही किडामुंगीसारखे का जगता? आपण यशस्वी होऊ शकत नाही, असे आपल्या मनावर बिंबवलेले असते. त्यामुळे मानसिकदृष्ट्या असलेले अपंगत्व फेकून द्या.
जेसिका कॉक्स नावाच्या मुलीला दोन्ही हात नव्हते; परंतु ती निराश झाली नाही. तिने आपल्या वडिलांजवळ विमान चालवण्याचा हट्ट धरला आणि विशेष म्हणजे ती पायाने विमान चालवते.
स्वप्न पाहणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वप्न वास्तवात आणणे हे तुमचे कर्तव्य आहे. जबरदस्त आत्मविश्वासामुळे अपंग माणसेही जीवनात यशस्वी होतात. तुमचे आयुष्य तुम्हीच बदलू शकता.
प्रत्येकाच्या आयुष्यात एकवेळ तरी अशी येते, की तो प्रवासाला निघताना स्टॅंडवर किंवा स्टेशनवर पोचतो अन् एक किंवा दोन मिनिटांसाठी गाडी चुकते. चूक बसची किंवा ट्रेनची नसते. ती पकडण्यासाठी आपण एक-दोन मिनिटे उशिरा पोचतो. अशाच रीतीने एखादे वेळी आलेली संधीदेखील आपण गमावतो. दोष संधीचा नसतो. आपल्या नियोजनाचा, प्रयत्नांचा असतो. आयुष्य एखाद्या कादंबरीसारखं आहे. रोजचा एक दिवस म्हणजे कादंबरीचे एक पान. त्यातील प्रत्येक पान निराशा किंवा अपयश घेऊन येत नसतं. एखादं पान किंवा एखादा धडा तसा असला म्हणून संपूर्ण कादंबरी तशी नसते. तेव्हा आपण खचून न जाता, ती कादंबरी वाचत राहिलं पाहिजे.
फुलपाखरांना फक्त चौदा दिवसाचं आयुष्य मिळतं, पण तेवढंही आयुष्य ते आनंदानं बागडत वावरतं. म्हणून छोट्या अपयशानं खचून जाऊ नका. धीर सोडू नका. प्रयत्न सोडू नका. त्यासाठी अपयशाची भीती न बाळगता ध्येय निश्चित केलं पाहिजे आणि ते पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठलाग केला पाहिजे. तुमचं ध्येय कोणतंही असो, पण ते निश्चित हवं, स्पष्ट हवं. ठराविक कालावधीत पूर्ण होणारं हवं. आपण घरी भिंतीवर देवदेवतांचे अथवा आपल्या पूजनीय वडीलधाऱ्या मंडळींचे फोटो लावतो. कशासाठी? त्यातून आपल्याला काय मिळते? ज्या वेळी आपली नजर त्या फोटोकडे जाते, त्या वेळी काही क्षणात एक विशिष्ट सकारात्मक, श्रद्धायुक्त ऊर्जा आपल्या डोळ्यांवाटे आपल्या अंत-करणात उतरते आणि ती आपल्याला प्रेरणा देते. वाईट विचारापासून प्रवृत्त करते. चांगले विचार आपोआपच आपल्या मनात येतात आणि मग कृतीही तशीच होते. अगदी त्याचप्रमाणे, आपले ध्येय एका मोठ्या कागदावर लिहून ते भिंतीवर समोर दिसेल असे लावावे. म्हणजे ते तुम्हाला रोज आठवण करून देईल. मग तुमचे विचार व कृती आपोआपच त्याच दिशेने होईल.
कुटुंबीयांना सामील करून घ्या –
कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला आपले कुटुंबीय व हितचिंतकांची मन-पूर्वक साथ हवी, म्हणून तुमच्या ध्येयपूर्तीच्या प्रवासात तुमच्या कुटुंबीयांना व हितचिंतकांना सामील करून घ्या. त्या खडतर प्रवासाचे ते सुद्धा साथीदार व मालक असतात, यशाचे धनी असतात. ध्येयप्राप्तीचा प्रवास बैलगाडीच्या प्रवासासारखा असतो. शेतकरी “ढवळ्या आणि पवळ्या’ या बैलजोडीला गाडीला जुंपतो, हातात कासरे धरून आपण गाडीत बसतो. मागे कुटुंबीय बसतात. गाडी वाटेने खडखडाट करीत करीत जात असते. बैलांना गाडी ओढणे सुखकर होण्यासाठी, शेतकरी चाकात वंगण घालतो, उन्हाचा चटका कमी व्हावा म्हणून बैलांच्या पाठीवर रंगीत, नक्षीदार झूल घालतो, प्रवासाचा शिणवटा कमी व्हावा म्हणून बैलांच्या गळ्यात घुंगरांची माळ घालतो, कुटुंबीयांना सावली मिळावी म्हणून गाडीवर वक्राकार छत घालतो आणि सर्वांचाच प्रवास सुखकर होण्यासाठी एखादं गाणंही म्हणतो व मजल दरमजल करीत इच्छित गावी पोचतो.
अगदी त्याचप्रमाणे, यशाच्या प्रवासात जिद्द व कष्ट हे दोन बैल असतात. त्यांचे कासरे तुमच्या हातात असतात. या कासरांचा वापर करून दिशा ठरवायची असते. योग्य ठिकाणी वळण घ्यायचे असते. योग्य विचार व आचाराची झूल घालून कुटुंबीयांना प्रेमाचे छत करून चालत राहा, तुमचे इच्छित गाव तुम्हाला सहज भेटेल. गाडीचा रस्ता नेहमीच खडबडीत असतो. तो तसाच असायला हवा. या प्रवासात छोटे मोठे हादरे, धक्के बसतात ते बसायलाच हवेत. कारण गुळगुळीत रस्ता शेवटपर्यंत कधीच नसतो. तो आपल्या इच्छित स्थळापर्यंत नेईलच याची खात्री नसते. म्हणून इच्छित स्थळ जायचे असेल तर रस्ता कसा आहे हे पाहू नका. एकदा इच्छित स्थळी पोचला, की यश हाती येते. पैसा तुमच्या हातात आपोआप येईल व टिकूनही राहील.
अपयश हीच खरी यशाची पहिली पायरी
अडचणी, अडथळे सर्वांनाच येतात, पण ते पार करण्याची ताकद आपण स्वत-हून निर्माण केली पाहिजे. नाउमेद, निराश, हताश होऊन चालणार नाही. कारण यांच्याशी सामना करणारी माणसंच यशस्वी होतात. जगातील सर्वच यशस्वी, श्रीमंत माणसं कधी ना कधी, बऱ्याच वेळा अपयशाच्या मार्गातून गेलेली असतात. अपयशातूनच अनुभव मिळतो. अनुभवातून आत्मविश्वास निर्माण होतो. आत्मविश्वासातून जोम व ताकद मिळते. हाच जोम व ताकद आपल्याला पुढे घेऊन जाते, अपयशच आपल्याला जोमाने पुढे जाण्याची प्रेरणा देते. अंगात नवीन बळ देते, विश्वास देते, नम्र बनवते आणि परिस्थितीवर मात करण्याची कला व कौशल्य मिळवून देते. म्हणून अपयशाच्या भीतीने येणाऱ्या परिस्थितीचे बळी पडण्यापेक्षा तिच्यावर मात करून यश व समृद्धी मिळवा.