हिंदवी स्वराजाच्या राजमाता जिजाबाई यांचा आज जन्मदिन

राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा (जि. बु लढाणा) येथे इतिहास प्रसिद्ध यादव घराण्यातील लखूजीराजे जाधव म्हाळसाराणी या राजघराण्यात झाला. लखुजीराजेंनी आपल्या मुलांबरोबरच मुलीला म्हणजेच जिजाऊला देखील राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. जिजाऊंनी राजघराण्याचा वृथा अभिमान न बाळगता युद्धकला राजनीती यामध्ये प्राविण्य मिळवले. आजच्या मुलींमध्ये प्रचंड नैराश्य, न्युनगंड किंवा असुरक्षतेची भावना प्रामुख्याने जाणवते. जिजाऊंनी आत्मविश्वासाने युद्धकलेत नैपुण्य मिळवले याचा उपयोग पुढे शिवरायांना युद्धकला आणि राजनीतीचे शिक्षण देण्यासाठी झाला.

आजची स्त्री चुल आणि मुल या परिघाबाहेर पडायला तयार नाही किंबहुना तिने त्यातच सौख्य मानावे अशी समाज व्यवस्था आजदेखील आहे. पण जिजाऊंनी विवाहानंतर स्वराज्यसंकल्पनेला अखंड स्वरूप प्राप्त करून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. शहाजीराजे-जिजाऊमाता यांनी मोठ्या उदात्त आणि व्यापकपणे रयतेच्या स्थैर्यासाठी स्वराज्य स्थापण्याचा निर्णय घेतला.केवळ आपली जहागिरी किंवा वतन याचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे ही भुमिका शहाजीराजे-जिजाऊंची होती.

शहाजीराजांच्या कार्यात जिजाऊमाता अत्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. अदिलशहा, निजाम, मुघल असे बलाढ्य विरोधात असताना मोठ्या निर्भिडपणे जिजाऊमाता शहाजीमहाराजांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आल्या. आजची स्त्री माझी मुले, माझे घर, माझे सगेसोयरे आणि कौटुंबिक कार्यक्रम या पलीकडे विचार करताना दिसत नाही. जिजाऊमातेनं स्वत:च्या जाधव-भोसले कुटूंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार केला. त्यामुळे तानाजी, येसाजी, कान्होजी, शिवाजी, बाजी पालसकर, मुरारबाजी, बहिर्जी, कावजी, नेताजी इ.सर्व जाती धर्मातील सरदार व मावळे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करण्यासाठी पुढे आले. म्हणजे जिजाऊमातेनं आपले मातृप्रेम शिवरायांप्रमाणेच सर्व मावळ्यांवर केले.त्यामुळे जिजाऊ स्वराज्यमाता आहेत.

पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला. एकदा एक हत्ती पिसळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाईचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले. हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्‍यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला. या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले. नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता.

राजमाता जिजाऊ संकटसमयी डगमगल्या नाहीत, शिवरायांना यश मिळावे यासाठी यज्ञ, तप, शांती, उपवास करीत बसल्या नाहीत. यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते, चातुर्य पणाला लावावे लागते, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. यावर जिजाऊंचा दृढ विश्वास होता. जिजाऊ प्रयत्नवादी होत्या. शिवरायांवर चालून आलेल्या शत्रूचा नायनाट करण्यासाठी जिजाऊंनी मार्गदर्शन केले. अशा प्रसंगी जिजाऊ जपमाळ ओढत नामस्मरण करत बसल्या नाहीत. जिजाऊ दैववादी नव्हे तर प्रयत्नवादी होत्या. त्यामुळे संकटसमयी त्या हताश-निराश झाल्या नाहीत. आजची स्त्री मुलाचा गुणवत्ता यादीत क्रमांक यावा, नोकरी मिळावी, पदोन्नती मिळावी, निवडणूक जिंकावी यासाठी यज्ञ, होमहवन, तीर्थयात्रा, उपवास, नामस्मरण करताना दिसते. जिजाऊंचा प्रयत्नवाद स्रियांनी आत्मसात केला पाहिजे.

जिजाऊमाता पन्हाळ्याच्या दिशेने निघाल्या त्यावेळेस नेताजी पालकरांनी जिजाऊंना साकडे घातले. आम्ही जिवंत असेपर्यंत आपण तसदी न घ्यावी, म्हणजे जिजाऊ वेळप्रसंगी हाती तलवार घेऊन लढणाऱ्या होत्या. आज स्त्रियांवर अनेक ठिकाणी अत्याचार होतात त्याप्रसंगी स्त्री स्वत:चे संरक्षण करू शकत नाही. जिजाऊंमध्ये असणाऱ्या धैर्याचे-शौर्याचे अनुकरण स्त्रियांनी करावे.

जिजाऊमातांनी संभाजीराजेंना राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. पुत्राप्रमाणे नातवावर उत्तम संस्कार करणारी जिजाऊमाता म्हणजे स्वराज्याचे खरे विद्यापीठ आहे. शिवाजीराजे – संभाजीराजे मावळे यांच्या मध्ये असणारी उच्चकोटीची नैतिकता जिजाऊंच्या संस्कारातून आलेली आहे. विखुरलेला मराठा समाज एक करावा म्हणून शहाजी राजे-जिजाऊंनी शिवरायांचे आठ विवाह केले.त्या आठही महाराण्यांचा जिजाऊंनी सन्मान केला. सासू-सुन हे नातं संघर्षाचे नव्हे तर अत्यंत जिव्हाळ्याचं, विकासाचं, प्रेमाचं नातं आहे हे जिजाऊंनी दाखवून दिले.जिजाऊंचा हा आदर्श आजच्या महिलांनी अंगिकारावा.

शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्राकैदेत होते, तेव्हा महाराष्ट्रातील इंचभर भूमी देखील मिर्झाराजा जयसिंगला जिंकता आली नाही. कारण त्यावेळेस स्वराज्याची सुत्रे जिजाऊमातांच्या हाती होती. म्हणजे जिजाऊंची जरब कशाप्रकारे होती हे यावरून स्पष्ट होते. शहाजीराजांचा म्रुत्यू झाला त्याप्रसंगी जिजाऊ सती गेल्या नाहीत,म्हणजे जाधव – भोसले घराण्यात सतीप्रथा तर नव्हतीच पण जिजाऊमाता देखील सतीप्रथेच्या विरोधात होत्या. आज २१ व्या शतकात जिजाऊमातेच्या पुरोगामी विचारांची गरज आहे. शिवरायांना न्यायनिवाडा करण्याचे धडे जिजाऊमातेने दिले. गावागावांतील तंटे-बखेडे जिजाऊंनी मिटवले.

शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला तेव्हा ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला. या प्रसंगी जिजाऊंची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जिजाऊ – शिवराय जर ग्रंथप्रामाण्य मानणारे असते तर त्यांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला नसता. जिजाऊमाता बुद्धिप्रामाण्यवादी होत्या त्यामुळेच त्यांनी वैदिकांचा विरोध झुगारून राज्याभिषेक करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला. आज अनेक कठीण प्रसंग येतात त्याप्रसंगी स्त्री-पुरुष हतबल होतात. असे प्रसंग जिजाऊंच्या जीवनात देखील आले होते पण जिजाऊ हतबल, निराश झाल्या नाहीत त्यांनी मोठ्या हिंमतीने संकटावर मात करून स्वराज्य निर्माण केले. जिजाऊंची हिम्मत आजच्या महिलांमध्ये यावी, हीच जिजाऊ चरणी प्रार्थना…

– श्रीमंत कोकाटे, इतिहासतज्ञ

Source : http://vishvamarathi.blogspot.in/2013/09/blog-post_24.html

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *