Tag: लेखमालिका

  • ज्याच्या खिशात पैसा, तिथं आणि त्यांच्यासाठीच व्यवसाय करा

    ज्याच्या खिशात पैसा, तिथं आणि त्यांच्यासाठीच व्यवसाय करा

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासुन शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे; ज्याच्या खिशात पैसा तिथं आणि त्यांच्यासाठीच व्यवसाय करा… करायची सुरुवात?

    एक अतिउत्तम जॅकेट शिवणारा व्यावसायिक होता, त्याला नेहमी प्रश्न पडायचा कि “माझे जॅकेट जेमतेम १२०० रुपयांना विकले जाते, पण अशाच दर्जाचे जॅकेट शोरूमला लोक ३००० रुपयांना विकत घेतात. असं का होत असेल? मला ती किंमत का मिळत नाही?” त्याची ही समस्या घेऊन तो व्यावसायिक सल्लागार कदमांकडं आला. तेव्हा कदमांनी त्याला मुल्ला नसरुद्दीनची गोष्ट सांगितली.

    एकदा नसरुद्दीन खूप सुंदर पगडी घालून राजवाड्यात गेला. राजाला त्याची पगडी आवडली. राजा म्हणाला, “किती रुपयांत पगडी?” नसरुद्दीन म्हणाला, “१ हजार रुपयांना.”

    हे बोलणे तेथे असलेल्या व्यापाऱ्याने ऐकले व राजाला त्याने पगडी खूप महाग असल्याचे सांगितले.

    राजा म्हणाला, “पगडी खूप महाग आहे.” त्यावर नसरुद्दीन म्हणाला, “ही पगडी बनवायला किती खर्च आला आहे यावरच त्यांची किंमत ठरविली आहे व इतकी चांगली पगडी १ हजार रुपयांना केवळ राजाच घेवू शकतो, गोरगरीबांना ती परवडणारी नाही.”

    ह्या वाक्याने राजा खुश झाला व त्याने ताबडतोब १ हजार रुपये देऊन पगडी घेतली. बाहेर आल्यानंतर नसरुद्दीन त्या व्यापाऱ्याला म्हणाला, “तुला ह्या पगडीची किंमत माहीत असेल, पण राजाची प्रशंसा आणि त्याला खुश करण्याची किंमत काय मिळते, हे मला माहीत आहे.”

    मित्रहो, आपल्या उत्पादनाला जर चांगली किंमत मिळवायची असेल, तर आपले उत्पादन ज्याच्या खिशात पैसा आहे, त्यालाच विकण्याचा प्रयत्न करावा. दळभद्री लोकांच्या नादी लागू नये. तसेच कोणताही माणूस हा प्रशंसा व मानसन्मानाचा भुकेला असतो. त्यामुळे ग्राहकांची प्रशंसा करायला विसरू नये. तुमच्या उत्पादनाची किंमत ते तुम्ही कुणाला व कशा पद्धतीने विकता यावर अवलंबून आहे. जलद विचार करून ते आपले विचार दुसऱ्याच्या गळी उतरवता आले पाहिजे.

    तुम्ही तुमचे उत्पादन कशा प्रकारे विकता? उत्पादन विकताना काही ठराविक मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा उपयोग करता का? करत असाल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेलला आताच सब्स्क्राइब करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

  • हिशोब लागण्यासाठी तो ठेवावा लागतो

    हिशोब लागण्यासाठी तो ठेवावा लागतो

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘हिशोब लागण्यासाठी तो ठेवावा लागतो !’ करायची सुरवात?

    एका व्यापाऱ्याने बिझिनेस एक्सपर्ट असणाऱ्या कदमांना एक प्रश्न विचारला. मी संगमनेरवरून आहे. मी डाळिंब ट्रेडिंग व्यवसाय चालू केला. १५ ते १८% मार्जिन आहे. आता वर्ष झाले. धंदा होतोय पण पैसा कुठून आला व कुठे गेला कळतच नाही. बँकेचं कर्जही लाखांचे आहे. काहीच ताळमेळ लागेना, काय करावे?

    यावर कदम त्याला म्हणाले, “खर्च झाल्याचं दु:ख नाही, पण हिशोब लागत नाही याचं वाईट वाटतं.” नवीन व्यवसाय सुरू केल्यावर अनेकांचं असंच होतं. हातात अचानक पैसा खेळायला लागतो. पूर्वी कटिंग चहा पिणारा पण, हॉटेलात बसून सहज ५०० रुपये खर्च करतो. मुलांना १०० ऐवजी ५००चे खेळणे घेतो. इकडे तिकडे वायफळ पैसे खर्च होत राहतात. शेवटी इकडची तिकडची उधारी, बंकेचं कर्ज असं सगळं वाढत जात. बिझनेसमध्ये कॅश फ्लो आहे तोपर्यंत काही वाटत नाही, राहणीमान आपोआप उच्च होत राहतं, खर्च होत राहतो.

    बिझनेसमधले पैसे व वैयक्तिक वापराचे पैसे यातील फरक तोटा झाल्यावर कळतो. दुकानाच्या गल्ल्यातील दहा हजारांपैकी आपले ५००च आहेत हे समजायला नवख्या व्यावसायिकाला वेळ लागतो, तोपर्यंत ५-१० लाख तोटा झालेला असतो. हिशोब म्हणजेच अकाऊंटिंग हा कोणत्याही व्यवसायातील सगळ्यात महत्वाचा भाग आहे, ज्याकडे बरेच व्यावसायिक दुर्लक्ष करतात. व्यवसायाची सुरुवात सकाळी अकाऊंटची वही उघडून व सायंकाळी दुकान बंद करताना दिवसभरचा ताळेबंद मांडूनच व्हायला हवी, नाहीतर वर्षाच्या शेवटी डोळे उघडून काही उपयोग नाही. ह्याचे एवढे येणे बाकी व त्याचे तेवढे देणे बाकी. गल्ल्यात ठणठण गोपाळ आणि वहीत लाखोंचा फायदा अशी गत. हिशोबाची वही काय फक्त पुजण्यासाठी घेतली का? पैशाचा हिशोब रोजच्या रोज हवा व त्याचं रोजचं नियंत्रण हवे, अन्यथा नुकसान होऊन पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय नाही.

    Behind every good Business, there is a great accountant. यशस्वी व कर्त्या पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, जिला आपण संसाराची ‘अर्थमंत्री’ म्हणतो. म्हणजेच ती चांगली accountant असते. महिना तीन किलो तेल, पाच किलो साखर लागते, तर त्यातच बरोबर घर चालविते आणि असेच घर पुढे जाते. त्यामुळे तुम्हीसुद्धा हिशोब ठेवलात तर लागेल, नाहीतर फक्त पश्चाताप करावा लागेल.

    तुम्ही रोजचा हिशोब ठेवताय ना? हिशोब न ठेवण्यामुळे तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या आहेत? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

  • बिल गेट्स का म्हणतात, शेवटच्या क्षणी काम करण्याची सवय घातक!

    बिल गेट्स का म्हणतात, शेवटच्या क्षणी काम करण्याची सवय घातक!

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासुन शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे; बिल गेट्स का म्हणतात, ‘शेवटच्या क्षणी काम करण्याची सवय घातक! करायची का सुरुवात?’

    अमेरिकेतल्या एका भाषणात बिल गेट्स यांनी हा किस्सा सांगितला होता. स्वतःच्याच भयंकर वाईट सवयीचा. ते सांगतात की, मी काम चांगलं करायचो, पण सगळी कामं शेवटच्या मिनिटार्पयत तंगवून ठेवायचो. वेळ संपत आली, की मग धावतपळत काम करायचो. माझं काम चांगलं व्हायचं, पण त्या कामाचा मला आनंद होत नसे. दुसरं म्हणजे कुणीही त्या कामाचं काही कौतुक करीत नसे. मग वाटायचं की, हे काय, आपण इतकं काम करतो, चांगलं करतो तरी कुणाला त्याचं काही विशेष वाटत नाही. हा खेद एकीकडे आणि दुसरीकडे ते काम करताना येणारा ताण, काम चांगलं करण्यापेक्षा ते वेळेत करण्याचंच टेन्शन मग वाढत जायचं. इतकं वाढायचं की, काम पूर्ण झाल्यावर सुटलो एकदाचा असं वाटायचं.

    नंतर नंतर माझ्या लक्षात यायला लागलं, की आपल्याला ही वाईट सवय सोडावी लागेल. आपल्याला काम करायचं असतं, ते आपल्याला आवडतं, जमतंही. मग शेवटच्या क्षणापर्यंत ते काम टोलवत कशाला राहायचं? मग प्रयत्न करून मी ती सवय मोडली.

    हीच गोष्ट आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत तंतोतंत खरी असते. आपण कामचुकार नसतो, काम टाळतही नसतो, पण शेवटच्या क्षणापर्यंत ते काम लटकवून ठेवतो आणि मग धावतपळत कसंबसं ते पूर्ण करतो.

    ही सवय तोडण्याचंही अवघड काम जमवलं तर जमू शकतं. ते कसं जमेल याचं उत्तरही, बिल गेट्सच देतात.

    ते म्हणतात, की सकाळी फक्त 15 मिनिटं मी कागद, पेन घेऊन बसायला लागलो. जी कामं त्या दिवशी होणं गरजेचीच आहे, ती आधी करतो. मग बाकीची. ऐनवेळी दुसरं कितीही तातडीचं काम आलं तरी, जे आधी करायचं काम असतं, त्याला वेळ देतोच. हळूहळू हे प्लॅनिंग जमतं.

    जे त्यांना जमलं ते आपल्यालाही जमू शकेल. मुद्दा इतकाच की, आपण ते करणार का? की अगदी आपल्या करिअरच्या, यशाच्या जिवावर बेतेल इतपत उशीर होईर्पयत ही सवय लांबवत नेणार? यावर तुमचं मत काय आम्हाला कॉमेंट नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी
  • १. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा – यवतमाळ

    १. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा – यवतमाळ

    आपण प्रत्येक जिल्ह्याचे उद्योग पाहण्याआधी त्यातील रस्ते, नैसर्गिक साधनसंपत्ती, नद्या, पाणीपुरवठा, वीज निर्मिती, दळणवळणाच्या इतर सोयी सुविधा यांचा बारकाईने अभ्यास करणार आहोत. कारण या प्रत्येक गोष्टींचा व्यवसायात अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो. त्यानंतर त्या-त्या जिल्ह्यात चालणारे उद्योग व नवीन उद्योग निर्मितीला असणारा scope याविषयी आपण चर्चा करणार आहोत. व शेवटी त्या जिल्ह्यातील आता सध्याच्या घडीला असणारे यशस्वी उद्योजक कोण आहेत. याबद्दल चर्चा करणार आहोत.

    नॉर्थ-साऊथ कॉरिडोर हा राष्ट्रीय महामार्ग (National Highway -07) या जिल्ह्यातून जातो. त्यामुळे भारताच्या उत्तरेकडील राज्यांपासून ते थेट दक्षिणेकडील राज्यांना यवतमाळ जिल्हा जोडला गेला आहे. या मार्गावर पांढरकवडा हे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने इतर जिल्ह्याच्या तुलनेत यवतमाळ मधून रस्ते वाहतूक ही अतिशय सोपी झालेली आहे. पूर्ण भारताला दक्षिणोत्तर जोडणारा नॉर्थ-साऊथ कॉरिडोर महाराष्ट्राच्या नागपूर-वर्धा-यवतमाळ या तीन जिल्ह्यातून जातो. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर-नागपूर (National Highway – NH204) उमरखेड-आर्णी-यवतमाळ-कळंब या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडतो. या मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र-मराठवाडा व विदर्भ एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे जवळजवळ अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र राज्यात रस्त्याने व्यवसायजोडणी शक्य आहे.

    पैनगंगा नदी ही यवतमाळ जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पैनगंगा नदी यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरुन वाहते. पैनगंगा नदीच्या उपनद्या या जिल्ह्याच्या अंतर्गत भागातून वाहत येऊन पैनगंगा नदीला मिळतात. पैनगंगा व तिच्या उपनद्यातून होणारा पाणीपुरवठा हा या जिल्ह्यातील पाण्याचा स्रोत आहे. पावसाचे प्रमाण हे कमी असून परतीचा मान्सून यवतमाळ जिल्ह्यात जोरदार बरसतो. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. येथील जास्तीत जास्त लोकजीवन हे शेतीवर अवलंबवून आहे. पाणीपुरवठ्याच्या तशा कोणत्याही ठळक योजना या जिल्ह्यासाठी उपलब्ध नाहीत.

    नेर, बाभूळगाव, कळंब, राळेगाव, दिग्रस, दारव्हा, पुसद, महागाव, उमरखेड, घाटंजी, पांढरकवडा, मारेगाव, झरी जामणी हे यवतमाळ जिल्ह्यातील तालुके आहेत. लघुद्योगाच्या मोठ्या प्रमाणावर वाढीसाठी यवतमाळ जिल्ह्यात पोषक वातावरण आहे. या जिल्ह्यात अकुशल कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र या जिल्ह्यातील लोकांची शिकण्याची वृत्ती ही फार चांगली आहे. शिक्षणासाठी मोठमोठ्या शैक्षणिक संस्था (काही तुरळक संस्था वगळून) या जिल्ह्यात नाहीत. गुणग्रहणाची उत्तम क्षमता या जिल्ह्यातील लोकांजवळ आहे. याशिवाय येथील तरुण शारीरिक क्षमतेने चांगले असल्याने त्यांच्यातील कलागुण ओळखून त्याच्या वाढीसाठी वाव मिळाला तर देशासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू या जिल्ह्यातून निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. आजवर क्षमता असून ही त्या गुणांना पैलू न पाडल्यामुळे आपला ठसा उमटवण्यात अपयशी ठरल्याचे पाहून खंत वाटते.

    आर्थिक उत्पन्नाचे स्रोत सुध्दा कमी आहेत. त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची हुनर इथल्या माणसांमध्ये आहे. आयटी, manufacturing हे उद्योग वाढण्याच्या आधी शेतीपूरक उद्योग वाढीस लावण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील मोठे खाद्यान्नाचे ब्रँड तयार करण्याची क्षमता यवतमाळ जिल्ह्याची आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन करत असल्याने या जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा ही ओळख प्राप्त झाली आहे. मात्र कापसावर प्रक्रिया करणारी मोठी केंद्रे या जिल्ह्यात नाहीत. त्यामुळे जिल्ह्याची आर्थिक बाजू तशी फार भक्कम होताना दिसत नाही. उत्तरेकडे आता कापसावर प्रक्रिया करणारा एक मोठा प्रकल्प अमरावती मध्ये निर्माण होत आहे. त्याचा फायदा यवतमाळला होऊ शकतो. शेती, सेवा, शेतीपूरक उद्योग, हातमाग, यंत्रमाग, आयटी, शिक्षण, बँकिंग व manufacturing उद्योग येणाऱ्या काळात या जिल्ह्यात वाढणार आहेत. तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत स्वतःची ओळख जपत हा जिल्हा लवकरच समृध्दीचे उद्दिष्ट साध्य करेल याची खात्री वाटते. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मुंबई याठिकाणी व्यवसाय करण्याऐवजी यवतमाळ नवीन व्यवसाय उभारणे ही सोपी प्रक्रिया आहे. निर्माण होणारी उत्पादने नागपूरच्या बाजारपेठेत विकण्यासाठी सोयीस्कर आहे. विज्ञानाच्या प्रगतीने जग जवळ आले आहे. त्यामुळे जगभरात सर्वत्र ही उत्पादने विकली जाऊ शकतात.

    पुढील जिल्हा – वाशिम

  • आपण गधा मजुरी तर करत नाही ना?

    आपण गधा मजुरी तर करत नाही ना?

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘आपण गधा मजुरी तर करत नाही ना?’ करायची सुरवात?

    बँकेचे २० लाखांचे कर्ज काढले, महिना ३० हजार हप्ता… दुकान भाड्याने घेतले… ४ कामगार ठेवले, त्यांचा पगार ३० हजार रुपये… सर्व प्रकारचे कर महिना जवळपास १० हजार… वीजबिल, प्रवास इत्यादी किरकोळ खर्च ५ ते १० हजार… ईएमआयवर फ्लॅट व गाडी घेतली आहे, त्याचा हप्ता महिना १५ हजार जातो… शेवटी व्यवसायातून स्वतःसाठी व घरखर्चासाठी राहतात फक्त काही हजार रुपये… अशीच आहे आज असंख्य व्यावसायिकांची स्थिती… यालाच म्हणतात गधा मजुरी! व्यवसाय स्वतःच्या फायद्यासाठी करतो की इतरांना पैसे वाटण्यासाठी हेच कळत नाही. वैयक्तिक जेवढा फायदा कमावता, त्यापेक्षा जास्त बँकेचे व्याज देता, दुकानाचे भाडे त्यापेक्षा जास्त देता, कामगारांना पगार त्यापेक्षा जास्त देता, असे का होते?

    याची काही मुख्य कारणे आहेत. एक म्हणजे मार्केट साईज व ट्रेंडचा विचार न करता भला मोठा व्यवसाय सुरू केलेला असतो, नंतर म्हणावा तेवढा व्यवसाय होत नाही, त्यामुळे आता करायचं काय, बंदही करता येत नाही व जोरातही चालत नाही. स्वतःचं मन स्वत:ला सतत खात असतं. वरुन दिसणारे कित्येक मोठे व्यावसायिक ह्यामुळे आतून दु:खी असतात. दुसरे म्हणजे मार्केटिंग, ब्रॅंडिंग व व्यवस्थापनात कमी पडलेले असतात. दुकान किंवा नवीन व्यवसाय टाकला म्हणजे ग्राहक लगेच उद्यापासून आपल्या दुकानात येऊ लागतील असं होत नसतं राजाहो…! ज्यांच्याकडे शंभर फुटसुध्दा दुकान नाही, ते लाखो करोडोचा व्यवसाय करत आहेत तर ज्यांची करोडोची दुकाने, लाखोंचे फर्निचर केले आहे ते सध्या माशा मारत बसले आहेत. त्यामुळे व्यवसायात उतरताना मागचा पुढचा विचार करूनच उतरा. सुरुवातीलाच लगेच  अनावश्यक खर्च ओढवून घेऊ नका. नाहीतर सगळी कमाई त्यातच जाईल. एवढी मेहनत करूनसुद्धा हातात काहीच राहणार नाही.

    तुम्ही तुमच्या व्यवसायात पैशाचं नियोजन कसं करताय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी
  • लॉजिक की इमोशन्स ? – फ्रँचायझी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी हे पाहा!

    लॉजिक की इमोशन्स ? – फ्रँचायझी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी हे पाहा!

    तुम्हाला एका यशस्वी व सुप्रसिध्द ब्रँडच्या फ्रँचायझीचे मालक म्हणून करियर घडवायचे आहे का? स्वत:च्या फ्रँचायझी व्यवसायाचे मालक असण्याचे फायदे आपण समजून घेतले आहेत. परंतु योग्य फ्रँचायझी निवडण्यापूर्वी एखादी फ्रँचायझी संधी आपल्यासाठी परिपूर्ण आहे याबाबत तुमचे हदय व मेंदू पूर्णत: तयार आहे का? अर्थातच हा निर्णय तुमच्या भावनेवर नव्हे तर तर्कवादावर आधारित असावा.

    आपले डोके वापरा, मन आपोआपच साथ देईल.

    आपल्यासाठी कोणती फ्रँचायझी सुयोग्य व परिपूर्ण आहे, हे ठरवण्यापूर्वी आपल्याकडे कोणती कौशल्ये आहेत व आपली उद्दिष्टे काय आहेत याचा विचार करण्यासाठी स्वत:ला थोडा वेळ द्या. त्यासाठी आपली उद्दिष्टे, स्वप्ने व इच्छित जीवनशैली याबाबत स्वत:ला प्रश्न विचारा.

    एका माणसाला क्रिकेटचे फार वेड होते. क्रिकेटविषयी तो फारच भावनिक होता. याचे तीव्र भावनेतून त्याने खेळाच्या साहित्याचे दुकान सुरू केले. परंतु लवकरच त्याची फसगत झाली. क्रिकेटची तीव्र आवड असूनही त्याचे दुकान काही महिन्यांत बंद झाले. कारण त्यांच्याकडे एक दुकानदार म्हणून, एक व्यापारी म्हणून आवश्यक असलेली कौशल्ये व हुशारी नव्हती. फ्रँचायझी क्षेत्राबद्दल पॅशनेट असलेल्यांसाठी हा एक धडा आहे. तुमच्या निर्णय प्रक्रियेत तुमची वैयक्तिक आवड किंवा छंद यांना प्राथमिकता देऊ नका. व्यवसायिक निर्णय घेताना ते भावनात्मक नसावेत, ते तर्कशुध्द असावेत. एका विशिष्ट फ्रँचायझीच्या यशासाठी तुमचे कौशल्य व तुमच्यातील उपजत बुध्दीमत्ता हे दोन घटक महत्वपूर्ण भूमिका बजावतात. या व्यवसायात तीव्र पॅशनसोबतच लीडरशीप कौशल्ये आत्मसात करणे अत्यंत आवश्यक असते. फ्रँचायझी सिस्टीमच्या एकूण उद्दीष्टांबद्दल तुम्ही नेहमीच पॅशनेट व उत्साहित असले पाहिजे.

    परंतु आपण योग्य निर्णय घेत असल्याचे कसे सुनिश्चित करू शकता? तुम्ही योग्य लोकांशी सल्ला मसलत केले पाहिजे त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. एका संशोधनानुसार अनेक व्यवसायिक केवळ प्रॉडक्टची जाहिरात आवडल्याने फ्रँचायझी विकत घेतात व व्यवसाय सुरू करतात. ही भावना नैसर्गिक असली तरी केवळ भावनात्मक निर्णय घेऊन व्यवसाय सुरू करणे हा तर्कसंगत मार्ग नाही. यामुळे आपण अडचणीत येऊ शकता. एखादी फ्रँचायझी संधीसाठी आपल्या भावना तीव्र असतील किंवा एखाद्या फ्रँचायझी संधीने आपणास भावनिक अपील केले असेल तर ते तुमचे अंतिम लक्ष्य साध्य करण्यास तुमची मदत करेल याची खात्री करा किंवा तुम्हाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास योग्य आहे का, हे तपासून पहा. बरेच व्यवसायिक तर्कशुध्द विचार न करता भावनेच्या आहारी जाऊन फ्रँचायझी विकत घेतात व नंतर अपयशी होतात.

    काही व्यवसायिक अजून एक चूक करतात. केवळ एखादे उत्पादन किंवा सेवा उदा. पिझ्झा, केकची आवड आहे म्हणून पिझ्झा स्टोअर किंवा केक शॉपची फ्रँचायझी घेतात. या लॉजिक मध्ये गुणवत्तेला व कौशल्यांचे मूल्य शून्य असते. कारण या फ्रँचायझी निवडीमध्ये केवळ आपली आवड हा एकमेव आधार असतो आणि तो नसावा. तुम्ही या व्यवसायात स्वत:ला कसे गुंतवू इच्छिता. एक फ्रँचायझी ऑपरेटर/मालक म्हणून की एक अबसेन्टी ओनर म्हणून? तसेच फ्रँचायझी सपोर्ट सिस्टीम, कॉर्पोरेट स्टाफ आणि गुंतवणूक याबाबत सखोल माहिती असणे आवश्यक आहे. केवळ भावनिक निर्णय घेऊन बिझनेस सुरू केल्यास एक सक्षम लीडर म्हणून पुढील वाटचालही आव्हानात्मक असते. ही आव्हाने योग्य रीतीने न हाताळता आल्यास अपयश पदरी पडते.

    वरील सर्व गोष्टी पडताळून तसेच तर्क शुध्द विचार करून आपले उद्दिष्टे आणि लक्ष्य साध्य करण्यासाठी परिपूर्ण फ्रँचायझी कोणती आहे याबाबत निर्णय घेतल्या नंतरच तुमच्या संकल्पना वास्तवात उतरतील. एका नामवंत व यशस्वी ब्रँडच्या फ्रँचायझीचे मालक होणे ही स्वप्नवत व रोमांचक गोष्ट आहे. परंतु भावनांवर नियंत्रण ठेवून तर्कशुध्द पध्दतीने विचारपूर्वक व्यवसाय चालवला तर तुम्ही आत्मविश्वासाने यश प्राप्त करू शकता. कारण फक्त तीव्र भावनांनी यश संपादन करता येत नसते, त्यासाठी ज्ञान, कौशल्ये, स्थिर लक्ष्य व तर्कशुध्द विचारशक्ती आवश्यक असते.

  • “अंधश्रद्धेला तिलांजली द्या… विवेक, ज्ञान आणि विज्ञानाचा पाठपुरावा करा…

    “अंधश्रद्धेला तिलांजली द्या… विवेक, ज्ञान आणि विज्ञानाचा पाठपुरावा करा…

    कष्ट करा, जोखीम उचला, ध्येये बाळगा…

    उद्योग करा, पैसा कमवा…!!!”

    एकदा एका दुकानदाराने ज्योतिष्याला विचारले की, “माझे दुकान चालत नाही, काय करू?” ज्योतिषी म्हणाला,”ही घे घोड्याची नाल, फक्त ५००० रुपयांना. दुकानावर लाव, मग बघ. दुकान चांगले चालेल.” दुकानदाराने थोडा विचार केला. नाल घोड्याची आहे मग आपण घोड्यालाच विचारले तर? मग तो घोड्याकडे गेला आणि त्याला विचारले,”तुझी नाल दुकानाला लावल्याने माझे दुकान चालेल का?” घोडा हसला आणि म्हणाला,”अरे बाबा, नाल लावून पैसा मिळत असेल तर मी कशाला दिवसभर टांगा ओढला असता? नाल हे प्रतीक आहे, घोड्यासारखं वेगवे धावत पळत राहण्याचं, काम करण्याचं.

    छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही अंधश्रद्धेला थारा दिला नव्हता.” कोणत्याही निष्पाप प्राण्याचा बळी न देता स्वतःची करंगळी कापून मंदीरात स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज… देवावर श्रद्धा असूनही महाराजांनी आपल्या गडकिल्ल्यांना कुठल्याही देवाचे नाव दिले नाही, गणपतीचे सुद्धा नाही… अंधश्रद्धेला कधीच प्रोत्साहन दिले नाही. शिवराय कुठेही लिंबू-मिरच्या बांधत बसले नाहीत, की देव-देवस्की करत बसले नाहीत. ज्या मनुस्मृतीने समुद्र ओलांडू नये असे बंधन घातले होते त्यांच्याविरूद्ध शिवाजी महाराजांनी जाऊन समुद्रात आरमार उभारले… कोणताही गड जिंकल्यावर तिथे कधीच सत्यनारायण घातला नाही… अमावस्या अशुभ मानली जाते. काही नकली लोकांच्या सांगण्यावरून आपण कुठलेही काम अमावस्याला सुरू करत नाही. पण महाराजांच्या लढाया या अमावस्येच्या रात्री व्हायच्या. कारण अंधाराचा फायदा घेण्यासाठी ते बहूतेक मोहिमा अमावस्येला घेत. गनिमी कावा पद्धतीने लढाया करायचे व जिंकायचे. शहाजीराजेंच्या मृत्युनंतर माँसाहेब जिजाऊ सती गेल्या नाहीत. तर त्यांच्या जाण्याने जी मार्गदर्शनाची ऊणीव शिवरायांना भासणार होती, ती भरून काढली. गुरू बनून शिवरायांना मार्गदर्शन देत राहिल्या. महाराजांचा स्वतःवर, स्वतःच्या बुद्धीवर व मनगटावर पूर्ण विश्वास होता… रायगडावर काम घेऊन आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जेवल्याशिवाय परत पाठवायचे नाही, हा नियम….

    हे वाचल्याने तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार होणार नाही, परंतु तुमच्या विचारात आणि जीवनात सकारात्मक बदल करू शकतात… मी आशा करतो की हा लेख वाचून समाजात अंधश्रद्धा निर्मूलन होण्यासाठी प्रबोधन होईंल, लोकं अंधश्रद्धा सोडून स्वावलंबी बनतील आणि खऱ्या श्रद्धेतून उघड्या डोळ्याने सत्य पाहतील. मी बऱ्याच लोकांना पहिले आहे की त्यांनी यशासाठी किंवा आपल्या समस्या सोडवण्यासाठी अंधश्रद्धेचा मार्ग अवलंबला आणि बरबाद झाले. असे तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या बाबतीत होऊ नये हीच माझी भावना आहे. त्यामुळे वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात कोणताही मोठा निर्णय घेताना एकट्याने निर्णय घेऊ नका. चर्चा होणे महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांशी चर्चा करा, सल्ला घ्या. तर्कशास्त्र सांगणार्‍या गोष्टी स्वीकारा आणि आपण स्वतःला व इतरांना दिलेल्या आश्वासनांवर ठाम रहा. देव माझ्यासाठी अस्तित्वात आहे. पण ती माझी श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. बरेचजण नकली ज्योतिष्यांकडे जाऊन फसताना मी पहिले आहे. मी या गोष्टीला विरोध करीत नाही परंतु आपले भविष्य सांगणारे लोकसुद्धा काही मोठे विचारवंत नाहीत, जर त्यांना खरोखर काय घडणार आहे हे माहित असते तर त्यांचे स्वतःचे जीवन वेगळे असते. कोणतीही ग्रहांची हालचाल किंवा स्थिती काय होणार आहे, ते ज्योतिषी ठरवू शकत नाही. आपली स्वतःची उर्जा, आपले विचार आणि आपले व्हाइब आपले जीवन बदलू शेतात. आज बाजारात बरेच लोक अंगठ्या आणि रंगीत खडे विकण्याचे धंदे करतात. पण तुमचे आयुष्य कोणतेही अंगठी किंवा खडा बदलू शकणार नाही, ते तुम्हीच बदलू शकाल. मूळ किंवा आधार नसलेल्या अंधश्रद्धांसाठी बळी पडण्याऐवजी आपल्याला आपल्या जीवनात जी ध्येये आणि लक्ष्ये आहेत त्यासाठी उघड्या डोळ्यांनी लढा देण्याची आवश्यकता आहे. आपल्याला लक्षाधीश व्हायचे आहे, जर आपण कठोर परिश्रम केले तरच..

    आपल्या आवडत्या मुलीशी लग्न करण्याची तुमची इच्छा आहे, पण जर तुम्ही तिच्या पाठीशी उभे राहून तिच्यासाठी जगाशी लढा देत असाल तरच… फक्त तुम्हाला तुमच्या प्रेमावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. संकटकाळात, अडचणींत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अपयश आल्यास स्वतःला दोषी समजण्यात आणि एकटेपणात आपला आपल्याच निर्णयावर विश्वास नसतो; म्हणून लोक केवळ ज्योतिष्यांनी सांगितलेल्या भविष्यवाणीवर निर्णय घेतात. भविष्यवाणी क्वचितच खरी ठरते; परंतु या नादात ज्या वाईट गोष्टींमुळे आपल्या मनात भीती निर्माण होते, त्या गोष्टींवरच आपले लक्ष केंद्रित केले जाते. भविष्य सांगणाऱ्या लोकांना आपल्याबद्दल किंवा आपल्या भूतकाळाबद्दल काहीच माहिती नसते. अंधश्रद्धांवर विश्वास ठेवणे थांबवा. लक्षात ठेवा, जगाचा विनाश होणार असा खूप वेळा दावा केला गेला होता, परंतु तसे झाले का कधी? आणि होणारही नाही हे तुम्हाला आणि मलाही माहिती आहे. शहाणपणाने आणि तार्किकदृष्ट्या विचार करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

  • Live and let live ‘जगा आणि जगू द्या’ हे जीवन, व्यवसायाचे मूलभूत तत्व

    Live and let live ‘जगा आणि जगू द्या’ हे जीवन, व्यवसायाचे मूलभूत तत्व

    Live and let live भगवान महावीरांच्या शिकवणीचा हा खूप महत्वाचा भाग आहे आणि तो पुढे अनेक संताच्या आचरणात व लेखनात सापडतो. संत तुकाराम त्यांच्या शेतामध्ये ज्वारीची राखण करायचे तेव्हा चिमण्यांनी दाणे खाल्यानंतर त्यांना पिण्यासाठी मडकी भरून पाणी शेतात ठेवायचे. तोच मार्ग पुढे मोठ्या कॉर्पोरेट ब्रँडनी अवलंबला. बिल गेट्स यांनी आतापर्यंत ९० अब्ज डॉलरचे दान विविध समाजजोपयोगी उपक्रमांना दिले.

    कायद्याने CSR (Corporate Social Responsibility) फायद्याच्या २-३% रक्कम अशा सामाजिक कामासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. पिकावर येणारे पाखरे, चिमण्या, फुलपाखरू इत्यादी १ ते २% धान्य खातील पण त्यामुळे परागीभवन होऊन पिकांचे उत्पन्नही वाढायचे, पण जेव्हापासून कीटकनाशके, फवारणी सुरू झाले व त्याचा अतिरेक झाला. तेव्हा कोणतेच पीक औषध फवारलेशिवाय येईना मग पराग संचयन करणार कोण? कीटकांची संख्या कमी झाली, खर्च वाढू लागला व उत्पन्न घटू लागले. आपण दुसऱ्यांना जगू नाही दिले तर आपण ही जगू शकत नाही हे भगवान महावीर, संत तुकाराम यांनी सांगितले. सगळंच १००% मीच खाणार, माझं एकट्याच राज्य असणार याला दुर्योधन प्रवृत्ती म्हणतात. ज्याने पांडवांना काही गाव तर सोडाच, पण सुईच्या टोकावर इतकी पण जमीन देण्यास नकार दिला त्यामुळेच महाभारत घडले.

    मोठी कार कंपनी अनेक लहान उद्योगांना स्पेअर पार्ट बनवायचे कॉंन्ट्रॅक्ट देते. कारण तेथे अनेक कामगारांना काम मिळते व त्यांचीही कामे सोपी होतात. जगात कोणतेही काम, उद्योग सगळं मीच खाणार व सगळं मीच कमविणार या प्रवृत्तीने कधीच मोठा होत नाही व टिकतही नाही. ‘जिओ और जीने दो!’(Live and let live) ही प्रवृत्ती जोपासणारे मोठे होतात. आपल्या सोबत इतरांना, प्राण्यांना, पशूंना, झाडांना सांभाळा. ते तुम्हाला सांभाळतील व तुम्हाला मोठे करतील. मुंबईत ठिकठिकाणी सकाळी दुकान उघडण्या अगोदर कबुतरांना धान्य, गाईला चारा टाकताना अनेक व्यापारी बंधू तुम्हाला दिसतील. हे ‘जिओ और जीने दो!’ या तत्वातूनच येते.

    दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर प्रत्येकाला वाटत असते कि लोकांनी आपल्याशी सन्मानपूर्वक वर्तणूक केली पाहिजे, इतरांनी आपल्याला इज्जत, मानसन्मान द्यावा, आपली प्रतिष्ठा निर्माण व्हावी. परंतु त्यासाठी आपणसुद्धा इतरांचा सन्मान केला पाहिजे, इतरांच्याही भावनांची कदर केली पाहिजे. इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल असे वर्तन करू नये. आपण इतरांना सुखी नाही करू शकलो तरी चालेल, परंतु आपल्यामुळे कोणी दुःखी होता काम नये याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे. आपण आणि भोवतालचा समाज यात सुसंवाद असेल तरच सामाजिक संतुलन अबाधित राहील.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

  • आपल्या ध्येयाची स्वत:ला सतत आठवण करून द्या…

    आपल्या ध्येयाची स्वत:ला सतत आठवण करून द्या…

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘आपल्या ध्येयाची स्वत:ला सतत आठवण करून द्या’ करायची सुरवात?

    गावाकडून शहरात व्यवसायासाठी आलेल्या जयसिंगने आपला व्यवसाय अजून वाढावा यासाठी बिझिनेस एक्सपर्ट असणाऱ्या कदमांना फोन करून आपल्या कारखान्यावर बोलावलं.

    मुंबईतील झोपडपट्टी एरियात, दोन खोल्यात त्याचा कारखाना. एक मोडका टेबल आणि खुर्ची म्हणजे त्याचं ऑफिस. चार पाच महिला, बॉक्स चिकटवणे, पॅकेजिंग करणे यांसारख्या गोष्टी करत होत्या. जयसिंग मूळचा राजस्थानचा. तिकडे तो अशा पद्धतीच्या कारखान्यात काम करायचा. तीन चार वर्षापूर्वी मुंबईत आला आणि ड्रायफ्रूटसाठी लागणाऱ्या डेकोरेटीव्ह पॅकेजिंग बॉक्स निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. जशी गावाकडे दिवाळीला एकमेकांना फराळ देण्याची जशी पद्धत आहे, तशी उच्चवर्गीय लोकांत सण, समारंभ इत्यादीसाठी ड्रायफ्रूट बॉक्स देण्याची पध्दत आहे. तळलेले पदार्थ, गोड बेकरीचे पदार्थ वगैरे देण्याचे आता प्रमाण कमी झालं. आता ड्रायफ्रूट्सना खूप मोठी मागणी आहे. अनेक उच्चभ्रू लोक विवाह समारंभांत किंवा लग्नाच्या पत्रिकेबरोबर ड्रायफ्रुटचा बॉक्स देतात. कॉर्पोरेट कंपन्यांमध्येसुद्धा हीच पध्दत वापरली जाते. हे सारं जयसिंग अगदी अचूक हेरत होता. हीच संधी ओळखून, आपलं शिकलेलं कौशल्य वापरून त्यानं हा व्यवसाय करायचं ठरवलं. पुठ्ठे, थर्माकोल, पेपर, चमकी कागद इत्यादी आकर्षक बाबी वापरून तो आपलं कौशल्य दाखवत होता. या पेपर-क्राफ्ट कलेत निपुण होऊन तो उत्पादन बनवत होता आणि आता त्याला ते बॉक्सेस विदेशात एक्स्पोर्ट करायचे होते म्हणून त्याला मार्गदर्शन हवं होतं.

    कारखान्यात आलेल्या कदमांना जयसिंगने आपला तो दोन खोल्यांचा कारखाना दाखवला आणि खुर्चीत बसायला सांगितले. खुर्चीत बसवून ते टेकतात, तोच त्यांच्या पाठीला एक खिळा टोचला. कदम म्हणाले, “अरे जयसिंग, इस कुर्सी में कील है, इसे ठीक करना पड़ेगा किसी से।” त्यावर त्याने जे उत्तर दिले ते थक्क करणारे होते. तो म्हणाला, “हाँ साहब, कील मैंने ही लगवाया है। मैं गांव से कुछ कमाने के लिए मुंबई आया था, वो मुझे हर वक्त याद रहना चाहिए। जब मैं इस कुर्सी पे बैठू, तो वो कील मुझे चुभती है और बताती है, जब तक तू कमायेगा नहीं, तब तक बैठ नहीं सकता। मैं यहाँ आया ही इसी सपने के साथ हूँ की, पाच सालों में कमसे कम एक करोड का धंदा करूंगा, तब तक चैन से नहीं बैठूंगा। ये कील इसीलिए लगायी है कि मुझे आराम से बैठने की आदत न लगे।”

    पुढे त्याचे बॉक्सेस एक्सपोर्ट करण्यासंबधीच्या चर्चा सुरू झाल्या. प्रत्येकाने आपल्याला ध्येय गाठायचे आहे याची आठवण प्रत्येक दिवशी व्हावी अशी काहीतरी गोष्ट करावी, जेणेकरून तुमच्या ध्येयाचा तुम्हाला कधीही विसर पडणार नाही. ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत राहाल.

    तुमचं ध्येय नेहमी लक्षात राहावं यासाठी तुम्ही अशी काही आयडिया वापरत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, नाहीतर पश्चाताप होईल…

    कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, नाहीतर पश्चाताप होईल…

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, नाहीतर पश्चाताप होईल…’ करायची सुरवात?

    काही व्यक्तींमध्ये रिस्क घ्यायची हिंमत नसते. अशी लोकं नेहमी आरामदायक, सुरक्षित व जोखीमरहित पर्यायांचा अवलंब करीत असतात. वैयक्तिक व प्रोफेशनल जीवनात ‘कम्फर्ट झोन’ ही अशा जागा आहे की त्यात अडकलेला माणूस कधीच आव्हांनाना सामोरे जाण्यास मानसिकदृष्ट्या तयार नसतो. त्यामुळे तो कायमच संभाव्य अडचणीबद्दल गाफील राहत असतो.

    कम्फर्ट झोनमध्ये अडकलेल्या व्यक्तींचा विकास हा खुंटलेला असतो. कम्फर्ट झोन त्यांना प्रगतीच्या संधीचा फायदा घेण्यापासून रोखत असतो. सतत कम्फर्ट झोनमध्ये राहिल्याने माणूस नवीन आव्हाने पेलण्यास असमर्थ ठरतो किंवा संभाव्य अडचणींबद्दल त्याच्यात जागरूकता निर्माण होत नाही. एक प्रयोग केला गेला होता. एका काचेच्या बरणीत धान्य भरून ठेवले होते. एक उंदीर त्यात सोडला. जेव्हा बरणी पूर्ण भरलेली होती तेव्हा उंदराला वाटले की, आता शांतपणे धान्य खाईन, काही अडचण नाही. त्यामुळे तो तिथेच राहिला व बरणीतील धान्याचा उपभोग घेऊ लागला. असे करता करता एक दिवस सर्व धान्य संपले. आता उंदीर बरणीत एकदम तळाला होता आणि दुर्भाग्य म्हणजे तो आता त्यातून बाहेरही पडू शकत नव्हता. फक्त बाहेर पाहून रडण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

    म्हणूनच तरुण वयात नवनवीन आव्हाने स्वीकारा, त्यातून बरेच काही शिकता येईल, परंतु केवळ आरामदायी सुरक्षित वाटणाऱ्या कम्फर्ट झोनमध्ये अडकू नका, कारण ते एक जाळे असते. त्यात दीर्घकाळ अडकाल, तर तुमच्या विकासाचे सर्व दरवाजे बंद होतील व वेळही निघून गेलेली असेल. जेव्हा तुम्ही मनातील भीती व चिंता बाजूला सारून नवीन आव्हानांचा सामना करता, तेव्हा तुमच्या यशस्वी वाटचालीस सुरुवात झालेली असते. दुर्दैवाने बरेच लोक कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यास मानसिकरित्या तयार नसतात. त्यांना आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असते; परंतु नवीन जोखिमा आणि आव्हानांना पेलण्यास ते घाबरत असतात. त्यांना जे सुरक्षित वाटते, त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात. कम्फर्ट झोन ही स्वतःला घातलेली मर्यादा असते; जिथे माणूस जीवनात पुढे जाण्याबाबत साशंक असतो, बऱ्याचदा नवीन आव्हानांबाबत चिंताग्रस्त व नर्व्हस असतो. उदाहरण घ्यायचे तर आपल्या लोकांचे घ्या. उद्योगात जोखीम घ्यावी लागते. त्यामुळे लोकांना उद्योग क्षेत्र असुरक्षित वाटते, परंतु नोकरी हा उत्पन्नाचा शाश्वत व सुरक्षित मार्ग म्हणून नोकरीसाठीच शिकतात. हा झाला कम्फर्ट झोन… मग सांगा आपल्यामध्ये उद्योजक कसे घडणार?

    तुम्ही केलात का कधी असा प्रयत्न तुमचा कम्फर्ट झोन सोडण्याचा? केला असाल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • उद्योग महाराष्ट्राचे : प्रस्तावना

    उद्योग महाराष्ट्राचे : प्रस्तावना

    👍 महाराष्ट्राचा इतिहास

    महाराष्ट्र राज्याला भूगोल आहे आणि इतिहाससुद्धा! गौरवशाली इतिहासाची परंपरा आपणास प्राचीन कालखंडात दिसते. मध्ययुगात सर्व भारतभर परकीय आक्रमणाचे ढग दाटून आलेले होते. या नैराश्यपूर्ण मळभावर विजयनगरचे साम्राज्य आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे अपवाद आपणास दिसून येतात. मराठी सत्तेच्या पतनानंतर इंग्रजांचा अंमल महाराष्ट्रावर सुरू झाला. इंग्रजांविरुद्धच्या संघर्षात आद्य क्रांतिकारकांपासून ते सर्वसामान्य माणसांपर्यंत अनेकांनी बलिदान केले आणि हा देश स्वतंत्र झाला. १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाल्यावर महाराष्ट्राला पुन्हा एकदा भाषिक राज्यासाठी लढा द्यावा लागला. १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले. अर्थात बेळगाव वगळून! १९६० ते आजतागायत स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

    👍 महाराष्ट्र भौगोलिक स्थान व क्षेत्रफळ :


    दिनांक १ मे, १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना झाली.
    महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ. कि. मी. इतके आहे.

    विस्तार – महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम जास्तीत जास्त लांबी ८०० कि. मी. आणि उत्तर-दक्षिण जास्तीत जास्त लांबी ७०० कि.मी. आहे.

    क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा राजस्थान, मध्यप्रदेशनंतर भारतात तिसरा क्रमांक लागतो. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी (३२,८७,२६३ चौ. कि.मी.) ९.३६ % इतका हिस्सा महाराष्ट्राने व्यापला आहे.

    महाराष्ट्राच्या वायव्येस-गुजरात राज्य, दादरा व नगर हवेली , उत्तरेला -मध्य प्रदेश, पूर्वेस – छत्तीसगढ, आग्नेयेस – तेलंगणा, दक्षिणेस – कर्नाटक आणि अगदी दक्षिणेस – गोवा राज्य आहे. राज्याच्या पश्चिम सीमेलगत अरबी महासागर पसरलेला आहे.

    👍 महाराष्ट्रातील उद्योग:

    औद्योगिकीकरणाच्या क्षेत्रात महाराष्ट्र हे आजही देशातील अव्वल राज्य म्हणून गणले जाते. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात कृषी-औद्योगिक रचनेचा पाया घातला. राज्यातील वातावरण उद्योगवाढीला पोषक राहील, याची काळजी यशवंतरावांनी सुरुवातीपासून घेतली.

    मुबंई हे भारतातील प्रमुख औद्योगिक-आर्थिक केंद्र मानले जाते. राज्याचा विकास होण्याकरिता पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. यादृष्टीने महाराष्ट्रातील विविध औद्योगिक विकास महामंडळे, मुंबई हे आंतरराष्ट्रीय बंदर, वाहतूक व संदेशवहनाच्या अत्याधुनिक सुविधा, वित्तीय संस्था व महामंडळे, पाणी, वीज, रस्ते आदी सुविधा, मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर यांसारखी औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची शहरे राज्याच्या औद्योगिक विकासामधे मोलाचा वाटा उचलत आहेत. महाराष्ट्राचा जीएसडीपी २५.३५ लाख कोटी (३८० अब्ज डॉलर्स) आहे. ऑगस्ट १९९१ ते नोव्हेंबर, २०१६ या कालावधीत ११,३७,७८३ कोटी रु. गुंतवणुकीच्या एकूण १९,४३७ उद्योगांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. देशाच्या एकूण औद्योगिक गुंतवणूकीमध्ये महाराष्ट्राचा वाटा १०% असून त्यामधून देशातील एकूण रोजगार उपलब्धतेच्या १५% रोजगार प्राप्त होतो. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा २३% आहे. (या विभागातील आकडेवारी ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी : २०१६ -१७ नुसार अद्ययावत करण्यात आली आहे.)

    👍 महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांचे प्रकार :


    १. कृषी उत्पादनांवर आधारित उद्योग – यामध्ये कापड उद्योग, साखर उद्योग, तेलगिरण्या, तंबाखू प्रक्रिया, डाळ मील, वाईन, रबर उद्योग यांसारख्या उद्योगांचा समावेश होतो.
    २. खनिज उत्पादनांवर आधारित उद्योग – यामध्ये लोह पोलाद उद्योग, सिमेंट उद्योग, खनिज तेल शुद्धीकरण केंद्र, यंत्रोद्योग यांचा समावेश होतो.
    ३. वन उत्पादनांवर आधारित उद्योग – लाकूड कापण्याच्या गिरण्या, कागद कारखाने, आगपेट्यांचे कारखाने, औषधे निर्मिती, खेळांचे साहित्य, फर्निचर निर्मिती उद्योग यांचा समावेश होतो.
    ४. प्राणिज उत्पादनांवर आधारित उद्योग – यामध्ये कातडी उद्योग, लोकरी कापडाच्या गिरण्या, रेशीम उद्योग, दुग्धजन्य पदार्थ उद्योग यांचा समावेश होतो.

    त्याच बरोबरीने बांधकाम उद्योग, पर्यटन उद्योग, सेवा क्षेत्र, वाहन उद्योग, प्रकाशन व मुद्रण उद्योग, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, करमणूक उद्योग हे सर्व उद्योग जोमाने वाढत आहेत.

    देशातील औद्योगिक गुंतवणुकीतील महाराष्ट्राचे अग्रस्थान कायम राखणे, राज्यातील औद्योगिकदृष्टया मागास भागांत गुंतवणुकीचा वेग कायम राखणे, नवीन गुंतवणूक वाढवण्यास चालना देणे, रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करणे, ही उद्दिष्टे कशी पूर्ण करायची, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना आपण पुढील लेखांमध्ये बघणार आहोत. धन्यवाद

  • ०२. पैशाची गरज व श्रीमंतीकडे वाटचाल

    ०२. पैशाची गरज व श्रीमंतीकडे वाटचाल

    पैसा बहुत कुछ है लेकीन सबकुछ नही है,
    बहुत कुछ पाने के लिए सबकुछ करना मत,
    खरीददार चाहे कितना भी बडा क्यो न हो, बिकाऊ बनना मत,
    दिमाग चाहे दिल न चाहे वह चीज करना मत |

    पैसा खुदा तो नही, लेकिन खुदा से कम भी तो नही |

    तुमच्याकडे कोणत्याही स्वरुपातले पैसेच नसतील तर…? अशी कल्पना करुन बघा. खिशात पैसे नाहीत. बँकेत पैसे नाहीत. घरात पैसे नाहीत. तुम्ही कुणाला उसने पैसे दिलेले नाहीत किंवा तुम्ही कुणाकडे उसने पैसे मागू सुध्दा शकत नाही. अशा प्रसंगी तुम्ही काय कराल? पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. घरात आहेत त्या जगण्यायोग्य वस्तूंचा साठा संपत चाललाय. एके दिवशी तो संपून गेला. आता काय करणार? पैशाविना जीवन म्हणजे जिवंतपणी मृत्यू अनुभवण्यासारखी अवस्था होय.

    बऱ्याचवेळा पैशाबाबत अनेक गैरसमज पाळले जातात. पैसा हा आध्यात्मिक मार्गातील अडथळा आहे हा एक त्यातला मुख्य गैरसमज आहे. मात्र ज्यांनी संपूर्ण जगाला आपल्या आध्यात्माची ओळख करुन देऊन प्रभावीत केले ते विवेकानंद सांगतात की, उपाशीपोटी धर्म शिकवला जाऊ शकत नाही. त्यांनी पैशाचे महत्त्व नमूद केले आहे. पैसा आध्यात्मातील अडथळा आहे असे म्हणणाऱ्या लोकांच्या मनावर ताबा नसतो. त्यामुळे ते पैशाला बदनाम करतात. पैशाने अनेक चांगली कामे केली जाऊ शकतात. उत्तम शिक्षणासाठी शिक्षणसंस्था सुरु करण्यासाठी, चांगले रस्ते तयार करण्यासाठी, पुस्तके विकत घेण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी, चांगले व उबदार कपडे खरेदी करण्यासाठी, आपली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी, लोकांना सुखसोयी चांगल्या मिळवण्यासाठी, दवाखाने व आरोग्य केंद्रांसाठी, व्यायामशाळा उभारण्यासाठी, चांगली शेती पीकवण्यासाठी, संशोधनासाठी, खेळाडूंसाठी, मैदानांसाठी, सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी अगदी कशाचेही नाव घ्या. ती प्रत्येक गोष्ट साकारण्यासाठी पैसा लागतो. पैशाविना काहीच करता येत नाही.

    the-need-for-money-and-the-journey-to-wealth

    मग आपल्याला बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की, जे लोक पैशाने अमुक गोष्टी खरेदी करता येतील मात्र तमुक गोष्ट खरेदी करता येणार नाहीत याची मोठी यादी सांगत असतात त्यांचे काय? उदाहरण द्यायचे झाल्यास पैशाने पुस्तके खरेदी करता येतील ज्ञान नाही. पैशाने चांगले अंथरुन खरेदी करता येईल, झोप नाही. अशा वाक्यांचा भडीमार करणाऱ्या व्यक्तींनी हे समजून घेणे गरजेचे आहे की, पुस्तके खरेदी करणे ही पैशाने साध्य होणारी कृती आहे ते पैशाचे काम आहे. ती पुस्तके वाचणे हे तुमचे काम आहे, पैशाचे नाही. त्यासाठी पैशाला कशाला दोष देता? तो दोष तुमचा आहे. अंथरुन विकत घेणे ही पैशाने साध्य होणारी कृती आहे. झोप लागणे न लागणे ही तुमच्या कर्मावर किंवा मानसिक शांतीवर अवलंबवून आहे. पैशावर नाही.

    पैशाने माणूस बिघडतो वगैरे या गोष्टीत काहीही तथ्य नाही. तसे असते तर सगळी गरीब माणसे चांगली असती किंवा सगळी श्रीमंत माणसे वाईट असली असती. ज्याची वृत्ती वाईट आहे ती माणसे वाईट वागणार. मग त्यांच्याकडे पैसे आहेत किंवा नाहीत याने काही फरक पडत नाही. ज्यांची वृत्ती विधायक आहे ती माणसे चांगलीच वागणार. तो संस्काराचा भाग आहे. त्यांच्याकडे पैसा असला किंवा नसला तरी काही फरक पडत नाही. काहीवेळा पैशामुळे आपापली वृत्ती प्रकट करायला वाव मिळतो. चांगल्या माणसांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आला तर त्या समाजाची भरभराट होते. कारण चांगली माणसे पैसा आल्यावर शिक्षणसंस्था, दवाखाने, चांगले रस्ते, संस्कार केंद्रे अशा विधायक गोष्टी सुरु करतील. याउलट वाईट माणसांकडे पैसा आला तर त्या समाजाची अधोगती होते. कारण विध्वंसक माणसे जुगार, दारुचे अड्डे सुरु करतील.

    आणखी वाचा

  • ०१. फरक गरीबी व श्रीमंतीतला

    ०१. फरक गरीबी व श्रीमंतीतला

    the-gap-between-the-rich-and-the-poor

    शतकानुशतके माणसामाणसात संपत्तीच्या मोजमापानुसार फरक करण्यात आला आहे. राजा व रंक, सावकार व फकीर, गरीब व श्रीमंत अशी थेट विभागणी होत आलेली आहे. जगाच्या अगदी सर्व कोपऱ्यात हीच व्यवस्था आहे. मानवात व इतर सजीवात अनेक फरक असले तरीही संपत्ती निर्माण करणे, तिची गुंतवणूक करणे, त्या संपत्तीत वाढ करणे ही माणसांनी तयार केलेली व्यवस्था आहे. ती निसर्गात इतर कोणत्याही घटकात नाही. प्रत्येकाला पैसा हवा आहे. भौतिक व आरामदायी सुखसुविधा पाहिजे आहेत. त्यामुळे प्रत्येकजण गरीबीतून श्रीमंतीकडे किंवा श्रीमंतीकडून अधिक श्रीमंतीकडे वाटचाल करत असतो. म्हणजे काय तर, आता आहे त्या स्थितीतून वरच्या स्थितीत जाण्याचा प्रयत्न करत असतो. आता गरीबी व श्रीमंतीत मुख्य फरक कोणता हा प्रश्न आपल्याला पडतोच.

    गरीबी व श्रीमंतीत अजून काही फरक आहेत. माणसाला गरीब होण्यासाठी कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत. श्रीमंत असणाऱ्या (कोणत्याही बाबतीत) माणसाने त्याचे कार्य सोडले तो आपोआप गरीबीकडे प्रवास करु लागतो. गरीबी ही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर हातमिळवणी करण्यासाठी आतुरलेली असते. ती आपल्याला सतत तिच्याकडे ओढत असते. तिच्या दिशेने वाहवत जायचे की नाही ही निवड प्रत्येक माणसाला स्वतःहून करावी लागते. गरीब होण्याचा प्रवास अत्यंत सोपा आहे. काहीही न करता गरीब होता येते. गरीबी आल्यावर मात्र तिथे टिकून राहण्यासाठी सुध्दा संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष जीवघेणा ठरतो. हा संघर्ष अतिशय जीवघेणा असतो, इतका की यातून वर उठण्यासाठी कमालीचे कष्ट करावे लागतात. हा संघर्ष सोडून दिला की माणसाचे जगणे संपून जाण्याची दाट शक्यता निर्माण होते. एखाद्या मजूराने आठ दिवस काम केले नाही तर त्याच्या जगण्याचे वांधे व्हायला वेळ लागत नाही. मात्र ज्याने पैशाने पैसा कमावायची कला साध्य केली आहे, अशा एखाद्या श्रीमंत माणसाने आठ दिवस काम केले नाही, तर त्याच्या जगण्याचे वांधे होणार नाहीत.

    the-gap-between-the-rich-and-the-poor

    श्रीमंती ही अतिशय प्रयत्नानंतर, युक्तीने, बुध्दीचा वापर करुन किंवा वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक करुन प्राप्त करता येते. श्रीमंतीला आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावरती बोलवता येते. ती स्वतःहून चालून आपल्याकडे येत नाही. आपल्याला ती यावी म्हणून प्रयत्न करावे लागतात. तिला प्रसन्न करावे लागते, मगच ती आपल्याकडे येते. आल्यावर सुध्दा तिला टिकवून राहण्यासाठी सतर्क राहावे लागते. माणूस तिच्या बाबतीत गाफील झाला की ती त्याच्याकडे पाठ फिरवून निघून जाते. ती आली की बऱ्याच चांगल्या गोष्टी घेऊन येते. त्या चांगल्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. वाईट गोष्टींना शिरकाव करु दिला की, तिचा उलट्या दिशेने प्रवास सुरु होतो. म्हणून अशा प्रयत्न प्राप्त केलेल्या श्रीमंतीला किंवा आता ती नसेल तर प्रयत्नांनी प्राप्त कराव्या लागणाऱ्या, टिकवून ठेवण्यासाठी, तिच्यात वाढ करण्यासाठी काय करावे? आता नसलेली श्रीमंती प्राप्त कशी करावी? गरीबीला निरोप कसा द्यावा? या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखमालिकेत असतील तेव्हा पैशाची गरज व श्रीमंतीकडे वाटचाल या विषयावर पुढील लेखात जाणून घेऊ.

    आणखी वाचा