फूटबॉलच मैदान,तायवान विरुद्ध सामना भारताने ५-० ने जिंकलाय, मात्र जिंकायचा आनंद कमी आणि राग जास्त आहे. हा राग याचा की, आम्ही देशासाठी खेळतोय आणि कोणी बघायला का येत नाही? याच रागात एक ट्विट होतं आणि ते ट्विट एवढं वायरल होतं की ते २०१८सालचं गोल्डन ट्विट ठरतं.
यानंतर, जेव्हा भारताचा केनिया सोबत सामना होतो, तेव्हा मैदान हजारो प्रेक्षकांनी गच्च भरलेलं असतं आणि ‘इंडिया इंडियाचा’ जयघोष देत असतं.ते ट्विट होतं नुकत्याच निवृत्ती घेतलेल्या भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीचं.
आज आपण याच “कॅप्टन फॅनटेस्टीक” चा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. सुनील छेत्रीचा जन्म ३ ऑगस्ट १९८४ रोजी सिकंदराबाद येथे झाला. लहानपणापासूनच मैदानी खेळांकडे आकर्षण असलेल्या सुनीलने सुरुवातीला स्पोर्ट कोट्यातून चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा म्हणून हौसेखातर फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली, परंतु फुटबॉलने त्याच्या हृदयात घर केलं आणि मग पुढे त्यानेही स्वतःला या खेळात झोकून घेतलं.
त्याने आपल्या करिअरची सुरुवात २००२ मध्ये कोलकत्याच्या मोहन बागान क्लबपासून केली आणि पुढे आपल्या मेहनतीच्या बळावर 2005 साली पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारतीय संघात पदार्पण केलं. त्याच्या खेळातील कौशल्यांमध्ये कमालीची स्पष्टता होती. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे लवकरच तो संघातील एक प्रमुख खेळाडू बनला. सुनीलच्या प्रतिभेने भारताला नेहरू कप, SAFF चॅम्पियनशिप, AFC चॅलेंज कपसह अनेक विजय मिळवून दिले. सातत्याने गोल करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे तो जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय गोल स्कोररपैकी एक ठरला.
सुनील छेत्रीला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये पद्मश्री, अर्जुन पुरस्कार,मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या प्रमुख पुरस्कारांचा समावेश आहे.भारतीय संघासाठी striker म्हणून खेळणारा सुनील हा “कॅप्टन फॅनटॅस्टिक” म्हणून सुद्धा ओळखला जातो. त्याने अंतरराष्ट्रीय स्तरावर १५१ सामन्यांत ९४ गोल केले आहेत. जे रोनाल्डो, मेस्सी आणि अली दाई नंतर सावार्धिक आहेत. सुनील छेत्रीने भारतीय फुटबॉलमध्ये अतुलनीय योगदान दिलं आहे. त्याच्या परिश्रमांनी आणि नेतृत्वाने देशातील असंख्य तरुण खेळाडूंना प्रेरणा दिली आहे.
नवी अर्थक्रांती, सुनीलच्या भारतीय फुटबॉलला दिलेल्या योगदानाला salute करते.
तुम्ही राजकुमार राव अभिनित “श्रीकांत” हा चित्रपट पाहिलाय का? जर आतापर्यंत पाहिला नसेल, तर आमच्या मते एकदा नक्की बघावा. तुम्ही विचार करत असाल की, आम्ही अचानक चित्रपटाबद्दल का बोलायला लागलो? चित्रपटाचं प्रमोशन करतोय का? नाही, मग आम्ही राजकुमार राव यांचे चाहते आहोत का? तर नाही. हा चित्रपट तुम्ही या कारणासाठी बघितला पाहिजे की ही कथा ज्या “श्रीकांत” च्या जीवनावर आधारित आहे, ती तुमच्या-आमच्यासारख्या लाखो, करोडो लोकांना प्रेरणा देणारी आहे.
तो श्रीकांत, ज्याने त्याच्यावर होणाऱ्या भेदभावाविरुद्ध इथल्या सरकारला कोर्टात उभं केलं, तो श्रीकांत ज्याने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना वचन दिलं की, तो देशाचा पहिला अंध राष्ट्रपती बनून दाखवेल, तो श्रीकांत ज्याची चिकाटी आणि जिद्द पाहून रतन टाटा आणि देशातील मोठमोठ्या उद्योजकांनी त्याची पाठ थोपाटली आणि तोच श्रीकांत ज्याने असं कर्तृत्व गाजवलं की, त्याच्या आयुष्यावर चित्रपट सुद्धा आला. त्याने हे खरं करुन दाखवलं की, स्वप्न पाहण्यासाठी डोळ्यांची गरज नाही, स्वत:वरील विश्वास तुम्हाला तुमचंय इप्सित गाठून देऊ शकतो. आज, नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून त्याच्या या प्रेरणादायी प्रवासावर एक नजर फिरवूया.
जन्मजात संघर्ष
श्रीकांत बोल्ला याचा जन्म 7 जुलै 1991 रोजी आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम जवळील सीतारामपुरम येथे झाला. श्रीकांत जन्मतःच अंध होता, ज्यामुळे त्याच्या जीवनाला सुरुवातीपासूनच आव्हानात्मक वळण मिळाले. त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल होतं. वडील दामोदरराव आणि आई वेंकटम्मा हे साधारण शेती करणारे जोडपं, ज्यांचे महिन्याचं उत्पन्न केवळ १६०० रुपये होतं. त्यामुळे लहानपणीच त्यांना गरिबीचा सामना करावा लागला. परिस्थिती आधीच हलाखीची होती आणि त्यात अंध मुलाच्या जन्मामुळे त्यांच्या कुटुंबावर अधिकच निराशा पसरली.
गावातील काही लोकांनी सल्ला दिला की , “याला मारून टाका, नाहीतर आयुष्यभर दुःख सहन करावं लागेल. हा मुलगा कामाचा नाही; जन्मतः अंध असणं हे पाप आहे.” परंतु, श्रीकांतच्या आई-वडिलांनी कोणत्याही कथित शुभचिंतकाचं न ऐकता आपल्या मुलाला मोठं केलं. त्यांना विश्वास होता की, एक दिवस हा मुलगा चमत्कार करून दाखवेल.
सुरुवातीला, वडिलांनी त्याला शेतीची कामे शिकवायचा प्रयत्न केला, पण अंधत्वामुळे त्याला ती कामे करता येत नव्हती. त्यामुळे वडिलांना वाटले की, त्याने शाळेत जाऊन अभ्यास करून नाव कमवावे. त्यानुसार, त्याला शाळेत दाखल करण्यात आले. त्यानेसुद्धा जिद्दीने शिक्षण घेतले. दिसत नसल्यामुळे, तो लहानपणी भावांच्या मदतीने शाळेत जात असे. शाळेतही त्याला नेहमी शेवटच्या बाकावर बसावे लागे. ही सगळी अवहेलना सहन करताना त्याला प्रचंड वाईट वाटत असे. सततच्या अवहेलनांमुळे एकदा त्याने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, वडिलांनी त्याला सांगितले की, शिक्षणाच्या माध्यमातूनच तुझे आयुष्य बदलू शकते. हे ऐकल्यानंतर श्रीकांतने कधीही मागे वळून पाहिले नाही. सगळं सहन करत, प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर त्याने शिक्षण पूर्ण केलं.
शिक्षण मिळावं म्हणून सरकारला खेचलं कोर्टात
श्रीकांतला अंध मुलांच्या शाळेत टाकण्यात आलं. ही शाळा त्यांच्या गावापासून साधारणतः 400 किमी दूर होती, त्यामुळे त्याला हैदराबादमध्ये जावं लागलं. त्याने हार न मानता मन लावून अभ्यास केला, परिणामी त्याला इयत्ता 10वीमध्ये 96 टक्के आणि 12 वीमध्ये 98 टक्के मार्क्स मिळवले. या गुणांच्या आधारे त्याने पुढील शिक्षण विज्ञान शाखेत घेण्याचा निर्णय घेतला.
तरीही, त्याला विविध महाविद्यालयांमधून प्रवेश मिळवण्यात अडथळे आले, कारण त्या काळात अंध विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शाखेतून शिक्षण घेण्याची व्यवस्था अस्तित्वात नव्हती. पण श्रीकांतची ठाम इच्छा आणि जिद्द त्याला यशस्वी होण्यासाठी प्रेरित करत होती. त्याने आपल्या हक्कासाठी सरकारविरुद्ध कोर्टात केस दाखल केली आणि थेट सरकारलाच कोर्टात खेचलं. हा खटला सुमारे सहा महिने चालला आणि त्यात श्रीकांतला विजय मिळाला. त्यानंतर, त्याने विज्ञान शाखेत प्रवेश मिळवला आणि विज्ञान शाखेतून अभ्यास करणारा पहिला दृष्टीहीन विद्यार्थी बनला. तेव्हा दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शाखेतील पुस्तकं उपलब्ध नव्हती, त्यामुळे श्रीकांतने त्यावर तोडगा काढला. त्याने विज्ञान शाखेच्या पुस्तकांचे ऑडिओ व्हर्जन तयार करून अभ्यास सुरू केला. श्रीकांतचा हा संघर्ष आणि त्याच्या धाडसाने केवळ स्वतःच्या जीवनातच नव्हे, तर अंध विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या क्षेत्रातही एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.
भारतात उच्चशिक्षण मिळालं नाही म्हणून गाठली थेट अमेरिका
श्रीकांतने १२ वी नंतर आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अप्लाय केलं. त्यांने देशातील विविध आयआयटी आणि आयआयएम्समध्ये पात्रता परीक्षेचा अर्ज भरला. परंतु, हॉल तिकीट येण्याऐवजी त्याला एक पत्र प्राप्त झालं, ज्यात स्पष्टपणे सांगितलं गेलं की, ‘तुम्ही अंध आहात म्हणून तुम्ही परीक्षेला बसू शकत नाही’. हे ऐकून श्रीकांतला खूप वाईट वाटलं, पण त्याने या अडचणीला नकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी ठामपणे सांगितलं की, ‘आयआयटी मला स्वीकारत नाही, तर मलाही आयआयटीची गरज नाही.’
आयआयटीने त्याला नाकारलं, पण त्याच्या डोळ्यांत इंजिनिअर होण्याचं स्वप्न अजूनही होतं. त्या नकारानंतर, श्रीकांतने अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच एमआयटी आणि इंग्लंडच्या केंब्रिजमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला आणि चमत्कारिकरित्या, त्याला एमआयटीमध्ये प्रवेश मिळाला. त्यालाच मॅनेजमेंट सायन्समध्ये शिकण्यासाठी स्कॉलरशिपदेखील मिळाली, ज्यामुळे तो एमआयटीमध्ये शिकणारा पहिला आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी बनला. एमआयटी ही अमेरिकेमधील एक अत्यंत प्रतिष्ठित तांत्रिक संस्था आहे.
श्रीकांतने दिलेल्या संधीचा उत्कृष्ट उपयोग केला आणि एमआयटीमध्ये अत्यंत मेहनतीने अभ्यास केला. अखेर, तो एमआयटीमधून उत्तीर्ण होणारा पहिला आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी ठरला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला अमेरिकेतील अनेक कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळू लागल्या, पण श्रीकांतने अमेरिकेत काम करण्यासाठी नकार दिला. कारण त्याला आपल्या देशासाठी आणि देशातील लोकांसाठी काहीतरी करायचं होतं.
असा सुरु केला यशाचा प्रवास
वर म्हटल्याप्रामाणे त्याला देशातील अंध, गरीब आणि दुर्बल लोकांसाठी काहीतरी चांगलं करायचं होतं आणि म्हणूनच तो शिक्षण पूर्ण करून मायदेशी परतला. आपल्या कामात गुंतल्यावरच श्रीकांतच्या कार्याची खरी गती सुरू झाली.
2012 मध्ये, श्रीकांतने भारतात “बोलंट इंडस्ट्रीज” नावाची ग्राहक खाद्य पॅकेजिंग कंपनी स्थापन केली. या कंपनीत पाने आणि कागदापासून पर्यावरणपूरक म्हणजेच इको-फ्रेंडली पॅकेजिंग तयार केली जाते. सुरुवातीला एकाच ठिकाणाहून सुरू झालेल्या या कंपनीने आज 7 युनिट्स उभारली आहेत. 2012 पासून कंपनीने मासिक 20% दराने वाढ नोंदवली आहे. कंपनीची वार्षिक उलाढाल 200 कोटींवर पोहोचली असून, तिचं मूल्य सुमारे 400 कोटींहून अधिक आहे.
श्रीकांतच्या कंपनीने अशा प्रकारची प्रगती केली आहे की, 2021 मध्ये फोर्ब्सने त्याला “30 अंडर 30 एशिया” यादीत स्थान दिले. या यादीत स्थान मिळवणारे व्यावसायिक 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात आणि आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करत असतात. श्रीकांतने आपल्या कार्याने एक नवा मानक निर्माण केला आहे आणि त्याची प्रेरणादायक कथा आजच्या युवांसाठी एक आदर्श ठरली आहे.
श्रीकांतच्या आयुष्यात एक असा टप्पा आला की, त्याला आपल्या व्यवसायासाठी निधी मिळवण्यात अडचणी येत होत्या. या कठीण परिस्थितीत, भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी श्रीकांतच्या कंपनीत 1.3 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीमुळे श्रीकांतच्या व्यवसायात लक्षणीय वाढ झाली. टाटा यांच्यासोबतच सतीश रेड्डी, एसपी रेड्डी, श्रीनी राजू, चलमला सेट्टी आणि रवी मंथ यांच्याही गुंतवणुकीचा फायदा श्रीकांतच्या कंपनीला झाला.
आज श्रीकांतच्या कंपनीत 1500 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, ज्यात बहुसंख्य कर्मचारी दिव्यांग आहेत. श्रीकांतने आपल्या सहकाऱ्यांसह 8 जणांच्या टीमसह कंपनीची स्थापना केली होती, ज्यामध्ये बेरोजगार आणि अंध व्यक्तींना रोजगार दिला गेला. व्यवसायाच्या वाढीमुळे अन्य लोकांनाही रोजगार मिळाला.
पुरस्कार आणि मानसन्मान
श्रीकांतला त्याच्या यशाबद्दल त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये प्रतिष्ठित युवा सेवा पुरस्कार मिळाला जो समाजातील युवा वर्गासाठी असामान्य कार्यासाठी प्रदान केला जातो. या व्यतिरिक्त तेलुगु फाइन आर्ट्स सोसायटीचा युवा उत्कृष्टता पुरस्कार, तसेच त्याच्या उद्योजकीय क्षमतांना लक्षात घेऊन २०१५ साली युवा उद्योजक पुरस्कार दिला गेला. 2018 साली समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी बिझनेस लाइन यंग चेंज मेकर पुरस्कार दिला गेला,शिवाय, श्रीकांत भारताच्या अंध क्रिकेट संघातही खेळला आहे, जे त्याच्या विविध अंगभूत गुणांचं द्योतक आहे.
त्याच्या आयुष्याचा एक प्रसंग येथे विशेष नमूद करावासा वाटतो. तो म्हणजे साल 2006 मध्ये त्या वेळचे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी ‘लीड इंडिया 2020’ सुरू केले, ज्यात तरुणांना मार्गदर्शन करून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याची संधी दिली गेली. श्रीकांतही त्या निवडक तरुणांमध्ये होता. कलाम सर सर्व मुलांशी संवाद साधत होते आणि त्यांना विचारले की, तुम्ही भविष्यात काय करणार आहात? त्या मुलांनी दिलेल्या उत्तरांमध्ये, नववीत शिकणाऱ्या श्रीकांतचे उत्तर राष्ट्रपतींना विशेष लक्षात राहिले. श्रीकांतने सांगितले की तो देशाचा पहिला अंध राष्ट्रपती बनू इच्छितो. श्रीकांतच्या या उत्तरात असणाऱ्या आत्मविश्वासामुळे कलाम सर प्रभावित झाले आणि त्यांनी त्याची प्रशंसा केली.
श्रीकांतची कहाणी ही खरंच प्रेरणादायी आहे. त्याच्या जीवनातील संघर्ष आणि त्यावर मात करत त्यांनी केलेली प्रगती, आपल्यासाठी एक मोठा धडा आहे. श्रीकांतचे आयुष्य हे एक प्रेरणास्त्रोत आहे, ज्यातून आपल्याला शिकायला मिळते की कोणत्याही परिस्थितीत हार मानू नये आणि नेहमीच आपल्या ध्येयाच्या दिशेने धैर्याने आणि आत्मविश्वासाने वाटचाल करावी.
त्याचा कधीही तडजोड न करणारा स्वभाव आणि त्यांच्या सेंस ऑफ ह्यूमरने त्याला त्याच्या जीवनातल्या सर्व आव्हानांना तोंड देण्याची ताकद दिली. त्याने कधीही स्वतःला दयेचे पात्र बनवले नाही, उलट त्या परिस्थितींवर हसून ते पुढे जात राहिला. त्याच्या या प्रवासातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते – जीवनातील कोणतेही संकट हे आपल्या आत्मबलापुढे थिटे आहे, फक्त आपल्याकडे त्याला सामोरे जाण्यासाठी धैर्य हवे. जीवनात कोणतीही अडचण आपल्याला तोडू शकत नाही, जर आपला स्वतःवर विश्वास असेल. श्रीकांतच्या या अद्वितीय जीवन प्रवासाला “नवी अर्थक्रांती” सलाम करते!
आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीमध्ये मानसिक आरोग्य टिकवणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. व्यस्त वेळापत्रक, करिअरच्या स्पर्धा, सामाजिक अपेक्षा, व्यवसायातील अपयश आणि आर्थिक ताणतणाव यामुळे मानसिक शांती हरवते. या सर्वांमुळे चिंता, नैराश्य आणि मानसिक अस्वस्थता वाढत आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी विपश्यना ध्यान हा एक प्रभावी आणि शाश्वत उपाय म्हणून समोर आला आहे.
गौतम बुद्ध यांनी सुमारे २५०० वर्षांपूर्वी शोधून काढलेले हे आत्मनिरीक्षण आणि सजगतेचे तंत्र म्हणजेच विपश्यना. याच तंत्राचा प्रसार आचार्य सत्यनारायण गोयंका हे व्यापारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने आधुनिक काळात प्रभावीपणे केला. त्यांनी विपश्यना ध्यानाचा प्रचार करताना आत्मशुद्धी आणि शांततेवर भर दिला. विपश्यना म्हणजे वास्तवाचं तटस्थ निरीक्षण, ज्यामुळे आपले विचार, भावना आणि अनुभव यांचे मूल्यांकन करता येते.
आचार्य गोयंका यांनी शिकवलेले विपश्यना तंत्र हे कोणत्याही धर्म, जाती किंवा सांप्रदायिक बंधनातून मुक्त आहे. त्याचा उद्देश व्यक्तीला मानसिक आरोग्य आणि आंतरिक शांती मिळवून देणे आहे. विपश्यना ध्यानाद्वारे मनाची शांतता, तणावाचे नियमन, चिंता आणि नैराश्यावर मात करता येते. नियमित सरावाने व्यक्तीला स्वतःच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतात, ज्यामुळे तणावपूर्ण परिस्थितीतही सकारात्मक दृष्टिकोन ठेवता येतो.
या लेखात आपण विपश्यना काय आहे आणि या ध्यानाच्या नियमित सरावामुळे तणावमुक्त जीवन जगण्याची आणि मानसिक स्थैर्य टिकवण्याची कला कशी आत्मसात करता येते, याबद्दल जाणून घेणार आहोत. विपश्यना ध्यान हे केवळ मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेच नव्हे, तर समग्र जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक प्रभावी साधन आहे.
काय आहे विपश्यना?
विपस्सना (पाली) किंवा विपश्यना (संस्कृत) ही गौतम बुद्धांनी शोधून काढलेली आणि शिकवलेली एक प्राचीन ध्यान पद्धती आहे. आजच्या काळात, ही पद्धत जागतिक स्तरावर विपश्यना या नावाने प्रचलित आहे. ‘विपस्सना’ या पाली शब्दाचा अर्थ ‘स्वतःच्या आत खोलवर पाहणे’ असा होतो. बुद्धांनी या ध्यान पद्धतीच्या आचरणातून सत्य आणि अंतर्ज्ञान शोधले आणि याचा वापर करून त्यांनी आत्मबोध साधला असे म्हटले जाते.
विपश्यना ध्यानामुळे आपल्याला मनाच्या गाभ्यात डोकावण्याची आणि आपल्या विचारांचा सखोल अभ्यास करण्याची क्षमता मिळते. या पद्धतीतून मनाला शांती, संतुलन, आणि अंतर्गत समजूत मिळते. गौतम बुद्धांनी या ध्यान पद्धतीद्वारे दुःख, तणाव आणि अशांततेतून मुक्तीचा मार्ग दाखवला. विपश्यना केवळ ध्यान न राहता, ती एक जीवनशैली आहे ज्यातून आपण आत्म-शुद्धीकरण आणि सत्याच्या शोधाकडे प्रवास करतो.
आनापान ही विपश्यना ध्यानाच्या अभ्यासाची प्रारंभिक पायरी आहे. आनापान म्हणजे श्वासोच्छवासाचे निरीक्षण करणे, जसे ते आत येते आणि बाहेर जाते. यामुळे मनाची एकाग्रता वाढवण्यास मदत होते. श्वासोच्छवासाचे निरीक्षण हे ध्यानासाठी आवश्यक आहे कारण ते नेहमी उपलब्ध असते. याशिवाय, श्वसनाच्या लयीचा मनाशी घनिष्ठ संबंध असतो. जेव्हा मनात राग, भीती, वासना, मत्सर किंवा इतर नकारात्मकता येते, तेव्हा श्वासोच्छवासाची लय वेगवान आणि स्थूल होते. नकारात्मकता कमी होताच, श्वासोच्छवासाची लय सामान्य होते.
आनापान केल्यावर आपलं स्थूल मन नासिकांच्या द्वारावंर नैसर्गिकरित्या सुक्ष्म झालेलं असतं आणि याच सुक्ष्म मनाच्या आधारे अवयवांची संवेदना जाणवायला सुरुवात होते. सुरुवातीला संवेदना सुद्धा स्थूल स्वरूपाच्या असतात. उदा. हात पाय अवघडणं, कपड्यांचा किंवा वाऱ्याचा स्पर्श, घामाची जाणीव, खाज येणं, शरीरावर रोमांच येणं अशा वेगवेगळ्या संवेदना जाणवतात. या संवेदनांकडे केवळ पाहायचं, अनुभवायचं आणि मनात नोंद ठेऊन त्यांवर कुठल्याही प्रकारची शारीरिक अथवा मानसिक प्रतिक्रिया द्यायची नाही आणि बघता बघता संवेदना सुक्ष्म होतात. संपूर्ण शरीरभर या सुक्ष्म संवेदना जाणवायला सुरुवात होते. यांचेच साक्षी भावाने आणि तटस्थ भावाने निरीक्षण सुरु ठेवायचं म्हणजेच संवेदना वाईट आणि चांगली न मानता फक्त संवेदना आहे, उत्पाद होऊन पुन्हा नष्ट होईल असा भाव ठेवायचा आणि बघता बघता यातून मनस्थैर्य जाणवायला सुरुवात होते आणि ध्यान प्राप्त व्हायला लागते.
पुनरुज्जीवन आणि प्रसार
मुळची भारतीय असलेली ही साधना गौतम बुद्धांच्या महानिर्वाणानंतर काही वर्षांनी लोप पावली होती. मात्र गुरुशिष्य परंपरा असलेली ही साधना तिच्या मूळ स्वरुपात म्यानमारमधील काही अनुयायांनी आपल्या नियमित सरावाने जपून ठेवली होती. सत्यनारायण गोयंका हे मूळचे भारतीय व्यापारी त्या काळात म्यानमार मध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या व्यापारातील अपयशामुळे त्यांना नैराश्य आले आणि विविध आजारांनी ते ग्रसित झाले. तेव्हा एका मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी म्यानमारमधील “आचार्य सयाग्यी यू बा खिन” हे निवृत्त सेनेतील अधिकारी यांच्याकडे विपश्यना साधनेचे शिक्षण घेतले आणि जवळपास चौदा वर्ष साधनेचा नियमित सराव करून ते भारतात वास्तव्यास आले आणि भारतासोबत जगभरात या साधनेचा प्रसार केला. गोयंका यांच्या नेतृत्वाखाली लाखो लोकांनी विपश्यना ध्यान पद्धतीच्या माध्यमातून आत्मशांती आणि मानसिक समतोल साधला. १९६९ मध्ये आचार्यपद स्वीकारल्यानंतर त्यांनी बिहारच्या बुद्धगया येथे पहिले विपश्यना शिबिर आयोजित केले. याच वर्षी ३ ते १४ जुलै दरम्यान मुंबईतील एका धर्मशाळेत त्यांनी पहिल्या विपश्यना शिबिराचे आयोजन केले, ज्यामुळे विपश्यना ध्यानाची लोकप्रियता भारतभर वाढू लागली.
१९७६ साली गोयंका यांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे ‘विपश्यना विद्यापीठ’ स्थापन केले. हे केंद्र जगभरातील साधकांसाठी महत्त्वाचे ध्यानस्थळ बनले. पुढे १९८५ साली त्यांनी इगतपुरी येथेच ‘विपश्यना संशोधन केंद्र’ उभारले. ज्यामुळे विपश्यना ध्यानावर आधारित संशोधन व अध्यापनाला एक नवे व्यासपीठ मिळाले.
गोयंका यांच्या कार्याचा सन्मान म्हणून, भारत सरकारने त्यांना २०१२ साली सामाजिक सेवेसाठी ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले. गोयंका यांनी विपश्यना साधनेला समाजातील सर्व थरांपर्यंत पोहोचवून एक शांत, तणावरहित, आणि समतोल समाज निर्माण करण्यासाठी अमूल्य योगदान दिले. त्यांच्या या कार्यामुळे विपश्यना ध्यानाला जागतिक स्तरावर मान्यता व लोकप्रियता प्राप्त झाली.
विपश्यनेचे मानसिक आरोग्यासाठी फायदे
१) ताण-तणाव कमी करणे
विपश्यनेचा प्रमुख फायदा म्हणजे तणाव कमी होणे. शरीरातील संवेदनांबद्दलची जागरूकता वाढवल्याने व्यक्ती मानसिक तणावाची ओळख करून त्यावर सकारात्मक उपाय करू शकते. यामुळे मन:शांती आणि मानसिक स्थिरता मिळते, जी रोजच्या जीवनातील तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त ठरते.
२) चिंता व्यवस्थापन
चिंता बहुतेकदा मनातील अनावश्यक विचारांमुळे, भूतकाळातील घटना पुन्हा पुन्हा आठवून किंवा भविष्याची सतत काळजी करून निर्माण होते. विपश्यना साधनेतून वर्तमान क्षणात तटस्थ राहण्याची कला शिकता येते, ज्यामुळे चिंता कमी होते आणि मनाला शांती अनुभवता येते.
३) आत्म-जागरूकता
विपश्यना साधना आत्म-शोधासाठी एक प्रभावी मार्ग आहे. या पद्धतीद्वारे व्यक्ती स्वतःला जसे आहे तसे स्वीकारण्याचे शिकतात, त्यांच्या विचारांचे, भावना आणि संवेदनांचे आकलन करून त्यावर कोणतीही निर्णयशुद्ध प्रतिक्रिया न देण्याची कला शिकतात. यामुळे आत्म-सन्मानात वृद्धी होते आणि एक सकारात्मक आत्म-प्रतिमा निर्माण होऊ शकते.
४) भावनिक नियमन
विपश्यनाद्वारे, व्यक्ती त्यांच्या भावनांचे निरीक्षण आसक्ती किंवा घृणेशिवाय करण्यास शिकतात. यामुळे भावनिक बुद्धिमत्ता सुधारते, ज्यामुळे व्यक्तींना त्यांच्या भावनांना अधिक संतुलित आणि सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देता येतो.
5) सुधारित एकाग्रता
विपश्यना साधना एकाग्रतेला तीक्ष्ण करण्यावर जोर देते. अभ्यासक किंवा साधक जसजसे संवेदनांचे निरीक्षण करण्यात अधिक कुशल होतात, तसतसे त्यांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता नैसर्गिकरित्या वाढते. याचा फायदा काम आणि नातेसंबंधांसह जीवनाच्या विविध पैलूंमध्ये होऊ शकतो.
विपश्यना कोण करू शकतो?
विपश्यना ही दुःख मुक्तीची साधना आहे, म्हणून यात जात, पात, धर्म, लिंग, देश, विदेश असा भेद राहत नाही. हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, यहूदी–सर्व धर्मांच्या लोकांना या साधनेचा लाभ घेता येतो. यात कुठल्याही धर्माची विशेषता नसून, ती फक्त एक साधना आहे जी आपल्या जीवनाला सुलभ बनवण्यास मदत करते.
महाराष्ट्रात, भारतात आणि भारताबाहेर विपश्यना केंद्र आहेत, ज्यात विविध शिबिरे घेतली जातात. १० दिवसीय शिबीर हे नवीन साधकांसाठी असते. यात साधकांना सर्व नियमानुसार पालन करणे बंधनकारक असते. आपल्याला गूगलवर विपश्यना सर्च करून फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर शिबीर केंद्रातून फोन येतो आणि ते विचारपूस करतात. यानंतर आपण दहा दिवसांच्या शिबीरात प्रवेश घेऊन साधना शिकू शकतो.
या शिबीरासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत. हे शिबीर पूर्णतः मोफत आहे. तथापि, साधक इच्छुक असल्यास, आपल्या सोयीनुसार दान देऊ शकतो.
मित्रांनो, आजच्या युगात ध्यानाचे महत्व अत्यंत वाढले आहे. जीवनाच्या गतीमुळे आणि ताण-तणावामुळे ध्यान एक महत्त्वाचं साधन ठरलं आहे. ध्यान आपल्याला मानसिक शांतता, आत्मसमर्पण आणि एकाग्रता साधायला मदत करते. यामुळे आपले मन शांत आणि केंद्रित राहते, ज्यामुळे दैनंदिन आव्हानांचा सामना करणे सोपे जाते.
आज, जगभरातील लाखो लोक विपश्यना ध्यानाचा सराव करत आहेत. ज्यात अभिनेते अमीर खान, ट्विटरचे फाउंडर जॅक डोर्सी, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, लिंक्डइनचे चेअरमन जेफ वायनर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल इत्यादी काही प्रसिद्ध नावे घेता येतील. विपश्यना कोर्ससाठी महाराष्ट्र शासनाने सर्व अधिकारी, कर्मचारी यांना १४ दिवसांची सुट्टी ३ वर्षातून एकदा व संपूर्ण सेवाकालावधीमध्ये एकूण ६ वेळा करणेसाठी सवलत दिली आहे. (शासन निर्णय क्र.: अरजा २४०२/२७/सेवा-८ दि. २७ जून २००३)
परिस्थिती काहीही असो, वय कितीही असो, मात्र एखादी गोष्ट ठरवली की, आपण सर्व अडचणींवर मात करून यश प्राप्त करू शकतो. यातच जर कुटुंब आणि घर सांभाळणाऱ्या महिला असतील आणि त्यांनी काहीतरी करण्याचं ठरवलं, तर त्या आपल्या जिद्दीच्या बळावर सगळ्या अडथळ्यांचे डोंगर पार करून यश मिळवतात.
“नारी समाजस्य कुशलवास्तुकारा” या उक्तीप्रमाणे नारी ही समाजाची कुशल वास्तुकार आहे आणि आपली संस्कृती स्त्रीला देवी मानणारी आहे, आपल्या महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. यातीलच एक क्षेत्र आहे व्यवसाय क्षेत्र.
आज आम्ही तुम्हाला अशा 5 महिलांचा व्यवसाय प्रवास सांगणार आहोत, ज्यांनी घर-परिवार सांभाळत, छोटे व्यवसाय सुरू केले आणि त्यांना यशस्वी करून दाखवलं. या प्रेरणादायी कहाण्या तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील आणि तुम्हालाही काहीतरी मोठं करण्याची प्रेरणा देतील.
१) निर्मला हेगडे
निर्मला हेगडे यांचा जीवनप्रवास अनेक भारतीय स्त्रियांच्या प्रवासासारखाच आहे. २२ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले आणि त्या कर्नाटकातून मुंबईत आल्या. दोन वर्षांत त्यांनी एका मुलाला जन्म दिला आणि २४ व्या वर्षी त्या आई झाल्या. त्यानंतर घर आणि मुलाची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि या जबाबदारी सांभाळण्यातच त्याचं वय झालं असं त्या सांगत असतात.
निर्मला यांचं वय ६४ वर्षे आहे, त्या एक शेफ आहेत आणि त्यांनी या वयात आपल्या स्टार्टअपची सुरुवात केली आहे, आणि त्याचं नाव ठेवलं “आई’ज किचन”’. मुंबईत, निर्मला हेगडे आपल्या मुलासोबत एक फूड किचन चालवतात, जिथून आपण घरच्या स्वादिष्ट जेवणाची ऑर्डर देऊ शकता.
निर्मला हेगडे यांच्या किचनची सुरुवात लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या बिल्डिंगमधील सुरक्षारक्षकांना जेवण देण्यापासून झाली. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत गार्ड ड्यूटीवरून बाहेर जाऊ शकत नव्हते. निर्मला यांनी स्वतः त्यांच्या जेवणाची जबाबदारी घेतली आणि त्यांना घरगुती चवीचे जेवण देण्यास सुरुवात केली, जेणेकरून गार्ड यांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना उत्तम जेवण मिळावे.
आई’ज किचनमध्ये तुम्ही महाराष्ट्रीयन, गोवा आणि कर्नाटकी जेवण ऑर्डर करू शकता. ऑर्डर घेणे, पॅकिंग करणे आणि डिलिव्हरीचे काम गौतमच्या (मुलगा) समर्थनामुळे सुरळीत पार पडते.
शेवटी, इतरांसाठी त्यांचे काही प्रेरणादायक शब्द आहेत: “तुम्हाला ज्या गोष्टींची आवड आहे, त्या गोष्टींच्या संपर्कात राहण्याचे मार्ग नेहमी शोधा. व्यवसाय करण्यासाठी तुमचे वय कधीही तुम्हाला थांबवत नाही.”
२) उर्वशी पाटील
नाशिकच्या उर्वशी पाटील यांनी MBA केलं असून, सध्या त्या “MBA दाबेली” नावाने एक लोकप्रिय फूड वॅन चालवतात. लग्नानंतर उर्वशी यांच्याकडे चांगल्या पगाराची नोकरी होती, परंतु गरोदरपणात त्यांनी ती सोडली. त्यांच्या पतीचा व्यवसाय सुरळीत चालू होता, परंतु अचानक त्यात मोठं नुकसान होऊन तो व्यवसाय बंद पडला. उर्वशी यांना लहान बाळ सांभाळायचं असल्याने नोकरी करणं शक्य नव्हतं. घरात आर्थिक अस्थिरता वाढत होती, त्यामुळे त्यांनी या संकटातून मार्ग काढण्याचा निर्णय घेतला.
एकदा रस्त्यावरून जाताना उर्वशी यांना एक फूड वॅन दिसली आणि त्यातून त्यांना व्यवसायाची कल्पना सुचली. त्यांनी आधी दाबेली कशी बनवायची हे शिकून घेतलं आणि “MBA दाबेली” या नावाने व्यवसायाची सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या मेहनतीचं फळ मिळू लागलं आणि व्यवसायाने भरभराट घेतली.
आज उर्वशी पाटील या नोकरीपेक्षा कित्येक पटीने अधिक उत्पन्न मिळवत आहेत. त्यांची दाबेली खाण्यासाठी ग्राहक दूरवरून येतात आणि त्यांच्या वॅनवर नेहमीच गर्दी असते.
मित्रांनो, ही कहाणी आपल्याला शिकवते की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानता कामा नये. उर्वशी पाटील यांची संघर्षमय वाटचाल आणि जिद्द आपल्याला खूप काही शिकवते. संकटं आणि परिस्थिती आपल्याला कितीही खचवण्याचा प्रयत्न करत असली, तरी त्यावर मात करून यश मिळवणं हेच खऱ्या आयुष्याचं यश आहे.
३) चंद्रप्रभा परिहार
वयाच्या अशा टप्प्यावर, जेव्हा बहुतांश लोक निवृत्तीचा विचार करतात, 70 वर्षीय चंद्रप्रभा परिहार आज आपल्या व्यवसायात यशस्वीपणे पुढे वाटचाल करत आहेत. चंद्रप्रभा यांना प्रेमाने ‘आबा’ म्हटलं जातं. मुंबईत राहणाऱ्या आबांनी दीड वर्षांपूर्वी क्रोशिया कलेचा वापर करून बॅग्स, टोप्या, घरातील सजावटीच्या वस्तू आणि राख्या बनवायला सुरुवात केली आणि ‘नेहर’ या नावाने आपल्या ब्रँडची ओळख निर्माण केली.
आबांनी आपल्या आयुष्यातील 70 वर्षे कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यात घालवली. त्यांना लहानपणापासूनच विणकामाची आवड होती, पण त्या कलेला व्यवसायात रूपांतर करण्याचा विचार त्यांनी कधीच केला नव्हता. त्यांनी 20 वर्षांपूर्वी या कलेत डिप्लोमा घेतला होता, पण कुटुंबाच्या गरजांमध्ये स्वतःचे स्वप्न साकार करण्याची संधी त्यांना कधी मिळाली नाही. मात्र, त्यांच्या सून स्वाती यांनी पाठिंबा दिल्यामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात आणता आले.
सुरुवातीला, सासु-सुनेच्या जोडीने हे फक्त छंद म्हणून हे सगळं सुरु सुरू केलं. स्वाती नवीन डिझाइन्स शोधून आबांना द्यायची आणि आबा त्या डिझाइन्स बनवून ओळखीच्या लोकांमध्ये वाटायच्या. व्यवसायाचा विचार तेव्हा सुरू झाला जेव्हा आबांच्या भाचीने त्यांच्या बनवलेल्या बॅग्स ऑफिसमध्ये नेल्या आणि सहकाऱ्यांनी अशाच बॅग्स बनवण्याची मागणी केली.
या मागणीने त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि लवकरच त्यांना ऑस्ट्रेलियातून मोठं ऑर्डर मिळाली. यानंतर स्वातीने कंपनीची अधिकृत नोंदणी केली आणि वेबसाइट व इंस्टाग्राम पेज सुरू केले.
आज आबा स्वतः प्रत्येक ऑर्डरवर काम करतात आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येत आहेत. तुम्हाला देखील आबांच्या या वस्तू खरेदी करायच्या असतील , तर त्यांच्या वेबसाइट www.nayher.com वर जाऊन त्यांच्या हातांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करू शकता.
४) सायली कासले
जर एखाद्या व्यक्तीनं काही करायचं ठरवलं, तर तिला कोणीही थांबवू शकत नाही, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सायली कासले. घरातूनच व्यवसाय सुरू करणाऱ्या सायली आज जवळजवळ 100 हून अधिक प्रकारचं उत्पादनं विकतात आणि दरमहा 2 लाख रुपयांपर्यंत नफा कमावतात.
सायली यांचं वय 31 वर्ष आहे आणि त्या वसई येथे राहतात. त्या आपल्या पतीसोबत ‘स्पृहा घरगुती’ या नावाने स्टार्टअप चालवतात. लॉकडाऊनच्या काळात, जेव्हा सगळं काम घरातून चालू होतं, तेव्हा त्यांनी आपल्या स्पेशल ‘ऑल इन वन’ मसाल्याची निर्मिती करून सोसायटीत विक्री सुरू केली. बघता बघता हा मसाला एकदम हिट प्रॉडक्ट बनला.
यानंतर केवळ 25 हजार रुपये गुंतवून मोठी चक्की आणि मिक्सर खरेदी केला. त्यानंतर त्यांनी आटा (पीठ), तूप, लाडू अशी उत्पादनं बनवायला सुरुवात केली. आपल्या मेहनत आणि चवीच्या जोरावर त्यांची उत्पादनं लवकरच प्रसिद्ध झाली. आज त्यांची स्वतःची एक फॅक्टरी आहे आणि अनेक महिला त्यांच्या बनवलेल्या उत्पादनांची विक्री करून आत्मनिर्भर बनल्या आहेत.
त्यांचा एक सामान्य स्त्री ते बिझनेसवूमन हा प्रवास कित्येक महिलांसाठी प्रेरणादायी आहे.
५) कमलजीत कौर
कमलजीत कौर या मूळच्या पंजाबच्या आहेत, पण आता त्या मुंबईत राहतात. 51 वर्षीय कमलजीत यांनी आपल्या घरातूनच व्यवसायाची सुरुवात केली. कोविड काळात त्यांना संक्रमण झाले होते आणि परिस्थिती गंभीर होती. डॉक्टरांनी जवळजवळ आशा सोडली होती, पण त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. या प्रसंगानंतर त्यांना आपल्या लहानपणीच्या काळाची आठवण झाली, जेव्हा त्या ताजं दूध, घी, आणि मक्खन यांचं नियमित सेवन करत होत्या, ज्यामुळे त्यांची इम्युनिटी मजबूत होती. त्यांना मुंबईत या गोष्टींची कमतरता जाणवली.
कमलजीत सांगतात की लग्नाआधी लुधियानामध्ये राहात असताना त्या कधीच इतक्या आजारी पडल्या नव्हत्या. पण लग्नानंतर मुंबईत आल्यावर ताजं दूध आणि शुद्ध घी मिळणं थांबलं आणि त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली. या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी शुद्ध देशी घी बनवण्याचा निर्णय घेतला. तीन महिन्यांच्या संशोधनानंतर 2020 मध्ये त्यांनी ‘किम्मू किचन’ची स्थापना केली .
सुरुवातीला त्यांनी मुंब्रा (ठाणे) येथेच घी बनवण्यास सुरुवात केली होती, पण दूधाच्या गुणवत्तेची समस्या असल्याने त्यांनी लुधियानामध्ये यासाठी एक युनिट सुरू केलं आणि तिथून मुंबईत घी पाठवण्याचं ठरवलं. आता हे घी लुधियानामधील युनिटमध्ये बनवलं जातं आणि तिथून मुंबईत पाठवलं जातं. कमलजीत सांगतात की कधी त्यांना 100 ऑर्डर मिळतात, तर कधी एकही नाही; पण हे काम करताना त्यांना समाधान मिळतं.
त्यांचा मुलगा हरप्रीत याने लुधियानामध्ये आधीच असलेल्या सेटअपमध्ये थोडेफार बदल करून त्याचा उपयोग केला गेला. या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी 8 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आणि पहिल्याच वर्षात या व्यवसायातून 20 लाख रुपयांपर्यंतची कमाई झाली. कमलजीत यांची कंपनी 220, 500 आणि 1000 एमएलच्या बाटल्यांमध्ये घी विकते, ज्याची किंमत 399 रुपयांपासून सुरू होते.
तर, या सर्व महिलांच्या कहाण्या आपल्याला हेच शिकवतात की, ठरवलं तर काहीच अशक्य नाही. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, आव्हानं कितीही कठीण असली, तरी जिद्द, मेहनत आणि समर्पणाच्या बळावर कोणत्याही स्वप्नाला साकार करता येतं.
तुमच्यातही हे सामर्थ्य आहे. फक्त ठाम निर्धार करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि वाटचाल सुरू करा. व्यवसाय करण्यासाठी, आपलं स्वप्न साकार करण्यासाठी, वय किंवा परिस्थिती कधीच अडथळा ठरत नाही. मनात ठरवलं, तर काहीच अशक्य नाही, याचीच प्रेरणा या महिला देतात. तर, तुमच्या यशाचा प्रवास कधी सुरू करायचा, हा निर्णय आता तुमचाच
अमेरिकेतील प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी Apple Inc ने आपल्या व्यवस्थापनामध्ये मोठे बदल केले असून, भारतीय वंशाचे केवन पारेख यांची कंपनीचे नवीन मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून नियुक्ती केली आहे. ते 1 जानेवारी 2025 पासून हा पदभार स्वीकारतील आणि लुका मेस्त्री यांची जागा घेतील. पारेख हे सध्या Apple मध्ये उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. ते मूळ भारतीय वंशाचे असून, त्यांनी कंपनीच्या आर्थिक धोरणांमध्ये आणि कामकाजात महत्वाचे योगदान दिले आहे. Apple मध्ये केविन पारेख गेल्या 11 वर्षांपासून कार्यरत आहेत, ज्यामुळे त्यांना कंपनीतील आर्थिक प्रणालीचे सखोल ज्ञान आहे.
52 वर्षीय केवन पारेख यांनी मिशिगन विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे आणि त्यानंतर शिकागो विद्यापीठातून एमबीए केले आहे. ते आता थेट CEO टीम कुक यांना रिपोर्ट करणार आहेत आणि त्यांचा Appleच्या टीममध्ये एक महत्त्वाचा सहभाग असेल.
Apple ने एका आठवड्यात दुसऱ्यांदा व्यवस्थापनात मोठा बदल केला आहे. iPhone 16 लवकरच बाजारात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या व्यवस्थापनामध्ये हे महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
लुका मेस्त्री यांच्याकडे आता नवीन जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, केवन पारेख यांनी लुका मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. लुका मेस्त्री गेले काही महिने केवन पारेख यांना ऍपलच्या मुख्य आर्थिक अधिकारी (सीएफओ) पदासाठी तयार करत होते.
पारेख यांनी यापूर्वी ऍपलमध्ये विक्री आणि विपणन विभाग हाताळले आहेत, त्यामुळे त्यांना ऍपलच्या व्यवसायाचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी याआधी थॉमसन रॉयटर्स आणि जनरल मोटर्ससारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी देखील काम केले आहे. रॉयटर्समध्ये त्यांनी चार वर्षे उपाध्यक्ष पदावर काम केले, तर जनरल मोटर्समध्ये बिझनेस ग्रोथ डायरेक्टर म्हणून ते कार्यरत होते.
ऍपलचे सीईओ टीम कुक यांनी नवीन सीएफओ केवन पारेख यांच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. टीम कुक म्हणाले की, “केवन पारेख हे ऍपलच्या टीमचा महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल.” लुका मेस्त्री यांनी देखील त्यांच्या नवीन जबाबदारीबद्दल उत्साह व्यक्त केला आहे आणि पारेख यांच्या नेतृत्वाखाली कंपनीला यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
खेळण्याच्या वयात कोकच्या ६ बाटल्यांचा संच विकून ५ सेंट्सचा स्वकष्टाने नफा मिळवणाऱ्या वॉरन बफे यांनी पुढे गुंतवणूक क्षेत्राद्वारे अफाट संपत्ती कमावली. तुम्ही म्हणाल, प्रचंड संपत्ती तर जगातील अनेक लोकांनी कमावली आहे. मग बफेंनी यात जगावेगळं असं केलं तरी काय?
कुठलाही कायदा न मोडता, करचुकवेगिरी न करता, नैतिकतेच्या मार्गाने यशाचं शिखर सर करणाऱ्या फार कमी व्यक्ती असतात. त्यांपैकी एक व्यक्ती असणं आणि त्याच्याही पुढे जाऊन, मिळवलेल्या संपत्तीपैकी ९० टक्के संपत्ती फारसा गाजावाजा न करता समाजाला परत देणं, हेच बफेंच्या यशाचं वेगळेपण आहे.
‘समभागधारक हेच कंपनीचे मालक’ अशी सर्वस्वी वेगळी समीकरणं प्रमाण मानून, यशाच्या वाटेवरून एकटं चालत न जाता आपल्या सहकारी आणि कर्मचाऱ्यांनाही यशाचं क्षितिज दाखवणाऱ्या बफेंकडून आपल्याला शिकण्यासारख्या असंख्य बाबी आहेत.
जगभरात गुंतवणूक गुरू म्हणून प्रसिद्ध असलेले वॉरन बफे यांचा आज जन्मदिवस. जगातील कोट्यवधी लोक शेअर बाजारातून पैसे कमविण्यासाठी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा अवलंब करतात. गुंतवणुकीबाबत त्यांनी केलेले मार्गदर्शन आजही अतिशय प्रभावी ठरते. वॉरन बफे हे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांपैकी एक मोठे नाव आहे. त्यांच्या गुंतवणुकीचा जगभरातील शेअर बाजारावर परिणाम होतो. जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत ते आजही सातव्या स्थानावर आहेत.
बफे यांना आपल्या युवा अवस्थेतच Business आणि Investing विषयी आवड निर्माण झाली आणि त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षापासूनच गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. कोलंबिया बिजनेस स्कूलमधून ते पदवीधर झाले जिथे ते बेंझामिन ग्रॅहम यांच्याकडून गुंतवणुकीचे तत्त्वज्ञान आणि व्हॅल्यू इन्वेस्टिंगच्या कन्सेप्टविषयी बरेच काही शिकले. ओरॅकल ऑफ ओमाहा म्हणून ओळखले जाणारे वॉरन बफे आत्तापर्यंतच्या सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक समजले जातात.
वॉरन बफे यांचे 5 गुंतवणूक मंत्र :
1. गुंतवणुकीकडे दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा :
शेअर्स विकत घेतल्यानंतर एका दिवसात किंवा फार कमी वेळात विकण्यापेक्षा चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून त्यामध्ये तुमची गुंतवणूक दीर्घकाळ टिकवून ठेवणे चांगले. शेअर मार्केटमधील दीर्घकालीन गुंतवणूक शेवटी जास्त परतावा देते, परंतु त्यासाठी तुम्ही योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
2. रातोरात श्रीमंत होण्याचा विचार करू नका :
बाजारात लवकरात लवकर श्रीमंत होण्याची हाव तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. चांगला Portfolio तयार करणे ही एक मोठी प्रक्रिया आहे. यासाठी खूप संयम लागतो. बाजारातून चांगल्या परताव्यासाठी तुम्ही अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी ज्यांचे Business Model तसेच त्यांचे व्यवस्थापन चांगले आहे.
3. ध्येय ठेवून गुंतवणूक करा :
ध्येयाशिवाय केलेली गुंतवणूक अनेकदा फायदेशीर नसते. तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेला पैसा हुशारीने गुंतवा. त्या गुंतवणुकीत पैसा कसा वाढणार आहे हे समजत नसेल, तर त्यापासून दूर राहणेच बरे.
4. वैविध्य समजून घ्या :
‘जवळची सर्व अंडी एका टोपलीत ठेवू नये’ हे सूत्र गुंतवणुकीलाही लागू केले पाहिजे. तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी असलेली रक्कम वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वितरित करावी. संपूर्ण पैसा एकाच ठिकाणी गुंतवू नका, सर्वांमध्ये समतोल ठेवा.
5. रास्त भावाने करा शेअर्सची खरेदी :
एखादी कंपनी उत्तम दर्जाची उत्पादने बनवत आहे किंवा ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देत आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. वॉरन बफे असे सांगतात, एखाद्या मोठ्या कंपनीचे शेअर्स मोठ्या किंमतीला खरेदी करण्यापेक्षा चांगल्या कंपनीचे शेअर्स वाजवी किंमतीला विकत घेणे कधीही चांगले.
वॉरन बफे यांचा हा प्रसिद्ध विचार प्रत्येक गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीने कायम लक्षात ठेवला पाहिजे.
“खर्च केल्यानंतर जे वाचते, त्याची बचत करु नये,
तर बचत केल्यानंतर जे राहते, त्यातून खर्च केला पाहिजे.”
आपल्या भारत देशाला क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा लाभलाय. भारतीय क्रीडा विश्वातील एक प्रेरणादायी आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचं नाव आजही तितक्याच आदराने घेतलं जातं.
देशातीलच नव्हे तर जगातील महान हॉकीपटूंच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 मध्ये उत्तर प्रदेशमधील प्रयागराज म्हणजे आधीच्या इलाहाबाद येथे झाला. मेजर ध्यानचंद यांचे खरे नाव ध्यानसिंग असे होते. मात्र, ते नेहमी रात्री चंद्र प्रकाशात सराव करत असत. त्यामुळे कालांतराने त्यांच्या जवळच्या मित्रांनी ध्यानसिंग यांच्या नावापुढे ‘चंद’ हा शब्द जोडला. तेव्हापासून ध्यानचंद या नावाने ते ओळखले गेले.
आज 29 ऑगस्ट म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिन. हॉकीचे सार्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा गौरव म्हणून त्यांचा जन्मदिवस दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून संबंध देशभर आजही साजरा केला जातो. या क्रीडा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपतींच्या हस्ते या दिवशी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्काराचे वितरण करण्यात येते. याशिवाय खेळातील आजीवन कामगिरीसाठी ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार 2002 पासून देण्यात येतो.
हॉकीच्या मैदानात ध्यानचंद यांनी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केली आहे. मेजर ध्यानचंद यांचा हॉकी खेळ म्हणजे चेंडू आणि स्टीक यांचा सुंदर मिलाप होता. त्यांच्या कारकीर्दीत भारताने ऑलम्पिक स्पर्धेत सलग तीन वेळा सुवर्ण कामगिरी अनुक्रमे 1928, 1932 आणि 1936 झाली नोंदविली आहे. 1956 साली सरकारने ध्यानचंद यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवित केले.
ध्यानचंद यांनी 1926 ते 1948 दरम्यान 400 हून अधिक सामने खेळले आहेत. यात त्यांनी जवळपास 1000 गोल करण्याचा पराक्रम केला आहे. त्यांनी आपला शेवटचा आंतराष्ट्रीय सामना 1948 साली खेळला. हॉकीच्या मैदानात त्यांनी केलेल्या अभूतपूर्व कामगिरीसाठी त्यांना सन्मानित करण्यासाठी 2012 पासून भारत सरकारने त्यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय क्रीडा विश्वाच्या या महान जादूगाराला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
आजच्या तरुणाईला वारंवार शेती किंवा संबंधित व्यवसायांकडे वळण्याची गरज आहे, असं सांगितलं जातं. मात्र, प्रत्यक्षात या क्षेत्रात आधुनिक प्रयोग, नवं तंत्रज्ञान आणि नवनवीन संधी शोधणाऱ्या तरुणांची संख्या अतिशय अल्प आहे यातच, जेव्हा पुरुषी वर्चस्व असलेल्या व्यवसायात एखादी महिला उतरते, तेव्हा तिला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. बायकांनी फक्त बायकांची कामं करावी, असा पारंपरिक दृष्टिकोन आजही प्रचलित आहे. त्यामुळे, महिला अशा व्यवसायात उतरली की, तिला हिणवलं जातं, आणि कधी कधी तिला “तू नाही करू शकणार” असं म्हणून मानसिक खच्चीकरण केलं जातं.
मात्र त्यांना जर योग्य वेळी योग्य संधी मिळाल्या, तर त्या कोणतंही काम करु शकतात. मग ते खेळ असो, राजकारण असो, सैन्य असो किंवा व्यवसाय असो, महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली प्रतिभा आणि यश सिद्ध केलं आहे. आज आपण अशाच एका २४ वर्षीय कृषीकन्या बद्दल चर्चा करणार आहोत जिने आपल्या प्रचंड मेहनतीच्या बळावर वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी दुमजली गोठा उभारून यशस्वी दुग्धव्यवसाय उभारून तरुणाईसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
ती तरुणी आहे अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील पारनेर तालक्यातील निघोज या गावाची रहिवासी श्रद्धा ढवण. श्रद्धाने आपले जीवन संघर्षाच्या बळावर यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेलं आहे. भौतिकशास्त्रात एम. एस. सी. शिक्षण घेतलेल्या श्रद्धा तायक्वांडो खेळाडू म्हणूनही प्रसिद्ध आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्रद्धाची लहानपणापासूनच म्हशींच्या व्यापारात घेतलेली मेहनत आणि त्याचा परिणाम तिच्या भविष्यावर झाला.
व्यवसायाची सुरुवात
शेतकरी कुटुंबातील श्रद्धाच्या वडिलांचा म्हशी खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्यामुळे घरी म्हशी आणल्या जायच्या. कधी चार-पाच म्हशी घरी असायच्या तर कधी एकही नसायची. घरची परिस्थितीही हलाखीची होती. वडील अपंग, भावंडं लहान म्हणून घरात जबाबदार व्यक्ती श्रद्धाच होती.
लहानपणापासूनच या वातावरणात वाढलेली श्रद्धा जसजशी मोठी होत गेली तसतसे आपल्या वडिलांकडून आता काम नाही, त्यांना आर्थिक हातभार लावला पाहिजे, या जाणिवेतून वयाच्या अकराव्या वर्षापासून तीही हे काम शिकू लागली. मुळातच अतिशय बुद्धिमान आणि मेहनती असलेल्या श्रद्धाने पुढे कॉलेज ला गेल्यापासून आपल्या भावाच्या मदतीने मोठ्या धडाडीने दोन म्हशी घेऊन पशुपालन आणि दुग्धव्यवसायाचा श्रीगणेशा केला.
प्रगती आणि विस्तार:
सुरुवातीला दोन म्हशींनी सुरूवात केली खरी, मात्र खरा प्रवास तर आता सुरु झाला होता. घर सांभाळण्यासाठी किंवा शिक्षणासाठी ती घर सोडून शहरात गेली नाही, तर गावातच बीएससी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. ती स्वतःच्या हाताने म्हशींचं दूध काढायची आणि मोटार सायकलवर बसून स्वतः दूध विकायला जायची. हा व्यवसाय श्रद्धाने नियोजनपूर्वक सांभाळला. व्यवसायात नफा मिळायला लागल्यावर तेच पैसे गुंतवून तिने व्यवसाय वाढण्यावर भर दिला. प्रसंगी कर्ज काढून तिनं उत्पादन कसं वाढेल, दुधाची गुणवत्ता कशी सुधारेल याकडे लक्ष दिलं. त्यासाठी म्हशींना कोणतं खाद्य दिलं गेलं पाहिजे याचा तिने नीट अभ्यास केला. शेण काढण्यापासून ते दूध काढणं, दूध घालणं, गोठा साफ करणं ही सगळी कामं तिने स्वतः केली. मात्र, जसजशी म्हशींची संख्या वाढत गेली, तसतसं कामगार ठेवण्याची गरज भासू लागली. आजच्या घडीला, श्रद्धाकडे तब्बल ८० म्हशी आणि तेवढी क्षमता असणारा दोन मजली गोठा आहे.
जोडव्यवसायाचा श्रीगणेशा
व्यवसाय करत असताना, काही वर्षांनंतर श्रद्धाने गोठ्यावर विविध प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली. गोठ्यातील मलमूत्र, शेण, आणि वाया जाणारे पाणी यांचा सखोल अभ्यास करून तिने शून्य कचरा व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केला. यासाठी तिने तज्ज्ञांच्या मदतीने बायोगॅस प्रकल्प उभारला, ज्यामध्ये शेण आणि मलमूत्राचा वापर केला गेला. या प्रकल्पातून पुढे बायोगॅसचे रूपांतरण करून वीज निर्मितीही केली गेली.
घरातील स्वयंपाकाचा गॅस, गोठ्यातील वीज आणि बोअरवेल, विहिरी, तसेच बायोगॅससाठी लागणाऱ्या दोन मोटारींसाठी लागणाऱ्या संपूर्ण वीजेचा खर्च, म्हणजेच जवळपास ८ ते १० हजार रुपये या प्रकल्पामुळे वाचले. याशिवाय, बायोगॅसच्या प्रक्रियेमुळे शेणातून निघणारा मिथेन गॅस जाळला जातो, जो पर्यावरणासाठी हानिकारक असतो. परिणामी, पर्यावरणावर होणारे दुष्परिणामही कमी झाले.
बायोगॅस प्रकल्पातून बाहेर पडणारी स्लरी शेतकऱ्यांनी वापरण्यास सुरुवात केली आहे. स्लरीमध्ये नायट्रोजनचे प्रमाण अधिक असल्यामुळे ती सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीसाठी उपयुक्त आहे. ऑरगॅनिक कार्बन वाढविण्यासाठीही स्लरीचा वापर केला जातो. साधारणपणे ५ ते १० रुपये प्रति लिटरने ही स्लरी विकली जाते, ज्यामुळे या प्रकल्पातूनही उत्पन्न मिळू लागले आहे.
याशिवाय, श्रद्धाने ‘गांडूळ खत प्रकल्प’ आणि जिवाणू जैविक खत प्रकल्प’ही सुरू केले आहेत. बायोगॅस प्रकल्पासाठी वापरात येणाऱ्या शेणाव्यतिरिक्त उरलेले शेण या प्रकल्पांत कुजवले जाते आणि त्याचा योग्य वापर केला जातो. या उपक्रमांमुळे श्रद्धाने गोठ्यावर शाश्वत आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापन पद्धती निर्माण केली आहे.
आपल्या अनुभवाच्या बळावर मिळवलेले ज्ञान श्रद्धाने स्वतःपर्यंत मर्यादित न ठेवता पशुपालन आणि दुग्धव्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली. खरंतर श्रद्धाचे व्यवसायातील यश पाहून अनेकांना प्रेरणा मिळू शकते. तिच्या यशाचा अनुभव पाहून एखाद्याला म्हशीपालन व्यवसाय, दुग्धव्यवसाय सुरू करण्याची इच्छा होऊ शकते किंवा ‘जर एक मुलगी हे करू शकते, तर मी का नाही?’ असा विचार करायला लावू शकतो. पण या यशामागील खडतर प्रवास, सुरुवातीच्या अडचणी आणि संघर्ष यांचे महत्व समजून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच श्रद्धाच्या प्रशिक्षण केंद्रात तरुणांना अधिक प्राधान्य दिले जाते, ज्यामुळे त्यांना या प्रवासाची खरी जाणीव होऊ शकेल.
शून्य कचरा व्यवस्थापन पद्धतीसह, श्रद्धाच्या प्रशिक्षण केंद्रात बायोगॅसनिर्मिती, बायोवीजनिर्मिती, मुरघास, जीवाणू जैविक खत, गांडूळ खत, आणि गोमूत्रापासून बनविण्यात येणारी स्लरी यांसारख्या विविध प्रकल्पांचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षणार्थी ‘श्रद्धा फार्म’मधील कामकाजाची पद्धत समजून घेतात आणि त्यांना या प्रकल्पांद्वारे कशा प्रकारे शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने उत्पन्न मिळवू शकतो याची जाणीव होते. या विश्वासाने प्रशिक्षणार्थी केंद्रातून बाहेर पडतात आणि त्यांच्या यशाचा पाया घट्ट होत जातो.
एका म्ह्शीपासून सुरु झालेला हा व्यवसाय आता प्रचंड वाढला आहे. श्रद्धा त्या हजारो लाखो तरुणींसाठी प्रेरणास्त्रोत आहे. सोबतच कृषी क्षेत्रात “श्रद्धा फार्म” सध्याच्या घडीला खूप गाजलेलं नाव आहे. एक दोन म्हशींपासून सुरु झालेला हा व्यवसाय महिन्याला ७ ते ८ लाख श्रद्धाला मिळवून देतो.
शेती आणि पशुपालन हे क्षेत्र प्रचंड शारीरिक श्रम आणि कष्टांची मागणी करणारं क्षेत्र आहे, म्हणूनच अनेकजण या व्यवसायाकडे वळायला कचरतात. याचाच परिणाम म्हणून, शेतीला तरुणाईकडून कमी महत्त्व दिले जाते आणि काही लोकांना वाटते की, हा व्यवसाय फायदेशीर नाही. पण हा एक गैरसमज आहे. सध्याच्या काळात, तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती अधिक सुलभ आणि परिणामकारक होऊ शकते. मात्र, शेतीतून उत्पन्नाची शाश्वतता कमी असल्याने शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायांचाही विचार व्यावसायिक दृष्टिकोनातून करायला हवा.
पशुपालन हा एक दीर्घकालीन चालणारा व्यवसाय आहे. शेतकऱ्यांवर कितीही संकटे आली, तरी पशुपालन आणि शेतीपूरक इतर व्यवसाय शेतकऱ्यांना तारून नेऊ शकतात. त्यामुळे स्वतःचं करिअर घडवायचं असेल, स्वतःचा पैसा उभा करायचा असेल, तर केवळ मुलांनीच नव्हे, तर मुलींनीही या क्षेत्रात निसंकोचपणे येण्याची आवश्यकता आहे.
मित्रांनो, श्रद्धासाठी डेअरी फार्मचं काम करणं अगदीच सोपं नव्हतं, कारण तिला आपल्या मित्रमैत्रिणींच्या टोमण्यांना सामोरं जावं लागलं. गावातल्या लोकं श्रद्धाच्या कामावरून वेगवेगळे टोमणे मारत असत, पण श्रद्धाने त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. तिच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती, त्यामुळे श्रद्धाने डेअरी फार्मला यशस्वी व्यवसाय बनवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली.
तिच्या कार्याची दखल घेत तिला मागील वर्षी ‘एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’ बारामती येथे जागतिक महिला दिनानिमित्त ‘शारदा सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
श्रद्धा त्या हजारो, लाखो तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहे जे स्वतःच्या परिस्थितीला दोष देत काहीतरी करण्याची उमेद हारून बसलेत आणि तिचं कार्य त्या हजारो लोकांना दिलेली चपराक सुद्धा; जे म्हणतात, मुलगी म्हणजे परक्याचं धन, मुलगी म्हणजे काळजाला घोर. पण या विचारांना तडा देत, घरच्या व्यवसायासाठी लहानपणापासूनच झटणारी श्रद्धा आज आपल्या वडिलांचा खंबीर आधार बनली आहे. मुलगी म्हणजे बापाचा अभिमान, मुलगी म्हणजे बापाचा खरा आधार, हे तिने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवलं आहे.
तुम्ही प्रवासासाठी गाडी शोधत असता, पण गाड्यांची उपलब्धता कमी असते आणि तुम्हाला घाई सुद्धा असते,अशा वेळेला तुम्ही काय करता? तर तेव्हा तुम्ही मोबाईलवर ओला किंवा उबर सारख्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांच्या ऍप्सचा उपयोग करून सहज गाडी बुक करता. पण तुम्ही कधी विचार केलाय का की हे एवढं आरामदायी समाधान कुणाच्या कल्पकतेमुळे शक्य झालं? आज आपण त्याच व्यक्तीचा प्रवास पाहणार आहोत, ज्यांनी ओला या कंपनीची स्थापना करून भारतीय कॅब ट्रान्सपोर्ट क्षेत्रात क्रांती घडवली आणि ज्यांना भारताचा इलोन मस्क म्हटलं गेलं. त्या व्यक्तीचे नाव म्हणजे ओला कंपनीचे संस्थापक ‘भाविश अग्रवाल’. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, त्यांनी अनेक अडचणींवर मात करून, सातत्य, कल्पकता आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेल्या यशावर एक नजर टाकूया.
प्रारंभिक जीवन, शिक्षण आणि नोकरी
भाविश अग्रवाल यांचा जन्म 28 ऑगस्ट 1985 रोजी पंजाबमधील लुधियाना येथे झाला. बालपणापासूनच ते अतिशय बुद्धिमान आणि मेहनती होते. त्यांचे आई वडील हे दोघेही पेशाने डॉक्टर आहेत. वडील हे ऑर्थोपेडिक सर्जन तर आई ह्या पॅथोलॉजिस्ट आहेत. आयआयटी मुंबई येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी. टेक. पूर्ण केल्यानंतर भाविश यांनी 2007 मध्ये मायक्रोसॉफ्ट रिसर्च इंडिया येथे रिसर्च इंटर्न म्हणून आपल्या कॉर्पोरेट प्रवासाची सुरुवात केली. येथे त्यांनी टेक्नॉलॉजीवर आधारित विविध प्रकल्पांमध्ये काम केले.
मायक्रोसॉफ्ट रिसर्चमध्ये ते विविध टेक्नॉलॉजीवर संशोधन करत होते आणि या शोधाच्या प्रक्रियेतच त्यांना दोन पेटंट्स मिळाले, परंतु 9 ते 5 च्या सुरक्षित नोकरीत त्यांना समाधान मिळत नव्हतं. त्यांच्या मनात स्वतःच्या व्यवसायाची तळमळ निर्माण झाली होती. उद्योजक होण्याची त्यांची तीव्र इच्छा होती, पण सुरक्षित नोकरीमुळे ते अडकले होते.
त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे 2008 मध्ये मायक्रोसॉफ्टने त्यांना सहाय्यक संशोधक म्हणून नियुक्त केले. दोन वर्षांहून अधिक काळ मायक्रोसॉफ्टमध्ये काम करताना भाविशला एक उद्योजक म्हणून काहीतरी नवीन करण्याची ओढ लागली होती.
मनात कसा आला ‘ओला’ सुरु करण्याचा विचार?
भाविश अग्रवाल सांगतात की ओला (Ola) ची सुरुवात त्यांच्या एका प्रवासाच्या वैयक्तिक वाईट अनुभवातून झाली. एकदा त्यांनी बेंगळुरूहून बंदीपूरला जाण्यासाठी एक कार बुक केली होती. मात्र, त्या प्रवासाचा अनुभव खूपच निराशाजनक होता. प्रवासाच्या दरम्यान अर्ध्या रस्त्यातच ड्रायव्हरने अतिरिक्त पैसे मागायला सुरुवात केली, शिवाय त्याचं वागणं आणि बोलणं अत्यंत उद्धट होतं. या गैरवर्तणुकीमुळे त्रासून भाविश यांना रस्त्यातच गाडी सोडावी लागली आणि उर्वरित प्रवास बसने करावा लागला.
बसमधून प्रवास करताना भाविश यांच्या मनात वारंवार विचार येत होता की, अशा वाईट सेवेमुळे प्रवाशांचे किती हाल होत असतील. त्यांना जाणवलं की त्यांच्या सारखे अनेक लोक असतील, ज्यांना दर्जेदार कॅब सेवा मिळत नाहीये. आणि त्याच वेळी त्यांच्या मनात एक कल्पना आली की, एक आपण अशी सेवा सुरू करावी जी लोकांना गुणवत्तापूर्ण, विश्वासार्ह आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा देईल.
ओलाची सुरुवात आणि सुरुवातीचा संघर्ष
कल्पकता आणि कौशल्य यांचा व्यवस्थित समन्वय साधला, तर नवनिर्मितीचा चमत्कार घडतोच! भाविश अग्रवाल यांनी हेच सिद्ध करून दाखवलं आहे. त्यांनी आपल्या दूरदृष्टी आणि धडपडीच्या जोरावर ओला कॅब्सची कल्पना प्रत्यक्षात आणली. व्यवसायात येणाऱ्या अडथळ्यांना त्यांनी संधीमध्ये बदललं आणि आपल्या जिद्दीने एक नवीन यशस्वी प्रवासाला सुरुवात केली.
कॅब सेवा क्षेत्रातील सर्व कमतरता समजून घेतल्यानंतर, भाविश यांनी उत्तम ग्राहकांना उत्तम अनुभव आणि परवडणाऱ्या किमतींसह एक कॅब एग्रीगेटर कंपनी सुरू करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी जोधपूरमधील आणखी एक आयआयटीयन मित्र अंकित भाटी यांना सोबत घेतले. 3 डिसेंबर 2010 रोजी मुंबईत त्यांनी एकत्रितपणे ‘ओलाट्रिप्स डॉट कॉम’ वेबसाइट लॉन्च केली, ज्यामध्ये ग्राहक बाह्य प्रवासासाठी कार बुक करू शकत होते.
सुरुवातीला, भाविश आणि अंकित यांच्याकडे या कल्पनेत गुंतवणूक करण्यासाठी फारशी आर्थिक क्षमता नव्हती आणि कोणत्याही गुंतवणूकदाराकडून आधारही मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या बचतीमधूनच ऑनलाइन ऍप्लिकेशन विकसित करण्यास सुरुवात केली. जून 2012 मध्ये, Olacabs ने एक मोबाईल ॲप लाँच केले. ओला ऍप लाँच झाल्यानंतर त्यांना ‘टायगर ग्लोबल मॅनेजमेंट’ कडून 5 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक मिळाली, तसेच अनुपम मित्तल आणि स्नॅपडीलचे कुणाल बहल यांच्याकडूनही निधी उभारला. सुरुवातीच्या वर्षांत, कॅब बुकिंग फर्मचे वापरकर्ते फोन कॉलद्वारे कॅब बुक करत होते. नंतर ॲप आल्यानंतर त्याचा वापर वाढण्यास सुरुवात झाली.
पण प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता, भाविश अग्रवाल यांना भारतीय बाजारपेठेत ओला सादर करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एकदा नाही, तर प्रत्येक वेळी जेव्हा त्यांनी काहीतरी नवीन आणले किंवा नवीन बाजारपेठेकडे पाऊल टाकले, तेव्हा त्यांना संघर्ष करावा लागला.
प्रारंभीच्या काळात, रेडिओ ट्रॅफिक सर्व्हिसेस आणि फास्टट्रॅकसारख्या स्थानिक मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करणे ओलासाठी अवघड होते, परंतु यामुळे भाविश थांबले नाहीत. या अडचणींनी त्यांना वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास आणि अनोख्या, पण समस्येचे निराकरण करणाऱ्या उपायांकडे पाहण्यास प्रवृत्त केले. याच वेळी ओलाने ऑल इंडिया परमिट असलेल्या ड्रायव्हर्सना कामावर घेण्यास सुरुवात केली आणि इंटरसिटी प्रवास सुविधा सुरू केली.
ओलाचा यशस्वी प्रवास
भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वात ओला आज भारतातील एक अग्रगण्य स्टार्टअप म्हणून उभी राहिली आहे. त्यांनी स्वतः नवीन कार विकत न घेता ड्रायव्हर्सना जोडण्यावर भर दिला, ज्यामुळे अनेक ड्रायव्हर्सना रोजगार मिळाला. त्यांनी ओला सेवेला एका अॅपद्वारे इंटरनेटशी जोडले, ज्यामुळे लोकांना राईड बुकिंगची सुविधा मिळाली. भाविश यांनी काही प्रसंगी स्वतः ओला ड्रायव्हर बनूनही सेवा दिली आहे.
ओला कॅब सर्व्हिसची खासियत म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. हे अॅप लोकांना त्यांच्या राईडसाठी सर्व आवश्यक माहिती देते, ज्यात रेटिंग्स, रिव्ह्यूज आणि क्वालिटी चेकिंगसाठी सुविधा आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवरूनच सर्व काही नियंत्रित करता येते.
भाविश यांची दूरदृष्टी आणि सेवा गुणवत्ता यामुळे ओलाचा व्यवसाय झपाट्याने वाढला. त्यांनी कमी दरात उत्कृष्ट सेवा देण्याचा विचार केला आणि 2013-14 मध्ये ओलाचा टर्नओव्हर सुमारे 418.25 कोटी रुपयांचा होता. आज, 75 हून अधिक शहरांमध्ये 1.75 लाखांपेक्षा अधिक लोक रोज ओला वापरतात. भाविश यांच्याकडे ओलामध्ये 6.7% हिस्सेदारी आहे, ज्यामुळे त्यांची नेट वर्थ महत्त्वाची ठरते. ओलाचे सध्याचे मूल्यांकन $4.8 बिलियन डॉलर्सपेक्षा (40000 कोटी रुपये) जास्त आहे, जे तिच्या यशाची साक्ष देते.
2017 मध्ये, भाविश यांनी ओला इलेक्ट्रिकची स्थापना केली, जी इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि बाईक्स तयार करते. या व्यवसायाची वाढही लक्षणीय आहे.
ऑक्टोबर 2023 मध्ये, ओला इलेक्ट्रिकने टेमासेक आणि भारतीय स्टेट बँकेकडून 3,200 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली. यामुळे त्यांच्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील विस्ताराला गती मिळाली. भाविश अग्रवाल यांनी दोन कंपन्या उभारल्या, ज्यांचे मूल्यांकन 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे आणि यामुळे त्यांच्या दूरदृष्टीची आणि नेतृत्वाच्या कौशल्याची झलक दिसते.
भारतातील पहिले स्वदेशी AI-प्लॅटफॉर्म ‘कृत्रिम’ केलं लॉन्च
भाविश अग्रवाल यांनी 15 डिसेंबर 2023 रोजी भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) प्लॅटफॉर्म ‘कृत्रिम’ लाँच केले. हे प्लॅटफॉर्म सुमारे 22 भारतीय भाषा समजू शकते आणि सध्या ओपन एआयच्या चॅट जीपीटी तसेच गुगलच्या जेमिनीशी स्पर्धा करत आहे .
लाँचिंग कार्यक्रमादरम्यान, अग्रवाल यांनी AI चॅटबॉटचे प्रात्यक्षिक दाखवले, जो चॅट जीपीटी आणि जेमिनीसारखचं प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम आहे. हा चॅटबॉट कवितांपासून कथांपर्यंत विविध प्रकारची सामग्री तयार करू शकतो. ‘कृत्रिम’ हे प्लॅटफॉर्म 22 भारतीय भाषा समजू शकते आणि 10 भाषांमध्ये मजकूर तयार करण्याची क्षमता ठेवते. कंपनीच्या मते, हे भारताचे पहिले पूर्ण-स्टॅक AI आहे, जे स्थानिक भारतीय ज्ञान, भाषा आणि डेटावर आधारित आहे. अग्रवाल यांनी हे साधन सर्वांसाठी उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.
मानसन्मान आणि पुरस्कार
भाविश हे भारतातील सर्वात तरुण आणि श्रीमंत उद्योजकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. कठोर कॉर्पोरेट जीवनशैलीच्या पलीकडे, त्यांना सायकलिंग, स्क्वॅश खेळणे, आणि फोटोग्राफीची आवड आहे. ते एक लोकप्रिय फोटोब्लॉग देखील चालवतात, जिथे ते त्यांच्या छायाचित्रांद्वारे स्वतःचे विचार मांडतात.
2013 मध्ये भाविश आणि Ola ला दक्षिण आशियाच्या mBillionth पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हा पुरुस्कार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्कृष्टता दर्शवणाऱ्या स्टार्टअप्सना दिला जातो, त्याच वर्षी, Internet and Mobile Association of India (IAMAI) द्वारे Ola ला वर्षातील सर्वोत्कृष्ट स्टार्टअप म्हणून गौरवण्यात आले. 2017 मध्ये, द इकॉनॉमिक टाइम्सने भाविश अग्रवाल यांना त्यांच्या नेतृत्वाच्या कौशल्यासाठी ET सर्वोत्कृष्ट आणि तेजस्वी पुरस्काराने सन्मानित केले.
या व्यतिरिक्त भाविश उत्तम गुंतवणूकदार, व्याख्याते आणि उत्तम छायाचित्रकार सुद्धा आहेत. ते नवीन उद्योजकांना नेहमीच प्रोत्साहन देत असतात. त्यांनी बऱ्याच नवीन स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. ज्यात ओव्हा, कार्किनोस ऑफ बिझनेस, सुपरसूट, टॉर्क मोटर्स, हॅशलर्न अशी काही उदाहरणं देता येतील. उद्योगात आणि समाजसेवेतील त्यांच्या यशाव्यतिरिक्त, भाविश एक वक्ते आणि लेखक म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी अनेक मंचांवर आपल्या विचारांचे आदानप्रदान केले आहे आणि उद्योजकतेबद्दल अगणित लेख लिहिले आहेत.
आज, भाविश आपल्या नवीन उपक्रमाच्या दिशेने लक्ष केंद्रित करत आहेत. आपल्या साहसी मनासह, त्यांनी अक्षय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान बदल आणि वाढत्या ऊर्जेच्या गरजा या जगासमोरील सर्वांत महत्त्वाच्या आव्हानांपैकी आहेत आणि भाविश या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय विकसित करण्याबद्दल वचनबद्ध आहेत. भाविश म्हणतात, “मला विश्वास आहे की अक्षयऊर्जा ही भविष्याची गरज आहे आणि या क्षेत्रात भरीव योगदान देणे हे माझे ध्येय आहे.
तसेच ते तरुणांना यशाचा मूलमंत्र देताना म्हणतात की, ”वेगवेगळ्या प्रकारच्या घटना सगळ्यांच्या आयुष्यात घडत असतात. पण त्या घटनांमधून काहीतरी शिकून, त्यांना आपल्या प्रयत्नांच्या रूपात बदलायचे असेल, तर तुमची पूर्ण मेहनत आणि समर्पण लागेल. एक दिवस, यश नक्कीच तुमच्या पायाशी असेल.” भाविश अग्रवाल यांचा हा प्रवास कठोर मेहनत, समर्पण आणि नवनिर्मितीच्या शक्तीचा पुरावा आहे.
सध्या उद्योगजगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, टेलिग्राम मेसेजिंग प्लॅटफॉर्मचे संस्थापक पावेल दुरोव यांना फ्रान्समध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेवर टेक जगतातील अनेक दिग्गजांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामध्ये इलोन मस्क आणि इथेरियमचे संस्थापक विटालीक बुटेरीन यांनी X (ट्विटर) वर ट्विट करत आपला विरोध नोंदवला आहे.
पोलिसांचा दावा आहे की टेलिग्रामवर क्रिमिनल अॅक्टिव्हिटीजला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आहे. तथापि, टेलिग्रामकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही टिप्पणी आलेली नाही. याशिवाय, दुरोवच्या अटकेवर फ्रेंच मंत्रालय आणि पोलिसांकडून सध्या कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
या पार्श्वभूमीवर, रशियन सरकारच्या दडपशाहीला न जुमानता देश सोडून टेलिग्रामच्या माध्यमातून आपले स्वतंत्र तंत्रज्ञान विश्व निर्माण करणारे पावेल दुरोव यांच्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया.
पावेल दुरोव कोण आहेत?
पावेल दुरोव हे ३९ वर्षीय रशियन उद्योजक असून त्यांनी २०१३ मध्ये टेलिग्राम अॅपची स्थापना केली. याआधी त्यांनी २००६ मध्ये ‘व्हीकोंटाक्टे’ नावाचं रशियन फेसबुकसारखं सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म सुरू केलं होतं. मात्र, रशियन सरकारसोबत मतभेद झाल्यानं त्यांनी २०१४ मध्ये रशिया सोडून VK (व्हीकोंटाक्टे) मधील आपला हिस्सा विकला आणि टेलिग्राम सुरू केलं. टेलिग्राम हे अॅप युजर्सच्या गोपनीयतेला प्राधान्य देतं. यातील संदेश एन्क्रिप्टेड असल्यानं ते सुरक्षित असतात. त्यामुळे अल्पावधीतच टेलिग्रामने मोठी लोकप्रियता मिळवली. आज जगभरात कोट्यवधी लोक हे अॅप वापरतात.
२०१३ मध्ये पावेल दुरोव यांनी टेलिग्राम हे मेसेजिंग अॅप लॉन्च केलं. एन्क्रिप्टेड मेसेजिंग फीचर्सच्या माध्यमातून युजर्सची प्रायव्हसी जपत, हे अॅप लवकरच लोकप्रिय झालं. काही काळातच व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम,फेसबुक, टिकटॉक आणि वीचॅट सारख्या प्लॅटफॉर्मसाठी टेलिग्राम एक प्रभावी स्पर्धक ठरलं. सध्या जगभरात कोट्यवधी लोक हे अॅप वापरत आहेत आणि पुढील वर्षभरात हे अॅप एक अब्ज सक्रिय मासिक युजर्सचा टप्पा पार करेल, असा अंदाज आहे.
टेलिग्राम रशिया, युक्रेन आणि सोव्हिएत रशियातील इतर राज्यांमध्ये विशेषतः प्रभावी आहे. या अॅपने त्या भागात महत्त्वपूर्ण माहिती स्त्रोत म्हणून स्थान मिळवलं आहे, विशेषत: युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या संदर्भात. युक्रेन आणि रशियन अधिकारी मोठ्या प्रमाणात या प्लॅटफॉर्मचा वापर करत असून भारतात सुद्धा लाखो युजर्स विशेषतः स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी टेलिग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.
आव्हानं आणि यश
रशिया सोडल्यानंतर दुरोव यांनी अनेक देशांत भ्रमंती केली आणि अखेर दुबईत स्थायिक झाले. सध्या तिथेच टेलिग्रामचं मुख्यालय आहे. २०२१ मध्ये त्यांनी फ्रान्सचं नागरिकत्व घेतलं, तसेच ते संयुक्त अरब अमिराती आणि सेंट किट्स अँड नेव्हिसचेही नागरिक आहेत.२०१८ मध्ये रशियाने टेलिग्रामवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला, पण दुरोव यांनी युजर्सच्या प्रायव्हसीसाठी सरकारला संदेश देण्यास नकार दिला. यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं, पण युजर्सचा पाठिंबा कायम राहिला
पावेल दुरोव यांची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे – ते कोणत्याही दबावाला न झुकता युजर्सची प्रायव्हसी जपण्यावर भर देतात. त्यांच्या या तत्त्वावर टेलिग्रामची उभारणी झालेली आहे, ज्यामुळे आज जगभरात ते एक महत्त्वपूर्ण संवाद माध्यम बनलं आहे.