Blog

  • ‘मार्केटिंग’ म्हणजे काय आणि मार्केटिंगचे प्रकार

    ‘मार्केटिंग’ म्हणजे काय आणि मार्केटिंगचे प्रकार

    इंटरनेटच्या आधारे चालणाऱ्या या माध्यम स्वरूपात काही क्षणांमध्ये अनेक लोकांपर्यंत पोहोचता येतं. तुमचा व्यवसाय काय आहे, कोणासाठी आहे, त्याची किंमत काय इत्यादी सर्व महत्वाच्या गोष्टी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं हे एक सर्वोत्तम साधन म्हणावं लागेल. सोशल मीडियाच्या मदतीने व्यवसाय वाढवत असताना मार्केटिंग स्ट्रॅटेजी पक्की असली पाहिजे असं म्हणतात, मात्र मार्केटिंग म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय? हे जाणून घेऊया…

    मार्केटिंग म्हणजे काय?

    एखादा विक्रेता जेव्हा त्याच्याजवळ असलेल्या सेवा आणि उत्पादनांचा प्रचार करतो तेव्हा त्याला मार्केटिंग करणं असं म्हणतात किंवा आपला ग्राहकवर्ग कोणता आहे, त्यांची गरज काय आहे हे ओळखून त्यांना आपल्या उत्पादनांकडे आकर्षित करणं याला मार्केटिंग म्हटलं जाऊ शकतं. तुमच्याजवळ असलेली वस्तू ग्राहकांच्या मनात उतरावी, त्यांच्या पसंतीस यावी आणि त्यांना वाटावं की आपली गरज इथेच पूर्ण होऊ शकते आणि त्यांना ती खरेदी करण्याची इच्छा व्हावी म्हणजेच सोप्या शब्दांत मार्केटिंग होय. वर्तमानपत्रांमध्ये तुम्ही जाहिराती पाहिल्याच असतील जिथे डोळ्यांना भावणाऱ्या शब्दांमध्ये प्रॉपर्टीची जाहिरात केली जाते. ती जाहिरात वाचून आपल्या मनात देखील असंच एखादं घर असावं अशी इच्छा निर्माण होते आणि यालाच आपण मार्केटिंगची जीत म्हटली पाहिजे. 

    960x0 1

    व्यवसाय म्हटलं की मार्केटिंग हा त्याचा अविभाज्य भाग ठरतो, कारण मार्केटिंगमध्ये एखादा उपक्रम यशस्वी बनवण्याची किंवा मुळापासून उखडून टाकण्याची ताकद असते. यामध्ये सर्वात अगोदर तुम्ही वावरत असलेल्या बाजाराचा अभ्यास केला जातो, या अभ्यासामधून ग्राहकांची गरज ओळखायला मदत होते आणि सोबतच आपले प्रतिस्पर्धी कोण आहेत याचं ढोबळ चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. हा अभ्यास झाल्यानंतर आपण कोणत्या गोष्टी विकणार आहोत, त्याची किंमत किती असेल, त्याचं पॅकेजिंग कसे असेल, देवाण-घेवाणीमधून आपण जास्तीत जास्त विक्री करून महसूल कसा उभा करू शकतो याची आखणी केली जाते. 

    मार्केटिंगमधल्या 4Ps कोणत्या?

    १) Product: कोणत्याही प्रकारचे मार्केटिंग कॅम्पेन सुरु करण्याअगोदर विक्रेत्याला तो विकत असलेल्या वस्तू किंवा सेवेबद्दल माहिती असली पाहिजे, कारण संपूर्ण कॅम्पेन याच उत्पादन किंवा सेवांवर अवलंबून असते. आपण विकत असलेल्या वस्तू ग्राहकांना कशाप्रकारे मदत करतील, आपण बाजाराची गरज पूर्ण करणारी वस्तू बाजारात विकत आहोत का याची माहिती विक्रेत्याला असली पाहिजे. 

    २) Price: विक्रेता विकत असलेल्या वस्तूची किंमत म्हणजे प्राईस. यामध्ये युनिटची किंमत, वितरणाचा खर्च, विपणनाचा खर्च इत्यादी घटक ग्राह्य धरले जातात. ग्राहकांकडून त्या वस्तूसाठी किती प्रमाणात मागणी आहे किंवा प्रतिस्पर्धी तीच वस्तू कोणत्या किमतीत विकतोय यांवर वस्तूची किंमत ठरते. 

    ३) Place: विक्रेता उत्पादन किंवा सेवा कशाप्रकारे ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहे याचा विचार देखील विपणनात केला जातो. आधी बऱ्यापैकी वस्तूंची विक्री प्रत्यक्षात व्हायची, मात्र आता सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या जगात ऑनलाईन देखील वस्तू विकल्या जातात. 

    ४) Promotion: विक्रेता विकत असलेली वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे प्रमोशन. जाहिरात, जनसंपर्क, सोशल मीडिया इत्यादींच्या मदतीने वस्तूंचा प्रचार केला जातो. 

    मार्केटिंगचे प्रकार किती आहेत?

    १) ब्लॉग मार्केटिंग: संबंधित ग्राहकांपर्यंत ब्लॉगिंगच्या माध्यमातून आवश्यक माहिती पोहोचवणे म्हणजे ब्लॉग मार्केटिंग होय. यामध्ये विक्रीसाठी निवडलेल्या वस्तूंची विशिष्ट माहिती दिली जाते. 

    २) इंटरनेट मार्केटिंग: आजच्या जगात अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इंटरनेटशिवाय चांगला पर्याय उपलब्ध नाही आणि म्हणूनच उत्तमरित्या इंटरनेटचा वापर करून विपणन केल्यास आर्थिक फायदा होऊ शकतो. 

    ३) प्रिंट मार्केटिंग: आपण जरी इंटरनेटच्या युगात वावरत असलो तरीही वर्तमानपत्र आणि मासिकांचा वाचकवर्ग आजही अफाट आहे आणि परिणामी लक्षवेधी छायाचित्रे, दर्जेदार लिखाण केल्यास वाचकांच्या मनात जागा निर्माण करता येते. 

    ४) सोशल मीडिया मार्केटिंग: सोशल मीडियाचा वापर किती प्रमाणात केला जातो याबद्दल विशेष काही नमूद करण्याची गरज नाही. लाखो, कोट्यवधी लोकं दर दिवशी हातात मोबाईल घेऊन वावरत असतात आणि म्हणूनच तांत्रिक जगात वावरत असताना सोशल मीडिया मार्केटिंग हा पर्याय उपयुक्त ठरतो. Instagram, Facebook, Twitter  यांसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ग्राहकांना आकर्षित करण्यात मदत करतात. 

    ५) व्हिडिओ मार्केटिंग: कदाचित तुम्हाला सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेल्या ‘Reels’ बद्दल माहिती असेल. व्हिडीओ मार्केटींगद्वारे अगदी ३० सेकंदांमध्ये अत्यावश्यक माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाऊ शकते आणि तांत्रिक घटकांमुळे अधिक आकर्षकदृष्ट्या आपली गोष्ट मांडता येते. 

    ६) SEO मार्केटिंग: Pay-Per-Click या संकल्पनेवर आधारित चालणाऱ्या या उपक्रमात स्पर्धात्मक जगात वावरणाऱ्या इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या पुढे स्वतःला ठेवण्यासाठी सर्च इंजिनला पैसे दिले जातात. वाचकांनी अधिकाधिक लक्ष द्यावे, कंपनीची साईट उघडून बघावी म्हणून SEOची प्रक्रिया वापरली जाते. 

    मार्केटिंगची मदत घेतल्यामुळे तुम्ही कोणती उत्पादने विकत आहात याची सविस्तर माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात मदत मिळते. जास्तीत-जास्त लीड्स मिळवल्यामुळे दीर्घकाळासाठी ब्रॅण्डची विक्री वाढते. सध्या आपण शर्यतीच्या जगात वावरत आहोत. जिथे मार्केटिंगमधून मिळणाऱ्या मदतीची गरज सर्वाधिक आहे. अनेकवेळा तुम्ही मार्केटिंगच्या मदतीने स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करू शकता, ज्यामधून नफा वाढतो.

    आणखीन वाचा:

  • यशस्वी जीवनाचा मूलमंत्र; चिकाटी आणि सातत्य

    यशस्वी जीवनाचा मूलमंत्र; चिकाटी आणि सातत्य 

    एखादं लहान मूल जेव्हा जन्माला येतं, तेव्हा ते लगेच चालायला शिकत नाही. अनेकदा चालण्याच्या प्रयत्नात ते धडपडतं, पण पडल्यावरदेखील ते चालणं सोडत नाही. सरतेशेवटी त्याच्या प्रयत्नांना यश मिळतं आणि ते मूल चालायला शिकतं. त्या लहान मुलाला कोणी चालण्याचे धडे दिलेले असतात का? तर नाही. ते स्वतःच शिकतं आणि प्रयत्न करायला लागतं. सांगायचं काय, ‘तर केलं तर नक्की होतं.’ process खूप महत्वाची आहे. त्या process मध्ये टिकून राहणं त्याहून जास्त महत्वाचं. जो थांबणार त्याचा शेवट निर्विवाद आहे आणि जो टिकून राहणार, त्याचं यश सुद्धा हमखासच. टिकून राहणं आणि करत राहणं एवढीच समज घ्यायची. आयुष्याचा प्रवास, यशाचा प्रवास हा कमी अधिक प्रमाणात सारखाच. वेगळं काय तर प्रवासाचे टप्पे आणि येणारे थांबे. फक्त करत राहायचं आणि लढत राहायचं. 

    image

    कोणत्याही कामात सातत्य ठेवण्याची काही महत्त्वाचे कारणे आहेत :

    प्रगती: सतत प्रयत्न केल्याने आपण हळूहळू, परंतु निश्चितच प्रगती करतो. सातत्यामुळे आपल्याला आपल्या कामात सुधारणा दिसून येतात. आपणच आपल्यात बदल अनुभवतो. 

    निपुणता: सातत्याने एकाच कामात गुंतलेले राहिल्यास त्या क्षेत्रात निपुणता आणि कौशल्य वाढते. त्या कामाचं सुयोग्य तंत्र आपल्या लक्षात येते आणि ते काम आपल्या अंगवळणी पडतं.

    आत्मविश्वास: नियमितपणे प्रयत्न केल्याने आत्मविश्वास वाढतो, कारण यशाची शक्यता वाढते आणि आपण आपली क्षमता ओळखतो. ते काम आपण करू शकतो हा विश्वास आपल्याला वाटतो.

    अनुकूलता: सातत्याने काम केल्याने मन आणि शरीर त्या कामाशी अनुकूल होते, ज्यामुळे कामात वेग येतो आणि कार्यक्षमतेत वाढ होते. कामाचा वेग आणि अचूकता अधिकाधिक वाढते.

    लक्ष्य प्राप्ती: सातत्यामुळे आपण आपल्या ठरवलेल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याची शक्यता अधिक असते. आपल्याला आपलं ध्येय अधिकाधिक जवळ दिसू लागतं. त्या ध्येयप्राप्तीची खात्री वाटू लागते.  

    समयसूचकता : नियमितपणे आणि सातत्याने काम केल्याने वेळेत काम पूर्ण करण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे इतर कामांसाठी वेळ उपलब्ध होतो. आपण स्वत: आपली personal life आणि corporate life मध्ये प्रामाणिक आणि punctual राहायला लागतो. 

    कौशल्य विकास : सातत्यामुळे आपण आपले कौशल्यं आणि तंत्र अधिकाधिक सुधारू शकतो. नियमित सराव आणि प्रयत्न केल्याने कोणत्याही गोष्टीत निपुणता मिळते.

    ध्यान आणि एकाग्रता : सातत्यामुळे आपल्या कामावर लक्ष केंद्रित राहते. मन एकाग्र होते. यामुळे विचलित न होता आपले उद्दिष्ट साध्य करण्याची क्षमता विकसित होते.

    स्वयंशिस्त: सातत्याने काम केल्याने आपल्यात स्वयंशिस्त येते, काटेकोरपणा येतो. जी फक्त कोणतेही उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच नाही, तर आपले जीवन अधिक अनुशासित आणि परिणामकारक बनविण्यासाठी आवश्यक आहे.

    आत्मसंतोष: सातत्याने प्रयत्न करून जेव्हा आपण आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचतो, तेव्हा त्यातून मिळणारी आत्मसंतोषता आणि अतीव आनंद खूप महत्त्वाचा असते.

    image 1

    सातत्य ठेवल्यामुळे होणारे फायदे खालीलप्रमाणे : 

    आव्हानं ओळखण्याची क्षमता: सातत्याने काम करत राहिल्याने कोणत्या ठिकाणी अडचणी येतात किंवा समस्या उद्भवतात, हे ओळखणे सोपे होते. यामुळे त्या समस्यांवर उपाय शोधणे व त्या सोडविणे अधिक सोपे होते.

    दृढ इच्छाशक्ती: सातत्याने प्रयत्न करत राहिल्यामुळे इच्छाशक्ती मजबूत होते, जे अडचणींचा सामना करण्यासाठी महत्त्वाचे असते.

    संयम आणि सहनशीलता: सातत्य हे संयम आणि सहनशीलता वाढवते. यामुळे आपल्याला तात्काळ यश न मिळाल्यास निराश न होता पुढे जाण्याची प्रेरणा मिळते.

    शारीरिक व मानसिक आरोग्य: नियमित व्यायाम किंवा योगासारख्या सातत्याने केलेल्या गोष्टींमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते.

    विश्वासार्हता: सातत्यामुळे आपली विश्वासार्हता वाढते. इतर लोक आपल्यावर विश्वास ठेवतात आणि आपली जबाबदारी स्वीकारतात.

    दीर्घकालीन यश: सातत्य हे दीर्घकालीन यशाचा पाया बनते. सातत्याने मेहनत घेतल्यास आपण आपल्या क्षेत्रात दीर्घकालीन यश मिळवू शकतो.

    कुटुंब व समाजातील नाते: सातत्याने दिलेला वेळ आणि प्रयत्न कुटुंब व सामाजिक नात्यांना बळकटी देतो. नियमित संवाद आणि सहभागामुळे नाते अधिक घनिष्ट होते.

    चांगल्या सवयींची निर्मिती: सातत्याने काहीतरी करत राहिल्यामुळे चांगल्या सवयी निर्माण होतात, ज्या आपले जीवन सुधारण्यात मदत करतात.

    आणखीन वाचा

  • ऑलिम्पिक गाजवणारा बीडचा शिलेदार : अविनाश साबळे

    ऑलिम्पिक गाजवणारा बीडचा शिलेदार : अविनाश साबळे

    बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा गावातील एका साधारण शेतकरी कुटुंबात  १३ सप्टेंबर १९९४ ला जन्मलेल्या अविनाशची घरची परिस्थिती तशी जेमतेमच. त्याचे आई वडील वीटभट्टी कामगार होते. आईवडिलांचा संघर्ष आणि घरातील दारिद्र्य उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या अविनाशची स्वप्नं मात्र छोटी नव्हती. सुरुवातीच्या काळात त्याच्याकडे प्राथमिक सुविधा नसताना, त्याने विविध खेळांमध्ये भाग घेतला. अविनाशला लहानपणापासून धावण्याचा सराव होता. घरापासून शाळा लांब असल्याने तो धावत शाळेमध्ये जायचा.  ग्रामीण भागात संसाधनांची कमतरता असताना, अविनाशने मातीच्या रस्त्यावर आणि साध्या साधनांवर प्रशिक्षण घेतले. त्याच्या पदरी कित्येक वेळा निराशा आणि अपयश आले; पण त्याचा आत्मविश्वास आणि चिकाटीने त्याला कायम पुढे जाण्यासाठी प्रेरित केले. 

    अविनाशने आपल्या शालेय जीवनात धावण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्यात यशही मिळवले. १२ वी झाल्यानंतर तो भारतीय लष्करामध्ये भरती झाला. तिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आणि धावण्यासाठीप्रोत्साहित केले. २०१८ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अविनाशने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्य पदक जिंकले. त्यानंतर २०१९ साली जागतिक क्रीडा स्पर्धेत त्यांनी नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. 

    गरीब परिस्थितीचे चटके सोसत त्याने आज बीड ते पॅरिस ऑलिम्पिक असा संघर्षमय प्रवास पूर्ण केला. फायनलमध्ये पदक जरी मिळाले नसले तरी कोणत्याही प्रकारची खेळाची पार्श्वभूमी नसताना अविनाशने घेतलेली एवढी मोठी झेप ही निःसंशय कौतुकास्पद आहे. 

    मंजिल उन्हीं को मिलती है;
    जिनके सपनो में जान होती है; 
    पंख से कुछ नहीं होता; 
    हौंसलों से ही उड़ान होती है।

    जय हिंद

    आणखी वाचा:

  • भारताला अंतराळात घेऊन जाणारे शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. विक्रम साराभाई…

    भारताला अंतराळात घेऊन जाणारे शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. विक्रम साराभाई…

    आनंदाची बाब म्हणजे भारताने पुन्हा एकदा प्रगतीचा मार्ग पकडला आहे. वर्ष १९६३ मध्ये भारताकडून पाहिलं रॉकेट लॉंच करण्यात आलं होतं. तेव्हापासून ते आत्तापर्यंतच्या प्रवासात अनेक चढ-उतार सर करत आपण चांद्रयान-२ ची मोहीम यशस्वी करून दाखवली. प्रत्येक भारतीयासाठी चांद्रयानाची मोहीम श्वास रोखून धरणारीच होती. भारताच्या अंतराळ प्रवासात अनेक बुद्धिवंतांनी योगदान दिलं आणि यातीलच म्हत्त्वाचे नाव म्हणजे विक्रम साराभाई. एवढं महत्त्वाचं का? जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. 

    विक्रम साराभाई कोण आहेत?

    विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे (Indian Space Research Programme) जनक म्हणून ओळखलं जातं आणि आज विक्रम साराभाई यांची १०५वी जयंती आहे. वर्ष १९१९ मध्ये विक्रम साराभाई यांचा जन्म गुजरातमधील एका श्रीमंत कुटुंबात झाला. त्यांचे वडील अंबालाल साराभाई हे एक प्रसिद्ध उद्योगपती होते, तर आई सरला देवी मॉंटेसरी शिक्षण पद्धतीवर आधारित द रिट्रीट नावाची शाळा चालवायच्या. 

    विक्रम साराभाई यांच्या जन्माचा काळ पारतंत्र्याचा असल्याने त्यांच्या घरी सतत स्वातंत्र्यसैनिकांची ये-जा असायची, परिणामी महात्मा गांधी, रवीन्द्रनाथ टागोर, सरोजिनी नायडू, मौलाना आझाद यांच्याशी साराभाईंनी बालपणीच संवाद साधला होता. विक्रम साराभाई यांचं प्राथमिक शिक्षण घरीच झालं, सोबत अशा दिग्गजांचा सहवास लाभला म्हणूनच लहानग्या विक्रम यांच्यात देशभक्तीचं बाळकडू तेव्हाच रुजलं होतं.  

    कळत्या वयात अहमदाबादच्या गुजरात कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्चशिक्षणासाठी त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळवला आणि  १९३९ साली रसायन आणि भौतिकशास्त्रात पदवी मिळवल्यानंतर बी.ए. आणि एम.ए.च्या पदव्या देखील पदरात पडून घेतल्या. विक्रम साराभाई यांचा शैक्षणिक प्रवास मात्र इथेच थांबत नाही, दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी भारतात परतलेल्या विक्रम साराभाई यांनी वर्ष १९४० मध्ये पीएच. डी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून डॉक्टरेट मिळवली आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी ही पदवी डॉ. सी. व्ही. रमन यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली होती. 

    विक्रम साराभाई यांचा वैज्ञानिक प्रवास:

    वर्ष १९४७ रोजी भारत देश इंग्रजांच्या जुलुमी राजवटीतून मुक्त झाला आणि त्यानंतर विक्रम साराभाई यांच्या वैज्ञानिक प्रवासाची खरी सुरुवात देखील झाली. स्वतःच्या राहत्या घरातील एका खोलीमधून विक्रम साराभाई यांनी भौतिक संशोधन प्रयोगशाळेचा श्रीगणेशा केला होता. या जागेचे ऐतिहासिक महत्त्व देखील अपार आहे, कारण इथूनच अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे काम सुरु झाले होते. विक्रम साराभाई भौतिक प्रयोगशाळेची गरज जाणून होते, म्हणूनच मित्रांच्या आणि पालकांच्या साहाय्याने त्यांनी अहमदाबाद एज्युकेशन सोसायटीच्या एम्. जी. सायन्स इन्स्टिट्यूटमधे भौतिकशास्त्राची प्रयोगशाळा उभारली, हीच अहमदाबादची फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी होय. विक्रम साराभाई काही काळ इथे प्राध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळत होते आणि त्यानंतर संचालक म्हणून देखील कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रयोगशाळेमध्ये किरणविज्ञान, अवकाशविज्ञान आदींवर संशोधन केलं जायचं. 

    इस्रोची सुरुवात:

    कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण आज जगभरात नाव गाजवणाऱ्या ISRO ची सुरुवात विक्रम साराभाई यांनी वयाच्या २८व्या वर्षी केली होती. आपल्याला ज्या वयात नेमकं काय करिअर निवडावं याची खात्री नसते किंवा आपण तारुण्याच्या ओघात वहावत जात असतो. त्याच वयात साराभाईंनी ISROची निर्मिती केली होती. सरकार दरबारी पायऱ्या झिजवून, सरकारला भौतिकशास्त्राचे महत्त्व पटवून देत साराभाई यांनी भारतीय अंतराळ संशोधन समितीची (INCOSPA) निर्मिती केली, ज्याचे नाव पुढे बदलून भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच  ISRO असे करण्यात आले. 

    भारताकडून आर्यभट्ट नावाचा पहिला अंतरिक्ष उपग्रह अवकाशात सोडण्यात आला होता, ज्याची रचना अहमदाबाद रिसर्च सेंटरमध्ये करण्यात आली होती. आर्यभट्टच्या यशस्वी उड्डाणानंतर अनेक उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आणि या सर्वांमध्ये विक्रम साराभाई यांचा वाटा महत्वाचा होता. 

    vs photo 167 759 1

    पहिले रॉकेट लॉंच:

    वर्ष १९६३ मध्ये केरळमधील थुंबा नावाच्या गावातून चर्चची जमीन विकत घेण्यात आली, जिथे नंतर थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशनची (TERLS) स्थापना करण्यात आली. याच ठिकाणी भारताचं पहिलं रॉकेट लाँच करण्यात आलं होतं. आज याच लॉंचिंग स्टेशनला विक्रम साराभाई अंतराळ केंद्र म्हणून ओळखलं जातं. डॉ. अब्दुल कलाम देखील त्यांच्या यशाचे श्रेय डॉ. विक्रम साराभाई यांनाच देतात, डॉ. अब्दुल कलाम म्हणतात की, “मी शिक्षणात कधीच गुणवान नव्हतो. केवळ माझी मेहनत बघून डॉ. साराभाई यांनी मला पुढे जाण्याची प्रेरणा दिली.”

    विविध संस्थांची स्थापना:

    डॉ. विक्रम साराभाई यांनी विविध संस्थांच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट असो किंवा टेक्स्टाइल रिसर्च असोसिएशन साराभाई यांनी नेहमीच देशाला नवीन दिशा  दाखवण्याचा प्रयत्न केला. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) व्यतिरिक्त ऑपरेशन रिसर्च ग्रुप, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन आणि पत्नी मृणालिनी साराभाई यांच्या सहकार्याने त्यांनी दर्पण ॲकॅडमी फॉर परफॉर्मिंग आर्ट्सची स्थापना केली.

  • पुरेशी झोप घे रे पाखरा!

    पुरेशी झोप घे रे पाखरा!

    शरीराच्या योग्य कार्यासाठी आणि मानसिक संतुलनासाठी पुरेशी झोप अत्यावश्यक आहे. झोप कमी झाल्यास त्याचा आपल्या आरोग्यावर आणि कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पुरेशी झोप घेतल्याने ऊर्जा वाढते, एकाग्रता टिकवून ठेवता येते आणि मानसिक आरोग्य सुधारण्यात मदत होते.

    gettyimages 920554794 1 1558019750

    निरोगी जीवनशैलीसाठी झोपेचे महत्त्व अपार आहे. झोप ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी आपल्या शरीराला नवीन ऊर्जा प्रदान करते. मानवी शरीराला किमान ७ तास झोप आवश्यक असते, चांगली आणि पूर्ण झोप आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग झोपेच्या महत्त्वाबद्दल अधिक जाणून घेऊया.

    1. शारीरिक बांधणी 

    रात्रीच्या झोपेमध्ये आपल्या शरीराची एकप्रकारे पुनःबांधणी होते. हॉर्मोनल संतुलन राखणे, ताणतणाव कमी करणे, आणि शरीरातील पेशींना कार्यन्वित करणे हे झोपेमुळे शक्य होते. पुरेशी झोप न मिळाल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि रोगप्रतिकारक प्रणाली कमजोर होते.

    २. मानसिक स्वास्थ्य

    झोपेमुळे मेंदूला आराम मिळतो आणि नवीन माहिती आणि अनुभवांच्या प्रक्रियेत मदत होते. कमी झोपेमुळे तणाव, चिंता आणि डिप्रेशन यांसारख्या मानसिक आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. चांगली झोप मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक आहे, जी स्मरणशक्ती आणि निर्णयक्षमता सुधारण्यासाठी मदत करते.

    ३. भावनिक संतुलन

    good night sleep

    योग्य झोपेमुळे भावनिक संतुलन राखले जाते. झोप न मिळाल्यास चिडचिडेपणा, अस्वस्थता आणि भावनिक असंतुलनाची समस्या उद्भवते. योग्य झोपेमुळे भावनिक स्थिरता आणि आनंदाची भावना वाढते.

    ४. शारीरिक आरोग्य

    झोपेचा आपल्या शारीरिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. झोपेच्या अभावामुळे वजन वाढणे आणि मोटापा यांसारख्या समस्या उद्भवतात.

    ५. उत्पादनक्षमता आणि कार्यक्षमता

    चांगली झोप आपली उत्पादनक्षमता आणि कार्यक्षमता वाढवते. नीट झोप घेतल्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणे, निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे सोपे होते. झोपेच्या अभावामुळे कार्यक्षमतेत घट येते आणि चुका होण्याची शक्यता वाढते.

    ६. रोगप्रतिकारक शक्ती

    झोपेमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. नीट झोप घेतल्याने सर्दी, खोकला आणि इतर संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होतो. कमी झोपेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते आणि आपण लवकर आजारी पडतो.

    ७. त्वचेचे आरोग्य

    चांगली झोप आपली त्वचा ताजेतवानी आणि निरोगी ठेवते. झोपेच्या अभावामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे, त्वचेवर सुरकुत्या आणि मुरुमांसारख्या समस्या उद्भवतात.

    मित्रांनो चांगली झोप आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी पुरेशी आणि गुणवत्तायुक्त झोपेची गरज आहे. पुरेशा  झोपेमुळे आपण निरोगी, ताजेतवाने जीवन जगू शकतो.

  • आर्थिक स्वातंत्र्याची पहिली पायरी: आर्थिक ध्येयनिश्चिती

    आर्थिक स्वातंत्र्याची पहिली पायरी: आर्थिक ध्येयनिश्चिती  

    याच विषयावर आज आपण बोलणार आहोत, की नेमकं आर्थिक ध्येय म्हणजे काय? आणि हे आर्थिक ध्येय कसं ठरवायचं? 

    आर्थिक ध्येय म्हणजे आर्थिक स्वप्न किंवा उद्दिष्टे जे तुम्ही तुमच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी किंवा साध्य करण्यासाठी ठरवता. हे ध्येयं तुम्हाला तुमचे आर्थिक निर्णय घेण्यात मदत करतात आणि तुमच्या भविष्याच्या योजना निश्चित करण्यात मदत करतात. 

    image 2

    आर्थिक ध्येयांमध्ये खालील गोष्टींचा समावेश असू शकतो :

    1. Savings: विशिष्ट रक्कम सेव्ह करणे.

    2. निवृत्ती नियोजन: निवृत्तीनंतरच्या आपल्या खर्चांसाठी निधी जमा करणे.

    3. कर्ज फेडणे: कर्जमुक्त होण्यासाठी ठराविक वेळेत कर्ज फेडणे.

    4. घर खरेदी: प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आयुष्यात एकदा तरी आपलं स्वतःचं  घर व्हावं. स्वतःचे घर खरेदी करणे हे नक्कीच एक चांगलं आर्थिक ध्येय असू शकतं. 

    5. आपत्कालीन निधी: अडचणी कधीच सांगून येत नाहीत. कधी कोणती परिस्थिती समोर उभी राहील याचा आपण अंदाज लावू शकत नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत उपयोगात येणारा निधी तयार करणे गरजेचे आहे. 

    6. शिक्षण: स्वतःच्या किंवा मुलांच्या शिक्षणासाठी निधी जमा करणे.

    7. गुंतवणूक: संपत्ती वाढवण्यासाठी विविध ठिकाणी गुंतवणूक करणे.

    आर्थिक ध्येय असणे तुम्हाला तुमच्या आर्थिक वाटचालीसाठी एक स्पष्ट दिशा देतं आणि तुम्हाला त्वरित निर्णय घेण्यासाठी सहाय्यक ठरतं.

    आर्थिक ध्येयांचे अधिक तपशीलवार उदाहरणे आणि महत्त्व समजून घेण्यासाठी खालील मुद्दे विचारात घेता येऊ शकतात

    finance

    आर्थिक ध्येयांचे प्रकार :

    1. लघुकालीन ध्येये (Short-term Goals) :

    • महिन्याकाठी बचत: दर महिन्याला ठराविक रकमेची बचत  करणे.
    • कर्जाची नियमित हप्त्यांनी परतफेड: क्रेडिट कार्ड बिल, वैयक्तिक कर्ज किंवा शैक्षणिक कर्जाची हप्त्यांनी फेड करणे.
    • आपत्कालीन निधी निर्माण: आकस्मिक खर्चांसाठी निधी तयार ठेवणे.

    2. मध्यमकालीन ध्येये (Medium-term Goals) :

    • वाहन खरेदी: काही वर्षात नवीन किंवा वापरलेले वाहन खरेदी करणे.
    • शिक्षण खर्च: स्वतःच्या किंवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी निधी गोळा करणे.
    • घरगुती सुधारणा: घराच्या देखभाल, दुरुस्ती किंवा सजावटासाठी निधी जमा करणे.

    3. दीर्घकालीन ध्येये (Long-term Goals) :

    • निवृत्ती नियोजन: निवृत्तीनंतरच्या खर्चांसाठी दीर्घकालीन गुंतवणूक योजना तयार करणे.
    • घर खरेदी किंवा बांधकाम: आपले स्वतःचे घर खरेदी करणे किंवा बांधणे.
    • वारसा योजना: मुलांसाठी, नातवंडांसाठी किंवा परोपकारी कार्यांसाठी संपत्ती राखणे.

     आर्थिक ध्येयांचे महत्त्व :

    • आर्थिक शिस्त: आर्थिक ध्येय ठरवल्याने आपल्याला खर्चावर नियंत्रण मिळवता येते आणि बचतीसाठी प्रेरणा मिळते.
    • निश्चिंतता: ध्येयांची पूर्तता केल्यामुळे भविष्यातील अनिश्चितता कमी होते आणि मानसिक शांतता मिळते.
    • प्रगतीचे मापन: आपले आर्थिक प्रगती किती झाली आहे हे आपल्याला  मोजता येते.
    • प्राथमिकता निश्चिती: कोणते खर्च महत्त्वाचे आणि कोणते टाळता येतात हे ओळखता येते.
    • Financial Planning : आर्थिक ध्येयांमुळे योजनाबद्ध गुंतवणूक आणि बचत करण्यास मदत होते.
    1683308255213

     आर्थिक ध्येय कसे ठरवावेत:

    • करता येण्याजोगे : ध्येय वास्तववादी आणि साध्य करता येण्याजोगे असावे.
    • Relevant: ध्येय आपल्या आयुष्याशी संबंधित आणि महत्त्वाचे असावे.
    • Time-bound (कालबद्ध): ध्येय साध्य करण्यासाठी ठराविक वेळ आणि काळ निश्चित करणे.

    2. प्राथमिकता ठरवा : तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांनुसार ध्येयांची प्राथमिकता ठरवा व त्यानुसार त्यांच्या पूर्ततेला सुरुवात करा. 

    3. गुंतवणुकीची योजना : ध्येय साध्य करण्यासाठी योग्य गुंतवणूक योजना ठरवा.

    4. सल्ला घ्या : आर्थिक तज्ञांचा तसेच या क्षेत्रात सखोल माहिती आणि ज्ञान असणाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या आणि तुमच्या ध्येयांसाठी योग्य आर्थिक साधनांचा वापर करा.

    आणखी वाचा :

  • स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर क्रांतिदिनाचे महत्त्व काय?

    स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर क्रांतिदिनाचे महत्त्व काय?

    भारत आणि भारताचा  स्वतंत्रता संग्राम येणाऱ्या अनेक वर्षांसाठी प्रत्येकाच्या मनात घर करून राहील असा दैदिप्यमान आहे. भारताला परकीयांच्या जाळातून मोकळं करण्यासाठी कित्येक आहुती स्वातंत्र्य देवतेच्या यज्ञ कुंडात अर्पण झाल्या आणि त्यानंतर मिळालं ते आज आपण उपभोग घेत असलेलं स्वातंत्र्य. भारताच्या इतिहासातील या पर्वाचे अनेक टप्पे आणि कोपरे आहेत आणि आज आपण यातीलच क्रांती दिवसाचं पान उलघडणार आहोत… 

    आपण क्रांती दिवस का साजरा करतो?

    भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात डोकावण्याआधी आपण इतिहास म्हणजे काय हे जाणून घेऊया. इतिहास या शब्दाची संस्कृत भाषेत अतिशय उत्तम फोड करण्यात आली आहे, इति-ह-आस इति इतिहास शब्दः म्हणजेच काय तर जे घडलं, जसं घडलं त्याची मांडणी म्हणजे इतिहास होय. भारताचा इतिहास खूपच जुना आहे, प्रत्येक टप्प्यावर हा इतिहास बदलत जातो आणि प्रत्येकाचं स्वतःचं असं एक महत्व आहे. पैकी एक म्हणजे भारताचा स्वातंत्र्यसंग्राम. परकीयांच्या आक्रमणानंतर स्वतःच्याच भूमीत माणसं दबली जात होती आणि हीच राजवट दूर करण्यासाठी भारतीयांनी स्वतंत्रता मोहीम सुरु केली, यात अनेक ज्ञात-अज्ञात कुटुंब पणाला लागली, कितीतरी चुली कायमच्या विझल्या गेल्या. 

    भारत स्वतंत्रता संग्रामाचे दोन विभाग पडतात, एक म्हणजे अहिंसावादी आणि दुसरा हिंसावादी. वेगळ्या शब्दांत मांडायचं तर सशस्त्र क्रांती आणि विनाशस्त्र क्रांती. दोन वेगळ्या विचारांची ही माणसं जरी त्या-त्या विचारसरणीला धरून लढत असली तरीही त्यांचा उद्देश मात्र एकच होता. अहिंसावादी गटाचे नेतृत्व महात्मा गांधी करायचे. गांधीजींच्या मते हातात शस्त्र घेऊन केलेल्या युद्धात अनेक निष्पाप बळी जात असत. ते नेहमी म्हणायचे की अस्त्र-शस्त्राविना देखील क्रांती घडवता येते आणि म्हणून त्यांनी मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन असे कैक मार्ग देखील स्वीकारले होते. यापैकी भारत छोडो आंदोलन हे महात्मा गांधींकडून उचलण्यात आलेलं सगळ्यात शेवटचं पाऊल होतं. 

    आजच्या दिवशीच म्हणजे 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनात सदर आंदोलनाची घोषणा केली होती. गांधीजींकडून इंग्रजांना हद्दपार करण्यासाठी केलेला हा सर्वात मोठा प्रयत्न म्हटला जातो, कारण यावेळी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकासाठी हा क्षण ‘करो या मरो’ असाच होता. देशभरातून महात्मा गांधींना प्रचंड प्रतिसाद मिळाला. भारतीय लोकं त्याकाळी महात्मा गांधींना एका नेत्याच्या रूपात पाहायचे, गांधीजी एखादी गोष्ट सांगतायत म्हणजे ती बरोबरच असेल याची त्यांना खात्री वाटायची. एकार्थी काय तर गांधीजी भारतीयांसाठी अंधारात दिसणाऱ्या दिव्याप्रमाणे होते आणि म्हणून लोकांनी दरवेळीप्रमाणे या वेळी देखील गांधीजींना सोबत केली.

    भारत छोडो आंदोलनात अरुणा असफ अली यांची भूमिका फारच महत्वाची ठरते. त्याकाळी अरुणाबाई भूमिगत होऊन वावरत होत्या आणि सदर आंदोलनात त्यांनी देशातील तरुणांना एकत्र करत आंदोलनाचा भाग बनवलं होतं. एवढंच नाही तर अरुणाबाईंनी या आंदोलनात गोवालिया टँक मैदानावर भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याचे धाडस केलं होतं. अरुणा असफ अली यांच्या धाडसी स्वभावामुळे आजही ग्रँड ओल्ड लेडी म्हणत त्याच्या कार्याचा गौरव केला जातो. 

    193957 rgergerg

    भारतमातेला परकीयांच्या जुलुमापासून मुक्त करण्यासाठी उठलेल्या लाटेला रोखणं इंग्रजांसाठी कठीण झालं होतं आणि म्हणूनच चळवळीस सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींसह काँग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी ‘9 ऑगस्ट’ हा ‘ क्रांती दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

  • Friendship Day : एक दिवसाचं सेलिब्रेशन, आयुष्यभराची सोबत!

    Friendship Day : एक दिवसाचं सेलिब्रेशन, आयुष्यभराची सोबत!

    माणसाच्या याच भावनिक गरजेमुळे जन्म होतो नाते-संबंधांचा. आणि घरच्या मंडळींसोबत असलेला हाच दुवा पुढे मित्र-मैत्रिणींसह जपला जातो. मैत्रीचं नातं जरी जन्मापासून निर्माण झालं नसलं, तरीही जन्मभरासाठी जपता येतं आणि जपलं देखील जातं. मैत्रीच्या नात्याचं छोटंसं सेलिब्रेशन म्हणजे मैत्री दिवस किंवा फ्रेन्डशिप डे. तुमचा देखील कोणीतरी खास मित्र असेलच ना, ज्याच्यासोबत तुम्ही हा दिवस घालवणार आहात. मात्र आपण मैत्री दिवस का साजरा करतो? मैत्री तर आयुष्यभरासाठी असते, मग केवळ एका दिवसाचा आनंद का? चला जाणून घेऊया…

    फ्रेन्डशिप डे का साजरा केला जातो?

    फ्रेन्डशिप डे (Friendship Day) हा मैत्रीचा दिवस आहे, दोन मित्रांमधील नातं साजरं करण्याचा दिवस. भारतात आपण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा करतो. मग त्यात मित्रांसोबत घेतलेला एक घोट चहा असेल किंवा मोठाल्या हॉटेलमध्ये पार्टी, महत्त्वाचं काय, तर मित्रांसोबत वेळ घालवणं. आता तुम्ही असं म्हणाल की मैत्री ही दररोज निभवायची असते, मग एका दिवसाचं सेलीब्रेशन का? एकमेकांच्या आधारासाठी कृतज्ञता व्यक्त करणं, समोरचा व्यक्ती आपल्यासाठी किती महत्वाचा आहे याची जाणीव करून देण्यासाठी एखादा खास दिवस हवाच. नाही का? कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण जगभरात वेगवेगळ्या दिवशी मैत्रीचा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांमध्ये (United Nations) मध्ये ३० जुलै, तर मेक्सिकोमध्ये १४ फेब्रुवारी आणि सिंगापूरमध्ये एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मैत्री दिवस साजरा केला जातो. दिवस वेगळे असले, तरी त्यामागे असलेला उद्देश मात्र बदलत नाही.

    हॉलमार्क कार्ड्सचे संस्थापक जॉयस हॉल यांनी मैत्री दिवसाची सुरुवात दोन मित्रांमधील नातं खुलवण्यासाठी केली होती. जॉयस हॉलच्या याच सिद्धांतचा पुढे स्वीकार करण्यात आला आणि अशाप्रकारे मैत्री दिवसाची सुरुवात झाली.  दोन देशांमधले संबंध सुधारावेत, शांतता प्रस्तापित व्हावी म्हणून या दिवसाला महत्व दिलं जाऊ लागलं. मात्र तुम्हाला माहिती आहे का? कित्येक वर्षांपासून सुरु असलेली मैत्री दिवसाची ही परंपरा अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखली जाऊ लागली आहे. वर्ष 2011 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने (United Nations General Assembly) 30 जुलै हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून घोषित केला. विविध लोकं, देश आणि संस्कृती यांच्यामध्ये शांततेचे संबंध निर्माण व्हावे आणि परस्परांमध्ये एक आपुलकीचा धागा निर्माण व्हवा म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेत हा निर्णय घेण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व संस्कृतींना समान आदर मिळावा, त्यांचा विविधतेसह स्वीकार व्हावा म्हणून मैत्री दिवस साजरा केला जातो. 

    मैत्रीचे महत्व काय?

    आपल्या आयुष्यात नाते संबंधांचे खरोखर महत्व आहे का? वरती उल्लेख केल्याप्रमाणे कुणीतरी आपले विचार समजून घ्यावे, आपल्याला गटाचा भाग बनवून घ्यावं असं प्रत्येकाला वाटतं आणि ही आपली मानसिक गरज आहे. घरच्या चौकटीत बांधलेलं असताना कुणी आपल्याला दूर लोटण्याचे किंवा समजून न घेण्याचे प्रसंग उद्भवत नाहीत, मात्र एकदाका घरचा उंबरा ओलांडला की बाहेरच्या जगाशी जुळवून घेताना कुणीतरी आपल्यासोबत असावं अशी मानसिक भूक निर्माण होते. परिणामी शाळेत गेलेलं मूल ‘माझ्या आवडीचा खेळ खेळणारं इथे कोण असेल?’  याचा विचार करू लागतं. माणसाचे विचार जुळले म्हणजे आवडी-निवडी उलगडून बघता येतात आणि यातूनच मैत्रीचं नातं तयार होतं, खुलतं आणि बहरू लागतं. 

    भले या नात्यात असलेली दोन लोकं जन्मापासून एकत्र नसतील, मात्र वेळेसोबत जोडली गेलेली ही नाळ दिवसेंदिवस घट्ट होते. मैत्री म्हटलं की कट्ट्यावरच्या गप्पा, चहाचा एक कप, संध्याकाळचा खेळ, गाडीवरून मारलेल्या फेऱ्या आणि “माझ्या मित्राला बाईंनी बाहेर ठेवलंय म्हणून मी पण बाहेर जाणार” याचा अट्टाहास. रुसव्या-फुव्यांशिवाय कोणतंही नातं टाकलेलं नाही. असं म्हणतात आपण त्याच्यावरच रागावरतो, ज्याच्यावर आपलं प्रेम असतं, हक्क असतो आणि म्हणून मैत्रीतदेखील कधीतरी भांड्याला भांडं लागतंच. वेळप्रसंगी मित्रासाठी खंबीरपणे उभं राहणं असो किंवा मित्राची प्रेयसी सोडून गेली म्हणून रडायला खांदा देणं असो मैत्रीचं नातं आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्यात सामावलेलं आहे. 

    मैत्रीच्या नात्याचे पौराणिक दाखले:

    मैत्री म्हणजे माणसाला मिळालेली एक खास भेट, आणि याला अनेक पौराणिक दाखले देखील जोडता येतात. मैत्री दिवस म्हटलं म्हणजे हमखास आठवते ती सुदामा आणि भगवान श्रीकृष्णाची जोडी. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात झालेली ही मैत्री कायम चिरतरुण राहिली. श्रीकृष्ण राजा झाले, तर सुदामा मात्र गरीब ब्राह्मणच राहिला, तरीही पायपीट करून आलेल्या सुदाम्याच्या पायात रुतलेले काटे आपल्या मऊ हातांनी काढणारे श्रीकृष्ण कोणी देव अगर राजा नव्हते, ते केवळ आणि केवळ सुदाम्याचे मित्र होते. महाभारताच्या पानांमध्ये आपल्याला मैत्रीची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात, मग ती मित्राचं बोट कापलं म्हणून भरजरी शालू फाडणारी द्रौपदी आणि चिंधीची परतफेड लाज राखून करणारे श्रीकृष्ण असोत किंवा खरी आई कोण याची प्रचिती येऊन सुद्धा मैत्रीच्या नात्यापायी कौरवांकडून लढलेला कर्ण, असे कैक प्रसंग पहिले म्हणजे यामधील प्रत्येक मित्राने आपल्या मित्रासाठी केलेला  त्याग डोळ्याच्या पापण्या अलगद ओल्या करतो. 

    रामायणाच्या पानांमध्ये देखील मैत्रीची बरीच उदाहरणं आहेत. राजा दशरथाच्या मैत्रीखातर स्वतःचा जीव धोक्यात घालत अपहरण झालेल्या सीतेच्या रक्षणार्थ धावलेला जटायू किंवा मैत्री निभावण्यासाठी वानरसेनेसह समुद्र पार करून गेलेला सुग्रीव, सर्वात महत्वाचं म्हणजे दिलेल्या शब्दाला जागत जिंकलेलं संपूर्ण राज्य विभीषणच्या नावे करणारे श्रीराम ही मैत्रीच्या नात्याची मूर्तिमंत उदाहरणं आहेत. मात्र कायम लक्षात असुद्या की पुराण किंवा इतिहासातील दाखले केवळ गोष्ट म्हणून ऐकण्यासाठी नाहीत, तर स्वतःमध्ये ते गुण उतरवण्यासाठी आहेत. वर उल्लेख केलेल्या प्रत्येकाने मैत्रीची परिभाषा ओळखत, प्रामाणिक राहत, नात्याचा सन्मान करत वेळोवेळी नातं खुलवलं आणि म्हणूनच ते नातं टिकलं. 

  • संख्येने कमी मात्र अब्जाधीशांमध्ये अव्वल; काय आहे पारशी समाजाची गोष्ट?

    संख्येने कमी मात्र अब्जाधीशांमध्ये अव्वल; काय आहे पारशी समाजाची गोष्ट?

    पारशी समाजाचा उगम कसा झाला?

    आजच्या घडीला केवळ देशातच नाही, तर विदेशात देखील भारताचे नाव गाजवत असलेली कंपनी म्हणजे टाटा समूह किंवा Tata Group of Industries आणि या कंपनीचे सर्वेसर्वा रतन टाटा. मात्र तुम्हाला माहिती आहे का हे रतन टाटा देखील पारशीच आहेत. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आज भारतीय व्यावसायिक क्षेत्रात सर्वोच्च  कामगिरी बजावणारा हा पारशी समाज मूळचा भारतीय नाही. सध्याच्या काळात जो देश इराण म्हणून ओळखला जातो त्याचं जुनं नाव होतं पर्शिया आणि म्हणून तिथून उगम पावलेले लोक पारशी म्हणून ओळखले जातात. पारशी समाज इ.स पूर्व ७व्या शतकापासून या भागात पाहायला मिळू लागला. मात्र त्यानंतर इराणवर अरबी मुस्लिमांकडून आक्रमणं व्हायला सुरुवात झाली. या भयावह आक्रमणांना तोंड देणं पारशी समाजाला जमणारं नव्हतं म्हणूनच त्यांनी स्थलांतर करायला सुरुवात केली. 

    विविध दिशांना निघालेल्या या जहाजांपैकी कैक जहाजं भारतातील गुजरात राज्याच्या सीमेला येऊन धडकली. परदेशातून आलेल्या या समजाला स्थानिकांशी संवाद मात्र साधता येईना आणि स्थानिक देखील या लोकांबद्दल आणि त्यांच्या भाषेबद्दल अनभिज्ञ होते. परिणामी सर्व खबर स्थानिक राजाच्या कानी घालण्यात आली. आता या अनोळखी लोकांशी संवाद साधायचा तरी कसा या विचारात असलेल्या राजाला अचानक एक कल्पना सुचली, त्याने ताबडतोब एक भरलेला दुधाचा पेला पारशी समूहासमोर आणून ठेवला. या काठोकाठ भरलेल्या पेल्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, की राज्याची लोकं सामावून घेण्याची मर्यादा संपली आहे आणि यात आणखी लोकांना सामावून घेता येणार नाही. 

    राजाच्या या निर्णयावर हताश न होता पारशी लोकांनी संयम बाळगला आणि त्यानंतर पारशी लोकांकडून आलेलं उत्तर सर्वांना अचंबित करणारं होतं. पारशी लोकांनी त्याच दुधाने भरलेल्या पेल्यात काहीशी साखर मिसळली आणि तो पेला पुन्हा राजासमोर ठेवला. राजा या उत्तरावर खुश झाला, तुमच्या समाजामध्ये आम्ही साखरेप्रमाणे विरघळून जाऊ असा मतितार्थ समोर ठेऊन पारशी लोकांनी त्यांच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर या स्वभावाचं उदाहरण प्रस्तुत केलं आणि  सर्वांना क्षणार्धात जिंकूनही घेतलं. बुद्धिमान, हुशार, मेहनती आणि शेतीचा अनुभव असलेल्या पारशी समाजाने दिलेल्या शब्दाचं  पालन केलं. ते राजाच्या छत्रछायेत आनंदाने राहू लागले  मात्र काही काळानंतर आलेल्या दुष्काळाने त्यांना देशाटन करायला भाग पडलं. त्याकाळात आपल्या भारतात विविध राज्यांमध्ये आपापसात युद्धं व्हायची, मात्र पारशी लोकांनी कधीही अशा युद्धांमध्ये भाग घेतला नाही, याउलट नेहमीच सर्व राज्यांशी जुळवून घेत व्यवसाय सुरु ठेवला. 

    45037151 2305641402992949 1628658427641200640 n 1

    इंग्रजांची सत्ता आणि पारशी समाज

    पारशी समाज भारतात मुख्यत्वेकरून दलालीचा व्यवसाय (Brokerage business) करायचा. सर्वांशी जुळवून घेत ते व्यापार वाढवतच होते आणि अशातच व्यापाराच्या उद्देशाने काही मत्सरी पाऊलं भारतात उमटली. साधारण १६०८ साली इंग्रजांनी मसाल्याच्या व्यापाराचे निमित्त साधून भारतीय बाजारात आणि भूमीत प्रवेश मिळवला. भारताचे वैभव पाहून त्यांचे डोळेच दिपले आणि या संधीसाधू माणसांनी भारतावर राज्य करण्याचा निर्णय पक्का केला. काही स्वकीयांच्या धूर्त, फितूर आणि लालची स्वभावामुळे ते यशस्वी देखील झाले. इंग्रजांच्या जुलमी राजवटीखाली भारतीय जनता होरपळून निघत होती, मात्र पारशी समाजाने या संधीचं सोनं करून दाखवलं. सर्वात अगोदर पारशी लोकांनी इंग्रजांची भाषा शिकून घेतली, कारण भाषा हीच संवाद साधण्याचं महत्वाचं साधन आहे. पारशी लोकांनी इंग्रजी भाषेचा अभ्यास केल्याने इंग्रजांना देखील स्थानिकांशी संवाद साधण्यासाठी मदत मिळू लागली. इंग्रजी राजवटीत पारशी लोकं इंग्रजांकडे नोकरी करायचे आणि म्हणूनच त्याकाळात अनेक पारशी लोकं सरकारी कर्मचारी म्हणून पाहायला मिळत. पारशी लोकांच्या या स्वभावगुणांमुळे त्यांनी इंग्रजी राजवटीचा केंद्रबिंदू असलेल्या आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरलेला मुंबई/बॉम्बे मध्ये जम बसवला. 

    Cover2 1

    भारतात इंग्रजी सत्ता असताना घडलेला एक महत्वाचा प्रसंग म्हणजे चीन आणि युरोप यांमध्ये वाढलेला व्यापार. चीन युरोपला मोठ्या प्रमाणात चिनी मातीची भांडी, चहा आणि रेशीम पाठवायचा आणि युरोपकडून देखील या वस्तूंसाठी मागणी वाढत होती. दुसऱ्या बाजूला चीन आणि युरोप यांमधले वृद्धिंगत होणारे संबंध इंग्रजांना रुचणारे नव्हते आणि म्हणूनच त्यांनी पारशी लोकांच्या मदतीने चीनमध्ये अफूची निर्यात सुरु केली. येणाऱ्या  प्रत्येक दिवसासोबत चीनमधून अफूची मागणी वाढू लागली, एक वेळ तर अशी आली होती की चीनमध्ये प्रत्येक ४ पैकी ३ माणसं अफूच्या आहारी गेली होती. अफूच्या व्यापाराने इंग्रजांना काय फायदा झाला? एकतर चीनमधील लोकं अफूच्या नशेत असल्याने युरोपसोबतचा व्यापार कमी झाला आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या निर्यातीमुळे धानाचे पेटारे भरू लागले. 

    पारशी समाज आणि आज

    स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच पारशी समाज भारतात उत्तमरीत्या त्यांचा जम बसवून आहे. इंग्रजांची राजवट असताना देखील त्यांनी अनेक सन्मानित पदं सांभाळली होती. पारशी लोकं त्याकाळी अनेक जहाजांचे मालक होते, डॉक्टर होते आणि सरकारी कचेऱ्यांमध्ये काम देखील करायचे. पारशी लोकांनी जरी भरपूर पैसा कमावला असला तरीही आपण कोणत्या परिस्थितीमधून इथवर आलोय याची जाण त्यांना कायमच होती आणि म्हणूनच कमावलेल्या पैशांमधून त्यांनी मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी हॉस्पिटल्स आणि शैक्षणिक संस्थांची निर्मिती करत समाजाप्रती नेहमीच आपले कर्तव्य निभावलं. स्वातंत्र्योत्तर काळातही आपण जर का यांची संख्या मोजायला गेलो तर ती ०.००५ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही, मात्र भारतीय अब्जाधीशांच्या यादीत तीन ते पाच नावं ही पारशी समाजातील (टाटा, गोदरेज, पूनावाला, मिस्त्री, वाडिया) आहेत.

    एअरलाईन्स, सॉफ्टवेअर, कन्स्ट्रक्शन, फूड, हेल्थ यांसारख्या एक ना अनेक क्षेत्रांमध्ये पारशी समाज अव्वल कामगिरी बजावतोय. देशाची सुरक्षा, मनोरंजन, खेळ किंवा वैज्ञानिक क्षेत्राची समाजातील प्रत्येक क्षेत्रात या लोकांनी नाव कमावलं असल्याने व्यवसायातून झालेली सुरुवात आज अनेक दिशांना पसरलेली आहे. पारशी लोकांची संख्या अत्यंत नगण्य म्हणजे १४२ कोटींच्या देशात फक्त ५७००० असली तरीही सैन्य, मनोरंजन, व्यापार, विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये पारशी नाव कमावताना दिसतात. समाज थोडा असला तरी कर्तबगारांची संख्या खूप मोठी आहे. फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ, जमशेदजी टाटा, रतन टाटा, होमी भाभा, सायरस पुनावाला, आदी गोदरेज, बोमन इराणी अशी अनेक नावं या समाजाच्या कर्तृत्वाचे उदाहरण प्रस्तुत करतात.

    fb52ba bfc2bb9b6d884b34bcd6067456d2940fmv2

    आपण पारशी समाजाकडून काय शिकलो?

    एखादी गोष्ट वाचल्यानंतर आपण त्यातून काय शिकलो याची जाणीव झाली पाहिजे. पारशी समाज हा हातावर मोजण्याएवढा जरी असला तरीही त्यांच्या शांत आणि मेहनती स्वभावामुळे ते अनेकांवर भारी ठरले आहेत. कदाचित त्यांना जन्मजात हा स्वभाव मिळालाही असेल, मात्र तरीही समोर आलेला प्रसंग कशाप्रकारे आपल्या फायद्याचा ठरू शकतो याचे धडे आपण पारशी समाजाकडून गिरवले पाहिजेत. अनेकवेळा फटकळ बोलण्यामुळे मह्त्वाची कामं होता-होता राहतात, मात्र या समाजात जर का टिकून राहायचं असेल आणि चार-चौघांमध्ये वावरायचं असेल तर तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवता आला पाहिजे. सर्वात शेवटी पारशी समाजाकडून शिकण्याची गोष्ट म्हणजे मेहनती स्वभाव, परिस्थिती कितीही बिकट असली तरीही ती केवळ मेहनतीच्या जोरावर बदल घडवता येतात. 

    आणखीन वाचा:

  • भारतीय विमान सेवेचे जनक, उद्योगरत्न जेआरडी टाटा यांचा जन्मदिवस

    भारतीय विमान सेवेचे जनक, उद्योगरत्न जेआरडी टाटा यांचा जन्मदिवस

    JRD TATA 1
    JRD TATA 2
    ओळख
    जेआरडी यांचा जन्म 29 जुलै 1904 रोजी रतन दादाभॉय व सूनी टाटा यांच्या पोटी पॅरिस येथे झाला. ते टाटा ग्रुपचे चौथे अध्यक्ष होते.
    JRD TATA 3
    शिक्षण
    जेआरडींचं बालपण फ्रान्समध्ये गेलं. तर शिक्षण लंडन, जपान, फ्रान्स आणि भारतात झालं. त्यांना केंब्रिजमधून इंजिनिअरिंग करायची इच्छा होती, पण वडिलांनी व्यवसाय सांभाळण्यासाठी भारतात बोलावून घेतलं.
    JRD TATA 4
    सुरुवात
    बिनपगारी अॅप्रेंटिस म्हणून त्यांनी कंपनीत कामाला सुरुवात केली.

    वयाच्या 22 व्या वर्षी ते टाटा सन्सचे डायरेक्टर बनले, तर 34 व्या वर्षी कंपनीचे चेअरमन बनले.
    JRD TATA 5
    विमान वाहतुकीचे जनक
    भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक म्हणून जेआरडी ओळखले जातात. ते भारताचे पहिले कमर्शिअल पायलट होते. कराची ते मुंबई
    हे पहिलं विमान त्यांनी स्वतः उडवलं होतं. त्यांनी 1932 मध्ये टाटा एअरलाइन्स स्थापना केली. ज्याचं नाव नंतर एअर इंडिया झालं.
    JRD TATA 6 1
    टाटा ग्रुपचा विस्तार
    जेआरडी अध्यक्ष झाले तेव्हा टाटांच्या 14 कंपन्या होत्या. निवृत्तीच्या वेळेस ही संख्या 95 पर्यंत पोहोचली. ग्रुपचा महसूल 100 दशलक्ष डॉलर्सवरून 5 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. टीसीएस, टायटन, टाटा मोटर्स, वोल्टास, एअर इंडिया इत्यादी कंपन्या जेआरडींच्याच काळात सुरु झाल्या.
    JRD TATA 7 1
    समाजकल्याण
    त्यांनी कामगारांसाठी दिवसात 8 तास काम, मोफत आरोग्यसेवा, भविष्य निर्वाह निधी, अपघात विमा योजना सुरु केली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, टाटा मेमोरिअल कॅन्सर रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल इत्यादी संस्था स्थापना करण्यात भूमिका बजावली.
    JRD TATA 8
    पुरस्कार
    जेआरडी हे पहिले आणि एकमेव उद्योगपती आहेत, ज्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे. फ्रान्सचा लिजन ऑफ ऑनर हा सर्वोच्च नागरी सन्मान सुद्धा त्यांना दिला गेला. भारतीय हवाई दलातील एअर व्हाईस मार्शल हे मानद पद त्यांना देण्यात आले होते. हवाई क्षेत्रातील
    JRD TATA 9
    देशातील सामान्य लोकांचा आणि देशाचा जोपर्यंत विकास होत नाही, तोपर्यंत
    एक उद्योजक म्हणून मिळणारे कोणतेही यश अपूर्ण आहे.
    – जेआरडी टाटा