Blog

  • बिझनेसमध्ये पार्टनर गरजेचा आहे का? | Why is a partner necessary in business?

    बिझनेसमध्ये पार्टनर गरजेचा आहे का? | Why is a partner necessary in business?

    व्यवसाय म्हटलं की अनेक गोष्टी आल्या. प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करण्याच्या आधीही बरीच पूर्वतयारी गरजेची असते. बिझनेस आयडियापासून ते प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करेपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय एक व्यावसायिक म्हणून आपल्याला घ्यावे लागतात.भांडवल, कच्चा माल, यंत्रं, कर्मचारी, ग्राहक, बाजारपेठ, बँका अशा अनेक घटकांचा समावेश करून त्यांच्या साहाय्याने व्यवसाय उभा राहतो. या सर्वांच्या बरोबरीने व्यवसायातील अतिशय महत्त्वाचा असणारा एक घटक म्हणजे आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्याबरोबर व्यवसाय करायला व सर्व आघाड्यावर तोंड द्यायला तयार असणारा आपला व्यावसायिक भागीदार अर्थात आपल्या व्यवसायाचा बिझनेस पार्टनर होय.

    बिझनेस पार्टनर निवडताना काय काळजी घ्यावी? 

    • व्यवसायात भागीदार असावाच का? 
    • असला तर तो का असावा? 
    • नसला तर तो का नसावा? 

    पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणे चांगले नसल्याचा सल्ला अनेक अनुभवी लोकांनी दिला आहे. तरीसुध्दा पार्टनर घ्यावाच का? 

    असे अनेक प्रश्न व्यवसायिकाला पडू शकतात. खरंतर बिझनेसमध्ये पार्टनर असणे गरजेचे आहे का, हे बिझनेसच्या प्रकारावर आणि त्याच्या गरजांवर अवलंबून असते; परंतु या सगळ्यात एक महत्त्वाची बाब  म्हणजे व्यवसायात पार्टनर न घेता फार मोठे संघटन तुम्हाला उभे करता येत नाही. एकटा व्यक्ती फक्त एक प्रोप्रायटर होऊ शकतो. त्याची मजल पुढे जाऊन एकल व्यक्ती कंपनी (One Person Company – OPC) पर्यंतच जाऊ शकते आणि भारतात कायदा असे सांगतो की, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप अथवा पब्लिक लिमिटेड कंपनी स्थापन करण्यासाठी एकापेक्षा जास्त व्यक्तींची गरज आहे.

    प्रोप्रायटर किंवा एकल व्यक्ती कंपनी फार मोठी Growth करू शकत नाही. त्यामुळे मोठा व्यवसाय करायचा असला, तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा एलएलपी सुरू करणे गरजेचे ठरते. त्यानंतरच बँका व इतर कंपन्या आपल्यासोबत (अर्थात कंपनीसोबत) मोठे व्यवहार करायला तयार होतात. म्हणून आपल्याला मोठा व्यवसाय करायचा असेल तर पार्टनर हा घ्यावाच लागेल; कारण ती व्यवसायाची गरज आहे. काहीजण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करताना घरातील व्यक्तींची (विशेष करून बायको अथवा नवरा, भाऊ, आई, वडील, मुलगा) नावे व्यवसायात सहभागी करतात. जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. मात्र अशा कंपनीत केवळ नावालाच असणारे डायरेक्टर (संचालक/पार्टनर) काही काम करू शकत नाहीत किंवा कंपनीच्या वाढीसाठी प्रयत्न करत नाहीत, कारण त्यांना काम कसे करायचे हे माहिती असतेच असे होत नाही. त्यामुळे फायदा जरी घरातच राहिला, तरी कंपनी मोठी होत नाही. त्यामुळे हा फायदा व व्यवसायाचा विस्तार कमी प्रमाणात असतो.

    त्याउलट एखादा अनुभवी काम करणारा संचालक (तो घरातला नसला तरीही) पार्टनर म्हणून घेतला, तर कंपनीची वाढ मोठ्या प्रमाणात होऊ शकते, कारण तो प्रत्यक्ष आपल्या कामांनी कंपनीच्या वाढीसाठी प्रयत्न करतो. त्यामुळे फायद्याचे वाटे झाले, तरीसुध्दा चांगले उत्पन्न मिळते. कंपनी झपाट्याने वाढल्यामुळे अनेक ग्राहक जोडले जातात. गुणवत्तेचा पार्टनर घ्यायचा की, केवळ नावालाच पार्टनर घेऊन स्वतः काम करायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. कारण आपण स्वतः किती काम करू शकतो हे आपल्यालाच चांगले माहिती असते.

    पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करण्याचे काही फायदे:

    1) नवीन कौशल्यं : 

    पार्टनरमुळे तुमच्या जोडीला नवीन कौशल्यं आणि अनुभव मिळतात, ज्यामुळे कामकाज अधिक प्रभावीपणे आणि उत्तम पद्धतीने पार पाडले जाऊ शकते.

    2) भांडवल वाढ : 

    पार्टनरमुळे आर्थिक गुंतवणुकीचा भार एकट्याच्या खांद्यावर न येता, तो दोन किंवा अधिक लोकांमध्ये विभागला जातो.

    3) निर्णय घेण्यात मदत : 

    पार्टनरमुळे निर्णय घेण्यात वेगवेगळी मतं आणि दृष्टीकोन मिळतात, ज्यामुळे योग्य निर्णय घेणे सोपे होते

    4) Networking :

    प्रत्येक पार्टनरकडे त्याच्या स्वतःच्या व्यावसायिक संपर्कांचे जाळे असते, जे बिझनेसला नवीन ग्राहक, सप्लायर्स किंवा इतर व्यवसायिक संधी मिळवून देऊ शकते.

    business agreement handshake hand gesture

    5) जोखीम वाटप :

    पार्टनरमुळे बिझनेसची जोखीम अनेकांमध्ये वाटली जाते, त्यामुळे जोखीम कमी होते. आर्थिक नुकसान किंवा बिझनेसच्या अडचणींमध्ये सर्व पार्टनर्स एकत्र येऊन त्या समस्येचा, अडथळ्यांचा सामना सोबतीने करू शकतात.

    व्यवसाय मोठा करायचा म्हटलं की, पार्टनर हा घ्यावाच लागतो, कारण कायद्याने ते बंधनकारक आहे. मग तो पार्टनर नावापुरताच असावा की, प्रत्यक्ष काम करणारा असावा याबाबत जरी कायद्याने कोणतेही बंधन घातले नसले, तरी पार्टनरला फायद्यातील वाटा हा ठरल्याप्रमाणे तुम्हाला द्यावाच लागतो. 

    दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की, कंपनीचे मालक म्हणून कंपनीत येणारा सगळा नफा घरी न्यायचा नसतो किंवा कंपनी तोट्यात चालायला लागली म्हणून घरातील सगळ्या गोष्टी दाव्यावर लावून कंपनीबरोबर स्वतःचे वाटोळेदेखील करून घ्यायचे नसते ही पक्की खूणगाठ प्रत्येक व्यावसायिकाने स्वत:च्या मनात बांधून ठेवली पाहिजे. तुम्ही जरी कंपनीचे मालक असलात तरी तुमचा पगार आधी ठरवा. तेवढेच पैसे महिन्याच्या शेवटी सर्व कर्मचाऱ्यांच्या पगाराबरोबर आपल्या घरी न्या. तुमच्या पार्टनरलासुध्दा हेच नियम लागू करा. ही विचारांची स्पष्टता जर तुमच्यात आणि तुमच्या पार्टनरमध्ये असेल तरंच ही व्यवसायातील भागीदारी दीर्घकाळ टिकेल व व्यवसाय मोठा होईल.

    जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आताच Whatsapp वर शेअर करा. 😊

    आणखी वाचा

  • सोशल मीडियामध्ये व्यवसाय संधी | Business Opportunities in Social Media

    सोशल मीडियामध्ये व्यवसाय संधी | Business Opportunities in Social Media

    स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे म्हणजेच स्वयंरोजगाराचे बरेच फायदे आहेत. स्वयंरोजगार ही स्वतःला विकसित करण्याची, नवीन ज्ञान संपादन करण्याची निरंतर प्रक्रिया असते. ही प्रक्रिया तुम्हाला नोकरी करून कधीच आत्मसात होणार नाही. 

    आपण जर सोशल मीडियाचे जाणकार आहात व आपणास काहीतरी नावीन्यपूर्ण असा व्यवसाय करायचा असेल, तर सोशल मीडिया कन्सलटंट हा व्यवसाय एक चांगला पर्याय आहे. 

    सोशल मीडिया कन्सलटंट म्हणजे काय ?

    सोशल मीडिया कन्सलटंट म्हणजे असा एक व्यक्ती जो व्यवसायांना किंवा व्यक्तींना त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर योग्य प्रकारे त्यांचा Presence निर्माण करण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करतो. 

    यामध्ये – 

    • सोशल मीडिया अकाउंट्स तयार करणे
    • पोस्ट्सचे नियोजन करणे
    • टार्गेट ऑडियन्सशी संवाद साधणे
    • ब्रँड प्रमोशन करणे, ट्रॅफिक वाढवणे 
    • व्यवसायाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी रणनीती तयार करणे यांचा समावेश असतो. 

    सोशल मीडिया कन्सलटंटचे मुख्य काम व्यवसायाचे ब्रँडिंग इमेज सुधारण्याचे असते, तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून विक्री किंवा लोकप्रियता वाढवण्याचे असते.

    आज कोणताही व्यावसायिक किंवा कंपनी, मग ती मोठी असो वा लहान त्यांचे ऑनलाईन अस्तित्व वाढवण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळे एक सोशल मीडिया कन्सलटंट म्हणून पार्ट टाईम किंवा फुलटाईममध्ये पैसे कमवण्याची उत्तम संधी आहे, परंतु या व्यवसायात येण्याअगोदर काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.

    सोशल मीडिया कन्सलटंट बनण्यासाठी आवश्यक बाबी : 

    1. सोशल मीडिया कन्सलटंटला प्रत्येक सोशल मीडिया टूलच्या साधक बाधक गोष्टींबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे. हे ज्ञान केवळ फेसबूक किंवा ट्विटरपुरते मर्यादित नसावे. त्यांनी नफा मिळवण्याच्या व व्यवसायाच्या गुंतवणुकीवर परतावा (ROI) देण्याच्या धोरणांमध्येदेखील सर्जनशील असावे. 
    2. एक सोशल मीडिया तज्ज्ञाने योग्य डावपेच आखण्याइतपत विश्लेषणात्मक असावे. तसेच चांगले परिणाम मिळवण्यासाठी त्यामध्ये वेळोवेळी योग्य बदल करण्याचे कौशल्यही आत्मसात करावे.
    3. एक सोशल मीडिया तज्ज्ञाने योग्य डावपेच आखण्याइतपत विश्लेषणात्मक असावे. तसेच चांगले परिणाम मिळवण्यासाठी त्यामध्ये वेळोवेळी योग्य बदल करण्याचे कौशल्यही आत्मसात करावे.
    4. एक सोशल मीडिया सल्लागार म्हणून आपल्या ग्राहकाचा व्यवसाय, त्यांचे संभाव्य ग्राहक, सोशल मीडिया प्रेझेन्स, सध्याची वर्तमान सोशल मीडिया धोरणे व संबंधित इतर माहिती असणे आवश्यक असते. 
    5. ग्राहकाची सोशल मीडिया रणनीती, त्यांच्या कमजोर बाबी व अन्य समस्या निवारणाबद्दल नि:पक्षपाती मत तयार करण्यासाठी सोशल मीडिया सल्लागाराकडे विशेष कौशल्य असावे लागते.
    6.  सोशल मीडियाद्वारे व्यवसायवृध्दीचे धोरण तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले पाहिजे. 
    7. एक सल्लागार म्हणून सोशल मीडियावरील फॉलोअर्सच्या डेटाचे विश्लेषण करता आले पाहिजे. 
    8. सोशल मीडिया सल्लागार हे आपल्या ग्राहकाच्या सोशल मीडिया उपक्रमांमध्ये विविध डावपेच आखत व सतत नवीन प्रयोग करत असतात. त्यामध्ये सोशल मीडियामधील सध्याचे ट्रेंडस व बदलांचे परीक्षण करणे, प्रभावी ऑनलाईन मार्केटिंगचे धोरण बनवताना सोशल मीडिया माध्यमांचा व आपल्या मार्केटिंग ज्ञानाचा प्रभावी वापर करणे या गोष्टींचा समावेश असतो. 
    9. मार्केटिंग योजनांमध्ये विविध तंत्राचा कसा वापर करावा याचे व्यवस्थापन करणे शिकले पाहिजे. 
    10. ग्राहकाच्या फायद्यासाठी त्यांच्या व्यवसायातील सर्वोत्तम योजनांचे मूल्यांकन व त्यांची अंमलबजावणी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सोशल मीडिया सल्लागाराचे असते. 
    11. ऑनसाईट कामकाजाच्या माध्यमातून ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा पुरवणे, त्यांच्या गरजा समजून घेणे हे कौशल्य विकसित करावे लागते. 
    creative team having discussion social media application

    एक परिपूर्ण सोशल मीडिया सल्लागार होण्यासाठी वरील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. 

    सध्याच्या काळात आपल्या व्यवसायास ऑनलाईन अस्तित्व प्रदान करण्यासाठी उद्योजक सोशल मीडियाचा चांगल्यापैकी उपयोग करतात. परिणामी आजच्या काळात अनेक उद्योजक कंपन्याचे ऑनलाईन किंवा सोशल मीडिया Presence प्रभावशाली करण्यासाठी त्यांना सोशल मीडिया सल्लागारांची गरज असते. त्यामुळे सोशल मीडिया सल्लागार म्हणून व्यवसाय करण्यासाठी एक उत्तम संधी आहे. संधीचा फायदा अवश्य घ्या आणि करिअरच्या दृष्टीकोनातून याचा नक्की विचार करा. 

    आणखी वाचा :

  • मुंबईची झोपडपट्टी ते दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय | The richest Indian in Dubai – Rizwan Sajan’s

    मुंबईची झोपडपट्टी ते दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय | The richest Indian in Dubai – Rizwan Sajan’s 

    भारतात अनेक उद्योगपती आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीने एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. काहींच्या हातात वारसा संपत्ती नसली तरी, त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कमावले आहे. अशाच एका यशस्वी उद्योगपतीची गोष्ट आज आम्ही सांगणार आहोत, जो मुंबईतील घाटकोपरच्या झोपडपट्टीत राहत होता आणि छोट्या-छोट्या नोकऱ्या करीत जीवनाची गाडी पुढे नेत होता. आज तो दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीयांमध्ये गणला जातो आणि त्यांचा व्यवसाय केवळ दुबईतच नाही, तर इतर अनेक देशांमध्येही पसरलेला आहे.

    सुरुवातीचे दिवस आणि संघर्ष

    रिझवान साजन यांचा जन्म मुंबईच्या घाटकोपरमधील एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांचं कुटुंब झोपडपट्टीत राहायचे. आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं फार कठीण होत होतं. त्यामुळे, साजन यांनी लहानपणापासूनच कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावण्याचं ठरवलं  होतं. त्यांनी शाळेतील पुस्तकं विकणं, सणासुदीच्या वस्तू विकणं, घरोघरी जाऊन दूध विकणं अशी छोटी छोटी कामं लहानपणीच  करण्यास सुरुवात केली. 

    वयाच्या अवघा १६व्या वर्षीच रिझवान साजन एक मोठा धक्का बसला,त्यांच्या वडिलांचं अचानक निधन झालं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण आर्थिक जबाबदारी साजन यांच्यावर आली आणि याचा परिणाम  म्हणून त्यांना शिक्षण मधूनच सोडावं  लागलं. काही काळ त्यांनी एक छोटा व्यवसाय सुरू केला, ज्यात ते फाईल बॉक्सेस बनवायचे. सुरुवातीला या व्यवसायात थोडंफार  यश मिळाले, पण पुरेसं नव्हतं. 

    कुवेतमध्ये मिळाली सुवर्णसंधी

    रिझवान साजन यांचे काका तेव्हा कुवैतमध्ये नोकरी करत होते, कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी साजन यांनी आपल्या काकांकडे कुवेतमध्ये नोकरीसाठी विचारणा केली. त्यांच्या काकांनी त्यांना एका बांधकाम साहित्याच्या दुकानात नोकरी मिळवून दिली. ही संधी साजन यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण वळण ठरली. त्यांनी या नोकरीत एक विक्रेता म्हणून काम सुरू केलं, आणि त्यांच्या मेहनतीने त्यांना त्या ठिकाणी लवकरच व्यवस्थापकाची पदवी मिळाली. 

    १९९० साली  पुन्हा त्यांच्या  जीवनाला एक  जोरदार  धक्का मिळाला . कुवेतमध्ये भीषण आखाती युद्ध सुरू झालं आणि त्यांना  कुवेत सोडावं लागलं आणि पुन्हा भारतात परतावं  लागलं. परत आल्यावर त्यांनी काही नोकऱ्या करून पहिल्या, पण यश मिळवण्यासाठी त्यांच्या मनात काहीतरी मोठं करण्याची इच्छा होती. काही काळ भारतात राहिल्यानंतर त्यांनी दुबईला जाण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना दुबईत बांधकाम उद्योगात मोठी संधी दिसत होती.

    The richest Indian in Dubai - Rizwan Sajan's

    दुबईत ‘डॅन्यूब ग्रुप’ची स्थापना 

    १९९३ मध्ये दुबईला गेल्यावर रिझवान साजन यांनी ‘डॅन्यूब’ नावाची ट्रेडिंग फर्म सुरू केली. हि कंपनी कुवेतमधून बांधकाम साहित्य खरेदी करायची  आणि दुबईमध्ये त्याची विक्री करायची. दुबईमध्ये बांधकाम उद्योगाची प्रचंड वाढ होत होती, आणि त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला जोरदार प्रतिसाद मिळाला. साजन यांच्या सर्जनशील स्वभावामुळे  आणि मेहनतीमुळे ‘डॅन्यूब’ ने अवघ्या काही वर्षांतच मोठं यश मिळवलं.

    १९९९ पर्यंत ‘डॅन्यूब’ चा वार्षिक महसूल १६ कोटी रुपये झाला होता, आणि ते १ कोटी रुपयांचा नफा मिळवत होते. पण साजन इथेच थांबले नाहीत. त्यांनी बांधकाम साहित्याबरोबरच गृहसजावट, सॅनिटरीवेअर, इलेक्ट्रिकल उपकरणे यांसारख्या विविध क्षेत्रांत विस्तार केला.

    रिअल इस्टेटमध्ये पाऊल

    २००८ मध्ये जागतिक आर्थिक संकट आलं , पण साजन यांच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही उलट त्यांनी आपला व्यवसाय वाढवण्याचं ठरवलं आणि २०१४ मध्ये ‘डॅन्यूब प्रॉपर्टीज’ नावाची रिअल इस्टेट कंपनी लाँच केली. त्यांचा उद्देश मध्यमवर्गीयांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा होता. ‘डॅन्यूब प्रॉपर्टीज’ ने बाजारात एक क्रांतिकारी योजना आणली — “1% मासिक पेमेंट योजना” या योजनेत खरेदीदारांना घर खरेदीसाठी फक्त 1% रक्कम दरमहा भरण्याची मुभा  होती आणि त्यांना घरमालकीचा हक्क मिळत होता.

    या योजनेने घर खरेदीदारांसाठी घरमालकीचा मार्ग सोपा केला आणि अल्पावधीतच ‘डॅन्यूब प्रॉपर्टीजचं नाव बाजारात लोकप्रिय झालं. या योजनेमुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळाले आणि २०१६ पर्यंत ‘डॅन्यूब’चा वार्षिक महसूल ९००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. साजन यांनी रिअल इस्टेटमध्ये आपले स्थान मजबुत  केलं आणि आज ‘डॅन्यूब ग्रुप’ १६,७०९ कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळवणारी कंपनी आहे. रिझवान साजन यांनी आपल्या अपार मेहनत आणि हुशारीच्या जोरावर ‘डॅन्यूब’ला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं आणि त्यांची उपस्थिती जगभरातील ३० पेक्षा जास्त देशांत आहे.

    रिझवान साजन यांची कहाणी ही एका सामान्य माणसाच्या असामान्य संघर्षाची आणि यशाची कहाणी आहे.

    मुंबईच्या झोपडपट्टीतून सुरु झालेला हा प्रवास दुबईतील यशाच्या शिखरापर्यंत पोहोचला. त्यांनी कठीण परिस्थितीतही हार न मानता स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांच्या जिद्दीने, मेहनतीने बुद्धिमत्तेमुळे ते आज जागतिक स्तरावर यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात . 

    आणखी वाचा

  • करिअर निवडताना या 5 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्याच पाहिजेत

    करिअर निवडताना या 5 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्याच पाहिजेत

    1. स्वतःची आवड आणि क्षमता ओळखा : 

    ज्या क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचे आहे त्यात तुम्हाला आवड आहे का? ती तुमची Strength आहे का? हे आधी तपासा आणि मगच निर्णय घ्या.

    2. मार्केट आणि करिअरच्या संधी : 

    ज्या क्षेत्रात तुम्ही करिअर करू इच्छिता त्या क्षेत्रात सध्या आणि भविष्यात कोणत्या संधी आहेत, याचा अभ्यास करा. त्या क्षेत्राचा विस्तार आणि रोजगाराच्या संधींचा अंदाज घेतल्यास करिअरला चांगली दिशा मिळू शकते.

    3. आर्थिक स्थैर्य : 

    निवडलेल्या करिअरमध्ये मिळणारा आर्थिक फायदा आणि दीर्घकालीन स्थैर्य याचा विचार करा. तुम्ही निवडलेलं करिअर तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकेल का? याची खात्री करा.

    4. कामाचे वातावरण : 

    तुम्हाला ज्या प्रकारचे कामाचे वातावरण हवे आहे, त्यानुसार तुमचं करिअर निवडा. 

    काहींना ऑफिसमध्ये बसून काम करणे आवडते, तर काहींना फील्डवर काम करण्याची आवड असते. कोणत्या कामाच्या पद्धतीत आपण जास्त सूट होवू शकतो हे शोधा.

    5. करिअर आणि वैयक्तिक जीवनाचा समतोल : 

    निवडलेल्या करिअरमुळे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला तडजोड करावी लागणार नाही याची काळजी घ्या. काम आणि वैयक्तिक जीवन यांचा योग्य समतोल असलेल्या करिअरची निवड करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेता येईल.

    करिअर निवडीबाबतच्या या 5 गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

    आणखी वाचा :

  • ५,००० रुपये उसने घेऊन उभारली १७,००० कोटींची कंपनी: पी. रामचंद्रन यांचा संघर्ष आणि “उजाला” साम्राज्य.

    ५,००० रुपये उसने घेऊन उभारली १७,००० कोटींची कंपनी: पी. रामचंद्रन यांचा संघर्ष आणि “उजाला” साम्राज्य.

    प्रत्येक यशोगाथेमध्ये एक संघर्षाची कथा असते. अनेक वेळा मोठं यश मिळवण्यासाठी आयुष्यात चढ-उतार आणि अडचणी येतात. पण काही लोक असतात, जे या सर्व अडचणींवर मात करून आपला कर्तृत्वाचा ठसा उमटवतात. त्यांचा जीवन प्रवास आपल्याला हे शिकवतो की यश हे फक्त मेहनत, चिकाटी आणि नवकल्पना यावरच आधारित असतं . “उजाला सुप्रीम” या लोकप्रिय ब्रँडचे संस्थापक एम.पी. रामचंद्रन यांची कथा अशीच एक प्रेरणादायक आणि संघर्षपूर्ण गाथा आहे.

    या लेखात आपण त्यांच्या जीवनातील संघर्ष, कठोर परिश्रम, आणि एक मोठं व्यवसाय साम्राज्य उभारण्याचा प्रेरणादायक प्रवास जाणून घेणार आहोत.

    प्रारंभिक जीवन आणि संघर्ष 

    एम.पी. रामचंद्रन यांचा जन्म १९५० साली केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात झाला. त्यांचं बालपण आर्थिक संघर्षात गेलं , त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं . परंतु, त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट शिकली ती म्हणजे आयुष्य आपले  कष्ट आणि इच्छाशक्तीवर अवलंबून असतं .

    शाळेचं शिक्षण पूर्ण केल्यावर रामचंद्रन यांनी एका कंपनीत लेखापाल म्हणून नोकरी केली. मात्र, त्यांना स्वतःचं काहीतरी मोठं साध्य करायचं होतं. हा प्रवास सोपा नव्हता,  त्यांना यश मिळवण्यासाठी काहीतरी वेगळं करायचं होतं. लेखापाल म्हणून काम करत असताना, त्यांच्या मनात एक व्हाईटनर मिश्रण तयार करण्याची कल्पना आली. व्हाईटनर म्हणजे कपड्यांवरील डाग दूर करण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ. त्यांनी त्यांच्या स्वयंपाकघरातच या मिश्रणावर प्रयोग सुरू केले, मात्र त्यात अपेक्षित गुणवत्ता साधता येत नव्हती.

    एके दिवशी, त्यांनी एका रासायनिक उद्योगावरील मासिकात एक लेख वाचला ज्यामध्ये जांभळ्या रंगाच्या वापरामुळे कपडे अधिक स्वच्छ धुतले जाऊ शकतात, असं म्हटलं होतं. हा लेख वाचल्यानंतर त्यांच्या मनात नवीन कल्पना आली. त्यांनी या विचारावर प्रयोग सुरू केले, आणि त्यांना हवे तसे परिणाम मिळाले. स्वयंपाकघरात सुरू झालेला त्यांचा हा प्रयोग आता एका मोठ्या उद्योगात बदलू लागला होता. 

    व्यवसायाची स्थापना 

    १९८३ मध्ये रामचंद्रन यांनी आपल्या पहिल्या मुलीच्या नावावरून “ज्योती लॅबोरेटरीज” हा व्हाईटनर उत्पादन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांना असं वाटलं की एक संस्कृतीप्रधान नाव त्यांच्या व्यवसायाला एक वेगळा आणि भावनिक स्पर्श देईल . त्यामुळे त्यांनी आपल्या नव्या कंपनीचं नाव “ज्योती लॅबोरेटरीज” ठेवलं. आपला व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांनी आपल्या भावाकडून फक्त ५००० रुपयांचं कर्ज घेतलं आणि त्याच तुटपुंज्या भांडवलावर त्यांनी कारखाना सुरू केला.

    ज्योती लॅबोरेटरीजचं पहिलं उत्पादन “उजाला सुप्रीम” हे लिक्विड फॅब्रिक व्हाईटनर होतं. हे एक साधं पण प्रभावी उत्पादन होतं, जे कपड्यांना अधिक पांढरे, स्वच्छ आणि तेजस्वी बनवण्यासाठी वापरलं जातं. रामचंद्रन यांना समजलं होतं की गृहिणी हा त्यांच्या मुख्य ग्राहकवर्ग असेल. त्यामुळे त्यांनी उत्पादन विक्रीसाठी सहा महिलांना कामावर ठेवलं, ज्या घरोघरी जाऊन “उजाला” विकू लागल्या. त्यांच्या विक्रीसाठीचा संदेश सोपा आणि प्रभावी होता- तो म्हणजे “उजल्याचे फक्त चार थेंब वापरून तुमच्या  कपड्यांना चमकदार बनवा”.

    image

    रामचंद्रन यांची ही युक्ती ग्राहकांच्या मनात घर करू लागली, आणि “उजाला”ला पहिल्या वर्षातच चांगला प्रतिसाद मिळाला. वर्षाच्या अखेरीस, ज्योती लॅबोरेटरीजने १४४० रुपयांचा नफा मिळवला आणि विक्रीचा आकडा ४०,००० रुपयांपर्यंत पोहोचला. रामचंद्रन यांच्या दृढनिश्चयाने आणि कल्पकतेने ज्योती लॅबोरेटरीजला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या साध्या पण परिणामकारक मार्केटिंग पद्धतीमुळे, कंपनीला अल्पावधीतच मोठं यश मिळालं. “उजाला”च्या यशामुळे रामचंद्रन यांनी आपल्या व्यवसायाला पुढे नेण्याची प्रेरणा घेतली, आणि पुढील काळात ज्योती लॅबोरेटरीज अनेक यशस्वी उत्पादनांसह एक यशस्वी ब्रँड म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

    व्यवसायातील स्पर्धेवर मात 

    व्यवसाय करताना रामचंद्रन यांना मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागले. रेकिट बेंकीझर कंपनीच्या ‘रॉबिन ब्लू’ या उत्पादनाने भारतीय बाजारात आपली पायाभरणी केली होती. यशस्वी होण्यासाठी रामचंद्रन यांना काहीतरी वेगळं करण्याची गरज होती. त्यांनी पारंपरिक ‘पावडर ब्लू’ ऐवजी ‘लिक्विड ब्लू’ तयार केलं आणि हे उत्पादन फक्त १ रुपयांपासून ४५ रुपयांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध करून दिलं.

    त्यानंतर, त्यांनी “चार बूंदों वाला, आया नया उजाला” ही जाहिरात तयार केली, जी खूपच लोकप्रिय झाली. ही जाहिरात घराघरात पोहोचली आणि प्रत्येक गृहिणीची पसंद बनली. अल्पावधीतच ‘उजाला’ हा एक मोठा ब्रँड बनला, आणि १९९७ मध्ये ‘उजाला’ने १०० कोटी रुपयांच्या विक्रीची यशस्वी कामगिरी केली.

    यानंतर १९९६ मध्ये डेंग्यूच्या प्रादुर्भावामुळे रामचंद्रन यांना मच्छरांपासून संरक्षण देणाऱ्या उत्पादनाची आवश्यकता भासली. त्यामुळे त्यांनी ३५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून ‘मॅक्सो’ हे उत्पादन बाजारात आणले. हे उत्पादन देखील खूप लोकप्रिय ठरलं आणि पुढे ‘मॅक्सो’ हा ३०० कोटी रुपयांचा ब्रँड बनला.

    विस्तार आणि नवा टर्निंग पॉइंट: Henkel AG & Co.ची भागीदारी

    2011 मध्ये ‘ज्योती लॅबोरेटरीज’ने एक मोठं पाऊल उचलत जर्मन FMCG (Fast-moving consumer goods) कंपनी ‘Henkel AG’च्या भारतातील व्यवसायातील ५०.९७% हिस्सेदारी ६१७ कोटी रुपयांना खरेदी केली. ही खरेदी ज्योती लॅबोरेटरीजसाठी एक महत्त्वपूर्ण टर्निंग पॉइंट ठरली, ज्यामुळे कंपनीला भारतीय FMCG उद्योगात आपलं स्थान मजबूत करण्यासाठी भक्कम आधार मिळाला.

    ‘ज्योती लॅबोरेटरीज’ने या संधीचा लाभ घेत आपल्या उत्पादनांना वाढवलं, विक्रीत चांगली वाढ साधली आणि वितरण नेटवर्क अधिक विस्तारित केलं.  या विकासामुळे कंपनीने २०१३ मध्ये १०१७.३८ कोटी रुपयांची विक्री केली आणि ८३.१४ कोटी रुपयांचा नफा कमवला आणि  त्यांची उत्पादने भारतातील 29 लाख दुकांनांमध्ये उपलब्ध झाली.

    आज, ‘ज्योती लॅबोरेटरीज’चा वार्षिक महसूल २७५७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे आणि कंपनी ३६९ कोटी रुपयांचा नफा कमावते आहे. त्यांच्याकडे २३ कारखाने असून २५ हून अधिक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. उजला सुप्रीम, मॅक्सो, एक्सो डिश वॉश, प्रिल डिश वॉश, मिस्टर व्हाईट, आणि मार्गो बॉडी सोप ही त्यांची प्रमुख उत्पादने भारतीय ग्राहकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत.

    ‘ज्योती लॅबोरेटरीज’ने आता राष्ट्रीय स्तरावर आपला व्यवसाय स्थिर केला असून . ‘उजला’ आणि ‘मॅक्सो’ यांसारखी उत्पादने संपूर्ण भारतात लोकप्रिय झाली आहेत. मोठ्या FMCG कंपन्यांशी स्पर्धा करताना ‘ज्योती लॅबोरेटरीज’ने भारतातील FMCG क्षेत्रात आपली खास ओळख निर्माण केली आहे, आणि आता P&G व HUL सारख्या दिग्गज कंपन्यांना थेट स्पर्धा देत आहे.

  • काय आहे ‘जागतिक बचत दिन’ आणि भारतात तो एक दिवस आधी का साजरा केला जातो?

    काय आहे ‘जागतिक बचत दिन’ आणि भारतात तो एक दिवस आधी का साजरा केला जातो?  

    बचत ही सर्वश्रेष्ठ सवय आहे, ज्याला ही सवय लागेल त्याची प्रगती होते. अडचणीच्या काळात आपण केलेल्या बचतीचा आपल्याला खूप फायदा होतो. बचत करणे हे प्रत्येकाच्या नियोजनात असायलाच हवे. वाढती महागाई आणि भविष्यातील अगणित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बचत ही काळाची गरज बनली आहे. घरखर्चाचे आर्थिक नियोजन असो किंवा एखाद्या देशाची अर्थव्यवस्था प्रत्येक ठिकाणी बचतीची गरज पडतेच. जर बचत केली नाही, तर उत्पन्न ढासळू शकते आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊन नुकसान होऊ शकते. बचत करण्याची गरज आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ओळखली गेली आणि तिथूनच ‘जागतिक बचत दिवसा’ची सुरुवात  झाली. वर्षभर कसले ना कसले दिवस साजरे करून आपण आपला खर्च वाढवतच असतो. या जागतिक बचत दिवसाला आपण ही काही उपाय करून बचत करण्याचा प्रयत्न करणं जमतंय का ते पाहूयात. 

    World Savings Day

    कधी आणि कुणी केली ‘जागतिक बचत दिवसा’ ची सुरुवात  ?

    या दिवसाची सुरुवात 31 ऑक्टोबर 1942 रोजी झाली. इटली मधील मिलान इथे प्रा. फिलिपो  फिलिपो रविझा यांनी पहिल्या आंतरराष्ट्रीय कॉंग्रेस बचत बँकेच्या परिषदेत या दिवसाची सुरुवात केली. तेव्हापासून हा दिवस जगभर साजरा केला जाऊ लागला. 1925 मध्ये पहिला जागतिक बचत दिवस साजरा केला गेला. त्यानंतर 1929 मध्ये स्पेन आणि अमेरिकेत प्रथम राष्ट्रीय बचत दिन साजरा केला गेला. 

    भारतात जागतिक बचत दिवस एक दिवस आधी साजरा का केला जातो ?

    जागतिक बचत आणि रिटेल बँकिंग संस्था WSBI नुसार, जागतिक बचत दिवस 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. 31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. तेव्हापासून भारतात ३० ऑक्टोबर रोजी जागतिक बचत दिवस साजरा केला जातो.

    World Savings Day: A Look at the History, Importance, and Why India Celebrates it a Day Early

    या जागतिक बचत दिवसाला पुढील उपाय वापरून करू शकता स्वत:ची बचत

    प्रत्येक महिन्याला खर्चाचे नियोजन करावे

    दर महिन्याला खर्चाचे नियोजन करून त्यानुसार पैसे खर्च करणे आवश्यक आहे. खर्चाचे नियोजन करून त्यानुसार आपला खर्च नियंत्रित ठेवावा .

    गरज पहावी आवड नाही

    खर्च करताना नेहमी गरजेला प्राधान्य द्यावे. वायफळ खर्च टाळता आला, तरच बचत करणे शक्य होईल. ज्या वस्तू गरजेच्या आहेत त्याच खरेदी कराव्यात.

    पैसा घरी ठेवू नये

    आवश्यक तो पैसा घरी ठेवून बाकीची रक्कम बँकेत ठेवणे कधीही फायदेशीर आहे. आपला पैसा शेअर बाजार, म्युच्युअल फंड, जीवन विमा किंवा आरोग्य विम्यामध्ये गुंतवल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.

    जर तुम्हाला बँकांमध्ये पैसा गुंतवायचा नसेल, त्यांच्या धोरणानुसार खाते उघडणे तुम्हाला शक्य होत नसेल, तर भारतीय पोस्ट खाते आणि सेव्हिंग्स हा तुमच्यासाठी उत्तम आणि  फायदेशीर पर्याय आहे.

    आणखी वाचा

  • भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम : ‘अतीसामान्य ते असामान्य’ प्रवासाचा यात्री यांची जयंती

    भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम : ‘अतीसामान्य ते असामान्य’ प्रवासाचा यात्री यांची जयंती

    पेपर वाटण्यापासून खडतर आयुष्याची सुरवात करणाऱ्या एका व्यक्तिवर जेव्हा जगातील लहानमोठ्या सर्व पेपर्समधे स्तुती करणारे रकानेच्या रकाने लिहुन येतात तेव्हा ‘अतिसामान्य ते असामान्य’ ह्या प्रवासाचे ते एक उदाहरण ठरते. अनेक मार्गदर्शक पुस्तकांतून आशावादी लिखाण करुन जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी व युवकांना सत्य, विकास, नीतिमत्ता व राष्ट्रनिर्माणाचा मार्ग दाखवणाऱ्या ह्या महापुरुषाचा जन्मदिन 15 ऑक्टोबर हा विश्व विद्यार्थी दिवस म्हणुन साजरा केला जातो तो ह्यासाठीच.

    एकदा डॉ.साहेब मिसाईल चाचणीत इतके रममाण झाले की, स्वतःच्या भाचीचेही लग्न विसरून गेले. कधी शाळेत जेवणाच्या पंगतीत आनंदाने लहान मुलांना वाढणे, तर कधी आपली खुर्ची इतरांपेक्षा वेगळी आहे हे आढळल्याने ‘मलाही साधीच खुर्ची द्या’ म्हणत बडेजाव टाळणे, अगदी 2012 ला देशाच्या सर्वोच्च पदाच्या निवडणुकीत ‘राष्ट्रपती पदाबाबत राजकारण होणे योग्य नसून सर्वसंमती असेल, तरच मी उभा राहील’ म्हणत राष्ट्रपतीपदावर सुद्धा पाणी सोडणे, वयाच्या 83 व्या वर्षीही युथ आयकॉन असणे किंवा राष्ट्रप्रमुख असतानाही आपल्यात एक कॉमन मॅन जपणे, असे कितीतरी पैलू आपल्याला डॉ. कलामांनी आधुनिक काळातही एका साधुप्रमाणे निर्मोही आयुष्य व्यतीत केल्याचे दाखले देतात.

    जगातील सर्वश्रेष्ठ संशोधकांपेेकी एक असूनही शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपली ओळख केवळ एक शिक्षकाची रहावी, कारण ‘शिक्षकांची राष्ट्रनिर्माणातील भूमिका अतुलनीय असते’, असे म्हणत ज्ञानदानाच्या पवित्रकार्याचा केलेला योग्य असा गौरव करणे असो, नातलग दिल्लीला आल्यावर स्वतःच्या खिशातून केलेला त्यांच्यावरचा खर्च असो किंवा कायम गरजू संस्थाना केलेले आपल्या मासिक मानधनाचे वाटप असो, ही उदाहरणे अगदी सहज सांगतात की, ह्या आदर्श व्यक्तिमत्वाची, ट्रक भरून असणारी एकमेव संपत्ती म्हणजे पुस्तके का होती. एकीकडे “स्वप्न म्हणजे ते नाही, जे तुम्हाला झोपेत पडते; स्वप्न म्हणजे ते जे तुम्हाला झोपूच देत नाही” म्हणणारे राष्ट्रसमर्पित व्यक्तिमत्त्व, तर दुसरीकडे, low aim is a crime, स्वप्ने मोठीच बघा आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा’ म्हणणारे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व.

    लेखक म्हणून डॉ. कलाम यांनी अनेक प्रेरणादायी पुस्तके लिहिली. “विंग्स ऑफ फायर” हे त्यांचं आत्मचरित्र विशेष प्रसिद्ध आहे, ज्यात त्यांच्या जीवनातील संघर्षाची आणि यशाची कहाणी आहे. “इग्नाइटेड माइंड्स”, “इंडिया २०२०” आणि “माय जर्नी” या पुस्तकांतून त्यांनी भारताच्या प्रगतीसाठी आपल्या कल्पना मांडल्या. त्यांचं स्वप्न होतं की भारत २०२० पर्यंत एक महासत्ता बनेल, आणि या उद्दिष्टासाठी त्यांनी आयुष्यभर युवकांना प्रेरणा देण्याचं कार्य अविरत केलं.

  • ‘परम’ महासंगणकाचे जनक : डॉ. विजय भटकर

    ‘परम’ महासंगणकाचे जनक : डॉ. विजय भटकर 

    प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

    डॉ. विजय भटकर यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९४६ रोजी अकोला जिल्ह्यातील मुरांबा या छोट्या गावात झाला. त्यांचं मूळ घर जनावरांचा गोठा आणि पडक्या भिंती असलेल्या जुनाट वाड्यात होतं, त्यांचं  बालपण अत्यंत साधारण परिस्थितीत गेलं, पण त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाच्या आणि शिक्षणाच्या तृष्णेमुळे त्यांनी कष्टाची आणि जिद्दीची वाट धरली. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी अनेक मोठी टप्पे गाठले. त्यांनी 1965 साली नागपूर विद्यापीठातून बी.ई. (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) ही पदवी प्राप्त केली. पुढे त्यांनी बडोद्याच्या एम.एस. विद्यापीठातून एम.ई. (कॉम्प्युटर सायन्स) ही पदवी मिळवली.

    त्यांची शिक्षणाची ऊर्मी यावर थांबली नाही. त्यांनी आय.आय.टी. दिल्लीमधून पीएच.डी. मिळवली. डॉ. भटकर यांच्या शैक्षणिक प्रवासात ते केवळ शिक्षण घेणारे विद्यार्थी नव्हते, तर नवीन विचारांची दृष्टी असलेले संशोधक होते. 

    महासंगणक क्रांती

    १९८० च्या दशकात भारताला अचूक हवामान अंदाज आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी  महासंगणकाची (SUPERCOMPUTER) गरज होती. अमेरिकेने भारताला त्यांचा ‘क्रे’ महासंगणक विकण्यास नकार दिला. अशावेळी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्वदेशी महासंगणक निर्मितीचं स्वप्न पाहिलं. सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. भटकर यांच्यावर या प्रकल्पाची जबाबदारी सोपवण्यात आली. भारताला महासंगणकाच्या तंत्रज्ञानात आत्मनिर्भर बनविणं हे या प्रकल्पाचं ध्येय होतं.

    १९८८ साली पुणे विद्यापीठात ‘सी-डॅक’ (Center for Development of Advanced Computing) या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत महासंगणक निर्मितीचं  काम सुरू झालं.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पसाठी भारत सरकारने ३७.५ कोटी रुपयांची तरतूद केली, पण विशेष म्हणजे, खूप कमी  कालावधीत आणि कमी खर्चात डॉ. भटकर आणि त्यांच्या टीमने ‘परम-८000’ महासंगणकाची निर्मिती केली. १९९१ साली ‘परम-८000 महासंगणक कार्यान्वित झाला. हा महासंगणक दर सेकंदाला 1 अब्ज गणिती क्रिया करण्यास सक्षम होता. भारतासाठी ही एक मोठी तांत्रिक प्रगती होती.

    डॉ. भटकर यांनी विकसित केलेला पहिला महासंगणक ‘परम-८०००’ केवळ सुरुवात होती. त्यानंतर ‘परम-१0000’ महासंगणकाची निर्मिती १९९८ मध्ये करण्यात आली. ‘परम-१0000’ ची क्षमता दर सेकंदाला १ लाख कोटी गणिती क्रिया करण्याची होती. या महासंगणकामुळे भारताने हवामान अंदाज, उपग्रह प्रक्षेपण, संरक्षण, अणु तंत्रज्ञान, औषधनिर्मिती, खनिज संशोधन अशा अनेक क्षेत्रात प्रचंड प्रगती केली. भारत महासंगणकाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रगण्य देशांमध्ये स्थान मिळवू लागला.

    2 03 24 18 vijay bhatkar 1 H@@IGHT 514 W@@IDTH 686 1

    संगणकीय भाषांमधील क्रांती; ‘जिस्ट’ प्रणाली

    संगणकाचा वापर केवळ इंग्रजीत भाषेतच मर्यादित राहावा असे डॉ. भटकर यांना मान्य नव्हतं. त्यांनी विविध भारतीय भाषांचा संगणक क्षेत्रात उपयोग करून घेण्याचं ध्येय ठेवलं होतं. १९८९ साली त्यांनी ‘जिस्ट’ (Graphics and Intelligence based Script Technology) ही संगणकीय प्रणाली विकसित केली. ‘जिस्ट’मुळे भारतीय भाषांमध्ये संगणकावर कार्य करणं सहज शक्य झालं. भारतीय उपखंडात संगणक वापराच्या क्षेत्रात हे एक मोठं पाऊल होतं. यामुळे इंग्रजी भाषेची मक्तेदारी संपुष्टात आली आणि संगणक क्षेत्रात भारतीय भाषांनाही स्थान मिळालं . 

    विविध संस्थांच्या उभारणीत महत्त्वाचं योगदान

    डॉ. भटकर हे एक संस्थापक-विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या संस्थांची स्थापना केली आणि त्या संस्थांच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर’, ‘टेक्नोपार्क (त्रिवेंद्रम)’, ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’, ‘महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन (MKCL)’, ‘डिशनेट’, ‘डिव्हिनेट अ‍ॅक्सेस टेक्नॉलॉजी’ अशा विविध संस्थांची स्थापना झाली. यापैकी प्रत्येक संस्था तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भरीव योगदान देत आहे. 

    पुरस्कार आणि सन्मान

    डॉ. विजय भटकर यांना त्यांच्या अभूतपूर्व कार्यासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना ‘पद्मश्री’, ‘महाराष्ट्रभूषण’, ‘एच.के. फिरोदिया पुरस्कार’, आणि ‘डेटाक्वेस्ट जीवनगौरव पुरस्कार’ यांसारखे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. तसेच, विविध विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे. 

    भारतातील आयटी उद्योगाच्या विकासात डॉ. भटकर यांचं  मोलाचं  योगदान आहे. भारत सरकारच्या अनेक वैज्ञानिक सल्लागार समित्यांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. ते ‘विज्ञानभारती’ संस्थेचे अध्यक्ष म्हणून सहा हजारांहून अधिक संशोधकांसोबत कार्यरत होते. २०१७ साली ते नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्त झाले होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सुद्धा  सन्मानित करण्यात आले  आहे. त्यांना एकूण ४०हून अधिक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालण्याच्या त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव आहे.

    डॉ. भटकर हे एक नामांकित लेखक आणि संशोधक आहेत. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ रचले आहेत, ज्यामध्ये ‘आजची ज्ञानेश्वरी’, ‘आजची मराठी भगवद्गीता’, ‘इतिहास घडविला त्यांनी’, ‘मधुराद्वैताचार्य श्रीगुलाबराव महाराजांची विज्ञानदृष्टी’, ‘नीळा झालासे पांडुरंग’, ‘तुका सर्वांगे विठ्ठल’, ‘वेध अंतिम सत्याचा’, आणि ‘विज्ञानदृष्टी’ या पुस्तकांचा समावेश आहे.

    त्यांनी आठ पुस्तके संपादित केली असून, त्यांचे ८० पेक्षा अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या शोधनिबंधांमध्ये ‘सुपर कॉम्प्यूटिंग’, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’, ‘डिस्ट्रिब्युटेड कॉम्प्युटर कन्ट्रोल’, आणि ‘व्हेरिएशनल थिअरी’ यांसारख्या संगणक विज्ञानाच्या विषयांचा समावेश आहे. 

    2 1

  • अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय मिळालं? मराठीला त्याचा काय फायदा? जाणून घ्या सर्वकाही…

    अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय मिळालं? मराठीला त्याचा काय फायदा? जाणून घ्या सर्वकाही…

    या लेखात आपण अभिजात भाषा म्हणजे काय, ती कशी निवडली जाते आणि मराठी भाषेला याचा कसा फायदा होईल याची  माहिती जाणून घेऊया…

    अभिजात भाषा म्हणजे काय?

    एखादी भाषा अभिजात म्हणून घोषित केली जाते तेव्हा ती भाषा केवळ प्राचीन आणि समृद्धच नाही, तर त्या भाषेचा साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रभाव देखील खूप मोठा असतो. भारतीय संविधानानुसार  अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्या भाषेला विशेष मान्यता दिली जाते, ज्यामुळे त्या भाषेच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक आणि शैक्षणिक सहाय्य दिलं जातं. 

    अभिजात भाषा हा दर्जा मिळण्यासाठी निकष काय?

    • संबंधित भाषेचं अस्तित्व कमीत कमी दीड ते अडीच हजार वर्षांपूर्वीचं असावं.
    • भाषेत प्राचीन काळापासून समृद्ध साहित्य असावं, ज्यामुळे भाषेची सांस्कृतिक आणि साहित्यिक महानता दिसून येते.
    • भाषेचं स्वत:चं स्वायत्त अस्तित्व असावं, म्हणजेच ती भाषा इतर भाषांच्या प्रभावाखाली येऊन संपुष्टात आलेली नसावी.
    • भाषेच्या प्राचीन आणि आधुनिक रूपामध्ये एक गाभ्याचं एकसारखं स्वरूप टिकून असावं.

    अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मराठी भाषेच्या प्रवासाचा इतिहास

    मराठी भाषेच्या अभिजात भाषेच्या दर्जासाठी गेल्या काही दशकांपासून जोरदार चळवळ सुरू होती. मराठी साहित्यिक आणि अभ्यासकांनी सतत या मागणीसाठी आवाज उठवला. महाराष्ट्र शासनाने २०१३ साली ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करायला सुरुवात केली आणि त्याच काळात अभिजात दर्जासाठी प्रयत्न अधिक जोर धरू लागले.

    राज्य सरकारने या मागणीच्या पुढील टप्प्यात रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली होती. या समितीने मराठी भाषेच्या समृद्ध साहित्यिक परंपरेचा आणि तिच्या ऐतिहासिक महत्त्वाचा सखोल अभ्यास करून सादर केलेला ५०० पानांचा अहवाल केंद्र सरकारला सुपूर्द केला होता. या अहवालात मराठी भाषेच्या अभिजात भाषेच्या निकषांची पूर्तता होत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. अखेर, केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल करून महाराष्ट्रातील भाषाप्रेमींना आनंदाची मोठी बातमी दिली.

    WhatsApp Image 2024 01 20 at 5.09.22 PM 730x350 1

    अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे फायदे:

    १) भाषेच्या संशोधनाला चालना

    मराठी भाषेच्या अभिजात दर्जामुळे भाषातज्ज्ञ आणि साहित्यिकांना अधिक संशोधनासाठी प्रोत्साहन मिळेल. विशेषतः मराठी भाषेतील विविध बोली आणि त्यांच्या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान मिळेल. प्राचीन मराठी ग्रंथ, साहित्य आणि काव्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी संशोधन संस्थांना मदत मिळेल.

    २) साहित्य आणि विद्वानांसाठी पुरस्कार

    अभिजात भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. मराठी भाषेला हा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेतील साहित्यिक, कवी, आणि भाषातज्ज्ञांना या पुरस्कारासाठी पात्रता मिळेल. यामुळे मराठी साहित्यिकांना अधिक प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळेल.

    ३) विद्यापीठांमध्ये विशेष अभ्यास केंद्रे

    अभिजात भाषांना दिलेल्या दर्जामुळे विविध विद्यापीठांमध्ये त्या भाषेच्या अभ्यासासाठी विशेष केंद्र उभारली जातात. आता मराठी भाषेसाठीही देशभरातील विद्यापीठांमध्ये अभ्यास केंद्रे स्थापन केली जातील. या केंद्रांमध्ये मराठी भाषेचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची माहिती देण्यासाठी  विशेष अभ्यासक्रम तयार केले जातील.

    ४)  ग्रंथालयांचा विकास

    राज्यातील १२ हजारांहून अधिक ग्रंथालयांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वा ठरला आहे. अभिजात भाषेच्या ग्रंथालयांसाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळत असतं, त्यामुळे मराठीतील प्राचीन ग्रंथांचे जतन, अनुवाद आणि पुनरुत्थान होणार आहे. मराठी भाषेतील साहित्यावर विशेष ग्रंथालये स्थापन केली जाऊ शकतात.

    ५) अनुवाद आणि जागतिक स्तरावर प्रसिद्धी

    मराठी भाषेतील प्राचीन आणि महत्त्वपूर्ण साहित्य आता अन्य भारतीय तसेच जागतिक भाषांमध्ये अनुवाद करण्याची प्रक्रिया वेगवान होणार आहे. यामुळे मराठी साहित्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रसिद्धी मिळेल आणि त्याचे महत्त्व जागतिक स्तरावर पोहोचेल.

    ६)  केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान

    अभिजात भाषेला मिळणारे अनुदान हे भाषेच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. केंद्र सरकारकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो, जो भाषेच्या संवर्धनासाठी, साहित्य प्रकाशनासाठी आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी वापरला जातो. या निधीतून विविध मराठी साहित्यिक उपक्रम राबवले जाऊ शकतात, ज्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसाराला गती मिळेल.

    marathi

    ७)  प्राचीन आणि आधुनिक मराठीचा अभ्यास

    मराठी भाषेच्या प्राचीन आणि आधुनिक रूपांचा सखोल अभ्यास करण्यासाठी आता अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. भाषातज्ज्ञांना भाषा विकासाचा आणि बदलाचा अभ्यास करता येईल, ज्यामुळे मराठी भाषेतील विविध पैलूंवर अधिक प्रकाश पडेल.

    मराठीसह भारतात इतर काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या भाषांमध्ये तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम या भाषांचा समावेश आहे. या भाषांना अभिजात दर्जा मिळाल्यानंतर त्यांचा विकास आणि संरक्षण अधिक गतीने झाला आहे. केंद्र सरकारकडून या भाषांच्या संवर्धनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो, ज्यामुळे त्या भाषांचे प्राचीन साहित्य जतन होण्यास मदत झाली आहे. त्याचप्रमाणे, मराठी भाषेलाही आता या मार्गावर चालण्याची संधी मिळाली आहे.

    मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने तिच्या भविष्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. मराठी भाषेच्या साहित्य, कला, आणि संस्कृतीचे संवर्धन होण्यासाठी आता अधिक साधनसंपत्ती उपलब्ध होणार आहे. मराठी भाषा ही फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशाच्या इतर भागांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली ओळख निर्माण करू शकते.

  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेची केली सुरुवात

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेची केली सुरुवात 

    योजनेच्या अटी

    ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेअंतर्गत १८ वर्षांपर्यंतची सर्व मुले पात्र आहेत. खाते केवळ मुलांच्या नावाने उघडता येईल, परंतु गुंतवणुकीची जबाबदारी पालकांची असेल. यामुळे पालकांना त्यांच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. जवळपास सर्व बँका, पोस्ट ऑफिस आणि पेन्शन फंडांमध्ये पॉइंट ऑफ प्रेझेन्सद्वारे या खात्याचे उघडणे शक्य आहे. ई-एनपीएस प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होईल.

    गुंतवणूक रक्कम

    या खात्याचे उघडणे कमीत कमी १००० रुपयांनी शक्य आहे आणि गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. त्यामुळे पालकांना त्यांच्या आवडीनुसार आणि आर्थिक क्षमतेनुसार अधिक रक्कम गुंतवण्याची मुभा मिळते. खात्यात जमा केलेल्या पैशावर चक्रवाढ व्याज मिळेल, ज्यामुळे योजनेचा आर्थिक लाभ वाढतो.

    रक्कम काढणे

    या योजनेमध्ये तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीनंतर, २५ टक्के रक्कम विशेष परिस्थितीत, जसे की शिक्षण, आजार किंवा अपंगत्व यासाठी काढता येईल. हे पालक आणि मुलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, कारण यामुळे आर्थिक संकटांच्या काळात आवश्यक रक्कम उपलब्ध होऊ शकते.

    रक्कम काढण्याची मर्यादा

    मुलाचे वय १८ वर्षांचे होईपर्यंत, जास्तीत जास्त तीन वेळा यातील रक्कम काढता येईल. १८ वर्षांपर्यंत मूल या योजनेतून बाहेर पडता येणार नाही, ज्यामुळे बचतीचा एक स्थिर प्लॅन तयार केला जातो आणि मुलांचे भविष्य सुरक्षित राहते.

    आणखी वाचा