आजच्याच दिवशी १९४९ साली पहिले भारतीय लष्करप्रमुख म्हणून जनरल के. एम. करिअप्पा यांनी सूत्रं हाती घेतली होती.
भारतीय लष्कराच्या सार्मथ्याचा दिवस म्हणजे लष्कर दिन. त्या दिवशी आपली तिन्ही दले त्यांचे शक्तिसार्मथ्य दाखवतात. त्याचप्रमाणे युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करतात. भारताच्या सर्व सीमा सुरक्षित ठेवणार्या लष्कराचा हा दिवस दर वर्षी १५ जानेवारी रोजी साजरा केला जातो..
एक ऐतिहासिक दिवस म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ – स्वातंत्र्यलढय़ात यशस्वी होऊन भारत स्वतंत्र झाला. भारत सरकारच्या विनंतीवरून ब्रिटिश लष्करातील काही उच्च अधिकारी आपल्या लष्करात काही वर्षे आणखी राहण्यास तयार झाले. फिल्डमार्शल क्लोड औकीनलेक यांची सर्वोच्च सेनापती म्हणून नियुक्ती झाली; तर जनरल सर रोब लोकहार्ट कमांडर इन चीफ बनले. १ जानेवारी १९४८ रोजी जनरल सर रॉबर्ट रॉय बुचर यांनी कमांडर इन चीफ म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांचा कार्यकाल एका वर्षानंतर समाप्त व्हायची वेळ जेव्हा आली, तेव्हा भारत सरकारने हा निर्णय घेतला, की आता भारतीय सेनेचा मुख्य – कमांडर इन चीफ भारतीयच असेल..
लष्कर दिन म्हणजे आपला देश आणि त्यातील लोकांच्या रक्षणार्थ आपले जीवन सर्मपित करणार्या वीर सैनिकांना एक खर्या अर्थाने वाहिलेली श्रद्धांजली आहे. नवी दिल्ली येथील इंडिया गेटवरील अमर जवान ज्योतीजवळ शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहून समारंभास सुरुवात होते. लष्कराची तांत्रिक प्रगती आणि भारतीय लष्कराकडे उपलब्ध असलेली शस्त्रसामग्री, वाहने – हत्यारे, हेलिकॉप्टरची कर्तबगारी आणि शत्रूवर हल्ल्याची प्रात्यक्षिक दृश्ये, तसेच सैनिकी कवायत दर वर्षी दिल्ली छावणी येथील आर्मी परेड मैदानावर आयोजित केली जाते. प्रजासत्ताक दिनी होत असलेल्या सैन्याच्या कवायतीची ही रंगीत तालीमच मानली जाते..
जानेवारीच्या कडक थंडीमध्येसुद्धा जवानांचा आणि प्रेक्षकांचा उत्साह वाखाणण्यासारखा असतो. सेना पदके, शौर्य पुरस्कार आणि विविध गटांना त्यांच्या कार्याकरिता प्रशस्तिपत्रके सेनाप्रमुखांकडून दिली जातात. प्रशस्तिपत्रके आणि शौर्य पदके मिळवणार्या सैनिकांकरिता हा दिवस खास असतो. कारण, प्रत्यक्ष सेनाप्रमुखांकडून त्यांचा गौरव केला जातो. लष्कराच्या ज्या तुकड्या यात भाग घेतात, त्यांना महिनाभराच्या कठोर मेहनतीनंतर हा गौरव प्राप्त होतो..
फौजी बँडच्या तालावर सैनिकांच्या तुकड्या शिस्तशीरपणे आगेकूच करीत जातात, ते दृश्य पाहण्यासारखे असते. जमीन आणि आकाशात आपल्या दुर्दम्य साहसाचा परिचय करून देणारा भारतीय लष्कराचा शो प्रत्यक्ष पाहणे हासुद्धा एक रोमांचकारी अनुभव असतो. जय हिंदच्या जयघोषाने आसमंत निनादून टाकत कार्यक्रमाची सांगता होते. देशात अन्यत्रही लष्कराच्या प्रमुख ठिकाणी १५ जानेवारीला लष्करी कवायतीचे आयोजन केले जाते. आपल्या देशातील जनतेला सेनेची तयारी आणि उत्साह पाहण्याची चांगली संधी यामुळे मिळते. तसेच युवकांना यामुळे देशाकरिता काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते..
भारतीय लष्कर जगातील सशक्त आणि मजबूत सैन्यापैकी एक आहे. भारतीय लष्कर आपल्या निडर आणि साहसी वृत्तीसाठी प्रसिद्ध आहे. इतिहासात भारतीय सेना म्हणजे एक गौरवास्पद शौर्यगाथाच आहे. सेना राजकारणापासून दूर असते आणि फक्त अंतर्गत व बाह्य धोक्यांपासून आपले रक्षण करते. भारतीय सेनेचा प्रत्येक भारतीयाला गर्व वाटतो. जेव्हा जेव्हा भारतीय सीमेवर आक्रमणे झाली, तेव्हा तेव्हा भारतीय सेनेने अतिशय उत्साही प्रतिकार करून देशाला यशस्वी केले आहे. खरं तर या प्रकारच्या सर्मपित आणि शिस्तशीर सैनिकांचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे आणि अशा लष्कराचा एक भाग बनून देशाची सेवा करायला मिळाली, तर तो आमचा सर्वोच्च सन्मान ठरला पाहिजे.
तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला हे कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. लेख आवडला असेल तर लाइक आणि subscribe जरूर करा आणि हो अजून कोणत्या विषयाची माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.
ह्या थोर मातेस विनम्र अभिवादन… अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या राजमाता म्हणजे जिजाऊ. विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सुत्रात गुंफून स्वराज्याचे जनआंदोलन उभं करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे ! त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य, शौर्य, प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि गरीबांप्रती प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले आहे.
राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा (जि. बु लढाणा) येथे इतिहास प्रसिद्ध यादव घराण्यातील लखूजीराजे जाधव म्हाळसाराणी या राजघराण्यात झाला. लखुजीराजेंनी आपल्या मुलांबरोबरच मुलीला म्हणजेच जिजाऊला देखील राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. जिजाऊंनी राजघराण्याचा वृथा अभिमान न बाळगता युद्धकला राजनीती यामध्ये प्राविण्य मिळवले. आजच्या मुलींमध्ये प्रचंड नैराश्य, न्युनगंड किंवा असुरक्षतेची भावना प्रामुख्याने जाणवते. जिजाऊंनी आत्मविश्वासाने युद्धकलेत नैपुण्य मिळवले याचा उपयोग पुढे शिवरायांना युद्धकला आणि राजनीतीचे शिक्षण देण्यासाठी झाला.
आजची स्त्री चुल आणि मुल या परिघाबाहेर पडायला तयार नाही किंबहुना तिने त्यातच सौख्य मानावे अशी समाज व्यवस्था आजदेखील आहे. पण जिजाऊंनी विवाहानंतर स्वराज्यसंकल्पनेला अखंड स्वरूप प्राप्त करून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. शहाजीराजे-जिजाऊमाता यांनी मोठ्या उदात्त आणि व्यापकपणे रयतेच्या स्थैर्यासाठी स्वराज्य स्थापण्याचा निर्णय घेतला.केवळ आपली जहागिरी किंवा वतन याचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे ही भुमिका शहाजीराजे-जिजाऊंची होती.
शहाजीराजांच्या कार्यात जिजाऊमाता अत्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. अदिलशहा, निजाम, मुघल असे बलाढ्य विरोधात असताना मोठ्या निर्भिडपणे जिजाऊमाता शहाजीमहाराजांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आल्या. आजची स्त्री माझी मुले, माझे घर, माझे सगेसोयरे आणि कौटुंबिक कार्यक्रम या पलीकडे विचार करताना दिसत नाही. जिजाऊमातेनं स्वत:च्या जाधव-भोसले कुटूंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार केला. त्यामुळे तानाजी, येसाजी, कान्होजी, शिवाजी, बाजी पालसकर, मुरारबाजी, बहिर्जी, कावजी, नेताजी इ.सर्व जाती धर्मातील सरदार व मावळे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करण्यासाठी पुढे आले. म्हणजे जिजाऊमातेनं आपले मातृप्रेम शिवरायांप्रमाणेच सर्व मावळ्यांवर केले.त्यामुळे जिजाऊ स्वराज्यमाता आहेत.
पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला. एकदा एक हत्ती पिसळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाईचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले. हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला. या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले. नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता.
स्वराज्यावर अनेक संकट आली. अफजलखान, दिलेरखान, शाहिस्तेखान, सिद्धी जौहर या प्रसंगी जिजाऊ शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. संकटसमयी जिजाऊ लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या. शिवरायांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य जिजाऊंनी केले. शिवरायांचे मोठेपणाचे श्रेय जिजाऊंना जाते. कारण शिवरायांना जिजाऊंनी बालपणापासून तलवार घ्या, घोड्यावर बसा, गडकोट-किल्ले पायदळी घाला, शत्रूचाचा नि:पात करा, तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे, मी तुमच्या पाठीशी आहे असे सांगितले. आजची आई मुलांना तू कोणाच्या भानगडीत पडू नकोस, आपल्याला काय करायचेय, असे सांगते. आजची आई आत्मकेंद्री बनत चालली आहे. जिजाऊंनी मात्र उपेक्षित, वंचित, शोषित जनतेचा प्राधान्याने विचार केला. आज देखील शिवरायांसारखे पराक्रमी,मानवतावादी नेते उदयाला येतील पण त्याअगोदर जिजाऊंसारखी माता घरोघरी निर्माण झाली पाहिजे.
राजमाता जिजाऊ संकटसमयी डगमगल्या नाहीत, शिवरायांना यश मिळावे यासाठी यज्ञ, तप, शांती, उपवास करीत बसल्या नाहीत. यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते, चातुर्य पणाला लावावे लागते, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. यावर जिजाऊंचा दृढ विश्वास होता. जिजाऊ प्रयत्नवादी होत्या. शिवरायांवर चालून आलेल्या शत्रूचा नायनाट करण्यासाठी जिजाऊंनी मार्गदर्शन केले. अशा प्रसंगी जिजाऊ जपमाळ ओढत नामस्मरण करत बसल्या नाहीत. जिजाऊ दैववादी नव्हे तर प्रयत्नवादी होत्या. त्यामुळे संकटसमयी त्या हताश-निराश झाल्या नाहीत. आजची स्त्री मुलाचा गुणवत्ता यादीत क्रमांक यावा, नोकरी मिळावी, पदोन्नती मिळावी, निवडणूक जिंकावी यासाठी यज्ञ, होमहवन, तीर्थयात्रा, उपवास, नामस्मरण करताना दिसते. जिजाऊंचा प्रयत्नवाद स्रियांनी आत्मसात केला पाहिजे.
जिजाऊमाता पन्हाळ्याच्या दिशेने निघाल्या त्यावेळेस नेताजी पालकरांनी जिजाऊंना साकडे घातले. आम्ही जिवंत असेपर्यंत आपण तसदी न घ्यावी, म्हणजे जिजाऊ वेळप्रसंगी हाती तलवार घेऊन लढणाऱ्या होत्या. आज स्त्रियांवर अनेक ठिकाणी अत्याचार होतात त्याप्रसंगी स्त्री स्वत:चे संरक्षण करू शकत नाही. जिजाऊंमध्ये असणाऱ्या धैर्याचे-शौर्याचे अनुकरण स्त्रियांनी करावे.
जिजाऊमातांनी संभाजीराजेंना राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. पुत्राप्रमाणे नातवावर उत्तम संस्कार करणारी जिजाऊमाता म्हणजे स्वराज्याचे खरे विद्यापीठ आहे. शिवाजीराजे – संभाजीराजे मावळे यांच्या मध्ये असणारी उच्चकोटीची नैतिकता जिजाऊंच्या संस्कारातून आलेली आहे. विखुरलेला मराठा समाज एक करावा म्हणून शहाजी राजे-जिजाऊंनी शिवरायांचे आठ विवाह केले.त्या आठही महाराण्यांचा जिजाऊंनी सन्मान केला. सासू-सुन हे नातं संघर्षाचे नव्हे तर अत्यंत जिव्हाळ्याचं, विकासाचं, प्रेमाचं नातं आहे हे जिजाऊंनी दाखवून दिले.जिजाऊंचा हा आदर्श आजच्या महिलांनी अंगिकारावा.
शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्राकैदेत होते, तेव्हा महाराष्ट्रातील इंचभर भूमी देखील मिर्झाराजा जयसिंगला जिंकता आली नाही. कारण त्यावेळेस स्वराज्याची सुत्रे जिजाऊमातांच्या हाती होती. म्हणजे जिजाऊंची जरब कशाप्रकारे होती हे यावरून स्पष्ट होते. शहाजीराजांचा म्रुत्यू झाला त्याप्रसंगी जिजाऊ सती गेल्या नाहीत,म्हणजे जाधव – भोसले घराण्यात सतीप्रथा तर नव्हतीच पण जिजाऊमाता देखील सतीप्रथेच्या विरोधात होत्या. आज २१ व्या शतकात जिजाऊमातेच्या पुरोगामी विचारांची गरज आहे. शिवरायांना न्यायनिवाडा करण्याचे धडे जिजाऊमातेने दिले. गावागावांतील तंटे-बखेडे जिजाऊंनी मिटवले.
शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला तेव्हा ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला. या प्रसंगी जिजाऊंची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जिजाऊ – शिवराय जर ग्रंथप्रामाण्य मानणारे असते तर त्यांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला नसता. जिजाऊमाता बुद्धिप्रामाण्यवादी होत्या त्यामुळेच त्यांनी वैदिकांचा विरोध झुगारून राज्याभिषेक करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला. आज अनेक कठीण प्रसंग येतात त्याप्रसंगी स्त्री-पुरुष हतबल होतात. असे प्रसंग जिजाऊंच्या जीवनात देखील आले होते पण जिजाऊ हतबल, निराश झाल्या नाहीत त्यांनी मोठ्या हिंमतीने संकटावर मात करून स्वराज्य निर्माण केले. जिजाऊंची हिम्मत आजच्या महिलांमध्ये यावी, हीच जिजाऊ चरणी प्रार्थना…
विशेष लेख – असा खेळाडू पुन्हा होणे नाही – छत्तीसगढ सरकार आणि युनिसेफ यांच्या मदतीने गावात उघडय़ावर शौच करण्यावर पूर्णपणे प्रतिबंध आणणाऱ्या आणि प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या तीस मुलांचं विशेष कौतुक करण्यासाठी मागच्या वर्षीच्या मे महिन्यात काही क्रिकेटपटू छत्तीसगढमध्ये गेले होते. इमरान ताहिर, जेपी डुमिनी, मयंक अग्रवाल, ऋषभ पंत आणि समालोचक इयान बिशप यांच्यासोबत आणखी एक धुरंधर त्यांच्यासोबत होता. दूर गावातील या चिमुरडय़ांना मात्र आपण नेमकं कोणाशी संवाद साधतोय याची पुसटशीदेखील कल्पना नव्हती. त्यामुळे संवादादरम्यान एक मुलीने भारतीय क्रिकेट संघाची ‘द वॉल’ म्हणून ओळख असलेल्या व्यक्तीला त्याचं नाव विचारलं आणि तेथे उपस्थित सर्वासोबत तोही मनसोक्तपणे हसू लागला. त्यानंतर दबक्या आवाजात त्याने मुलांना नाव सांगितलं, ‘मी राहुल द्रविड. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार.’
साधेपणा चोरीला गेल्याचे किंवा हरवल्याचे आजकालचे दिवस आहेत. एखाद्या सामान्य व्यक्तीने साधेपणाने वागण्यात कुणालाच फारसं नवल वाटत नसतं. पण सर्व सुखं ज्यांच्या पायाशी लोळण घेत असतात आणि समाज ज्यांना आदर्श मानतो अशा एखाद्या व्यक्तीचा साधेपणा समोर आला तर मात्र त्याची चांगलीच चर्चा होते.
बॉलीवूड आणि क्रिकेटवर तर भारतीयांचं विशेष प्रेम. अमाप प्रसिद्धी आणि पैसा यामुळे या दोन क्षेत्रांत वावरणारी मंडळी कायम ढगातच असतात. असं असलं तरी त्याला काही अपवाद जरूर आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे राहुल द्रविड. भारत सरकारद्वारे दिले जाणारे ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’ या सर्वोच्च नागरी सन्मानांनी त्याला गौरवण्यात आलंय. आपल्या सोळा वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत तंत्रशुद्ध आणि संयमी खेळीने आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या द्रविडच्या नावावर कसोटीत तेरा हजारांहून जास्त तर एकदिवसीय सामन्यांमध्ये दहा हजारांहून जास्त धावा जमा आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार, उपकर्णधारपद त्याने सांभाळलेलं आहे. पण भारतीय क्रिकेट संघात असतानाही सामन्याची स्थिती, निकाल काहीही असो त्याने आपला संयम केव्हाही सुटू दिला नाही. टीव्हीच्या पडद्यावर जसा साधासरळ तो सर्वाना दिसला तसाच तो आपल्या खासगी आयुष्यातही वागत आलाय. असा हा जंटलमन काही दिवसांपूर्वी आपल्या मुलांसमवेत विज्ञान प्रदर्शनात रांगेत उभा असलेला पाहायला मिळाला. चेहऱ्यावर कुठलाही आविर्भाव नाही किंवा आजूबाजूला सुरक्षारक्षकांचा गोतावळा नाही. एखाद्या सामान्य पालकांप्रमाणे तो रांगेत उभा असल्याचा फोटो एका खासगी ट्विटर हॅण्डलवरून शेअर करण्यात आला आणि वाऱ्यासारखा पसरला. पुन्हा एकदा द्रविडच्या साधेपणाच्या किश्शांनी इंटरनेटच्या वॉल भरल्या. अनेकांनी केवळ हात जोडले तर काहींनी खासगी अनुभव, त्यांच्याकडे असलेले फोटो शेअर करत द्रविडच्या साधेपणाला सलाम ठोकला.
वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी दूरवरून आलेल्या आपल्या चाहत्यांना भेटणारा, विमानाच्या इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करणारा, समोरच्या व्यक्तीशी हस्तांदोलन करताना आपलं नाव सांगणारा, बंगळूरु विश्वविद्यालयातर्फे दिली जाणारी मानद डॉक्टरेट प्रांजळपणे नाकारून माझ्या मेहनतीवर ती मिळवीन असं म्हणणारा, अंथरुणाला खिळलेल्या आपल्या चाहत्याला व्यग्र कार्यक्रमामुळे भेटू न शकलेला पण नंतर स्काइपद्वारे संवाद साधणारा, अंध क्रिकेटपटूंकडून मलाच अनेक गोष्टी शिकायला हव्यात अशी कबुली देणारा, पॅराऑलिम्पियन खेळाडूंचा मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या द्रविडचे असे अनेक किस्से यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चिले गेले.
प्रतिमा तयार करणे आणि ती विकून पैसा कमवणे हादेखील आज एक व्यवसाय झाला आहे. आपण जे नाही ते नाटय़मय प्रसंगामधून सतत लोकांसमोर मांडून सहानुभूती मिळविणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला आहेत. एखाद्या क्षेत्रात प्रसिद्धीच्या शिखरावर असताना आणि तिथून पायउतार झाल्यावरही चर्चेत राहण्याचा अनेकांचा आटापिटा सुरू असतो. पण या सगळ्या गोष्टींना अपवाद ठरणाऱ्यांमध्ये राहुल द्रविड हे नाव कायमच आदराने घेतलं जात होतं आणि यापुढेही घेतलं जाईल. संयम आणि साधेपणाचं हे मूर्तिमंत उदाहरण कायम असेच सुखद धक्के देत राहो हीच आशा.
viva@expressindia.com
(हा मूळ लेख १ डिसेंबर २०१७ रोजी लोकसत्ताच्या व्हिवा पुरवणीमध्ये प्रकाशित झाला होता)
तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला हे कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. लेख आवडला असेल तर लाइक आणि subscribe जरूर करा आणि हो अजून कोणत्या विषयाची माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.
वि. स. खांडेकर यांचा जन्म ११ जानेवारी १८८९ साली महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये झाला. विष्णू खांडेकर हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार, एक लोकप्रिय साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले.
वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला. त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंत:करणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. ललित भाषा रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख आणि तेजस्वी. लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यांचा लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि धेयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात, म्हणूनच तर वि.स.खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात.
कुमार वयापासूनच त्यांच्यावर उत्तम साहित्याचे संस्कार होत होते, ते त्यांच्या मराठीच्या शिक्षकांमुळे आणि बालकवी, राम गणेश गडकरी, अच्युतराव कोल्हटकर यांसारख्या साहित्यिकांशी झालेल्या परिचयामुळे. गडकरींमुळे पाश्र्चात्त्य साहित्य वाचण्याचा छंदही त्यांना तेव्हा लागला होता. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी खांडेकरांना विनोद चांगला साधतो व काव्यात्म प्रकृतीचे लेखनही ते करू शकतात, तेव्हा या दोहोंचे मिश्रण असलेल्या गोष्टी त्यांनी लिहाव्यात असे सुचवले; तेव्हा खांडेकर यांना स्वत:त लपून बसलेला कथाकार सापडला. ते उत्कृष्ट वक्ते म्हणूनही महाराष्ट्रात प्रसिद्ध होते.
एक कादंबरीकार म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच त्यांना महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही अफाट लोकप्रियता मिळाली. १९३० मध्ये ‘हृदयाची हाक’ ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. त्यानंतर एकापाठोपाठ एक कांचनमृग, दोन ध्रुव, हिरवा चाफा, दोन मने, रिकामा देव्हारा, पहिले प्रेम अशा त्यांच्या अनेक कादंबर्या प्रकाशित झाल्या. सुमारे ३५ कथासंग्रह, १० लघुनिबंध संग्रह, गोफ आणि गोफण यांसारखे समीक्षालेख संग्रह असे झंझावाती लेखन त्यांनी केले. छाया, ज्वाला, अमृत, देवता, माझं बाळ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या कथाही त्यांनी लिहिल्या. शब्दप्रभुत्व, कोटीबाजपणा, कल्पनावैभव यांचा वारसा त्यांनी कोल्हटकर-गडकरी यांच्याकडून घेतला. मध्यमवर्गीय माणसांच्या आशा-आकांक्षा, सर्वसामान्यांची सुख दु:खे, त्यांचा आदर्शवाद त्यांनी मुख्यत्वे आपल्या कथा-कादंबर्यांतून मांडला. त्यांचा नायक हा सामाजिकतेचे भान असलेला, आदर्शाची ओढ असलेला असे.
हळूहळू बदलत चाललेल्या सामाजिक परिस्थितीत या प्रकारचा आदर्शवाद ही मध्यमवर्गीय तरुण पिढीची मानसिक गरज होती. त्यामुळे खांडेकर त्या काळातले सर्वांत लोकप्रिय लेखक ठरले. त्यांची क्रौंचवध ही कादंबरीही लोकप्रिय ठरली. ययाती, अमृतवेल या स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वांत जास्त गाजलेल्या त्यांच्या कादंबर्या होत. ‘ययाती’ला १९६० चा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला.
भारत सरकारने १९६८ मध्ये पद्मभूषण सन्मान देऊन त्यांना गौरवले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहला केली. तर भारतीय ज्ञानपीठातर्फे १९७४ मध्ये त्यांना ‘ज्ञानपीठ’ या अत्युच्च मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या कथा-कादंबर्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दुरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय भाषांत व विदेशी भाषांतही अनुवाद झाले.
‘रूपककथा’ ही खांडेकरांनी मराठी कथेला दिलेली देणगी होय. आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी त्यांनी या कथांतून केली. वेचलेली फुले या संग्रहात या रूपककथा आहेत. अक्षरश: चकित व्हायला व्हावे एवढे विविध प्रकारचे, विपुल आणि तरीही दर्जेदार असे लेखन करून खांडेकरांनी मातृभाषेची सेवा केली आहे, आणि त्यायोगे मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून त्यांनी मराठी रसिकांत व साहित्यिकांमध्ये चैतन्य आणि आत्मविश्र्वास निर्माण केला.
तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला हे कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. लेख आवडला असेल तर लाइक आणि subscribe जरूर करा आणि हो अजून कोणत्या विषयाची माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.
स्टीफन हॉकिंग यांचा जन्म इंग्लंड येथील ऑक्सफर्ड येथे ८ जानेवारी १९४२ रोजी झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग हे जीवशास्त्राचे संशोधक होते. तर त्यांची आई वैद्यकीय संशोधन सचिव होती. त्यामुळे संशोधनाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. ऑक्सफर्ड विद्यापीठातून भौतिकशास्त्रात अव्वल क्रमांक पटकावल्यानंतर ते केंब्रिजमध्ये पीएचडीसाठी गेले. विश्वाची निर्मिती कशी झाली, आकाशातील कृष्णविवरे नेमकी कशी तयार होतात, अशा अनेक गूढ न उकललेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.
‘मोटार न्यूरॉनडिसीज’ने त्यांना ग्रासले होते. गेली अनेक वर्ष त्या आजाराशी झगडत होते. त्यांची ही जिद्द आणि प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असाच होता. भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल, यासाठी त्यांनी लिखाण केले. हॉकिंग यांना आधुनिक काळातील न्यूटन असे म्हटले जायचे. वयाच्या ३५ व्या वर्षी हॉकिंग केंब्रिज विद्यापीठात ल्यूकॅशियन प्रोफेसर झाले. केंब्रिज विद्यापीठात हे पद महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेच मानले जाते. न्यूटन देखील ल्यूकॅशियन प्रोफेसरच होते.
स्टीफन हॉकिंग आपल्या ग्रॅजुएशनच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होते. त्यावेळी आइस स्केटिंग करताना ते अचानक पडले. गंभीर जखमी झालेल्या हॉकिंग यांना Amyotrophic Lateral Sclerosis (ALS) न्युरॉन कमी करणारा आजार झाला होता. हा कधीच बरा नाही होणारा आजार असून येत्या 1 ते 1.5 वर्षांत स्टीफन यांचा मृत्यू होणार अशी भविष्यवाणी डॉक्टरांनी केली होती. पण, या भविष्यावाणीनंतर त्यांनी मृत्यूला पछाडले आणि पुढचे 42 वर्षे जगले.
स्टीफन हॉकिंग यांनी आपल्या हयातीत अनेक संशोधन आणि सिद्धांत मांडले. व्हीलचेअरवर बांधले गेले तेव्हा त्यांचे हात पाय आणि शरीराने काम करणे बंद केले. शरीराने काम करणे बंद केले पण जीनियस डोक्यातील विचार कधीच थांबले नाहीत. शरीर निष्क्रीय झाल्यानंतर आपले डोके आणखी सक्रीय झाले असे ते म्हणाले होते. हात, पाय आणि शरीराने जी ऊर्जा वाचवली ती समस्त ऊर्जा बुद्धीने वापरली आणि एकानंतर एक सिद्धांत त्यांनी जगासमोर मांडले.
हॉकिंग्ज एनर्जी, हॉकिंग्ज रेडिएशन यांसह अनेक शोधांसाठी ते प्रसिद्ध आहेत. हॉकिंग्ज यांची ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम, ब्लॅक होल अॅन्ड बेबी युनिवर्सेस अन्ड इदर एसेज, द युनिवर्स इन नटशेल, ऑन द शोल्डर्स ऑफ जायंटस यांसारखी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. भौतिकशास्त्रातले जगातील अत्यंत मानाचे व मोठे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला हे कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. लेख आवडला असेल तर लाइक आणि subscribe जरूर करा आणि हो अजून कोणत्या विषयाची माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.
भारत फोर्ज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष श्री. कल्याणी यांनी भारत फोर्जची सूत्रे हाती घेतल्यानंतर नवनव्या कल्पनांना मूर्त रूप देत कंपनीला यशोशिखरावर नेले. श्री. कल्याणी यांची ओळख प्रथितयश उद्योगपती एवढीच नाही तर अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे अध्वर्यू व आधारस्तंभ अशी आहे. यंत्रांनाच देव मानून सतत कार्यशील राहिलेल्या या व्यक्तिमत्त्वाविषयी…
नवनिर्मितीचा ध्यास आणि नवनव्या आव्हानांना सामोरे जाण्याची चिकाटी याच्या जोरावर “भारत फोर्ज‘ या वाहनांच्या सुट्या भागाचे उत्पादन घेणाऱ्या कंपनीने जागतिक स्तरावर वर्चस्व निर्माण केले. त्याचे प्रणेते आहेत अर्थातच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष बाबा कल्याणी. कारखाना म्हणजे देवालय, मशिन म्हणजे देव आणि उत्पादन म्हणजे देवाची भक्ती अशी त्यांची श्रद्धा आहे. या श्रद्धेच्या जोरावरच त्यांनी भारत फोर्जला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन पोचविले. त्यांच्या नेतृत्वाखालील कल्याणी उद्योगसमूहाने आज ऑटोमोबाइलबरोबरच तेल व नैसर्गिक वायू,ऊर्जा, बांधकाम, खाण, रेल्वे इंजिन, जहाज व विमान, युद्धसामग्री अशा विविध क्षेत्रांत डौलाने आपला झेंडा फडकाविला आहे. 1972 मध्ये सेल्स इंजिनिअर या पदापासून त्यांची भारत फोर्जमधील कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. सरव्यवस्थापक ते व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष अशी त्यांची कारकीर्द बहरत गेली आणि कंपनीही. आज त्यांच्या कुशल नेतृत्वामुळेच कंपनीची आर्थिक उलाढाल 2.5 अब्जच्या घरात जाऊन पोचली आहे.
>> संस्कारांचे बाळकडू
वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षीच बाबांना बेळगावच्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाठविण्यात आले. वास्तविक हे वय खेळण्या-बागडण्याचे; पण याच वयात त्यांना सर्व बालसुलभ गोष्टी बाजूला ठेवून लष्कराच्या कडक शिस्तीत वावरावे लागले. बेळगावचे हे सैनिक स्कूल देशातील नामांकित शाळांपैकी एक. आर. एस. मणी हे त्यावेळी या शाळेचे प्राचार्य होते. ऑक्सफर्डमध्ये शिक्षण झालेले प्राचार्य मणी कडक शिस्तीचे. त्यांचा हात पाठीवरून फिरला आणि बाबांचे आयुष्यच बदलून गेले. बाबांनी शिस्त, वेळेचे महत्त्व आणि व्यक्तिमत्त्व विकास ही त्रिसूत्री आयुष्यभर जपली.
गुजरातमधील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सेस या महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. येथे त्यांनी चमक दाखवताना सातत्याने पहिला-दुसरा क्रमांक राखला. येथील शिक्षण संपवून त्यांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील बोस्टन येथील एमआयटी महाविद्यालयात प्रवेश घेतला. अगदी त्या काळातही तेथील प्रवेशासाठी अत्यंत कठीण असणारी प्रवेश परीक्षा द्यावी लागायची. बाबांनी ही कठीण परीक्षा अगदी सहज दिली. एमआयटीमधील पदवी पाच सेमिस्टरची होती; पण बाबांनी कठोर मेहनत, नावीन्याचा ध्यास आणि शिस्तीचे संस्कार याच्या जोरावर तीन सेमिस्टरमध्येच पदवी पूर्ण केली. त्याच काळात तेथील “सिप्को‘ या कंपनीचे अध्यक्ष चार्ल्स स्मिथ यांनी “इलेक्ट्रो केमिकल‘ मशिनचे नवे तंत्र विकसित केले होते. बाबांचा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा शोधनिबंधही याच विषयावर होता. त्यामुळे चार्ल्स स्मिथ हे त्यांचे प्रेरणास्थान बनले. अमेरिकेत त्यांनी त्यांच्याकडे पाच ते सहा महिन्यांचा अनुभव घेतला. याच अनुभवाच्या शिदोरीवर त्यांनी “भारत फोर्ज‘ कंपनीला यशोशिखरावर पोचविले.
बाबांचे अमेरिकेत शिक्षण सुरू असतानाच इकडे पुण्यात “भारत फोर्ज‘च्या उभारणीचे काम वेगाने सुरू झाले होते. 1964-65चा तो काळ होता. बाबा सुटीला पुण्यात आले, की त्यांचा पूर्ण वेळ या प्लॅंटवरच जात असे. तेथे सुरू असलेल्या यंत्रजोडणीच्या कामात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या या जिद्दी वृत्तीमुळेच भारत फोर्जमधील यंत्रांना आकार मिळाला आणि त्यांच्या आयुष्यालाही!
अमेरिकेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते थेट भारत फोर्जमध्येच दाखल झाले. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे एकवीस वर्षे. अवजड उद्योगात आधुनिक तंत्राचा वापर कसा करता येईल, याचे बाळकडू त्यांना अमेरिकेतील शिक्षणात मिळाले होते. त्यामुळेच ‘भारत फोर्ज‘ला अत्याधुनिक बनविण्याचा ध्यासच त्यांनी घेतला. 1971 मध्ये सेल्स इंजिनिअर पदापासून त्यांच्या कारकीर्दीला प्रारंभ झाला. गतिमान आयुष्य आणि झपाटून काम करण्याची जीवनशैली त्यांना अमेरिकेतील शिक्षणात मिळाली होती. याच गुणांच्या आधारावर त्यांनी भारत फोर्जमधील कामाला प्रारंभ केला. वेळेचे महत्त्व, कमालीची शिस्त आणि गुणवत्तेत तडजोड न करण्याची भूमिका या त्रिसूत्रीचा त्यांनी स्वतः तर अवलंब केलाच; पण कंपनीतील प्रत्येकाला त्याचा अवलंब करण्यास भाग पाडले.
बाबांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या वर्षभरातच ते कंपनीचे सरव्यवस्थापक बनले. नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून घेण्यासाठी, त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी परदेशात पाठविले. बाबांच्या नेतृत्वाखाली कंपनीने जेवढ्या ऑर्डरी होत्या त्या तर वेळेत पूर्ण केल्याच; पण त्यापेक्षाही अधिक उत्पादन घेतले. त्यामुळे त्यांनी हे जादाचे उत्पादन निर्यात करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या सरव्यवस्थापक पदाच्या काळातच भारत फोर्जने आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करण्यास सुरुवात केली.
भारत फोर्जला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवतानाच त्यांनी दोन विदेशी कंपन्या खरेदी केल्या व त्या यशस्वीपणे चालवूनही दाखविल्या. त्यापैकी एक कंपनी होती जर्मनीतील सीडीपी फोर्जिंग नावाची. त्यानंतर तेथेच आणखी एक कंपनीही त्यांनी खरेदी केली. या कंपनीत वाहनांसाठी लागणारे सुटे भाग ऍल्युमिनिअमपासून तयार करण्यात येत होते. अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वापरून त्यांनी या कंपनीतही व्यावसायिक यश मिळवून दाखविले. भारत फोर्जचा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी दबदबा निर्माण केला.
कल्याणी उद्योगसमूहाच्या माध्यमातून इतर अनेक औद्योगिक क्षेत्रांत धवल यश संपादन केले. हे सर्व करतानाच त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली. त्यामुळेच त्यांनी पुण्यात “प्रथम ट्रस्ट‘ नावाची बिगरशासकीय संस्था (एनजीओ) स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी झोपडपट्ट्यांतील मुलांसाठी शाळा सुरू केल्या. नांदेडला अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले. कामालाच देव मानून त्यांनी झपाटून केलेल्या कामामुळेच कल्याणी उद्योगसमूह देशातीलच नव्हे तर जगातील एक नामांकित उद्योगसमूह बनला. याचे सर्व श्रेय जाते ते बाबा कल्याणी यांच्या कल्पकतेला, धडाडीला, कामालाच ईश्वर मानण्याच्या त्यांच्या श्रद्धेला.
– अनिल सराफ, दै. सकाळ
तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला हे कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. लेख आवडला असेल तर लाइक आणि subscribe जरूर करा आणि हो अजून कोणत्या विषयाची माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.
आज दि. ६ जानेवारी. वृत्तपत्रसृष्टीत ६ जानेवारी या तारखेला विशेष महत्व आहे. कारण आजपासून साधारणपणे १८३ वर्षांपूर्वी ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई मध्ये ‘दर्पण’ या नावाने पाक्षिकास सुरूवात केली आणि तो मराठी वृत्तपत्रसृष्टीचा सुवर्ण दिन ठरला. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू करून मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान मिळविला. त्यांची आठवण म्हणून आपण ६ जानेवारी रोजी दर्पण दिन साजरा करतो.
एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मराठी समाजमन घडविण्यात बाळशास्त्री जांभेकरांचा फार मोठा वाटा होता. कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले या गावी जन्मलेल्या बाळशास्त्रींनी अनेक विषयांचे अभ्यासक-संशोधक, अध्यापक, उत्कृष्ट लेखक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार म्हणून आपल्या कार्याचा ठसा १८३२ ते १८४६ या काळात उमटवला.
बाळशास्त्री जांभेकरांना आपण ‘दर्पण’कार जांभेकर म्हणूनच ओळखतो. ब्रिटिश कालखंडात त्यांनी दर्पणच्या संपादनाची धुरा समर्थपणे वाहिली. भविष्यकाळातील या माध्यमाची जबरदस्त ताकद त्यांनी तेव्हाच ओळखली होती. परकी सत्तेला उलथून टाकायचे असेल, तर समाजजागृती घडवायला हवी आणि त्यासाठी लेखणीला पर्याय नाही हे त्यांना फार पूर्वीच समजले होते. बाळशास्त्री कडवे देशाभिमानी होते. त्यांच्या या देशसेवा आणि समाजसेवेच्या जाणिवेतूनच दर्पणसारख्या नियतकालिकाचा जन्म झाला आणि मराठी वृत्तपत्रविश्र्वात नवी पहाट उगवली. दर्पणाचा जन्म होताना गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांचेही सहकार्य बाळशास्त्रींना लाभले. त्या वेळी बाळशास्त्रींचे वय अवघे वीस वर्षांचे होते. एका वृत्तपत्राच्या संपादकाला आवश्यक असणारी भाषेची जाण आणि सामाजिकतेचे भान त्यांच्याकडे होते.
दर्पणाचा पहिला अंक ६ जानेवारी, १८३२ रोजी प्रकाशित झाला. वृत्तपत्राची किंमत १ रुपया होती. जनसामान्यांसाठी वृत्तपत्राची भाषा मराठी ठेवण्यात आली असली तरी ब्रिटिश शासनापर्यंत आपला आवाज जावा या हेतूने, वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्लिश भाषेत असायचा. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र! या अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ (कॉलम) मराठीत आणि एक स्तंभ इंग्रजीत असे. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी इंग्रजी मजकूर होता. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. दर्पण अशा रीतीने साडे आठ वर्षे चालले आणि जुलै, १८४० ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रातील पहिल्या पिढीतील समाजसुधारक होते. ‘दर्पण’ हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोकशिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला. यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाच्या प्रश्र्नाचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचा करावा लागेल. बाळशास्त्रींनी या विषयांवर विपुल लिखाण केले. त्यामुळे त्यावर विचारमंथन होऊन त्याचे रूपांतर पुढे विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत झाले. ज्ञान, बौद्धिक विकास आणि विद्याभ्यास या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत. उपयोजीत ज्ञानाचा प्रसार समाजात व्हावा, ही त्यांची तळमळ होती. देशाची प्रगती, आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज आहे, तसेच सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याच्या विवेकनिष्ठ भूमिकेसाठी शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराची आवश्यकता आहे, याची जाणीव त्यांना झाली होती. विज्ञाननिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते. थोडक्यात, आजच्यासारखा ज्ञानाधिष्ठित समाज त्यांना दोनशे वर्षांपूर्वीच अपेक्षित होता. त्या अर्थाने ते द्रष्टे समाजसुधारक होते. सार्वजनिक ग्रंथालयांचे महत्त्व ओळखून त्यांनी ‘बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना केली. विविध समस्यांवर सकस चर्चा घडवण्यासाठी ‘नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी’ची स्थापना केली. यातूनच पुढे ‘स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ या संस्थेला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड यांसारखे दिग्गज कार्यरत झाले.
१८४० मध्येच त्यांनी ‘दिग्दर्शन’ या मराठीतील पहिल्या मासिकाची सुरुवात केली. या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी ५ वर्षे काम पाहिले. या मासिकातून त्यांनी भूगोल, इतिहास, रसायन शास्त्र,पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान आदी विषय नकाशे व आकृत्यांच्या साहाय्याने प्रसिद्ध केले. या अभिनव माध्यमातून त्यांनी लोकांची आकलनक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्या विद्वत्तेला जोड होती ती त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची. संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी या त्या काळच्या प्रचलित भाषांवर त्यांचे प्रभुत्व होतेच, याशिवाय ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, बंगाली आणि गुजराती भाषाही त्यांना उत्तम अवगत होत्या. या भाषांसह विज्ञान, गणित, भूगोल, शरीरशास्त्र व सामान्य ज्ञान या विषयांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. आज मराठीतील वृत्तपत्रांचे जनक असा जसा त्यांचा नावलौकिक आहे, तसाच एल्फिन्स्टन कॉलेजमधील नावाजलेले, हिंदीचे पहिले प्राध्यापक असाही त्यांचा लौकिक आहे. त्याचबरोबर रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोधनिबंध प्रसिद्ध झालेले पहिले भारतीय असाही मान त्यांच्याकडे जातो. १८४५ मध्ये त्यांनी केलेले ज्ञानेश्र्वरीचे मुद्रण हे या ग्रंथाचे पहिले मुद्रण मानले जाते. बाळशास्त्रींनी कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही काम पाहिले. तसेच त्यांनी नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, हिंदुस्थानचा इतिहास, शून्यलब्धिगणित आदी ग्रंथांची निर्मिती केली.
साधारणपणे १८३० ते १८४६ या काळात बाळशास्त्रींनी आपले योगदान महाराष्ट्राला (व भारताला) दिले. या काळात बहुसंख्येने समाज निरक्षर, अंधश्रद्ध व अज्ञानी होता. म्हणूनच अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात, विविध क्षेत्रांत त्यांनी केलेले प्रचंड कार्य मूलभूत , मौल्यवान व अद्भूत ठरते. ६ जानेवारी रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. हाच योगायोगाने बाळशास्त्रींचाही जन्मदिवस. त्यांच्या स्मृत्यर्थ हाच दिवस ‘पत्रकार दिन’ म्हणून आज महाराष्ट्रात साजरा केला जातो.
तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला हे कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. लेख आवडला असेल तर लाइक आणि subscribe जरूर करा आणि हो अजून कोणत्या विषयाची माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.
अनेक वर्ष प्रयत्न करूनही जेव्हा यश मिळत नाही तेव्हा “माझं नशिबच खोटं” म्हणून आयुष्यात निराश होणाऱ्या माझ्या शेकडो मित्रांना आजची पोस्ट समर्पित…
किंग कँप जिलेट हा काही कोणी शास्त्रज्ञ नव्हता. तो होता एका कंपनीत काम करणारा २१ वर्षाचा एक तरुण सेल्समन. घरोघरी फिरून तो विविध प्रकारच्या वस्तू विकायचा. पण त्याच्या डोळ्यात मात्र भव्य स्वप्नं असायची. एक दिवस आपण असा एखादा शोध लावायचा कि संपूर्ण जगात आपलं नाव होईल आणि आपल्याला चिक्कार पैसेही मिळतील. परंतु एका सामान्य माणसासाठी ते एक अशक्य कोटीतलच स्वप्नं होतं. तरीही जिलेट आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करीतच राहिला.
तब्बल २८ वर्षांनी त्याला यश मिळालं तेव्हा जिलेट हे नाव तब्बल दोनशे देशातील लाखो करोडो लोकांना ठाऊक झालं होतं. वयाच्या ७७ व्या वर्षी १९३२ मध्ये त्याचे निधन झाले तरीही आज ८० वर्षानंतर जिलेट हे नाव जिलेट ब्लेड, जिलेट सेफ्टी रेझर, जिलेट ट्वीन ब्लेड, जिलेट ट्रिपल ब्लेड, जिलेट शेविंग क्रीम, जिलेट ब्रश म्हणून जगातील अब्जावधी लोकांच्या ओठावर रोजच असते. २००५ मध्ये प्रोक्टर एंड ग्याम्बलने जिलेट कंपनी ५७ बिलिअन डॉलरला म्हणजे तब्बल ३ लाख ४२ हजार कोटी रुपयांना खरेदी केली तरी जिलेट हे नाव कायम ठेवले. किंग कँप जिलेटच्या त्या अफाट स्वप्नाला, त्याच्या त्या अविश्वसनीय चिकाटीला माझा त्रिवार सलाम !
दिवसभर सेल्समन म्हणून पायपिट केल्यानंतर फावल्या वेळात जिलेट काहीतरी संशोधन करत असे. (तुम्ही फावल्या वेळात क्रिकेट बघता ) त्याने तसे बारीक सारीक अनेक शोध लावले. पण त्यापासून त्याला चार पैसे काही गाठीला बांधता आले नाहीत. त्याचं संशोधनाचं ते वेड पाहून एक दिवस त्याच्या मालकाने त्याला एक असा सल्ला दिला कि तू असं काही शोधून काढ कि ज्याची गरज लोकांना रोजच पडेल आणि ते ती वस्तू वापरून फेकून देतील अन त्याला चांगला व्यवसाय करता येईल. त्या कल्पनेने जिलेटला झपाटून टाकलं. रात्रंदिवस तो अशी कोणती वस्तू असेल हाच विचार करू लागला. त्यासाठी त्याने असंख्य वेळा डिक्शनरी चाळून काढली.
एकदा नेहमी प्रमाणे हातात वस्तरा घेऊन तो दाढी करत होता. अचानक त्याला एक सुंदर कल्पना सुचली. रोज घासून घासून वस्तऱ्याला धार लावत बसण्यापेक्षा आठवडाभर वापरून फेकून देता येईल असे ब्लेड तयार करता येईल का ? त्याला पकडता येईल असे रेझर बनवता येईल का ? त्या कल्पनेने जिलेटला झपाटून टाकलं. रात्रंदिवस तो अशी कोणती वस्तू असेल हाच विचार करू लागला. त्यासाठी त्याने असंख्य वेळा डिक्शनरी चाळून काढली. एकदा नेहमी प्रमाणे हातात वस्तरा घेऊन तो दाढी करत होता. अचानक त्याला एक सुंदर कल्पना सुचली. रोज घासून घासून वस्तऱ्याला धार लावत बसण्यापेक्षा आठवडाभर वापरून फेकून देता येईल असे ब्लेड तयार करता येईल का ? त्याला पकडता येईल असे रेझर बनवता येईल का ? त्या कल्पनेने जिलेटला झपाटून टाकलं. त्या दिवसांपासून त्याने अनेक तज्ञ व्यक्तींना भेटायला सुरुवात केली. प्रत्येकाने त्याच्या कल्पनेला वाटण्याच्या अक्षता लावल्या. तरीही जिलेट खचला नाही. आपली कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा त्याचा विश्वास थोडाही डगमगला नाही. त्याने आणखी पाच वर्ष अनेक तज्ञांच्या गाठी भेटी घेतल्या. शेवटी वयाच्या ४६ व्या वर्षी एकाने त्याला हवे तसे ब्लेड बनवून दिलेच. तेव्हा जिलेटला आकाशाला गवसणी घातल्याचा आनंद झाला.
पण त्याचा तो आनंद फार काळ टिकला नाही. कारण मोठ्या प्रमाणावर अशी ब्लेड बनविण्यासाठी त्याच्याकडे भांडवलच नव्हतं. कर्ज काढून त्याने एक मशीन बनवलं तेव्हा इतका खर्च झाला कि तो अक्षरशः कर्जबाजरी झाला. देणेकरी त्याच्या मागे लागले. मित्र त्याच्या रेझरवरून त्याची टिंगल करू लागले. शेवटी एका गुंतवणूकदाराने त्याला कर्ज रोखे काढायचा सल्ला दिला आणि कमी किमतीत स्वतः कर्जरोखे खरेदी करून त्याला भांडवल दिले. जिलेटने मोठ्या प्रमाणावर ब्लेड आणि रेझरची निर्मिती केली. पण त्याची ही कल्पना लोकांना आवडली नाही. फक्त ५० ब्लेड आणि रेझर विकली गेली. तेव्हा त्याने आपल्या प्रोडक्टचे पेटंट रजिस्टर केले आणि बाजारात तुफान जाहिरात करून हजारो दुकानात आपले प्रोडक्ट विकायला ठेवले.
बघता बघता लाखामध्ये विक्री होऊ लागली. एका देशातून दुसऱ्या देशात करता करता जगातील दोनशे देशातील अब्जावधी लोकांना त्याच्या त्या सुंदर कल्पनेने भुरळ घातली आणि त्याने एका मागून एक अशी ब्रश, क्रीम, सोप अशी प्रोडक्ट बाजारात आणली. त्याच्या प्रत्येक प्रोडक्टचा दर्जा इतका उच्चा होता कि त्यानंतर अनेक कंपन्यांनी आपली प्रोडक्ट बाजारात आणून त्याला शह द्यायचा प्रयत्न केला, पण जिलेट म्हणजे जिलेटच हवं अशी मागणी करणाऱ्या ग्राहकांमुळे जिलेटने आभाळालाच गवसणी घातली. वयाच्या ४९ व्या वर्षी आपलं स्वप्न साकार करणाऱ्या जिलेटची कहाणी आयुष्यात लवकर निराश होणाऱ्या लाखो तरुणांना दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करणारी ठरावी.
तर ही होती ब्लेडचा शोध लावणारे जिलेट कंपनीचे संस्थापक किंग कॅम्प जिलेट यांची जीवनकहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या उद्योजकांच्या गोष्टी ऐकून प्रेरणा घेण्यासाठी चॅनेल आताच सबस्क्राईब करा.
सर आयझॅक न्यूटन : (४ जानेवारी १६४३ – ३१ मार्च १७२७) सुप्रसिद्ध इंग्रज शास्त्रज्ञ, गणित, गतिकी (प्रेरणांच्या संदर्भात गतीचा अभ्यास करणारे शास्त्र), खगोलीय यामिकी, ज्योतिषशास्त्र आणि प्रकाशकी या बहुविध विज्ञान शाखांमध्ये अतिशय मोलाची भार टाकणाऱ्या या शास्त्रज्ञांचे नाव विज्ञानाच्या इतिहासात अजरामर झाले आहे. त्यांचा जन्म वुल्झथॉर्प (लिंकनशर) येथे झाला. त्यांच्या जन्माच्या दोन महिने अगोदरच त्यांचे वडील मृत्यू पावले. त्यांच्या पूर्वजांचा शेतीचा व्यवसाय होता. न्यूटन यांचे सुरुवातीचे शिक्षण जवळच्याच ग्रँथम येथील शाळेत झाले.
लहान वयातच त्यांनी लहानशी चक्की (उंदराने चालविलेली), घड्याळे, कंदील यांसारख्या वस्तू बनविल्या होत्या. त्यांना शेतीमध्ये गुंतविण्याच्या दृष्टीने आईने त्यांना शाळेतून काढून शेतावर कामास नेले; परंतु त्यात त्यांचे लक्ष लागेना. मामाच्या व शिक्षकांच्या सल्ल्याने त्यांना १६६० मध्ये परत शाळेत पाठविण्यात आले.
ते १६६१ मध्ये केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. १६६५ मध्ये बी. ए. पदवी मिळविल्यानंतर दोन वर्षांनी त्यांची ट्रिनिटी कॉलेजचे फेलो म्हणून निवड झाली. जून १६६५ नंतर सु. दीड वर्ष प्लेगच्या साथीमुळे विद्यापीठ बंद राहिल्याने त्या काळात न्यूटन यांना वुल्झथॉर्पमध्ये रहावे लागले. या काळातच त्यांनी त्यांच्या गणित, प्रकाशकी आणि खगोलीय यामिकी या विषयांतील कामगिरीचा पाया घातला.
१६६८ मध्ये त्यांनी एम्.ए. ही पदवी संपादन केली. त्यांचे गुरू आयझॅक बॅरो यांनी न्यूटन यांची योग्यता ओळखली होती आणि १६६९ मध्ये जेव्हा बॅरो यांनी केंब्रिज विद्यापीठातील आपल्या गणिताच्या ल्यूकेशिअन प्राध्यापकदाचा राजीनामा दिला तेव्हा वयाच्या केवळ सव्वीसाव्या वर्षी न्यूटन यांची त्या पदावर नेमणूक झाली.
ल्यूकेशिअन प्राध्यापक म्हणून नियमाप्रमाणे त्यांनी आपल्या व्याख्यानांची हस्तलिखिते विद्यापीठाच्या ग्रंथालयात ठेवली. ही व्याख्याने पुढील विषयांवरील होती : प्रकाशकी (१६७०–७३), अंकगणित व बीजगणित (१६७३–८३), Principia या ग्रंथाचा पहिला भाग (१६८४–८५), सूर्यकुलातील ग्रह, उपग्रह, धूमकेतू व भरती-ओहोटी – द सिस्टिम ऑफ द वर्ल्ड – (१६८७). १६८८ ते १६९६ पर्यंत त्यांनी कोणत्या विषयांवर व्याख्याने दिली त्याची नोंद उपलब्ध नाही. १६८९ मध्ये केंब्रिज विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून संसदेत त्यांची निवड झाली व पुढील वर्षी संसद विसर्जित होईपर्यंत ते त्या पदावर राहिले. १७०१ साली त्यांची संसदेत पुन्हा निवड झाली; परंतु राजकारणात त्यांनी कोणताही महत्त्वाचा भाग घेतला नाही.
१६९० मध्ये संसद विसर्जित झाल्यावर ते केंब्रिजला परतले व काही काळ यांनी गणितावर संशोधन केले; परंतु १६९२–९४ या काळात निद्रानाश व मानसिक त्रास यांमुळे ते आजारी पडल्याने त्यांच्या कार्यात खंड पडला. केंब्रिजमधील जीवनाचा कंटाळा आल्याने ते तेथून बाहेर पडण्याचा विचार करू लागले. १६९६ मध्ये त्या वेळचे अर्थमंत्री चार्ल्स माँटाग्यू यांनी न्यूटन यांची टाकसाळीमध्ये अधीक्षक (वॉर्डन) म्हणून नेमणूक केली व चार वर्षांनी ते तेथील मुख्याधिकारी झाले. अधीक्षक असतानाच ते केंब्रिज येथील प्राध्यापकपदावरही होते; परंतु मुख्याधिकारी झाल्यावर त्यांनी प्राध्यापकपदाचा राजीनामा दिला आणि ते लंडन येथे स्थायिक झाले व टाकसाळीतच मुख्याधिकारी म्हणून त्यांनी मृत्यूपावेतो काम केले.
गणितशास्त्रातील न्यूटन यांची महत्त्वाची कामगिरी म्हणजे अवकलन व समाकलन यांचा निर्मिती ही होय. अवकलनांकाला त्यांनी ‘फ्लक्शन’ हे नाव दिले होते. अवकलनांक दर्शविण्याकरिता त्यांनी शिरोबिंदूचा उपयोग केला उदा., dक्ष/dट करिता क्षं. न्यूटन यांनी अवकलनाच्या साहाय्याने वक्राची स्पर्शिका काढण्याची पद्धत निश्चित केली. समाकलन या संकल्पनेची मांडणीही त्यांनी केली होती. समाकलनाचा उपयोग त्यांनी वक्राने वेढलेले क्षेत्रफळ व घन आकृत्यांचे घनफळ मिळविण्याकरिता केला. अवकलन व समाकलन यांना जोडणारे कलनशास्त्रातील मूलभूत प्रमेय त्यांनीच मांडले. सांत अंतर कलन या कलनाच्या दुसऱ्या एका शाखेतही त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली.
Isaac Newton
कलनशास्त्राचा निर्माता कोण यासंबंधी १७०५ च्या सुमारास न्यूटन आणि जर्मन गणितज्ञ जी. डब्ल्यू. लायप्निट्स यांच्यात बराच मोठा वाद निर्माण झाला होता. लायप्निट्स यांनी कलनशास्त्राची निर्मिती स्वतंत्रपणे केली असेच सध्या मानण्यात येते. लायप्निट्स यांचीच कलनशास्त्रातील संकेतन पद्धती पुढे रूढ झाली कलन. बीजगणितात महत्त्वाचे मानले जाणारे द्विपद प्रमेय न्यूटन यांनी १६६५ च्या सुमारास मांडले बीजगणित. समीकरणाच्या असत् मूलांविषयी त्यांनी विवरण केलेले होते. समीकरणाच्या निर्वाहाचे उपसादन पद्धतीने आसन्नीकरण करण्याची (अंदाजी मूल्य काढण्याची) एक पद्धत त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे समीकरण सिद्धांत. न्यूटन यांनी काही अनंत श्रेढी मांडण्यात यश मिळविले होते. विशेषतः ज्या -१ (क्ष) आणि लॉग (१+क्ष) ही फलने श्रेढी स्वरूपात त्यांनीच मांडून दाखविली श्रेढी.
गतिकीमधील न्यूटन यांचे गतिविषयक नियम पायाभूत मानले जातात यामिकी. या नियमांच्या साह्याने त्यांनी गॅलिलीओ यांचे खाली पडणाऱ्या पदार्थाच्या गतिविषयीचे सिद्धांत पूर्णावस्थेस नेले.
न्यूटन यांचे सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी मांडलेला गुरुत्वाकर्षणाचा नियम हे होय गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षणाची थोडीशी कल्पना न्यूटन यांच्यापूर्वीच्या शास्त्रज्ञांनाही होती; पण न्यूटन यांनी आपल्या नियमाद्वारे तिला निश्चित स्वरूप दिले. ‘विश्वातील दोन कणांमधील आकर्षण प्रेरणा ही त्यांच्या वस्तुमानांच्या गुणाकाराच्या समप्रमाणात व त्यांच्यातील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते’ हे त्यांनी स्पष्ट केले.
न्यूटन यांनी आपले गतिनियम पृथ्वीवरील पदार्थांप्रमाणेच अवकाशातील ग्रह, उपग्रह इत्यादींना लागू केले व त्यातून मिळालेली माहिती योहानेस केप्लर यांच्या नियमानुसार खगोलीय यामिकी मिळणाऱ्या माहितीशी जुळणारी होती. यामध्ये बुध या ग्रहाचा मात्र अपवाद होता. ग्रहगतीतील अनियमितपणाचाही त्यांनी अभ्यास केला. न्यूटन यांनी ‘गोलाची त्याच्या बाहेरील वस्तुमानावरची आकर्षण प्रेरणा त्याच्या केंद्रबिंदूमध्ये केंद्रित झालेली आहे असे मानता येते’ हे सिद्ध केले. त्यांचा हा सिद्धांत ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासात फार महत्त्वाचा ठरला आहे.
प्रकाशकी हा न्यूटन यांच्या खास अभ्यासाचा विषय होता. जर शुभ्र प्रकाशाचा (उदा., सूर्यप्रकाशाचा) किरण एखाद्या अरुंद फटीद्वारे त्रिकोणी लोलकातून जाऊ दिला, तर त्याचे (दृश्य वर्णपटाच्या) निरनिराळ्या रंगांच्या किरणांमध्ये पृथक्करण होते; तसेच या रंगीत किरणांपैकी एकाच रंगाचा किरण दुसऱ्या लोलकातून जाऊ दिल्यास त्याचे आणखी पृथक्करण न होता फक्त प्रणमन (एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करताना दिशेमध्ये होणारा बदल) होते, असे त्यांनी प्रयोगाद्वारे दाखविले. यावरून शुभ्र प्रकाश हा अनेक रंगांच्या किरणांचे मिश्रण असून या किरणांच्या प्रणमनाची क्षमता (प्रणमनांक) निरनिराळी असल्यामुळेच शुभ्र प्रकाशाचे पृथक्करण होते असे त्यांनी सिद्ध केले.
त्यांनी वर्णविपथनाचा प्रकाशीय व्यूहांतील विपथन अभ्यास केला व त्यांना असे आढळून आले की, एखादी वस्तू शुभ्र प्रकाशाने प्रकाशित केल्यास भिंगामुळे मिळणाऱ्या त्याच्या प्रतिमेची कडा स्पष्टपणे रेखीव न दिसता नेहमी रंगीत दिसते कारण निरनिराळ्या रंगांकरिता भिंगाचे केंद्रांतर भिन्न असते. हा रंगीत प्रतिमा मिळण्याचा दोष टाळून भिंगाचा दूरदर्शक (प्रणमनी दूरदर्शक) तयार करणे शक्य नाही असा निष्कर्ष त्यांनी काढला (हा निष्कर्ष चुकीचा असल्याचे मागाहून दिसून आले) व त्यामुळे त्यांनी वस्तूपासून येणारा प्रकाश ज्यावर प्रथम पडतो तो मुख्य भाग अंतर्वक्र आरसा असलेला दूरदर्शक (परावर्तनी दूरदर्शक) तयार केला. तथापि अन्वस्तीय (पॅराबोलिक) आरसे तयार करण्याची प्रक्रिया पूर्णावस्थेस जाईपर्यंत या दूरदर्शकाचा पूर्णांशाने उपयोग होऊ शकला नाही.
सध्या अस्तित्वात असलेले सर्व शक्तिशाली दूरदर्शक (उदा., मौंट विल्सन आणि पॅलोमार वेधशाळेतील ५०८ सेंमी. व्यासाचा दूरदर्शक) परावर्तनी प्रकाराचेच आहेत दूरदर्शक. प्रकाश हा दीप्तिमान पदार्थापासून बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म कणांचा बनलेला असतो असा सिद्धांत न्यूटन यांनी मांडला प्रकाश व या सिद्धांताच्या आधारे त्यांनी परावर्तन, प्रणमन इ. प्रकाशीय आविष्कारांचे स्पष्टीकरण मांडले. मोठ्या केंद्रांतराचे बहिर्गोल भिंग व ते ज्यावर ठेवलेले आहे असा सपाट परावर्तक पृष्ठभाग यांच्यामधील हवेच्या पातळ थराचे विशिष्ट रंगाच्या परावर्तित प्रकाशात निरीक्षण केल्यास एका मध्यवर्ती काळ्या ठिपक्याभोवती एकाआड एक प्रकाशमान व काळी अशी वर्तुळाकार कडी दिसतात. या आविष्काराचे न्यूटन यांनी आपल्या प्रकाशाच्या कण सिद्धांताद्वारे स्पष्टीकरण दिले आणि प्रकाशमान कड्याची त्रिज्या व प्रकाशाचा रंग यांचा संबंध दर्शविणारा नियमही त्यांनी मांडला. हा आविष्कार ‘न्यूटन कडी’ या नावाने ओळखण्यात येतो.
रॉबर्ट हुक यांनी न्यूटन यांच्या कण सिद्धांतावर बरेच आक्षेप घेतले. नंतरच्या काळात क्रिस्तीआन हायगेन्झ, टॉमस यंग व ऑगस्तीन फ्रेनेल यांनी प्रकाशाचा तरंग सिद्धांत विकसित केला. तथापि न्यूटन यांनी हा साधा तरंग सिद्धांत मान्य केला नाही, कारण या सिद्धांताच्या आधारे प्रकाशाचे रेखीय प्रसारण व ध्रुवण (एकाच विशिष्ट प्रतलात होणारे कंपन) या आविष्कारांचे स्पष्टीकरण करता येत नाही असे त्यांचे मत होते.
दीप्तिमान पदार्थांपासून प्रकाश कणरूपाने बाहेर पडतो व हे कण मग ईथरमधून ईथर -२ जाताना तरंग निर्माण करतात तसेच अनेक प्रकाशीय आविष्कार (उदा., पातळ पटलांचे रंग) तरंग व कण या दोहोंच्या गुणधर्मामुळे निर्माण होतात असा सिद्धांत त्यांनी आपल्या काही सुरुवातीच्या निबंधात व नंतर Opticks (पहिली आवृत्ती १७०४) या आपल्या ग्रंथात मांडला. तथापि एकोणिसाव्या शतकात तरंग सिद्धांतच ग्राह्य मानला जात होता. विसाव्या शतकात अॅल्बर्ट आइन्स्टाइन यांनी मांडलेली फोटॉनांची संकल्पना व माक्स प्लांक यांच्या पुंज सिद्धांत यामुळे न्यूटन यांचा सिद्धांत अगदीच चुकीचा नव्हता असे दिसून आले आहे.
‘थंड होत असलेल्या पदार्थाचा थंड होण्याचा दर हा त्याच्या व भोवतालच्या तापमानात असलेल्या फरकावर अवलंबून असतो’ हा शीतलीकरणाचा नियम न्यूटन यांच्या नावाने ओळखला जातो.
न्यूटन यांचा Philosophiae Naturalis Principia Mathematica (इं. शी. मॅथेमॅटिकल प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसॉफी) हा प्रख्यात ग्रंथ १६८७ साली प्रथम प्रकाशित झाला. १७०९ साली रॉजर कोट्स यांच्या सहकार्यांने दुसरी आवृत्ती तयार करण्यास न्यूटन यानी संमती दिली व ही आवृत्ती १७१६ मध्ये प्रसिद्ध झाली. हेन्री पेम्बर्टन यांच्या सहकार्यांने तयार केलेली तिसरी आवृत्ती १७२६ साली प्रकाशित झाली. यानंतरही या ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या व त्यावरील टीकाग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत. या ग्रंथाच्या पहिल्या भागात गतिकीचा गणितीय दृष्टिकोनातून विकास केलेला आहे, तर तिसऱ्या भागात या गणितीय सिद्धांतांचा उपयोग ज्योतिषशास्त्रीय व भौतिक प्रश्न सोडविण्यासाठी केलेला आहे. दुसऱ्या भागात रोधक माध्यमांतील पदार्थांच्या गतीचे विवरण केलेले असून या भागाचा ग्रंथात समावेश करण्याचा विचार न्यूटन यांनी मागाहून केलेला होता, असे आढळून येते. या ग्रंथामुळे न्यूटन यांची कीर्ती सर्वत्र पसरली व सु. २०० वर्षे वैज्ञानिक जगतात या ग्रंथाचे श्रेष्ठत्व अबाधित राहिले.
आधुनिक विज्ञानाच्या विकासाला या ग्रंथापासूनच सुरुवात झाली असे मानण्यात येते. Opticks हा त्यांचा दुसरा महत्त्वाचा ग्रंथ १७०४ साली प्रथमतः प्रसिद्ध झाला आणि न्यूटन यांच्या आयुष्यातच त्याच्या तीन आवृत्त्या निघाल्या. त्यांचे शास्त्रीय निबंध आय्. बी. कोएन (१९५८–), सॅम्युएल हॉर्सली (५ खंड, १७७९–८५), डी. टी. व्हाइटहेड (२ खंड, १९६७–६८) इ. लेखकांनी एकत्रित स्वरूपात निरनिराळ्या ग्रंथांच्या रूपाने संपादित केलेले आहेत. रॉयल सोसायटीने न्यूटन यांचा पत्रव्यवहार चार खंडांत प्रसिद्ध केलेला आहे (पहिले तीन खंड १९५९–६१, चौथा खंड १९६७).
न्यूटन १६७२ पासून रॉयल सोसायटीचे सदस्य होते. १७०३ मध्ये ते सोसायटीचे अध्यक्ष झाले व त्यानंतर मृत्यूपावेती दर वर्षी त्यांची या पदावर निवड झाली. पॅरिस येथील सायन्स अॅकॅडेमीने १६९९ साली त्यांना सन्मान्य सदस्यत्वाचा बहुमान दिला. १७०५ मध्ये अॅन राणीने त्यांना नाईट (सर) हा किताब दिला. ते लंडन येथे मृत्यू पावले व विशेष सन्मान म्हणून त्यांचे दफन वेस्टमिन्स्टर अॅबेमध्ये करण्यात आले.
संदर्भ : 1. Brewster, D. Memoirs of the Life, Writings and Discoveris of Sir Isaac Newton, 2 Vols., Edinburgh, 1855. (Reprinted, New York, 1965). 2. More, L. T. Isaac Newton : A Biography, New York, 1934.
लेखक: मो. वि काळीकर / स. ज. ओक / व. ग. भदे स्त्रोत – मराठी विश्वकोश, vikaspedia.in
तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला हे कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. लेख आवडला असेल तर लाइक आणि subscribe जरूर करा आणि हो अजून कोणत्या विषयाची माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.
‘इंटेल’चे उत्पादन कोट्यवधी लोक दररोज वापरत असतात; पण ते नेमके कसे दिसते, ते मात्र कुणालाच माहीत नाही; हे अजबच नाही का? इंटेल नक्की काय बनवते? कॉम्प्युटर नेमका चालतो कसा? एकविसाव्या शतकात जगताना कॉम्प्युटर, मोबाईल फोन यांच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. याआधी असलेली रेडिओ किंवा टीव्हीसारखी उपकरणे आणि कॉम्प्युटर यामध्ये असा काय फरक आहे, ज्यामुळे कॉम्प्युटर सगळ्यांचा ‘दादा’ झाला?
जॅक किल्बीशिवाय इंटिग्रेटेड सर्किट (आयसी) च्या शोधात महत्त्वाचं काम बजावणारा माणूस म्हणजे रॉबर्ट नॉइस (१९२७-१९९०). रॉबर्ट नॉइस फेयरचाईल्ड कंपनीत बऱ्यापैकी रुळला होता. तो कंपनी सोडेल हे कोणाच्याही डोक्यात आले नसते पण १९६८ ला त्याने गॉर्डन मूर सोबत एक अनपेक्षित खेळी खेळली. १९४७ च्या साली बेल लॅब्स मध्ये ट्रान्झिस्टर नावाच्या इलेक्ट्रॉनिक स्विचचा शोध लागला होता. या शोधाने इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात प्रचंड क्रांती घडवून आणली होती. यामुळे संगणकाच्या आकारात आणि किंमतीत प्रचंड मोठा फरक पडणार होता.
हे ‘भवितव्य’ ओळखल्याने हे ट्रान्झिस्टर्स वापरावेत म्हणून मूर आणि नॉइस यांनी ओरडून ओरडून फेयरचाईल्ड कंपनीला सांगितले होते पण कंपनीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्या दोघांनी वैतागून ती कंपनीच सोडून दिली. स्वतःच्या खिशातून अडीच लाख डॉलर्स गुंतवून ऑर्थर रॉक नावाच्या प्रसिद्ध वित्तसहाय्यकाकडून ३ लाख डॉलर्स घेतले आणि नवी कंपनी सुरु केली.
गॉर्डन मूर आणि रॉबर्ट नॉइस यांच्या नावावरून सुरुवातीला ‘मूर नॉइस’ ठेवण्याचा विचार होता.पण त्याचा उच्चार ‘मोअर नॉईज’ असा वाटेल अशी त्यांना भीती वाटली! मग त्यांनी वर्षभर ‘एनएम इलेक्ट्रॉनिक्स’ या नावानं त्यांची कंपनी चालवली. त्यानंतर त्यांनी तिचं नामकरण ‘इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स’ असं करायचं ठरवलं. पण दुसऱ्या एका हॉटेलची साखळी चालवणाऱ्या कंपनीनं ते नाव आधीच घेतलं असल्यानं त्यांनी ते त्यांच्याकडून ‘विकत’ घेतलं आणि या लांब नावाचं छोटं स्वरूप (म्हणजे ‘इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स’ ऐवजी ‘इंटेल’) घेऊन ते आपल्या कंपनीला द्यायचं ठरवलं. हीच आजची ‘इंटेल’ होय. ‘इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स’ चे लघुरूप म्हणजे इंटेल. आपल्या आधीच्या फेअरचाइल्ड कंपनीशी स्पर्धा करून आयसी बनवण्याऐवजी त्यांनी संगणकात माहिती साठवण्यासाठी लागत असलेल्या मेमरी चिप्स बनवायचा घाट घातला. लवकरच त्यांनी यात छान यश संपादन केलं. अँडी ग्रोव्हही या दोघांना येऊन सामील झाला.
खरं तर ज्या कंपनीत आधी हे दोघे काम करत होते त्या फेयर चाईल्ड कंपनीने ‘इंटिग्रेटेड सर्किट’वर बऱ्यापैकी संशोधन केले होते. त्यामुळे याची माहिती नव्याने कंपनी स्थापणाऱ्या मूर आणि नॉइस या दोघांनाही माहित होते. त्यामुळे त्या दोघांनी फेयरचाईल्ड कंपनीचे संशोधन चक्क ढापले आणि आयसीज वापरून कॉम्पुटरची मेमरी बनवण्यास सुरुवात केली. यावर फेयर चाईल्डचा चांगलाच जळफळाट झाला पण काहीच करू शकली नाही. त्याकाळी इंटेलने काढलेल्या ११०३ मॉडेलच्या मेमरी चिपमध्ये १०२४ बिट्स (म्हणजे १ केबी) इतकी माहिती साठवू शकता येई. इतकी माहितीही त्याकाळी ‘प्रचंड’ मानली जाई. इंटेलच्या इंजिनियर्सच्या मते त्या चिपची किंमत १० डॉलर्स इतकी योग्य होती,म्हणजे थोडक्यात १ बिटला एक सेंट अशी किंमत होती. पुढे मुरने आपला एक महत्वाचा सिद्धांत १९६५ सालच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स’ मासिकात मांडला.
कॉम्प्युटरच्या वेगाच्या संर्दभात गॉर्डन मूरचा एक नियम सांगणे आवश्यक आहे. ‘दर अठरा महिन्यांनी आयसीजची आणि परिणामी कॉम्पुटर्सची क्षमता दुप्पट होत जाईल’ हे त्याचे भाकीत होते. एका स्क्वेअर इंचातील ट्रांझिस्टर्सची संख्या दर अठरा महिन्यांनी दुप्पट होते. मूरने १९६५ साली केलेले हे निरिक्षण मूर लॉ (Moore law) या नावाने प्रसिध्द आहे. याचा दुसरा अर्थ असा की, साधारणपणे दीड वर्षाने प्रोसेसरचा वेग दुप्पट होईल.आश्चर्य म्हणजे मूरचे सुमारे चाळीसवर्षांपूर्वी केलेले भाकीत खरे ठरले आहे. आज आपण २.४ गिगाहर्ट्झचे मायक्रोप्रोसेसर वापरतो. काही वर्षांपूर्वी आपण एक गिगाहर्ट्झ या वेगाचा मायक्रोप्रोसेसर वापरत होतो. तर त्याही आधी आपण पाचशे मेगाहर्ट्झचे प्रोसेसर वापरत होतो. आज हेच भाकीत प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.
सुरवातीला ही कंपनी कॅल्क्युलेटर्सना लागणाऱ्या मेमरी चिप्स बनवत असे. १९७१ साली इंटेलच्या टेड हॉफनं ‘मायक्रोप्रोसेसर’चा शोध लावला. ठराविक कामे करण्यापेक्षा नवनवीन ‘प्रोग्रॅम लिहून’ या चीपकडून वेगवेगळी कामे करून घेता येतील अशी सोय यात होती. या निर्मितीमुळे इंटेलचा कॉम्प्युटर जगतात प्रवेश झाला. मग इंटेलनं त्या कामात लक्ष घातलं. तरीही पुढची अनेक वर्षे इंटेलचा प्रमुख व्यवसाय मेमरीच्या चिप्स बनवणं हाच होता. पण १९८० च्या दशकात जपानी कंपन्यांनी अतिशय स्वस्त दरात मेमरीच्या चिप्स विकायला सुरुवात केल्यावर इंटेलला काहीतरी वेगळं करणं भाग होतं. त्याच सुमाराला आयबीएमचा ‘पर्सनल कॉम्प्युटर (पीसी)’ जोर धरायला लागला होता. ऐंशीच्या दशकांत “पर्सनल कॉम्प्युटर” तयार झाल्यानंतर मायक्रोप्रोसेसरचा वापर वाढतच गेला. त्यामुळे आता मेमरीच्या चिप्सऐवजी मायक्रोप्रोसेसर वापरून संगणकाचा ‘सेंट्रल प्रॉसेसिंग युनिट (सीपीयू)’ नावाचा भाग बनवण्याकडे इंटेलनं मोहरा वळवला. यालाच आपण संगणकाचा मेंदू असंही म्हणतो. इंटेलची ही चाल कमालीची यशस्वी ठरली, आणि पुढची अनेक वर्षं इंटेलनं अक्षरश: दणाणून सोडली.
इंटेलने त्यांचं सर्वात पहिलं मॉडेल काढलं ‘४००४’. अंतराळात सोडलेल्या ‘पायोनियर-१०’ मध्ये हीच चिप वापरली होती. त्यानंतर इंटेलने ‘८००८’ ही चिप बनवली. मायक्रोसॉफ्टचा सर्वेसर्वा बिल गेट्सने हीच चिप वापरून ट्रॅफिक नियंत्रण करण्यासाठी प्रोग्रॅम्स लिहिले होते. या चिप्स लोकप्रिय होतात न होतात तोच त्यांचा प्रतिस्पर्धी मोटोरोलाने ‘६८००’ नावाची नवी चिप बाजारात आणली. त्यावर इंटेलने ८०८६ आणि ८०८८ या चिप्स मार्केटमध्ये आणल्या. आयबीएमने बनवलेला पीसी याच चिप्सवर आधारित होता. मात्र त्यानंतर मोटोरोलाने ‘६८०००’ नावाची शक्तिशाली चिप काढून इंटेलला जबरदस्त दणका दिला होता. त्याकाळी इंटेलची एक ओळख होती, ‘इंटेल स्पर्धकांना फक्त हरवत नाही तर नेस्तनाबूत करते.’ याच ब्रीदवाक्यातून इंटेलने पुढे ‘८०२८६’ ही जबरदस्त ताकदवान, स्वस्त आणि वापरायला सोपी अशी मायक्रोप्रोसेसर चिप बनवली.
नव्वदच्या दशकांत ऍन्ड्य्रू ग्रोव्ह हा धडाडीचा ‘सीईओ’ कंपनीत जॉईन झाला. तेव्हापासून इंटेलची कॉम्प्युटरविश्वात जवळजवळ मक्तेदारीच तयार झाली. २८६, ३८६, ४८६ या चीप फारशा कुणाला माहीत नाहीत, कारण चिप्सच्या नंबरांमुळे होणाऱ्या कायद्याच्या कटकटी नकोत म्हणून इंटेलने त्यांचं नाव “पेंटियम” ठेवलं. हाच तो जगप्रसिद्ध पेंटियम मायक्रोप्रोसेसर. यामागची गंमतशीर कहाणी अशी की चिप्सना आकड्यांची (४००४, ८०८०, ८०२८६ वगैरे) नावं दिल्याने इंटेलला त्यावर पेटंट्स मिळेनात. कारण आकड्यांवर पेटंट्स मिळत नसतात. म्हणून ‘पेंटियम’ हे नाव निघालं. या चिप्सची ताकद बघा! १९९७ साली बाजारात आलेल्या ‘पेंटियम २’ मध्ये ७५००० ट्रान्झिस्टर्स एका चिपवर होते, आणि ही चिप दर सेकंदाला ४० कोटी आकडेमोडी करू शकत असे! हीच क्षमता आताच्या चिप्समध्ये कैकपटीनं वाढली आहे!
‘इंटेल इनसाइड’ या जाहिरात मोहिमेमुळे ‘पेंटियम’ हे नाव कोट्यवधी लोकांना माहीत झाले. त्यानंतर ‘पेंटियम ४’ श्रेणीवर आधारलेले कॉम्प्युटर्सही खूपच लोकप्रिय झाले. कॉम्प्युटरवर आधारित कामे जसजशी वाढत गेली. तसतशी त्याचा वेग वाढण्याची गरजही वाढतच गेलेली दिसते; पण एका कॉम्प्युटरमध्ये एकापेक्षा जास्त मायक्रोप्रोसेसर लावणे किचकट आहे. आज आपण कम्प्युटर विकत घेतो तेव्हा ‘पी-फोर’वाला कम्प्युटर विकत घ्यायचा की पी-फाइव्ह की पी-सिक्स या प्रश्नांनी गांगरून जातो. ही सारी नावं या पेंटियम सीपीयूचीच असतात. पी-४ यातील पी म्हणजे पेंटियम. पण यातल्या ‘पी सिक्स’ सीपीयूची मूळ युक्ती ‘डिजिटल इक्विपमेंट कापोर्रेशन (डेक)’ नावाच्या कंपनीकडून इंटेलनं चोरली असल्याच्या आरोपांनी मोठं वादळचं उभं राहिलं. त्या भानगडीत ‘डिजिटल’नं इंटेलला न्यायालयात खेचून ६०,००,००,००० डॉलर्सची वसुलीही केली !
पण पुढे एक आणखी गडबड झाली. व्हर्जिनियातील एका प्राध्यापकाने इंटेलला त्यांचा प्रोसेसर एक ठराविक आकडेमोड करताना चुकतोय हे दाखवून दिले, पण ही चूक २७००० वर्षांतून एकदाच होते असं इंटेलचे इंजिनियर पटवून देत होते तरी या प्रसंगाला वेगळेच वळण लागले. पेंटियमवर अनेक जोक्स येऊ लागले, लोक थट्टा करू लागले. त्यामुळे आयबीएमने पेंटियमवर आधारित पीसी बनवणे बंद केले. तेव्हा मात्र इंटेलने सपशेल शरणागती पत्करली. चिपमधील दोष काढून त्याजागी नव्या चिप्स बसवण्यात आल्या यात इंटेलला ४७.५ कोटी डॉलरचा फटका बसला.
वाढत्या वेगाची गरज भागविण्यासाठी आता इंटेलने नवे ‘कोअर’ तंत्रज्ञान बाजारात आणले आहे. कोअर तंत्रज्ञानामध्ये एक चीपच्या आतच माहितीवर प्रक्रिया करणारे दोन किंवा चार भाग असतात. यामुळे कॉम्प्युटरवर एकाच वेळी अनेक कामे वेगाने करणे शक्य होते. ऍपलच्या संगणकात इंटेलचे प्रोसेसर आधी वापरले जात नव्हते. हा इंटेलसाठी एक धब्बाच होता, पण २००५ साली स्टीव्ह जॉब्जने इंटेलच्या चिप्स बसवणे मान्य केल्याने आधीच दबदबा असलेल्या इंटेलचा मार्केटमधील धाक अजूनच वाढला. कॉम्प्युटर डेलचा असो, वा ऍपलचा… इंटेलच्या चिपशिवाय त्याचे पान हलत नाही.
हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या उद्योजकांच्या गोष्टी ऐकून प्रेरणा घेण्यासाठी चॅनेल आताच सबस्क्राईब करा.