भारताच्या वेगवान अर्थव्यवस्थेबाबत सर्वच बाजूंनी चांगली बातमी येत आहे. सातासमुद्रापार भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं २०२४ साठी भारताचा जीडीपी वाढीचा दर ६.८ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मूडीजनं आपलं रेटिंग ६.१ टक्क्यांवरून ६.८ टक्के केलंय. आता आणखी एका रेटिंग एजन्सीनं भारताच्या विकासाच्या गतीला मान्यता दिली आहे. क्रिसिल रेटिंग एजन्सीनं भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक संकेत दिलेत. CRISIL च्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारताचा जीडीपी ६.८ टक्क्यांच्या वेगाने वाढेल. रेटिंग एजन्सीस भारताचा विकासाचा दर वाढवत असताना आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या चीनची स्थिती मात्र बिकट आहे. आर्थिक मंदी आणि व्यवसायांसाठी प्रतिकूल परिस्थितींचा सामना करत असलेल्या चीननं यावर्षी पाच टक्के आर्थिक वृद्धीचं लक्ष्य ठेवलं आहे.
रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या मते, पुढील आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी ६.८ टक्के दरानं वाढण्याचा अंदाज आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलनं पुढील आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढीचा दर ६.८ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आणि २०३१ पर्यंत भारत उच्च-मध्यम उत्पन्न असलेला देश बनेल अशी शक्यता व्यक्त केलीये. २०३१ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होऊन ७ ट्रिलियन डॉलर (५८० लाख कोटी) होईल असंही त्यांनी म्हटलंय.
भारतीय अर्थव्यवस्थेला देशांतर्गत संरचनात्मक सुधारणेमुळे आधार मिळेल. २०३१ पर्यंत भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची क्षमता राखू शकते आणि त्यात सुधारणाही करू शकते. चालू आर्थिक वर्षात अपेक्षेपेक्षा ७.६ टक्क्यांच्या वाढीनंतर, २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताची वास्तविक जीडीपी वाढ ६.८ टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा असल्यातं क्रिसिल रेटिंग्सनं आपल्या ‘इंडिया आउटलुक’ अहवालात म्हटलं आहे.
७ लाख कोटींची अर्थव्यवस्था
रिपोर्टनुसार, पुढील सात आर्थिक वर्षांमध्ये (२०२४-२५ ते २०३०-३१) भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडून सात ट्रिलियन डॉलरच्या जवळपास पोहोचेल. क्रिसिलनं सांगितलं की, या कालावधीत अंदाजे सरासरी ६.७ टक्क्यांची वाढ भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवेल. आर्थिक वर्ष २०३०-३१ पर्यंत, भारताचे दरडोई उत्पन्न देखील उच्च-मध्यम उत्पन्न गटापर्यंत पोहोचेल. भारत सध्या ३.६ ट्रिलियन डॉलरच्या (२९६ लाख कोटी) जीडीपीसह (GDP) जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताच्या पुढे अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी हे देश आहेत.
‘कोई भी धंदा छोटा नहीं होता और धंदे से बड़ा धर्म कोई नहीं होता’, हा डायलॉग आपण ऐकला असेलच. त्यामुळे आज आपण आजच्या लेखात धंदा/व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ टिप्स पाहणार आहोत. विशेष म्हणजे, या टिप्स इतर कुणी नाही, तर स्वत: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या इलॉन मस्कच्या आहेत. मस्क साहेबांची संपत्ती आजघडीला २१० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. म्हणजे आपल्या मुकेश अंबानींच्या दुप्पट.
मस्क हा PayPal, Tesla Motors, आणि SpaceX यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा संस्थापक आहे. मस्क त्याच्या नाविण्यपूर्ण विचारासाठी आणि जोखीम पत्करण्याच्या स्वभावासाठी ओळखला जातो. ज्या व्यक्तीच्या घरी श्रीमंती नांदते अशा मस्कला अनेकदा व्यवसाय चालवण्याबाबत सल्ला विचारला जातो. तेव्हा या लेखातून आपण त्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी सांगितलेल्या ५ महत्त्वाच्या टिप्स कोणत्या आहेत, हे पाहूयात…
इलॉन मस्कने व्यवसाय सुरू करण्यासाठी सांगितलेल्या ५ टिप्स (Elon Musk’s 5 Best Tips for Running a Business)
१. तुमच्या कामाप्रती कायम उत्साही राहा
धनाढ्य इलॉन मस्क (Elon Musk) याच्या मते यशस्वी होण्यासाठी तुम्ही जे काही करत आहात, त्याच्याबद्दल कायम उत्साही असलं पाहिजे. तो म्हणतो, “लोकांनी तेच केलं पाहिजे, ज्याची त्यांना आवड आहे. यामुळे त्यांना इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त आनंद मिळेल.”
२. जोखीम पत्करा
इलॉन मस्क असेही सांगतो की, तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल आणि तुमच्या बँक अकाऊंटमध्ये भर घालायची असेल, तर तुम्ही जोखीम पत्करण्यासाठी तयार असला पाहिजेत. २०१२ सालच्या एका मुलाखतीत मस्क म्हणाला होता की, “प्रत्येकजण एकाच साच्यात बसण्याचा प्रयत्न करत आहे. कारण, जोखीम घेण्याविरूद्ध एक प्रचंड पूर्वाग्रह आहे.” मस्कचा असाही विश्वास आहे की, कोणतीच जोखीम न घेणे, ही सर्वात मोठी जोखीम आहे. विशेषत: अशा जगात जे सातत्याने बदलत आहे. अपयशी ठरण्याची हमी एकमेव स्ट्रॅटेजी देते, ती म्हणजे जोखीम न घेणे.
३. कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा
इलॉन मस्क हा त्याच्या कामाच्या नैतिकतेसाठी ओळखला जातो. मस्क म्हणतो की, “चिकाटी ही खूप महत्वाची आहे. जोपर्यंत तुम्हाला हार मानायला भाग पाडले जात नाही, तोपर्यंत तुम्ही हार मानू नका.” मस्कचा विश्वास आहे की, यशस्वी होण्यासाठी लोकांना ‘जीवतोड काम’ करावे लागेल. इतरांपेक्षा जास्त मेहनत केल्याने तुमच्या यशाची शक्यता वाढेल.
मस्क असेही म्हणतो की, “एकसारख्या कामासाठी जर इतर लोक आठवड्याचे ४० तास कामात घालवत असतील आणि त्याच वेळी तुम्ही आठवड्याचे १०० तास काम करत असाल, तर तुम्हाला माहिती आहे की, त्यांना जी गोष्ट साध्य करण्यासाठी जिथे वर्ष लागतं, ते तुम्ही अवघ्या ४ महिन्यात कराल.” त्यामुळे तुम्ही कठोर परिश्रमासाठी तयार असले पाहिजे. तसेच, तुमचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागेल.
४. कायम चिकाटी ठेवा
इलॉन मस्क आज जगातील दुसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. इथपर्यंत पोहोचण्याच्या त्याचा मार्ग सोपा नव्हता. त्याच्याकडेही अपयशाचा मोठा वाटा होता, पण त्याने चिकाटी दाखवली आणि हार मानली नाही. मस्कने स्थापन केलेल्या Zip2 आणि PayPal या दोन्ही कंपन्यांमधून बाहेर पडल्यानंतर २००८च्या मंदीच्या लाटेत त्याची Tesla आणि SpaceX या दोन्ही कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होत्या. त्यामुळे अनेकांना वाटले की, आता मस्क पुन्हा एकदा अपयशाच्या खाईत लोटला जाईल. पण मस्कने त्याच्या आधीच्या चुकांमधून धडा घेतला आणि आज तो जगातली श्रीमंत व्यक्तींच्या मांडीला मांडी लावून बसला आहे. अशाप्रकारे कोणीही स्वतःचे आर्थिक टप्पे गाठण्यासाठी आणि प्रेरणा शोधण्यासाठी त्याच्या अनुभवातून शिकू शकतो.
५. स्वतःमध्ये गुंतवणूक करत राहा
इलॉन मस्क याचा एकच सर्वोत्तम सल्ला कोणता असेल, तर तो हा की, “तुम्ही गोष्टी चांगल्या प्रकारे कशा करता येतील याचा सतत विचार करा आणि स्वतःला प्रश्न विचारा.” वयाच्या अवघ्या ८ वर्षापर्यंत मस्क हा दिवसाला तब्बल १० तास वाचन करत होता. त्याची पुस्तक वाचण्याची आवड इतकी प्रचंड होती की, लायब्ररीत वाचण्यासाठी त्याच्याकडील पुस्तके संपली म्हणून त्याने संपूर्ण एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका वाचण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या वयात, मस्क सातत्याने काहीतरी शिकण्यावर आणि स्वत:मध्ये गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित करायचा. त्याने स्वतःला प्रोग्राम करायला शिकवले आणि वयाच्या १२ व्या वर्षी त्याने 500 डॉलर्समध्ये व्हिडिओ गेम लिहिली आणि विकली देखील. पुढे मस्कने पेनिल्व्हेनिया विद्यापीठातून भौतिकशास्त्र आणि अर्थशास्त्रात दुहेरी पदवी घेतली. मस्कने सतत स्वत:मध्ये आणि त्याच्या स्वप्नांमध्ये गुंतवणूक केली. आज पाहा मस्कने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
मस्क हा आपल्या काळातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक आहे. मस्कने अनेक व्यवसाय शून्यातून उभे केले आहेत. तसेच, आपली राहण्याची आणि काम करण्याची पद्धत बदलण्यात मदत केली आहे. मस्कचा सल्ला कोणत्याही व्यवसायात लागू केला जाऊ शकतो.
तुम्ही जर मस्कच्या या टिप्सचे पालन केले, तर तुम्हालाही यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
वाचक मित्रांनो, तुम्हालाही हा लेख आवडला असेल, तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. तसेच, तुम्हाला आणखी कोणत्या व्यक्तींच्या टिप्स वाचायला आवडतील, या कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा.
जो जिद्दीने स्वप्नांच्या दिशेने झेप घेतो, त्याला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. आपल्यापुढे अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांनी खडतर प्रवास, कठोर परिश्रम करून अगदी काही वर्षांतच आपलं भलंमोठं साम्राज्य उभं केलं आहे. यामध्ये झेरोधा स्टॉक ब्रोकिंग स्टार्टअपचाही समावेश आहे. झेरोधा हे स्टार्टअप नितीन कामथ आणि निखिल कामथ या दोन भावांनी सुरू केलं आहे.
यशाचे शिखर गाठणाऱ्या या स्टार्टअपचे सहसंस्थापक नितीन कामथ यांनी सोमवारी (दि. २६ फेब्रुवारी) धक्कादायक खुलासा केला. त्यांनी सांगितले की, सहा आठवड्यांपूर्वी त्यांना स्ट्रोकचा सामना करावा लागला होता. कामथ यांनी ही माहिती त्यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून दिली. चला तर, नितीन कामथ यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.
झेरोधा (Zerodha) या स्टार्टअपने ही भारतात ऑनलाईन ट्रेडिंगला लोकप्रिय बनवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. नितीन कामथ यांनी त्यांचा भाऊ निखिलला सोबतीला घेत झेरोधाची स्थापना केली होती. नितीन लाखो युवा उद्योजकांचे प्रेरणास्थान आहेत.
किती वर्षांचे आहेत झेरोधाचे संस्थापक?
नितीन कामथ (Nithin Kamat) यांचा जन्म ५ ऑक्टोबर, १९७९ रोजी कर्नाटकाच्या शिमोगा येथे झाला. ४५ वर्षीय नितीन यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये बीईची पदवी घेतली आहे. २००८ मध्ये त्यांनी सीमा पाटील यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. विशेष म्हणजे, सीमा या झेरोधामध्ये क्वालिटी चीफ आहेत. या दाम्पत्याला एक मुलगाही आहे. त्यांची संपत्ती ही जवळपास २.७ अब्ज डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार, 22,526 कोटी रुपये आहे. क्रिकेट आणि फुटबॉलची प्रचंड आवड असलेले नितीन हे Rainmatter नावाच्या एका व्हेंचर कॅपिटल फर्मचेही सह-संस्थापक आहेत.
काय म्हणाले नितीन?
ट्विटरचा वापर कोण करत नाही? अर्थातच सर्वजण करतात. नितीनही एक सक्रिय ट्विटर युजर आहेत. ते नेहमी आपले विचार आणि अनुभव लोकांसोबत शेअर करत असतात. विशेष म्हणजे, जेव्हा त्यांना स्ट्रोक आला, तेव्हा त्यांनी याची माहिती देण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला होता. त्यांनी ट्वीट करत म्हटले होते की, “जवळपास सहा आठवड्यांपूर्वी मला अचानक हलका स्ट्रोक आला होता. यामागील कारण, वडिलांचे निधन, व्यवस्थित झोप पूर्ण न होणे, थकवा, शरीरातील पाण्याची कमतरता आणि जास्त काम करणे, यापैकी काहीही असू शकते.”
कशी झाली सुरुवात?
नितीन यांनी २०००च्या दशकाच्या सुरुवातीला एक ट्रेडर म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. एक वेळ अशी होती जेव्हा नितीन यांना कॉल सेंटरमध्ये ८ हजार रुपयांच्या मासिक वेतनावर काम करावे लागत होते. त्यावेळी नितीन फक्त १७ वर्षांचे होते. ही त्यांची पहिलीच नोकरी होती. नितीन यांनी त्यांच्या याच पगारासह स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू केली होती. सुरुवातीला एक वर्ष त्यांनी स्टॉक मार्केटला गांभीर्याने घेतले नव्हते. मात्र, नंतर त्यांना कळून चुकले की, यामधून चांगला नफा मिळवला जाऊ शकतो.
नितीन यांनी २००१ ते २००५ पर्यंत कॉल सेंटरमध्ये काम केले. सन २००५मध्ये त्यांनी आपला एक सल्लागार व्यवसाय सुरू केला. काही वेळानंतर जेव्हा NSEने मोफत ट्रेडिंग प्लॅटफॉर्म लाँच केला, तेव्हा नितीन यांना झेरोधा सुरू करण्याची कल्पना सुचली. कामथ बंधूंनी कोणत्याही फंडिंगशिवाय स्वत:च्या जोरावर २०१० साली बंगळुरूत झेरोधाची सुरुवात केली होती. २०१६ पर्यंत कंपनीच्या ग्राहकांची संख्या ७० हजार एवढी होती. मात्र, डिसेंबर २०१५मध्ये कंपनीने झिरो ब्रोकरेज इक्विटी इन्व्हेस्टिंग सुरुवात केली. त्यानंतर कंपनीच्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली.
मागील वर्षी मिळाली कोट्यवधींची भरपाई
नितीन आणि निखिल यांना मागील वर्षी म्हणजेच आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये १९५.४ कोटी रुपयांची भरपाई मिळाली होती. यादरम्यान दोन्ही भावांना प्रत्येकी ७२ कोटी रुपयांचा वार्षिक पगार मिळाला. म्हणजेच दोन्ही भावांना दर महिन्याला ६ कोटी रुपये पगार मिळाला.
कंपनीचा फायदा
झेरोधा या कंपनीच्या मागील आर्थिक वर्षातील उत्पन्न हे ३८.५ टक्क्यांच्या वाढीसह ६८७५ कोटी रुपये राहिले होते. हेच उत्पन्न २०२२च्या आर्थिक वर्षात ४,९६४ कोटी रुपये होते. यादरम्यान कंपनीचा नेट प्रॉफिटही ३९% वाढून २९०७ कोटी रुपयांवर पोहोचला. आर्थिक वर्ष २०२२मध्ये हे उत्पन्न २०९४ कोटी रुपये होते. कंपनीचे मूल्य पाहायचे झाले, तर तब्बल ३०००० कोटी रुपये आहे. हा नफा वार्षिक नफ्यापेक्षा जवळपास १० पटींनी जास्त आहे. स्टार्टअप कंपन्यांमध्ये कामथ बंधूंची संपत्ती ही सर्वाधिक आहे.
झेरोधाची गणना देशातील सर्वात मोठ्या डिस्काऊंट ब्रोकर्समध्ये होते. यामुळे कंपनीचे १ कोटींपेक्षा जास्त सक्रिय सबस्क्रायबर्स आहेत. कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ही १५०० पेक्षा जास्त आहे.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात पैसा कमावणे हा सर्वांपुढील यक्षप्रश्न राहिला आहे. पैसा कुणाला नको आहे. सर्वांनाच तो पाहिजे. लवकर पैसे कमावण्यासाठी लोक व्यवसाय करण्याचा सल्ला देतात. मात्र, व्यवसाय करणे आणि त्यात यश मिळवणे, हे वाटते तितके सोपे काम मुळीच नाही. यामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. जेव्हाही व्यवसाय किंवा त्याच्याशी संबंधित दिग्गजांची चर्चा होते, तेव्हा त्यात मुकेश अंबानी यांचं नाव आल्याशिवाय राहत नाही. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामील असलेले मुकेश अंबानी यांना आज कोणत्याही परिचयाची गरज नाहीये.
मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मालक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज ही तीच कंपनी आहे, जिने प्रत्येकाला फोन वापरण्याची सवय लावली होती. ही रिलायन्स कंपनी आज भारतातील सर्वाधिक मूल्य असणारी कंपनीही आहे. विशेष म्हणजे, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही १११ बिलियन डॉलर्स एवढी आहे. एवढं मोठं साम्राज्य, कोट्यवधी-अब्जो रुपये एका दिवसात किंवा एका रात्रीत कमावले जात नाहीत. यामागे त्यांचे वडील स्वर्गीय धीरूभाई अंबानी यांची कठोर मेहनत राहिली आहे. त्यांच्यानंतर मुकेश अंबानी यांनी आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे चालवत यशाच्या शिखरावर पोहोचवला आहे. तसं पाहिलं, तर मुकेश अंबानींना हा व्यवसाय वारशात मिळाला आहे, पण त्यांनीही आपलं डोकं लावून आणि कठोर मेहनत घेऊन एक वेगळी ओळख बनवली आहे. त्यामुळे आज आपण या लेखातून यशस्वी बनण्याच्या त्यांच्या ५ नियमांविषयी जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्हीही बिझनेस किंग बनू शकता.
यशस्वी बनण्यासाठी मुकेश अंबानींचे ५ नियम (Mukesh Ambani’s 5 rules to success)
१. धैर्यवान बना
मुकेश अंबानी यांनी यशस्वी बनण्यासाठी सांगितलेला पहिला नियम म्हणजे धैर्यवान बना. व्यवसायात किंवा जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात धैर्याशिवाय कोणीही मोठे यश मिळवले नाहीये. अर्थातच, तुम्ही एखादी मोठी गोष्ट करायला जाता, तेव्हा तुम्हाला थोडी भीती वाटते. मात्र, तुमच्यात दडलेला नायक शोधण्यासाठी तुम्हाला भीतीवर विजय मिळवावाच लागेल. धैर्याने, आत्मविश्वासाने कोणत्याही संकटावर मात करू शकता.
२. समस्या शोधा आणि त्यावर तोडगा काढा
अंबानींचा दुसरा नियम असा की, एक उद्योजक म्हणून, तुम्हाला ज्या समस्येचे निराकरण करायचे आहे ती शोधणे खूप महत्वाचे आहे. अंबानी सांगतात, ममला युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (UDCT) मध्ये प्रोफेसर शर्मा मिळाल्याने मी धन्य झालो. ते नेहमी म्हणायचे की, मी तुम्हाला समस्यांची यादी देणार नाही. तुम्ही जाऊन कोणत्याही गोष्टीवर काम करू शकता. तुम्हाला एखादी समस्या सापडेल आणि मग तुम्हाला सापडलेल्या समस्येच्या आणि त्यावर शोधलेल्या निराकरणाच्या गुणवत्तेवर मी तुम्हाला ग्रेड देईन. त्यामुळे उद्योजकाला हेच नियम लागू होतात की, तो समस्या सोडवत नाही, तर तो प्रथम समस्या शोधतो. एकदा तुम्हाला समस्या सापडली की, तुम्ही ती सोडवता.
३. कठोर मेहनत करा
अंबानी म्हणतात, तुमचे धावण्याचे शूज घाला, परंतु लक्षात ठेवा की, वैयक्तिक आणि व्यावसायिक यश हे स्प्रिंट (Sprint) नसून एक मॅरेथॉन आहे. आपण एका गतिमान जगात राहत असल्याने भाग्यवान आहोत, जिथे काहीही शक्य आहे. मात्र, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, असे रातोरात यश मिळत नाही. तुम्हाला समर्पित व्हावे लागेल. एकल मनाने राहावे लागेल आणि कठोर परिश्रम करावे लागेल. यातील कोणत्याच गोष्टीला पर्याय नाही. तसेच, हेही लक्षात ठेवा की, जीवनाच्या या मॅरेथॉनमध्ये आपले ध्येय साध्य करणे महत्वाचे आहे.
४. उच्च उद्देशाची सेवा करा
वडील धीरूभाई अंबानी यांनी १०० डॉलर्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड सुरू केल्याचे मुकेश अंबानी सांगतात. ते म्हणतात, १९८० मध्ये जेव्हा मी व्यवसाय जॉईन केला, तेव्हा कंपनीचे बाजारमूल्य हे ३० किंवा ४० दशलक्ष डॉलर्स होते. पुढच्या ३० वर्षात, या देशाने दिलेल्या संधींमुळे आम्हाला भारतासाठी संपत्ती निर्माण करता आली.
माझ्या वडिलांचा मोठा विश्वास होता की, कोणताही व्यवसाय ज्याचा एकमेव उद्देश पैसा कमविणे हा आहे तो करणे योग्य नाही. खरं तर, व्यवसाय हा एक मोठा सामाजिक हेतू पूर्ण केला पाहिजे. रिलायन्सने आपले सर्व पैसे भांडवली बाजारातून आणि वैयक्तिक लहान भागधारकांकडून उभे केले, म्हणून आम्ही सामान्य भारतीयांपैकी फक्त रिलायन्समध्ये गुंतवणूक करून दहा लाख करोडपती निर्माण केले आहेत आणि हीच देशासाठी संपत्ती निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. संधी निर्माण झाली की संपत्ती ही येतेच.
५. अपयश स्वीकारा
अंबानी असेही म्हणतात की, अपयश हे सामान्य असते. सर्व यश पाहून, माझ्या स्वतःच्या बाबतीतही लोक हे पाहत नाहीत की, यशस्वी होण्यापूर्वी मी किती वेळा अयशस्वी झालो आहे. तुम्ही यशस्वी होण्यापासून एक पाऊल दूर आहात. त्यामुळे अपयशाने कधीही निराश होऊ नका. त्याच्याकडून शिका, पण हार मानू नका.
वाचक मित्रांनो, तुम्हाला या लेखातील कोणता नियम सर्वात जास्त आवडला, हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. याव्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणत्या व्यक्तींच्या टिप्स वाचायला आवडतील, या कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा.
व्यवसाय करायचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मित्रांनो, असे अनेक बिझनेस स्टार्टअप आहेत, जे सध्याच्या बाजारात मोठ्या आव्हानांचा सामना करताना दिसत आहेत. मात्र, जर तुम्ही स्वतःचा स्टार्टअप लाँच करण्याचा विचार करत असाल किंवा आधीपासून या प्रक्रियेत उडी घेतली असेल, तर तुम्ही एक किंवा त्याहून अधिक कॉमन (Common) स्टार्टअप समस्या अनुभवल्या असतील. खरं तर, आज आम्ही तुम्हाला अशा ७ कॉमन स्टार्टअप चुका सांगणार आहोत, ज्यांच्यावर तोडगा काढला जाऊ शकतो. चला तर, वेळ न घालवता जाणून घेऊयात…
१. पात्र उमेदवार
हे जग वेगाने पुढे जात आहे. जगात अनेक लोक आहेत आणि त्यांच्यासाठी कधीही न संपणारे इंटरनेट कनेक्शनही आहे. अशात तुम्हाला वाटते की, नवीन स्टार्टअपमध्ये काम करण्यासाठी आपल्याला पात्र उमेदवार सापडतील. मात्र, दुर्दैवाने असे नसते. पात्र उमेदवार शोधणे हे तितकेच आव्हानात्मक असू शकते. तसेच, तुम्हाला पात्र उमेदवार जरी मिळाला, तरीही त्याच्या कामाची पद्धत, त्याची मूल्ये आणि इतर गोष्टी आवडतीलच असे होत नाही.
त्यामुळे नवीन स्टार्टअप आणि प्रस्थापित व्यवसायांसह पात्र उमेदवारांना जोडण्यासाठी चांगला ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या जॉब पोर्टल साइट्सचा वापर केल्याने तुम्ही फक्त आवश्यक पात्रता असलेल्यांचीच मुलाखत घेत आहात, याची खात्री करू शकता. इंटरनेट तुमच्या निवडी कमी करण्यासाठी अनेक उत्तम साधने ऑफर करत असताना तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवू नका.
२. एचआर आणि पगार
स्टार्टअप सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात एचआर विभाग आणि त्याचे सर्व पैलू हाताळणे, यामुळे संपूर्ण स्टार्टअप प्रक्रियेत अतिरिक्त ताण आणि चिंता वाढवू शकते. त्यामुळे, तुमच्याकडे जे काही आहे ते पुरेसे आहे. तुमच्यासाठी फक्त तुमच्या ब्रँडची प्रतिमा आणि मूल्यांवर काम करणे, नवीन कर्मचारी नियुक्त करणे, दुकान सुरू करणे आणि आपल्या ग्राहकांचा शोध घेणे, हे महत्त्वाचे आहे. तुम्हाला शेवटची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे एचआर विभाग स्थापन करणे.
हा अधिकचा ताण टाळण्यासाठी, काही व्यवसाय एचआर विभाग हाताळण्यासाठी पीईओ (Professional Employer Organization) सेवा निवडतात. जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी सर्वोत्तम PEO कंपन्यांपैकी एक निवडता, तेव्हा तुमच्या सर्व HR संबंधी गरजांची काळजी घेतली जाते. यामुळे होतं असं की, तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित करू शकता.
३. वाढती स्पर्धा
सध्याच्या जगात प्रचंड स्पर्धा वाढली आहे. यामागील कारण फक्त एकच आहे. ते म्हणजे वेब. वेब पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात लोकांना जोडत असल्याने स्पर्धा वाढली आहे. नवीन व्यवसायांना त्यांच्या उद्योगांमध्ये अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते, ज्यामध्ये सारखाच व्यवसाय करणारे सुस्थापित व्यावसायिक आधीच मोठ्या संख्येने ग्राहकांचे नेतृत्व करतात. तसेच, आपली प्रतिष्ठाही निर्माण करतात. अनेकदा काही व्यवसाय मालक या आव्हानामुळे भारावून जातात, परंतु याकडे वाईट गोष्ट म्हणून पाहण्याऐवजी, वाढ होण्याची संधी म्हणून पाहा. स्पर्धेचा अभ्यास केल्याने, बाजार आणि तुमच्या भावी ग्राहकांबद्दल महत्त्वाची माहिती मिळू शकते.
४. मार्केटिंगसाठी कष्ट न घेणे
मार्केटिंग हा तुमच्या व्यवसायाच्या आत्मा आहे. कारण, यामुळेच नवीन ग्राहक तुमच्या स्टोअर किंवा वेबसाइटवर येतात. तसेच, तुमच्या ब्रँडची दृश्यमानता (Visibility) वाढवते आणि तुम्ही ज्या उद्योगात काम करत आहात, त्या उद्योगाचा एक प्रतिष्ठित भाग म्हणून तुमचा व्यवसाय स्थापित करण्यात मदत करते. अनेक स्टार्टअप्स मार्केटिंगसाठी संघर्ष करतात. कारण, त्यांच्याकडे पेरोलवर कोणीही नसते, ज्यामुळे त्यांना कळेल की, ते काय करत आहेत. मार्केटिंग किंवा SEO तज्ञ हा नवीन व्यवसायाचा व्यावहारिकदृष्ट्या एक आवश्यक घटक आहे. कारण, चांगल्या मार्केटिंगशिवाय, आपल्या उत्कृष्ट उत्पादनांबद्दल किंवा सेवांबद्दल कोणालाही माहिती होणार नाही.
तुम्ही जर मार्केटिंगमध्ये संघर्ष करत असाल, तर थर्ड पार्टी फर्म किंवा SEO तज्ञ नियुक्त केला पाहिजे. जेणेकरून तुमच्या नवीन व्यवसायाला तुमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत मिळू शकते. तसेच, ते सातत्याने तुमच्याकडे येत राहतील.
५. निधी (फंडिंग)
खरं तर, अनेक व्यवसाय असे असतात, ज्यांना पुरेसा निधी कधीच मिळत नाही, मिळतो का? दररोज किंवा आठवड्याला आपल्याकडे कल्पना येतात, त्यापैकी काहींवर आपण कृती करतो आणि इतर काही बॅकअपमध्ये अशा वेळेसाठी ठेवतो, जेव्हा आपल्याकडे जास्त पैसा, अधिक वेळ किंवा स्पष्टता असते. अनेक स्टार्टअप्सना निधीच्या कमतरतेच्या समस्येचा सामना करावा लागतो आणि काहींना मर्यादित बजेटमुळे काही उत्पादने आणि सेवाही मिळतात.
निधी कधीही पुरेसा पुरवठा करत नाही, परंतु स्टार्टअप आणि स्थापित व्यवसायांसाठी बरेच पर्याय असतात. नवीन स्टार्टअपसाठी एंजेल गुंतवणूकदार, बँक कर्ज आणि नेहमीच लोकप्रिय क्राऊड-फंडिंग यांसारखे काही पर्याय आहेत. गुंतवणूकीसाठी पैसे कर्ज म्हणून घेण्यापूर्वी किंवा स्वीकारण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या निधीच्या अटींची चांगली जाणीव आहे, याची खात्री जरूर करा.
६. वेळेचे खराब नियोजन
नवीन व्यवसाय जेव्हाही सुरू करतात, तेव्हा व्यवसाय मालक एक सामान्य चूक नक्कीच करतात. ती म्हणजे, त्यांना वाटते की, ते संपूर्ण व्यवसाय स्वत: व्यवस्थापित करू शकतात. आपल्या वैयक्तिक दृष्टिकोनातून इतरांवर विश्वास ठेवणे, अर्थातच कठीण काम आहे. तुमच्या व्यवसायाचे यश हे थेट तुमच्या वैयक्तिक यशाशी जोडलेले असते. वस्तुस्थिती अशी आहे की, प्रत्येकजण चांगला व्यवस्थापक नसतो. काही लोक जरी कल्पना, वित्त किंवा मार्केटिंगमध्ये उत्कृष्ट असले, तरीही व्यवसाय व्यवस्थापित करू शकत नाहीत. तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या व्यवस्थापनाशी संघर्ष होत असल्यास, तुम्हाला तो चालवण्यात मदत करण्यासाठी कोणालातरी कामावर घेणे, यात कसलीही लाज नाही. याव्यतिरिक्त तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखत असलेल्या व्यक्तीला, ज्याला व्यवस्थापन प्रक्रियेसाठी योग्य कौशल्ये माहिती आहेत, अशा व्यक्तीला व्यावसायिक भागीदार बनवण्यात कोणतीही अडचण नाही.
७. संवाद
नवीन स्टार्टअप म्हणजे एका कॉर्पोरेट छताखाली काम करणारी पूर्णपणे नवीन टीम असू शकते. अगदी उत्तम परिस्थितीतही संवाद आव्हानात्मक बनू शकतो. नवीन लोकांशी जुळवून घेणे प्रत्येकासाठी सोपे नसते, परंतु व्यवसायाच्या निरंतर यशासाठी तुमच्या सहकाऱ्यांमध्ये योग्य संवाद असणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाइन चॅट रूमसह एक संघ व्यवस्थापन प्लॅटफॉर्म सेट करा, जेणेकरून व्यवसायातील प्रत्येकजण सहजपणे एकमेकांशी संपर्क साधू शकेल, फायली शेअर करू शकेल आणि त्यातूनच कामांचे वाटपही करू शकेल.
तर मित्रांनो, आता व्यवसायात उतरताना किंवा उतरला असाल, तर तुम्ही या समस्या ओळखून त्यावर तोडगा काढू शकता.
तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर कमेंटमध्ये Yes असे लिहा. तसेच, तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवर लेख वाचायला आवडतील, हेदेखील कमेंट करून सांगायला विसरू नका. तुमच्या मित्रमंडळींनाही हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.
महाराष्ट्राच्या मातीने अनेक रत्नं घडवली, अनेकांनी स्व-कर्तृत्त्वावर नावलौकिक मिळवला. अनेक दिग्गजांनी स्वतःसोबतच महाराष्ट्राचं, भारताचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं. आज आपण अश्याच एका चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी महाराष्ट्राचा डंका भारताबरोबरच आख्ख्या जगात वाजवला, ज्यांनी खवय्यांना स्वर्गीय चवीची अनुभूती दिली, शेकडो हॉटेल्सची उभारणी करणारे आघाडीचे ते मराठी उद्योजक म्हणजे विठ्ठल कामत.
विठ्ठल कामत यांचे वडील व्यंकटेश कामत सुरुवातीला डिश वॉशर म्हणून काम करायचे. हे काम करत असताना सतत त्यांना वाटायचं की, आपलं स्वतःचं एक हॉटेल असावं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली, रात्रंदिवस काम केले आणि अखेरीस 1952 मध्ये त्यांनी सत्कार हे पहिले हॉटेल उभे केले. हे हॉटेल उभे करण्यासाठी व्यंकटेश कामत यांनी आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवले आणि व्यवसायाची उभारणी केली. हळूहळू व्यवसाय वाढू लागला. धंद्यात यश येऊ लागलं. सगळं काही आनंदात चालू होत. या अश्या आनंदाच्या वातावरणातच 1956 साली विठ्ठल कामत यांचा जन्म झाला. लहानपणापासून विठ्ठल कामत अभ्यासात हुशार होते, नवीन गोष्टी करण्यात त्यांना रस होता. अभ्यासात हुशार असणाऱ्या विठ्ठल यांनी 1973 साली मुंबईच्या रॉबर्ट मनी हायस्कूलमधून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
विठ्ठल यांच्या आईला नेहमी वाटायचं की, त्यांनी वडिलांना हॉटेलमध्येच मदत करावी, मात्र त्यांना इंजीनियर व्हायचं होतं. त्यांनी इंजीनियरिंगची पदवी मिळवली. इकडे वडिलांचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतच होता. वडिलांनी दोन चांगली हॉटेल उभी केली होती. मात्र अपयशाशिवाय यश मोठं वाटत नाही म्हणतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अपयश, संकटं ही येतच असतात, जवळच्याच एका व्यक्तीने फसवणूक करून विठ्ठल यांच्या वडिलांचे हॉटेल हिसकावले. त्यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अश्यावेळी त्यांच्याकडे असलेले दुसरे म्हणजेच सत्कार हॉटेलही असेच लुबाडले जाईल, या भीतीने विठ्ठल यांनी वडीलांसोबत काम करायचे ठरवले. त्यांचा हा निर्णय त्याच्या आई-वडिलांना देखील खूप आवडला. हेच होते विठ्ठल यांचे हॉटेल व्यवसायातले पहिले पाऊल. व्यवसाय कसा वाढेल यासाठी विठ्ठल काम करू लागले. त्यांनी मुंबईत ‘विठ्ठल कामत’ या नावाने अनेक हॉटेल्सची साखळीच उभी केली.
एका मुलाखतीत ते सांगतात, त्यांच्या मित्राचा गुजरातमधील हॉटेल व्यवसाय तोट्यात जात होता, काही दिवसात ते हॉटेल बंद करायची पाळी येणार होती, अशाकाळात ते त्याच्या हॉटेलच्या व्यवस्थापनासाठी गुजरातला गेले, ते हॉटेल इतकं मोक्याच्या जागेवर होतं, की हॉटेल कसं काय चालत नाही हा एक प्रश्नच होता, हॉटेल हायवेला होते. गडबड होती होती ती मार्केटिंग आणि मॅनेजमेंटमध्ये. त्यांनी गेल्या गेल्या, हॉटेलसमोर अनेक गाड्या लावल्या, ज्यावरून असं वाटेल की, ‘बाप रे! या हॉटेलमध्ये किती गर्दी आहे.’ त्याबरोबरच त्यांनी हॉटेलमध्ये आलेल्या कस्टमरच्या गाड्या स्वच्छ करण्यासाठी काही लोक ठेवले. म्हणजे गाडी स्वच्छ होईपर्यंत ड्रायवर हॉटेलमध्ये काहीतरी खात बसेल. अश्या पद्धतीने ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या आयडीयांनी त्यांनी मित्राच्या हॉटेलची गाडी पुन्हा रुळावर आणली.
त्यानंतर ते मुंबईत आले, जेव्हा त्यांचे ‘सत्कार’ रेस्टॉरंट चांगले चालू लागले, तेव्हा विठ्ठल यांनी वडिलांना व्यवसाय वाढवण्याचा आपला विचार सांगितला. वडिलांनीही होकार दिला. त्यांनी हॉटेल व्यवसायाबद्दल अधिक माहिती गोळा करण्यासाठी लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये कूक म्हणून प्रति आठवडा 75 पौंडची नोकरी पत्करली. अनेक देशांचा प्रवास केला आणि हॉटेल व्यवसायातील बारकावे शिकून घेतले.
लंडनमध्ये आलेल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी धंद्यात नावीन्य आणले. एके दिवशी त्यांना कळले की, सांताक्रूझ विमानतळाजवळील फोर स्टार हॉटेल ‘प्लाझ्मा’ विकले जात आहे. त्यांनी ते विकत घ्यायचे ठरवले, पण त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते. मात्र त्यांनी हिंमत हारली नाही. बँकेतून कर्ज काढून कशीबशी त्यांनी पैश्यांची जुळवणी केली आणि ‘प्लाझ्मा’ विकत घेतले.
आणि त्याच ठिकाणी 1997 साली त्यांनी भारतातील पहिले इको-टेल फाइव्ह स्टार हॉटेल ‘ऑर्किड’ उभे केले. जे की, REDUCE – REUSE – RECYCLE या तत्वावर उभे आहे. हे हॉटेल एक इको-फ्रेंडली हॉटेल आहे. इथे कोणत्याही प्रकारचा कचरा तुम्हाला अजिबात पाहायला मिळणार नाही आणि विशेष म्हणजे हे हॉटेल जगातील Highest Award winning हॉटेल आहे. या हॉटेलला आतापर्यंत ३७५ पेक्षाही जास्त पुरस्कार मिळाले आहेत.
The orchid hotel pune
त्यांनी इतकं अफाट यश मिळवलं खरं पण ‘ऑर्किड’ च्या उभारणीवेळी त्यांच्या डोक्यावर कर्जाचा देखील बलाढ्य डोंगर उभा राहिला. या कर्जाच्या ओझ्यामुळे हॉटेल बंद करण्याची वेळ आली होती. तब्बल 282 कोटी रुपयांपर्यंत कर्ज वाढलं होतं. आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या ते खचले होते, आता पुढे काय होईल? पैश्यांची जोडणी कशी करता येईल? या विचाराने ते बैचेन झाले होते आणि अशातच त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार डोकावू लागले, मात्र एका दृश्यामुळे त्यांना संकटांना हरवण्याची प्रेरणा मिळाली. एका इमारतीच्या २३ व्या मजल्यावर एक पेंटर काहीही सुरक्षाकवच नसताना भिंत रंगवत होता आणि भिंत रंगवून झाल्यावर तो सुरक्षित खाली देखील उतरला, “जर तो पेंटर जीवघेणी जोखीम घेऊ शकतो तर मग मी नक्कीच परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो.” या विचाराने त्यांनी परिस्थितीशी दोन हात केले आणि शेवटी संकटांना हरवून दाखवले.
ही झाली विठ्ठल कामत यांची व्यावसायिक बाजू. पण विठ्ठल कामत हे एक बहुरंगी, बहुढंगी, बहूआयामी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे पर्यावरणावर देखील खूप प्रेम. हे विश्व, ही सृष्टी सदा हिरवळ आणि झाडा-झुडूपांनी तसेच प्राण्यांनी समृद्ध असावी असा त्याचा मानस आहे. यासाठी ‘पाथरे गाव’ सारख्या डोंगराळ भागात त्यांनी औषधी वनस्पतींची लागवड केली. मुंबईतील अनेक उद्यान दत्तक घेत शहर प्रदूषण विरहित बनवण्यास सहाय्य केले. ६० लाखांहून अधिक झाडे लावली. १०० पेक्षा जास्त टेकड्यांचे त्यांनी औषधी आणि स्थानिक झाडांमध्ये रुपांतर केले. पक्षीशास्त्रज्ञाच्या पेशाने त्यांनी ‘ऑर्किड’ हॉटेल जवळ पोपट गल्ली देखील तयार केली. तिथे नानाविविध प्रकारचे पोपट, इतर काही पक्षी पाहायला मिळतात, त्याबरोबर ओडिसा येथील “चिल्का सरोवर” येथे डॉल्फीन ऑबझर्वेटरी सेंटर”ची स्थापना केली. ऑर्किड हॉटेल, मुंबई आणि किल्ले जाधवगड येथे आई या नावाचे संग्रहालय देखील त्यांनी उभे केले. तिथे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू ठेवून पर्यावरणाला पूरक असा उपक्रम कामतांनी यशस्वी करून दाखवला.
The Orchid Jamnagar
विठ्ठल कामत यांचा हॉटेल व्यवसाय आज संपूर्ण जगभर पसरला आहे. त्यांना आजवर ११० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. यामध्ये इंडियन एक्सप्रेसचा सर्वोत्कृष्ट सीईओ उद्योग पुरस्कार, त्यानंतर दलाई लामा यांच्याकडून मिळालेला गोल्डन पीकॉक पुरस्कार, २०१० मध्ये ग्रीन हॉटेलीयर पुरस्कार, राजीव गांधी पुरस्कार, २०१२ मध्ये जर्मनचा जीवनगौरव पुरस्कार अश्या अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. विठ्ठल कामत हे ‘हॉटेल आणि रेस्टॉरेट असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष आहेत. या व्यतिरिक्त अनेक शैक्षणिक, औद्योगिक समितीवर सल्लागार म्हणून ते आपले काम करतात.
हॉटेल इंडस्ट्री मध्ये मराठी माणूस यशस्वी होऊ शकतो किंवा उद्योजक बनू शकतो असं क्वचित पहायला मिळतं, परंतु आज बरीच वेगवेगळी मराठी लोकं उद्योजक बनण्याचा किंवा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतात. अशांसाठी विठ्ठल कामत यांनी आपली हॉटेल इंडस्ट्रीमधील कारकीर्द आणि उद्योजक म्हणून यशस्वी केलेल्या वाटचालीचा संपूर्ण प्रवास त्यांच्या ‘इडली ऑर्किड आणि मी’, ‘उद्योजक होणारच मी’ आणि यश, अपयश आणि मी या पुस्तकांच्या माध्यमातून उद्योजकांपर्यंत पोहोचवला आहे.
जगभरात ४५० पेक्षाही अधिक रेस्टॉरंट उघडणारे एक यशस्वी उद्योजक, एक जाणकार लेखक, पर्यावरण आणि पक्षीविद्यातज्ञ, पूरातन वस्तूंचे अभ्यासक एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या विठ्ठल कामत यांचा आदर्श घेऊन आपण देखील संकटातून ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग शोधत यशाचे सर्वोच्च शिखर गाठू आणि आपल्या कामाचा डंका केवळ अटकेपर्यंतच नाही तर जगाच्या दाही दिशात पोहोचवू.
Dell Success Story: आजपर्यंत आपण अनेक यशस्वी लोकांच्या कथा पाहिल्या किंवा वाचल्या आहेत. यापैकी काहींनी स्वत:ला पडलेल्या कोड्यामुळे, तर काहींनी निर्माण झालेल्या उत्सुकतेतून आपल्या आयुष्यात क्रांती घडवली. अशा महारथींमध्ये डेल कम्प्यूटर कंपनीचे संस्थापक मायकल डेल यांच्या नावाचाही समावेश आहे. डेल आज (दि. २३ फेब्रुवारी) आपला ५९वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात की, त्यांनी कशाप्रकारे लहानपणापासून ‘जादूचा डब्बा’ म्हणजेच कम्प्युटर समजून घेण्याच्या हट्टापायी शिक्षणाला रामराम ठोकला आणि DELL कंपनीचा पाया रचला. चला तर, सुरुवात करूयात…
जन्म आणि कुटुंब
मायकल डेल (Michael Dell) यांचा जन्म २३ फेब्रुवारी, १९६५ रोजी अमेरिकेच्या ह्यूस्टन शहरात झाला आहे. त्यांचे वडील अलेक्झांडर डेल, दातांचे डॉक्टर होते. तसेच, आई लंगफान या एक स्टॉक ब्रोकर होत्या. मायकल यांच्या घरची परिस्थिती चांगली होती. आई-वडील दोघेही कमावते होते. त्यामुळे घरात पैशांची कसलीच कमतरता नव्हती. दुसरीकडे, मायकल हे बालपणापासूनच अभ्यासात हुशार होते. ते बालपणी इतर मुलांसारखे अजिबातच नव्हते. ते त्यांच्या जास्तीत जास्त वेळ काही ना काही शिकण्यात घालवत होते. मायकल यांचे प्राथमिक शिक्षण ह्यूस्टन शहरातील ‘हीरोड एलिमेंटरी स्कूल’मध्ये झाले होते. शिकत असतानाच मायकल यांनी आई-वडिलांकडून गुंतवणूक आणि व्यापाराचे सर्व गुण शिकून घेतले होते. बालपणापासूनच हे सर्व गुण शिकल्यानंतर मायकल यांचा व्यवसायाबद्दलचा रस आणखीच वाढला होता. त्यांनी मोठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे, जेव्हा ते १० वर्षांचे होते, तेव्हा त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडून पॉकेट मनी मिळायची. हेच पैसे ते साठवू लागले होते.
बालपणीपासून मायकल यांच्यात पैसे साठवण्याची धडपड असायची. त्यामुळेच त्यांनी पैसे जमा करण्यासाठी शहरात टपाल तिकिटांची विक्री सुरू केली होती. हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल की, पैसे साठवण्याच्या चांगल्या सवयीमुळे त्यांनी अवघ्या १२ वर्षांच्या वयात २०००हून अधिक डॉलर्स साठवले होते.
यशाचे पहिले पाऊल
बालपणीपासून एक चांगला धडा घेतल्यामुळे मायकल डेल यांनी त्यांच्याजवळची संपूर्ण रक्कम मेटल्समध्ये गुंतवली. आयुष्यातील आपल्या पहिल्याच गुंतवणूकीतून मायकल यांना १८००० डॉलरचा फायदा झाला. तसेच, त्यांचे मनोबलही खूप वाढले. मायकल यांना इतक्या कमी वयात झालेला फायदा हा त्यांच्या वडिलांच्या वर्षभराच्या कमाईपेक्षाही कित्येक पटींनी जास्त होता. मायकल लहान वयातच यशाच्या त्या टप्प्यावर होते, जिथे अनेक व्यावसायिकही पोहोचू शकत नाहीत. मायकलचा काम करण्याबद्दलचा रस पाहून त्याच्या वडिलांनी त्याचे स्वप्न साकार करण्याचा विडा उचलला.
बालपणीपासूनच तांत्रिक क्षेत्रात रस
प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रस असतो. तसंच काहीसं मायकल यांच्याविषयीही होतं. मायकल यांना बालपणीपासूनच तांत्रिक क्षेत्रात खूपच रस होता. यामुळेच त्यांच्या वडिलांनी त्यांना वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी एक कम्प्यूटर खरेदी करून दिला. मात्र, मायकल यांनी कम्प्यूटर बाहेरून शिकण्याऐवजी त्याच्या आतमधील भागांविषयी शिकण्यास सुरुवात केली. त्यांनी त्या कम्प्यूटरचा एक-एक भाग वेगळा केला आणि आता त्यांना कम्प्यूटरचा प्रत्येक भाग व्यवस्थित दिसत होता.
याच घटनेनंतर मायकल यांचे कम्प्यूटरविषयीचा रस आणखी वाढला आणि त्यांनी आपला अधिकतर वेळ कम्प्यूटरवर घालवण्यास सुरुवात केली. नेहमीप्रमाणे कम्प्यूटरचा प्रत्येक भाग चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी त्यांनी दुसऱ्या एका कंपनीचा कम्प्यूटर खरेदी केला. इथंही मायकल यांनी दुसऱ्या कम्प्यूटरसोबत तेच केले, जे आधीच्या कम्प्यूटरसोबत केले होते. नंतर त्यांनी त्या कम्प्यूटरचे सर्व भाग योग्यरीत्या कम्प्यूटरमध्ये लावले आणि पुन्हा त्या कम्प्यूटरला पहिल्यासारखे बनवले, जे खूपच चकित करणारे होते.
कॉलेजमध्ये जुन्या पार्ट्सपासून बनवला कम्प्यूटर
मायकल डेल जेव्हा कॉलेजमध्ये होते, तेव्हा त्यांनी एकदा कम्प्यूटरशी संबंधित हार्डवेअर आणि त्याचे पार्ट्स एकत्र करून आपला स्वत:चा एक कम्प्यूटर बनवला. त्यांनी तयार केलेला कम्प्यूटर आपल्याच कॉलेजमधील मित्राला विकला आणि त्यातून त्यांना काही पैसे मिळाले. आता पैशांचे आकर्षण मायकल डेल यांना बालपणीपासूनच होते. आता मायकल आणि कम्प्यूटर हे एक समीकरण बनले होते. ते आणखी कम्प्यूटर बनवू लागले. ते जे कोणते कम्प्यूटर बनवायचे, ते लोकांची सुविधा लक्षात ठेवून बनवत होते. यामुळे लोकांना त्यांनी बनवलेले कम्प्यूटर खूपच आवडू लागले होते.
कॉलेजला रामराम अन् स्वत:ची कंपनी
एका अहवालानुसार, १९८४मध्ये मायकल डेल यांनी १ हजार डॉलरमधून कम्प्यूटरचा व्यवसाय सुरू केला होता. हा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला. त्यांनी व्यवसायात प्रवेश करण्यासाठी मेडिकल कॉलेजला रामराम ठोकला. त्यांनी आपल्या कंपनीला पीसीज लिमिटेड (PC’s Limited) या नावाने रजिस्टर केले. सुरुवातीला त्यांनी हॉस्टेलच्या एका रूममध्ये कम्प्यूटर असेम्बल करण्यास सुरुवात केली आणि त्यांना यातून यशही मिळाले. १९८५मध्ये त्यांनी आपल्या कंपनीचा पहिला टर्बो पीसी बनवला, ज्याचे डिझाईन मायकल यांनीच केले होते. हे कम्प्यूटर विकण्यासाठी त्यांनी जाहिराती आणि मेल-ऑर्डर कॅटलॉग या माध्यमाची निवड केली. मायकल यांच्या सर्व पॉलिसी मार्केट आणि ग्राहक, या दोघांसाठी योग्य होती, ज्यामुळे कंपनी दिवसेंदिवस प्रगती करू लागली. यानंतर १९८८ मध्ये कंपनीचे नाव पीसीज लिमिटेड बदलून डेल कम्प्यूटर कॉर्पोरेशन (Dell Computer Corporation) असे ठेवले.
विशेष म्हणजे, पुढच्याच वर्षी म्हणजे १९८९मध्ये मायकल यांनी संसार थाटला. त्यांनी सुझेन डेल यांच्यासोबत लग्न केले. या दोघांनी ३ मुली आणि १ मुलगा अशी ४ अपत्य आहेत. मुलींची नावे, अलेक्सा, ज्युलिएट आणि किरा आहे. तसेच, मुलाचे नाव झॅकरी डेल असे आहे.
हळूहळू मायकल यांनी बनवलेल्या कंपनीचे नाव प्रत्येक व्यक्तीच्या तोंडावर येऊ लागले, जे मायकल यांच्यासाठी मोठ्या यशाचे संकेत होते. मायकल यांची डेल कंपनी त्यावेळी सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि कमी किंमतीत लोकांना कम्प्यूटर उपलब्ध करून देऊ लागली. एवढंच नाही, तर मायकल यांची कंपनी जगभरात यशस्वी झाली. विशेष म्हणजे, अवघ्या २७व्या वर्षी मायकल हे सर्वात कमी वयातील CEO बनले. त्यांची कंपनी जगातील प्रसिद्ध 500 कंपन्यांमध्येही सामील झाली. मायकल यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे त्यांची कंपनी आज जगातील सर्वात मोठी टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांपैकी एक आहे.
आज घडीला मायकल डेल हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १७व्या स्थानी आहेत. रिपोर्टनुसार, डिसेंबर २०२३मध्ये त्यांची एकूण संपत्ती ही ७२.८ बिलियन डॉलर्स इतकी होती. यावरून एक गोष्ट सिद्ध होते मित्रांनो, जर तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करत आयुष्यात पुढे जात राहिलात, तर एक दिवस तुम्हाला यश नक्कीच मिळेल.
तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला हे कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. लेख आवडला असेल तर लाइक आणि subscribe जरूर करा आणि हो अजून कोणत्या विषयाची माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.
हरयाणातील आदमपूर मंडी गावातील एका तरुणाचं स्वप्नं होतं- इंजिनिअर बनायचं. पण त्याची झेप काही इंटरपुढे गेली नाही. बरं झालं तो इंजिनिअर झाला नाही ते. नाहीतर कुठेतरी पाच पंचवीस हजाराची नोकरी करून पगाराच्या दिवसाची वाट बघत बसला असता. आज त्याच्या कंपन्यामध्ये हजारो लोक काम करताहेत आणि त्याच्या सर्व कंपन्यांचं बाजारमूल्य आहे तब्बल ४२ हजार कोटी. १९९२ मध्ये देशात सर्व प्रथम २४ तास चालणारी वाहिनी आणून अभूतपूर्व क्रांती घडवून देशातील लाखो-करोडो लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या सुभाष चंद्रांची कहाणी…
हरियानाच्या आदमपूर शहरात, १९५० साली एक सर्वसाधारण व्यापारी कुटुंबात जन्म झाला सुभाष चंद्रा गोयल यांचा. लहानपणापासूनच कौटुंबिक दुकानात हातभार लावत कष्टाचे संस्कार व कौटुंबिक व्यावसायिकतेचे धडे घेतले. सुभाष चंद्रा अर्धवट शिक्षण घेऊन घराबाहेर पडले, तेच मुळी उराशी आणखी एक स्वप्न घेऊन. नोकरी करायची नाही तर काहीतरी उद्योग धंदाच करायचा. त्या दिशेने त्याने पावले टाकायला सुरुवात केली. ऐन तिशीत असताना ते एका पॅकेजिंगच्या औद्योगिक प्रदर्शनाला गेले. तेव्हाच त्यांच्या मनात आपणही पॅकेजिंग कंपनी सुरु करायची असा विचार आला. देशात त्याकाळी ॲल्युमिनिअम ट्यूबची चलती होती. पण भविष्यात ॲल्युमिनिअम नव्हे, तर लॅमीनेटेड ट्यूबची चलती असेल हे हेरून त्यांनी एस्सेल प्रोपॅक नावाने कंपनी सुरु केली. टूथपेस्ट, औषधे, सौंदर्य प्रसाधने, अन्न पदार्थ आणि दैनंदिन वापराच्या वस्तूसाठी आवश्यक अशा पॅकिंगची निर्मिती त्यांनी सुरु केली. आशियातील ती सर्वाधिक मोठी कंपनी तर आहेच, पण जगातली ती दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. 2019 मध्ये द ब्लॅकस्टोन ग्रुपने कर्जबाजारी एस्सेल ग्रुपच्या मालमत्ता विक्रीदरम्यान कंपनीचे अधिग्रहण केले होते आणि ऑक्टोबर २०२० मध्ये कंपनीचे नाव बदलून ईपीएल लिमिटेड असे करण्यात आले.
परदेशी पर्यटन करताना एका ॲम्युझमेंट पार्कमध्ये फिरताना त्यांना भारतात आशिया खंडातली सर्वात मोठी मनोरंजन नगरी उभारायची कल्पना सुचली आणि मुंबईजवळ त्यांनी ६४ एकर जागेवर १९८८ मध्ये एस्सेल वर्ल्ड उभे केले. नंतर जवळच वॉटर किंग्डमही उभारले. देशातील लाखो लोक त्यांच्या मनोरंजन नगरीला भेट देतात.
एकदा ते मुंबईच्या दूरदर्शन केंद्रावर आपल्या मित्राला भेटायला गेला. त्या काळात दूरदर्शनवर केवळ संध्याकाळी काही रटाळ कार्यक्रम असायचे. तेव्हाच त्यांना २४ तास चालणारी वाहिनी काढायची कल्पना सुचली. तेव्हा सर्वच अनुभवी लोकांनी त्यांना वेड्यात काढले. कमावलेले सारे काही ते एका फटक्यात गमावणार असाच त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांचा अंदाज होता, पण सुभाष चंद्रांना स्वतःवर विश्वास होता. त्या क्षेत्रातील कोणताही अनुभव गाठीशी नसताना त्यांनी २ ऑक्टोबर १९९२ रोजी झी टीव्ही हे देशातील पहिलं २४ तास चालणारं टीव्ही चॅनेल सुरु केलं. सुरुवातीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, तरीही सुभाष यांनी जिद्द आणि नावीन्यतेने झी टीव्हीला यशस्वी केले. मनोरंजनापासून बातम्यांपर्यंत विविध प्रकारचे कार्यक्रम, प्रादेशिक भाषांमधील वाहिन्या, तसेच आंतरराष्ट्रीय विस्तार यामुळे ‘झी’ लवकरच घराघरात पोहोचली. नंतर त्यांनी २४ तास बातम्या देणारी झी न्यूझ वाहिनी सुरु केली. आणि मग एकामागून एक प्रमुख भाषेतील वाहिन्या काढायचा सपाटाच लावला. सुभाष चंद्राना प्रचंड यश मिळालं. त्यांच्या त्या एका कल्पनेमुळे देशातील लाखो लोकांना रोजगार मिळाला.
त्यानंतर सुभाष चंद्रांनी ‘प्ले विन’ लॉटरी नावाने ऑनलाइन लॉटरी सुरु केली. तिलाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. नंतर डिश टीवी, सिटी केबल, फन सिनेमा नावाने चित्रपटगृहंही सुरु केली. गोल्ड रिफायानिंग कंपनीही काढली. डीएनए नावाने इंग्रजी वृत्तपत्र सुरु केले. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातही मुसंडी मारली. हे सर्व व्यवसाय एस्सेल ग्रुपच्या नावाखाली एकत्र आणले. त्यांच्या नेतृत्वाखाली हा समूह भारतातील एक प्रमुख मीडिया घराणे बनले.
ज्या क्षेत्रात पहिले कोणीही नव्हते त्या क्षेत्रात नव्यानेउद्योग उभारून सुभाष चंद्रांनी जगासमोर एक अचंबित करणार आदर्श उभा केला. देशातील २१ राज्यातील ११ लाख गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी एकल विद्यालय फाउंडेशन स्थापना केलीय. दूरचित्रवाणी क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच इतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांचे कार्य गौरवले गेले.
2019 मध्ये कर्जफेडीच्या समस्येत अडकलेल्या झी एंटरटेनमेंटच्या दोन स्वतंत्र संचालकांनी एस्सेल ग्रुपच्या इतर कंपन्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने झी एंटरटेनमेंटच्या मुदत ठेवीचा वापर केल्याच्या आरोपाखाली सेबीने त्यांच्यावर कारवाई केली होती. आणि त्यांना संचालक मंडळातून बाहेर पडावे लागले.
आज महिला कोणापेक्षाही कमी नाहीयेत. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात प्रगती करताना दिसत आहेत. एवढंच काय तर, अनेक महिला अशाही आहेत, ज्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून कुटुंबाच्या व्यवसायात एन्ट्री केली आणि जगात डंका वाजवला. या महिलांमध्ये मल्लिका श्रीनिवासन यांच्या नावाचाही समावेश होतो. मल्लिका या अशा भारतीय महिला आहेत, ज्या १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त महसुलासह जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या ट्रॅक्टर निर्मात्या बनल्या आहेत. चला तर, त्यांनी एवढा लांबचा पल्ला कसा गाठला आणि त्यांची वैयक्तिक संपत्ती किती आहे? या सर्वांचा आढावा घेऊयात…
भल्याभल्यांना लाजवेल अशी कामगिरी करून दाखवणाऱ्या मल्लिका श्रीनिवासन (Mallika Srinivasan) या भारताचे अब्जपती आणि TVS मोटर्सचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांच्या पत्नी आहेत. त्यांनी आपल्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट म्हणझेच टॅफे (TAFE) कंपनीला यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे. इतकेच नाही, तर त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे की, महिलादेखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यश मिळवू शकतात.
मल्लिका श्रीनिवासन या देशातील त्या निवडक महिला उद्योजकांपैकी एक आहेत, ज्यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळेच त्यांना ‘ट्रॅक्टर क्वीन’ म्हणूनही ओळखले जाते. त्या देशातील दुसऱ्या आणि जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या ट्रॅक्टर उत्पादक ब्रँड टॅफेच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन आहेत. टॅफे हा ब्रँड मोठा होण्यात मल्लिका यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांनी या कंपनीला तंत्राची जोड दिली आणि कंपनीला यशाच्या पायऱ्या चढण्यात मदत केली. आजघडीला कंपनीची वार्षिक उलाढाल ही १० हजार कोटींपेक्षाही जास्त आहे.
कौटुंबिक व्यवसायात कधी घेतली उडी?
सन १९५९मध्ये चेन्नई येथे जन्मलेल्या मल्लिका श्रीनिवासन या शालेय जीवनापासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांनी मद्रास विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले होते. तसेच, यूएसए येथील पेन्सिल्वानिया विद्यापीठाच्या वॉर्टन स्कूलमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले होते. परदेशातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर मल्लिका पुन्हा भारतात आल्या. त्यांनी आपल्या वडिलांच्या देखरेखीखाली १९८६मध्ये कौटुंबिक व्यवसायात उडी घेतली. या कंपनीची सुरुवात मल्लिका यांचे आजोबा एस अनंतरामाकृष्णन यांनी केली होती. त्या टॅफेच्या जनरल मॅनेजर म्हणून कंपनीशी जोडल्या गेल्या होत्या. जेव्हा त्यांनी कंपनीत प्रवेश केला, तेव्हापासूनच महत्त्वाचे बदल होण्यास सुरुवात झाली.
टॅफेचा प्रवास
ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट (Tractors and Farm Equipment) म्हणझेच टॅफेची (TAFE) सुरुवात १९६०मध्ये चेन्नई येथे झाली होती. कंपनीची स्थापना जरी १९६०मध्ये झाली असली, तरीही यामध्ये महत्त्वाचे आणि मोठे बदल घडवून आणण्याचा विडा मल्लिका श्रीनिवासन यांनीच उचलला. त्यांनी कंपनीला तंत्राची जोड देऊन तिचा विस्तार केला. त्यामुळेच टॅफेचे प्रोडक्ट भारतीय शेतकऱ्यांची पहिली पसंत बनले आहेत. टॅफे ही ट्रॅक्टर बनवणारी जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीकडे जवळपास १६०० डीलर्सचं नेटवर्क आहे. तसेच, कंपनी जगातील जवळपास १०० देशांमध्ये व्यापार करत आहे. एवढंच नाही, तर टॅफे फक्त ट्रॅक्टर बनवण्यापर्यंत मर्यादित राहिली नाहीये. ही कंपनी बॅटरी, डिझेल इंजिन, जेनेसेट, गियर पार्ट्स, पॅसेंजर व्हेइकल, हायड्रॉलिक पंप्स आणि फार्म मशिनरीही तयार करते.
कौटुंबिक व्यवसायाला मिळवून दिला फायदा
टॅफेला यशाच्या पायऱ्या चढण्यासाठी भाग पाडण्यात मल्लिका श्रीनिवासन यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्याच नेतृत्वाखाली टॅफेने फ्रेंच कंपनी फॉरेसियाला विकत घेण्यासाठी ४०० कोटींचा करार केला. त्यांनी कंपनीची क्षमता वाढवण्यासाठी अमेरिकन ऍग्रो कंपनी AGCO शी मिळून काम करण्यास सुरुवात केली. कंपनीने AGCOसोबत मिळून तुर्की येथेही आपला प्लान्ट सुरू करत जगातील अनेक भागात ट्रॅक्टर पोहोचवणे सुरू केले. कालांतराने व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यासाठी टॅफेने अनेक कंपन्या आपल्यात जोडल्या. टॅफे कंपनीने आयशर लिमिटेडचे ट्रॅक्टर, इंजिन आणि गियर्स विभाग विकत घेतले. त्यामुळेच भारतात कृषी यंत्र व्यवसायात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.
पद्मश्री पुरस्काराने सन्मान
टॅफेच्या यशाचा डंका जगभरात गाजवल्यानंतर ६४ वर्षीय मल्लिका श्रीनिवासन यांना ‘ट्रॅक्टर क्वीन’ या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांना ट्रेड आणि इंडस्ट्रीतील यशामुळे जानेवारी २०१४मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. त्या अशा निवडक महिलांपैकी एक आहेत, ज्यांचे नाव दिग्गज उद्योगपतींमध्ये घेतले जाते.
भारतातील ८३ व्या श्रीमंत व्यक्ती
प्रसिद्ध उद्योगपती असण्याव्यतिरिक्त मल्लिका श्रीनिवासन या एनजीसीओ, टाटा स्टील आणि टाटा ग्लोबल बेवरेजेस बोर्डाच्या सदस्या आहेत. तसेच, चेन्नईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) आणि हैदराबादच्या इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या (ISB) कार्यकारी बोर्डाच्याही सदस्या आहेत. त्यांनी अलीकडेच, स्विगी बोर्डातील स्वतंत्र संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. स्विगीची व्हॅल्यू ही जवळपास ६८९१८ कोटी रुपये इतकी प्रचंड आहे. तसेच, मल्लिका श्रीनिवासन यांच्या संपत्तीविषयी बोलायचं झालं, तर त्यांची एकूण संपत्ती २.८४ बिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास २३,६२५ कोटी रुपये आहे. अशाप्रकारे, फोर्ब्सनुसार त्या भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ८३व्या क्रमांकावर आहेत.
वाचक मित्रांनो, तुम्हाला हा लेख कसा वाटला, हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच, तुमच्या जवळच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. याव्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरील लेख वाचायला आवडेल, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
कार कोणाला नाही आवडत! आणि त्यात जर स्पोर्ट्स कार असल तर मग विषयच सोडा. पण स्पोर्ट्स कार म्हटल की आपल्याला आठवतात Lamborghini, Ferrari, Bugatti याच स्पोर्ट्स कारच्या लिस्टमध्ये आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे Porsche. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्सने संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या Porsche चा पाया कसा रचला गेला आणि हा पाया रचणारा रचनाकार कोण होता हे आपण आजच्या लेखामध्ये पाहूया.
3 sept 1875 या दिवशी ऑस्ट्रियाच्या हंगेरीत Ferdinand Porsche या अवलियाचा जन्म झाला. लहानपणापासूनच Technology, mechanics आणि electricity या विषयांमध्ये त्यांना रस होता.त्यांच्या वडिलांचा damaged car repair करण्याचा व्यवसाय होता. वडिलांना नेहमी असं वाटायचं की Ferdinand यांनी आपल्या व्यवसायात मदत करावी आणि Ferdinand यांनी तशी मदत केलीसुद्धा. वडिलांचा व्यवसाय सांभाळता सांभाळता त्यांनी Reichenberg च्या ‘Imperial Polytechnical College’ मध्ये शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना लगेचच Bela Eager & Co. Electrical या कंपनीमध्ये जॉब मिळाला.
Ferdinand Porsche Founder of Porsche Car
आपल्या कंपनीत ते नेहमीच उत्कृष्ट काम करत राहिले. एकदा Austrian carriage company चे head Ludwig Lohner या कंपनीला भेट देण्यसाठी आले होते तेव्हा त्यांचे लक्ष Ferdinand यांच्या कामाकडे गेले आणि त्यांचं काम पाहून Ludwig खूप impressed झाले. काही काळ गेला; Ludwig यांनी असा अंदाज बांधला की बऱ्याच वर्षापासून चालत आलेले घोड्याचे carriages म्हणजे ज्यांना आपण बग्गी म्हणतो ते आता बंद होतील आणि त्या ऐवजी मोटरवर चालणारे carriages जास्त वापरले जातील. वेळ वाया न घालवता लगेचच त्यांनी eager company शी tie up केला आणि तिथे काम करणाऱ्या Porsche यांना त्या carriages चं design बनवायला लावले. बऱ्याच दिवसांच्या कामानंतर अखेर 26 June 1898 ला ही carriage जिला त्यांनी Porsche P1 असं नाव दिलं होतं Vienna च्या रस्त्यांवर वर चालू लागली. या Carriage मध्ये 2.2kw ची hub motor होती तर तब्बल 12-speed gears होते. यापैकी 6 forward gears होते, 2 reverse आणि 4 braking gears होते. यात असलेल्या battery चं वजन 1350 kg होतं जी एका वेळी 79 Km पर्यंत चालू शकत होती.
1899 मध्ये Porsche आपण बनवलेल्या carriage ला घेऊन Berlin Road Race मध्ये सहभागी झाले आणि तिथं ते इतर स्पर्धकांच्या तुलनेत १८ मिनिटांनी लवकर अंतर पार करून अव्वल स्थानावर आले. अशाच दुसऱ्या एका स्पर्धेत त्यांची ही carriage, efficiency test जिंकली आणि याच carriage ला ‘most efficient vehicle in urban traffic’ अशी सर्वमान्यता मिळाली. Electric Carriage च्या grand success नंतर 1901 मध्ये त्यांनी जगातील पहिली petrol-electric कार बनवली. या कारचा 56 km/hr एवढा स्पीड होता, जो की कोणत्याही कारसाठी त्या काळातला highest speed मानला गेला. काही काळानंतर या कारमध्ये आणखी powerful engine बसवले गेले, ज्यामुळे या कारचा speed आणखी वाढला. इकडे Automobile क्षेत्रात त्यांच्या नावाचा दबदबा वाढत असताना 1902 मध्ये त्यांची लष्करी सेवेत नियुक्ती करण्यात आली. त्यांनी ऑस्ट्रियाचे क्राऊन प्रिन्स फ्रांझ फर्डिनांड यांच्या गाडीवर चालक म्हणून काम केले. पुढे 1914 मध्ये याच Prince ची गोळी मारून हत्या करण्यात आली आणि इथूनच पहिल्या महायुद्धाची ठिणगी पेटली.
1906 मध्ये, ऑस्ट्रो-डेमलरने या कंपनीने Porsche यांना आपल्या कंपनीचे मुख्य डिझायनर म्हणून नियुक्त केले. Porsche यांची सर्वात प्रसिद्ध ऑस्ट्रो-डेमलर कार 1910 मध्ये Prince Henry Trail यांच्यासाठी डिझाइन केली गेली होती. 1916 पर्यंत Porsche या कंपनीचे MD बनले होते आणि याच वर्षी व्हिएन्ना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीकडून त्यांना मानद डॉक्टरेट ही पदवी मिळाली. 1922 पर्यंत porsche यांनी एका पेक्षा एक racing car बनवल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ५३ race competition मध्ये ते सहभागी झाले ज्यापैकी ४३ मध्ये ते जिंकले. नंतर Car development विषयी आपल्या सहकाऱ्यांसोबत झालेल्या मतभेदामुळे 1923 मध्ये ऑस्ट्रो-डेमलरला त्यांनी राम राम ठोकला.
काही महिन्यानंतर जर्मनीच्या स्टुटगार्ट शहरात असलेल्या डेमलर मोटरेन गेसेलशाफ्टने या कंपनीने porsche यांना Technical Director म्हणून काम करण्या साठी नियुक्त केले. या कंपनीत असताना त्यांनी अनेक कारचे designs बनवले जे पुढे जाऊन खूप लोकप्रिय ठरले. 1926 मध्ये ही कंपनी आणि Karl Benz यांची कंपनी merged झाली आणि या दोन कंपनीने बनविलेल्या products ला ‘मर्सिडीज-बेंझ’ असं नाव देण्यात आले. काही काळानंतर इथेही त्यांचे मतभेद झाले आणि त्यांनी या ही कंपनीला राम राम ठोकला.
1931 च्या एप्रिल महिन्यात ते आपल्या शहरात म्हणजे स्टुटगार्टमध्ये परतले. इथे आल्यानंतर आपला मुलगा, जावई आणि काही सहकार्यांसोबत ‘Porsche’ ची मुहूर्तमेढ रोवली. ही कंपनी कारचे आणि कारच्या engines चे design आणि consulting करायची. त्यांना पहिला प्रोजेक्ट Wanderer कंपनीचा मिळाला. या कंपनीला middle class car design बनवून घ्यायचे होते. Porsche यांना वेगवेगळे प्रयोग करून पाहण्यासाठी full freedom होते. दोन वर्षात Porsche च्या आयुष्यात अनेक घडामोडी घडल्या. 1933 च्या Berlin Motor Show मध्ये जर्मन Chancellor Adolf Hitler यांनी सर्व नागरिकांकडे स्वतःची गाडी किंवा tractor असला पाहिजे असं आपलं स्वप्न आहे हे सांगितलं यातून नाझी पक्ष सर्वांसाठी किती हितकारक आहे असं त्यांना दाखवायचं होत. राजकारणातील या गोष्टींचा फायदा Porsche यांना झाला आणि 1934 साली पोर्श यांना हिटलरकडून सर्वात लोकप्रिय अश्या people’s car चे डिझाइन करण्याचे contract मिळाले.
काही महिन्यातच Porsche यांनी आपल्या कौशल्याने या people’s car चे design बनवले जिचं नाव होतं ‘Volkswagen Beetle’ या कारने विक्रीचे सगळे विक्रम मोडीस काढले. जर्मनीच्या रस्त्या रस्त्यांवर beetle दिसू लागली. या अभूतपूर्व कामगारीनंतर Porsche आणि हिटलरचे संबंध आणखी घनिष्ट झाले यामुळे Porsche यांनी नाझी पक्षात सामील झाले. पुढे Porsche यांनी जर्मन आर्मीसाठी काही गाड्या बनवल्या ज्यांचा दुसऱ्या महायुद्धा दरम्यान प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर झाला. आर्मीसाठी त्यांनी काही रणगाडेसुद्धा बनवले. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी म्हणजेच 1945 मध्ये मुलगा आणि जावई यांच्यासोबत Porsche यांना अटक झाली, ज्याचं कारण होतं हिटलर सोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध. ६ महिन्यानंतर त्यांच्या मुलाची आणि जावयाची सुटका झाली, पण Porsche मात्र अजूनही तुरुंगात होते.
वडील तुरुंगात आहेत याचे दुःख कुरवाळत न बसता त्यांचा मुलगा Ferry Porsche ने आपल्या व्यवसायात लक्ष द्यायला सुरुवात केली. काही काळ शिक्षा भोगल्यानंतर Porsche यांची सुटका करण्यात आली आणि 1949 मध्ये संपूर्ण Porsche कुटुंबाने आपल्या व्यवसायाला नव्याने सुरुवात केली. November 1950 मध्ये Volkswagen आणि Porsche यांच्यात consulting work साठी contract झालं, ज्यामुळे Volkswagen च्या प्रत्येक beetle मागे Porsche यांना Royalty मिळू लागली. हे सगळं सुरु असतानाचं Tank बनविण्यात अपयशी ठरलेल्या Porsche यांनी आपला मोर्चा परत Tank Manufacturing कडे वळवला.
आपल्या अथक प्रयत्नांनी अखेर त्यांनी Tank चे design complete केले ज्याचं नाव होतं ‘The Leopard’. हा tank main battle field वर सर्वात जास्त वापरला जाणारा tank ठरला. आत्तापर्यंत Porsche यांनी दैदिप्यमान कारकीर्द अनुभवली होती, पण आपण बनवलेल्या tank चे यश त्यांना पाहता आले नाही. 30 जानेवारी 1951 या दिवशी त्यांना हृद्यविकाराचा झटका आला आणि आयुष्यातले प्रत्येक speed breaker ओलांडून वेगाने धावलेल्या या अवलियाच्या गाडीला ब्रेक लागला तो कायमचाच!
1996 मध्ये, Porsche यांना ‘इंटरनॅशनल मोटरस्पोर्ट्स हॉल ऑफ फेम’ मध्ये समाविष्ट करण्यात आले आणि 1999 मध्ये त्यांच्या मरणोत्तर ‘Car Engineer of the Century’ चा पुरस्कार त्यांना देण्यात आला. Ferdinand Porsche यांनी आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या आणि कौशल्याच्या जोरावर Automobile industry मध्ये एक क्रांती घडवली जी आजतागायत आपण सर्वजण अनुभवतोय .
बिझनेस महारथी या मालिकेत आम्ही जगातील महान उद्योजकांच्या जीवनप्रवास आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. आपल्याला हि मालिका कशी वाटतेय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कोणत्या उद्योजकांच्या कहाण्या तुम्हाला ऐकायच्या आहेत ते देखील सांगा.