एक सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा झालेला तरुण, पुण्याला आठ वर्षे नोकरी केली, कामाचा चांगला अनुभव घेतला. घेतलेला फ्लॅट ५० लाखांना विकला व नोकरीचा राजीनामा देऊन गावी जिल्ह्याच्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुरु केला. गोड बोलणे, अप्रतिम संवादकौशल्य, बांधकाम व्यवसायाचे चांगले ज्ञान याचा पुरेपूर वापर करून पहिला पाच गुंठ्याचा एक प्लॉट घेतला. मूळ मालकाला पैसे न देता २ बीएचके देऊन व्यवहार केला. उरलेले सात फ्लॅट जाहिरात करून विकले. बाकीचे बिल्डर्स १ बीएचके २० लाखाला द्यायचे व एका फ्लॅटमागे पाच लाख नफा काढायचे. याने मात्र १७ लाख दर लावला. पेमेंटमध्येही फ्लेक्झिबिलिटी (सुलभता) ठेवली. सात जणांनी ३०% भरून बुकिंग केले. त्यामुळे हातात २०-२५ लाखांचे खेळते भांडवल आले. शिवाय पुण्यातील फ्लॅटचे पैसे तसेच शिल्लक होते. ते नवीन प्लॉट खरेदीसाठी वापरले. पीडीसी चेक देऊन ६० दिवसांच्या क्रेडिटवर माल उचलू लागला.
हातात असणाऱ्या भांडवलावर त्याने ७ प्रकल्प पूर्ण केले. प्रत्येक प्रकल्पात ८ फ्लॅट आणि एका फ्लॅटमागे १-२ लाख रुपये एवढाच नफा ठेवला; पण उलाढाल मोठी झाली. त्यामुळे मार्केटमध्ये पत निर्माण झाली. माफक दरात व योग्य वेळेत घर देणारा बिल्डर म्हणून नावही झाले. केवळ दोन वर्षांत १०-१२ कोटींची उलाढाल खात्यावर दिसू लागली, त्यामुळे बँकेनेही १ कोटींचे बिझनेस लोन देऊ केले.
हे उदाहरण आहे, कमी भांडवलात जास्त टर्नओव्हर करण्याचे. हे मूळ व्यवसायातच गुंतवावे. लगेच फर्निचर, गाड्या, ऑफिस अशा अनुत्पादक बाबीत गुंतवू नये. उद्योजकाला कोणतेही अनुत्पादक ओव्हरहेड्स नसावेत. जर टर्नओव्हर वाढवायचा असेल, तर प्रॉफिट मार्जिन कमी ठेवावे. मार्केटिंगवर भर द्यावा. पर्चेसमध्ये क्रेडिट वाढवत ठेवावी. योग्य वेळेत पैसे व हमी दिली की पत वाढतच जाते. एकामागून एक माल विकणे किंवा दुसरे प्रोजेक्ट चालूच ठेवावेत.
तुम्ही तुमचे भांडवल कसे मॅनेज करता आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी नवी अर्थक्रांतीला फॉलो करा.
एका लोहाराचा मुलगा ते होंडा मोटर्सचा मालक होण्यासाठी केलेला संघर्ष
आई मला होंडा ऍक्टिव्हा पाहिजे… बाबा तुमची गाडी आता जुनी झालीये, आपण मस्त एखादी होंडाची गाडी घेऊ… या पाडव्याला आम्ही होंडासिटी घेतली… मध्यम वर्गीयांपासून श्रीमंतांपर्यंत अनेक घरांत होंडाची कोणती ना कोणती गाडी तुम्हाला पाहायला मिळतेच. ही कंपनी जितकी लोकप्रिय आहे, तितकाच तिच्या संस्थापकाचा संघर्ष देखील रोमांचक आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे सोइचिरो होंडा.
नमस्कार! नवी अर्थक्रांतीमध्ये आपलं स्वागत आहे… स्टार्टअप आणि उद्योग क्षेत्रातील रंजक आणि उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. तेव्हा चॅनेल आत्ताच सबस्क्राइब करा.
सोइचिरो होंडा यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९०६ मध्ये जपान मधील शिजूओका भागातील कोमयो गावात झाला. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. त्यांचे वडील गिहेई होंडा लोहार होते, तसंच त्यांचं एक सायकल रिपेअरिंगचं दुकान होतं. लहान सोइचिरो आपल्या वडिलांना कामात मदत करायचे. लहान लहान यंत्रांवर प्रेम करणाऱ्या सोइचिरोंचं अभ्यासात काय मन लागेना. त्यांनी आपलं शिक्षण अर्धवट सोडलं आणि टोकियो गाठलं. तिथं ते ‘आर्ट शोकाई’नावाच्या कंपनीत मेकॅनिक म्हणून रुजू झाले, पण ते वयाने सगळ्यात लहान असल्यामुळे त्यांना मेकॅनिकचं काम सोडून इतर छोटीमोठी कामं द्यायचे. यावर सोइचिरोंनी मालकाला विनंती केली आणि मेकॅनिकचं काम द्यायला लावलं. त्यांचं मशीनवरच प्रेम पाहून मालकानं सोइचिरोंना दुसऱ्या शाखेत पाठवलं. त्या शाखेत रेसिंग कार तयार केल्या जात होत्या. सोइचिरो तिथं मन लावून काम करु लागले. शोकाई कंपनीनं जपान कार चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता आणि त्या स्पर्धेत अगदी अनपेक्षितरित्या कंपनीची कार पहिली आली. सोइचिरो त्या पहिल्या आलेल्या कारचे मेकॅनिक होते. यामुळे खुश होऊन कंपनीने एका शाखेची जबाबदारी या २१ वर्षीय पोराच्या खांद्यावर दिली. २० व्या वर्षी होंडा यांना सैन्यदलात नोकरीसाठी बोलावण्यात आलं होतं; परंतु रंगांधळेपणामुळे त्यांना डावलण्यात आलं.
सोइचिरो रेसिंग स्पर्धेतसुद्धा भाग घ्यायचे. ७ जून १९३६ रोजी एका रेसमध्ये होंडा यांचा अपघात झाला. त्यात ते किरकोळ जखमी झाले; परंतु त्यांचा लहान भाऊ गंभीर जखमी झाला. ऑक्टोबरमध्ये त्यांनी आणखी एका रेसमध्ये भाग घेतला. मात्र, वडील रागावल्याने आणि पत्नी नाराज झाल्यामुळे त्यांनी रेसिंगची आवड सोडली.
काम करत असताना सोइचिरोंच्या लक्षात आलं की गाडीसाठी लागणाऱ्या पिस्टनला खूप मागणी आहे,. पण ते बनवणाऱ्या कंपन्या कमी. त्यांनी आपल्या मालकाला ही गोष्ट बोलून दाखवली आणि सुचवलं ही आपणही पिस्टन बनवू. पण मालकाने त्यांना साफ नकार दिला. यावर आता आपण स्वतःच पिस्टन बनवू म्हणत त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल गाव गाठलं. त्यांनी ‘तोकाई सेकी’ नावाची कंपनी उभी केली. या कंपनीनं पिस्टन रिंग बनवून त्या टोयोटा कंपनीला चाचणीसाठी दिल्या. पण त्यांनी पाठवलेल्या ५० रिंग पैकी फक्त ३ रिंग टोयोटा कंपनीच्या चाचण्या पास करू शकल्या. हे होत त्यांच्या आयुष्यातलं पहिलं अपयश.
दोन वर्षांत त्यांनी आपल्या कामाच्या गुणवत्तेत सुधार करून अधिक उत्कृष्ट पिस्टन रिंग बनवल्या. कंपनी बऱ्यापैकी काम करत होती, तोच दुसरं जागतिक महायुद्ध सुरु झालं आणि यात अमेरिकेने जपानवर टाकलेल्या B२९ बॉम्बमध्ये सोइचिरोंची कंपनी उध्वस्त झाली. हा त्यांना बसलेला दुसरा तडाखा.
युद्ध संपल्यानंतर त्यांनी आपल्या कंपनीचे जळालेले अवशेष साडेचार लाख येनना विकले आणि परत नव्या जोमानं कंपनी उभी केली. तिचंही काम चांगलं चालू होतं. तोच जपानमध्ये मोठा भूकंप झाला आणि त्यांची कंपनी जमीनदोस्त झाली. दैवाने त्यांची तिसऱ्यांदा परीक्षा बघितली. एक वेळ तर अशी होती की, सोइचिरोंकडे फक्त एका दिवसाचं पेट्रोल भरण्याइतकेच पैसे शिल्लक होते.
मित्रहो सामान्य माणूस इतक्या अपयशानंतर खचून जातो. प्रयत्न सोडून देतो, पण हे सोइचिरो होंडा होते. ते अपयशाचं भांडवल करत बसले नाहीत. ‘हे माझ्याच सोबत का झालं’ म्हणून त्याला गोंजारत बसले नाहीत. इतक्यांदा पडून देखील ते पुन्हा उभे राहिले. नव्या जोमाने कामाला लागले. दोन वर्षांनंतर ते चांगल्या गुणवत्तेच्या पिस्टन रिंगचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात आणि ‘टोयोटा’ व ‘नाकाजिमा एअरक्राफ्ट’ सारख्या कंपन्यांना त्यांचा पुरवठा करण्यात यशस्वी झाले.
युद्धामुळे जपानची आर्थिक स्थिती पूर्ण बदलली. इंधनाची कमतरता जाणवू लागली. लोक सायकल वापरू लागले. अशीच एकदा सायकल चालवताना सोइचिरोंच्या डोक्यात आलं की याच सायकलला जर इंजिन बसवलं तर… त्यांनी आपली कल्पना सत्यात उतरवली आणि त्या सायकलचं नाव ठेवलं ‘चुचू’. फक्त पंधराशे रुपयात या चुचूची विक्री सुरू झाली. चांगला फायदा होऊ लागल्यावर ५०cc चं २ स्ट्रोक इंजिन बसवून होंडाची पहिली मोटारसायकल बाजारात आली आणि अल्पावधीतच लोकप्रिय झाली. युध्दामुळं जपानमधील बहुतांशी पुरुष हे सैन्यात भरती होत, यामुळं सोइचिरोंच्या कंपनीची जबाबदारी महिलांवर आली आणि ती त्यांनी तितक्याच समर्थपणे पेललीदेखील.
१९४६ मध्ये ४० वर्षीय होंडा यांनी ‘होंडा रिसर्च टेक्निकल इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. तसेच १९४९ मध्ये २० कर्मचाऱ्यांसोबत ‘होंडा मोटार कंपनी’ सुरू केली. त्यानंतर त्यांनी काळासोबत मोटाराइज्ड बायसिकलच्या डिझाइनमध्ये जपानी ग्राहकांच्या सुविधेसाठी अनेक बदल घडवले. हळूहळू पाय पसरणाऱ्या त्यांच्या कंपनीने १९६०मध्ये उत्तर अमेरिकेच्या बाजारात देखील पाऊल टाकले. ज्या अमेरिकेच्या बॉम्बहल्यात त्यांची कंपनी उध्वस्त झाली, त्या अमेरिकेत व्यवसाय पसरवणे म्हणजेच खरंच एक दिव्य होतं. १९६१ मध्ये त्यांची कंपनी महिन्याला १ लाख बाईक बनवत होती. प्रगतीचा हा आलेख उत्तरोत्तर वाढत होता. १९६८ मध्ये होंडा कंपनी महिन्याला १० लाख बाईक्स बनवू लागली.
हळूहळू जपानची अर्थव्यवस्था सुधारू लागली. तसंच सोइचिरोंनी चारचाकी गाड्या बनवण्याच्या क्षेत्रात देखील पाय ठेवला. सोइचिरो नेहमी आपल्या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत. अशा या प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या अवलियाने ५ ऑगस्ट १९९१ रोजी जगाचा निरोप घेतला. सर्वसामान्यांना परवडेल अशी गाडी तयार करून लाखो मध्यमवर्गीयांची स्वप्न पूर्ण करणारे सोइचिरो होंडा आपल्याला हेच सांगतात की “जब तक न सफल हो, नींद-चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ कर मत भागो तुम। कुछ किये बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।”…
तर ही होती सोइचिरो होंडा यांची जीवनकहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या उद्योजकांच्या गोष्टी ऐकून प्रेरणा घेण्यासाठी चॅनेल आताच सबस्क्राईब करा.
काही दिवसांपूर्वी आमच्या ऑफीसमध्ये व्यवसाय मार्गदर्शन घेण्यासाठी दोन शेतकरी आले होते, एक म्हणजे अनिलराव ते एक मोठे शेतकरी आहेत. तसेच त्यांच्याकडे मळणीयंत्र ट्रॅक्टर व अर्थमुव्हिंग वाहने म्हणजे जेसीबी आहेत. त्यांचे वय अंदाजे ५२ वर्ष आहे आणि गेली ३० वर्षे ते शेती व्यवसाय करतात. परंतु आज त्यांच्या खात्यावर एक रुपयाची सुध्दा बचत होत नाही. उलट त्यांच्या अंगावर जवळजवळ १० ते १२ लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याबाबत विश्लेषण केल्यावर मला असा निष्कर्ष मिळाला की, ते एकप्रकारे पांढरा हत्ती पाळताहेत. म्हणजे त्यांच्याकडील मोठी शेतजमीन, साधने, उपकरणे, यंत्रसामुग्री, वाहने अनेक आहेत परंतु त्यातून त्यांचा फायदाच निघत नाही, फक्त तोटेच होत आहेत. म्हणजे जे काही आहे ते सर्व दाखवण्यापुरतेच आहे.
तर दुसरा कॉल नितीन नावाच्या शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याचा होता. त्यांचे वय ४४ वर्ष आहे. त्यांच्याजवळ केवळ ३ एकरच शेतजमीन आहे, परंतु त्यांच्याजवळ स्वतःची कार आहे, तसेच मुलगा विदेशात चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. गेली १० वर्षे ते व्यवसाय करीत आहेत. यादोन्ही उदाहरणांचे निरीक्षण केल्यावर मला आश्चर्य वाटले. एकीकडे ज्याच्याजवळ मोठी शेतजमीन, अद्ययावत उपकरणे व यंत्रसामुग्री, वाहने आहेत तरीसुध्दा एक रुपयाही नफा नाही, उलट १०-१२ लाखांचे कर्ज आहे. तर दुसरीकडे ३-४ एकरांचीच शेतजमीन असलेला शेतकरी आहे, जो शेती व शेतीपूरक व्यवसाय करतो, परंतु त्यांच्याकडे चांगले उत्पन्न, संपत्ती, वैभव आहे आणि ते ही डोक्यावर एका रुपयाचेही कर्ज नसताना. या दोन्ही उदाहरणांमध्ये प्रचंड विरोधाभास दिसून येतो.
उत्पादकतेचे अर्थशास्त्र :
तुमचे शोरूम, दुकान, व्यवसाय, कारखाना किंवा शेतजमीन कितीही मोठी असली तरीही त्यातून तुम्हाला किती फायदा नफा मिळतो याला खरा अर्थ असतो. यालाच म्हणतात उत्पादकतेचे अर्थशास्त्र. तुमचे कुटुंब परिवार किती मोठा आहे हे महत्वाचे नाही, तर त्यातील किती लोक उत्पादनक्षम आहेत ते महत्वाचे आहे. तुमच्याकडे किती एकर जमीन आहे हे महत्वाचे नाही, तर त्यापैकी किती जमीन तुम्हाला उत्पन्न मिळवून देते याला महत्व आहे. म्हणजे तुमच्याकडे कितीही संसाधने म्हणजे मोठी जमीन, भांडवल आणि मनुष्यबळ इत्यादी गोष्टी असतील, तर त्या उत्पन्न देणाऱ्या असाव्यात. नाहीतर पांढऱ्या हत्तीसारख्या केवळ शोभेसाठी असतील तर तुम्ही कंगाल झाल्यातच जमा असे समजा.
उत्पादकता लेखापरीक्षण (Productivity Audit) :
ज्या ऑडिटमध्ये, मोजमापात्मक व तुलनात्मक मानके/मापदंड आणि वास्तविक घटकांची कार्यक्षमता यांची छाननी आणि मूल्यांकन केले जाते त्यास उत्पादकता लेखापरीक्षण (Productivity Audit) म्हणतात. म्हणजे आपल्या शेतीत किंवा व्यवसायात आपल्याकडील मनुष्यबळ, भांडवल, साहित्य, संसाधने, यंत्रसामुग्री, इ. मधून किती उत्पन्न मिळाले याचे मूल्यांकन आणि विश्लेषणात्मक अभ्यास म्हणजे उत्पादकता लेखापरीक्षण. यासाठी अनेक निकष पडताळून पाहावे लागतात.
i) Personal Audit:
Personal Audit
शेती म्हणा किंवा इतर व्यवसाय. त्यांचे लीडर म्हणून तुम्ही स्वतःचे मूल्यांकन केले पाहिजे. तुम्ही शेतात किंवा व्यवसायात किती काम करता व शेती/उद्योगातील उत्पादनक्षमतेत किती आणि कसे योगदान देता हे पाहणे म्हणजेच स्वतःच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. समजा तुमच्याकडे ३० एकर जमीन आहे, पण खरंच तुम्ही रोज ३० एकर जमिनीकडे जातीने लक्ष देता किंवा काम करता का? की मजुरांवर शेताचे काम सोपवून गावात पुढारीपण करता? एखाद्याने नोकरी सोडून व्यवसाय सुरु केला असेल, तर ज्याप्रमाणे नोकरी करताना १२-१२ तास काम करत होता, तसेच स्वतःच्या व्यवसायातही काम करता का ?
ii) Family Member Audit:
Family member audit
तुमचे सर्व कुटुंबीय तुमच्या शेतीत/व्यवसायात काय योगदान देतात? ते कोणते काम किंवा कोणती जबाबदारी हाताळतात याचे मूल्यांकन करावे. नाहीतर असे व्हायला नको की, तुमचा वेळ पोकळ मोठेपणा/पुढारपण गाजवण्यात जातोय; पोरगं तासनतास मोबाईलमध्ये डोकं घालून नाहीतर कुठल्यातरी पक्षाचा युवानेता बनून फिरतोय, बायको महिलामंडळाची अध्यक्ष म्हणून गजाली मारण्यात आणि चुगल्या करण्यात वेळ वाया घालवतेय आणि शेतात गुडघाभर तण आहे. तुमचा व्यवसाय असो वा शेती घरातल्या प्रत्येकाने त्यासाठी काम केले पाहिजे, आपापले ठळक योगदान दिले पाहिजे. काम न करणाऱ्या पोरांना कंबरड्यात लाथ घालून हाकलून दिले पाहिजे.
iii) Management Audit:
Management Audit
मॅनेजमेंट ऑडिट म्हणजे तुमच्या व्यवसायात अंतर्भूत व्यवस्थापनाच्या पद्धती आणि धोरणे, संसाधनांचा वापर, कामाचे नियोजन, कर्मचारी आणि संस्थात्मक सुधारणा यांचे मूल्यांकन. मानव संसाधनांचा अधिक चांगल्या उपयोग आणि उपलब्ध भौतिक सुविधांची खात्री करुन घेणे, उद्दिष्ट्ये, धोरण, कार्यपद्धती आणि नियोजनातील कमतरता पडताळणे, कार्यपद्धतीची सुधारित पद्धती सुचविणे. उदा. तुमचा जेसीबी ड्रायव्हर असेल, तर तो जेसीबी किती चांगल्या प्रकारे हॅण्डल करतो याची तपासणी करा. तुमची कार्यपद्धती व त्यांचे काम प्रभावी असायला हवे.
iv) Employee Audit:
Employee Audit
आपले कर्मचारी, मजूर आपल्या व्यवसायात/शेतात किती काम करतात आणि ते किती उत्पादनक्षम आहेत हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नाहीतर मालक गावभर फिरतोय आणि मजूर शेतावर टाईमपास करतायत अशी अवस्था नको. असेच चालत राहिले तर कर्ज होणार नाहीतर काय होणार? कोण काम करतो व कोण चुना लावतो याचा तपास करा.
v) Product Audit:
Product Audit
आपली उत्पादने/सेवा किती गुणवत्तापूर्ण आहेत, त्यांना बाजारात किती मागणी आहे आणि त्यांच्या खरेदीसाठी ग्राहक किती उत्सुक आहेत तसेच त्याचे मार्केटिंग कशा प्रकारे केले जात आहेत हे पाहणे महत्त्वपूर्ण आहे. नाहीतर तुम्ही आणि तुमचे कर्मचारी खूप मेहनत घेऊन उत्पादन घेत असाल, परंतु ते दर्जेदार नसेल तर काय फायदा? काय पिकतं यापेक्षा काय विकतं याचा तपास घ्या.
vi) Real Asset Audit:
Real Asset Audit
तुमची जितकी संपत्ती आणि संसाधने आहेत त्याच्या देखभालीसाठी, ती सांभाळण्यासाठी किती खर्च येतो आणि त्यापासून उत्पादन किती मिळते याला रिअल अॅसेट ऑडिट म्हणतात. म्हणजे तुमची १० एकराची जिरायती शेती आहे, ती सांभाळण्यासाठी ५ लाख रुपये खर्च येत असेल आणि त्यांतून १ लाखाचेही उत्पन्न मिळत नसेल तर काय फायदा? यामध्ये अधिक उप्पन्न देणारी, मध्यम उत्पन्न देणारी आणि उत्पन्न न देणारी शेतजमीन, असे तीन गट पडले पाहिजेत.
vii) Machinery Audit:
Machinery Audit
आपल्या व्यवसायात किंवा शेतीसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री आणि वाहने यांच्या खरेदीवर आणि त्यांच्या देखभालीवर (maintenance) एकूण किती खर्च येतो आणि एकूण किती उत्पन्न मिळते याचे ऑडिट केले पाहिजे.
viii) Working Capital Audit:
Working Capital Audit
शेतकरी किंवा व्यावसायिक भांडवल उभारणीसाठी कर्ज घेतात. बँक त्या कर्जाचे हफ्ते व्याजासहित वसूल करते. शेतकरी त्याच्या शेतीसाठी लागणारी यंत्रसामुग्री, वगैरे विकत घेण्यासाठी कर्ज काढतो, व्यावसायिक त्याच्या व्यवसायात भांडवल उभारणीसाठी कर्ज काढतो. आपण आपले भांडवल कशा प्रकारे वापरतो आणि त्या खेळत्या भांडवलातून आपल्याला कितपत फायदा होतो याचेही ऑडिट केले पाहिजे.
आपण काय करावे?:
वरील प्रत्येक लेखापरीक्षणाच्या विश्लेषणानंतर आपल्या व्यवसायाची/शेतीची उत्पादनक्षमता तपासून घ्यावी. तुम्ही शेती करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर त्यांचे अर्थशास्त्रीय विश्लेषण करा. तुमच्या एकूण शेतीपैकी किती जमीन नफा मिळवून देते किंवा व्यवसायाच्या कोणत्या घटकांमधून उत्पन्न मिळते यांचे विश्लेषण करा. नाहीतर पांढरा हत्ती पाळल्यासारखे करू नका. जे फक्त दिखाव्याप्रमाणे, बिनकामाचे ठरते.
जसा पांढऱ्या हत्तीचा उपयोग युध्द, खेळ, भारवहनासाठी करता येत नसतो. तो केवळ दिखाव्यासाठीच बाळगला जातो आणि हत्ती पाळल्याचा बडेजाव करता येतो, परंतु नुसता दिखावा करून उपयोग नाही. तोट्यातली जर्सी गाय पाळण्यापेक्षा, फायद्यातली शेळी कधीची चांगलीच.
तुम्ही आजवर अनेकदा कोका कोलाचा एक घोट तरी घेतला असेलच. इतकंच नाही तर तुमच्या आई बाबांनी, आज्जी आजोबांनी कोका कोला ब्रॅंड माहीत नाही ही शक्य नाहीच.चला तर जाणून घेऊ ह्या जगप्रसिद्ध कोका कोला विषयी बरचं काही…
प्रत्येक गोष्टीला एक इतिहास असतो. एकदा सुरू झालेली गोष्ट लगेच यश मिळवते असे नाही त्यासाठी संयम, कठीण परिश्रम आणि अपयश पचविण्याची ताकद असणे महत्वाचे असते.
तर झालं अस की, 8 जुलै 1831 रोजी जॉन पेंबरटण या अमेरिकन farmactis चा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना संशोधनात रस होता, नवनवीन आणि नावीन्यपूर्ण औषधे तयार करणे हाच त्यांचा छंद होता. 1860 च्या काळात अमेरिकेत Vin Mariani ही वाइन लोकांच्या पसंतीस उतरली होती. आणि जॉन पेंबरटण यांनी ठरवलं की, आपणसुद्धा असच काहीतरी नावीन्यपूर्ण बनवायच. कोला या झाडाच्या पानांपासून बनविलेली ही वाइन अनेक मोठ-मोठ्या उद्योगपतींच्या पसंतीस उतरली होती. एतकचं नाही तर थॉमस एडिसण देखील vin mariani चे सेवन करायचे.
8 मे 1886 रोजी पेंबरटण यांनी आफ्रिकन कोला फ्रूट आणि कोकेन वापरुन एक पेय बनवलं. आणि त्याचे नाव कोका कोला असे ठेवले. आणि कोका कोलाने जगात आपली एक वेगळी ओळख तयार केली. कोलाच्या पानांचा आणि फळांचा वापर हा शारीरिक थकवा घालविण्यासाठी केला जायचा.
शारीरिक आणि मानसिक आजारावरील रामबाण काढा अशी जाहिरात करून कोका कोला विकला जायचा. तो काढा अर्थातच कोका कोला लोकांच्या पसंतीस इतका आला की, कोका कोला शिवाय लोकांना काहीच दिसत नव्हत. अल्पावधीतच कोका कोला लोकांच्या पसंतीस उतरला. अनेकांना कोका कोलाचे व्यसन देखील लागले. त्यात जॉन पेंबरटण काही बाकी नव्हते. त्यांना देखील कोका कोलचे व्यसन लागले.
आणि त्यांनी एसा ग्रिग्स कॅडलर यांना केवळ 2300 डॉलर ने कंपनीचे सगळे हक्क विकले.
आणि त्यांनंतर एसा ग्रिग्स कॅडलर यांनी कोका कोलाची रेसीपी बदलली. कोकेन काढून त्यांनी त्यात साखरेचे प्रमाण वाढविले. आणि त्याचवेळी बाजारात कोका कोलाचा प्रतिस्पर्धी तयार झाला. तो म्हणजे पेप्सी. कोका कोलच्या मागून आलेला पेप्सी ब्रॅंड देखील लोकांच्या पसंतीस उतरला.
जगप्रसिद्ध कोका कोला अनेकदा वादाचा विषय ठरला. कधी अल्कोहोल मुळे तरी कधी प्लॅस्टिकच्या प्रदूषणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला कोका कोला लोकांच्या मनातून काही उतरला नाही
फिरण्याचा शौक कोणाला नसतो. सगळेचजण फिरण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. सुट्टी असेल तर कधी एकदा बाहेर फिरायला जातो. एखाद्या मस्त, निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेतो असं वाटतं. काहींना एकदम Luxurious जीवनाचा आनंद लुटायचा असतो तर काहींना या धावपळीपासून दूर शांत निसर्गाच्या सानिध्यात चार क्षण आनंदाचे घालवायचे असतात. तुम्ही देखील जर निसर्गप्रेमी असाल तर दांडेली हे ठिकाण तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
उत्तर कर्नाटकात स्थित असलेलं दांडेली म्हणजे कर्नाटकातील सर्वात मोठं दुसऱ्या क्रमांकाचं अभयारण्य. फारच कमी माणसांची वर्दळ, स्वच्छ प्रदूषणमुक्त हवा, हिरवागार निसर्ग, लहान लहान कौलारू घर, लहानश्या टपऱ्या आणि एखाद-दुसरं हॉटेल अशा वातावरणात असलेलं दांडेली. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गर्द झाडीच्या झुलत्या कमानी पाहिल्या की, वाटतं दांडेली जणूकाही आपल्या स्वागतासाठीच नटलेली आहे. त्या गर्द झाडीची शहरी लोकांना भीती वाटू शकते पण तिथली स्वच्छ हवा, पक्षांचा मंत्रमुग्ध करून टाकणारा किलबिलाट, काळी नदीचा शांत प्रवाह एकूणच सगळं वातावरण पाहिलं की दोन – तीन दिवस तरी तिथून मुक्काम हलवावा नाही वाटत.
866.41 चौरस किलोमीटर परिसर असलेल्या या परिसरात वाघ, हत्ती, हरीण, बिबट्या, गुबगुबीत ससे असे अनेक प्राणी आहेत. अनेक वेगवेगळे पक्षी देखील आहेत. चित्तथरारक जंगल सफारी करून तुम्ही हे प्राणी जवळून अनुभवू शकता. तसेच River Rafting, White Water Rafting, Spice Plantation Tour, Swimming असे अनेक अविस्मरणीय अनुभव देखील तुम्ही घेऊ शकता. भर दुपारी देखील जंगलाच्या गर्द झाडीमुळे रस्त्यावर प्रकाशाला अजिबात थारा नसतो.
पुण्याहून दांडेलीचा रस्ता जवळपास 442 किलोमीटरचा आहे. पुणे- सातारा हायवेने कोल्हापूर मधून बेळगाव वरुन 2 तासात तुम्ही दांडेलीला पोहोचू शकता. पुण्याहून 8 – 8.30 तासांचा प्रवास करून जरी थकवा आला असेल तरी तिथल्या शांत वातावरणाने हा थकवा अगदी चुटकीसरशी निघून जातो.
निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी दांडेली शिवाय दूसरा कोणताच पर्याय असू शकत नाही त्यामुळे विस्मयकारक, रोमांचित आणि निसर्ग समृद्धीने भरपूर असा दांडेली परिसर आणि दांडेली अभयारण्य प्रत्येकाने निदान एकदा तरी पहावेच.
बिझनेस किंवा व्यवसाय हे शब्द कानावर पडले, तरी आपल्याला दोन गोष्टी सर्वात आधी आठवतात त्या म्हणजे नफा आणि तोटा. व्यवसायाचा नेमका ठोकताळा काढायचा तेव्हा नफा आणि तोटा मोजला जातो आणि त्यावर ठरवलं जातं, गणित फायद्याचे आहे कि तोट्याचे. व्यवसायात ही अशी गणितं महत्वाची असली, तरी सगळ्यात महत्वाची असते ती प्रोसेस म्हणजेच प्रक्रिया. व्यवसायाच्या शुभारंभापासून व्यवसाय संपूर्ण ताकदीने चालेपर्यंत जी प्रक्रिया किंवा प्रोसेस आपण राबवतो ती आपल्या व्यवसायाचे भविष्य ठरवते.
आता व्यवसाय किंवा बिझनेस म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्प्या भाषेत सांगायचं, तर आपण एखादी वस्तू किंवा सेवा तिच्या खरेदीच्या किंवा निर्मिती मूल्यापेक्षा जास्त किंमतीने बाजारात विकतो आणि त्यातून नफा मिळवतो तेव्हा या व्यवहाराला बिझनेस म्हणजे व्यवसाय असं म्हणतात. पूर्वीच्या काळी चलन म्हणून वस्तूंचा वापर व्हायचा. अजूनही काही गावांमध्ये अशी पद्धत आहे कि वस्तूच्या मोबदल्यात वस्तू दिली जाते. मग प्रश्न हा पडतो आपल्या आजूबाजूला इतके लोक व्यवसाय करताना दिसत असतात, त्यातले काही यशस्वी असतात आणि तर काहींचा व्यवसाय ठराविक काळापुरताच सुरु राहून नंतर बंद पडतो. असं का होत असेल? तर एक म्हणीमध्ये याचं सार लपलेले आहे, ते म्हणजे, ‘शेतात काय पिकतं, यापेक्षा बाजारात काय विकलं जातं’ हे महत्वाचं आहे. व्यवसाय म्हणून आपण ज्या गोष्टीचा किंवा प्रॉडक्टचा विचार करतो त्याचा आणि सध्याच्या बाजारात त्याची किती गरज आहे हा विचार फार महत्वाचा आहे.
व्यवसाय करताना अगदी सुरुवातीच्या टप्प्यात सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे मार्केट रिसर्च. आपण जे प्रॉडक्ट किंवा ज्या गोष्टीचा बिझनेस करणार असू त्याचे ठिकाण, त्याची ग्राहक संख्या आणि बाजारमूल्य इ. गोष्टींचा सखोल अभ्यास असणे महत्वाचे आहे. त्यानंतर आपण ज्या गोष्टीचा अथवा प्रॉडक्टचा व्यवसाय करणार आहोत ते आपण तयार स्वतः तयार करणार किंवा होलसेल मार्केटमधून मागवणार, त्याचा निर्मिती खर्च, विक्री किंमत, प्रवास खर्च आणि निव्वाळ नफा यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. हे सगळं झाल्यानंतर जर आपण हा व्यवसाय सुरु केला, तर साधारण वर्षभरापर्यंत अंदाजे आपल्याला किती नफा अथवा तोटा होऊ शकतो, त्याचे नेमके ठोकताळे काय असतील किंवा रिस्क फॅक्टर काय असेल याचा अंदाज येऊ शकतो.
या सर्व गोष्टींची तयारी झाल्यानंतर त्यासोबतच किंबहुना त्याआधीपासूनच विचार करावी अशी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निधी किंवा भांडवल. यामध्ये विचार करताना आपल्या व्यवसायाला किती पैसे आवश्यक आहेत हे तर महत्वाचे आहेच; पण त्यासोबतच व्यवसायातून नफा मिळेपर्यंत व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्यासाठी आवश्यक अतिरिक्त निधी आपल्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय असतात ते म्हणजे, आपण गुंतवणूकदारांकडून भांडवल घेऊ शकतो किंवा सरळ आपण बँकमधून कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो. नवीन उद्योजकांसाठी सरकारने उद्योजकता वाढीस लागावी यासाठी अनेक योजना देखील आणल्या आहेत आपण त्याचासुद्धा वापर करू शकतो.
या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर तुम्ही तुमचा लहान-मोठा बिझनेस नक्कीच सुरु करु शकता, पण तो पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी तुमच्याजवळ काही उत्तम सवयी असणे गरजेचे आहे. आता या नेमक्या सवयी कोणत्या? अगदी थोडक्यात सांगायचं तर धाडस, आत्मविश्वास, रिस्क घेण्याची तयारी, दूरदृष्टी, संयम, कष्ट, जिद्, मेहनत, सातत्य आणि चिकाटी. हो हे शब्द बोलायला जितके सोपे वाटतात तितकीच हे सर्व अमलात आणण्यासाठी खूप मोठी मानसिक तयारी असणे गरजेचे आहे. ही मानसिक तयारी तेव्हाच असू शकते, जेव्हा तुम्ही खूप जास्त महत्त्वाकांक्षी असता आणि तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सर्व प्रकारे तयार असता.
आपण एक गोष्ट नेहमी ऐकतो की यश मिळवणे जितके अवघड आहे, त्यापेक्षा यश टिकवणे जास्त अवघड असते. हे समीकरण व्यवसायाला सुद्धा लागू होते. व्यवसाय सुरु करणे जितके अवघड आहे, त्यापेक्षा सातत्याने तो चालवणे आणि त्याचा सर्वदूर प्रसार करणे अवघड आहे. अवघड असले, तरी अशक्य आजिबात नाही आणि हो शेवटी एवढं नक्की सांगता येईल की अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. जसा प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा त्याची पद्धत वेगळी अगदी तसेच प्रत्येकाचा अनुभव वेगळा आणि त्यातून आलेले शहाणपण हे त्याहून वेगळे. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेऊन पूर्व तयारी आणि पूर्ण तयारी करून नक्कीच आपण आपल्या स्वप्नातील व्यवसायच्या क्षेत्रात मैलाचा दगड पार करू शकू.
तुम्हाला आजचा लेख कसा वाटला हे कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि नवी अर्थक्रांतीच्या चॅनेलला आताच subscribe करा.
मित्रांनो कोणतीही मोठी ट्रीप म्हटलं की त्याला महिन्याभराची planning आली. प्रवासात खाण्याच्या पदार्थांपासून ते तिथे गेल्यावर घालायच्या कपड्यांपर्यंत सगळ्या गोष्टींची तयारी करण्यात आपलं बराच वेळ जातो, पण आज तुम्हाला आम्ही जे ठिकाण सांगणार आहे तिथं इतक्या planning ची काहीच गरज नाहीये. हा फक्त tickets booking साठी वगैरे तुम्हाला आधी थोडा वेळ काढावा लागेल, पण नंतर मात्र तुम्हाला छानपैकी निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवता येईल.
हिमाचल प्रदेशामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं रोजच्या गोंगाटापासून आपल्याला शांतीची अनुभूती मिळते. यातल्याच एका ठिकाणाबद्दल “खजियार” बद्दल आपण मागील लेखात पाहिलं होतं. हिमाचल प्रदेशमधील असंच आणखी एक सुंदर आणि शांत ठिकाण म्हणजे तीर्थन व्हॅली. हे एक असं ठिकाण आहे जिथं तुम्ही चार ते पाच दिवसांचा वेळ आनंदात आणि तितकाच शांततेत घालवू शकता. या प्रदेशामध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत, पण सगळीकडे फिरत बसण्यापेक्षा एका ठिकाणीच काही दिवस घालवले तर तुम्हाला जास्त आनंद मिळेल.
जिभी
हिमाचल प्रदेशच्या तीर्थन व्हॅलीमधील एक निसर्गरम्य गाव म्हणजे जिभी. इथल्या वॉटरफॉलचं सौंदर्य काही औरच असतं. डोंगरांमधून खळखळत खाली येणारं पाणी मनाला एक वेगळीच शांतता देऊन जातं. सोबतच्या पक्षांचा चिवचिवाटही या आनंदात भर घालतो.
जलोरी पास आणि सिरोलसार लेक
इथल्या आकर्षणामध्ये ही दोन ठिकाणंसुद्धा महत्त्वाची आहेत. फक्त ठिकाणंच नाही तर इथपर्यंत पोहोचण्याचे रस्तेही तितकेच मनमोहक आहेत. रस्त्यावर बर्फाची चादर अंथरलेली असल्याचा भास या ठिकाणी जाताना होतो. मध्यभागी गोठलेला तलाव आणि चारही बाजूंनी बर्फच बर्फ. उंचावर असलेलं मंदिर. इथे एकदा आल्यानंतर तुमचा वेळ कसा जाईल याचा अंदाजही येणार नाही.
चैहणी गाव
तीर्थन व्हॅलीतील आणखी एक छोटसं गाव म्हणजे चैहणी. यालाच चैहणी कोठी सुद्धा म्हणतात. इथे एक कोठी आहे. लाकडांपासून तयार केलेली ही कोठी १५०० वर्ष जुनी आहे. इथे कुल्लूचे राजा राणा ढाढिया राहत होते. १५ मजल्यांची ही इमारत १९०५ मध्ये आलेल्या भूकंपात १० मजलीच शिल्लक राहिली आहे. या कोठीतच शृंगा ऋषींचं भंडारही आहे. या कोठीपासूनच साधारण एक किमीच्या अंतरावर शृंगा ऋषींचं मंदीर आहे.
तीर्थन व्हॅलीला केव्हा जाणार?
तीर्थन व्हॅलीला भेट देण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे मार्च ते जून. यावेळी वातावरण फारच चांगलं असतं. जास्त थंडीही नसते. त्यासोबतच वेगवेगळ्या थरारक खेळांचाही तुम्ही इथे आनंद घेऊ शकता. उन्हाळ्यात जलोरी पास आणि हिमालयन नॅशनल पार्कची ट्रेकिंग सुद्धा करू शकता.
कसे जाल?
तीर्थन व्हॅलीला पोहोचण्यासाठी भुंटर हे येथील सर्वात जवळचं एअरपोर्ट आहे. या एअरपोर्टहून टॅक्सीने तुम्ही तीर्थन व्हॅलीला पोहोचू शकता. तीर्थन व्हॅलीला रेल्वे स्टेशन नसल्याने तुम्हाला शिमलापर्यंत रेल्वेची तिकीट बुक करावी लागेल. तेथून तुम्ही टॅक्सीने जाऊ शकता.
उंच उंच डोंगर, चहू बाजूंनी असलेली मोठी झाडी, स्लो मोशनमध्ये पडत असलेला बर्फ, अंग गोठवणारी थंडी अशा या गुलाबी थंडीत एक जोडपं वाफाळणाऱ्या चहाचा आस्वाद घेत आहे…. आहाहाऽऽ! पिक्चरमध्ये येणारे असे सीन्स पाहून तुम्हीसुद्धा हिरो हिरोईनच्या जागी स्वतःला imagine केलंच असेल. तुम्हालाही वाटत असेल की आपणसुद्धा जावं अशा ठिकाणी, आनंदाचे चार क्षण जगावे; पण परदेशी जाऊन एवढे पैसे घालवण्याऐवजी तुम्ही तो plan cancel करता आणि इथंच “The End” होतो! पिक्चरचा नाही ओ… तुमच्या फिरायला जायच्या plan चा! पण रील टू रिअल लाईफ मध्ये जर तुम्हाला हा सीन अनुभवायला मिळाला तर? आणि तेही आपल्या मायभूमीत… भारतात! आनंद होईल की नाही? चला मग उपजत निसर्गसौंदर्य लाभलेलं हे ठिकाण कोणतं आहे हे पाहूया आजच्या लेखात…
मित्रांनो आपल्याला माहितीच आहे हिमाचल प्रदेश हे आपल्याकडचं असं ठिकाण आहे जे लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत प्रत्येकालाच आकर्षित करत आलंय. इथलं निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक इथं येत असतात. इथं वेगवेगळे फेमस टूरिस्ट स्पॉट्ससुद्धा आहेत. रोजच्या गर्दीपासून दूर जाऊन शांत ठिकाणी निसर्गसौंदर्य अनुभवायला आपल्या प्रत्येकालाच आवडतं आणि अशाच शांततेचा जर तुम्हालाही अनुभव घ्यायचा असेल, तर हिमाचल प्रदेशातल्या खजियारला तुम्ही नक्कीच भेट द्यायला हवी. “मिनी स्वित्झर्लंड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खजियारला अलौकिक निसर्गसौंदर्य लाभलं आहे.
खजियार हा तलाव हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यामध्ये समुद्र सपाटीपासून 1,920 मीटर उंचावर आहे. याच्या चारही बाजूंना असलेल्या देवनार वृक्षांची तलावाच्या निळ्याशार पाण्यामध्ये सुंदरशी प्रतिमा उमटते. इथली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे, तलावामध्ये तरंगणारा गवताचा गुच्छ. निळ्याशार पाण्यामध्ये तरंगणारा हा गुच्छ पाहायला खूप सुंदर दिसतो. खजियारमध्ये गेल्यानंतर तेथील निसर्गसौंदर्य पाहून तुम्हाला एक क्षण खरंच वाटेल की तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये आला आहात की काय.
खजियारच्या या मखमली प्रदेशात एका बाजूला बाराव्या शतकातील लाकडातील कोरीव कारागिरीचं “खज्जिनाग मंदिर” असून, त्याच्या गर्भगृहात नागदेवतेची मूर्ती आहे. १६व्या शतकात राजा बलभद्र बर्मनने येथे पांडवांच्या लाकडातील मूर्ती उभारल्या. राजा पृथ्वीसिंग यांची धार्मिक प्रवृत्तीची दाई “बाल्टू” ने १७ व्या शतकात या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. “मिनी स्वित्झर्लंड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खजियारमध्ये तुम्ही adventure ही करू शकता. इथं तुम्ही Paragliding पासून ते Horse Riding पर्यंत अनेक वेगवेगळ्या activities करू शकता. एवढचं नाही तर खजियारमध्ये तुम्ही trekking चाही अनुभव घेऊ शकता. या ठिकाणी राहण्यासाठी अनेक गेस्ट हाउसही आहेत. इथं तुमच्या राहण्याची उत्तम सोय होऊ शकते.
खजियारला जाणार कसं?
चंबा किंवा डलहौसीपासून खजियार फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. खजियारला पोहोचण्यासाठी शिमलापर्यंत रेल्वे मार्गाने किंवा फ्लाइटने तुम्ही जाऊ शकता. यानंतर तुम्हाला बस किंवा टॅक्सी घेऊन खजियारपर्यंत पोहोचता येईल. याव्यतिरिक्त खजियारसोबतच हिमाचल प्रदेशातील इतरही अनेक वेगवेगळ्या ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की मुलांना, पालकांना वेध लागतात फिरण्याचे! यातले काहीजण मोठमोठे पॅकेज घेऊन मग परदेशात सुट्टी एन्जॉय करतात, तर काहीजण आपल्या देशातच केरळ, कर्नाटक, गोवा यांसारख्या वेगवेगळ्या राज्यांना भेट देतात. आता या दोन्ही गोष्टी करण्यात काही चुकीचं नाहीये, पण आपण ज्या महाराष्ट्रात राहतो त्यातल्या महा सौंदर्याचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर फिरणं आम्हाला तरी पटत नाही बुवा! महाराष्ट्र म्हटलं की कोकण हे नेहमीच प्रत्येकासाठी सुट्टीचं परफेक्ट डेस्टिनेशन असतं. तिथले वळणदार रस्ते, उंच डोंगर आणि घनदाट झाडी यामुळे भर उन्हातही कोकण हवाहवासा वाटतो.
महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. मुंबईपासून ते वेंगुर्ल्यापर्यंत पसरलेल्या या किनाऱ्यावर पर्यटकांना खिळवून ठेवणारी अनेक ठिकाणं आहेत. कोल्हापूरपासून जवळ असलेले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे म्हणजे “तळकोकण”. या तळकोकणात अनेक छोटी-छोटी गावं आहेत आणि यातलंच एक रमणीय गाव म्हणजे “जांभरूण”. चारही बाजूंनी डोंगरानं घेरलेल्या या गावात बारा महिने खळखळणारी नदी वाहत असते. इथल्या डोंगर उतारावर भाताची खाचरं, माळ, फणस, आंबा, सुपारीच्या झाडांची गर्दी पाहायला मिळते. याच झाडांच्या गर्दीतून पाझरणारी रसाळ कोकणी, लक्ष वेधून घेणारी टुमदार घरं आणि जिव्हाळा जपणारी इथली माणसं असं एकूणच ओसंडून वाहणारं निसर्गसौंदर्य या गावाला लाभलंय.
जांभरूणमध्ये आजही २४ तास डोंगरांचं पाणी पाटाने झऱ्यातून वाहतं. या गावाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गावात ४०० ते ५०० वर्ष जुनी खासगी मालकीची मंदिरं आहेत, जी अजूनही शाबूत असलेली पाहायला मिळतात. ही मंदिरं, घरं यांना दगडी पायवाटेने जोडलेलं आहे. यांना इथं “पाखाड्या” म्हटलं जातं. या पाखाड्यांना दोन्ही बाजूंनी रानफुलांनी सजवलेलं आहे. अशा कितीतरी पाखाड्या, मोठी झाडं, मंदिरं असा नैसर्गिक सांस्कृतिक वारसा लाभलेलं हे गाव आहे.
पुणे ते जांभरूण हे अंतर ३१४ किमी आहे. पुणे, कोकरूड, मल्कापूर, अंबाघाट, निवळी गणपतीपुळे रोडने कोतवडे फाट्यावरून डावीकडे वळून जांभरूणला जातं येतं. रत्नागिरीहून हे अंतर साधारण २४ किमी इतकं आहे. गावाजवळ येताच निसर्गाचं वैभव बघून तुमची गावाबद्दलची उत्सुकता आणखी वाढेल. सतत खळखणाऱ्या नदीचा, पाटबंधाऱ्यांचा आवाज या ठिकाणी अनुभवायला मिळेल.
तुम्हालाही जर रोजच्या गर्दीतून बाहेर पडून चार क्षण नैसर्गिक शांततेत घालवायचे असतील, तर “जांभरूण” शिवाय दुसरा चांगला पर्याय कोणता असू शकतो?
जगातील सर्वात महान वैज्ञानिक कोण असं म्हटल्यावर आपल्याला आठवतात ते; अल्बर्ट आईनस्टाईन, आयझॅक न्यूटन, हेन्री फोर्ड, थॉमस एडिसन, पण यातील अजून एक नाव ज्याने संपूर्ण पृथ्वीला प्रकाशाने सजविले, ज्याच्या नावाने अनेक वैज्ञानिकांना पुरस्कृत केले जाते, ज्याचे शोध हे आइन्स्टाईन आणि एडिसन यांच्या तोडीस तोड आणि तितकेच महत्वाचे होते… कोण होता तो?
पावसाळ्याचे दिवस होते. आकाशात वीजा कडाडत होत्या. सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. ऑस्ट्रिया-हंगेरी सीमेवरच्या लिका नावाच्या भागातील स्मिजन गावातील एका गर्भवती आईला गरोदारपणाच्या कळा सहन होत नव्हत्या. प्रसूतीची वेळ झाली होती. अखेरीस दाईच्या सहाय्याने आईने बाळाला जन्म दिला. बाळ जन्मल्यावर दाई म्हणाली की “एवढ्या घनघोर अंधारात जन्मेलेल्या या बाळाच्या आयुष्यात पण अंधार असेल का?” त्यावर आईने उत्तर दिले, “नाही हे बाळ संपूर्ण जगाला प्रकाशमान करेल.” १० जुलै १८५६ या दिवशी त्या वेळच्या ऑस्ट्रियामध्ये म्हणजे आजच्या क्रोएशियात जन्मलेल्या त्या बाळाचे नाव होते निकोला टेस्ला.
लहानपणी त्याची तब्येत अतिशय नाजूक असे. लहान असताना त्याला प्रकाश तसेच वेगवेगळ्या आकृत्यांचे भास व्हायचे. त्यामुळं त्याला बऱ्याच वेळा हे कळत नसे की आपण जे पाहतो आहे, ते खरं आहे की खोटं! कुठलीही गोष्ट एकदा पहिली की त्याच्या डोक्यात फिट्ट बसायची. त्याला जेव्हा एखादी आकृती दिसायची, तेव्हा ती त्याच्या पूर्णपणे स्मरणात रहायची. ती आकृती कागदावर काढायची सुद्धा त्याला कधी गरज पडली नाही. शिक्षकांनी दिलेली गणितं मुलं उतरवून घेईपर्यंत निकोलाने ती मनातच सोडवूनसुद्धा टाकलेली असायची! वयाच्या नवव्या वर्षी टेस्लानं उडणाऱ्या माश्यांच्या हालचालींमधून मिळणाऱ्या ऊर्जेच्या जोरावर चालणारी विजेची मोटार बनवली.
त्याचे वडील हे चर्चमध्ये धर्मगुरू होते आणि आपल्या मुलानेसुद्धा आपल्यासारखेच काम करावे असं त्यांना वाटायचं. पण मुलाचा विज्ञान आणि गणिताकडे असलेला कल पाहून त्यांनी निकोलाला इलेक्ट्रीकल Engineering ला प्रवेश घेण्यासाठी संमती दिली. गणित आणि विज्ञानात अत्यंत हुशार असलेल्या निकोलाने १८७५ मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेऊन ९ परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. कॉलेजमध्ये असताना टेस्ला फाटे ३ वाजता अभ्यासाला बसायचा आणि रात्री ११ वाजेपर्यंत त्याचा अभ्यास अखंड सुरु असायचा. झोपेत वेळ वाया जाऊ नये म्हणून तो फक्त ४ तास झोपायचा.
१८७५ला पॉलिटेक्नीकच्या द्वितीय वर्षाला असताना, अतिहुशारपणामुळे एका शिक्षकांसोबत त्याचे मतभेद झाले आणि त्या वर्षी तो नापास झाला. त्यातच त्याला जुगार खेळायची सवय लागली. अभ्यास झाला नाही आणि तो फायनल परीक्षेत नापास झाला. त्यामुळे तो त्यांचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण करू शकल नाही. एवढंच नाही तर त्यांने त्यांच्या कुटुंबियांशी आणि मित्रांशी असलेले संपर्क पूर्णपणे तोडले. १८८१ मध्ये टेलिग्राफ कंपनीमध्ये काम करून अनेक संप्रेषणात सुधारणा केली. टेलीफोन इम्प्लिफायरची नव्याने रचना केली, मात्र त्यावर स्वतःचे पेटंट घेतले नाही.
घडल्या प्रसंगातून स्वतःला सावरत, इकडे-तिकडे काम केल्यानंतर, त्याला एडिसन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. एडिसन यांनी त्याला त्यांनी बनविलेला डायरेक्ट करंट जनरेटर (DC Generator) जास्त प्रभावी करून द्यायचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी त्याला सांगितले की, “जर तो या कामात यशस्वी झाला, तर त्याला ५० हजार डॉलर बक्षीस म्हणून मिळतील.” मिळणारे बक्षीस ही त्याच्यासाठी खूप मोठी रक्कम होती, म्हणून त्याने ते आव्हान स्वीकारले आणि तो कामाला लागला. दिवस रात्र एक करून, १८-१८ तास काम करून त्याने डायरेक्ट करंट जनरेटर अधिक प्रभावी करून दाखविला. एडिसन यांना हवे तसे बदल त्याने करून दाखवले. परंतु एडिसन यांनी आपला शब्द पाळला नाही. आणि पैसे द्यायला नकार दिला. झालेल्या अपमानामुळे त्याने एडिसनची कंपनी सोडली. त्यानंतर मग त्या दोघांमधील कलह संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरला.
त्यानंतर टेस्ला यांचा काही काळ खूप खडतर गेला. पैसे नसल्याने त्यांनी काही दिवस खड्डे खणण्याचे काम केले. त्यात त्यांना दिवसाला २ डॉलर्स मिळायचे. पण काही दिवसांनंतर त्यांचे नशीब पुन्हा उजळणार होते, कारण १८८७ मध्ये टेस्ला यांनी Induction Motor चा शोध लावला, जी AC म्हणजेच Alternating Current System वर काम करायची. ही मोटर इतकी शक्तिशाली होती की Electric मार्केटमध्ये आघाडीवर असलेले उद्योगपती जॉर्ज वेस्टिंगहाऊस यांचं लक्ष त्याकडे गेलं. टेस्ला यांनी जॉर्ज वेस्टिंगहाऊस यांच्यासोबत Alternating Current सिस्टीमवर चालणारी ही मोटर जगासमोर ठेवली. मात्र त्याही वेळी एडिसन यांनी त्याचा विरोध केला, कारण त्यावेळी संपूर्ण अमेरिकेत एडिसन यांची DC म्हणजेच Direct Current System कार्यरत होती. एडिसन टेस्ला वाद इतक्या विकोपाला गेला होता, की जेव्हा रेडियोच्या शोधामुळे मार्कोनी आणि टेस्ला यांच्यात भयंकर वाद निर्माण झाले त्यावेळी एडिसनने मार्कोनीला पाठिंबा दिला.
टेस्ला यांनी केवळ Alternating Current System चाच शोध नाही लावला तर, त्याचबरोबर Electric Motor, पहिले Hydro Electric Power Station, Radio, Wireless Communication, Remote Control, Magnetic Power, रडारचा शोध लावला. तसेच 1895 मध्ये X-Ray Technologyवर प्रभुत्व मिळवून त्यात नवनवीन शोध लावले. ते फक्त संशोधक नव्हते, तर ते खूप चांगले वाचक होते. ते सबक्रोएशियन, झेक, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, हंगेरियन, इटालियन आणि लॅटिन अशा आठ भाषांमध्ये पारंगत होते.
संशोधनाचे अनेक यशस्वी प्रयोग पार पाडले असताना काही संशोधनामध्ये त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि त्यामुळे ते नैराश्याला बळी पडले. १८९३ साली टेस्लानी वायरलेस कम्युनिकेशन संदर्भात आपलं काम सुरू केलं, पण दोनच वर्षानी १८९५ साली त्यांच्या प्रयोगशाळेला आग लागून त्या सगळी उपकरणांची राख झाली. अनेक वर्षे एकटेच राहिल्यामुळे निकोला टेस्ला नैराश्येच्या आणखी गर्तेत ढकलले गेले. त्यांच्या जीवनातील शेवटचा १० वर्षांचा काळ सुद्धा त्यांनी एकट्यानेच एका हॉटेलमध्ये काढला. टेस्लांच्या नावे सुमारे ७०० पेटंट्स असूनसुद्धा ते शेवटपर्यंत कफल्लकच राहिले. जगातील सर्वात हुशार अशा या वैज्ञानिकावर अखेरच्या दिवसात कर्ज झाले होते.
शेवटी वयाच्या ८६व्या वर्षी आर्थिकदृष्ट्या पूर्ण बेजार झालेले निकोला टेस्ला न्यूयॉर्कच्या एका हॉटेलात 7 जानेवारी 1943 च्या रात्री झोपेतच कधी जग सोडून गेले हे सकाळपर्यंत कुणाला समजलं सुद्धा नाही! एडिसन, फॅरडे, मार्कोनी, आईनस्टाईन यांना जिवंतपणी जी प्रसिद्धी, जो मानसन्मान मिळाला तो टेस्ला यांना दुर्दैवाने मिळू शकला नाही. नाही म्हणायला या अवलियाच्या कामाची पोचपावती म्हणून, त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्ताने टाइम मासिकाने त्यांना front page वर स्थान दिले. यावेळी त्यांना ७० हून अधिक वैज्ञानिकांकडून कौतुकास्पद पत्रं आली. त्यावेळी त्यात आईनस्टाईन यांचेही पत्र होते. पण आज त्यांचा सन्मान म्हणून अमेरिकेमध्ये १० जुलै हा टेस्ला दिन म्हणून साजरा केला जातो. क्रोएशियातील १३०हून अधिक रस्त्यांना निकोला टेस्ला हे नाव दिले आहे. चंद्रावरील एका २६ किलोमीटर व्यासाच्या विवराला टेस्ला नाव देण्यात आले आहे. टेस्ला या इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीचं नाव सुद्धा त्यांच्या नावावरुनच ठेवलं आहे. मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये निर्माण झालेल्या एक लघुग्रहाचे नाव 2244 टेस्ला ठेवण्यात आले आहे आणि सर्बियाच्या १०० दिनारच्या नोटेवर टेस्ला यांचे चित्र आहे.
टेस्ला यांची आई म्हणाली होती की, “हे बाळ संपूर्ण जगाला प्रकाशमान करेल” आणि तिचं हे वाक्य टेस्ला यांनी आपल्या कर्तुत्त्वाने सार्थ ठरवलं. आता जेव्हा जेव्हा तुम्ही घरात लाईट सुरु करण्यासाठी स्विच वापराल तेव्हा तुम्हाला टेस्लाची आठवण नक्की येईल.