Category: लेखमालिका

  • निर्णयक्षमता नसल्यास खूप मोठे नुकसान होते

    निर्णयक्षमता नसल्यास खूप मोठे नुकसान होते

    सुनील या ग्रामीण भागातील एक तरुण. शाळेत हुशार होता, ७५ ते ८०% गुण मिळवायचा, १२ वी नंतर बीसीए केले. नोकरी करावी का व्यवसाय, का स्पर्धा परीक्षा द्यावी यात गोंधळलेला होता. दरम्यान बीसीए झाल्यानंतर १-२ वर्ष स्पर्धा परीक्षा देऊन पाहिल्या, परत नोकरीसाठी पुण्याला जाऊन आला. नंतर म्हणाला आता काहीतरी उद्योग व्यवसाय करू. कोणता करावा हे शोधण्यात २-३ वर्षे अजून घालवली. कशात काय ठरत नाही.

    घरची स्थिती मध्यमवर्गीय. वडील छोटेसे किराणा दुकान चालवतात. थोडी शेती, त्यात वय वाढत चाललेले, घरच्यांना काळजी वाटू लागली व नातेवाईकांमधीलच एका दहावी नापास झालेल्या मुलीशी फारसा विचार न करता त्याचे लग्न लावून दिले व किराणा दुकान इथून पुढे तूच चालव म्हणून वडिलांनी सांगितले.

    आपण शाळेत इतके हुशार होतो, पण आयुष्यात खूप मागे राहिलो याची खंत त्याच्या मनाला आयुष्यभर लागत असते. त्यामुळे आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याला खूप मोठे महत्व आहे. एकदा गेलेली वेळ परत येत नाही व वेळेनुसार अनेक संधी निघून जातात व शेवटी हताश होण्याशिवाय पर्याय नसतो. लोकांना भेटा, वाचा, निर्णय घेण्यास वेग द्या व आपल्याला सुनील होण्यापासून वाचवा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

  • थेंबे थेंबे तळे साचे

    थेंबे थेंबे तळे साचे

    एक काळ होता जेव्हा भविष्याची तरतूद म्हणून लोक संपत्तीचा संचय करायचे एखाद्या जुन्या पेटीमध्ये धन साठवून ठेवायचे. या सगळ्या धन साठवण्याच्या पद्धतीमध्ये मात्र भलतीच रिस्क असायची, हे धन कधी चोरीला जायचे तर कधी नैसर्गिक कारणामुळे गहाळ व्हायचे. लोकांना या गोष्टी लक्षात आल्यानंतर हळू हळू लोक धन हे वस्तू रूपात साठवू लागले त्यामध्ये जमीन किंवा सोने याचा समावेश असायचा. लोकांना जेव्हा कळायला लागलं की या साठवण म्हणून घेतलेल्या वस्तूंची अथवा संपत्तीची किंमत वेळेनुसार वाढते तेव्हा गुंतवूणक ही पद्धत खऱ्या अर्थाने सुरु झाली. गुंतवणूक आणि बचत या दोन्हींकडे त्या काळात एकच नजरेतून पहिले जायचे. जस जसा काळ बदलत गेला तस तसे लोकांना समजले की बचतीपेक्षा गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा जास्त आहे. ज्यामुळे गुंतवणूककडे लोकांचा ओढा जास्त वाढला. जेव्हा तुमच्या उत्पन्नाच्या नफ्यातील काही भाग तुम्ही भविष्यातील काही गोष्टींसाठी बाजूला काढून जपून ठेवता तेव्हा ती बचत होते आणि जेव्हा तुम्ही नफ्याचा काही भाग हा एखाद्या कंपनीचा हिस्सा खरेदी करण्यासाठी वापरता तेव्हा तुम्ही गुंतवणूक करता. तसे पाहायला गेल्यानंतर दोन्हीमधून फायदाच होतो पण गुंवणूकीतून जास्त फायदा होतो, ज्यामुळे आजकाल गुंतवणुकीचा विचार जास्त करतात बचतीपेक्षा. आता दोन्ही गोष्टींमध्ये नेमका फरक कसा पडतो हे आपण पाहूया.

    ज्याप्रमाणे गुंतवणुकीमध्ये फायदा जास्त असतो त्याप्रमाणे त्यात जोखीमसुद्धा जास्त असते. गुंतवणुकीचा हा फायदा जेव्हा गुंतवणूक जास्त कालावधीसाठी असते तेव्हा अधिक जास्त होतो. गुंतवणुकीचा विचार करताना आपण म्युचुअल फ़ंड, ट्रेडिंग, स्टॉक मार्केट, रिअल इस्टेट इ. पर्यायांचा विचार नक्की करू शकतो. हे सर्व करत असताना गुंतवणुकीमध्ये जोखीम जास्त असली तरी वेळेसोबत त्यातून मिळणार नफा फार मोठा आहे. ज्यामुळे भविष्यातील अनेक प्लॅन यशस्वी करण्यासाठी तुम्हाला अधिक बळ मिळू शकते. भविष्यातील एखादी मोठी कल्पना किंवा तुमचे एखादे मोठे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी फक्त बचत हा पर्याय खूपच तोकडा पडू शकतो. त्यामुळे गुंतवणूक या पर्यायाचा विचार करून आपण आपली ही मोठी स्वप्नं नक्कीच पूर्ण करू शकतो. आता जोखीमबद्दल बोलायचे झाल्यास गुंतवणुकीमध्ये जसा फायदा जास्त तशी जोखीम जास्त आहे तरीसुद्धा सर्वांचा बारकाईने अभ्यास केला आणि गुंतवणूक नेमकी कुठे, कधी आणि केव्हा करावी हे समजायला लागले तर ही जोखीम आपण नक्कीच कमी करू शकतो.

  • २. कल ओळखण्याची कला

    २. कल ओळखण्याची कला

    त्याला मिळालेल्या काही पायाभूत बाबी समान आहेत. त्याच्या शरीराची रचना व ठेवण एकसारखीच असते. म्हणजेच काय? तर प्रत्येकाच्या धडाच्या वर डोके आहे. डोक्यात मेंदू आहे, पंच ज्ञानेंद्रिये आहेत, हृदय, यकृत, फुफ्फुसे, हात, पाय अशी अंतर्बाह्य इंद्रिये आहेत. त्यांची जागा ठरलेली आहे. प्रत्येकाचा चेहरा सारखा दिसत नाही, प्रत्येकाच्या अंगात वेगवेगळ्या कला दडलेल्या आहेत, प्रत्येकाच्या डोक्यात वेगळी प्रतिभा आहे. हे असे आहे हेच उत्तम आहे. 

    एवढ्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येकाला हवी ती गोष्ट प्राप्त करुन घेण्यासाठी लागणारी अमर्याद ऊर्जा प्रत्येकात दडलेली आहे. आपण काहीही करु शकतो. त्यासाठी आपल्याला आपल्या क्षमतांना आव्हान द्यावे लागते, मानसिकता बनवावी लागते, सराव व प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. या गोष्टी वारंवार सिध्द करणारी उदाहरणे आपण आपल्या रोजच्या जीवनात अनुभवत असतो. ज्याला शिक्षक व्हायचे आहे त्याने ठरवून प्रयत्न केले तर तो शिक्षक होतो, ज्याला डॉक्टर व्हायचे आहे तो डॉक्टर होतो. प्रत्येकालाच बिल गेट्स आणि वॉरन बफेट सारखे बनायचे नाही, बिल गेट्स हा बिल गेट्स आहे आणि तुम्ही तुम्ही आहात. दोघांची आपापली वैशिष्टे आहेत. 

    The Art of Recognizing Tomorrow

    आता आपल्याला असे वाटू शकते की आपल्याला हवे ते आपण बनू शकतो मग आपला कल ओळखण्याची व त्याप्रमाणे काम करण्याची गरज काय आहे? प्रत्येक गोष्ट आपल्याला शक्य आहेच, मात्र काही गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला जास्त प्रयत्न करावे लागतात, तर काही गोष्टी आपल्याला सहज जमतात. याउलट ज्या गोष्टींसाठी आपल्याला अथक परिश्रम करावे लागतात त्या गोष्टी काहीजण लिलया करुन दाखवतात, तर ज्या गोष्टी आपल्याला अगदी सोप्या वाटतात, त्यात काहीजणांचा कस लागतो. हे असे का होत असावे बरे? तर त्याचे उत्तर आहे की, आपल्याला सर्व गोष्टी साध्य करता येतात, त्यातील काही गोष्टी साध्य करण्यासाठी लागणारे उपजत गुण आपल्यात असतात. काहीजणांचा आवाज जन्मताच चांगला असतो, काहीजणांची शरीरयष्टी उत्तम असते, तर काहीजणांची स्मरणशक्ती अफलातून असते, काहीजण सुंदर व रुपवान असतात, तर काहीजण धाडसी असतात. ज्याचा आवाज चांगला आहे त्याने गायनात, ज्याची शरीरयष्टी चांगली आहे त्याने खेळात, जे सुंदर आहेत त्यांनी मॉडेलिंगमध्ये, तर जे धाडसी आहेत त्यांनी धाडस दाखवता येणाऱ्या क्षेत्रात कामगिरी केल्यास लवकर यश मिळणे स्वाभाविक आहे. 

    The Art of Recognizing Tomorrow

    अल्बर्ट आईनस्टाईनला शिक्षणात फार गती नव्हती त्याने पुढे जाऊन जगाला परिवर्तनाचा वेगळा आयाम देणारा सापेक्षतावादाचा सिध्दांत दिला या सारखी कित्येक उदाहरणे आहेत. मात्र यासाठी अथक परिश्रम करावे लागतात. त्याउलट सचिनमध्ये उपजतच क्रिकेट होते त्याने क्रिकेट मध्ये करिअर केले तो यशस्वी झाला. विश्वनाथन आनंद बुध्दिबळाचा निर्विवाद बादशहा झाला. हे त्यांच्या योग्य वयात झाले. केएफसीच्या मालकाला त्याच्यातील उद्योजकता माहिती व्हायला वयाची साठ वर्षे उलटून गेली होती. त्यानंतर प्रयत्न करुन त्याने केएफसी नावाचा जगप्रसिध्द ब्रँड बनवला.

  • अ कप ऑफ कॉफी कॅन चेंज द लाईफ

    अ कप ऑफ कॉफी कॅन चेंज द लाईफ

    तुम्हाला बिझनेस करायचा व वाढवायचा आहे, मग मोठी कामे मिळविण्यासाठी क्लायंटना कसे पटवायचे हे जमले पाहिजे. समोरचा माणूस  क्लाईंट असो, सप्लायर असो, कर्मचारी असो किंवा खबऱ्या असो, अशांना पटवायचे असेल, तुम्हाला हवी असणारी माहिती पाहिजे असेल, तर त्यांना एखाद्या चांगल्या ठिकाणी जेवायला निमंत्रण द्या. चांगले थ्रीस्टार, फाईव्ह स्टार हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा, कॅफे किंवा अशा काही ठिकाणी. चांगलं रुचकर जेवण कोणाला आवडत नाही? प्रत्येकजण खाण्यासाठी तर कमवितो. जेवणासाठी एकत्र भेटल्याने संवाद चांगला वाढतो, संबध अधिक चांगले प्रस्थापित होतात.

    आज बिझनेस करण्यासाठी तुमच्यामधले व्यवहार कौशल्य, गट्स महत्वाचे आहेत. तुमचे ऑफिस, फॅक्टरी, कंपनी किती मोठी आहे कोणी विचारत नाही. तुम्हाला डील करता आली पाहिजे, मार्केटिंग जमले पाहिजे.  क्लाईंटबरोबर व्यवहार व संबध प्रस्थापित करता आले पाहिजेत. हे बिझनेस तंत्र तुम्हीही शिकून घ्या आणि आजमावून पाहा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • व्यवहाराला नेकी व पत काय ठेवावी?

    व्यवहाराला नेकी व पत काय ठेवावी?

    शिवचरित्रातील एक गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मोहिमेवर जाण्यासाठी खजिना कमी होता. छत्रपती असूनसुद्धा ते स्वतः सावकाराकडे गेले व म्हणाले मला २ लाख होनांचे कर्ज हवे आहे.

    सावकार म्हणाला, “कर्जदार म्हणून आलात की महाराज म्हणून?” महाराज म्हणाले, “कर्जदार छत्रपती म्हणून आलोय.”

    सावकाराने प्रश्न केला, “तारण काय ठेवणार? कर्ज द्यायचे म्हणजे तारण काहीतरी ठेवले पाहिजे.”

    त्यावर छत्रपती म्हणाले, “हे स्वराज्य तर रयतेचे आहे, मी काय तारण ठेवणार?”

    सावकार म्हणाला, “तारण तर ठेवावेच लागेल.”

    शिवाजी  महाराजांनी शेजारी पडलेली गवताची काडी उचलली त्या सावकाराच्या हातात दिली आणि सांगितलं, “ही माझ्या स्वराज्यातील गवताची काडी आहे. ही तारण म्हणून घे आणि मला दोन लाख होनांचं कर्ज दे.”

    सावकाराने दोन लाख होनांचं कर्ज दिलं आणि ती गवताची काडी तारण म्हणून ठेवून घेतली.

    तेव्हा महाराज म्हणाले, “आम्ही गवताची काडी गहाण ठेवली होती, ती परत करा.”

    सावकाराने तिजोरीत ठेवलेली गवताची काडी बाहेर काढली आणि महाराजांच्या हातावर दिली आणि म्हणाला, “ही घ्या तुमची गवताची काडी”.

    त्यावेळी शेजारी उभा असलेला कोंडाजी महाराजांना म्हणाला, “महाराज, गवताची काडी ती, तीची किंमत काय! घेतली काय आणि न घेतली ती काय.” त्यावर महाराज म्हणाले, “कोंडाजी, ह्या स्वराज्यातील गवताची काडीसुध्दा कुणाकडे गहाण पडता कामा नये.”

    छत्रपतींच्या त्या गोष्टीवरुन व्यवहारातील सचोटीपण व ‘गवताची काडीसुध्दा परत घेतली’ हा पराकोटीचा स्वाभिमान आजच्या मराठी माणसाला शिकण्यासारखा आहे. कर्ज काढणे हा व्यवहाराचा भाग आहे, पण ते वेळेत फेडून आपली पत व स्वाभिमान ठेवणे तितकेच महत्त्वाचे, परंतु भ्रष्ट सहकार सम्राटांनी व उद्योगपतींनी जनतेचे व बँकांचेही पैसे बुडवून स्वतःबरोबर इतरांनासुद्धा व्यावसायिक क्षेत्रात बदनाम केले आहे. आपण मात्र सचोटीने आणि प्रामाणिकपणाने व्यवहार करून आपली पत कायम ठेवावी.

  • अब्राहम लिंकनचे हेडमास्तरास पत्र

    अब्राहम लिंकनचे हेडमास्तरास पत्र

    प्रिय  गुरुजी,
    
    सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात,
    नसतात सगळीच सत्यनिष्ठ,
    हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी.
    मात्र त्याला हे देखील शिकवा,
    जगात प्रत्येक बदमाषागणिक      
    असतो एक साधूचरित, पुरुषोत्तमही
    स्वार्थी राजकारणी असतात जगात,
    तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे  नेतेही.
     असतात टपलेले वैरी,  तसे जपणारे  मित्रही,
    
    मला माहित आहे !
    सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत......... 
    तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा,
    घाम गाळून कमावलेला एकच छदाम,
    आयत्या  मिळालेल्या  घबाडापेक्षा मौल्यवान आहे.
    
    हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा 
    आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला,
    तुमच्यात शक्ती असती तर .........
    
    त्याला द्वेष मत्सरापासून दूर रहायला शिकवा 
    आणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला.
    गुंडांना भीत जावू नको म्हणावं,
    त्यांना नमविणे सर्वात सोपं असतं.
    
    जमेल तेवढं दाखवित चला त्याला,
    ग्रंथ भांडाराच अदभूत वैभव.
    मात्र त्याबरोबरच,
    मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा, 
    सृष्टीचं शाश्वत सौंदर्य  अनुभवायला,
    पाहू दे त्याला, 
    पक्षांची अस्मान भरारी ............
    सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर ..........
    आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं......
    
    शाळेत त्याला हा धडा मिळू दे,
    फसवून  मिळालेल्या यशापेक्षा,
    सरळ आलेल अपयश श्रेयस्कर आहे .
    आपल्या कल्पना, आपले विचार,
    यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने,
    बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी,
    
    त्याला सांगा ................
    भल्याशी भलाईनं वागावं,
    आणि टग्यांना अद्दल घडवावी .
    माझ्या मुलाला हे पटवता आल तर पहा .........
    जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत,
    सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी,
    पुढे हेही सांगा त्याला,
    ऐकावं जनाच अगदी सर्वांच ...........
    पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून,
    आणि फोलपट टाकून निव्वळ सत्व तेवढं स्वीकाराव.
    
    जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा,
    हसत रहावं उरातल दुःख दाबून,
    आणि म्हणावं त्याला 
    आसवांची लाज वाटू देऊ नको.
    
    त्याला शिकवा .........
    तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला,  
    अन चाटुगिरीपासून सावध रहायला.
    त्याला हे पुरेपूर समजवा की,
    करावी कमाल कमाई त्याने, 
    ताकद आणि अक्कल विकून,
    पण कधीही विक्रय करू नये, 
    हृदयाचा आणि आत्म्याचा.
    
    धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर,
    कानाडोळा करायला शिकवा त्याला.
    आणि ठसवा त्याच्या मनावर,
    जे सत्य आणि न्याय वाटते,
    त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.
    त्याला ममतेनं वागवा,
    पण, लाडावून ठेवू नका.
    
    आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय 
    लोखंडाच कणखर पोलाद होत नसतं,
    त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य,
    अन धरला पाहिजे धीर त्याने,
    जर गाजवायच असेल शौर्य .
    
    आणखीही एक सांगत रहा त्याला ..........
    आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर,
    तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर, 
    
    माफ करा गुरुजी, 
    मी फार बोलतो आहे
    खूप काही मागतो आहे.........
    पण पहा........ 
    जमेल तेवढ अवश्य कराच,
    माझा मुलगा, भलताच गोड छोकरा आहे हो तो !!!
    - अब्राहम लिंकन
    
    
  • जीभेवर साखर, डोक्यावर बर्फ, मेंदूत आयडिया, हातात काम

    जीभेवर साखर, डोक्यावर बर्फ, मेंदूत आयडिया, हातात काम

    पहिलं जीभेवर साखर :

    सतत गोड बोलणे, मृदुभाषा, आलेल्यांचे हसतमुखाने स्वागत, चहापान वगैरे इत्यादींमुळे माणसाचे संपर्क वाढतात, संबंध सलोख्याचे बनतात. गोड, मृदु व समजूतदारपणे बोलणार्‍याबरोबर ग्राहकांना व्यवहार करावासा वाटतो. गोड बोलणार्‍या दुकानदाराचे दुकान इतरांपेक्षा निश्चित अधिक चालते. गुड मॉर्निंग, हॅप्पी न्यू ईयर, हॅप्पी बर्थडे, अभिनंदन असे प्रशंसेचे उद्गार काढण्यास किंवा तसा एखादा व्हॉटसअप मेसेज पाठवण्यास काय तोटा होतो? मग गोड बोलण्याची सवय लावून घ्या ना! सतत उद्धट भाषा, शिवीगाळ, वादविवाद, चिडचिड अशा प्रकारच्या वागण्याने माणूस कधीही जीवनात पुढे जाऊ शकत नाही.

    दुसरी डोक्यावर बर्फ :

    उद्योग तर सोडा, पण आता सर्वसामान्य जीवनसुध्दा प्रचंड तणावाचे झाले आहे. आयुष्यात येणार्‍या ताणतणावाच्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी व त्यातून मार्ग काढण्यासाठी डोके अतिशय शांत असणे महत्वाचे आहे. मोबाईल तापला की हँग होतो, तसे डोके गरम झाले की बुध्दी चालत नाही आणि बुध्दी चालायची बंद झाली झाली की सगळं संपलं. तेव्हा डोक्यावर बर्फ ठेवूनच जीवनात व व्यवसायात वावरले पाहिजे, तरच तुमची आयुष्यात प्रगती होत जाईल. तापट स्वभावाच्या माणसाचा काही दिवसात सत्यानाश होऊन तो शेवटी मागे पडून गरिबीच्या खाईत लोटला जातो.

    तिसरी मेंदूत आयडिया :

    आयुष्यात श्रीमंत होण्यासाठी केवळ पारंपारिक पध्दतीने जगणे आता कालबाह्य झाले आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी सतत नवीन नवीन आयडियांचा विचार केला पाहिजे. कोणत्या प्रोडक्ट, सेवांमध्ये चांगला फायदा आहे, भविष्यात कोणत्या जागांचे भाव वाढतील, मार्केटिंग करताना काय करावे म्हणजे फायदा वाढेल, कोणत्या व्यक्तीशी संपर्क कुठे व कसा साधावा म्हणजे आपणास फायदा होईल, कोणत्या कंपनीची एजन्सी घ्यावी म्हणजे फायदा होईल, ई-कॉमर्स, इंटरनेटच्या माध्यमातून काय करता येईल का? असे मेंदूत सतत आयडियांचे मंथन सुरू पाहिजे.

    चौथी हातात काम :

    श्रीमंत होणार्‍या व प्रचंड यशस्वी होणार्‍या व्यक्तीचे एक वैशिष्ट्य म्हणजे सकाळी ६ वाजता उठल्यापासून ते रात्री १२ वाजता झोपेपर्यंत त्यांच्या हाताला काही-ना-काही काम असते. आपला व्यवसाय, व्यवहाराचा व्यापच येवढा पाहिजे, की तुम्हाला सतत काम असले पाहिजे. प्रत्येक यशस्वी उद्योजक एकाच वेळी १० हून अधिक वेगवेगळे व्यवसाय सांभाळतात. हातात काम नसणे म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या मृत व्यक्तीचे लक्षण आहे. ज्यांच्या हाताला आज काम नाही म्हणजे, तो लवकरच मार्केट बाहेर पडून होऊन मागे पडेल. काम नसेल तर काम शोधून काढले पाहिजे :

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • कंजूषपणामुळे व्यवसायात होतं मोठं नुकसान

    कंजूषपणामुळे व्यवसायात होतं मोठं नुकसान

    एका गावात एक जनरल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर होते. गेली ३ ते ४ वर्ष त्यांचा व्यवसाय नीट चालत नव्हता. रोजचे पेशंट ५० ते ६० वरुन फक्त २० ते २५ वर आले होते. त्यांचे वय ५०च्या पुढे होतं. तसं म्हणावं, तर ते मागच्या पिढीचे डॉक्टर. त्यांच्या आजूबाजूला नवीन डॉक्टरांचे दवाखाने सुरू झाले होते, त्यांचे दवाखाने चालायला लागले, पण यांचा धंदा कमी झाला होता. आजूबाजूच्या इतर डॉक्टरांचे क्लिनिक पाहिलं तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येत होती, ती म्हणजे हे महाशय नको तेवढे कंजूष होते. तपासणीचा टेबल, बसण्याचं बाकडं, खुर्च्या त्याच २० ते ३० वर्षापूर्वीच्या. रिसेप्शनिस्टसुध्दा एकदम लो प्रोफाईल. त्यांना धड चांगल्याप्रकारे संवादही साधता येत नव्हता. त्या बऱ्याच वेळी घरच्या कामानिमित्त गैरहजर असत. कमी पगारात काम करते म्हणून त्याच रिसेप्शनिस्टला ठेवलं होतं. क्लिनिकमध्ये पेपर नाही, की पाणी पिण्याची सोय नाही, आरोग्याशी संबंधित माहिती देणारे पोस्टरही नाहीत.

    क्लिनिकमध्ये एखादी एखादी तपासणीची आधुनिक मशीन आणलीत तरी फरक पडतो. साधा ॲप्रन स्वत: व रिसेप्शनिस्टला वापरायला दिला तरी फरक पडतो. औषध ठेवण्याचा चांगला रॅक, बाहेर चांगली पोस्टर्स, चांगले इंटेरिअर करून क्लिनिकला जाणारा डॉक्टर समाजाच्या दृष्टीने हुशार असतो, प्रत्यक्षात कदाचित वेगळंही असू शकतं. पण तो व्यवसायाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे व्यवसायाची जागा अधिक आकर्षक कशी दिसेल याचा विचार करा आणि तसे बदल करा. 

    हा लेख विडीयो मध्ये पहा

  • भाग १ – शिकण्याचे मुलभूत घटक – शिक्षणाचे महत्त्व

    भाग १ – शिकण्याचे मुलभूत घटक – शिक्षणाचे महत्त्व

    एखाद्या माणसाकडे एकूण किती कौशल्ये आहेत त्यावर त्याचे जीवनशाळेतील शिक्षण ठरते. एकाच व्यक्तीला पोहायला येते, दुचाकी-चारचाकी चालवता येते, उत्तम स्वयंपाक बनवता येतो, चांगले भाषण देता येते, संगणक चालवता येतो, त्याचे आरोग्य उत्तम आहे अशी जेवढी जास्त कौशल्ये प्राप्त असतील तेवढा तो जास्त यशस्वी होण्याच्या शक्यता निर्माण होतात. त्याने मिळवलेली कौशल्ये सध्या काम करत असलेल्या क्षेत्राशी संबंधित असल्यास अत्युत्तम ठरते. आपल्याला ज्या गोष्टी येत नाहीत. त्या गोष्टी साध्य करुन घेण्याची कला हा सुध्दा शिक्षणाचाच एक भाग आहे. 

    The Importance of Education

    माणसाला चारित्र्य घडवणारे, बुध्दीचा विकास करणारे, स्वतःच्या पायावर उभा करणारे शिक्षण आपल्याला हवे आहे. माणसाला माणूस बनवणारे शिक्षण आपल्याला हवे आहे. खऱ्या अर्थाने जीवन समृध्द बनवणारे शिक्षण आपल्याला हवे आहे. म्हणजे काय? तर जीवनातील आपल्याला आवश्यक त्या सर्व गोष्टी साध्य करण्याची गरज शिक्षणातून पूर्ण झाली पाहिजे. सामाजिक, आर्थिक, आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, समाधान, आनंद, भौतिक गरजा, मनःशांती व नातेसंबंध या सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात प्राप्त करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. 

    समजा एखाद्याने खूप सारा पैसा कमावण्यात आयुष्य खर्च केले व त्या नादात आरोग्याची हानी करुन घेतली तसेच कुटुंबातील व्यक्तींसाठी सुध्दा वेळ दिला नाही. तर त्याच्या आयुष्यातील एक बाजू पूर्ण करण्याच्या नादात दुसरी बाजू अपूर्णच राहून गेली किंवा एखाद्याने खूप सगळी माहिती गोळा करण्यात आयुष्य व्यतीत केले त्यावर काम करुन ती माहिती अस्तित्वात आणण्यासाठी त्याच्याकडे वेळ शिल्लक राहिला नाही, तर त्या माणसाची सुध्दा आयुष्याची एक बाजू अपूर्णच राहून गेली. एखाद्या विद्वानाने आयुष्यात खूप काही विद्या प्राप्त केली. त्या नादात त्याने आयुष्यातील इतर गोष्टीकडे दुर्लक्ष केले. कमालीच्या आर्थिक दारिद्र्याचा सामना करत आयुष्य कंठित केले. एखाद्या पैलवानाने आयुष्यात खूपच चांगले आरोग्य कमावले मात्र व्यवहार चातुर्य आत्मसात करण्यात अपयशी ठरला त्याच्या सुध्दा आयुष्यात एक गोष्ट अपूर्णच राहिली. बराक ओबामांनी दोनवेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद भूषविले. राष्ट्राच्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी कुटुंबासाठी सुध्दा वेळ दिला. 

    एका माणसाने आयुष्य भर फार पैसा कमावला व प्रचंड काटकसर करत त्या पैशाचा आनंद न घेताच मरुन गेला. तर दुसऱ्या एका माणसाने आयुष्यभर जेवढा पैसा कमावला तेवढा तो उधळला, नको तसा खर्च केला व म्हातारपणी कर्जबाजारी व आर्थिक हाल करत जगला. त्याउलट एका माणसाने पैसाही कमावला, आवश्यकतेनुसार त्याचा वापर केला, त्याचे नियोजन व बचत सुध्दा केली. त्याचे आयुष्य समाधानात पूर्ण झाले. आयुष्यात सर्व गोष्टीचा सुवर्ममध्य साधण्याचे तारतम्य शिक्षणातून प्राप्त होते.

    The Importance of Education
  • जे तराजू चालवतील, तेच संपत्ती कमवतील

    जे तराजू चालवतील, तेच संपत्ती कमवतील

    इतिहास काय सांगतो, ‘जे तलवारी चालवतील, ते तलवारीने मरतील, जे डोकं चालवतील, ते जगावर राज्य करतील; तसेच जे तराजू चालवतील, ते संपत्ती कमवतील.’ मित्रहो, आजही तेच दिसतंय. पुस्तकं वाचणारे बुद्धीवादी सरकारमध्ये आहेत, तराजूवाले त्यांना पैसे पुरवतात आणि तलवारीची भाषा करणारे अजून मोर्चे व आंदोलन करत आहेत. यात मराठी माणूस कुठे आहे याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. तराजूवाले, आज देशातील उद्योग क्षेत्रात मुख्यतः यांचेच वर्चस्व दिसून येते, कारण हे लोक पिढ्यानपिढ्या उद्योग क्षेत्रात आहेत. स्वतःचा उद्योग कसा यशस्वी करायचा, याचाच विचार ते करतात आणि परिणामी ते यशस्वी होतात. त्यांची मुलेदेखील याच क्षेत्रात येताना दिसतात. हे पिढ्यानपिढ्या चालू राहणार. यात मराठी माणसे आहेत ती केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकी.

    आजकाल सोशल मीडियावर आपण शिवाजी महाराजांबद्दल पोस्ट टाकून आपण मराठी असल्याचे अभिमानाने सांगतो. स्वतःला त्यांचे वारस समजतो; परंतु शिवरायांनी नुसती तलवार नाही चालवली, तर बुध्दी चालवली. त्यांचे राजकीय डावपेच आणि गनिमी काव्यापुढे त्यांचे सर्व शत्रू हतबल झाले होते हे विसरू नका. केवळ आपली बुध्दी व दूरदृष्टीच्या साहाय्याने त्यांनी इतिहास घडवला. आजही त्यांना मॅनेजमेंट गुरु म्हणून संबोधले जाते. हा इतिहासाचा भाग आतातरी मराठी तरुणांना समजेल का? अनेकांच्या व्हॉटसअप प्रोफाईलवर तलवारीचा फोटो असतो, तेव्हा असे वाटते की अजून यांच्या डोक्यात तलवारच आहे. त्यांच्या डोक्यात बुध्दी आणि पैसा यावा हीच शिवरायांचरणी प्रार्थना.

    आज तलवारीपेक्षा पैशाची धार जास्त आहे. ज्याच्याजवळ पैसा त्याचीच जास्त पॉवर. यामध्ये बहुतांशी उद्योजक आहेत. आज मराठी तरुणांनी देखील उद्योग क्षेत्रात उतरणे गरजेचे झाले आहे. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर यश मिळवण्यासाठी केलात, तर तुमचेच भले होईल. आपल्याकडे एक म्हण आहे, “उद्योगीला महापूर, आळश्याला गंगा दूर.”

    हा लेख विडीयो मध्ये पहा