Category: लेखमालिका

  • कुटुंबीयांचा पाठिंबा की विरोध ? व उपाय

    कुटुंबीयांचा पाठिंबा की विरोध ? व उपाय

    उद्योगपती वालचंद हिराचंद, लोखंडी नांगरांना जन्म देणारे किर्लोस्कर बंधू, आबासाहेब गरवारे, भारत फोर्जचे बाबा कल्याणी, विकोचे पेंढारकर घराणे, कॅमलिनचे दांडेकर, आयफ्लेक्सचे दीपक घैसास, दास ऑफशोअरचे अशोक खाडे, घोडावत ग्रुपचे संजय घोडावत, व्हीआयपी कपड्यांचे सर्वेसर्वा पाठारे बंधू, सारस्वत बँकेचे एकनाथ ठाकूर, मराठी नाटक व्यवसायाला वेगळा आयाम देणारे विष्णुदास भावे, दाते पंचांग विकणारे दाते, पितांबरीचे प्रभुदेसाई, बीव्हीजीचे हणमंतराव गायकवाड, माने ग्रुपचे रामदास माने, हावरे ग्रुप अशी न संपणारी मराठी व्यावसायिकांची यादी आहे.

    मात्र या सर्व उद्योजकांचा विचार केला तर असे आढळून आले आहे, ते म्हणजे यातील बहुतांश उद्योजक हे पहिल्या पिढीचे उद्योजक आहेत. त्यांना आपला उद्योग वारसा पुढच्या पिढीकडे म्हणाव्या तशा प्रभावी पध्दतीने हस्तांतरीत करता आला नाही व या सर्व उद्योजकांच्या आधीच्या पिढीनेही कधी व्यवसाय केलेला नव्हता. त्यामुळे ओघानेच हे आले की, कोणालाही कुटुंबातून फारसा पाठिंबा मिळाला नव्हता. तरीही या उद्योजकांनी आपला उद्योग मोठा करण्याची स्वप्ने पाहिली. त्यासाठी लागेल ते कष्ट उपसले, आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला व अपेक्षित असणारे यश त्यांना मिळाले. त्यामुळे आपण खचून न जाता या उद्योजकांनी निर्माण केलेल्या वाटांवरून पुढे चालायचे आहे.

    घरातील व्यक्तींचा विरोध कमी करुन त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करण्याचे काही उपाय आपण पाहू या. घरातील व्यक्तींचा विरोध असणाची काही कारणे म्हणजे उत्पन्नाची अनिश्चितता, भांडवल लावण्यासाठी कमी पडणारी क्षमता, अनुभवाचा अभाव ही होत. एकतर तुम्ही भरपूर पैसा कमावून घरी द्यायला लागला की, घरच्यांचा व्यवसायाला असलेला विरोध सहज मावळून जातो. तुम्ही पैसे कमावावेत ही त्यांची माफक अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. आता घरातील सर्वात जिव्हाळ्याच्या व्यक्तीला विश्वासात घेऊन व्यवसाय पूर्ण समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. तुम्ही घरातील या व्यक्तीला तुम्ही व्यवसाय करु शकता ही खात्री पटवून देऊ शकलात, तर व्यवसायासाठी लागणारी मदतसुध्दा घरातल्या व्यक्तींकडून मिळते. जेव्हा तुम्ही घरातील या व्यक्तीचा विश्वास संपादन करता तेव्हा तुम्हाला कोणालाही व्यवसाय पटवून देण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. मग ती व्यक्ती हळूहळू घरातील इतर व्यक्तींना तुमच्या बाजूने करते.

    गुजराती, मारवाडी, पंजाबी व सिंधी कुटुंबामध्ये घरातील वातावरणच व्यवसायासाठी अनुकूल असते. त्यामुळे त्यांना जास्त संघर्ष करावा लागत नाही. म्हणून शक्यतो काहीजणांनी मिळून व्यवसाय चालू केला, तर प्रत्येकाने दुसऱ्याच्या घरात समजावून सांगावे म्हणजे ते पटकन समजून जातात व त्यांना विश्वास बसतो की हा शेजारचा/किंवा कॉलेजमधला मित्र व्यवसाय करतोय म्हणजे तुमच्याबरोबर कोणीतरी आहे व तुम्ही काहीतरी करु शकता.

    आणखी एक महत्त्वाची गोष्ट; कुटुंबातील व्यक्तीचा पाठिंबा असो किंवा विरोध असो आपले पूर्ण लक्ष व्यवसाय मोठा करणे, त्यासाठी लागेल त्या गोष्टी करणे यावरच असले पाहिजे. घरातील लोक तुम्हाला सुरवातीला पाठिंबा देत नसतील, तर कालांतराने का होईना ते तुमच्या बाजूने होतातच. हे सगळीकडे झाले आहे हा इतिहास आहे. परत या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा.

    अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

  • लेख ७.२ – बिझनेस प्लॅन कसा तयार करावा?

    लेख ७.२ – बिझनेस प्लॅन कसा तयार करावा?

    ५. स्पर्धक – आपण करत असलेल्या उत्पादनांची निर्मिती करणारे कितीतरी उद्योजक आपल्या कार्यक्षेत्रात असतात. त्यापैकी आपल्या उत्पादनांच्या किंमतीत व आपल्या ग्राहक वर्गाला आकर्षित करणारे कोण आहेत. त्या तीन–पाच स्पर्धकांची नावे यात समाविष्ट करायची आहेत. कारण आपल्याला आपल्या उत्पादनांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी हे माहिती असणे गरजेचे असते. याशिवाय गुंतवणूकदाराला हे समजते की आपला बाजाराविषयी (मार्केटचा) अभ्यास खूप चांगला आहे.

    ६. स्पर्धकाच्या तुलनेत असणारी तुमची वैशिष्टे – आपण ज्या प्रकारचा व्यवसाय करतो आहे, त्या प्रकारची उत्पादने निर्माण करणारे उद्योजक जर आधीच असतील तर आपण नवीन उद्योग सुरु का करतोय? किंवा आपल्या व्यवसायाची ग्राहकांना गरज काय? आपला व्यवसाय चालण्याची शक्यता काय? या प्रश्नांची उत्तरे देणारा हा टप्पा आहे. तर या प्रश्नांची उत्तरे अशी असतात; आधीचे उद्योजक ज्या सेवा देण्यात कमी पडतात, त्या सेवांची उपलब्धता करुन देण्याची क्षमता असणारी उत्पादने आपण तयार करत आहोत, त्याच किंमतीत चांगली गुणवत्तापूर्ण उत्पादने पुरवत आहोत.

    ७. लागणारे भांडवल व त्याचा उपयोग – आपण सुरु करत असणाऱ्या व्यवसायासाठी लागणारे अंदाजे भांडवल आणि त्याचा उपयोग आपण कोणत्या गोष्टींसाठी आणि कशा प्रकारे करणार आहोत याची माहिती गुंतवणूकदारांना द्यावी लागते.

    ८. विक्री व जाहिरात माध्यमे – या टप्प्यात आपण आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी आपण कोणते प्रयत्न करणार आहोत याची माहिती थोडक्यात द्यावी लागते. विक्री वाढवण्यासाठी कोणती पावले उचलणार आहोत तसेच आपले उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचं मार्केटिंग कसे करणार आहोत यासंदर्भात माहिती द्यावी.

    ९. उलाढाल, खर्च व नफा यांचा आलेख – उद्योगाला सुरुवात केल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज गुंतवणूकदारांना द्यावा लागतो. यात आपल्याला साधारणपणे पुढील तीन सहामाही (दीड वर्ष) किंवा तीन वर्षात उद्योगाचा होणारा विस्तार दाखवून द्यायचा असतो. यात आपल्या उद्योगाची होणारी एकूण उलाढाल, विक्री व जाहिरात माध्यमांवर होणारा तसेच इतर खर्च वजा करून निव्वळ नफा दाखवून द्यावा लागतो. ही सर्व माहिती एखाद्या तक्त्याच्या किंवा आलेखाच्या स्वरूपात दाखविल्यास त्याचे आकलन करणे सोपे जाते.

    १०. व्यवसायातील महत्त्वाचे टप्पे व त्याची कालमर्यादा – यामध्ये व्यवसायातील महत्त्वाचे टप्पे कोणते असतील आणि ते कधीपर्यंत पूर्ण होतील याची निश्चित कालमर्यादा सांगावी लागते. उदाहरणार्थ, सहा महिन्यात दोन नवीन शाखा काढणार (ठिकाणांसहित), स्वतःची वेबसाईट सुरु करणार, उद्योगातील एखादा विशिष्ट दर्जा/मानांकन प्राप्त करणार इत्यादी.

    ११. सोबत काम करणारे छोटेमोठे ब्रँड – आपल्या बरोबरीने काही छोटे मोठे ब्रँड काम करीत असतील किंवा काही सेवांसाठी आपण एखाद्या उद्योगाशी, संस्थेशी, व्यक्तीशी टायअप केलेले असेल, तर त्यांचासुद्धा उल्लेख आवर्जून करावा. याचा गुंतवणूकदारांवर सकारात्मक प्रभाव निर्माण होतो.

    १२. काम करणारी टीम फोटो व पदासहित – आपल्या व्यवसायामध्ये आपल्याबरोबर काम करणाऱ्या व्यक्तींविषयी आणि त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली आहे याची माहिती करून द्यावी. तसेच त्या व्यक्तींची शैक्षणिक अर्हता, कामाचा अनुभव किंवा एखाद्या विषयात विशेष प्राविण्य मिळवले असेल तर त्याचासुद्धा उल्लेख करावा.

    १३. व्यवसायाचा पत्ता, संपर्क, ईमेल व असल्यास वेबसाईट – यामध्ये आपल्या व्यवसायाचा पत्ता, संपर्क क्रमांक, व्यावसायिक ईमेल आयडी आणि वेबसाईट असल्यास तिचा उल्लेख करावा. तसेच सोशल मिडियावर तुमचे व्यावसायिक पेज किंवा अकाऊंट असल्यास त्याची माहिती द्यावी. तुम्हाला संपर्क करण्यासाठीची सर्व माहिती एकत्रित एकाच ठिकाणी देणे फायद्याचे ठरते.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती
  • स्मार्ट गुंतवणूकदार – मनोगत

    स्मार्ट गुंतवणूकदार – मनोगत

    जगभरातील आर्थिक गणिते कोणत्याही क्षणाला बदलायची ताकद ठेऊन असणारे हे क्षेत्र आहे. हे प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा आहेच, त्यातून पैसे सुध्दा मोठ्या प्रमाणात कमावयचे आहेत; काहीजण कमावत सुध्दा आहेत, मात्र हे शिकावे कुठे? शिकवणारे भेटत नाहीत. यावरचा कोणताही कोर्स (प्रशिक्षण अभ्यासक्रम) नाही. स्वतः शिकायचे तर कोणती पुस्तके वाचायची? डिमॅट अकाउंट काय असते? त्याची गरज काय? ते कसे प्राप्त करावे?

    कोणत्या दिवशी शेअरबाजार उसळी मारणार? कोणत्या दिवशी शेअर बाजार ढासळणार? उसळीतच पैसे कमावता येतात की ढासळीत सुध्दा पैसे कमावता येताता? रुपया-डॉलर यांच्या पडझडीवर वरती शेअर बाजार कितपत अवलंबून आहे? सोने-चांदीच्या तेजी-मंदीचा शेअर बाजारावर काही परिणाम होतो का? जागतिक मंदी कशाने उद्भवते? म्युचुअल फंड म्हणजे काय? SIP (एसआयपी) म्हणजे काय? त्यात गुंतवणूक कशी करायची? कोणत्या कंपन्यांचे शेअर घ्यायचे? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायची कुठे? हा प्रश्न सुध्दा अनुत्तरीत राहतो व सगळेच प्रश्न जागच्या जागी तसेच सगळीच माणसे जागच्या जागी राहतात. सुरुवातीलाच बऱ्याच जणांना आलेल्या अपयशयाच्या अनुभवामुळे बाकीचे लोक सुध्दा या क्षेत्राची धास्ती बाळगून असतात. ‘दुधाने तोंड पोळलं की ताक सुध्दा फुंकून पिण्याची सवय’ या माणसाच्या नैसर्गिक स्वभावातून न्यूनगंड व भीती निर्माण होत असतात, त्यामुळे परत त्या गोष्टीच्या वाटेलाच माणूस जात नाही.

    c33793f4 36bb 42fe a8f2 501d91616d53.jpg

    शेअर बाजारात गुंतवणूकीला सुरुवात करण्याआधी एक समान गोष्ट सगळ्यांना माहिती असावी आणि शेअर बाजार शिकवणारे बरेच प्रशिक्षक ही गोष्ट प्रत्येकाला सुरवातीला सांगतात. एका गावात दोन माणसे येतात. एक गुरु व दुसरा त्याचा शिष्य. गुरु त्या गावकऱ्यांना सांगतो की, या गावात जेवढी माकडे आहेत, ती माकडे पकडून मला आणून दिली की मी प्रत्येक माकड १०० रुपयांना खरेदी करणार आहे. गावातील लोकांना वाटते चला गावात भरपूर माकडे आहेत. पकडायची आणि गुरुला नेऊन द्यायची. गावातील सगळे लोक माकडे पकडतात व गुरुकडून १०० रुपये प्रतिमाकड अशी रक्कम घेऊन जातात. गुरु ती सगळी माकडे एका मोठ्या पिंजऱ्यात ठेवत असतो. त्यांना खायला घालत असतो. गावातील माकडांची संख्या कमी झाल्यामुळे कमी लोक माकडे पकडतात, मग गुरु माकडांची किंमत वाढवून २०० रुपये प्रतिमाकड अशी करतो. गावातील लोकांचा उत्साह परत वाढीस लागतो. उरलेली जवळजवळ सगळी माकडे पकडली जातात. मग गुरु एके दिवशी दुसऱ्या गावाला निघून जातो. तेव्हा शिष्य गावकऱ्यांना बोलावतो व सांगतो की माकडांची किंमत अजून वाढणार आहे. तेव्हा मी तुम्हाला या पिंजऱ्यातली माकडे ५०० रुपयांना एक याप्रमाणे देतो आणि गुरु गावावरुन परत आल्यावर त्यांना ही माकडे १००० रुपयांना एक याप्रमाणे खरेदी करतील; म्हणजे तुमचा फायदाच फायदा होईल. शिष्य सगळ्या गावकऱ्यांकडून ५०० रुपये प्रतिमाकड अशी रक्कम वसूल करतो व एके रात्री गावातून निघून जातो. गावकरी गावात वाट बघत राहतात. गुरु व शिष्य दोघे परत कधीही दिसले नाहीत. आता माकडे परत गावात मोकळेपणाने फिरतात. गावकरी गावातच आहेत. पैसा गुरु व शिष्य यांना मिळाला आहे व दोघेही गाव सोडून गेले आहेत.

    3b15697f bb62 4eea 8dd6 340e99a420b9.jpg

    या गोष्टीत शेअर बाजारात प्रवेश हा १०० रुपयांनी होऊ शकतो. त्याचे २०० रुपये, ५०० रुपये सुध्दा होऊ शकतात आणि १००० रुपयांच्या नादात बरेच नुकसान सुध्दा होऊ शकते. म्हणजेच कोणता शेअर कधी खरेदी करावा? तो कधी विकावा? त्यातून बाहेर कधी पडावे? याचा अंदाज आला की माणूस शेअर बाजारात चांगला खेळू शकतो. पैसे कमावू शकतो. हा खेळ चांगल्या रितीने खेळण्यासाठी या खेळाचे नियम चांगल्या पध्दतीने माहिती असल्यास तो जिंकण्याची जास्त शक्यता निर्माण होते. हा खेळ योग्य रितीने खेळण्याचे कानमंत्र या पुस्तकात आहेत.

  • बिझनेस प्लॅन कसा तयार करावा?

    बिझनेस प्लॅन कसा तयार करावा?

    बिझनेस प्लॅन हे दोन असतात. एक म्हणजे डीपीआर आणि दुसरा म्हणजे बी.पी. यापैकी जो स्वतःला मार्गदर्शन करणारा भाग असतो, त्याला संपूर्ण प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR (Detailed Project Report) म्हणतात. जो इतर कोणालाही सांगायचा नसतो. ते आपल्या व्यवसायाचे रहस्य असते. त्यातून आपला व्यवसाय चालवण्याची पूर्ण व इत्थंभूत माहिती आपल्याला मिळत असते. हे एक प्रकारचे व्यवसाय मार्गदर्शक असते. त्यानुसार आपल्या व्यवसायातील प्रत्येक पाऊल ठरत असते.

    बिझनेस प्लॅन हा स्वतःच बनवला पाहिजे, कारण आपल्या स्वतःइतका तो व्यवसाय कोणीही जाणत नसतो. या बनवलेल्या बिझनेस प्लॅनमध्ये मग सीए, व्यवसाय व्यवस्थापक, आर्थिक सल्लागार यांच्याकडून सुधारणा करुन योग्य ते बदल करावेत. बिझनेस प्लॅन हा व्यवसायाच्या सुरुवातीला बनवला जातो व त्यात वारंवार बदल केले जातात. उदाहरणाद्वारे समजून घ्यायचे असल्यास व्यवसाय हा एक क्रिकेटचा सामना आहे. त्याची वेळ ठरलेली आहे. मात्र सामना चालू झाला की आपण त्याचे धावते समालोचन (Live Commentary) करत/बघत असतो. धावफलक (Score Board) सतत बदलत असतो. हे सर्व बदल सामना चालू असताना त्या त्या वेळीच करायचे असतात. त्याचा आधी फक्त अंदाज लावला जातो व सामना पूर्ण झाल्यावर विश्लेषण (Analysis) केले जाऊ शकते. चालू सामन्यात त्या बदलाची दखल घेणे गरजेचे ठरते. व्यवसायाच्या सुरुवातीला ज्या उद्योजकांनी हा बिझनेस प्लॅन बनवलेला नसतो, त्यांनी आत्ता याक्षणी तो बनवला पाहिजे.

    यातील दुसरा भाग म्हणजेच बी.पी. अर्थात आपला बिझनेस प्लॅन, जो आपण आपल्या गुंतवणूकदारांना, भांडवल पुरवठादार व बँकांना सुरवातीच्या टप्प्यात देत असतो व भांडवल मिळण्याची खात्री देण्यासाठी पहिल्या भागातून म्हणजेच संपूर्ण प्रकल्प अहवालामधून सविस्तर महत्त्व पटवून देत असतो. बिझनेस प्लॅनमधून व्यवसायाची गरज, अपेक्षित ग्राहक, व्यवसायात मिळणारा नफा, होणारा खर्च, विक्री व विपणन (Sales & Marketing), काम करणारी यंत्रणा व मनुष्यबळ, या व्यवसायाशी संबंधित सर्वच बाबींचे चित्र स्पष्ट होत असते. आता प्रत्यक्ष बिझनेस प्लॅन बनवण्याची प्रक्रिया पाहू या.

    बिझनेस प्लॅनमधील पहिला व दुसरा भाग यापैकी आपल्या सोयीनुसार कोणताही भाग आधी बनवायचा. पण शक्यतो दुसरा भाग आधी बनवल्यास पहिला भाग म्हणजे दुसऱ्या भागातील प्रत्येक मुद्द्याचे सविस्तर वर्णन व अंमलबजावणीचे उपाय लिहले जातात किंवा पहिला भाग आधी बनवला तर दुसरा भाग म्हणजे पहिल्या भागाचा सारांश होय. बिझनेस प्लॅनचे टप्पे –

    १. व्यवसायाचे नाव, घोषवाक्य (tagline), संकेतचिन्ह (logo) याचा समावेश व व्यवसायाला साजेशे असे एक चित्र असावे. यामुळे आपल्या व्यवसायाची एक Image/प्रतिमा बिझनेस प्लॅन वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर उभी राहते. त्यामुळे हे बिझनेस प्लॅनचे जसे आपण फर्स्ट इम्प्रेशन म्हणतो तसेच हे सुरुवातीचे दर्शन आहे. यापुढील प्रत्येक टप्प्यात कमीत कमी २ मुद्दे व जास्तीत जास्त ४ मुद्दे लिहावेत.

    २. समस्या – कोणताही व्यवसाय म्हणजे वेळ, श्रम आणि पैसा या तीन गोष्टींची बचत आणि एखाद्या समस्येचे उत्तर यातूनच जन्माला येतो. जर समस्या नसतील तर व्यवसाय निर्माण होत नाही. उदा. चेहरा कोरडा/काळा असणे ही समस्या, तर त्यावर लावण्याचे मलम (cream) हा त्यावरचा उपाय झाला. म्हणजे एखाद्या समस्येचे उत्तर देणाऱ्या प्रक्रियेला व्यवसाय म्हणतात.

    ३. उपाय – समस्या ही जोपर्यंत समस्या आहे, तोपर्यंत तिचे व्यवसायात रुपांतर होत नाही. याउलट समस्येवरचा उपाय शोधून काढणे म्हणजे व्यवसाय होय. त्या समस्येचे कोणते उपाय आपल्या व्यवसायामुळे शोधले जातात. यावर दोन–चार मुद्दे यात समाविष्ट करावेत.

    ४. अपेक्षित ग्राहकवर्ग – प्रत्येक व्यवसायात (B2B किंवा B2C) ग्राहक असला तरच तो व्यवसाय चालतो. म्हणून आपल्याला आपला ग्राहक ओळखता आला पाहिजे. आपल्या कार्यक्षेत्रानुसार, ग्राहकाच्या खरेदीक्षमतेनुसार व आपल्या विक्री किंमतीनुसार आपला ग्राहक व त्यातून होणारी वर्षभराची अपेक्षित उलाढाल याचे गणित या टप्प्यावर केले जाते. महिलांसाठी सौंदर्यप्रसाधने बनवणाऱ्या उद्योगाचा अपेक्षित ग्राहक वर्ग हा ११-४५ वयाच्या महिला हा असतो.

    यात परत दोन उपप्रकार पडतात. आपण ज्या प्रकारची उत्पादने उत्पादित करत असतो, त्या सर्व उत्पादनासाठी उपलब्ध असलेल्या बाजारपेठेतील ग्राहकवर्ग हा पहिला अपेक्षित ग्राहकवर्ग आहे. मात्र हा एकूण मार्केटचा ग्राहकवर्ग असतो. त्या संपूर्ण मार्केटमधील आपल्या स्वतःच्या उत्पादनाचा ग्राहक वर्ग किती? त्यातून मिळणारा आपला मार्केटशेअर (बाजारातील वाटा) किती? व आपला नफा किती? आपली उलाढाल किती? हे यात दर्शविता आले पाहिजे. हे वेगवेगळ्या आलेखाच्या साहाय्याने दाखवता येते.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती
  • बिझनेस प्लॅन जरुरी आहे का?

    बिझनेस प्लॅन जरुरी आहे का?

    विकसनशील देशातील युवक हे व्यवसायासाठी मदत शोधण्यात आपली युवावस्था संपवून टाकतात, पण त्यांना अशा प्रकारची मदत मिळत नाही. मागास देशात युवकांकडे किंवा ४० वर्षे ओलांडलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या माणसांकडे पैसे व व्यवसाय करण्याची इच्छा नसते.

    तारुण्याच्या उंबरठ्यावर माणसाचे रक्त गरम असते. काहीतरी करुन दाखवण्याची इच्छा त्याला गप्प बसू देत नसते. त्याच्या डोक्यात सतत नवनवीन संकल्पनाचा जन्म होत असतो. त्या कल्पना साकारण्याची त्याची तयारी असते. त्यासाठी लागेल ती जोखीम पत्करण्यासाठी तो तयार असतो. या तारुण्यातील उर्जेला आपण ‘पतंगा’ची ऊर्जा म्हणू या. कारण दिव्याभोवती रात्रीच्या अंधारात पतंग फिरत असतात. त्या पतंगांना दिव्याच्या ज्योतीकडे झेप घेण्याची इच्छा अनावर होत असते. ते स्वतःला रोखू शकत नाहीत किंवा रोधू शकत नाहीत. त्यांना माहित असते की आपण दिव्याच्या ज्योतीवर झेप घेतल्यास आपले पंख जळून आपण मरणार आहोत.

    प्रसंगी हे पतंग त्या ज्योतीकडे झेपावतात व आपले पंख जाळून मरुन जातात. मृत्यूची भीती त्यांना शिवत नाही. त्याचप्रमाणे नव्या उमेदीचा तरुण ह्या पतंगासारखा संकटावर झेपावण्यासाठी आतुर झालेला असतो, आसुसलेला असतो. अशावेळी त्याच्या कल्पनेला साकार करण्यासाठी लागणारे भांडवल व बाकी गोष्टी मिळाल्या तर तो यशाच्या शिखरावर फार वेगाने आरुढ होतो.

    वयाची ४०-४५-५० वर्षे पार केलेली माणसे गाठीशी चांगला पैसा बांधून असतात. त्यांची उमेद कमी झालेली असते, जोखीम पत्करण्याची वृत्ती संपत आलेली असते. त्यांनी हे पैसे जर तरुण वर्गाला भांडवल म्हणून दिले, तर त्यांनाही त्याचा भरघोस फायदा होतो व नवे व्यवसाय वेगाने वाढतात. ज्यांच्याकडे (टाटा, अंबानी सारखे मोठे उद्योजक, सचिन सारखे खेळाडू व अमिताभ सारखे कलाकार) भरपूर पैसे असतात अशा लोकांना चांगल्या तरुणांची गरज असते. ते आपले पैसे नवीन व्यवसायात गुंतवण्यास उत्सुक असतात. मात्र त्यांच्याकडे फार कमी वेळ असतो. अशा लोकांना अगदी ५-७ मिनिटांत संपूर्ण व्यवसाय (गुंतवणूक, ग्राहक, नफा इ.) प्रभावीपणे समजावून सांगणारा तरुण बाजी मारुन जातो. त्याला भरपूर पैसे मिळतात. असे पैसे प्राप्त करण्यासाठी प्रभावी बिझनेस प्लॅन बनवणे अत्यंत महत्त्वाचे असते.

    प्रगत देशात (अमेरिका, इंग्लड, जर्मनी, फ्रान्स व जपान) युवक आपल्याकडे असलेल्या कल्पनेत उतरवण्यासाठी भांडवलाच्या शोधात असताना ते वर्तमानपत्रात त्यांच्या डोक्यात असलेल्या संकल्पनेबाबत जाहिरात देतात व ज्यांच्याकडे पैसा आहे अशा व्यक्तींनी ती संकल्पना विकत घ्यावी म्हणून लिलाव करतात किंवा त्या संकल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी लागणारे भांडवल मागण्यासाठी प्रस्ताव ठेवतात. त्यातून नवी भागीदारी व गुंतवणूक करवून घेतात.

    १. व्यवसायाचे नाव, घोषवाक्य (tagline), संकेतचिन्ह (logo) याचा समावेश व व्यवसायाला साजेसे असे एक चित्र असावे.
    २. समस्या
    ३. उपाय
    ४. अपेक्षित ग्राहकवर्ग
    ५. स्पर्धक
    ६. स्पर्धकाच्या तुलनेत असणारी तुमची वैशिष्टे (USP)
    ७. लागणारे भांडवल व त्याचा उपयोग
    ८. विक्री व जाहिरात माध्यमे
    ९. उलाढाल, खर्च व नफा यांचा आलेख
    १०. व्यवसायातील महत्त्वाचे टप्पे व त्याची कालमर्यादा
    ११. सोबत काम करणारे छोटेमोठे ब्रँड
    १२. काम करणारी टीम फोटो व पदासहित
    १३. व्यवसायाचा पत्ता, संपर्क, ईमेल व असल्यास वेबसाईट

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती
  • कार्यक्षेत्र कसे ठरवावे? – व्यवसाय लोकल ठेवायचा कि ग्लोबल करायचा हे कसं ठरवावं.

    कार्यक्षेत्र कसे ठरवावे? – व्यवसाय लोकल ठेवायचा कि ग्लोबल करायचा हे कसं ठरवावं.

    आपला व्यवसाय वस्तूवर आधारित असल्यास कार्यक्षेत्र ठरविण्याची पध्दत आपण पाहूया. उत्पादित केलेल्या वस्तूची टिकवणक्षमता म्हणजेच तिचा कार्यकाल पूर्ण होण्याच्या आत अंतिम ग्राहकाला त्या वस्तूचा वापर करण्यासाठी वेळ मिळावा याची दक्षता घेणे अत्यंत जरुरीचे असते किंवा त्या वस्तूंची टिकवणक्षमता वाढवण्याचे उपाय शोधून काढल्यास कराव्या लागणाऱ्या प्रक्रिया करणे गरजेचे ठरते. उदाहरण द्यायचे झाल्यास कच्चे दूध हे जास्तीत जास्त २४ तासाच्या आत ग्राहकापर्यंत पोहोचणे गरजेचे असते तरच ते वापरात आणता येते. याउलट या दूधाचे पाश्चरित दूधात रूपांतर केल्यास हा कालावधी १८० दिवसांपर्यत वाढवता येतो. या वाढलेल्या टिकवण क्षमतेमुळे ते अधिकाधिक दूरवरच्या ठिकाणांपर्यंत पोहोचवणे शक्य होते.

    वाहतूक व्यवस्थेच्या उपलब्धतेवरही वस्तूचे कार्यक्षेत्र ठरवले जाते. दूरवर ग्रामीण भागात वाहतूक व्यवस्था म्हणावी तेवढी सुलभ नसते किंवा परदेशात वस्तू पाठवण्यासाठी वाहतुकीवर होणारा खर्च हा प्रचंड असतो. अशावेळी आपल्या वस्तूंची वाहतुकीवर आधारित कार्यक्षेत्रे निवडणे आवश्यक आहे. वाहतुकीत उत्पादने खराब होण्याच्या प्रमाणावरुनही याचा अभ्यास केला जाऊ शकतो. वेगवेगळ्या प्रदेशातील ग्राहकांच्या अभिरुचीवरुनही कार्यक्षेत्रात बदल करणे आवश्यक असते. उदा. तलम कपडे तयार करणाऱ्या व्यवसायाची गरज उष्ण कटिबंधीय प्रदेशात, तर उबदार कपडे हे थंड प्रदेशात विकले जाऊ शकतात. कार्यक्षेत्र हे ऋतुमानानुसारही बदलते. सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असणारे मनुष्यबळ (Working force) हेही कार्यक्षेत्र ठरवताना लक्षात घेणे गरजेचे आहे.

    सेवा (services) साठी कार्यक्षेत्र हे फार व्यापक असू शकते. आयटी उद्योगातील सेवा जगातील सर्वठिकाणी घरबसल्या पोहोचवता येतात व त्याचे मूल्यही घरबसल्या मिळवता येते. तर कुरिअर सेवेसाठी वाहतूक व्यवस्थेशी असणारी आपली समरसता ही महत्त्वाची ठरते. हॉटेल उद्योगासारख्या सेवांसाठी जागेची गरज लागते म्हणून या सेवांचे कार्यक्षेत्र मर्यादित असते. यावर मात करण्यासाठी त्याच्या अनेकानेक शाखा उघडणे हे फायदेशीर ठरते. टेलिमार्केटिंग सारख्या सेवांवर अंतराचा काही परिणाम होत नाही.

    आपल्या उत्पादनानुसार (वस्तू/सेवा) टिकवणक्षमता, प्रक्रिया, वाहतूक, वाहतुकीदरम्यान होणरी नासाडी, ग्राहकांची अभिरुची, ऋतुमान, आपल्याकडे असणारे मनुष्यबळ व आपली उत्पादनक्षमता या गोष्टींचा सारासार विचार करुन गल्ली, प्रभाग, गाव-खेडे, शहर, तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, देश, खंड किंवा अगदी जगभरात सर्वत्र असे कार्यक्षेत्र ठरवणे आवश्यक असते. प्रत्येक उद्योजक हे कार्यक्षेत्र ठरवतो. माल उत्पादित करतो, ग्राहकांपर्यंत वेळेत पोहोचवतो व नफा मिळवतो. सुरुवातीच्या टप्प्यावर जे आपले कार्यक्षेत्र असते त्यापेक्षा ते वाढवत नेणे हे त्या उद्योगाच्या वाढीसाठी लागणारे इंधन आहे.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती
  • उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी

    उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी

    उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी खालील १० गोष्टी लक्षात ठेवा.

    १. आर्थिक सुरक्षिततेची योजना तयार करा.

    २. पुढे कोणती पावले उचलायची आहेत याची माहिती मिळवा.

    ३. अशी बिझनेस आयडिया शोधून काढा जी यशस्वी होईल.

    ४. चांगल्या मार्गदर्शक किंवा सल्लागाराची मदत घ्या

    ५. यशस्वी होण्यासाठी ध्येयधोरणे आखा.

    ६. आत्मविश्वास वाढवा.

    ७. चांगले सहकारी तयार करा.

    ८. भविष्यातील ध्येय स्पष्ट असू द्या.

    ९. मोठी स्वप्नं बघा.

    १०. संपूर्ण प्रवासाची ब्लूप्रिंट (आराखडा) बनवा.

    या सर्व गोष्टींची गरज तुम्हाला सुरुवातीलाच पडणार नाही, पण उद्योजकतेचा प्रवास जसजसा पुढे सरकेल, यातील प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणे तुम्हाला गरजेचे आहे.

    तथापि हा प्रवास तितकासा सोपा असणार नाही. तुम्हाला एकटं वाटू शकतं. तुम्ही रात्रंदिवस मेहनत करून छोट्या छोट्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करत असता, पण वारंवार येणाऱ्या अपयशामुळे मध्येच सोडून देण्याचा विचार तुमच्या मनात येऊ शकतो.

    Tips for Successful Entrepreneurship

    बरेच उद्योजक व्यवसायाच्या सुरुवातीलाच जोखीम घेतात. थोडेफार यशस्वी होतात, परंतु त्यानंतर व्यवसाय विकासासाठी जोखीम घेणं थांबवतात. नवीन संधींचा शोध घेत नाहीत. फक्त आहे तो व्यवसाय टिकवण्यावर भर देतात. कल्पना करा तुम्ही एखाद्या डोंगरावर गिर्यारोहणासाठी जात आहात. सुरुवातीला तुम्ही खूप आनंदात असता. आपण काहीतरी नवीन करतोय याची वेगळीच मजा आणि उत्सुकता तुमच्या मनात असते, पण चढण जशी अधिक कठीण होत जाते, तुम्ही चालताना मध्येच अडखळू लागता (बहुतांशी लोकांच्या बाबतीत हेच होतं). तुम्हाला पुढे जायचं असतं, पण जाता येत नाही आणि एवढ्या लांब जाऊन रिकाम्या हाताने परत आला म्हणून लोकं नावं ठेवतील या भीतीने माघारी जाऊ शकत नाही, अशा द्विधा मनस्थितीत तुम्ही अडकलेले असता.  

    या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि तुमच्या मदतीसाठी आणि तुम्हाला नवीन संधीचं दार उघडून देण्यासाठी एखादा चांगला मार्गदर्शक/प्रशिक्षक उपयुक्त ठरू शकतो.

  • व्यवसाय कोणता ?- व्यवसाय करायचा म्हणजे स्वतःची फॅक्टरी पाहिजे, दुकान पाहिजे या कल्पना आता मागे पडत चालल्या आहेत.

    व्यवसाय कोणता ?- व्यवसाय करायचा म्हणजे स्वतःची फॅक्टरी पाहिजे, दुकान पाहिजे या कल्पना आता मागे पडत चालल्या आहेत.

    आपला अनुभव, आपल्या आवडी, आपले ज्ञान व कसब, उपलब्ध असणारी मानवी संसाधने, कच्चा माल व आपली काम करण्याची क्षमता व इतर बाबींचा विचार करुन कोणता व्यवसाय करावा? यासाठी पुढे दिलेल्या माहितीचा उपयोग आपल्याला होईल.

    तर सेवा पुरवण्यासाठी त्या त्या सेवेनुसार अनेक घटकांची गरज असते. समजा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वेबसाईट तयार करण्याचा व्यवसाय करायचा असेल, तर फार घटकांची आवश्यकता नाही. याउलट एखादा पर्यटनविषयक व्यवसाय करायचा असेल तर गाड्या, मार्गदर्शक, राहण्याची व्यवस्था अशा सर्व सोयींची गरज पडेल. त्यासाठी त्या सर्व गोष्टी स्वतःच्या असणे आवश्यक नाही, त्या तुम्ही आउटसोर्स करु शकता. तसे तुमचे नेटवर्क असणे अत्यावश्यक आहे. वेगवेगळ्या सेवानुंसार लागणाऱ्या गोष्टींची माहिती घेणे उपयुक्त ठरते.

    उबर या जगातील सर्वात मोठ्या टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडे स्वतःची एकही टॅक्सी नाही. फेसबुक या जगातील सर्वात मोठ्या व लोकप्रिय सोशल मिडीया कंपनीकडे स्वतःचे एक अक्षरही लेखन नाही. अलिबाबा या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनीकडे एक खिळासुध्दा स्टॉकमध्ये नाही. एअरबीएनबी (Airbnb) या जगातल्या सगळ्यात मोठ्या भाड्याची घरे पुरवणाऱ्या कंपनीकडे स्वतःचे एकही घर नाही.

    ॲपल या जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन व टॅबलेट बनवणाऱ्या कंपनीची स्वतःची फॅक्टरी नाही. व्हॉट्सॲप या दिवसातून कोट्यावधी संदेशांची देवाणघेवाण करणाऱ्या कंपनीकडे स्वतःचा सर्व्हर सुध्दा नाही. नाइकी या जगातील आघाडीच्या पादत्राणे बनवणाऱ्या कंपनीचा स्वतःची कोणताही कारखाना नाही.

    वरील सर्व उदाहरणांवरून असे लक्षात येते की, एकदा कोणता व्यवसाय करायचा हे ठरवल्यानंतर सर्व गोष्टी स्वतःच्या असणे गरजेचे नाही. त्या स्वतःच्या असतील तर उत्तमच पण नसतील तर काळजी नसावी. उद्योजक हा नेहमी सर्व उपलब्ध वस्तूंचा योग्य ताळमेळ घालून उत्तम वस्तू व सेवा निर्माण करणारा एक तरबेज माणूस असतो. कारण व्यवसाय करायचा म्हणजे स्वतःची फॅक्टरी पाहिजे, दुकान पाहिजे, भांडवल या कल्पना आता मागे पडत चालल्या आहेत.

    लोकांची गरज ओळखा, ती पुरवणारी संकल्पना किंवा वस्तू शोधून काढा. Outsourcing व Out sharing सारख्या तंत्राचा उपयोग करुन, निरनिराळ्या एजन्सींना आपल्यासोबत घ्या. मार्केटिंगवर जास्तीत जास्त भर देणे. ग्राहकांना उत्तम सेवा देणे. प्रामाणिक व पारदर्शी व्यवहार ठेवणे, आपल्याबरोबरच, आपल्याबरोबर काम करणाऱ्या संस्थांचा विकास करणे, आंतरराष्ट्रीय बाजारात शिरकाव करणे हे नवीन व्यवसायाचे मंत्र आहेत. कल्पना तुमची, पैसा दुसऱ्याचा हे तत्त्व चालते.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती
  • व्यवसाय विषयक सल्ला उठसुठ कोणालाही विचारू नका अशाच लोकांचा सल्ला घ्या, जे त्याची योग्य उत्तरे देतील

    व्यवसाय विषयक सल्ला उठसुठ कोणालाही विचारू नका अशाच लोकांचा सल्ला घ्या, जे त्याची योग्य उत्तरे देतील

    व्यवसाय हा स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळला, जपला व वाढवला पाहिजे. म्हणजे त्याला लागेल ते सर्व काही पुरवायची तयारी ठेवली पाहिजे. वेळप्रसंगी काही कठोर निर्णय घेता आले पाहिजेत. मात्र व्यवसाय हा त्याच्या System प्रमाणे आपोआप चालत नाही तोपर्यंत त्याची काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर तो वेगाने वाढत जातो.

    आपल्या आवडीचे काम करावे किंवा जे काही करतो आहे त्यामध्ये आवड निर्माण करावी, अन्यथा आपले आयुष्य हे केवळ इतरांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या कामाचे बनून जाते. हेच तत्त्व व्यवसाय करताना लागू होते. आपल्या आवडीच्या क्षेत्रात व्यवसाय करावा किंवा आपण जो व्यवसाय करतो त्यात आवड निर्माण करावी म्हणजे व्यवसाय हा आनंद देईल. त्यात तोचतोचपणा किंवा रटाळपणा जाणवणार नाही, त्यामुळे कायम झोकून देऊन काम करण्याची आपली तयारी होते. इतरांना अवघड वाटणारी अनेक काम आपण सहजपणे कधी करुन जातो, ते आपल्या लक्षातसुध्दा येत नाही.

    मानसिकता निर्माण करण्याचा व टिकवण्याचा अजून एक उपाय म्हणजे व्यवसायविषयक सल्ला ऊठसूट कोणालाही विचारु नका. फक्त तज्ज्ञ व जाणकार मंडळीकडून हा सल्ला व मार्गदर्शन घ्यावे. नकारात्मक लोकांपासून दूर रहावे. याचे कारण कित्येक लोकांना काहीही माहित नसताना तू व्यवसाय करु नको तुला जमणार नाही असे फुकटचे सल्ले देण्याची सवय असते किंवा काही लोक तुम्हाला नोकरीचे महत्त्व पटवून देण्यासाठीच केवळ बोलत असतात.

    एका इंजिनियर मुलाने नुकताच फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला होता. त्याच्या आईने तिच्या मैत्रिणीला त्या मुलाची ओळख करुन देताना त्याने फोटोग्राफीचा व्यवसाय सुरु केला असल्याचे सांगितले. तेव्हा त्या मैत्रिणीने त्या मुलाला तू हा व्यवसाय करु नको ह्यात काही भविष्य नाही असा फुकटचा सल्ला दिला. त्या मुलाने विचारले की “याचे कारण काय? तुम्ही हे कशावरुन सांगत आहात?” त्या मुलाला मिळालेले उत्तर असे होते की, “माझ्या भाच्याने हा व्यवसाय सुरु केला व काही फायदा नाही म्हणून बंदही करुन टाकला व तू तर इंजिनियर असून हा व्यवसाय का करतोस? तुला एखादी चांगली नोकरी मिळू शकेल.” या प्रसंगामध्ये सल्ला देणाऱ्या व्यक्तीचा व व्यवसायाचा दूरदूरपर्यंत काही संबंध नव्हता. शिवाय अमुक एक व्यक्ती अपयशी झाला म्हणजे जगात कोणीच यशस्वी होणार नाही हा समज चुकीचा आहे. जगात जेवढ्या यशोगाथा आहेत त्याहून अधिक अपयशाच्या कथासुध्दा आहेत. आपण यशस्वी माणसांकडून योग्य दिशा घेऊन तसेच अपयशी लोकांकडून संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रगती करणे गरजेचे असते. आपण स्वतःच्या व्यवसायाबद्दल जेवढे जाणतो तेवढे जगातला कोणताही तज्ज्ञ जाणत नाही. म्हणून व्यवसायविषयक सल्ला घेताना अशा लोकांचा सल्ला घ्यावा की जे तुम्हाला त्याची योग्य उत्तरे देतील. पुढे जाण्याचे चांगले मार्ग सांगतील किंवा त्यांच्याकडे उत्तर नसले तर तुम्हाला हतोत्साहित करणार नाहीत. तुमच्या मार्गातील अडथळे व धोके समाजावून सांगतील व त्यावरचे उपायही सांगतील अशाच लोकांचा सल्ला घ्यावा.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती
  • व्यवसायाच्या वाटेवर चालताना – सुरुवात करण्यापूर्वी काय?

    व्यवसायाच्या वाटेवर चालताना – सुरुवात करण्यापूर्वी काय?

    असे प्रश्न दररोज विचारले जातात. ह्या प्रश्नाचे सहज सोपे उत्तर असते, पण विचार करण्याची कला अवगत नसल्याने किंवा तिची ओळख नसल्याने हे प्रश्न अवघड वाटतात. शिवाय ह्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे सुरूवातीच्या टप्प्यावर निराशा येते. काय करावे ते सुचत नाही, कुणाकडे उत्तर मागावे ते कळत नाही. आता ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची कला आपण जाणून घेऊ या.

    प्रत्येक व्यक्तीची जडणघडण ही त्या व्यक्तीला लाभणारे सामाजिक वातावरण, सहवासात येणारी माणसे, घेतलेले शिक्षण, वाचलेली पुस्तके, ऐकलेली भाषणे व चर्चा, आयुष्यात आलेले प्रसंग व वरील सर्व घटनांना त्या व्यक्तीने दिलेला प्रतिसाद याद्वारे झालेली असते. त्यामुळे प्रत्येकाचे एक वेगळे व्यक्तिमत्व, एक वेगळी विचारसरणी तयार झालेली असते. अशा वेळी कोणत्या व्यक्तीने कोणता व्यवसाय करावा हे प्रत्येक व्यक्तीप्रमाणे बदलत जाणारे समीकरण आहे. आता सगळ्यांना समर्पक असे एक उत्तर शोधण्याची प्रक्रिया चालू होते.

    पहिल्यांदा एक गोष्ट मनावर कोरुन ठेवली पाहिजे की, प्रत्येक प्रकारचा व्यवसाय हा अतिशय उत्कृष्ट पध्दतीने करता येतो. त्यातून हवा तेवढा नफा मिळवता येतो. त्याचा ब्रँडही बनवता येतो. वडापावचे दुकान (मॅकडोनाल्ड, जंबोकिंग), चहाकॉफीचा ठेला (कॅफे कॉफी डे, बरिस्ता, स्टारबक्स), शिकवण्या घेणे (बायजूज, स्टडी सर्कल, चाटे कोचिंग) अशी काही उदाहरणे देता येतील. अगदी एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही, तर आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रापुरता व्यवसाय वाढवता येतो. ‘व्यवसाय कोणता करावा?’ हे अनुभव, आवडी, तुमची जोखीम घेण्याची क्षमता यावरुन ठरवावे लागेल. एखाद्याला शेत कसले असते हे माहित नसताना जाऊन नांगरणीपासून ते माल बाजारात विकेपर्यंतची प्रक्रिया समजून घेण्यात व अंमलात आणण्यात किती वेळ लागेल हे तुमच्या लक्षात येईल. त्याऐवजी ज्याचे बालपण शेतीत गेले आहे, ज्याने ह्या सर्व प्रक्रिया बघितल्या आहेत, त्याला थोडासा वेगळा विचार करुन, आधुनिक पध्दती वापरुन शेती करणे व मोठ्या प्रमाणात नफा मिळवणे सोपे आहे. शेकडो तरुण शेतकऱ्यांच्या यशोगाथा पाहिल्यावर हे सहज समजून येते.

    डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रज्वलित मने या पुस्तकातील एक उतारा – “आपण कसे आहोत याचा विचार माणूस करतो आणि नेमका तसाच घडतो. मी काहीही करु शकत नाही असा विचार केला, तर माझी काही करायची कार्यक्षमताच लोप पावते. तेच जर मी काहीही करु शकतो असा विचार मी मनाशी केला, तर माझी सुरवातीला ते करायची कार्यक्षमता नसली तरी ते मी करु शकतो.”

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

    आणखी वाचा