ज्या कुंकवाशिवाय भारतीय सण आणि सौभाग्य पूर्ण होत नाही, ते कुंकू नक्की येतं कुठून? तुम्हाला वाटेल एखाद्या मोठ्या फॅक्टरीतून… पण नाही! सोलापूर जिल्ह्यातील केम या गावात गेलं तर तुम्हाला रस्त्याच्या दुतर्फा लाल रंगाची उधळण दिसेल. हे गाव म्हणजे ‘कुंकवाचं गाव’ म्हणून ओळखलं जातं. चला, या लाल रंगाची रंजक गोष्ट पाहूया!
केम गावातील कुंकू हे त्याच्या गडद लाल रंगासाठी आणि मखमली पोतासाठी प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे, या गावात वर्षानुवर्षे पारंपारिक पद्धतीने कुंकू बनवण्याचे काम घरोघरी चालतं. हळकुंड, चुना आणि ठराविक तापमानाची प्रक्रिया यातून हे नैसर्गिक कुंकू तयार होतं.
केममध्ये तयार होणारं कुंकू केवळ महालक्ष्मी मंदिर किंवा तुळजाभवानी मंदिरच्या चरणी जात नाही, तर ते परदेशातही निर्यात होतं. या एका गावामुळे हजारो कुटुंबांना रोजगार मिळाला असून, कुंकू उत्पादनात या गावाने आपली मक्तेदारी निर्माण केली आहे.
हे काम दिसायला जितकं रंगीन आहे, तितकंच कष्टाचं आहे. वाळवणे, दळणे आणि ते हाताने चाळणे यामध्ये या गावातील महिलांना बरेच कष्ट सोसावे लागतात. सणासुदीच्या काळात तर केमच्या रेल्वे स्टेशनवरून रोज कुंकवाची हजारो पोती देशोदेशी रवाना होतात.
तुम्ही कधी केमचं कुंकू वापरलंय का? किंवा तुमच्या गावाची अशीच काही खासियत आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा!
जर तुम्ही नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय शोरूममध्ये जाऊ नका! कारण महाराष्ट्र सरकारच्या ‘ईव्ही पॉलिसी २०२५’ मुळे तुमचे लाखो रुपये वाचणार आहेत. टू-व्हीलरपासून ते थेट ट्रॅक्टरपर्यंत भरपूर सबसिडीचा मिळतेय आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे— आता एक्सप्रेसवेवर टोल सुद्धा माफ होणार आहे! चला, ‘नवी अर्थक्रांती’ मध्ये या ईव्ही क्रांतीचं सत्य जाणून घेऊया.
सरकारने २०२५ ते २०३० साठी असा प्लॅन बनवलाय की ज्यामुळे तुम्ही पेट्रोल गाडी घेण्याचा विचारही करणार नाही!
टू-व्हीलर: नवीन इलेक्ट्रिक स्कुटर घेतली, तर १०,००० रुपयांपर्यंत थेट सबसिडी. ई-कार: जर तुम्ही फॅमिली कार घेतली, तर चक्क १.५ ते २ लाख रुपयांपर्यंत सबसिडी तुमच्या खात्यात जमा होणार! ई-ट्रॅक्टर आणि हार्वेस्टरवर सुद्धा १.५ लाखांपर्यंत सवलत दिली जात आहे. सार्वजनिक वाहतूक: ई-बसवर तर तब्बल २० लाखांचा फायदा!
आणि सर्वात महत्त्वाचं… सर्व इलेक्ट्रिक गाड्यांना रोड टॅक्स (Road Tax) आणि रजिस्ट्रेशन फी मधून १००% माफी! म्हणजे गाडी घेताच तुमचे लाखो रुपये वाचले.”
“आतापर्यंत लोक म्हणायचे, ‘ईव्ही घेतली तर लांबच्या प्रवासाचं काय?’ पण आता टेन्शन सोडा! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्ग आता ‘सस्टेनेबल मोबिलिटी कॉरिडॉर’ बनले आहेत. याअंतर्गत दर २५ किमीवर हाय-स्पीड चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. आणि हो, ई-गाड्यांना या प्रमुख एक्सप्रेसवेवर आता टोल माफी मिळण्याचे संकेत आहेत, ज्यामुळे तुमचा प्रवास प्रदूषणमुक्त आणि विनामूल्य होईल!
गाडी चार्ज कुठे करायची? याचं उत्तर आता तुमच्या सोसायट्यांमध्येच मिळेल. कारण नवीन नियमानुसार, प्रत्येक नवीन गृहनिर्माण सोसायटीमध्ये १००% पार्किंग ईव्ही-रेडी असणं आता बंधनकारक आहे. जुन्या बॅटरीचं प्रदूषण होऊ नये म्हणून मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये विशेष ‘रिसायकलिंग हब’ तयार होत आहेत. इतकंच नाही, तर महाराष्ट्रात नवनवीन ईव्ही तंत्रज्ञान विकसित व्हावं म्हणून सरकारने १५ कोटींचा स्वतंत्र R&D फंड देखील मंजूर केलाय!
२०३० पर्यंत महाराष्ट्रात विकल्या जाणाऱ्या किमान ३०% नवीन गाड्या इलेक्ट्रिक असाव्यात, हे सरकारचं टार्गेट आहे. सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला गाडी विकत घेतानाच डीलर तो लाभ मिळवून देतो किंवा मग https://mhevpolicy.in पोर्टलवर अर्ज करून तुम्ही सबसिडी क्लेम करू शकता .
तुमची पुढची गाडी पेट्रोल घेणार की इलेक्ट्रिक? कमेंट्समध्ये तुमचं प्रामाणिक मत नक्की सांगा!
ही माहिती तुमच्या त्या मित्राला पाठवा जो नवीन गाडी घेण्याच्या विचारात आहे. अशाच जबरदस्त अपडेट्ससाठी ‘नवी अर्थक्रांती’ ला आत्ताच फॉलो करा!
काही लोकांना ‘नजर’ असते, काही लोकांना फक्त ‘दिसतं’, तर काही लोक असे असतात, ज्यांना काळाच्याही पुढे पाहण्याची ‘दृष्टी’ असते आणि, म्हणूनच ते समाजात ‘वेगळे’ ठरतात. अशीच दृष्टी असणाऱ्या एका यशस्वी “डॉक्टर”ची ही प्रेरक कहाणी…माकेगाव (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील एका गरीब घरात जन्मलेला डॉक्टर दहाजणांचं कुटुंब, आईवडील शेतमजूर,अशी प्रतिकूल परिस्थिती. दहावीपर्यंत चार महिन्यांपेक्षा जास्तकाळ शाळेतच न जाताही, दहावीला जिल्ह्यात पहिला.गावाला येण्यासाठी लाल डब्याची गाडी नव्हती. म्हणून याला रोज १४ किमी पायी जावे लागले. या डॉक्टरला एका कंडक्टरच्या घरी राहून महाविद्यालयीन शिक्षण घ्यावे लागले.
या डॉक्टरला महिन्याला ३० रुपये मजुरीसाठी रोज खांद्यावर कावड घेऊन २५ खेपा असे ५० घागरी पाणी आणावे लागले.या डॉक्टरला MBBS ला ॲडमिशन घेतल्यावर वसतिगृहातील ७ मुलांचा रोज स्वयंपाक करावा लागला. का? तर जेवण फुकट मिळायचे म्हणून..
अथक परिश्रम करून तो एक नेत्रतज्ज्ञ बनला…
१९९१ साल उजाडलं या डॉक्टरच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या डॉक्टरांनी एका वर्षांतच तुम्ही मरणार असे भाकीत केलं आईनं अंजनाबाईनं स्वत:ची किडनी दिली. पुनर्जन्म मिळाला. आणि पुढील आयुष्य रुग्णांच्या सेवेसाठी व्यतीत करायचं हा निर्णय त्याने घेतला आजवर या अवलिया डॉक्टरने सव्वा कोटींवर रुग्णांची तपासणी केली आहे. तर, त्यापैकी दीड लाख वृद्धांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या. जन्मत: अंध असलेल्या १० हजार रुग्णांच्या आयुष्यात नवचैतन्याचे रंग भरण्याचं काम केलं. एक लाख शस्त्रक्रिया केल्याबद्दल या डॉक्टरचा ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरव करण्यात आला असा हा अवलिया डॉक्टर म्हणजे डॉ. तात्याराव लहाने.
मुंबईतील जे.जे. रुग्णालयात त्यांचे काम चालत असले तरी विविध शिबीरांच्या निमित्ताने त्यांनी अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला. आनंदवन येथे डॉ. बाबा आमटे यांच्या पुढाकाराने झालेल्या शिबीरातून त्यांनी दुर्गम भागातील अनेक मोतीबिंदू झालेल्या आदिवासी बांधवांनाही दृष्टी दिली.
तळातील कष्टकरी तसेच हायप्रोफाईल व्यक्तींवरही त्यांनी यशस्वी उपचार केले. बारामतीतील शिबीरात एक एडसग्रस्त व्यक्ती होती, तिच्यावर कोणीच उपचार करायला तयार नव्हते, त्या व्यक्तीची खाजगी रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया करुन घेण्याची परिस्थितीही नव्हती. लहाने यांनी त्याला तपासून लगेचच शिबीरात दाखल करुन त्याच्यावर शस्त्रक्रीया केली, त्याला दिसू लागले.
६६७ वैद्यकीय शिबिरांमधून तीस लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार आणि १८० हून अधिक शिबिरांमधून एक लाख ३० हजार रुग्णांना दृष्टी देणाऱ्या शस्त्रक्रिया एवढे अफाट काम त्यांनी केले. लातूरमधील मकेगावसारख्या लहानशा खेडयातून मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता, आरोग्य विभागाचे सहसंचालक या पदापर्यंतचा त्यांचा प्रवास सारं काही सांगणारा आहे. नुकतेच डॉ. लहाने ३६ वर्षांच्या शासकीय सेवेनंतर निवृत्त झाले.
प्रतिकूल परिस्थितीतही आपले ध्येय गाठणारा एक ध्येयवादी म्हणून डॉ. लहानेंचं नाव घेता येईल. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.
स्पर्धेच्या युगात जागच्या जागी टिकून राहण्यासाठी प्रचंड वेगाने धावायची गरज आहे. आहे तिथे टिकून राहण्यासाठी प्रत्येकाला अतिशय वेगाने धावणे अपरिहार्य बनले आहे. कारण प्रत्येकाची स्पर्धा जगातील प्रत्येकाबरोबर आहे. अशा वेळी व्यवसायात उतरणाऱ्या प्रत्येक बिझनेसमनला स्मार्ट पध्दतीने जगाच्या पटलावर वावरावे लागत आहे. सोशल मिडिया, वेबसाईट, डिजिटल प्रोग्रॅमिंग हे रोजच्या जीवनाचे भाग बनले आहेत. अशा काळात प्रत्येक उद्योजकाच्या पोटात भीतीचा गोळा आणणारी गोष्ट म्हणजे ज्याला डिजीटल जगाशी जोडता येणार नाही त्या उद्योजकाचा व्यवसाय कालबाह्य ठरणार आहे. पानपट्टी, टॅक्सी, रिक्षा, किराणा दुकाने सुध्दा ऑनलाईन व्हायला लागली आहेत.
डिजीटल उपकरणांमुळे जग एकदम जवळ आले. त्यात प्रचंड बदल झाले. या आभासी जगाशी आपल्याला जुळवून घेण्यासाठी तयार राहणे गरजेचे आहे. या नव्या डिजीटल जगात हौस – नवसे – गवसे यांची संख्या सुध्दा प्रचंड प्रमाणात वाढली आहे. म्हणून आपला व्यवसाय डिजीटल करण्याआधी आपल्याला डिजीटल मार्केटिंगची पायाभूत माहिती असणे गरजेचे आहे. आपण जर या क्षेत्राशी संपूर्णपणे अनभिज्ञ असू तर भरल्या बाजारात आपल्याला ठगवणाऱ्यांची संख्या कमी नाही. तेव्हा जाणकार बनण्यासाठी आपल्याला डिजीटल मार्केटिंग कळणे, त्याच्या सेवा कुणाकडून घ्यायच्या कोणावर विश्वास ठेवायचा हे शिकणे सुध्दा गरजेचे आहे.
काही महिन्यापूर्वी एका नवीन उद्योजकाने ई-कॉमर्स वेबसाईट बनवायला दिली. त्या कंपनीने त्या वेबसाईटवर काम करण्याचे ४० हजार रुपये प्रतिमहिना द्यावे लागतील असे सांगितले. आता हा उद्योजक नवीन होता. त्याला या वेबसाईट किंवा आयटी क्षेत्रातील काहीच माहिती नव्हती. तो कबूल झाला. साडेतीन महिन्यानंतर त्याचे बील १ लाख ४० रुपये झाले तरी सुध्दा त्या वेबसाईट १० टक्के काम सुध्दा झाले नव्हते. आता तो इतर सगळीकडे त्याच्या वेबसाईटची जाहिरात करुन बसला होता. आणि ती कंपनी केवळ डोमेनचे १ लाख चाळीस हजार मागत होती. अशा दुःखद कथा ऐकायला मिळतात. तेव्हा मन सुन्न होते. अजून कुणी या गर्तेत फसू नये म्हणून या पुस्तकाचा घाट घातला आहे.
गेल्या पाच वर्षात जेवढे बदल आपण पाहिलेले आहेत. तेवढे बदल संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात घडून आलेले नाहीत. गेल्या काही वर्षात आपल्याला वस्तू खरेदी करण्यासाठी किराणा दुकान, सुपर मार्केट व मॉलमध्ये जाणे भाग होते. आता मात्र घरबसल्या फ्लिककार्ट, स्नॅपडील सारख्या कंपन्यांना हव्या त्या वस्तूची ऑर्डर द्या. दुसऱ्या दिवशी ती वस्तू आपल्या दारात येऊन उभी असते. त्याचे पैसेसुध्दा वस्तू हातात मिळाल्यावरच द्यायचे आहेत. पैशासाठी नोटा किंवा रोख रक्कमेचे निम्याहून अधिक व्यवहार इतिहासजमा झाले आहेत.
मोबाईलचा रिचार्ज करणारी दुकाने बंद व्हायला लागली आहेत. कारण प्रत्येकजण आपल्या मोबाईल मधून रिचार्ज करु लागला आहे. सायबर कॅफेत बसण्यासाठी तरुणाई रांग लागलेली असायची त्या ठिकाणी आता सायबर कॅफे औषधाला सुध्दा सापडणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. डाटा सेवेवर पैसे कमावणाऱ्या टेलिकॉम कंपन्यामध्ये जास्तीत जास्त डाटा व इंटरनेट स्पीड देण्याची जणू काही स्पर्धाच चालू झालेली आहे. प्रत्येकाच्या हातात डिजीटल उपकरणे आलेली आहेत. ती कमालीची स्वस्त व खिशाला परवडणाऱ्या दरात तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. बातम्या वाचण्यासाठी वर्तमान पत्र किंवा टीव्ही वर अवलंबवून राहावे लागत नाही.
अशा परिस्थितीत जगाची विभागणी एका न दिसणाऱ्या रेषेने दोन भागात झाली आहे. त्यातील पहिल्या भागाला वास्तव जग (Real World) म्हणतात. तर दुसऱ्या भागाला आभासी जग (Virtual World) म्हणतात. खऱ्याखुऱ्या जगात जगण्यासाठी या आभासी जगाचा आधार घेणे अपरिहार्य आहे. म्हणून या नव्या जगाशी जोडून राहण्यासाठी डिजीटल मार्केटिंगची माहिती व त्याचा वापर करुन आपला व्यवसाय वाढवणे ही प्रत्येक लहान मोठ्या उद्योजकाची गरज बनली आहे. तेव्हा आपण या डिजीटल दुनियेत प्रवेश करण्यासाठी तयार होऊया.
गेल्या १५ वर्षात जेवढे बदल या जगाने पाहिले व अनुभवले तेवढे मानवजातीच्या कोट्यावधी वर्षात सुध्दा घडलेले नाहीत. जेव्हा असे मोठे बदल घडत असतात. तेव्हा जग वेगवान प्रगतीच्या उंबरठ्यावर उभे असते. हे एक युगांतर असते. अशी अनेक युगांतरे झाली. त्यापैकी काही उल्लेखनीय युगांतराचा आढावा घेऊनच आपण या नव्या बदलाला आत्मसात करण्यासाठी सिध्द होऊया.
अश्मयुगीन मानवाला आगीचा शोध लागला आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन आले. चाकाचा शोध लागल्यानंतर जीवन अधिक गतिमान झाले. त्यानंतर जवळजवळ हजार वर्षांनतर मुद्रणकलेचा शोध लागला व ज्ञानाचे, माहितीचे संकलन मोठ्या प्रमाणावर केले गेले आणि जगभर ज्ञानाचा प्रसार झाला. ज्ञानाची देवाणघेवाण सहज व सुलभ झाली.
युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीनंतर यंत्रांची निर्मिती व वापर सर्वत्र सुरु झाला. त्यांनतर अलिकडच्या काळात आईनस्टाईनने सापेक्षतावादाचा सिद्धांत शोधून काढला तेव्हा विज्ञान आणि तंत्रज्ञानात क्रांती झाली. संगणकाचा शोध हा माहिती तंत्रज्ञानाची पायाभरणी होती. आज माहिती तंत्रज्ञानाने संपूर्ण जगावर मोहिनी घातली आहे. कोणतेही क्षेत्र घ्या. माहिती तंत्रज्ञान वगळल्यास त्यातील जीवनदायी तत्त्वच नष्ट होऊन जाईल. आर्थिक, उद्योग, कृषी, शिक्षण, राजकारण, व्यापार, उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान हा आत्माच मानला जातो.
निवडणुका जिंकण्यासाठी, राजकीय कारभार सुरळीत चालवण्यासाठी, बँकिंग व्यवहारासाठी, प्रवासासाठी रस्ते शोधताना, घरपोच वस्तू व सेवा प्राप्त करण्यासाठी व अगदी काहीही करण्यासाठी आयटी क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे.
जगभरातील करोडो तरुण Social Media वर उपलब्ध आहेत. त्यांच्यापर्यंत आपला उद्योग पोहोचवणे सर्वात कमी किमतीत व कमी वेळेत सहजसाध्य झाले आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, गुगल प्लस, हाईक, टेलिग्राम असे अगणित मोबाईल ॲप्स सर्वांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेली पाहायला मिळतात. तुमच्या आमच्या सर्वाच्या मोबाईलमध्ये या social media उपकरणांचा समावेश हमखास असतो. जो कोणी समाज माध्यमाचा वापर करत नाही त्याला खचितच काही कळत नाही असा समज इतर लोकांचा होऊ शकतो.
दिवसेंदिवस स्वस्त होणारे नेटपॅक खिशाला परवडत असल्याने तरुणाई मोबाईलची बॅटरी संपेपर्यंत मोबाईल हातातून सोडत नाही. अवघे जग आभासी जगाला (Virtual World) वास्तव मानू लागले आहे. दिवसभरातला अधिकाधिक वेळ मोबाईलवर व्यस्त असलेल्या व्यक्ती सर्व काही गुगलला विचारतात. आजकाल रस्ता विचारावा लागत नाही. वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात जावे लागत नाही. पैशाचे व्यवहार करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. मोबाईल व टीव्हीचे रिचार्ज घरबसल्या होऊ लागले. कुठेही जाताना खिशात रोख मोठ्या प्रमाणावर ठेवण्याची पध्दत आता इतिहासजमा झाली आहे. प्रियजनांना वाढदिवस व इतर प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी आठवण करुन देणारे सहाय्यक (Reminder) तर साध्या मोबाईलमध्ये सुध्दा उपलब्ध आहेत. नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करता येतात. Video conferencing च्या माध्यमातून घरबसल्या मुलाखती देता येऊ लागल्या आहेत. परिक्षा व कितीतरी प्रशिक्षण क्रम घरबसल्या व्यक्ती शिकू लागला आहे. कर्जापासून अगदी आरोग्याचा सल्ला गुगल देऊ लागले आहे. स्वयंपाकघरातून बेडरुममध्ये व्हॉट्सॲपद्वारे संभाषण केले जाऊ लागले आहे. विनाचालक कार लवकरच बाजारात येतील. तुमचा पगार व इतर देणी-घेणी थेट तुमच्या खात्यात जमा होत आहेत. अशी न संपणारी उदाहरणांची यादी आहे. या सगळ्या गोष्टी आपले जीवन सुलभ व सोपे करण्यासाठी खूप सोयीस्कर झाल्या आहेत. ग्राहक म्हणून विचार केल्यास फायदेशीर ठरतातच.
जेव्हा आपण व्यावसायिक म्हणून किंवा उद्योजक म्हणून विचार करतो तेव्हा आपल्या दृष्टीने सोयीस्कर झालेल्या काही गोष्टींची यादी पाहू या. ज्याप्रमाणे ग्राहक घरबसल्या ऑर्डर देऊ लागला आहे, त्याप्रमाणे आपल्याला ग्राहकांकडून त्या ऑर्डरचे पैसे थेट खात्यात जमा होण्याची प्रक्रिया निर्माण झाली आहे. दुकानात येऊन ग्राहक वस्तूंची निवड करताना दाखवावे लागणाऱ्या varieties नुसार होणारा पसारा होत नाही. त्याशिवाय वेळ वाचतो तसेच ग्राहकाची मानसिकता जाणून घेण्याची गरज उरत नाही. ग्राहक स्वतःच्या आवडी निवडी, पाहिजे तेवढ्या varieties, त्याच्या गरजेनुसार व आर्थिक क्षमतेनुसार ऑर्डर करतो त्यामुळे ग्राहकाला झेलायची वेळ विक्रेत्यावर येत नाही. दरामध्ये घासाघीस करावी लागत नाही. आपल्याला परवडणारी सूट (Discount) देऊन ग्राहकाला आकर्षित करता येते. जगभरातल्या कोणत्याही ठिकाणाहून आपल्याला ग्राहक मिळू शकतात. वेगवेगळ्या परवानग्या काढण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत नाहीत. कंपनी नोंदणी (Company Registration) पासून कर भरणा (Tax Filing) करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी स्वतःहून बसल्या ठिकाणी करु शकतो. व्हर्च्युअल ऑफिसच्या माध्यमातून व्यवसायाच्या कक्षा रुंदावतात. २४ * ७ म्हणजे आठवड्याचे सातही दिवस दररोज २४ तास आपला व्यवसाय आपल्या प्रत्यक्ष सहभागाविना चालू राहतो. तुम्ही झोपलेले असताना, जेवताना, चहा पिताना, गप्पा मारताना, व्यायाम करताना तसेच अगदी सहलीला गेल्यावर सुध्दा व्यवसाय चालूच राहतो. असे कितीतरी चमत्कार होत असतात.
मात्र हे सगळं एवढं सोपं असूनही आपल्याला हे सर्व कसं साध्य करुन घेता येईल. आपल्या व्यवसायाची वेबसाईट असावी. त्या वेबसाईटला ऑनलाईन पध्दतीने ग्राहकांकडून पैसे येण्यासाठी पेमेंट गेटवे जोडलेला असावा. ग्राहकाला ऑर्डर करण्याची व्यवस्था असावी. व्यवसायाचे फेसबुक पेज असावे. सर्च इंजिन ऑप्टीमायझेशनच्या माध्यमातून आपली वेबसाईट गुगल शोधात पहिल्या क्रमांकावर कशी आणायची? बल्क मेसेज व बल्क Email काय आहे? त्याचा उपयोग करायचा कसा? फेसबुक पेज कसे तयार करावे? त्याचा प्रसार, प्रचार व प्रसिध्दी कशी करावी? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे साध्या भाषेत जाणून घेण्यासाठी एक महिनाभर आपण दररोज सकाळी दहा वाजता एक विषय घेऊन भेटू या.
तुम्हाला पडणारे प्रश्न विचारा. तुमच्याकडे असलेली माहिती आम्हाला द्या. त्यामुळे त्या माहितीचा फायदा जास्तीत जास्त उद्योजकांना होईल. चला तर उद्योजकता वाढीसाठी माहिती तंत्रज्ञान व समाज माध्यमाचा वापर करुन यशाच्या नव्या टप्प्यावर जाऊया.
स्पर्धेच्या युगात जागच्या जागी टिकून राहण्यासाठी प्रचंड वेगाने धावायची गरज आहे. आहे तिथे टिकून राहण्यासाठी प्रत्येकाला अतिशय वेगाने धावणे अपरिहार्य बनले आहे. कारण प्रत्येकाची स्पर्धा जगातील प्रत्येकाबरोबर आहे. अशा वेळी व्यवसायात उतरणाऱ्या प्रत्येक बिझनेसमनला स्मार्ट पध्दतीने जगाच्या पटलावर वावरावे लागत आहे.
सोशल मीडिया, वेबसाईट, डिजिटल प्रोग्रॅमिंग हे रोजच्या जीवनाचे भाग बनले आहेत. अशा काळात प्रत्येक उद्योजकाच्या पोटात भीतीचा गोळा आणणारी गोष्ट म्हणजे ज्याला डिजीटल जगाशी जोडता येणार नाही त्या उद्योजकाचा व्यवसाय कालबाह्य ठरणार आहे. पानपट्टी, टॅक्सी, रिक्षा, किराणा दुकाने सुध्दा ऑनलाईन व्हायला लागली आहेत.
डिजीटल उपकरणांमुळे जग एकदम जवळ आले. त्यात प्रचंड बदल झाले. या आभासी जगाशी आपल्याला जुळवून घेण्यासाठी तयार राहणे गरजेचे आहे. या नव्या डिजीटल जगात हौस – नवसे – गवसे यांची संख्या सुध्दा प्रचंड प्रमाणात वाढली आहे. म्हणून आपला व्यवसाय डिजीटल करण्याआधी आपल्याला डिजीटल मार्केटिंगची पायाभूत माहिती असणे गरजेचे आहे. आपण जर या क्षेत्राशी संपूर्णपणे अनभिज्ञ असू तर भरल्या बाजारात आपल्याला ठगवणाऱ्यांची संख्या कमी नाही. तेव्हा जाणकार बनण्यासाठी आपल्याला डिजीटल मार्केटिंग कळणे, त्याच्या सेवा कुणाकडून घ्यायच्या कोणावर विश्वास ठेवायचा हे शिकणे सुध्दा गरजेचे आहे.
काही महिन्यापूर्वी एका नवीन उद्योजकाने ई-कॉमर्स वेबसाईट बनवायला दिली. त्या कंपनीने त्या वेबसाईटवर काम करण्याचे ४० हजार रुपये प्रतिमहिना द्यावे लागतील असे सांगितले. आता हा उद्योजक नवीन होता. त्याला या वेबसाईट किंवा आयटी क्षेत्रातील काहीच माहिती नव्हती. तो कबूल झाला. साडेतीन महिन्यानंतर त्याचे बील १ लाख ४० रुपये झाले तरी सुध्दा त्या वेबसाईट १० टक्के काम सुध्दा झाले नव्हते. आता तो इतर सगळीकडे त्याच्या वेबसाईटची जाहिरात करुन बसला होता. आणि ती कंपनी केवळ डोमेनचे १ लाख चाळीस हजार मागत होती. अशा दुःखद कथा ऐकायला मिळतात. तेव्हा मन सुन्न होते. अजून कुणी या गर्तेत फसू नये म्हणून या पुस्तकाचा घाट घातला आहे.
गेल्या पाच वर्षात जेवढे बदल आपण पाहिलेले आहेत. तेवढे बदल संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात घडून आलेले नाहीत. गेल्या काही वर्षात आपल्याला वस्तू खरेदी करण्यासाठी किराणा दुकान, सुपर मार्केट व मॉलमध्ये जाणे भाग होते. आता मात्र घरबसल्या फ्लिककार्ट, स्नॅपडील सारख्या कंपन्यांना हव्या त्या वस्तूची ऑर्डर द्या. दुसऱ्या दिवशी ती वस्तू आपल्या दारात येऊन उभी असते. त्याचे पैसेसुध्दा वस्तू हातात मिळाल्यावरच द्यायचे आहेत. पैशासाठी नोटा किंवा रोख रक्कमेचे निम्याहून अधिक व्यवहार इतिहासजमा झाले आहेत. मोबाईलचा रिचार्ज करणारी दुकाने बंद व्हायला लागली आहेत. कारण प्रत्येकजण आपल्या मोबाईल मधून रिचार्ज करु लागला आहे.
सायबर कॅफेत बसण्यासाठी तरुणाई रांग लागलेली असायची त्या ठिकाणी आता सायबर कॅफे औषधाला सुध्दा सापडणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. डाटा सेवेवर पैसे कमावणाऱ्या टेलिकॉम कंपन्यामध्ये जास्तीत जास्त डाटा व इंटरनेट स्पीड देण्याची जणू काही स्पर्धाच चालू झालेली आहे. प्रत्येकाच्या हातात डिजीटल उपकरणे आलेली आहेत. ती कमालीची स्वस्त व खिशाला परवडणाऱ्या दरात तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. बातम्या वाचण्यासाठी वर्तमान पत्र किंवा टीव्ही वर अवलंबवून राहावे लागत नाही.
अशा परिस्थितीत जगाची विभागणी एका न दिसणाऱ्या रेषेने दोन भागात झाली आहे. त्यातील पहिल्या भागाला वास्तव जग (Real World) म्हणतात. तर दुसऱ्या भागाला आभासी जग (Virtual World) म्हणतात. खऱ्याखुऱ्या जगात जगण्यासाठी या आभासी जगाचा आधार घेणे अपरिहार्य आहे. म्हणून या नव्या जगाशी जोडून राहण्यासाठी डिजीटल मार्केटिंगची माहिती व त्याचा वापर करुन आपला व्यवसाय वाढवणे ही प्रत्येक लहान मोठ्या उद्योजकाची गरज बनली आहे. तेव्हा आपण या डिजीटल दुनियेत प्रवेश करण्यासाठी तयार होऊया.
तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला हे कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. लेख आवडला असेल तर लाइक आणि subscribe जरूर करा आणि हो अजून कोणत्या विषयाची माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.
तुम्ही तुमच्या नोकरीत समाधानी नसाल किंवा तुम्हाला पगार मनासारखा मिळत नसेल किंवा
तुम्ही तुमच्या नोकरीत समाधानी नसाल किंवा
करिअरमध्ये हवी तशी प्रगती होत नसेल किंवा
नाईलाज म्हणून न आवडणारी नोकरी करावी लागत असेल किंवा
तुम्ही अशी नोकरी करत असाल, जी आयुष्यभर करत राहण्याची
तुमची अजिबात ईच्छा नाही किंवा
बॉसचा वैताग आला असेल किंवा
तुम्हाला जाणवत असेल; आपण इतर सहकाऱ्यांपेक्षा चांगलं काम करू शकतो, पण संधी मिळत नाही किंवा
बऱ्याच दिवसांपासून एखादी बिझनेस आयडिया डोक्यात घोळत असेल किंवा
स्वतःचं उद्योग साम्राज्य उभं करायचं असं स्वप्न असेल किंवा
आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण करण्याची ईच्छा आणि मनासारखं जगण्याचं स्वातंत्र्य हवं असेल किंवा
बिझनेस करून भरपूर पैसे कमवावेत असं वाटत असेल, तर योग्य वेळी हे पुस्तक तुमच्या हाती पडलं आहे याची खात्री बाळगा मी जेव्हा असे नोकरदार बघतो, जे त्यांच्या नोकरीत, त्यांच्या आयुष्यात अजिबात सुखी नाहीत, तेव्हा मला प्रचंड दुःख होतं, वाईट वाटतं. शिक्षण संपलं की कुठेतरी नोकरी बघायची, नोकरी मिळाली की लग्न व्हावं म्हणून कर्ज काढून घर घ्यायचं. घर घेतलं की लग्न करून संसाराच्या रहाटगाडग्यात गुंतून राहायचं हेच त्यांचं आयुष्य बनून जातं. अनेकांच्या बाबतीत घरची आर्थिक परिस्थिती बिकट असते, कुटुंबाची जबाबदारी उचलता यावी म्हणून त्यांना नोकरी करावी लागते. काहीजण असेही असतात की, त्यांना वेगळं काहीतरी करायची इच्छा असते, परंतु ‘काही तरी कामधाम कर’ हा घरातल्यांचा पिच्छा सुटावा म्हणून नाईलाजास्तव नोकरी करतात. नंतर ही सगळी मंडळी आयुष्यातील अनेक वर्ष बँकेचे हप्तेच फेडत असतात. ५० हजार पगार असला, तरी त्यातील २५-३० हजार हप्त्यांवरच खर्च होत असतात.
कभी किसी को मुकम्मल जहां नही मिलता, कहीं जमी तो कहीं आसमान नही मिलता…
या काव्यपंक्तीप्रमाणे आयुष्यात आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतातच असं नाही. अनेकदा तडजोड स्वीकारावी लागते. नाईलाज म्हणून स्वीकारलेले काम नीरस वाटू लागते. कधीकधी काम वेळेवर पूर्ण होत नाही, त्यामुळे वरिष्ठांची बोलणी खावी लागतात. बॉससोबत नेहमीच ‘पंगा’ होत राहतो. त्यामुळे कामाची लय बिघडते. कधी सहकाऱ्यांसोबत वाद होतात. रोजचे काम करताना ना आनंद वाटत असतो, ना काही वेगळे शिकायला मिळाल्याचे समाधान. प्रत्येक महिन्याच्या शेवटी हातात येणारा पगाराचा चेक आणि आठवड्याच्या शेवटी एक किंवा दोन दिवसांची सुट्टी यासाठी ही मंडळी आठवड्याचे ५ दिवस खाली मान घालून निमूटपणे काम करत असतात. जिथं काम करायला आवडत नाही, तिथं जावं लागतं; ज्यांच्यासोबत पटत नाही, अशा लोकांसोबत काम करावं लागतं.
खरंतर ही सगळी मंडळी खूप मेहनत करत असतात. आपल्या आस्थापनेसाठी आयुष्यातील बहुतांश वेळ देत असतात. घाण्याला लावलेल्या बैलासारखे राब राब राबत असतात, पोटाला चिमटा काढत असतात, ऑफिसमध्ये १० ते १२ तास धडपडत असतात, पण दिवसाच्या शेवटी पुरते थकलेले असतात. आयुष्यातील इच्छा, आकांक्षा आणि उद्देशच ते हरवून बसलेले असतात. पैशांच्या मागे लागतात आणि जगणं विसरतात. चाकोरीबद्ध आयुष्य त्यांना जग वाटायला लागतं आणि ते तिथेच थांबतात.
गेली बरीच वर्षं मी या सर्वांसाठी काहीतरी ठोस उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. या अनेक वर्षांच्या अभ्यासातून आणि अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट झाली की; ही सर्व लोकं जी या दुष्टचक्रात अडकली आहेत आणि ज्यांना यातून बाहेर पडायचं आहे, त्यांनी ‘नोकरीतून उद्योजकतेकडे’ जायची गरज आहे. उद्योजक होणं हा एक चांगला आणि शाश्वत मार्ग असू शकतो. यामुळे स्वातंत्र्य, अर्थपूर्ण आयुष्य आणि बऱ्यापैकी चांगलं आर्थिक उत्पन्न मिळू शकते.
हे जरी खरं असलं तरीसुद्धा, नोकरदार ते उद्योजक बनणं हा प्रवास तितकासा सोपादेखील नाही. सुरुवातीच्या काळात या नवउद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यातील बऱ्याच अडचणींतून मी सुद्धा गेलेलो आहे.
त्यामुळेच या उद्योजकांची मदत व्हावी म्हणून मी नोकरीतून उद्योजकतेकडे जाण्यासाठी चार सोप्या पायऱ्या विकसित केल्या आहेत. या पायऱ्या इतक्या सोप्या आहेत की कोणीही यांचा सहजपणे वापर करू शकतं.
त्यासाठी तुमच्याकडे उद्योजकतेचं ज्ञान असलंच पाहिजे असं काही नाही. या पायऱ्या वापरून तुम्ही तुमच्या नोकरीला आणि बॉसला ‘टाटा-गुडबाय’ म्हणू शकता आणि आपलं स्वप्नातीत आयुष्य जगू शकता. ते कसं करायचं हे या लेखांमध्ये आपण समजून घेणार आहोत.
गेली अनेक वर्षे मुंबईत व्यवसाय करीत असताना अनेक व्यापारी समाजांशी संबंध आला. व्यावसायिक क्षेत्रांमध्ये आपल्या माणसांना व समाजाला वरती आणण्यासाठी ५% चा सामाजिक नियम अनुभवला. या समाजात ज्याला व्यवसायात भरभरून यश मिळाले, पैसा मिळाला, नाव मिळाले ते आपल्या फायद्याच्या ५% इतकी रक्कम किंवा वेळ आपल्या समाज बांधवांच्या उद्धारासाठी देऊ करतात. हाच विचार पुढे घेऊन जाताना २०१४ पासून आपल्या माणसांसाठी त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी माझ्या फायद्यातील ५% व उपलब्ध वेळेतील ५% वेळ देऊन मराठी उद्योजकता चळवळ सुरु केली. त्यामध्ये प्रत्येक मराठी माणसाला करता येतील, अशा हजारो बिझनेस आयडिया तसेच प्रेरणा देणारे शेकडो संशोधनपर लेख लिहिले. वेळ मिळेल तसा महाराष्ट्रभर अनेक व्यापारी संस्था, विद्यालये व संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात व्याख्याने दिली. या लेखांचे आज २५ लाख वाचक असून त्यातून प्रेरणा घेऊन सुमारे १८ हजार तरुणांनी आपला व्यवसाय सुरु केला.
माकडासमोर केळी आणि दोन हजारांची नोट ठेवली, तर माकड केळी उचलतं. माकडाला हे माहित नसतं की, दोन हजारांत अनेक केळी विकत घेता येतात. केळी घेऊन तात्पुरती भूक भागवणे हा एकच मार्ग त्याला माहित असतो. मराठी माणसाचेही तसेच आहे. मराठी माणूस उद्योग करून लाखो रुपये कमावण्याऐवजी, काही हजारांची नोकरी मिळवण्यास प्राधान्य देतो. आपल्या ज्ञानाचा उपयोग करून उद्योग करावा, लाखो करोडो रुपये कमवावेत व इतरांना आपल्याकडे नोकरीसाठी ठेवावे असे कोणालाच वाटत नाही. आज महाराष्ट्राचा भूमिपुत्र गरिबी व कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालाय. कमी शिकलेले लोक उद्योग करतात व उच्च शैक्षणिक पात्रता आणि प्रतिभा असणारे त्यांच्या हाताखाली नोकरी करतात. त्यामुळे आपण आपल्या विचारसरणीत क्रांतीमय बदल घडवून आणला पाहिजे.
सध्या अनेक तरुण बेरोजगार आहेत, त्यामुळे लग्नं जुळत नाहीत, त्यामुळे त्यांच्यात मानसिक तणाव दिसून येतो. काहीजण या तणावावर मात करुन पुढे जातात, तर काहीजण व्यसनाचा आधार घेतात. उमेदीचा काळ अशा गोष्टींमुळे वाया गेल्याने नंतर त्यांच्या आयुष्यात संघर्ष सुरु होतो. त्यामुळे मुलांना बिनकामाचे शिक्षण देण्यापेक्षा व्यवसायाभिमुख व कौशल्य प्रदान करणारे शिक्षण दिले पाहिजे. हल्लीच्या मुलांमध्ये नवीन शिकण्याची वृत्ती, धाडस व उच्च क्षेत्रात झेपावण्याचे बळ आहे, त्याची जाणीव त्यांना होणे गरजेचे आहे.
आजकाल अनेक चांगली शिकलेली मुलं, गृहिणी, व्हीआरएस घेतलेले लोक भेटतात. प्रत्येकाकडे काहीतरी अनुभव, ज्ञान, वेळ व मेहनत करण्याची तयारीही असते पण; नेमकं काय करायचं, कोणता व्यवसाय निवडायचा, तो कसा एकत्र करायचा, ग्राहक कुठून मिळतील, नेमकी प्रक्रिया कशी असेल, व्यवसाय करण्यासाठी कोणत्या मूलभूत गोष्टींचे ज्ञान आवश्यक आहे हे सर्व प्रश्न त्यांच्या डोक्यात असतात. या जगात अगणित संधी आहेत, पण बऱ्याच जणांना याची माहिती नसते. या सर्वांसाठी ही लेखमाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल. या लेखमालेतील बिझनेसच्या १०१ भन्नाट आयडिया वाचून अनेकांचा निश्चितच फायदा होईल. या सर्व लेखांचे संकलन असलेले पुस्तक नवी अर्थक्रांती प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. https://shop.naviarthkranti.com इथून आपल्याला ते विकत घेता येईल.
कोणताही व्यवसाय एकदम करोडोंचा होत नसतो. गाड्या, फॅक्टरी, कार्यालये ही काही अल्पावधीत होणारी गोष्ट नसते. प्रत्येकाला आपली आपली एखादी ‘भन्नाट बिझनेस आयडिया’ शोधावी किंवा निवडावी लागेल व त्या दृष्टीने व्यवसायाचे मार्गक्रमण करावे लागेल. तुम्हीही तुमच्या परीने ५% चा नियम आपल्या समाजाच्या उद्धारासाठी स्वतःला लागू करा. “घेणाऱ्याने घेत जावे व घेता घेता घेणाऱ्याचे हात घ्यावे.” माझ्या असंख्य वाचक बांधवाना त्यांच्या व्यावसायिक यशासाठी हार्दिक शुभेच्छा…! लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरो…! हीच माझी प्रार्थना…! शक्य असल्यास आपला अनुभव मला जरूर कळवावा. आपल्याला हे पुस्तक आवडलं, तर आपण हे पुस्तक आपल्या मित्रमंडळीना, नातेवाईकांना अवश्य वाचायला द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.
शेवटी एवढंच सांगतो, वडापावची गाडी टाका, रेस्टॉरंट टाका, फर्निचर बनवा, गवंडीकाम करा, वायरमन व्हा, ड्रायव्हर व्हा, भाजी विका, इडली सांबार विका, दूध घाला, पेपर टाका; जो जमेल, जो मिळेल तो धंदा न लाजता करा. धन्यवाद.
टीप : या लेखांत दिलेले आकडे हे केवळ संदर्भासाठी आहेत. आपली कल्पना, नियोजन, व्यवस्थापन, जोखीम घेण्याची, गुंतवणूक करण्याची क्षमता यावर व्यवसायाची वाढ अवलंबून असते.
भारतातील अर्थसाक्षरतेबद्धल एका संस्थेने केलेल्या पाहणीचे निष्कर्ष नुकतेच वाचण्यात आले. त्यातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे
बहुतेक लोक FD आणि Insurance (Money back) यांना गुंतवणूक समजतात.
सोन्याचे दागिने व राहते घर यांचे सध्याचे बाजारमूल्य कितीही जास्त असले तरी ते आभासी आहे. त्याचा फारसा काही उपयोग नसून त्याने फक्त मानसिक समाधानच लाभू शकते.
महागाईवर मात करणारा परतावा मिळाला पाहिजे हे अनेकांना माहित नाही.
म्युच्युअल फंड हा विमा प्रकार असून SIP ही पॉलिसी आहे असे अनेकांना वाटते.
आपल्याकडे किती रकमेची, कोणत्या कंपनीची आणि किती वर्षाची विमा पॉलिसी आहे, तसेच कोणत्या म्युच्युअल फंडामध्ये आपली किती रक्कम आहे हे अनेकांना अंदाजेही सांगता येत नाही. आपल्या विमा रकमेवर मिळत असणारा परतावा ६% पेक्षाही कमी आहे हे अनेकांना माहित नाही.
फारच थोड्या लोकांनी योग्य रकमेचा, योग्य मुदतीचा आणि योग्य वर्षांचा मुदत विमा (Term Insurance) व आरोग्यविमा (Mediclaim) घेतला आहे. यामध्ये भरत असलेल्या हप्त्यांचा उपयोग न होण्यातच आपला खराखुरा फायदा आहे, हे त्यांच्या लक्षातच येत नाही.
अनेक लोक भविष्यकाळातील तरतुदीबद्दल जागरूक नाहीत, तर अनेकजण मुलांवर अवलंबून आहेत.
गुंतवणूक साधनांची वेगवेगळ्या प्रकारांत विभागणी करायची असते हे कित्येकांना माहित नाही.
येथील बहुतेक लोकांना व्याज करपात्र, तर लाभांश आणि मुळातून STT कापला असेल, तर दीर्घमुदतीचा भांडवली नफा करमुक्त असतो याची माहिती नाही.
सोन्याचे दागिने घेण्याऐवजी शुध्द स्वरूपातील सोने, गोल्ड ETF अथवा गोल्ड Bonds मध्ये गुंतवणूक करणे अधिक फायद्याचे याची लोकांना जाणीव नाही.
Taxfree bonds हे ८०/सी ची सवलत देतात असे बरेचजण मानतात, तर ५४/ईसी बॉण्ड्स, Infrabonds, PMS, Corporate FD’s यांविषयी फारच थोड्या लोकांना माहिती आहे.
पूर्णपणे आर्थिक नियोजन करणारे लोक नगण्य आहेत.
या सर्व गोष्टी विचारात घेऊन एकच निष्कर्ष काढता येईल की, आपल्याकडे गुंतवणूक संस्कृती रुजलेली नाही. असे होण्याचे महत्वाचे कारण असे की, आपण आपले जे पैसे बचत खाते, मुदत ठेवी, पोस्टाच्या योजना, पीपीएफ आणि मनी बॅक पॉलिसीमध्ये टाकले आहेत, सोन्याचे दागिने केले आहेत त्यालाच गुंतवणूक असे समजत आहोत, परंतु ही गुंतवणूक नसून बचत आहे. बचत आणि गुंतवणूक यांचा एकमेकांशी सबंध असला तरी या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. ढोबळमानाने असे म्हणता येईल की, उत्पन्नातील असा भाग जो गरजांसाठी खर्च न करता साठवून ठेवला आहे किंवा वेगवेगळे खर्च केल्यावर जी रक्कम शिल्लक राहते ती म्हणजे बचत; तर गुंतवणूक म्हणजे अशी ठरवून केलेली प्रक्रिया ज्यामध्ये आपण आधिक फायदा मिळवण्यासाठी पैसे गुंतवले आहेत. हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण बचत व गुंतवणुकीची ठळक वैशिष्ट्ये पाहूया :-
बचतीमध्ये आपण पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवतो, त्यामुळे नजीकच्या काळात वापरू शकतो. उदा. बचत खाते, मुदत ठेव, परावर्तित ठेव, आवर्ती ठेव; तर गुंतवणूकीत आपण पैसे अशा साधनांमध्ये ठेवतो की, ज्यापासून भविष्यात आर्थिक लाभ होऊ शकेल. उदा. समभाग, यूनिट, फ्यूचर, सोने, चांदी, वस्तू, बाजारपेठ, स्थावर मालमत्ता इत्यादी.
बचत ही अल्पकालीन क्रिया असून तिची सुरुवात कधीही करता येते, तर गुंतवणूक ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे, त्यामुळे तिची सुरुवात जितक्या लवकरात लवकर करू तेवढे चांगले.
बचतीचे पैसे नजीकच्या काळात वापरू शकतो, तर गुंतवणुकीचा भविष्यकाळात उपयोग होतो.
बचत ही सवय, तर गुंतवणूक ही प्रक्रिया आहे.
बचत ही सुरक्षित असून त्यावर मिळणारा लाभ अल्प आहे, तर गुंतवणुकीत जोखीम जास्त असून, जेवढी जोखीम जास्त, तेवढा मोठा फायदा किंवा तोटा होण्याची शक्यता असून क्वचित प्रसंगी मुद्दल गमावण्याचा धोकाही आहे.
बचतीत सुरक्षितता असल्याने त्याचा आढावा घ्यावा लागत नाही, तर गुंतवणुकीचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यातील बदलांबद्दलचा निर्णय त्वरित घ्यावा लागतो.
बचतीची साधने आपणास निष्क्रिय बनवतात, तर गुंतवणुकीची साधने स्वातंत्र्याचा अनुभव देतात.
बचतीचे पैसे अडीअडचणीच्या काळात उपयोगी पडतात, तर गुंतवणुकीच्या साधनांतून दीर्घ काळासाठी संपत्ती निर्माण करण्यासाठी नियमित प्रयत्न करावे लागतात.
बचत ही भीतीपोटी केली जाते, तर गुंतवणूक आत्मविश्वासपूर्वक करावी लागते.
बचतीचे पैसे त्वरित उपलब्ध होतात, तर गुंतवणुकीतील पैसे मिळवण्यासाठी काही कालावधी द्यावा लागतो.
बचतीसाठी फारशा ज्ञानाची गरज नसते, तर गुंतवणुकीसाठी सखोल ज्ञान व नियोजनाची गरज असते, तज्ञांची मदत घ्यावी लागते अथवा स्वतः तज्ज्ञ व्हावे लागते.
बचतीमुळे पैशाचे रक्षण होते, तर गुंतवणुकीमुळे योग्य उत्पन्न व चांगला परतावा मिळण्याची शक्यता असल्याने चलनवाढीवर मात करता येते.
वरील सर्व विवेचनावरून अशी समजूत होऊ शकते, गुंतवणूक चांगली व बचत वाईट किंवा बचत चांगली आणि गुंतवणूक वाईट; परंतु यामधील कोणतीही एक गोष्ट पूर्ण बरोबर व दुसरी गोष्ट पूर्ण चूक असे नसून आपली अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीची ध्येयं पूर्ण करण्यासाठी बचत आणि गुंतवणूक या दोघांची आपल्या आयुष्यात फार महत्वाची भूमिका आहे. जर बचत आणि गुंतवणूक यांचा समतोल आपण साधू शकलो, तर आणि तरच भविष्यातील वाढत्या गरजा व चलनवाढ यांच्याशी सामना करू शकू. दुर्दैवाने आपल्या शालेय शिक्षणात बचत आणि गुंतवणूक यांतील फारच थोड्या गोष्टींचा स्पर्श होतो, तरीही इतर अनेक गोष्टी आपण जीवनात करून पाहतो, चूकतो, धडपडतो, पडतो, पुन्हा उठून उभे राहतो. आपले ज्ञान आणि अनुभव यांची सांगड घालून पैशांच्या सर्व बाजूंचा विचार करून, व्यावहारिक व व्यावसायिक दृष्टिकोन बाळगू शकलो, तर आपल्या स्वकष्टार्जित व वडिलोपार्जित संपत्तीचा सांभाळ करू शकू. तेव्हा पैशाच्या सर्व पैलूंचा विचार करूया, माहिती घेऊया, जागरूक राहूया, नियोजन करूया आणि स्वतःबरोबरच इतरांनाही अर्थसाक्षर करूया.
(टीप : भांडवल बाजारातील गुंतवणूक बाजारपेठेतील जोखमींच्या अधीन आहे, योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा. तसेच कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.)
उद्योजकता हा समाजात बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक असा महत्त्वपूर्ण घटक आहे, परंतु समाजाची सर्वसाधारण प्रवृत्ती अशी आहे की, आपण तरुणांना डॉक्टर, इंजिनिअर आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतो, परंतु उद्योजक होण्यास फारच कमी लोक मदत किंवा सहकार्य करतात. उद्योजकता लोकांना नोकरीच्या अनेक संधी निर्माण करण्याची क्षमता देते, अनेकांचे आयुष्य बदलते, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी मदत करते. अनेक तरुणांमध्ये उद्योजकतेची ही प्रवृत्ती दडलेली असते. या प्रवृत्तीला प्रेरणा दिली, तर त्या तरुणांमधून चांगला उद्योजक जन्माला येतो, जो पुढे चालून देशाच्या संपत्तीत भर घालू शकतो.
आज जगातील एक तृतीयांश लोकसंख्येच्या मूलभूत गरजासुद्धा पूर्ण होत नाहीत, तर ग्रामीण भारतातील कोट्यावधी लोकांचे मासिक उत्त्पन्न ५००० रुपयांपेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत, मानवी संस्कृतीशी निगडित विविध समस्यांवरील उपाय शोधण्यासाठी उद्योजक महत्वपूर्ण भूमिका निभावू शकतात.
३२.२४ लाख कोटी रुपये (४५० अब्ज डॉलर्स) सकल राज्य उत्पादन (जीएसडीपी) असेलली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. देशाच्या एकूण जीडीपीतील १५ टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. देशातील उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. भारतातील एकूण विदेशी गुंतवणुकीपैकी (एफडीआय) ३० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येते. देशातील सर्वाधिक कोट्याधीश आणि अब्जाधीशसुद्धा महाराष्ट्रातच राहतात. एवढं सगळं असूनही या उद्योग क्षेत्रात सदैव आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात मराठी उद्योजक मात्र जितका दिसायला हवा तितका दिसत नाही. आपल्याकडे अशी म्हण आहे की, अंथरूण पाहून पाय पसरावे; पण अंथरुणच मोठं घ्या असं कुणीही सांगत नाही. अगदी प्राचीन काळापासून देशांतर्गत आणि देशाबाहेर व्यापार केला जातो आहे, पण ‘मोठा झाल्यावर तू व्यवसाय कर’ किंवा ‘मोठा बिझनेसमन हो’ असं आपल्यापैकी किती जणांना त्यांच्या पालकांनी सांगितले? बोटावर मोजण्याइतके असतील. परंतु आजकालच्या नोकरदारांमध्ये, तरुण पिढीमध्ये उद्योजकता हे करिअरचे क्षेत्र म्हणून निवडण्याचे प्रमाण वाढते आहे. आयुष्यभर दुसऱ्याच्या हाताखाली ‘नोकरी’ करत राहण्याची मध्यमवर्गीय मानसिकता आता बदलत आहे.
जगातील लाखो लोक नोकरीला लाथ मारून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची, प्रचंड पैसा कमवायची स्वप्नं रोज बघत असतात. आपल्याला कोणीही बॉस नसेल, स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतील, काम करण्याचं कोणतंही बंधन नसेल यामुळे नोकरी सोडायचा विचार जरी आकर्षक वाटत असला, तरी वास्तव स्वप्नापेक्षा पूर्णपणे वेगळं असू शकतं. पूर्ण विचार न करता नोकरी सोडण्यामुळे वेळ आणि पैसा वाया जाऊ शकतो, मानसिक त्रास होईल तो वेगळाच.
डोक्यात आयडिया आली किंवा एखाद्या मित्राने सांगितलं किंवा कुठेतरी अमुक अमुक धंदा जोमात आहे, अशी बातमी वाचली/बघितली आणि बिझनेस करायचा म्हणून कसलाही विचार न करता सरळ नोकरी सोडली, याला निव्वळ मूर्खपणा म्हणतात. व्यवसाय सुरु करणं एकवेळ सोपं आहे, पण तो यशस्वीपणे चालवणं तितकंच अवघड. त्यामुळे पूर्वतयारी केल्याशिवाय व्यवसायात उतरणे धोक्याचे ठरू शकते. ही पूर्वतयारी कशी करायची हे चार सोप्या पायऱ्यांमध्ये या पुस्तकात सांगितले आहे. त्याचसोबत गुंतवणूकदार कसे शोधायचे, कमी खर्चातील मार्केटिंगच्या पद्धती, व्यवसाय नोंदणीचे प्रकार आणि कंपनीचं नाव, लोगो, टॅगलाईन बनवताना काय काळजी घ्यावी याचीही माहिती दिली आहे.
प्रत्येकाला पैसा कमवायचा असतो, श्रीमंत व यशस्वी व्हायचं असतं, त्यासाठी नोकरी करून काही होणार नाही, हेही कळतं, पण व्यवसायात उतरताना भीती व संकोच असतो. जवळ बुद्धी व कौशल्य असते, पण योग्य मार्गदर्शनाअभावी धाडस होत नाही. हे पुस्तक अशा लोकांसाठी आहे, जे सध्या नोकरी करत आहेत, पण त्यांच्या मनात स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा आहे. हे पुस्तक अशा उद्योजकांनासुद्धा उपयुक्त ठरेल, जे सध्या त्यांच्या व्यवसायात अनेक आव्हानांचा आणि अडचणींचा सामना करत आहेत. यातील संकल्पना समजून घेऊन, त्यावर आवश्यक कृती करून, सर्व प्रकारच्या भीतीवर मात करून, सावधपणे एकेक पाऊल पुढे जात राहिले पाहिजे. अनेक वर्ष नोकरीत अडकून पडलेल्या नोकरदारांमध्ये दडलेला उद्योजक जागरूक व्हावा यासाठी त्यांना नोकरीतून उद्योजकतेकडे नेणाऱ्या एका सेतूची गरज आहे असा सेतू बनवण्याचा हा प्रयत्न आहे. रामायणात वानरांनी समुद्रात एक एक दगड टाकून रामसेतू बनवला आणि प्रभू रामचंद्रांनी लंकेमध्ये प्रवेश करुन रावणावर विजय मिळवला. त्याप्रमाणे ह्या सेतूवरुन असंख्य श्रीराम प्रवास करोत आणि आपल्या आयुष्यात यशस्वी होवोत याच सदिच्छा…