जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…’
“We become like the average of the five people we spend the most time with.” आपण ज्या लोकांसोबत सर्वाधिक वेळ घालवतो, त्यापैकी सरासरी पाच लोकांप्रमाणेच आपणही बनतो.
एक साधू रस्त्याने चालले असताना त्याना खूप तहान लागली. पुढे एका कुंभाराचं घर लागले. साधूंनी त्या कुंभाराकडे पाणी मागितले. त्यानेही त्या साधूंना आदरपूर्वक नमस्कार करून पाणी दिले. पाणी पीत असताना अचानक त्यांचं लक्ष बाजूस गेलं. एका बाजूला मडक्यांचा ढीग लावला होता, पण एक मडकं वेगळं ठेवलं होतं. त्या साधूंनी त्याला विचारलं, “का रे बाबा, बाकी सगळी मडकी एका बाजूस आणि ते एकच मडकं वेगळं का ठेवलं आहेस?” तेव्हा तो म्हणाला, “महाराज ते मडकं खराब आहे, त्याला गळती लागली आहे आणि कोणी ते घेत नाही. म्हणून वेगळं ठेवलं आहे.”
साधूंनी त्याच्याकडे त्या मडक्याची मागणी केली. तो कुंभार म्हणाला, “महाराज, तुम्हाला हवं असेल, तर चांगलं मडकं घेऊन जा. फुटकं मडकं नेऊन काय फायदा?” ते म्हणाले, “देणार असशील तर हेच दे. नाहीतर चाललो मी!” नाईलाजास्तव त्याने ते मडकं त्यांना देऊन टाकलं. त्या साधूंनी त्या मडक्याला स्वछ धुतल्यानंतर आणून आपल्या मंदिरातील शिवलिंगावर बांधून ठेवलं. परिणामस्वरुप कालपर्यंत कोणा एका कोपऱ्यात खितपत पडलेलं निरुपयोगी ते मडकं आज साधूंच्या सहवासाने, संत समागमाने देवकार्य करू लागलं. देवाच्या सानिध्यात भक्त यायचे तेव्हा त्या शिवशंकरांच्या पिंडीला नमस्कार करताना त्या मडक्यालाही डोकं लावायचे आणि त्यांचं मन प्रसन्न व्हायचं.
जर एक मातीचं मडकं एका साधूच्या सहवासात येऊन त्याच्या जगण्याचा मार्ग बदलत असेल, क्षणात ते कुठच्या कुठे पोचत असेल, तर आपण मनुष्य योनीत आहोत. मग आपण जर गुरूंच्या/चांगल्या माणसांच्या सहवासात राहू, तर काय आपलं जीवन सुंदर घडणार नाही का?
आर्थिक परिस्थिती, काही गोष्टीत कमीपणा, संधीचा अभाव जरी असला तरी तुमच्याकडे जे कौशल्य असेल, त्यानुसार मिळेल ती संधी घेऊन चांगल्या लोकांच्या सहवासात जाण्याचा प्रयत्न करा. जसे परिसाला लोखंड लागले, की त्याचे सोने होते. तसेच तुम्ही ज्यांच्या सहवासात राहता त्यांच्या वागण्याचा, बोलण्याचा तुमच्यावर परिणाम होत असतो. त्यांचे गुण किंवा अवगुण तुमच्यात उतरत असतात. तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत राहिले पाहिजे आणि वाईट लोकांची संगत टाळली पाहिजे.
संगतीचा परिणाम एकदम थोडक्यात सांगायचा म्हणजे;
जर तुम्ही ५ हुशार लोकांच्या संगतीत राहाल, तर ६वे हुशार तुम्ही असाल…
जर तुम्ही ५ यशस्वी लोकांच्या संगतीत राहाल, तर ६वे यशस्वी व्यक्ती तुम्ही असाल…
जर तुम्ही ५ करोडपती लोकांच्या संगतीत राहाल, तर ६वे करोडपती तुम्ही असाल…
आणि जर तुम्ही ५ टवाळ लोकांच्या संगतीत राहाल, तर ६वे टवाळखोर तुम्ही असाल…
तुमची सांगत चांगली आहे ना? तुम्हाला तुमच्या संगतीमुळे चांगले वाईट काय अनुभव आलेत. आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
कॅश क्रंच म्हणजेच मराठीत आपण ‘कडकी’ म्हणतो… ही फायनान्स मिसमॅनेजमेंटमुळे व्यवसायात आलेली परिस्थिती असते. उदा. कामगारांना पगार द्यायला पैसे नसणे, भाडे द्यायला पैसे नसणे, दैनंदिन खर्चाला पैसे नसणे, घरखर्चालाही पैसे नसणे… ही परिस्थिती व्यवसायाचा खप कमी होणे, उधारी वसूल न होणे, व्हेंडरकडून पेमेंट उशिरा मिळणे यामुळे उद्भवते. अशावेळी ईएमआय बाऊन्स होतात व बँकेत क्रेडिट स्कोअरची वाट लागते. त्यामुळे नवीन कर्ज मिळण्यातही अडचणी निर्माण होतात.
कॅश क्रंचचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे बुध्दी चालायची बंद होते. सगळे लोक पैसे मागत असतात व तुम्हाला मालक असूनही तोंड चुकवून पळावे लागते. कर्मचाऱ्यांना पगार वेळेत न दिल्याने कंपनी बुडणार आहे, अशा अफवा पसरतात, कंपनीचे एकूण वातावरण खूप वाईट होते व बरेच चांगले कर्मचारी नोकरी सोडून जातात. चेक बाऊन्स झाल्याने बिझनेस मार्केटमधून उठला, असा समज होतो.
अनेकदा तुमच्याकडे केलेल्या कामाचे पैसे येणार असतात, तुम्ही त्याच्या आशेवर असता. पण या मधल्या वेळात तुम्हाला पगार द्यायचे असतात, भाडं, वेगवेगळी बिलं भागवायची असतात. प्रत्येक उद्योजकाला कधी ना कधी या परिस्थितीचा सामना करावाच लागतो. त्यामुळे ‘कॅशफ्लो मॅनेजमेंट’ ही कुठल्याही उद्योजकासाठी सर्वात अवघड गोष्ट असते, विशेषतः लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी. बँकासुद्धा सहजासहजी भांडवल उपलब्ध करून देत नाहीत. तर मग करायचं तरी काय?
यासाठी खात्रीलायक उपाय म्हणजे वर्षभराच्या मूलभूत खर्चाएवढा निधी राखीव असावा. उधारीची मर्यादा काटेकोरपणे पाळावी. वैयक्तिक खर्चासाठी पैसे गाठीला बांधून ठेवलेले बरे. भल्या भल्या व्यवसायिकांना कॅश क्रंचमुळे भिकारी होताना पाहिले आहे. कॅश क्रंचच्या कारणांमुळे छोटेच काय, पण मोठे मोठे उद्योग बुडाले आहेत. एकूण व्यवसायाच्या १०% उलाढालीमुळे कॅश क्रंच मिटवता येतो. परंतु तो शास्त्रशुध्दपणे मॅनेज केला पाहिजे. ‘कडकी’तून बाहेर पडण्यासाठी काही टिप्स आजच्या आणि उद्याच्या लेखात देत आहे.
१. विक्रेत्यांशी चर्चा करा
तुमच्याकडे किती पैसे आणि कधी येणार आहेत यावर कदाचित तुमचे नियंत्रण नसेल, परंतु तुमच्याकडून जाणाऱ्या पैशांवर तुम्ही नक्कीच नियंत्रण करू शकता. विक्रेत्यांना/पुरवठादारांना काही कालावधीसाठी थांबवता येईल का ते बघा किंवा एकदम सर्व पैसे देण्याऐवजी टप्प्याटप्याने पैसे देणं हा सुद्धा चांगला मार्ग आहे. बरेच व्यावसायिक आपल्या विक्रेत्यांशी बोलायला कचरतात. त्यांना वाटते की, आपली ‘इज्जत’ कमी होईल किंवा समोरची व्यक्ती कमी पैसे घ्यायला तयारच होणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या. विक्रेते/पुरवठादार सुद्धा तुमच्यासारखेच व्यावसायिक असतात. त्यांनीसुद्धा अशा परिस्थितीचा सामना केलेला असतो. त्यामुळे ते तुमची अडचण समजू शकतात.
तसेच त्यांनासुद्धा आपला ग्राहक (तुम्ही) टिकवायचा असतो. जर तुमच्यासोबतचा त्यांचा अनुभव चांगला असेल तर ते नक्कीच तुमची मदत करतील. जेणेकरून दोघांचा फायदा होईल. त्यामुळे किती पैसे येणार आहेत याचा अंदाज घ्या. एकूण किती पैसे द्यावे लागणार आहेत? त्यात कुणाला तातडीने द्यावे लागतील? कुणाला काही कालवधीसाठी थांबवू शकतो? त्यांना फोन करा, चर्चा करा. आणि त्यानुसार नियोजन करा.
२. अनावश्यक खर्च लांबणीवर टाका
‘कडकी’ चालू असताना आपला खर्च कुठे होतोय याचा बारीक विचार करा. त्यातील काही खर्च लांबणीवर टाकता येतात का किंवा पूर्णपणे काढून टाकता येतात का ते पाहा. तात्पुरत्या स्वरूपात, तुम्ही मालाचा आठवड्याला/महिन्याला जो स्टॉक भरून ठेवता तो कमी भरणं हा सुद्धा चांगला पर्याय आहे. जेवढा खर्च कमी कराल तेवढे जास्त पैसे तुमच्याजवळ खर्चासाठी उपलब्ध होतील.
३. निरुपयोगी गोष्टी विकून टाका
समजा एखादे नवीन उत्पादन करण्यासाठी एखादी मशीन दोन वर्षांपूर्वी तुम्ही विकत घेतली होती. पण तुमचे नियोजन फसले. ती मशीन तुमच्या कार्यालयात तशीच पडून आहे. ती विकू शकता का? कदाचित तुमच्याबाबतीत मशीन नसेल, एखादा कंप्यूटर, गाडी किंवा इतर काहीही असू शकते. जे तुम्ही विकू शकता. अशा गोष्टींचा अंदाज घ्या. त्यांची किंमत ठरवा. ऑनलाईन किंवा ऑफलाईन विक्रीस ठेवा. विकताना जास्त आढेवेढे न घेता व्यवहार शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला लगेचच पैसा उपलब्ध होईल.
४. पेमेंटवर सूट द्या.
आपल्याच पैशांसाठी वाट बघत बसणं जिकिरीचं असतं. अशावेळी तुमच्या सर्व ग्राहकांशी संपर्क साधा आणि पेमेंट बाबत विचारा. काहींची मुदत संपायला (नूतनीकरण) अजून वेळ असेल. अशा लोकांना थोडीफार सूट (विशेष लाभ) देऊ शकता. त्यांना परिस्थितीची कल्पना द्या. ‘जर तुम्ही मुदतपूर्तीच्या आधी पेमेंट केलं, तर तुम्हाला सूट मिळेल’ असं सांगून बघा. अर्थात, सूट देताना कमीत कमी द्या. मुख्य उद्दिष्ट आपल्याला लागणारे पैसे उभे करणं हे असावं. अशाच प्रकारे सर्व ग्राहकांशी बोलून घ्या. कदाचित तुम्हाला आश्चर्यचकित करून टाकणारे परिणाम मिळतील आणि तुमची पैशांची चिंता मिटेल.
५. फ्लॅश सेल सुरु करा
तुमच्याकडे तुमच्या ग्राहकांचा डेटाबेस असेलच. त्यांचे फोन नंबर, ईमेल आयडी असतील. कदाचित त्या ग्राहकांनी कोणत्या वस्तू किंवा सेवा आधी वापरल्या आहेत याची सुद्धा माहिती असेल. याच ग्राहकांसाठी तुमच्या सर्वात लोकप्रिय वस्तू/सेवांवर एखादी ऑफर सुरु करा. किंमत आकर्षक ठेवा. फक्त डिस्काउंट देऊ नका. ऑफर अशी असली पाहिजे की, लोकांचं लक्ष आकर्षून घेईल आणि त्यांना खरेदी करायला भाग पाडेल.
तसेच ही ऑफर मर्यादित वेळेसाठीच ठेवा, कदाचित ४८ तास किंवा पुढील ५ दिवस. त्यानंतर ही ऑफर कधीच असणार नाही असं सांगा. ही माहिती देणारा संदेश तुमच्या सर्व ग्राहकांना आणि संभाव्य ग्राहकांना बल्क ईमेल/मेसेज करा. फक्त एकच ईमेल पाठवून थांबू नका. अनेक लोक रोज ईमेल बघत नाहीत. त्यामुळे तुम्ही नियमितपणे ईमेल/मेसेज पाठवून वेळ संपत चालल्याची आठवण करून दिली पाहिजे. तुमची सेल्स आणि मार्केटिंग टीम सुद्धा व्यक्तिशः फोन करून जास्तीत जास्त बिझनेस मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात.
६. वस्तू/सेवांच्या किंमतीवर पुनर्विचार करा
किंमत वाढवणे हा सुद्धा व्यवसायाचा एक भाग आहे. आणि जेव्हा तुम्ही आर्थिक अडचणीत असाल, तेव्हा या पर्यायाचा नक्कीच विचार करू शकता. अर्थात वस्तूंचे/सेवांचे दर वाढवण्याआधी पूर्ण विचार करा. तुमचा एकूण खर्च किती आहे? त्याबदल्यात तुम्ही किती रक्कम आकारत आहात? तुम्ही दर वाढवून बराच कालावधी झाला आहे का? तुमच्या प्रतिस्पर्ध्यांशी तुलना करता तुमचे दर कसे आहेत? दर वाढवणे हा कॅश क्रंच मधून बाहेर निघण्याचा एक मार्ग आहे. परंतु, नियोजनबद्धपणे वाढवले पाहिजेत. नाहीतर हा पर्याय अंगलट आला तर, आहेत ते ग्राहक सुद्धा तुम्हाला सोडून जातील.
७. कर्मचारी कमी करा, पगार लांबवा
हा सर्वात शेवटचा पर्याय असला पाहिजे. कनिष्ठ/नवीन कर्मचाऱ्यांपेक्षा तुलनेनं वरिष्ठ/जुने कर्मचारी कंपनीची परिस्थिती समजून घेऊ शकतात. पुढे अडचण येणार आहे, असे लक्षात येताच आपल्या मुख्य सहकाऱ्यांशी चर्चा करा. यातून बाहेर पडण्यासाठी वर दिलेले पर्याय वापरून काय करता येईल याची योजना बनवा. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांचे सहकार्य मागा.
शेवटी, एवढं सगळं करूनही समस्या सुटली नाही, तर सर्वांचे पगार करण्याइतपत पैसे कंपनीजवळ नसतील. त्यामुळे परिस्थिती सुधारेपर्यंत पगार मिळू शकणार नाही, असे सांगा. अर्थात कुठल्याही कर्मचाऱ्याला हे आवडणार नाही. परंतु अनेक कर्मचाऱ्यांनी सुद्धा कंपनीच्या वाढीसाठी भरपूर मेहनत घेतलेली असते. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहात, ते तुमची साथ देऊ शकतात. अगदीच गरज पडली तर काही कर्मचारी कामावरून कमी करा.
वर नमूद केलेल्यापैकी कोणतीही पद्धत स्वीकारा, परंतु कृती करा. फक्त डोळेझाक करून परिस्थिती अजून बिघडू देऊ नका. आणि हो, एकदा का कॅश क्रंच मधून बाहेर पडलात की, पुढची पायरी म्हणजे परत अशी अडचण येऊ नये म्हणून प्लॅन बनवा. किती पैसे येतात, किती जातात याचा नियमित आढावा घ्या.
मित्रहो आपल्या मराठी भाषेत असे अनेक जुनाट विचार व म्हणी आहेत, ज्या आज भंगारात काढण्याची गरज आहे. उदा. अंथरूण पाहून पाय पसरावे, कर्ज काढू नये, समुद्र पार करणे पाप आहे असे अनेक बुरसटलेले विचार व म्हणी आहेत. अशा विचारांचा पगडा गेली कित्येक वर्षे समाजावर आहे.
कायतर म्हणे; पैसे व्याजाने लावू नये, नाहीतर कुटुंबाचे बरेवाईट होते मग इतक्या मोठ्या बँकांना का शाप लागत नाहीत. त्यातल्या त्यात अंथरूण पाहून पाय पसरावे सारख्या म्हणी आपली विचारसरणी व दृष्टिकोण संकुचित करतात. म्हणजे तुम्हाला १० हजार पगार आहे, तर तेवढ्यात काय येईल ते घ्या व जगत रहा, आपली २ एकर जमीन आहे, तर २ म्हशी पाळू व त्यात किती उत्पन्न येईल तेवढ्यातच जगत राहू अशी अनेक उदाहरणे मिळतील.
आम्ही अनेक उद्योजकांबरोबर काम करतो. खूप संकुचित व लहान विचार करून एखादा व्यवसाय, प्रोडक्ट किंवा कंपनी स्थापन केल्यास ती सुरूही होत नाही व झालीच तर ती खूप मोठी होत नाही. एकाच गावातील दोन शेतकऱ्यांची उदाहरणे सांगते म्हणजे तुम्हाला समजेल. तुकाराम; लहान विचारसरणीचा २ एकर बागायत जमिनीचा मालक. आपल्या ऐपतीनुसार एक जर्सी गाय विकत घेतो, त्याला लागणारा चारा काही जागेत पिकवतो. गाय रोज १५ ते २० लीटर रोज दूध देते, त्याचे त्याला रोज ४०० रुपये मिळतात. चारा, खाद्य, औषधोपचार याचा रोजचा खर्च २०० रुपये, त्याला शिल्लक राहतात केवळ २०० रुपये, म्हणजे दरमहा ६००० रुपये. तसं बघायला गेलं तर ह्यात फायदा काहीच नाही. तुकारामाने आपल्या श्रमाचा मोबदला जर पकडला, तर ६००० रुपयाचे काहीच शिल्लक राहणार नाहीत. म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरणारा तुकाराम हा तोट्यात व्यवसाय करतो आहे.
सखाराम, हा त्याच गावातील दुसरा शेतकरी, धाडसी व उद्योगी विचारसरणीचा. त्याच्याकडेही २ एकर बागायत शेती. त्याने या शेतीचा व सरकारी योजनेचा फायदा घेतला व पंधरा जर्सी गायींना पुरेल एवढा गोठा बांधला. योजनेवर त्याला काही अनुदान मिळाले, तसेच गावातील डेअरीबरोबर दूध पुरवठ्याचा करार करून १५ गायी खरेदी करण्यासाठी ८०% रक्कम मिळवली. म्हणजे हातात केवळ २ ते ३ लाख रुपयाचे भांडवल असताना त्याने ५ लाखांचा गोठा उभारला, ८ लाख रुपये किंमतीच्या १५ गायी विकत घेतल्या व इतर साधनसामुग्रीही घेतली.
सर्व काम हे यांत्रिक व शास्त्रशुध्द पध्दतीने होत असल्यामुळे कमी मजुरीत व कमी खर्चात काम होते व गायीही जास्त दूध देतात. जास्त दूध असल्याने त्याला १ रुपया जास्त दर मिळतो व खाद्य खरेदी जास्त असल्याने त्याला ५% कमी दराने खाद्य मिळते. एका गायीपासून रोज ५०० रुपयाचे दूध मिळते. १५ गायींचे रोज रुपये ७५००. खाद्य, औषधपाणी, ३ मजूर मिळून रोज ४५०० खर्च होतो. रोज निव्वळ नफा ३००० हजार रुपये. महिना १० ते १२ गाड्या शेणखत निघते. ते रुपये ४ हजार प्रती गाडी याप्रमाणे खपते, त्याचे महिना ३० ते ४० हजार मिळतात. एकूण महिना फायदा रुपये १२,५००० पर्यंत मिळतो.
आता मला सांगा, तुम्हाला कोणती म्हण मान्य आहे, “अंथरूण पाहून पाय पसरावे” की “आधी भरपूर पाय पसरा, मग अंथरूण गोळा करा?” तेव्हा जुने बुरसटलेले विचार भंगारात घाला, आधुनिक विचारसरणीचा स्वीकार करा.
तुम्हालाही अशा काही म्हणी माहित असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या गोष्टींतून उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेलला आताच सब्स्क्राइब करा.
विदर्भातील अमरावती विभागात येणारा यवतमाळ हा जिल्हा कापूस उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. म्हणूनच यवतमाळ जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखले जाते. यवतमाळ जिल्ह्याच्या सीमा ह्या दक्षिण दिशेला नांदेड जिल्हा व तेलंगणा राज्य, पश्चिमेस हिंगोली व वाशिम जिल्हे, उत्तरेस वर्धा व अमरावती हे जिल्हे तर पूर्वेस चंद्रपूर जिल्ह्याला लागून आहेत.
आपण प्रत्येक जिल्ह्याचे उद्योग पाहण्याआधी त्यातील रस्ते, नैसर्गिक साधनसंपत्ती, नद्या, पाणीपुरवठा, वीज निर्मिती, दळणवळणाच्या इतर सोयी सुविधा यांचा बारकाईने अभ्यास करणार आहोत. कारण या प्रत्येक गोष्टींचा व्यवसायात अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो. त्यानंतर त्या-त्या जिल्ह्यात चालणारे उद्योग व नवीन उद्योग निर्मितीला असणारा scope याविषयी आपण चर्चा करणार आहोत. व शेवटी त्या जिल्ह्यातील आता सध्याच्या घडीला असणारे यशस्वी उद्योजक कोण आहेत. याबद्दल चर्चा करणार आहोत.
नॉर्थ-साऊथ कॉरिडोर हा राष्ट्रीय महामार्ग (National Highway -07) या जिल्ह्यातून जातो. त्यामुळे भारताच्या उत्तरेकडील राज्यांपासून ते थेट दक्षिणेकडील राज्यांना यवतमाळ जिल्हा जोडला गेला आहे. या मार्गावर पांढरकवडा हे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने इतर जिल्ह्याच्या तुलनेत यवतमाळ मधून रस्ते वाहतूक ही अतिशय सोपी झालेली आहे. पूर्ण भारताला दक्षिणोत्तर जोडणारा नॉर्थ-साऊथ कॉरिडोर महाराष्ट्राच्या नागपूर-वर्धा-यवतमाळ या तीन जिल्ह्यातून जातो. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर-नागपूर (National Highway – NH204) उमरखेड-आर्णी-यवतमाळ-कळंब या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडतो. या मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र-मराठवाडा व विदर्भ एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे जवळजवळ अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र राज्यात रस्त्याने व्यवसायजोडणी शक्य आहे.
पैनगंगा नदी ही यवतमाळ जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पैनगंगा नदी यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरुन वाहते. पैनगंगा नदीच्या उपनद्या या जिल्ह्याच्या अंतर्गत भागातून वाहत येऊन पैनगंगा नदीला मिळतात. पैनगंगा व तिच्या उपनद्यातून होणारा पाणीपुरवठा हा या जिल्ह्यातील पाण्याचा स्रोत आहे. पावसाचे प्रमाण हे कमी असून परतीचा मान्सून यवतमाळ जिल्ह्यात जोरदार बरसतो. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. येथील जास्तीत जास्त लोकजीवन हे शेतीवर अवलंबवून आहे. पाणीपुरवठ्याच्या तशा कोणत्याही ठळक योजना या जिल्ह्यासाठी उपलब्ध नाहीत.
नेर, बाभूळगाव, कळंब, राळेगाव, दिग्रस, दारव्हा, पुसद, महागाव, उमरखेड, घाटंजी, पांढरकवडा, मारेगाव, झरी जामणी हे यवतमाळ जिल्ह्यातील तालुके आहेत. लघुद्योगाच्या मोठ्या प्रमाणावर वाढीसाठी यवतमाळ जिल्ह्यात पोषक वातावरण आहे. या जिल्ह्यात अकुशल कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र या जिल्ह्यातील लोकांची शिकण्याची वृत्ती ही फार चांगली आहे. शिक्षणासाठी मोठमोठ्या शैक्षणिक संस्था (काही तुरळक संस्था वगळून) या जिल्ह्यात नाहीत. गुणग्रहणाची उत्तम क्षमता या जिल्ह्यातील लोकांजवळ आहे. याशिवाय येथील तरुण शारीरिक क्षमतेने चांगले असल्याने त्यांच्यातील कलागुण ओळखून त्याच्या वाढीसाठी वाव मिळाला तर देशासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू या जिल्ह्यातून निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. आजवर क्षमता असून ही त्या गुणांना पैलू न पाडल्यामुळे आपला ठसा उमटवण्यात अपयशी ठरल्याचे पाहून खंत वाटते.
आर्थिक उत्पन्नाचे स्रोत सुध्दा कमी आहेत. त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची हुनर इथल्या माणसांमध्ये आहे. आयटी, manufacturing हे उद्योग वाढण्याच्या आधी शेतीपूरक उद्योग वाढीस लावण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील मोठे खाद्यान्नाचे ब्रँड तयार करण्याची क्षमता यवतमाळ जिल्ह्याची आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन करत असल्याने या जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा ही ओळख प्राप्त झाली आहे. मात्र कापसावर प्रक्रिया करणारी मोठी केंद्रे या जिल्ह्यात नाहीत. त्यामुळे जिल्ह्याची आर्थिक बाजू तशी फार भक्कम होताना दिसत नाही. उत्तरेकडे आता कापसावर प्रक्रिया करणारा एक मोठा प्रकल्प अमरावती मध्ये निर्माण होत आहे. त्याचा फायदा यवतमाळला होऊ शकतो. शेती, सेवा, शेतीपूरक उद्योग, हातमाग, यंत्रमाग, आयटी, शिक्षण, बँकिंग व manufacturing उद्योग येणाऱ्या काळात या जिल्ह्यात वाढणार आहेत. तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत स्वतःची ओळख जपत हा जिल्हा लवकरच समृध्दीचे उद्दिष्ट साध्य करेल याची खात्री वाटते. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मुंबई याठिकाणी व्यवसाय करण्याऐवजी यवतमाळ नवीन व्यवसाय उभारणे ही सोपी प्रक्रिया आहे. निर्माण होणारी उत्पादने नागपूरच्या बाजारपेठेत विकण्यासाठी सोयीस्कर आहे. विज्ञानाच्या प्रगतीने जग जवळ आले आहे. त्यामुळे जगभरात सर्वत्र ही उत्पादने विकली जाऊ शकतात.
पुढील जिल्हा – वाशिम
वाचक मित्रांनो, तुम्हाला हा लेख कसा वाटला, हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच, तुमच्या जवळच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. याव्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरील लेख वाचायला आवडेल, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
नमस्कार मित्रांनो, स्टार्टअप विश्वाच्या नव्या कोऱ्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो मला सांगा समजा तुम्हाला Market मध्ये एक Product launch करायचं आहे. असं Product की जे लोकांसाठी खूप उपयोगी असेल, असं Product की ज्यामुळे लोकांचं आयुष्य बदलून जाईल,या Product चा Sale इतका जास्त होईल की तुम्ही मालामाल व्हाल! एक मिनिट… पण असेल, जाईल, होईल या सगळ्या भविष्यातल्या गोष्टी झाल्या ना; यापैकी अजून एकही गोष्ट झालेली नाही, हे सगळं तुम्हाला सध्या फक्त वाटतंय. यातल्या गोष्टी खऱ्या ठरण्यासाठी तुम्हाला वर्तमानात यावं लागेल, म्हणजे आधी तुम्हाला तुमचं Product Launch करावं लागेल. तर आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. याच Product बद्दल म्हणजेच Minimal Viable Product बद्दल. चला मग करूया सुरुवात.
What is MVP (Minimal Viable Product)?
MVP किंवा Minimal Viable Product म्हणजे असं एक Basic Product की ज्यामध्ये तुमच्या Final Product मध्ये असणारे सगळे Main Features आहेत, पण ते इतकंही परफेक्ट नाहीये की, ते तुमच्या Final Product शी Compete करू शकेल बर हे समजून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या App चं उदाहरण पाहूया WhatsApp चं! तुम्हाला आठवतंय का जेव्हा WhatsApp launch झालं होतं, तेव्हा त्यात फक्त दोनच Features होते. Text Messaging आणि Voice Messaging. हे ते Features होते जे की Normal Users पर्यंत वापरण्यासाठी आले होते. पण त्याहीआधी WhatsApp ने त्यांचं Minimal Viable Product बनवलं होतं जे की काही लोकांनाच वापरण्यासाठी मिळालं होतं आणि त्या Version मध्ये फक्त एक महत्वाचं feature होतं ते म्हणजे Text Messaging चं! जेव्हा WhatsApp ला समजलं की आपलं हे MVP लोकांना आवडतंय, तेव्हाच त्यांनी यावर आणखी काम करायला सुरुवात केली.
MVP launch करण्यामागची कारणं
Eric Ries या अमेरिकन उद्योजकाने MVP या concept चा शोध लावला. MVP का launch केलं पाहिजे हे सांगण्यासाठी त्यांनी तीन महत्त्वाची कारणं सांगितली.
१. पहिलं कारण म्हणजे MVP मुळे तुमचं जे Dream Product आहे, ते लवकरात लवकर Market मध्ये उतरवता येतं.
२. दुसरं कारण म्हणजे तुम्हाला हे समजतं की Customer तुमच्या Product ला कसं React करतायेत. तुम्हाला जसं वाटलं होतं, तसं ते Actually काही Value Generate करतंय का? हे समजायला मदत होते.
३. तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या वेळेचा आणि पैशाचा खर्च कमी होतो. आता MVP असल्यामुळं साहजिक आहे Final Product च्या Comparison मध्ये याला बनवायला कमी वेळ आणि पैसा खर्च होणार आहे. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू म्हणजे जर तुम्ही एखादं Product मोठ्या Scale वर Launch केलं, पण ते लोकांना आवडलंच नाही तर यात नुकसान कोणाचं आहे? तुमचं! पण जर हेच Product तुम्ही MVP च्या रुपात Launch केलं आणि लोकांना ते नाही आवडलं, तर आधीच्या तुलनेत इथं होणार नुकसान हे खूप कमी आहे. बघा आहे का नाही Double फायदा?
तर मित्रांनो तुम्हाला आजचा स्टार्टअप विश्वाचा लेख कसा वाटला आम्हाला Comment मध्ये नक्की सांगा. MVP प्रमाणेच अनेक Interesting Startup Terms आम्ही याआधीच्या लेखामध्ये सोप्या भाषेत Explain केल्या आहेत. जर खरंच तुम्हाला Startup सुरु करायचा असेल तर या Terms चा फायदा नक्कीच तुम्हाला होईल याची आम्हाला खात्री आहे. बाकी आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच Like करा आणि जास्तीत तुमच्या उद्योजक मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. भेटूया पुढच्या भागात अशाच एका Interesting Term सोबत. तोपर्यंत राम राम.
Agro Tourism – सिमेंटच्या शहरांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे, बेसुमार औद्योगिकरण आणि वाढत जाणारे प्रदूषण यामळे शहरं बकाल होत आहेत. मोठ्या प्रमाणावर गावागावातील लोक शहराकडे नोकरीसाठी येत आहेत. ज्यामुळे शहरांमध्ये गर्दी वाढत आहे. अशावेळी या गर्दीला गरजेचा असतो मोकळा श्वास आणि एक विरंगुळ्याची जागा.
यासाठी प्रत्येक आठवड्याच्या शेवटी म्हणजेच विकेंडला सगळे जात असतात प्रेक्षणीय किंवा रम्य ठिकाणी जिथे आपल्या कुटुंबासोबत त्यांना निवांत वेळ घालवता येईल आणि रोजच्या जेवणापेक्षा छान, वेगळं काहीतरी खाता येईल. लोक हे पर्यटन नेमके कशासाठी करतात. त्यांचं स्वतःचं शहर सोडून, देश सोडून का जातात पर्यटनाला. तर Enjoy करता यावं, कामातून थोडीशी उसंत मिळावी. सुट्टीचा दिवस आनंदात घालता यावा, एक नवीन अनुभव मिळावा म्हणून.
असं म्हणतात “गरज हीच शोधाची जननी” आणि नेमकी हीच गरज ओळखून आपण आपल्या उद्योगाला सुरुवात करू शकतो. कृषी या विषयाचा तुम्हाला गंध असेल किंवा मूळातच शेती हा तुमचा व्यवसाय असेल, तर शेती करत करत किंवा अगदी पूर्णवेळ उद्योग म्हणून “Agro Tourism” म्हणजेच “कृषी पर्यटन” या व्यवसायाकडे बघू शकता.
नेमके हे कृषी पर्यटन म्हणजे काय हे आता आपण पाहणार आहोत. शहरात राहात असताना अनेकांना ग्रामीण जीवनाबद्दल प्रचंड कुतूहल असते. त्यांचे राहणीमान, शेती, शेतीचे व्यवस्थापन, पशुपालन, गावरान भोजन आणि निसर्गरम्य वातावरण याबद्दल प्रचंड आकर्षण असते. धकाधकीच्या जीवनातून एक दिवस हे सर्व याची देही, याची डोळा अनुभवता यावे यासाठी लोक कृषी पर्यटन करतात. हे निव्वळ पर्यटन नाही तर एक प्रकारचे संस्कार आणि सामाजिक जाणिवेचा उपक्रम आहे.
तुम्हाला माहित आहे का की भारतामध्ये Travel आणि Tourism industry ही Service Sector मधील सर्वात मोठ्या Industry पैकी एक आहे. २०१८ साली भारतामध्ये Travel आणि Tourism Industry हि २३४ बिलियन डॉलरची होती. २०१९ मध्ये देशातील एकूण Jobs पैकी ८% Jobs हे या Industry ने देशाला दिले होते. भारतामध्ये दर वर्षी करोडो लोक पर्यटनाला जातात. इतकंच नाही तर अनेकी लोक दरवर्षी बाहेरच्या देशातून भारतामध्ये फिरायला येतात. भारतामध्ये अनेक अशी पर्यटन स्थळं आहेत, ज्यांना करोडो लोक दरवर्षी भेट देतात.
या कृषी पर्यटनामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आपण सामावून घेऊ शकतो? तर त्यासाठी अनेक पर्याय आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय शेती पद्धत आणि तिचे महत्त्व, पशुपालन पद्धत, चुलीवरच्या जेवणाची पद्धत तसेच बैलगाडी, घोडागाडी, घोड्याची सवारी, कुकुटपालन आणि नैसर्गिक साधन संपत्तीची माहिती व महत्त्व अशा गोष्टींचा समावेश होऊ शकतो. यासाठी तुमच्याकडे शेती असणे आवश्यक आहे किंवा शेत जमीन. त्यावर इतर गोष्टी तुम्ही विकसित करू शकता. तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा हा प्रकल्प उभा करणार आहात. त्या ठिकाणी जवळच असलेल्या पर्यटन स्थळांची माहिती घेऊन त्याचाही वापर तुम्ही यासाठी करू शकता.
तुम्ही जर शेतकरी असाल तर शेतीसोबत जोडधंदा म्हणून हा व्यवसाय उभा करू शकता. यासाठी भेट देणाऱ्या लोकांसाठी ठराविक तिकीट रक्कम तसेच ग्रुपसाठी काही खास ग्रुप बुकिंग सवलत आणि विध्यार्थ्यांसाठी किंवा शालेय सहलींसाठी खास ऑफर ठेऊ शकतो. अशापद्धतीने शेती सांभाळत पर्यटन हा उद्योग खास करून शेतकऱ्यांना एक नवी आर्थिक उभारी देऊ शकतो. तसेच या माध्यमातून निसर्ग संवर्धनासाठी आपण जागरूकता निर्माण करू शकतो.
या संकल्पनेविषयी तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.
भारतातली पहिली शिपयार्ड कंपनी, पहिली विमान कंपनी सोलापुरात जन्मलेल्या एका महाराष्ट्रीयन माणसाने चालू केली असं सांगितलं तर ते अनेकांना विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. त्या माणसाचं नाव आहे वालचंद हिराचंद दोशी.
२३ नोव्हेंबर १८८२ रोजी हिराचंद दोशी व सौ. राजू दोशी यांच्या पोटी वालचंद यांचा जन्म सोलापूरमध्ये झाला. त्यांचे वडील सुती कपड्याचे व्यापारी होते. वालचंद यांचे वालचंदजी १८९९ मध्ये सोलापूरातून मॅट्रिक झाले आणि त्यांनी पुढील शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज व पुणे येथील डेक्कन कॉलेज येथून इतिहास व अर्थशास्त्र या विषयातून पूर्ण केले. त्यानंतर ते वडिलांच्या व्यवसायात आले. वडिलांसोबत कपड्याचा व्यापार करणाऱ्या वालचंद यांच्या लक्षात आलं की, आपलं काय या व्यवसायात मन रमत नाही. त्यांनी स्वत: बांधकाम कंत्राटदार होण्याचा निर्णय घेतला
Walchand Hirachand Doshi
तो काळ होता जेव्हा भारत ब्रिटिशांच्या ताब्यात होता आणि या ब्रिटिश भारतात गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी नुकतीच रेल्वेची सुरुवात होती, तर दुसरीकडे उद्योगपटलावर जमशेदजी टाटांसारख्या दिग्गजांचा जन्म होत होता.
या परिस्थितीत कौटुंबिक व्यवसायात न अडकता वालचंद यांनी रेल्वेमध्ये कारकून असलेले आपले सहकारी लक्ष्मण बळवंत पाठक यांच्यासोबत, पाठक वालचंद प्रायव्हेट लिमिटेड ही कन्स्ट्रक्शन कंपनी चालू केली. संपूर्ण भारतीय असणारी ही कंपनी त्यावेळची गरज होती. त्यामुळं खूप कमी वेळात कंपनीनं जोम धरला.
कामाचे तसेच कर्मचाऱ्यांचे योग्य व्यवस्थापन, कामे वेळेत पूर्ण करण्याची सचोटी आणि आर्थिक रक्कम उभी करण्याचे सामर्थ्य यामुळं वालचंद यांच्या कंपनीने अल्पावधीतच गोऱ्या सरकारचा विश्वास कमावला. यामुळं झालं असं की, बांधकामाचे मोठमोठे प्रकल्प वालचंद यांच्या कंपनीला मिळू लागले. ‘बार्शी लाईट’ हा सात किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग बांधण्याचं काम त्यांनी अतिशय कुशलतेने आणि वेळेत पूर्ण करून दिले. या त्यांच्या कामाकडे पाहून त्यांना बोरीबंदर ते चिंचपोकळी व पुढे करी रोड ते ठाणे आणि मग ठाणे ते कल्याण या रेल्वेमार्गांच्या चौपदरीकरणाचेही काम मिळाले. ते सुद्धा त्यांनी चोख व वेळेत पूर्ण केले. या त्यांच्या उत्तम आणि वेळेत काम करण्याच्या लौकिकामुळे त्यांना रेल्वेची, सार्वजनिक बांधकाम खात्याची, धरणांची, पुलांची तसेच मुंबई महानगरपालिका इमारत बांधणीची व इतर कामेही मिळाली. अशा प्रकारच्या कार्यपद्धतीमुळे बांधकाम क्षेत्रात त्यांचा पूर्ण जम बसला.
काही कालवधीनंतर पाठक यांनी कंपनीतून आपली भागीदारी काढून घेतली. मात्र व्यवसायाची वाढती मागणी आणि आपल्या कंपनीचा विस्तार करण्यासाठी १९२० मध्ये वालचंद यांनी आपली ही कंपनी टाटा समूहामध्ये विलीन केली.
वालचंद यांच्या कंपनीने टाटा समूहासोबत अनेक मोठे प्रकल्प पूर्ण केले. जसे की मुंबई पुण्याला जोडणारा बोर घाटातील रेल्वे बोगदा, तानसापासून मुंबईला पाणी मिळण्यासाठी टाकलेल्या गेलेल्या मोठ्या पाईपलाईन, याशिवाय सिंधू नदीवरील कलबाग पुल, सध्याच्या म्यानमारमधील इरावती नदीवरील पूल हे सुद्धा वालचंद त्यांच्याच नेतृत्वाखाली पूर्ण झाले. १९३५ मध्ये टाटांनी आपला समभाग विकला, यानंतर या कंपनीचं नाव हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी असं ठेवलं गेलं. वालचंद यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी चांगलीच नावारूपाला आली.
वालचंद यांनी 1908 मध्ये ‘वालचंदनगर इंडस्ट्रीजची’ स्थापना केली. जिथे साखर, साखर कारखाना मशिनरी, प्लास्टिकच्या वस्तू, सिमेंट प्लांट, पेपर, बॉयलर, टर्बाइन अशा अनेक वस्तू बनवल्या जातात.
1919 मध्ये पहिल्या महायुद्धानंतर जलवाहतुकीचं महत्त्व वाढू लागलं. ही संधी लक्षात घेऊन ग्वाल्हेरचे राज्यकर्ते शिंदे यांच्याकडून वालचंद यांनी एस एस लॉयल्टी ही बोट विकत घेतली आणि मालवाहतूक चालू केली. ब्रिटिशांच्या मक्तेदारीलाच आव्हान दिल्यामुळे त्यांच्यापुढे समस्यांचे अनेक डोंगर ब्रिटिश कंपन्यांनी उभे केले. त्यामुळे त्यांना खूप तोटा व त्रास सहन करावा लागला. वालचंद यांची ही कंपनी परदेशी कंपन्यांनासोबत दराबाबत चांगलीच स्पर्धा करत होती. सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन या नावाने चालू केलेली ही भारतातली पहिली जलवाहतूक कंपनी.
SS Loyalty, 5 April 1919
5 एप्रिल 1919 रोजी एस एस रॉयल्टी या बोटीने मुंबई ते लंडन हा पहिला प्रवास पूर्ण केला आणि म्हणूनच पाच एप्रिल हा दिवस नॅशनल मेरीटाईम डे म्हणजेच समुद्री दिन म्हणून साजरा केला जातो. १९५० पर्यंत वालचंद या कंपनीचे प्रमुख होते. तोपर्यंत किनारी भागात केल्या जाणाऱ्या वाहतुकीचा २१ टक्क्यांहून अधिक भाग वालचंद यांच्या कंपनीने काबीज केला होता. महात्मा गांधीनी स्वतः हरिजन आणि बहिष्कार या वृत्तपत्रांमधून पहिली स्वदेशी कंपनी असा या कंपनीचा उल्लेख केला होता.
पुढे 1940 मध्ये विशाखापट्टणम येथे त्यांनी सिंधिया शिपयार्ड ही जहाजबांधणी कंपनी सुरु केली. ही देखील पहिली स्वदेशी शिपयार्ड कंपनी ठरली. या कंपनीने जलसा ही पहिली स्वदेशी बोट बांधली. पुढे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर १९६१ साली याचे राष्ट्रीयीकरण होऊन ती हिंदुस्तान शिपयार्ड कंपनी म्हणून नावारूपाला आली.
1939 साली वालचंद यांची भेट अमेरिकेतील विमान उत्पादकांशी झाली. त्यांच्याकडून विमान निर्मितीचे कौशल्य शिकल्यानंतर म्हैसूर संस्थानच्या मदतीने त्यांनी बंगळूरु येथे पहिली विमान निर्माण करणारी कंपनी बनवली. १९४१ मध्ये सरकाराने त्याचा एक तृतीयांश भाग विकत घेतला. पुढे 1942 मध्ये दुसऱ्या महायुद्धाची लढाऊ विमानांची गरज पूर्ण करण्यासाठी सरकारने संपूर्ण कंपनी विकत घेतली आणि हिंदुस्थान एअरक्राफ्ट हे नाव बदलून त्याला हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड असं नाव दिलं. आजही तिथे जागतिक दर्जाची विमाने बनतात.
१९३०-४०च्या दशकात वाहननिर्मिती उद्योग आपला जम बसवत होता. वाहन क्षेत्रातली संधी ओळखत वालचंद यांनी क्रायस्लर कंपनीशी करार केला आणि ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये देखील ते उतरले. १९४५ मध्ये त्यांनी मुंबईजवळ ‘प्रिमिअर ऑटोमोबाईल्स’ ही कंपनी स्थापन केली. मोटारीचे सुटे भाग बनवण्यापासून सुरू झालेल्या या कंपनीने पुढे फियाट या परदेशी कंपनीच्या सहकार्याने देशामध्ये पुढे बरीच वर्षे मोटारींचा पुरवठा केला. आज अजूनही त्यातील काही मोटारी भारताच्या रस्त्यांवर धावत आहेत.
Premier Padmini
आपल्या सर्वांचं लहानपण ज्या रावळगाव चॉकलेटने गोड केलं, ते चॉकलेटसुद्धा वालचंद यांचीच देण. १९३३ मध्ये त्यांनी रावळगाव येथे शुगर फॉर्म चालू केलं, तिथंच हे चॉकलेट बनवलं जात होत. सातारा इथलं कूपर इंजिनिअरिंग, कळंब साखर कारखाना यांसारखे अनेक उद्योग वालचंद हिराचंद दोषी यांच्या उद्योगसमूहाने यशस्वी केले.
ब्रिटिशांचा साम्राज्याखाली असणाऱ्या भारताची आर्थिक गुलामगिरीतून मुक्तता होण्यासाठी त्यांनी हरतऱ्हेने मदत केली. उद्योगासोबतच त्यांनी अनेक सामाजिक कामं देखील केली. भारत स्वतंत्र झाला तेव्हा वालचंद उद्योगसमूह हा देशातील पहिल्या दहा मोठ्या उद्योगांपैकी एक होता. १९४९ मध्ये, त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि १९५० मध्ये व्यवसायातून निवृत्त झाले. ८ एप्रिल १९५३ मध्ये उद्योग क्षेत्रातील या अवलियाने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू लालचंद यांनी त्यांचा व्यवसाय सांभाळला.
शेठजी अतिशय गुणग्राहक होते, कट्टर राष्ट्रनिष्ठ होते. सचोटी, दर्जा, प्रामाणिकपणा यांमध्ये तडजोड कधीही न केल्याने त्यांना नेहमीच लोकांचा पाठिंबा मिळाला. आपल्या गतिमान व सर्जनशील बुद्धिमत्तेच्या व कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी भारतात एका नव्या औद्योगिक युगाचा प्रारंभ केला. उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याकरिता इंडियन मर्चंट्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांची उभारणी केली.
वालचंद शेठजींचं कार्य आणि त्यांचा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या औद्योगिक क्षेत्रातील सिंहाचा वाटा नेहमीच आपल्या स्मरणात राहील. खऱ्या अर्थाने वालचंद हिराचंद दोशी यांनी मेक इन इंडिया मॉडेल साकारले असे म्हणायला हरकत नाही.
तर ही होती आधुनिक भारताच्या औद्योगिकीकरणाचे शिल्पकार वालचंद हिराचंद दोशी यांची जीवन कहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
मित्रांनो Equity हा शब्द अनेकवेळा ऐकला असेल कारण Business मध्ये या Equity भोवती बऱ्याच गोष्टी फिरत असतात. आपण सुद्धा या इक्विटी बद्दल अनेकवेळा ऐकत असतो, पण इक्विटी म्हणजे नेमकं काय हे खूप कमी जणांना माहीत असतं. तर आजच्या लेखामध्ये जाणून घेऊया या Equity बद्दल.
Equity म्हणजे काय?
आपल्या मराठी भाषेत Equity ला एक सुंदर शब्द आहे तो म्हणजे ‘समभाग’. बघा या एका शब्दावरूनच लगेच समजतं की याचा अर्थ काय असू शकतो ते. आता ज्यांना ज्यांना या शब्दावरूनच समजलं असेल की Equity म्हणजे काय त्यांच्यासाठी टाळ्या! पण ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी हा लेख.
तर एकदम साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इक्विटी म्हणजे भागीदारी किंवा तुमचा हिस्सा. जर तुम्ही एखाद्या कंपनीत पैसे गुंतवले असतील आणि तुम्ही त्या कंपनीचे काही शेअर्स खरेदी केले असतील तर याचा अर्थ असा की त्या कंपनीमध्ये तुमची हिस्सेदारी किंवा मालकी आहे म्हणजेच इक्विटी आहे. Owner Point Of View ने बघायचं झाल्यास जेव्हा तुम्ही एखादा Business चालू करता तेव्हा त्यात तुमची 100% इक्विटी असते. कारण तेव्हा त्याची नुकतीच सुरुवात झालेली असते. पण जस जसा हा Business Grow करायला लागतो तस तसा तुम्हाला यात जास्त पैसा Invest करावा लागतो. जेव्हा तुमच्याकडे असलेला सर्व पैसा संपतो तेव्हा तुम्ही बँकेतून किंवा इतर कोणाकडून तो घेता आणि इतरांकडून घेतलेल्या याच पैशाला डेबिट(Debt) असं म्हणतात.
Equity आणि Debt मधला फरक
Equity आणि Debt ची Defination आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आली असेलच. आता आपण त्याचं उदाहरण पाहूया. समजा तुम्हाला हॉटेल Business सुरू करायचा आहे. Business सुरु करण्यासाठी तुम्हाला 10 लाख रुपयांची आवश्यकता आहे पण तुमच्याकडे फक्त 6 लाख रुपये आहेत. त्यामुळे अशा स्थितीत तुम्ही विचार केला की, उरलेल्या ४ लाख रुपयांसाठी एखाद्या Investor कडून पैसे घ्यावेत. अशा प्रकारे तुम्ही स्वतः ६ लाख रुपये गुंतवले आणि Investor कडून ४ लाख घेतले. तर आता तुम्हाला एकूण 10 लाख रुपये मिळाले आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमचा हॉटेल Business सुरू करू शकता.
या उदाहरणात तुम्ही पाहिलं की तुमच्या Business ला सुरु करण्यासाठी एकूण 10 लाख रुपये लागले पण यात तुम्ही फक्त 6 लाख रुपये गुंतवले. या ६ लाख रुपयांना आपण Equity म्हणतो. याचा अर्थ तुम्ही एकूण पैशाच्या 60 टक्के (10 लाखाचे 60% = 6 लाख) पैसे गुंतवले आहेत. त्यामुळं असं म्हणता येईल की तुम्ही या हॉटेलचे 60% मालक आहात म्हणजेच Business मधील तुमची इक्विटी 60% आहे आणि 40% इक्विटी ही त्या investor ची आहे. याचाच अर्थ तुमच्यावर 40% Liability आहे. जेव्हा आपण Equity आणि Liability दोन्ही जोडतो तेव्हा त्याला Assets म्हणतात. थोडक्यात काय तर जे आपल्या मालकीचं ते म्हणजे Assets आणि जे दुसऱ्याला द्यावं लागतं ते Liability. आपण पाहिलेल्या उदाहरणात 10 लाख रुपये ही तुमची एकूण मालमत्ता आहे म्हणजेच Equity + Liability = Assets मग Equity = काय होईल तर Assets – Liability.
Equity चे प्रकार :-
1.Normal Equity Shares
समजा एक कंपनी आहे चंगू मंगू Limited. समजायला काय जातंय! हा तर या कंपनीचे संपूर्ण Shares आहेत 10 लाखाचे. जर तुम्ही चंगू मंगू Limited या कंपनीचे एक लाख Shares विकत घेतले तर या चंगू मंगू Limited कंपनीमध्ये तुमची Equity ही दहा टक्के असेल. म्हणजे तुम्ही या कंपनीचे दहा टक्के हिस्सेदार किंवा मालक असाल. याचप्रमाणे तुम्ही जर का चंगू मंगू Limited या कंपनीचे 10,000 Shares विकत घेत असाल तर या कंपनीमध्ये तुमची मालकी फक्त एक टक्का असेल. अशाच प्रकारे तुम्ही कोणत्याही एखाद्या कंपनीचे जेवढे जास्त किंवा जेवढे कमी Share घेतात त्या प्रमाणे तुमचा मालकी हक्क जास्त किंवा कमी होतो. आता या प्रकारात जर तुम्ही Invest केलेली कंपनी Profit मध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा Profit होईल आणि जर कंपनी Loss मध्ये गेली तर तुम्हाला सुद्धा Loss च होईल.
आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे तर दुसरा प्रकार आहे
2. Preference Equity Shares
समजा जेव्हा मी एखादा Business सुरु केला होता तेव्हा असे काही लोक होते ज्यांनी माझ्या या Business मध्ये पैसे Invest केले होते. तर याच लोकांना मी एक Preference देतो म्हणजे जरी मला या Business मधून Profit झाला किंवा Loss झाला तरी मी त्यांना त्यांचे पैसे Return देणारच म्हणजे इतर लोकांपेक्षा मी या लोकांना एक प्रकारचा Preference दिलेला आहे.
तर तुम्हाला आजचा लेख कसा वाटला हे आम्हाला Comment करून नक्की सांगा…
तो काळ होता १८४०चा. भारत पूर्णपणे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. इंग्रज भारतीयांची सर्वच बाबतींत पिळवणूक करत होते. समाज या अन्यायाविरुद्ध लढत होता, तर यातील एक भारतीय देशाच्या अर्थव्येवस्थेचा पाया रचत होता. ते द्रष्टे भारतीय म्हणजे टाटा ग्रुपचे संस्थापक आणि भारतीय उद्योगाचे जनक जमशेटजी टाटा.
गुजरातमधल्या नवसारी या छोट्या गावात नुसेरवान यांचा जन्म झाला. वयाच्या ५व्या वर्षी जीवनबाई या चिमुरडीसोबत त्यांचा विवाह झाला. वयाच्या १७ व्या वर्षी म्हणजे ३ मार्च १८३९ रोजी नुसेरवानजी वडील झाले आणि जन्माला आले ते भारताच्या उद्योगविश्वाचे भीष्म पितामह म्हणून नावलौकिक मिळवलेले जमशेटजी टाटा.
नवसारीतील पारशी परिवारासाठी आपल्या गावाची वेस ओलांडणं म्हणजे एक दिव्यच. हे दिव्य नुसेरवान यांनी पार केलं. सात पिढ्यांत व्यापार कशाशी खातात हेही कुणाला माहित नव्हतं. घरात पौरोहित्याची परंपरा असूनही व्यापाराचं खूळ त्यांच्या डोक्यात शिरलं आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते आपल्या परिवारासहित मुंबईला आले. तेव्हा जमशेटजी ८ वर्षांचे होते. हा तोच काळ होता जेव्हा इंग्रजीचं शिक्षण भारतीयांना द्यायला सुरुवात झाली होती. हेच वाघिणीचं दूध प्यायला जमशेटजी तयार होत होते. त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते वडिलांना उद्योगधंद्यात मदत करू लागले.
आपल्या मुलाच्या अंगचे व्यावसायिक गुण बघून नुसेरवान यांनी त्यांना थेट परदेशात व्यापारासाठी पाठवलं. अतिपूर्वेकडे असणाऱ्या हाँगकाँग या देशात गेलेले जमशेटजी पहिल्या परदेश दौऱ्यातच तिथं कंपनी स्थापन करुन आले, जमशेटजी आणि अर्देशीर या नावाने. औद्योगिक क्रांतीच्या दारात उभ्या असणाऱ्या जगामध्ये कापसाचं महत्व ओळखून त्यांची कंपनी कापसाचा व्यापार करत होती, तर चीनसाठी लागणाऱ्या अफूला देखील त्यांनी तितकंच महत्त्व दिलं. व्यवहार चातुर्य, संधी ओळखण्याचे कसब यामुळे जमशेटजींनी काही महिन्यांतच आपल्या पहिल्या कंपनीची शाखा शांघायमध्ये आणि दुसरी नंतर लगेच लंडनमध्ये उघडली. युरोपला कापड आणि चीनला अफू विकून तिथून चहा, वेलदोडे, सोनं, तयार कापड ते भारतात आणून विकत. यातून त्यांना भरपूर नफा मिळाला.
याच दरम्यान चालू होतं ते अमेरिकेचं यादवी युद्ध. भारतातील अनेक व्यापाऱ्यांचं दिवाळं निघालं. याची झळ टाटा परिवारालासुद्धा बसली, पण नुसेरवान आणि जमशेट पिता-पुत्राने यातून देखील मार्ग काढला. राहतं घर विकून सर्वांची देणी चुकती केली. यामुळे लोकांचा टाटा नावाशी विश्वास जोडला गेला.
१८६५ मध्ये यंत्रविद्येचे ज्ञान मिळविण्यासाठी जमशेटजी मँचेस्टरला गेले. इंग्लंडमध्ये ते चार वर्षे होते. स्वदेशी परतल्यावर कापडाची वाढती मागणी लक्षात घेता त्यांनी कापड गिरण्या सुरु करायचं ठरवलं. अंदाज घेण्यासाठी त्यांनी २१००० रुपयांत मुंबईच्या चिंचपोकळी भागातील दिवाळं निघालेली एक तेलगिरणी विकत घेऊन अलेक्झांड्रिया मिल असं तिचं नामकरण केलं. बऱ्यापैकी फायदा कमवून २ वर्षांनी ती विकून टाकली. त्यानंतर नागपूरला कापड मिल उभी करण्यासाठी जागा घेतली. त्याकाळी सगळ्या कापड गिरण्या मुंबईमध्ये होत्या. अशा वेळी नागपूरमध्ये मिल उभी करण्याला अनेकांचा विरोध असून देखील त्यांनी हीच जागा पक्की करत मोठ्या कष्टाने मिल उभी केली. कापसाचं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न, वाहतुकीची सोय, पाण्याची उपलब्धता यामुळे जमशेटजी यांनी घेतलेला निर्णय अगदी योग्य ठरला. ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरियाच्या गौरवार्थ आणि त्या काळाची गरज लक्षात घेता त्यांनी त्या मिलला एम्प्रेस मिल असं नाव दिलं. १८७७ मध्ये उभी राहिलेली ही गिरणी सप्टेंबर २००२मध्ये अखेर बंद पडली. या दोन गिरण्यांच्या अनुभवावरच कुर्ला येथील ‘धरमसी मिल’ ही जुनी गिरणी विकत घेऊन तिचे ‘स्वदेशी मिल’ असे नामकरण केले, तर अहमदाबादला ‘ॲडव्हान्स मिल’ सुरू केली गेली.
Empress Mill, Nagpur
Svadeshi Mill, Mumbai
आपल्या कारखान्यात काम करणारा प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे याची जमशेटजींना जाणीव होती. कर्मचाऱ्यांना अपघात विमा देणे, कामाचे तास कमी ठेवणे, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे, कामाची जागा हवेशीर ठेवणे यांसारख्या गोष्टींमुळे त्यांच्या मिल या जगभरातील सर्वात सुनियोजित मिल म्हणून ओळखल्या जात होत्या. ज्या सुविधा पश्चिमी देशात देखील त्यांच्या कामगारांना मिळत नव्हत्या, त्या जमशेदजी त्याकाळी आपल्या कर्मचाऱ्यांना देत होते.
आर्थिक स्वतंत्रता हीच राजनीतिक स्वतंत्रतेचा आधार आहे हे जमशेटजी जाणत होते. दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता यांच्या विचारांचा प्रभाव जमशेटजींवर होता. जमशेटजींची ४ मोठी स्वप्नं होती. स्टील उद्योग उभा करणं, जागतिक दर्जाचं शैक्षणिक केंद्र उभं करणं, हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट उभा करणं आणि जागतिक कीर्तीचं हॉटेल उभं करणं. दुर्दैवाने यातील हॉटेल सोडल्यास इतर तीन स्वप्नं त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकली नाहीत, पण त्याची बीजं मात्र त्यांनी रोवली होती. आणि ‘शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी’ या म्हणीप्रमाणे त्यांच्या येणाऱ्या पिढीने ही सगळी स्वप्नं पूर्ण केली.
आपल्या अपमानाचा बदला म्हणून भारतीयांसाठी एक भलंमोठं हॉटेल बांधायचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. त्या काळातील ४ कोटी रुपये खर्च करुन ३ डिसेंबर १९०३ रोजी उद्घाटन झालेले ‘दि ताजमहल पॅलेस’ हे वीज वापरणारे देशातले पहिले हॉटेल होते! हे जगविख्यात हॉटेल कसं उभं राहिलं याची कहाणी आम्ही एका व्हिडीओमध्ये सांगितली आहे. त्याची लिंक खाली आहे. तो व्हिडीओ नक्की पहा.
मुंबईची वाढती विजेची गरज पूर्ण करण्यासाठी जमशेटजींनी २ कोटी रूपये भांडवल उभे करून फेब्रुवारी १९११ला खोपोली येथे जलविद्युत प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली. खंडाळा, लोणावळा येथे पडणारे पावसाचे पाणी १८०० फूट ऊंचीवरून खाली खोपोली येथे ७ पाइपलाइन टाकून आणायचे, तेथे जनित्राद्वारे वीज निर्माण करायाची व ती मुंबईला पोहोचवायची अशी ही योजना होती. त्याकरता वळवण येथे दोन धरणे बांधण्यात आली. १९११ साली केलेल्या या कामांत आजही कोठे गळती नाही, की कोणताही पाइप फुटला नाही. प्रचंड वेगाने कित्येक वर्षे या पाइपांतून पाणी येत आहे व ८००० मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. हे काम टाटांच्या ७ हजार लोकांनी ४ वर्षात पूर्ण केले. १९११ साली दळणवळणाची साधने, टेक्नॉलॉजी, परिस्थिती आणि इतर सोयींचा विचार केला, तर ह्या अफाट कामाची व दूरदृष्टीची टाटांची समज किती मोठी होती हे लक्षात येते.
Tata Power hydro plant, Khopoli
ब्रिटिश जहाजउद्योगाला टक्कर देण्याकरिता त्यांनी आपली ‘टाटा लाइन’ ही जहाजकंपनीही उभारली होती. तथापि ब्रिटिश सरकारच्या वाहतूकदरांच्या स्पर्धेत जमशेटजींना आपल्या स्वदेशी जलवाहतूक कंपनीची प्रगती साधणे शक्य झाले नाही व तो नाद त्यांना सोडावा लागला.
भारतात प्रगत विज्ञान संशोधन केंद्रासाठी जमशेटजींना ‘रॉयल सोसायटी ऑफ इंग्लंडसारखी’ एक संशोधन संस्था भारतात उभी करण्याची होती. यासाठी त्यांनी स्वामी विवेकानंदांचे मार्गदर्शन घेतले. या संस्थेसाठी जमशेटजींनी तेव्हा सव्वा लाख रु. दिले. अनेक दानशूर लोकांनी देणग्या दिल्या. पैसे कमी पडले म्हणून टाटांनी मुंबईतील आपल्या सतरा इमारती विकल्या. मंजुरीसाठी इंग्रज सरकारकडून उशीर झाला, तरी १९११ मध्ये बंगलोर येथे या संस्थेच्या इमारतीचा पाया घालण्यात आला आणि त्याच वर्षी २४ जुलैपासून संस्था कार्यान्वित झाली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अर्थात ‘भारतीय विज्ञान संस्था’ या नावाने ओळखली जाणारी ही ४४० एकरात पसरलेली संस्था आजही जगद्विख्यात आहे.
Indian Institute of Science (IISc), Bangalore
अर्थव्यवस्थेची प्रगती सातत्याने चालू राहण्यात लोखंड व पोलाद उद्योगाचा फार मोठा वाटा असल्याने जमशेटजींच्या ध्यानात आले होते. अनेक वर्ष शोधाशोध करून आणि संशोधन करून शेवटी बिहारच्या सिंगभूम जिल्ह्यातील साक्ची या छोट्याशा गावात कारखाना उभारण्याचे ठरले. १९११ साली ‘द टाटा आयर्न अँड स्टील कंपनी’ (टिस्को) हा कारखाना सुरू झाला. बघता बघता त्या गावाचं एका मोठ्या शहरात रुपांतर झालं आणि तेथील रेल्वेस्टेशनला ‘टाटानगर’ नाव देण्यात आलं. सध्या झारखंडमध्ये असलेल्या या शहराचं नाव जमशेटजींच्या गौरवार्थ ‘जमशेदपूर’ असं देण्यात आलं. आज टाटा स्टील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीत खनिज लोखंडापासून उत्कृष्ट पोलादापर्यंतच्या सर्व प्रक्रिया या पार पाडल्या जातात. टाटा स्टील आज भारतातील दुसरी मोठी कंपनी आहे.
प्रचंड अभ्यासू असणाऱ्या आणि जगभर फिरणाऱ्या जमशेटजींनी साताऱ्यातील पाचगणीचं महत्त्व त्या काळात ओळखलं होतं. तिथल्या हवामानात कॉफी आणि स्ट्रॉबेरी चांगली लागेल याची त्यांना खात्री होती. कॉफीत त्यांना यश मिळालं नाही, पण स्ट्रॉबेरी रुजली. फ्रान्समधून रेशमाचे किडे आणून बंगलोर, म्हैसूरमधील शेतकऱ्यांना त्यांनी रेशीम लागवडीचे धडे द्यायला सुरुवात केली. आज म्हैसूरच्या रेशमी साड्यांमुळे हा परिसर रेशीम उद्योगाचं केंद्र बनलाय, त्याच्या मुळाशी जमशेटजीच आहेत.
कर्मचार्यांच्या हक्क आणि अधिकारांसाठीही टाटा सदैव जागरूक राहिले. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही ठीकठाक जगता यावं यासाठी भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ ही संकल्पना जमशेटजींनी जन्माला घातली. ही संकल्पना त्यावेळी पाश्चात्य देशांतसुद्धा सुरु झाली नव्हती. काम करताना काही अपघात झाल्यास त्यासाठी नुकसानभरपाईची सोय केली. जमशेटजी म्हणायचे, ‘आपण आपले भागधारक, कामगार यांच्या हिताचा विचार केला; तर प्रगतीचा मळा अधिक फुलतो.’
जमशेटजींनी आपला उद्योग अशा काळात चालू केला जेव्हा उद्योग क्षेत्र फक्त युरोपियनांचीच मक्तेदारी होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तो औद्योगिकदृष्ट्या तारला गेला तो जमशेटजींच्या दूरदृष्टीने. टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा केमिकल्स, टाटा टी, टायटन इंडस्ट्रीज, टाटा कम्युनिकेशन्स, ताज हॉटेल्स आणि अशाच अजून १०० कंपन्या आणि त्यात काम करणारे ८ लाखांहून अधिक कर्मचारी ही आहे टाटांची देन.
जमशेटजींनी त्यांच्या दूरदृष्टीने टाटा सन्स लि. ची स्थापना करून तिच्याकडे आपल्या सर्व कंपन्यांचे व्यवस्थापन सोपविले. या संस्थेचे ८५ टक्के भांडवल टाटा कुटुंबातील मंडळींनी उभारलेल्या धर्मादाय न्यासांच्या मालकीचे असल्याने टाटा समूहातील विविध उद्योगांना होणारा फायदा या न्यासांकडे म्हणजे पर्यायाने जनतेकडे पोहोचविला जातो. एका प्रसिद्ध संस्थेच्या रिपोर्टमध्ये गेल्या १०० वर्षातील जगातील सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून जमशेटजी टाटांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं.
१९ मे १९०४ रोजी जर्मनीतील न्यूहॅम येथे वयाच्या पासष्टाव्या वर्षी या महान उद्योगपतीचे निधन झाले. ‘भारतीय व्यापार व उद्योग यांच्या भरभराटीसाठी कोणत्याही तत्कालीन भारतीयाने जमशेटजींइतके प्रयत्न केले नाहीत’, हे लॉर्ड कर्झनचे उद्गार यथार्थाने जमशेटजींची थोरवी व्यक्त करतात. त्यांच्या पश्चात दोराबजी व रतनजी या त्यांच्या दोन मुलांनी वडिलांची परंपरा यशस्वीपणे पुढे चालविली.
शंभर सव्वाशे वर्षापूर्वी आपल्यातल्याच एका माणसाने एक स्वप्न पाहिलं. त्यासाठी त्याच्यासह पुढच्या कित्येक पिढ्यांनी जिवाचं रान केलं आणि आजचं हे नंदनवन उभं राहिलं. फक्त देशाची आर्थिक बाजू भक्कम करणारं हे स्वप्न मुळीच नव्हतं, तर देशाच्या सामान्य नागरिकाला सन्मानानं जगता यावं, त्याच्या सर्व गरजा त्याच्या आवाक्यातच पूर्ण व्हाव्यात असा त्यांचा दृष्टीकोन होता. संपत्ती निर्मिती हा टाटांचा उद्देश कधीच नव्हता, उलट समाजाकडून आलेले पैसे समाजालाच परत करावयाचे हे त्यांचे धोरण होते. कोणतीही पार्श्वभूमी नसताना उद्योग क्षेत्रातला ध्रुवतारा असणारे, भारतीय उद्योगाचे भीष्म पितामह म्हणजे जमशेदजी टाटा यांच्या चिरकाल टिकणाऱ्या कार्याला आणि प्रेरणेला आपल्यातही उतरवण्याचा प्रयत्न करूया.
तर ही होती जमशेदजी टाटा यांची जीवन कहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
कामानिमित्त प्रवास करायचा तर ऑटो किंवा टॅक्सीने फिरणं आलंच. त्यातच रिक्शा आणि टॅक्सीने प्रवास करायचा तर खासकरून रिक्शा टॅक्सी चालक आणि प्रवासी यांच्यातली भांडणं आपण दररोज ऐकत असतो किंवा वाचत असतो. कधी आपल्याही वाट्याला असे प्रसंग येतात. आपलंही त्यावेळेस डोकं फिरतं, मात्र काही काळ गेला की आपण शांत होतो आणि मग इतरांना त्याचा कसा त्रास होतोय हे वाचतो आणि सोडून देतो. मात्र एका व्यक्तीने त्याला आलेल्या वाईट अनुभवातून योग्य तो धडा घेतला आणि त्यापासून प्रेरणा घेत त्याने चक्क कोट्यावधी रुपयांचं साम्राज्य उभं केलं. ऐकून थोडं विचित्र वाटेल मात्र आयआयटी पदवीधर भावेश अग्रवाल यांचा हा अनुभव तुम्हालाही इंटरेस्टिंग वाटेल.
अनेकदा टॅक्सीचालक आपल्याला मनमानी भाडं सांगतात. आपण नाईलाज म्हणून ते भाडं देण्यासाठी तयारही होतो. आयआयटी पदवीधर भावेश अग्रवाल आपल्या कामानिमित्त असाच एकदा प्रवास करत असताना टॅक्सीचालकाशी त्यांचं भांडण झालं. भांडणाचं प्रमुख कारण म्हणजे तो टॅक्सीचालक त्यांच्याकडून जादा भाड्याची मागणी करत होता.
मात्र हे भांडण झाल्यावर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं नाही तर देशात लो बजेट फेअर कॅब सर्व्हीसची किती नितांत गरज आहे हे त्यांनी ओळखलं. घरी आल्यावर त्यांनी आपला प्लान कुटुंबाला सांगितला. मात्र ‘आयटीत भरघोस पगाराची नोकरी असताना हे काय मध्येच?’ अशी कुटुंबाची भूमिका होती. भावेश मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी आपली योजना पूर्णत्वास न्यायची असा चंग बांधला. त्यांना त्यांच्या या बिझनेस प्लानमध्ये त्यांचा मित्र अंकीत भाटी यांची साथ मिळाली आणि मग काय, या दोघांनी मिळून बंगळूरूत ‘ओला’ या टॅक्सी व्यवसायाची सुरूवात केली.
त्यांनी कायम एक खूणगाठ मनाशी पक्की केली होती की काहीही झालं तरीही प्रवाशांना सर्वोच्च सेवा उपलब्ध करून द्यायची. लो फेअर कॅब सर्व्हिसची मुहूर्तमेढ तिथेच रोवली गेली आणि देशात प्रवाशांना आरामदायी आणि खिशाला परवडणारी अशी ‘ओला’ सेवा मिळाली. आज आपल्यापैकी प्रत्येकानं किमान एकदा तरी स्मार्टफोनवरून ही कॅब बुक करून त्याचा आनंद घेतला असेलच.
किती आहे ओला कॅबचं नेटवर्थ?
ओलैा कॅबच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झाल्यास हा आकडा आजमितीला 4.8 अब्ज डॉलर्स म्हणजेच 39 हजार 832 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.याशिवाय आता कंपनीने ओला इलेक्ट्रिकल्सच्या नावाने सुरू केलेल्या इ टू व्हिलरलाही पसंती मिळतेय. आज याही कंपनीचं नेटवर्थ साधारणपणे 2 हजार 400 कोटी रुपयांच्या घरात पोहोचलं आहे.