Tag: लेखमालिका

  • उद्योग महाराष्ट्राचे : प्रस्तावना

    उद्योग महाराष्ट्राचे : प्रस्तावना

    👍 महाराष्ट्राचा इतिहास

    महाराष्ट्र राज्याला भूगोल आहे आणि इतिहाससुद्धा! गौरवशाली इतिहासाची परंपरा आपणास प्राचीन कालखंडात दिसते. मध्ययुगात सर्व भारतभर परकीय आक्रमणाचे ढग दाटून आलेले होते. या नैराश्यपूर्ण मळभावर विजयनगरचे साम्राज्य आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे अपवाद आपणास दिसून येतात. मराठी सत्तेच्या पतनानंतर इंग्रजांचा अंमल महाराष्ट्रावर सुरू झाला. इंग्रजांविरुद्धच्या संघर्षात आद्य क्रांतिकारकांपासून ते सर्वसामान्य माणसांपर्यंत अनेकांनी बलिदान केले आणि हा देश स्वतंत्र झाला. १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाल्यावर महाराष्ट्राला पुन्हा एकदा भाषिक राज्यासाठी लढा द्यावा लागला. १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले. अर्थात बेळगाव वगळून! १९६० ते आजतागायत स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

    d618ae35 53f7 410b 8a0d 23ac74e98f42.jpg

    👍 महाराष्ट्र भौगोलिक स्थान व क्षेत्रफळ :


    दिनांक १ मे, १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना झाली.
    महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ. कि. मी. इतके आहे.

    विस्तार – महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम जास्तीत जास्त लांबी ८०० कि. मी. आणि उत्तर-दक्षिण जास्तीत जास्त लांबी ७०० कि.मी. आहे.

    क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा राजस्थान, मध्यप्रदेशनंतर भारतात तिसरा क्रमांक लागतो. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी (३२,८७,२६३ चौ. कि.मी.) ९.३६ % इतका हिस्सा महाराष्ट्राने व्यापला आहे.

    महाराष्ट्राच्या वायव्येस-गुजरात राज्य, दादरा व नगर हवेली , उत्तरेला -मध्य प्रदेश, पूर्वेस – छत्तीसगढ, आग्नेयेस – तेलंगणा, दक्षिणेस – कर्नाटक आणि अगदी दक्षिणेस – गोवा राज्य आहे. राज्याच्या पश्चिम सीमेलगत अरबी महासागर पसरलेला आहे.

    👍 महाराष्ट्रातील उद्योग:

    औद्योगिकीकरणाच्या क्षेत्रात महाराष्ट्र हे आजही देशातील अव्वल राज्य म्हणून गणले जाते. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात कृषी-औद्योगिक रचनेचा पाया घातला. राज्यातील वातावरण उद्योगवाढीला पोषक राहील, याची काळजी यशवंतरावांनी सुरुवातीपासून घेतली.

    मुबंई हे भारतातील प्रमुख औद्योगिक-आर्थिक केंद्र मानले जाते. राज्याचा विकास होण्याकरिता पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. यादृष्टीने महाराष्ट्रातील विविध औद्योगिक विकास महामंडळे, मुंबई हे आंतरराष्ट्रीय बंदर, वाहतूक व संदेशवहनाच्या अत्याधुनिक सुविधा, वित्तीय संस्था व महामंडळे, पाणी, वीज, रस्ते आदी सुविधा, मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर यांसारखी औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची शहरे राज्याच्या औद्योगिक विकासामधे मोलाचा वाटा उचलत आहेत. महाराष्ट्राचा जीएसडीपी २५.३५ लाख कोटी (३८० अब्ज डॉलर्स) आहे. ऑगस्ट १९९१ ते नोव्हेंबर, २०१६ या कालावधीत ११,३७,७८३ कोटी रु. गुंतवणुकीच्या एकूण १९,४३७ उद्योगांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. देशाच्या एकूण औद्योगिक गुंतवणूकीमध्ये महाराष्ट्राचा वाटा १०% असून त्यामधून देशातील एकूण रोजगार उपलब्धतेच्या १५% रोजगार प्राप्त होतो. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा २३% आहे. (या विभागातील आकडेवारी ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी : २०१६ -१७ नुसार अद्ययावत करण्यात आली आहे.)

    👍 महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांचे प्रकार :


    १. कृषी उत्पादनांवर आधारित उद्योग – यामध्ये कापड उद्योग, साखर उद्योग, तेलगिरण्या, तंबाखू प्रक्रिया, डाळ मील, वाईन, रबर उद्योग यांसारख्या उद्योगांचा समावेश होतो.
    २. खनिज उत्पादनांवर आधारित उद्योग – यामध्ये लोह पोलाद उद्योग, सिमेंट उद्योग, खनिज तेल शुद्धीकरण केंद्र, यंत्रोद्योग यांचा समावेश होतो.
    ३. वन उत्पादनांवर आधारित उद्योग – लाकूड कापण्याच्या गिरण्या, कागद कारखाने, आगपेट्यांचे कारखाने, औषधे निर्मिती, खेळांचे साहित्य, फर्निचर निर्मिती उद्योग यांचा समावेश होतो.
    ४. प्राणिज उत्पादनांवर आधारित उद्योग – यामध्ये कातडी उद्योग, लोकरी कापडाच्या गिरण्या, रेशीम उद्योग, दुग्धजन्य पदार्थ उद्योग यांचा समावेश होतो.

    त्याच बरोबरीने बांधकाम उद्योग, पर्यटन उद्योग, सेवा क्षेत्र, वाहन उद्योग, प्रकाशन व मुद्रण उद्योग, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, करमणूक उद्योग हे सर्व उद्योग जोमाने वाढत आहेत.

    देशातील औद्योगिक गुंतवणुकीतील महाराष्ट्राचे अग्रस्थान कायम राखणे, राज्यातील औद्योगिकदृष्टया मागास भागांत गुंतवणुकीचा वेग कायम राखणे, नवीन गुंतवणूक वाढवण्यास चालना देणे, रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करणे, ही उद्दिष्टे कशी पूर्ण करायची, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना आपण पुढील लेखांमध्ये बघणार आहोत. धन्यवाद

  • ०२. पैशाची गरज व श्रीमंतीकडे वाटचाल

    ०२. पैशाची गरज व श्रीमंतीकडे वाटचाल

    पैसा बहुत कुछ है लेकीन सबकुछ नही है,
    बहुत कुछ पाने के लिए सबकुछ करना मत,
    खरीददार चाहे कितना भी बडा क्यो न हो, बिकाऊ बनना मत,
    दिमाग चाहे दिल न चाहे वह चीज करना मत |

    पैसा खुदा तो नही, लेकिन खुदा से कम भी तो नही |

    तुमच्याकडे कोणत्याही स्वरुपातले पैसेच नसतील तर…? अशी कल्पना करुन बघा. खिशात पैसे नाहीत. बँकेत पैसे नाहीत. घरात पैसे नाहीत. तुम्ही कुणाला उसने पैसे दिलेले नाहीत किंवा तुम्ही कुणाकडे उसने पैसे मागू सुध्दा शकत नाही. अशा प्रसंगी तुम्ही काय कराल? पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. घरात आहेत त्या जगण्यायोग्य वस्तूंचा साठा संपत चाललाय. एके दिवशी तो संपून गेला. आता काय करणार? पैशाविना जीवन म्हणजे जिवंतपणी मृत्यू अनुभवण्यासारखी अवस्था होय.

    बऱ्याचवेळा पैशाबाबत अनेक गैरसमज पाळले जातात. पैसा हा आध्यात्मिक मार्गातील अडथळा आहे हा एक त्यातला मुख्य गैरसमज आहे. मात्र ज्यांनी संपूर्ण जगाला आपल्या आध्यात्माची ओळख करुन देऊन प्रभावीत केले ते विवेकानंद सांगतात की, उपाशीपोटी धर्म शिकवला जाऊ शकत नाही. त्यांनी पैशाचे महत्त्व नमूद केले आहे. पैसा आध्यात्मातील अडथळा आहे असे म्हणणाऱ्या लोकांच्या मनावर ताबा नसतो. त्यामुळे ते पैशाला बदनाम करतात. पैशाने अनेक चांगली कामे केली जाऊ शकतात. उत्तम शिक्षणासाठी शिक्षणसंस्था सुरु करण्यासाठी, चांगले रस्ते तयार करण्यासाठी, पुस्तके विकत घेण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी, चांगले व उबदार कपडे खरेदी करण्यासाठी, आपली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी, लोकांना सुखसोयी चांगल्या मिळवण्यासाठी, दवाखाने व आरोग्य केंद्रांसाठी, व्यायामशाळा उभारण्यासाठी, चांगली शेती पीकवण्यासाठी, संशोधनासाठी, खेळाडूंसाठी, मैदानांसाठी, सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी अगदी कशाचेही नाव घ्या. ती प्रत्येक गोष्ट साकारण्यासाठी पैसा लागतो. पैशाविना काहीच करता येत नाही.

    the-need-for-money-and-the-journey-to-wealth

    मग आपल्याला बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की, जे लोक पैशाने अमुक गोष्टी खरेदी करता येतील मात्र तमुक गोष्ट खरेदी करता येणार नाहीत याची मोठी यादी सांगत असतात त्यांचे काय? उदाहरण द्यायचे झाल्यास पैशाने पुस्तके खरेदी करता येतील ज्ञान नाही. पैशाने चांगले अंथरुन खरेदी करता येईल, झोप नाही. अशा वाक्यांचा भडीमार करणाऱ्या व्यक्तींनी हे समजून घेणे गरजेचे आहे की, पुस्तके खरेदी करणे ही पैशाने साध्य होणारी कृती आहे ते पैशाचे काम आहे. ती पुस्तके वाचणे हे तुमचे काम आहे, पैशाचे नाही. त्यासाठी पैशाला कशाला दोष देता? तो दोष तुमचा आहे. अंथरुन विकत घेणे ही पैशाने साध्य होणारी कृती आहे. झोप लागणे न लागणे ही तुमच्या कर्मावर किंवा मानसिक शांतीवर अवलंबवून आहे. पैशावर नाही.

    पैशाने माणूस बिघडतो वगैरे या गोष्टीत काहीही तथ्य नाही. तसे असते तर सगळी गरीब माणसे चांगली असती किंवा सगळी श्रीमंत माणसे वाईट असली असती. ज्याची वृत्ती वाईट आहे ती माणसे वाईट वागणार. मग त्यांच्याकडे पैसे आहेत किंवा नाहीत याने काही फरक पडत नाही. ज्यांची वृत्ती विधायक आहे ती माणसे चांगलीच वागणार. तो संस्काराचा भाग आहे. त्यांच्याकडे पैसा असला किंवा नसला तरी काही फरक पडत नाही. काहीवेळा पैशामुळे आपापली वृत्ती प्रकट करायला वाव मिळतो. चांगल्या माणसांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आला तर त्या समाजाची भरभराट होते. कारण चांगली माणसे पैसा आल्यावर शिक्षणसंस्था, दवाखाने, चांगले रस्ते, संस्कार केंद्रे अशा विधायक गोष्टी सुरु करतील. याउलट वाईट माणसांकडे पैसा आला तर त्या समाजाची अधोगती होते. कारण विध्वंसक माणसे जुगार, दारुचे अड्डे सुरु करतील.

    आणखी वाचा

  • ०१. फरक गरीबी व श्रीमंतीतला

    ०१. फरक गरीबी व श्रीमंतीतला

    the-gap-between-the-rich-and-the-poor

    शतकानुशतके माणसामाणसात संपत्तीच्या मोजमापानुसार फरक करण्यात आला आहे. राजा व रंक, सावकार व फकीर, गरीब व श्रीमंत अशी थेट विभागणी होत आलेली आहे. जगाच्या अगदी सर्व कोपऱ्यात हीच व्यवस्था आहे. मानवात व इतर सजीवात अनेक फरक असले तरीही संपत्ती निर्माण करणे, तिची गुंतवणूक करणे, त्या संपत्तीत वाढ करणे ही माणसांनी तयार केलेली व्यवस्था आहे. ती निसर्गात इतर कोणत्याही घटकात नाही. प्रत्येकाला पैसा हवा आहे. भौतिक व आरामदायी सुखसुविधा पाहिजे आहेत. त्यामुळे प्रत्येकजण गरीबीतून श्रीमंतीकडे किंवा श्रीमंतीकडून अधिक श्रीमंतीकडे वाटचाल करत असतो. म्हणजे काय तर, आता आहे त्या स्थितीतून वरच्या स्थितीत जाण्याचा प्रयत्न करत असतो. आता गरीबी व श्रीमंतीत मुख्य फरक कोणता हा प्रश्न आपल्याला पडतोच.

    गरीबी व श्रीमंतीत अजून काही फरक आहेत. माणसाला गरीब होण्यासाठी कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत. श्रीमंत असणाऱ्या (कोणत्याही बाबतीत) माणसाने त्याचे कार्य सोडले तो आपोआप गरीबीकडे प्रवास करु लागतो. गरीबी ही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर हातमिळवणी करण्यासाठी आतुरलेली असते. ती आपल्याला सतत तिच्याकडे ओढत असते. तिच्या दिशेने वाहवत जायचे की नाही ही निवड प्रत्येक माणसाला स्वतःहून करावी लागते. गरीब होण्याचा प्रवास अत्यंत सोपा आहे. काहीही न करता गरीब होता येते. गरीबी आल्यावर मात्र तिथे टिकून राहण्यासाठी सुध्दा संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष जीवघेणा ठरतो. हा संघर्ष अतिशय जीवघेणा असतो, इतका की यातून वर उठण्यासाठी कमालीचे कष्ट करावे लागतात. हा संघर्ष सोडून दिला की माणसाचे जगणे संपून जाण्याची दाट शक्यता निर्माण होते. एखाद्या मजूराने आठ दिवस काम केले नाही तर त्याच्या जगण्याचे वांधे व्हायला वेळ लागत नाही. मात्र ज्याने पैशाने पैसा कमावायची कला साध्य केली आहे, अशा एखाद्या श्रीमंत माणसाने आठ दिवस काम केले नाही, तर त्याच्या जगण्याचे वांधे होणार नाहीत.

    the-gap-between-the-rich-and-the-poor

    श्रीमंती ही अतिशय प्रयत्नानंतर, युक्तीने, बुध्दीचा वापर करुन किंवा वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक करुन प्राप्त करता येते. श्रीमंतीला आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावरती बोलवता येते. ती स्वतःहून चालून आपल्याकडे येत नाही. आपल्याला ती यावी म्हणून प्रयत्न करावे लागतात. तिला प्रसन्न करावे लागते, मगच ती आपल्याकडे येते. आल्यावर सुध्दा तिला टिकवून राहण्यासाठी सतर्क राहावे लागते. माणूस तिच्या बाबतीत गाफील झाला की ती त्याच्याकडे पाठ फिरवून निघून जाते. ती आली की बऱ्याच चांगल्या गोष्टी घेऊन येते. त्या चांगल्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. वाईट गोष्टींना शिरकाव करु दिला की, तिचा उलट्या दिशेने प्रवास सुरु होतो. म्हणून अशा प्रयत्न प्राप्त केलेल्या श्रीमंतीला किंवा आता ती नसेल तर प्रयत्नांनी प्राप्त कराव्या लागणाऱ्या, टिकवून ठेवण्यासाठी, तिच्यात वाढ करण्यासाठी काय करावे? आता नसलेली श्रीमंती प्राप्त कशी करावी? गरीबीला निरोप कसा द्यावा? या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखमालिकेत असतील तेव्हा पैशाची गरज व श्रीमंतीकडे वाटचाल या विषयावर पुढील लेखात जाणून घेऊ.

    आणखी वाचा