Category: लेख

  • McDonald’s Success Story in India | वडापावच्या देशात परदेशी कंपनी कशी जिंकली?

    McDonald’s Success Story in India | वडापावच्या देशात परदेशी कंपनी कशी जिंकली?

    McDonald’s Success Story: एक असा देश जिथे नाक्या-नाक्यावर वडापाव, समोसा आणि भजीचा खमंग वास येतो. अशा खवय्यांच्या देशात एका परदेशी कंपनीने आपलं दुकान थाटलं. वर्ष होतं १९९६. कंपनीचं नाव – मॅकडोनाल्ड्स (McDonald’s).

    पण सुरुवातीलाच या कंपनीला एक गोष्ट समजली – इथे आपला जागतिक ‘बीफ’ आणि ‘पोर्क’चा मेनू पूर्णपणे फ्लॉप होणार! कारण भारतात बीफ आणि पोर्क खाणं हे धार्मिक व सांस्कृतिक भावनांच्या विरोधात आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे शाकाहारी लोकांची संख्या खूप मोठी आहे.

    मग या विदेशी ब्रँडने अशी काय जादू केली, की आज त्यांचेसगळे सगळे आउटलेट्स हाऊसफुल असतात? चला तर मग, या ‘ग्लोबल ब्रँडच्या लोकल तडक्याची’ रंजक कहाणी ऐकूया…

    १. नियम लादले नाहीत, स्वतःला बदललं!


    मॅकडोनाल्डने भारतीयांवर आपले नियम लादले नाहीत. त्यांनी चक्क स्वतःला बदलून घेतलं. जगात पहिल्यांदाच त्यांनी एकाच हॉटेलमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी ग्राहकांसाठी पूर्णपणे ‘स्वतंत्र किचन’ बनवले. हा निर्णय भारतीयांचा विश्वास जिंकण्यासाठी पहिला मास्टरस्ट्रोक ठरला.

    २. ‘मॅकआलू टिक्की’चा जन्म


    भारतीयांना काय आवडतं? बटाटा आणि मसाले! हे ओळखून त्यांनी अस्सल भारतीय चवीचा ‘मॅकआलू टिक्की’ बर्गर लाँच केला. परदेशी पावामध्ये दडलेला हा देशी बटाट्याचा तडका भारतीयांना एवढा आवडला की त्याने विक्रीचे रेकॉर्ड मोडले. आणि त्यांच्या जगप्रसिद्ध ‘बिग मॅक’ची जागा रॉयल ‘महाराजा मॅक’ने घेतली!

    ३. खिशाला परवडणारा रॉयल अनुभव


    पण खरा गेम चेंजर ठरला तो त्यांचा सायकोलॉजिकल प्रायसिंग (Psychological Pricing) फॉर्म्युला. विचार करा, एसी हॉटेल, इंटरनॅशनल ब्रँड, आणि तिथे मिळतंय अवघ्या ७ रुपयांत सॉफ्ट सर्व्ह आईस्क्रीम आणि २५ रुपयांचा बर्गर! याने मध्यमवर्गीय भारतीयांना एका विदेशी ब्रँडचा फील अगदी स्वस्तात दिला.

    ४. ‘हॅपी मील’ची जादू


    McDonald’s Success Story त्यांनी मार्केटिंगसाठी मुलांना टार्गेट केलं. ‘हॅपी मील’सोबत मिळणाऱ्या मोफत खेळण्यांमुळे, लहान मुलं हट्ट करून आपल्या आई-वडिलांना मॅकडोनाल्डमध्ये खेचून आणू लागली. एक मूल आलं की सोबत अख्खं कुटुंब येणार, हे फॅमिली मार्केटिंगचं गणित पक्कं होतं.

    थोडक्यात सांगायचं तर…
    मॅकडोनाल्डने भारतात फक्त फास्ट फूड विकलं नाही, तर भारतीयांच्या खिशाला परवडणारा ‘इंटरनॅशनल अनुभव’ विकला. एका विदेशी ब्रँडने स्थानिक संस्कृती आणि चवीचा आदर करून कसा व्यवसाय मोठा करावा, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.

    तुमचा आवडता बर्गर कोणता? अस्सल ‘मॅकआलू टिक्की’ की रॉयल ‘महाराजा मॅक’? कमेंटमध्ये नक्की सांगा!

  • Startup Yojana: स्टार्टअपसाठी ५ महत्त्वाच्या सरकारी योजना

    Startup Yojana: स्टार्टअपसाठी ५ महत्त्वाच्या सरकारी योजना

    Startup Yojana: मित्रांनो, दुसऱ्याच्या हाताखाली कामं करायला कोणाला आवडतं? तुम्ही जर नोकरी करत असाल, तरी एकदा तरी तुम्हाला स्वतःचा व्यवसाय असावा हा विचार नक्कीच मनात येऊन गेला असेल. किंवा काहींनी तर ठरवलं असेल की दुसऱ्यांची जी हुजरेगिरी खूप झाली, स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचंय.

    या लेखात, तुम्हाला त्या सरकारी आणि खाजगी योजनांबद्दल माहिती देणार आहोत, ज्या तुमच्या नवीन व्यवसायाला योग्य मार्गदर्शन देण्यासोबतच आर्थिक पाठबळ देखील देतील.

    १) प्रधानमंत्री मुद्रा योजना

    प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही योजना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना (MSMEs) आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विशेषत: लहान आणि नवउद्योजकांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले भांडवल उपलब्ध करून दिले जाते.

    मुख्य वैशिष्ट्ये:

    या योजनेत एकूण तीन प्रकारे कर्ज दिले जाते. 

    • शिशु (Shishu):  यात रु. 50,000 पर्यंतचे कर्ज नवीन उद्योजकांसाठी दिले जाते
    • किशोर (Kishore):यात  रु. 50,001 ते रु. 5 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते. 
    • तरुण (Tarun): यात  रु. 5 लाख ते रु. 10 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते

    प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ कसा मिळवाल?

    मुद्रा योजना (पीएमएमवाय) च्या माध्यमातून कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागेल. जर तुम्ही स्वत:च्या उद्योग सुरू करणार असाल तर तुम्हाला घराचा मालकी हक्क किंवा भाड्याच्या घराचे करारपत्र, कामासंबंधित माहिती, आधार, पॅन नंबर सह अन्य कागदपत्रे सादर करावी लागतील.

    बँकेचे शाखा व्यवस्थापक तुमच्याकडून उद्योगासंबंधी आवश्यक माहिती विचारतील. या माहितीनुसार, तुम्हाला पीएमएमवाय योजनेच्या माध्यमातून लोन मंजूर केले जाऊ शकते. उद्योगाच्या स्वरूपानुसार, शाखा व्यवस्थापक तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासही सांगू शकतात. पीएमएमवाय योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही योजनेची अधिकृत वेबसाइट http://www.mudra.org.in/ ला भेट देऊ शकता.

    या योजनेत  कर्ज प्राप्त करण्यासाठी कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नाही, कर्जावरील व्याजदर बँकांच्या धोरणांवर अवलंबून असतो. व्यावसायिक आवश्यकतांसाठी, जसे की मशीन खरेदी, कामगारांचे पगार, सामग्री खरेदी इत्यादीसाठी आपण हे कर्ज घेऊ शकतो. ही योजना लहान उद्योजकांसाठी आर्थिक सहाय्य मिळविण्याचा उत्तम मार्ग आहे, कारण यात कोणतीही मालमत्ता गहाण न ठेवता कर्ज मिळवता येते. विविध बँका, नॉन-बँकिंग वित्तीय संस्थांकडून (NBFCs) आणि मायक्रोफायनान्स संस्थांकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. 

    २) पीएम स्वनिधी योजना 

    प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजना १ जून २०२० रोजी सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील रस्त्यावरील विक्रेत्यांना (स्ट्रीट व्हेंडर्स) आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे, या योजनेसाठी स्ट्रीट वेंडर जवळ महापालिकेने जारी केलेले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. मात्र जर स्ट्रीट वेंडर्स नोंदणीकृत नसतील, तर ते सुद्धा स्वनिधी योजनेअंतर्गत ऑनलाईन तथा ऑफलाईन अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत मिळालेले कर्ज लाभार्थ्यांना एक वर्षाच्या आत सुलभ हप्त्यात किंवा कमी व्याजदरात परतफेड करावे लागते.

    मुख्य वैशिष्ट्ये 

    कर्जाची उपलब्धता: या योजनेअंतर्गत, रस्त्यावरील विक्रेत्यांना सुरुवातीला ₹१०,००० पर्यंतचे विना गॅरंटी कर्ज दिले जाते. कर्जाची परतफेड नियमितपणे केल्यास पुढील टप्प्याचे जास्त रकमेचे कर्ज मिळू शकते.

    सुविधाजनक परतफेड: हे कर्ज १ वर्षाच्या कालावधीत मासिक हप्त्यांमध्ये परत करता येते. जर विक्रेत्यांनी हप्ते वेळेत भरले, तर त्यांना व्याजावर ७% सबसिडी मिळते.

    डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन: डिजिटल माध्यमातून व्यवहार केल्यास अतिरिक्त लाभ दिले जातात. UPI, डेबिट कार्ड, QR कोड इत्यादींच्या माध्यमातून व्यवहार करण्यास प्रोत्साहन दिले जाते.

    क्रेडिट स्कोर सुधारणा: नियमित हप्ते भरण्यामुळे विक्रेत्यांचा क्रेडिट स्कोर सुधारतो, ज्यामुळे भविष्यात आणखी कर्ज घेणे सुलभ होते.

    रस्त्यावरील विक्रेते, ज्यांनी २४ मार्च २०२० किंवा त्याआधी व्यवसाय सुरू केला असेल, या योजनेसाठी पात्र आहेत. लायसन्सधारक विक्रेत्यांव्यतिरिक्त ओळखपत्र असलेल्या विक्रेत्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येतो.

    अर्ज कसा कराल ?

    Startup Yojana: पीएम स्वनिधी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी रस्त्यावरील विक्रेत्यांना नजीकच्या बँकेमध्ये जाऊन अर्ज करावा लागतो किंवा अधिकृत ऑनलाईन पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतात.

    रस्त्यावरील विक्रेत्यांना स्वतःच्या व्यवसायाची पुनर्बांधणी आणि विस्तार करण्यासाठी आर्थिक मदत मिळते. यामुळे आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होत आहे. पीएम स्वनिधी योजना रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे, ज्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या स्थिर होऊ शकतात आणि आपला व्यवसाय  सुरू करू शकतात.

    ३) स्कील इंडिया डिजिटल हब (SIDH )

    स्कील इंडिया डिजिटल हब योजना ही भारत सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी युवकांना विविध कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी राबवली जाते. या योजनेचा उद्देश भारतातील युवकांना नव्या डिजिटल युगाच्या मागणीनुसार सक्षम करणे आहे.

    योजनेची उद्दिष्टे

    डिजिटल कौशल्य विकास: युवकांना डिजिटल कौशल्ये शिकवून त्यांना रोजगारक्षम बनवणे.

    स्वयंरोजगाराची संधी: युवकांना विविध डिजिटल व्यावसायिक संधी निर्माण करण्यास प्रेरित करणे.

    कौशल्य प्रशिक्षण: ऑनलाइन माध्यमातून आणि क्लासरूम ट्रेनिंगद्वारे विविध कौशल्यं शिकवणे.

    उद्योगाशी संलग्नता: उद्योगांच्या गरजेनुसार युवकांना प्रशिक्षित करणे आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

    अर्ज करण्याची प्रक्रिया:

    यासाठी अर्ज करताना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागतो. ओळखपत्र, शैक्षणिक कागदपत्रे इत्यादी आवश्यक दस्तावेज सादर करणे आवश्यक आहे. अर्जदाराला योग्यतेनुसार प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. ही योजना युवकांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे, ज्यामुळे त्यांना भविष्यातील डिजिटल जगात उत्तम संधी मिळतील.

    या योजनेअंर्तगत विविध कौशल्यांमध्ये मोफत प्रशिक्षण उपलब्ध असते, तसेच वेगवेगळ्या डिजिटल कौशल्यांवरील ऑनलाईन कोर्सेसची सुविधा उपलब्ध असते.  प्रशिक्षणानंतर उद्योगांमध्ये इंटरशिप किंवा प्रोजेक्ट्स मिळण्याची संधी मिळते तसेच प्रशिक्षणानंतर सरकार मान्यताप्राप्त प्रमाणपत्र मिळते.

    ४) स्टार्टअप इंडिया

    स्टार्टअप इंडिया योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी भारतातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवउद्योजकांना सहकार्य करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. देशातील उद्योजकांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी 2016 रोजी या योजनेची घोषणा केली होती.  स्टार्टअप इंडिया योजनेच्या माध्यमातून सरकारने अनेक धोरणात्मक बदल केले, ज्यामुळे स्टार्टअप्सना अनुकूल वातावरण मिळाले. ही योजना देशातील बेरोजगारी कमी करणे, नवकल्पनांना  प्रोत्साहन देणे आणि आर्थिक विकासाला गती देणे या प्रमुख उद्दिष्टांवर आधारित आहे.

    मुख्य वैशिष्ट्ये 

    करभरण्यातून सूट: स्टार्टअप्सना तीन वर्षांसाठी करातून सूट दिली जाते. त्याचबरोबर, पात्र स्टार्टअप्सना Minimum Alternate Tax मध्ये सूट मिळते.

    स्वतःच्या संकल्पना आणि उत्पादने पेटंट करण्यासाठी सहाय्य: स्टार्टअप्सना जलदगतीने पेटंट अर्ज मंजूर होण्यासाठी सहाय्य दिले जाते. पेटंट अर्ज दाखल करण्यासाठी लागणाऱ्या फीमध्ये सवलत मिळते, तसेच सरकारतर्फे आर्थिक सहाय्यही दिले जाते.

    फंडिंग आणि गुंतवणूक सहाय्य: स्टार्टअप्ससाठी सरकारने ₹10,000 कोटींचा ‘फंड ऑफ फंड्स’ स्थापन केला आहे. या फंडाच्या माध्यमातून स्टार्टअप्सना भांडवल मिळवण्यासाठी सहाय्य केले जाते. व्हेंचर कॅपिटलिस्ट्स, अँजेल इन्व्हेस्टर्स आणि बँका यांच्याकडून स्टार्टअप्सना गुंतवणूक मिळवण्यासाठीही मार्गदर्शन केले जाते.

    मॅन्युफॅक्चरिंग आणि व्यापारातील सवलती: स्टार्टअप्सना सरकारच्या विविध निविदांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि खरेदीसाठी विशेष सवलती मिळतात. यामध्ये स्टार्टअप्सना मागील अनुभवाची किंवा टर्नओव्हरची अट लावली जात नाही.

    उद्योगासाठी अनुकूल वातावरण निर्माण: देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये आणि संशोधन केंद्रांमध्ये इनक्यूबेशन सेंटर स्थापन करून नवउद्योजकांना सहाय्य केले जाते. स्टार्टअप्ससाठी योग्य धोरणं तयार करून, यासाठी उद्योजकाना मार्गदर्शन केले जाते. 

    लायसन्सिंग आणि नियमातील सवलती: स्टार्टअप्सना विविध प्रकारची लायसन्स मिळवण्यासाठी कमीत-कमी  कागदपत्रांची आवश्यकता असते, तसेच ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होते. पर्यावरणीय आणि श्रम नियमांमधून काही सवलती दिल्या जातात, ज्यामुळे स्टार्टअप्सना व्यवसाय सुरु करण्यासाठी सहूलियत मिळतं असते.

    स्किल डेव्हलपमेंट आणि ट्रेनिंग: उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन कार्यक्रम, प्रशिक्षण शिबिरे, आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात. शैक्षणिक संस्थांमध्ये स्टार्टअप कोर्सेस आणि प्रोग्राम्स सुरु करून उद्योजकतेची मानसिकता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.

    योजनेचा लाभ कसा घ्यावा?

    Startup Yojana: सर्वप्रथम, स्टार्टअप इंडिया पोर्टलवर स्टार्टअपची नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी, PAN कार्ड, कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र, आणि संबंधित कागदपत्रांची आवश्यकता असते. स्टार्टअप्सना डीपीआयआयटी (DPIIT) कडून स्टार्टअप म्हणून मान्यता मिळवावी लागते. या मान्यतेसाठी स्टार्टअपने नवीन आणि नाविन्यपूर्ण संकल्पना विकसित केल्या असाव्यात आणि कंपनीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असावे लागते.

    नोंदणी झाल्यानंतर, स्टार्टअप्स विविध कर लाभ, सवलती, आणि निधी मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात. सरकारच्या ‘फंड ऑफ फंड्स’ आणि विविध वित्तीय संस्थांमधून गुंतवणूक मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. स्टार्टअप्सना इनक्यूबेशन सेंटर आणि इन्व्हेस्टर मॅचमेकिंग सेवांचा लाभ देखील घेता येतो.

    स्टार्टअप इंडिया योजनेमुळे देशभरातील नवउद्योजकांना त्यांच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळाली आहे. या योजनेमुळे उद्योजकतेला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत नवीन रोजगार निर्मिती, उत्पादनक्षमता वाढवणे, आणि जागतिक पातळीवर भारताचा दबदबा वाढवण्यास मदत झाली आहे.

    ५) जागृती यात्रा 

    जागृती सेवा संस्थेने मध्य भारतातील उद्योग विकासाला चालना देण्यासाठी जागृती यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेअंतर्गत उद्योजकांना एक अनोखी संधी मिळते. ज्यामुळे त्यांना प्रख्यात उद्योजकांशी भेटण्याची, व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याची आणि जागतिक अनुभव मिळवण्याची संधी मिळते.

    यात्रेचे मुख्य उद्दिष्ट:

    जागृती यात्रा (JY): भारतातील टियर 2 (अधिक विकसित जिल्हे परंतु मोठ्या शहरांपेक्षा कमी) . आणि टियर 3 (कमी विकसित, आर्थिक आणि सामाजिक संसाधनांची उपलब्धता कमी असणारे जिल्हे ) जिल्ह्यांमधील उद्योजकांना पाठिंबा देणे.

    सहकार्य वाढवणे: उद्योजकांमध्ये नेटवर्किंग आणि सहकार्य वाढवणे, व्यावसायिक ज्ञान आणि संसाधनांची उपलब्धता.

    शिष्यवृत्ती अर्ज: यात आपल्यालाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येतो. 

    विविध भारतीय प्रदेशांतून प्रवास करून सांस्कृतिक आणि भौगोलिक अनुभव मिळवयाचा असेल तर या यात्रेपेक्षा उत्तम पर्याय नाही. तसेच या ठिकाणी अनेक तज्ज्ञांच्या कार्यशाळा आणि सत्रांद्वारे ज्ञान प्राप्त करता येते. व्यावसायिक कौशल्यं आणि नेटवर्किंगच्या संधी मिळवता येतात अनेक उद्योजक आणि सामाजिक बदल घडवणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधता येतो आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ घेता येतो 

    तर मित्रांनो, हे काही प्रमुख उपक्रम आहेत जे नवउद्योजकांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी प्रदान करतात. या योजनांचा वापर करून, आपण आपल्या कल्पकतेला सकारात्मक दिशा देऊ शकता आणि आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर एक पाऊल पुढे जाऊ शकता. नवउद्योजकांनी या सुवर्णसंधीचा फायदा करून घेतल्यास त्यांच्या यशस्वी उद्योजकीय प्रवासास गती नक्कीच  मिळेल.

    आणखी वाचा

  • पेट्रोल विक्रीतून जास्त नफा कोणाला? तेल कंपन्या की सरकार; पहा करांचा हिशोब

    पेट्रोल विक्रीतून जास्त नफा कोणाला? तेल कंपन्या की सरकार; पहा करांचा हिशोब

    इस्रायल आणि इराण युद्धाचा भारतावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. LPG गॅससह कच्च्या तेलाच्या किंमतीतही वाढ करण्यात आली. दरम्यान, भारतात दररोज लाखो-करोडो नागरिक पेट्रोल आणि डिझेल विकत घेत असतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, प्रति लिटर पेट्रोलमागे सरकार आणि तेल कंपन्यांना किती नफा होत असेल? तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल प्रत्येकी एका लिटर मागे एका दिवसात तब्बल 380 कोटी रुपये कर स्वरुपात सरकारच्या तिजोरीत जमा होत असतात.

    आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्च्या तेलाची आयात करणे, त्यावर रिफायनरीमध्ये प्रक्रिया करणे आणि पंपांपर्यंत वाहतूक करणे, या सगळ्याचा एकूण खर्च मिळून १ लिटर पेट्रोलची मूळ किंमत साधारणपणे ₹४५ ते ₹५० च्या आसपास पडते. ही मूळ किंमत घेऊन जेव्हा तेल कंपन्या जसे की IOCL, BPCL बाजारात येतात, तेव्हा त्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून प्रचंड प्रमाणात कर (Taxes) लादला जातो. जेव्हा आपण पेट्रोल पंपावर जाऊन १ लिटर पेट्रोलसाठी सुमारे ₹१०० ते ₹११० मोजतो, तेव्हा त्यातील जवळपास निम्मे पैसे हे थेट सरकारच्या तिजोरीत टॅक्सच्या रूपाने जमा होत असतात.

    या किमतीवर केंद्र सरकार साधारण ₹२० ते ₹२५ प्रति लिटर एक्साईज ड्युटी (Excise Duty) वसूल करते, तर विविध राज्य सरकारे त्यावर ₹१५ ते ₹३० पर्यंत व्हॅट (VAT) किंवा सेस लावतात. याशिवाय पेट्रोल पंप चालवणाऱ्या डीलरला प्रति लिटर सुमारे ₹३.८० कमिशन मिळते. म्हणजेच, तुम्ही खरेदी करत असलेल्या पेट्रोलच्या एकूण किमतीमध्ये तब्बल ४०% ते ५०% पेक्षा जास्त वाटा हा केवळ केंद्र आणि राज्य सरकारच्या करांचा असतो. तर दुसरीकडे, तेल कंपन्यांचा निव्वळ नफा (Net Margin) प्रति लिटर ₹३ ते ₹४ च्या दरम्यान असतो, जो आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या चढ-उतारानुसार बदलत राहतो. थोडक्यात सांगायचे तर, १ लिटर पेट्रोलमागे कंपन्यांपेक्षा सरकारलाच कराच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि फायद्याचा नफा मिळतो, ज्याचा थेट भार सर्वसामान्यांच्या खिशावर पडतो.

  • Hybrid Fund: गुंतवणुकीचा स्मार्ट फॉर्म्युला!

    Hybrid Fund: गुंतवणुकीचा स्मार्ट फॉर्म्युला!

    Hybrid Fund: तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून भरघोस नफा कमवायचा आहे, पण “मार्केट पडलं तर पैसे बुडतील” ही भीती वाटतेय? मग टेंशन सोडा; कारण कमी रिस्क आणि बँकेपेक्षा जास्त परतावा मिळवून देणारा Hybrid Fund (हायब्रीड फंड) आहे तुमच्या पैशांचे खरे सुरक्षा कवच!

    पण हे हायब्रीड फंड नक्की काय आहे आणि ते कसे काम करते? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, हायब्रीड फंड म्हणजे तुमच्या गुंतवणुकीची एक ‘मल्टी-कुझिन थाळी’ आहे. ज्याप्रमाणे एका थाळीत गोड, तिखट, आणि लोणचं असं सगळं असतं, तसंच हायब्रीड फंड तुमचे पैसे एकाच वेळी Equity (शेअर्स) आणि Debt (सुरक्षित सरकारी रोखे) अशा दोन्ही ठिकाणी गुंतवतो.

    मार्केटमधील ऑलराउंडर खेळाडू!

    जेव्हा शेअर मार्केट वर जातं, तेव्हा यातील Equity Component तुम्हाला चांगला नफा मिळवून देतो. परंतु, जेव्हा मार्केटमध्ये चढ-उतार होतात किंवा मार्केट खाली येतं, तेव्हा Debt Component तुमच्या गुंतवणुकीला एक सुरक्षित कवच देतो.

    थोडक्यात काय तर, हा फंड म्हणजे क्रिकेटमधला तो All-rounder खेळाडू आहे, जो बॅटिंग आणि बॉलिंग अशा दोन्ही आघाड्यांवर तुमची टीम म्हणजेच तुमचे पैसे सुरक्षित ठेवतो.

    हायब्रीड फंडाची ३ खास वैशिष्ट्ये (Key Features)

    • रिस्क आणि रिटर्न्सचा अचूक समतोल (Risk-Return Balance): यामध्ये एकाच वेळी दोन वेगवेगळ्या क्षेत्रांत गुंतवणूक होत असल्याने जोखीम आपोआप कमी होते आणि परतावा उत्तम मिळतो.
    • प्रोफेशनल मॅनेजमेंट (Professional Management): मार्केटच्या हालचालीनुसार तुमचे Fund Manager आपोआप गुंतवणुकीचे प्रमाण (Asset Allocation) बदलतात. त्यामुळे तुम्हाला स्वतःला सतत मार्केटचे ग्राफ्स पाहण्याची गरज नसते.
    • नवशिक्यांसाठी सर्वोत्तम (Best for Beginners): जर तुम्ही पहिल्यांदाच Share Market किंवा म्युच्युअल फंडामध्ये येत असाल, तर हायब्रीड फंड हा तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित आणि सोपा पर्याय ठरू शकतो.

    आणखी वाचा

  • लोन आणि EMI चे टेन्शन संपवा! कर्जातून बाहेर पडण्याचे २ भन्नाट मार्ग..

    लोन आणि EMI चे टेन्शन संपवा! कर्जातून बाहेर पडण्याचे २ भन्नाट मार्ग..

    EMI: १ तारखेला पगार होतो आणि ५ तारीख येईपर्यंत बँक अकाउंट रिकामं होत. EMI, क्रेडिट कार्ड बिल आणि लोनच्या हप्त्यांमध्ये तुमचाही पगार गायब होतोय? तर मित्रांनो, कर्ज घेणं चुकीचं नाही, पण कर्जाच्या डेथ ट्रॅपमध्ये अडकणं भयंकर आहे. आज मी तुम्हाला या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचे जगप्रसिद्ध २ भन्नाट उपाय सांगणार आहे, जे तुमचे बँक अकाउंट पुन्हा जिवंत करतील.

    पहिली पद्धत आहे डेट स्नोबॉल (Debt Snowball Method).


    यामध्ये व्याजाचा विचार बाजूला ठेवा. तुमच्या सर्व कर्जांची एक लिस्ट बनवा त्यामध्ये सर्वात आधी सर्वात लहान कर्ज पूर्ण ताकदीने फेडून टाका. जेव्हा पहिलं छोटं कर्ज संपतं ना, तेव्हा मिळणारा मानसिक आनंद आणि आत्मविश्वास पुढची मोठी कर्जं संपवायला ऊर्जा देतो. जसा बर्फाचा गोळा डोंगरावरून खाली येताना मोठा होतो, तसाच तुमचा कर्ज फेडण्याचा आत्मविश्वास वाढतो.

    दुसरी पद्धत आहे डेट एव्हलांच (Debt Avalanche Method).


    जर तुम्हाला गणिताची भाषा समजते आणि हुशारीने पैसे वाचवायचे असतील, तर ही पद्धत तुमच्यासाठी बेस्ट आहे. यामध्ये सर्वात आधी ज्या कर्जावर सर्वात जास्त व्याज आहे, उदा. क्रेडिट कार्ड लोन ज्यावर वार्षिक ३६% ते ४२% व्याज असतं, ते आधी संपवा. यामुळे तुमचं व्याजात जाणारं हजारो रुपयांचं नुकसान तात्काळ थांबतं. हे संपलं की, त्यापेक्षा कमी व्याज असलेलं कर्ज टार्गेट करा आणि ते संपवा.

    EMI: थोडक्यात सांगायचं तर पहिली पद्धत तुम्हाला मानसिक समाधान देते, तर दुसरी पद्धत तुमचे खरे पैसे वाचवते. फायनान्शियल एक्सपर्ट्सच्या मते, ८०% लोक स्नोबॉल पद्धतीमुळे कर्जातून लवकर बाहेर पडतात कारण माणसाला रिझल्ट्स लवकर हवे असतात. तुम्हाला या दोन्हींपैकी कोणती पद्धत जास्त प्रॅक्टिकल वाटते? स्नोबॉल की एव्हलांच? कमेंट करून नक्की सांगा.

    आणखी वाचा :

  • Saving Money Tips Marathi: बचत आणि योग्य गुंतवणूक

    Saving Money Tips Marathi: बचत आणि योग्य गुंतवणूक

    Saving Money Tips Marathi: जाणून घ्या जीवनातील बचतीचे अनन्यसाधारण महत्व

    ‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही म्हण आपण अगदी बालपणापासूनच ऐकत आलो आहोत. ही म्हण जितकी आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर लागू होते, तितकीच ती Money Saving (पैशांच्या बचती) च्या बाबतीतही खरी ठरते. कारण बचत म्हणजे केवळ पैशांची साठवणूक नाही, तर ती म्हणजे सुरक्षिततेची खात्री, भविष्यातील तरतूद आणि Financial Freedom (आर्थिक स्वातंत्र्य) चा मजबूत पाया आहे.

    आजच्या धावपळीच्या काळात जेव्हा खर्चाचे प्रमाण वाढले आहे, महागाई सतत वाढत आहे आणि आकस्मिक परिस्थिती क्षणात येऊन ठेपते, तेव्हा पैशांची बचत करणे ही प्रत्येकाची प्राथमिक गरज ठरते. आजच्या या लेखात आपण बचत ही संकल्पना आणि जीवनात बचतीचे असंख्य फायदे जाणून घेणार आहोत.

    आर्थिक शिस्त: सुरक्षिततेची ढाल

    पैसे वाचवणे हा तुमच्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी संपत्ती निर्माण करण्याचा (Wealth Creation) पारंपारिक मार्ग आहे. “आर्थिक शिस्त ही आर्थिक स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे.” पैशाची बचत केवळ आकडेवारी नसून ती आयुष्याला सुरक्षिततेची ढाल देणारी सवय आहे. नियोजनपूर्वक केलेली बचत तुमच्या भविष्यासाठी आधार ठरते.

    बचत कशी करावी यावर जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार वॉरेन बफेट (Warren Buffett) सांगतात:

    “खर्च केल्यावर जे उरेल ते साठवू नका, तर बचत केल्यानंतर जे उरेल ते खर्च करा.”

    पैसे वाचवणे म्हणजेच कमावणे आहे. आपण लहानपणापासूनच घरातील आई, आजी, गृहिणी यांना घरखर्च वेगळा काढून पैशांची बचत करताना पाहिले आहे. जेव्हा कधी घरात अडीअडचणीची वेळ येते तेव्हा घरातील गृहिणींनी केलेली हीच Micro Savings हमखास कामी पडते. यावरूनच लक्षात येते की छोटी-मोठी बचतही भविष्यात खूप मोठा आधार ठरू शकते.

    बचत आणि गुंतवणुकीचे पर्याय (Investment Options)

    तज्ज्ञांच्या मते, पैशांची बचत करणे ही सामान्यतः कमी जोखीम असलेली क्रिया आहे. व्यक्ती असो किंवा कुटुंब, प्रत्येकाने आपल्या मासिक निव्वळ उत्पन्नातून (Monthly Income) किमान १०% ते १७% रक्कम बचतीसाठी वेगळी ठेवली पाहिजे. फक्त पैसे साठवू नका, तर त्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे कधीही फायदेशीर ठरते.

    आजच Investment करा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करा. पैशांची सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी भारतीयांचे अनेक आवडते पर्याय आज उपलब्ध आहेत:

    • बँक फिक्स्ड डिपॉझिट (FD – Fixed Deposit): सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळवण्याचा पारंपारिक पर्याय.
    • रिकरिंग डिपॉझिट (RD – Recurring Deposit): दर महिन्याला निश्चित रक्कम जमा करण्याचा उत्तम पर्याय.
    • पोस्ट ऑफिस योजना (Post Office Schemes): छोट्या बचतीसाठी किसान विकास पत्र (KVP), मासिक उत्पन्न योजना (MIS) हे उत्तम पर्याय आहेत.
    • पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF): दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक आणि कर बचतीसाठी (Tax Saving) एक उत्तम माध्यम.
    • म्युच्युअल फंड आणि SIP (Systematic Investment Plan): नियमित गुंतवणुकीने बाजाराच्या गतीने चांगला परतावा मिळविण्यासाठी लोकप्रिय पर्याय.
    • सोने (Gold Investment): पारंपारिक पण संकटकाळात अत्यंत उपयुक्त आणि सुरक्षित मानली जाणारी गुंतवणूक.

    बचत गटांचे महत्त्व आणि आपत्कालीन फंड (Emergency Fund)

    आपल्या समाजात बचत गट, महिला बचत गट आणि सहकारी संस्था यांमुळे अनेक कुटुंबांचा आर्थिक दर्जा उंचावला आहे. ‘Self Help Groups’ (बचत गट) ही संकल्पना ग्रामीण भागातील महिलांसाठी तर आर्थिक स्वावलंबनाचा मोठा आधार ठरली आहे.

    पर्याय अनेक आहेत परंतु प्रत्येकाने आपले उत्पन्न, गरजा आणि जोखमीची क्षमता (Risk Appetite) पाहून योग्य मार्ग निवडणे महत्त्वाचे आहे.

    जर एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये अचानक पैशांची गरज भासली, तर तुम्हाला बचतीचे पैसे मदतीला येऊ शकतात. त्यासाठी प्रत्येकाकडे एक Emergency Fund (आपत्कालीन फंड) असणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीपूर्वीच आपल्या उत्पन्नातून काही पैसे सुरक्षित ठेवा, मात्र अत्यंत आवश्यकता भासल्याशिवाय त्या पैशांचा वापर करू नका.

    तरुण पिढी आणि बचतीची सवय

    Saving Money Tips Marathi: आजची तरुण पिढी प्रामुख्याने ‘कमवा आणि खर्च करा’ या पाश्चात्य विचाराला जास्त प्राधान्य देताना दिसते. पण हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, जेवढ्या लवकर तुम्ही Early Investing आणि बचत सुरू कराल, तितका ‘कंपाउंडिंग’च्या मदतीने तुमचा पैसा भविष्यात अधिक वाढेल.

    लहान मुलांमध्येही बालपणापासूनच बचतीची सवय लावणे महत्त्वाचे आहे. त्यांना छोट्या पैशांची गुल्लक (Piggy Bank) देऊन बचत शिकवली, तर पुढील आयुष्यात ते पैशांचे महत्व जाणून जबाबदार नागरिक बनतील.

    आजची शहाणी बचत म्हणजे उद्याचा आनंदी प्रवास!

    प्रत्येकाला काही ना काही स्वप्ने असतात—स्वतःचे घर, मुलांचे उच्च शिक्षण, प्रवास किंवा निवृत्तीनंतरचे (Retirement Life) निर्धास्त आयुष्य. या सगळ्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी बचत आवश्यक असते. अनपेक्षित प्रसंग जसे की आजारपण, अपघात, नोकरीतील अस्थिरता यांचा सामना करताना बचत आपल्याला मानसिक आणि आर्थिक आधार देते.

    आजची छोटीशी बचत उद्या मोठा आधार ठरते. बचतीमुळे केवळ सुरक्षित भविष्यच नाही तर समाधानकारक आणि संतुलित जीवनशैलीही निर्माण होते.

  • Quick Commerce 2026: ऑनलाइन खरेदीचा सर्वात वेगवान अवतार

    Quick Commerce 2026: ऑनलाइन खरेदीचा सर्वात वेगवान अवतार

    Quick Commerce 2026: क्विक कॉमर्स (Quick Commerce) म्हणजे E-commerce चा पुढचा आणि अत्यंत वेगवान टप्पा. हे नवीन मॉडेल ग्राहकांना किराणा माल, औषधे, खाद्यपदार्थ, आणि इतर दैनंदिन वस्तू अवघ्या काही मिनिटांत पोहोचवते. ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि आधुनिक तंत्रज्ञानातील प्रगती यामुळे क्विक कॉमर्सने जगभरातील Business क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणला आहे.

    भारतात क्विक कॉमर्स क्षेत्रात झेप घेतलेले अनेक Startups आहेत, जे लोकांच्या जीवनशैलीत आणि खरेदीच्या पद्धतीत वेगाने बदल घडवत आहेत. या लेखात आपण क्विक कॉमर्सची व्याप्ती, त्याचा इतिहास, प्रमुख कंपन्या आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने होत असलेली वाढ, यांचा सखोल आढावा घेणार आहोत.

    क्विक कॉमर्स म्हणजे काय आणि ही संकल्पना कशी कार्य करते?

    क्विक कॉमर्स (Q-commerce) म्हणजेच जलद ई-कॉमर्स सेवा, ज्यामध्ये ग्राहकांना १० ते ३० मिनिटांत वस्तू डिलीव्हर केल्या जातात. पारंपारिक ई-कॉमर्समध्ये Delivery ला काही तासांपासून काही दिवस लागू शकतात, पण Q-commerce तात्काळ सेवा पुरवतो. या सेवेमध्ये किराणा, ताजे अन्न, औषधे आणि इतर रोजच्या गरजेच्या वस्तूंचा समावेश आहे.

    मायक्रो फुलफिलमेंट सेंटर्स (Micro-Fulfillment Centers)

    जलद सेवा देण्यासाठी, शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये छोटे स्टोअर्स उभारले जातात, ज्यांना ‘डार्क स्टोअर्स’ किंवा मायक्रो फुलफिलमेंट सेंटर्स म्हटले जाते. यामध्ये थोड्या प्रमाणात पण अत्यंत आवश्यक वस्तू साठवल्या जातात.

    यामधील डिलीव्हरीची प्रक्रिया Gig Economy वर आधारित असते, म्हणजेच फ्रीलांस काम करणारे Delivery Partners ऑर्डर पोहोचवतात. यात स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर केला जातो ज्यामुळे ऑर्डर मिळाल्यानंतर तात्काळ Route Planning आणि Real-time Tracking यासारख्या सुविधा वापरून ग्राहकांना वेळेत सेवा दिली जाते. अशा प्रकारे, क्विक कॉमर्स जलद आणि सोयीस्कर खरेदीचा अनुभव देते.

    क्विक कॉमर्सचा इतिहास (History of Q-Commerce)

    क्विक कॉमर्स संकल्पनेचा उदय विशेषतः COVID-19 महामारीच्या काळात झाला. २०२० च्या लॉकडाऊन दरम्यान, लोकांना घरातून बाहेर पडणे शक्य नव्हते आणि आवश्यक वस्तूंची तातडीने गरज होती. या स्थितीने किराणा माल, औषधे, आणि दैनंदिन वापराच्या वस्तू जलदगतीने पोहोचवणाऱ्या सेवांची मागणी प्रचंड वाढवली.

    तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या कंपन्यांनी या संधीचा फायदा घेत, डार्क स्टोअर्स आणि Smart Logistics वापरून जलद सेवा सुरू केल्या. भारतासारख्या देशात, जिथे शहरीकरण वेगाने होत आहे आणि लोकांचा दिनक्रम खूप व्यस्त आहे, तिथे क्विक कॉमर्स सेवांनी जलदगतीने बाजारपेठ काबीज केली.

    क्विक कॉमर्समधील प्रमुख कंपन्या (Top Q-Commerce Brands)

    भारताच्या क्विक कॉमर्स क्षेत्रात काही प्रमुख स्टार्टअप्सने आपला मोठा ठसा निर्माण केला आहे:

    • झेप्टो (Zepto): हा स्टार्टअप २०२१ मध्ये मुंबईत सुरू झाला. झेप्टो अवघ्या १० ते २० मिनिटांत किराणा माल घरपोच पोहचवतो. ते मायक्रो फुलफिलमेंट सेंटर्सद्वारे कार्य करतात, ज्यामुळे ग्राहकांच्या ऑर्डर त्यांच्या जवळच्या गोदामातून अतिशय वेगाने पूर्ण केल्या जातात.
    • ब्लिंकिट (Blinkit): हा स्टार्टअप पूर्वी ग्रोफर्स (Grofers) म्हणून ओळखला जात होता. त्यांनी क्विक कॉमर्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपली रणनीती बदलली आहे आणि १०-१५ मिनिटांत वस्तू पोहोचवण्याचा यशस्वी पॅटर्न तयार केला आहे.
    • स्विगी इन्स्टामार्ट (Swiggy Instamart): स्विगी, जी एक प्रमुख Food Delivery कंपनी आहे, तिने इन्स्टामार्टच्या माध्यमातून क्विक कॉमर्समध्ये प्रवेश केला. Instamart ग्राहकांना तातडीने आवश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी स्विगीच्या अवाढव्य लॉजिस्टिक्स नेटवर्कचा वापर करते.

    तंत्रज्ञानाचा प्रगत वापर (Role of Technology)

    कृत्रिम बुद्धिमत्ता (AI – Artificial Intelligence) आणि Data Analytics च्या मदतीने कंपन्या ग्राहकांच्या खरेदीच्या सवयींचा सखोल अभ्यास करत आहेत. यामुळे त्यांना ग्राहकांना वेळेवर आणि अचूक सेवा देणे सोपे जात आहे. उदाहरणार्थ, नियमितपणे काही विशिष्ट वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी AI आधीच त्यांचा साठा तयार ठेवतो, ज्यामुळे डिलिव्हरी प्रक्रिया अधिक वेगवान होते.

    Logistics Management हा जलद वितरणासाठी एक महत्त्वाचा घटक आहे, जिथे कंपन्या GPS System, स्मार्ट रूट प्लॅनिंग आणि रियल-टाइम ट्रॅकिंगचा प्रभावी वापर करतात. तंत्रज्ञानामुळे संपूर्ण प्रक्रिया जलद, कार्यक्षम आणि अचूक होते, ज्यामुळे ग्राहकांचा अनुभव मोठ्या प्रमाणावर सुधारतो.

    भविष्यातील वाटचाल (Future Trends)

    क्विक कॉमर्स हा ई-कॉमर्स क्षेत्रात एक क्रांतिकारी बदल आहे, ज्यामुळे खरेदीचा संपूर्ण अनुभव बदलला आहे. ग्राहकांना जलद सेवा मिळाल्यामुळे त्यांची अपेक्षा वाढली आहे आणि कंपन्यांना त्यांच्या सेवा आणखी सुधारण्याची गरज भासू लागली आहे. भविष्यात, Drone Delivery, Automation (ऑटोमेशन) आणि नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने क्विक कॉमर्स अधिक कार्यक्षम आणि सर्वव्यापी होण्याची शक्यता आहे. या प्रगतीमुळे खरेदी अधिक सुलभ, जलद आणि कार्यक्षम होईल.

    आणखी वाचा :

  • E-Commerce: ई-कॉमर्स क्षेत्राची झपाट्याने वाढ

    E-Commerce: ई-कॉमर्स क्षेत्राची झपाट्याने वाढ

    E-Commerce: जाणून घेऊया, भारतीय ई-कॉमर्स मार्केट, UPI आणि बरंच काही….

    भारतामध्ये मागील अनेक वर्षांत व्यापारी क्षेत्रात अनेक मोठे बदल घडून आले. स्मार्टफोन, इंटरनेट, स्वस्त डेटा यांमुळे ग्राहकांची खरेदी-विक्रीची सवय झपाट्याने बदलली आहे. घरबसल्या मोबाईलवर अगदी काही क्षणात एका क्लिक वरून वस्तू मागवण्याची सुविधा आता सर्वसामान्यात रूढ झाली आहे. याच बदलाला आपण E-commerce (ई-कॉमर्स) असे म्हणतो. वस्तू व सेवा यांची खरेदी-विक्री इंटरनेटद्वारे केली जाणारी पद्धत म्हणजे ई-कॉमर्स.

    भारतात झपाट्याने वाढणारे E-commerce Market

    २०२३ – २४ या आर्थिक वर्षात भारताचा E-commerce Market बाजार सुमारे १०.२५ लाख कोटी एवढा होता. तज्ञांच्या अंदाजानुसार २०२७-२८ पर्यंत हा बाजार २४ लाख कोटींहून अधिक होईल. म्हणजेच दरवर्षी सुमारे १८ ते १९ टक्के दराने प्रचंड वाढ अपेक्षित आहे. २०२४ मध्ये भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ८८.६ कोटी इतकी झाली आहे. आज B2B Business, B2C Business – थेट ग्राहकाला विक्री, ऑनलाइन लिलाव विक्री, एका ग्राहकाकडून दुसऱ्याला विक्री (C2C), असे काही ई-कॉमर्सचे प्रमुख प्रकार भारतामध्ये प्रचलित आहेत.

    UPI: डिजिटल पेमेंटमधील क्रांती

    ई-कॉमर्सच्या वाढीसाठी Digital Payments चा मोठा वाटा आहे. भारतात UPI (Unified Payments Interface) हे खूप मोठे यश ठरले आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये UPI ने २००० कोटींहून अधिक व्यवहार पूर्ण केले, ज्यांची किंमत तब्बल २४.८५ लाख कोटी इतकी होती. एवढ्या प्रमाणावर स्वस्त, सोपी आणि सुरक्षित व्यवहार व्यवस्था जगात दुसरीकडे नाही.

    UPI मुळे ई-कॉमर्समध्ये कार्ड किंवा Cash-on-Delivery (COD) वर अवलंबून राहावे लागत नाही. आता छोट्या दुकानदारांपासून ते मोठ्या ब्रँडपर्यंत सर्व जण QR Code द्वारे पैसे स्वीकारतात. यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढला आहे.

    ONDC: छोट्या विक्रेत्यांसाठी सुवर्णसंधी

    आजपर्यंत ऑनलाइन खरेदी काही मोठ्या कंपन्यांपुरते मर्यादित होती. पण सरकारने सुरू केलेल्या ONDC (Open Network for Digital Commerce) या योजनेमुळे स्थानिक दुकानदार, शेतकरी, किराणा व्यावसायिक, रेस्टॉरंट मालक यांनाही डिजिटल बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. २०२५ मध्ये ONDC वर दर महिन्याला लाखो व्यवहार होत असून हजारो छोटे विक्रेते यात सहभागी झाले आहेत. त्यामुळे मोठ्या Platforms वर अवलंबून न राहता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे.

    Logistics व वितरण (Delivery)

    ई-कॉमर्समध्ये ग्राहकाला सर्वात जास्त महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे जलद वितरण. भारत सरकारने राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरण (National Logistics Policy) जाहीर करून खर्च कमी करण्यावर भर दिला आहे. २०२५ मध्ये लॉजिस्टिक्स खर्च GDP च्या ८.३५% इतका आहे, जो ५% पर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

    मोठ्या शहरांमध्ये आता एक-दोन दिवसांत वस्तू मिळतात, तर झोमॅटो, ब्लिंकिटसारख्या कंपन्या १०-३० मिनिटांत Grocery घरपोच करत आहेत.

    ई-कॉमर्सचे फायदे (Benefits of E-commerce)

    इंटरनेटच्या मदतीने खरेदी-विक्री करणे अधिक जलद, सुरक्षित आणि सोपं झालं आहे. ई-कॉमर्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो २४ तास उपलब्ध असतो. ग्राहक कुठूनही आणि कधीही आपल्या गरजेची वस्तू खरेदी करू शकतो. यामध्ये एकाच ठिकाणी हजारो उत्पादने व Brands ची निवड मिळते, त्यामुळे जास्त पर्याय सहज उपलब्ध होतात.

    ऑनलाइन खरेदीमुळे वेळ आणि श्रम दोन्हीची बचत होते, कारण ग्राहकांना दुकानात जाऊन रांगेत उभे राहावे लागत नाही. त्याशिवाय वस्तू घरपोच सेवेच्या माध्यमातून थेट ग्राहकांच्या दारात पोहोचवल्या जातात. विक्रेत्यांसाठीही ई-कॉमर्स फायदेशीर आहे, कारण दुकानभाडे, कर्मचारी, वीज, इत्यादी खर्च कमी होतो आणि त्यामुळे ते ग्राहकांना सवलती आणि Offers देऊ शकतात.

    ई-कॉमर्समुळे व्यापाऱ्यांना Global Market मध्ये सहज पोहचता येते. एखादा छोटा विक्रेता देखील आपल्या उत्पादनांची विक्री जगभर करू शकतो. तसेच, Price Comparison करणे सोपे असल्यामुळे ग्राहकांना सर्वोत्तम दर मिळतो. सुरक्षित आणि जलद Digital Payments हेही ई-कॉमर्सचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

    ई-कॉमर्सचे फायदे (Benefits of E-commerce)

    ई-कॉमर्स पुढील आव्हाने (Challenges)

    E-Commerce: जरी ई-कॉमर्स व्यापारी क्षेत्रातील मोठी क्रांती असली तरी ई-कॉमर्ससमोर काही गंभीर आव्हाने आहेत. नकली वस्तूंची विक्री, Returns & Refunds मधील अडचणी, Cyber Fraud, ग्रामीण भागात अजूनही स्थिर इंटरनेट व डिजिटल साक्षरतेचा (Digital Literacy) अभाव इ. समस्यांचा विचार करणे आवश्यक आहे.

    नियमन व ग्राहक संरक्षण (Consumer Protection)

    सरकारने Consumer Protection Rules, 2020 लागू करून ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण केले आहे. या नियमांनुसार प्लॅटफॉर्मनी स्पष्ट परतावा धोरण (Return Policy), ग्राहक तक्रार निवारण अधिकारी (Grievance Officer), व पारदर्शक जाहिराती यांची अट पाळणे बंधनकारक केले आहे. तसेच Digital Personal Data Protection Act, 2023 (DPDP Act) मुळे ग्राहकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ई-कॉमर्स कंपन्यांकडे आली आहे.

    सामाजिक परिणाम (Social Impact)

    ई-कॉमर्सने MSME (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) क्षेत्राला प्रचंड चालना दिली आहे. स्थानिक कारागीर, शेतकरी, महिला उद्योजिका आता थेट देशभरात व परदेशात आपली उत्पादने विकू शकतात. उदाहरणार्थ, विदर्भातील संत्री, कर्नाटकातील कॉफी, कोकणातील आंबा, राजस्थानातील हस्तकला हे सगळं आता डिजिटल माध्यमातून ग्राहकांपर्यंत सहज पोहोचत आहे.

    भविष्याचा वेध (Future Trends)

    आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI – Artificial Intelligence), आवाजावर आधारित खरेदी (Voice Commerce), थेट सोशल मीडियावर खरेदी (Social Commerce), पर्यावरणपूरक पॅकेजिंग, तसेच Drone Delivery या गोष्टी ई-कॉमर्सला आणखी नवी दिशा देतील.

    एकंदरीत, ई-कॉमर्स हा आजच्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा नवा इंजिन ठरला आहे. २०२५ मध्येच हा बाजार १० लाख कोटींहून अधिक झाला असून, काही वर्षांत दुप्पट होण्याची शक्यता आहे. UPI सारखी पेमेंट व्यवस्था, ONDC सारखी खुली नेटवर्क प्रणाली, आणि सरकारचे ग्राहक संरक्षणाचे कायदे यामुळे लोकांचा ई-कॉमर्सवर विश्वास वाढला आहे. या तंत्रज्ञानाधारित क्रांतीमुळे उद्योजकतेला नवे आयाम मिळाले असून भारताचे डिजिटल भविष्य अधिक सक्षम होत आहे.

    आणखी वाचा :

  • Fevicol Man: एका वॉचमन च्या कल्पनेतून साकारलेला ब्रॅण्ड

    Fevicol Man: एका वॉचमन च्या कल्पनेतून साकारलेला ब्रॅण्ड

    Fevicol Man: फेविकॉलची जाहिरात “फेविकॉल का मजबूत जोड, आसानी से टूटेगा नहीं” ही सर्वांनाच परिचयाची आहे. आजही “मजबूत जोड” म्हटलं की फेविकॉल आठवतं, कारण फेविकॉल असेल तर जोड खरोखरच टिकाऊ असतो. फेविकॉलच्या जाहिरातींनी आणि त्यांच्या Branding ने लोकांच्या मनात या नावाची छाप कायमची बसवली आहे. लहानपणापासून आपल्याला अनेक गोष्टी तुटल्या की फेविकॉल वापरायची सवय आहे, मग ती वस्तू कितीही लहान किंवा मोठी असो.

    पण तुम्हाला कधी विचार आला आहे का की या यशस्वी Brand च्या मागे कोण आहे? हा ब्रँड उभा करणारी ती प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे बलवंत पारेख, ज्यांना Fevicol Manम्हणूनही ओळखलं जातं. गुजरातच्या भावनगरमधील एक साधा माणूस, ज्याने आपल्या मेहनतीने फेविकॉलला यशस्वी बनवलं आणि तो घराघरात पोहोचवला.

    आजच्या या लेखात आपण बलवंत पारेख यांच्या प्रेरणादायी Life Journey वर एक नजर टाकूया, आणि पाहूया की त्यांनी कसं फेविकॉलसारख्या सामर्थ्यवान ब्रँडची निर्मिती केली.

    प्रारंभिक जीवन (Early Life)

    बलवंत पारेख यांचा जन्म १९२५ साली गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील महुवा या शहरात एका जैन कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा मॅजिस्ट्रेट होते, त्यामुळे कुटुंब सुशिक्षित आणि प्रतिष्ठित होते. लहानपणापासूनच बलवंत यांना शिक्षणाची आवड होती. त्यांच्या पालकांना वाटत होतं की त्यांनी कायद्याची पदवी घेऊन वकील व्हावे. त्यामुळे त्यांनी मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयात (Government Law College) कायद्याचं शिक्षण घेतलं.त्याकाळी देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. महात्मा गांधींच्या विचारांची देशात लाट पसरली होती. बलवंत यांनी देखील स्वातंत्र्याच्या या संग्राममध्ये सक्रिय सहभाग घेतला, Quit India Movement मध्येही ते पूर्ण तन मनाने सहभागी झाले होते मात्र त्यांनी आधी आपला अभ्यास पूर्ण करावा असा घरच्यांचा दबाव होता.

    शिक्षण घेत असतानाच बलवंत यांचा विवाह कांताबेन यांच्यासोबत झाला. कायद्याची पदवी तर त्यांना मिळाली पण बलवंत यांना वकिलीपेक्षा व्यवसायात अधिक रस होता. त्यांनी वकिली न करता मुंबईतील एका रंगाई आणि मुद्रणालयात काम करायला सुरुवात केली. काही काळानंतर त्यांनी ही नोकरी सोडली आणि एका लाकूड व्यापाऱ्याच्या कार्यालयात शिपाई म्हणून नोकरी धरली, जिथे ते पत्नीसोबत गोदामात राहत होते. त्यांना स्वतःचा Business सुरु करायची तीव्र इच्छा होती म्हणून कठीण परिस्थितीतून मार्ग काढताना त्यांनी मोहन नावाच्या गुंतवणूकदाराच्या (Investor) मदतीने पाश्चात्य देशांतून सायकल, सुपारी, आणि कागदी रंग आयात करण्याचा व्यवसाय सुरू केला. पण दुर्दैवाने तो व्यवसाय फार काळ टिकू शकला नाही, त्या काळात त्यांनीं व्यवसायासाठी घेतलेल्या विविध कर्जांमुळे त्यांना खूप आर्थिक बोजादेखील सहन करावा लागला.

    संघर्षांतून सुरु केला यशाचा प्रवास (Success Story)

    त्यांनी नंतर अनेक छोटी मोठी कामं करून आपल्या मेहनतीच्या बळावर थेट जर्मनी गाठली आणि फेडको या कंपनीत ते रुजू झाले. फेडकोमधील नोकरी बलवंत यांना उद्योग आणि व्यवसायाचे तंत्र शिकवणारी ठरली. फेडको या जर्मन कंपनीसोबत काम करताना त्यांना उत्पादकता, गुणवत्ता नियंत्रण आणि उत्पादनांच्या साठवण व्यवस्थापनाबद्दलची माहिती मिळाली. फेडकोने काही काळानंतर व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यावेळी मात्र बलवंत यांनी परत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. 1954 मध्ये त्यांनी आपल्या भावासह मुंबईच्या जेकब सर्कल येथे ‘Parekh Dyechem Industries‘ नावाने एक कंपनी स्थापन केली, जी औद्योगिक रसायने, रंगद्रव्य इमल्शन आणि रंगांचे उत्पादन आणि विक्री करत होती. ही त्यांची पहिली उद्योजकीय पायरी होती.

    फेविकॉलचा शोध (Invention of Fevicol)

    Pidilite Industries म्हणजेच पारेख डायकेम लाइट इंडस्ट्रीजने प्रथम औद्योगिक उत्पादनासाठी काम केलं , परंतु बलवंत यांना सुतारांच्या वापरासाठी एक नवीन उत्पादने तयार करण्याची संधी दिसली. सुतारांना कामासाठी लागणारे गोंद त्या काळात अनेकदा प्राण्यांच्या अवयवांपासून तयार होत असे, ज्यामुळे त्याच्या वापरात काही मर्यादा येत होत्या. यामुळे त्यांनी शाकाहारी म्हणजेच कोणत्याही प्राण्याची हत्त्या न करता गोंद तयार करण्याचा संकल्प केला. आपल्या जुन्या कंपनीच्या नावातला फेडको आणि कॉल म्हणजे गोंद हा जर्मन शब्द जोडून ‘Fevicol‘ नावाचा त्यांनी नवीन ब्रँड तयार केला. फेविकॉलची निर्मिती १९५९ सालापासून सुरु झाली. सुरुवातीला अपेक्षित असं यश त्यांना मिळालं नाही, मात्र फेविकॉलच्या उत्तम दर्जामुळे ते सुतारांच्या पसंतीस उतरू लागले.

    Fevicol Man एका वॉचमन च्या कल्पनेतून साकारलेला ब्रॅण्ड

    Fevicol Man:फेविकॉलने सुतारांचा बाजार कसा काबीज करावा यासाठी एक अभिनव योजना आखली. बलवंत यांनी “Fevicol Champions Club” नावाचा एक समुदाय निर्माण केला. या क्लबने सुतारांना फेविकॉल उत्पादनांची माहिती देऊन त्यांच कौशल्य आणि व्यवसाय अधिक सुधारण्यासाठी मदत केली. या समुदायात फक्त उत्पादनाबद्दल शिकवलं गेलं नाही, तर सुतारांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि शिकण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. या मोहिमेमुळे फेविकॉलने त्या काळात देशभरातील ८०% पेक्षा जास्त सुतारांचा विश्वास प्राप्त केला.

    जाहिरात आणि व्यवसाय विस्ताराचे धोरण (Marketing Strategy)

    १९८९ मध्ये बलवंत पारेख यांनी फेविकॉलला एक सार्वत्रिक ब्रँड बनवण्याचा संकल्प केला. या उद्देशासाठी त्यांनी एक Advertising Strategy अवलंबली. “दम लगाके हैशा” आणि “फेविकॉल का मजबुत जोड़ है, टूटेगा नहीं” या प्रभावशाली स्लोगनद्वारे (Slogan) त्यांनी फेविकॉलला सर्वसामान्यांच्या वापरात आणलं. फेविकॉल केवळ सुतारांसाठी नाही, तर घराघरातील लोकांसाठी एक उपयोगी साधन बनले. या अनोख्या जाहिरातींमुळे फेविकॉलने भारतीय बाजारपेठेत एक विशेष स्थान प्राप्त केले आणि 20 वर्षांच्या आत अविश्वसनीय 70% Market Share मिळवला. या यशात, देशातील प्रत्येक दोन सुतारांपैकी एकाने फेविकॉल वापरण्यास सुरुवात केली.

    Fevicol Man: 1993 पर्यंत, Pidilite ने बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर (BSE) IPO मध्ये प्रवेश केला, आणि सर्व काही ठीकटाक आणि सुरळीत असूनही बलवंत पारेख पूर्णपणे समाधानी नव्हते, कारण त्यांची इच्छा होती की फेविकॉल सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनावं. ग्राहकांच्या मागणीनुसार, त्यांनी फेविकॉलचा Logo बदलून दोन जोडलेले हत्ती बनवले, जे एकता आणि शक्तीचे प्रतीक झाले. यामुळे फेविकॉल 30 ग्रॅमच्या ट्यूबमध्ये उपलब्ध झाला, त्याला प्रचंड लोकप्रियता मिळली.

    आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवत बलवंत पारेख यांनी २००६ पर्यंत फेविकॉलचा विस्तार केला, फेविकॉल ७१ देशांमध्ये पोहोचले. त्याच वेळी, M-Seal आणि Dr. Fixit सारखे अन्य ब्रँड्स देखील यशस्वीपणे लाँच करण्यात आले. बलवंत यांच्या नेतृत्वाखाली Pidilite Industries जवळजवळ २००० कोटी रुपयांच्या मूल्याची कंपनी बनली, ज्यामुळे फेविकॉलने भारतीय बाजारपेठेत एक वर्चस्व प्रस्थापित केलं.

    सामाजिक आणि शैक्षणिक कार्य (Philanthropy)

    बलवंत पारेख हे केवळ उद्योगातच नाही तर समाजकार्यात देखील सक्रिय होते. त्यांनी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच महुवा येथे दोन शाळा, एक महाविद्यालय, आणि एक रुग्णालयाची स्थापना केली. त्यांना आपल्या संस्कृती आणि इतिहासाची प्रचंड आवड होती म्हणून त्यांनी ‘दर्शक फाउंडेशन’ (Darshak Foundation) या संस्थेची स्थापना केली, ही संस्था भारतीय सांस्कृतिक इतिहासावर संशोधन करते. बलवंत यांचे स्वतःचे एक खाजगी ग्रंथालय होते ज्यामध्ये शास्त्र, साहित्य, कायदा, मानसशास्त्र, आणि सामान्य ज्ञानाचे विविध ग्रंथ होते. त्यांनी Balwant Parekh Centre for General Semantics and Other Human Sciencesया संस्थेची स्थापना करून, लोकांच्या शिक्षणासाठी आणि विज्ञानविषयक संशोधनासाठी एक ठोस पाऊल उचलले.

    मित्रांनो, बलवंत पारेख यांचा जीवनप्रवास आणि कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. एका सामान्य व्यक्तीने जिद्द, मेहनत आणि सततची शिकण्याची तयारी याच्या जोरावर उद्योगजगताला नवी दिशा दिली. फेविकॉलचे माध्यमातून त्यांनी भारतीयांना एक असा ब्रँड दिला जो एकता, विश्वास, आणि अतूट बंधनाचे प्रतीक आहे. आजही बलवंत पारेख यांच्या योगदानाचे स्मरण त्यांच्या उद्योजकीय विचारसरणीतून आणि समाजसेवेच्या कार्यातून होते.

  • 5 Successful Habits : यशामागचं खरं रहस्य

    5 Successful Habits : यशामागचं खरं रहस्य

    5 Successful Habits: जर मी हे करू शकतो, तर मी ते केलंच पाहिजे..

    स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स, वॉरेन बफेट, रतन टाटा, एलोन मस्क, नेल्सन मंडेला, ओप्राह विन्फ्रे, मदर तेरेसा, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम  या आणि अशा अनेक व्यक्तींनी संपूर्ण मानवजातीवर त्यांच्या कार्यातून, कर्तृत्वातून खूप मोठा प्रभाव पडलेला आहे. या सर्वांनी त्यांच्या परीने मानवतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे.

    मित्रांनो जर तुम्ही स्व-विकास साधण्याचा प्रयत्न केला असेल, स्वत:ला घडवण्याचा प्रयत्न केला असेल, तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल ती म्हणजे, “आपण जे विचार करतो, तेच विचार प्रत्यक्षात येतात”. मग हे असामान्य लोक नक्की कसा विचार करतात ज्यामुळे ते यशस्वी होतात ? सामान्य लोकांपेक्षा कोणत्या वेगळ्या गोष्टी हे लोक करतात ज्यामुळे मोठा बदल घडून येतो ?

    असामान्य लोकं नेहमीच समस्या सोडवण्याच्या वेगळ्या मार्गांचा आणि वेगळ्या पद्धतींचा शोध घेतात, नेहमीच्या साचेबद्ध विचारांमध्ये ते अडकत नाहीत आणि प्रत्येक संधी आणि आव्हानं नवीन दृष्टिकोनातून, वेगळ्या विचारातून  पाहतात.

    लेखक शिव खेरा म्हणतात .. 

    विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. 

    आजच्या लेखात आपण असामान्य लोक सामान्य लोकांपेक्षा कोणत्या बाबतीत वेगळे असतात पाहूया : 

    1. कठोर मेहनत विरुद्ध मिळणारे यश :

    कुठलीही कृती करण्यापूर्वी सामान्य लोकांची प्रवृत्ती असते की, ते फक्त काम करण्यावर लक्ष  देतात. त्यातून होणाऱ्या परिणामांचा फारसा विचार करत नाहीत.

    टेस्ला कार रस्त्यावर आणण्यासाठी एलोन मस्कला अगणित अडथळ्यांना तोंड द्यावे लागले. तसेच ओप्रा विन्प्रेला तिचा टीव्हीवरील कार्यक्रम प्रचंड यशस्वी करण्यासाठी बरीच दिव्यं पार करावी लागली. पण त्यांचं लक्ष त्यांच्या मेहनतीपेक्षा त्यातून मिळणाऱ्या यशाकडे होतं आणि म्हणून ते यशस्वी झाले. Result कडे आपण जर लक्ष दिलं तर हातून घडणारी कृती ही चांगलीच घडणार आहे. 

    २. सकारात्मक दृष्टिकोन विरुद्ध नकारात्मक दृष्टिकोन :

    एखादं छोटं-मोठं अपयश आलं की सामान्य लोक लगेच खचून जातात आणि नकारात्मक विचार करतात. स्वतःच्या परिस्थितीला, नशिबाला दोष देत बसतात. याउलट असामान्य लोक अशा छोट्या-मोठ्या अपयशांनी घाबरून जात नाहीत,जरी एखादी अडचण आली तरी ते शांतपणे त्यावर मार्ग काढतात ; पण कारण नसताना तक्रारींचा पाढा वाचत बसत नाही. अपयश जरी आलं तरी त्याला अनुभव समजून ते त्यांचं काम करत राहतात आणि शेवटी त्यांना हवा असणारा परिणाम साधतात. तक्रारींपेक्षा त्यांना सातत्य आणि चिकाटी कायम अधिक महत्त्वाची वाटते.

    ३. मीच का ? विरुद्ध मीच का नाही ? :

    सामान्य लोक नेहमी विचार करतात की, “मीच का?”

    सगळं दुखः, सगळा त्रास माझ्याच वाट्याला का ? अपयशाचा आणि नकारांचा सामना नेहमी मलाच का करावा लागतो ? जगात बदल घडवण्याची जबाबदारी मीच का उचलावी ?

    याउलट असामान्य लोक विचार करतात, “मीच का नाही?”

    या जगात काहीतरी नवीन जन्माला घालणारा पहिला माणूस मीच का असू नये? लोकांचं जगणं सुसह्य करणारी एखादी गोष्ट मी का निर्माण करू नये? संकटांचा सामना करून, त्यावर उपाय शोधून मी ते उपाय इतरांशी शेअर का करू नयेत ? जर मी हे करू शकतो, माझ्यात ती क्षमता आहे तर मी ते केलंच पाहिजे.

    ४. नाही विरुद्ध हो :

    सामान्य लोकं एखाद्या गोष्टीला नकार देताना खूप विचार करतात की ती व्यक्ती माझ्या जवळची आहे, नात्यातील आहे, माझा मित्र आहे मी त्याच्या कामाला नाही कसं म्हणू..तो काय विचार करेल ..

    या उलट असामान्य लोकं त्यांच्या तत्त्वाविरुद्ध, इच्छेविरुद्ध एखादी गोष्ट होत असेल तर त्याला लगेच नकार देतात…. एखादी गोष्ट करण्याची त्यांची इच्छा नसेल किंवा त्यांना ते जमणार नसेल तर ते विनाकारण जबाबदारी घेत नाहीत

    ५.  उद्या विरुद्ध आज :

    सामान्य लोक चालढकल करण्यात पटाईत असतात, तर असामान्य लोक लगेच सुरुवात करण्यात. सामान्य लोक आजचं काम उद्यावर कसं ढकलता येईल, नंतर करता येईल का ? याचा विचार करतात, तर असामान्य लोक उद्याचं काम आजचं कसं करता येईल याचा विचार करतात.

    तुम्ही आजची कामं उद्यावर ढकलणं बंद करा आणि बघा काय चमत्कार होतो ते. उद्या 

    कल करे सो आज.. आज करे सो अभी ही असामान्य लोकांची वृत्ती असते. कधीही येत नाही. त्यामुळे सामान्य लोक अर्थपूर्ण आणि प्रभावी जीवनाऐवजी सामान्य जीवनच जगत राहतात.

    5 Successful Habits : यशामागचं खरं रहस्य

    तर मित्रांनो, जर तुम्हाला पटकन यशस्वी व्हायचं असेल तर खालील प्रश्न स्वतःला विचारा.

    • १. संपून मानवजातीवर मोठा परिणाम करू शकेल अशी कोणती गोष्ट मी करू शकतो ?
    • २. ती गोष्ट फक्त मीच का करू शकतो ?
    • ३. ती गोष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी मला आजपासूनच काय करायला पाहिजे ?
    • ४. माझ्या जीवनाचा अर्थ मला सापडला आहे का ?
    • ५. मला आयुष्यात का यशस्वी व्हायचं आहे ? आणि आता कसलाही विचार न करता सुरुवात करा. 

    कधीतरी केलेली सुरुवात ही कधीही न केलेल्या सुरुवातीपेक्षा कायम चांगलीच नाही का? 

    आणखी वाचा