Category: लेख

  • Business Loan Guide Marathi – बिझनेस लोन कसे घ्यावे?

    Business Loan Guide Marathi – बिझनेस लोन कसे घ्यावे?

    Business Loan: व्यवसाय म्हटलं की भांडवल हे आलंच. कोणताही छोटा-मोठा व्यवसाय असेल, तरी तो सुरू करण्यासाठी किंवा सुरू केल्यावर, त्याचा विस्तार करण्यासाठी भांडवलाची गरज ही असतेच.

    अनेकदा व्यावसायिकांना मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते ; पण तितक्या भांडवलाची उपलब्धता त्यांच्याजवळ त्यावेळी नसते….

    पण मित्रांनो, तुमचा व्यवसाय आता भांडवल या समस्येवर अडखळून राहणार नाही. कारण आजच्या लेखात आपण एक अशी संकल्पना जाणून घेणार आहोत, जी तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी भांडवल उभं करण्यासाठी नक्की मदत करू शकेल. 

    ही संकल्पना म्हणजे  बिजनेस लोन अर्थात् व्यवसायिक कर्ज. बिजनेस लोनबद्दल अनेकांना माहीत असतं ; पण ते कसं घ्यायचं, त्याची प्रक्रिया काय असते या बद्दल त्यांना कल्पना नसते. 

    चला तर मग जाणून घेऊया बिजनेस लोन विषयी….

    बिजनेस लोन म्हणजे काय ? (What is a business loan?)

    Business Loan: बिजनेस लोन म्हणजे वित्तीय संस्थांकडून व्यवसायाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी घेतलेले कर्ज. हे कर्ज व्यवसायाच्या विविध गरजांसाठी वापरले जाते. ज्याचा उद्देश व्यवसायाची वाढ, विस्तार किंवा दैनंदिन खर्चासाठी भांडवल उपलब्ध करून देणे हा असतो.

    हे कर्ज बँक, नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या (NBFCs), मायक्रोफायनान्स संस्था किंवा सरकारी योजनांच्या माध्यमातून व्यवसायिकांना दिले जाते.

    बिजनेस लोन हे विविध कालावधींसाठी आणि विविध व्याजदरांवर उपलब्ध असते. कर्जाची रक्कम ही व्यवसायाची आर्थिक स्थिती आणि कर्ज परतफेडीच्या क्षमतेवर अवलंबून असते.

    बिजनेस लोनची  गरज का असते ?( Why is a business loan needed?)

    व्यवसायाच्या वाढीसाठी :

     कोणत्याही व्यवसायाला वाढीसाठी किंवा विस्तारासाठी भांडवलाची गरज असते. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासाठी किंवा व्यवसायाच्या नवीन शाखा उघडण्यासाठी लोन घेण्याची आवश्यकता भासते. 

    कार्यशील भांडवलासाठी : 

    अनेकदा व्यवसायिकांना ग्राहकांच्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक असलेला माल किंवा कच्चा माल खरेदी करण्यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता भासते. काही व्यवसायांना दैनंदिन खर्च भागवण्यासाठी तात्पुरत्या आर्थिक मदतीची गरज भासते. 

    उदा. मालाचा साठा खरेदी करणे, कर्मचार्‍यांना पगार देणे किंवा अन्य नियमित खर्च. अशा वेळी लोन घेणे उपयुक्त ठरते. 

    तंत्रज्ञानातील गुंतवणूक :

    Business Loan: व्यवसायाचे तंत्रज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी नवनवीन उपकरणं, सॉफ्टवेअर, किंवा इतर साधनं घेण्यासाठी आर्थिक मदतीची व्यवसायिकांना गरज भासते. अनेकदा नवीन तंत्रज्ञानांची मशिनरिज ची किंमत तुलनेने जास्त असते, तेवढे भांडवल व्यवसायिकाकडे उपलब्ध नसते ; पण त्याची गरज असल्याने कर्ज घ्यावे लागते.

    बिझनेस लोनचे प्रकार : (Types of Business Loans)

    1. टर्म लोन : 

     या कर्जाचा कालावधी निश्चित असतो आणि व्याजदरही पूर्वनिर्धारित असतो. ही कर्जे विशिष्ट उद्दिष्टासाठी घेतली जातात. 

    उदा. मशीनरी खरेदी, इमारत बांधकाम, किंवा इतर मोठ्या गुंतवणुकीसाठी.

    2. ओव्हरड्राफ्ट :  

    हे एक प्रकारचे बँक कर्ज आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यातील ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्याची परवानगी दिली जाते. हा कर्ज प्रकार अल्पकालीन गरजांसाठी उपयुक्त ठरतो.

    3. वर्किंग कॅपिटल लोन :

     व्यवसायाच्या दैनंदिन गरजांसाठी म्हणजे  कच्चा माल खरेदी करणे, वेतन देणे, वाहतूक खर्च, वीज बिल, भाडे  इत्यादींसाठी हे कर्ज घेतले जाते. ज्या व्यवसायात विक्री हंगामानुसार होते, तेथे विक्रीच्या काळात जास्त मागणी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त भांडवलाची आवश्यकता असते, अशा वेळीदेखील वर्किंग कॅपिटल लोनची आवश्यकता भासते.

    4. बिल डिस्काऊंटिंग : 

    ग्राहकांकडून येणारी थकबाकी लवकर मिळवण्यासाठी बिल डिस्काऊंटिंगचा उपयोग केला जातो. यामध्ये बँका किंवा वित्तीय संस्था तुमच्या थकबाकीवर तुम्हाला काही प्रमाणात पैसे उधार देतात.

    5. मुदत कर्ज ( Term Loan ) : 

    व्यवसायासाठी मोठ्या गुंतवणुकीसाठी हे कर्ज घेतले जाते. हे दीर्घकालीन कर्ज आहे. यामध्ये कर्जाचा कालावधी आणि व्याजदर ठरलेला असतो. मुदत कर्जाचा कालावधी सहसा 1-10 वर्षांपर्यंत असू शकतो. 

    6. एमएसएमई कर्ज : 

    सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विशेष कर्ज योजना उपलब्ध असतात. या कर्जाचे व्याजदर तुलनेने कमी असतात आणि ते नवीन उद्योगांना चालना देण्यास मदत करतात.

     बिझनेस लोन घेण्यासाठी आवश्यक अटी (Requirements for obtaining a business loan)

    • 1. व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र : तुमच्या व्यवसायाची नोंदणी आवश्यक आहे.
    • 2. व्यवसायाचा आर्थिक अहवाल : कर्ज देणारी संस्था व्यवसायाची आर्थिक स्थिती तपासते, ज्यामध्ये वार्षिक उलाढाल, नफा-तोटा अहवाल, बँक स्टेटमेंट यांचा समावेश असतो.
    • 3. व्यक्तिगत आणि व्यवसायाचा क्रेडिट स्कोअर : तुमचा आणि तुमच्या व्यवसायाचा क्रेडिट स्कोअर चांगला असावा लागतो. क्रेडिट स्कोअरवर अवलंबून तुमच्या कर्जाची मंजूरी ठरते.
    • 4. कर्जाची गरज आणि वापर : कर्जाचा उद्देश स्पष्ट असावा लागतो. तुम्ही कर्ज कोणत्या कारणासाठी घेत आहात याची सविस्तर माहिती देणे आवश्यक असते.
    • 5. जामीनदार : काही कर्ज प्रकारांसाठी जामीनदाराची आवश्यकता असते.

     बिझनेस लोनसाठी अर्ज प्रक्रिया (Application process for a business loan)

    • 1. अर्ज भरणे : तुम्ही निवडलेल्या बँकेच्या किंवा वित्तीय संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष अर्ज करू शकता.
    • 2. आवश्यक कागदपत्रे : अर्ज करताना व्यवसाय नोंदणी, आर्थिक दस्तऐवज, बँक स्टेटमेंट, वैयक्तिक ओळखपत्र, पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक असते.
    • 3. क्रेडिट स्कोअर तपासणी : बँक किंवा वित्तीय संस्था तुमचा क्रेडिट स्कोअर तपासते. यावरून कर्जाची मंजुरी ठरते.
    • 4. मंजुरी आणि वितरण : कागदपत्रांची आणि क्रेडिट तपासणी पूर्ण झाल्यानंतर कर्ज मंजूर होते आणि आवश्यक रक्‍कम तुमच्या खात्यात जमा केली जाते.

     व्याजदर आणि परतफेडीचे पर्याय :

    Business Loan: बँक किंवा वित्तीय संस्था बिझनेस लोनसाठी 8% ते 20% दरम्यान व्याजदर लागू करतात. परतफेडीसाठी साधारणत: 12 महिन्यांपासून 60 महिन्यांपर्यंतचा कालावधी मिळतो. वेळोवेळी EMI (Equated Monthly Installment) च्या माध्यमातून तुम्ही तुमचे कर्ज परत करू शकता.

    आणखी वाचा:

  • शाळा सोडली, पण स्वप्न नाही! २५ व्या वर्षी ६,३०० कोटींचं साम्राज्य उभा करणाऱ्या हर्षिता अरोराची यशोगाथा

    शाळा सोडली, पण स्वप्न नाही! २५ व्या वर्षी ६,३०० कोटींचं साम्राज्य उभा करणाऱ्या हर्षिता अरोराची यशोगाथा

    Harshita Arora: म्हारी छोरियां छोरों से कम हैं के? आमीर खानच्या ‘दंगल’ चित्रपटातील हा डायलॉग तुम्हाला माहिती असेलच.

    या डायलॉगप्रमाणेच आज भारतीय महिलांनी पुरुषांच्या तोडीस तोड कामगिरी करून दाखवली आहे. एक काळ असा होता, जेव्हा स्त्रियांना चूल आणि मूल यापुरतेच मर्यादित ठेवले गेले होते. तिने केवळ कौटुंबिक कर्तव्ये पार पाडावीत, अशीच समाजाची अपेक्षा असायची. त्यामुळे महिलांनीही स्वतःभोवती एक सीमारेषा आखून घेतली होती. मात्र, आता ती साखळी तोडण्याचे काम महिला स्वतःच करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून स्टार्टअप क्षेत्रात महिलांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढत आहे. सध्या देशात ८,००० हून अधिक स्टार्टअप उपक्रमांचे नेतृत्व महिला उद्योजक करत आहेत. अवघ्या २५ व्या वर्षी ६,३०० कोटींचे साम्राज्य उभं करणाऱ्या हर्षिता अरोरा हिचा औद्योगिक प्रवास आज आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.

    संघर्षातून यशाकडे

    उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील हर्षिता अरोरा ही आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी उद्योजिका ठरली आहे. हर्षिताचे वडील रवींद्र सिंह अरोरा हे ऑटो फायनान्सर आहेत आणि आई जसविंदर कौर गृहिणी आहेत. हर्षिताने आठवीपर्यंतचे शिक्षण पाइनवुड स्कूलमधून पूर्ण केले, मात्र तिचे मन पुस्तकांपेक्षा कॉम्प्युटर कोडिंगमध्ये जास्त रमत होते. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी तिने कोडिंग आत्मसात केले. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण १५ व्या वर्षी हर्षिताने शाळा सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. इतरांप्रमाणे सुरक्षित नोकरीचा मार्ग निवडण्याऐवजी तिने स्वतःचे काहीतरी वेगळे निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले आणि येथूनच तिच्या उद्योजकीय प्रवासाला सुरुवात झाली.

    Harshita Arora: सुरुवातीचा काळ अत्यंत आव्हानात्मक होता. पाठीशी कोणताही अनुभव नाही, भांडवलाची चणचण आणि मार्केटमधील प्रचंड स्पर्धा, अशा परिस्थितीत स्वतःची ओळख निर्माण करणे सोपे नव्हते. अनेकदा तिच्या संकल्पना फेटाळल्या गेल्या, काही निर्णय चुकले आणि काही वेळा तर सर्व सोडून द्यावे असे वाटू लागले. मात्र, हर्षिताने प्रत्येक अडचणीकडे एक संधी म्हणून पाहिले. तिचे यश जेवढे आकर्षक वाटते, त्यामागे तितकाच मोठा संघर्ष, अपयश आणि चिकाटी दडलेली आहे.

    १६ व्या वर्षी बाल शक्ती पुरस्काराची मानकरी

    हर्षिताचा प्रवास जानेवारी २०१८ मध्ये खऱ्या अर्थाने सुरू झाला. वयाच्या १६ व्या वर्षी तिने ‘क्रिप्टो पोर्टफोलिओ ट्रॅकर ॲप’ विकसित केले, जे ३२ देशांमधील १,००० हून अधिक क्रिप्टोकरन्सींविषयीची थेट माहिती पुरवते. हे ॲप लाँच झाल्यानंतर महिन्याभरातच ॲपल स्टोअरवरील सर्वाधिक मागणी असलेल्या पेड ॲप्सच्या यादीत झळकले. या कामगिरीबद्दल तिला भारताचा प्रतिष्ठित ‘बाल शक्ती पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. या यशानंतर हर्षिता अमेरिकेला गेली.

    ६,३०० कोटींच्या कंपनीची संस्थापिका

    कठोर परिश्रम आणि अचूक निर्णयांच्या जोरावर हर्षिताने ‘A to B’ नावाची फिनटेक (Fintech) कंपनी स्थापन केली. ही कंपनी प्रामुख्याने ट्रकिंग उद्योगासाठी पेमेंट आणि आर्थिक पायाभूत सुविधा पुरवते. या कंपनीला ट्रकिंग क्षेत्रातील स्ट्राइप असेही म्हटले जाते. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी हर्षिताने कॅलिफोर्नियातील ट्रक स्थानकांवर अनेक आठवडे घालवले, ड्रायव्हर्सशी संवाद साधला. तिला जाणवले की, अब्जावधी डॉलर्सची ही इंडस्ट्री आजही १९९० च्या जुन्या तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. यावर उपाय म्हणून तिने आधुनिक फ्यूल कार्ड तयार केले, ज्यामुळे पेमेंट प्रक्रिया पारदर्शक आणि सोपी झाली. आज ‘A to B’ ही एक ‘Series C’ कंपनी असून तिचे मूल्यांकन सुमारे ६,३०० कोटी रुपये इतके आहे.

    Y Combinator मध्ये ऐतिहासिक कामगिरी

    २०२० मध्ये कोरोनाच्या काळात हर्षिताची पहिली स्टार्टअप आयडिया ‘Y Combinator’ कडून नाकारली गेली होती. पण जिथे अपयश आले, त्याच संस्थेत आज ती जनरल पार्टनर म्हणून कार्यरत आहे. वयाच्या २५ व्या वर्षी हे पद भूषवणारी ती पहिली भारतीय आणि सर्वात तरुण व्यक्ती ठरली आहे. या पदावर ती आता नवीन स्टार्टअप्सची निवड करते आणि त्यांना कोट्यवधींच्या गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन करते.

    Harshita Arora: सुरुवातीला अनेकांनी हर्षिताच्या वयावर आणि क्षमतेवर शंका उपस्थित केल्या होत्या. इतक्या लहान वयात ती व्यवसाय कसा सांभाळणार? असा प्रश्न विचारला जायचा. पण आज तिने सर्व टीकाकारांना आपल्या कामाने उत्तर दिले आहे. हर्षिता अरोराचा प्रवास हा केवळ एका यशस्वी उद्योजिकेची कथा नसून, स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी एक धडा आहे. तुमची पार्श्वभूमी किंवा वय काहीही असो, जर तुमच्याकडे जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर आकाशाला गवसणी घालणे अशक्य नाही. हेच या प्रवासातून शिकण्यासारखे आहे. हर्षिता अरोराचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हला कमेंटमध्ये नक्की सांगा. 

  • जमिनीच्या पोटात तेल नेमकं कसं तयार होतं? | CRUDE OIL FORMATION PROCESS

    जमिनीच्या पोटात तेल नेमकं कसं तयार होतं? | CRUDE OIL FORMATION PROCESS

    Crude Oil: आज संपूर्ण जग एका अत्यंत अस्थिर आणि कठीण काळातून जात आहे. रशिया-युक्रेन असो वा मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल संघर्ष, या युद्धांच्या झळांनी जागतिक अर्थव्यवस्थेला होरपळून काढले आहे. या सर्व संघर्षांच्या केंद्रस्थानी असलेला सर्वात कळीचा घटक म्हणजे ‘कच्चे तेल’ (Crude Oil). आजच्या युगात ज्याच्या ताब्यात तेलाचे साठे आहेत, तोच जगाच्या सत्तेवर आणि राजकारणावर आपला प्रभाव टाकतो. सौदी अरेबिया, रशिया, व्हेनेझुएला आणि इराक यांसारख्या देशांकडे निसर्गाची ही मोठी देणगी असल्यामुळे जागतिक पटलावर त्यांचे स्थान अत्यंत निर्णायक ठरले आहे.

    परंतु, ज्या तेलावर जगाची चाके फिरतात आणि ज्यासाठी मोठी युद्धे लढली जातात, ते जमिनीच्या पोटात नेमके तयार कसे होते? ते काही ठराविक देशांच्याच नशिबात का आले? आपल्या भारताची यात काय स्थिती आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला मानवी इतिहासाच्या पलीकडे, तब्बल ३० कोटी वर्ष मागे नैसर्गिक स्थित्यंतराच्या प्रवासात जावं लागेल! या काळ्या सोन्याच्या निर्मितीमागे निसर्गाची एक अजब, दीर्घकालीन आणि गूढ प्रक्रिया दडलेली आहे… तीच प्रक्रियाShe आपण आजच्या लेखात उलगडणार आहोत.

    तेल निर्मितीची नैसर्गिक प्रक्रिया (Natural process of oil production)

    कच्चे तेल तयार होणे ही काही दिवसांची किंवा वर्षांची प्रक्रिया नसून, तो लाखो वर्षांचा एक अद्भुत चमत्कार आहे. याची सुरुवात झाली सुमारे ३० ते ४० कोटी वर्षांपूर्वी, जेव्हा पृथ्वीवर मानवाचा जन्मही झाला नव्हता आणि तेव्हा पृथ्वीवर होते फक्त अथांग महासागर. त्या काळी समुद्रात वावरणारे सूक्ष्म जीव (Plankton) आणि वनस्पती मृत झाल्यावर समुद्राच्या तळाशी जमा झाल्या. काळाच्या ओघात या अवशेषांवर माती, चिखल आणि वाळूचे एकावर एक थर साचत गेले आणि या मृत जीवांचे शरीर पृथ्वीच्या पोटात कायमचे विसावले.

    Crude Oil: जसजसे हे थर वाढत गेले, तसतसे जमिनीच्या खोल भागात या अवशेषांवर प्रचंड दबाव आणि उष्णता वाढू लागली. तिथे ऑक्सिजन नसल्यामुळे या सेंद्रिय पदार्थांचे नैसर्गिकरीत्या रासायनिक विघटन झाले. या प्रचंड दाबामुळे आणि उष्णतेमुळे लाखो वर्षांनंतर त्या अवशेषांचे रूपांतर ‘हायड्रोकार्बन’मध्ये झाले, ज्याला आपण आज ‘कच्चे तेल’ म्हणतो. निसर्गाच्या या दीर्घकालीन प्रक्रियेतूनच आजच्या युगाला गती देणारे हे मौल्यवान इंधन तयार झाले आहे.

    तेल ठराविक ठिकाणीच का आढळते? (Why is oil found only in specific locations?)

    जगभरात सर्वच ठिकाणी तेल का सापडत नाही, असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. याचे मुख्य कारण म्हणजे तेल साचण्यासाठी निसर्गाला एका विशिष्ट रचनेची गरज असते. तेल हे पाण्यापेक्षा हलके असल्याने ते जमिनीच्या आतल्या खडकांमधून वर सरकण्याचा प्रयत्न करते. पण जर या प्रवासात वरच्या बाजूला ‘अभेद्य खडक’ (Impermeable Rock) आडवा आला, तर हे तेल तिथेच अडकून पडते. अशा प्रकारे निसर्गाच्या या विशिष्ट रचनेमुळे जमिनीखाली तेलाच्या ‘नैसर्गिक टाक्या’ तयार होतात, ज्याला आपण ऑईल रिझर्व्ह म्हणतो.

    दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे भौगोलिक स्थित्यंतरे. आज आपण जिथे वाळवंट किंवा कोरडी जमीन पाहतो, तिथे कोट्यवधी वर्षांपूर्वी अथांग महासागर होते. पृथ्वीच्या पोटातील हालचालींमुळे (Tectonic Plates) हे महासागरांचे तळ काळाच्या ओघात जमिनीवर आले. म्हणूनच सौदी अरेबियासारख्या मध्य पूर्वेतील वाळवंटी देशांत आज तेलाचे प्रचंड साठे सापडतात. थोडक्यात, आजची ही तेलसंपत्ती म्हणजे प्राचीन महासागरांनी मागे सोडलेला एक अनमोल वारसा आहे.

    भारतातील तेलाचे प्रमुख साठे (Major oil reserves in India)

    भारताच्या बाबतीत बोलायचे झाले तर आपल्याकडेही काही महत्त्वाच्या ठिकाणी तेलाचे उत्खनन केले जाते. यामध्ये अरबी समुद्रातील ‘मुंबई हाय’ हे भारताचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे तेल क्षेत्र आहे. याशिवाय राजस्थानमधील बाडमेरचे वाळवंटी भाग आणि आशियातील पहिले तेल क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे आसाममधील ‘दिग्बोई’ ही ठिकाणे तेल उत्पादनात मोलाची भूमिका बजावतात. गुजरातचा भाग आणि पूर्व किनारपट्टीवरील कृष्णा-गोदावरी खोऱ्यातही (Basin) तेलाचे साठे उपलब्ध आहेत, जे देशाची उर्जेची गरज भागवण्यासाठी मदत करतात.

    Crude Oil: जागतिक स्तरावर नजर टाकली तर असे लक्षात येते की, निसर्गाची ही उधळण काही देशांवर अधिक झाली आहे. व्हेनेझुएला या देशाकडे जगातील सर्वात जास्त प्रमाणित तेल साठे आहेत. मात्र, तेल उत्पादनाच्या बाबतीत सौदी अरेबिया आणि रशिया हे देश जगात आघाडीवर आहेत. यामुळेच जागतिक राजकारणात आणि अर्थकारणात या देशांचे वजन नेहमीच जास्त राहते. थोडक्यात, जमिनीखाली गाडल्या गेलेल्या लाखो वर्षांपूर्वीच्या अवशेषांनी आज संपूर्ण जगाचे नशीब आणि सत्ता समीकरणे बदलून टाकली आहेत.

    मित्रांनो, कच्चे तेल हा निसर्गाचा असा खजिना आहे जो एकदा संपला की पुन्हा तयार होण्यासाठी पुन्हा लाखो वर्षांचा काळ लागेल, म्हणूनच याला आपण ‘अनूतनक्षम’ (Non-renewable) ऊर्जा स्रोत मानतो. सध्याच्या इराण-इस्रायल संघर्षासारख्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम होत असून इंधनाचे दर गगनाला भिडत आहेत. निसर्गाने लाखो वर्षे खर्च करून तयार केलेली ही संपत्ती आज मानवी प्रगतीचे चाक फिरवत असली, तरी त्याच संपत्तीसाठी होणारा हा संघर्ष जगाला चिंतेत टाकणारा आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यात सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांसारख्या पर्यायांकडे वळणे ही केवळ आपली गरज नसून ती काळाची गरज आणि अपरिहार्यता ठरणार आहे.

    तुम्हाला काय वाटतं? येत्या १० वर्षात इलेक्ट्रिक गाड्या पेट्रोल-डिझेलला पूर्णपणे रिप्लेस करू शकतील का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा! व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

    आणखी वाचा:

  • Harshit Godha Success Story: Avocado Farming ने कमावले कोट्यवधी

    Harshit Godha Success Story: Avocado Farming ने कमावले कोट्यवधी

    Avocado Farming: युवा शेतकरी हर्षित गोधा हे मुळचे मध्य प्रदेशमधील भोपाळचे. मूळचे भोपाळचे असलेले हर्षित यांची कौटुंबिक पार्श्वभूमी वकिलीची असली, तरी त्यांना मात्र स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती. 

    ब्रिटनमध्ये डिग्रीचे शिक्षण घेऊन त्यांनी स्वत:च्या मातीत प्राप्त परिस्थितीचा अभ्यास करून एव्होकॅडोची शेती करण्यास सुरुवात केली. 

    ब्रिटनमध्ये शिक्षण घेत असताना हर्षित यांना एव्होकॅडो या फळाबद्दल माहिती मिळाली आणि त्या फळाचे आरोग्यविषयक फायदे त्यांच्या लक्षात आले. अधिक माहिती घेतल्यावर हे फळ इस्त्राईलमध्ये पिकवले जाते हे त्यांच्या लक्षात आले. इंग्लंडसारखा देश हे फळ इस्त्राईलमधून आयात करत आहे म्हणजे नक्कीच या  इस्रायली एव्होकॅडोमध्ये काहीतरी खास आहे.

    सामान्यतः एव्होकॅडो या फळाच्या वाढीसाठी 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. परंतु इस्राईलसारख्या कोरड्या आणि उष्ण देशामध्ये एव्होकॅडो कसे वाढू शकतात यावर आश्चर्यचकित होऊन हर्षित यांनी अधिक संशोधन सुरू केले.

    अभ्यासाअंती हर्षित यांच्या लक्षात आले की इस्त्राईलने परिस्थितीवर मात करत आणि समस्यांवर उपाय शोधत यशस्वी शेती केली आहे आणि त्याचे अनेक संकरित वाण देखील तयार केले आहेत 

    इस्त्राईलसारख्या उष्ण वातावरणात जर ही शेती होऊ शकते तर आपण देखील का करू नये? हा विचार त्यांच्या डोक्यात चमकला.

    त्यांनी इस्त्राईलमध्ये जाऊन या शेतीविषयी अभ्यास केला, तेथील शेतकऱ्यांकडून आवश्यक प्रशिक्षण देखील घेतले. 

    प्रशिक्षण घेतल्यानंतर हर्षित यांनी ॲव्होकॅडोच्या रोपांची इस्त्राईलमधून भारतात आयात केली. आयात प्रक्रियेत देखील हर्षित यांना बऱ्याच अडचणी आल्या.

    Avocado Farming: 2019 मध्ये Order केलेली रोपं त्यांना 2021 मध्ये प्राप्त झाली. यानंतर मात्र हर्षित यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. सध्या 28 वर्षीय हर्षित यांनी 100 एकर जमिनीवर ॲव्होकॅडोची लागवड केली असून त्यातून त्यांना 10 कोटींचे वार्षिक उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. आज हर्षित संपूर्ण भारतात ॲव्होकॅडोची रोपे विकतात आणि करोडोंची उलाढाल करतात. 

    शेती करणं हे केवळ कमी शिक्षण असलेल्या गावाकडील लोकांचं काम आहे अशी समजूत असणाऱ्यांच्या डोळ्यात हर्षित यांनी त्यांच्या कर्तृत्वाने झणझणीत अंजन घातलं आहे.

    आणखी वाचा:

  • Successful Trading Tips: प्रत्येक ट्रेडरने जाणून घ्यावेत ५ Golden Rules

    Successful Trading Tips: प्रत्येक ट्रेडरने जाणून घ्यावेत ५ Golden Rules

    Successful Trading Tips: आपल्या समाजात शेअर मार्केटबद्दल अनेक गैरसमज आहेत. बहुतेकांना वाटते की हे केवळ नशिबावर चालणारे क्षेत्र आहे, परंतु सत्य याच्या अगदी उलट आहे. शेअर मार्केट हे पूर्णपणे गणित, मानसशास्त्र आणि शिस्तीवर आधारित आहे. मार्केटला तुमच्या वैयक्तिक गरजांशी किंवा स्वप्नांशी काहीही देणेघेणे नसते. ते केवळ अचूक नियोजन करणाऱ्यांचा आदर करते. जर तुम्हाला या क्षेत्रात दीर्घकाळ टिकायचे असेल आणि संपत्ती निर्माण करायची असेल, तर केवळ भावनांच्या आहारी जाऊन चालणार नाही. एक यशस्वी ट्रेडर तोच असतो जो स्वतःच्या भीतीवर आणि हव्यासावर नियंत्रण मिळवून मार्केटच्या नियमांचे पालन करतो. तुम्हालाही ट्रेडिंग करण्याची आवड आहे? शेअर मार्केटमधील वेगवेगळे फंडे शिकायला आवडत असतील तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा..  

    ट्रेड फायदेशीर बनवण्याचे ५ प्रभावी मार्ग!

    १. ट्रेडिंग प्लॅन (Trading Plan)

    ट्रेडिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी ट्रेडिंग प्लॅन हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा पाया आहे. अनेक नवीन ट्रेडर कोणत्याही नियोजनाशिवाय केवळ टिप्सच्या मागे लागून ट्रेड घेतात, ज्याला आपण जुगार म्हणू शकतो. मात्र, एक व्यावसायिक ट्रेडर ट्रेड घेण्यापूर्वीच आपला प्रवेश (Entry), नफा (Target) आणि तोटा (Stop-Loss) एका कागदावर किंवा जर्नलमध्ये निश्चित करतो. ट्रेडिंग प्लॅन म्हणजे एक अशी चौकट आहे जी तुम्हाला मार्केटच्या अनिश्चिततेमध्ये स्थिर ठेवते. जेव्हा तुमच्याकडे लेखी प्लॅन असतो, तेव्हा तुम्ही बाजारातील अचानक होणाऱ्या हालचालींमुळे गोंधळून जात नाही. नियोजित पद्धतीने केलेला प्रत्येक ट्रेड हा तुमच्या कौशल्याचा भाग असतो, ज्यामुळे तुमची जोखीम कमी होते आणि आत्मविश्वासात वाढ होते.

    २. मार्केटमधील चढ उतारांचे निरीक्षण

    दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे मार्केटमधील चढ-उतारांचे सूक्ष्म निरीक्षण करणे. मार्केटमध्ये तासंतास चार्ट पाहणे म्हणजे केवळ वेळ घालवणे नव्हे, तर तो मार्केटचा स्वभाव समजून घेण्याचा एक प्रयत्न असतो. मार्केट कधीही सरळ रेषेत चालत नाही, ते विशिष्ट पॅटर्नमध्ये हालचाल करते. जेव्हा मार्केट सातत्याने उच्चांक गाठतो, तेव्हा त्याला बुलिश ट्रेड म्हणतात, तर घसरणीच्या मार्केटला बेअरिश म्हटले जाते. या तांत्रिक विश्लेषणासोबतच जागतिक घडामोडींकडे लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. अमेरिकन मार्केटमधील बदल, कच्च्या तेलाचे दर किंवा आरबीआयचे धोरण यांसारख्या बातम्यांचा भारतीय बाजारावर मोठा परिणाम होतो. अशा वेळी केवळ चार्टवर अवलंबून न राहता न्यूज कॅलेंडरचा वापर करून जागृत राहणे, ही एका यशस्वी ट्रेडरची ओळख आहे.

    ३. रिस्क मॅनेजमेंट 

    तिसरा आणि सर्वात कठीण भाग म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. मार्केटमध्ये टिकून राहणे हे पैसे कमावण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे, कारण जर तुमच्याकडे भांडवलच उरले नाही, तर तुम्ही नफा कमावण्याची संधी गमावून बसाल. तुमच्या एकूण भांडवलापैकी किती हिस्सा एका ट्रेडमध्ये लावायचा, याचे गणित मांडणे म्हणजेच पोझिशन सायझिंग होय. एकाच शेअरमध्ये सर्व पैसे गुंतवणे हे आत्मघातकी ठरू शकते. तसेच, प्रत्येक ट्रेडमध्ये स्टॉप-लॉस लावणे अनिवार्य आहे. स्टॉप-लॉस म्हणजे तुमच्या आर्थिक नुकसानीला लावलेला लगाम आहे. जे लोक या नियमाचे पालन करत नाहीत, त्यांना मार्केट मोठ्या नुकसानीसह बाहेर फेकते. त्यामुळे शिस्तबद्ध रिस्क मॅनेजमेंट हे मार्केटमधील तुमचे सुरक्षा कवच आहे.

    ४.  ट्रेडिंग जर्नल

    चौथा मार्गदर्शक मंत्र म्हणजे ट्रेडिंग जर्नल लिहिण्याची सवय. अनेक ट्रेडर आपल्या चुका विसरून जातात आणि त्याच चुका वारंवार करतात. जर्नलमध्ये दररोजच्या ट्रेड्सची नोंद केल्यामुळे तुम्हाला तुमचा स्वतःचा आरसा दिसतो. तुम्ही एखादा ट्रेड घेताना तुमची मानसिक स्थिती काय होती, तुम्ही भीतीपोटी ट्रेड लवकर बंद केला का, किंवा जास्त नफ्याच्या हव्यासापोटी योग्य वेळी बाहेर पडला नाहीत का, या सर्व गोष्टींची नोंद केल्याने तुमची सायकॉलॉजी सुधारण्यास मदत होते. आठवड्याच्या शेवटी जेव्हा तुम्ही हे जर्नल वाचता, तेव्हा तुम्हाला तुमच्या त्रुटी समजतात. स्वतःच्या चुकांमधून शिकणे हाच शेअर मार्केटमध्ये प्रगती करण्याचा सर्वात जलद मार्ग आहे.

    ५. रिस्क-टू-रिवॉर्ड रेशो

    पाचवा आणि अत्यंत प्रभावी मंत्र म्हणजे रिस्क-टू-रिवॉर्ड रेशोचे पालन करणे. हे एक असे तंत्र आहे जे तुम्हाला गणिताच्या आधारावर फायद्यात ठेवते. तुमचा अपेक्षित नफा हा नेहमी संभाव्य तोट्यापेक्षा किमान दुप्पट असावा. उदाहरणार्थ, जर तुम्ही १:३ चा रेशो ठेवला, तर तुम्ही १० पैकी ६ वेळा जरी चुकलात, तरी उरलेल्या ४ वेळच्या नफ्यामुळे तुम्ही शेवटी फायद्यातच राहाल. हा आकड्यांचा खेळ तुम्हाला भावनिक निर्णयांपासून दूर ठेवतो. ट्रेडिंगमध्ये विन रेट (किती वेळा जिंकलात) यापेक्षा रिस्क-टू-रिवॉर्ड (किती जिंकलात) याला जास्त महत्त्व आहे, कारण यामुळे कमी अचूकता असूनही तुम्ही एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता.

    Successful Trading Tips: सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ट्रेडिंगमध्ये कोणती रणनीती निवडावी, हे पूर्णपणे तुमच्या उपलब्ध वेळेवर आणि मानसिकतेवर अवलंबून असते. जर तुम्ही दिवसभर स्क्रीनसमोर बसू शकत असाल, तर ब्रेकआउट किंवा मोमेंटम ट्रेडिंग तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, जिथे तुम्ही झटपट होणाऱ्या हालचालींचा फायदा घेऊ शकता. मात्र, जर तुम्ही नोकरी किंवा इतर व्यवसायात व्यस्त असाल, तर पोझिशन ट्रेडिंग हा सर्वात उत्तम मार्ग आहे, ज्यामध्ये तुम्ही आठवडे किंवा महिन्यांसाठी शेअर्स होल्ड करता. लक्षात ठेवा की, कोणतीही रणनीती १००% अचूक नसते. शेअर मार्केटमध्ये शिकण्याची प्रक्रिया कधीही थांबवू नका आणि गरज पडल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास संकोच करू नका. सातत्य, अभ्यास आणि संयम हीच तुमच्या स्वप्नांना पंख देणारी गुरुकिल्ली आहे.

    आणखी वाचा:

  • Mira Kulkarni: मीरा कुलकर्णी यांचा थक्क करणारा प्रवास!

    Mira Kulkarni: मीरा कुलकर्णी यांचा थक्क करणारा प्रवास!

    Mira Kulkarni: वयाच्या ४५ व्या वर्षी लोक आपल्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग करतात. पण एका महिलेने वयाच्या ४५ व्या वर्षी, एका छोट्याशा गॅरेजमध्ये फक्त २ लाख रुपयांची गुंतवणूक करून असा ब्रँड उभा केला… ज्याचं व्हॅल्युएशन आज १,२९० कोटी रुपये आहे!

    ही कथा कुठल्या कॉर्पोरेट घराण्यातील नाही, तर भारतातील सर्वात प्रसिद्ध लक्झरी आयुर्वेदिक ब्रँड ‘फॉरेस्ट एसेंशियल्स’ (Forest Essentials) च्या संस्थापिका मीरा कुलकर्णी यांची आहे.

    १. संघर्षाची काळी बाजू (The Dark Reality)

    ही कहाणी सुरू होते एका अत्यंत कठीण वळणावरून. वयाच्या २० व्या वर्षी मीरा यांचं लग्न झालं आणि शिक्षण अर्धवट सुटलं. लग्नानंतर पतीला दारूचं व्यसन लागल्याने घरची परिस्थिती बिघडत गेली. शेवटी मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी पतीपासून विभक्त होण्याचा कठोर निर्णय घेतला.

    पण नियतीची परीक्षा इथेच संपली नव्हती. वयाच्या २८ व्या वर्षी आई-वडिलांचं एकापाठोपाठ एक निधन झालं. दोन लहान मुलं आणि आधार द्यायला पाठीशी कुणीही नाही. ही ती वेळ होती, जिथे कोणीही खचून गेलं असतं.

    २. एक ‘आयडिया’ आणि गॅरेजमधून सुरुवात

    ४५ व्या वर्षी अमेरिकेत शिकणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी गेल्या असताना, तिथे त्यांनी हाताने नैसर्गिक साबण आणि मेणबत्त्या बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं. भारतात परतल्यावर त्यांनी ठरवलं, आपणही काहीतरी करूया.

    २००० साली, फक्त २ कर्मचारी आणि २ लाख रुपये घेऊन त्यांनी एका गॅरेजमधून ‘फॉरेस्ट एसेंशियल्स’ची सुरुवात केली. पण आता खरा प्रश्न हा आहे की… साबण तर अनेक जण बनवतात, मग मीरा कुलकर्णी १,२९० कोटींपर्यंत कशा पोहोचल्या?

    ३. ‘लक्झरी मार्केटिंगचा’ मास्टरस्ट्रोक! (The Real Business Strategy)

    इथेच मीरा यांनी खरी बिझनेस बुद्धी वापरली. भारतात तोपर्यंत ‘आयुर्वेद’ म्हणजे फक्त स्वस्त आणि आजारांवरची औषधं मानली जायची. मीरा यांनी आयुर्वेदाला ‘लक्झरी’ बनवलं. त्यांनी स्वस्त साबण विकण्यापेक्षा, अस्सल नैसर्गिक घटकांपासून बनवलेली ‘प्रीमियम प्रॉडक्ट्स’ तयार केली.

    B2B मास्टरस्ट्रोक:

    आपली प्रॉडक्ट्स सामान्य दुकानात विकण्याऐवजी, त्यांनी ताज (Taj) आणि हयात (Hyatt) सारख्या फाईव्ह-स्टार हॉटेल्सना ती सप्लाय करायला सुरुवात केली. जेव्हा श्रीमंत आणि परदेशी पाहुण्यांनी त्यांच्या हॉटेल्समध्ये ही उत्पादने वापरली, तेव्हा ‘फॉरेस्ट एसेंशियल्स’ रातोरात एक जागतिक दर्जाचा ‘प्रीमियम ब्रँड’ बनला!

    Mira Kulkarni: या दमदार स्ट्रॅटेजीमुळे २००८ मध्ये जागतिक कॉस्मेटिक जायंट ‘एस्टी लॉडर’ (Estée Lauder) ने त्यांच्या कंपनीसोबत करार केला. आज देशभरातील २८ शहरांमध्ये त्यांची ११० हून अधिक यशस्वी स्टोअर्स आहेत. फॉर्च्युन मॅगझिनने त्यांना ‘भारतातील सर्वात शक्तिशाली व्यावसायिक महिलांच्या’ यादीत स्थान दिले आहे.

    ४. ग्लोबल उड्डाण (The Big League)

    थोडक्यात सांगायचं तर…

    Mira Kulkarni: वयाच्या २८ व्या वर्षी पोरक्या झालेल्या आणि ४५ व्या वर्षापर्यंत स्वतःची कोणतीही व्यावसायिक ओळख नसलेल्या मीरा कुलकर्णी, जर आज १,२९० कोटींचं साम्राज्य उभं करू शकतात… तर “वेळ निघून गेलीये” किंवा “माझ्याकडे पुरेसं भांडवल नाही”, ही फक्त आपली कारणं आहेत.

    मित्रांनो, तुम्हाला ही ‘खऱ्या संघर्षाची आणि बिझनेसची’ स्टोरी कशी वाटली? “सक्सेससाठी वयाची कोणतीही अट नसते”, यावर तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा!

  • SIP 8-4-3 Formula Marathi: चक्रवाढ व्याजाने १५ वर्षांत १ कोटींची संपत्ती कशी तयार कराल?

    SIP 8-4-3 Formula Marathi: चक्रवाढ व्याजाने १५ वर्षांत १ कोटींची संपत्ती कशी तयार कराल?

    SIP 8-4-3 Formula Marathi: पहिला १ रुपया कमवायला जितका वेळ लागतो, तितकाच वेळ पुढचे १० रुपये कमवायला लागत नाही! हाच आहे चक्रवाढ व्याजाचा जादूई ‘८-४-३’ फॉर्म्युला…

    म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू केल्यानंतर मार्केटच्या चढ-उतारांमुळे मनात धाकधूक होणे स्वाभाविक आहे. जेव्हा शेअर बाजार खाली येतो, तेव्हा अनेक जण घाबरून आपली गुंतवणूक थांबवण्याचा विचार करतात. मात्र, गुंतवणुकीत सातत्य नसेल तर संपत्ती निर्मितीचा मूळ उद्देशच हरवून जातो. त्यामुळे बाजारातील अस्थिरतेकडे लक्ष देण्यापेक्षा, आपली गुंतवणूक किती काळ टिकवून ठेवायची आणि ती कशी वाढवायची हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.

    दीर्घकाळात करोडोंचा निधी उभा करण्यासाठी तज्ज्ञ सध्या ‘८-४-३ चा फॉर्म्युला’ (8-4-3 Rule) वापरण्याचा सल्ला देतात. हा केवळ एक आकडा नसून चक्रवाढ व्याजाची ताकद दाखवणारा एक प्रभावी मंत्र आहे. गेल्या काही वर्षांत अनेक यशस्वी गुंतवणूकदारांनी याच सूत्राचा वापर करून मोठी संपत्ती निर्माण केली आहे. आजच्या लेखात आपण हाच फॉर्म्युला सविस्तरपणे समजून घेणार आहोत.

     SIP म्हणजे नक्की काय? (What is SIP?)

    म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे SIP (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन). याचा अर्थ असा की, तुम्हाला एकदम मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नाही; तुम्ही दर महिन्याला तुमच्या बजेटनुसार एक ठराविक रक्कम (उदा. ५०० किंवा १००० रुपये) नियमितपणे गुंतवू शकता. ही शिस्तबद्ध पद्धत मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्माण करण्याचे एक उत्तम साधन ठरते.

    SIP चा सर्वात मोठा फायदा म्हणजे ‘रुपी कॉस्ट एव्हरेजिंग’. जेव्हा शेअर बाजार तेजीत असतो, तेव्हा तुम्हाला तुमच्या पैशात कमी ‘युनिट्स’ मिळतात, पण जेव्हा बाजार घसरतो, तेव्हा त्याच रकमेत जास्त ‘युनिट्स’ खरेदी केले जातात. उदाहरण घ्यायचे झाले तर, तुमची ५०० रुपयांची SIP असेल आणि युनिटचा भाव २५० रुपये असेल, तर तुम्हाला २ युनिट्स मिळतील. पण जर बाजार पडला आणि भाव १०० रुपये झाला, तर तुम्हाला ५ युनिट्स मिळतील. यामुळे बाजारातील चढ-उताराचा धोका कमी होतो आणि दीर्घकाळात तुमच्या गुंतवणुकीची सरासरी किंमत संतुलित राहते.

    काय आहे हा ‘८-४-३’ फॉर्म्युला? (8-4-3 Formula Explained)

    शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते, संपत्ती निर्मितीसाठी ‘८-४-३ चा फॉर्म्युला’ हा एक अत्यंत यशस्वी आणि ऐतिहासिक मंत्र मानला जातो. यातील पहिले ८ वर्षे हे ‘संयमाचा काळ’ असतात. सुरुवातीला तुमच्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हा संथ किंवा अगदी सामान्य वाटू शकतो. खरं तर हा टप्पा तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा असतो, कारण याच काळात अनेक गुंतवणूकदार कंटाळून किंवा घाबरून आपली SIP बंद करतात; मात्र खरी जादू पाहण्यासाठी हा पाया मजबूत करणे आवश्यक असते.

    एकदा का तुम्ही पहिली ८ वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली की, चक्रवाढ व्याजाचा (Compounding) वेग वाढायला लागतो. पुढच्या अवघ्या ४ वर्षांत तुमची एकूण जमा झालेली रक्कम जवळपास दुप्पट होते. आणि त्यापुढील ३ वर्षांत तर गुंतवणुकीची अशी काही ‘विस्फोटक वाढ’ होते की, तुमचा एकूण फंड वेगाने कोटींच्या घरात पोहोचू शकतो. म्हणजेच, १५ वर्षांच्या या प्रवासात शेवटची ३ वर्षे तुमच्या संपत्तीमध्ये सर्वात मोठी भर घालतात.

     उदाहरणातून समजून घेऊया 

    समजा तुम्ही दरमहा २५,००० रुपयांची SIP सुरू केली आणि तुम्हाला त्यावर वार्षिक सरासरी १२% परतावा मिळाला, तर या फॉर्म्युल्यानुसार तुमची संपत्ती कशी वाढते ते पाहूया. सुरुवातीच्या ८ वर्षांत तुमची अंदाजित रक्कम ३९.२५ लाख रुपयांपर्यंत पोहोचते. हा काळ गुंतवणुकीचा पाया रचण्याचा असतो, जिथे वाढ संथ वाटली तरी शिस्त महत्त्वाची ठरते.

    खरा चमत्कार यानंतरच्या टप्प्यात पाहायला मिळतो. पुढच्या केवळ ४ वर्षांत (म्हणजेच १२ व्या वर्षी) ही रक्कम जवळपास दुप्पट होऊन ७७.०२ लाख रुपये होते. आणि त्यानंतरच्या अवघ्या ३ वर्षांत (१५ व्या वर्षी) हीच रक्कम तब्बल १ कोटी १८ लाख रुपयांचा टप्पा ओलांडते. विशेष म्हणजे, जे पहिले ३९ लाख जमवण्यासाठी तुम्हाला ८ वर्षे लागली, तेवढीच संपत्ती पुढच्या फक्त ३-४ वर्षांत चक्रवाढ व्याजामुळे (Compounding) आपोआप तयार होते.

    काय सांगतो ऐतिहासिक डेटा?

    भारतीय शेअर बाजाराचा इतिहास एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करतो, ती म्हणजे गुंतवणुकीतील सुरक्षितता. आकडेवारीनुसार, ज्या गुंतवणूकदारांनी आपली SIP किमान ८ वर्षांपेक्षा जास्त काळ सातत्याने सुरू ठेवली आहे, त्यांना कधीही ‘नकारात्मक परतावा’ (Negative Returns) मिळालेला नाही. याचाच अर्थ असा की, दीर्घकाळ मार्केटमध्ये टिकून राहिल्यामुळे मुद्दल गमावण्याची भीती उरत नाही आणि गुंतवणुकीवर चांगला नफा मिळण्याची शक्यता वाढते.

    SIP 8-4-3 Formula Marathi: शेअर बाजारात रोजच्या स्तरावर कितीही चढ-उतार आले, तरी दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला केवळ आर्थिक सुरक्षितता देत नाही, तर संपत्ती निर्मितीची खात्रीशीर संधीही उपलब्ध करून देते. त्यामुळे बाजाराच्या तात्पुरत्या घसरणीला न घाबरता, संयम ठेवून आपली SIP चालू ठेवणे हाच खऱ्या अर्थाने श्रीमंत होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.

    मित्रांनो, म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही बाजार जोखमीवर आधारित असते. ऐतिहासिक आकडेवारीनुसार दीर्घकाळात फायदा होत असला, तरी प्रत्यक्षात गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवर्जून घ्यावा.

    आणखी वाचा:

  • Bike Blazers Success Story: घराच्या गच्चीवरून सुरू झालेला व्यवसाय आज करोडोंमध्ये!

    Bike Blazers Success Story: घराच्या गच्चीवरून सुरू झालेला व्यवसाय आज करोडोंमध्ये!

    Bike Blazers: अडथळ्यांवर मात करून यशाच्या शिखरावर: केशव राय यांचा प्रेरणादायी प्रवास

    जीवनातील यशाचा मार्ग कधीही सोपा नसतो. तो मेहनत, ध्येय, आणि अपयशाला येणाऱ्या अडथळ्यांना पार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो. यशाच्या दिशेने वाटचाल करताना अनेक अडचणी येतात, पण त्या परिस्थितीचा सामना करून मार्ग काढणारा व्यक्तीच खरा यशस्वी ठरतो. याच मार्गावरून जाणाऱ्या व्यक्तींच्या कथा प्रेरणादायक असतात. माणसामध्ये जबरदस्त इच्छाशक्ती आणि मनात ठरवलेली गोष्ट पूर्ण करण्याचा ध्यास, तसेच त्यासाठी करावी लागणारी मेहनत करण्याची तयारी असेल तर ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होते.

    तसेच, यशप्राप्तीसाठी अनेक अपयशांचे डोंगर पार करावे लागतात. परिस्थितीशी दोन हात करत, परिस्थितीतून मार्ग काढत वाटचाल करावी लागते, तेव्हाच कुठे माणूस यशस्वी होतो. अशाच परिस्थितीतून मार्ग काढत यशाचं शिखर सर करणाऱ्या व्यक्तीचं उत्तम उदाहरण म्हणजे “बाईक ब्लेझर्स” चे सर्वेसर्वा केशव राय.

    कोण आहेत केशव राय?

    भारतामध्ये बहुतेक घरांमध्ये तुम्हाला बाईक मिळेल. आजच्या काळात हे परिवहनाचे सर्वात स्वस्त साधन आहे, असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. जर तुमच्याकडे बाईक आहे, तर तिची योग्य काळजी घेणे तुमचे कर्तव्य आहे. बाईकचा विचार केला तर त्यासोबत बाईक कव्हरची देखील चर्चा होते. उन्हापासून आणि पावसापासून बचाव करण्यासाठी बाईक झाकून ठेवण्याची प्रथा आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा बाईक कव्हर स्टार्टअप ‘बाईक ब्लेझर’ विषयी सांगणार आहोत, ज्यांनी एक अनोखं बाईक कव्हर डिझाइन केलं आहे. केशव राय हे याच ‘बाईक ब्लेझर’ कंपनीचे संस्थापक आहेत.

    प्रारंभिक जीवन 

    मुळचे दिल्ली गाझियाबादचे असलेले केशव शाळेत अगदी सरासरी विद्यार्थी होते. त्यांचं अभ्यासात अजिबात मन लागत नव्हतं म्हणून कुठलातरी व्यवसाय करावा, हे सतत त्यांच्या डोक्यात असायचं. कॉलेजमध्ये असताना केशव त्यांच्या मित्रांबरोबर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायचे. विविध आणि नवनवीन कल्पना त्यांच्या डोक्यात घर करून असायच्या. तसेच वेगवेगळ्या वस्तू आणि उपकरणे दुरुस्त करण्याच्या त्यांच्या उत्सुकता आणि आवडीमुळे ते अभियांत्रिकी क्षेत्रात आले, आणि अशातच २०१५ साली त्यांनी एका ॲप्लिकेशनची निर्मिती करून त्यावर आधारित व्यवसाय करण्यास सुरुवात केली.

    Bike Blazers: व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांनी त्यांच्या वडिलांकडे निधी म्हणजेच फंडची मागणी केली. वडिलांनी निधी दिला सुद्धा, मात्र म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. जे काही घडायचं असतं ते त्या वेळेवर बरोबर घडतं. केशवचा पहिला प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. पण नवनवीन गोष्टी शिकण्याच्या त्यांच्या इच्छाशक्तीने त्यांना नंतर व्यवसायात प्रचंड यश मिळवून दिलं.

    घर सोडले 

    पहिल्या ॲप आधारित व्यवसायामध्ये अपयश आल्यानंतर आता घरी न बसता काहीतरी करावं, या उद्देशाने त्यांनी बॅग भरली व घरी चार दिवसांनी परत येतो, असं सांगून घर सोडायचं ठरवलं व घर सोडलं देखील. त्यानंतर ते सतत तीन दिवस दिल्लीच्या रस्त्यांवर फिरत राहिले, मात्र डोक्यात कुठलीही कल्पना नसताना देखील तीन दिवस रस्त्यांवर फिरून चौथ्या दिवशी परत घरी जावं, हा विचार सुरू असताना दिल्ली शहरातील कौशांबी मेट्रो स्टेशनच्या पार्किंगमध्ये केशव राय बसलेले होते.

    Bike Blazers: त्या ठिकाणी असलेल्या पार्किंगमध्ये एक माणूस त्याची बाईक साफ करण्यासाठी धुळीचे फॅब्रिक शोधत होता. परंतु त्याला ते मिळाले नाही व त्या माणसाने शेजारील बाईकचं डस्टर घेतलं व स्वतःची बाईक स्वच्छ करून तो निघून गेला. ही सगळी परिस्थिती केशव यांनी पाहिली, व तेव्हाच त्यांच्या डोक्यात एक बिझनेस आयडिया आली, आणि तीच आयडिया घरी येऊन त्यांनी वडिलांना सांगितली. केशव राय यांची ती व्यावसायिक कल्पना होती बाईकचे कव्हर बनवणं, असं कवर जे सेमीऑटोमॅटिक असेल आणि ते गाडीची धूळ आणि पावसाळ्यातील पाणी काढण्यास मदत करेल. वडिलांना देखील ही कल्पना आवडली व केशव यांना पाठिंबा दर्शवला आणि अशा पद्धतीने झाली बाईक ब्लेझरची सुरुवात.

    व्यवसायाच्या दुसऱ्या पर्वाची  सुरवात 

    २०१६ च्या सुरुवातीला, केशव यांनी त्यांच्या व्यवसायात दुसरा प्रयत्न करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि ‘बाईक ब्लेझर’ या ब्रँडची स्थापना केली. त्यांनी हा प्रवास अगदी साधेपणाने सुरुवातीला घराच्या गच्चीवरून सुरू केला. केशव यांनी बाईक कव्हरचं उत्पादन घरच्या गच्चीवर सुरू केलं, परंतु त्यांच्या कष्टाने आणि ध्येयाने ते थांबले नाहीत.

    सुरुवातीचं छोटं उत्पादन युनिट आज एका मोठ्या उद्योगात रूपांतरित झालं आहे. आज, बाईक ब्लेझर कंपनीकडे नवी दिल्ली आणि गाझियाबाद येथे दोन भव्य उत्पादन युनिट्स आहेत. केशव यांचा हा प्रवास त्यांच्या जिद्दीचा आणि प्रयत्नांचा साक्षीदार आहे, ज्यामुळे त्यांनी आपल्या कंपनीला उंचीवर नेलं.

    बाईक ब्लेझरचं कव्हर औद्योगिक दर्जाच्या नायलॉन फॅब्रिकचं बनवलेलं असतं, जे हवामानास प्रतिरोधक असतं. हे कव्हर पावसाळ्यानंतर साठलेलं पाणी काढून टाकण्याची व्यवस्था करतं आणि वाहनांना धुळीपासून वाचवतं. बाईक किंवा कारवर ३० सेकंदांपेक्षा कमी वेळात कव्हर घालता येतं.

    त्यांच्या या प्रवासातून हे स्पष्ट होतं की, छोटी सुरुवात असली तरी ती मोठ्या यशाची वाट दाखवू शकते. केशव यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अपार मेहनत घेतली आणि त्यांच्या या उद्योजकतेच्या प्रवासाने आज त्यांना यशाची उंची गाठायला लावली आहे.

    Bike Blazers: २०२१ पर्यंत बाईक ब्लेझरने १.३ कोटी रुपये उलाढाल केली होती आणि आज हा व्यवसाय कैक पटींनी वाढला आहे. केशव रायने अपयशातून शिकून नव्या कल्पनांच्या मदतीने यशाचा मार्ग तयार केला आहे. त्यांची ही कहाणी हे सिद्ध करते की, मनात ठरवलेलं ध्येय पूर्ण करण्यासाठी कष्ट आणि इच्छाशक्ती आवश्यक आहेत. आज बाईक ब्लेझर एक यशस्वी व्यवसाय म्हणून उभा आहे, ज्याची सुरुवात एका साध्या विचाराने झाली होती.

    मित्रांनो, केशव राय यांचा हा प्रवास निश्चितच लाखो तरुणांना उर्जा देणारा आहे. जेव्हा मनात काहीतरी करण्याची धमक असते आणि ध्येय साध्य करण्यासाठी आपण सर्वतोपरी कष्ट करण्याची तयारी ठेवतो, तेव्हा कोणतीही अडचण आपल्याला रोखू शकत नाही. अशा व्यक्तींच्या वाटेत कितीही अडथळे आले, तरी ते आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहतात आणि अखेर यशस्वी होतात. त्यामुळे, इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम हे यशाच्या मार्गावरचं सर्वात मोठं शस्त्र आहेत, हे आपल्याला वेळोवेळी अनुभवायला मिळतं.

  • Pet Industry Business: कमी गुंतवणुकीत मोठा नफा देणारा व्यवसाय

    Pet Industry Business: कमी गुंतवणुकीत मोठा नफा देणारा व्यवसाय

    Pet Industry Business: काही उद्योजक त्यांच्या उद्योगात, व्यवसायात यशस्वी होतात व काही व्यवसाय अयशस्वी होऊन बंद पडतात. काही जणांना त्यांचा व्यवसाय टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. यामागे बरीच कारणे आहेत, त्यापैकी योग्य व अचूक व्यवसाय क्षेत्र निवडणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. सध्या पाळीव प्राणी व त्यांच्याशी संबंधित उत्पादने म्हणजेच पेट (Pet) इंडस्ट्री हे एक असे क्षेत्र आहे,  ज्यामध्ये गुंतवणूकदार पैसे गुंतवण्यास कायम उत्सुक असतात. बदलत्या काळानुसार कुत्र्या- मांजरासह इत्यादी पाळीव प्राण्यांच्या संगोपणसाठी सुविधा पुरवण्याच्या या व्यवसायाला मोठी गती प्राप्त झाली आहे. मोठ- मोठ्या शहरांमध्ये प्राण्यांसाठी खास ग्रूमिंग सेंटर्स उभी राहिली आहेत.

     सध्या भारतात या क्षेत्रात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे लोकांची जीवनशैली खूप वेगाने बदलत आहे. आजकाल उच्चभ्रू वस्त्यांमध्ये व शहरी भागात पाळीव प्राणी पाळण्याचे प्रमाण तुलनेने वाढत आहे. बऱ्याच जणांना एकटेपणा आल्याने ते घरात पाळीव प्राणी पाळतात, तर काही मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आपल्या ग्राहकांना पाळीव प्राणी पाळण्याचा सल्ला देतात. बऱ्याच लोकांना मूलबाळ नसल्यास तेही पाळीव प्राणी पाळतात, तर काहीजण केवळ एक आकर्षण/फॅड म्हणून प्राणी पाळतात. बऱ्याच जणांना पशुपालनाची आवड असते. असे पशुप्रेमी एकापेक्षा अधिक प्राणी (कुत्रे, मांजर, पक्षी) आपल्या घरात पाळतात. 

    आजकाल बऱ्याच घरांमध्ये देशीविदेशी प्राण्यांच्या जाती पाहायला मिळतात. या सर्व कारणास्तव या व्यवसायास मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच शहरी भागात हा व्यवसाय नेहमीच फायद्याचा आहे.

    Pet Industry Business: शहरात व उच्चभ्रू वसाहतीत पाळीव प्राणी पाळण्याची हौस आणि छंद जवळपास सर्वच लोकांना असतो. या व्यवसाय क्षेत्रामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. विविध देशी विदेशी जातीच्या प्राण्यांचे ब्रीडिंग, उत्पादन त्याची विक्री, पशुखाद्य निर्मिती व विक्री, पेट (Pet) केअर, पेट (Pet) शेल्टर, पेट (Pet) मेडिसिन, पेट (Pet) पार्लर्स, पेट (Pet) शो, पेट (Pet) गेम्स, पेट (Pet) सलून अशा अनेक प्रकारचे व्यवसाय व ब्रँड्स आज बाजारात नावारूपास आले आहेत. त्यामुळे नवउद्योजकांसाठी हे एक आकर्षक व्यवसाय क्षेत्र आहे, ज्यामध्ये पुष्कळ संधी उपलब्ध आहेत व यशाची खात्री आहे. 

    पेट (Pet) इंडस्ट्री व्यवसायातील यशाच्या खात्रीची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत : 

    1.  सर्वात महत्त्वाचे कारण या व्यवसायात प्राणी व त्यांच्यासंबंधित सर्व उत्पादनांना बाजारात कायम वाढती मागणी असते. 
    2. अगदी मंदीच्या काळातही या व्यवसाय क्षेत्रावर फारसा फरक पडत नाही व आर्थिक संकटांचा त्रास होत नाही. उलट मंदीच्या काळातही कुत्रे व मांजरांच्या विविध जातीची मागणी स्थिर होती.
    3.  हा व्यवसाय वर्षभर चालतो, त्यामुळे कॅशफ्लोमध्ये सातत्य टिकून राहते. या व्यवसायातील ग्राहक हे त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी खर्च करण्यास संकोच करत नाहीत.
       
    4. तसेच ग्राहकांना जास्त माहिती पुरवावी लागत नाही, त्यांना कोणतेही स्पष्टीकरण द्यावे लागत नाही, कारण पाळीव प्राणी पाळणाऱ्यांना त्यांच्या प्राण्यांचे आरोग्य, सवयी, प्रशिक्षण व त्यांचे मनोरंजन कसे करावे याबद्दल अगोदरपासून माहिती असते. ते लोक सर्व बाबतीत आधीपासूनच जागरूक असतात. 
    5. पाळीव प्राण्यांच्या पिल्लांबद्दल लोकांना खूप आकर्षण असते. त्यामुळे बाजारात त्यांमध्येही खूप विविधता दिसते व त्यास ग्राहकांकडून खूप मोठा प्रतिसाद मिळतो.
    6. या व्यवसाय वृद्धीचे सर्वात मोठे कारण म्हणजे मार्जिन. या क्षेत्रात एकूण गुंतवणुकीच्या ५० ते ६० टक्के नफा मिळतो. कुत्रे व मांजरांच्या पिल्ल्यांच्या खाद्य उत्पादनांमध्ये ४० ते ५० टक्के मार्जिन मिळते, तर त्यांच्यासाठी लागणाऱ्या खेळण्यांमधून ७० टक्के मार्जिन मिळते. पशुखाद्य उत्पादनातून सर्वात जास्त मार्जिन मिळते आणि त्याची मागणी बाजारात वर्षभर असते.
       
    7. आजकाल पेट (Pet) फॅशनमधूनसुद्धा चांगले उत्पन्न मिळते.
    8. सर्वसाधारणपणे पाहता या व्यवसायात पाळीव प्राणी व त्यांच्या संबधित सर्व उत्पादनांची मागणी वाढते आहे व ती निरंतर वाढतच राहील यात शंका नाही, हे मार्केट रिटेलर्सनाच नव्हे, तर व्यावसायिकांनासुध्दा आकर्षित करत आहे आणि दरवर्षी १० ते २० टक्यांनी वाढत आहे, कारण पाळीव प्राण्यांचे मालक त्यांच्या प्राण्यांच्या पालन- पोषणासोबतच त्यांचे मनोरंजन, आरोग्य यासाठी कितीही पैसे खर्च करायला तयार असतात.
       
    9. पाळीव कुत्रे पाळणारे मालक अंदाजे १० ते १५ हजाररुपये दरवर्षी खर्च करतात, तर मांजरांसाठी दरवर्षी किमान १२ ते १५ हजार रुपये खर्च करतात.

    Pet Industry Business: व्यवसायाच्या या संधीचा फायदा आपण  घेतलाच पाहिजे. या प्रत्येक व्यवसायामध्ये आपली पशुपालनाची आवड ही जोपासली जाते व पैसेही कमावता येतात.

    वाचक मित्रहो, बिझनेसची ही नवीन कल्पना तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.  

  • Tea Stall Business: १० रुपयांच्या चहातून लाखोंची कमाई?

    Tea Stall Business: १० रुपयांच्या चहातून लाखोंची कमाई?

    Tea Stall Business: मित्रांनो, सोशल मीडियावर आपण अनेकदा ऐकतो की, “एका चहावाल्याची कमाई आयटी इंजिनिअरपेक्षा जास्त असते!”

    १०-१२ रुपये देऊन चहा पिताना तुम्हालाही कधीतरी हा विचार नक्कीच आला असेल. वरवर पाहता हे खूप सोपं आणि आकर्षक वाटतं. पण यामागे खरंच एवढा नफा आहे का? चला, आज चहाच्या टपरीचं ‘रिअलिस्टिक बिझनेस मॅथेमॅटिक्स’ समजून घेऊया.

    सुरुवातीला बघूया कागदावरचं गणित:
    समजा, एका गजबजलेल्या रेल्वे स्टेशन किंवा आयटी पार्कबाहेर एक चहाची टपरी आहे.

    • रोजची विक्री: सरासरी ५०० कप चहा.
    • एका कपची किंमत: १० रुपये.
    • दिवसाची उलाढाल: ५,००० रुपये.
    • महिन्याची उलाढाल: १,५०,००० रुपये!

    Tea Stall Business: आता खर्चाचा विचार करूया. एक कप चहा बनवण्यासाठी दूध, साखर, चहापत्ती, गॅस आणि कागदी कप मिळून साधारण ५ ते ६ रुपये खर्च येतो. म्हणजेच एका कपमागे ४-५ रुपये ढोबळ नफा (Gross Profit). या हिशोबाने दिवसाचा नफा २,५०० रुपये आणि महिन्याचा नफा ७५,००० रुपये होतो. कोणत्याही कॉर्पोरेट टार्गेट्सशिवाय आणि टॅक्स न भरता हातात येणारी ही रक्कम ऐकून कुणीही थक्क होईल.

    पण थांबा! आता बघूया ‘खरे वास्तव’ (The Ground Reality):
    कोणताही व्यवसाय फक्त कागदावरच्या हिशोबाने चालत नाही. या ७५,००० रुपयांच्या नफ्यामधून काही मोठे ‘छुपे खर्च’ आणि संघर्ष वजा करावे लागतात:

    प्राइम लोकेशनची किंमत: गर्दीची जागा फुकट मिळत नाही. तिथे टपरी लावण्यासाठी अधिकृत भाडे किंवा स्थानिक पातळीवर द्यावा लागणारा ‘हफ्ता’ (Adjustment) हा या व्यवसायातील एक मोठा खर्च असतो.

    Tea Stall Business: मदतनीसांचा पगार: दिवसाला ५०० कप चहा बनवणे, ग्राहकांना देणे आणि कप उचलणे हे एका माणसाचे काम नाही. यासाठी किमान १-२ कामगार लागतात, ज्यांचा मासिक पगार द्यावा लागतो.

    शारीरिक मेहनत (Physical Toll): उन्हाळा असो, थंडी असो वा पाऊस… चहावाल्याला रोज १२-१४ तास गरम गॅसशेजारी उभं राहावं लागतं. इथे शनिवार-रविवारची सुट्टी नसते किंवा ‘पेड लीव्ह’ (Paid Leave) नसते. दुकान बंद, म्हणजे त्या दिवसाची कमाई शून्य!

    स्पर्धा: तुमचा चहा प्रसिद्ध झाला, की दुसऱ्याच महिन्यात आजूबाजूला तशाच ४ नवीन टपऱ्या उघडलेल्या असतात.

    थोडक्यात सांगायचं तर…

    Tea Stall Business: चहाचा व्यवसाय हा नक्कीच ‘कॅश रिच’ (Cash Rich) बिझनेस आहे. जर तुमचं ‘लोकेशन’, ‘चव’ आणि ग्राहकांशी असणारं ‘कौशल्य’ परफेक्ट असेल, तर हा व्यवसाय तुम्हाला उत्तम परतावा देतो. पण आयटी इंजिनिअरची फक्त सॅलरी पाहून चालत नाही, चहावाल्याची ती अफाट शारीरिक मेहनत आणि अनिश्चितताही पाहावी लागते.

    तुम्हाला काय वाटतं? नोकरीमधील सुरक्षितता आणि एसी ऑफिस बरं, की स्वतःच्या व्यवसायातील हा संघर्ष आणि स्वातंत्र्य? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा!

    आणखी वाचा :