Category: लेख

  • जागतिक महिला दिन 2026: भारतीय स्त्रीशक्तीचा नवा आवाज – International Womens Day

    जागतिक महिला दिन 2026: भारतीय स्त्रीशक्तीचा नवा आवाज – International Womens Day

    ८ मार्च (International Womens Day) हा केवळ शुभेच्छांचा उत्सव नसून, तो महिलांच्या संघर्षाची जाणीव करून देणारा दिवस आहे. २०२६ मध्ये, जेव्हा आपण संयुक्त राष्ट्रांच्या (UN Women)हक्क, न्याय आणि कृती’ (Rights. Justice. Action. For ALL Women and Girls) या संकल्पनेचा विचार करतो, तेव्हा हे स्पष्ट होतं की आता केवळ चर्चा करून चालणार नाही. आजही मालमत्तेचा हक्क, समान वेतन आणि सुरक्षिततेसाठी स्त्रियांना जगाच्या कानाकोपऱ्यात लढावं लागत आहे, हे वास्तव नाकारून चालणार नाही. कायद्याने दिलेले हक्क जेव्हा समाजात प्रत्यक्ष न्यायात रूपांतरित होत नाहीत, तेव्हा मानवी प्रगती खुंटते. त्यामुळे, स्त्रियांच्या हक्कांचं रक्षण हे केवळ स्त्रियांसाठी आवश्यक नसून, जागतिक मानवी हक्कांच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण आहे.

    भारतीय महिला: आकाशाला गवसणी घालणारी झेप

    भारताचा विचार केला तर २०२६ सालापर्यंत आपण एक मोठा टप्पा गाठला आहे. भारतीय स्त्रिया आज केवळ स्वयंपाकघरातील सुगृहिणी राहिलेल्या नाहीत, तर त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे चाक फिरवणाऱ्या खऱ्या ‘कर्त्या’ बनल्या आहेत.

    उद्योजकीय क्रांती: भारतातील स्टार्टअप क्षेत्रात महिलांचे योगदान गेल्या दोन वर्षांत विक्रमी वाढले आहे. ‘नायका’ (Nykaa) च्या फाल्गुनी नायर असोत किंवा ग्रामीण भागातील एखादी छोटी उद्योजिका, भारतीय महिला आज स्वतःच्या हिमतीवर ‘ब्रँड’ उभे करत आहेत. २०२६ च्या आकडेवारीनुसार, देशातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांपैकी (MSME) सुमारे २४% उद्योगांची मालकी महिलांकडे आहे.

    संरक्षण आणि अंतराळ संशोधन: भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये महिलांना आता ‘कॉम्बॅट रोल’ (युद्धभूमीवरील भूमिका) मध्ये सामावून घेतले जात आहे. इस्रो (ISRO) च्या गगनयान आणि चांद्रयान मोहिमांमध्ये महिला शास्त्रज्ञांचे नेतृत्व जगाने पाहिले आहे. ही केवळ एक नोकरी नसून भारतीय मानसिकतेत झालेला हा एक क्रांतिकारी बदल आहे.

    ग्रामीण भारताचा कणा: लखपती दीदी आणि तंत्रज्ञान

    महिला सक्षमीकरणाचा खरा अर्थ ग्रामीण भारतात पाहायला मिळतो. केंद्र सरकारच्या ‘लखपती दीदी’ यांसारख्या मोहिमांमुळे ग्रामीण महिलांच्या हातात आर्थिक सत्ता आली आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी केवळ कर्ज घेणेच शिकले नाही, तर त्या आता उत्पादने तयार करून ती जागतिक बाजारपेठेत पोहोचवत आहेत. डिजिटल इंडियाच्या प्रसारामुळे आज गावातील एक सामान्य महिलाही क्यूआर कोड (QR Code) वापरून व्यवहार करत आहे. हे तांत्रिक साक्षरतेचे सर्वात मोठे उदाहरण आहे. २०२६ मध्ये ‘ड्रोन दीदी’ सारख्या उपक्रमांमुळे शेतीसारख्या पारंपरिक पुरुषप्रधान क्षेत्रातही महिलांनी आपली पकड घट्ट केली आहे.

    शिक्षण आणि आरोग्य: बदलाचे दोन मुख्य स्तंभ

    कोणत्याही प्रगत समाजाची ओळख ही तिथल्या स्त्रियांच्या शिक्षणावरून होते. २०२६ मध्ये भारताचा ‘महिला उच्च शिक्षण प्रवेश दर’ (GER) वाढून तो ३०% च्या पुढे गेला आहे. विशेषतः विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणित (STEM) या विषयांत मुलींची आवड वाढत आहे. आरोग्य क्षेत्रातही ‘मिशन शक्ती’ आणि ‘मिशन वात्सल्य’ यांसारख्या योजनांमुळे माता मृत्यू दरात (MMR) मोठी घट झाली आहे. मात्र, आजही स्त्रियांच्या मानसिक आरोग्याकडे आणि पोषण आहाराकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. जेव्हा स्त्री निरोगी असेल, तेव्हाच घर आणि देश प्रगत होईल.

    क्रीडा क्षेत्र: मैदानावरची स्त्रीशक्ती

    क्रीडा क्षेत्रातील भारतीय महिलांचे यश हे २०२६ मधील सर्वात मोठे ठळक वैशिष्ट्य आहे. स्मृती मानधना, निखत जरीन किंवा पी.व्ही. सिंधू यांसारख्या खेळाडूंनी जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली आहे. महिलांच्या प्रीमियर लीग (WPL) सारख्या स्पर्धांमुळे महिला खेळाडूंना केवळ आर्थिक स्थैर्यच मिळाले नाही, तर त्यांना एक मोठी ओळखही मिळाली आहे. आज ‘मुलगी आहे म्हणून काय झाले?’ हा प्रश्न विचारणे बंद झाले असून ‘मुलगी आहे म्हणून करून दाखवणार!’ हा विश्वास वाढला आहे.

    भविष्यातील आव्हाने: सायबर सुरक्षा आणि सामाजिक समानता

    प्रगती होत असली तरी २०२६ मध्ये नवी आव्हाने उभी राहिली आहेत. ‘डीपफेक’ (Deepfake) आणि ‘एआय’ (AI) च्या माध्यमातून स्त्रियांची बदनामी करणे किंवा त्यांना सायबर गुन्ह्यांना बळी पाडणे हे मोठे संकट आहे. तसेच, आजही कामाच्या ठिकाणी होणारा छळ आणि घरगुती हिंसाचार यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. ‘न्याय’ आणि ‘कृती’ या २०२६ च्या थीमचा अर्थ हाच आहे की, आपण अशा कायद्यांची निर्मिती आणि अंमलबजावणी केली पाहिजे, जिथे प्रत्येक स्त्रीला सुरक्षित वाटेल.

    कृतीची वेळ आताच!

    जागतिक महिला दिन हा केवळ एका दिवसाचा कार्यक्रम नसून, तो वर्षभर राबवण्याचा एक विचार आहे. ‘स्त्री’ ही निसर्गाची सर्वात मोठी शक्ती आहे. तिला सवलती नको आहेत, तर तिला समान संधी हवी आहे. तिला आरक्षणापेक्षा अधिक सन्मानाची गरज आहे. “Rights. Justice. Action. For ALL Women and Girls” या मंत्राचा अवलंब करून आपण असा समाज घडवूया जिथे लिंगभेद हा केवळ शब्दापुरता उरेल आणि प्रत्येकाची प्रगती त्याच्या कौशल्यानुसार होईल.

    चला तर मग, २०२६ च्या या महिला दिनानिमित्त संकल्प करूया की, आपण आपल्या घरातील, कार्यालयातील आणि समाजातील प्रत्येक स्त्रीचा आदर करू, तिचे हक्क मान्य करू आणि तिला तिचे आकाश शोधण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य देऊ. तरच खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा केल्याचे सार्थक होईल.

    आणखी वाचा :

  • National Science Day 2026 : पर्यावरणपूरक व्यवसाय, Sustainable Packaging आणि Green Supply Chain ची सुवर्णसंधी

    National Science Day 2026 : पर्यावरणपूरक व्यवसाय, Sustainable Packaging आणि Green Supply Chain ची सुवर्णसंधी

    राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष: पर्यावरणपूरक व्यवसाय, शाश्वत पॅकेजिंग (Sustainable Packaging)आणि ग्रीन सप्लाय चेन (Green Supply Chain)

    विज्ञानाशिवाय जग चालत नाही. माणसाने घेतलेला श्वास, माळरानावर उगवलेले झाड ते अवकाशात फिरणारे कृत्रिम उपग्रह – सगळंच विज्ञानाच्या भोवती चालत असतं तसेच अर्थकारण, नोकरी, उद्योग आणि व्यवसायही.

    आज जगभरात पर्यावरणपूरक व्यवसाय (Eco-friendly Business) हा केवळ ट्रेंड नसून, एक गरज बनली आहे. प्लास्टिक प्रदूषण, हवामान बदल, संसाधनांची कमतरता यामुळे कंपन्या आणि उद्योजकांना शाश्वत उपाय स्वीकारावे लागत आहेत. वैज्ञानिक क्षेत्रामधील Material science, biotechnology, AI, आणि nanotechnology यातील नवनवीन शोधांमुळे Biodegradable plastics, Smart recycling systems, Green energy logistics यासारख्या नवकल्पना निर्माण करणे शक्य झाले आहे.

    पर्यावरणपूरक व्यवसाय म्हणजे काय?

    पर्यावरणपूरक व्यवसाय म्हणजे असा उद्योग जो उत्पादन, पॅकेजिंग, वाहतूक आणि वापरात नैसर्गिक संसाधनांचा कमी वापर करतो, प्रदूषण कमी करतो आणि पुनर्वापराला प्रोत्साहन देतो.

    आजचे ग्राहक केवळ किंमत नाही तर ब्रँडचे पर्यावरणीय मूल्य (Eco Value) पाहून खरेदी करतात. त्यामुळे Green Business ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी नसून व्यवसायाची गरज बनली आहे.

    Reduce, Reuse, Recycle – व्यवसायासाठी Golden Formula

    Reduce (कमी वापर)
    – हलके पॅकेजिंग
    – कमी प्लास्टिक
    – डिजिटल बिलिंग
    म्हणजे खर्च कमी आणि पर्यावरण संरक्षणसुद्धा!

    Reuse (पुन्हा वापर)
    Glass bottles
    – Cloth bags
    – Returnable packaging
    यातून ग्राहकांची loyalty वाढते.

    Recycle (पुनर्निर्मिती)
    Recycled paper
    – Recycled plastic
    – Upcycled products
    त्यातून Circular Economy तयार होते. 

    Sustainable Packaging: 2026 चा एक मोठा ट्रेंड

    Sustainable Packaging म्हणजे काय?

    शाश्वत पॅकेजिंग (Sustainable Packaging) म्हणजे पुनर्वापर करता येणाऱ्या, जैवविघटनशील किंवा पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून पर्यावरणावर होणारी हानी कमी करणारी पॅकेजिंग प्रणाली.
    यामध्ये Recyclable साहित्य, Biodegradable साहित्य, Plant-based साहित्य यांचा वापर केला जातो.

    Sustainable Packaging Trend 2026

    1. Single-Use Plastic ला पूर्ण पर्याय
      जगभरातील अनेक देश Single-use plastic वर पूर्ण बंदी आणण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कागद, बांबू, बायोप्लास्टिक, मशरूम पॅकेजिंग यांची मागणी वाढत आहे.
    2. Plant-Based Packaging
      कॉर्न स्टार्च, गव्हाचा कोंडा, ऊसाच्या बॅगॅसपासून पॅकेजिंग तयार केली जात आहे. हे fully biodegradable आणि compostable असते. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाला मदत होते. 
    3. Smart Packaging
      QR code, RFID tag, recyclable ink वापरून digital traceability देणारी पॅकेजिंग हा मोठी ट्रेंड आहे. विशेषतः ई-कॉमर्स क्षेत्रात याचा वापर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. 
    4. Minimal Packaging
      Less is More – कमी साहित्य वापरून पॅकेजिंग करणे म्हणजे खर्च आणि कचरा दोन्ही कमी करणे. 

    Green Supply Chain


    Green Supply Chain म्हणजे उत्पादन तयार करण्यापासून ग्राहकापर्यंत पोहोचण्याची संपूर्ण प्रक्रिया पर्यावरणपूरक बनवणे आणि म्हणजे पर्यावरणाला हानी न पोहोचवता व्यवसाय नफा मिळवणे.

    यामध्ये पर्यावरणपूरक कच्चा माल (Eco-friendly raw material), ऊर्जा कार्यक्षम उत्पादन (Energy Efficient Products), Green logistics (EV वाहतूक), Recyclable packaging यांचा समावेश होतो.

    Green Supply Chain चे फायदे

    1. खर्चात बचत
      ऊर्जा, पाणी आणि कच्चा माल कमी वापरल्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो.
    2. ब्रँड व्हॅल्यूमध्ये वाढ
      आज ग्राहक पर्यावरणपूरक ब्रँडला, त्यांच्या उत्पादनांना जास्त पसंती देत आहेत.
    3. सरकारी नियमांचे पालन
      भारत सरकार EPR (Extended Producer Responsibility) आणि प्लास्टिक बॅनसारखे नियम लागू करत आहे.
    4. जागतिक बाजारात प्रवेश
      पर्यावरणपूरक उत्पादनांना जागतिक बाजारातही महत्त्वाचे स्थान आहे. Green Supply Chain च्या माध्यमातून तयार झालेल्या उत्पादनांची वेगळी ओळख निर्माण होऊ शकते. 

    Recycled Products: वेगाने वाढणारी Green Businessची नवी सुवर्णसंधी

    Recycled Products इंडस्ट्री आज मल्टी-बिलियन डॉलर मार्केट झाली असून भारतात Startup आणि MSME साठी मोठी व्यवसाय संधी आहे. कचऱ्यातून उपयोगी उत्पादने तयार करून पर्यावरण संरक्षणासोबत नफा कमावणे ही Circular Economy ची मुख्य ताकद आहे.

    लोकप्रिय Recycled Business Categories:

    • Plastic Recycling: बाटल्या, पिशव्या, पाईप्स, फर्निचर
    • Paper Recycling: पॅकेजिंग बॉक्स, कार्डबोर्ड, स्टेशनरी
    • E-waste Recycling: मोबाईल व संगणकातील मौल्यवान धातू
    • Upcycled Fashion: जुन्या कपड्यांपासून बॅगा व फॅशन वस्तू
    • Tyre Recycling: रबर मॅट्स, फर्निचर, बांधकाम साहित्य

    Recycled Products व्यवसाय कमी भांडवलात सुरू करता येतो आणि कच्चा माल सहज उपलब्ध असल्यामुळे नव्या उद्योजकांसाठी ही उत्तम संधी आहे. योग्य मशिनरी आणि आवश्यक परवाने घेतल्यास व्यवसाय सुरळीत चालवता येतो. डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर ग्राहक मिळवता येतात आणि ब्रँड ओळख तयार करता येते. सरकारी प्रोत्साहन योजना आणि वाढती पर्यावरण जागरूकता यामुळे या उद्योगाची मागणी वेगाने वाढत आहे आणि भविष्यात मोठी कमाई व रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते.

    भारतीय उद्योजकांसाठी सुवर्णसंधी

    भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा कन्झ्युमर मार्केट आहे, परंतु कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक प्रदूषण ही भारतातील एक मोठी समस्या आहे. त्यामुळे Green Businesses हे केवळ CSR (Corporate Social Responsibility) नाही तर Profit Opportunity आहे.

    काही उदाहरणे:
    Zero-waste grocery stores
    Eco-friendly packaging startups
    Sustainable fashion brands
    Organic product brands

    तुम्ही पर्यावरणपूरक व्यवसाय का सुरू करावा?

    1.  ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी
    2.  दीर्घकालीन खर्च कमी करण्यासाठी
    3.  भविष्यातील कायद्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी
    4.  पर्यावरणासाठी योगदान देण्यासाठी

    उत्तर: वरीलपैकी सर्व कारणांसाठी!

    2026 मध्ये Sustainable Business, Eco friendly businesses का ट्रेंडिंग आहे?

    • Gen Z आणि Millennials Eco-conscious आहेत. 
    • ESG (Environmental, Social, and Governance) investing वाढत आहे.
    • सरकार Green regulations आणत आहे. 
    • सोशल मीडिया वर Sustainable Brands Viral होत आहेत. 

    म्हणजेच, Green Business = Growing Business

    भविष्यातील यशस्वी व्यवसायासाठी नवा विचार

    3P = People + Planet + Profit = Sustainable Success

    केवळ नफ्याचा विचार न करता, लोकांसाठी व पर्यावरणासाठी योग्य उद्योग – व्यवसाय करणे! जो उद्योजक आज पर्यावरणपूरक धोरण स्वीकारेल, तो उद्या बाजारात आघाडीवर असेल.

    अशाच नवनवीन माहितीपर लेखांसाठी ‘नवी अर्थक्रांती’च्या वेबसाईटला नियमित भेट द्या!!

  • मराठी भाषा गौरव दिन 2026: अभिजात मराठीचा इतिहास, महत्त्व आणि भविष्यासाठी संदेश

    मराठी भाषा गौरव दिन 2026: अभिजात मराठीचा इतिहास, महत्त्व आणि भविष्यासाठी संदेश

    Marathi Bhasha Gaurav Din 2026 इतिहास, महत्त्व आणि मराठीच्या भविष्यासाठीचा संदेश

    “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…”

    भाषा म्हणजे काय मुळात, तुमचे – आमचे म्हणणे, विचार एकमेकांपर्यंत पोहचवण्याचे माध्यम. ही भाषा म्हणजे माणसाची ओळख, अस्मिता आणि संस्कृती, जी इतर प्राण्यांपासून माणसाला वेगळं बनवते. 

    आपली मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही, तर महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख, इतिहास आणि विचारधारा आहे. भाषावार प्रांतरचना करताना हजारो वर्षांची परंपरा, संतसाहित्य, आधुनिक साहित्य आणि लोकसंस्कृती जपणाऱ्या मराठी भाषा बोलणाऱ्यांचा महाराष्ट्र बनवला गेला. याच मराठी भाषेच्या गौरवासाठी दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो.

    ‘अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा’ असे आशावादाचे शब्द आपल्या साहित्यातून पेरणारे कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिवस. कुसुमाग्रज हे आधुनिक मराठी साहित्याचे अग्रणी कवी, नाटककार आणि साहित्यिक होते. मराठी साहित्यात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. म्हणूनच मराठी भाषा आणि साहित्याच्या सन्मानाचा दिवस, कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो.

    महाराष्ट्र सरकारने २०१३ पासून अधिकृतपणे २७ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्याची घोषणा केली. यामागचा उद्देश मराठी भाषेचा वापर वाढवणे, तिचे संवर्धन करणे आणि नव्या पिढीमध्ये भाषेबद्दल अभिमान निर्माण करणे हा होता.

    २०२६ मध्ये मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व (Importance of Marathi Bhasha Gaurav Din in 2026)

    १. भाषिक अभिमान जागृत करणे : मराठीचा वापर शिक्षण, प्रशासन, व्यवसाय आणि डिजिटल माध्यमांमध्ये वाढावा हा मुख्य उद्देश आहे.

    २. साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन: संत साहित्य, लोककला, नाटक, चित्रपट आणि आधुनिक साहित्याची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे.

    ३. शिक्षण आणि संशोधनाला चालना: मराठी भाषेत संशोधन, डिजिटल डॉक्युमेंटेशन आणि भाषाशास्त्रीय अभ्यासाला प्रोत्साहन.

    ४. डिजिटल युगातील मराठी: AI, ई-लर्निंग, सोशल मीडिया, OTT कंटेंट आणि डिजिटल पब्लिशिंगमुळे मराठीला जागतिक व्यासपीठ मिळत आहे.

    मराठी भाषा आणि आधुनिक काळ

    “माझ्या मराठीची गोडी, वाटे अमृताहून भारी, 
    शब्दाशब्दांतून वाहते, संस्कृतीची ही वारी!”

    मराठी भाषेचा इतिहास किमान २००० वर्षांहून अधिक जुना मानला जातो. नाणेघाटातील प्राचीन शिलालेख, संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, संत तुकारामांचे अभंग, मोरोपंत, शाहिरांची कवनं, पोवाडे ते आधुनिक साहित्यिकांची मांदियाळी—हे सर्व मराठीच्या समृद्ध परंपरेचे प्रतीक आहेत. आज मराठी भाषा अभिजात (Classical) भाषेच्या दर्जासाठी पात्र ठरणारी समृद्ध साहित्यिक परंपरा असलेली भाषा मानली जाते. मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात दर्जा ३ ऑक्टोबर २०२४ यादिवशी प्रदान केल्यानिमित्त, महाराष्ट्र शासनाने दरवर्षी ३ ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

    मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे भाषेच्या संशोधनाला मोठी चालना मिळणार आहे. प्राचीन मराठी ग्रंथ, बोलीभाषा आणि साहित्याच्या अभ्यासासाठी संशोधन संस्थांना अनुदान आणि सुविधा उपलब्ध होतील. मराठी साहित्यिक, कवी आणि भाषातज्ज्ञांना राष्ट्रीय स्तरावरील विशेष पुरस्कारांसाठी पात्रता मिळेल, ज्यामुळे साहित्य निर्मितीला प्रेरणा मिळेल. देशभरातील विद्यापीठांमध्ये मराठी अभ्यास केंद्रे स्थापन होऊन विशेष अभ्यासक्रम राबवले जातील. ग्रंथालयांसाठी केंद्र सरकारकडून निधी मिळाल्याने प्राचीन ग्रंथांचे जतन, अनुवाद आणि पुनरुत्थान होईल. मराठी साहित्याचा जागतिक भाषांमध्ये अनुवाद वाढून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळेल. 

    मराठी भाषा गौरव दिन हा केवळ एक दिनविशेष नाही, तर एक आठवण आहे की आपली मराठी भाषा टिकवायची असेल, टिकवायची असेल तर ती वापरावी लागेल, विकसित करावी लागेल आणि डिजिटल युगाशी जोडावी लागेल आणि तसे बदल आज काही प्रमाणात सर्वत्र दिसत आहेत. आज मराठी ही केवळ घरातील भाषा राहिलेली नाही. ती शिक्षण, मीडिया, स्टार्टअप, तंत्रज्ञान, AI आणि डिजिटल क्रिएटर इकॉनॉमी मध्ये वापरली जात आहे. मराठी कंटेंट क्रिएटर्स, पॉडकास्ट, डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि OTT प्लॅटफॉर्ममुळे मराठी जागतिक स्तरावर पोहोचत आहे.

    आपली भाषा, आपली जबाबदारी: आपण काय करू शकतो?

    भाषा तेव्हाच टिकते जेव्हा ती बोलली जाते आणि वापरली जाते. या गौरव दिनानिमित्त आपण हे छोटे संकल्प करूया:

    • दैनंदिन वापर: व्यवहारात आणि संवादात जास्तीत जास्त मराठीचा वापर करा.
    • वाचन संस्कृती: वर्षातून किमान ५ मराठी पुस्तके वाचा आणि ती इतरांना भेट द्या.
    • डिजिटल उपस्थिती: सोशल मीडियावर मराठीत लिहा, मराठी हॅशटॅग वापरा. (#marathi, #marathibhasha)
    • पुढची पिढी: आपल्या मुलांना मराठी भाषेची गोडी लावा, त्यांना मराठी कविता-गोष्टी सांगा.

    मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, मराठीसारख्या संपन्न, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय वारशाच्या भाषेच्या अस्तित्वाची, अभिमानरक्षणाची आणि भविष्याची जबाबदारी आपली आहे. भाषा मरते तेव्हा त्या भाषेसोबत अनेक परंपरा आणि ज्ञानही नाहीसे होते; त्यामुळे भाषेचे संवर्धन करणे हा आपल्या वारशाचा सन्मान आणि रक्षण करणे आहे. 

    मराठी भाषेचा अभिमान बाळगा, कारण आपली भाषा ही आपली ताकद आहे!

    आणखी वाचा :

  • इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट २०२६: जागतिक एआय (AI) क्रांतीचे केंद्र म्हणून भारताचा उदय 

    इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट २०२६: जागतिक एआय (AI) क्रांतीचे केंद्र म्हणून भारताचा उदय 

    मानवी संस्कृतीच्या वाटचालीत तंत्रज्ञान जेव्हा केवळ प्रगतीचे साधन न राहता सामाजिक परिवर्तनाचा कणा बनते, तेव्हा खऱ्या अर्थाने नव्या युगाची सुरुवात होते. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे १६ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली ‘इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट’ हा असाच एक ऐतिहासिक टप्पा ठरत आहे. ‘ग्लोबल साऊथ’ (जागतिक दक्षिण) मधील देशांनी आयोजित केलेली ही पहिलीच मोठी जागतिक शिखर परिषद असून, तिने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या समिटने केवळ तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेवर चर्चा न करता, त्याच्या प्रत्यक्ष ‘प्रभावावर’ (Impact) लक्ष केंद्रित करून भारताला एआय क्षेत्रातील जागतिक धोरणकर्ता म्हणून प्रस्थापित केले आहे.

    ‘मानव’ (MANAV) व्हिजन: एआय(AI) चे मानवीकरण

    भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआय (AI) तंत्रज्ञानाला मशीन-केंद्रित चौकटीतून बाहेर काढून ‘मानव-केंद्रित’ बनवण्यासाठी ‘MANAV’ (मानव) हे पाच कलमी सूत्र जगासमोर मांडले:

    १. M (Moral – नैतिक): एआय (AI) प्रणाली पूर्णपणे नैतिक आणि मानवी मूल्यांच्या चौकटीत असणे आवश्यक आहे.

    २. A (Accountable – उत्तरदायी): तंत्रज्ञानाचा वापर करताना त्याचे प्रशासन पारदर्शक आणि उत्तरदायी असले पाहिजे.

    ३. N (National Sovereignty राष्ट्रीय सार्वभौमत्व): प्रत्येक देशाचा आणि नागरिकाचा त्यांच्या स्वतःच्या डेटावर अधिकार असावा, ज्यामुळे ‘डिजिटल वसाहतवाद’ टाळता येईल.

    ४. A (Accessible – सुलभता): एआय (AI) वर काही मोजक्या कॉर्पोरेट संस्थांची मक्तेदारी नसावी; ते समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे.

    ५. V (Valid – वैधता): एआय मॉडेल्स (AI Models) हे कायदेशीररित्या वैध, विश्वसनीय आणि पडताळणीयोग्य असावेत.

    पंतप्रधानांनी एआय (AI)ची तुलना ‘जीपीएस’ (GPS) शी केली; ज्याप्रमाणे जीपीएस रस्ता दाखवते, पण जाण्याची दिशा चालक ठरवतो, तसेच एआय (AI) चे नियंत्रण नेहमी मानवाच्या हातात राहिले पाहिजे. ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ (सर्वांचे कल्याण आणि सर्वांचा आनंद) हाच भारतासाठी एआय (AI) च्या प्रगतीचा बेंचमार्क असेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

    जागतिक दिग्गजांचा भारतावर विश्वास

    या परिषदेत जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रमुखांनी उपस्थित राहून भारताच्या वाढत्या तांत्रिक सामर्थ्याचे कौतुक केले:

    सुंदर पिचाई (Google): पिचाई यांनी ‘इंडिया-अमेरिका कनेक्ट’ या नवीन उपक्रमाची घोषणा केली, ज्यांतर्गत भारत, अमेरिका आणि दक्षिण गोलार्धातील देशांना जोडण्यासाठी नवीन सब-सी (समुद्राखालून) केबल मार्ग तयार केले जातील. यामुळे एआय (AI) डेटा ट्रान्सफरची गती प्रचंड वाढेल. तसेच, भारतीयांच्या कौशल्य विकासासाठी ‘Google AI Professional Certificate’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रमही त्यांनी लाँच केला.

    सॅम ऑल्टमन (OpenAI): ऑल्टमन यांनी नमूद केले की, भारताकडे ‘फुल-स्टॅक एआय (AI) लीडर’ बनण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिभा, धोरणे आणि उत्साह आहे. ओपन-एआय (OpenAI) भारतात आपली व्याप्ती वाढवण्यासाठी भारत सरकारसोबत नवीन भागीदारी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    इमॅन्युएल मॅक्रॉन (फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष): मॅक्रॉन यांनी भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचे (UPI, आधार) कौतुक केले आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी सोशल मीडियावर कडक निर्बंध लादण्याचे आवाहन केले.

    एन. चंद्रशेखरन (टाटा सन्स):  चंद्रशेखरन यांनी एआय (AI) ची तुलना वाफेचे इंजिन, वीज आणि इंटरनेटशी केली. आयटी उद्योगासाठी एआय (AI) हा अडथळा नसून सर्वात मोठी संधी असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

    नंदन निलेकणी (Infosys): निलेकणी यांनी डिप्लॉयमेंट गॅप (Deployment Gap) ही मुख्य अडचण असल्याचे सांगितले. एआय (AI)चा वापर करून जुन्या प्रणालींचे आधुनिकीकरण (Modernization) करणे आता आर्थिकदृष्ट्या अधिक सुलभ झाले आहे, असे त्यांनी नमूद केले.

    तात्विक पाया: तीन सूत्रे आणि सात चक्रं


    तीन सूत्रे

    या शिखर परिषदेची संपूर्ण रचना भारताच्या प्राचीन ज्ञानाला आधुनिक विज्ञानाशी जोडणाऱ्या संकल्पनांवर आधारित आहे. ही परिषद लोक (People), ग्रह (Planet) आणि प्रगती (Progress) या तीन मूलभूत सूत्रांवर उभी आहे.

    या सूत्रांच्या अंमलबजावणीसाठी सात तांत्रिक चक्रं:

    सुरक्षित आणि विश्वासार्ह एआय (AI):

    एआय (AI) सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह असावा यासाठी मजबूत नियम आणि तंत्रज्ञान आवश्यक आहे, जे सर्व देशांना एआय (AI) नियंत्रणात सहभागी होण्यास मदत करतील.

    ह्युमन कॅपिटल (मानव भांडवल):

    एआय (AI) मुळे नोकऱ्या आणि कौशल्ये बदलत आहेत, म्हणून लोकांना नवीन कौशल्ये शिकवून रोजगार संधी समानपणे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

    विज्ञान:

    एआय (AI) विज्ञान संशोधनात मोठी मदत करत आहे आणि त्याचा वापर करून जागतिक स्तरावर सहकार्य व पारदर्शक संशोधनाला चालना देणे हे उद्दिष्ट आहे.

    अनुकूलता, नवीन कल्पकता आणि कार्यक्षमता:

    एआय (AI) मुळे ऊर्जा आणि पर्यावरणावर परिणाम होतो, म्हणून कमी संसाधनात कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक एआय (AI) प्रणाली विकसित करणे महत्त्वाचे आहे.

    सामाजिक सक्षमीकरणासाठी समावेश:

    एआय (AI) सर्व लोकांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित करावा, जेणेकरून सर्व समाजघटकांना त्याचा फायदा मिळेल.

    एआय (AI) संसाधनांचे लोकशाहीकरण:

    एआयसाठी आवश्यक संगणकीय आणि डेटा संसाधने सर्व देशांना परवडणारी आणि उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे.

    आर्थिक प्रगती आणि सामाजिक कल्याण:

    एआय (AI) चा वापर करून अर्थव्यवस्था वाढवणे आणि लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सेवा आणि नवोन्मेषाला चालना देणे महत्त्वाचे आहे.

    स्वदेशी एआय: ‘भारतजेन’ आणि सार्वभौम मॉडेल्स

    इंडिया-एआय मिशन (India AI mission) अंतर्गत भारत स्वतःचे Sovereign AI (सार्वभौम एआय) विकसित करण्यावर भर देत आहे.

    भारतजेन (BharatGen): हा जगातील पहिला सरकारी अर्थसहाय्यित बहुभाषिक एआय (AI) उपक्रम आहे, जो भारताच्या सर्व २२ भाषांना सपोर्ट करतो. हे मॉडेल केवळ भाषांतर करत नाहीत, तर भारतीय संस्कृती आणि स्थानिक संदर्भांचा विचार करून उत्तरे देतात.

    सर्वम एआय (Sarvam AI): या स्टार्टअपचे ‘Sarvam-1’ आणि ‘Bulbul V3’ सारखी मॉडेल्स भारतीय भाषांमधील टेक्स्ट-टू-स्पीच आणि व्हिजन प्रणालीमध्ये क्रांती घडवून आणत आहेत.

    सामाजिक परिणाम आणि जागतिक आव्हाने

    परिषदेचा मुख्य भर एआय (AI) ला सर्वसामान्यांच्या जीवनात आणण्यावर होता. ‘एआय फॉर ऑल’ (AI for ALL), ‘एआय बाय हर’ (AI by HER), आणि ‘युवा-एआय’ (YUVAi) या तीन प्रमुख जागतिक आव्हानांद्वारे (Challenges) सामाजिक परिणाम घडवणाऱ्या स्टार्टअप्स (Startups)ना गौरवण्यात आले. आरोग्य, कृषी, हवामान बदल आणि समावेशकता या क्षेत्रातील १० विजेत्यांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

    सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात नेटवर्क-आधारित ओळख शोधण्याचे तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले, जे नागरिकांना ऑनलाइन फसवणूक आणि ‘डिजिटल अरेस्ट’ सारख्या गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी गेम-चेंजर ठरेल.

    ‘इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ ही केवळ एक तांत्रिक परिषद नाही, तर ती भारताच्या तांत्रिक आत्मविश्वासाचा आविष्कार आहे. या परिषदेने सिद्ध केले की भारत आता केवळ तंत्रज्ञानाचा वापरकर्ता राहिलेला नाही, तर तो जगाला दिशा देणारा निर्माता बनला आहे. सुरक्षित, विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक एआयच्या माध्यमातून भारत केवळ स्वतःचाच नव्हे, तर संपूर्ण जागतिक दक्षिणचा विकास सुनिश्चित करत आहे. ही परिषद ‘विकसित भारत @ २०४७’ या स्वप्नाच्या दिशेने टाकलेले एक निर्णायक पाऊल आहे.

  • Microsoft ते Lenskart:पियुष बन्सल यांचा प्रेरणादायी प्रवास

    Microsoft ते Lenskart:पियुष बन्सल यांचा प्रेरणादायी प्रवास

    प्रत्येक मोठ्या स्वप्नामागे धैर्य, मेहनत आणि जिद्द दडलेली असते. अशीच सुरुवात आहे एका तरुणाच्या प्रवासाची. त्या तरुणाचं नाव आहे Lenskart चे संस्थापक पियुष बन्सल. जगभरात करिअरचे असंख्य दालने उघडी असताना आणि आरामदायी आयुष्याच्या अनंत शक्यता समोर असताना, पियुष यांनी मात्र अमेरिकेतील उच्च पगाराची, सुरक्षित नोकरी मागे सोडून भारतात परतण्याचं धाडस केलं. स्वतःच्या देशात काहीतरी अर्थपूर्ण उभारण्याच्या स्वप्नावर, जोखीम घेण्याच्या धैर्यावर आणि प्रबळ इच्छाशक्तीवर त्यांनी आपल्या स्वप्नांची बीजं पेरली आणि त्यातूनच जन्म झाला पुढे “Lenskart” या तब्बल ७२,000 कोटींच्या सामर्थ्यशाली कंपनीचा.

    सामान्य माणसाला कमी किमतीत उत्तम दर्जाची दृष्टी सेवा मिळावी हा उद्देश घेऊन सुरू झालेला हा प्रवास भारतीय उद्योजकतेला नवी दिशा देणारा ठरला आहे. २०२५ हे वर्ष त्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरलं असून Lenskart ने आपला IPO लाँच केला आहे. ‘शार्क टँक इंडिया’मधील शार्क म्हणून पियुष बन्सल यांचं व्यक्तिमत्त्व आज लाखो युवकांसाठी प्रेरणेचं प्रतीक बनलं आहे. संघर्ष, चिकाटी, अपयशांवर मात आणि पुन्हा उभं राहण्याची क्षमता,या सर्वांचा मिलाफ म्हणजे पियुष बन्सल यांचा आतापर्यंतचा जीवनप्रवास. या लेखातून त्यांच्या या प्रेरणादायी वाटचालीवर एक नजर टाकूया…

    सुरुवातीचं आयुष्य 

    पियुष बन्सल यांचा जन्म २६ एप्रिल १९८५ रोजी बलकिशन आणि किरण बन्सल यांच्या कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांच्यात नवीन काहीतरी शिकण्याची आणि स्वतःला सतत घडवत राहण्याची वृत्ती होती. इतर मुलं खेळण्यात रमली असताना, पियुष कॉल सेंटरमध्ये काम करू लागले. तिथे ते ग्राहकांच्या तक्रारी ऐकत आणि त्यांच्या समस्या समजून घेत. या अनुभवातून त्यांना ग्राहकांचा स्वभाव आणि त्यांची गरज ओळखणं किती महत्त्वाचं आहे, हे समजलं.

    त्यांच्या प्रामाणिकपणा आणि जिद्दीने प्रभावित होऊन एका वरिष्ठ व्यक्तीने त्यांना कोडिंग शिकण्याची संधी दिली. हीच ती वेळ होती ज्या क्षणापासून त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली. कोडिंगने त्यांच्यासमोर नव्या शक्यता उघडल्या आणि त्यांनी आपल्या पुढच्या प्रवासाची सुरुवात केली.

    उच्च शिक्षण आणि Microsoft मधील भूमिका

    पियुष बन्सल यांनी आपले उच्च शिक्षण कॅनडाच्या मॉन्ट्रियल येथील McGill University मधून इंजिनीअरिंगमध्ये पूर्ण केलं. शिक्षणानंतर त्यांना अमेरिकेत Microsoft मध्ये नोकरी मिळाली, जिथे २००७ मध्ये ते प्रोग्राम मॅनेजर झाले,असं पद, ज्याचं स्वप्न हजारो तरुण पाहतात. या पदामुळे त्यांना मोठ्या कंपनीत काम करण्याचा अनुभव, स्थिर भविष्य आणि परदेशातील आयुष्य जगण्याची संधी मिळाली. अनेक लोकांसाठी हे यशाचं प्रतीक असतं, पण पियुषच्या मनात काहीतरी कमी असल्याची जाणीव सतत होत होती.

    मोठं पद, सुरक्षित भविष्य असूनही त्यांना जाणवत होतं की त्यांच्यात स्वतःचं काहीतरी निर्माण करण्याची ओढ आहे. हीच ओढ आणि आत्मविश्वास त्यांना परत भारताकडे घेऊन आले, इथे त्यांनी स्वतःचं मार्ग तयार करून नव्या संधी शोधायला सुरुवात केली.

    पहिला प्रयत्न अपयशी

    भारत परतल्यावर २००७ मध्ये पियुष बन्सल यांनी SearchMyCampus.com नावाचे स्टार्टअप सुरू केलं. हे प्लॅटफॉर्म मुख्यतः विद्यार्थ्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलं गेलं होतं. सुरुवातीला १५,००० विद्यार्थी जोडले गेले, टीम वाढली आणि अनेक संधी दिसू लागल्या. विद्यार्थ्यांना उपयुक्त असलेला हा उपक्रम त्यांना खूप उत्साही बनवत होता, पण व्यवसायाची वाढ अपेक्षेनुसार होत नव्हती.

    दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर, या स्टार्टअपला बंद करावं लागलं. हे अपयश पियुषसाठी धक्का देणारं होतं, पण त्यांनी हार मानली नाही. उलट, या अनुभवाने त्यांना अधिक सजग आणि समजूतदार बनवले. अपयशातून शिकण्याची संधी त्याला मिळाली आणि पुढील प्रवासासाठी तो अधिक ठाम आणि तयार झाला.

    Flyrr ते Lenskart पर्यंत 

    २००९ मध्ये पियुष बन्सल यांनी Flyrr नावाचा ऑनलाइन आयवेअर व्यवसाय सुरू केला. काही काळ हा उपक्रम चालला, पण नंतर तो बंद करावा लागला. या अनुभवात त्यांना एक महत्त्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे भारतामध्ये चष्म्याची विक्री अजूनही व्यवस्थितरित्या होत नव्हती. देशात ५ कोटींहून अधिक लोकांना चष्म्याची गरज होती, पण व्यवस्थापनाचा अभाव, महाग किंमती आणि कमी दर्जाची सेवा यामुळे त्यांची ही गरज पूर्ण होत नव्हती.

    त्याचबरोबर जवळपास १८ कोटी लोक चष्मा न वापरता राहत होते. या समस्येवर बघताना पियुषने ही संधी म्हणून पाहण्यास सुरुवात केली. त्यांना जाणवले की ही फक्त समस्या नाही, तर भारतातील आयवेअर उद्योगात एक मोठी आणि भव्य संधी आहे, जिथे चांगली सेवा आणि दर्जेदार उत्पादन देऊन लाखो लोकांच्या गरजा पूर्ण करता येऊ शकतात.

    Lenskart च्या क्रांतीचा उदय

    डिसेंबर २०१० मध्ये पियुष बन्सल, अमित चौधरी आणि २०११ मध्ये सुमीत कापाही यांनी एकत्र येऊन Valyoo Technologies अंर्गत Lenskart ची स्थापना केली. सुरुवातीच्या काही महिन्यांत अनेक अडचणी आल्या, जवळपास २०% प्रोडक्ट्स परत येणे, ग्राहकांना योग्य नंबर न मिळणे, फिटिंगमध्ये त्रुटी, आणि डिलिव्हरी नुकसान होणे. या काळात पियुष एकाचवेळी WatchKart, JewelsKart, BagsKart हे तीन उपक्रमही सांभाळत होते, पण त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे ,सगळं थांबवून फक्त Lenskart वर लक्ष देण्यास सुरुवात केली. या निर्णयानंतरच Lenskart चा खरा प्रवास सुरू झाला.

    २०१३ मध्ये Lenskart ने भारतीयांसाठी एक क्रांतिकारी सेवा सुरू केली, फ्री होम आय चेकअप. या सेवेत प्रशिक्षित तंत्रज्ञ थेट घरपोच येऊन काही मिनिटांतच नंबर तपासणी करायचे, ज्यामुळे लाखो लोकांपर्यंत सहज पद्धतीने सेवा पोहोचली. ही सेवा ग्राहकांसाठी नव्या अनुभवाची सुरुवात ठरली आणि त्यांना घरबसल्या चष्मे मिळण्याची सुविधा मिळाली.

    फक्त एका वर्षातच Lenskart ने मोठ्या गतीने प्रगती केली. १०,००० हून अधिक घरभेटी, दररोज १,००० ऑर्डर्स, आणि व्यवसाय १०० कोटींच्या उंबरठ्यावर पोहोचला. या नव्या मॉडेलमुळे भारतीय eyewear बाजारात Lenskart ची ओळख क्रांतिकारी बनली आणि पियुष यांच्या धाडसी निर्णयाचे फळ दिसू लागले.

    यशाच्या शिखरावर

    Lenskart ने भारतात पहिल्यांदाच ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मार्गांनी चष्मा खरेदीचा अनोखा फॉर्म्युला आणला. त्यांनी 3D Try-On तंत्रज्ञान, ४८ तासांत डिलिव्हरी, अत्याधुनिक उत्पादन सुविधा, तसेच ऑफलाइन स्टोअर्स आणि ऑनलाइन ऑर्डर या संकल्पनेतून ग्राहकांचा अनुभवच बदलला. २०१७ पर्यंत रोज ३०,००० पेक्षा जास्त लेन्सेस तयार होत होत्या आणि २०१८ मध्ये रेव्हेन्यू ४६० कोटींवर पोहोचला.

    २०१९ मध्ये SoftBank Vision Fund ने Lenskart मध्ये $275 million अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली आणि कंपनी एका झटक्यात युनिकॉर्न बनली. भारतभर २,२०० स्टोअर्स उघडल्या, त्यातील निम्मी स्टोअर्स फक्त ७ महिन्यांत प्रॉफिटेबल ठरल्या. २०२४ पर्यंत रेव्हेन्यू ५,४२८ कोटींवर पोहोचला. हे आकडे Lenskart च्या अद्भुत आणि प्रभावी वाढीचं स्पष्ट उदाहरण आहेत.

    २०२५  वर्ष ऐतिहासिक 

    २०२५ वर्ष Lenskart साठी ऐतिहासिक ठरलं. ४ नोव्हेंबरला त्यांनी IPO लाँच केला, ज्याची रक्कम ७,२७८.०२ कोटी होती आणि त्याला २८.२६ पट ओव्हरसब्स्क्रिप्शन मिळालं, हे आकडे खरंच थक्क करणारे होते. त्यानंतर १० नोव्हेंबरला स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग झाली आणि कंपनीचे मूल्यांकन थेट ७२,००० कोटी वर पोहोचले. १२ वर्षांच्या अथक संघर्षाचं हे Lenskart साठी सुवर्णफळ ठरलं.

    मित्रांनो, स्वप्न जर मनापासून असेल आणि त्याला पूर्ण करण्याची इच्छाशक्ती आपल्यात असेल, तर वाट आपोआप उजळत जाते. Lenskart फक्त एक ब्रँड नाही, तर तो भारतीयांना त्यांच्या दृष्टिकोनाशी जोडणारा एक दुवा आहे, आणि पियुष बन्सल हे त्या दृष्टिकोनाला तेज देणारे दीपस्तंभ आहेत.

  • संघर्षातून उभा राहिलेला भारताचा शिक्षणदीपस्तंभ: ‘फिजिक्सवाला’-  Physics Wallah

    संघर्षातून उभा राहिलेला भारताचा शिक्षणदीपस्तंभ: ‘फिजिक्सवाला’- Physics Wallah

    अलख पांडे यांची प्रेरणादायी शैक्षणिक क्रांती

    देशातील मोठ्या उद्योगपती, अभिनेते, डॉक्टर किंवा राजकारण्यांच्या संपत्तीबद्दल आपण नेहमी ऐकतो. पण एका सामान्य शिक्षकाने अब्जोंची कंपनी उभी करून देशभरातील विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवला, ही प्रेरणादायी गोष्ट आहे ‘फिजिक्सवाला’चे संस्थापक अलख पांडे यांची. अतिशय साधारण परिस्थितीतून आलेल्या या तरुणाने आपल्या जिद्दीने, सातत्यपूर्ण मेहनतीने आणि अनोख्या शिकवण्याच्या शैलीने लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकला. एडटेक क्षेत्रात त्यांचं नाव आज सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं आहे.

    कधीकाळी अभिनेता होण्याचं स्वप्न पाहणारा, कधी वर्गात उभा राहून विद्यार्थ्यांना शिकवणारा, तर कधी यूट्यूबवर मोफत शिकवून विद्यार्थ्यांचा मित्र बनणारा हा मुलगा पुढे एका प्रचंड साम्राज्याचा सहसंस्थापक बनेल, हे कोणालाही वाटलं नव्हतं. त्यांची जिवंत, मजेदार आणि समजण्यास सोपी शिकवण्याची पद्धत विद्यार्थ्यांच्या हृदयात स्थान मिळवत गेली आणि हळूहळूच त्यांचा अब्जावधींच्या ‘युनिकॉर्न’ कंपनीपर्यंतचा रोमांचक प्रवास सुरु झाला.

    आजच्या लेखात आपण अलख पांडे यांच्या एका साध्या शिक्षकापासून देशातील सर्वात मोठ्या एडटेक युनिकॉर्नपैकी एक घडवणाऱ्या त्यांच्या क्रांतिकारक प्रवासावर एक नजर टाकणार आहोत.

    बालपणातील संघर्ष आणि स्वप्नांची उंच भरारी

    अलख पांडे यांना लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. पथनाट्ये, शालेय सादरीकरणे,या सगळ्यात भाग घेत त्यांनी कला जगतातील दारं उघडून पाहिली. पण घरची कठीण परिस्थिती त्यांना वेगळ्या मार्गावर घेऊन गेली. आठवीत असतानाच त्यांनी ट्युशन घेण्यास सुरुवात केली. चौथीच्या विद्यार्थ्यांना शिकवणारा हा मुलगा पुढे नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांचा विश्वासू शिक्षक आणि मार्गदर्शक बनेल, याची कल्पना कदाचित कोणालाही नव्हती.

    घरची आर्थिक अवस्था इतकी कठीण होती की अलख आणि त्यांच्या बहिणीच्या शिक्षणासाठी आई-वडिलांना स्वतःचं घरदेखील विकावं लागलं. पण अडचणींनी त्यांची पावलं थांबवली नाहीत,उलट त्यांच्या जिद्दीला आणखी धार मिळाली. दहावीत ९१% आणि बारावीत ९३.५% गुण मिळवत त्यांनी HBTI, कानपूर येथे बी.टेकमध्ये प्रवेश घेतला. शिक्षणासाठीचं हे पाऊल पुढे त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे नवी दिशा देणार होतं आणि इथूनच त्यांच्या पुढच्या महत्वाच्या प्रवासाची खरी सुरुवात झाली.

    एका छोट्या खोलीतून उभा राहिलेला ‘फिजिक्सवाला’

    बी.टेक करत असतानाच अलख पांडे यांनी आपल्या क्लासरूममधील शिकवणीचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यास सुरुवात केली. त्यांच्या शिकवण्याची शैली पूर्णपणे वेगळी आणि आकर्षक होती,अवघड संकल्पना अगदी सोप्या भाषेत उलगडून सांगणं, मजेदार ॲक्शन आणि ऊर्जेनं भरलेलं प्रेझेंटेशन. विद्यार्थ्यांना हवी असलेली तीच पद्धत अलख यांनी दिली, आणि त्यामुळे त्यांचे व्हिडिओ झपाट्याने लोकप्रिय होऊ लागले. थोड्याच काळात व्ह्यूज वाढले, सबस्क्राइबर्सची संख्या उंचावली आणि एक साधा शिक्षक यूट्यूबवरील ‘स्टार टीचर’ म्हणून ओळख मिळवू लागला.

    २०१७ मध्ये प्रयागराजमधील एका छोट्याशा खोलीत अत्यंत मर्यादित साधनांनी त्यांनी ‘फिजिक्सवाला’ची पायाभरणी केली. एक बोर्ड, एक कॅमेरा आणि प्रचंड इच्छाशक्ती,इतक्याच गोष्टींवर आधारलेलं हे छोटसं स्वप्न पुढे लाखो विद्यार्थ्यांचा आधार ठरलं आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवू लागलं.

    कोरोना काळात मिळाली अभूतपूर्व लोकप्रियता

    तीन वर्षे विनामूल्य व्हिडिओ देणाऱ्या अलख पांडे यांनी करोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या अडचणी ओळखून स्वतःचं ॲप सुरू केलं. अत्यंत कमी फी मध्ये त्यांनी JEE आणि NEET ची कोचिंग उपलब्ध करून दिली. महागड्या कोचिंग संस्थांच्या स्पर्धेतही विद्यार्थ्यांसाठीची त्यांची खरी तळमळ, त्यांचं ज्ञान आणि विश्वासार्हता यामुळे ‘फिजिक्सवाला’ वेगाने लोकप्रिय होऊ लागलं. देशभरातील हजारो विद्यार्थ्यांनी या ॲपचा आधार घेत आपल्या शैक्षणिक प्रवासाची वाटचाल सुरू केली.

    या काळात अलख सरांचे व्हिडिओ विद्यार्थ्यांना केवळ समजण्यास सोपेच नव्हते, तर मजेशीर, उत्साही आणि प्रेरणादायीही वाटू लागले. त्यांच्या शिकवण्याची शैली तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण करू लागली, आणि त्यांचे क्लासेस विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा व आत्मविश्वासाचा स्रोत बनले. कोरोनाकाळात मिळालेल्या या प्रचंड लोकप्रियतेने त्यांच्या कामाला नवा वेग दिला, आणि यानंतर विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्यांनी घेतलेला प्रत्येक पुढचा पाऊल ठाम, प्रभावी आणि न थांबणारा ठरला.

    मोठ्या ऑफर्स नाकारून स्वतःचा मार्ग निवडणारा शिक्षक

    लोकप्रियता वाढत असताना अलख पांडे यांच्या कामाची दखल मोठ्या एडटेक कंपन्यांनी घ्यायला सुरुवात केली. अनअकॅडमीने त्यांना तब्बल ४० कोटींचे वार्षिक पॅकेज ऑफर केले होते. इतकंच नाही, तर त्यांच्या ‘फिजिक्सवाला’मधील १०% हिस्सा ७५ कोटींना खरेदी करण्याची मोठी ऑफरही देण्यात आली. कोणत्याही तरुणासाठी ही स्वप्नवत संधी असू शकली असती, पण अलख यांच्या मनात वेगळंच ध्येय होतं.

    त्यांच्यासाठी पैसा नव्हता तर विद्यार्थ्यांचं भविष्य, शिक्षणाचा प्रसार आणि त्यांच्या मूल्यांची जपणूक अधिक महत्त्वाची होती. म्हणूनच त्यांनी या दोन्ही आकर्षक ऑफर्स ठामपणे नाकारल्या. स्वतःचा मार्ग, स्वतःची ओळख आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, परवडणारे शिक्षण हेच त्यांचं ध्येय राहिलं. आणि याच निर्णयाने ‘फिजिक्सवाला’ला पुढे एका ऐतिहासिक उंचीवर पोहोचवण्याची ताकद दिली.

    भारतातील  पहिली ‘डिजिटल-फर्स्ट’ एडटेक युनिकॉर्न  कंपनी 

    २०२० मध्ये ‘फिजिक्सवाला’ची कंपनी नोंदणीकृत झाली आणि त्याचा प्रगतीचा वेग झपाट्याने वाढू लागला. IIT BHU पदवीधर आणि अलख पांडे यांचे सहकारी प्रतीक माहेश्वरी व्यवस्थापन सांभाळू लागले, तर अलख पांडे पूर्णपणे शिक्षणात गुंतले. आज फिजिक्सवालाकडे ५००+ शिक्षक, १००+ टेक एक्स्पर्ट्स, १०९ शहरांतील १९८ सेंटर्स, ९९ मिलियन यूट्यूब सबस्क्राइबर्स आणि २,८८७ कोटींचे वार्षिक उत्पन्न आहे. या मेहनतीमुळे फिजिक्सवाला आज १.१ बिलियन डॉलर नेटवर्थ असलेली युनिकॉर्न कंपनी बनली आणि भारतीय एडटेक क्षेत्रात ही एक ऐतिहासिक पायरी ठरली आहे.

    फिजिक्सवाला IPO ही भारतीय एडटेकसाठी एक ऐतिहासिक क्षण मानली जाते. पहिली ‘डिजिटल-फर्स्ट’ एडटेक कंपनी म्हणून IPO घेणे म्हणजे शिक्षकांपासून स्टार्टअप्सपर्यंत सर्वांसाठी प्रेरणेची नवी दारे उघडण्यासारखं आहे. फिजिक्सवालाने सिद्ध केले की लहान शहरांतील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळू शकते, शिक्षकांनाही मान, सन्मान आणि योग्य कमाई मिळू शकते, आणि भारत जागतिक स्तरावर एडटेक क्रांतीचे नेतृत्व करू शकतो.

    मित्रांनो, अलख पांडे यांचा प्रवास म्हणजे संघर्ष, स्वप्नं आणि कठोर परिश्रमांनी विणलेलं एक प्रेरणादायी गीत आहे, जिथे एका मुलाने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याला आशेचा उजेड दिला. आज ते केवळ एक  शिक्षक नाहीत, तर भारताच्या नव्या शिक्षणयुगाचे दीपस्तंभ बनले आहेत. त्यांची कहाणी हे सांगते की शिक्षणाच्या पायावर उभं राहिलेलं स्वप्न कधीही अपयशी ठरत नाही, आणि जिद्द, सातत्य आणि मनापासून केलेल्या प्रयत्नांमुळे कोणतीही मर्यादा पार करता येते.

    आणखीन वाचा:

  • अपमानाचे उत्तर ‘यशाने’ दिलं! सुधीर जाटिया आणि ‘सफारी’ ब्रँडचा प्रेरणादायी प्रवास

    अपमानाचे उत्तर ‘यशाने’ दिलं! सुधीर जाटिया आणि ‘सफारी’ ब्रँडचा प्रेरणादायी प्रवास

    यशाचा ‘सफारी’ पॅटर्न: हार न मानता अपयशालाच ताकद बनवणाऱ्या सुधीर जाटियांची गोष्ट.

    यश हे कधीच एका रात्रीत मिळत नाही. त्यामागे सातत्यपूर्ण मेहनत, स्वतःवरचा ठाम विश्वास, प्रचंड जिद्द आणि अपयशातून शिकण्याची तयारी लागते. अनेक लोक अडचणी आल्या की थांबतात, पण काही मोजकेच लोक अपयशालाच आपली ताकद बनवून पुढे जातात आणि खऱ्या अर्थाने यश मिळवतात. अशा लोकांचा प्रवास नेहमीच प्रेरणा देणारा असतो.

    कधी कधी यशाची खरी सुरुवात अपमान, दुर्लक्ष आणि नाकारण्यातून होते. अशाच एका प्रेरणादायी प्रवासाचं नाव आहे,  सुधीर जाटिया. अत्यंत साध्या सुरुवातीपासून ते आज करोडोंची कंपनी उभारण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. आजच्या लेखात आपण त्यांच्या व्यवसायिक प्रवासावर एक नजर टाकणार आहोत.

    करिअरची सुरुवात 

    वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी सुधीर जाटिया यांनी VIP Industries मध्ये Aristocrat (Value Luggage) या विभागात ट्रेनी म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्या काळात अनेकांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास नव्हता. मात्र त्यांनी हार न मानता मेहनत, बारकाईने निरीक्षण करण्याची सवय आणि बाजाराची सखोल समज विकसित केली.

    या गुणांच्या जोरावर त्यांनी हळूहळू स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि सर्व शंका चुकीच्या ठरवल्या. अवघ्या १२ वर्षांत ते VIP Industries चे Vice President (VP) बनले. ट्रेनीपासून VP पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा त्यांच्या मेहनतीचा आणि जिद्दीचा खरा पुरावा आहे.

    ब्रँडिंगचा मास्टरस्ट्रोक

    सुधीर जाटिया यांनी VIP Industries च्या ब्रँडिंगमध्ये मोठा आणि धाडसी बदल केला. त्यांनी कंपनीचं संपूर्ण पोर्टफोलिओ नव्यानं मांडून प्रत्येक ब्रँडची वेगळी ओळख ठरवली. VIP ब्रँडला त्यांनी प्रीमियम आणि बिझनेस-क्लास सेगमेंटमध्ये स्थान दिलं, ज्यामुळे तो दर्जेदार आणि विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळखला जाऊ लागला.

    त्याच वेळी Aristocrat ब्रँडला तरुण पिढीसाठी परवडणारा, मजबूत आणि व्हॅल्यू-फॉर-मनी ब्रँड म्हणून सादर करण्यात आलं. या स्पष्ट रणनीतीचा थेट परिणाम कंपनीच्या आर्थिक कामगिरीवर दिसून आला आणि २०१० पर्यंत VIP Industries ही कंपनी १० कोटींच्या तोट्यातून बाहेर येत थेट ५६ कोटींच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नफ्यापर्यंत पोहोचली.

    टर्निंग पॉइंट 

    इतकं मोठं यश मिळवूनही २०१० साली व्यवस्थापनाने नवीन Lead VP नेमला आणि सुधीर जाटिया हळूहळू निर्णयप्रक्रियेतून बाजूला केलं. हा प्रसंग कुणालाही खचवणारा ठरला असता, कारण इतक्या मेहनतीनंतरही दुर्लक्ष होणं वेदनादायक असतं.

    पण सुधीर यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतःशीच एक ठाम निर्णय घेतला की उत्तर शब्दांनी नाही, तर यशातून द्यायचं. त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय त्यांच्या आयुष्यातील खरा वळणबिंदू ठरला.

    Safari ची निवड 

    २०११ मध्ये Safari ही एक लिस्टेड लगेज कंपनी होती, मात्र तिचा वार्षिक नफा केवळ २.६५ कोटींच्या मर्यादेत अडकलेला होता. VIP ला खऱ्या अर्थाने टक्कर देण्यासाठी Safari हाच योग्य ब्रँड आहे, हे सुधीर जाटिया यांनी अचूक ओळखलं. सप्टेंबर २०११ मध्ये त्यांनी २९ कोटींची गुंतवणूक करत Safari मध्ये ४१.३४% भागीदारी मिळवली आणि कंपनीच्या मालकीत प्रवेश केला.

    Safari मध्ये पाऊल टाकताच सुधीर यांनी ग्राहककेंद्री धोरण राबवलं. त्यांचा पहिला निर्णयच धक्कादायक होता तो म्हणजे वॉरंटीमध्ये आलेल्या बॅग दुरुस्त न करता थेट नवीन बॅग देण्याचा आदेश. यामुळे डिझाईन आणि उत्पादन टीमवर गुणवत्तेबाबत प्रचंड दबाव आला. त्याचबरोबर त्यांनी मटेरियल, टिकाऊपणा आणि उत्पादन प्रक्रियेवर पुन्हा लक्ष केंद्रित केलं आणि “Quality First” ही फक्त टॅगलाईन न राहता कंपनीची संस्कृती बनली. विक्री वाढवण्यासाठी त्यांनी Big Bazaar, Reliance Trends, Spencer’s यांसारख्या रिटेल चॅनेल्ससोबत भागीदारी केली आणि Amazon व Flipkart वर जाणारा भारतातील पहिला लगेज ब्रँड म्हणून Safari ने आपली वेगळी ओळख निर्माण केली. याच टप्प्यावरून Safari च्या यशाची खरी सुरुवात झाली.

    झपाट्याने वाढ आणि स्पर्धेत आघाडी

    २०१५ पर्यंत Safari ची विक्री १५० कोटींवर पोहोचली होती, ज्यातील सुमारे ३०% विक्री ई-कॉमर्समधून होत होती. २०१६ मध्ये Genius आणि Magnum या ब्रँड्सचे अधिग्रहण करून Safari ने शालेय बॅग्स आणि बजेट लगेज सेगमेंटमध्ये आपला विस्तार केला. या झपाट्याने होत असलेल्या वाढीमुळे VIP आणि Samsonite सारखे दिग्गज ब्रँडही सावध झाले.

    VIP ने aspirational branding वर भर दिला, Samsonite ने पूर्णपणे ऑफलाइन नेटवर्कवर विश्वास ठेवला, तर Safari ने स्टायलिश जाहिराती, मोठ्या रिटेल स्टोअर्स आणि मजबूत ई-कॉमर्स या तिन्हींचा प्रभावी मेळ साधला. या स्मार्ट रणनीतीचा परिणाम असा झाला की २०१९ पर्यंत Safari ची विक्री ६०० कोटींवर पोहोचली आणि Samsonite ला मागे टाकत Safari भारतातील नंबर २ लगेज कंपनी बनली. COVID-19 च्या कठीण काळातही Safari ने १००% ऑर्डर्स पूर्ण करून आपली विश्वासार्हता आणि ताकद सिद्ध केली.

    यशाच्या शिखरावर 

    २०२३ पर्यंत VIP Industries ची मार्केट कॅप ८,४७६ कोटी होती, तर Safari ची विक्री १,२१२ कोटींवर पोहोचली. कंपनीची एकूण मार्केट व्हॅल्यूएशन ९,२७३ कोटी झाली आणि सुधीर जाटिया यांचं “उत्तर” सगळ्यांनाच दिसून आलं.

    आज Safari ची स्थिती आणखी मजबूत आहे . विक्री १,८०० कोटी, नफा १८५.५७ कोटी, ८०० हुन अधिक  प्रॉडक्ट्स आणि ९,३०० टचपॉइंट्ससह. कंपनीची मार्केट व्हॅल्यूएशन आता १०,७३४ कोटींवर पोहचलं आहे आणि Safari आज भारतातील सर्वात वेगाने वाढणारी लगेज कंपनी म्हणून ओळखली जाते.

    आणखीन वाचा:

  • दोन मित्रांची जिद्द आणि ६०,००० कोटींचे साम्राज्य! – Success Story of Razorpay

    दोन मित्रांची जिद्द आणि ६०,००० कोटींचे साम्राज्य! – Success Story of Razorpay

    नमस्कार! आज आपण अशा एका कंपनीबद्दल बोलणार आहोत, जिचा वापर तुम्ही दररोज करता, पण कदाचित तुम्हाला तिचं नाव माहीत नसेल. तुम्ही जेव्हा झोमॅटोवर ऑर्डर देता किंवा नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन घेता, तेव्हा पडद्यामागे जे काम करतं, ते म्हणजे Razorpay.

    तुम्ही-आम्ही जेव्हा दुकानात स्कॅन करतो, ते झालं ‘B2C’ पेमेंट. पण एखाद्या स्टार्टअपला किंवा छोट्या बिझनेसला जेव्हा हजारो ग्राहकांकडून पैसे घ्यायचे असतात, तेव्हा त्यांना लागतो तो पेमेंट गेटवे. २०१४ च्या आसपास, जर तुम्हाला एखादा छोटा ऑनलाईन बिझनेस सुरू करायचा असेल आणि ग्राहकांकडून पैसे घ्यायचे असतील, तर ती एक डोकेदुखी होती. बँकांच्या चकरा मारणं, शेकडो कागदपत्रं आणि ‘पेमेंट गेटवे’ सुरू व्हायला कित्येक आठवडे लागायचे. हर्षिल आणि शशांकला स्वतःच्या एका प्रोजेक्टसाठी पेमेंट गेटवे हवा होता, पण त्यांना तो मिळाला नाही. तिथेच त्यांना समजलं— समस्या मोठी आहे, म्हणजे संधीही मोठी आहे!

    आयआयटी रुरकीतून बाहेर पडलेल्या हर्षिल माथुर आणि शशांक कुमार यांनी ही समस्या सोडवायची ठरवलं. सुरुवातीला या दोन मित्रांना जवळपास १०० बँकांनी नकार दिला. कोणालाच या दोन मुलांच्या आयडियावर विश्वास नव्हता. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी एक असा प्लॅटफॉर्म बनवला जो इतका साधा होता की, अवघ्या काही तासांत कोणताही छोटा बिझनेस डिजिटल पेमेंट स्वीकारायला सुरुवात करू शकत होता. जिथे बँकांचे फॉर्म भरण्यात आठवडे जायचे, तिथे Razorpay ने एका दिवसात काम केलं.

    Razorpay ने काय केलं? त्यांनी तंत्रज्ञान इतकं सोपं केलं की कोडिंग न येणारा माणूसही त्यांच्या सेवा वापरू लागला. त्यांनी ‘कमी फी’ आणि ‘फास्ट सर्व्हिस’वर भर दिला. जेव्हा छोटे व्यावसायिक Razorpay कडे वळले, तेव्हा मोठ्या कंपन्यांनाही त्यांचं महत्त्व कळलं. जेव्हा नोटाबंदी झाली आणि डिजिटल इंडियाची लाट आली, तेव्हा Razorpay आधीच तयार होतं.

    आज झोमॅटो, स्विगीपासून ते तुमच्या गल्लीतल्या स्टार्टअपपर्यंत सगळेजण Razorpay वापरत आहेत. आज ते फक्त पेमेंट्स नाही, तर बिझनेस बँकिंग आणि पेरोलमध्येही नंबर १ आहेत. ८ लाखांहून अधिक व्यवसाय आज Razorpay मुळे आपला धंदा ऑनलाईन चालवत आहेत. ही कंपनी आता फक्त भारतात नाही, तर जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत आहे. २०२५ पर्यंत या कंपनीचं मूल्य चक्क ७.५ अब्ज डॉलर्स (सुमारे ६०,००० कोटी रुपये) इतकं झालंय!

    Razorpay ची ही कहाणी आपल्याला शिकवते की— “मैदानात कितीही मोठे खेळाडू असले, तरी जर तुमच्याकडे लोकांच्या समस्या सोडवणारी एखादी साधी पण प्रभावी आयडिया असेल, तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही!”

    तुम्ही तुमच्या बिझनेससाठी कोणतं पेमेंट गेटवे वापरता? कमेंट्समध्ये सांगा! आणि अशाच दमदार बिझनेस स्टोरीजसाठी नवी अर्थक्रांती’ला फॉलो नक्की करा.

  • २०२६ मध्ये यशस्वी होण्यासाठी या ७ सवयी माहित असायलाच हव्यात.

    २०२६ मध्ये यशस्वी होण्यासाठी या ७ सवयी माहित असायलाच हव्यात.

    सकाळी लवकर उठणे 

    लवकर उठणे ही यशस्वी जीवनाची पहिली पायरी मानली जाते. सकाळची वेळ अत्यंत शांत, स्वच्छ आणि सकारात्मक असते. या वेळी आपले मन अधिक एकाग्र असते आणि विचार स्पष्ट होतात. २०२६ मध्ये लवकर उठण्याचा संकल्प केल्यास आपल्याला दिवसासाठी योग्य नियोजन करता येते. सकाळी उठल्यानंतर थोडा वेळ स्वतःसाठी दिल्यास आत्मपरीक्षण, वाचन किंवा शांत विचार करण्याची सवय लागते. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि मानसिक ताजेपणा टिकून राहतो. उशिरा उठल्यामुळे घाई, ताणतणाव आणि कामातील गोंधळ वाढतो, तर लवकर उठल्यामुळे वेळेचे योग्य व्यवस्थापन करता येते.

    यशस्वी व्यक्तींच्या जीवनाकडे पाहिले तर त्यांच्या दिनचर्येत लवकर उठणे ही एक महत्त्वाची सवय दिसून येते. म्हणूनच २०२६ मध्ये आळस सोडून लवकर उठण्याचा संकल्प केल्यास जीवनात सकारात्मक बदल नक्कीच घडून येईल.

    नियमीत व्यायामाची सवय . 

    निरोगी शरीराशिवाय यशस्वी जीवनाची कल्पनाही करता येत नाही. आजच्या डिजिटल युगात आपण शारीरिक हालचाली कमी करत चाललो आहोत, ज्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. २०२६ मध्ये नियमित व्यायाम किंवा जिमला जाण्याचा संकल्प केल्यास शरीर तंदुरुस्त राहील आणि मनही उत्साही बनेल. व्यायामामुळे शरीराची ताकद वाढते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि आत्मविश्वास निर्माण होतो. तसेच व्यायामामुळे तणाव कमी होतो आणि मन प्रसन्न राहते. रोज थोडा वेळ व्यायामासाठी दिल्यास शिस्त आणि सातत्याची सवय लागते. जिम असो किंवा घरच्या घरी केलेला व्यायाम, महत्त्व नियमिततेला आहे. चांगले आरोग्य आपल्याला कामात अधिक लक्ष देण्यास मदत करते. त्यामुळे २०२६ हे वर्ष आरोग्यदायी बनवण्यासाठी व्यायामाला जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचा संकल्प करणे अत्यंत आवश्यक आहे.

     मानसिक शांतता जपण्याचा संकल्प

    आजच्या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या जीवनात मानसिक शांतता हरवत चालली आहे. सततचा ताण, अपेक्षा आणि अपयश यामुळे मन अस्थिर होते. म्हणूनच २०२६ मध्ये मानसिक शांतता जपण्याचा संकल्प करणे फार महत्त्वाचे आहे. शांत मन असल्यास योग्य निर्णय घेता येतात आणि अडचणींना सामोरे जाण्याची ताकद मिळते. ध्यान, श्वसनाचे व्यायाम, शांत संगीत ऐकणे किंवा निसर्गात वेळ घालवणे यामुळे मनाला शांती मिळते. स्वतःशी संवाद साधण्याची सवय लावल्यास आपल्याला स्वतःची खरी ओळख होते. मानसिक शांतता म्हणजे समस्यांपासून पळ काढणे नव्हे, तर त्यांना सकारात्मक दृष्टीने सामोरे जाणे होय. शांत मनामुळे आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मक विचार दूर होतात. म्हणूनच २०२६ मध्ये स्वतःच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याचा संकल्प केल्यास जीवन अधिक संतुलित आणि आनंदी बनेल.

     नवीन कौशल्ये शिकण्याचा संकल्प

    जग वेगाने बदलत आहे आणि त्यासोबत ज्ञान व कौशल्यांची गरजही वाढत आहे. २०२६ मध्ये नवीन कौशल्ये शिकण्याचा संकल्प केल्यास आपण काळाबरोबर पुढे राहू शकतो. Self Development साठी कौशल्यविकास खूप महत्त्वाचा आहे. नवीन स्किल्स शिकल्यामुळे आपली क्षमता वाढते आणि आत्मविश्वासही बळकट होतो. विद्यार्थी असो किंवा काम करणारी व्यक्ती, सतत शिकण्याची वृत्ती ठेवणे आवश्यक आहे. आज ऑनलाइन माध्यमांमुळे शिकण्याच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. दररोज थोडा वेळ शिकण्यासाठी दिल्यास मोठा बदल घडू शकतो. कौशल्ये म्हणजे केवळ नोकरीसाठी उपयुक्त गोष्टी नव्हेत, तर व्यक्तिमत्त्व विकासासाठीही ती आवश्यक असतात. त्यामुळे २०२६ मध्ये स्वतःला अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी नवीन कौशल्ये शिकण्याचा ठाम संकल्प करायला हवा.

     शिस्त पाळण्याचा संकल्प

    शिस्त ही यशाची गुरुकिल्ली मानली जाते. मोठी स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तींसाठी शिस्त असणे अत्यंत आवश्यक आहे. २०२६ मध्ये शिस्त पाळण्याचा संकल्प केल्यास आपले जीवन अधिक सुव्यवस्थित बनेल. वेळेवर उठणे, कामे वेळेत पूर्ण करणे, जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणे यामुळे आत्मविश्वास वाढतो. शिस्त नसल्यास आळस, काम टाळणे आणि अपयश यांचा सामना करावा लागतो. शिस्त म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःसाठी नियम बनवणे. सुरुवातीला शिस्त पाळणे कठीण वाटू शकते, पण हळूहळू ती सवय बनते. शिस्तबद्ध जीवनामुळे आपण उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करू शकतो. म्हणूनच २०२६ हे वर्ष यशस्वी बनवण्यासाठी शिस्तीला आपल्या जीवनाचा पाया बनवण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे.

     नकारात्मक गोष्टी दूर करण्याचा संकल्प

    नकारात्मक विचार, वाईट सवयी आणि चुकीची संगत ही प्रगतीतील मोठी अडथळे आहेत. २०२६ मध्ये अशा नकारात्मक गोष्टी जीवनातून दूर करण्याचा संकल्प करणे अत्यंत आवश्यक आहे. नकारात्मकता माणसाचा आत्मविश्वास कमी करते आणि पुढे जाण्याची ताकद हिरावून घेते. सतत तक्रार करणे, स्वतःवर शंका घेणे आणि अपयशाची भीती बाळगणे हे नकारात्मक विचारांचे उदाहरण आहेत. अशा गोष्टी सोडून सकारात्मक विचारांची सवय लावली पाहिजे. चांगल्या लोकांच्या सहवासात राहिल्यास विचारही सकारात्मक होतात. नकारात्मक गोष्टी दूर केल्यास मन हलके होते आणि ऊर्जा वाढते. म्हणूनच २०२६ मध्ये स्वतःच्या प्रगतीस अडथळा ठरणाऱ्या सर्व नकारात्मक गोष्टींना कायमचे दूर करण्याचा संकल्प करायला हवा.

     गरज नसलेल्या गोष्टींना “नाही” म्हणण्याचा संकल्प

    अनेक वेळा आपण इतरांना खुश करण्यासाठी स्वतःच्या गरजा आणि ध्येयांकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे ताणतणाव आणि असमाधान वाढते. २०२६ मध्ये गरज नसलेल्या गोष्टींना “नाही” म्हणण्याचा संकल्प करणे Self Development साठी खूप महत्त्वाचे आहे. “नाही” म्हणणे म्हणजे उद्धटपणा नव्हे, तर स्वतःच्या जीवनाला प्राधान्य देणे होय. प्रत्येक गोष्टीसाठी होकार देणे शक्य नसते. आपल्या वेळेचा, ऊर्जेचा आणि क्षमतेचा योग्य वापर करण्यासाठी मर्यादा ठरवणे आवश्यक आहे. जे आपल्या ध्येयांशी जुळत नाही, अशा गोष्टींना नकार देणे ही आत्मसन्मानाची खूण आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि निर्णयक्षमता मजबूत होते. म्हणूनच २०२६ मध्ये स्वतःसाठी ठाम उभे राहण्याचा आणि गरज नसलेल्या गोष्टींना निर्भयपणे “नाही” म्हणण्याचा संकल्प करायला हवा.

    आणखी वाचा

  • नादच खुळा! सॉफ्टवेअर इंजिनिअरने उभारला ११,२२७ कोटींचा ब्रँड; BlueStone च्या यशाचं नेमकं गुपित काय?

    आजच्या काळात ‘Set Life’ सोडून अनिश्चिततेच्या वाटेवर चालण्याचं धाडस फार कमी लोक करतात. जेव्हा हाताशी IIT दिल्लीची पदवी आणि खिशात Amazon सारख्या जागतिक कंपनीचा कोट्यवधींचा पगार असतो, तेव्हा लोक सहसा स्थिरावण्याचा विचार करतात. पण गौरव सिंग कुशवाहा हे वेगळ्या मातीचे बनले होते. एका साध्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने भारतातील ज्वेलरी मार्केटचा चेहरामोहरा कसा बदलला आणि ११,२२७ कोटींचे साम्राज्य कसे उभे केले? चला जाणून घेऊया BlueStone च्या यशाचं ‘अस्सल’ गुपित!

    करिअरची सुरुवात 

    गौरव सिंग कुशवाहा यांचा प्रवास सुरू झाला IIT दिल्ली मधून. कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केल्यावर त्यांच्यासमोर यशाचे पायघड्या अंथरल्या होत्या. त्यांनी Amazon मध्ये सिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून भारत आणि अमेरिकेत काम केले. पैसा, प्रतिष्ठा आणि सुख सोयी सर्व काही होते. पण त्यांच्या मनात एक स्वप्न सतत धडका मारत होतं – “स्वतःचं काहीतरी निर्माण करायचं!”

    ठरलेल्या चौकटीत राहण्यापेक्षा स्वतःचा नवा रस्ता शोधण्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर दीड वर्षातच त्यांनी सुरक्षित नोकरीला रामराम ठोकला आणि उद्योजकतेच्या मैदानात उडी घेतली.

    पहिलं अपयश: जेव्हा स्वप्नांना ब्रेक लागला

     Amazon मध्ये सुमारे दीड वर्ष काम केल्यानंतर गौरव सिंग कुशवाहा यांनी धाडसी निर्णय घेत नोकरी सोडली आणि “Chapak” नावाचं ऑनलाइन मूव्ही पोर्टल सुरू केलं. 

    तब्बल ४ वर्षे त्यांनी यावर जीवापाड मेहनत घेतली. पण म्हणतात ना, “वेळ आणि काळ” नेहमी आपल्या बाजूने नसतो. त्या काळात स्मार्टफोनचा वापर फारसा नव्हता आणि व्यवसायासाठी ठोस कमाईचं मॉडेल तयार झालं नव्हतं. त्यामुळे Chapak अपेक्षेप्रमाणे वाढू शकला नाही.

    पण गौरव खचले नाहीत. या अपयशाने त्यांना एक मौल्यवान धडा दिला: फक्त कल्पना चांगली असणं पुरेसं नसतं, तर योग्य वेळ, योग्य बाजारपेठ आणि लोकांची खरी गरज ओळखणं तितकंच महत्त्वाचं असतं.

    समस्येतून संधीचा शोध

    या अपयशाच्या काळात गौरव सिंग कुशवाहा यांनी बाजाराकडे नव्या नजरेने पाहायला सुरुवात केली. त्यांना जाणवलं की भारतातील ज्वेलरी मार्केट प्रचंड मोठं आहे, तरीही त्याचा अगदी कमी भाग ऑनलाइन उपलब्ध आहे. Flipkart आणि Amazonसारखे प्लॅटफॉर्म असूनही फाइन ज्वेलरीची विक्री जवळजवळ पूर्णपणे ऑफलाइनच होत होती. 

    ज्वेलरी खरेदी ही केवळ वस्तू खरेदी नसून ती विश्वासावर आधारित प्रक्रिया होती. मर्यादित डिझाइन्स, किमती आणि शुद्धतेबाबत स्पष्ट माहिती नसणं, तसेच ग्राहकांना योग्य मार्गदर्शन न मिळणं या मोठ्या अडचणी होत्या. ह्याच समस्या ओळखून गौरव यांनी त्यावर उपाय शोधण्याचं ठरवलं आणि इथूनच एका नव्या संधीची बीजं रोवली गेली. 

    BlueStone चा जन्म

    ऑनलाइन शॉपिंगची लाट येत असताना सोन्या-चांदीचे दागिने ऑनलाइन का विकले जाऊ नयेत? याच प्रश्नातून२०११ साली गौरव यांनी विद्या यांना सहसंस्थापक म्हणून सोबत घेतलं आणि BlueStone या ऑनलाइन ज्वेलरी ब्रँडची सुरुवात केली. हा ब्रँड डिझाइनला प्राधान्य देणारा आणि तंत्रज्ञानावर आधारित होता. “Blue” म्हणजे विश्वास आणि “Stone” म्हणजे कारागिरी, या दोन मूल्यांवर BlueStone उभा राहिला. 

    ऑनलाइन ज्वेलरी खरेदी ही संकल्पनाच नवीन असल्याने सुरुवातीपासूनच हा प्रवास आव्हानात्मक होता. ग्राहकांचा विश्वास जिंकणं हे BlueStone समोरचं सर्वात मोठं आव्हान होतं.  सुरुवातीला लोकांच्या मनात भीती होती – “ऑनलाइन सोनं कसं काय घ्यायचं?” ही भीती घालवण्यासाठी गौरव यांनी भन्नाट आयडिया वापरल्या:

    • Try at Home: दागिने विकत घेण्यापूर्वी घरी बसून ट्राय करण्याची सोय.
    • पारदर्शकता: प्रत्येक दागिन्याचं कॅरेट वजन, शुद्धता आणि हॉलमार्क सर्टिफिकेटची पूर्ण माहिती.
    • Customization: ग्राहकांच्या आवडीनुसार दागिने बनवून मिळण्याची सोय.

    यामुळे BlueStone वरचा लोकांचा विश्वास वाढला आणि ऑर्डरचा ओघ सुरू झाला

    गुंतवणूक आणि वेगवान वाढ

    BlueStone ने इन्व्हेंटरी-लाइट आणि ऑर्डर-वर-निर्मिती मॉडेल स्वीकारलं, ज्यामुळे खर्च कमी राहिला आणि व्यवसाय सहज वाढू लागला. सुरुवातीला Accel, Kalaari आणि Saama कडून ६० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, आणि २०१५ पर्यंत महसूल ८० कोटी रुपये झाला. नंतर Accel, IvyCap आणि रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली १०० कोटी रुपये अधिक गुंतवले गेले. एका वर्षातच कंपनी दरमहा ७,००० ऑर्डर्स पूर्ण करू लागली, ज्यात सरासरी विक्री २५,००० रुपये होती.

    ऑनलाइन ते ऑफलाइन प्रवास

    गौरव यांना लक्षात आलं की ज्वेलरी मार्केटमधला ऑनलाइन हिस्सा फक्त 0.५% आहे. मोठ्या प्रमाणावर वाढीसाठी ऑफलाइन स्टोअर्स उघडणे आवश्यक होते. त्यामुळे २०१८ मध्ये दिल्लीच्या Pacific Mall मध्ये पहिलं फिजिकल स्टोअर उघडलं. २०१९ पर्यंत BlueStone कडे २० स्टोअर्स झाले आणि महसूल ५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. रोमँटिक-मुव्ही थीमवर आधारित LoveLike कॅम्पेनमुळे Millennials आणि Gen Z मध्ये ब्रँड खूप लोकप्रिय झाला. पाहता पाहता स्टोअर्सची संख्या १७५ च्या पार गेली.

    आणखीन वाचा: