Author: Navi Arthkranti

  • शेअर डिलिस्टिंग : एक गुंतवणूकदार मार्गदर्शक

    शेअर डिलिस्टिंग : एक गुंतवणूकदार मार्गदर्शक

    शेअरबाजारात नोंदवण्यात आलेल्या शेअर्सची खरेदीविक्री गुंतवणूकदार करू शकतात हे आपल्याला माहिती आहे. सध्या देशभरात कुठेही व्यवहार होऊ शकणाऱ्या मुंबई शेअरबाजार आणि राष्ट्रीय शेअरबाजार यापैकी किमान एका बाजारात सार्वजनिक मर्यादित कंपनीस नोंदणी करावीच लागते. अनेक चांगल्या कंपन्या गुंतवणूक दारांच्या सोईसाठी दोन्हीही शेअरबाजारात नोंदणी करतात.

    अशी नोंदणी करण्यासाठी दरवर्षी नोंदणी फी द्यावी लागते त्याचप्रमाणे शेअरबाजाराच्या नियमावलीचे पालन करून कंपनी बाबतची सर्व माहिती पारदर्शकपणे विहित कालावधीत जाहीर करावी लागते जेव्हा एखादी कंपनी शेअर बाजारातील आपल्या शेअर्सची खरेदीविक्री पूर्णपणे थांबवते तेव्हा ती सार्वजनिक मर्यादित कंपनी म्हणून न राहता तिचे रूपांतर खाजगी कंपनीत होते. जोपर्यंत वरील दोनपैकी कोणत्याही एका शेअरबाजारात कंपनीच्या शेअर्समध्ये व्यवहार होत असतात तोपर्यंत ती कंपनी नोंदणीकृत कंपनी आहे असे म्हटले जाते. जेव्हा दोन्हीही राष्ट्रीयस्तरावर बाजारातील खरेदी विक्री कंपनी प्रवर्तकांकडून रीतसर नियमाचे पालन करून थांबवली जाते किंवा कंपनीवर कारवाई म्हणून बाजारातील व्यवहार थांबवले जातात तेव्हा सदर कंपनीचे शेअर्स डिलिस्ट झाले असे आपल्याला म्हणता येईल.

    शेअर डिलिस्ट करण्याची गरज कुणाला आणि का पडावी? याची कारणे शोधली असता शेअर्सचे डिलिस्टिंग दोन प्रमुख पद्धतीने होऊ शकते.

    ★ सन्मानपूर्वक पद्धतीने
    ★ सक्तीने

    ★ सन्मानपूर्वक पद्धतीने शेअर डिलिस्ट करण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाकडून घेतला जातो तशी नियामकांकडे मागणी केली जाते. सर्व शेअरहोल्डरना त्याची पूर्वकल्पना देऊन त्यांच्याकडील शेअर्सचा उचित मोबदला दिला जातो आशा प्रकारे बाजारातील विक्रीयोग्य सर्वच लॉट काढून घेतले जातात असे करत असताना सर्व शेअरहोल्डरनी आपल्याकडील शेअर्स व्यवस्थापनास दिलेच पाहिजेतच अशी सक्ती नसते फक्त यापुढे शेअर्स खरेदीविक्री सहजासहजी होऊ शकणार नाही याची शेअरहोल्डरना जाणीव करून देऊन त्यावर तात्पुरता उपलब्ध पर्याय उपलब्ध करून दिलेला असतो.

    सन्मानपूर्वक डिलिस्टिंग हा कंपनीच्या विस्तार कार्यक्रमाचा आणि पुनर्रचनेचा एक भाग असतो किंवा एखादा मोठा गुंतवणूकदार ती कंपनी पूर्णपणे आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असतो तो मूळ प्रवर्तकाचे सर्व शेअर्स खरेदी करतो याशिवाय संस्थात्मक गुंतवणूकदारांचे जास्तीत जास्त शेअर्स आपल्याकडे येतील असा प्रयत्न करतो हाच नियम सर्वसाधारण भागधारकांना लागू पडतो सध्या एकूण भागभांडवलाच्या 25% शेअर्स हे जनतेकडे बाजारात खरेदी विक्रीसाठी उपलब्ध असावेत असा नियम आहे या नियमावलीतून फक्त सरकारी मालकीच्या कंपन्यांना वगळण्यात आले आहे. प्रवर्तक अथवा कंपनी खरेदी करणारा गुंतवणूकदार आपला कंपनीवर पूर्ण ताबा असावा या हेतूने 75% हून अधिक भागभांडवल आपल्या ताब्यात राहावे अशा प्रयत्नात असतात अशा प्रसंगी कंपनी डिलिस्ट करण्यास काही अटींवर नियमकांची परवानगी मिळू शकते.

    जी कंपनी डिलिस्ट होणार त्याचे प्रवर्तक किंवा नवे मालक यांना कंपनीचे शेअरबाजारातील व्यवहार पूर्णपणे बंद करण्यासाठी 90% शेअर्स मिळवावे लागतात ते मिळवण्यासाठी त्या शेअर्सचे स्वतंत्र मूल्यांकन करून घेऊन तसा देकार अन्य भागधारकांना द्यावा लागतो ही किंमत प्रवर्तक आणि संस्थात्मक गुंतवणूकदार यांना दिलेल्या किमतीहून कमी असू शकत नाही त्याचप्रमाणे बाजारभावाहून कमी असल्यास त्यास कोणीही प्रतिसाद देणार नाही.

    असे धरून चालू की हे शेअर्स सन्मानपूर्वक डिलिस्ट करण्याची प्रवर्तक किंवा नवे गुंतवणूकदार यांनी ठरवले आहे. हा निर्णय झाल्यावर भागधारकांना 10 आठवडे आधी पूर्वसूचना ठेवून त्यांची विशेष सर्वसाधारण सभा बोलावून मान्यता मिळवावी लागते ही मान्यता मिळवली की त्यानंतरची प्रक्रिया अशी-

    मर्चंट बँकर्सची नेमणूक– शेअर डिलिस्टिंग निर्णय झाल्यावर स्वतंत्र मर्चंट बँकरची नेमणूक करावी लागते तो रिव्हर्स बुक बिल्डिंग त्यामधून शेअर्स पुनर्खरेदी कोणत्या भावात करावी लागेल या प्रक्रियेवर लक्ष ठेवेल.

    रिव्हर्स बुक बिल्डिंग– यात कंपनी भागधारकांना एक विशिष्ट किंमत सांगेल जी शेअरहोल्डरना त्यांचे शेअर्स देण्यासाठी आकर्षक वाटेल. यासाठी ऑनलाइन देकार मागवण्यात येतील त्याची किमान किंमत (बेस प्राईज) ही मागील 2 आठवडे किंवा 26 आठवडे यांपैकी जी सर्वाधिक सरासरी किंमत असेल ती किमान किंमत धरली जाईल. भागधारक त्याहून अधिक अशा कोणत्या किंमतीत शेअर्स देण्यास तयार आहेत असे देकार घेतले जातील त्यातून कोणत्या भावांनी सर्वाधिक शेअर्स खरेदी केले जातील याचा शोध घेतला जाईल. ही खरेदी नेमकी कोणत्या भावाने करावी? याचा शोध घेण्याची ही आदर्श पद्धत आहे त्यामुळे गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण होते. जगभराचा विचार केला असता केवळ भारतातच रिव्हर्स बुक बिल्डिंग पद्दत अस्तित्वात आहे. ही पद्धत बदलून जगभरात मान्य अशी एका विशिष्ट किमतीनेच नियोजित डिलिस्टिंग कंपनीचे शेअर खरेदी करावेत अशी उद्योगांची मागणी असून यावरील संशोधन प्रबंध सेबीने प्रकाशीत केला आहे. त्यावर लोकांच्या सूचना प्रतिक्रिया मागवल्या असून सेबीच्या येत्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर विचार करण्यात येणार असल्याचे सेबी चेअरपर्सन “माधवी पुरी बुच” यांनी अलीकडेच जाहीर केले आहे. त्यामुळे लवकरच या पद्धतीत कोणते नवे बदल होतील ते समजेल.

    डिलिस्टिंगसाठी स्वतंत्र खात्याची निर्मिती– निश्चित केलेल्या भावाने शेअर्स खरेदी केले जातील याची खात्री करण्यासाठी स्वतंत्र खाते (एस्क्रू अकाउंट) उघडले जाते. त्यातील पैशांचा वापर केवळ मान्यवर भागधारकांचे शेअर्स खरेदी करण्यासाठीच वापरले जातील.
    बहुसंख्य शेअरहोल्डरची मान्यता– किंमत निश्चित झाल्यावर सर्वाना पत्रे पाठवून खरेदी ऑफर दिली जाईल जोपर्यंत 90% शेअरहोल्डर यास मान्यता देत नाहीत तोपर्यंत ही प्रक्रिया चालू राहील यात कधीही ऑफर केलेला भाव हा बाजारभावाहून कमी नसेल यास अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास संपूर्ण प्रक्रिया मागे घेण्याचा अधिकार कंपनीस आहे.

    सक्तीने करण्यात आलेले डिलिस्टिंग: यात शेअर्सचे व्यवहार बंद व्हावेत अशी मागणी कंपनी व्यवस्थापनाने केलेली नसते. या कंपन्या यथातथाच असल्याने लिस्टिंग नियमावलीचे पालन करू शकत नाहीत त्यांच्यावर शेअरबाजाराच्या नियामक मंडळाकडून अशी कारवाई केली जाते ही कारवाई तात्पुरती अथवा कायमस्वरूपी असू शकते. काही गंभीर गैरवर्तन आढळून आल्यास सेबीकडून सर्व व्यवहार थांबवले जाऊ शकतात झालेले व्यवहार रद्द केले जाऊ शकतात. गुंतवणूकदारांचे यात नुकसान होत असले तरी बाजारात व्यवहार करणाऱ्या सर्वाना ही जोखीम स्वीकारणे भाग आहे. हा एक शिक्षेचाच प्रकार आहे. अशी शिक्षा केल्याने अनेक गुंतवणूकदारांचे नुकसान होण्याचीच शक्यता असल्याने शक्यतो अशी कारवाई बाजार नियामक मंडळाकडून घाईघाईत केली जात नाही. त्या संबधी योग्य त्या पूर्वसूचना दिल्या जातात. मात्र मोठा गैरव्यवहार आढळल्यास सेबीकडून धडक कारवाई केली जाऊ शकते. यासर्वच प्रक्रियेवर अथवा सेबीने घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर कंपनी अथवा भागधारक यांना सिक्युरिटीज अपिलेट ट्रिब्युनलकडे (सॅट) अपील करता येते त्यांनीही योग्य निर्णय दिला नाही तर उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतात आणि निर्णय मान्य नसल्यास त्यावर अपील हे प्रकार सर्वोच्च न्यायालयातून न्याय मिळेपर्यंत चालू रहातात. सन 2005 मध्ये 90% भागधारकांच्या संमतीने कॅटबरी ने आपले शेअर्स ₹ 500/- मोबदला देऊन डिलिस्ट केले होते राहिलेल्या शेअरहोल्डर्सनी एकत्र येऊन मुंबई उच्च न्यायालयात या किमतीस आव्हान दिले त्यावर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने भागधारकांना ₹ 2014.50 प्रतिशेअर्स द्यावेत असा आदेश दिला होता.

    सक्तीने शेअर्स डिलिस्ट होण्याची काही प्रमूख कारणे-

    ● शेअरबाजाराच्या नियमावलीचे पालन न करणे
    ● शेअरबाजारात 6 महिन्याहून अधिक काळ खरेदीविक्री व्यवहार न होणे किंवा व्यवहारांचे प्रमाण तुरळक असणे
    ● दिवाळखोरी, सतत तीन वर्षाहून अधिक काळ नफा न मिळवणे, कंपनीच्या मालमत्तेचे मूल्यांकन उणे असणे.

    सन्मानाने डिलिस्ट होऊ घातलेल्या कंपनीची ऑफर मान्य करून शेअर्स देण्याची सक्ती कोणत्याही भागधारकावर नाही त्याची इच्छा असल्यास ते त्यापुढेही कंपनीचे भागधारक म्हणून राहू शकतात परंतू असे शेअर्स विकण्यासाठी त्यांच्यावर मर्यादा येतात हे लक्षात घ्यावे डिलिस्ट झालेल्या कंपनीचे शेअर्स त्यानंतर एक वर्षापर्यंत अंतिमतः मान्य केलेल्या भावाने खरेदी करण्याचे बंधन प्रवर्तकावर आहे. डिलिस्टिंग होणाऱ्या शेअर्सचा भाव सर्वसाधारणपणे वाढतो त्यापेक्षा अधिक खरेदी किंमत भागधारकांना मिळत असल्याने अशा शेअर्सवर बारकाईने लक्ष ठेवून त्यात गुंतवणूक करणे ही एक गुंतवणूक पद्धतही होऊ शकते. यात कंपनीने डिलिस्टिंग मागे घेतल्यास बाजारभाव मोठ्या प्रमाणात पडझड होऊ शकेल एवढीच जोखीम आहे.

    ©उदय पिंगळे
    अर्थ अभ्यासक
    (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य असून महारेरा सलोखा मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक असल्याची नोंद घ्यावी)

    आणखी वाचा

  • THE IKEA Effect – एकदा आत गेलेला माणूस इथून लवकर बाहेर पडत नाही

    THE IKEA Effect – एकदा आत गेलेला माणूस इथून लवकर बाहेर पडत नाही

    THE IKEA Effect – मित्रांनो Zudio मध्ये कपडे इतके स्वस्त का मिळतात किंवा डी-मार्टवाले इतक्या कमी किमतीत वस्तू विकून Profit कसा कमावतात या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती आहेच. त्यामुळे त्या जरा बाजूला ठेऊया. मार्केटमध्ये सध्या IKEA हे नाव चांगलंच गाजतंय! कमी किमतीत मिळणारं Top Quality चं फर्निचर, कितीही मोठ्या फर्निचरला आपल्याच कारमध्ये टाकून घरी नेण्याची सोय, फर्निचरचे Simple आणि Unique Designs या सगळ्या गोष्टी IKEA ने कशा मॅनेज केल्या आणि लोकांना या सगळ्या गोष्टींची चटक कशी लावली; जाणून घेऊया आजच्या लेखामध्ये!

    IKEA बद्दल तुम्हीसुद्धा कधी ना कधी ऐकलं असेलच, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी… IKEA ही जगातली सर्वात मोठी Furniture Manufacturing Company आहे, जिचा जन्म १९४३ साली स्वीडनमध्ये झाला. या कंपनीच्या नावाची स्टोरी पण मजेदार आहे. IKEA च्या I आणि K मध्ये दडलंय कंपनीच्या फाऊंडरचं नाव, म्हणजे Ingvar Kamprad (इंगवार कॅम्परड). E for Elmtaryd हे त्या फार्मचं नाव आहे, जिथं ते लहानाचे मोठे झाले आणि A for Agunnaryd जे की या फार्म जवळचं एक गाव आहे. अशा पद्धतीने बनलं ते IKEA. IKEA सुरुवातीला एकदम छोट्या Scale वर सुरु झालं होतं; पेन्सिल, पोस्ट कार्ड्स सारख्या छोट्या छोट्या गोष्टी आधी ते विकायचे. कंपनी सुरु केल्यानंतर ५ वर्षानंतर त्यांनी सुरुवात केली फर्निचर विकण्यासाठी आणि आज ४६० पेक्षा जास्त स्टोअर्सचं हे जाळं पसरलंय ६३ देशांमध्ये. 

    the-ikea-effect-everything-you-need-to-know

    कुठल्याही फेमस स्टोअरमध्ये लोकं का गर्दी करतात? तिथल्या क्वालिटीमुळे? का त्याच्या प्राईम लोकेशनमुळे? नाही. तर तिथल्या Affordable Pricing मुळे. अर्थात क्वालिटी, लोकेशन या गोष्टी Matter करतातच, पण Pricing समोर कोणती गोष्ट टिकलीये का भाऊ? IKEA Effect च्या बाबतीत सुद्धा हीच गोष्ट लागू होते. इथं मिळणारं फर्निचर हे टॉप क्वालिटीचं तर आहेच, पण त्याचसोबत ते Affordable आहे. आणि Quality आणि Affordability एकत्र आली की होतो… धमाका!

    आता येऊया यांच्या फर्निचरकडे. IKEA मध्ये आपल्याला एका सध्या चमच्यापासून ते एका रूमच्या अख्ख्या सेटअपपर्यंत सगळ्या प्रकारचं फर्निचर पाहायला मिळतं. स्टडी टेबल, स्टूल्स, लॅम्प्स, कार्पेट, डिशेस, बाऊल्स, कपाटं, सोफा, बेड, खुर्च्या,आरसे, टी-पॉय असे नाही नाही ते सगळे Product इथं पाहायला मिळतात. या सगळ्याचे डिझाइन्स, व्हरायटी, क्वालिटी आणि  सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर बघून तुम्ही यातलं एखादं तरी Product होनाही करता करता घेताच.

    फर्निचर तर घेतलं पण याची Delivery कधी मिळणार? कधी तो टेम्पो येणार? कधी त्याला आपल्या घराचा पत्ता सापडणार? बर परत फर्निचर आतमध्ये नेताना कशाला घासलं वगैरे तर? सोसायटीवाल्यांच्या नाहीतर घरात बायकोच्या शिव्या खायला लागणार! पण काळजी करू नका; असं काहीच होणार नाही. कारण हे फर्निचर तुम्ही तुमच्या कारमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. काय? तुम्हाला सुद्धा शॉक बसला असेल नाही तो वाला शॉक नाही. तर तुम्ही जे पण फर्निचर चूझ करता त्या फर्निचरला IKEA हे Dissemble करून देतं आणि इथंच येतो तो सगळ्यात महत्त्वाचा IKEA Effect. IKEA चा हा USP आहे म्हणा हवं तर.

    the-ikea-effect-everything-you-need-to-know

    आता हा IKEA Effect आपण समजून घेऊया आपल्या घराघरातल्या उदाहरणाने. समजा तुमच्या आईने तुमच्यासाठी उद्या मस्त इडली सांबार बनवण्याचा प्लॅन केलाय. तर त्यासाठी त्या माऊलीनं रात्री पीठ भिजवून ठेवलं, मग सकाळी लवकर उठून कांदा, टोमॅटो चिरून, खोबरं, कोथिंबीर घालून मस्त सांबार बनवलं. मग इडली पात्रात त्या इडल्या उकडल्या. मग एक एक इडली काढून ती तुमच्यासमोर ठेवली आणि हे सगळं करून झाल्यावर ती म्हणाली, “हूssश दमले बाबा खूप!” एवढं सगळं करून झाल्यावर इडल्या खाऊन तुम्ही तिला काय म्हणाले तर, “काय आई कशाला एवढा कुटाणा केला. मी तुला इन्स्टंट पीठ आणि इन्स्टंट सांबार मसाला आणून दिला असता ना!” खाल्ला का इन्स्टंट मार??? तर एवढं सगळं करून आई शेवटी काय म्हणाली दमले बाबा खूप! पण मित्रांनो या दमले बाबामध्येच आईचा खरा आनंद आहे, कारण हे सगळं करून तिला एक Sense of Achievement मिळतो, जो या इन्स्टंट पिठातून मिळणं कधीच शक्य नसतं. IKEA ने सुद्धा या Human Psychology ला ओळखलं आणि आपलं Furniture Dessemble करून देण्यास सुरुवात केली. ज्यामुळे झालं काय. जेव्हा Customer घरी जाऊन स्वतःच हे Furniture Assemble करायला लागला, तेव्हा त्याला एक Sense of Achievement मिळाला आणि यातूनच सुरुवात झाली IKEA च्या यशस्वी वाटचालीला.

    तुम्हाला ही आजची IKEA स्टोरी कशी वाटली आम्हाला Comment मध्ये नक्की सांगा. जर लेख आवडला असेल तर लाईक करा Channel ला Subscribe करा जेणेकरून YouTube ला, पण कळेल Market मध्ये नवीन Brand आलाय ते. आणि हो तुम्हाला अजून अशा कोणकोणत्या ब्रॅण्डच्या केस स्टडीज जाणून घ्यायला आवडतील हेही नक्की सांगा. तो पर्यंत Bye Bye.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

  • फुकट वाटा, पण उधार नको

    फुकट वाटा, पण उधार नको

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे फुकट वाटा, पण उधार नको… करायची सुरवात?

    उधारी आणि व्यवसाय याचं नातं वेगळंच आहे. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. उधार द्यायचं नाही, तर धंदा होत नाही आणि उधार दिलं तर वसूल होत नाही. उधारी देऊन नुकसान होण्यापेक्षा धंदा न करता गप्प बसलेलं काय वाईट? लोकांना फुकट वाटायला तुम्ही काय कुबेराचे नातेवाईक आहात का? उधारी देण्याच्या बदल्यात तुम्ही चिंता विकत घेता व चिंता ही चिता समान असते, जी माणसाला हळूहळू मारते. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. आपल्या हक्काचे, कामाचे पैसे दुसऱ्याकडे पडून आहेत, त्याचा वापर आपण करू शकत नाही यापेक्षा वाईट गोष्ट कोणती.   

    उधारीवर बाजारात खूप मजेशीर किस्से आहेत. “उधार एक जबरदस्त जादू है। हम उधार देंगे आज, तो कल आप गायब हो जाओगे।”, “उधार ८० साल के उपरवाले को मिलेगा, वो भी उनके माता पिता को पुछकर।”

    उधार दिल्याचे व्यवसायात फायदे आणि तोटे

    १) डोक्यात नकारात्मक विचार बंद होतात.

    २) तुम्ही सकारात्मक योजना व प्लॅनिंग करू शकता.

    ३) उधार देऊन संबध बिघडण्यापेक्षा उधारी नाकारून बिघडलेले बरे.

    ४) माल नाही खपला तर तो दानधर्म करा, पुण्य तरी मिळेल; पण उधार देऊन डोक्याला नसता ताप नको.

    ५) उधारीतून वाद म्हणजे विकतचे भांडण होऊ शकते.

    ६) उधारीमुळे बुद्धिमान, कौशल्यपूर्ण व्यावसायिक आयुष्यातून बरबाद होतो.

    ७) उधारीपुढे नुकसान झाल्यास तुमचा चांगुलपणा तुम्हालाच भोवतो व जग तुम्हालाच खुळे समजते, तुम्ही फेल बिझनेसमन आहेत असा समज होतो.

    ९) माल नाही खपला तर तो दानधर्म करीन, पुण्य तरी मिळेल पण उधार देऊन डोक्याला नसता ताप नको.

    प्रमाणाबाहेर उधारी म्हणजे व्यवसायाचा सर्वात मोठा शत्रू. “एक रूपयाच्या मार्जिनवर धंदा करेन, पण उधारीवर करणार नाही.” अशी खूणगाठ बांधा. उधारीची वही हा प्रकारच दुकानात ठेऊ नका. नंतर देतो, लिहून ठेवा; तसले काही नको. ‘माल ठेवा, पैसे असतील तेव्हा घेऊन जा.’ कोणाशी कितीही दुश्मनी असली तरी मृत्यूनंतर आपण त्यांच्या कार्यास जातो; पण उधार घेणारा कधीच येत नाही. उधारी माणसात इतके वाईट अंतर निर्माण करते.

    तुम्ही व्यवसाय करत असताना उधारीच्या समस्येला कसे हाताळता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेलला आत्ताच  सब्स्क्राइब करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

  • पैशातून पुन्हा पैसा कसा कमवायचा शिकले पाहिजे

    पैशातून पुन्हा पैसा कसा कमवायचा शिकले पाहिजे

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासुन शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे; पैशातून पुन्हा पैसा कसा कमवायचा शिकलं पाहिजे करायची सुरवात?

    एका गावात एक व्यावसायिक कुटुंब होते. तिघे भाऊ, वडील मिळून इंजिनीअरिंग स्पेअर पार्टस, हॉटेल इत्यादी व्यवसाय करत होते. गेल्या ७ ते ८ वर्षात एक्सपोर्टमधून बराच फायदा कमविला. अंदाजे १ ते ३ कोटी रुपये एका रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये गुंतविले. मुंबईजवळ काही अंतरावर रोडलगत २७ एकर शेतजमीन १८ लाख रुपये एकर दराने विकत घेतली. काही महिने प्रोजेक्टचे नियोजन करीत होते. नंतर त्यांनी ती शेतजमीन एनए करून घेतली. त्यावर व जमिनीतील अंतर्गत रस्ते हेक्टरच्या लेवलने केले, वृक्षारोपण इत्यादीसाठी अंदाजे एकरी सहा लाख खर्च आला. तो त्यांनी बँकेतून कर्ज काढून केला. प्रत्येकी २००० वर्गफुटाने प्लॉट प्रत्येकी १६ लाख दराने विक्रीस आणले व ३ बीएचके बंगलो ४० ते ५० लाख ह्या दरम्यान. अशा अनेक प्रकारच्या प्रॉपर्टीची विक्री त्यांनी सुरू केली. सुरुवातीचे काही प्लॉट खपल्यानंतर थोडे महिने विक्री बंद करून आलेले पैसे खर्च करून सर्व प्लॉटना लहान बाउंड्री हॉल, छोटे वूड हाऊस, आकर्षक एन्ट्रन्स लॉन प्रोजेक्टससाठी बनविली. खूप लहान व १५ गुंठे ओपन जागेत लॉन बनविले. प्रोजेक्ट अंतर्गत खूप छान वृक्ष लागवड केली. प्रोजेक्ट्सचे थ्रीडी प्रझेंटेशन तयार केले, पूर्ण प्रोजेक्ट तयार झाल्यानंतर कसा दिसेल याचा आकर्षक व्हिडीओ बनविला व त्यांची पुणे, मुंबई आणि इतर चांगल्या ठिकाणी जाहिरातबाजी केली. पुढे काही महिन्यात प्रॉपर्टीचे दरही वाढले होते. प्लॉट, बंगलो बघायला येणाऱ्यासाठी आकर्षक वेटिंग रूम, छोटेसे छान ऑफिस, साईटवर माहिती देण्यासाठी एमबीए झालेल्या तरुणाची नियुक्ती केली.

    २७ एकर जमिनीपैकी एनए केल्यानंतर सुमारे २२ एकर जमीन विक्रीस उपलब्ध होती व प्रत्येकी २००० वर्गफुटाचे ४४० प्लॉट विक्रीस तयार होते. म्हणजे तो प्रोजेक्ट म्हणजे ४४० गुणिले २० लाख बरोबर आठ कोटी ऐंशी लाख इतक्या किंमतीचा होता. एनए करणे, अंतर्गत रस्ते, सजावट, बाउंड्री वॉल, गार्डनिंग, फलकहाऊस, प्लॅन, मार्केटिंग, ब्रॅंडिंग, एजंटना देऊ केलेले ५% कमिशन, बँकेचे व्याज, कामगारांचा पगार इत्यादीवर १५ ते २०% खर्च त्यांनी केला होता. पाच ते सहा वर्षात हळूहळू करून सर्व प्लॉट विकले गेले. सुरुवातीचे काही प्लॉट १० लाखाने विकले व परत प्रत्येक सहा महिन्यात किंमत वाढत गेली, शेवटचे ३० ते ३५% प्लॉट २७ लाखाच्या दराने विकले गेले. सरासरी दर १८ लाखाचा राहिला. ज्या शेतकर्‍याने १८ लाख एकरी दर म्हणून जमीन विकली त्याला त्याच जमिनीला दोन गुंठ्याला १८ लाख दर केवळ ५-७ वर्षात होईल असा विचार केला नसेल.

    पैशातून पैसा कमविण्याचे हे एक उदाहरण खूप काही सांगत आहे. जमिनी विकून खायच्या की आपण उद्योजक व्हायचं हे ज्याचे त्याने ठरवावे. जसे कस्तुरीमृगाला माहीत नसते की, आपल्याकडे अत्यंत किंमती कस्तुरी आहे, तसे शेतकर्‍यांनाही माहीत नाही आपल्या जमिनीचे भविष्यातले खरे मोल काय आहे. ज्यांनी जमिनी २० लाख प्रति एकराने विकल्या तेथे आज २० लाख गुंठ्याचा दर आहे व दुर्दैव त्या मुळ जमीन मालकाकडे एक गुंठा तेथे घेण्याची ऐपत नाही. कारण बाटली, गाडी, सोन्याची चेन, राजकारण यातच त्याचे सर्व पैसे संपले.

    पैशाने पैसा वाढवायचं तंत्र तुम्ही कधी अंमलात आणलाय का? आणलं असेल तर तुमच्याकडे असणाऱ्या पैशाचे नियोजन तुम्ही कसं केल? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेल ला आताच सब्स्क्राइब करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

  • काऊंटरवर नेहमी हसतमुखाने बसा

    काऊंटरवर नेहमी हसतमुखाने बसा 

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘काऊंटरवर नेहमी हसतमुखाने बसा…’ करायची सुरवात?

    रामलाल मिठाईवाले ४० वर्षांपूर्वी अंगावरच्या कपड्यावर मुंबईत आले. दुसर्‍याच्या दुकानात हलवाईचे काम करत करत स्वतःचा धंदा सुरू केला. आज मुंबईत ५ दुकाने, ४ फ्लॅट, गाड्या सर्व काही आहे. दोन मुलं त्यांना व्यवसायात हातभार लावतात. काही दिवसांपूर्वी रामलाल याचं दुःखद निधन झालं. सांत्वन सभा पुढील रविवारी होती, त्यांच्या मोठ्या मुलाने व्हॉटसअपवर तसा निरोप सर्वांना दिला. त्यांचा लहान मुलगा काऊंटर सांभाळत होता, ग्राहकांची गर्दी होती. ख्रिसमसमुळे केक, मिठाईला चांगली मागणी होती. थोडी गर्दी कमी झाल्यावर त्यांच्या परिचयाचे एक गृहस्थ दुकानात गेले आणि म्हणाले, “बिपीनभाई पिताजी गुजर गये समजके बहुत दुःख हुआ.” तो म्हणाला; मेहमान मिलने के लिए घर मे आते रहते है, इसलिए बडा भाई घर पे है। ख्रिसमस का सीझन है, तो मै धंदा संभाल रहा हू। क्या करे शो मस्ट गो ऑन! सर जी, वो कंडोलन्स मीटिंग का मेसेज मिला क्या, हमारे समाजभवन मे है।” ते गृहस्थ म्हणाले, “हा मिल गया, चलता हूँ।”. तीन दिवसापूर्वी वडिलांचं निधन झालं, त्याचा परिणाम काऊंटरला अजिबात न जाणवू देता तो व्यवसाय चालवत होता.

    असे म्हणतात ज्या दिवशी तुम्हाला हसता येत नाही त्या दिवशी दुकान उघडू नका. ज्या दुकानदाराच्या चेहऱ्यावर हसू नसते, त्याच्या दुकानात आले की ग्राहकांना जाऊच नये असे वाटते. काऊंटर सेल्सचीसुद्धा एक विशिष्ट सायकॉलॉजी आहे. माल त्याच किंमतीचा, पण चांगल्या सेल्स मॅनेजमेंटमुळे काही दुकाने जोरदार चालतात.

    यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत. मार्केटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा उघडणारे व सगळ्यात शेवटी बंद होणारे दुकान तुमचेच हवे. देवाला सुगंधी अगरबत्ती, दिवा लावूनच काऊंटरची सुरवात करा. मद्यपान, मांसाहार केले असेल तर आंघोळ केल्याशिवाय काऊंटरला येऊ नका. गृहकलह, बायकोबरोबर भांडण, टेन्शन, आजार, तब्येत, कुणाचा मृत्यू किंवा काहीही असेल, तरी कोणत्याही परिस्थितीत त्याचा काऊंटरवर दिखावा व वाच्यता करू नका. खरंच काही अडचण असेल व तुम्हाला त्या दिवशी हसता येत नसेल, तर एकतर दुकान उघडू नका, नाहीतर तुम्ही काऊंटरला बसू नका.

    दुकानाचे सर्व शेल्फ गच्च भरलेले दाखवा व ठेवा. अर्धवट शेल्फ ग्राहकांवर अत्यंत बॅड इंम्प्रेशन टाकतात. नेहमी स्वच्छ कपडे घाला, शक्यतो पांढरे शुभ्र किंवा लाईट कलरचे शर्ट वापरा. काऊंटरवर नेहमी स्वच्छता ठेवा. दुकानातील कामगारसुध्दा नीटनेटके असावेत. गल्ल्यात सुट्टे पैसे नेहमी ठेवा. सुट्टे नसले की उगीच प्रत्येक वेळी इकडे तिकडे पळू नका. ‘छुट्टा लेके आओ’ असे ग्राहकांना म्हणू नका. नाहीतर सुट्टे आणायला जातो आणि मालही तिकडेच खरेदी करतो, तुम्ही वाट पाहत बसणार कधी येतोय म्हणून. अशा लहान लहान गोष्टीचे बारीक लक्ष व नियोजन म्हणजे ‘काऊंटर सेल्स मॅनेजमेंट’ हे लक्षात ठेवा.

    तुमचे काउंटर सांभाळताना तुम्ही या गोष्टी पाळता का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्टीचा विषय आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी
  • ज्याच्या खिशात पैसा, तिथं आणि त्यांच्यासाठीच व्यवसाय करा

    ज्याच्या खिशात पैसा, तिथं आणि त्यांच्यासाठीच व्यवसाय करा

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासुन शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे; ज्याच्या खिशात पैसा तिथं आणि त्यांच्यासाठीच व्यवसाय करा… करायची सुरुवात?

    एक अतिउत्तम जॅकेट शिवणारा व्यावसायिक होता, त्याला नेहमी प्रश्न पडायचा कि “माझे जॅकेट जेमतेम १२०० रुपयांना विकले जाते, पण अशाच दर्जाचे जॅकेट शोरूमला लोक ३००० रुपयांना विकत घेतात. असं का होत असेल? मला ती किंमत का मिळत नाही?” त्याची ही समस्या घेऊन तो व्यावसायिक सल्लागार कदमांकडं आला. तेव्हा कदमांनी त्याला मुल्ला नसरुद्दीनची गोष्ट सांगितली.

    एकदा नसरुद्दीन खूप सुंदर पगडी घालून राजवाड्यात गेला. राजाला त्याची पगडी आवडली. राजा म्हणाला, “किती रुपयांत पगडी?” नसरुद्दीन म्हणाला, “१ हजार रुपयांना.”

    हे बोलणे तेथे असलेल्या व्यापाऱ्याने ऐकले व राजाला त्याने पगडी खूप महाग असल्याचे सांगितले.

    राजा म्हणाला, “पगडी खूप महाग आहे.” त्यावर नसरुद्दीन म्हणाला, “ही पगडी बनवायला किती खर्च आला आहे यावरच त्यांची किंमत ठरविली आहे व इतकी चांगली पगडी १ हजार रुपयांना केवळ राजाच घेवू शकतो, गोरगरीबांना ती परवडणारी नाही.”

    ह्या वाक्याने राजा खुश झाला व त्याने ताबडतोब १ हजार रुपये देऊन पगडी घेतली. बाहेर आल्यानंतर नसरुद्दीन त्या व्यापाऱ्याला म्हणाला, “तुला ह्या पगडीची किंमत माहीत असेल, पण राजाची प्रशंसा आणि त्याला खुश करण्याची किंमत काय मिळते, हे मला माहीत आहे.”

    मित्रहो, आपल्या उत्पादनाला जर चांगली किंमत मिळवायची असेल, तर आपले उत्पादन ज्याच्या खिशात पैसा आहे, त्यालाच विकण्याचा प्रयत्न करावा. दळभद्री लोकांच्या नादी लागू नये. तसेच कोणताही माणूस हा प्रशंसा व मानसन्मानाचा भुकेला असतो. त्यामुळे ग्राहकांची प्रशंसा करायला विसरू नये. तुमच्या उत्पादनाची किंमत ते तुम्ही कुणाला व कशा पद्धतीने विकता यावर अवलंबून आहे. जलद विचार करून ते आपले विचार दुसऱ्याच्या गळी उतरवता आले पाहिजे.

    तुम्ही तुमचे उत्पादन कशा प्रकारे विकता? उत्पादन विकताना काही ठराविक मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा उपयोग करता का? करत असाल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेलला आताच सब्स्क्राइब करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

  • हिशोब लागण्यासाठी तो ठेवावा लागतो

    हिशोब लागण्यासाठी तो ठेवावा लागतो

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘हिशोब लागण्यासाठी तो ठेवावा लागतो !’ करायची सुरवात?

    एका व्यापाऱ्याने बिझिनेस एक्सपर्ट असणाऱ्या कदमांना एक प्रश्न विचारला. मी संगमनेरवरून आहे. मी डाळिंब ट्रेडिंग व्यवसाय चालू केला. १५ ते १८% मार्जिन आहे. आता वर्ष झाले. धंदा होतोय पण पैसा कुठून आला व कुठे गेला कळतच नाही. बँकेचं कर्जही लाखांचे आहे. काहीच ताळमेळ लागेना, काय करावे?

    यावर कदम त्याला म्हणाले, “खर्च झाल्याचं दु:ख नाही, पण हिशोब लागत नाही याचं वाईट वाटतं.” नवीन व्यवसाय सुरू केल्यावर अनेकांचं असंच होतं. हातात अचानक पैसा खेळायला लागतो. पूर्वी कटिंग चहा पिणारा पण, हॉटेलात बसून सहज ५०० रुपये खर्च करतो. मुलांना १०० ऐवजी ५००चे खेळणे घेतो. इकडे तिकडे वायफळ पैसे खर्च होत राहतात. शेवटी इकडची तिकडची उधारी, बंकेचं कर्ज असं सगळं वाढत जात. बिझनेसमध्ये कॅश फ्लो आहे तोपर्यंत काही वाटत नाही, राहणीमान आपोआप उच्च होत राहतं, खर्च होत राहतो.

    बिझनेसमधले पैसे व वैयक्तिक वापराचे पैसे यातील फरक तोटा झाल्यावर कळतो. दुकानाच्या गल्ल्यातील दहा हजारांपैकी आपले ५००च आहेत हे समजायला नवख्या व्यावसायिकाला वेळ लागतो, तोपर्यंत ५-१० लाख तोटा झालेला असतो. हिशोब म्हणजेच अकाऊंटिंग हा कोणत्याही व्यवसायातील सगळ्यात महत्वाचा भाग आहे, ज्याकडे बरेच व्यावसायिक दुर्लक्ष करतात. व्यवसायाची सुरुवात सकाळी अकाऊंटची वही उघडून व सायंकाळी दुकान बंद करताना दिवसभरचा ताळेबंद मांडूनच व्हायला हवी, नाहीतर वर्षाच्या शेवटी डोळे उघडून काही उपयोग नाही. ह्याचे एवढे येणे बाकी व त्याचे तेवढे देणे बाकी. गल्ल्यात ठणठण गोपाळ आणि वहीत लाखोंचा फायदा अशी गत. हिशोबाची वही काय फक्त पुजण्यासाठी घेतली का? पैशाचा हिशोब रोजच्या रोज हवा व त्याचं रोजचं नियंत्रण हवे, अन्यथा नुकसान होऊन पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय नाही.

    Behind every good Business, there is a great accountant. यशस्वी व कर्त्या पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, जिला आपण संसाराची ‘अर्थमंत्री’ म्हणतो. म्हणजेच ती चांगली accountant असते. महिना तीन किलो तेल, पाच किलो साखर लागते, तर त्यातच बरोबर घर चालविते आणि असेच घर पुढे जाते. त्यामुळे तुम्हीसुद्धा हिशोब ठेवलात तर लागेल, नाहीतर फक्त पश्चाताप करावा लागेल.

    तुम्ही रोजचा हिशोब ठेवताय ना? हिशोब न ठेवण्यामुळे तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या आहेत? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

  • बिल गेट्स का म्हणतात, शेवटच्या क्षणी काम करण्याची सवय घातक!

    बिल गेट्स का म्हणतात, शेवटच्या क्षणी काम करण्याची सवय घातक!

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासुन शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे; बिल गेट्स का म्हणतात, ‘शेवटच्या क्षणी काम करण्याची सवय घातक! करायची का सुरुवात?’

    अमेरिकेतल्या एका भाषणात बिल गेट्स यांनी हा किस्सा सांगितला होता. स्वतःच्याच भयंकर वाईट सवयीचा. ते सांगतात की, मी काम चांगलं करायचो, पण सगळी कामं शेवटच्या मिनिटार्पयत तंगवून ठेवायचो. वेळ संपत आली, की मग धावतपळत काम करायचो. माझं काम चांगलं व्हायचं, पण त्या कामाचा मला आनंद होत नसे. दुसरं म्हणजे कुणीही त्या कामाचं काही कौतुक करीत नसे. मग वाटायचं की, हे काय, आपण इतकं काम करतो, चांगलं करतो तरी कुणाला त्याचं काही विशेष वाटत नाही. हा खेद एकीकडे आणि दुसरीकडे ते काम करताना येणारा ताण, काम चांगलं करण्यापेक्षा ते वेळेत करण्याचंच टेन्शन मग वाढत जायचं. इतकं वाढायचं की, काम पूर्ण झाल्यावर सुटलो एकदाचा असं वाटायचं.

    नंतर नंतर माझ्या लक्षात यायला लागलं, की आपल्याला ही वाईट सवय सोडावी लागेल. आपल्याला काम करायचं असतं, ते आपल्याला आवडतं, जमतंही. मग शेवटच्या क्षणापर्यंत ते काम टोलवत कशाला राहायचं? मग प्रयत्न करून मी ती सवय मोडली.

    हीच गोष्ट आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत तंतोतंत खरी असते. आपण कामचुकार नसतो, काम टाळतही नसतो, पण शेवटच्या क्षणापर्यंत ते काम लटकवून ठेवतो आणि मग धावतपळत कसंबसं ते पूर्ण करतो.

    ही सवय तोडण्याचंही अवघड काम जमवलं तर जमू शकतं. ते कसं जमेल याचं उत्तरही, बिल गेट्सच देतात.

    ते म्हणतात, की सकाळी फक्त 15 मिनिटं मी कागद, पेन घेऊन बसायला लागलो. जी कामं त्या दिवशी होणं गरजेचीच आहे, ती आधी करतो. मग बाकीची. ऐनवेळी दुसरं कितीही तातडीचं काम आलं तरी, जे आधी करायचं काम असतं, त्याला वेळ देतोच. हळूहळू हे प्लॅनिंग जमतं.

    जे त्यांना जमलं ते आपल्यालाही जमू शकेल. मुद्दा इतकाच की, आपण ते करणार का? की अगदी आपल्या करिअरच्या, यशाच्या जिवावर बेतेल इतपत उशीर होईर्पयत ही सवय लांबवत नेणार? यावर तुमचं मत काय आम्हाला कॉमेंट नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी
  • १. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा – यवतमाळ

    १. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा – यवतमाळ

    आपण प्रत्येक जिल्ह्याचे उद्योग पाहण्याआधी त्यातील रस्ते, नैसर्गिक साधनसंपत्ती, नद्या, पाणीपुरवठा, वीज निर्मिती, दळणवळणाच्या इतर सोयी सुविधा यांचा बारकाईने अभ्यास करणार आहोत. कारण या प्रत्येक गोष्टींचा व्यवसायात अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो. त्यानंतर त्या-त्या जिल्ह्यात चालणारे उद्योग व नवीन उद्योग निर्मितीला असणारा scope याविषयी आपण चर्चा करणार आहोत. व शेवटी त्या जिल्ह्यातील आता सध्याच्या घडीला असणारे यशस्वी उद्योजक कोण आहेत. याबद्दल चर्चा करणार आहोत.

    download

    नॉर्थ-साऊथ कॉरिडोर हा राष्ट्रीय महामार्ग (National Highway -07) या जिल्ह्यातून जातो. त्यामुळे भारताच्या उत्तरेकडील राज्यांपासून ते थेट दक्षिणेकडील राज्यांना यवतमाळ जिल्हा जोडला गेला आहे. या मार्गावर पांढरकवडा हे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने इतर जिल्ह्याच्या तुलनेत यवतमाळ मधून रस्ते वाहतूक ही अतिशय सोपी झालेली आहे. पूर्ण भारताला दक्षिणोत्तर जोडणारा नॉर्थ-साऊथ कॉरिडोर महाराष्ट्राच्या नागपूर-वर्धा-यवतमाळ या तीन जिल्ह्यातून जातो. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर-नागपूर (National Highway – NH204) उमरखेड-आर्णी-यवतमाळ-कळंब या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडतो. या मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र-मराठवाडा व विदर्भ एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे जवळजवळ अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र राज्यात रस्त्याने व्यवसायजोडणी शक्य आहे.

    पैनगंगा नदी ही यवतमाळ जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पैनगंगा नदी यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरुन वाहते. पैनगंगा नदीच्या उपनद्या या जिल्ह्याच्या अंतर्गत भागातून वाहत येऊन पैनगंगा नदीला मिळतात. पैनगंगा व तिच्या उपनद्यातून होणारा पाणीपुरवठा हा या जिल्ह्यातील पाण्याचा स्रोत आहे. पावसाचे प्रमाण हे कमी असून परतीचा मान्सून यवतमाळ जिल्ह्यात जोरदार बरसतो. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. येथील जास्तीत जास्त लोकजीवन हे शेतीवर अवलंबवून आहे. पाणीपुरवठ्याच्या तशा कोणत्याही ठळक योजना या जिल्ह्यासाठी उपलब्ध नाहीत.

    esakal 2021 08 d9b090ca 3d69 4cc7 b2b0 9704c85c2b5c Cotton Field

    नेर, बाभूळगाव, कळंब, राळेगाव, दिग्रस, दारव्हा, पुसद, महागाव, उमरखेड, घाटंजी, पांढरकवडा, मारेगाव, झरी जामणी हे यवतमाळ जिल्ह्यातील तालुके आहेत. लघुद्योगाच्या मोठ्या प्रमाणावर वाढीसाठी यवतमाळ जिल्ह्यात पोषक वातावरण आहे. या जिल्ह्यात अकुशल कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र या जिल्ह्यातील लोकांची शिकण्याची वृत्ती ही फार चांगली आहे. शिक्षणासाठी मोठमोठ्या शैक्षणिक संस्था (काही तुरळक संस्था वगळून) या जिल्ह्यात नाहीत. गुणग्रहणाची उत्तम क्षमता या जिल्ह्यातील लोकांजवळ आहे. याशिवाय येथील तरुण शारीरिक क्षमतेने चांगले असल्याने त्यांच्यातील कलागुण ओळखून त्याच्या वाढीसाठी वाव मिळाला तर देशासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू या जिल्ह्यातून निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. आजवर क्षमता असून ही त्या गुणांना पैलू न पाडल्यामुळे आपला ठसा उमटवण्यात अपयशी ठरल्याचे पाहून खंत वाटते.

    आर्थिक उत्पन्नाचे स्रोत सुध्दा कमी आहेत. त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची हुनर इथल्या माणसांमध्ये आहे. आयटी, manufacturing हे उद्योग वाढण्याच्या आधी शेतीपूरक उद्योग वाढीस लावण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील मोठे खाद्यान्नाचे ब्रँड तयार करण्याची क्षमता यवतमाळ जिल्ह्याची आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन करत असल्याने या जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा ही ओळख प्राप्त झाली आहे. मात्र कापसावर प्रक्रिया करणारी मोठी केंद्रे या जिल्ह्यात नाहीत. त्यामुळे जिल्ह्याची आर्थिक बाजू तशी फार भक्कम होताना दिसत नाही. उत्तरेकडे आता कापसावर प्रक्रिया करणारा एक मोठा प्रकल्प अमरावती मध्ये निर्माण होत आहे. त्याचा फायदा यवतमाळला होऊ शकतो. शेती, सेवा, शेतीपूरक उद्योग, हातमाग, यंत्रमाग, आयटी, शिक्षण, बँकिंग व manufacturing उद्योग येणाऱ्या काळात या जिल्ह्यात वाढणार आहेत. तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत स्वतःची ओळख जपत हा जिल्हा लवकरच समृध्दीचे उद्दिष्ट साध्य करेल याची खात्री वाटते. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मुंबई याठिकाणी व्यवसाय करण्याऐवजी यवतमाळ नवीन व्यवसाय उभारणे ही सोपी प्रक्रिया आहे. निर्माण होणारी उत्पादने नागपूरच्या बाजारपेठेत विकण्यासाठी सोयीस्कर आहे. विज्ञानाच्या प्रगतीने जग जवळ आले आहे. त्यामुळे जगभरात सर्वत्र ही उत्पादने विकली जाऊ शकतात.

    पुढील जिल्हा – वाशिम

  • आपण गधा मजुरी तर करत नाही ना?

    आपण गधा मजुरी तर करत नाही ना?

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘आपण गधा मजुरी तर करत नाही ना?’ करायची सुरवात?

    बँकेचे २० लाखांचे कर्ज काढले, महिना ३० हजार हप्ता… दुकान भाड्याने घेतले… ४ कामगार ठेवले, त्यांचा पगार ३० हजार रुपये… सर्व प्रकारचे कर महिना जवळपास १० हजार… वीजबिल, प्रवास इत्यादी किरकोळ खर्च ५ ते १० हजार… ईएमआयवर फ्लॅट व गाडी घेतली आहे, त्याचा हप्ता महिना १५ हजार जातो… शेवटी व्यवसायातून स्वतःसाठी व घरखर्चासाठी राहतात फक्त काही हजार रुपये… अशीच आहे आज असंख्य व्यावसायिकांची स्थिती… यालाच म्हणतात गधा मजुरी! व्यवसाय स्वतःच्या फायद्यासाठी करतो की इतरांना पैसे वाटण्यासाठी हेच कळत नाही. वैयक्तिक जेवढा फायदा कमावता, त्यापेक्षा जास्त बँकेचे व्याज देता, दुकानाचे भाडे त्यापेक्षा जास्त देता, कामगारांना पगार त्यापेक्षा जास्त देता, असे का होते?

    याची काही मुख्य कारणे आहेत. एक म्हणजे मार्केट साईज व ट्रेंडचा विचार न करता भला मोठा व्यवसाय सुरू केलेला असतो, नंतर म्हणावा तेवढा व्यवसाय होत नाही, त्यामुळे आता करायचं काय, बंदही करता येत नाही व जोरातही चालत नाही. स्वतःचं मन स्वत:ला सतत खात असतं. वरुन दिसणारे कित्येक मोठे व्यावसायिक ह्यामुळे आतून दु:खी असतात. दुसरे म्हणजे मार्केटिंग, ब्रॅंडिंग व व्यवस्थापनात कमी पडलेले असतात. दुकान किंवा नवीन व्यवसाय टाकला म्हणजे ग्राहक लगेच उद्यापासून आपल्या दुकानात येऊ लागतील असं होत नसतं राजाहो…! ज्यांच्याकडे शंभर फुटसुध्दा दुकान नाही, ते लाखो करोडोचा व्यवसाय करत आहेत तर ज्यांची करोडोची दुकाने, लाखोंचे फर्निचर केले आहे ते सध्या माशा मारत बसले आहेत. त्यामुळे व्यवसायात उतरताना मागचा पुढचा विचार करूनच उतरा. सुरुवातीलाच लगेच  अनावश्यक खर्च ओढवून घेऊ नका. नाहीतर सगळी कमाई त्यातच जाईल. एवढी मेहनत करूनसुद्धा हातात काहीच राहणार नाही.

    तुम्ही तुमच्या व्यवसायात पैशाचं नियोजन कसं करताय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी