Author: Navi Arthkranti

  • तुमचा बिझनेस हा नेहमी Updated असणं गरजेचं आहे.

    तुमचा बिझनेस हा नेहमी Updated असणं गरजेचं आहे.

    व्यवसाय! हा शब्द उच्चारला की संपूर्ण सोशल मीडिया पटकन डोळ्यासमोरून तरळून जातो. व्यवसाय असा करा, तसा करा, तुम्ही अमकं केलं पाहिजे, तमकं केलं पाहिजे. अशा सतरा गोष्टी आणि या गोष्टी सांगणारे अठरा गुरु.

    खरं सांगायचं झालं तर बिझनेस शिकवून किंवा वाचून शिकता येत नाही. तो करताना येणारे अनुभव आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जातात. अत्यंत समर्पित वृत्तीने झोकून देऊन बिझनेससाठी आपण मेहनत घेतली पाहिजे. बिझनेसची संपूर्ण रचना आणि व्यवस्था यावर नीट अभ्यास करून शुभारंभ केला की मागे वळून पाहण्याची गरज नाही.

    जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात बिझनेस सुरू करता, तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळात तुमचा चांगला जम बसलेला असतो. तुम्ही मन लावून आणि लक्ष देऊन सगळ्या गोष्टी करत असता, पण जेव्हा तुमचा बिझनेस ग्रो होतो आणि तुम्हाला सगळेजण एक यशस्वी बिझनेसमन म्हणून बघायला लागतात, तेव्हा नेमकं असं होतं की; आपल्या बिझनेसपेक्षा आपण बाकीच्या गोष्टींवर जास्त लक्ष देतो. ते म्हणतात ना, यश मिळवण्यापेक्षा यश टिकवणं फार जास्त अवघड असते. अगदी याच म्हणीप्रमाणे बिझनेसचा जम बसायला लागल्यानंतर आपले लक्ष विचलित होते आणि कळत नकळत आपण रोज वेगवेगळ्या चुका करायला लागतो. या चुका जेव्हा एक मर्यादा गाठतात, तेव्हा तुमच्या बिझनेसला उतरती कळा लागली म्हणून समजा.

    नेमकं याच विषयावर आपण या लेखामध्ये बोलणार आहोत. तुम्ही जेव्हा नुकताच बिझनेस सुरु केलेला असतो, तेव्हा तो तुमच्या ग्राहकांसाठीही नवीन असतो. अशावेळी तुमची आणि तुमच्या प्रॉडक्टची त्यांना आणि त्यांची तुम्हाला नुकतीच ओळख झालेली असते. सगळं नवीन नवीन असताना दोन्हीकडून समजुतदारपणा दाखवला जातो. पण जेव्हा हा सगळा नवा काळ ओसरून जातो, खरी मजा तेव्हा सुरु होते. बिझनेसमध्ये तोचतोचपणा येऊ नये यासाठी तुमची कसरत सुरु होते. त्यामधीलच एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रॉडक्टचा दर्जा कायम टिकवून ठेवणे.

    उदाहरण म्हणून आपण एक गोष्ट घेऊ. गोपाळला खाद्यपदार्थांचा भलताच नाद होता. एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ तो नेहमीच सर्वांसाठी बनवायचा. हळूहळू त्याचे हे पदार्थ त्याच्या नातेवाईकांमध्ये बरेच लोकप्रिय झाले आणि त्यासोबत गोपाळसुद्धा लोकप्रिय होऊ लागला. अशातच त्याच्या सर्व मित्रांनी त्याला इडलीचा व्यवसाय सुरु करण्याचा आग्रह केला. स्वतःचे हे नवे स्वप्न आणि थोडाफार अनुभव घेऊन इडलीच्या व्यवसायात गोपाळने एन्ट्री केली. बघता बघता त्याचा व्यवसाय त्याच्या हाताच्या उत्कृष्ट चवीमुळे सर्वदूर प्रसिद्ध झाला. ज्यामुळे त्याच्याकडे ग्राहकांची संख्या प्रचंड वाढू लागली आणि त्याच्यावर कामाचा ताण वाढू लागला. या वाढत्या गर्दीबरोबर त्याने त्याच्या सोबतीला कामासाठी कोणीच व्यक्ती ठेवली नसल्यामुळे इडलीच्या चवीवर, सर्व्हिसवर प्रचंड परिणाम होऊ लागला. ज्यामुळे त्याचा व्यवसाय पूर्णपणे मोडकळीस आला.

    गोपाळच्या या गोष्टीवरून आपण काय शिकलो? कळत नकळत चुका होत जातात, वेळीच त्या सुधारल्या जात नाहीत, त्याकडे पाहिलं जात नाही आणि या दुर्लक्षामुळे व्यवसाय कोलमडून पडू शकतो. म्हणजेच काय व्यवसायाची सुरुवात झाल्यांनतर एकदा जम बसला की त्याकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी गरजेनुसार जे बदल करणे महत्वाचे आहे, त्याकडे व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे.

    गोपाळचे उदाहरण घेतले, तर नेमक्या कोणत्या चुका झाल्या ते आपण पाहूया. जेव्हा तुमचा बिझनेस वेगाने प्रगती करत असतो, तेव्हा बिझनेसच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अनेक प्रकारचे बदल अपेक्षित असतात, हे बदल करत असताना बिझनेसच्या प्रॉडक्टवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते. गरजेनुसार मनुष्यबळ वाढवणे, कामाची रचना नीट लावणे, सर्व कामं शिस्तीने पूर्ण होत आहेत ना याकडे लक्ष देणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःहून वैयक्तिकपणे याकडे नीट लक्ष देणे. हे सगळं जमून आलं की, दर्जा टिकून राहतो आणि ग्राहकांचा उत्साहदेखील.

    थोडक्यात काय, तर तुमचा बिझनेस हा नेहमी updated असणे गरजेचे आहे. तुम्हाला काय वाटतं व्यावसायिक म्हणून किंवा ग्राहक म्हणून अजून कोणते बदल तुमच्या दृष्टीने करणे गरजेचे आहे. आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

  • आधुनिक शेती – Modern Agriculture

    आधुनिक शेती – Modern Agriculture

    Modern Agriculture – मित्रांनो, आपल्या रोजच्या जगण्यात सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत जवळपास सगळ्याच पदार्थांमध्ये कांदा असतो. भारतीयांच्या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. संपूर्ण भारतात कांदा पिकविणाऱ्या राज्‍यात, क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत, महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे एक लाख हेक्‍टरवर कांद्याची लागवड केली जाते. यामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर, सातारा हे जिल्‍हे हेक्‍टरी कांदा पिकविण्‍याबाबत प्रसिध्‍द आहेत. तसेच मराठवाडा, विदर्भ व कोकणात सुध्‍दा काही जिल्‍हयांमध्‍ये कांद्याची लागवड केली जाते.

    नाशिक जिल्‍हा हा महाराष्‍ट्रात नव्‍हे तर सबंध भारतात कांदा पिकविण्‍यात प्रसिध्‍द आहे. एकूण उत्‍पादनापैकी महाराष्‍ट्रातील 37 टक्‍के तर भारतातील 10 टक्‍के कांद्याचे उत्‍पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात घेतले जाते. साहजिकच येथे कांद्याचे उत्पादन घेताना पेरणी, काढणी आणि कापणी अशा प्रक्रियांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज भासते. सध्याच्या काळात मजुरांची वाढती मजुरी बघता नक्की त्यांना काम द्यावं का? अशी समस्या सर्व शेतकरी बांधवांसमोर उभी राहिली आहे. शेतकऱ्यांच्या याच समस्येला दूर करण्यसाठी म्हणून की काय नाशिक जिल्हाच्या चांदवड तालुक्यातील तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या मुलांनी कांदा काढणी व पात कापणी यंत्राचा यशस्वी प्रयोग केला आहे. श्रम, वेळ आणि खर्च या तीनही गोष्टी कमी करण्यासाठी या यंत्राचा चांगलाच वापर होणार आहे. 

    कांदा काढणीच्या वेळेस अनेकदा विळा लागून इजा होण्याचा धोका असतो. या गोष्टींचा विचार करून या विद्यार्थ्यांनी उन्हाळी कांद्यासाठी उपयोगी ठरेल असे नावीन्यपूर्ण व स्वयंचलित कांदा काढणी व पात कापणी यंत्र विकसित केले आहे. सागर ऐशी, पंकज पवार, दुर्गेश भामरे व लोकेश देवरे हे चौघे विद्यार्थी कळवण, सटाणा व देवळा तालुक्यांतील आहेत. जन्मच शेतकरी कुटुंबातला असल्याने लहानपणापासूनच त्यांना शेतीतील समस्या जवळून माहित होत्या. यंत्रनिर्मितीसाठी हा महत्त्वाचा घटक होता. तांत्रिक ज्ञानासह त्यांनी विविध शोधनिबंधांचा अभ्यास केला. कांदा पात यंत्र तयार झाले, पण त्यात काही त्रुटी होत्या. मग योग्य अंतरावर कापणी, पात व कांदा विलगीकरण यात काही बदल करून शेवटी बुद्धी कौशल्य, संशोधकवृत्ती अथक प्रयत्नांतून स्वयंचलित पद्धतीचे कांदा पात कापणी (ओनियन लीफ कटर) यंत्र विकसित करण्यात त्यांना यश आले.

    यंत्राची रचना आणि काढणी-कापणी प्रक्रिया

    – दोन मिलिमीटर जाडी व ३ X १.५ इंच आकाराच्या एमएस पाइपवर आधारित आर्क वेल्डिंगच्या साह्याने सांगाडा निर्मिती केली गेली.

    – सांगाडा वाहतुकीसाठी मागील बाजूस १४ इंच आकार परिघाच्या दोन चाकांना जोडून पुढील भागात आधारासाठी बोल्टच्या आधारे स्टँड लावण्यात आलं.

    – शेतातून पातीसहित काढणी केलेले कांदे यंत्राच्या मागील भागात वरील बाजूस हॉपरमध्ये टाकले जातात. हे हॉपर एक मिमी शीट मेटलद्वारे तयार करण्यात आलंय. तसेच यात एकावेळी क्रेटभर पातीसहित कांदे टाकता येतात.

    – हे कांदे यंत्राद्वारे पुढे जाण्यासाठी कन्व्हेअर सिस्टीम आहे. त्यासाठी जीआय शीटचा वापर केला गेलाय.

    – या यंत्रणेतून पुढे आलेले कांदे, कापणीसाठी पातीसहित जाण्यासाठी वर्तुळाकार स्लॉटेड रोटर रचना केली आहे. त्यात एकूण २८ ओळी आणि प्रत्येक ओळीत ९ स्लॉट्‍स आहेत. असे एकूण २५२ चौकोनी स्लॉट्‍स यात आहेत.

    – या यंत्रणेद्वारे कांदा स्लॉटमध्ये तर पात वर उभी असते. रोटर फिरल्यानंतर पात कटरच्या संपर्कात येऊन योग्य अंतरावर कांद्याच्या मानेजवळ कापली जाते. व्यवस्थित कापणी व्हावी म्हणून हार्ड मेटल स्टीलचा कटर वापरला आहे.

    – एकदा कांद्यापासून पात बाजूला झाली तर कापला गेलेला कांदा एका भांड्यात जाऊन पडतो.

    – कन्व्हेअर आणि रोटरच्या गतीवर नियंत्रण व सुसंगतता ठेवण्यासाठी गिअर बॉक्स व वेगवेगळ्या आकाराच्या पुलीचा वापरसुद्धा यात केला गेला आहे.

    – या यंत्राच्या वापरासाठी सिंगल फेज वीजपुरवठा आवश्यक आहे.

    – हे यंत्र तसं ६२ हजार रुपयांत तयार झालंय, पण त्याचा एकूण निर्मिती खर्च धरल्यास ही किंमत ९० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते.

    यंत्राचे फायदे

    – तासाला १० क्विंटल कांदा प्रक्रिया करण्याची यंत्राची क्षमता असल्याने वेळ, मजुरी आणि खर्चात बचत होते.

    – या यंत्राला चाके असल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणंसुद्धा शक्य आहे.

    –  या यंत्राची हाताळणी ही प्रत्येक शेतकऱ्याच्या दृष्टीने सुलभ व सुरक्षित करण्यात आलेली आहे.

    – तसेच हे यंत्र पर्यावरणपूरक व प्रदूषण विरहित आहे.

    आता हे यंत्र बाजारात कधी येतंय आणि ते सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहचतंय हे पाहणं औस्तुक्याचं ठरेल.

    अशा या आधुनिक शेती – Modern Agriculture ची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. हा लेख जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि नवी अर्थक्रांतीच्या यू ट्यूब चॅनलला आत्ताच subscribe करा.


    आणखी वाचा

  • मतिमंद म्हणून शाळेतून काढून टाकलं, तोच मुलगा जगातील सर्वात मोठा संशोधक बनला

    मतिमंद म्हणून शाळेतून काढून टाकलं, तोच मुलगा जगातील सर्वात मोठा संशोधक बनला

    मेहनत करूनही यश मिळत नाही म्हणून प्रयत्न सोडून देणारे जगात अनेकजण आहेत, पण आज आपण ज्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत ते व्यक्तिमत्व इतकं महान आहे, की हजारहून अधिक वेळा आपले प्रयत्न चुकले, तरी त्यात सातत्य ठेवून त्याने अखेरीस विजेच्या बल्बचा शोध लावला. लहानपणी ज्याला मतिमंद म्हणून शाळेतून काढून टाकलं, पण आज त्याच्या नावावर १०९३ पेटंट आहेत अशा त्या महान व्यक्तिमत्वाचं नाव आहे थॉमस अल्वा एडिसन.

    नमस्कार! नवी अर्थक्रांतीमध्ये आपलं स्वागत आहे… स्टार्टअप आणि उद्योग क्षेत्रातील रंजक आणि उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत.

    अमेरिकेतील ओहियो राज्यामधील मिलान या गावात सॅम्युअल आणि नॅन्सी नावाचे दाम्पत्य राहात होते. सॅम्युअल दुकानात काम करत, तर नॅन्सी घरी शिकवणी घेऊन संसाराला हातभार लावत असे. ११ फेब्रुवारी १८४७ रोजी या दाम्पत्याच्या पोटी एडिसनचा जन्म झ़ाला. लहानपणापासूनच एडिसनला प्रत्येक गोष्टीच कुतूहल होतं. एडिसनने एकदा आपल्या आईला विचारलं कि, ‘पक्षी हवेत का उडतात?’ यावर तिने सांगितलं कि, ‘ते किडे खातात ना, त्यामुळं हवेत उडतात.’ यावर एडिसन बागेत गेला. त्याने अनेक किडे जमा केले, त्याचा घोळ बनवला आणि आपल्या मित्राला म्हणाला की, ‘हे पिलं कि तू हवेत उडशील.’ त्याचा मित्र ते प्याला. तो हवेत काय उडाला नाही, पण एडिसनला दिवसा तारे मात्र नक्की दिसले. आपल्या कुतुहलामुळं असे अनेक वेडेवाकडे प्रश्न एडिसन विचारायचा. त्यामुळं त्याला सगळे निर्बुद्ध आणि मतिमंद म्हणायचे.

    शाळेतून येताना एकदा एडिसन शिक्षकांची एक चिट्ठी घेऊन आला. जी त्याने आपल्या आईला दिली. ती वाचून त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. एडिसनने जेव्हा आपल्या आईला विचारलं की यात काय लिहिलंय, तेव्हा त्याची आई म्हणाली, त्यांनी लिहिलेलं आहे की, ‘तुमचा मुलगा खूप हुशार आहे. तो एक विद्वान आहे आणि आमची शाळा आणि शिक्षक त्याला शिकवण्यात कमी पडत आहेत.’ तेव्हापासून पुढं एडिसनचं घरातच शिक्षण चालू झालं. त्याची आई त्याला अनेक पुस्तक आणून द्यायची आणि एक पुस्तक वाचलं कि त्याला पैसे मिळायचे. एडिसन विज्ञानाची अनेक पुस्तकं वाचू लागला. त्यानं आपल्या घरातच एक लहान प्रयोगशाळा चालू केली. तो तिथं अनेक प्रयोग करू लागला. रसायनं घ्यायला पैसे कमी पडत, म्हणून तो पेपर टाकत असे, रेल्वेमध्ये चॉकलेट गोळ्या विकत असे. घरातील त्याच्या उपद्व्यापामुळे घरचे वैतागले. त्याच्या आईने चिडून त्याची प्रयोगशाळाच बंद केली. नंतर त्यानं रेल्वेच्या एका लहान डब्यात आपले प्रयोग चालू केले. तिथं देखील एक अपघात घडला आणि त्याच्या एका रसायनामुळं डब्याला आग लागली. यावर रेल्वेच्या टिसीने एडिसनच्या इतक्या जोरात कानफटात वाजवली कि, तेव्हापासून एडिसनला कमी ऐकू यायला लागलं. पुढं जेव्हा त्याला यावर प्रश्न विचारला. तेव्हा याकडं देखील सकारात्मक पाहत एडिसन म्हणाले कि, ‘बरं झालं मला कमी ऐकू येतं. त्यामुळे मला वायफळ बडबड ऐकून घ्यावी लागत नाही आणि माझं लक्ष फक्त कामावर असतं.’

    हार न मानता लहान एडिसनने त्याचे प्रयोग चालू ठेवले. अशातच एकदा रेल्वेखाली येणाऱ्या एका लहान मुलाचा जीव एडिसनने वाचवला. तो लहान मुलगा स्टेशनमास्तर मॅकेंझीचा होता. याचं बक्षिस म्हणून त्याने एडिसनला टेलिग्राफ ऑपरेटिंग शिकवले. १५ वर्षाचा एडिसन टेलिग्राफ ऑपरेटर म्हणून काम करू लागला आणि सोबतच आपले प्रयोगही. दिवसभर प्रयोगात दंग असल्यामुळे त्याला रात्री झोप येई, म्हणून त्याने टेलिग्राफलाच घड्याळ बसवले. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी.

    घरची परिस्थिती बिघडत चालली होती वडिलांची नोकरी सुटली, आई आजारी. यामुळं घरची आर्थिक जबाबदारी पेलण्यासाठी एडिसन बोस्टनला आला आणि वेस्टर्न युनियन कंपणीमध्ये नोकरी करू लागला. १८६९ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी तो न्यूयॉर्क मध्ये आला. तिथं त्यानं आपला पहिला यशस्वी प्रयोग केला युनिवर्सल स्टोक प्रिंटर बनवण्याचा. त्याने जेव्हा तो विकायचा ठरवलं तेव्हा त्याची किंमत ४हजार डॉलर्स लावली, पण एडिसनचा तो अविष्कार एक अमेरिकन माणसाने चक्क ४० हजार डॉलर्सला विकत घेतला. आता मात्र एडिसनकडे आपली स्वतःची प्रयोगशाळा उभारण्यासाठी पुरेसे पैसे होते.

    या प्रयोगशाळेत त्यांनी अनेक प्रयोग केले. त्यांने ग्रामोफोनचा शोध लावला. त्याकाळी गाणी ऐकण्यासाठी वापरलं जाणारं हे मशीन अल्पावधीतच लोकप्रिय झालं. एडिसनचं पहिलं प्रेम इलेक्ट्रिसिटी होतं. खरंतर इलेक्ट्रिकं बल्बचा शोध वोडवॉर्ड आणि इवान यांनी लावला, पण अपुऱ्या पैशामुळं त्यांना तो पुढं नेता आला नाही. एडिसनने त्यांच्याकडून या साठीचे सगळे हक्क खरेदी केले आणि आपल्या प्रयोगशाळेत तो याचे प्रयोग करू लागला. अखेरीस २१ ऑक्टोबर १८७९ मध्ये दिवसभर म्हणजे जवळपास १३ तास चालणारा बल्ब बनवण्यात एडिसनला यश मिळालं. त्याचा हा अविष्कार पहाण्यासाठी माणसं येऊ लागली.

    त्यांनी नंतर एडिसन एलुमनेटिंग कंपनी चालू केली. जिच्यासाठी फोर्ड यांनी मदत केली आणि ती बनली जनरल इलेक्ट्रिक कंपनी बनली. याच हेन्री फोर्ड यांची माहिती मागील व्हिडीओमध्ये आम्ही सांगितली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तो व्हिडीओ नक्की पहा.

    एडिसन आपल्या अनेक प्रयोगात यशस्वी होत होते. घरातील कपाट आवरत असताना त्यांना एक पत्र सापडलं. हे ते पत्र होतं, जे त्यांच्या आईला त्यांच्या शिक्षकांनी दिलं होतं. त्यांनी ते उघडलं, तर त्यात लिहिलं होतं की, ‘तुमचा मुलगा मतिमंद आहे, निर्बुद्ध आहे. आम्ही त्याला शिकवू शकत नाही. त्याला शाळेतून काढून टाकण्यात येत आहे.’ हे पत्र वाचून एडिसन रडू लागले. आपल्या आईने आपल्यासाठी काय केलं आहे हे त्यांच्या लक्षात आलं. एडिसन यांनी लिहून ठेवलं आहे कि, ‘एका महान आईनं एका मतिमंद मुलाला अजरामर असा संशोधक बनवलं.’ मित्रहो आजकाल आपण पहातो की, आपल्या मुलाने अमुक एवढे मार्क्स मिळवलेच पाहिजेत म्हणून दबाव टाकणारे अनेक पालक आहेत. अशांसाठी एडिसनची आई बरंच काही शिकवून जाते. 

    आपल्याला माहित नसेल, पण मोशन पिक्चर म्हणजेच चलतचित्र, त्याचा शोध लावण्यात देखील एडिसन यांचा खूप मोठा वाटा आहे. फ्लोरोस्कोपी मशीन जे Xरे साठी वापरलं जात,  ट्रान्समीटर, रिचार्जेबल बॅटरी, अनेक प्रकारचे केमिकल्स असे एक ना अनेक शोध एडिसन यांनी लावले आहेत. एडिसन हे संशोधकासोबतच एक गुंतवणूकदारसुद्धा होते. त्यांनी खाणकाम क्षेत्रातही गुंतवणूक केली होती. पहिल्या जागतिक युद्धात देखील अमेरिका सरकारला एडिसन यांची खूप मदत झाली.

    जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडं सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला शिकवणाऱ्या या महान संशोधकाचा मृत्यू १८ ऑक्टोबर १९३१ मध्ये झाला. एडिसन यांनी पहिल्या बायकोच्या मृत्यनंतर दुसरं लग्न केलं. त्याना एकूण ६ मुलं आणि विशेष म्हणजे सहाही जण शास्त्रज्ञ होती. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा चार्ल्स  एडिसन याने त्यांच्या कंपनीची घोडदौड सांभाळली.

    माणूस सकारात्मक असला की त्याच्या हातून होणाऱ्या गोष्टीसुद्धा सकारात्मक आणि भव्यदिव्य असतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे थॉमस अल्वा एडिसन. शाळेतून काढलेल्या मुलाबाबत आजकालचे आईवडील, समाज कदाचित मानसिक खच्चीकरण करेल, पण एडिसनच्या आईच्या विश्वासाने याच मतिमंद समजल्या जाणाऱ्या मुलाला १०९३ पेटंट मिळवणारा संशोधक बनवलं. कमी ऐकू येण्याला जीवनातला अडथळा न मानता, उलट त्यामुळे आपण कामावर जास्त लक्ष केंद्रित करू शकलो, बल्ब बनवण्यात मला १००० वेळा अपयश आलं नाही, तर कोणत्या पद्धतीने बल्ब बनवला, तर तो बनत नाही याचे १००० मार्ग सापडले असा जगावेगळा विचार करणारे एडिसन.


    आणखी वाचा

  • यशस्वी होण्यासाठी टाईम मॅनेजमेंट (Time management) कसे करावे?

    यशस्वी होण्यासाठी टाईम मॅनेजमेंट (Time management) कसे करावे?

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासुन शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे; यशस्वी होण्यासाठी टाईम मॅनेजमेंट (Time Management) कसे करावे… करायची सुरवात?

    आयुष्य म्हणजे तरी काय? जन्मापासून मृत्यूपर्यंत तुमच्याकडे असणारा वेळच. जो हा वेळ अत्यंत प्रभावीपणे वापरतो, तोच आयुष्यात यशस्वी होतो. आपला वेळ शास्त्रशुध्द पध्दतीने कसा वापरावा, जेणेकरून तुम्ही जीवनात व उद्योगात यशस्वी व्हाल? प्रथम आज, या महिन्यात, या वर्षी, या आयुष्यात तुम्हाला काय करायचं आहे, ते ध्येय निश्चित करा व त्यानुसार टाईम मॅनेजमेंट (Time Management) करा. रोज सकाळी शांतपणे दिवसभराच्या नियोजनासाठी १५ मिनिटे द्या. प्राधान्यक्रमानुसार कामाची यादी बनवा, कामाचे चार भाग बनवा.

    पहिली – अत्यावश्यक व अर्जंट अशी कामे पहिल्यांदा करा;

    दुसरी – महत्वाची पण अर्जंट नाहीत, ती त्यानंतर करा;

    तिसरी – अर्जंट पण महत्वाची नाही, ती त्यानंतर करा;

    चौथी – अर्जंटही नाहीत व महत्वाची नाहीत, ती कामे शेवटी वेळ उरला तर करा.

    दिवस सुरू करताना वहीमध्ये कामाची नोंद करा व दिवस संपताना ती पूर्ण झाल्याची खात्री करा. नाही म्हणायला शिका, प्रत्येक फोन घेतलाच पाहिजे किंवा लगेच घेतला पाहिजे, ईमेल किंवा फेसबुक किंवा व्हॉटसअपवर आलेल्या मेसेजला लगेच रिप्लाय केलाच पाहिजे असे नाही. पहिल्यांदा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. फोन कितीही वाजू दे, अत्यंत महत्वाचा असेल, तरच उचला. ई-मेल, व्हॉटसअपला ठराविक वेळेनंतर रिप्लाय द्या. सकाळी एकदा, दुपारी एकदा, सायंकाळी एकदा असा प्रत्येकी १५ मिनिटांचा वेळ द्या. सर्व कामे स्वतः करण्याचा आग्रह धरू नका कमी महत्वाची, वेळखाऊ कामे इतरांकडून करून घ्या. ज्याचे काम त्याने करावे, वेळेचा व पैशाचा अपव्यय त्यामुळे टळतो.

    आज जीवनातील अनेक लोकांच्या एकाच वेळी संपर्कामुळे डिस्ट्रॅक्शन खूप वाढले आहे, ते कमी करा, त्यामुळे तुमचा वेळ वाचेल. नातेवाईक, मित्र, क्लब इत्यादींचा उगाचच फापट पसारा वाढवू नका. सिलेक्टिव्ह व्हा, ज्याच्यांशी आपले जमते अशांशी सबंध व संपर्क ठेवा, त्यामुळे तुमचे आयुष्यातील वेळ वाचून सुखी, श्रीमंत व समृध्द होत राहाल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतःची काळजी घ्या, वेळेवर उठणे, थोडासा का होईना व्यायाम करणे, वेळेवर योग्य आहार घेणे याकडे लक्ष द्या. किमान आठ तास झोप व्हायला हवी, तरच दिवसभराचे जीवनाचे टाईम मॅनेजमेंट (Time Management) तुम्हाला साधता येईल.

    तुम्ही तुमचे टाइम मॅनेजमेंट (Time Management) कसे करता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेल ला आताच सब्स्क्राइब करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी
  • उत्तम शेती करण्यासाठी कोणत्या महत्वाच्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.

    उत्तम शेती करण्यासाठी कोणत्या महत्वाच्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.

    जसे माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गोष्टींची गरज लागते, तसेच मातीला देखील अन्न पाणी हवा या गोष्टींची गरज लागते आणि यामध्ये मातीचे अन्न काय; तर तिला दिली जाणारी पोषक द्रव्य. आपण जरी आपल्या बाल्कनीमध्ये एखादं छोटं रोपटं लावलं, तरी त्यात काहीतरी खत हे टाकतोच. मग शेताचा विचार केला तर चांगलं पीक येण्यासाठी आणि जमीन चांगली राहण्यासाठी खत तर द्यावच लागणार ना. खतांसोबत जमिनीची योग्य मशागत, जमिनीला पोषक द्रव्य अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो.

    शेती करीत असताना शेतीचे व्यवस्थापन ही महत्त्वपूर्ण बाब आहे. केवळ फक्त राबराब राबणे म्हणजे शेती नव्हे, तर तुमच्या कष्टाचे चीज होणे म्हणजे खरी शेती. कोणतेही पीक घेत असताना काही गोष्टींचा प्रकर्षाने अभ्यास केला पहिजे.  कमी खर्चात पाण्याचा वापर, कमी खर्चात कीड नियंत्रण, खत व्यवस्थापन व पीक विक्रीचाही शेतकऱ्यांनी अभ्यास केला पाहिजे. चला तर पाहूया उत्तम शेती करण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.

    पाणी व्यवस्थापन –

    पाणी हा शेतीसाठीचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे पाणी व्यवस्थापन आवश्यक तेथे मुळांच्या कक्षेला दिले जावे. रेताड जमिनीची जलधारण क्षमता कमी असते. त्यामुळे त्यांची पाण्याची गरज अधिक असते. तर खोल काळ्या जमिनीची जलधारण क्षमता जास्त असते. अशा जमिनीत तुलनेने पिकांना पाण्याची गरज कमी असते. अतिरिक्त पाणी दिल्याने उत्पादन वाढत नाही तर जमिनीचे आरोग्य बिघडते. त्यामुळे पिकांना गरजेप्रमाणेच पाणी द्यावे.

    जमिनीची निवड –

    फुलशेती, फळशेती किंवा कोणतेही अन्नधान्य पिकविताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनीची निवड. जर डोंगराळ भागात तुमची जमीन असेल, तर चांगले पीक येण्यास खूप वर्ष लागू शकता. जमिनी ह्या पिकांनुसार विविध अन्नद्रव्यांचा पुरवठा करणाऱ्या व पिकांनुसार आवश्यक ओल टिकवून ठेवणाऱ्या असाव्यात. लागवड पूर्व जमिनीची निवड हा पीक व्यवस्थापनातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी विविध कृषी विद्यापीठं अथवा खासगी संस्थांकडून मातीपरीक्षण करून त्यातील बारकावे शास्त्रज्ञांकडून समजून घ्यावेत.

    जमिनीची मशागत –

    जमिनीच्या मशागतीमुळे आपोआपच जमिनीची उत्पादकता वाढते. सूर्य प्रकाशाची गरज जशी प्राणी, वनस्पती, मानव यांना असते तशीच ती जमिनीला सुद्धा असते. पिकाच्या वाढीसाठी माती भुसभुशीत असणे आवश्यक असते, त्याशिवाय मुळांची वाढ उत्तम होत नाही. मशागतीमुळे जमिनीची घनता, रंग, पोकळी, भौतिक गुणधर्म ह्यावर परिणाम होत असतो.

    पिकांची निवड –

    पिकांची निवड करताना घेणारे पीक हे किडीस कमी बळी पडणारे गुणवत्तापूर्वक पीक असावे. यामध्ये फळे आणि फुले देणारे वाण हे अधिक उपयुक्त ठरते. यासाठी शेतकऱ्यांनी नेहमीच चौकस बुद्धीने, बियाण्यांची निवड करावी, बियाणे, रोपे खात्रीशीर ठिकाणांहून घ्यावीत. तसेच फळबागा किंवा इतर रोपे खरेदी वेळी रोपांच्या मातृवृक्षाची माहिती घ्यावी, रोपांचा दर्जा, वय इत्यादी गोष्टी जाणून घ्याव्यात.

    अशा पद्धतीने जर जमिनीची योग्य काळजी घेऊन शेती केली, तर नक्कीच तुम्ही शेतीत चांगले उत्पन्न घेऊ शकता.


    आणखी वाचा

  • Angel Investors: स्टार्टअपसाठी एक शक्तिशाली संसाधन

    Angel Investors: स्टार्टअपसाठी एक शक्तिशाली संसाधन

    Angel Investors म्हणजे अशी लोकं ज्यांच्याकडे भरपूर पैसे असतात आणि ते सुरुवातीच्या काळात नवउद्योजकांना पैशांचा पुरवठा करतात. बँक, एफडी, सोने अशा पारंपारिक आणि तुलनेने कमी रिटर्न्स देणाऱ्या गुंतवणूक पर्यायांऐवजी ते भरभक्कम परतावा मिळेल अशा पर्यायांच्या शोधात असतात. 

    बिझनेस सुरु करताना नव्या उद्योजकाकडे सुरुवातीला फायनान्ससाठी तीन पर्याय असतात – मित्र, कुटुंबीय किंवा बँका. जेव्हा तुमच्या डोक्यात बिझनेसची फक्त आयडिया असते, तेव्हा त्यात १००% जोखीम ही असतेच. त्यामुळे बँका आणि इतर मोठे गुंतवणूकदार अशा बिझनेसमध्ये पैसे गुंतवण्यास कचरतात. अशा वेळी अँजेल इन्व्हेस्टर्स हा चांगला पर्याय आहे. अँजेल म्हणजे देवदूत. गरजेच्या वेळी धावून येणारे गुंतवणूकदार म्हणून अँजेल इन्व्हेस्टर्स.

    Angel Investors गुंतवलेल्या पैशांच्या बदल्यात त्यांना कंपनीत भागीदारी म्हणजेच शेअर्स द्यावे लागतात. त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. या Angel Investors चा सर्वात मोठा फायदा म्हणजे या लोकांचं नेटवर्क फार मोठं असतं आणि फायदा उद्योजकांना करून घेता येतो. आणि दुसरा फायदा म्हणजे बँकेसारखे इथे हप्ते भरण्याची गरज नाही. कारण त्यांनी शेअर्स घेतलेले असतात, त्यामुळे जर व्यवसाय वाढला तर त्यांचा फायदाच होतो आणि जर व्यवसाय बुडाला तर त्यांचा तोटा. म्हणजेच त्यांचेही पैसे बुडतात.

    साधारणत: ते उद्योगाच्या विविध पैलूंची व आंत्रप्रिन्युअर्सची माहिती आदी बाबींचा तपास घेतात. याला ड्यू डिलिजेन्स असे म्हणतात. सर्वसाधारणपणे गुंतवणूकदार अशा कंपनीकडे बघतात जिच्याकडे ग्राहक पुनःपुन्हा येतील किंवा उत्पन्न चांगले मिळू शकते, चांगले मार्जिन्स असतील, उत्पादन वैशिष्ट्यपूर्ण असेल. अँजेल इन्व्हेस्टमेंट ही एक ‘हाय रिस्क, हाय रिटर्न’ गुंतवणूक आहे. जगातील Angel Investors ना अपेक्षित फायदा मिळ्ण्याचे ५० टक्क्यांहून कमी आहे.

    जवळपास ५ ते ७ वर्षांत जेव्हा उद्योग नफा कमावू लागतो आणि उद्योगास भांडवल गोळा करण्यासाठी आपले शेअर्स काढतो तेव्हा एंजल इन्व्हेस्टरला व्यवसायात भागीदारीनुसार शेअर्स मिळतात. मग त्याला वाटले तर ते शेअर्स तो विकू शकतो किंवा नव्या व्यवसायात विकू शकतो.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

    आणखी वाचा

  • मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या योजनांमध्ये करा गुंतवणुक

    मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या योजनांमध्ये करा गुंतवणुक

    आपल्या मुलामुलींचे भवितव्य सुकर व्हावे असे प्रत्येक सुजाण पालकाला वाटणे स्वाभाविक आहे. मातृभाषेत शिक्षण द्यावे असे सर्व तज्ञ सांगत असले तरी जवळपास सर्वांनीच यावर काट मारली असून इंग्रजी माध्यमास पसंती दर्शवली आहे. त्यामध्ये स्टेट बोर्ड, सेंट्रल बोर्ड, इंटरनॅशनल बोर्ड असे प्रत्येक टप्यावर महाग होणारे पर्याय असून अनेक पालक आपल्याला परवडत नसतानाही त्याच्या मुलांना हे शिक्षण कसे मिळेल याची धडपड करीत आहेत. ज्यांची ऐपत आहे त्यांचे ठीक पण नाही त्यांचे काय?


    उच्च शिक्षण घेण्यासाठी कमी व्याजदराने विनातारण कर्ज मिळू शकते त्यामुळे अनेक ऐपत असलेले आणि नसलेले अशा कर्जाचा उपयोग करून घेत आहेत परंतु शालेय शिक्षणाचे काय? त्याचा खर्च सध्या एवढा वाढला आहे की या एक वर्षाच्या खर्चात 20 वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांचे सर्व शालेय शिक्षण होत होते. तेव्हा मुले जन्माला येण्यापूर्वी किंवा अगदी लहान असताना विविध प्रकाराच्या मालमत्ता प्रकारात गुंतवणूक करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे सध्या यासाठी उपलब्ध पर्याय आपण पडताळून पाहुयात.


    ★सुकन्या समृद्धी योजना-(Sukanya Smruddhi Yojana)


    *ही सरकारी योजना असून केवळ मुलींसाठीच उपलब्ध आहे.
    *मुलीचा जन्म झाल्यापासून 10 वर्ष पूर्ण होईपर्यंत पालकांना किंवा कायदेशीर पालकाला मुलीच्या नावे याचे खाते पोस्ट ऑफिस, सरकारी आणि खाजगी बँकेत काढता येते.
    *एकाच व्यक्तीच्या नावे दोन खाती काढता येत नाहीत. जास्तीत जास्त 2 मुलींच्या नावे अपवादात्मक परिस्थितीत 3 खाती काढता येणे शक्य आहे.
    *खात्याची मुदत 21 वर्ष अथवा मुलीचे लग्न ठरेपर्यत यातील जे प्रथम पूर्ण होईल ते.
    *किमान गुंतवणूक ₹1000/- प्रतिवर्षी कमाल ₹150000/- पालकास 80 c सवलत घेता येईल.
    *सध्याचा व्याजदर 8% व्याजदर दर 3 महिन्यांनी बदलतो सरकारकडून जाहीर केला जातो. व्याज करमुक्त मुदतपूर्ती रक्कम मुलीच्या हातात पूर्णपणे करमुक्त.
    *मुलीला 18 वर्षे पूर्ण झाली असताना त्यांच्या आधीच्या वर्षी शिल्लख असलेल्या रकमेच्या 50% रक्कम योग्य ते पुरावे देऊन शिक्षणासाठी काढता येते.


    ★पोस्ट ऑफिस मुदत ठेव (Time deposit)


    *अल्पबचत योजनेत याचा समावेश होतो, त्यास सरकारची हमी असल्याने पूर्ण सुरक्षित.
    *केवळ पोस्ट ऑफिसमध्ये याचे खाते काढता येते. भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये बदलून घेता येते.
    *मुदत 1 ते 5 वर्ष, व्याजदर कामाल 7.5% प्रतिवर्षी.
    *10 वर्षाच्या वरील मुलांचे खाते काढता येईल.
    *किमान गुंतवणूक ₹1000 कमाल कोणतीही मर्यादा नाही.


    ★मुदत ठेव योजना


    *योजना वरील प्रमाणेच फक्त गुंतवणूक बँकेत.
    *बँकेतील एकत्रित ठेवीस नियमानुसार ₹5 लाख विमा संरक्षण.


    ★राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Saving Certificate)


    *अल्पबचत योजना
    *मुदत 5 वर्षे व्याजदर 7.70% दरवर्षी.
    *10 वर्षावरील मुलांना त्यांच्या नावे घेता येईल.
    *किमान गुंतवणूक ₹1000 कमाल मर्यादा नाही.


    ★रिकरिंग डिपॉझिट-


    *पोस्ट बॅंक येथे उपलब्ध
    *व्याजदर मुदतीनुसार मुदत 1 ते 5 वर्ष.
    *शिस्तबद्ध रीतीने गुंतवणूक करण्याची पद्धत.


    ★सार्वजनिक निवृत्तीवेतन योजना ( Public Providand Fund)


    *पालकासह मुलांना खाते काढता येते.
    *किमान गुंतवणूक ₹ 500/-प्रतिवर्षी कमाल ₹ दीड लाख. मुदत 16 आर्थिक वर्षे.
    *नंतर मुदत 5 वर्ष अशी कितीही वेळा वाढवता येते
    *7 व्या आर्थिक वर्षापासून 3 ऱ्या आर्थिक वर्षातील शिल्लख किंवा पूर्वीच्या वर्षातील शिल्लख याच्या 50% रक्कम काढून घेता येते.
    *18 वर्षानंतर मुले सदर खाते स्वतंत्रपणे चालवू शकतात.
    गोल्ड इटीएफ : मुलांसाठी ज्यांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांना गोल्ड इटीएफ हा पर्याय आहे याचे कार्य म्युच्युअल फंडाप्रमाणेच चालते यातील एक युनिट 1 gm सोन्याची किंमत दर्शवतो. यात गुंतवणूक कधीही करता किंवा काढून घेता येते.
    म्युच्युअल फंड योजना: म्युच्युअल फंड युनिट मध्ये कालबद्ध गुंतवणूक ही योजनेत कालबद्ध गुंतवणूक दीर्घकाळ करून करता येते यामुळे
    सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन यामुळे जोखीम कमी होऊन परतावा अधिक मिळण्याची शक्यता वाढते. या योजनेशिवाय योजना आहेत त्यांना चिल्डरेन गिफ्ट ग्रोथ फंड असे म्हणतात त्यांचे कार्य बॅलन्स फंडाप्रमाणे चालते यातून चांगला परतावा मिळू शकतो.
    विमा योजना/ युलीप :मुलांसाठी खास निश्चित परतावा देणाऱ्या त्याचबरोबर विमा माध्यमातून सुरक्षा कवच मिळते यात निश्चित परतावा देणारे त्याचबरोबर बाजार निगडित परतावा देणाऱ्या योजना आहेत. त्या करारानुसार सुरक्षा कवच पुरवतात यामध्ये निश्चित परतावा देणाऱ्या योजना आपली जाहिरात करताना सुरक्षा कवच मोफत देत असल्याचे सांगत असतील तरी त्यातून मिळणारा परतावा बाजारात मिळू शकणाऱ्या परताव्याहून कमी असतो त्यामुळे कोणी कोणाला फुकट काही देत नाही हे लक्षात ठेवावे. त्यांच्या अनेक योजनांना संचय, चाईल्ड प्लस, चाईल्ड एडव्हॅनटेज अशी आकर्षक नावे आहेत. युलीप मध्ये अनेक पर्याय आहेत यात बाजार निगडित परताव्यातून दीर्घकाळ राहिल्यास चांगला लाभ होऊ शकतो या दोन्ही प्रकारातून पुरेसे विमा संरक्षण मिळू शकत नाही, हमी देणाऱ्या योजनेतून पुरेसा परतावाही मिळू शकत नाही असे माझे मत आहे. यातील परताव्याबद्धल अनेकदा एजंट चुकीची माहिती देऊन गुंतवणूकदारांची दिशाभूल करतात.
    या आणि अशा प्रकारच्या योजना लहान मुलांसाठी उपयुक्त आहेत यातील सुकन्या समृद्धी योजना फक्त 10 वर्षाच्या आतील मुलींना उपलब्ध आहे. आपली गरज, क्षमता, जोखीम स्वीकारण्याची ताकद याचा विचार करून वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारात गुंतवणूक विभागता येईल. यातील बहुतेक योजनांत पाल्याच्या नावे केलेल्या गुंतवणूकसाठी पालकांना 80 C नुसार आयकर सवलत मिळते.

    ©उदय पिंगळे
    अर्थ अभ्यासक

    (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारिणीचे पदाधिकारी असून महारेराच्या सलोखामंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत)

  • खरी संपत्ती म्हणजे काय ?

    खरी संपत्ती म्हणजे काय ?

    रॉजर एच. यांच्या पुस्तकातील एक गोष्ट आजच्या संडे मोटिव्हेशनमध्ये आपण बघुयात.आजवर शिकलेल्या उद्योजकतेच्या धड्यांपैकी एक खूप चांगला धडा मला योगायोगाने श्रीलंकेतील एक नदीमध्ये प्रवास करताना शिकायला मिळाला.

    मी श्रीलंकेत गेलो असताना नदीच्या पांढऱ्याशुभ्र पाण्यात राफ्टींग करण्याची माझी इच्छा होती. नदीमध्ये राफ्टींग करत असताना आमची राफ्ट एका सुंदर अशा नदीच्या खोऱ्यामध्ये शिरली. आमचा जो गाईड होता, तो आम्हाला बोटाने पर्वताच्या आजूबाजूला चहाची केलेली लागवड, अतिशय सुंदर आणि रम्य घरं, नदीकिनारी निसर्ग सौंदर्याने नटलेलं शहर दाखवत होता.

    “हे सर्व माझ्या वडिलांचं होतं.” तो म्हणाला.

    “यातला नक्की कुठला भाग?” मी प्रश्न केला.

    “सगळंच!” त्याने उत्तर दिलं

    त्याचे वडील श्रीमंत जमीनदार असतील असं मला वाटलं. न राहवून मी त्याला त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी विचारली, मग त्याने एक चकित करून सोडणारी गोष्ट सांगायला सुरुवात केली.

    “माझ्या वडिलांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीस भारत सोडला आणि काहीतरी नवं करता येईल का हे पाहण्यासाठी श्रीलंकेला आले. इथे आल्यावर त्यांना या खोऱ्याचे दर्शन घडले. त्यांना ही जागा इतकी आवडली की त्यांनी इथेच स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे तेव्हा अजिबात पैसे नव्हते. त्यांनी इथली काही जमीन मोकळी केली. चहाची लागवड कशी करायची ते शिकून घेतलं आणि त्या जमिनीवर चहा लागवड सुरु केली.”

    “लोकांना त्यांचा चहा आवडू लागला. त्यामुळे त्यांनी उत्पादन वाढवायला सुरुवात केली. त्यांच्यापेक्षा जास्त माहिती असणाऱ्या अनुभवी लोकांना लागवडीसाठी सोबत घेतलं. आता त्यांच्याजवळ पुरेसे पैसे होते, त्यामुळे ते या लोकांना पगार देऊ शकत होते. पण लांबचा प्रवास करून कामासाठी इथवर येणं लोकांना गैरसोयीचं ठरत होतं. त्यामुळे त्यांनी घरं बांधली आणि त्या लोकांना ती भाडेतत्वावर दिली.”

    मी त्याला मध्येच थांबवत म्हणालो, “म्हणजे तुझ्या वडिलांनी त्या लोकांना पगार दिला आणि तोच पगार त्या लोकांनी भाड्याच्या स्वरुपात त्यांना परत दिला, असंच ना?”

    “हो.” त्याने उत्तर दिलं.

    “आणि त्यांनी या परत मिळालेल्या पैशातून अजून घरे बांधली असतील?” मी विचारलं.

    “नाही. त्यांच्या घरांची सोय झाली होती, पण त्यांना खायला दर्जेदार अन्न मिळत नव्हतं. त्यामुळे त्यांनी हा पैसा रेस्टॉरंट बांधण्यासाठी वापरला.”

    मी परत विचारलं “म्हणजे त्यांनी त्या लोकांना पगार दिला, तोच पगार त्या लोकांनी भाड्याच्या स्वरुपात परत दिला, तो पैसा तुझ्या वडिलांनी रेस्टॉरंट काढण्यात गुंतवला. त्यामुळे आपल्याला चांगलं जेवण मिळावं आणि तो खर्च भागवता यावा यासाठी त्या लोकांनी अजून मेहनत करायला सुरुवात केली असेल?”

    “हो, बरोबर. यातूनच पुढे ही सगळी दुकानं सुरु झाली, इथे रस्ते बांधले गेले, रेल्वे स्थानक बांधलं गेलं, पूल बांधला गेला. खरं सांगायचं तर, २० वर्षांत जवळपास २००० लोक या सुंदर शहरात स्थायिक झाले आहेत. त्यातील बऱ्याचशा लोकांनी चहा लागवडीचं कामसुद्धा केलेलं नाही, कारण इथे त्यांना करता येण्याजोग्या अनेक गोष्टी होत्या.”

    जसजसं आम्ही पुढे जाऊ लागलो, त्याची ही गोष्ट ऐकून ‘पैसा हा फुटबॉलसारखा आहे’, असे विचार माझ्या मनात येऊ लागले. म्हणजे तुम्ही फुटबॉल खेळत असताना त्याचा पाठलाग करत असता, पण त्याचा वेग जास्त असल्याने आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण आपण दोष मात्र इतर खेळाडूंना देतो.

    आपण जर खेळाकडे नीट लक्ष दिले आणि आपल्याकडे बॉल आल्यावर तो पुढच्या खेळाडूकडे ढकलला, तर तोच बॉल मग तुमच्याकडे परत परत येत राहतो. जसं त्या गाईडच्या वडिलांनी केलं. त्यांनी पैशाच्या मागे धावण्यापेक्षा पैसा खेळता कसा राहील याकडे लक्ष दिलं. जसं फुटबॉलमध्ये मैदानातील खेळाडूंकडे बॉल परत परत येत राहतो, तसंच त्यांच्याकडे सुद्धा पैसा परत परत, रोज येत राहिला. मग तो चहाच्या विक्रीतून असो, त्यांनी बांधलेल्या घरांतून असो, रेस्टॉरंटमधून असो किंवा दुकानांतून.

    आणि या प्रत्येक वेळी पैशाची देवाणघेवाण झाली, कारण ते लोकांच्या आयुष्यात काहीतरी चांगला बदल घडवू पाहत होते. संपूर्ण शहराला ते स्वतःचं घर समजत होते. आपलं घर संपन्न आणि समृद्ध व्हावं म्हणून प्रयत्न करत होते. खरे उद्योजक कधीही पैशांच्या मागे लागत नाहीत. ते वाळू व्हॅल्यू अॅडीशन करायचा प्रयत्न करतात. पैसा ही त्यांच्यासाठी दुय्यम गोष्ट असते, जिचा ते पुन्हा वापर करतात आणि अजून मोठे होतात.

    चीनमधील महान तत्त्वज्ञ लाओ त्से यांचा एक प्रसिद्ध सुविचार आहे, ‘पर्वतासारखे निश्चल बना आणि नदीसारखे प्रवाही बना.’

    “तुझे वडील आता कुठे आहेत?” मी विचारलं.

    “ते वीस वर्षांपूर्वीच वारले.”

    “अरेरे, ऐकून दुःख झाले.”

    थोडा वेळ थांबून मी म्हणालो, “मग हे सगळं तुला वारसा हक्काने मिळालं असेल ना?”

    तो हसला. “नाही! नागरी युद्धाच्यावेळी सरकारने माझ्या वडिलांची सगळी जमीन आणि सगळे व्यवसाय ताब्यात घेतले. सर्व मालमत्ता जप्त करून नंतर इतरांना विकून टाकल्या. आमच्याकडे आता नदीकिनारी एक लहान घर तेवढं राहिलेलं आहे, दुसरं काही नाही. माझ्या वडिलांचं त्यावेळी खूप वय झालं होतं, त्यामुळे ते काम करू शकत नव्हते. मरताना त्यांच्याकडे फुटकी कवडीसुद्धा नव्हती.”

    हे ऐकून मला धक्काच बसला. मी म्हणालो, “त्यांना खूपच वाईट वाटलं असेल ना?”

    त्याने स्मित केले आणि नदीकडे पाहत म्हणाला, “नाही. मरताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्यांना जिथे जगायचं होतं, तिथे जगता आलं. या परिसरात ते सगळीकडे फिरले, सगळ्यांशी त्यांची मैत्री होती. सगळे त्यांना जेवूखावू घालत असत. त्यामुळे त्यांना पैशांची तशी गरज वाटत नव्हती. खरी संपत्ती काय असते हे माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं. आणि म्हणूनच मी इथे गाईडचं काम करतो.”

    वर पर्वताकडे आणि खाली नदीकडे हात करत तो पुढे म्हणाला, “मोठ्या शहरात जावं. खूप मेहनत करून पैसे कमवावे आणि गरज नसलेल्या गोष्टींवर खर्च करावेत याची मला अजिबात गरज वाटत नाही. हे सगळं जे माझ्याजवळ आहे, ते माझ्यासाठी खूप आहे.”

    प्रवास संपवून तिथून निघताना माझ्याकडे पैसे कमी होते, पण संपत्ती जास्त होती. चिंता कमी होती, आनंद जास्त होता. कमी कमवायचं आणि जास्त द्यायचं ही भावना होती. आणि संपत्तीची एक नवीन व्याख्या मी बनवली: “संपत्ती म्हणजे तुमच्याजवळ किती पैसे आहेत हे नव्हे, तर तुमच्याजवळील सर्व पैसे गमावल्यावर तुमच्याकडे शिल्लक राहील, ती तुमची खरी संपत्ती.”

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • डिव्हिडंड देणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी का?

    डिव्हिडंड देणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी का?

    शेअरबाजारात गुंतवणूक करणारे जाणीवपूर्वक धोका पत्करत असतात. यातून होऊ शकणारा आकर्षक परतावा त्यांना खुणावत असतो. कधीतरी एखादा शेअर्स आपले सर्व आयुष्यच बदलून टाकेल असा विश्वास त्यांना वाटत असतो. असे शेअर्स मिळतील न मिळतील पण शिस्तबद्ध गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीस बाजारातून मिळणारा परतावा शेअर्सवर मिळणारा लाभांश म्हणजे डिव्हिडंड आणि भाव वाढून भांडवलात होणारी वृद्धी अशा दोन प्रकारे मिळतो. डिव्हिडंड आणि भांडवलात होणारी वृद्धी दोन्ही करपात्र आहेत.

    डिव्हिडंड व्यक्तीच्या करपात्र उत्पन्नात मिळवला जाऊन त्यावर चालूदराने कर आकारणी केली जाते तर भांडवलात झालेली वाढ हा भांडवली नफा समजला जावून शेअर्स धारण करण्याच्या कालावधीनुसार अल्प किंवा दीर्घ मुदतीचा असतो त्यावर विशेष दराने कर भरावा लागतो तो अन्य कराच्या तुलनेत बराच कमी आहे. ज्या भावाने शेअर्स खरेदी केले त्यावर मिळणारा परतावा हा डिव्हिडंड बरोबर तुलना केली तर अत्यल्प असतो. याला अपवाद असलेले काही शेअर्स आहेत जे बँकेतील फिक्स डिपॉझिटच्या तुलनेत अधिक परतावा देतात अनेक गुंतवणूकदार असे आहेत त्यांना सातत्याने नियमित उत्पन्नाची गरज असते म्हणून आशा शेअर्सना डिव्हिडंड स्टॉक असेही म्हटले जाते परंतु त्यांचा बाजारभाव हा तुलनेने कमी असल्याने त्यातून होणारी भांडवलवृद्धी कमी असते तर जास्तीतजास्त भांडवलवृद्धी व्हावी अशी गुंतवणूक दाराची इच्छा असते.


    कंपनी कायद्यात, कंपनीने तिला झालेल्या फायद्यातील निश्चित वाटा डिव्हिडंड म्हणून भागधारकांना द्यावा असे कोणतेही बंधन नाही. अशा अनेक जगप्रसिद्ध कंपन्या आहेत ज्यांनी फायद्यात असूनही अद्याप डिव्हिडंड दिलेला नाही तरीही भारतीय शेअरबाजारात सर्वसाधारणपणे फायद्यात असणाऱ्या कंपन्या डिव्हिडंड देतात. बोनस रूपाने शेअर्सही देतात वर म्हटल्याप्रमाणे ज्यांना डिव्हिडंड स्टॉक असे म्हटले जाते त्यात भांडवलवृद्धीची शक्यता कमी असते त्यांची विभागणी – डिव्हिडंड ग्रोथ स्टॉक आणि हाय डिव्हिडंड स्टॉक अशी करता येईल या कंपन्या वर्षातून एकदा किंवा दर तीन महिन्यांनी डिव्हिडंड देतात.
    डिव्हिडंड ग्रोथ स्टॉक आपण अशा कंपन्यांना म्हणू शकतो ज्या कंपन्या भविष्यात डिव्हिडंड अधिक देऊ शकतील तर हाय डिव्हिडंड स्टॉक म्हणजे अशा कंपन्या ज्या भविष्यात डिव्हिडंड कदाचित अधिक देऊ शकतील परंतु सध्या त्या त्यांच्या नफ्यातील अधिक भाग त्या डिव्हिडंड रूपाने भागधारकांना देत आहेत.


    गुंतवणूकदारांनी डिव्हिडंड स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याची कारणे-


    सातत्याने मिळणारे अप्रत्यक्ष उत्पन्न– या कंपन्या दरवर्षी किंवा दर तिमाहिस डिव्हिडंड देत असल्याने सातत्याने काहीतरी पैसे नियमित मिळत राहतात याची तुलना बँकेतून मिळणाऱ्या फिक्स डिपॉझिट वरील व्याजाशी करता येईल. अशा तऱ्हेने नियमितपणे उत्पन्न मिळत राहणे ही काही जणांची गरज असू शकते. असे उत्पन्न नियमितपणे मिळणे ही त्याच्या दृष्टिकोनातून सुयोग्य गुंतवणूक असेल.
    अन्य शेअर्सच्या तुलनेत कमी जोखमीची गुंतवणूक– या शेअर्समधील गुंतवणूकीत तुलनेने जोखीम कमी आहे. त्याच्या बाजारभावात फार चढ उतार होत नाहीत. बाजार अन्य कोणत्याही कारणाने खाली आला तरी या शेअर्सचे भाव फारसे उतरत नसल्याने भांडवली नफा किंचित कमी होऊ शकतो. त्यात फारसा फरक पडत नसल्याने तुलनेने यात जोखीम कमी आहे.
    डिव्हिडंडची त्याच कंपनीच्या शेअर्समध्ये पुनर्गुंतवणूक शक्य– जेव्हा गुंतवणूक दारास डिव्हिडंड मिळेल तेव्हा एक तर तो स्वतःसाठी खर्च करता येईल किंवा त्याच कंपनीचे अधिक शेअर्स खरेदी करता येईल. अशा पध्दतीने गुंतवणूक त्याच कंपनीच्या शेअर्समध्ये केल्यास डिव्हिडंड चक्रवाढ पद्धतीने वाढेल. यामधून मिळणारा परतावा सातत्याने वाढताच राहील.
    दुहेरी फायदा– अशा शेअर्समधून डिव्हिडंड तर मिळतोच त्याचप्रमाणे त्यातून भांडवली नफाही होत राहील असा दुहेरी फायदा होईल त्यामुळे आपोआपच मूल्यवृद्धी होत राहील.
    वाढत्या महागाईवर मात– यातून मिळणारा डिव्हिडंड आणि भांडवल वृध्दी यामुळेच अशी गुंतवणूक वाढत्या महागाईवर मात करणारा परतावा मिळावणारी असते.
    बाजार अस्थिरतेवर मात– बाजार कितीही अस्थिर असला तरी अशा शेअर्सच्या बाजारभावात फारसा फरक नसल्याने बाजारातील अस्थिरतेवर आपोआपच मात केली जाते. त्यामुळे गुंतवणूक करून ती तशीच ठेवणे अशा पद्धतीने गुंतवणूक करणाऱ्याच्या दृष्टीने अशा शेअर्स मधील गुंतवणूक हे वरदान ठरण्याची शक्यता आहे.


    डिव्हिडंड स्टॉकमधील गुंतवणूक कोणाच्या फायद्याची-


    डिव्हिडंड स्टॉक मधील गुंतवणूक सोपी आणि कमी जोखीम असलेलीच आहे, असा यातून समज होत असेल तरी इतक्या सहजतेने ही गुंतवणूक करावी असा विचार गुंतवणूकदारांनी करू नये. गुंतवणूक केल्याने त्यातून मिळणारे फायदे आणि त्याच्या मर्यादा जाणून घ्याव्यात त्या आपल्या गुंतवणूक धोरणाशी मिळत्या जुळत्या असतील तरच गुंतवणूक करण्याचा विचार करावा. ते स्वतःला सावध गुंतवणूकदार समजत असतील तर अशी गुंतवणूक करण्यामागचे फायदेतोटे लक्षात घ्यावेत. दीर्घकाळात अशी गुंतवणूक अपवादात्मक प्रमाणात भरपूर मूल्यवृद्धीही करून देऊ शकते. यासाठी संशोधन करून कंपनीचे मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषण करणे गरजेचे आहे. ग्रोथ स्टॉकमधून खात्रीपूर्वक नियमित परतावा आणि काही प्रमाणात मूल्यवृद्धी निश्चित होईल एवढेच यातून ठामपणे सांगता येईल त्यामुळे अशी गुंतवणूक ही काही जणांच्या दृष्टीने योग्य गुंतवणूक असल्याचा निष्कर्ष आपण यातून काढू शकतो. अनेक गुंतवणूकदार हीच गुंतवणूक आदर्श मानून केवळ ग्रोथ स्टॉकमध्येच गुंतवणूक करीत आहेत.

    ©उदय पिंगळे
    अर्थ अभ्यासक

    (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाचे सदस्य असून महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकर म्हणून कार्यरत आहेत. लेखातील मते वैयक्तिक असून ती गुंतवणूक शिफारस नाही हे लक्षात घ्यावे यातील मुद्द्यांवर आपल्या गुंतवणूक सल्लागारांशी चर्चा करावी.)

    आणखी वाचा

  • जर खरोखरच आयकर रद्द झाला तर?

    जर खरोखरच आयकर रद्द झाला तर?

    आपल्याकडे सध्याचे आयकरचे दर मध्यम प्रमाणात आहेत. या करातून अनेक सरकारी खर्च भागावले जातात, शिक्षण, संरक्षण, पायाभूत सुविधांचा विकास केला जातो. त्यातूनच देशाचा आर्थिक विकास होण्यास मदत होते. सरकारच्या उत्पन्नाचे प्रत्यक्ष कर हे महत्वाचे साधन आहे. ज्याने उत्पन्न अत्यल्प आहे त्यांना सरकारची मदत मिळते तर अतिशय श्रीमंत लोक संघटितपणे त्यांच्या अनेक उत्पन्नावरील कर कमी करावेत यासाठी सरकारवर दबाव आणतात.

    याउलट मध्यमवर्गीय लोकांच्या उत्पन्नातूनच कर लगेच कापून घेत असल्याने त्यात अधिक सवलती मिळाव्यात अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे सरकारला उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण करून सर्वच घटकांना खुष ठेवावे लागते निदान जे काही आहे ते त्यांच्या फायद्यासाठी आहे असा दिलासा समाजातील प्रत्येक घटकांना द्यावा लागतो. अनेक आयकरदात्याना कराचे दर अधिक वाटतात. बरेचदा त्याची कर भरण्याची जबाबदारी मालकावर असल्याने कामाच्या ठिकाणी करकपात केली जाते.

    दरमहा वेतनातून काही कपात न केल्यास शेवटचे तीन चार महिने करदात्यांवर ताण येऊ शकतो त्यामुळेच कच्चा हिशोब करून दरमहा काहीतरी कपात केली जाते. आयकर मापन करण्याच्या जुन्या पद्धतीत विविध गुंतवणूका आणि खर्च यावर सूट मिळते. त्यामुळे निव्वळ उत्पन्नाचा विचार करता द्याव्या लागणाऱ्या आयकराचे प्रमाण अप्रत्यक्षपणे खूप कमी होते. अनेक सवलती रद्द करून काही प्रमाणात करदेयता कमी करणारी नवीन करयोजना सरकारने आणली असली तरी सरकारने आयकरच रद्द करावा अशी मागणी नियमित केली जाते. यात अनेकदा राजकारण असले तरी या मागणीस करदात्यांचे समर्थनही मिळते. आयकर रद्द केला तर विकासाची गती कशी वाढेल याचे अनेक दाखले दिले जातात.

    समर्थनार्थ पुढे येणारे ठळक मुद्दे-

    सध्याच्या पद्धतीत व्यक्ती आणि उद्योजक यांच्यावरील भार अधिक वाढतो. आयकर रद्द केल्यास अधिक खेळाता पैसा बाजारात उपलब्ध होईल त्यातून अधिक गुंतवणूक होईल आणि अधिक खर्चही केला जाईल त्यामुळे अर्थव्यवस्थेस चालना मिळेल. यासाठी युनायटेड अरब अमिरात, सौदी अरेबिया या देशाची उदाहरणे दिली जातात आयकर नसताना तेथील सकल राष्ट्रीय उत्पन्नात, गेल्या दहा वर्षांत जागतिक सरासरीहून 4.2% दराने वाढ झाली आणि तो दर 5% होऊ शकेल. विकासदरात वाढ झाल्यास नवीन नोकऱ्या निर्माण होतात, परदेशी गुंतवणूक वाढते त्यामुळे जनतेचे सर्वसाधारण राहणीमान उंचावते.

    भारतातील कररचना गुंतागुंतीची आहे. आयकर रद्द केल्याने त्यात सुलभता येईल त्यामुळे करदाते आणि व्यावसायिक यांना कर नियमांचे पालन करणे सुलभ होईल. त्याचप्रमाणे कर गोळा करण्यासाठी जो प्रशासकीय खर्च होतो तो कमी होईल. कर सल्लागाराची महागडी फी द्यावी लागणार नाही त्याचप्रमाणे हिशोबांचे लेखा परीक्षण सहसा आवश्यक नसल्याने परीक्षकांची गरज कमी होईल.

    आयकर रद्द केल्याने व्यक्ती आणि व्यवसायांना करचुकवेगिरी करण्यात किंवा त्यांचे उत्पन्न लपविण्याची गरजच पडणार नाही. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था विस्तारू शकते. अधिक पारदर्शक आणि जबाबदार आर्थिक शक्ती म्हणून पुढे येऊ शकते. पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय कर मानकांचे पालन करणारा देश म्हणून भारताची जागतिक पत देखील सुधारू शकते. जे विश्वासार्ह आणि अनुपालित वातावरण शोधत असलेल्या परदेशी गुंतवणूकदारांना आणि व्यवसायांना आकर्षित करू शकते

    भारताने प्राप्तिकर रद्द केल्यास विदेशी गुंतवणूकदार आणि उद्योजक यांच्यासाठी एक सशक्त आकर्षक पर्याय उपलब्ध झाल्याने जागतिक बाजारात स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊ शकते.
    आयकर रद्द केल्याचे असे अनेक फायदे असताना सरकार तो रद्द करीत नाही कारण-

    आयकर हा सरकारच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि संरक्षण क्षेत्राच्या गरजा यातून भागवल्या जातात. त्यामुळे त्यास व्यवहार्य पर्याय उपलब्ध होयला हवा, नाहीतर यामुळे येणारी तूट भरून काढण्यास अधिक कर्ज घ्यावे लागेल त्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता वाटते.

    महसूल वाढवण्यासाठी विविध अन्य करपर्याय शोधावे लागतील. जसे की वस्तू आणि सेवाकर, संपत्तिकर, कंपनीकर यात वाढ करावी लागेल. व्यवहार कर आणावा लागेल या वाढीचे स्वतःचे वेगळे आर्थिक आणि सामाजिक परिणाम होऊ शकतात.

    व्यवहारकरासारख्या करात वाढ करताना त्याचे आंतरराष्ट्रीय करार , जबाबदाऱ्या, परकीय गुंतवणूक आणि व्यापार यावर होणारे संभाव्य परिमाण तपासून पाहावे लागतील.

    सध्याच्या व्यवस्थेने संपत्तीचे असमान वितरण होत आहे आयकर रद्द केल्यास त्याचा अधिक फायदा श्रीमंतांना होईल त्यामुळे विषमता अधिक वाढेल. अप्रत्यक्ष करवाढीचा थेट परिणाम कमी उत्पन्न असलेल्या लोकांवर अधिक होतो त्यामुळे अशी करप्रणाली विकसित करावी लागेल जी कमी उत्पन्न असलेल्या लोकांचे अप्रत्यक्ष कर समायोजित करू शकेल आणि त्यांच्यावरील कराचे ओझे हे संपत्ती वाढीच्या प्रमाणात किंचित वाढेल. त्यामुळे संपत्तीचे असमान ऐवजी पुनर्वितरण होऊ शकेल. या दिशेने जाणारा एकही मार्ग समोर नाही.

    आयकर रद्द करण्याची मागणी करणारे सर्व युक्तिवाद हे व्यवहारकराची आकारणी करण्याची मागणी करीत आहेत किंबहुना त्यांची सर्व मदार या करावर आहे. व्यवहार करांमध्ये सामान्यत: विशिष्ट आर्थिक व्यवहारांवर कर आकारणे समाविष्ट असते, जसे की स्टॉक ट्रेड, मालमत्ता विक्री किंवा बँकिंग व्यवहार.

    व्यवहार करांच्या बाजूने केले जाणारे युक्तिवाद:

    ★ साधेपणा: व्यवहार कर हे आयकराच्या तुलनेत सोपे मानले जाते व्यवस्थापन आणि गोळा करण्याची पद्धत सोपी आहे.

    ★ आर्थिक वाढ: याबाबत असा युक्तिवाद आहे की व्यवहार कर व्यक्ती आणि व्यवसायांवरील आयकराचा भार कमी करून त्यास चालना देऊ शकतात. कमी आयकर दर किंवा त्याचे निर्मूलन यामुळे संभाव्यपणे गुंतवणूक आणि वापर याला प्रोत्साहन मिळू शकते.

    ★ कमी करचोरी: व्यवहार कर चुकवणे अधिक आव्हानात्मक असू शकते कारण ते विशिष्ट व्यवहारांशी जोडलेले असतात आणि व्यवहाराच्या ठिकाणी गोळा केले जाऊ शकतात.

    निष्कर्ष

    ● भारतात आयकर रद्द करणे हा एक धाडसी प्रस्ताव आहे ज्याचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.
    ● आर्थिक विकासाला चालना देण्याची, करप्रणाली सुलभ करणे, करचोरी टाळणे, कर कमी करण्याचे आश्वासन देताना संभाव्य महसुलाची हानी आणि वाढत्या संपत्ती असमानतेची चिंता त्यामुळे अशा बदलाच्या व्यवहार्यतेचे मूल्यमापन करण्यासाठी, धोरणकर्त्यांनी व्यापक संशोधन, तज्ञांशी सल्लामसलत करणे आणि त्याचे परिणाम याचा विचार करणे आवश्यक आहे.
    ● आयकर रद्द करण्याचा प्रस्ताव देशाच्या भविष्यासाठी व्यवहार्य आणि फायदेशीर प्रस्ताव आहे की नाही हे ठरवण्यासाठी आर्थिक वाढ आणि निष्पक्षता बाळगून यातील संभाव्य उणीवांकडे लक्ष देणारा संतुलित दृष्टीकोन बाळगणे महत्वाचे आहे.

    ©उदय पिंगळे
    अर्थ अभ्यासक

    (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे पदाधिकारी असून महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार आहेत, लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत)

    आणखी वाचा