Category: लेख

  • कोण म्हणतं जॉब करणारे श्रीमंत नाही बनू शकत? ‘असे’ प्लॅनिंग करून तुम्हीही श्रीमंत बनू शकता

    कोण म्हणतं जॉब करणारे श्रीमंत नाही बनू शकत? ‘असे’ प्लॅनिंग करून तुम्हीही श्रीमंत बनू शकता

    आर्थिक नियोजन

    आपण या लेखातून जॉब करणारा व्यक्ती कशाप्रकारे योग्य आर्थिक नियोजनाद्वारे श्रीमंत कसा बनू शकतो, हे पाहूयात. आज तुमचा पगार कमी जरी असला, तरीही तुम्ही स्वत:ला धन्यवाद द्या की, तुम्ही या काळात जन्माला आलात. कारण, आज तुम्ही कुठल्या कॉलेजमधून आलात, त्याचे महत्त्व कमी झाले आहे. तुमची पदवी काय आहे, त्याचे महत्त्व कमी झाले आहे. एवढंच काय, तर तुमचे मार्क्स किती आहेत, याचेही महत्त्व कमी झाले आहे. आजपासून १०-१५ वर्षांपूर्वी या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरत होत्या. मात्र, आता त्यांचा एवढा फरक पडत नाही. आता फक्त एकच गोष्ट गरजेची आहे, ते म्हणजे तुम्ही कोणत्या एका गोष्टीमध्ये चांगले आहात. तसेच, जर तुम्ही एखाद्या गोष्टीत चांगले नसलात, पण तुम्हाला त्यात रस असेल; तर तुम्ही मोफत इंटरनेटच्या वापराने त्यात चांगले होऊ शकता. मग ते काहीही असू शकते. ग्राफिक्स डिझायनिंग असू शकते, वेब डेव्हलपमेंट असू शकते किंवा कंटेंट रायटिंगदेखील असू शकते.

    तुम्ही कोणत्यातरी एका गोष्टीत स्वतःला एक चांगली व्यक्ती बनवू शकला, तर कोणतीही कंपनी तुम्हाला जॉब देईल, जिथे तुमचा पगार २० हजार किंवा त्याहून अधिक असेल. तर अशा परिस्थितीत आम्ही जे आर्थिक नियोजन तुम्हाला सांगत आहोत, ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

    How job seekers can become rich know here

    जर तुमचा पगार २० हजार रुपये किंवा त्याहून अधिक असेल, तर तुम्ही कोट्याधीश कसे बनू शकता? यासाठी काही नियम आहेत. एक असा की, ५०, ३० आणि २० नियम. या नियमानुसार, तुमचा जो काही पगार आहे, त्यातील ५० टक्के पगार तुम्ही गरजांवर खर्च करू शकता. जसे की, वीज बिल, पेट्रोल, फोन बिल, खान-पान आणि घराचे भाडे. त्यानंतर ३० टक्के पगार तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींवर खर्च करू शकता. जसे की, चांगले कपडे घ्यायचे आहेत, पार्टी करायची आहे, कुठे फिरायला जायचे आहे, मूव्हीला जायचं आहे. यानंतर पुढचा भाग येतो २० टक्के पगार, जी आहे बचत. तुम्हाला तुमच्या पगारातील कमीत कमी २० टक्के पैशांची बचत करायची आहे. त्यानंतर याच पैशांची गुंतवणूक करायची आहे. चला तर, आपण याची आकडेमोड करून पाहूयात.

    तुमचा पगार फक्त २० हजार असला, तरीही हा हिशोब वैध आहे. आपण २० हजार रुपयांविषयी बोलत आहोत, तर तुम्हाला यापैकी किती रुपयांची बचत करायची आहे, तर २० टक्के. तुम्ही जर यापेक्षा जास्तीची बचत करू शकला, तर अति उत्तम. २० टक्के रक्कम तुम्ही बचत करत आहात, तर ती रक्कम होते ४ हजार रुपये. आता ४ हजार रुपयांची तुम्ही बचत करत आहात किंवा तुमचं ते ध्येय आहे. आता आपण पाहूयात की, तुम्ही जे ४ हजार रुपये बचत करत आहात, त्यातून तुम्ही काय कराल. पहिला नियम होता ५०-३०-२० आता आपण दुसरा नियम पाहूयात, जो गुंतवणुकीचा आहे. त्यानुसार तुम्हाला त्या ४ हजार रुपयांची गुंतवणूक करायची आहे.

    How job seekers can become rich know here

    यासाठी तुम्ही जीवन विमा घेऊ शकता. तुम्ही जर तरुण असाल, २७ ते ३० पेक्षा कमी वयाचे, तर तुम्हाला १ कोटी रुपयांचा विमा मिळेल. हा तुम्हाला साधारण ५०० रुपये प्रति महिना हिशोबाने मिळेल. आता ४ हजारातील ५०० रुपये गेले, तेव्हा तुम्ही साधारण विमा नाही, तर टर्म प्लॅन घ्याल आणि काही गोष्टींची काळजी घ्या. जसे की, कुटुंबातील सर्वांचा जीवन विमा घ्यायचा नाहीये. जे कमावते लोक आहेत किंवा तुम्ही कमावते आहात, तर तुमचा विमा घ्या. कोणत्याही स्कीममध्ये अडकून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका.

    दुसरी पायरी म्हणजे, आरोग्य विमा. हा विमा सर्वांचा घ्यायचा आहे. कारण, आजारी कुणीही पडू शकतो. त्यामुळे यासाठी जवळपास ५०० रुपयात तुमचा आरोग्य विमाही मिळेल. आता ४ हजारांपैकी १ हजार रुपये तुमच्या जीवन आणि आरोग्य विम्यासाठी खर्च झाले. सर्वप्रथम ही दोन कामे केली पाहिजेत.

    आपत्कालीन निधी

    आता पुढची पायरी म्हणजे आपत्कालीन निधी. आजकाल फ्रीलान्सिंग सुरू आहे. मात्र, त्याचाही काही भरोसा नाहीये. कधी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाते. कधी व्यवसाय ठप्प पडतो, किंवा लॉकडाऊनची स्थिती उद्भवते. कोणतीही आपत्कालीन स्थिती उभी राहते. मात्र, खर्च हा सुरूच असतो. त्यामुळे त्याची आधी तयारी करायची. त्यानंतर गुंतवणुकीचा विचार करायचा.

    जर तुमच्या घरात एकटे कमावते असाल, तर तुमच्याकडे सहा महिन्यांचा आपत्कालीन निधी असावा. तसेच, जर तुमच्या घरात दोन कमावते लोक असतील, तर तुमच्याकडे तीन महिन्याचा आपत्कालीन निधी असावा. आता तीन महिन्यांचा आपत्कालीन निधी समजून घेऊयात. तुमचा पगार २० हजार आहे, तर आपण ५०-३०-२० नियमानुसार ५० टक्के रुपये तुमच्या गरजांसाठी आहेत, त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. तुमची नोकरी जरी गेली, तरीही तुम्ही तो खर्च दुर्लक्षित करू शकणार नाहीत. म्हणजेच महिन्याचा १० हजार रुपये हा असा खर्च आहे, जो तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेच. त्यामुळे तुम्ही जर घरातील दुसरे कमावते व्यक्ती असाल, तर तुमचा आपत्कालीन निधी कमीत कमी तुमच्या गरजांपेक्षा तीन पट असला पाहिजे. तसेच, घरातील प्रथम कमावते व्यक्ती असाल, तर आपत्कालीन निधी तुमच्या गरजांपेक्षा सहा पट असला पाहिजे. म्हणजेच तुमच्या महिन्याच्या गरजांवरील खर्च १० हजार रुपये आहे, तर तुमचा आपत्कालीन निधी हा कमीत कमी ३० हजार रुपयांचा असावा. जास्त असेल, तर उत्तमच.

    How job seekers can become rich know here

    आता हे ३० हजार रुपये कसे येणार हे पाहूयात. तुमच्या बचतीतील ४ हजार रुपये जे होते, त्यातील १ हजार महिना तर विम्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील. उरलेल्या ३ हजार रुपयांतून तुम्ही आताच गुंतवणुकीला सुरुवात करू नका. तुम्हाला १० महिन्यांसाठी ते ३-३ हजार रुपये जोडून बचत खात्यात आधी ३० हजार रुपये जमा केले पाहिजेत. तसेच, तुम्ही पे ऑटो स्विच ऑन करा. जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही पैसे खर्च कराल, तर एफडी करा, जी रक्कम काढता येऊ शकेल. अशाप्रकारे तुम्ही १० महिन्यांपर्यंत ३-३ हजार रुपये जमा करून आपत्कालीन निधी तयार करू शकता. हे तुम्ही कामाला लागल्यानंतर पहिल्या १० महिन्यात करावे लागणार आहे.

    जीवन विमा तुम्हाला सर्वप्रथम घ्यायचा आहे. कारण, जितक्या तरुण वयात तुम्ही हा विमा घ्याल, तेवढा तुम्हाला प्रीमियम (हप्ता) कमी भरावा लागेल. तर या झाल्या तीन महत्त्वाच्या पायऱ्या. तुम्ही तुमचा जीवन आणि आरोग्य विमा घेतला. तुमचा आपत्कालीन निधी बनवला. आता ११ महिन्यानंतर तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता.

    गुंतवणूक

    अनेकजण काय करतात की, पहिल्या महिन्यापासूनच गुंतवणूक सुरू करतात. तसे करायचे नाही. जेव्हा ११ महिने होतील, तेव्हा गुंतवणूक सुरू करा. तुमच्याकडे आता ३ हजार रुपये आहेत, तुम्हाला स्टॉक्समध्ये, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवायचे आहेत, तर आता तुम्ही गुंतवू शकता. म्युच्युअल फंड्समध्ये अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास १२-१५ टक्के परतावा सहज मिळवू शकता. यासाठी एखाद्या अनुभवी आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता.

    आपण अद्याप एक गोष्टीचा हिशोब केलाच नाही, तो म्हणजे तुमचा पगार कायम २० हजार असणार नाहीये. कधी ना कधी तुमचा पगार वाढणार आहे. तुम्ही नेहमी एवढीच गुंतवणूक करणार नाहीयेत. नक्कीच त्यात वाढ कराल. त्यामुळे जेव्हा तुम्ही जास्त गुंतवणूक कराल, तेव्हा तुम्हाला जास्त पैसे लागतील आणि त्यावर जास्त परतावा मिळेल. जसे तुम्ही सध्या ३००० रुपयांची गुंतवणूक करत आहात, पण पुढच्या वर्षी त्यात १५ टक्के वाढवाल. म्हणजेच पुढच्या वर्षी तुम्ही ३ हजार नाही, तर जवळपास ३५०० हजार रुपये गुंतवाल. त्यानंतर पुन्हा तुम्ही १५ टक्के वाढवाल. आता एक प्रश्न असाही आहे की, कुणाचा पगार दरवर्षी १५ टक्के वाढतो. जर महागाईचा दर ६.७ टक्के वाढला आणि तुमचा पगार १० टक्क्यांनी वाढला, तर तुमच्या पगाराच्या २० टक्के रक्कम गुंतवत आहात आणि त्यात तुम्ही १० टक्क्यांच्या वाढ केली, पण इतर ८० टक्के खर्च तुमचा गरजा आणि इतर गोष्टींसाठी ६ टक्क्यांनीच वाढला, तरी ४ टक्के तुम्ही गुंतवू शकाल.

    How job seekers can become rich know here

    आपण हे एका उदाहरणाद्वारे समजूया. समजा तुमचा पगार २० हजार आहे. आपण ५/६ टक्क्यांची महागाई पकडली, तर हिशोब सोपा होईल. आता ५ टक्के मानूया आणि तुमचा पगार १० टक्क्यांनी वाढला, तर पगार झाला २२ हजार. आधी तुमचा पगार २० हजार होता, तेव्हा तुमच्या गरजा आणि इतर गोष्टींसाठी ५०+३० म्हणजेच ८० टक्के म्हणजेच २० हजार पगाराच्या ८० टक्के रक्कम होते १६ हजार. आता तुमच्या मागील वर्षीच्या गरजा आणि इतर गोष्टींवरील खर्च १६ हजार होता. आता महागाई ५ टक्के वाढली आहे असे समजू. जे काम तुमचे आधी १६ हजारात व्हायचे, त्यावर आता ५ टक्के आणखी खर्च होत आहे, तेव्हा तुमचे ८०० रुपये आणखी खर्च होत आहेत, तेव्हा मागील वर्षी जे काम १६ हजारात व्हायचे, त्यासाठी आता १६८०० रुपये मोजावे लागत आहेत. तुमचा पगार २ हजारांनी वाढला आहे, ज्यातील ८०० रुपये महागाईमुळे खर्च झाले, तरीही तुमच्याकडे १२०० रुपये आहेत.

    आता हे समजून घेऊयात की, २० टक्के नियम हा आहे की, २० टक्के तुम्हाला आणखी गुंतवायचे आहेत. जेव्हा तुम्ही २० हजार कमवत होता, तेव्हा त्यातून ४ हजार रुपये बचत करायचा. आता तुम्ही २२ हजार कमवत आहात, तर त्याचे २० टक्के होतात ४४००.

    तुम्ही ४ हजार रुपये बचत करण्यापासून सुरुवात केली होती. त्यातील १ हजार रुपये विम्यासाठी गेले आणि ३ हजार रुपये उरले आणि तुम्ही प्रत्येक महिन्यात गुंतवणूक करू लागला. जर तुम्ही आता २०-२५ वर्षांचे असाल, तर ४०-४५ वर्षांचे होईपर्यंत २० वर्षांत तुम्ही दर वर्षी ३ हजारांपासून सुरू केलेली गुंतवणूक १५ टक्क्यांनी वाढवत असाल, तर तुम्हाला १२ किंवा १३ टक्क्यांच्या हिशोबाने ४० वयापर्यंत १ कोटी रुपये जमा होतील. म्हणजेच तुम्ही चाळिशीपर्यंत कोट्याधीश बनाल. २० वर्षांनंतर तुमच्याकडे १ कोटी असतील आणि तुम्ही आणखी ५-६ वर्षे थांबलात, तर तुमच्याकडे ५० वयापर्यंत २ कोटी रुपये येतील. यात दोन प्रश्न उद्भवू शकतात, त्यातील एक असा की, दोन कोटी जरी असले, तरीही तेव्हा यांचे मूल्य किती असेल.

    हेही आपण पाहूयात. आजपासून २५-३० वर्षांनंतरही २ कोटी रुपयांचे मूल्य जर ५-६ टक्के महागाई पकडली, तरीही तुमच्याकडे त्यावेळी आजच्या हिशोबाने ६५-७० लाख रुपये असतील. एवढ्या पैशात तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. आणखी एक गोष्ट अशी की, तुमचे लग्न झालेले असेल. त्यामुळे तुमचा पार्टनरही कमावता असेल. त्यामुळे दोघेही कमावते असल्यामुळे खर्च वाढणार नाही. अनेक खर्च सामान्य असतात. घरखर्च तेवढा वाढणार नाही. तुमची बचत जास्त होऊ शकते. कधी पगारात १० टक्क्यांची वाढ मिळेल, कधी २० टक्क्यांची, तर कधी ३० टक्क्यांची. या गोष्टींचा हिशोबही आपण अद्याप केला नाही. त्यानंतर एक शेवटचा प्रश्न असा की, ५० वर्षांच्या वयात श्रीमंतीचा काय फायदा.

    तर हे आपण एकदम वर्स्ट केसमध्ये पाहिलं आहे. मात्र, जर तुमच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळाला. जर तुम्ही जास्त गुंतवणूक केली, तर होऊ शकतं की, तुम्ही ३५-४० वयात श्रीमंत होऊ शकाल. त्यामुळे तेव्हा तुम्ही या पैशांचा मनासारखा वापर करू शकाल.

    आणखी वाचा

  • १० लाख कर्ज काढून शेती पिकवणारा आणि ४०० कोटींचा टर्नओव्हर करणारा ‘शेतकरी’

    १० लाख कर्ज काढून शेती पिकवणारा आणि ४०० कोटींचा टर्नओव्हर करणारा ‘शेतकरी’

    पुण्याच्या मुळशीचा हा माऊली.

    वडील शेतकरी. परंपरागत पद्धतीने शेती करणारे.

    शेतीत फायदा नाही म्हणून माऊलीने दहावीनंतर ऑफिस बॉयची नोकरी पत्करली. बारा वर्षें नोकरी केली.

    माऊलीच्या आयुष्यास कलाटणी मिळाली ती एका बातमीमुळे. ती बातमी ही होती, “10 गुंठ्यात 12 लाखाचे उत्पन्न.”

    माऊली त्या शेतकऱ्यास जाऊन भेटला. तो फुलांची शेती करत असे. माऊली त्या शेतकऱ्याचे यश पाहून भारावला. स्वतःच्या शेतीत तोच प्रयोग करण्याचे ठरवले. नोकरीचा राजीनामा दिला. फुलांची शेती करण्याचा चंग बांधला आणि झपाटून कामाला लागला. बऱ्याच प्रयत्नांतून बँकेने दहा लाख कर्ज दिले आणि या माऊलीने ‘पुण्यातील पहिलंवहिलं पॉलिहाऊस’ उभं केलं आणि फुलांची हायटेक शेती सुरू केली.

    पाणी, वीज, खतं आणि मजूर या सगळ्या गोष्टींचा कमीत कमी वापर, सोबत बाजारपेठेवरही लक्ष. या गोष्टींमुळे माऊलीने ‘दहा लाखाचं कर्ज अवघ्या एका वर्षात फेडलं.’

    या पराक्रमाने बघता बघता माऊली हिरो झाला. वर्तमानपत्रे, टीव्हीवर माऊली झळकू लागला. माऊलीकडे कित्येक शेतकरी मार्गदर्शन घ्यायला येऊ लागले आणि यातून निर्माण झाली एक संस्था… ‘अभिनव फार्मर्स क्लब’. या गटात भागातील ३०५ शेतकरी सहभागी झाले. माऊलीने या साऱ्या शेतकऱ्यांची घडी व्यवस्थित बसविली. परिणामतः त्या सर्व ३०५ शेतकऱ्यांनी एकाच दिवशी ३०५ ‘मारुती 800’ गाड्या विकत घेतल्या.

    आज कित्येक इंजिनिअर, डॉक्टर किंवा सीए या लोकांना सुध्दा ८ तास काम केल्यावर वार्षिक ५ लाख निव्वळ नफा राहत नाही. मात्र येथील शेतकरी दररोज फक्त ५ तास काम करुन हे उद्दिष्ट साध्य करतात. प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतःचा बंगला व चारचाकी सुध्दा आहे.

    एक एकर शेतीचे दोन तुकड्यात विभाजन केले जाते. एका तुकड्यात भाजीपाला लागवड केली जाते. उरलेल्या तुकड्यात पॉलिहॉऊस/ग्रीनहाऊस शेती केली जाते. या पॉलिहॉऊसमध्ये विदेशी भाज्या पिकवल्या जातात. या भाज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये विकल्या जातात. पिकवलेल्या भाज्या शेताच्या बांधावरुनच भरुन नेल्या जातात. त्यामुळे विकण्यासाठी बाजारात नेणे व वाहतूकीचा खर्च या गोष्टीसुध्दा शेतकऱ्याला कराव्या लागत नाहीत.

    यासोबतच एक देवनी गाय सर्व शेतकऱ्यांनी पाळली आहे. तिला खाद्य कमी लागते मात्र ही गाय दूध जास्त देते. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते. या दुधाबरोबरच सर्व शेतकरी गोमूत्र साठवून ठेवतात व औषधे बनविणाऱ्या कंपन्यांना विकतात. त्यातूनसुध्दा चांगली कमाई केली जाते.

    सध्या ‘अभिनव फार्मर्स क्लब’ या गटात ४५००० शेतकरी आहेत. ग्रुपकडून केली जाणारी शेती पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने केली जाते. ‘अभिनव फार्मर्स क्लब’ला या कामासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

    केवळ “दहावी शिक्षण” झालेल्या माऊलीने आजवर ३५पेक्षा जास्त देशाचे दौरे केलेले आहेत, जे एखाद्या IT इंजिनीअर ला देखील जमले नसेल. आजवर माऊलीला २००० पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. हा माऊली म्हणजेच श्री. ज्ञानेश्वर बोडके.

    भारतीय समाज शेतीकडे ‘डबघाईला आलेला व्यवसाय’ म्हणून पाहत असताना श्री. ज्ञानेश्वर बोडके यांनी शेतकऱ्यांना शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवण्याची ‘सिस्टिम’ शोधून काढली. ती यशस्वीपणे राबवली. डबघाईला आलेल्या शेतीला आणि शेतकऱ्यांना त्यांच्या प्रयत्नाने सुगीचे दिवस आले आहेत. त्यांना राष्ट्रपती पारितोषक सुद्धा जाहीर झाले आहे.

    घरच्यांचा विरोध, आर्थिक परिस्थिती आणि अल्पसंतुष्टी वृत्तीला श्री. ज्ञानेश्वर बोडके बळी पडले असते. तर, आज ते कोठे असते? त्याच ऑफिसमध्ये… ऑफिसबॉय म्हणून… आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना श्री. बोडके यांना लाख संकटे आली असतील, पण ते तरीही डगमगले नाहीत आणि शेती फायद्याची कशी हे सिद्ध करून दाखविले. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

    १३ जानेवारी २०१८ रोजी या माऊलीला प्रत्यक्ष पाहण्याचा आणि ऐकण्याचा लाभ मु. पो. घारेवाडी, ता. कराड येथील बलशाली युवा हृदय संमेलनमध्ये मिळाला होता.

  • तेजीनं होणार भारताची प्रगती, ७ वर्षांत भारताची अर्थव्यवस्था दुपटीनं वाढून ७ ट्रिलियन डॉलरपार जाणार

    तेजीनं होणार भारताची प्रगती, ७ वर्षांत भारताची अर्थव्यवस्था दुपटीनं वाढून ७ ट्रिलियन डॉलरपार जाणार

    भारताच्या वेगवान अर्थव्यवस्थेबाबत सर्वच बाजूंनी चांगली बातमी येत आहे. सातासमुद्रापार भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं २०२४ साठी भारताचा जीडीपी वाढीचा दर ६.८ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मूडीजनं आपलं रेटिंग ६.१ टक्क्यांवरून ६.८ टक्के केलंय. आता आणखी एका रेटिंग एजन्सीनं भारताच्या विकासाच्या गतीला मान्यता दिली आहे. क्रिसिल रेटिंग एजन्सीनं भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक संकेत दिलेत. CRISIL च्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारताचा जीडीपी ६.८ टक्क्यांच्या वेगाने वाढेल. रेटिंग एजन्सीस भारताचा विकासाचा दर वाढवत असताना आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या चीनची स्थिती मात्र बिकट आहे. आर्थिक मंदी आणि व्यवसायांसाठी प्रतिकूल परिस्थितींचा सामना करत असलेल्या चीननं यावर्षी पाच टक्के आर्थिक वृद्धीचं लक्ष्य ठेवलं आहे.

    रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या मते, पुढील आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी ६.८ टक्के दरानं वाढण्याचा अंदाज आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलनं पुढील आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढीचा दर ६.८ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आणि २०३१ पर्यंत भारत उच्च-मध्यम उत्पन्न असलेला देश बनेल अशी शक्यता व्यक्त केलीये. २०३१ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होऊन ७ ट्रिलियन डॉलर (५८० लाख कोटी) होईल असंही त्यांनी म्हटलंय.

    भारतीय अर्थव्यवस्थेला देशांतर्गत संरचनात्मक सुधारणेमुळे आधार मिळेल. २०३१ पर्यंत भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची क्षमता राखू शकते आणि त्यात सुधारणाही करू शकते. चालू आर्थिक वर्षात अपेक्षेपेक्षा ७.६ टक्क्यांच्या वाढीनंतर, २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताची वास्तविक जीडीपी वाढ ६.८ टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा असल्यातं क्रिसिल रेटिंग्सनं आपल्या ‘इंडिया आउटलुक’ अहवालात म्हटलं आहे.

    ७ लाख कोटींची अर्थव्यवस्था

    रिपोर्टनुसार, पुढील सात आर्थिक वर्षांमध्ये (२०२४-२५ ते २०३०-३१) भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडून सात ट्रिलियन डॉलरच्या जवळपास पोहोचेल. क्रिसिलनं सांगितलं की, या कालावधीत अंदाजे सरासरी ६.७ टक्क्यांची वाढ भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवेल. आर्थिक वर्ष २०३०-३१ पर्यंत, भारताचे दरडोई उत्पन्न देखील उच्च-मध्यम उत्पन्न गटापर्यंत पोहोचेल. भारत सध्या ३.६ ट्रिलियन डॉलरच्या (२९६ लाख कोटी) जीडीपीसह (GDP) जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताच्या पुढे अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी हे देश आहेत.

  • क्रेडिट कार्डबाबत आरबीआय’ची मोठी अपडेट! ग्राहक आता त्यांना हवे ते पेमेंट नेटवर्क निवडू शकणार

    क्रेडिट कार्डबाबत आरबीआय’ची मोठी अपडेट! ग्राहक आता त्यांना हवे ते पेमेंट नेटवर्क निवडू शकणार

    भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना एका पेक्षा अधिक कार्ड नेटवर्क निवडण्याचा पर्याय देण्याचे निर्देश दिले आहेत. क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँका आणि बिगर बँकांना ग्राहकांना एकाधिक कार्ड नेटवर्कमधून निवडण्याचा पर्याय द्यावा लागणार आहे. कार्ड जारी करताना हा पर्याय दिला जाईल.

    आरबीआयने म्हटले आहे की, ‘कार्ड नेटवर्कशी असा कोणताही करार करू नये ज्यामुळे त्यांना इतरांच्या सेवांचा लाभ घेण्यापासून वंचित रहावे लागले, यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अधिकृत कार्ड नेटवर्कची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये American Express Banking Corp, Diners Club International Ltd, MasterCard Asia/Pacific Pte, National Payments Corporation of India-Rupay आणि Visa Worldwide Pte यांचा समावेश आहे. या मार्गदर्शक तत्त्वांद्वारे, आरबीआय क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या आणि वापरणाऱ्या ग्राहकांसाठी अधिक पर्यायांची खात्री करू देण्याचा प्रयत्न करत आहे. आरबीआयच्या मते, काही कार्ड नेटवर्क आणि जारीकर्त्यांमधील करार ग्राहकांच्या पर्यायांवर मर्यादा घालत आहेत.

    आरबीआयने दिले निर्देश

    कार्ड जारीकर्त्यांना करारनामा करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना इतर कार्ड नेटवर्कच्या सेवांचा लाभ घेता येत नव्हता. आता कार्ड जारी करणाऱ्यांना कार्ड जारी करताना पात्र ग्राहकांना एकाधिक कार्ड नेटवर्कमधून निवडण्याचा पर्याय द्यावा लागेल. आता क्रेडिट कार्ड असणाऱ्यांना त्यांचे ते कार्ड अपडेट करत असताना त्यांना हा नवीन पर्याय दिसणार आहे.

    कार्डची सेवा पुरवणाऱ्या काही व्यवस्था पाहिल्यानंतर आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. कार्ड नेटवर्कमधून निवड करताना ग्राहकांना निवडीच्या उपलब्धतेसाठी या व्यवस्था अनुकूल नाहीत. हे नियम त्या क्रेडिट कार्ड जारीकर्त्यांना लागू होणार नाहीत, ज्यांच्या जारी केलेल्या सक्रिय कार्डांची संख्या १० लाखांहून कमी आहे.

  • महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल (मैत्री)

    महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल (मैत्री)

    महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल (मैत्री) ही सुविधा महाराष्ट्र सरकार द्वारा सुरु केली गेली आहे. ही सुविधा महाराष्ट्र राज्य पुरतीच मर्यादित केली गेली आहे . या सुविधेच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने मैत्री (महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल) पोर्टल विकसित केले आहे . सहजपणे व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल (मैत्री) ची सुरवात केली आहे . व्यवसायाशी संबंधित गुंतवणूक संबंधित माहिती, मार्गदर्शन या सारख्या समस्या दूर करण्यासाठी एक सिंगल विंडो कार्यक्रम सुरु केला आहे. मैत्री मध्ये एका ठिकाणी १६ सरकारी विभाग आणि ४४ सेवा उपलब्ध आहे. या पोर्टल द्वारे आवेदक परवाना, प्रमाणपत्र ऑनलाइन पोर्टल च्या मदतीने कोणताही आराखडा मंजूर करू शकतो. १६ सरकारी विभागांना पासून नोडल अधिकारी सेवा उपलब्ध आहेत विशेषज्ञ सेवा व इतर सुविधा उपलब्ध आहेत.

    मैत्री काय आहे?

    महाराष्ट्र शासनाने मैत्री (महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल) पोर्टल विकसित केले आहे. सहजपणे व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल (MAHARASHTRA INDUSTRY, TRADE AND INVESTMENT FACILITATION CELL – MAITRI) ची सुरवात केली आहे . व्यवसायाशी संबंधित गुंतवणूक संबंधित माहिती, मार्गदर्शन या सारख्या समस्या दूर करण्यासाठी एक सिंगल विंडो कार्यक्रम सुरु केला आहे. मैत्री मध्ये एका ठिकाणी १६ सरकारी विभाग आणि ४४ सेवा उपलब्ध आहे. या पोर्टल द्वारे आवेदक परवाना, प्रमाणपत्र ऑनलाइन पोर्टल च्या मदतीने कोणताही आराखडा मंजूर करू शकतो. १६ सरकारी विभागांना पासून नोडल अधिकारी सेवा उपलब्ध आहेत विशेषज्ञ सेवा व इतर सुविधा उपलब्ध आहेत.

    महाराष्ट्र मैत्री ऑनलाइन पोर्टल मार्फत येणारी एकूण खाती

    1. उद्योग विभागा
    2. उद्योग संचालनालय (DOI)
    3. महसूल विभाग
    4. नगर विकास विभाग (UDD)
    5. उद्योग संचालनालय
    6. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)
    7. पाटबंधारे विभाग
    8. पर्यावरण विभागाच्या
    9. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय (डिश)
    10. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ)
    11. महाराष्ट्र अग्निशमन सेवा
    12. विक्री कर विभाग
    13. सार्वजनिक बांधकाम विभाग (सध्याचे मुंबई)
    14. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ मर्यादित (महावितरण)
    15. बाष्पक संचालनालय
    16. कामगार विभाग

    महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल (मैत्री) ची वैशिष्ट्ये:

    • सहजपणे व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल (मैत्री) ची सुरवात केली आहे
    • व्यवसायाशी संबंधित गुंतवणूक संबंधित माहिती, मार्गदर्शन या सारख्या समस्या दूर करण्यासाठी एक सिंगल विंडो कार्यक्रम सुरु केला आहे
    • मैत्री मध्ये एका ठिकाणी १६ सरकारी विभाग आणि ४४ सेवा उपलब्ध आहे
    • या पोर्टल द्वारे आवेदक परवाना, प्रमाणपत्र ऑनलाइन पोर्टल च्या मदतीने कोणताही आराखडा मंजूर करू शकतो
    • १६ सरकारी विभागांना पासून नोडल अधिकारी सेवा उपलब्ध आहेत
    • विशेषज्ञ सेवा व इतर सुविधा उपलब्ध आहेत

    मैत्री पोर्टलच्या विविध सेवांसाठी अर्ज कसा करावा:

    1. फक्त महाराष्ट्र उद्योग, व्यापार भेट आणि गुंतवणूक सुविधा सेल (मैत्री) च्या अधिकृत साइटला भेट द्या : https://maitri.mahaonline.gov.in/Home/home
    2. लॉगिन करा वर क्लिक करा https://maitri.mahaonline.gov.in/
    3. आपण नवीन वापरकर्ता असल्यास नोंदणी लिंकवर क्लिक करा आणि सर्व आवश्यक माहिती भरा
    4. यशस्वी नोंदणी झाल्या नंतर, वापरकरत्याला लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळेल
    5. त्यानंतर वापरकर्ता मैत्री पोर्टल महाराष्ट्र सरकार अंतर्गत येणाऱ्या विविध सेवांसाठी अर्ज करू शकतो

    संपर्काची माहिती:

    1. c / o. महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ (MSSIDC), ‘Krupanidhi’ बिल्डिंग, ९, वालचंद शेठ मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४०००३८
    2. ९१-२२-२२६२२३६२ / २२६२ २३२२
    3. ifcincharge@mahaebiz.com

    संदर्भ तपशील:

    1. महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल (मैत्री) अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी: https://maitri.mahaonline.gov.in/Home/home
    2. महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल (मैत्री) चे पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी इथे भेट द्या: https://maitri.mahaonline.gov.in/PDF/MAITRI%२०_Brochure.pdf
    3. मैत्री पोर्ट्ल चे पीडीफ: https://maitri.mahaonline.gov.in/PDF/Doing_Business_in_Maharashtra_२०१६.pdf
  • २५ हजार रुपयांत सुरु होणारे १०० व्यवसाय

    २५ हजार रुपयांत सुरु होणारे १०० व्यवसाय

    व्यवसायात यायचं तर भांडवल हवे म्हणून अनेक तरुण मागे हटतात, पण त्यांच्याच हातात मी २० हजाराचा मोबाईल पाहतो. मेहनत करण्याची तयारी असणाऱ्यांसाठी १०० व्यवसाय सुचवत आहे. मी मोठ्या खानदानातला, मी उच्चशिक्षित, मी आता व्यवसाय कसा करू म्हणणाऱ्या व घरचं फुकट खाऊन फिरणाऱ्यांसाठी या संकल्पना नाहीत.

    1. चहाची गाडी
    2. डोसा सेंटर
    3. सँडविच गाडी
    4. कट फ्रुट व्यवसाय
    5. भाजीपाला विक्री
    6. फळविक्री
    7. ओली व सुकी भेळ
    8. कडबा कुट्टी
    9. मसाला ताक
    10. कागदी/कापडी पिशव्या
    11. पेस्टकंट्रोल
    12. बॉडी मसाज/फिजिओथेरपी
    13. पार्सल बिर्याणी सेंटर
    14. मटका कुल्फी
    15. सोसायटी भाजीपाला केंद्र
    16. होम अप्लायसेन्स रिपेअरिंग
    17. एसी मेंटेनन्स
    18. कॉम्प्युटर सेंटर
    19. ओला/उबेर टॅक्सी
    20. टुरिस्ट गाईड
    21. होम पेंटिंग
    22. इंटिरिअर डिझाईन
    23. कन्सल्टंसी
    24. वॉलपेपर डिझाईन
    25. कटपीस गारमेंट सेंटर
    26. पोहा, उपमा नाश्ता सेंटर
    27. फ्रुटज्यूस गाडी
    28. मसाला दूध गाडी
    29. प्लंबिंग
    30. इलेक्ट्रिशियन
    31. पेपर एजन्सी
    32. स्क्रॅप मर्चंट
    33. गार्डनिंग लँडस्केपिंग
    34. प्रायव्हेट ट्युशन
    35. वेब डिझायनिंग
    36. स्पोर्टस कोचिंग
    37. फिटनेस ट्रेनिंग
    38. कंटेन्ट रायटिंग
    39. रिव्ह्यू रायटिंग
    40. सायकल रिपेअरिंग
    41. फुलविक्री
    42. जिलेबी गाडी
    43. इस्त्रीचे दुकान
    44. हाऊसकीपिंग
    45. नारळ पाणी
    46. इडली सेंटर
    47. तयार इडली पीठ व चटणी
    48. ट्रॅव्हल एजंट
    49. पार्टी फूड ऑर्डर
    50. बर्थडे इव्हेंट मॅनेजमेंट
    51. नॅचरोपॅथी सेवा
    52. योगा ट्रेनर
    53. ड्रेस डिझायनिंग
    54. चायनीज सेंटर
    55. बेबी सेटिंग
    56. ओल्ड एज केअर
    57. डॉक्यूमेंटेशन सेवा
    58. करिअर कन्सल्टंट
    59. फ्रीलान्स प्रोग्रॅमर
    60. कार वॉशिंग
    61. अकाउंटिंग सेवा
    62. इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट
    63. स्वीटकॉर्न/ मक्याचे कणीस विक्री
    64. पूजापाठ
    65. चहा होलसेल पुरविणे
    66. भजी, वडापाव विक्री
    67. स्पीच थेरपी
    68. सायकॉलॉजी कौन्सिलर
    69. सोसायटी मेंटेनन्स
    70. व्हॉईसओव्हर सेवा
    71. युट्यूब मार्केटिंग
    72. सोशल मीडिया मार्केटिंग
    73. एसईओ, एसईएम मार्केटिंग सेवा
    74. टिफिन सर्व्हिस
    75. रिअल इस्टेट कन्सल्टिंग
    76. बनपाव मस्कापाव केंद्र
    77. पिझ्झा सेंटर
    78. ऊसाचा रस गाडी
    79. लिंबू सरबत
    80. कुल्फी, आईसक्रीम
    81. पुस्तके विक्री
    82. पॉपकॉर्न
    83. घरगुती मेणबत्ती
    84. वेटलॉस ज्यूस सेंटर
    85. ब्युटी पार्लर घरपोच सेवा
    86. ट्रान्सलेशन सेवा
    87. टायपिंग सेवा
    88. इंटरनेट रिसर्च सेवा
    89. लोन सेवा
    90. इन्शुरन्स व्यवसाय सेवा
    91. डेटा मायनिंग
    92. वृक्ष छाटणी सेवा
    93. गोमूत्र संकलन
    94. प्रबोधनपर व्याख्यान सेवा
    95. भजन सेवा
    96. धार्मिक कार्य सेवा
    97. कॅटरिंग
    98. ग्राफिक डिझाईन
    99. घरगुती ट्युशन
    100. मोबाईल रिपेअरिंग इत्यादी शेकडो व्यवसाय आहेत.

    कोणतीही सुरुवात छोटीच असते. महाकाय वडाच्या झाडाची बी राईएवढीच असते. आज चहा विकणारा उद्या स्टार हॉटेलचा मालक असेल, न घाबरता छोटी सुरुवात करा व व्यावसायिक व्हा. एमए, बीएड करून बिनपगारी काम करून संस्थाचालकांची धुणी धुण्यापेक्षा व बीई करून पुण्या-मुंबईत १० हजाराच्या पगाराची भीक मागण्यापेक्षा स्वाभिमानाने स्वतःचा व्यवसाय सुरु करा.

  • भारतीयांसाठी 5 भन्नाट स्मॉल बिझनेस आयडिया, चौथा बिझनेस सर्वात भारी

    भारतीयांसाठी 5 भन्नाट स्मॉल बिझनेस आयडिया, चौथा बिझनेस सर्वात भारी

    उद्योजक बनण्याचं स्वप्न बाळगणारे अनेकजण संघर्ष करताना दिसतात. पण आपल्याकडे घरबसल्या करता येतील अशा अनेक आयडिया आहेत, ज्यातून आपण प्रचंड नफा मिळवू शकतो.

    आम्ही आज कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवून देणारी ५ लहान बिझनेस आयडिया सांगणार आहोत. त्या कोणत्या आयडिया आहेत, जाणून घेऊयात…

    १. सुक्या मेव्याचा व्यवसाय

    सुका मेवा म्हणजेच ड्राय फ्रूट्स शरीरासाठी फायदेशीर असतो. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या घरात सुका मेवा ठेवतो म्हणजे ठेवतोच. सुका मेवा हा लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतो. सुक्या मेव्याच्या आरोग्यासाठी वाढत्या फायद्यांमुळे भारतात सुक्या फळांची विक्री घाऊक, घरगुती, किरकोळ आणि ऑनलाइन मार्केटच्या स्वरूपात होत आहे.

    भारतीय मिठायांमध्ये सुका मेवा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत विशेषतः सणांच्या काळात मिठाईत भेसळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत भेसळयुक्त मिठाई घेण्यापेक्षा सुका मेवा घेण्यास लोक पसंती दर्शवतात. त्यामुळे सुक्या मेव्याची विक्रीही दिवसेंदिवस वाढत आहे.

    अशात हा स्टार्टअप सुरू करून कोणीही पैसे कमवू शकतो. आजकाल सणासुदीला, लग्नसमारंभात सुका मेवाही भेट म्हणून दिला जातो. तुमच्याकडे जागेची उपलब्धता, तुमची भांडवल क्षमता आणि व्यवसायाचे स्वरूप याप्रमाणे तुम्ही तुमचा ड्रायफ्रूट व्यवसाय खालीलप्रमाणे सुरु करू शकता:

    • घरगुती विक्री
    • ऑनलाइन विक्री
    • किरकोळ विक्री
    a2 1

    सामान्यतः डेअरी, बेकिंग उद्योग, मिठाई, सण आणि शुभ समारंभाच्या प्रसंगी पॅकेज केलेल्या भेटवस्तू म्हणून सुकामेवा मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. अंदाजे 15,000 ते 25,000 रुपयांच्या कमी गुंतवणुकीत सुक्या मेव्यांची विक्री घरबसल्या करता येते. या सुकामेव्याच्या विक्रीतून दरमहा 20000 ते 30000 रुपयांइतका नफा मिळू शकतो.

    तुमच्या सुक्या मेव्यासाठी मिठाईची दुकाने, बेकिंगची दुकाने, केटरिंग सेवा, डेअरी आणि मिठाई, ऑनलाइन किराणा दुकाने आणि कॉस्मेटिक उद्योग, ही लक्ष्यित ग्राहकांची काही उदाहरणे आहेत.

    २. स्टेशनरी शॉप

    आपण सर्वजण जाणता की, आजकाल लोकांमध्ये शिक्षणाबाबत बरीच जागृती झाली आहे. तसेच, आता बहुतांश मुले-मुली शिक्षण घेण्यासाठी शाळा-कॉलेजमध्ये जात आहेत. तुम्ही या संधीचा फायदा घेऊन तुमच्या परिसरात अगदी कमी गुंतवणुकीत स्टेशनरीचे दुकान सुरू करू शकता आणि हे स्टेशनरी स्टोअर कुठेही सहज चालू शकते. जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत पैसे कमवायचे असतील, तर तुम्ही स्टेशनरीचे दुकान सुरू करू शकता.

    आजकाल शाळा, महाविद्यालये किंवा कोचिंग सेंटर्स सगळीकडेच पाहायला मिळतात. अशा वेळी मोठी मागणी असलेले स्टेशनरीचे दुकान आपण सुरू करू शकतो. आजच्या काळात, शाळा किंवा कार्यालयीन स्टेशनरीला जास्त मागणी आहे. विशेष म्हणजे, काही बाजारपेठा अशा आहेत, ज्या कधीही बंद होणार नाहीत. त्यात स्टेशनरीचाही समावेश आहे.

    050716 elite

    लॅपटॉप, टॅबलेट आणि मोबाईलच्या जमान्यातही शाळा, कॉलेज आणि ऑफिसमध्ये पेपर आणि पेनचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. रेझ्युमे आणि ग्रीटिंग कार्ड्स आजही जुन्या पद्धतीच्या पद्धतीने कागदावर छापण्यास प्राधान्य दिले जाते. तसेच, फक्त नोटबुक, कागदपत्रे, पेन याशिवाय स्टेशनरीमध्ये बरेच काही आहे.

    जर तुम्ही कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असाल, तर स्टेशनरीचे दुकान सुरू करणे तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरू शकते. स्टेशनरीचे दुकान कसे सुरू करावे याबद्दल काही सूचना देत आहोत.

    स्टेशनरी शॉप सुरू करताना विक्री करायच्या असलेल्या गोष्टींची यादी करा.

    • डिंक, कात्री, टेप, स्टेपलर आणि गिफ्ट रॅपर यांसारखी स्टेशनरी ठेवा.
    • व्हाईटबोर्ड, खोडरबर, क्रेयॉन, पेन, पेन्सिल, शार्पनर, कंपास बॉक्स, पेंट्स, नोटबुक, ग्लोब्सपासून सुरू होणारे शालेय साहित्य.
    • ऑफिस स्टेशनरी सामान जसे की, कार्यालयीन कामासाठी लागणारे व्हाईट पेपर्स, हायलायटर पेन, फोल्डर्स, लिफाफे, ऑर्गनायझर्स, स्टेपलर, मार्कर, फाइल्स, नोटपॅड्स, व्हाईटनर, रबर स्टॅम्प आणि कव्हर.
    • सर्व प्रकारचे चारकोल, वॉटर पेंट्स, स्टेन्सिल इत्यादी.
    • शाईचा बॉक्स, संगणक सॉफ्टवेअर आणि प्रिंटर, हेडफोन, टोनर.
    • रिबन, ग्लिटर, बटणे, मणी, आणि लोकर यांसारखा हस्तकला पुरवठा.
    • पार्टी साहित्य जसे की, रंगीत कागदाचे छोटे तुकडे, फुगे, मुकुट, मुखवटे, स्ट्रीमर आणि मेणबत्त्या.

    तुम्हाला कोणत्या वस्तू विकायच्या आहेत याची कल्पना आल्यावर, एक पोर्टफोलिओ तयार करा आणि तुमच्या स्थानिक भागात जाहिरात करा. हे तुमच्या संभाव्य ग्राहकांना प्रत्यक्ष भेट देण्यापूर्वी स्टोअरमध्ये काय आहे याची कल्पना देण्यात मदत करते.

    ठिकाण- भारतातील इतर लहान व्यवसाय कल्पनांप्रमाणे, तुम्ही दुकान सुरू करण्यापूर्वी तुम्हाला बाजाराचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचे स्टेशनरी स्टोअर मॉलमध्ये किंवा एखाद्या शाळा-कॉलेजच्या किंवा सरकारी कार्यालयाच्या परिसरात उघडू शकता. ज्यामुळे तुमची विक्री होण्याची शक्यता वाढते. स्टेशनरीचे दुकान हे प्रवेशयोग्य असावे, अर्ध-निवासी भागात स्थित आणि तुमचे संभाव्य ग्राहक असण्याची शक्यता असलेल्या लोकांसाठी दिसेल अशा ठिकाणी असावे.

    इतर कोणत्याही लहान स्टोअर किंवा दुकानाप्रमाणे, तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी निधीची आवश्यकता असते. तुमच्या बजेटमध्ये स्टोअरच्या जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार, वीजबिल, वाहतूक, पुरवठा, साठा आणि विविध खर्चांचा समावेश करणे आवश्यक आहे.

    आजच्या पिढीमध्ये, बहुतेक लोक ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देतात. त्यामुळे तुमची माहिती सांगण्यासाठी तुमचे ऑनलाइन स्टेशनरी स्टोअर तयार करा. जसे की, तुमच्या वस्तूंच्या किंमती, मिशन, उद्दिष्टे, तुमचे स्थान, तुमच्या स्टोअरबद्दल, तुम्ही विकू इच्छित असलेल्या वस्तू, मालकी आणि बरेच काही. इतर कोणत्याही छोट्या दुकानाप्रमाणे तुमच्या दुकानाची नोंदणी करा. एकतर एकमेव मालकी, भागीदारी किंवा LLC. आवश्यक स्टेशनरी स्टोअर परवाने आणि व्यापार नोंदणी जसे की, दुकान आणि आस्थापना कायदा परवाना मिळवा. GST सारख्या करांसाठी नोंदणी करा, PAN आणि TAN साठी अर्ज करा.

    या स्टेशनरी व्यवसायातून तुम्ही महिन्याकाठी ४०००० ते ५०००० रुपयांपर्यंतचा नफा कमवू शकता.

    ३. सॅनिटरी पॅड (नॅपकिन) बनवण्याचा व्यवसाय

    महिला त्यांच्या मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी पॅड वापरतात. भारतीय बाजारपेठेत महिलांच्या स्वच्छतेशी संबंधित अनेक प्रकारचे सॅनिटरी पॅड आणि उत्पादने उपलब्ध आहेत. त्यामुळे जर तुम्ही सॅनिटरी पॅड बनवायला सुरुवात केलीत, तर तुम्हाला कमी वेळात भरपूर नफा मिळू शकतो. ज्यांना कमी गुंतवणुकीत लघु-व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी ही भारतातील सर्वोत्तम लघु व्यवसाय कल्पनांपैकी एक आहे.

    sanitary pads business 1019x573 1

    सॅनिटरी पॅड बनवणे सुरू करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही सॅनिटरी पॅड बनवण्याचे प्रशिक्षण घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला या प्रकल्पासाठी योग्य स्ट्रॅटेजी बनवावी लागेल आणि बाजारात सॅनिटरी पॅड नॅपकिन्सची किती मागणी आहे हे समजून घ्या. त्यानंतर, तुम्ही सर्व कच्चा माल आणि आवश्यक मशीन्सची यादी तयार करा आणि तुमचे बजेट सेट करा.

    तुम्ही निधी उभारण्याचा विचार करत असाल, तर प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि स्टार्टअप इंडिया, स्टँड-अप इंडिया, PMEGP अशा कर्ज योजना आहेत, जिथे तुम्ही संपर्क साधू शकता. तसेच, तुमच्या स्टार्टअपसाठी कर्ज मिळवू शकता. या कर्ज योजना तुम्हाला राष्ट्रीयीकृत बँकांकडून अनुदानासह 10 लाख ते 1 कोटींपर्यंत कर्ज घेण्याची परवानगी देतात.

    ४. टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय

    उद्योजक बनायचं ठरवलेल्या तरुणांनो, तुम्ही भारतात कमी गुंतवणुकीसह लघु- प्रकल्प सुरू करण्याचा शोध घेत असाल, तर प्रचंड मागणी असणारा अजून एक व्यवसाय आहे. आजच्या काळात तरुणांना/तरुणींना नवनवीन डिझाइन्स आणि रंगीबेरंगी प्रिंटेड टी-शर्ट्स घालायला आवडतात. तुम्हाला छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही कमी गुंतवणुकीत टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय सुरू करू शकता आणि पैसे कमवू शकता.

    t shirt printing business 1681807097

    टी-शर्ट प्रिंटिंग हा एक लोकप्रिय व्यवसाय बनला आहे. विशेषत: सुरू करण्यासाठी तुलनेने कमी गुंतवणूकीचा व्यवसाय शोधू पाहणाऱ्या उद्योजकांसाठी. तुम्ही प्रिंटेड टी-शर्ट ऑनलाइन विकल्यास सुरुवातीला तुम्हाला कोणत्याही परवान्याची गरज लागत नाही. किंवा तुम्ही साधं शॉप ऍक्ट काढूनसुद्धा सुरुवात करू शकता.

    टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय सुरू कसा कराल?

    • दर्जेदार सामग्रीसाठी विश्वसनीय उत्पादक किंवा पुरवठादाराशी टाय-अप करा
    • लक्ष आकर्षित करण्यासाठी एक निश (Niche) प्रकार निवडा
    • तुमचे टी-शर्ट मॉकअप करा
    • तुमच्या डिझाईन्स तयार करा

    टी-शर्ट प्रिंटिंग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे

    • स्क्रीन प्रिंटिंग
    • उष्णता हस्तांतरण (Heat transfer)
    • डायरेक्ट-टू-गारमेंट (DTG) इत्यादी

    5. टिफिन सर्व्हिस व्यवसाय

    अनेकजण कामासाठी, शिक्षणासाठी आपल्या कुटुंबापासून दूर दुसऱ्या शहरात राहायला जातात. अशावेळी त्यांच्या जेवणाची समस्या उद्भवते. दररोज बाहेरचे अन्न खाल्ल्याने तब्येतही चांगली राहत नाही. अशा परिस्थितीत आजच्या काळात टिफिन सेवेचा व्यवसाय खूप विकसित होत आहे. जर तुम्ही एक महिला असाल किंवा तुम्हाला घरी कमी गुंतवणुकीचा कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल, तर अशा परिस्थितीत टिफिन सेवा व्यवसाय तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो.

    हा व्यवसाय अनेक प्रकारचा असू शकतो, जसे की टिफिन देण्यासाठी लोकांच्या घरी जाणे, ग्राहकांना तुमच्या ठिकाणी बोलावणे आणि त्यांना घरासारखे जेवण देणे.

    Tiffin20COVID

    हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जवळपास २० ते ३० हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तसेच, तुम्ही जर दररोज ५० लोकांना दोन वेळचे जेवण देत असाल, तर तुमचा खर्च वगळून तुम्ही महिन्याला ७० हजार ते ८० रुपयांची कमाई करू शकता.

    अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या वेगवेगळे व्यवसाय करू शकता.

    आणखी वाचा

  • इलॉन मस्कच्या ‘या’ 5 टिप्स ठरतील तुमच्याच फायद्याच्या, शेवटचा सल्ला सर्वात महत्त्वाचा

    इलॉन मस्कच्या ‘या’ 5 टिप्स ठरतील तुमच्याच फायद्याच्या, शेवटचा सल्ला सर्वात महत्त्वाचा

    मस्क हा PayPal, Tesla Motors, आणि SpaceX यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा संस्थापक आहे. मस्क त्याच्या नाविण्यपूर्ण विचारासाठी आणि जोखीम पत्करण्याच्या स्वभावासाठी ओळखला जातो. ज्या व्यक्तीच्या घरी श्रीमंती नांदते अशा मस्कला अनेकदा व्यवसाय चालवण्याबाबत सल्ला विचारला जातो. तेव्हा या लेखातून आपण त्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी सांगितलेल्या ५ महत्त्वाच्या टिप्स कोणत्या आहेत, हे पाहूयात…

    इलॉन मस्कने व्यवसाय सुरू करण्यासाठी सांगितलेल्या ५ टिप्स (Elon Musk’s 5 Best Tips for Running a Business)

    १. तुमच्या कामाप्रती कायम उत्साही राहा

    धनाढ्य इलॉन मस्क (Elon Musk) याच्या मते यशस्वी होण्यासाठी तुम्ही जे काही करत आहात, त्याच्याबद्दल कायम उत्साही असलं पाहिजे. तो म्हणतो, “लोकांनी तेच केलं पाहिजे, ज्याची त्यांना आवड आहे. यामुळे त्यांना इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त आनंद मिळेल.”

    worlds-richest-person-elon-musks-5-best-tips-for-running-a-business

    २. जोखीम पत्करा

    इलॉन मस्क असेही सांगतो की, तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल आणि तुमच्या बँक अकाऊंटमध्ये भर घालायची असेल, तर तुम्ही जोखीम पत्करण्यासाठी तयार असला पाहिजेत. २०१२ सालच्या एका मुलाखतीत मस्क म्हणाला होता की, “प्रत्येकजण एकाच साच्यात बसण्याचा प्रयत्न करत आहे. कारण, जोखीम घेण्याविरूद्ध एक प्रचंड पूर्वाग्रह आहे.” मस्कचा असाही विश्वास आहे की, कोणतीच जोखीम न घेणे, ही सर्वात मोठी जोखीम आहे. विशेषत: अशा जगात जे सातत्याने बदलत आहे. अपयशी ठरण्याची हमी एकमेव स्ट्रॅटेजी देते, ती म्हणजे जोखीम न घेणे.

    worlds-richest-person-elon-musks-5-best-tips-for-running-a-business

    ३. कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा

    इलॉन मस्क हा त्याच्या कामाच्या नैतिकतेसाठी ओळखला जातो. मस्क म्हणतो की, “चिकाटी ही खूप महत्वाची आहे. जोपर्यंत तुम्हाला हार मानायला भाग पाडले जात नाही, तोपर्यंत तुम्ही हार मानू नका.” मस्कचा विश्वास आहे की, यशस्वी होण्यासाठी लोकांना ‘जीवतोड काम’ करावे लागेल. इतरांपेक्षा जास्त मेहनत केल्याने तुमच्या यशाची शक्यता वाढेल.

    worlds-richest-person-elon-musks-5-best-tips-for-running-a-business

    मस्क असेही म्हणतो की, “एकसारख्या कामासाठी जर इतर लोक आठवड्याचे ४० तास कामात घालवत असतील आणि त्याच वेळी तुम्ही आठवड्याचे १०० तास काम करत असाल, तर तुम्हाला माहिती आहे की, त्यांना जी गोष्ट साध्य करण्यासाठी जिथे वर्ष लागतं, ते तुम्ही अवघ्या ४ महिन्यात कराल.” त्यामुळे तुम्ही कठोर परिश्रमासाठी तयार असले पाहिजे. तसेच, तुमचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागेल.

    ४. कायम चिकाटी ठेवा

    इलॉन मस्क आज जगातील दुसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. इथपर्यंत पोहोचण्याच्या त्याचा मार्ग सोपा नव्हता. त्याच्याकडेही अपयशाचा मोठा वाटा होता, पण त्याने चिकाटी दाखवली आणि हार मानली नाही. मस्कने स्थापन केलेल्या Zip2 आणि PayPal या दोन्ही कंपन्यांमधून बाहेर पडल्यानंतर २००८च्या मंदीच्या लाटेत त्याची Tesla आणि SpaceX या दोन्ही कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होत्या. त्यामुळे अनेकांना वाटले की, आता मस्क पुन्हा एकदा अपयशाच्या खाईत लोटला जाईल. पण मस्कने त्याच्या आधीच्या चुकांमधून धडा घेतला आणि आज तो जगातली श्रीमंत व्यक्तींच्या मांडीला मांडी लावून बसला आहे. अशाप्रकारे कोणीही स्वतःचे आर्थिक टप्पे गाठण्यासाठी आणि प्रेरणा शोधण्यासाठी त्याच्या अनुभवातून शिकू शकतो.

    worlds-richest-person-elon-musks-5-best-tips-for-running-a-business

    ५. स्वतःमध्ये गुंतवणूक करत राहा

    इलॉन मस्क याचा एकच सर्वोत्तम सल्ला कोणता असेल, तर तो हा की, “तुम्ही गोष्टी चांगल्या प्रकारे कशा करता येतील याचा सतत विचार करा आणि स्वतःला प्रश्न विचारा.” वयाच्या अवघ्या ८ वर्षापर्यंत मस्क हा दिवसाला तब्बल १० तास वाचन करत होता. त्याची पुस्तक वाचण्याची आवड इतकी प्रचंड होती की, लायब्ररीत वाचण्यासाठी त्याच्याकडील पुस्तके संपली म्हणून त्याने संपूर्ण एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका वाचण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या वयात, मस्क सातत्याने काहीतरी शिकण्यावर आणि स्वत:मध्ये गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित करायचा. त्याने स्वतःला प्रोग्राम करायला शिकवले आणि वयाच्या १२ व्या वर्षी त्याने 500 डॉलर्समध्ये व्हिडिओ गेम लिहिली आणि विकली देखील. पुढे मस्कने पेनिल्व्हेनिया विद्यापीठातून भौतिकशास्त्र आणि अर्थशास्त्रात दुहेरी पदवी घेतली. मस्कने सतत स्वत:मध्ये आणि त्याच्या स्वप्नांमध्ये गुंतवणूक केली. आज पाहा मस्कने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

    worlds-richest-person-elon-musks-5-best-tips-for-running-a-business

    मस्क हा आपल्या काळातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक आहे. मस्कने अनेक व्यवसाय शून्यातून उभे केले आहेत. तसेच, आपली राहण्याची आणि काम करण्याची पद्धत बदलण्यात मदत केली आहे. मस्कचा सल्ला कोणत्याही व्यवसायात लागू केला जाऊ शकतो.

    तुम्ही जर मस्कच्या या टिप्सचे पालन केले, तर तुम्हालाही यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

    आणखी वाचा

  • एकदम फिट झिरोधाच्या मालकाला ह्रदयविकाराचा झटका, काय आहेत यापासून स्वतःला वाचवण्याचे उपाय? डॉक्टर म्हणतात.

    एकदम फिट झिरोधाच्या मालकाला ह्रदयविकाराचा झटका, काय आहेत यापासून स्वतःला वाचवण्याचे उपाय? डॉक्टर म्हणतात.

    अश्नीर ग्रोव्हरचा सल्ला

    शार्क टँकचा माजी परीक्षक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) याने नितीन कामथ (Nithin Kamath) यांना आपल्या तब्येतीची काळजी आणि ब्रेक घेण्यास सांगितले आहे. त्याने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत म्हटले की, “यार, काळजी घे. असे होऊ शकते की, तुझ्यावर तुझ्या वडिलांच्या निधनाचा मोठा परिणाम झाला आहे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्यावरही खूप परिणाम झाला होता. एक दिवस मी पडलो होतो. एक ब्रेक घेऊन टाक.”

    image

    डॉक्टर काय सांगतात?

    डॉक्टर मनन वोरा यांनी त्यांच्या लिंक्डइन अकाऊंटवरून नितीन यांच्या स्ट्रोकविषयी भाष्य केले. ते म्हणतात की, एक डॉक्टर म्हणून हे संकेत देते की, १८ ते ५५ वयातील व्यक्तींमध्ये ही प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. तसेच, त्यांनी हा स्ट्रोक येण्यामागील शक्यताही सांगितल्या आहेत. जेणेकरून तुम्ही त्याची काळजी घेऊ शकता.

    १. तीव्र ताण

    भारतात अति-तणावाचे वातावरण असणे हे सामान्य आहे, परंतु कॉर्टिसॉलसारखे भारदस्त तणाव संप्रेरक रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकतात. तसेच, जळजळ होण्यास हातभार लावू शकतात, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.

    6f8c424b 3e22 49a2 9422 2fd41eb82be5.jpg

    २. झोपेची कमतरता

    सतत झोप न लागल्यामुळे सामान्य हार्मोनल संतुलन बिघडू शकते. तसेच, रक्तदाबही वाढू शकतो, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य आणि स्ट्रोकचा धोका संभवतो.

    b3de61fe ee85 4288 901b 5bf674a0a901.jpg

    ३. भावनिक आघात

    नितीन यांनी अलीकडेच त्यांचे वडील गमावले होते, ज्यामुळे कदाचित ते कामावर परत जाण्यापूर्वी या गोष्टीतून सावरले नसतील. अचानक भावनिक धक्का किंवा तणाव देखील हृदयविकाराच्या झटक्यास कारणीभूत ठरू शकतो.

    7c89183c 9bfa 408e 84d1 16543b048cb8.jpg

    ४. अतिविचार

    व्यायाम करणे सामान्यतः फायदेशीर असले, तरीही जास्त व्यायाम करणे आणि स्वतःवर मर्यादेपेक्षा जास्त जोर देणे, यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर ताण येऊ शकतो. यामुळेच स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

    c6849d17 5094 4da6 9fdb 9f5468a9a6c9.jpg

    ५. पाण्याची कमतरता (Dehydration)

    पाण्याच्या कमतरतेमुळे तुमचे रक्त घट्ट होते आणि तुमच्या रक्तवाहिन्या संकुचित होतात, ज्यामुळे तुमच्या हृदयावर कालांतराने ताण येऊ शकतो.

    e9248c88 60df 4e23 bf60 1d891ec918d4.jpg

    डॉक्टर वोरा पुढे सांगतात की, नितीन यांच्यासोबत जे घडलं, ते कुणासोबतही घडू शकतं, परंतु लक्षणं लक्षात घेऊन आणि लगेच कृती करून तुम्ही तात्काळ बरे होऊ शकता. त्यामुळे तुम्ही स्ट्रोकची लक्षणे FAST या शब्दाद्वारे समजू शकता.

    F: Face dropping (झुकलेला चेहरा)
    A: Arm weakness (हाताला कमजोरी जाणवणे)
    S: Speech difficulty (बोलताना अडचण होणे)
    T: Time to call 102 (१०२ या क्रमांकावर कॉल करणे)

  • बिल गेट्स यांना चहा पाजून जगाचे लक्ष वेधणारा Dolly Chaiwala आहे तरी कोण? जगात रंगलीय चर्चा

    बिल गेट्स यांना चहा पाजून जगाचे लक्ष वेधणारा Dolly Chaiwala आहे तरी कोण? जगात रंगलीय चर्चा

    ‘डॉली चायवाला’ (Dolly Chaiwala) हा बहाद्दर त्याच्या चहा बनवण्याच्या अनोख्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या स्टॉलचे नाव ‘डॉली की टपरी’ (Dolly Ki Tapri) असे आहे. याच नावाने त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अनेक भारतीयांसोबतच परदेशी व्यक्तीही डॉली चायवालासोबत व्लॉग बनवताना दिसतात. मात्र, यावेळी त्याच्या चर्चेत येण्याचं कारण जरा वेगळं आहे.

    डॉली चायवाला याने कुठल्याही साध्या सुध्या नाही, तर चक्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामील असलेले अब्जपती आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांना चहा पाजला आहे. “वन चाय प्लीज” म्हणत बिल गेट्स ‘डॉली की टपरी’वर चहा पिण्यासाठी हजर झाले होते आणि डॉलीचा चहा पिऊन तेदेखील त्याचे दीवाने झाले. खुद्द बिल गेट्स यांनी हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्ही भारतात प्रत्येक ठिकाणी इनोव्हेशन पाहू शकता. अगदी साधा चहा बनवतानाही.”

    44 1

    आता हा व्हिडिओ जगभरात आगीसारखा व्हायरल होत आहे. या व्हिडिओला ६ कोटींहून अधिक व्ह्यूज आणि ४५ लाखांहून अधिक लाईक्सही मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे, ११ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओवर कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

    कोण आहे डॉली चायवाला?

    माध्यमांतील वृत्तांनुसार, डॉली चायवाला नागपूरच्या सदर भागातील वीसीए स्टेडिअमजवळ ‘डॉली की टपरी’ नावाने चहाचा स्टॉल चालवतो. डॉली चायवाला सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे. नागपूरमध्ये लोक दूरहून या प्रसिद्ध चहावाल्याच्या स्टॉलवर चहा पिण्यासाठी हजेरी लावतात. डॉली चायवाल्याविषयी बोलायचं झालंं, तर त्याचा सोशल मीडियावर मोठा वावर आहे. तो आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलने चहा विकून सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. त्याचे इंस्टाग्रामवर १० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

    डॉली चायवाला एवढा प्रसिद्ध आहे तरी का?

    चहाच्या दुनियेत डॉली चायवाला हे नाव आता छोटे राहिले नाहीये. त्याच्या अनोख्या पेहरावासोबतच त्याच्या चहा देण्याच्या टेक्निकमुळे त्याची तुलना चक्क आयकॉनिक, दिग्गज हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपशी केली जाते. त्याच्या ट्रेंडी सेटअप आणि चहा बनवण्याच्या आकर्षक पद्धतीमुळे तो एक सेन्सेशन बनला आहे. स्टायलिश ग्लासेसमध्ये चहा देण्यापासून ते सिगारेट आणि टॉफी क्रिएटिव्ह पद्धतीने देण्यापर्यंत, डॉलीची टपरी नेहमीच चहाच्या शौकिनांनी गजबजलेली असते.

    लोकांच्या प्रतिक्रिया

    जेव्हा डॉली चायवाल्याचा बिल गेट्स यांच्यासोबतचा व्हिडिओ जसा व्हायरल झाला, तसा अनेक लोकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेनासा झाला. अनेकांनी व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या की, “मला वाटते की, हे एआय जनरेटेड आहे.” एकाने असेही म्हटले की, “हा डीपफेक आहे का?” दुसऱ्या एकाने कमेंट करत म्हटले की, “सर, तुमचे बिल ५६७८९० डॉलर्स इतके झाले.” आणखी एकाने कमेंट केली की, “डॉली चायवाला नाही, तर इंडियन जॅक स्पॅरो.”

    बिल गेट्स यांचा भारत दौरा

    खरं तर, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी २८ फेब्रुवारी रोजी हैदराबादमध्ये मायक्रोसॉफ्टच्या भारत विकास केंद्राचा दौरा केला होता. याच ठिकाणी हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ शूट करण्यासाठी डॉली चायवाल्याला बोलावण्यात आले होते. डॉलीचा भाऊ शैलेश याने माध्यमांशी बोलताना या गोष्टीचा खुलासा केला. शैलेशनुसार, डॉलीला कोलॅबरेशन व्हिडिओ शूट करण्यासाठी बिल गेट्स यांच्या ऑफिसकडून बोलावण्यात आले होते. शैलेशने हा संपूर्ण नागपूरसाठी गौरवाचा क्षण असल्याचे सांगितले.