Divya Deshmukh :असं म्हणतात, की चपळ बुद्धिमत्ता, कष्टाची तयारी आणि सातत्य असलं, तर कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. याचं जिवंत उदाहरण म्हणजे कु. दिव्या देशमुख .फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकावणारी भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर.
वयाच्या सहाव्या वर्षीच तिच्या हातात बुद्धिबळाची पट होती, ज्या वयात इतर मुलं खेळण्यांत गुंग असतात, त्या वयात तिने डाव-प्याद्यांची शाळा सुरू केली. बुद्धिबळासारखा गुंतागुंतीचा खेळ सोबत ठेवत ती सातत्याने पुढे जात राहिली. या वाटचालीत तिला अनेक अडथळे आले, पण ती कधीही थांबली नाही, डगमगली नाही. तिच्या हाच संघर्षमय पण प्रेरणादायी प्रवास आपण आजच्या लेखात जाणून घेऊया.
प्रारंभिक आयुष्य
दिव्या देशमुख हिचा जन्म ९ डिसेंबर २००५ रोजी नागपूर येथे झाला. तिचे आई-वडील दोघेही वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळे घरात अभ्यासाचे चांगले वातावरण होते. दिव्या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिच्या मोठ्या बहिणीला बॅडमिंटनची आवड होती, त्यामुळे दिव्यालाही सुरुवातीला त्या खेळात रस वाटू लागला. मात्र तिच्या पालकांना वाटत होते की, दिव्याने बुद्धिबळ खेळावे.
त्यामुळे त्यांनी तिला लहान वयातच नागपूरमधील एका नामांकित बुद्धिबळ अकॅडमीत प्रवेश करवून दिला. तिथूनच तिच्या बुद्धिबळ प्रवासाला सुरुवात झाली. लहान वयातच बुद्धिबळातील तिची चमक दिसू लागली आणि हळूहळू ती या खेळात पारंगत होत गेली.
बुद्धिबळाकडे यशस्वी वाटचाल
२०१२ मध्ये पॉंडिचेरी येथे अंडर – ७ पहिले राष्ट्रीय सुवर्णपदक मिळवत दिव्याच्या प्रवासाची सुवर्ण सुरुवात झाली. पुढच्याच वर्षी इराणमध्ये आशियाई अंडर – ८ गटात स्पर्धेत विजेतेपद मिळवून तिने खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची ओळख निर्माण केली. पुढे ती सर्वात कमी वयाची वुमन फिडे मास्टर ठरली. २०१४ मध्ये डर्बन येथे अंडर – १० वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकताना ती भारतीय बुद्धिबळाच्या आशा – आकांक्षांचे प्रतीक बनली. आजवरच्या कारकिर्दीत तिने भारताचे तब्बल ४० वेळा प्रतिनिधित्व करत २३ सुवर्ण, ७ रौप्य व ५ कांस्य अशी ३५ पदकांची श्रीमंती मिळवली. २०२० मध्ये फिडेच्या ऑनलाईन ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या विजयी संघात सहभागी होऊन देशाची ताकद दाखवली. २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर पदवी प्राप्त करून आपले पाय आणखी मजबुत केले आणि अखेर २०२५ मध्ये वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी भारताची ८८ वी ग्रँडमास्टर म्हणून इतिहास रचला.
कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली आणि वैशाली रमेशबाबू यांच्या पावलांवर पाऊल ठेवत भारताची ग्रँडमास्टर म्हणून तिचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले. तिच्या या ऐतिहासिक विजयाने ती केवळ भारतीय नव्हे तर जागतिक बुद्धिबळातील एक उज्ज्वल भविष्य असल्याचे सिद्ध झाले.
ते म्हणतात ना, “मंजिले उन्हीं को मिलती हैं ,जिनके सपनों में जान होती हैं , पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती हैं।” या उत्कीला दिव्याच्या या यशोगाथेने सिद्ध केले. दिव्याचा विजय केवळ एक स्पर्धा जिंकण्यापुरते मर्यादित नसून आपल्या पिढीला प्रेरणा देणारा आहे.तिचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की , प्रचंड इच्छाशक्ती , कार्याप्रती समर्पण आणि चिकाटीच्या बळावर प्रत्येक गोष्ट साध्य करता येते.
क्षेत्र कोणतंही असो, भारतीय महिला रणांगण गाजवतेच !
नमस्कार! आज आपण अशा एका कंपनीबद्दल बोलणार आहोत, जिचा वापर तुम्ही दररोज करता, पण कदाचित तुम्हाला तिचं नाव माहीत नसेल. तुम्ही जेव्हा झोमॅटोवर ऑर्डर देता किंवा नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन घेता, तेव्हा पडद्यामागे जे काम करतं, ते म्हणजे Razorpay.
तुम्ही-आम्ही जेव्हा दुकानात स्कॅन करतो, ते झालं ‘B2C’ पेमेंट. पण एखाद्या स्टार्टअपला किंवा छोट्या बिझनेसला जेव्हा हजारो ग्राहकांकडून पैसे घ्यायचे असतात, तेव्हा त्यांना लागतो तो पेमेंट गेटवे. २०१४ च्या आसपास, जर तुम्हाला एखादा छोटा ऑनलाईन बिझनेस सुरू करायचा असेल आणि ग्राहकांकडून पैसे घ्यायचे असतील, तर ती एक डोकेदुखी होती. बँकांच्या चकरा मारणं, शेकडो कागदपत्रं आणि ‘पेमेंट गेटवे’ सुरू व्हायला कित्येक आठवडे लागायचे. हर्षिल आणि शशांकला स्वतःच्या एका प्रोजेक्टसाठी पेमेंट गेटवे हवा होता, पण त्यांना तो मिळाला नाही. तिथेच त्यांना समजलं— समस्या मोठी आहे, म्हणजे संधीही मोठी आहे!
आयआयटी रुरकीतून बाहेर पडलेल्या हर्षिल माथुर आणि शशांक कुमार यांनी ही समस्या सोडवायची ठरवलं. सुरुवातीला या दोन मित्रांना जवळपास १०० बँकांनी नकार दिला. कोणालाच या दोन मुलांच्या आयडियावर विश्वास नव्हता. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी एक असा प्लॅटफॉर्म बनवला जो इतका साधा होता की, अवघ्या काही तासांत कोणताही छोटा बिझनेस डिजिटल पेमेंट स्वीकारायला सुरुवात करू शकत होता. जिथे बँकांचे फॉर्म भरण्यात आठवडे जायचे, तिथे Razorpay ने एका दिवसात काम केलं.
Razorpay ने काय केलं? त्यांनी तंत्रज्ञान इतकं सोपं केलं की कोडिंग न येणारा माणूसही त्यांच्या सेवा वापरू लागला. त्यांनी ‘कमी फी’ आणि ‘फास्ट सर्व्हिस’वर भर दिला. जेव्हा छोटे व्यावसायिक Razorpay कडे वळले, तेव्हा मोठ्या कंपन्यांनाही त्यांचं महत्त्व कळलं. जेव्हा नोटाबंदी झाली आणि डिजिटल इंडियाची लाट आली, तेव्हा Razorpay आधीच तयार होतं.
आज झोमॅटो, स्विगीपासून ते तुमच्या गल्लीतल्या स्टार्टअपपर्यंत सगळेजण Razorpay वापरत आहेत. आज ते फक्त पेमेंट्स नाही, तर बिझनेस बँकिंग आणि पेरोलमध्येही नंबर १ आहेत. ८ लाखांहून अधिक व्यवसाय आज Razorpay मुळे आपला धंदा ऑनलाईन चालवत आहेत. ही कंपनी आता फक्त भारतात नाही, तर जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत आहे. २०२५ पर्यंत या कंपनीचं मूल्य चक्क ७.५ अब्ज डॉलर्स (सुमारे ६०,००० कोटी रुपये) इतकं झालंय!
Razorpay ची ही कहाणी आपल्याला शिकवते की— “मैदानात कितीही मोठे खेळाडू असले, तरी जर तुमच्याकडे लोकांच्या समस्या सोडवणारी एखादी साधी पण प्रभावी आयडिया असेल, तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही!”
तुम्ही तुमच्या बिझनेससाठी कोणतं पेमेंट गेटवे वापरता? कमेंट्समध्ये सांगा! आणि अशाच दमदार बिझनेस स्टोरीजसाठी ‘नवी अर्थक्रांती’ला फॉलो नक्की करा.
“महिलांना जगातली सर्व कठीण कामे जमतील, पण ड्रायव्हिंग हे त्यांचे काम नाही,” हे वाक्य आपण आजही अनेकदा ऐकतो. पण या पुरुषी मानसिकतेला खोटं ठरवत एका मराठमोळ्या लेकीने थेट रेल्वे इंजिनचं सारथ्य केलं. ती लेक म्हणजे साताऱ्याच्या कन्या, सौ.. सुरेखा यादव. भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक (लोको पायलट) होण्याचा मान मिळवून त्यांनी इतिहास घडवला. तब्बल ३६ वर्षांच्या शानदार सेवेनंतर त्या या नवरात्रोत्सवात निवृत्त होत आहेत. चला, जाणून घेऊया रुळांवर आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या या असामान्य व्यक्तिमत्त्वाची प्रेरणादायी गोष्ट.
जन्म आणि शिक्षण: साताऱ्याच्या मातीतील अंकुर
सुरेखा यादव (Surekha Yadav) यांचा जन्म २ सप्टेंबर १९६५ रोजी महाराष्ट्राच्या साताऱ्यात एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील रामचंद्र भोसले आणि आई सोनाबाई. पाच भावंडांमध्ये सर्वात मोठ्या असलेल्या सुरेखा लहानपणापासूनच हुशार आणि महत्त्वाकांक्षी होत्या. त्यांचे शालेय शिक्षण साताऱ्यातील सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झाले. खरं तर, त्यांना शिक्षिका व्हायचे होते आणि त्यासाठी त्यांनी बी.एड. करण्याची योजनाही आखली होती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.
शालेय शिक्षणानंतर त्यांनी तांत्रिक शिक्षणाची वाट धरली आणि कराड येथील सरकारी पॉलिटेक्निकमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. याच तांत्रिक ज्ञानाच्या जोरावर त्यांनी भविष्याची एक नवी दिशा निवडली.
रेल्वे रुळांवरचा ऐतिहासिक प्रवास
१९८६ साली रेल्वेमध्ये असिस्टंट ड्रायव्हर पदासाठी भरती निघाली. त्या काळात हे क्षेत्र पूर्णपणे पुरुषांची मक्तेदारी मानले जायचे. पण सुरेखा यांनी धाडसाने अर्ज केला. लेखी परीक्षा आणि मुलाखत यशस्वीपणे पार करत त्यांनी रेल्वेमध्ये प्रवेश निश्चित केला. कल्याणच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये सहा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून १९८८ साली त्या भारतीय रेल्वेमध्ये सहाय्यक चालक म्हणून रुजू झाल्या आणि एका नव्या इतिहासाला सुरुवात झाली.
त्यांचा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीला त्यांनी मालगाडी चालवण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांची मेहनत, अचूकता आणि कौशल्य पाहून रेल्वे प्रशासनाचा विश्वास वाढत गेला.
यशाचे एकेक शिखर
२०००: त्यांना ‘मोटरवुमन’ म्हणून बढती मिळाली.
२०१०: पश्चिम घाटासारख्या आव्हानात्मक आणि कठीण रेल्वे मार्गावर गाडी चालवण्याची जबाबदारी त्यांना मिळाली.
८ मार्च २०११: ‘डेक्कन क्वीन’ अर्थात ‘दख्खनच्या राणी’ या प्रतिष्ठित गाडीचे पुणे ते मुंबई सारथ्य करण्याचा ऐतिहासिक मान त्यांना मिळाला. हा दिवस भारतीय रेल्वेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला.
२०११: त्यांची एक्सप्रेस मेल पायलट म्हणून नियुक्ती झाली, ज्यामुळे त्या आशियातील पहिल्या पूर्णवेळ महिला ड्रायव्हर ठरल्या.
१३ मार्च २०२३: त्यांनी सोलापूर ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) पर्यंत ‘वंदे भारत एक्सप्रेस’ चालवून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. वंदे भारत चालवणाऱ्या त्या पहिल्या महिला लोको पायलट ठरल्या.
कुटुंबाचा भक्कम पाठिंबा
सुरेखा यादव यांच्या या यशस्वी प्रवासात त्यांच्या कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे पती शंकर यादव हे महाराष्ट्र पोलिसात इन्स्पेक्टर पदावर कार्यरत आहेत. दोन मुलांची आई असलेल्या सुरेखा नेहमी सांगतात की, “कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते.” नोकरीची वेळ, जबाबदारी आणि ताण सांभाळून घराची जबाबदारी सांभाळण्यात त्यांच्या पतीने आणि कुटुंबाने दिलेली साथ मोलाची ठरली.
सेवानिवृत्ती आणि प्रेरणादायी वारसा
तब्बल ३६ वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर, सुरेखा यादव ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. आपल्या कारकिर्दीतील शेवटची फेरी त्यांनी हजरत निजामुद्दीन (दिल्ली) – CSMT राजधानी एक्सप्रेस चालवून पूर्ण केली.
त्यांच्या सेवानिवृत्तीवर मध्य रेल्वेने अत्यंत भावनाप्रधान शब्दात म्हटले आहे, “श्रीमती सुरेखा यादव या एक खऱ्या अर्थाने पथप्रदर्शक (trailblazer) आहेत. त्यांनी अडथळ्यांना पार करून अगणित महिलांना प्रेरणा दिली आणि हे सिद्ध केले की परिश्रम घेण्याची तयार असेल तर कोणतेही स्वप्न अपूर्ण राहू शकत नाही. त्यांचा प्रवास भारतीय रेल्वेमध्ये महिला सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून सदैव स्मरणात राहील.”
सुरेखा यादव यांची गोष्ट केवळ एका नोकरीची कहाणी नाही, तर ती स्वप्न पाहण्याचे आणि ते पूर्ण करण्यासाठी कोणत्याही मर्यादा न मानण्याची गाथा आहे. ‘चूल आणि मूल’ या चौकटीतून बाहेर पडून महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात, हे त्यांनी सिद्ध केले. त्यांचा हा प्रवास येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत आणि दीपस्तंभ म्हणून कायम प्रकाश देत राहील.
१९ मार्च २०२५ हा दिवस संपूर्ण जगासाठी ऐतिहासिक ठरला. नासाचे अनुभवी अंतराळवीर बुच विल्मोर (Butch Wilmore) आणि भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स (Sunita Williams) जवळपास नऊ महिने अंतराळात अडकल्यानंतर सुखरूपपणे पृथ्वीवर परतले. अमेरिकेतील फ्लोरिडा समुद्र किनाऱ्यावर स्पेसएक्सच्या कॅप्सूलच्या यशस्वी लँडिंगनंतर, या दोघांचं जगभरातून जल्लोषात स्वागत झालं. विशेष म्हणजे, ही मोहीम केवळ आठ दिवसांसाठी नियोजित होती, पण तांत्रिक अडचणींमुळे ती ९ महिन्यांची दीर्घ अंतराळयात्रा ठरली.
या मोहिमेत सुनीता विल्यम्स यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं ठरलं. त्यांनी अंतराळात आपल्या कर्तृत्वाने केवळ नवे विक्रम प्रस्थापित केले नाहीत, तर तरुणांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलं. एका सामान्य कुटुंबातून येऊन अंतराळवीर बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खरोखर कौतुकास्पद आहे. या लेखात आपण त्यांच्या यशस्वी कारकिर्दीवर एक नजर टाकूया.
बालपण आणि शिक्षण
सुनीता विल्यम्स यांचा जन्म १९ सप्टेंबर १९६५ रोजी अमेरिकेतील ओहायोमधील युक्लिड येथे झाला. त्यांचे वडील डॉ. दीपक पंड्या हे मूळचे गुजरातमधील झुलासन गावचे होते आणि अमेरिकेत न्यूरोअॅनाटॉमिस्ट म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आई उर्सुलाइन बोनी पंड्या या स्लोव्हेनियन वंशाच्या अमेरिकन होत्या. सुनीता आपल्या तिघा भावंडांमध्ये सर्वात धाकटी होती आणि त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच घरातून खूप प्रेम आणि प्रोत्साहन मिळालं .
लहानपणापासूनच सुनीता यांना विज्ञान आणि प्राण्यांची विशेष आवड होती. त्यामुळे त्या व्हेटरनरी डॉक्टर (प्राणीचिकित्सक) बनण्याचं स्वप्न पाहत होत्या. मात्र, त्यांच्या भावाने त्यांना संयुक्त राज्य नौदल अकादमीत (United States Naval Academy) प्रवेश घेण्याची प्रेरणा दिली आणि यामुळे त्यांच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलली.
सुनीता यांनी १९८७ मध्ये भौतिकशास्त्रात विज्ञान पदवी (B.Sc.) पूर्ण केली. त्यानंतर, १९९५ मध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकी व्यवस्थापन (Engineering Management) या विषयात पदव्युत्तर शिक्षण (M.Sc.) मिळवलं. शिक्षण घेत असताना त्यांची अंतराळ आणि ॲस्ट्रोनॉट या विषयात आवड वाढू लागली. याच शिक्षणामुळे त्यांना अंतराळवीर बनण्याचा मार्ग मिळाला आणि पुढे त्यांची अंतराळ क्षेत्रात वाटचाल सुरू झाली.
सैन्य सेवा आणि नासामधील प्रवेश
सुनीता विल्यम्स यांनी १९८७ मध्ये अमेरिकन नौदलात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. प्रारंभी, त्यांनी बेसिक डायव्हिंग ऑफिसर म्हणून काम केलं, त्यानंतर त्या नौदल विमानचालक (Naval Aviator) म्हणून प्रशिक्षित झाल्या. नौदलातील सेवेदरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला. विशेषतः, १९९२ मध्ये आलेल्या अँड्रयू चक्रीवादळाच्या वेळी त्यांनी फ्लोरिडामध्ये बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे १९९८ मध्ये नासाने त्यांची अंतराळवीर म्हणून निवड केली. त्यानंतर, जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये (Johnson Space Center) त्यांनी कठोर प्रशिक्षण पूर्ण केलं आणि नासाच्या विविध अवकाश मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
अंतराळातील ऐतिहासिक कामगिरी
सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी ९ डिसेंबर २००६ रोजी आपल्या पहिल्या अंतराळ प्रवासाला सुरुवात केली. त्या स्पेस शटल डिस्कव्हरी (Space Shuttle Discovery) च्या माध्यमातून अंतराळात पोहोचल्या आणि एकूण १९५ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) राहिल्या. या मोहिमेत त्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग केले आणि अंतराळ स्थानकाच्या देखभालीत महत्त्वाची भूमिका बजावली.
यानंतर, २०१२ मध्ये सुनीता यांनी पुन्हा एकदा अंतराळ यात्रा केली. Expedition 32 मध्ये फ्लाइट इंजिनिअर आणि Expedition 33 मध्ये कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळली. या वेळीही त्यांनी ISS वर प्रयोगशाळांमध्ये संशोधन केलं आणि अवकाश स्थानकाच्या कार्यक्षमतेसाठी महत्त्वाची कामं पार पाडली.
सुनीता यांनी एकूण ९ वेळा स्पेसवॉक केला, ज्यामध्ये ६२ तास ९ मिनिटे त्या अंतराळात चालल्या. ही कामगिरी महिलांसाठी एक मोठा विक्रम मानला जातो. तसेच, १६ एप्रिल २००७ रोजी ISS वरून “बॉस्टन मॅरेथॉन” पूर्ण करून अंतराळातून मॅरेथॉन धावणाऱ्या पहिल्या व्यक्ती ठरण्याचा अनोखा इतिहासही त्यांनी रचला.
अंतराळातील नवे प्रयोग आणि अनुभव
सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी मायक्रोग्रॅव्हिटी, जैवशास्त्र, वैद्यकीय प्रयोग, तेजस किरणांचे परिणाम आणि मानव शरीरावर अंतराळ प्रवासाच्या प्रभावांवर महत्त्वपूर्ण संशोधन केलं आहे. त्यांनी आपल्या टीमसोबत १५० हून अधिक वैज्ञानिक प्रयोग यशस्वीपणे पूर्ण केले आणि तब्बल ९०० तास संशोधनासाठी दिले. त्यांच्या या अभ्यासामुळे भविष्यातील अंतराळ मोहिमा अधिक सुरक्षित आणि प्रभावी होण्यास मदत होईल. तसेच, अंतराळात मानवी वास्तव्य शक्य करण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्वाचं ठरलं आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) हे फुटबॉल मैदानाइतकं मोठं आहे, आणि त्याची देखभाल करणं हे एक मोठं आव्हान असतं. सुनीता यांनी प्राचीन उपकरणांचे आधुनिकीकरण करून, नवीन प्रणाली कार्यान्वित केल्या, ज्यामुळे ISS अधिक कार्यक्षम बनलं. त्यांच्या तांत्रिक कौशल्यामुळे अंतराळ स्थानकाच्या दैनंदिन कार्यप्रणालींमध्ये सुधारणा झाली.
भारतीय नातं आणि खासगी आयुष्य
सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांचं भारताशी विशेष जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यांचे वडील गुजरातमधील झुलासन गावचे असल्यामुळे त्या वेळोवेळी भारताला भेट देतात. २००७ आणि २०१३ मध्ये त्यांनी भारतात येऊन विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यांच्या कर्तृत्वासाठी भारत सरकारने २००८ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान केला. अनेक मुलाखतींमध्ये त्या भारतीय संस्कृती, कुटुंबातील मूल्ये आणि भारताने दिलेल्या प्रेरणेचा आपल्या यशात मोठा वाटा असल्याचे सांगत असतात.
त्यांचे पती मायकल जे. विल्यम्स हे Federal Marshal म्हणून कार्यरत आहेत, तसेच त्यांना हेलिकॉप्टर उडवण्याचा अनुभव आहे. आपल्या व्यस्त कारकिर्दींमुळे सुनीता आणि मायकल यांनी बराच काळ एकमेकांपासून दूर घालवला, तरीही त्यांचे परस्परांवरील प्रेम आणि आदर कायम आहे. त्यांच्या नात्याला समजूतदारपणा आणि परस्पर समर्थनाचा मजबूत आधार आहे, ज्यामुळे त्यांनी आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात यशस्वी समतोल राखला आहे.
२०२५ ची यशस्वी मोहीम आणि जागतिक गौरव
बोईंग स्टारलायनर यान मोहिमेसाठी उत्कृष्ट असले तरीही, २०२४ मध्ये तांत्रिक अडचणींमुळे यानाच्या परतीच्या प्रवासात विलंब झाला. यामुळे अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अतिरिक्त नऊ महिने थांबावे लागले. या अनपेक्षित परिस्थितीतही सुनीता विल्यम्स यांनी मोठ्या संयमाने आणि कौशल्याने परिस्थिती हाताळली, ज्यामुळे त्यांची ही मोहीम संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरली.
सुनीता विल्यम्स (Sunita Williams) या केवळ एक अंतराळवीर नाहीत, तर जिद्द, चिकाटी, शिस्त आणि विज्ञानावर दृढ विश्वास ठेवणाऱ्या एका प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वाचे प्रतीक आहेत. भारतीय मुळांपासून अमेरिकेच्या आकाशात झेपावणारी ही लेक आजच्या पिढीला आणि भविष्यातील प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आहे.
सध्या देशभरात “छावा” (Chhaava) या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघर्षमयी जीवन प्रवासावर आधारित आहे, ज्यात महाराजांची भूमिका अभिनेताविकी कौशल (vicky kaushal) यांनी साकारली आहे, तर महाराणी येसूबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मीका मंदाना हिने साकारली आहे, तसेच अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि संतोष जुवेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी सुद्धा आपली भूमिका चोख निभावली आहे. या सर्व कलाकारांच्या अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.
मात्र, या चित्रपटाच्या यशामध्ये सर्वाधिक कौतुक कोणाचं होत असेल, तर ते म्हणजे चित्रपटाचे मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांचं. कारण पहिल्यांदाच संभाजी महाराजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर इतक्या ताकदीने साकारण्यात आला आहे. उतेकर यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण दिग्दर्शन शैलीत हा चित्रपट वास्तवाशी जुळवून प्रभावीपणे सादर केला आहे, ज्यामुळे या चित्रपटाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
लक्ष्मण उतेकर हे आज हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक आहेत, पण त्यांचा प्रवास अत्यंत कठीण आणि संघर्षमय होता. एक काळ असा होता की, त्यांना दोन वेळच्या जेवणासाठीही संघर्ष करावा लागला. उदरनिर्वाहासाठी त्यांनी टॉयलेट साफ करण्यापासून ते वडापाव विकण्यापर्यंत अनेक कामे केली. पण त्यांनी कधीही हार मानली नाही. कठोर मेहनत, चिकाटी आणि आपल्या कलेवरील निष्ठेमुळे ते आज यशस्वी दिग्दर्शक बनले आहेत. आजच्या लेखात आपण त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाची सविस्तर माहिती घेऊया.
प्रारंभिक जीवन आणि संघर्ष
लक्ष्मण उतेकर यांचा जन्म एका साधारण कुटुंबात झाला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शिक्षणासाठी आवश्यक सुविधा मिळाल्या नाहीत, पण त्यांच्या मनात मोठी स्वप्नं होती. काहीतरी वेगळं करण्याची जिद्द घेऊन त्यांनी लहान वयातच मुंबई गाठली. तिथे ना कुणी ओळखीचं होतं, ना कुठे राहायची सोय. हातात काहीच नव्हतं, पण मेहनतीवर आणि जिद्दीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता.
पोट भरण्यासाठी त्यांनी एका वडापाव विक्रेत्याकडे लहानसं काम मिळवलं. दिवस-रात्र मेहनत करत असताना त्यांची नजर सतत मोठ्या संधीच्या शोधात होती. त्यांना सिनेसृष्टीत काम करायचं होतं, पण त्यासाठी कुठून सुरुवात करावी, हे माहीत नव्हतं. त्यांनी हार मानली नाही. ते मुंबईत स्टुडिओच्या बाहेर तासन्तास उभे राहत, लोकांशी ओळख वाढवायचा प्रयत्न करत आणि योग्य संधी मिळण्याची वाट पाहत होते.
एके दिवशी अचानक महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची वडापावची हातगाडी जप्त केली आणि त्यांचं उपजीविकेचे एकमेव साधन हिरावलं गेलं. हा त्यांच्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉइंट ठरला. त्या क्षणी त्यांनी ठरवलं की आता मागे फिरायचं नाही. परिस्थिती कितीही कठीण आली तरी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करायचं आणि आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवायचं. उपजीविकेसाठी त्यांनी वेळप्रसंगी सफाईचं काम केलं, पण हार मानली नाही.
सिनेमॅटोग्राफीची पहिली पायरी
या कठीण परिस्थितीतून मार्ग काढत असताना, त्यांना एक दिवस एका वृत्तपत्रात पियूनच्या नोकरीची जाहिरात दिसली. स्टुडिओत काम करण्याची संधी पाहून त्यांनी अर्ज केला आणि त्यांना तिथे नोकरी मिळाली. हीच त्यांची सिनेसृष्टीत पहिली पायरी होती.
स्टुडिओत काम करत असताना त्यांना चित्रपट निर्मितीविषयी अधिक जाणून घेण्याची संधी मिळाली. तिथेच क्रूची गरज असल्याने त्यांना कॅमेरा अटेंडंट म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी हळूहळू सिनेमॅटोग्राफी शिकण्यास सुरुवात केली. छोट्या जबाबदाऱ्या स्वीकारत, सातत्याने मेहनत घेत आणि शिकत ते पुढे जात राहिले.
काळाच्या ओघात त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफी केली. इंग्लिश विंग्लिश, हिंदी मीडियम, डीअर जिंदगी आणि 102 नॉट आऊट यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांच्या उत्कृष्ट कार्याची झलक दिसली. त्यांच्या मेहनतीमुळे आणि कुशलतेमुळे त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळू लागली आणि सिनेमॅटोग्राफीच्या क्षेत्रात त्यांचं नाव लौकिकास आलं .
दिग्दर्शनाची सुरुवात आणि ब्रेकथ्रू
लक्ष्मण उतेकर यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून चांगलं नाव कमावलं होतं, पण त्यांना दिग्दर्शक होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. त्यांनी मराठीत पहिला चित्रपट दिग्दर्शित केला तो म्हणजे “टपाल”. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगला आवडला आणि त्यांना दिग्दर्शक म्हणून ओळख मिळाली.
यानंतर त्यांनी “लालबागची राणी” हा दुसरा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटामुळे त्यांच्या दिग्दर्शन कौशल्यावर शिक्कामोर्तब झालं. त्यांच्या कथा सांगण्याच्या अनोख्या शैलीला आणि भावनिक दृश्यांवरील पकडीला प्रेक्षकांची दाद मिळाली.
बॉलिवूडमध्ये संधी मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील होते आणि अखेर २०१९ मध्ये त्यांना मोठा ब्रेक मिळाला. त्यांनी “लुका छुपी” हा चित्रपट दिग्दर्शित केला. हा चित्रपट लिव्ह-इन रिलेशनशिप या विषयावर हलकाफुलका विनोदी सिनेमा होता. प्रेक्षकांनी तो उचलून धरला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर १२८ कोटींची कमाई केली.
यानंतर, आता लक्ष्मण उतेकर यांनी “छावा” हा छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडणारा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. भव्य निर्मितीमूल्य, दमदार अभिनय, आणि सुंदर दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय ठरतो आहे.मित्रांनो, लक्ष्मण उतेकर यांचा जीवनप्रवास आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक अडचण, संघर्ष, आणि अपयशाला संधी म्हणून स्वीकारलं आणि त्या सर्वांचा योग्य उपयोग करत, आपली स्वप्नं सत्यात उतरवली. त्यांची मेहनत, चिकाटी आणि अथक परिश्रम यामुळेच ते आज एक प्रतिष्ठित दिग्दर्शक बनले आहेत. त्यांची ही यशोगाथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी, आपल्याला दिलेल्या संधीचा योग्य उपयोग आणि प्रयत्नांमुळे सर्व गोष्टी शक्य होतात.
आधुनिक आणि प्रगत भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे महिला सशक्तीकरण. आजच्या भारतात महिला शिकतात, पैसे कमावतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. जगात वावरत असताना जरी आजूबाजूच्या देशांनी आपल्याला मागासलेलं, जुनाट आणि पारंपारिक रूढी-परंपरांना धरून वावरणारं राष्ट्र म्हटलं तरीही भारत विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करतोय आणि ही गोष्ट कुणापासून लपलेली नाही. आम्ही असं नाही म्हणणार की महिला पुरुषांची बरोबरी करतायत, कारण कोणीही कधीच कुणाची बरोबरी करण्यासाठी झटत नसतं. प्रत्येक माणसासमोर उभी असलेली आव्हानं वेगळी असतात, ती त्याची त्याने सोडवायची असतात. वेळप्रसंगी लागणारी मेहनत तो माणूस स्वतः करत असतो.
आपण भारतीय म्हणून एकत्रितपणे जगात भारताचा झेंडा फडकावण्याच्या तयारीत आहोत आणि म्हणूनच इथे आपापसात असलेल्या स्पर्धेला जागा नाही. भातातील अनेक महिला सध्या उद्योजकतेच्या मार्गावर यशस्वीपणे मार्गक्रमण करीत आहेत, पैकी झिवामेच्या सर्वेसर्वा म्हणजेच रिचा कर यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. रिचा कर या केवळ यशस्वी उद्योजिका आहेत म्हणून त्यांचा प्रवास जाणून घ्यावा का? नाही! रिचा यांनी सुरु केलेला व्यवसाय कोणत्या क्षेत्रातील आहे, हा प्रवास खडतर का होता, त्यांनी किती खस्ता खाल्ल्या आहेत हे समजून घेण्यासाठी त्यांचा प्रवास जाणून घेतला पाहिजे.
रिचा कर: बालपण आणि शिक्षण
रिचा कर यांचा जन्म १७ जुलै १९८० रोजी झारखंडमधल्या जमशेदपूर या शहरात झाला. इतर मध्यमवर्गीय घरांप्रमाणेच रिचा यांचे वडील नोकरी करायचे, तर आई घर सांभाळत असे, मात्र तरीही हे कुटुंब शिक्षणाचे महत्व जाणून होतं आणि रिचावर देखील हेच संस्कार करण्यात आले. परिणामी लहानपणापासूनच रिचाला शिक्षणाप्रती आदर वाटायचा आणि म्हणूनच त्यांनी BITS पिलानीमधून पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यावर रिचा यांनी अभियांत्रिकी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर ऍनालिस्ट (Software Analyst) म्हणून कामाला सुरूवात केली. नोकरी पत्करली असली तरीही नेहमीच त्यांच्या मनात Out of the Box जाऊन नाव कमावण्याची इच्छा होती. इतरांप्रमाणे ९ ते ६ काम करून खुश होणाऱ्यांपैकी त्या नव्हत्या आणि म्हणूनच नोकरीसोबत त्यांनी NMIMS मधून MBAची पदवी मिळवली. ही पदवी मिळवल्यानंतर अपेक्षित अनुभव देखील मिळवला. व्यवसाय म्हणजे काय? व्यवसाय कसा करावा? व्यवसाय करताना कोणते धोके येऊ शकतात? अशी बरीच महत्वाची माहिती मिळवून जन्म झाला तो झिवामेचा (Zivame).
झिवामेचा खडतर प्रवास:
झिवामेचा प्रवास इतरांपेक्षा खडतर का? कारण झिवामे हा ब्रँड महिलांसाठी बनणाऱ्या अंडरगार्मेंन्ट्सची (Undergarments) ऑनलाईन विक्री करतो. समाज कितीही बदलला असला तरीही काही बदल जोपर्यंत प्रत्येक माणूस मनापासून समजून आणि उमजून करत नाही तोपर्यंत समाज बदलणार नाही. अंडरगार्मेंन्ट्स म्हटलं की, उगाच शरमेने आपण त्याबद्दल बोलायचे बंद होतो आणि विशेषकरून महिलांच्या अंडरगार्मेंन्ट्स बद्दल कुठेही चर्चा केली जात नाही. अशा प्रकारच्या सामाजिक चौकटीत रिचा यांनी मात्र सर्व बंधनं तोडून पुढे जाण्याचा विचार पक्का केला होता.
व्यवसाय म्हटलं की किती पैसे गुंतवले जाणार? गुंतवलेली रक्कम परत मिळेल का? व्यवसाय यशस्वी होईल का? असे प्रश्न उपस्थित केले जातात मात्र रिचा कर यांनी सुरु केलेल्या व्यवसायासमोर असलेली प्रश्नपत्रिका वेगळीच होती. समाजाने या व्यवसायावर प्रश्नचिन्ह उभं करण्याआधीच त्यांच्या घरून आणि दुर्दैवाने त्यांच्या आईकडूनच सर्वात अगोदर या व्यवसायाला नावं ठेवण्यात आली. “मी काय माझी मुलगी ब्रा विकते असं सांगायचं का?” असं म्हणत त्यांनी मुलीच्या स्वप्नांना बळ द्यायच्या जागी उलटं मागे खेचलं. मुलगी समाजाच्या चौकटीबाहेर जात काही तरी वेगळं करू पाहतेय यासाठी तिचं कौतुक करण्याच्या जागी आईकडून लोकं काय बोलतील यावरच जोर देण्यात आला. कुठल्याही मुलीसाठी तिची आई ही आधारस्तंभ असते. असं म्हणतात दोन महिलांचं आपापसात कधीही पटत नाही, मात्र या उक्तीला फोल ठरवणारं एकमेव नातं असतं ते म्हणजे आई आणि मुलीचं नातं. रिचा कर यांची आईच त्यांच्या विरोधात उभी असल्याने व्यवसायाच्या सुरुवातीलाच त्यांच्यासमोर कष्टांचा डोंगर उभा ठाकला होता.
घरातील अडचणी बाजूला सारायचं म्हटलं, तर उंबरठ्याबाहेर देखील अडचणींची भली मोठी रांग लागली होती. भारतात त्यावेळी महिलांच्या अंडरगारमेंट्ससाठी अशाप्रकारचं ऑनलाईन पोर्टल (Online Portal) असू शकतं अशी कल्पना सुद्धा जन्माला आली नव्हती. एकतर या कपड्यांची खरेदी करताना महिला बऱ्यापैकी दुकानात सुद्धा शरमतात आणि या परिस्थितीत अशा कपड्यांची ऑनलाईन विक्री होत असल्याची बातमी अनेकांच्या पचनी पडत नव्हती. महिलांसाठी अंडरगारमेंट्सची खरेदी सोपी व्हावी आणि समाजातील ही पोकळी भरून निघावी म्हणून रिचा प्रयत्न करीत होत्या. अडचणी भले अनेक होत्या तरीही दृढ आत्मविश्वासाच्या जोरावर रिचा कर यांनी २५ ऑगस्ट २०११ पासून झिवामेच्या नावाने इ-कॉमर्स (E-Commerce) प्लॅटफॉर्मवरून व्यवसाय सुरु केला.
झिवामेने गाठलेली उंची:
सुरुवातीला ज्या व्यवसायाला अनेकांकडून हिणवण्यात आलं किंवा उपेक्षा करण्यात आली तोच व्यवसाय आज दरवर्षी नवीन शिखरं काबीज करतोय. रिचा कर यांच्या व्यवसायाची उलाढाल आज जवळपास २७० कोटी रुपयांच्या घरात आहे. भारतातील प्रत्येक पिनकोडवर डिलिव्हरी देण्यात हा व्यवसाय सक्षम आहे आणि दर दिवशी या प्लॅटफॉर्मला भेट देणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढतेय. झिवामेकडून अत्ताच्या घडीला ५००० लॉन्जरी स्टाईल (Lingerie Styles), ५० ब्रँड आणि १००० विविध साईझेस उपलब्ध आहेत.
एवढंच नाही तर झिवामेमध्ये लवकरच महिलांसाठीचे कपडे, फिटनेस वेअर आणि स्लीपवेअर समाविष्ट करण्यात येणार आहे. .जो व्यवसाय कधी एकेकेकाळी समाजाच्या चौकटीत बसत नव्हता आज त्याच व्यवसायाचा ग्राहकववर्ग या समाजाचा भाग आहे आणि म्हणून ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या रिचा यांचा अभिमान वाटतो.
आपली मुलगी किंवा सून जो व्यवसाय करू पाहतेय त्यामुळे आपण समजत तोंड दाखवू शकणार नाही अशा विचारसरणीच्या वातावरणातून उमलू पाहणाऱ्या रिचा इतरांना कायम प्रेरणा देत राहतील. परिवाराचा किंवा समाजतील कोणाचाही आधार नसताना रिचा यांनी केवळ स्वतःच्या मेहनत आणि जिद्धीच्या बळावर अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक गरजेसाठी वेळप्रसंगी त्यांनी स्वतःची जमापुंजी पणाला लावली होती. वर्ष २०१५-१६ मध्ये त्यांना ५४ कोटी रुपयांचं नुकसान सोसावं लागलं होतं तरीही त्या खचून गेल्या नाही. अशा कठीण काळात सुद्धा केवळ ग्राहकांवर विश्वास ठेऊन त्या नेहमी पुढे जात राहिल्या. रिचा त्यांच्या आत्तापर्यंतच्या व्यवसायाबद्ल बोलताना सांगतात की, “ आपण जर का एखादी चांगली गोष्ट करत असू, तर कुणालाही काहीही सिद्ध करून दाखवण्याची गरज नसते. तुम्ही प्रयत्न करत राहा आणि नंतर तुमच्या योग्यतेची साक्ष स्वतः देव देईल.” वर्ष २०१७ मध्ये रिचा कर यांनी कंपनीमधून CEO पदाचा राजीनामा दिला, मात्र तरीही त्या कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या सदस्या आहेत आणि त्यांची नेट वर्थ ७४९ रुपयांच्या आसपास आहे. कंपनीच्या आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये घडलेला सर्वात मोठा बदल म्हणजे वर्ष २०२० मध्ये रिलायन्स रिटेलकडून झिवामेचा ताबा मिळवण्यात आला होता.
एक असा व्यवसाय ज्याला अनेकांनी नावं ठेवली, समज हसला, लोकांनी हिणवलं त्या सर्वांसाठी रिचा कर यांचा यशस्वी व्यवसाय हेच सडेतोड उत्तर आहे. त्यांच्या अपार मेहनत आणि जिद्धीला सलाम आणि हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल यात खरोखरच काही शंका नाही.
आयुष्य हे एक न संपणारं युद्ध आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आज कोणत्याही क्षेत्रात जा तिथे स्पर्धा आहे, कष्ट आहे, मेहनत आहे. संघर्षाविना सहज मिळतील अशा खूप कमी गोष्टी राहिल्यात. आज कष्टाशिवाय पर्याय नाही. चिकाटी आणि संयम आत्ताच्या तरुण पिढीमध्ये कमी असल्याकारणाने उतावळेपणात झटपट श्रीमंत व्हावे असे त्यांना वाटत असते. लॉटरी, मटका, जुगार अशा सवयींमुळे अनेक तरुणांचं अक्षरशः संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं.
घरबसल्या लाखो-करोडो कमवा, तुमचे पैसे दुप्पट करा, नेटवर्क मार्केटिंग मधून करोडपती व्हा अशा अनेक फसव्या जाहिराती दररोज वर्तमानपत्रांमध्ये झळकत असतात. अशा झटपट आणि क्षणात श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी तरुण वर्ग फसतो आणि बळी पडतो. शेवटी अपयश आणि निराशा वाट्याला येते. मला कोणीतरी गॉडफादर भेटेल, श्रीमंत बनण्याची एखादी मोठी संधी चालून येईल किंवा देवाचा साक्षात्कार होईल अशी आपण अपेक्षा धरुन बसतो. अचानक राजयोग येऊन माझ्या आयुष्याला एका दिवसात कलाटणी मिळेल, माझं आयुष्य बदलून जाईल असं बहुतेकांना वाटत असतं. प्रयत्न, चिकाटी, परिश्रम, कष्ट, संघर्ष करण्याऐवजी सगळं सहज व्हावं, सहज मिळावं असं वाटत असतं. मात्र यशाला शॉर्टकट नसतो आणि शॉर्टकटने मिळालेलं यश हे शाश्वत देखील नसतं. अचानक एखादी संधी चालून येईल किंवा कोणीतरी आपल्या मदतीला येईल अशी आशा वाटणे हे स्वतःच्याच नाकर्तेपणाचे सर्वात मोठे लक्षण आहे.
जेव्हा आपला स्वतःचा स्वतःच्याच सामर्थ्यावर विश्वास नसतो तेव्हा अशा प्रकारच्या निरर्थक अपेक्षा आपण धरून राहतो. मित्रांनो तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचे आहे, जे कोणते ध्येय साध्य करायचे आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःला रणांगणात उतरावं लागेल, स्वतः झगडावं लागेल. आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाचं काही ना काही कारण आहे, ते कारण आपल्याला शोधायचंय आणि त्या कारणाच्या पूर्ततेसाठी काम करायचंय. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो त्यासाठी मेहनतीचा यज्ञ प्रत्येकाला पेटवावाच लागतो. शॉर्टकटने मिळालेल्या यशानं तुम्ही जितके लवकर वर जाता, तितक्याच लवकर तुम्ही खाली देखील येता. थ्री इडीयट्स मध्ये आमिर खानने म्हटल्याप्रमाणे “सक्सेस के पीछे मत भागो, मेहनत इतनी करो की सक्सेस खुद आपके पीछे आयेगी.
Shortcut आणि Smartwork मध्ये काय फरक आहे?
1. Shortcut :
हे काम जलद पूर्ण करण्यासाठी वापरलेले छोटे मार्ग किंवा तात्काळ उपाय असतात.
शॉर्टकट कधी कधी गुणवत्ता किंवा दीर्घकालीन परिणामांवर परिणाम करू शकतो.
शॉर्टकटमध्ये फक्त काम पटकन संपवणे हे उद्दिष्ट असते, त्यामागे ठराविक उद्दिष्ट किंवा हेतू नसतो.
उदाहरण: प्रोजेक्टमध्ये आवश्यक माहिती न वाचता थेट निष्कर्ष लिहिणे.
2. Smart Work :
हे काम चांगल्या पद्धतीने आणि नियोजनबद्ध मार्गाने कमी वेळात पूर्ण करण्याचे तंत्र आहे.
स्मार्ट वर्कमध्ये तंत्रज्ञान आणि कौशल्य वापरून कामाचे नियोजन केले जाते.
दीर्घकालीन यश आणि गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते.
Shortcut वापरल्याने फक्त तात्पुरते फायदे मिळतात, तर Smart Work दीर्घकालीन आणि शाश्वत यशाकडे नेते.
Smart Work म्हणजे काय?
Smart Work म्हणजे कमी वेळेत अधिक परिणाम साधणे. मेहनत कमी पण ती मेहनत योग्य दिशेने करणे महत्त्वाचे आहे. शॉर्टकट घेताना विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.
Smart Work कसे करावे?
कामाचे प्राधान्य ठरवा: सर्वात महत्त्वाचे काम आधी पूर्ण करा, त्याला सुरुवातीला प्राधान्य द्या.
तंत्रज्ञानाचा वापर करा: तंत्रज्ञानाचा वापर करून कामे सोपी करा. उदा. ऑटोमेशन साधने.
वेळेचे नियोजन: कामाचे छोटे भाग करा आणि त्यासाठी वेळेची मर्यादा ठरवा.
काम सोपवा: आवश्यकतेनुसार इतरांना काम सोपवा.
नवीन कौशल्ये शिकत रहा: नवीन तंत्र आणि पद्धती शिकून स्वतःला कायम अपडेट ठेवा
यामुळे तुम्ही शॉर्टकट घेत असतानाही अधिक परिणामकारकपणे आणि हुशारीने काम करू शकाल.
यश मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी :
धैर्य आणि सातत्य: प्रत्येक टप्प्यावर मेहनत आणि सातत्य ठेवणे.
योग्य नियोजन: कोणतेही काम व्यवस्थित योजना बनवून करणे.
समर्पण: यशासाठी तुमच्याकडे ठाम ध्येय असणे आणि त्यासाठी निरंतर प्रयत्न करणे.
शिकण्याची तयारी: चुका झाल्यावर त्यातून शिकणे आणि स्वतःला सुधारण्याची तयारी ठेवणे.
यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही, परंतु शहाणपणाने काम केल्यास योग्य वेळी यश नक्कीच मिळेल. Smart Work हा यश मिळवण्याचा मार्ग असू शकतो; पण Short Cut नाही.
फूटबॉलच मैदान,तायवान विरुद्ध सामना भारताने ५-० ने जिंकलाय, मात्र जिंकायचा आनंद कमी आणि राग जास्त आहे. हा राग याचा की, आम्ही देशासाठी खेळतोय आणि कोणी बघायला का येत नाही? याच रागात एक ट्विट होतं आणि ते ट्विट एवढं वायरल होतं की ते २०१८सालचं गोल्डन ट्विट ठरतं.
यानंतर, जेव्हा भारताचा केनिया सोबत सामना होतो, तेव्हा मैदान हजारो प्रेक्षकांनी गच्च भरलेलं असतं आणि ‘इंडिया इंडियाचा’ जयघोष देत असतं.ते ट्विट होतं नुकत्याच निवृत्ती घेतलेल्या भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीचं.
आज आपण याच “कॅप्टन फॅनटेस्टीक” चा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. सुनील छेत्रीचा जन्म ३ ऑगस्ट १९८४ रोजी सिकंदराबाद येथे झाला. लहानपणापासूनच मैदानी खेळांकडे आकर्षण असलेल्या सुनीलने सुरुवातीला स्पोर्ट कोट्यातून चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा म्हणून हौसेखातर फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली, परंतु फुटबॉलने त्याच्या हृदयात घर केलं आणि मग पुढे त्यानेही स्वतःला या खेळात झोकून घेतलं.
त्याने आपल्या करिअरची सुरुवात २००२ मध्ये कोलकत्याच्या मोहन बागान क्लबपासून केली आणि पुढे आपल्या मेहनतीच्या बळावर 2005 साली पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारतीय संघात पदार्पण केलं. त्याच्या खेळातील कौशल्यांमध्ये कमालीची स्पष्टता होती. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे लवकरच तो संघातील एक प्रमुख खेळाडू बनला. सुनीलच्या प्रतिभेने भारताला नेहरू कप, SAFF चॅम्पियनशिप, AFC चॅलेंज कपसह अनेक विजय मिळवून दिले. सातत्याने गोल करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे तो जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय गोल स्कोररपैकी एक ठरला.
सुनील छेत्रीला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये पद्मश्री, अर्जुन पुरस्कार,मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या प्रमुख पुरस्कारांचा समावेश आहे.भारतीय संघासाठी striker म्हणून खेळणारा सुनील हा “कॅप्टन फॅनटॅस्टिक” म्हणून सुद्धा ओळखला जातो. त्याने अंतरराष्ट्रीय स्तरावर १५१ सामन्यांत ९४ गोल केले आहेत. जे रोनाल्डो, मेस्सी आणि अली दाई नंतर सावार्धिक आहेत. सुनील छेत्रीने भारतीय फुटबॉलमध्ये अतुलनीय योगदान दिलं आहे. त्याच्या परिश्रमांनी आणि नेतृत्वाने देशातील असंख्य तरुण खेळाडूंना प्रेरणा दिली आहे.
नवी अर्थक्रांती, सुनीलच्या भारतीय फुटबॉलला दिलेल्या योगदानाला salute करते.
“अंतः अस्ति प्रारंभः” हा एक महत्वाचा आणि तात्त्विक विचार आहे जो आपल्याला जीवनातील विविध घटनांचा आणि स्थितींचा, वर्तमान परिस्थितीचा विचार करायला लावतो. या विचाराचा अर्थ असा आहे की, जिथे एक गोष्ट संपली आहे असे आपल्याला वाटते, तिथूनच दुसऱ्या गोष्टीची नवीन सुरुवात होते. जीवनात होणारा प्रत्येक अंत काहीतरी नवीन बदलाची सुरुवात घडवतो. संभाव्य परिवर्तनाची चाहूल देतो.
उदाहरणार्थ, जेव्हा एका व्यक्तीचे शालेय शिक्षण संपते, तेव्हा त्याच्या जीवनातील एक नवीन अध्याय म्हणजे महाविद्यालयीन जीवन सुरू होते. तसेच, एखाद्या नोकरीचा किंवा कामाचा समारोप होताना, एक नवीन संधी आपल्यासमोर येते.
या विचाराचा अर्थ असादेखील होतो की जीवनातील प्रत्येक घटनेचा एक प्रवास असतो – एक सुरूवात, एक मध्यवर्ती काळ आणि एक शेवट. परंतु हा शेवट म्हणजे अंतिम नाही, अंत नाही. तर तो एका नवीन प्रवासाचा प्रारंभ असतो. प्रत्येक संकट, आव्हान, किंवा पराभव यामध्येही नवीन काहीतरी शिकण्याची आणि अनुभवांची सुरुवात असू शकते.
आपण हे देखील लक्षात घेतले पाहिजे की जीवनातील अपयशाच्या क्षणांना “अंत” म्हणून पाहणे हा मर्यादित दृष्टिकोन असू शकतो. यामुळेच “अंतः अस्ति प्रारंभः” हा विचार आपल्याला नेहमीच पुढे पाहण्याची प्रेरणा देतो. आपण कोणत्याही स्थितीला अंत म्हणून पाहू नये, तर त्या क्षणाचे एक नवे पाऊल म्हणून स्वागत करावे.
या विचारामध्ये एक पारदर्शकता आहे. जी आपल्याला शिकवते की, प्रत्येक घटना, अनुभव आणि घडामोडी जीवनाच्या एका मोठ्या प्रवाहाचा भाग आहेत. आयुष्य म्हणजेच सतत चालणारी एक यात्रा आहे, ज्यात प्रत्येक अंत आणि प्रारंभ ह्या एका साखळीतील दोन वेगवेगळ्या कड्या आहेत. शेवट हीच सुरुवात या विचारधारेचं अजून एक महत्वाचं अंग म्हणजे परिवर्तन आणि पुनर्जन्म. जीवनातल्या एखाद्या घटनेचा शेवट म्हणजे संपणं नाही, तर त्यातून काहीतरी नवीन उगम पावण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, एखादी नोकरी, नातं किंवा जीवनातील एखादा टप्पा संपतो तेव्हा सुरुवातीला खूप दु:ख होतं, पण त्यातून नवीन संधी आणि अनुभव येतात.
या विचारधारेला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर, आपण आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक शेवटाला एक नवीन संधी म्हणून स्वीकारू शकतो. त्यामुळे, बदल घडवून आणण्याची आणि स्वतःला नव्याने घडवण्याची प्रेरणा मिळू शकते. यामुळे आपल्याला संकटं आणि आव्हानं यांच्याशी अधिक आत्मविश्वासाने सामना करता येतो.
शेवटी, अंतः अस्ति प्रारंभ: हाच विचार आपल्याला आत्मविश्वासाने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून जीवन जगायला शिकवतो. त्यामुळे, कोणत्याही घटनेच्या किंवा स्थितीच्या अंताचा विचार करताना, त्यातून काय नवीन सुरू होऊ शकते, याचा विचार करावा आणि नव्या अध्यायाचं शांत मनाने आणि जोमाने स्वागत करावे. पडणं हे कधीच अपयश नसतं, तर खरं अपयश हे पडून राहण्यात असतं.
शेवट हीच सुरुवात:
जेव्हा सगळं संपलंय असं आपल्याला वाटतं तेव्हा ती खरी सकारात्मक विचार करण्याची आणि नवीन सुरुवात करण्याची वेळ असते. या विचारधारेला अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर, आपण आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक शेवटाला एक नवीन संधी म्हणून स्वीकारलं पाहीजे. त्यामुळे, बदल घडवून आणण्याची आणि स्वतःला नव्याने घडविण्याची प्रेरणा मिळू शकते. यामुळे आपल्याला संकटं आणि आव्हानं यांचा अधिक आत्मविश्वासाने आणि निडरपणे सामना करता येईल.
नव्याने सुरुवात करा:
जीवनात कसेही प्रसंग आले, काहीही घडलं, सगळं संपलं असं वाटू लागलं की, स्वत:च्या मनाला सांगायचं की इथून होय इथूनच मला परत माझी नवीन सुरुवात करायची आहे. झालेल्या चुका लक्षात ठेऊन त्यात इष्ट बदल करून मला पुन्हा अचूकतेकडे नव्याने धावायचं आहे. उशिरा का होईना केलेली सुरुवात ही कधीच न केलेल्या सुरुवातीपेक्षा कधीही श्रेष्ठ आहे. त्यामुळं सुरुवात करायला कधीही घाबरू नका. सगळं संपलं तरी त्यात आशेचा नवा किरण शोधा. तोच किरण तुमच्या जीवनात यशाचा प्रकाश घेऊन येईल. पुन्हा सुरुवात केल्याने व्यक्तीला आशा आणि प्रेरणा मिळते.
1. स्वत:वर विश्वास
2. सकारात्मकता
3. ध्येय ठरविणे
4. आवश्यक तयारी
5. To Do List
6. कामाचं विश्लेषण
7. प्रत्यक्ष कृती
वरील बाबी आत्मसात करून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नवीन ऊर्जा घेऊन पुढे जाणे सहज शक्य आहे.
भारतातील व्यापारी समाज म्हटलं की हमखास आपल्यासमोर टाटा, गोदरेज, वाडिया अशी अनेक नावं समोर येतात. डोक्यावर टोपी आणि अंगात दिमाखदार सूट घातलेली पारशी लोकं पहिली की हा समाज जन्मजात श्रीमंत असल्याची खात्री पटते. आश्चर्याची बाब म्हणजे या समाजात लाखभर रुपये दर महिना कमावणाऱ्या माणसाला गरीब म्हटलं जातं. पारशी लोकं मुळातच व्यावहारिक ज्ञान अंगीकृत करून जन्म घेत असल्याने की काय पण संख्येने अत्यंत कमी असलेली ही लोकं व्यवहार आणि व्यवसायाच्या बाबतीत सर्वांना मागे टाकतात. असं का? सांगतो, पण त्यासाठीच हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा…
पारशी समाजाचा उगम कसा झाला?
आजच्या घडीला केवळ देशातच नाही, तर विदेशात देखील भारताचे नाव गाजवत असलेली कंपनी म्हणजे टाटा समूह किंवा Tata Group of Industries आणि या कंपनीचे सर्वेसर्वा रतन टाटा. मात्र तुम्हाला माहिती आहे का हे रतन टाटा देखील पारशीच आहेत. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आज भारतीय व्यावसायिक क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी बजावणारा हा पारशी समाज मूळचा भारतीय नाही. सध्याच्या काळात जो देश इराण म्हणून ओळखला जातो त्याचं जुनं नाव होतं पर्शिया आणि म्हणून तिथून उगम पावलेले लोक पारशी म्हणून ओळखले जातात. पारशी समाज इ.स पूर्व ७व्या शतकापासून या भागात पाहायला मिळू लागला. मात्र त्यानंतर इराणवर अरबी मुस्लिमांकडून आक्रमणं व्हायला सुरुवात झाली. या भयावह आक्रमणांना तोंड देणं पारशी समाजाला जमणारं नव्हतं म्हणूनच त्यांनी स्थलांतर करायला सुरुवात केली.
विविध दिशांना निघालेल्या या जहाजांपैकी कैक जहाजं भारतातील गुजरात राज्याच्या सीमेला येऊन धडकली. परदेशातून आलेल्या या समजाला स्थानिकांशी संवाद मात्र साधता येईना आणि स्थानिक देखील या लोकांबद्दल आणि त्यांच्या भाषेबद्दल अनभिज्ञ होते. परिणामी सर्व खबर स्थानिक राजाच्या कानी घालण्यात आली. आता या अनोळखी लोकांशी संवाद साधायचा तरी कसा या विचारात असलेल्या राजाला अचानक एक कल्पना सुचली, त्याने ताबडतोब एक भरलेला दुधाचा पेला पारशी समूहासमोर आणून ठेवला. या काठोकाठ भरलेल्या पेल्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, की राज्याची लोकं सामावून घेण्याची मर्यादा संपली आहे आणि यात आणखी लोकांना सामावून घेता येणार नाही.
राजाच्या या निर्णयावर हताश न होता पारशी लोकांनी संयम बाळगला आणि त्यानंतर पारशी लोकांकडून आलेलं उत्तर सर्वांना अचंबित करणारं होतं. पारशी लोकांनी त्याच दुधाने भरलेल्या पेल्यात काहीशी साखर मिसळली आणि तो पेला पुन्हा राजासमोर ठेवला. राजा या उत्तरावर खुश झाला, तुमच्या समाजामध्ये आम्ही साखरेप्रमाणे विरघळून जाऊ असा मतितार्थ समोर ठेऊन पारशी लोकांनी त्यांच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर या स्वभावाचं उदाहरण प्रस्तुत केलं आणि सर्वांना क्षणार्धात जिंकूनही घेतलं. बुद्धिमान, हुशार, मेहनती आणि शेतीचा अनुभव असलेल्या पारशी समाजाने दिलेल्या शब्दाचं पालन केलं. ते राजाच्या छत्रछायेत आनंदाने राहू लागले मात्र काही काळानंतर आलेल्या दुष्काळाने त्यांना देशाटन करायला भाग पडलं. त्याकाळात आपल्या भारतात विविध राज्यांमध्ये आपापसात युद्धं व्हायची, मात्र पारशी लोकांनी कधीही अशा युद्धांमध्ये भाग घेतला नाही, याउलट नेहमीच सर्व राज्यांशी जुळवून घेत व्यवसाय सुरु ठेवला.
इंग्रजांची सत्ता आणि पारशी समाज
पारशी समाज भारतात मुख्यत्वेकरून दलालीचा व्यवसाय (Brokerage business) करायचा. सर्वांशी जुळवून घेत ते व्यापार वाढवतच होते आणि अशातच व्यापाराच्या उद्देशाने काही मत्सरी पाऊलं भारतात उमटली. साधारण १६०८ साली इंग्रजांनी मसाल्याच्या व्यापाराचे निमित्त साधून भारतीय बाजारात आणि भूमीत प्रवेश मिळवला. भारताचे वैभव पाहून त्यांचे डोळेच दिपले आणि या संधीसाधू माणसांनी भारतावर राज्य करण्याचा निर्णय पक्का केला. काही स्वकीयांच्या धूर्त, फितूर आणि लालची स्वभावामुळे ते यशस्वी देखील झाले. इंग्रजांच्या जुलमी राजवटीखाली भारतीय जनता होरपळून निघत होती, मात्र पारशी समाजाने या संधीचं सोनं करून दाखवलं. सर्वात अगोदर पारशी लोकांनी इंग्रजांची भाषा शिकून घेतली, कारण भाषा हीच संवाद साधण्याचं महत्वाचं साधन आहे. पारशी लोकांनी इंग्रजी भाषेचा अभ्यास केल्याने इंग्रजांना देखील स्थानिकांशी संवाद साधण्यासाठी मदत मिळू लागली. इंग्रजी राजवटीत पारशी लोकं इंग्रजांकडे नोकरी करायचे आणि म्हणूनच त्याकाळात अनेक पारशी लोकं सरकारी कर्मचारी म्हणून पाहायला मिळत. पारशी लोकांच्या या स्वभावगुणांमुळे त्यांनी इंग्रजी राजवटीचा केंद्रबिंदू असलेल्या आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरलेला मुंबई/बॉम्बे मध्ये जम बसवला.
भारतात इंग्रजी सत्ता असताना घडलेला एक महत्वाचा प्रसंग म्हणजे चीन आणि युरोप यांमध्ये वाढलेला व्यापार. चीन युरोपला मोठ्या प्रमाणात चिनी मातीची भांडी, चहा आणि रेशीम पाठवायचा आणि युरोपकडून देखील या वस्तूंसाठी मागणी वाढत होती. दुसऱ्या बाजूला चीन आणि युरोप यांमधले वृद्धिंगत होणारे संबंध इंग्रजांना रुचणारे नव्हते आणि म्हणूनच त्यांनी पारशी लोकांच्या मदतीने चीनमध्ये अफूची निर्यात सुरु केली. येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत चीनमधून अफूची मागणी वाढू लागली, एक वेळ तर अशी आली होती की चीनमध्ये प्रत्येक ४ पैकी ३ माणसं अफूच्या आहारी गेली होती. अफूच्या व्यापाराने इंग्रजांना काय फायदा झाला? एकतर चीनमधील लोकं अफूच्या नशेत असल्याने युरोपसोबतचा व्यापार कमी झाला आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या निर्यातीमुळे धानाचे पेटारे भरू लागले.
पारशी समाज आणि आज
स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच पारशी समाज भारतात उत्तमरीत्या त्यांचा जम बसवून आहे. इंग्रजांची राजवट असताना देखील त्यांनी अनेक सन्मानित पदं सांभाळली होती. पारशी लोकं त्याकाळी अनेक जहाजांचे मालक होते, डॉक्टर होते आणि सरकारी कचेऱ्यांमध्ये काम देखील करायचे. पारशी लोकांनी जरी भरपूर पैसा कमावला असला तरीही आपण कोणत्या परिस्थितीमधून इथवर आलोय याची जाण त्यांना कायमच होती आणि म्हणूनच कमावलेल्या पैशांमधून त्यांनी मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी हॉस्पिटल्स आणि शैक्षणिक संस्थांची निर्मिती करत समाजाप्रती नेहमीच आपले कर्तव्य निभावलं. स्वातंत्र्योत्तर काळातही आपण जर का यांची संख्या मोजायला गेलो तर ती ०.००५ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही, मात्र भारतीय अब्जाधीशांच्या यादीत तीन ते पाच नावं ही पारशी समाजातील (टाटा, गोदरेज, पूनावाला, मिस्त्री, वाडिया) आहेत.
एअरलाईन्स, सॉफ्टवेअर, कन्स्ट्रक्शन, फूड, हेल्थ यांसारख्या एक ना अनेक क्षेत्रांमध्ये पारशी समाज अव्वल कामगिरी बजावतोय. देशाची सुरक्षा, मनोरंजन, खेळ किंवा वैज्ञानिक क्षेत्राची समाजातील प्रत्येक क्षेत्रात या लोकांनी नाव कमावलं असल्याने व्यवसायातून झालेली सुरुवात आज अनेक दिशांना पसरलेली आहे. पारशी लोकांची संख्या अत्यंत नगण्य म्हणजे १४२ कोटींच्या देशात फक्त ५७००० असली तरीही सैन्य, मनोरंजन, व्यापार, विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये पारशी नाव कमावताना दिसतात. समाज थोडा असला तरी कर्तबगारांची संख्या खूप मोठी आहे. फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ, जमशेदजी टाटा, रतन टाटा, होमी भाभा, सायरस पुनावाला, आदी गोदरेज, बोमन इराणी अशी अनेक नावं या समाजाच्या कर्तृत्वाचे उदाहरण प्रस्तुत करतात.
आपण पारशी समाजाकडून काय शिकलो?
एखादी गोष्ट वाचल्यानंतर आपण त्यातून काय शिकलो याची जाणीव झाली पाहिजे. पारशी समाज हा हातावर मोजण्याएवढा जरी असला तरीही त्यांच्या शांत आणि मेहनती स्वभावामुळे ते अनेकांवर भारी ठरले आहेत. कदाचित त्यांना जन्मजात हा स्वभाव मिळालाही असेल, मात्र तरीही समोर आलेला प्रसंग कशाप्रकारे आपल्या फायद्याचा ठरू शकतो याचे धडे आपण पारशी समाजाकडून गिरवले पाहिजेत. अनेकवेळा फटकळ बोलण्यामुळे मह्त्वाची कामं होता-होता राहतात, मात्र या समाजात जर का टिकून राहायचं असेल आणि चार-चौघांमध्ये वावरायचं असेल तर तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवता आला पाहिजे. सर्वात शेवटी पारशी समाजाकडून शिकण्याची गोष्ट म्हणजे मेहनती स्वभाव, परिस्थिती कितीही बिकट असली तरीही ती केवळ मेहनतीच्या जोरावर बदल घडवता येतात.
तर तुम्हाला या पारशी समाजाची गोष्ट कशी वाटली आणि तुम्ही यातून काय शिकलात हे आम्हाला सांगायला विसरू नका…