सुरुवातीला मुस्तफा स्वतः स्कूटरवरून दुकानांमध्ये जाऊन पिठाची पॅकेट्स विकायचे.
उत्तम दर्जा आणि शुद्धतेमुळे लोकांचा ब्रँडवर विश्वास बसला.
आज ही कंपनी केवळ इडली-डोसा पिठासोबत रेडी-टू-कुक पराठा, चपाती, वडा पीठ आणि सेंद्रिय दुधाचे पदार्थही तयार करते.
जगाचंलक्ष वेधून घेतलं
कंपनीच्या दमदार Growth मुळे लंडनच्या Apax Partners ने कंपनीत ३५% हिस्सा खरेदी करण्यासाठी ₹१,५०० कोटींची मोठी गुंतवणूक केली.
या करारामुळे कंपनीचे एकूण मूल्य आता ₹४,५०० कोटींच्या पार पोहोचले!
आखाती देशांमध्ये मोठा विस्तार (Global Vision)
iD Fresh Food: प्रेमजी इन्व्हेस्ट सारख्या दिग्गजांच्या पाठबळानंतर, या नव्या गुंतवणुकीमुळे कंपनी जागतिक स्तरावर मोठी झेप घेणार आहे.
भारतभर नेटवर्क विस्तारल्यानंतर, आता दुबई आणि इतर आखाती देशांमध्ये आपला बिझनेस मोठ्या प्रमाणावर वाढवण्याची तयारी सुरू आहे.
iD Fresh Food: परिस्थिती कशीही असो, प्रामाणिक कष्ट आणि मोठ्या विचारांच्या जोरावर एका हमालाचा मुलगाही देशात इतिहास रचू शकतो, हे मुस्तफा यांनी दाखवून दिले.
यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम जितके महत्त्वाचे असतात, तितकंच महत्त्वाचं असतं संकटांचा जिद्दीने सामना करणं. कोणत्याही व्यवसायात अपयश हे अपरिहार्य असतं, पण जो अपयशाने खचून जात नाही आणि त्याचा धैर्याने सामना करतो तो एक दिवस नक्कीच यश प्राप्त करतो. व्यवसायाच्या वाटचालीत अनेक अडथळे येतात, अनेकदा सर्व काही नियोजनानुसार होत नाही, पण खचून जाण्याऐवजी उभं राहून संघर्ष करणं हेच यशाचं खरं गमक असतं.
“डोसा क्रश” या फूड स्टार्टअपचे संस्थापक अंचल कुमार चौरसिया हे या गोष्टीचं उत्तम उदाहरण आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी व्यवसायात एक-दोन नव्हे, तर तब्बल १३ वेळा अपयश अनुभवलं. त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाच्या सुरुवातीला अपेक्षित यश मिळाल नाही. पण त्यांचा आत्मविश्वास डगमगला नाही. अपयशाने खचण्याऐवजी त्यांनी त्यातून शिकण्याचा आणि अधिक जोमाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
आजच्या लेखात आपण अंचल कुमार चौरसिया यांचा हा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत.
प्रारंभिक जीवन
अंचल कुमार चौरसिया यांचा जन्म ११ मे १९९३ रोजी मध्यप्रदेशमधील जबलपूर येथे झाला. त्यांचं बालपण अत्यंत साध्या आणि संस्कारक्षम वातावरणात गेलं. लहानपणापासूनच ते अभ्यासू आणि कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांच्या कुटुंबात आई-वडील आणि दोन बहिणी होत्या. घरातील सर्वांनी शिक्षणाला महत्त्व दिलं, त्यामुळे अंचल यांनीही शिक्षणात चांगली प्रगती केली.
त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र, त्यांना सुरुवातीपासूनच नोकरी करण्याची इच्छा नव्हती. स्वतःचा व्यवसाय सुरू करून यश मिळवायचं, हे त्यांचे ध्येय होतं. मोठ्या उद्योगपतींच्या यशोगाथांनी त्यांना नेहमीच प्रेरित केलं. त्यामुळे पदवी शिक्षण पूर्ण होताच त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
अपयशाची कहाणी
अंचल कुमार यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी २००९ मध्ये आपला पहिला व्यवसाय सुरू केला. मात्र त्यात अपयश आलं. त्यानंतर मोबाईल शॉप्स, पोल्ट्री फार्म यांसारखे अनेक व्यवसाय उभारले. मात्र, प्रत्येक वेळी काही काळाने व्यवसाय अडचणीत येत होत्या आणि त्यांना तो व्यवसाय बंद करावा लागायचा. सतत अपयश पदरी पडत असतानाही त्यांनी धीर सोडला नाही, पण आर्थिक नुकसान वाढत गेलं. अखेर, १३ व्यवसाय अपयशी ठरल्यानंतर त्यांच्यावर ८७ लाख रुपयांचं कर्ज झालं आणि त्यांची संपूर्ण आर्थिक घडी विस्कटली.
या संघर्षमय काळात त्यांच्या कुटुंबावर आणखी मोठं संकट कोसळलं. ते म्हणजे त्यांच्या बहिणीच्या लग्नाच्या अवघ्या दोन दिवसांनी त्यांच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. या धक्क्याने अंचल कुमार पूर्णतः खचले, पण त्यांच्या आईने त्यांना आधार दिला. आईच्या विश्वासामुळे त्यांनी पुन्हा प्रयत्न सुरू ठेवले आणि अपयशावर मात करण्याचा निर्धार केला. मात्र, दुर्दैवाने वडिलांच्या निधनानंतर अवघ्या सहा महिन्यांत त्यांच्या आईचंही निधन झालं. एकाच वर्षात दोन्ही पालकांना गमावल्यामुळे त्यांचं मानसिक आणि आर्थिक संतुलन पूर्णतः ढासळलं होतं.
पुन्हा उभारणी आणि मोठे यश
आधीच कर्जात बुडालेल्या अंचल यांना आता कोणीही कर्ज देण्यास तयार नव्हतं. त्यांनी इंदोर येथे एक कॅफे सुरू केला. पण तिथेही त्यांना यश मिळालं नाही. याआधी १३ व्यवसाय अपयशी ठरले होते, त्यामुळे त्यांच्याकडे गमावण्यास काहीच उरलं नव्हतं. त्यांनी पुन्हा एकदा मेहनतीने फंड गोळा करण्यास सुरुवात केली. आर्थिक अडचणी, सामाजिक दबाव आणि स्वतःच्या अपयशांचा सामना करताना त्यांच्यातील जिद्द मात्र कायम राहिली. हळूहळू त्यांच्या प्रयत्नांना यश मिळायला लागलं.
शेवटी, २३ जुलै २०१९ रोजी त्यांनी जबलपूर येथे “डोसा क्रश” या ब्रँडचं पहिलं आउटलेट सुरू केलं. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याने त्यांचा हा प्रयत्न अत्यंत यशस्वी ठरला. त्यांच्या स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पदार्थांनी ग्राहकांना आकर्षित केलं आणि अल्पावधीतच त्यांचा ब्रँड लोकप्रिय होऊ लागला. केवळ तीन महिन्यांत त्यांनी दुसरं आउटलेट सुरू केलं, आणि त्यानंतर परिस्थिती सुधारत गेली. वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी ३ लाख रुपये प्रति फ्रँचायझी दराने नवीन शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे, त्यांनी “डोसा क्रश” या ब्रँडला नव्या जोमाने बाजारात विस्तारायला सुरुवात केली आणि त्याच्या यशस्वी प्रवासाची सुरुवात झाली.
डोसा क्रश: एक लोकप्रिय फास्ट फूड ब्रँड
“डोसा क्रश” ही एक फास्ट फूड फ्रँचायझी आहे, जी पारंपरिक दक्षिण भारतीय पदार्थांना आधुनिक ट्विस्ट देऊन ग्राहकांसमोर सादर करते. या ब्रँडची खासियत म्हणजे दर्जेदार आणि स्वादिष्ट पदार्थ परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करून देणं. त्यामुळे ग्राहकांना उत्तम चव आणि उत्कृष्ट गुणवत्ता एकाच ठिकाणी मिळते. आज “डोसा क्रश” केवळ दक्षिण भारतीय पदार्थांपुरता मर्यादित न राहता, चायनीज, कॉन्टिनेंटल आणि फास्ट फूडमध्येही विस्तारली आहे.
नवीन उत्पादने आणि आव्हाने
डोसा क्रश नेहमीच नाविन्यपूर्ण पदार्थ ग्राहकांसमोर आणत आहे. त्यांनी जैन अमेरिकन डोसा, चीज डोसा, पिझ्झा उत्तप्पम आणि स्प्रिंग रोल डोसा यांसारखे नवे आणि आकर्षक पदार्थ सादर केले आहेत, जे ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहेत.
कोविड महामारीच्या काळात “डोसा क्रश” च्या अनेक शाखांना स्थलांतर करावं लागलं. मात्र, आधीच अनेक अपयशांचा सामना केलेल्या अंचल कुमार यांच्यासाठी ही परिस्थिती नवीन नव्हती. त्यांनी पुन्हा नव्याने उभारी घेतली आणि व्यवसाय वाढवला. आज छिंदवाडा, सागर, डिंडोरी यांसारख्या मध्य प्रदेशातील शहरांसह त्यांच्या अनेक ठिकाणी शाखा सुरू आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे आणि ग्राहकांच्या प्रतिसादामुळे आज “डोसा क्रश” चा वार्षिक व्यवसाय १.५ ते २ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
मित्रांनो, अंचल कुमार चौरसिया यांचा प्रवास सोपा नव्हता. सततच्या अपयशांमुळे आर्थिक अडचणी वाढल्या, मानसिक ताण वाढला, पण त्यांनी परिस्थितीसमोर हार मानण्यापेक्षा आपल्या चुका सुधारण्यावर भर दिला. प्रत्येक अपयशातून शिकत राहिले, नव्या संकल्पना मांडत राहिले आणि अखेर यश संपादित केले.
त्यांचा हा प्रवास प्रत्येक तरुण उद्योजकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवलं कीअपयश म्हणजे अंत नसतो, तर तो नव्या संधीचा आरंभ असतो. योग्य दिशा, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर कोणताही स्वप्नवत वाटणारा प्रवास यशस्वी होऊ शकतो.
आजकाल बहुतेक तरुण नोकरीच्या शोधात असतात आणि शिक्षण पूर्ण करून चांगल्या पगाराची नोकरी मिळवून आयुष्य सेटल करावं अशी त्यांची इच्छा असते. मात्र काही तरुण या पारंपारिक विचारांना तडा देत पूर्णतः स्वतःच्या हिंमतीवर वाटचाल करण्याचा निर्णय घेतात. ते नवा विचार, नव्या दृष्टिकोनातून कार्य करत, आपल्या कष्टांवर विश्वास ठेवून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवतात. नोएडातील सागर गुप्ता हा याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. त्याने पारंपारिक मार्गापेक्षा वेगळं काही करण्याचा ठरवलं आणि त्यासाठी लागणारी मेहनत, दूरदृष्टी आणि आत्मविश्वास याचा त्याने वापर केला.
केवळ २२ व्या वर्षी सागरने आपल्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात केली. आपल्या कौशल्यावर आणि दूरदृष्टीवर विश्वास ठेवून, त्याने चार वर्षांच्या कालावधीत आपल्या व्यवसायाला ६०० कोटी रुपयांच्या टर्नओव्हरपर्यंत पोचवलं.त्याचा हा प्रवास सिद्ध करतो की, आपल्या मेहनतीला जर योग्य दिशा मिळाली, तर काहीही शक्य आहे.
आजच्या लेखात आपण सागर गुप्ताच्या याच प्रेरणादायक प्रवासावर एक नजर टाकणार आहोत.
सुरुवातीचे दिवस व शिक्षण
सागर गुप्ताचा जन्म आणि शिक्षण दिल्लीमध्येच झाले. लहानपणापासूनच त्याला शिक्षणात आवड होती. त्याने श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बी.कॉम. केलं. त्याच्या वडिलांची इच्छा होती की, सागर चार्टर्ड अकाउंटंट बनावा. यासाठी त्याने सीए परीक्षेची तयारी सुरू केली आणि कोचिंग घेतलं, परंतु नियतीने त्याच्यासाठी वेगळा मार्ग ठरवला होता.
सागरला सीए होण्यापेक्षा व्यवसायात अधिक रुची होती. वडिलांचा व्यवसाय असल्यामुळे, शिक्षण घेत असतानाच त्याला उद्योग क्षेत्राची गोडी लागली.
सुरुवातीचे दिवस व शिक्षण
२०१७ मध्ये सागरने आपल्या वडिलांसोबत एलईडी टेलिव्हिजन उत्पादन क्षेत्रात प्रवेश केला. भारतात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होत होती, पण चीनच्या कंपन्यांचं उत्पादन बाजारात वर्चस्व गाजवत होते. अशा स्पर्धात्मक बाजारात आपलं स्थान निर्माण करणं हे एक मोठे आव्हान होतं. सागरने एक धाडसी निर्णय घेतला आणि ‘एक्का इलेक्ट्रॉनिक्स’ ही कंपनी सुरू केली. त्याला ठाऊक होतं की, या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काहीतरी वेगळं आणि उत्तम करावं लागेल.
सागरच्या कुटुंबात कोणीही मोठा व्यावसायिक नव्हतं, त्यामुळे व्यवसायाच्या तांत्रिक आणि व्यावसायिक बाबतीत त्याला कमी अनुभव होता. पण त्याने मेहनत, योग्य नियोजन, आणि बाजारपेठेचं बारकाईने निरीक्षण केलं आणि ‘एक्का इलेक्ट्रॉनिक्स’ला यशाच्या मार्गावर नेलं. अनेक अडचणी येत होत्या, पण सागरने प्रत्येक अडचणीला संधी मानून त्यावर काम केलं.
त्याला एक मोठं आव्हान होतं, ते म्हणजे चीनच्या उत्पादनांच्या तुलनेत भारतीय उत्पादने महाग होती. चीनच्या कंपन्यांची उत्पादने स्वस्त आणि सहज उपलब्ध होती, तर भारतीय ग्राहकांना स्थानिक उत्पादनांचा स्वीकार करवून घेणं खूप कठीण होतं. पण सागरने ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचा लाभ घेत, उत्पादनांची गुणवत्ता वाढवली आणि विश्वासार्हता निर्माण केली. यामुळे त्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला आणि त्याने भारतीय बाजारपेठेत आपलं स्थान निर्माण केलं.
एक्का इलेक्ट्रॉनिक्स – विस्तार आणि यश
आज ‘एक्का इलेक्ट्रॉनिक्स’ कंपनी एलईडी टीव्ही, स्मार्टवॉच, इअरफोन, हेडफोन, वॉशिंग मशीन यासारखी विविध उत्पादने तयार करते. भारतातील १०० हून अधिक व्यावसायिक या कंपनीकडून उत्पादने घेत आहेत. कंपनीने आपली गुणवत्ता, विश्वसनीयता आणि इतर गुणात्मक वैशिष्ट्यांमुळे बाजारात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे.
कंपनीचे मुख्य उत्पादन केंद्र सोनीपत, हरियाणा येथे स्थित आहे, जिथे १,००० हून अधिक कुशल कामगार आणि अभियंते कार्यरत आहेत. कंपनीत दर महिन्याला १ लाखाहून अधिक एलईडी टीव्हीचे उत्पादन केले जाते. २०२२-२३ मध्ये कंपनीने ६०० कोटी रुपयांचा महसूल गाठला, जो त्याच्या व्यवसायातील मोठ्या यशाचं प्रतीक आहे.
सागर आणि त्याच्या वडिलांनी आता नोएडामध्ये १,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करून नवीन उत्पादन सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुरुवातीला ४०० कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत. या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन प्रक्रियेचे सुधारणा केली जाईल. ‘एक्का इलेक्ट्रॉनिक्स’ने देशांतर्गत उत्पादनाला चालना दिली आहे, आणि आज भारतात तयार होणारी उत्पादने जागतिक दर्जाची बनली आहेत. त्यामुळे, त्यांची उत्पादने आता परदेशी कंपन्यांना टक्कर देत आहेत.
मित्रांनो, सागर गुप्ता याचा प्रवास हा केवळ एक व्यवसायिक यशोगाथा नाही, तर तो अनेक तरुणांसाठी एक प्रेरणा आहे. त्याने सिद्ध केलं आहे की योग्य संधीचा लाभ घेतल्यास आणि कठोर परिश्रम केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येतं.
तुम्ही राजकुमार राव अभिनित “श्रीकांत” हा चित्रपट पाहिलाय का? जर आतापर्यंत पाहिला नसेल, तर आमच्या मते एकदा नक्की बघावा. तुम्ही विचार करत असाल की, आम्ही अचानक चित्रपटाबद्दल का बोलायला लागलो? चित्रपटाचं प्रमोशन करतोय का? नाही, मग आम्ही राजकुमार राव यांचे चाहते आहोत का? तर नाही. हा चित्रपट तुम्ही या कारणासाठी बघितला पाहिजे की ही कथा ज्या “श्रीकांत” च्या जीवनावर आधारित आहे, ती तुमच्या-आमच्यासारख्या लाखो, करोडो लोकांना प्रेरणा देणारी आहे.
तो श्रीकांत, ज्याने त्याच्यावर होणाऱ्या भेदभावाविरुद्ध इथल्या सरकारला कोर्टात उभं केलं, तो श्रीकांत ज्याने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना वचन दिलं की, तो देशाचा पहिला अंध राष्ट्रपती बनून दाखवेल, तो श्रीकांत ज्याची चिकाटी आणि जिद्द पाहून रतन टाटा आणि देशातील मोठमोठ्या उद्योजकांनी त्याची पाठ थोपाटली आणि तोच श्रीकांत ज्याने असं कर्तृत्व गाजवलं की, त्याच्या आयुष्यावर चित्रपट सुद्धा आला. त्याने हे खरं करुन दाखवलं की, स्वप्न पाहण्यासाठी डोळ्यांची गरज नाही, स्वत:वरील विश्वास तुम्हाला तुमचंय इप्सित गाठून देऊ शकतो. आज, नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून त्याच्या या प्रेरणादायी प्रवासावर एक नजर फिरवूया.
जन्मजात संघर्ष
श्रीकांत बोल्ला याचा जन्म 7 जुलै 1991 रोजी आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम जवळील सीतारामपुरम येथे झाला. श्रीकांत जन्मतःच अंध होता, ज्यामुळे त्याच्या जीवनाला सुरुवातीपासूनच आव्हानात्मक वळण मिळाले. त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल होतं. वडील दामोदरराव आणि आई वेंकटम्मा हे साधारण शेती करणारे जोडपं, ज्यांचे महिन्याचं उत्पन्न केवळ १६०० रुपये होतं. त्यामुळे लहानपणीच त्यांना गरिबीचा सामना करावा लागला. परिस्थिती आधीच हलाखीची होती आणि त्यात अंध मुलाच्या जन्मामुळे त्यांच्या कुटुंबावर अधिकच निराशा पसरली.
गावातील काही लोकांनी सल्ला दिला की , “याला मारून टाका, नाहीतर आयुष्यभर दुःख सहन करावं लागेल. हा मुलगा कामाचा नाही; जन्मतः अंध असणं हे पाप आहे.” परंतु, श्रीकांतच्या आई-वडिलांनी कोणत्याही कथित शुभचिंतकाचं न ऐकता आपल्या मुलाला मोठं केलं. त्यांना विश्वास होता की, एक दिवस हा मुलगा चमत्कार करून दाखवेल.
सुरुवातीला, वडिलांनी त्याला शेतीची कामे शिकवायचा प्रयत्न केला, पण अंधत्वामुळे त्याला ती कामे करता येत नव्हती. त्यामुळे वडिलांना वाटले की, त्याने शाळेत जाऊन अभ्यास करून नाव कमवावे. त्यानुसार, त्याला शाळेत दाखल करण्यात आले. त्यानेसुद्धा जिद्दीने शिक्षण घेतले. दिसत नसल्यामुळे, तो लहानपणी भावांच्या मदतीने शाळेत जात असे. शाळेतही त्याला नेहमी शेवटच्या बाकावर बसावे लागे. ही सगळी अवहेलना सहन करताना त्याला प्रचंड वाईट वाटत असे. सततच्या अवहेलनांमुळे एकदा त्याने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, वडिलांनी त्याला सांगितले की, शिक्षणाच्या माध्यमातूनच तुझे आयुष्य बदलू शकते. हे ऐकल्यानंतर श्रीकांतने कधीही मागे वळून पाहिले नाही. सगळं सहन करत, प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर त्याने शिक्षण पूर्ण केलं.
शिक्षण मिळावं म्हणून सरकारला खेचलं कोर्टात
श्रीकांतला अंध मुलांच्या शाळेत टाकण्यात आलं. ही शाळा त्यांच्या गावापासून साधारणतः 400 किमी दूर होती, त्यामुळे त्याला हैदराबादमध्ये जावं लागलं. त्याने हार न मानता मन लावून अभ्यास केला, परिणामी त्याला इयत्ता 10वीमध्ये 96 टक्के आणि 12 वीमध्ये 98 टक्के मार्क्स मिळवले. या गुणांच्या आधारे त्याने पुढील शिक्षण विज्ञान शाखेत घेण्याचा निर्णय घेतला.
तरीही, त्याला विविध महाविद्यालयांमधून प्रवेश मिळवण्यात अडथळे आले, कारण त्या काळात अंध विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शाखेतून शिक्षण घेण्याची व्यवस्था अस्तित्वात नव्हती. पण श्रीकांतची ठाम इच्छा आणि जिद्द त्याला यशस्वी होण्यासाठी प्रेरित करत होती. त्याने आपल्या हक्कासाठी सरकारविरुद्ध कोर्टात केस दाखल केली आणि थेट सरकारलाच कोर्टात खेचलं. हा खटला सुमारे सहा महिने चालला आणि त्यात श्रीकांतला विजय मिळाला. त्यानंतर, त्याने विज्ञान शाखेत प्रवेश मिळवला आणि विज्ञान शाखेतून अभ्यास करणारा पहिला दृष्टीहीन विद्यार्थी बनला. तेव्हा दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शाखेतील पुस्तकं उपलब्ध नव्हती, त्यामुळे श्रीकांतने त्यावर तोडगा काढला. त्याने विज्ञान शाखेच्या पुस्तकांचे ऑडिओ व्हर्जन तयार करून अभ्यास सुरू केला. श्रीकांतचा हा संघर्ष आणि त्याच्या धाडसाने केवळ स्वतःच्या जीवनातच नव्हे, तर अंध विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या क्षेत्रातही एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.
भारतात उच्चशिक्षण मिळालं नाही म्हणून गाठली थेट अमेरिका
श्रीकांतने १२ वी नंतर आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अप्लाय केलं. त्यांने देशातील विविध आयआयटी आणि आयआयएम्समध्ये पात्रता परीक्षेचा अर्ज भरला. परंतु, हॉल तिकीट येण्याऐवजी त्याला एक पत्र प्राप्त झालं, ज्यात स्पष्टपणे सांगितलं गेलं की, ‘तुम्ही अंध आहात म्हणून तुम्ही परीक्षेला बसू शकत नाही’. हे ऐकून श्रीकांतला खूप वाईट वाटलं, पण त्याने या अडचणीला नकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी ठामपणे सांगितलं की, ‘आयआयटी मला स्वीकारत नाही, तर मलाही आयआयटीची गरज नाही.’
आयआयटीने त्याला नाकारलं, पण त्याच्या डोळ्यांत इंजिनिअर होण्याचं स्वप्न अजूनही होतं. त्या नकारानंतर, श्रीकांतने अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच एमआयटी आणि इंग्लंडच्या केंब्रिजमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला आणि चमत्कारिकरित्या, त्याला एमआयटीमध्ये प्रवेश मिळाला. त्यालाच मॅनेजमेंट सायन्समध्ये शिकण्यासाठी स्कॉलरशिपदेखील मिळाली, ज्यामुळे तो एमआयटीमध्ये शिकणारा पहिला आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी बनला. एमआयटी ही अमेरिकेमधील एक अत्यंत प्रतिष्ठित तांत्रिक संस्था आहे.
श्रीकांतने दिलेल्या संधीचा उत्कृष्ट उपयोग केला आणि एमआयटीमध्ये अत्यंत मेहनतीने अभ्यास केला. अखेर, तो एमआयटीमधून उत्तीर्ण होणारा पहिला आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी ठरला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला अमेरिकेतील अनेक कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळू लागल्या, पण श्रीकांतने अमेरिकेत काम करण्यासाठी नकार दिला. कारण त्याला आपल्या देशासाठी आणि देशातील लोकांसाठी काहीतरी करायचं होतं.
असा सुरु केला यशाचा प्रवास
वर म्हटल्याप्रामाणे त्याला देशातील अंध, गरीब आणि दुर्बल लोकांसाठी काहीतरी चांगलं करायचं होतं आणि म्हणूनच तो शिक्षण पूर्ण करून मायदेशी परतला. आपल्या कामात गुंतल्यावरच श्रीकांतच्या कार्याची खरी गती सुरू झाली.
2012 मध्ये, श्रीकांतने भारतात “बोलंट इंडस्ट्रीज” नावाची ग्राहक खाद्य पॅकेजिंग कंपनी स्थापन केली. या कंपनीत पाने आणि कागदापासून पर्यावरणपूरक म्हणजेच इको-फ्रेंडली पॅकेजिंग तयार केली जाते. सुरुवातीला एकाच ठिकाणाहून सुरू झालेल्या या कंपनीने आज 7 युनिट्स उभारली आहेत. 2012 पासून कंपनीने मासिक 20% दराने वाढ नोंदवली आहे. कंपनीची वार्षिक उलाढाल 200 कोटींवर पोहोचली असून, तिचं मूल्य सुमारे 400 कोटींहून अधिक आहे.
श्रीकांतच्या कंपनीने अशा प्रकारची प्रगती केली आहे की, 2021 मध्ये फोर्ब्सने त्याला “30 अंडर 30 एशिया” यादीत स्थान दिले. या यादीत स्थान मिळवणारे व्यावसायिक 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात आणि आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करत असतात. श्रीकांतने आपल्या कार्याने एक नवा मानक निर्माण केला आहे आणि त्याची प्रेरणादायक कथा आजच्या युवांसाठी एक आदर्श ठरली आहे.
श्रीकांतच्या आयुष्यात एक असा टप्पा आला की, त्याला आपल्या व्यवसायासाठी निधी मिळवण्यात अडचणी येत होत्या. या कठीण परिस्थितीत, भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी श्रीकांतच्या कंपनीत 1.3 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीमुळे श्रीकांतच्या व्यवसायात लक्षणीय वाढ झाली. टाटा यांच्यासोबतच सतीश रेड्डी, एसपी रेड्डी, श्रीनी राजू, चलमला सेट्टी आणि रवी मंथ यांच्याही गुंतवणुकीचा फायदा श्रीकांतच्या कंपनीला झाला.
आज श्रीकांतच्या कंपनीत 1500 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, ज्यात बहुसंख्य कर्मचारी दिव्यांग आहेत. श्रीकांतने आपल्या सहकाऱ्यांसह 8 जणांच्या टीमसह कंपनीची स्थापना केली होती, ज्यामध्ये बेरोजगार आणि अंध व्यक्तींना रोजगार दिला गेला. व्यवसायाच्या वाढीमुळे अन्य लोकांनाही रोजगार मिळाला.
पुरस्कार आणि मानसन्मान
श्रीकांतला त्याच्या यशाबद्दल त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये प्रतिष्ठित युवा सेवा पुरस्कार मिळाला जो समाजातील युवा वर्गासाठी असामान्य कार्यासाठी प्रदान केला जातो. या व्यतिरिक्त तेलुगु फाइन आर्ट्स सोसायटीचा युवा उत्कृष्टता पुरस्कार, तसेच त्याच्या उद्योजकीय क्षमतांना लक्षात घेऊन २०१५ साली युवा उद्योजक पुरस्कार दिला गेला. 2018 साली समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी बिझनेस लाइन यंग चेंज मेकर पुरस्कार दिला गेला,शिवाय, श्रीकांत भारताच्या अंध क्रिकेट संघातही खेळला आहे, जे त्याच्या विविध अंगभूत गुणांचं द्योतक आहे.
त्याच्या आयुष्याचा एक प्रसंग येथे विशेष नमूद करावासा वाटतो. तो म्हणजे साल 2006 मध्ये त्या वेळचे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी ‘लीड इंडिया 2020’ सुरू केले, ज्यात तरुणांना मार्गदर्शन करून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याची संधी दिली गेली. श्रीकांतही त्या निवडक तरुणांमध्ये होता. कलाम सर सर्व मुलांशी संवाद साधत होते आणि त्यांना विचारले की, तुम्ही भविष्यात काय करणार आहात? त्या मुलांनी दिलेल्या उत्तरांमध्ये, नववीत शिकणाऱ्या श्रीकांतचे उत्तर राष्ट्रपतींना विशेष लक्षात राहिले. श्रीकांतने सांगितले की तो देशाचा पहिला अंध राष्ट्रपती बनू इच्छितो. श्रीकांतच्या या उत्तरात असणाऱ्या आत्मविश्वासामुळे कलाम सर प्रभावित झाले आणि त्यांनी त्याची प्रशंसा केली.
श्रीकांतची कहाणी ही खरंच प्रेरणादायी आहे. त्याच्या जीवनातील संघर्ष आणि त्यावर मात करत त्यांनी केलेली प्रगती, आपल्यासाठी एक मोठा धडा आहे. श्रीकांतचे आयुष्य हे एक प्रेरणास्त्रोत आहे, ज्यातून आपल्याला शिकायला मिळते की कोणत्याही परिस्थितीत हार मानू नये आणि नेहमीच आपल्या ध्येयाच्या दिशेने धैर्याने आणि आत्मविश्वासाने वाटचाल करावी.
त्याचा कधीही तडजोड न करणारा स्वभाव आणि त्यांच्या सेंस ऑफ ह्यूमरने त्याला त्याच्या जीवनातल्या सर्व आव्हानांना तोंड देण्याची ताकद दिली. त्याने कधीही स्वतःला दयेचे पात्र बनवले नाही, उलट त्या परिस्थितींवर हसून ते पुढे जात राहिला. त्याच्या या प्रवासातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते – जीवनातील कोणतेही संकट हे आपल्या आत्मबलापुढे थिटे आहे, फक्त आपल्याकडे त्याला सामोरे जाण्यासाठी धैर्य हवे. जीवनात कोणतीही अडचण आपल्याला तोडू शकत नाही, जर आपला स्वतःवर विश्वास असेल. श्रीकांतच्या या अद्वितीय जीवन प्रवासाला “नवी अर्थक्रांती” सलाम करते!
सलग 17 वेळा अपयश 18 व्या वेळा यश! शेअरचॅट चे सीईओ अंकुश सचदेव यांची यशोगाथा…
लेहरो से डरकर नौका पार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती.
हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील या ओळी मनाला प्रेरणा देणाऱ्या आहेत. जीवनात यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करणं किती महत्वाचं आहे हे या ओळींमधून स्पष्ट होतं. अंकुश सचदेवा यांच्या यशाची कहाणी या ओळींचा उत्तम उदाहरण आहे. त्यांनी एक नाही, दोन नाही, तर तब्बल 17 वेळा अपयश पचवून त्यांच्या इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाने सोशल मीडिया क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केलं आहे.
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
अंकुश सचदेवांचा जन्म आग्रा, उत्तर प्रदेश येथे झाला. त्याची आई सरकारी रुग्णालयात काम करत होती आणि वडील व्यापारी होते. त्यांनी आपली प्रारंभिक शिक्षण आग्रा येथील स्थानिक शाळेत घेतले. लहानपणीच त्यांना तंत्रज्ञान आणि नवउद्यमशीलतेची आवड होती. त्यांनी उच्च शिक्षणासाठी आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश घेतला आणि तेथून अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. आयआयटी कानपूरमधील शिक्षणाने त्यांना तंत्रज्ञान आणि नवउद्यमशीलतेची गोडी लावली. आयआयटीमधील शिक्षणानंतर अंकुशने त्यांच्या करियरची सुरुवात करण्यासाठी आपली कल्पकता आणि मेहनत एकत्र केली.
करियरची सुरुवात आणि अडथळे
आयआयटी कानपूरमधून संगणक विज्ञानात (computer science) बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीची पदवी घेतल्यानंतर, आणि तब्बल 17 वेळा वेगवेगळ्या स्टार्टअपमध्ये अपयशी झाल्यानंतर अंकुशने आपल्या दोन मित्रांसह, भानु प्रताप सिंह आणि फरिद अहसान यांच्या सहकार्याने 2015 साली ShareChat ची स्थापना केली. तत्पूर्वी त्यांनी मे ते जुलै 2014 पर्यंत मायक्रोसॉफ्टमध्ये इंटर्न म्हणून काम केले. Sharechat स्थापन तर झाले. मात्र हा प्रवास सोपा अजिबात नव्हता. समोर अनेक आव्हानं होती. अडचणी होत्या. ज्यात आर्थिक अडचणी, तांत्रिक समस्या आणि विविध इतर आव्हानं समाविष्ट होती. तसेच सुरवातीला वापरकर्त्यांचा प्रतिसाद मिळवणे हे सर्व खूप आव्हानात्मक होते. मात्र त्यांनी कधीच हार मानली नाही. त्यांच्या मेहनत, समर्पण आणि दृढ संकल्पामुळे त्यांनी शेअरचॅटच्या यशाचा मार्ग तयार केला.
ShareChat चा उद्देश भारतीय भाषांमध्ये वापरकर्त्यांना एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रदान करणे होता, जो त्यांच्या भाषिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करतो. या प्लॅटफॉर्ममुळे भारतीय भाषांना एक नवा आयाम मिळाला आणि विविध भाषिक समुदायांना एकत्र येण्याचे साधन मिळाले. त्यांनी हे व्यासपीठ एकूण १५ भारतीय स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिले. ज्यात मराठी, गुजराथी, हिंदी, मल्याळम, पंजाबी, तेलगू, तामिळ, ओरिया, कन्नड, आसामी, हरियानवी, राजस्थानी, भोजपुरी आणि इंग्रजी यांचा समावेश आहे.
सुरुवातीच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कमाईपेक्षा अधिक युजर्स वाढीकडे लक्ष केंद्रित केले. जो मुलगा कधीकाळी त्याच्या कॉलेजमध्ये प्लेसमेंटसाठीही बसला नाही त्याने सहकाऱ्यांसोबत मिळून आपल्या दृढ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर बघता बघता 40 हजार कोटींची कंपनी उभी केली, हे खरंच “धडपडणार्यांच्या हाती यश येतेच” या उक्तीला सिद्ध करणारे कार्य ठरले.
सफलता आणि विस्तार
ShareChat यशस्वी झाल्यानंतर, अंकुशने Moj नावाचा एक शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म लाँच केला. TikTok बंद झाल्यानंतर, Moj ने भारतीय बाजारपेठेत जलद गतीने आपले स्थान निर्माण केले. या प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांना छोट्या व्हिडिओज तयार करणे आणि शेअर करणे शक्य झाले. Moj ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली आणि ती आज एक अत्यंत लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म बनली आहे.
ShareChat आणि Moj ने भारतातील डिजिटल कंटेंट कंझम्पशन मध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. ShareChat चे 160 दशलक्ष पेक्षा जास्त मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत.
अंकुश सचदेवा आणि त्यांची टीम नेहमीच नवीन फिचर्स आणि तंत्रज्ञान वापरण्यावर जोर देतात, ज्यामुळे ShareChat आणि Moj वापरकर्त्यांचा अनुभव सतत सुधारत असतो.
व्हिजन आणि नेतृत्व
अंकुश सचदेवांचे व्हिजन भारताच्या लहान शहरांतील आणि ग्रामीण भागांतील लोकांना डिजिटल दुनियेचे दरवाजे उघडणे आहे. त्यांचे ध्येय आहे की, प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या भाषेतून आणि संस्कृतीतून ऑनलाईन सामग्रीचा उपभोग घेण्याची संधी मिळावी. त्यांनी त्यांच्या टीमसोबत मिळून सातत्याने नवविचार केले आहेत आणि भारतीय टेक्नोलॉजी उद्योगात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, ShareChat आणि Moj हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स सतत सुधारत आहेत आणि वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करत आहेत.
गुंतवणूक आणि जागतिक विस्तार
अंकुशला SAIF Partners, DCM श्रीराम, ट्विटर (एक्स), Lightspeed India Partners, Venture Highway, India Quotient आणि Hero MotoCorp सारख्या प्रमुख गुंतवणूकदारांकडून महत्त्वपूर्ण पाठिंबा मिळाला. शेअरचॅटने अखेरीस $40 दशलक्ष उभे केले. 2021 मध्ये, ShareChat ने गुंतवणूकदारांना आकर्षित करून $400 दशलक्ष जमा केले आणि 2022 मध्ये, टाइम्स ग्रुप, Google आणि Temasek Holdings कडून $300 दशलक्ष जमा केले.
ShareChatने अनेक जागतिक बाजारपेठांमध्ये विस्तार केला आहे, ज्यामध्ये अमेरिका, युरोप आणि इतर देशांचा समावेश आहे. कंपनीने महत्त्वपूर्ण गुंतवणूक मिळवली, या निधीचा उपयोग प्लॅटफॉर्मच्या वैशिष्ट्यांची सुधारणा आणि वापरकर्त्यांच्या अनुभवाला अधिक आकर्षक बनवण्यासाठी केला जात आहे.
व्यक्तिगत जीवन
अंकुश एक साधारण आणि विनम्र व्यक्तिमत्वाचे धनी आहेत. त्यांना नवीन तंत्रज्ञानात रस आहे आणि ते भारतीय भाषांच्या प्रचार-प्रसारासाठीही काम करीत आहेत. त्यांनी त्यांच्या यशाचं श्रेय त्यांच्या टीमला आणि भारतीय वापरकर्त्यांना दिलं आहे. ते त्यांच्या कौटुंबिक जीवनातही तितकेच समर्पित आहेत.
अंकुश सचदेवा यांचा ‘फोर्ब्स’ कडून देखील सन्मान झाला आहे. ‘फोर्ब्स इंडिया 30 अंडर 30’ च्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला होता. ही यादी अशा तरुण उद्योजकांची ओळख करून देते ज्यांनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
अंकुश सचदेवांची कथा भारतीय नवउद्योजकांना प्रेरणा देणारी आहे. त्यांनी केवळ आपल्या कल्पनांना साकारच केले नाही, तर जन-जनापर्यंत पोहोचवले आहे. त्यांच्या कठोर परिश्रम, निष्ठा आणि नवविचारामुळे ते आज भारतीय टेक्नोलॉजी क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व बनले आहेत. त्यांची ही यशोगाथा निश्चितच प्रत्येक नवउद्यमीला मार्गदर्शन करेल आणि त्यांना त्यांच्या ध्येयाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देईल.
Struggle शब्दाचा एक लोचा आहे. आपल्याकडे हा शब्द आर्टसला Admission घेणाऱ्या, नाटक -चित्रपट क्षेत्रात Career करू इच्छिणाऱ्या आणि दहा ते पाच ची चाकोरी सोडून वेगळी वाट चोखाळणाऱ्या लोकांना उद्देशून वापरला जातो. मुळात मला असं वाटत की प्रत्येकजण हा त्याच्या / तिच्या पातळीवर एक Struggle करतच असतो. म्हणजे बापाशी बिघडलेले संबंध पूर्ववत करण्यासाठी धडपडणारा पोरगा हा एक Struggle च करत असतो.
नोकरी मध्ये बॉस आपली ठासत आहे हे कळत असून पण नोकरी टिकवण्यासाठी धडपड करणारा मध्यमवर्गीय माणूस पण रोज संघर्ष करीतच असतो. पण कधी कधी हा संघर्ष खुप लांबतो. इतका लांबतो की आता याला शेवटच नाही अस वाटायला लागत. खुप लोक अशावेळेस Give Up करतात. आणि आयुष्यभर ‘काश …’ च मधुन टोचणी देणार फिलिंग घेऊन जगतात. काही लोक मात्र याला अपवाद असतात. ते टिकून राहतात, लढतात आणि जिंकतात पण. अशीच एक हृदयस्पर्शी संघर्षाची कथा आहे आंग ली ची. इंग्रजी चित्रपट पाहणाऱ्या लोकांसाठी हे नाव अपरिचित नाही. Brokeback Mountain, नुकताच येउन गेलेला आणि गाजलेला life of pie असे अनेक चित्रपट आंग ली ने दिग्दर्शित केले आहेत. आज जगातल्या आघाडीच्या दिग्दर्शकांमध्ये त्याचा समावेश होतो. पण इथपर्यंत मजल मारण्यासाठी त्याने जो भावनिक, आर्थिक संघर्ष केला त्याची हि कुठलाही आव न आणणारी, melodramatic नसणारी पण हृदयस्पर्शी कहाणी त्याच्याच शब्दात :
१९७८ मध्ये मी Illinois University मध्ये चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेण्याचा निर्णय पक्का केला. माझ्या वडिलांचा या माझ्या निर्णयाला तीव्र विरोध होता. त्यांनी माझ्या तोंडावर काही आकडेवारी फेकून मारली.: ‘दरवर्षी तुझ्यासारखे ५०००० लोक हे असल कुचकामी शिक्षण घेऊन कॉलेजच्या बाहेर पडतात आणि त्यांच्यासाठी नोकऱ्या किती असतात, तर फक्त २००. ‘तरी त्यांचा हा सल्ला ठोकरून मी अमेरिकेला जाणाऱ्या विमानात बसलो. पण त्यामुळे पिता – पुत्राच्या नात्याला कधीही न भरून येणारा तडा गेला. पुढच्या दोन दशकात आम्ही शंभरहून कमी वाक्य एकमेकांशी बोललो असू.
पण जेव्हा मी माझ शिक्षण संपवून बाहेर पडलो तेव्हा माझ्या वडिलांनी व्यक्त केलेली भीती कीती खरी होती हे मला पदोपदी जाणवायला लागलं. एक चिनी वंशाचा माणूस hollywood मध्ये काहीतरी करून दाखवेल असे कुणालापण वाटत नव्हतं. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतरची पुढची सहा वर्ष ही कधीही संपणार नाही असे वाटणाऱ्या अनिश्चिततेने भरलेली होती. या सहा वर्षांमधला बहुतांश वेळ मी अनेक दिग्दर्शक व संकलक यांचा सहायक म्हणून छोटी मोठी किरकोळ काम करण्यात व्यतीत केला. सगळ्यात वेदनादायक भाग हा मी लिहिलेलं स्क्रिप्ट घेऊन निर्मात्यांचे उंबरठे झिजवणे हा होता. त्याकाळात मला साधारणतः ३० निर्मात्यांकडून नकार मिळाला.
त्याच वर्षी मी ३० वर्षाचा झालो. एक जुनी चिनी म्हण आहे : तिशीत माणूस त्याच्या स्वतःच्या पायावर ठाम उभा असतो अशा अर्थाची. पण मी तर अजूनही धड स्वतःच्या प्राथमिक गरजा पूर्ण करू शकत नव्हतो. या अशा पडत्या काळात माझ्यासमोर फार कमी पर्याय शिल्लक होते. एक तर काही घडेपर्यंत वाट बघत बसायचं अथवा चित्रपट बनवण्याचं माझ स्वप्न सोडून द्याच.
या अनिश्चिततेच्या अंधाराने भरलेल्या काळात मला माझ्या बायकोने पाठबळ दिल. तिने तिची पदवी जीवशास्त्र या विषयातून घेतली होती आणि ती एका प्रयोगशाळेत नोकरी करत होती. पण तिच्या नोकरीमधून मिळणारे उत्पन्न आम्हाला पुरेल एवढे नव्हते. त्याचकाळात आम्हाला एक पुत्ररत्न झाले आणि आमच्या जबाबदाऱ्या अजून वाढल्या. घरात मी पैसे आणू शकत नाही या अपराधी भावनेतून मी घरकामांची जबाबदारी घ्यायला सुरुवात केली. जेव्हा बायको कामावर जायची तेव्हा मी स्वयंपाक , साफसफाई आणि आमच्या मुलाच संगोपन अशी काम करत असे. फावल्या वेळात वाचन आणि संहिता लेखन चालूच होते. रात्रीच जेवण बनवून झाल की मी आमच्या मुलाला, घेऊन घरासमोरच्या पायऱ्यांवर बसून राही. मी माझ्या बायकोची आणि तो त्याच्या आईची वाट बघत.
हे असलं आयुष्य कुठल्याही पुरुषासाठी मानहानीकारकच. माझ्या सासू सासऱ्यांना हे डाचत असावं. त्यांनी माझ्या बायकोला काही पैसे देऊ केले. त्यांच्या मते मी या भांडवलातून एखाद चायनीज हॉटेल सुरु करावं जेणेकरून माझं स्वतःच काही उत्पन्न सुरु होईल. माझ्या बायकोने हे पैसे घ्यायला इन्कार केला. जेव्हा मला याबद्दल कळल तेव्हा मी सुन्न झालो. अनेक रात्री जागून काढल्यावर शेवटी मी निर्णयाप्रत आलो : माझं चित्रपट बनवण्याचं स्वप्न हे पूर्ण होणार नाही. सत्याला सामोरे जाण्याची वेळ आली आहे
जड अंत:करणाने मी जवळच्या एका कॉलेज मध्ये मी Computer Course ला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्यावर मी निराशेच्या गर्तेत बुडून गेलो. माझ्या बायकोला हा माझ्या स्वभावातला फरक जाणवला. कॉम्प्यूटर क्लासचं वेळापत्रक तिने माझ्या बॅगमध्ये पाहिलं. त्या रात्री ती काहीच बोलली नाही.
दुसऱ्या दिवशी ती तिच्या कामाला जायला निघाली. मी सुन्नपणे बसून होतो. ती घराबाहेर पडली. पण अचानक तिच्या मनात काय आल कुणास ठाऊक. घराबाहेरच्या पायऱ्यांवर असताना ती पुन्हा वळली आणि एवढंच म्हणाली, “आंग , तुझ्या स्वप्नांचा विसर पडू देऊ नकोस.” तिच्या या एका वाक्याने जादूची कांडी फिरली. निराशेच्या गर्तेत गटांगळ्या खाणारं माझ स्वप्न पुन्हा जिवंत झालं. त्याचा पुनर्जन्म झाला.
मी ते कॉम्प्यूटर क्लासचं वेळापत्रक बॅगमधून बाहेर काढलं. त्याचे हळूहळू बारीक बारीक तुकडे केले आणि कचऱ्याच्या डब्यात ते फेकून दिले.
अर्थातच एका रात्रीत परिस्थिती बदलली नाही. पण काही दिवसांनी मला माझ्या स्क्रिप्ट साठी finance मिळाला. मी माझ्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. नंतर माझ्या कामाला काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार पण मिळाले. नंतर माझ्या बायकोने माझ्याशी बोलताना कबुली दिली,’ मला नेहमीच असा विश्वास होता की तुझा जन्म हा चित्रपट बनवण्यासाठीच झाला आहे. संगणक क्षेत्रात आधीच खूप लोक काम करत आहेत आणि त्यांना तुझी गरजपण नव्हती.”
स्वप्नांना वयाची, लिंगाची, धर्माची बंधनं कधीच नसतात. त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी कुठल्याही मुहूर्ताची गरज नसते. आंग लि ने २०१३ मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा ऑस्कर पुरस्कार जिंकला. तुमचं स्वप्नं काय आहे ?
घरची प्रचंड गरिबी. बुद्धिमत्ता हेच भांडवल. पेड (ता. तासगाव, जि. सांगली) येथे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या युवकाने मोठ्या भावाच्या मदतीने मुंबईची वाट धरली. “जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट’ हे ब्रीद घेऊन व्यवसायात शिरलेले अशोक खाडे यांच्या “फॅमिली’चा विस्तार आज साडेचार हजार कर्मचारी आणि सुमारे साडेपाचशे कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या “दास ऑफशोअर’ कंपनीत झालाय.
वडील चर्मकार. आई, बहीण दुसऱ्याच्या शेतात काम करीत…कधी-कधी आम्हा भांवडांनाही कामाला जावं लागायचं…..आयुष्यानं दिलेल्या चटक्यांच्या आठवणी अशोक खाडे सांगत होते…””सातवीपर्यंत पेडला शिक्षण झालं. पुढील शिक्षणासाठी तासगावला बोर्डिंगमध्ये राहायला लागलो. मी शिकावं म्हणून वडील व मोठ्या भावाचा जीव तुटायचा. माझ्या शिक्षणासाठी घरचे किती कष्ट घेतायेत, याची जाणीव असल्यानं रात्र-रात्र झोप लागायची नाही. बोर्डिंगला पोटभरीचं जेवण मिळायचं नाही. पण मोठं व्हायचं स्वप्न असल्यानं कोणतीही तक्रार नव्हती.
सन 1972 ला चांगल्या गुणांनी अकरावी झालो. त्या वर्षी मोठा दुष्काळ पडला. अंगात घालायला कपडेच नाही, तर पायताण कोठून येणार. आम्हाला शिकविणारे देसाई सर कळवळले. त्यांनी शर्ट व पायजमा घेऊन दिला. अकरावीच्या ऐन परीक्षेला पेनची निफ तुटली. जोशी सरांनी अडचण समजून घेत निफ आणून दिली. साठ टक्के गुण पडले. आज माझ्याकडे हजारो रुपयांचा पेन आहे; परंतु अकरावीतील “त्या’ पेनची किंमत कशालाही नाही. आजही माझ्याकडे तो पेन आहे. वडील बोर्डिंगवर आम्हाला भाकरी घेऊन यायचे आणि म्हणायचे, “राजांनो, गरिबी आणि दुष्काळ मी आणला नाही. तुम्ही धीर सोडू नका. माळावर जोपर्यंत पळस आहे तोपर्यंत आपल्याकडे गरिबी आहे, असे समजू नका. खूप शिका.’ वडिलांचे शब्द काळजाला भिडले,” खाडे म्हणाले.
खाडे कुटुंबीयांनी सन 1975 ला मुंबई गाठली. वैद्यकीय शिक्षण घ्यावे अशी माझी इच्छा होती, असे सांगून खाडे म्हणाले, “”रोजीरोटीसाठी आम्ही तिघेही भाऊ माझगाव डॉकमध्ये नोकरी करायला लागलो. मी डिझाइन विभागात होतो. मोठ्या भावाच्या आग्रहामुळे इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. नोकरी आणि शिक्षण दोन्ही सुरू झाले. सन 1983 मध्ये कंपनीच्याच कामासाठी जर्मनीला जाण्याची संधी मिळाली. नवीन उमेद निर्माण झाली होती. गरिबी तर टोचत होतीच, स्वतःचे काही तरी करायचा ध्यास घेतला. त्यातून सन 1992 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला. अन्य भावांनीसुद्धा राजीनामा दिला. तिघेही एकत्र राहत होतो आणि घरात एक प्रकारचे इंजिनिअरिंगचेच वातावरण होते. गरिबीत आयुष्यभर जगण्यापेक्षा थोडेच आयुष्य जगू; परंतु ते चांगले असेल असा ध्यास घेऊन “दास ऑफशोअर‘ची निर्मिती झाली. मराठी माणूस, त्यातही खाडे आडनाव म्हटल्यावर कोण काम देणार, हा प्रश्न होताच. त्यामुळे तिघा भावांच्या नावांची आद्याक्षरे घेऊन (दत्तात्रय, अशोक आणि सुरेश) कंपनीला “दास’ नाव दिले. नावसुद्धा “के. अशोक’ असे सांगायचो. पहिले काम माझगाव डॉकमध्येच मिळाले. मुंबईतील पहिला स्कायवॉक बांधला. मग मागे वळून पाहिले नाही.”
“दास’ कंपनीने ओएनजीसी, ब्रिटिश गॅस अशा नामवंत कंपन्यांसाठी भरसमुद्रात प्रकल्प बांधणीचे काम केलेय. या समूहाच्या इंजिनिअरिंग, डेअरी, ऍग्रो प्रॉडक्ट्स, रस्ते बांधणी, उड्डाणपूल अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत सात कंपन्या आहेत. अबुधाबीचे प्रिन्स शेख महमंद बिन खलिफा बिन झायर अल नयन यांच्याबरोबर व्यावसायिक भागीदारी केल्याचे खाडे अभिमानाने सांगतात.
वारकरी वृत्तीचे असलेले खाडे यांचा ज्ञानेश्वरीवर गाढा विश्वास. जमशेठजी टाटा, मदर तेरेसा हे त्यांचे आदर्श. एक रुपयातील एक भाग समाजासाठी, एक भाग देवासाठी, एक भाग कामगारांसाठी आणि उर्वरित भाग स्वतःसाठी अशी त्यांनी उत्पन्नाची वाटणी केलीय. वर्षभर बीएमडब्ल्यूमध्ये फिरणारे खाडे पंढरीची पायी वारी करतात. ज्या चित्रा टॉकीज जवळील झाडाला टेकून वडील गटई काम करत होते, त्या झाडाला समोरून जाताना न चुकता नमस्कार करतात. खाडे यांनी मास्टर इन फिलॉसॉफी पूर्ण केले असून, संत ज्ञानेश्वर महाराजांवर पीएचडी करण्याचा विचार आहे.
“दुसऱ्यांवर केलेले उपकार तळहातावर लिहिण्यापेक्षा तळपायावर लिही, की जे फक्त मातीच वाचू शकते’ हे समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे शब्द खाडे यांनी मनात कोरले आहेत.
मराठी असल्याचा त्यांना प्रचंड अभिमान आहे. ‘माझ्या कंपनीत चेहऱ्यावर चिंता असलेला एक ही कर्मचारी दिसणार नाही. ज्या शेतात माझी आई शेतमजूर म्हणून काम करत होती, ती शेती मी विकत घेतली आहे. ज्या गावात दगडू चांभाराचा मुलगा अशी ओळख होती, ते गाव आता “आबा’ म्हणून ओळखत आहे. आजही आम्ही भाऊ एकत्र कुटुंब म्हणून राहतो. एकत्र कुटुंबात जी ताकद आहे, ती कशातच नाही. त्या भक्कम आधारामुळेच आम्ही आयुष्यात काही तरी करू शकलो.”
अशोक खाडेंचा “गुरुमंत्र’ “जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट’ हे ब्रीद लक्षात ठेवा. कष्ट करा. प्रामाणिक कष्टांचे फळ नक्की मिळेल. आईवडिलांना, समाजाला कधी विसरू नका.
वाचक मित्रांनो, तुम्हाला हा लेख कसा वाटला, हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच, तुमच्या जवळच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. याव्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरील लेख वाचायला आवडेल, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
प्रबळ इच्छाशक्ती आणि सातत्यपूर्ण मेहनत यांचा मिलाफ झाला की, क्षेत्र कोणतेही असो तिथे यश हे मिळणारच. फक्त गरज आहे, तो मिलाफ स्वतःहून घडवून आणण्याची. मित्रांनो प्रबळ इच्छाशक्ती असेल ना, तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही.
इतिहासात अश्या अनेक प्रेरणादायी कथा आहेत ज्या इच्छाशक्तीच्या जोरावर अजरामर झाल्या.
9 वी, 10 वी, 11 वी तिन्ही इयत्तेत कॉपी करून काटावर पास होऊन बारावीत नापास झालेल्या मुलाला तुम्ही काय म्हणाल? अर्थातच टपोरी, वाया गेलेला, बिनकामी; पण जर मी म्हणाले, की तोच बारावीत नापास झालेला मुलगा जर पोलिस आधिकारी बनला तर? तुमचा विश्वास बसणार आहे का? पण हे खरंय!
आम्ही सांगतोय, त्या आयपीएस अधिकाऱ्याबद्दल ज्याने गडचिरोलीत नक्षलवाद्यांना पाणी पाजलं. तो डॅशिंग अधिकारी म्हणजे आयपीएस मनोज कुमार शर्मा. 12 वी मध्ये केवळ हिंदी सोडून बाकी सगळ्या विषयात नापास झालेले मनोज कुमार परिस्थितीशी झगडत अखेर आयपीएस बनले ते केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर. नुकताच त्यांच्या संघर्षपूर्ण आयुष्यावर आधारित “12th फेल” हा सिनेमासुद्धा प्रदर्शित झाला.
मध्यप्रदेश मधील मुरैना जिल्ह्यातील मनोज कुमार यांनी बारावीमध्ये नापास झाल्यावर घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे काही वर्ष टॅम्पो चालवला, रिक्षा चालवली, जे मिळेल ते ते काम करू लागले. ते ग्वाल्हेरला एका लायब्ररीत शिपाई म्हणून सुद्धा काम करायचे, तिथे त्यांची पुस्तकांशी मैत्री जमली. त्यावेळी अब्राहम लिंकनचं आत्मचरित्र वाचून ते इतके प्रभावीत झाले की, आयुष्यात हार मानायची नाही, शेवटपर्यंत लढायचं, लोकांसमोर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श निर्माण करायचा असं त्यांनी ठरवले. लायब्ररीत येणारे बरेचजन upsc चा अभ्यास करायचे. त्यांनी देखील ठरवलं की आपणही यूपीएससीचा अभ्यास करायचा. सगळ्यांना वाटायचं की; काय थापा मारतोय, बारावीत नापास झालाय आणि हा काय यूपीएससी क्रॅक करणार! पण ‘लहरों से डरकर नौका पर नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती!’ या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मनोज कुमार शर्मा दिल्लीला गेले. यूपीएससीचा अभ्यास चालू केला. दिवसरात्र अभ्यास केला खरा, मात्र सलग तिन्ही वेळा त्यांच्या पदरी अपयशच आले, मात्र तरीही त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत। अजून इर्षेने अभ्यास करू लागले आणि त्यांचा चौथा प्रयत्न यशस्वी ठरला. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा पार करत करत ते मुलाखतीपर्यंत पोहोचले.
मुलाखती वेळी त्यांची थोडी कच्ची-पक्की इंग्रजी पाहून मुलाखत घेणाऱ्यांनी त्यांना विचारलं, ‘अरे तुला तर इंग्रजीच येत नाही, तर तू काम कसं करणार?’ त्यावर मनोज कुमार म्हणाले, भाषेचा आणि कामाचा काय संबंध, त्यावर ते मुलाखत घेणारे म्हणाले, ‘अरे तुला जर इंग्रजी बोलताच येत नसेल, तर लोकांचे प्रश्न तू कसे सोडवशील?’ त्यावर मनोज कुमार म्हणाले, ‘सर तुम्ही मला जर प्लॅस्टिकच्या ग्लासमधून पाणी दिलं, पण मी जर म्हटलं की, मला प्लॅस्टिकच्या ग्लासमधून नको काचेच्याच ग्लासमधून पाणी द्या. तर तुम्ही काय कराल? अर्थातच तुम्ही म्हणाल की, ग्लास कुठलाही असो, पण पाणी तेच आहे ना. मग काचेचा ग्लास असला काय किंवा प्लॅस्टिकचा असला काय. त्याची चव बदलणार नाहीच. अगदी तसंच माझी भाषा कोणतीही असो, त्याने माझ्या कामावर काय फरक पडणार आहे? मला जरी इंग्रजी अस्खलित बोलता येत नसले, तरी माझे काम मी सक्षमपणे व जबाबदारीने करू शकेन. यावर माझा विश्वास आहे” त्यांच्या या उत्तराने सर्वजण प्रभावित झाले आणि मनोज कुमार यांची निवड झाली.
तुमची इच्छाशक्ती जर प्रबळ असेल, तर अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा देखील तुम्ही शोध लावू शकता; मात्र जर एखादी गोष्ट तुम्हाला करायचीच नसेल, तर ती टाळण्यासाठी हजारो कारणं तयार असतात. जर एक बारावी नापास मुलगा आयपीएस अधिकारी बनतो, तर तुम्हीसुद्धा तुमच्या मनासारखं नक्कीच करू शकता, फक्त त्यासाठी तुमची मेहनत असणं तितकंच गरजेचं आहे.
केरळमध्ये एका गावात एक मंदिर उभारले गेले होते. नवीन मंदिरात एका पुजाऱ्यांची नेमणूक करण्याचे तेथील स्थानिक मंदिर संचालक कमिटीने ठरवले व इच्छुकांना निवड प्रक्रियेसाठी पाचारण केले गेले. बरेचजण त्या मंदिरात पुजारी म्हणून काम करण्यासाठी इच्छुक होते. ठरलेल्या दिवशी सर्वजण आले. त्यामध्ये एक पद्मनाभ नावाचा तरुणही होता. शिक्षण जास्त नव्हते नोकरी मिळत नव्हती.
मंदिरात पुजारी म्हणून तरी काम मिळेल या आशेने तो तेथे आला होता. त्यादिवशी बरेच इतर पुजारीसुद्धा तिथे जमा झाले होते. सर्वांनाच धर्माचे उत्तम ज्ञान होते. संचालक मंडळाला त्यातून एकाची निवड करणे अवघड वाटत होते. अनेकजण पुजारी म्हणून उत्तम होते. शेवटी संचालक मंडळातील एकाने असे सुचवले की ज्याला सर्वात चांगली घंटा वाजवता येईल त्यालाच मंदिराचा पुजारी म्हणून नियुक्त केले जाईल. त्यानुसार सर्व पुजाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली. पद्मनाभला नीट घंटा वाजवता न आल्याने त्याची निवड झाली नाही. तो मनात थोडा निराश झाला, त्याचा तिथे अपेक्षाभंग झाला होता. आता काय करावे? तो मंदिराबाहेर बसून विचार करू लागला. तेवढ्यात त्याला एक कल्पना सुचली. मंदिरासमोर खूप मोकळी जागा होती.
त्याने संचालक मंडळाची परवानगी घेऊन समोर एक चहाची टपरी सुरू केली. मंदिरात भेट द्यायला येणारे भक्तगण ग्रामस्थ तिथे जाऊन चहा प्यायचे. हळूहळू ते मंदिर प्रसिध्द होऊ लागले तशी मंदिरास भेट देणाऱ्या भक्तांची संख्या वाढू लागली. खूप दूरगावातून लोक यायला लागले. तसा पद्मनाभचा चहाचा व्यवसायही वाढला. तेव्हा लोकांनी त्याला सुचवले की, तुझा चहा तर उत्तम आहे. पण तुझ्या टपरीवर जर तू अल्पोपहाराचे पदार्थ ठेवलेस तर बरे होईल. पद्मनाभला ते पटले. कारण आसपास त्या ठिकाणी अल्पोपहाराची सोय कुठेच नव्हती. पद्मनाभने लवकरच अल्पोपहाराचे उपवासाचे पदार्थ विकायला सुरुवात केली. आता त्यांचा व्यवसाय चांगला चालू लागला. त्याच्या टपरीजवळ एक शेड बांधून टेबल खुर्च्या लावून सर्वांसाठी बसण्याचीही सोय केली. पुढे भक्तांची, पर्यटकांची संख्या अजून वाढत गेली. पुढे भक्तांच्या आग्रहावरून त्याने जेवणाची थाळी विकायला सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्याची आर्थिक स्थिती सुधारू लागली. त्याला गावातही मान मिळू लागला. आता त्याचे रेस्टॉरंट झाले.
पद्मनाभ एक व्यावसायिक बनला होता. एका भक्ताने त्याला सांगितले की इथे बाहेरून येणाऱ्या भक्तांची राहण्याची सोय नाही. पद्मनाभने त्याच्या रेस्टॉरंटचे एका लॉजमध्ये रूपांतर करून भक्त व पर्यटकांच्या राहण्याची सोय केली. त्याचा धंदा जोरात चालू आहे, तो सर्वांना उत्तम सेवा पुरवतो. मंदिराच्या वार्षिक जत्रेस दरवर्षी देणगी देतो. जसजशी मंदिरात येणाऱ्या भक्तांची, पर्यटकांची संख्या वाढते तसतसा त्याचा व्यवसाय वृद्धिंगत होतोय. एकेकाळचा बेरोजगार पद्मनाभ आज तिथला सर्वात यशस्वी श्रीमंत हॉटेल व्यावसायिक झालाय. पद्मनाभने गावातील इतर बेरोजगार तरुणांना त्याच्याच हॉटेलमध्ये काम दिले आहे. त्यामुळे त्याची समाजात प्रतिष्ठा देखील वाढली. गावातील, तालुक्यातील अनेक नामवंत व्यक्तींची त्याच्या घरी ऊठबस चालू असते. त्याला खूप मान मिळतोय.
एका व्यक्तीने त्याला त्यांच्या यशाचे गुपित विचारले. पद्मनाभ म्हणाला, “माझ्या यशाचे गुपित मंदिराच्या घंटेत आहे. मला घंटा वाजवता येत नाही म्हणून मी आज श्रीमंत झालोय. जर मला ती घंटा वाजवता आली असती तर मी मंदिरात पुजारी म्हणूनच राहिलो असतो.”
मित्रांनो, कधीकधी संधी थोडक्यात हुकतात, म्हणून डोक्याला हात लावून बसू नये. डोळे उघडा, आजूबाजूला पहा. बरेच पर्याय, संधी उपलब्ध असतात. पण नोकरीच्या नादात त्या दिसत नाहीत. वेळ निघून गेल्यावर ते लक्षात येते. तेव्हा आपल्याकडे पश्चाताप केल्याशिवाय पर्याय नसतो. पद्मनाभने संधी निर्माण केली व व्यवसाय करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याच्याजवळ काही नव्हते, तरी त्याने छोटासा का होईना, व्यवसाय सुरू केला. पुढे त्याला अनुभव येत गेला, संधी आपोआप दिसू लागल्या. प्रत्येक वेळी त्याने संधीचा फायदा उठवला आणि आज तो त्याच्या व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात यशस्वी श्रीमंत आणि सुखी आहे. म्हणून संधी हुकल्यावर निराश होऊ नका, नैराश्यावर पाय ठेवून पुढे चालत रहा. संधी मिळत जाईल तिचा फायदा घेत जा.
तुम्हाला आजचा लेख कसा वाटला हे कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि Motivation साठी नवी अर्थक्रांतीच्या चॅनेलला आताच subscribe करा.
सुप्रसिद्ध साहित्यिक चेतन भगत याने सांगितलेला हा किस्सा आहे.
मी एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीसाठी रांगेत उभा होतो. तेवढ्यात माझ्यासमोर एक टॅक्सी येऊन उभी राहिली. पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की ती टॅक्सी बाहेरून नुसतीच स्वच्छ नव्हती तर चकचकीत पॉलीश केलेली होती. टॅक्सीचा ड्रायव्हर खाली उतरून व टॅक्सीला वळसा घालून माझ्याकडे येत होता. त्यावेळी माझ्या लक्षात आले की त्याचा ड्रेस एकदम स्मार्ट आहे. त्याने स्वच्छ धुतलेला व इस्री केलेला पांढरा शर्ट घातला होता. तशीच इस्त्री केलेली काळी पँट होती. टाय लावलेला होता व पायात चकचकीत पॉलीश केलेले बुट होते. त्याने आदराने माझ्यासाठी टॅक्सीचे मागील दार उघडले व माझ्या हातात एक लॅमीनेट केलेले कार्ड देत म्हणाला, ‘ सर! माझे नाव वासु! मी तुमचा टॅक्सी ड्रायव्हर. मी तुमचे सामान मागे डिकीमध्ये ठेवेपर्यंत आपण हे माझे मिशन स्टेटमेन्ट कृपया वाचावे.’
‘मिशन स्टेटमेन्ट?’ मला गंमत वाटली व मी त्या कार्डावर नजर टाकली. त्यावर सुरेख व ठळक अक्षरात छापले होते. ‘ वासुचे मिशन स्टेटमेन्ट! माझ्या टॅक्सीमधील प्रवाशांना कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळात, सुरक्षितपणे त्यांच्या इच्छीत स्थळी पोचवणे व ते सुद्धा मैत्रीपूर्ण वातावरणात!’
मला गंमत वाटली. मी टॅक्सीत बसलो व मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण टॅक्सी आतुनसुद्धा बाहेरच्यासारखी चकचकीत स्वच्छ होती. वासुने त्याच्या ड्रायव्हरच्या सिटवर बसता बसता विचारले, ‘सर! आपण कॉफी घेणार? माझ्याकडे थर्मासमध्ये रेग्युलर तसेच ‘डिकॅफ’ कॉफी आहे!’ मी सहज गंमत करावी म्हणून म्हणालो, ‘नको! मला कॉफी नको! काहीतरी थंड पेय हवे आहे!’ ‘काही हरकत नाही!’ वासु म्हणाला, ‘माझ्याकडे पुढे कुलर आहे. त्यामध्ये रेग्युलर व डायट कोक, लस्सी, पाणी व ऑरेंज ज्युस आहे.’‘मला लस्सी चालेल!’ मी म्हणालो पण माझ्या चेहेऱ्यावरचे आश्चर्य काही लपत नव्हते. माझ्या हातात लस्सी देताना वासु म्हणाला, ‘आपल्याला जर वाचायला काही हवे असेल तर टॅक्सीमध्ये द हिन्दु, टाईम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाईम्स व इंडिया टुडे आहे.’
माझ्या हातात अजुन एक लॅमिनेटेड कार्ड देत वासु म्हणाला, ‘ही रेडियो स्टेशन्स व त्यावर असलेल्या कार्यक्रमांची यादी, जर आपल्याला रेडीयो ऐकायचा असेल तर!’मला वासुचे कौतुक वाटु लागले होते. टॅक्सी सुरु करताना वासु म्हणाला, ‘मी एअर कंडीशनींग चालु केले आहे. टेम्परेचर योग्य आहे ना व आपल्याला कंफर्टेबल वाटते ना? का यात ऍजेस्ट करू?’
वासुने मला त्यावेळी माझ्या इच्छीत स्थळी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता हे सांगितले. तसेच वाटेत कोणकोणती प्रेक्षणीय स्थळे लागतात याची पण माहिती दिली. ‘आपणास हरकत नसेल तर आपण माझ्याशी गप्पा मारू शकता. पण आपल्याला जर एकांत हवा असेल तर मी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही’ वासु म्हणाला.
‘मला एक सांग वासु!’ मला माझे आश्चर्य अजुनही लपवता येत नव्हते, ‘तु तुझ्या ग्राहकांना नेहमी अशीच सेवा देत असतोस?’ वासुच्या चेहेऱ्यावर हास्य पसरले. ‘नाही सर! गेल्या दोन वर्षांपासूनच मी हे सुरु केले. या आधीची पाच वर्षे मी इतर सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हरसारखाच होतो. गबाळा, अनुत्साही, सतत कसल्या ना कसल्या तरी तक्रारी करत बसणारा! पण एक दिवशी मला ‘पॉवर ऑफ चॉइस’ बद्दल कळले!’
‘पॉवर ऑफ चॉइस म्हणजे?’ मी उत्सुकतेने विचारले
‘पॉवर ऑफ चॉइस म्हणजे तुम्ही बगळा व्हायचे का गरुड व्हायचे याचा चॉइस!’ वासु म्हणाला, ‘तुम्ही सकाळी उठलात व म्हणालात की आजचा दिवस काही चांगला जाणार नाही तर तुमची कधीच निराशा होणार नाही. तक्रारी करण्याचे थांबवा! गरूड व्हा, बगळा होऊ नका! कारण बगळा सतत ‘क्वॅक क्वॅक’ करत असतो म्हणजे तक्रारी करत बसतो. तर गरुड येणाऱ्या सर्व अडचणी, अडथळे, संकटे यावर मात करत आकाशात उंच भरारी घेत असतो, ढगांच्या वर जात असतो. माझ्या डोक्यात हे वाक्य पक्के बसले’ वासु म्हणाला1
‘आता मी माझीच गोष्ट सांगतो. मी आधी बगळा होतो. सतत तक्रारी करत बसायचो. पण मग मी माझ्या मनोवृत्तीत बदल करायचे ठरवले. बगळा न होता गरुड व्हायचे ठरवले. मी आजूबाजूला निरीक्षण करायला सुरवात केली. बहुतेक टॅक्सी ड्रायव्हर गबाळे व गलीच्छ असतात, ग्राहकांची काळजी न घेणारे असतात. ग्राहक नेहमी त्यांच्याबद्दल तक्रारी करत असतात. त्यांच्या गाड्या पण खराब व अस्वच्छ असतात. मी माझ्या बाबतीत काही बदल करायचे ठरवले. थोडे थोडे बदल करत गेलो!’ वासु सांगत होता.
‘मग याचा तुला चांगला फायदा झाला असेल नाही का?’ मी वासुला विचारले.
‘झाला तर!’ वासु उत्साहाने सांगू लागला. ‘मी गरुड व्हायचे ठरवल्यावर पहिल्या वर्षीच माझे उत्पन्न आधीच्या वर्षापेक्षा दुपटीने वाढले. या वर्षी कदाचित माझे उत्पन्न चौपट वाढेल. माझ्या अनेक ग्राहकांनी माझा सेल फोन नंबर घेतला आहे. ते माझीच टॅक्सी हवी म्हणून फोन करत असतात. बहुतेक वेळा माझी टॅक्सी ऍडव्हान्समध्ये बुक होते.’
वासुने वेगळा चॉइस केला. त्याने किरकिर करणारा बगळा न होता आकाशात उंच भरारी घेणारा गरूड व्हायचे ठरवले. त्याचे फळ त्याला मिळाले.
बगळा व्हायचे का गरुड व्हायचे हा चॉइस देवाने प्रत्येकालाच दिलेला आहे, अगदी जन्मापासून ते मरेपर्यंत! आता आपण बगळा व्हायचे का गरुड व्हायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे नाही का?