Category: अर्थजगत

  • अर्थसंकल्प २०२५-२६: महाराष्ट्राच्या प्रगतीला दिशा देणारे १० महत्त्वाचे निर्णय

    अर्थसंकल्प २०२५-२६: महाराष्ट्राच्या प्रगतीला दिशा देणारे १० महत्त्वाचे निर्णय

    महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. हे त्यांचे ११ वे अर्थसंकल्पीय सादरीकरण असून, ते माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांच्या विक्रमाच्या जवळ पोहोचले आहेत. शेषराव वानखेडे यांनी आपल्या कार्यकाळात 13 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता.

    या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. शहरी आणि ग्रामीण भागाचा समतोल विकास साधण्यासोबतच अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. विविध क्षेत्रांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या असून, राज्याच्या प्रगतीला चालना देणारे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

    या अर्थसंकल्पातील 10 महत्त्वाचे निर्णय कोणते आहेत, यावर या लेखात सविस्तर नजर टाकूया.

    १. राजकोषीय तूट आणि राज्याची आर्थिक स्थिती

    अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याची राजकोषीय तूट कमी करण्यावर विशेष भर दिला आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राज्याची तूट 1 लाख 36 हजार 235 कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही तूट नियंत्रित ठेवण्यासाठी आणि राज्याची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना सुचवल्या आहेत.

    राज्याचा आर्थिक वाढीचा दर अंदाजे ९.७% राहू शकतो. त्यामुळे सरकारने खर्च नियंत्रणासोबतच विकास प्रकल्पांसाठी योग्य निधी वाटप करण्यावर भर दिला आहे. आर्थिक शिस्त पाळत राज्याच्या प्रगतीला गती देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.

    २. औद्योगिक विकास आणि गुंतवणूक

    महाराष्ट्र सरकारने राज्यातील उद्योगांना गती देण्यासाठी महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली आहे. दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये ६३ कंपन्यांसोबत सामंजस्य करार केल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. या करारांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार असून, उद्योग क्षेत्राचा अधिक विस्तार होईल.

    भारताच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा १५.४% वाटा असून, राज्याच्या निर्यात क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. नव्या धोरणांमुळे निर्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महाराष्ट्र देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल. तसेच, या करारांमुळे विविध उद्योगांत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार असून, राज्याची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.

    ३. महिला सक्षमीकरण

    महिला सक्षमीकरण हे सरकारच्या महत्त्वाच्या उद्दिष्टांपैकी एक आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत ३३,२३२ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. या योजनेमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील, ज्यामुळे त्यांचे आर्थिक स्थैर्य वाढेल.

    यासोबतच, महिलांच्या सुरक्षा, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकार विशेष धोरणे राबवणार आहे. यामुळे महिलांच्या जीवनमानात सुधारणा होईल आणि त्यांना उद्योग, व्यवसाय आणि इतर क्षेत्रांमध्ये अधिक संधी मिळतील, ज्यामुळे समाजात त्यांची भूमिका अधिक बळकट होईल.

    ४. कृषी क्षेत्रातील नवकल्पना आणि सुधारणा

    महाराष्ट्र सरकारने कृषी क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यभर कृषी तंत्रज्ञान केंद्रे उभारली जाणार असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली जाईल. यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवणं सोपं होईल आणि त्यांचं उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

    तसेच, राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान २.० सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत ५,८१८ गावांमध्ये जलसंधारण प्रकल्प राबवले जातील, ज्यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल. हे उपक्रम राज्यातील कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

    ५. पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक क्षेत्र

    महाराष्ट्र सरकारने लॉजिस्टिक धोरण २०२४ लागू केले असून, त्याअंतर्गत १०,००० एकर क्षेत्रावर लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. यामुळे राज्यातील मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढेल आणि ५ लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच, रस्ते, बंदरे, विमानतळ आणि रेल्वे यांसारख्या पायाभूत सुविधांच्या सुधारणा केल्या जातील, ज्यामुळे वाहतूक आणि व्यापार अधिक सुलभ व वेगवान होईल.

    ६. शहरी विकास आणि स्मार्ट सिटी योजना

    महाराष्ट्रातील शहरांच्या विकासासाठी स्मार्ट सिटी योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. या योजनेत पाणीपुरवठा सुधारणा, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, जलसंधारण आणि अन्य पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. यामुळे शहरातील नागरिकांना उत्तम सुविधा मिळतील आणि त्यांचं जीवनमान अधिक चांगलं होईल.

    शहरी भागांचा वेगाने होणारा विस्तार लक्षात घेऊन ३ लाख कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखण्यात आली आहे. यामुळे नव्या निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांना चालना मिळेल, स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि शहरांचा सर्वांगीण विकास साधता येईल.

    ७. समुद्रकिनारा विकास आणि आपत्ती व्यवस्थापन

    समुद्राच्या पातळीतील वाढता धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने किनारी विकास योजना हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत ८,४०० कोटी रुपये खर्च करून किनारी भागांचे संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजना राबवल्या जातील. यामुळे पूर, चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी किनारी भाग अधिक सुरक्षित होईल आणि स्थानिक नागरिकांचे जीवनमान सुधारेल.

    ८. ऊर्जा क्षेत्रात सुधारणा

    महाराष्ट्र सरकारने ऊर्जा क्षेत्र मजबूत करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २१,५३४ कोटी रुपये खर्च केले जाणार असून, पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीला चालना दिली जाईल. तसेच, राज्यातील वीज पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, ज्यामुळे नागरिकांना अखंड आणि विश्वासार्ह वीज सेवा मिळू शकेल.

    ९. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन

    महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी महत्त्वाची योजना सुरू केली आहे. याअंतर्गत छत्रपती संभाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांसाठी २२० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे राज्यातील ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण होईल आणि महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक ओळख अधिक भक्कम होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

    १०. शेती सुधारणा आणि सिंचन धोरण

    महाराष्ट्र सरकारने शेतीसाठी सिंचन योजनेचा विस्तार करण्यासाठी ४,५०० कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना सोयीस्कर आणि योग्य पाणीपुरवठा तसेच आधुनिक सिंचन साधने उपलब्ध करून दिली जातील. या उपाययोजनांमुळे शेतीचे उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होईल .

    सरकारने शहरी आणि ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, कृषी सुधारणा आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर दिला आहे. या उपाययोजनांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल आणि नागरिकांचे जीवनमान उंचावेल. तसेच, उद्योग, रोजगार आणि शेती क्षेत्राला गती मिळेल, ज्यामुळे राज्याच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळेल. या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र अधिक समृद्ध आणि विकसित राज्य बनेल, अशी आशा व्यक्त करूया.

  • बचत छोटी – शक्ती मोठी | आजच करा तुमच्या भविष्याची आर्थिक योजना | Plan Your Financial Future Today.

    बचत छोटी – शक्ती मोठी | आजच करा तुमच्या भविष्याची आर्थिक योजना | Plan Your Financial Future Today.

    पैसा कमावणे ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. पैशांशिवाय माणूस जगू शकत नाही. एक चांगले जीवन जगण्यासाठी जवळ मुबलक पैसा असणे खूप गरजेचे आहे. पण पैसे कमावण्यासोबतच पैशांची बचतही तितकीच महत्त्वाची आहे. अनेक लोकांना पैशाची बचत कशी करावी, हे कळत नाही. त्यामुळे अनेकदा अशा लोकांच्या हातून खूप पैसा खर्च होतो.  पण, हे ही बचत काही एका रात्रीत होणार नाही. त्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. 

    तुमची बचत तुमच्या चेहऱ्यावर दिसत असते. भरपूर बचत गाठीशी असल्यामुळे एक वेगळाच आत्मविश्वास तुमच्या चेहऱ्यावर आणि तुमच्या वागण्याबोलण्यातून जाणवत असतो. उत्पन्न जेमतेम असल्याने बचत करू शकत नाही, असा फार मोठा वर्ग आपल्याकडे आहे. हातातोंडाशी गाठ आहे, अशा उत्पन्न गटातील लोकांना बचत करणे कठीण असते, जीवनावश्यक खर्च एका मर्यादेपेक्षा कमी होऊ शकत नाहीत, म्हणून उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे हाच पर्याय योग्य ठरतो.

    कोण किती कमावतो, यापेक्षा त्याच्या कमाईतून किती प्रमाणात बचत करतो, किती अतिरिक्त खर्च करतो यांसारख्या बाबींवर त्या व्यक्तीची दीर्घकालीन संपत्तीची निर्मिती क्षमता आणि त्याचे आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून असते.

    कमी किंवा योग्य तितकाच खर्च करणे हा बचतीचा मूलमंत्र आहे; परंतु बरेच जण बचतीचा विचार करण्यापेक्षा कुठे, कसा आणि किती खर्च करता येईल याच विचारात जास्त असतात.

    खर्च किती, कसा, कुठे आणि का करावा हा व्यक्तीसापेक्ष प्रश्न आहे. तरीही उत्पन्नाच्या तुलनेत आणि बचतीचे व्यवस्थापन ठरवून केल्यास आर्थिक अडचणी येत नाहीत.

     उदाहरण १ :

    निशा आणि पंकजचा रविवार उजाडला तोच मुळी कागद आणि पेन घेऊन. प्रत्येक खोलीत काय फर्निचर करायचं याचा आराखडा दोघांनी मिळून तयार केला. गेल्या कित्येक महिन्यांत दोघांच्या पगारातले थोडे थोडे करत बरेच पैसे त्यांनी त्यांचे घर सजवण्यासाठी साठवले होते.

    उदाहरण २ :

    रोजंदारीच्या कामावर जाणारा रघू आज खुश होता. गावाकडे असणारी त्याची बायको, मुलं लवकरच त्याच्याबरोबर राहण्यासाठी येऊ शकणार होती. कारण आजच तो एक खोली भाड्याने घेण्यासाठी मालकासोबत व्यवहार करून आला होता. रोजच्या कामाचे मिळणारे पैसे अगदी गरजेपुरते थोडे वापरून बाकीचे पैसे त्याने शेठच्या सांगण्यावरून बँकेत साठवले होते.

    निशा-पंकज असोत की रघू असो, रोजच्या दैनंदिन खर्चाशिवाय अधिकचा खर्च ते करू शकत होते. हे त्यांना कसे सहज शक्य झाले? याचे उत्तर म्हणजे त्यांना मिळणाऱ्या कमाईच्या पैशातून काही पैसे त्यांनी वेगळे काढले होते, बचत केली होती. उत्पन्नातील सर्वच्या सर्व पैसे त्यांनी लगेच खर्च केले नव्हते.

    अविचाराने खर्च करणारी, कोणाच्याही साहाय्याशिवाय लढणारी आणि प्रत्येक गोष्टीची घाई करणारी व्यक्ती लवकर लयास जाते.

    साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर मिळालेले सर्वच उत्पन्न उधळून न देता काही रक्कम हाती राखणे महत्वाचे आहे. हातात आले आणि उडवून लावले असे न करता उत्पन्नातून खर्च वजा जाता जी शिल्लक आपल्याकडे उरते ती रक्कम म्हणजे बचत! बचतीचे हे सूत्र कोणत्याही बाबतीत लागू पडते, पैसा असो, वेळ असो, अन्न धान्य असो की पाणी असो, बचत सर्वव्यापी आहे.

    Add a heading 7

    बचतीची सुरुवात कशी करावी : 

    1. तुमच्या खर्चाची नोंद करा

    पैसे वाचवण्याची पहिली पायरी म्हणजे तुमच्या खर्चाची तुम्हाला चांगली जाणीव असणे. लोक पुरेशी बचत करू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे खर्च केल्यानंतर फारसा पैसा शिल्लक राहत नाही. त्यामुळे तुम्ही एका विशिष्ट महिन्यात खर्च केलेल्या प्रत्येक गोष्टीची काळजीपूर्वक नोंद ठेवणे महत्त्वाचे आहे. 

    2. कर्ज नियोजन

    जेव्हा तुमचे उत्पन्न कमी असते तेव्हा कर्ज सामान्यतः अटळ असते. तुमच्यावर एकूण किती कर्ज आहे, ते कर्ज तुम्ही किती दिवसात आणि कसे फेडणार आहात याचा आराखडा तुमच्याकडे आधीच तयार असणे आवश्यक आहे. नियोजन केलेले असेल तर त्या कर्जाचा अतिरिक्त ताण न येता सुलभरित्या तुम्ही त्या कर्जाची परतफेड करू शकाल.

    3. बजेट तयार करा

    तुमचा पैसा कुठे जात आहे हे एकदा तुम्हाला कळले की, तुम्ही तुमच्या पैशांचे वाटप कसे करायचे यावर विचार  करून निर्णय घेऊ शकता. आपण प्रत्येक खर्चाचे काळजीपूर्वक विश्लेषण करणे आवश्यक आहे. घरभाडे, कर्ज यांसारखे निश्चित खर्च आहेतच; पण जेवण, वाहतूक आणि मनोरंजन यांसारख्या खर्चांवर नियंत्रण ठेवता येवू शकते. 

    4. मोठी बचत करण्यासाठी लहान प्रारंभ करा

    तुमच्या करिअरच्या सुरुवातीला तुमचे उत्पन्न फारसे जास्त नसेल. बर्‍याच वेळा, सर्व खर्चानंतर खूप कमी गुंतवणूक करण्यायोग्य रक्कम उरते. तरीही जमेल तेवढी बचत करत जा. तुम्ही केलेली छोटी सुरुवातच तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकते. जसजसे उत्पन्न वाढते तसतसे गुंतवणुकीचे प्रमाण वाढवता येते.

    5. बचतीची उद्दिष्टे सेट करा

    बचत उद्दिष्टे सेट केल्याने प्रारंभ करणे खूप सोपे होते. प्रत्येक ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल हे ठरवून सुरुवात करा.

    काही अल्प-मुदतीची  उद्दिष्टे (ज्याला साधारणत: 1-3 वर्षे लागू शकतात) उदा. नोकरी गमावल्यास किंवा इतर आणीबाणीच्या परिस्थितीत 6 महिने ते एक वर्षाचा खर्च करण्यासाठी आणीबाणी निधी, सुट्टीसाठी पैसे वाचवणे, नवीन खरेदी करण्यासाठी बचत करणे.

    दीर्घकालीन बचत उद्दिष्टे अनेक वर्षे किंवा अगदी दशके लांब असतात आणि त्यात खालील गोष्टींचा समावेश असू शकतो : निवृत्तीसाठी बचत करणे, तुमच्या मुलाच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसे टाकणे, दुसऱ्या घरासाठी बचत करणे किंवा तुमच्या सध्याच्या घराचे नूतनीकरण करणे.

    6. तुमचे प्राधान्यक्रम ठरवा

    तुम्हाला करावयाच्या प्रत्येक गोष्टीची प्राथमिकता ठरवा. कोणती गोष्ट जास्त गरजेची आहे तिला आधी प्राधान्य द्या. कमी आवश्यक असणाऱ्या बाबी नंतर ठेवा. तुमची उद्दिष्टे ठरवा आणि ती कोणत्या क्रमाने तुम्हाला साध्य करायची आहेत याचे नियोजन करा.

    शिक्षण, घर, वृद्धापकाळ अशा कोणत्याही कारणासाठी तुम्हाला पैसा लागणार नसेल तरीसुद्धा निदान तुमच्या आत्मविश्वासासाठी तरी तुम्ही बचत ही केलीच पाहिजे. तुम्ही किती ताठ मानेने चालता याच्याशी तुमच्या बचतीच्या स्थितीचा खूप जास्त संबंध आहे. तुमच्या बचतीच्या स्थितीवरून तुमची समाजातील पत ठरणार हे मात्र नक्की !

    हे पण वाचा:

  • लवकर गुंतवणूक का सुरू करावी? | Why start investing early?

    लवकर गुंतवणूक का सुरू करावी? | Why start investing early?

    तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा अधिक मिळवलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही कसा करावा, योग्य आर्थिक नियोजन करून विविध ध्येय कशी साध्य करावी, तुमच्यावर असलेल्या कर्जाचे, तुम्ही काढलेल्या विम्याचे  व्यवस्थापन कसे करावे, सुयोग्य गुंतवणूक करून तुमच्या बचतीच्या पैशाला कसे कामाला लावावे, ही आर्थिक साक्षरता आत्ताच्या काळासाठी नितांत गरजेची आहे.

    भविष्यात अधिकचा नफा मिळविण्याच्या उद्देशाने वर्तमानात केलेले पैशांचे सुयोग्य व्यवस्थापन म्हणजे गुंतवणूक म्हणता येईल.

    जेव्हा एखादी वस्तू किंवा मालमत्ता कमी किमतीत खरेदी करून ठराविक कालावधीनंतर जास्त किमतीला विकून त्यावर मिळणारा भांडवली नफा हा त्या गुंतवणुकीचा सर्वात महत्त्वाचा फायदा होय. 

    अल्पकालीन गुंतवणूक आणि दीर्घकालीन गुंतवणूक अशा दोन प्रकारात आपल्याला गुंतवणूक करता येते.

    गुंतवणूक ही आपले आर्थिक भवितव्य अधिक आणि लवकर  सुरक्षित करण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग असूनही अनेकजण गुंतवणूक उशिरा सुरु करतात. पहिल्यांदाच नोकरीला लागलेले तरुण भविष्याचे नियोजन करण्याऐवजी आधी आपल्या जीवनशैलीत सुधारणा करताना जास्त आढळून येतात. गुंतवणूक सुरु करण्यास खरंतर उशीर कधीच होत नसतो, पण तरीसुद्धा लवकर गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे असतात. याशिवाय आयुष्यात लवकर गुंतवणूक केल्याने तरुण गुंतवणूकदारांना जास्त बचत करता येते, कारण त्यांच्या Professional Life च्या  सुरुवातीला त्यांच्याकडे खूप कमी जबाबदाऱ्या असतात.  

    आपल्या संस्कृतीमध्ये असं म्हणतात की माणसाने जर १ रुपया कमावला तर त्यातले २५ पैसे खर्च करावेत, २५ पैसे दान करावेत, २५ पैसे मुलांसाठी आणि उरलेले २५ पैसे गुंतवणूक करण्यासाठी वापरावेत. म्हणजेच थोडक्यात आपल्या कमाईचा २५% हिस्सा आपण गुंतवणुकीसाठी वापरायला हवा. गुंतवणूक म्हणजे आपल्या भविष्यकाळाची तरतूद असते. बहुतांश लोक लवकर गुंतवणूक करत नाहीत, कारण आयुष्यात लवकर गुंतवणूक करण्याचे महत्त्व त्यांना ठाऊक नसते ; परंतु लवकर गुंतवणूक करणे नेहमीच आपल्या हिताचे ठरते.

    लवकर म्हणजे नक्की कधी?

    वॉरन बफे म्हणतात की ‘मी वयाच्या ११ व्या वर्षापासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. मी तोपर्यंत माझे आयुष्य वाया घालवत होतो.’

    आपण आपल्या पहिल्या पगारापासून आपली गुंतवणूक सुरू करावी याचा अर्थ कमाई सुरू झाल्यावर साधारणतः २२ ते २५ वयोगटाच्या आसपास आपण गुंतवणूक सुरु करायला हरकत नाही.

    तरुण वयात चांगली कमाई होत असताना योग्य बचत न करता खर्चाची सवय लागल्यास पुढील आयुष्यातील आर्थिक जबाबदाऱ्या निभावणे कठीण होते. त्यापेक्षा शुभस्य शीघ्रम् ! आता गुंतवणूक सुरु करा. आपल्याकडे अजूनही वेळ आहे. त्या वेळेचा कसा वापर करायचा हे आपल्या हातात आहे. लवकर गुंतवणूक केल्यास तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. जर आपण लवकर प्रारंभ केला नसेल तर त्याचे दुःख करत बसण्यापेक्षा आता गुंतवणूक सुरू करा.

     म्हातारपणातही ज्यांच्याकडे पैसा आहे, ते तरुण राहतात. याउलट, आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्यक्ती मात्र तरुणपणातच वृद्ध होतात.

    थोडक्यात काय तर जेव्हा आपण कमवायला सुरुवात करू तेव्हा आपल्या उत्पन्नाचा काही भाग हा आपल्याला झेपेल त्या प्रकारात आपण गुंतवलाच पाहिजे, ज्या गुंतवणूक प्रकाराचा आपल्याला भविष्यात लाभ होईल.

    लवकर गुंतवणूक सुरू करण्याचे विविध फायदे :

    1. संपत्ती : 

     लवकर गुंतवणूक केल्याने तुम्हाला तुमच्या संपत्तीला वेळ देऊन ती वाढवता येते. त्यामुळे तुम्ही भविष्यात मोठ्या रकमेचा स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी फायदा मिळवू शकता. भविष्यातील ध्येयनिश्चिती करू शकता. काय योग्य ? काय अयोग्य? हे ओळखून कुठं गुंतवणूक करायची ? कशी आणि किती करायची हे आर्थिक शहाणपण कमी जबाबदारी असलेल्या वयातच येतं.

    2. कम्पाउंड इंटरेस्ट :

    गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम तुमच्या मूळ गुंतवणुकीच्या व्याजावर व्याज म्हणून वाढते, ज्यामुळे तुम्हाला त्याचा अधिक फायदा होतो.

    3. सहनशीलता : 

    लवकर गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला बाजारातील उतार-चढावांशी सामना करण्यासाठी अधिक वेळ मिळतो आणि तुम्ही अधिक शांतपणे गुंतवणूक करु शकता. संयम ठेवायला शिकता येतं. एक गुंतवणूकदार म्हणून आपली Risk Taking Capacity वाढते. त्या तणावाचं योग्य व्यवस्थापन देखील आपल्याला करता येतं.

    4. आर्थिक स्वातंत्र्य : 

    जेव्हा तुम्ही तुमच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी गुंतवणूक, बचत, आणि इतर आर्थिक योजना आखता, आर्थिक ध्येयनिश्चिती करता,  तेव्हा अप्रत्यक्षपणे तुम्ही तुमच्या जीवनात भविष्यातील आर्थिक संकटांची चिंता कमी करत असता.

    सुरुवातीला कमी गुंतवणूक केल्याने तुम्ही भविष्यात आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकता आणि तुमची दिर्घकालीन उद्दिष्टे साध्य करू शकता.

    5. सातत्यपूर्ण बचत :

    लवकर गुंतवणूक सुरू केल्याने तुम्हाला आर्थिक नियोजनाची आणि बचतीची सवय लागते. आपल्या उत्पन्नाच्या काही रकमेची आपल्याला बचत करायचीच आहे ही सवय लागून जाते.

    यामुळे लवकर गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत, जे तुम्हाला भविष्यात मोठ्या लाभाची, मोठ्या परताव्याची संधी देतात. 

    म्हणून आजच श्रीगणेशा करा तुमच्या गुंतवणुकीचा !

    हे पण वाचा

  • तुमचा CIBIL Score तुमचं आर्थिक भविष्य ठरवतो का? | CIBIL Score म्हणजे काय ? | What is CIBIL Score and its importance

    तुमचा CIBIL Score तुमचं आर्थिक भविष्य ठरवतो का? | CIBIL Score म्हणजे काय ? | What is CIBIL Score and its importance

    CIBIL Score म्हणजे Credit Information Bureau (India) Limited Score होय. हा एक 3-अंकी Score आहे जो 300 ते 900 च्या दरम्यान असतो. हा व्यक्तीच्या क्रेडिटच्या  इतिहासावर आणि कर्जफेडीच्या सवयींवर आधारित असतो. ज्या व्यक्तीचा CIBIL Score जितका जास्त, तितकी त्या व्यक्तीची Credit पात्रता चांगली मानली जाते.

    जर CIBIL 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज देताना अशा व्यक्तीस प्राधान्य देतात. कमी स्कोअर असलेल्यांसाठी कर्ज मिळवणे कठीण होऊ शकते किंवा उच्च व्याजदर भरावा लागू शकतो.

    CIBIL Score चांगला ठेवण्यासाठी वेळेवर कर्जाची परतफेड करणे, क्रेडिट कार्डचा योग्य वापर करणे आणि अधिक कर्ज किंवा क्रेडिटची गरज न ठेवणे हे महत्त्वाचे आहे.

    जास्त Score म्हणजे त्या व्यक्तीची क्रेडिट क्षमता चांगली आहे आणि कमी Score म्हणजे ती व्यक्ती वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड व्यवस्थित आणि वेळेवर करत नाही.

    CIBIL Score ची भूमिका : 

    कर्ज प्रक्रियेत CIBIL Score खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. जर हा Score चांगला असेल, तर कर्ज मंजूर होण्यास शक्यतो कोणतीही अडचण येत नाही; पण जर हा Score कमी असेल तर कर्ज मिळणे कठीण होते. चांगल्या CIBIL Score सह कमी व्याजावर कर्ज मिळण्याचीही शक्यता असते. 300 ते 550 चा CIBIL Score कमकुवत मानला जातो. तर 550 ते 650 सरासरी, 650 ते 750 चांगला आणि 750 ते 900 सर्वोत्तम मानला जातो. 

    CIBIL Scoreची मुख्य भूमिका खालीलप्रमाणे आहे :

    1. कर्ज मंजुरीसाठी महत्त्वाचा आधार: जेव्हा तुम्ही गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा कार कर्जासाठी अर्ज करता, तेव्हा बँक तुमचा CIBIL Score  तपासते. चांगला Score असल्यास कर्ज मंजूर होण्याची शक्यता अधिक असते.

    2. व्याजदर ठरवण्यासाठी: जास्त CIBIL Score असलेल्या व्यक्तींना कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते, कारण बँकांना अशा व्यक्तींवर जास्त विश्वास असतो की, ते वेळेवर परतफेड करतील.

    3. क्रेडिट कार्ड मंजुरी: क्रेडिट कार्ड देणाऱ्या कंपन्या देखील तुमचा CIBIL Score पाहून तुमच्यासाठी योग्य कार्ड मंजूर करतात. चांगला स्कोर असल्यास जास्त क्रेडिट Limit मिळते.

    4. Risk Management: कर्ज देणाऱ्या संस्थांना तुमचा CIBIL Score पाहून ठरवता येते की, तुम्ही त्यांच्या दृष्टीने जोखीम आहात की नाही. कमी Score असणाऱ्या व्यक्तींना कर्ज देणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे त्यांना कर्ज नाकारले जाते किंवा जास्त व्याजदर दिला जातो.

    5. करिअर: काही क्षेत्रांमध्ये, विशेषतः आर्थिक सेवांमध्ये, बहुतांश कंपन्या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांचा CIBIL Score तपासतात. चांगला Credit Score म्हणजे त्या व्यक्तीची आर्थिक शिस्त आणि जबाबदारी दर्शवत असते. 

    6. इतर फायदे: जास्त CIBIL Score असणाऱ्या व्यक्तींना कधी कधी विशेष ऑफर, जास्त क्रेडिट लिमिट किंवा कमी प्रोसेसिंग फी सारखे अनेक फायदे मिळतात.

    Untitled design 12

    1. तुम्ही तुमचा CIBIL Score कसा तपासू शकता: 

    Step 1: CIBIL वेबसाइटला भेट द्या.

    Step 2: मुख्य पानावर ‘Get Your CIBIL Score’ किंवा ‘Free CIBIL Score’ या पर्यायावर क्लिक करा.

    Step 3: तिथे तुम्हाला तुमची व्यक्तिगत माहिती भरावी लागेल, ज्यामध्ये नाव, जन्मतारीख, ईमेल, मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड क्रमांक असतो.

    Step 4: या प्रक्रियेनंतर तुम्हाला तुमचा CIBIL Score दिसेल. सुरुवातीला कदाचित एकदा नोंदणी करावी लागू शकते. काहीवेळा, हे मोफत असते, तर काहीवेळा वार्षिक Subscription

     शुल्क भरावे लागते.

    2. मोबाईल अ‍ॅप्सद्वारे CIBIL Score तपासणे

    तुम्ही विविध अ‍ॅप्स वापरून देखील CIBIL Score तपासू शकता :

    Paytm :

    • Paytm अ‍ॅप उघडा आणि Loans & Credit Cards किंवा CIBIL Score पर्यायावर जा.
    • आपले KYC डिटेल्स किंवा पॅन कार्ड नंबर भरून Score तपासा.

    Bajaj Finserv:

    • Bajaj Finserv अ‍ॅपवर नोंदणी करा.
    • Check your CIBIL Score या पर्यायावर जा आणि पॅन कार्ड आणि इतर माहिती भरून तपासणी करा.

    BankBazaar:

    • BankBazaar अ‍ॅप किंवा वेबसाईटवर जा.
    • CIBIL Score मोफत तपासण्याचा पर्याय निवडा आणि त्यानुसार आपली माहिती भरा.

    बँक किंवा वित्तीय संस्थांमधून बर्‍याच बँका आणि वित्तीय संस्थाही मोफत किंवा सवलतीच्या दरात CIBIL Score तपासण्याची सेवा देतात.

    तुम्ही तुमच्या नेट बँकिंग खात्यात लॉगिन करून देखील काही बँकांच्या सेवा वापरून CIBIL Score तपासू शकता

    उदा.

    • HDFC Bank
    • ICICI Bank
    • SBI (State Bank of India)

    3. विनामूल्य क्रेडिट रिपोर्ट्स मिळवण्यासाठी इतर पर्याय :

    • भारतात, तुम्ही TransUnion CIBIL कडून वर्षातून एकदा मोफत क्रेडिट रिपोर्ट मिळवू शकता. तुम्हाला या अहवालात तुमचा CIBIL Score  तसेच इतर क्रेडिट माहिती दिसेल.
    • CIBIL वेबसाइटवर जा आणि Free Annual Credit Report पर्यायावर क्लिक करा.

    आवश्यक माहिती भरून नोंदणी करा. यानंतर तुम्हाला तुमचा क्रेडिट रिपोर्ट आणि CIBIL Score दिसेल.

    तुमचा CIBIL Score हा तुमच्या आर्थिक स्थैर्याचा आणि जबाबदारपणाचा आरसा आहे. तो फक्त कर्ज मिळवण्यासाठीच महत्त्वाचा नाही, तर तुमची आर्थिक शिस्त आणि विश्वासार्हता याचेही प्रतीक आहे. त्यामुळे नियमितपणे क्रेडिट कार्डच्या देयकांचे वेळेवर पेमेंट, कर्जाचे नियोजनबद्ध पुनर्भरण आणि खर्चाचे शिस्तबद्ध व्यवस्थापन याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. CIBIL स्कोअर चांगला ठेवणे म्हणजे तुमच्या आर्थिक भवितव्यासाठी उत्तम तरतूद करण्यासारखे आहे.

    आणखी वाचा:

  • पैशांच्या स्मार्ट व्यवस्थापनाच्या या 10 Master Tricks तुम्हाला माहीत आहेत का?

    पैशांच्या स्मार्ट व्यवस्थापनाच्या या 10 Master Tricks तुम्हाला माहीत आहेत का?

    बहुतेक जणांना असे वाटते, की कमाई चांगली असेल तर आर्थिक नियोजनाची काही गरज नाही; पण पैसा कसा हाताळायचा किंवा गुंतवायचा हे कळत नसेल, तर उद्या हजारांत काय लाखांचे पॅकेज जरी मिळाले तरी ते पुरणार नाही हे वास्तव आहे. मित्रांनो, लक्षात घ्या पैशाचे स्मार्ट व्यवस्थापन जर तुम्ही करणार नसाल तर तुम्हाला तुमच्या भविष्यातील आर्थिक ध्येयांना गुंडाळण्याची वेळ येऊ शकते आणि कर्जाचा मोठा डोंगर तुमच्या पुढे उभा राहू शकतो. यासाठी उत्पन्न कितीही असलं तरी त्या पैशांचे योग्य व्यवस्थापन करता येणे गरजेचे ठरते. 

    आज आपण पैशांच्या स्मार्ट व्यवस्थापनाच्या 10 Master Tricks पाहूया: 

    • महिन्याच्या आणि वार्षिक खर्चाचे अंदाजपत्रक बनवा. त्यामध्ये होणाऱ्या खर्चाची विभागणी वेगवेगळी करा. यातून तुम्हाला आवश्यक गोष्टीवर होणारा खर्च, हॉटेलिंगवर होणारा खर्च, मुलांच्या शिक्षणावर होणारा खर्च याचा अंदाज येईल.
    • तुमच्या गरजा आणि इच्छा यामधला फरक समजून घ्या. बहुतेक जण यामध्ये गल्लत करतात. गरजेनुसार खर्च करा, इच्छेनुसार नको.
    • तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नका. हा एक महत्वाचा नियम आहे. बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये असणारे बहुतेकजण यामध्ये अडकलेले असतात.
    • महिन्याची बिले, कर्जाचे हप्ते वेळेवर भरा. यामुळे तुमची पत सुधारायला मदत होते. ECS (Electronic Clearing Service) मुळे आज बिल भरणे, कर्जाचे हप्ते भरणे खूप सोपे झाले आहे.
    • क्रेडिट कार्डचा योग्य वापर करा. आज बाजारात क्रेडिट धारकांसाठी खूप योजना येतात आणि त्या सापळ्यात अडकणारेही बरेचजण आहेत. क्रेडिट कार्डचे स्मार्ट उपयोगही आहेत ते समजून घेणे गरजेचे आहे.
    • स्मार्ट कर्जं आणि वाईट कर्जं घ्या. स्मार्ट कर्ज म्हणजे अशी कर्ज ज्यामध्ये आपल्याला कर नियोजनास मदत होते आणि स्वस्त दरात उपलब्ध होतात. जसे की गृहकर्ज आणि शैक्षणिक कर्ज यावर कर सवलती असतात, याविरुद्ध वाईट कर्ज म्हणजे अशी कर्जं जी महाग दराने मिळतात उदा. वाहन कर्ज, क्रेडिट कार्ड.
    • तुमच्या अडचणीच्या काळासाठी ३-६ महिन्याच्या खर्चाची तरतूद करून ठेवा. आपल्याला उद्या कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल सांगता येत नाही. नोकरी-धंद्यामध्ये येणाऱ्या चढउताराला सामोरे जाण्यासाठी ही तरतूद खूप महत्त्वाची आहे.
    • तुमचे महिन्याचे बँक, कर्जाचे स्टेटमेंट चेक करत चला. खूपवेळा आपण याकडे न बघताच रद्दीमध्ये टाकतो. जेव्हा तुम्ही ती काळजीपूर्वक पाहता, तेव्हा तुम्हाला त्यातील बारकावे लक्षात येतात.
    • तुमच्या परिवाराला, घरातील मोठ्या मुलांना पैशाचे महत्व, तुम्ही केलेल्या गुंतवणूका समजून सांगा, जेणेकरून भविष्यात या गुंतवणूका त्यांना समजायला वेळ लागणार नाही.
    • आर्थिक नियोजन, विमा, गुंतवणूक यासाठी त्या त्या क्षेत्रातील व्यावसायिक लोकांचा सल्ला घ्या.

    लक्षात घ्या; एक छोटेसे छिद्रही जहाजाला बुडवू शकते, त्यामुळे आपल्या आर्थिक जीवनाला शिस्त आणण्यासाठी पैशाचे स्मार्ट व्यवस्थापन गरजेचे आहे आणि त्याची सुरुवात कमाई सुरू झाल्यापासून करणे गरजेचे आहे. ज्याला पैसा कमावता येतो, त्याला तो सांभाळताही आला पाहिजे आणि वाढवताही आला पाहिजे.

    आणखी वाचा

  • नवीन अर्थसंकल्पावर सरकार खुश, मात्र विरोधी पक्षांनी मुरडले नाक

    नवीन अर्थसंकल्पावर सरकार खुश, मात्र विरोधी पक्षांनी मुरडले नाक

    संपूर्ण देशासाठी बजेट किंवा अर्थसंकल्प हा एक महत्वाचा भाग ठरतो, आपल्या देशात कोणत्या वस्तू स्वस्त आणि कोणत्या वस्तू महाग झाल्या आहेत किंवा भारताचे नागरिक म्हणून आपण सरकारला किती टक्क्यांपर्यंत कर भरणार आहोत या बद्दलची किमान माहिती सुजाण नागरिक म्हणून आपल्याजवळ असली पाहिजे. 

    कोणत्या वस्तू महाग आणि कोणत्या स्वस्त झाल्या?

    कालच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी कर कपात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे काही वस्तू स्वस्त झाल्या आहेत. भारतामध्ये अधिकाधिक मध्यवर्गीय लोकं वावरतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी असे आर्थिक चढ-उतार महत्वाचे ठरतात. काल सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये कॅन्सरची औषधं, क्रूझचा प्रवास, सी फूड, वस्त्र, X-Ray मशीन,चामड्याच्या वस्तू, मोबाईल, मोबाईल चार्जर व इतर उपकरणं स्वस्त होणार असल्याची माहिती मिळाली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे सोन्या-चांदीच्या कस्टम ड्युटीमध्ये ६ टक्क्यांची कपात करण्यात आल्याने या मौल्यवान वस्तू देखील आता स्वस्त होतील. महाग वस्तूंबद्दल बोलायचं झाल्यास फ्लेक्स आणि बॅनरच्या कस्टम ड्युटीमध्ये वाढ झाल्याने जाहिरातींची  ही साधनं महाग होणार आहेत. 

    nitish kumar hails special assistance announced by nirmala sitharaman for bihar 23115970

    अर्थसंकल्प थोडक्यात:

    काल सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा बऱ्यापैकी तरुणांसाठी आणि मध्यमवर्गीयांसाठी विशेष वरदान ठरला  आहे. देशातील पायाभूत सुविधा मजबूत व्हाव्यात, शेती व्यवसायात वाढ व्हावी, महिलांच्या हातात पैसे खेळात राहावेत म्हणून अर्थमंत्रालयाने धनाची पुंजी खुली केली आहे.भारतातील ग्रामीण भागांचा विकास व्हावा, तसेच आदिवासी वर्गाला आर्थिक मदत मिळावी म्हणून देखील विशेष धनादेश जारी करण्यात आला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरकार स्थापनेत मैत्रीचा हात पुढे केलेल्या बिहार आणि आंध्र प्रदेशला आर्थिक मदत पुरवण्यात आली आहे. एकंदरीतच या अर्थसंकल्पामधून मोदी सरकारचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल अशी आखणी करण्यात आली आहे. 

    अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया:

    निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर अनेक राजकीय मंत्र्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया मांडल्या आणि यात सर्वात महत्वाची प्रतिक्रिया ठरली ती म्हणजे आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. नरेंद्र मोदी यांच्या मते “हा अर्थसंकल्प देशातील मध्यमवर्गीयांवर लक्ष देणारा आहे. शेतकरी वर्गाला मदत करणारा तसेच तरुण मंडळींना नवीन संधी उपलध करून देणारा आहे.

    अर्थसंकल्पावर राहुल गांधी काय म्हणाले?

    विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी देखील अर्थसंकल्पावर मत नोंदवले आहे, त्यांच्या मते “हा खुर्ची बचाओ अर्थसंकल्प आहे. राजकारणात मदत केलेल्या पक्षांना खुश करण्यासाठी त्या-त्या राज्यांच्या नावे  भलामोठा धनादेश जारी करण्यात आला आहे आणि सोबतच अदानी-अंबानींना खुश करण्यात सामान्य जनतेला इथे सपशेलपणे डावलण्यात आले आहे.”

    अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले?

    आणखीन वाचा:

  • नवीन अर्थसंकल्पावरचा पडदा उठणार; अर्थसंकल्प 2024-25 च रहस्य उलघडणार…

    नवीन अर्थसंकल्पावरचा पडदा उठणार; अर्थसंकल्प 2024-25 च रहस्य उलघडणार…

    नियमांनुसार मार्च महिन्याच्या शेवटी आर्थिक वर्ष संपतं आणि नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होते. यावर्षी मात्र देशात मार्च-एप्रिलच्या काळात निवडणुकांचं वारं वाहत होतं आणि याच कारणामुळे तेव्हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. आता अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे काय? अंतरिम अर्थसंकल्प हा काही दिवसांसाठी सादर करण्यात येणारा अर्थसंकल्प आहे. जुनं सरकार जाऊन नवीन सरकार स्थापन होईपर्यंत बाकी राहिलेल्या काळात देशाची आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून अशाप्रकारच्या अर्थसंकल्पाची मदत घेतली जाते. आता निवडणूक पूर्ण झाली असून देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यावेळा निवड झाली आहे, आणि सोबतच पुन्हा एकदा अर्थमंत्री म्हणून देशाची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्या खांद्यांवर सोपवण्यात आली आहे. 

    668cfd04668c0 union budget 2024 090402522 16x9 1

    अर्थसंकल्पाची गरज काय?

    नवीन अर्थसंकल्प कधी येणार हे जाणून घेण्याआधी अर्थसंकल्प महत्वाचा का आहे? हे जाणून घेतलं पाहिजे. अगदीच सोपं उदाहरण द्यायचं झाल्यास आपण आपल्या घरातच डोकावून पाहू शकतो. नवीन महिना सुरु झाला म्हणजे घरातील स्त्री संपूर्ण महिन्याचं आर्थिक नियोजन पक्कं करते. घरात माणसं किती आहेत, संपूर्ण घर व्यवस्थित चालायचं असेल, तर धान्य किती प्रमाणात आणलं पाहिजे वगैरे नियोजन दरम्यान केलं जातं. तसंच देशाचा विचार करायचा झाल्यास हेच गणित लागू होतं. संपूर्ण आर्थिक वर्षात जर का देशाचं कामकाज सुरळीतपणे पार पाडायचं असेल, तर नियोजनाची गरज भासते. कोणत्या विभागाला किती प्रमाणात पैशांची गरज आहे, ती गरज का आहे या सर्व गोष्टींची शहनिशा केल्यानंतरच अर्थसंकल्प तयार होतो. पुढे याच अर्थसंकल्पामधून प्रत्येक विभागाला आवश्यक असणारे पैसे पुरवले जातात. थोडक्यात सांगायचं तर अर्थसंकल्प तयार होत असताना सर्वात आधी प्रत्येक विभाग त्यांच्या गरजा मंत्रालयासमोर समोर ठेवतो आणि त्यावर नीट विचार करून पैसे पुरवले जातात.

    नवीन अर्थसंकल्प कधी येणार?

    समोर आलेल्या माहितीनुसार 23 जुलै 2024 रोजी सकाळी ठीक 11 वाजता देशात नवीन अर्थसंकल्प (Union Budget 2024-25) सादर केला जाईल आणि हा अर्थसंकल्प पूर्ण वर्षभरासाठी लागू होईल. अंतरिम अर्थसंकल्पाच्या वेळी अर्थमंत्रालयाकडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते आणि आता नवीन अर्थसंकल्पामधून यात नेमके कोणते बदल केले जातील याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे. तुम्हाला माहिती असेलच की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कारकिर्दीची सुरुवात नवीन लोकसभेच्या इमारतीतून झाली होती आणि आता येणारा नवीन अर्थसंकल्प देखील याच भव्यदिव्य इमारतीमध्येच सादर केला जाईल. 

    तुम्हाला जर का अर्थविश्वाची आवड असेल तर घर बसल्या देखील या अर्थसंकल्पाचा आढावा घेणं शक्य आहे. दूरदर्शन, संसद टीव्ही यांसारख्या वाहिन्या येणाऱ्या अर्थसंकल्पाचं थेट प्रक्षेपण जारी करतील, शिवाय युट्युबच्या माध्यमातून देखील तुम्ही अर्थसंकल्पाबद्दल आवश्यक माहिती मिळवू शकता. याव्यतिरिक्त वृत्तवाहिन्या आणि सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही वेळेत आवश्यक माहिती मिळवू शकता. 

    thequint 2024 02 a6b6efb6 5870 47ca a0f9 0feb65e90417 01021 pti02 01 2024 000010b

    नवीन अर्थसंकल्प जुलैमध्ये का?

    आर्थिक वर्षाच्या गणितानुसार मार्च आणि एप्रिल हे दोन महिने फारच महत्वाचे ठरतात, कारण वर नमूद केल्याप्रमाणे या महिन्यांमध्येच जुनं आर्थिक वर्ष संपून नवीन वर्षाला सुरुवात होते. आपल्या देशात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशीच अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा सुरू आहे. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण काही वर्षांअगोदर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी देशात बजेट सादर केलं जायचं, मात्र राहिलेल्या काळात सरकारला नवीन बदल घडवून आणण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून सदर बदल घडवण्यात आले. यंदाच्या वर्षी आलेलं निवडणुकांचं वारं आणि सोबत लागू होणाऱ्या आचार संहितेमुळेच अंतरिम अर्थसंकल्पानंतर आता संपूर्ण वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकांपूर्वी ‘विकसित भारत’ या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून सरकार कार्यरत असल्याची माहिती दिली होती. आता विकसित भारत म्हणजे काय? तर सरकारला वर्ष 2047 पर्यंत भारताच्या अर्थव्यव्यस्थेला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवायचं आहे आणि म्हणूनच सरकार त्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.

    आणखी वाचा:

  • विमा कंपन्यांचे कार्य चालते तरी कसे?

    विमा कंपन्यांचे कार्य चालते तरी कसे?

    नव्या खुल्या आर्थिक धोरणानुसार सदर क्षेत्र आता खाजगी क्षेत्रांसाठी त्याचप्रमाणे थेट परदेशी गुंतवणुकीसाठी खुले करण्यात आले. सुरुवातीला थेट परदेशी गुंतवणूक मर्यादा 26% होती त्यानंतर ती 26% वरून 49% वरून 74%आणि तेथून सन 2019 मध्ये उपकंपनीच्या माध्यमातून ही मर्यादा 100% पर्यत टप्याटप्याने वाढवण्यात आली आहे. सन 2014 ते 2024 पर्यत या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये 53900 कोटी रुपयांची थेट गुंतवणूक आली आहे. भारत लोकसंख्येच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकावर असूनही, अजून विमा घ्यायला हवा ती आपली गरज आहे हे फार कमी लोकांना वाटते. त्यामुळे या व्यवसायात वाढ होण्याच्या मोठ्या संधी आहेत. स्वतःहून जीवन विमा किंवा आरोग्य विमा घेणारे फार थोडे लोक आहेत. अनेकांना विमा हा त्यांच्या मालकाकडून मिळतो. कोविड 19 नंतर या विषयावर थोडी जागृती होऊ लागली असून लोकांना त्याचे महत्त्व पटत आहे. सध्या जीवनाविमा देणाऱ्या (24) सर्वसाधारण विमा देणाऱ्या (33) अशा 57 कंपन्या कार्यरत आहेत. अलीकडे आलेल्या आणि शेअरबाजारात नोंदणी केलेल्या विमा कंपन्यांनी आपले 31 मार्च 2024 आर्थिक निकष जाहीर केले असून काहींनी अल्पावधीतच भरघोस नफा मिळवला आहे. त्यामुळे साहजिकच या कंपन्यांचा व्यवसाय चालतो तरी कसा? त्या प्रीमियम कसा ठरवतात, भरपाई कशी देतात याबद्दल सर्वसाधारण लोकांना कुतूहल आहे. त्यांच्या आकडेवारीच्या तपशिलात न जाता त्यांच्या कार्याचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न.

    आपल्याला माहिती आहेच की विमा हा एक करार असून कंपन्या त्याच्या ग्राहकांकडून विम्याचा प्रिमियम घेतात आणि करारातील अटी शर्ती मान्य करून जर तशी घटना घडलीच तर त्याची भरपाई देतात. यामुळे ग्राहकांची जोखीम कमी होते त्याचप्रमाणे किरकोळ विमा संरक्षण देऊन त्या ग्राहकांच्या गरजेच्या बचत योजनांही बाजारात आणतात. त्यांना गरजेनुसार नियमित उत्पन्न मिळेल याची काळजी घेतात, ते करताना:

    जोखीम निश्चिती: विमा कंपन्या एखाद्या व्यक्तीची त्याच्या मालमत्तेची किंवा एखाद्या अनपेक्षित घटनेची जोखीम स्वीकारतात. यासाठी वास्तविक विज्ञान तज्ञांची (Actuarial Science) तज्ञांची मदत घेतात. विमा, निवृत्ती वेतन, वित्त व्यापार, उद्योग, व्यवसाय यातील जोखीम मोजण्याची गणितीय आणि सांख्यिकीय विभागाची शाखा आहे भविष्यातील अनिश्चित घटनांचे आर्थिक परिणाम शोधून त्याचे विश्लेषण करण्यासाठी संभाव्यता आणि सांख्यिकीय गणिताचा वापर करते. प्रीमियम किती जमा होईल, किती क्लेम द्यावे लागतील आणि व्यवस्थापन खर्च भागवला जाईल याप्रमाणे योजनेची रचना करण्यात येते. बाजारात चालू अशाच प्रकारच्या योजना आणि त्यांचे प्रीमियम यांचाही विचार केला जातो.

    योजनेचा प्रीमियम: योजना निश्चित झाली की त्यांची आकर्षक जाहिरात केली जाते. एजंटच्या माध्यमातून त्याचप्रमाणे ऑनलाईन पोर्टलवर ग्राहक त्यांनी खरेदी केलेल्या योजनेचा प्रीमियम मासिक, त्रैमासिक, वार्षिक पद्धतीने इन्शुरन्स कंपनीकडे जमा करीत असतात. जमा होणारा प्रीमियम हे इन्शुरन्स कंपन्यांच्या उत्पन्नाचे साधन आहे.

    अंडररायटिंग: जेव्हा ग्राहक विमा संरक्षणाची मागणी करतो तेव्हा सर्वप्रथम या प्रक्रियेतून जावे लागते. विमा कंपन्या छोट्या व्यवसायाचा विमा उतरवण्याचा धोका निर्धारित करण्यायोग्य असल्याची चाचपणी करून तुमची मागणी स्वीकाहार्य आहे का नाही ते तपासून, जर ती स्वीकाहार्य असेल तर प्रीमियम किती घ्यायचा ते ठरवते. व्यक्तीला जीवना विमा, आरोग्य विमा देताना त्याचा प्रीमियम ठरवताना त्याचे वय, आरोग्य, जीवनशैली, कामाचे स्वरूप आणि त्याचा इन्शुरन्सच्या क्लेम्सचा पूर्वेतिहास तपासला जातो. त्यानंतर त्याचा प्रस्ताव बनवला जातो.

    प्रस्तावास मंजुरी अथवा नामंजुरी: अंडररायटिंगच्या अहवालास अनुसरून तुमचा प्रस्ताव स्वीकारायचा नाकारण्याचा किंवा त्यातील अटीशर्तीमध्ये अथवा प्रीमियममध्ये बदल करण्याचा अधिकार विमा कंपनीस असतो. तो दोघांनाही मान्य असेल तर प्रिमियम घेऊन विमा करार केला जातो. तो मिळाल्यावर ग्राहकाने तपासून पाहणे अपेक्षित असून त्याने समाधान होत नसेल, तर ठराविक मुदतीत तो रद्द केला जाऊ शकतो. यासाठी कोणतेही कारण देण्याची जरुरी नसते. अशा वेळी त्यावरील प्रोसेसिंग फी वजा करून उरलेली रक्कम परत देण्यात येते.

    जोखीम फंड उभारणी: विमा कंपन्या जमा झालेल्या प्रीमियममधील काही भागाचा एक फंड निर्माण करून त्याचा उपयोग क्लेम रक्कम देण्यास वापरतात. यामध्ये पडून असलेल्या रकमेची अल्पकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणूक कशी करायची यांचे नियम असून ती त्याच पद्धतीने केली जाते. ज्यामुळे कंपनीच्या रोखता प्रवाहात अडचण येणार नाही. ग्राहकांना त्यातूनच नुकसानीची भरपाई मिळात असल्याने त्यांची जोखीम कमी होते.

    क्लेमवरील प्रक्रिया: जेव्हा पॉलीसीधारक त्याच्या नुकसानीचा दावा दाखल करतो तेव्हा इन्शुरन्स कंपनीकडून त्याची सत्यता तपासली जाते. दावा योग्य असल्यास मंजूर करून त्याची रक्कम धारकास दिली जाते. अशा प्रकारे धारकाच्या आर्थिक नुकसानीची भरपाई होते.

    आपत्कालीन फंडाची निर्मिती: जमा झालेल्या प्रिमियममधून भविष्यात येणाऱ्या दाव्यांच्या भरपाईची खात्री असली तरी जमा प्रिमियममधील काही रक्कम बाजूला ठेऊन आपत्कालीन फंडाची निर्मिती केली जाते. जेणेकरून त्यातून गुंतवणूक केली जाऊन अधिक परतावा मिळेल, त्यामुळे भविष्यात कदाचित अधिक दावे मंजूर करायला लागल्यास होणाऱ्या जास्तीच्या खर्चाची भरपाई होईल.

    कंपनीचा नफा: जमा झालेला प्रिमियम आणि त्यातून द्यावी लागलेली भरपाई आणि व्यवस्थापन खर्च यातील फरक हा विमा कंपनीचा नफा असतो. पहिल्या वर्षाचा खर्च हा सर्वाधिक असतो. त्यातुनच एजंटला सर्वाधिक कमिशन मिळते. आपत्कालीन फंडातून मिळवलेले जास्तीचे उत्पन्न हा देखील कंपनीचा नफा असतो.

    पुनर्विमा: खूप मोठ्या रकमेचा विमा उतरवताना कंपनी अन्य कंपन्यांकडून पुनर्विमा घेऊन आपली जोखीम कमी करते. अनपेक्षित नुकसान होऊ नये यासाठी मुख्य कंपनी आपली जोखीम वेगवेगळ्या कंपनीकडे पुनर्विमा काढून कमी करून घेते.

    नियामक नियमन: या सर्व कंपन्यांवर अंकुश ठेवण्यासाठी स्वतंत्र नियामक आहेत. त्यामुळे सूचना आणि नियम या कंपन्यांना पाळावेच लागतात. ग्राहक हक्क संरक्षण, उचित व्यवहार, आर्थिक स्थिरता राहून कंपन्यांचा व्यवसाय कसा वाढेल याची काळजी नियमकाकडून घेतली जाते.

    उत्पादन विविधता: ग्राहकांच्या गरजा, नियामकांच्या सूचना यांचा विचार करून वेगवेगळी जोखीम कमी करणारी उत्पादने या कंपन्या बाजारात आणतात यात जीवनाविमा, आरोग्यविमा, मालमत्ता विमा, वाहन विमा, विशेष विमा इ. चा समावेश होतो.

    ©उदय पिंगळे
    अर्थ अभ्यासक

    (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकरणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत)

  • बँकिंग अँड फायनान्स – भारतातील सहकारी बँका

    बँकिंग अँड फायनान्स – भारतातील सहकारी बँका

    देशात अस्तीत्वात असलेल्या बँकांची चार मुख्य प्रकारात विभागणी करता येईल.

    शिखर बँक: याला सर्व बँकांची बँक असे म्हणता येईल. देशातील सर्व बँकिंग व्यवहारावर या बँकेचे नियंत्रण असते. याशिवाय पत नियंत्रण, पत निर्मिती यासारखी अनेक कामे या बँकेकडून केली जातात. आपल्याकडे हे काम भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) करते ती पूर्णपणे स्वायत्त संस्था आहे.

    1. RBI LEAD

    व्यापारी बँका: बँकिंग हा एक व्यवसाय समजून त्यातून नफा मिळवण्याच्या उद्देशाने या बँका स्थापन झाल्या आहेत. त्यांचे त्यातील मालकीनुसार उपप्रकार असे
    ◆ सरकारी बँका
    ◆ खाजगी बँका
    ◆ परदेशी बँका
    ◆ ग्रामीण विकास बँका

    Untitled 1

    सहकारी बँका: यांचेही दोन उपप्रकार आहेत
    ◆ नागरी सहकारी बँका
    ◆ ग्रामीण सहकारी बँका

    विशेष बँका: या अगदी अलीकडेच (सन 2015) विशेष हेतूने स्थापन झालेल्या बॅंका असून त्यांचेही दोन प्रकार आहेत.
    ◆ पेमेंट बँका
    ◆ स्मॉल फायनान्स बँका

    यातील प्रत्येक बँकेच्या प्रकार आणि उपप्रकाराची स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये आहेत. यातील सहकारी बँकांबद्धल थोडं अधिक जाणून घेऊयात.

    ‘सहकार’ ही एक चळवळ असून ‘एकी हेच बळ’ हे त्यामागील सूत्र आहे. व्यक्ती म्हणून दुसऱ्याचा स्वीकार करणे, एकमेकांना मदत करणे, आपलेपणाची भावना जपणे, जोपासणे हे मानवी विकासासाठी उपयोगी पडणारे गुण जेव्हा घरातून घराबाहेरील व्यक्तीपर्यंत पोहोचतात तेव्हा त्यास ‘सहकार’ असे म्हटले गेले. व्यक्तीच्या आर्थिक विकासासाठी कमी पडणारे भांडवल सर्वांनी गोळा केले, तर समाजाचा आणि त्यायोगे देशाचा विकास साधता येईल ही सहकारी बँका स्थापन करण्यामागची भावना होती. कृषी, उद्योग, शिक्षण यातील सहकार क्षेत्राचे काम अतुलनीय आहे. त्यामुळे “सहकारातून समृद्धी” या संकल्पनेचा केवळ राज्यापुरता विचार न करता संपूर्ण देशाने विचार करावा त्यातील अडचणींवर मार्ग काढावा यासाठी केंद्र सरकारने स्वतःचा सहकार विभाग स्थापन केला असून त्यासाठी स्वतंत्र मंत्रीही आहे. बँकिंग तळागाळात पोहोचवण्यात सहकारी बँकांची भूमिका महत्त्वाची आहे. नफा मिळवणे हा व्यापारी बँकांचा मुख्य हेतू असून त्यामुळे त्यांच्या भागधारकांना अधिक फायदा होतो त्याचप्रमाणे भागांच्या संख्येनुसार त्यातील व्यक्तींचे अथवा समूहाचे बँकेवर वर्चस्व राहतं, म्हणजे ज्याच्याकडे अधिक भाग तो अधिक लाभार्थी असतो आणि त्याचे बँकेवर नियंत्रण राहते. सहकारी बँकिंगमध्ये नफा मिळवणे हा दुय्यम हेतू आहे. त्याचप्रमाणे भागधारकांकडे कितीही समभाग असले तरी ‘एक व्यक्ती एक मत’ हे सहकाराची रचना असल्याने बँक व्यवहारावर सभासदाचे नियंत्रण राहते. सभासद हेच बँकेचे ग्राहक असल्याने बँकेस त्याच्याकडूनच मुख्य व्यवसाय मिळेल अशी त्यांची अनोखी निर्मिती आहे.

    या बँकांवर राज्य सरकार आणि रिझर्व्ह बँक असे दुहेरी नियंत्रण आहे. या दोघांचे नियम त्यांना पाळावेच लागतात. सहकारात नफ्याला फारसे महत्व नाही, तर व्यवसाय म्हटला की नफा हवाच हे रिझर्व्ह बँकेचे धोरण. या दोन्ही गोष्टींचे महत्त्व आता सर्वच बँका जाणत असल्याने आपण कोणत्याही बँकेत व्यवहार करताना आपल्याला फारसा फरक जाणवत नाही.

    सहकारी बँकांचे 11 ते 21 सभासदांचे संचालक मंडळ आणि 5 ते 12 व्यक्तींचे व्यवस्थापन मंडळ वेगळे असावे. समजा 5 व्यक्तींचे व्यवस्थापन मंडळ असेल, तर त्यातील 2 सभासदातून अन्य तीन व्यक्ती त्याची शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि कौशल्य असलेल्या असतील. त्यांची नेमणूक करण्यासाठी मध्यवर्ती बँकेची परवानगी घ्यावी लागेल.100 कोटींहून अधिक ठेवी असलेल्या सहकारी बँकांवर याची सक्ती करण्यात आली आहे. सन 1889 साली बडोद्यात स्थापन झालेल्या अन्योन्य सहकारी सोसायटीपासून आजपर्यंत असा सहकारी बँकिंगचा प्रदीर्घ इतिहास आहे. समाजाच्या विकासाला त्यांनी मोठा हातभार लावला आहे. आज कुटुंबातील एकतरी व्यक्तीचे सहकारी बँकेत खाते असतेच, अशी खाती नसलेली कुटुंबं केवळ अभावानेच असतील.

    saraswatcooperativebank505 120312043948

    लोकांकडून पैसे स्वीकारणे, त्यावर व्याज देणे, गरजू व्यक्तींना पैसे कर्ज स्वरूपात उपलब्ध करून त्यावर व्याज आकारणे, ठेवीची मागणी करणाऱ्यास पैसे ताबडतोब उपलब्ध करून देणे ही बँकेची प्रमुख कामे. ठेवींवर दिलेले व्याज आणि कर्जावर प्राप्त झालेले व्याज यातील फरक हे बँकेचे उत्पन्न असते. ते उत्पन्न मिळवण्यासाठी केलेला खर्च वगळला की बँकेस नफा होतो. याशिवाय ग्राहकांची सोय होईल आणि बँकेस काही उत्पन्न मिळेल असे पूरक व्यवसाय बँका करतात.

    मोठे कर्ज देताना तारण घेतले जाते, तर तारण विरहित कर्ज देताना ते घेणाऱ्यांची कर्ज फेडण्याची क्षमता जोखली जाते. अनेक छोटी तारण विरहित कर्ज समाजातील गरजू लोकांना उपलब्ध करून सहकारी बँकांनी समाजातील अनेक व्यक्तींचा आर्थिक स्तर उंचावला आहे. बहुतेक सहकारी बँका या निष्ठावान समाजसेवकांनी स्थापन केल्या, परंतु यात आर्थिक व्यवहार होत असल्याने राजकारणी व्यक्ती या क्षेत्रात अधिक रस घेऊ लागल्या. त्यांनी आपले नातेवाईक, मित्रमंडळ, समर्थक यांच्या सहाय्याने बँकांबर ताबा मिळवला. त्यामुळे पुढे काही दिवसातच त्या बँकांची ओळख पुसली जाऊन त्या अमुक एक व्यक्तीची किंवा समाज घटकाची बँक म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

    यातील काहींनी अवास्तव कर्जवाटप, वसुलीकडे दुर्लक्ष, पैशांची अफरातफर, खोट्या नोंदी, खोटी कर्जखाती दाखवून अनेक खाती अनुत्पादित केली किंवा बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणून ठेवली. रिझर्व्ह बँकेच्या सुचनेकडे दुर्लक्ष केले. मुदतवाढ घेतली, पण वसुली करू न शकल्याने त्यांचे परवाने रद्द झाले. जोपर्यंत याची झळ मर्यादित घटकांना पोहोचत होती तोपर्यंत सर्वपक्षीय लागेबांधे असल्याने त्यातील चालकांचे फावले आणि त्यांनी बँका स्थापन करून त्याचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी केला.

    अडचणीत आलेल्या बँकेमुळे सर्वाधिक त्रास ठेवीदारांना होतो. ज्या विश्वासाने त्यांनी बँकेत पैसे ठेवलेले असतात त्यास तडा जाऊन आपले पैसे आपल्याला मिळतील की नाही याची काळजी वाटू लागते. आता डीआयसीजीसी कायद्यात सुधारणा करून ठेव विमा संरक्षण ₹ 5 लाख करण्यात आले असून बँक अडचणीत आल्यापासून तीन महिन्यात ठेवीदारांना पैसे दिले जातील अशी स्वागतार्ह तरतूद केली आहे. त्यामुळे बँक पूर्ण बंद होऊन ठेव मिळण्यासाठी वाट पाहावी लागत नाही.

    सन 2019 मधील पंजाब आणि महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्याने देश हादरला. यापूर्वी बुडीत गेलेल्या बँकांच्या तुलनेत ही रक्कम खूप मोठी होती त्यात अनेकजनांचे पैसे अडकले होते. यातून मार्ग काढण्यासाठी बँकिंग नियमन कायद्यात दुरुस्ती करण्यात आली ती सन 2021 पासून लागू होऊन बरेचसे नियंत्रण हे रिझर्व्ह बँकेकडे आले. सहकारी बँकांनी अधिक व्यावसायिकता आणली पाहिजे, नाहीतर ती बँक अन्य सक्षम बँकेत विलीन करण्याचा अधिकार या सुधारणेने रिझर्व्ह बँकेस मिळाला आहे.

    pmc agencies

    सहकार क्षेत्रातील जाणकारांचा त्यास विरोध असून त्या बँका सहकारातच राहाव्यात आणि सरकारी/ खाजगी बँकांना ज्याप्रमाणे मदत केली जाते तशी मदत सहकारी बँकांनाही केली पाहिजे असे त्यांचे मत आहे. बँक कोणतीही असो विकासाच्या दृष्टीने सर्वच बँकांनी आपले यथोचित योगदान देऊन दर्जात सुधारणा केली पाहिजे. ग्राहकांच्या पैशाच्या बळावर त्यांना गाफील ठेवून आपण काही गैरवर्तन तर करीत नाही ना? असा प्रश्न त्यांना पडला पाहिजे. अनेक घोटाळ्यांनी सहकार क्षेत्र बदनाम झाले असून त्याने पुन्हा एकदा आपली विश्वासार्हता मिळवावी यासाठी जोरदार प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

    ©उदय पिंगळे
    अर्थ अभ्यासक

    (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक समजावी.)

  • शेतजमिनीच्या विक्रीचा इन्कम टॅक्स नियम; किती कर भरायचा, पैशांची बचत कशी कराल?

    शेतजमिनीच्या विक्रीचा इन्कम टॅक्स नियम; किती कर भरायचा, पैशांची बचत कशी कराल?

    शेती हा भारतीयांचा पारंपरिक व्यवसाय असून आजही ग्रामीण भागातील मुख्य रोजगार निर्मिती शेती किंवा शेतीशी संबंधित उद्योगातून होते. शेतीमुळे भारतीय लोकांच्या उदरभरणाची सोय होते. ज्या जमिनीत वर्षभरात कोणते ना कोणते पीक घेण्यात येते ती जमीन म्हणजेच शेतजमीन. आयकर कायद्याच्या दृष्टीने शेतजमिनीचे दोन प्रकार आहेत.
    ग्रामीण शेतजमीन
    ◆ शहरी शेतजमीन

    ग्रामीण शेतजमीन: अगदी अलीकडील जनगणनेनुसार (Census 2011) दहा हजार लोकसंख्या असलेल्या शहराच्या हद्दीबाहेर 2 किमी अंतर, दहा हजाराहून अधिक परंतु एक लाखाहून कमी लोकसंख्या असल्यास हे अंतर 6 किमी आणि एक लाखांहून अधिक लोकसंख्या असल्यास 8 किमी परिधाबाहेरील शेतजमीन ही ग्रामीण शेतजमीन समजण्यात येते. हे अंतर मोजताना हवाई अंतराचा (Aerial distance) विचार केला जातो.

    Investing in a plot in Talegaon offers several financial benefits FB 1200x700 compressed

    ● आयकर कायद्यातील कलम 45 नुसार ग्रामीण शेतजमीन ही मालमत्ता समजली जात नसल्याने त्यातून मिळणारे उत्पन्न हे शेतीचे उत्पन्न असल्याने त्यावर कलम 10(1) नुसार कोणतीही करआकारणी केली जात नाही. जर याशिवाय अन्य उत्पन्न असेल तर विवरणपत्र भरताना शेतीपासून मिळालेले उत्पन्न करमुक्त उत्पन्न म्हणून विहित नमुन्यात जाहीर करावे लागते.

    ● या जमिनीच्या विक्रीतून होणारा नफा/तोटा हा भांडवली नफा/तोटा मानला जात नाही. त्यामुळे त्याच्यावर कोणतीही आयकर आकारणी होत नाही. याला अपवाद जमिनीची खरेदी विक्री करणारे व्यापारी, त्याच्या दृष्टीने शेतजमीन ही खरेदी विक्री करण्याची व्यावसायिक वस्तू असल्याने या व्यवहारातून मिळणारे उत्पन्न हे त्यांचे व्यावसायिक उत्पन्न समजून त्यावर करआकारणी केली जाते.

    शहरी शेतजमीन: वर उल्लेख केलेल्या शेतजमिनी व्यतिरिक्त अन्य सर्व शेतजमीन ही शहरी शेतजमीन समजली जाते.

    ● शहरी शेतजमीन ही भांडवली मालमत्ता मानण्यात येते त्यामुळे ती धारण अथवा खरेदी केल्यापासून दोन वर्षांनी विकल्यास त्यातून मिळणारा नफा तोटा हा दीर्घकालीन भांडवली नफा तोटा समजण्यात येतो. त्यावर महागाई निर्देशांकातील फरकाचा लाभ (Indexation benefit) घेता येतो त्यावर 20% या एकाच दराने कर आकारणी केली जाते.

    fcba7005 dc91 4648 bf76 334f396fb905

    ● व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) किंवा त्यातील सदस्य शहरी शेतजमीनीतून मागील दोन वर्षात शेतीचे उत्पन्न मिळवत असतील तर त्यांना सदर जमीन विक्रीतून होणाऱ्या भांडवली नफ्यावरील करातून काही प्रमाणात सूट मिळू शकते.
    * जमीन हस्तांतरित केल्यापासून दोन वर्षांच्या आत नवीन शेतजमीन खरेदी करावी.

    ● करलाभ (54B) मिळवण्यासाठी खरेदी केलेली जमीन त्यापुढील तीन वर्षे विकता येत नाही.

    • विक्री वर्षाचे आयकर विवरण पत्र भरण्यापूर्वी जर शेतजमीन खरेदी करता येत नसेल, तर भांडवली लाभाची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेच्या भांडवली लाभ खात्यात जमा करावी. सदर रक्कम पुढे केव्हाही शेतजमीन खरेदी करण्यासाठी वापरता येईल. या खात्याचे व्याजदर बदलत असतात सध्या यावरील व्याजदर 7.15% प्रतिवर्षं असून व्याज करपात्र आहे. जर दोन वर्षात ही रक्कम वापरता आली नाही, तर ती भांडवली लाभ म्हणून पुन्हा करपात्र होईल.
    • विहित मुदत आणि मर्यादेत ही रक्कम राहते. घर घेण्यासाठी वापरल्यास त्यावर कर द्यावा लागणार नाही (54F), सध्या ही मुदत व्यवहार होण्यापूर्वी एक वर्ष ते व्यवहार झाल्यावर दोन वर्षाच्या आत असून त्याची अधिकतम मर्यादा 10 कोटी रुपये आहे.
    • पन्नास लाख रुपयांच्या मर्यादेतील भांडवली नफा सहा महिन्यांच्या आत मान्यताप्राप्त पायाभूत सुविधा रोख्यात गुंतवली असता त्या रकमेवर कर (54EC) भरावा लागत नाही. हे रोखे पाच वर्ष मुदतीचे असून त्यावर 5.25% व्याज प्रतिवर्षं मिळते. Rural Electric Corporation, Power Finance Corporation, Indian Railway Finance Corporation याचे रोखे वर्षभर आलटून पालटून सातत्याने येत असतात, त्यावर मिळणारे व्याज करपात्र आहे.
    • खरेदी केलेल्या जमिनीची किंमत भांडवली लाभाएवढी किंवा अधिक असल्यास भांडवली लाभ कर द्यावा लागणार नाही.
    • जर लाभ कमी असेल तर लाभातील फरकावर भांडवली लाभ कर द्यावा लागेल.

    शेतजमीन आणि कर यावर सातत्याने विचारले जमणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

    ★ ग्रामीण शेतजमीन हेच माझे उत्पन्नाचे साधन असून माझे इतर उत्पन्न आपले उत्पन्न आयकर मर्यादेहून कमी आहे, तर मला आयकर विवरणपत्र भरावे लागेल का?
    ■ आपले उत्पन्न विवरणपत्र भरण्याच्या सध्याच्या तीन लाख या मर्यादेहून कमी आहे, विक्री केलेली शेतजमीन भांडवली मालमत्ता म्हणून जमजली जात नसल्याने आयकर विवरणपत्र भरण्याची आवश्यकता नाही.

    ★ शहरी शेतजमीन विक्रीतून येणारी रक्कम निवासी घरात गुंतवल्यास आयकरात सवलत मिळेल का?
    ■ हो, यातील गुंतवणूक मुदत आणि मर्यादा यांचे पालन करावे.

    ★ शेतजमीन खरेदी करताना मुळातून कर (TDS) कापून घेतला जातो का?
    ■ शहरी शेतजमीन ही मालमत्ता समजली जात असल्याने पन्नास लाखांवरील व्यवहारावर 1% दराने मुळातून कर (कलम 194IA) कापला जाईल. ग्रामीण शेतजमीन खरेदी करताना असा कर कापला जाणार नाही.

    ★ शेतजमीन विक्री व्यवहार रोख रकमेत करता येईल का?
    ■ आयकर कायद्यातील तरतुदीनुसार (कलम 269ST) दोन लाखाहून अधिक रकमेचा व्यवहार रोख रकमेत करता येत नाही. ही तरतूद सर्व शेतजमीन विक्री व्यवहाराना लागू आहे.

    ★ आयकर कायद्यानुसार शेतजमीन खरेदीसाठी 54B, निवासी घरासाठी 54F आणि पायाभूत सुविधा रोखे 54EC यासाठी मिळणाऱ्या एक वा अधिक सवलती एकाच विक्री व्यवहारासाठी वापरता येतील का?
    ■ कायद्यात वरील प्रत्येक तरतूदी वेगवेगळ्या असून त्यात कोणतीही एक तरतूद एकाच व्यवहारासाठी वापरता येईल असे म्हटले नसल्याने एकाच व्यवहारासाठी एक वा अनेक तरतुदींचा एकत्रित लाभ मिळवण्यास कोणतीही कायदेशीर अडचण नाही.

    ©उदय पिंगळे, अर्थ अभ्यासक

    (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत लेखातील मते वैयक्तिक आहेत)