Tag: naviarthkranti

  • 3 वर्षे शेती करून उभी केली 1200 कोटींची कंपनी जाणून घ्या या “ॲग्री स्टार्टअप” ची कहाणी

    3 वर्षे शेती करून उभी केली 1200 कोटींची कंपनी जाणून घ्या या “ॲग्री स्टार्टअप” ची कहाणी

    अलिकडच्या काळात शेती क्षेत्रात सातत्यानं बदल होत आहेत. अनेक तरुण करिअर म्हणून देखील शेतीकडे पाहू लागले आहेत. बरेचसे शिक्षित तरुण आधुनिक शेतीची माहिती घेऊन शेतीकडे वळत आहेत व पारंपरिक शेतीपेक्षा कित्येक पटींनी अधिक उत्पन्न घेत आहेत. राजस्थानच्या जयपूरमध्ये राहणाऱ्या ऋतुराज शर्मा या 33 वर्षाच्या तरुणाने देखील शेतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. शेतीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधत या तरुणाने करोडो रुपयांची Zettafarms नावाची कंपनी स्थापन केली आहे.  

    गुडगावमध्ये ही कंपनी असून कॉर्पोरेट शेतीमध्ये कार्यरत आहे. कंपनी भाडेतत्त्वावर जमीन घेते आणि त्यात धान्य, फळं आणि भाजीपाला पिकवते. या कंपनीचे संस्थापक ऋतुराज शर्मा यांनी B.Tech आणि MBA केल्यानंतर नोकरीऐवजी स्वत:चं Startup सुरू केलं.  कंपनीचा उद्देश शेती अधिक फायदेशीर बनवणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे आहे. शेतकऱ्यांच्या तांत्रिक आणि आर्थिक समस्या कमी करून आधुनिक शेती पद्धतीचा वापर करून शेतीचे उत्पादन अधिक वाढवणे हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे

    Zettafarms चे काम कसे चालते? 

    Zetta Farms शेतीला एका व्यावसायिक कंपनी प्रमाणे चालवते. एका कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे  फायनान्स, ऑपरेशन्स, IT अशी सर्व खाती या कंपनीत देखील आहेत. मोठ्या प्रमाणावर शेतजमीन भाडेतत्वावर घेऊन सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्यावर शेती केली जाते. कुठले पीक किती प्रमाणात घ्यावे. कुठल्या पिकाला अधिक भाव मिळेल या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच पिके घेतली जातात. शेती करण्यासाठी कंपनीने शेतकऱ्यांनाच नोकरीवर ठेवले आहे, ज्याच्या बदल्यात त्यांना प्रत्येक महिन्याला ठराविक पगार मिळतो. कंपनी कायदेशीर असल्यामुळे शेतकऱ्यांचा PF देखील जमा होतो. याशिवाय कंपनी शेतकऱ्यांना मोफत इन्शुरन्स देखील देते. आज रोजी कंपनीमध्ये जवळपास २९०० कर्मचारी काम करतात.

    Zettafarms चा 15 राज्यांमध्ये विस्तार 

    Zettafarms ही कंपनी करारावर किंवा भाडेतत्त्वावर शेती करते. ज्यामध्ये ते किमान 50 एकर जमीन एका व्यक्तीकडून आणि 100 एकर जमीन एका गटाकडून भाडेतत्त्वावर घेतात. त्यानंतर त्या जमिनीवर ते शेती करतात. झेटाफार्म्स सध्या 15 राज्यांमध्ये 20 हजार एकर जमिनीवर शेती करत असून ६० पेक्षा जास्त पिकांचे उत्पादन घेते. पिकांमध्ये ते गहू, हरभरा, धान, कडधान्ये, भाजीपाला, फळे, चहा आणि कॉफीच्या मळ्यासह सर्व प्रकारची शेती केली जाते.

    ऋतुराजने शेती हा यशस्वी व्यवसाय कसा बनवला?

    ऋतुराज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतीमध्ये व्यवसाय, अर्थशास्त्र, गणित आणि विज्ञान यांचा समावेश केला, तर तो कोणत्याही परिस्थितीत फायदेशीर व्यवसाय आहे. या विचाराने ऋतुराजने शेतीमध्ये पाऊल टाकले. सुरुवातीला ऋतुराजने फक्त 2 एकर शेती करायला सुरूवात केली. हळूहळू भाडेतत्त्वावर आणि करारावर जमीन घेऊन व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. ऋतुराजच्या कंपनीला पहिल्या वर्षी फक्त 1 लाख रुपयांचा नफा झाला, पण नंतर त्यांनी झपाट्याने काम वाढवले. 

    Zettafarms

    Zettafarms चे यशाचे रहस्य काय?

    एका ठिकाणी केवळ एकाच पिकाची शेती हानीकारक असू शकते. या विचारसरणीवर काम करत Zettafarms हे पीक विविधतेवर काम करते. ते वेगवेगळ्या भागात विविध प्रकारची शेती करतात. शेतीसाठी ते नवीन तंत्रज्ञान वापरतात ज्यामध्ये ते माती परीक्षणापासून इतर गोष्टींपर्यंत आवश्यक माहिती गोळा करतात. तंत्रज्ञानामध्ये, ते हवामान apps आणि क्रॉप मॉनिटरिंगसह विविध प्रकारच्या माहितीचे विश्लेषण वापरतात. झेटाफार्म्स गरजेनुसार सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करतात, कुठे ठिबक सिंचनाची गरज भासल्यास तिथेही तेच काम केले जाते. याशिवाय कुठे पाणी कमी असल्यास कमी पाण्यात पिके घेण्याच्या नियोजनावर काम केलं जातं 

    ते संसाधनांचा योग्य वापर करतात. ज्यामुळं उत्पादन वाढते आणि नफाही वाढतो. पीक विविधीकरणाव्यतिरिक्त ते Risk Management वर देखील काम करतात.

    औषधे, खते किंवा किटकनाशके वापरताना ते कीटक व्यवस्थापनाच्या पद्धती देखील अवलंबतात. ज्यामुळं खर्च कमी होतो आणि शेतीमध्ये कमी रसायने वापरली जातात. 

    भविष्यातील वाटचाल : 

    ऋतुराज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतीला ते एक यशस्वी व्यवसाय म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या व्यवसाय मॉडेलद्वारे ते लोकांना सांगू इच्छित आहेत की, शेतीतूनही करोडोंची कमाई केली जाऊ शकते. आयटी, फायनान्स आणि इतर क्षेत्रात काम करणे ज्याप्रमाणे लोक अभिमानाची गोष्ट मानतात, त्याचप्रमाणे लोकांना शेती आणि शेतकऱ्यांबद्दल आदराची भावना निर्माण झाली पाहिजे. 2030 पर्यंत 50 हजार एकरांवर शेती करण्याचे ऋतुराज शर्मा यांचे ध्येय आहे. शेतकरी, जमीनीचे मालक, स्टार्टअप्स, शेती पूरक व्यवसाय आणि शेती उपकरणे पुरवठादार यांना जोडणारे कृषी अर्थव्यवस्थेचे केंद्र बनून झेट्टा फार्म्स कृषी क्षेत्रात स्वतःच्या कार्याने बहुमूल्य योगदान देत आहेत. 

    आणखी वाचा

  • ६ हजार कोटी दान  करणारा अवलिया : कोण आहेत आर. त्यागराजन?

    ६ हजार कोटी दान  करणारा अवलिया : कोण आहेत आर. त्यागराजन?

    आम्ही बोलत आहोत श्रीराम फायनान्स ग्रुपचे संस्थापक आर. त्यागराजन यांच्याबद्दल. आपल्या जीवनाबद्दल अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या आर. त्यागराजन यांची ही कथा यासाठी विशेष आहे की, जगातील अनेक मोठे उद्योगपती आपल्या संपत्तीच्या जोरावर अब्जावधींचे  इमले बांधत असताना, त्यागराजन यांनी जवळपास ६ हजार कोटींची संपत्ती आपल्या कर्मचाऱ्यांना दान करून जगाला एक नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या जीवनप्रवासावर एक नजर फिरवूया.

    कोण आहेत आर. त्यागराजन?

    त्यागराजन यांचा जन्म २५ ऑगस्ट १९३७ मध्ये  चेन्नईमधील (तत्कालीन मद्रास) एका समृद्ध शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी कोलकत्ता येथून भारतीय सांख्यिकी संस्थेतून गणितात पदव्युत्तर पदवी आणि गणितीय सांख्यिकीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. 1961 साली त्यांनी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड या सामान्य विमा कंपनीत प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आयुष्याची जवळ जवळ वीस वर्षं त्यांनी वेगवेगळ्या संस्थामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले. 

    1974 मध्ये,वयाच्या ३७ व्या वर्षी त्यांनी आपल्या काही मित्रांसह सुरुवातीला श्रीराम चिट्स या व्यावसायिक वित्तपुरवठा व्यवसायाची स्थापना केली, पण नंतर त्यांनी कर्ज आणि विम्याच्या दिशेने प्रवास सुरु केला. त्यागराजन यांनी कधीच धाडस आणि नवकल्पना यांची साथ सोडली नाही. त्यांच्या नेतृत्वाखालील श्रीराम ग्रुपने आर्थिक सेवा क्षेत्रात नवीन संधी ओळखून गुंतवणुकीचे नवीन मार्ग शोधले. यामुळे कंपनीच्या व्यवसायात सातत्याने वृद्धी होत राहिली. श्रीराम समूहात आजच्या घडीला 30 हून अधिक कंपन्या आहेत. त्यातील काहींनी शेअर बाजारात मोठा पल्ला गाठला. आजमितीला श्रीराम फायनान्स लिमिटेडचे बाजारातील भांडवल 8.5 अब्ज डॉलर आहे.

    खराब क्रेडीट स्कोर असलेल्यांना दिले कर्ज

    मुख्यतः बॅंका अशा लोकांना कर्ज देण्यास मनाई करतात ज्यांचा क्रेडिट इतिहास खराब असतो किंवा नियमित उत्पन्न  नसतं. पण त्यागराजन यांनी कुठलाही CIBIL (Credit Information Bureau India Limited) चेक न करता या विशिष्ट लोकांना कर्ज प्रदान केलं, एका मुलाखतीत जेव्हा  त्यांना त्यांच्या या धोरणावर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा  त्यांनी एक महत्वपूर्ण दृष्टिकोन व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट केले की, खराब क्रेडिट इतिहास किंवा नियमित उत्पन्न नसलेल्या व्यक्तींना कर्ज देणे जितके धोक्याचे मानले जाते, तितके ते धोकादायक नाही. या मुद्द्याचा सखोल अभ्यास करून त्यांनी फायनान्स क्षेत्रात प्रवेश केला आणि अशा लोकांना कर्ज देणे सामान्य बाब आहे, असं त्यांनी सिद्ध करून दाखवलं.

    त्यांच्या करिअरची सुरुवात एका सामान्य कर्मचाऱ्याच्या भूमिकेत झाली होती आणि  फायनान्स  क्षेत्रात  त्यांच्या दीर्घकालीन अनुभवाने आणि शिक्षणाने त्यांना कर्ज देण्याच्या धोरणावर एक नवा दृष्टिकोन त्यांनी फायनान्स क्षेत्राला  प्रदान केला, ज्यामुळे नंतर या व्यवसायातील  धोरण अधिक सुसंगत व प्रभावी बनण्यास मदत झाली. त्यांचे नेतृत्व हे कर्मचार्‍यांसाठी प्रेरणादायी होते. त्यांनी आपल्या टीमला सदैव प्रोत्साहन दिले. ‘सामान्य माणूस असामान्य गोष्टी करू शकतो’ हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.

    कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये ६ हजार कोटी रुपये केले दान

    त्यागराजन यांनी आपली संपूर्ण संपत्ती कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये समान प्रमाणात वाटून दिली आहे. ६२१० कोटी रुपयांची एकूण संपत्ती कर्मचाऱ्यांमध्ये वाटून देत, त्यांनी फक्त स्वतःजवळ ५ हजार डॉलर्स, घर आणि कार ठेवली होती. त्यांच्या या निर्णयामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये अत्यंत आनंद आणि प्रेरणा निर्माण झाली.

    आर त्यागराजन यांना २०१३ मध्ये भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मभूषण प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या कामामुळे, भारतातील गरिबांना ट्रॅक्टर आणि इतर वाहने खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणारे श्रीराम फायनान्स एक प्रमुख नाव बनले आहे. 

    व्यक्तिगत जीवन

    हजारो कोटींची संपत्ती असलेले आर. त्यागराजन हे अत्यंत साधे जीवन जगतात. ते स्वतःकडे मोबाईल फोन ही  ठेवत नाहीत, कारण त्यांना लोकांशी प्रत्यक्ष कनेक्ट राहायला आवडते. मोबाईल हा अनावश्यक वेळ खातो असं ते म्हणत असतात. “या उद्योजकाचा साधेपणा आणि जमिनीशी असलेली नाळ त्यांच्याशी संवाद साधताच लक्षात येते. त्यांनी आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कंपनीच्या व्यवस्थापन किंवा नेतृत्वाच्या पदावर स्थान दिले नाही. त्यांचा मोठा मुलगा टी. शिवरामन हा एक यशस्वी इंजिनिअर आहे, तर धाकटा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट असून, श्रीराम ग्रुपमध्ये एक सामान्य कर्मचारी म्हणून काम करतो. कुटुंबाचा व्यवसायात हस्तक्षेप नको म्हणून त्यांनी आपली मुल्ये  ठामपणे पाळली आहेत.

    आर. त्यागराजन हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात जी विनम्रता आणि साधेपणा आहे, ती आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहे.

    आणखी वाचा :

  • व्यवसायच का? नोकरदार आणि व्यावसायिक यातील फरक

    व्यवसायच का? नोकरदार आणि व्यावसायिक यातील फरक

    आपापल्या परीने प्रत्येक जण आपल्याला जमेल तसं परिस्थितीचा विचार करून, उपलब्ध संधींचा विचार करून, घरातून मिळणाऱ्या आर्थिक पाठबळाचा विचार करून स्वतःसाठी एखादं करिअर निवडतो आणि त्यामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी, घडविण्यासाठी प्रयत्न करत असतो. या सबंध करिअरच्या प्रवासात बऱ्यापैकी पिढी ही शिक्षण चालू असताना मला शिक्षण झाल्यावर व्यवसाय करायचा आहे, असे म्हणत नाही; तर एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी घ्यायची आणि आयुष्यात स्थिर व्हायचं असं बऱ्यापैकी जणांचं  म्हणणं असतं. 

    प्रत्येक व्यक्तीची जडणघडण ही त्या व्यक्तीला लाभणारे सामाजिक वातावरण, सहवासात येणारी माणसे, घेतलेले शिक्षण, वाचलेली पुस्तके, ऐकलेली भाषणे व चर्चा, आयुष्यात आलेले प्रसंग व या सर्व घटनांना त्या व्यक्तीने दिलेला प्रतिसाद यांच्याद्वारे झालेली असते त्यामुळे प्रत्येकाचे वेगळे विचार, वेगळे व्यक्तिमत्व आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा व्यक्तीपरत्वे बदललेला असतो. 

    मग या दृष्टिकोनामध्ये नोकरीच्या ऐवजी सुरुवातीपासूनच आपल्याला व्यवसायाच करायचा आहे आणि तो का करावा? ही मानसिकता मनाशी पक्की होणं गरजेचं असतं, याच विषयावर आज आपण बोलणार आहोत की व्यवसायच का ?..

    आणि नोकरी का नको ?

    खरंतर सर्वात आधी, मला कुठेतरी माझी फाईल हातात घेऊन कंपन्यांची दारं भटकत नोकरी मागायची नाही; तर चार लोकांना माझ्या माध्यमातून नोकरी देऊन त्या देणाऱ्यांच्या रांगेत मला यायचं आहे, ही भावना मनाशी पक्की होणं ही खूप प्राथमिक पायरी आहे. कोणताही व्यावसायिक हा आधी त्याच्या मनात उद्योजक म्हणून तयार झालेला असतो, मगच तो जगाच्या समोर त्याचा उद्योग, व्यवसाय आणू शकतो. 

    व्यवसायच का ? 

    अतीव समाधान:

    खरंतर जेव्हा आपण कोणतातरी व्यवसाय करतो त्यावेळी तो व्यवसाय म्हणजे लोकांच्या कोणत्यातरी समस्येचं समाधान असतं. लोकांच्या एखाद्या प्रश्नावर आपण उत्तर शोधलेलं असतं. त्यामुळे कोणाचं तरी जगणं आपल्या काहीतरी करण्यातून सुखकर होणं हे समाधान कोणा दुसऱ्यासाठी आठ तासाची नोकरी करून आणि नऊ ते पाचच्या साच्यात स्वतःला बांधून ठेवून कधीच मिळणार नाही.

    आर्थिक सुबत्ता:

    असं म्हटलं जातं की पैसा हे सर्वस्व नाही, पण आजच्या काळात पैशाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही हेही तितकंच खरं आहे. पैसा हे नक्कीच अंतिम साध्य नाही; परंतु आपल्या जीवनाचं अंतिम साध्य साधण्यासाठी पैसा हे नक्कीच एक उत्तम आणि आवश्यक साधन आहे. कुठंतरी नोकरी करत असताना एका ठराविक Limit पर्यंत आपण कमावू शकतो, पगार घेऊ शकतो परंतु एक व्यावसायिक असताना आपल्या उत्पन्नाला कोणतीच मर्यादा राहत नाही. आपण जितकं काम करू, जितके कष्ट करू, जितका स्वतःच्या व्यवसायाला वेळ देऊ, तितकं आपलं उत्पन्न वाढणार यात शंका नाही. आपण आपल्या कुटुंबाच्या गरजा, आपली इतर अपूर्ण स्वप्नं या आर्थिक उत्पन्नातून नक्कीच पूर्ण करू शकतो.

    स्वतःसाठी वेळ :

    आपण जर नोकरी करत असू तर आपल्या नोकरीच्या वेळी आपल्याला त्या ठिकाणी पोहोचणं हे बंधनकारक असतं. आपली कामाची वेळ संपल्याच्यानंतरच आपण तिथून बाहेर पडू शकतो; परंतु व्यवसायात तुम्ही स्वतः मालक असता, तुमच्यासाठी लोक काम करत असतात, त्यामुळे व्यावसायिक कामांचं योग्य नियोजन करून आपल्याला स्वतःला व्यवसायात किती वेळ द्यायचा आहे, स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यासाठी कोणता वेळ राखीव ठेवायचा आहे हे आपण स्वतः ठरवू शकतो.

    Risk Management:

    जेव्हा तुम्ही एक व्यवसायिक असता तेव्हा रोज नवनवीन आव्हानांना, अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागतं या सर्व समस्या व्यवसायाचे मालक म्हणून तुम्हाला स्वतः त्यात लक्ष घालून सोडवाव्या लागतात. अशावेळी कधी कोणता निर्णय घ्यायचा? काय करायचं?  हे सगळं आपल्याला ठरवावं लागतं. तणावपूर्ण परिस्थिती आपल्याला आपल्या पद्धतीनेच हाताळावी लागते. अशावेळी वेगवेगळ्या अनुभवातून शिकत या अडचणींचा कसा सामना करायचा, अवघड परिस्थिती कशी हाताळायची यामुळे नकळत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो आणि अप्रत्यक्षरित्या Risk Management चं महत्त्वाचं तंत्र आपल्याला अवगत होतं. 

    मग आता व्यवसायाच्या बाबतीत एवढ्या सगळ्या सकारात्मक बाबी असतील तर उशीर कशाला ? आजच आपल्या उद्योजकतेच्या प्रवासाला सुरुवात करा. डोक्यात असणाऱ्या कल्पनेला चांगल्या मार्गदर्शकासमोर मांडा, अनुभवी लोकांचे सल्ले घ्या आणि फक्त सुरुवात करा.. समोरची वाट पावलागणिक आपोआप दिसत जाईल.

  • कमी खर्चात सुरू करता येणारे 10 व्यवसाय

    कमी खर्चात सुरू करता येणारे 10 व्यवसाय

    या लेखात आपण असे दहा व्यवसाय पाहणार आहोत, जे कमी गुंतवणुकीत सुरू करता येतात आणि योग्य व्यवस्थापन केल्यास उत्तम नफा मिळवून देऊ शकतात. या व्यवसाय कल्पना तुम्हाला तुमच्या उद्योजकीय प्रवासाला नवी दिशा देण्यास सहाय्यक ठरतील.

    १) फ्रीलान्सिंग

    फ्रीलान्सिंग व्यवसाय म्हणजे आपले कौशल्य आणि सेवांसाठी स्वतंत्रपणे काम करण्याचे तंत्र. यात आपल्याला एका निश्चित नोकरीची गरज नसते; आपण विविध कंपन्यांसाठी, क्लायंट्ससाठी किंवा व्यक्तींसाठी प्रोजेक्ट्स पूर्ण करतो. फ्रीलांसर म्हणून काम करताना, आपल्याला कामाचे वेळापत्रक आणि कामाचे प्रकार स्वतः ठरवता येतात, ज्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य मिळते.

    तंत्रज्ञानाच्या युगात फ्रीलान्सिंग ही एक मोठी संधी आहे. लेखन, ग्राफिक डिझाईन, डिजिटल मार्केटिंग, वेब डेव्हलपमेंट यांसारखी कौशल्ये वापरून आपण फ्रीलान्सिंगद्वारे पैसे कमवू शकतो. यासाठी आपल्याला इंटरनेट कनेक्शन आणि संगणक एवढीच गुंतवणूक लागते.

    २) घरगुती पदार्थ विक्री

    जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल, तर घरगुती पदार्थ विकणे हा उत्तम व्यवसाय ठरू शकतो. घरच्या घरी पदार्थ तयार करून ते ऑनलाइन किंवा ऑफलाइन विकता येतात. यासाठी कमी खर्चात व्यवसाय सुरू करता येतो.

    घरगुती पदार्थ विक्री व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रथम ठरवा की, कोणते पदार्थ विकायचे आहेत; जसे की, चटणी, लोणचं किंवा स्नॅक्स. नंतर FSSAI परवाना मिळवा आणि आवश्यक उपकरणे व कच्चे साहित्य तयार ठेवा. पॅकेजिंग आकर्षक ठेवा आणि उत्पादनांसाठी योग्य किंमत ठरवा. सोशल मीडियावर प्रमोशन करा आणि ऑनलाइन विक्री प्लॅटफॉर्मचा उपयोग करा. सतत गुणवत्ता राखा आणि ग्राहकांच्या फीडबॅकनुसार सुधारणा करा.

    ३) ऑनलाइन ट्यूशन किंवा क्लासेस

    आजकाल ऑनलाइन शिक्षणाची मागणी खूप वाढली आहे. तुमच्या विषयातील कौशल्ये आणि ज्ञानाचा उपयोग करून तुम्ही ऑनलाइन ट्यूशन किंवा कोचिंग क्लासेस घेऊ शकता. यासाठी जास्त खर्च करण्याची गरज नाही.

    या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या विषयांसाठी ट्युशन द्यायची आहे हे ठरवावे लागेल. यासाठी Zoom, Google Meet सारख्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून डिजिटल मटेरियल तयार करणे आवश्यक आहे. उच्च गुणवत्ता शिक्षण पुरवण्यासाठी सखोल विषयज्ञान आणि नियमित वेळापत्रक तयार करावे. व्यवसाय वाढवण्यासाठी सोशल मीडियावर प्रमोशन करणे, फी स्ट्रक्चर फ्लेक्सिबल ठेवणे, जेणेकरून विद्यार्थ्यांना सोयीनुसार फी भरता येईल, शैक्षणिक क्षेत्रातील नवीन ट्रेंड्सवर आधारित शिक्षण पद्धतीत सुधारणा करणे आणि निरंतर अद्ययावत राहणे आवश्यक आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याची क्षमता असलेल्या या व्यवसायात मोठ्या संधी आहेत.

    ४) ब्लॉगिंग आणि यूट्यूबिंग

    ब्लॉगिंग किंवा यूट्यूबिंग हे व्यवसाय आजच्या काळात लोकप्रिय झाले आहेत, ज्यामुळे अनेक लोक आपल्या आवडीनुसार आणि कौशल्यानुसार कमाई करू शकतात. ब्लॉगिंगमध्ये आपल्याला लेखन, माहितीपूर्ण पोस्ट्स, आणि SEO चा वापर करून आपल्या ब्लॉगची लोकप्रियता वाढवावी लागते, तर यूट्यूबिंगमध्ये व्हिडिओ निर्मिती, संपादन आणि सोशल मीडिया प्रमोशन हे महत्त्वाचे घटक आहेत. दोन्ही व्यवसायांमध्ये सातत्य, दर्जेदार कंटेंट, आणि प्रेक्षकांसोबत उत्तम संवाद आवश्यक असतो. कमी गुंतवणूक आणि स्वातंत्र्यामुळे हे व्यवसाय अनेकांसाठी आकर्षक ठरले आहेत, पण यामध्ये वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी मेहनत आणि चिकाटी लागते.

    5) हस्तकला उत्पादन विक्री

    हस्तकला उत्पादन विक्री व्यवसाय हा एक कल्पकता, कौशल्य आणि परंपरेचा संगम असलेला व्यवसाय आहे. या व्यवसायात हाताने तयार केलेली विविध प्रकारची कला आणि हस्तकला उत्पादने विकली जातात, ज्यामध्ये काठ्यांवरील नक्षी, धातू, माती, लाकूड आणि वस्त्रांवरील कलाकुसर अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. स्थानिक कारागीरांच्या कौशल्याचा उपयोग करून तयार करण्यात आलेली ही उत्पादने विशिष्ट ग्राहक वर्गाला आकर्षित करतात. हस्तकला उत्पादने विक्री व्यवसायातून न केवळ आर्थिक फायदा होतो, तर स्थानिक हस्तकला आणि संस्कृतीचा वारसा जपण्याचेही काम होते.

    ६) ऑफलाइन किराणा दुकान

    छोट्या स्तरावर घरगुती वस्तूंचे दुकान उघडून व्यवसाय सुरू करता येतो. आवश्यक वस्तूंची मागणी नेहमीच असते, त्यामुळे यामध्ये कमी गुंतवणुकीत चांगले उत्पन्न मिळू शकते.ऑफलाईन किराणा दुकान व्यवसाय हा एक पारंपारिक पण स्थिर व्यवसाय आहे, जो आपल्या स्थानिक समुदायातील आवश्यक वस्तूंचा पुरवठा करतो. ग्राहकांना दररोजच्या जीवनातील वस्तू सहज उपलब्ध होतात, त्यामुळे स्थानिक किराणा दुकानांना एक स्थिर ग्राहकवर्ग मिळतो. या व्यवसायात, विविध प्रकारच्या वस्तू जसे की अन्नपदार्थ, घरेलू आवश्यक वस्तूंचा समावेश असतो. दुकानातील मर्चेंडाईझिंग, ग्राहक सेवा आणि स्थानिक बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन व्यवसायाचा विकास करणे आवश्यक आहे. या व्यवसायातील यशासाठी, उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांची निवडकता, योग्य स्टॉक व्यवस्थापन, आणि ग्राहकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

    ७) फोटोग्राफी

    जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड आणि कौशल्ये असतील, तर हाही एक चांगला व्यवसाय आहे. सुरुवातीला एका चांगल्या कॅमेरासोबत ही सेवा देऊ शकता. इव्हेंट फोटोग्राफी, प्रोडक्ट फोटोग्राफी किंवा पोर्ट्रेट फोटोग्राफीद्वारे तुम्ही उत्पन्न मिळवू शकता. फोटोग्राफी व्यवसाय आपल्या क्रिएटिव्ह आणि तांत्रिक कौशल्यांचा उपयोग करून सुंदर आणि संस्मरणीय चित्रे टिपण्यासाठी समर्पित आहे. या व्यवसायात विविध प्रकारच्या फोटोग्राफी सेवांचा समावेश होतो, जसे की; वेडिंग फोटोग्राफी, पोर्ट्रेट फोटोग्राफी, कमर्शियल फोटोग्राफी आणि इव्हेंट फोटोग्राफी. प्रत्येक ग्राहकाच्या आवश्यकता आणि अपेक्षांनुसार, फोटोग्राफर विविध शैली आणि तंत्रांचा वापर करून त्यांच्या दृश्यांना प्रभावशाली आणि अनोख्या स्वरूपात टिपण्याचा प्रयत्न करतो. फोटोग्राफीच्या व्यवसायात क्रिएटिव्हिटी, अचूकता, आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान महत्वाचे असते, जे क्लायंट्सना अत्यंत उत्कृष्ट परिणाम देण्यास मदत करते.

    ८) ड्रॉपशीपिंग

    ई-कॉमर्समध्ये ड्रॉपशीपिंग हा कमी खर्चात केला जाणारा व्यवसाय आहे. यात तुम्ही कोणताही स्टॉक न ठेवता थेट सप्लायरकडून ग्राहकांपर्यंत उत्पादने पोचवता. यासाठी तुम्हाला ऑनलाइन स्टोअर आणि मार्केटिंगवर भर द्यावा लागतो. ड्रॉपशिपिंग व्यवसाय म्हणजे एक प्रकारची रिटेल पद्धत आहे, जिथे विक्रेते उत्पादनांचा स्टॉक ठेवत नाहीत. ग्राहक ऑर्डर दिल्यावर, विक्रेता थेट उत्पादक किंवा होलसेलरकडून उत्पादन खरेदी करतो आणि ते ग्राहकाच्या पत्त्यावर पाठवतो. यामुळे विक्रेत्याला मोठ्या प्रमाणावर स्टॉक खरेदीची आवश्यकता नसते.  .

    ९) फ्लॉवर बुकिंग आणि डेकोरेशन

    फुलांचे बुके तयार करणे, कार्यक्रमांसाठी डेकोरेशन करणे ही कामे कमी गुंतवणुकीत करता येतात. यासाठी सुरुवातीला काही मटेरियल आणि सजावटीच्या वस्तूंची आवश्यकता असते. हा व्यवसाय विशेषतः विवाह, समारंभ, आणि इतर खास प्रसंगांसाठी आकर्षक आणि कलेची भव्यता आणण्यासाठी प्रसिद्ध आहे. या व्यवसायात, विविध प्रकारच्या फुलांचे रंग आणि प्रकार निवडून ग्राहकांच्या अपेक्षांनुसार सुंदर आणि आकर्षक डेकोरेशन तयार केली जाते. या सेवेत फुलांच्या बुकिंगची प्रक्रिया, स्थानिक  फुलांची उपलब्धता, कस्टमायझेशनसाठी विविध पर्याय, तसेच देखावे सजवण्यासाठी आवश्यक सामग्री आणि व्‍यावसायिक अनुभव यांचा समावेश असतो. ग्राहकांच्या खास इच्छांना अनुरूप असलेल्या डेकोरेशनच्या योजना तयार करून, या व्यवसायाने मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे.

    १०) फूड स्टॉल व्यवसाय

    फूड स्टॉल व्यवसाय म्हणजे कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा एक उपयुक्त आणि फायदेशीर व्यवसाय. यामध्ये, स्ट्रीट फूड, फास्ट फूड आणि स्थानिक चव असलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवता येतात. व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य ठिकाण, स्वादिष्ट पदार्थ आणि ग्राहकांसोबत उत्तम संवाद या गोष्टींवर भर देणे आवश्यक असते. तसेच, स्वच्छता आणि आकर्षक स्टॉल व्यवस्थापनामुळे ग्राहकांचा विश्वास मिळवता येतो. मार्केटिंगसाठी सोशल मीडियाचा वापर करून व्यवसायाला अधिक प्रसिद्धी देता येते, ज्यामुळे व्यवसायाची वाढ जलद होऊ शकते.

    आणखी वाचा

  • अशोक लेलँड : भारतीय वाहतूक क्षेत्राचा कणा | The Ashok Leyland Story

    अशोक लेलँड : भारतीय वाहतूक क्षेत्राचा कणा | The Ashok Leyland Story

    भारतात व्यावसायिक वाहने म्हटली की, पहिल्यांदा आठवण होते अशोक लेलँडची. मग ते ट्रक असू दे किंवा बस, अशोक लेलँड ही एक अशी कंपनी आहे जी भारतीय वाहतूक क्षेत्राचा कणा बनली आहे. टाटानंतर भारतातील दुसरी सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या अशोक लेलँडने आज केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही आपला ठसा उमटवला आहे. बस आणि ट्रक निर्मितीमध्ये जगातील अव्वल कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या अशोक लेलँडने तिच्या प्रवासात अनेक ऐतिहासिक टप्पे पार केले आहेत.

    भारतात स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी विविध उद्योगांची स्थापना करण्यात आली. यामध्ये उद्योग, तंत्रज्ञान आणि परिवहन क्षेत्रात विशेष प्रगती झाली. याच महत्त्वाच्या विकासपर्वात “अशोक लेलँड”ने भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात क्रांती घडवली. 1948 साली आजच्या दिवशी या कंपनीची स्थापना झाली होती. त्याचं अनुषंगाने आज या लेखात आपण अशोक लेलँडच्या आतापर्यंच्या प्रवासाचा आढावा घेऊ. 

    स्थापना आणि प्रारंभिक काळ

    7 सप्टेंबर 1948 रोजी, चेन्नई येथे रघुनंदन सरन यांनी अशोक मोटर्सची स्थापना केली. ‘अशोक’ हे नाव त्यांचा मुलगा अशोक सरन यांच्या नावावरून ठेवण्यात आले, सुरुवातीला या कंपनीत ऑस्टिन मोटर्सच्या गाड्यांचे उत्पादन केले जायचे. 

    1950 साली अशोक मोटरने ब्रिटिश लेलँड कंपनीशी करार केला, ज्यामुळे कंपनीचे नाव ‘अशोक लेलँड’ झाले. हा करार फक्त नावापुरता नव्हता, तर दोन्ही कंपन्यांच्या तंत्रज्ञानाचा संगम होता. ब्रिटिश तंत्रज्ञान आणि भारतीय बाजारपेठेची गरज यांचा समन्वय अशोक लेलँडने साधला आणि भारतीय व्यावसायिक वाहन क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाला. 

    स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारताला वाहतूक व्यवस्थेची अत्यंत गरज होती, कारण देशाची अर्थव्यवस्था विकासाच्या टप्प्यावर होती आणि औद्योगिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल करत होती. अशोक लेलँडने या गरजेची जाणीव ठेवून व्यावसायिक वाहतूक साधनांची निर्मिती सुरू केली. सुरुवातीला त्यांनी मालवाहतूक ट्रक्स आणि प्रवासी बस यांचे उत्पादन केले. यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे कंपनीने 6-सिलेंडर इंजिनयुक्त ट्रकची निर्मिती करून भारतीय रस्त्यांवर विश्वासार्हता निर्माण केली. यामुळे अशोक लेलँडने स्वदेशी ऑटोमोबाइल क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण केली.

    उत्पादनातील नाविन्य आणि विकासाचा प्रवास

    1950 आणि 60 च्या दशकात अशोक लेलँडने आपल्या उत्पादनात नाविन्य आणण्यास सुरुवात केली. 1954 साली अशोक लेलँडने आपल्या एन्नोर प्लांटमध्ये पहिला ट्रक तयार केला. ‘कॉमेट 350’ नावाचा हा ट्रक, मंगळूरच्या एका टाइल फॅक्टरीला विकला गेला होता. या क्षणापासून भारतात व्यावसायिक ट्रक निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यावेळी भारतात फक्त परदेशी कंपन्यांचे ट्रक उपलब्ध होते, पण अशोक लेलँडने स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ट्रक निर्माण करून भारतीय ग्राहकांना एक नवीन पर्याय दिला.

    अशोक लेलँड : भारतीय वाहतूक क्षेत्राचा कणा | The Ashok Leyland Story

    त्यानंतर भारत सरकारने अशोक लेलँडला दरवर्षी 1000 ट्रक तयार करण्याचा परवाना दिला आणि या उत्पादनाने भारतीय बाजारपेठेत कंपनीचे स्थान अधिकच मजबूत केले. कंपनीचे ट्रक केवळ भारतीय बाजारातच नव्हे, तर इतर काही देशांमध्येही निर्यात होऊ लागले. अशोक लेलँडच्या यशस्वी प्रवासात भारतीय सुरक्षादलांसाठी वाहनांची निर्मिती हे महत्त्वाचे योगदान होते. 1960 च्या दशकात BSF (सीमा सुरक्षा बल) आणि इतर सुरक्षा दलांसाठी वाहनं तयार करून कंपनीने देशाच्या संरक्षण यंत्रणेतील आपला वाटा उचलला.

    1960 च्या दशकात अशोक लेलँडने भारतीय बस क्षेत्रातही क्रांती घडवून आणली. 1967 साली कंपनीने पहिली ‘डबल डेकर बस‘ बाजारात आणली. यापूर्वी, डबल डेकर बस केवळ युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेतील काही ठराविक शहरांमध्येच पाहायला मिळायच्या. भारतात ही संकल्पना नवीन होती, पण अशोक लेलँडने स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ही बस तयार करून भारताच्या मोठ्या शहरांमध्ये चालू केली.

    मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यासारख्या शहरांमध्ये डबल डेकर बसने लोकांची प्रवाशांच्या प्रवासाचे व्यवस्थापन सुलभ झाले. आजही या शहरांमध्ये डबल डेकर बसची सेवा दिसून येते. 

    तंत्रज्ञानात सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय विस्तार

    1969 साली अशोक लेलँडने आपली आणखी एक महत्त्वाची कामगिरी केली. कंपनीने आपल्या ट्रक आणि बसमध्ये ‘पॉवर स्टीअरिंग‘ तंत्रज्ञानाचा वापर केला. त्या काळात हे तंत्रज्ञान खूपच आधुनिक आणि नवीन मानले जायचे. पॉवर स्टीअरिंगमुळे वाहन चालवणे खूप सोपे झाले, विशेषतः जड वाहने चालवताना ड्रायव्हर्सला अधिक आराम मिळाला. या तंत्रज्ञानामुळे अशोक लेलँडने भारतीय व्यावसायिक वाहन निर्मितीच्या तंत्रज्ञानात नवा मापदंड प्रस्थापित केला.

    1970 आणि 80 च्या दशकात अशोक लेलँडने तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या. 1980 च्या दशकात त्यांनी BS-II इंधन मानकांनुसार ट्रक्स तयार करण्यास सुरुवात केली. तंत्रज्ञानात सतत सुधारणा करण्याची कंपनीची भूमिकाही या काळात दिसून आली. याच काळात कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश केला आणि मध्य पूर्व, आफ्रिका, आशिया आदी देशांमध्ये आपल्या वाहनांची निर्यात सुरू केली.

    1980 साली कंपनीने आपला दुसरा प्लांट होसूर, तमिळनाडूमध्ये सुरू केला. या प्लांटमुळे मोठ्या प्रमाणात वाहने तयार करण्याची क्षमता वाढली. यामुळे कंपनीने मोठ्या आणि जड वाहनांच्या निर्मितीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याचवेळी कंपनीने मल्टी-एक्सेल ट्रक आणि मोठ्या बस तयार करण्यास सुरुवात केली.

    कंपनीने तामिळनाडूमधील नामक्कल येथे देशातील पहिल्या व्यावसायिक वाहन ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली. यामुळे व्यावसायिक वाहन चालवणाऱ्या ड्रायव्हर्सना उत्तम प्रशिक्षण मिळाले आणि भारतीय बाजारपेठेत कंपनीची प्रतिष्ठा वाढली. 

    1990 च्या दशकात भारताच्या उदारीकरणाच्या धोरणामुळे देशातील ऑटोमोबाइल क्षेत्रात स्पर्धा वाढली. परंतु अशोक लेलँडने आपल्या उत्पादनांची गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन कायम ठेवला, ज्यामुळे स्पर्धेचा सामना करण्यास ते सक्षम झाले. याच काळात त्यांनी ‘स्टारलाइन’ बस सादर केली, जी भारतीय बस निर्मिती क्षेत्रातील एक मोठी क्रांती ठरली.

    2007 पासून हिंदुजा समूहाची मालकी 

    2007 मध्ये, हिंदुजा समूहाने अशोक लेलँडमधील इवेकोचा (इंडस्ट्रियल व्हेईकल्स कॉर्पोरेशन) अप्रत्यक्ष हिस्सा विकत घेतला, इवेको ही इटालियन कंपनी आहे जिची स्थापना 1975 मध्ये झाली होती. हिंदुजा समूहाने याच कंपनीचा हिस्सा विका घेतला. आणि त्यांचा हिस्सा  51% वर पोहोचला आणि आज अशोक लेलँड ही हिंदुजा समूहाची एक प्रमुख कंपनी बनली आहे.

    भविष्यात अशोक लेलँड उत्तर प्रदेशात इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांचे उत्पादन करणारा एक प्लांट उभारणार आहे. या प्लांटची  उत्पादन क्षमता प्रत्येक वर्षी 2,500 वाहने एवढी असेल आणि पुढील दशकात ती 5,000 पर्यंत वाढवण्याची योजना आहे. या प्लांटमध्ये मुख्यतः इलेक्ट्रिक बस चे  उत्पादन होईल आणि ते 2025 मध्ये सुरू होईल

    आजची स्थिती आणि रोजगार निर्मिती

    आज कंपनी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे, ज्यामध्ये ऑटोमोबाईल्स, व्यावसायिक वाहने, इंजिन, सेवा आणि वाहन वित्तपुरवठा यांचा समावेश आहे. २०२४ मध्ये कंपनीने ₹ ४५,९३१ कोटी (US$५.५ अब्ज) महसूल मिळवला. कंपनीच्या एकूण मालमत्तेची किंमत ₹ ६७,६६० कोटी (US$८.१ अब्ज) आहे. २०२० पर्यंत कंपनीत ११,४६३ कर्मचारी कार्यरत होते, आज हा आकडा वाढला आहे.

    अशोक लेलँड आज फक्त भारतापुरती मर्यादित नाही. आफ्रिका, युरोप, आशिया आणि मध्य-पूर्वेतही कंपनी आपली उत्पादने निर्यात करत आहे. या देशांमध्ये अशोक लेलँडच्या वाहनांना प्रचंड मागणी आहे. 

    अशोक लेलँडचा प्रवास म्हणजे भारतीय औद्योगिक प्रगतीचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यानंतर सुरू झालेली एक छोटीशी कंपनी आज जागतिक व्यावसायिक वाहन क्षेत्रात एक महत्त्वाचे नाव बनली आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीपासून ते उत्पादन क्षमतेपर्यंत अशोक लेलँडने भारतीय वाहन निर्मिती क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे. 

    आणखी वाचा :

  • How to start your own blog? : स्वत:चा ब्लॉग कसा सुरू करावा?

    How to start your own blog? : स्वत:चा ब्लॉग कसा सुरू करावा?

    ब्लॉग म्हणजे काय ? 

    साध्या सरळ भाषेत सांगायचे झाले, तर ब्लॉग म्हणजे आपले ज्ञान (विचार, कला) इंटरनेटद्वारे इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्याचा वापर केला जातो. त्यालाच ब्लॉग असे म्हणतात. 

    आपल्याला विशिष्ट प्रकारची माहिती शोधायची असेल, तर इंटरनेट हे सर्वात जलद माध्यम आहे. त्याचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेदेखील आहेत. यात एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे वेळ. आपणही वेळेसाठी बांधील असतो आणि प्रत्येकाला फक्त आणि फक्त २४ तास आहेत. मग त्या वेळेचं योग्य व्यवस्थापन व्हावं असं प्रत्येकाला वाटतं ना. मग जिथे जिथे वेळ वाचवता येईल तिथे आपण नक्कीच प्रयत्न करतो. 

    अशा वेळी बऱ्यापैकी वाचक वर्ग कमी वेळात हवी असणारी माहिती एका ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतो. या वाचक वर्गाचा विचार करून आपण निश्चितपणे स्वत:चा ब्लॉग लिहिण्याचा विचार करु शकतो. ब्लॉग लिहायला सुरुवात करण्यासाठी काही प्राथमिक गोष्टींचा अभ्यास करणं सुरुवातीला अपेक्षित असतं. यात सर्वात आधीची आणि महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आवड. आपल्याला लिहिण्याची आवड आहे का ?

    स्वतःचा ब्लॉग सुरु करण्याची अनेक कारणे असू शकतात जसे की, आपल्याजवळ एखादे कौशल्य असेल किंवा आपल्याला एखादी गोष्ट उत्तमरित्या जमत असेल तर किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल लोकांना सांगायचे असेल तर आपण मायक्रो ब्लॉगच्या मदतीने ब्लॉग सुरु करू शकतो आणि सहज लोकांपर्यंत माहिती देखील पोहोचवू देखील शकतो. ब्लॉग सुरू करण्यासाठी ब्लॉगर.कॉम किंवा वर्डप्रेस.कॉम या वेबसाईटचा वापर करता येतो.

    How to start your own blog? : स्वत:चा ब्लॉग कसा सुरू करावा?

    स्वत:चा ब्लॉग सुरू करण्याच्या प्राथमिक पायऱ्या : 

    1.  ब्लॉगचा विषय निवडणे

    ब्लॉग तयार करण्यासाठी सर्वात आपल्याला नक्की कोणत्या विषयावर व्यक्त व्हायचं आहे हे आधी ठरवणं अत्यावश्यक ठरतं. ब्लॉगचा विषय निवडणे महत्वाचे आहे, आपल्याला एखाद्या विषयाची आवड असेल, तर आपण ब्लॉगचा विषय निवडून लेखन केले, तर नक्कीच आपल्या ब्लॉगवर वाचक आकर्षित होतील यात शंका नाही. आपल्या आवडीसंदर्भात, कृती संदर्भात किंवा एखाद्या ठिकाणा संदर्भात ब्लॉगचा विषय निवडावा.

    2.  वेबसाईट डिझाईन

    वेबसाईट डिझाईन हे ब्लॉगचे स्वरूप ठरविते, ब्लॉग किती Professional आहे ते Web Design वरुन कळते. जेवढी आकर्षक वेबसाईट डिझाईन असेल तेवढी लोक जास्त प्रतिसाद देतील, म्हणून वेब डिझाइन सुंदर व आकर्षक असायला हवी. 

    3. डोमेनचे नाव निवडणे

    डोमेन नेम हा वेबसाईटचा पत्ता (Address) आहे, जो लोक आपल्या वेबसाइटला भेट देण्यासाठी Browser च्या URL मध्ये टाईप करतात. डोमेन निवडताना आपला ब्लॉग कशा संदर्भात आहे, त्या संदर्भात डोमेन निवडावेत. डोमेन नाव निवडताना ते लांबलचक नसावे, आणि उच्चार करण्यास सोपे असावे.

    4. Unique Content 

    स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करत असताना कंटेंट अतिशय महत्वाचा भाग आहे. आपला ब्लॉग समजायला सोपा असावा, जास्त किचकट लिहू नये. आपण जेवढा विस्तृत ब्लॉग लिहणार तेवढाच जास्त वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळणार आहे. 

    ब्लॉग सुरू करण्यासाठी पैसे लागतात का?

    नाही, ब्लॉग सुरु करायचा असेल, तर आपण मोफत आणि सशुल्क या दोन्ही माध्यमातून ब्लॉग सुरु करू शकतो. जर आपल्याला मोफत म्हणजेच विनामूल्य ब्लॉग सुरु करायचा असेल, तर आपण ब्लॉगर किंवा वर्डप्रेस या साईटच्या साहाय्याने मोफत ब्लॉग बनवू शकतो. जर सशुल्क ब्लॉग सुरु करायचा असल्यास आपल्याला डोमेन आणि वेब होस्टिंग खरेदी करावी लागेल.  

    आणखी वाचा :

  • शिक्षक दिन 5 सप्टेंबरला का साजरा करतात? | Why Teachers Day Celebrated On 5th September

    शिक्षक दिन 5 सप्टेंबरला का साजरा करतात? | Why Teachers Day Celebrated On 5th September

    प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाची भूमिका ही अनन्यसाधारण महत्त्वाची असते. एखादी व्यक्ती जेव्हा यशस्वी होते, तेव्हा तिच्या मागे नेहमी कोणत्या-न-कोणत्या मार्गदर्शकाचा हात असतो, भूमिका असते. हा मार्गदर्शक म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्याला वळण देणारा, चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायला शिकवणारा शिक्षक.

     भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. हा स्मरणोत्सव आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती (दुसरे राष्ट्रपती), भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. देशाच्या शिक्षणाला आकार देण्यात त्यांनी कायम मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या योगदानामुळे अनेकांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली आणि म्हणूनच ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन सबंध देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. 

    खरंतर चांगल्या शिक्षकाचा सन्मान हा त्या संस्कृतीचा आणि त्यांच्याकडे असलेल्या अगाध ज्ञानाचा सन्मान असतो. कोणत्याही समाजाचा विकास होण्यासाठी शिक्षकाची भूमिका देवदूतासारखी असते. एक चांगला शिक्षक हजारो चांगले विद्यार्थी घडवू शकतो. हेच चांगले विद्यार्थी पुढे देशाचे सुजान नागरिक बनतात आणि प्रतिनिधित्व करतात. एक चांगला माणूस घडण्यासाठी त्यामागे एक चांगला शिक्षक कायम उभा असतो. 

    शिक्षकांचा सन्मान करण्याची शिक्षक दिनाची ही परंपरा तशी जुनीच. 

    शिक्षक म्हणजे काय? 

    शि म्हणजे शील 
    क्ष म्हणजे क्षमा
    क म्हणजे कला

    ज्याच्याकडे शील, क्षमा आणि कला यांचा त्रिवेणी संगम आहे तो म्हणजे शिक्षक. शिक्षक हे एका अर्थाने भावी पिढीला घडविणारे शिल्पकारच आहेत. आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने जीवनातील अंधार दूर करणारे मार्गदर्शकच. चुकल्यावर रागावणारेही शिक्षकच आणि पाठीवर कौतुकाची थाप मारणारेदेखील तेच. आपल्यापेक्षाही जास्त आपल्याला ओळखणारे आपले शिक्षक. आपल्यातील चांगल्या गुणांची पारख करून आपल्याला योग्य दिशा दाखविणारे आणि आपल्या जीवनाला ज्ञानाच्या प्रकाशाने तेजोमय करणारे हे आपले शिक्षक. 

    तुम्हाला अजून कोणत्या विषयाची माहिती वाचायला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

  • भारतीय फुटबॉलचा नायक : सुनील छेत्री Real Life Story of Football Legend Sunil Chhetri

    भारतीय फुटबॉलचा नायक : सुनील छेत्री Real Life Story of Football Legend Sunil Chhetri

    यानंतर, जेव्हा भारताचा केनिया सोबत सामना होतो, तेव्हा मैदान हजारो प्रेक्षकांनी गच्च भरलेलं असतं आणि ‘इंडिया इंडियाचा’ जयघोष देत असतं.ते ट्विट होतं नुकत्याच निवृत्ती घेतलेल्या भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीचं. 

    आज आपण याच  “कॅप्टन फॅनटेस्टीक” चा  प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. सुनील छेत्रीचा जन्म ३ ऑगस्ट १९८४ रोजी सिकंदराबाद येथे झाला. लहानपणापासूनच मैदानी खेळांकडे आकर्षण असलेल्या सुनीलने  सुरुवातीला स्पोर्ट कोट्यातून चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा म्हणून हौसेखातर फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली, परंतु फुटबॉलने त्याच्या हृदयात घर केलं आणि मग पुढे त्यानेही स्वतःला या खेळात झोकून घेतलं.

    त्याने आपल्या करिअरची सुरुवात २००२ मध्ये कोलकत्याच्या मोहन  बागान क्लबपासून  केली आणि पुढे आपल्या मेहनतीच्या बळावर 2005 साली पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारतीय संघात पदार्पण केलं. त्याच्या खेळातील कौशल्यांमध्ये कमालीची स्पष्टता होती. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे लवकरच तो  संघातील एक प्रमुख खेळाडू बनला. सुनीलच्या प्रतिभेने भारताला नेहरू कप, SAFF चॅम्पियनशिप, AFC चॅलेंज कपसह अनेक विजय मिळवून दिले. सातत्याने गोल करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे तो जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय गोल स्कोररपैकी एक ठरला.

  • Apple च्या तिजोरीची  चावी भारतीय व्यक्तीच्या हातात;नवीन मुख्य वित्त अधीकारी असणार केवन पारेख

    Apple च्या तिजोरीची  चावी भारतीय व्यक्तीच्या हातात;नवीन मुख्य वित्त अधीकारी असणार केवन पारेख

    52 वर्षीय केवन पारेख यांनी मिशिगन विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे आणि त्यानंतर शिकागो विद्यापीठातून एमबीए केले आहे. ते आता  थेट CEO टीम कुक  यांना रिपोर्ट करणार आहेत आणि त्यांचा Appleच्या टीममध्ये एक महत्त्वाचा सहभाग असेल.

    Apple ने एका आठवड्यात दुसऱ्यांदा व्यवस्थापनात मोठा बदल केला आहे. iPhone 16 लवकरच बाजारात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या व्यवस्थापनामध्ये हे महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

    लुका मेस्त्री यांच्याकडे आता नवीन जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, केवन पारेख यांनी लुका मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. लुका मेस्त्री गेले काही महिने केवन पारेख यांना ऍपलच्या मुख्य आर्थिक अधिकारी (सीएफओ) पदासाठी तयार करत होते.

    पारेख यांनी यापूर्वी ऍपलमध्ये विक्री आणि विपणन विभाग हाताळले आहेत, त्यामुळे त्यांना ऍपलच्या व्यवसायाचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी याआधी थॉमसन रॉयटर्स आणि जनरल मोटर्ससारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी देखील काम केले आहे. रॉयटर्समध्ये त्यांनी चार वर्षे उपाध्यक्ष पदावर काम केले, तर जनरल मोटर्समध्ये बिझनेस ग्रोथ डायरेक्टर म्हणून ते कार्यरत होते.

    ऍपलचे सीईओ टीम कुक यांनी नवीन सीएफओ केवन पारेख यांच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. टीम कुक म्हणाले की, “केवन पारेख हे ऍपलच्या टीमचा महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल.” लुका मेस्त्री यांनी देखील त्यांच्या नवीन जबाबदारीबद्दल उत्साह व्यक्त केला आहे आणि पारेख यांच्या नेतृत्वाखाली कंपनीला यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

    आणखी वाचा