Tag: Motivational Stories

  • उत्तुंग यश मिळवलेल्या नापास मुलाची गोष्ट !

    उत्तुंग यश मिळवलेल्या नापास मुलाची गोष्ट !

    GettyImages 459529302 web 104438

    हळूहळू बार्बराला काळजी वाटायला लागली. कसं होणार आपल्या या मुलाचं? अमेरिकेत म्हणजे, मुलानं लोटून घेतलेलं त्याच्या बेडरूमचं दार (त्याला न विचारता) उघडून आत शिरणं खुद्द त्याच्या आई-वडिलांसाठीही निषिद्ध! शेवटी एके दिवशी बार्बराने लेकाला विचारलं, ‘हे असे तासनतास आत बसून तू काय करतोस?’ तो म्हणाला, ‘लॅपटॉप!’ तेव्हा तिला काय ते कळलं. डेव्हिड रात्रंदिवस त्याच्या लॅपटॉपमध्ये बुडूनच गेला होता जणू. खरंतर त्याला शाळेत जाणंसुद्धा नको वाटे. लहानपणी बर्थडे गिफ्ट म्हणून मिळालेल्या लॅपटॉपशी एकट्यानं झगडून त्यानं बर्‍याच गोष्टी स्वत:च आत्मसात केल्या होत्या. जे समजतं आहे, आवडतं आहे, त्याचा हात धरून पुढे जात राहावं असं त्याला वाटू लागलं होतं. शाळेतल्या भाषा, गणित आणि शास्त्राच्या अभ्यासात त्याचा जीव रमेनासा झाला होता. बार्बरा आपल्या लेकावर लक्ष ठेवून होती. टीनएजर झाल्यावर डेव्हिड जरा खुलला. त्याला मुली आवडायला लागल्या. तो त्यांच्याबरोबर बाहेर जाऊ लागला. पण घरी आला की खोलीचं दार बंद! आणि आतला दिवा रात्रभर जळत!

    davidkarp kbkG

    ‘टोस्टीटोज’ नावाच्या प्रसिद्ध अमेरिकन बिस्किटांचे पुड्यावर पुडे संपवीत डेव्हिड पहाटेपर्यंत आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनला चिकटलेला असे. बार्बराला आपल्या लेकाची तडफड समजत होती. शेवटी एका सकाळी डेव्हिडनं बार्बराला सांगितलं, ‘मॉम, मला शाळेत जाऊन वेळ वाया नाही घालवायचा. मी उद्यापासून जाणार नाही.’ बार्बरानं विचारलं, ‘मग काय करशील?’ तो म्हणाला, ‘मला आवडतं ते काम करीन.’ आपण आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा निर्णय घेतो आहोत, हे तेव्हा बार्बराला ठाऊक असणं शक्य नव्हतं, पण तिनं आपल्या मुलावर विश्‍वास टाकायचं ठरवलं. ती म्हणाली, ‘नको जाऊस शाळेत. तू घरीच कर अभ्यास.’ वयाच्या पंधराव्या वर्षी डेव्हिड ड्रॉप-आऊट झाला, आणि त्यानंतर दोनच वर्षांनी बार्बरा आणि मायकेल यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. एकटीनं दोन टीनएजर मुलांच्या संगोपनाची कसरत बार्बरानं हिमतीनं सुरू केली. तोवर डेव्हिड आसपासच्या छोट्या कंपन्यांच्या वेबसाइट्स डिझाइन करून द्यायला लागला होता. तो एकटाच बाहेर जाई, काम मिळवी आणि एकट्यानंच ते पूर्ण करी. तो झपाटून गेल्यासारखा त्याचं स्वप्न जगू लागला होता. एवढंच फक्त की, त्या स्वप्नात ‘शाळा आणि इतर मुलांसारखा अभ्यास’ या गोष्टींना जागा नव्हती. काय चाललं आहे, हे बार्बराला कळत नव्हतं, पण आपला मुलगा इतर मुलांपेक्षा वेगळा आहे आणि इतरांचं अनुकरण करण्यापेक्षा आपण आपला नवा रस्ता शोधण्यात तो बुडालेला आहे, हे तिला ठाऊक होतं. डेव्हिडनं घरी अभ्यास करून शाळेच्या परीक्षा देणं (होम स्कूलिंग) नाकारलं आणि तो छोट्या (इंटरनेट) स्टार्ट अप कंपन्यांमध्ये कामाला जाऊ लागला.

    GettyImages 1245214756 800x534 1

    एके दिवशी त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, तो म्हणाला, ‘मी जपानला चाललो.’ ’ बार्बरा म्हणाली, ‘तुझ्या आवडीचं काम आहे ना, जरूर जा!’ साठवलेले सगळे पैसे खर्चून त्यानं टोकियोमध्ये एका खोलीचं आगाऊ भाडं भरून टाकलं आणि सॅक पाठीवर मारून निघाला. हा मुलगा घरूनच काम करत असे, त्यामुळे तो कॅलिफोर्नियात नसून जपानमध्ये आहे, हे तो ज्या कंपनीत काम करत होता, त्यांना तब्बल तीन महिन्यांनी कळलं. भरपूर अनुभव कमावून आणि साठवलेले सगळे पैसे खर्च करून डेव्हिड परत आला, तेव्हा त्याच्या खिशात एकूण पंधरा कंपन्यांच्या ऑफर्स होत्या. त्याचं काम सुरू झालं, बार्बरा सांगते, रोज रात्री घरी येताना हा आमच्या अपार्टमेण्टच्या गेटपासूनच जोरात ओरडायला सुरुवात करी, ‘मॉमऽऽऽ यू नो व्हॉट हॅपण्ड टूडे?????’..मग डिनर टेबलवर त्याची बडबड सुरू होई. तो काय म्हणतो, हे मला काहीही कळत नसे, पण तो त्याच्या आवडीचं काहीतरी करतो आहे, हे दिसत असे त्याच्या चेहर्‍यावर आणि तेवढं पुरेसं होतं माझ्यासाठी.’ पालकांसाठी इंटरनेटवर मेसेज बोर्ड लाँच करणार्‍या अर्बनबेबी नावाच्या स्टार्ट अपमध्ये डेव्हिडनं भलतीच चमक दाखवली. त्या बदल्यात पगारासोबत त्याला कंपनीचे काही शेअर्स मिळाले. ही कंपनी टेकओव्हर केली गेली तेव्हा जवळचे शेअर्स विकून डेव्हिडनं पैसा उभा केला आणि आपली स्वत:ची स्वतंत्र कंपनी सुरू केली. त्या कंपनीच्या अनेक प्रॉडक्टमधले नावारूपाला आलेले एक म्हणजे ‘टम्बलर’ ही ब्लॉग्ज होस्ट करणारी साइट! हे चालू होतं तोवर पंचविशी उलटली तरी ग्रॅज्युएशन सोडा, साधं हायस्कूलही पूर्ण न केलेल्या आपल्या मुलाचं बरं चाललं आहे, इतपत खात्री बार्बराला वाटत होती. अन पंधरा दिवसांपूर्वी डेव्हिड आनंदानं उड्या मारत घरी आला आणि ओरडून म्हणाला, ‘मॉमऽऽऽ यू नो, व्हॉट हॅपण्ड टूडे?????’ बातमी होतीच तशी! याहू या बलदंड कंपनीनं डेव्हिडचे टम्बलर हे अत्यंत लोकप्रिय पोर्टल विकत घेण्यासाठी तब्बल १.१ बिलियन अमेरिकन डॉलर्स मोजले होते आणि त्यातले २५0 मिलियन डॉलर्स व्यक्तिगत डेव्हिडच्या खिशात पडले होते !!!!!

    ही बातमी जाहीर होताच डेव्हिड आणि त्याची मॉम एकदम प्रकाशात आले. ’आय अँम द प्राऊडेस्ट मॉम टूडे’ – न्यूयॉर्क टाईम्स या वर्तमानपत्राला मुलाखत देताना बार्बराला याहून वेगळं काही सुचतच नव्हतं,’’मी काही केलं नाही त्याच्यासाठी.. फक्त त्याला स्वत:ला जे करायचं होतं ते त्याला करू दिलं. त्याच्या वाटेत आले नाही, हेच काय ते माझे कर्तृत्व – बार्बरा पुन:पुन्हा हेच सांगते आहे सगळ्या प्रसारमाध्यमांना. तिचा डेव्हिड सव्वीसावे वर्ष ओलांडता ओलांडता केवळ मिलेनिअर बनला आहे एवढंच नव्हे, तर त्याच्या व्यावसायिक आयुष्यात त्यानं जगाला थक्क करून टाकणारं यशही मिळवलं आहे.

    हे नेमकं कसं झालं, हे बार्बराला अजूनही उमगत नाही….!

    • Gunvant Sarpate

    आणखी वाचा

  • शिक्षण अर्धवट राहिलं, पण स्वप्नं पूर्ण केली! देशातील पहिला केबल टीव्ही चॅनेल सुरु करणाऱ्या सुभाष चंद्रांची कहाणी

    शिक्षण अर्धवट राहिलं, पण स्वप्नं पूर्ण केली! देशातील पहिला केबल टीव्ही चॅनेल सुरु करणाऱ्या सुभाष चंद्रांची कहाणी

    The Dropout Who Became a Billionaire: Subhash Chandra's Journey to Success

    हरियानाच्या आदमपूर शहरात, १९५० साली एक सर्वसाधारण व्यापारी कुटुंबात जन्म झाला सुभाष चंद्रा गोयल यांचा. लहानपणापासूनच कौटुंबिक दुकानात हातभार लावत कष्टाचे संस्कार व कौटुंबिक व्यावसायिकतेचे धडे घेतले. सुभाष चंद्रा अर्धवट शिक्षण घेऊन घराबाहेर पडले, तेच मुळी उराशी आणखी एक स्वप्न घेऊन. नोकरी करायची नाही तर काहीतरी उद्योग धंदाच करायचा. त्या दिशेने त्याने पावले टाकायला सुरुवात केली. ऐन तिशीत असताना ते एका पॅकेजिंगच्या औद्योगिक प्रदर्शनाला गेले. तेव्हाच त्यांच्या मनात आपणही पॅकेजिंग कंपनी सुरु करायची असा विचार आला. देशात त्याकाळी ॲल्युमिनिअम ट्यूबची चलती होती. पण भविष्यात ॲल्युमिनिअम नव्हे, तर लॅमीनेटेड ट्यूबची चलती असेल हे हेरून त्यांनी एस्सेल प्रोपॅक नावाने कंपनी सुरु केली. टूथपेस्ट, औषधे, सौंदर्य प्रसाधने, अन्न पदार्थ आणि दैनंदिन वापराच्या वस्तूसाठी आवश्यक अशा पॅकिंगची निर्मिती त्यांनी सुरु केली. आशियातील ती सर्वाधिक मोठी कंपनी तर आहेच, पण जगातली ती दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. 2019 मध्ये द ब्लॅकस्टोन ग्रुपने कर्जबाजारी एस्सेल ग्रुपच्या मालमत्ता विक्रीदरम्यान कंपनीचे अधिग्रहण केले होते आणि ऑक्टोबर २०२० मध्ये कंपनीचे नाव बदलून ईपीएल लिमिटेड असे करण्यात आले.

    The Dropout Who Became a Billionaire: Subhash Chandra's Journey to Success

    परदेशी पर्यटन करताना एका ॲम्युझमेंट पार्कमध्ये फिरताना त्यांना भारतात आशिया खंडातली सर्वात मोठी मनोरंजन नगरी उभारायची कल्पना सुचली आणि मुंबईजवळ त्यांनी ६४ एकर जागेवर १९८८ मध्ये एस्सेल वर्ल्ड उभे केले. नंतर जवळच वॉटर किंग्डमही उभारले. देशातील लाखो लोक त्यांच्या मनोरंजन नगरीला भेट देतात.

    एकदा ते मुंबईच्या दूरदर्शन केंद्रावर आपल्या मित्राला भेटायला गेला. त्या काळात दूरदर्शनवर केवळ संध्याकाळी काही रटाळ कार्यक्रम असायचे. तेव्हाच त्यांना २४ तास चालणारी वाहिनी काढायची कल्पना सुचली. तेव्हा सर्वच अनुभवी लोकांनी त्यांना वेड्यात काढले. कमावलेले सारे काही ते एका फटक्यात गमावणार असाच त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांचा अंदाज होता, पण सुभाष चंद्रांना स्वतःवर विश्वास होता. त्या क्षेत्रातील कोणताही अनुभव गाठीशी नसताना त्यांनी २ ऑक्टोबर १९९२ रोजी झी टीव्ही हे देशातील पहिलं २४ तास चालणारं टीव्ही चॅनेल सुरु केलं. सुरुवातीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, तरीही सुभाष यांनी जिद्द आणि नावीन्यतेने झी टीव्हीला यशस्वी केले. मनोरंजनापासून बातम्यांपर्यंत विविध प्रकारचे कार्यक्रम, प्रादेशिक भाषांमधील वाहिन्या, तसेच आंतरराष्ट्रीय विस्तार यामुळे ‘झी’ लवकरच घराघरात पोहोचली. नंतर त्यांनी २४ तास बातम्या देणारी झी न्यूझ वाहिनी सुरु केली. आणि मग एकामागून एक प्रमुख भाषेतील वाहिन्या काढायचा सपाटाच लावला. सुभाष चंद्राना प्रचंड यश मिळालं. त्यांच्या त्या एका कल्पनेमुळे देशातील लाखो लोकांना रोजगार मिळाला.

    त्यानंतर सुभाष चंद्रांनी ‘प्ले विन’ लॉटरी नावाने ऑनलाइन लॉटरी सुरु केली. तिलाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. नंतर डिश टीवी, सिटी केबल, फन सिनेमा नावाने चित्रपटगृहंही सुरु केली. गोल्ड रिफायानिंग कंपनीही काढली. डीएनए नावाने इंग्रजी वृत्तपत्र सुरु केले. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातही मुसंडी मारली. हे सर्व व्यवसाय एस्सेल ग्रुपच्या नावाखाली एकत्र आणले. त्यांच्या नेतृत्वाखाली हा समूह भारतातील एक प्रमुख मीडिया घराणे बनले.

    The Dropout Who Became a Billionaire: Subhash Chandra's Journey to Success

    ज्या क्षेत्रात पहिले कोणीही नव्हते त्या क्षेत्रात नव्यानेउद्योग उभारून सुभाष चंद्रांनी जगासमोर एक अचंबित करणार आदर्श उभा केला. देशातील २१ राज्यातील ११ लाख गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी एकल विद्यालय फाउंडेशन स्थापना केलीय. दूरचित्रवाणी क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच इतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांचे कार्य गौरवले गेले.

    2019 मध्ये कर्जफेडीच्या समस्येत अडकलेल्या झी एंटरटेनमेंटच्या दोन स्वतंत्र संचालकांनी एस्सेल ग्रुपच्या इतर कंपन्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने झी एंटरटेनमेंटच्या मुदत ठेवीचा वापर केल्याच्या आरोपाखाली सेबीने त्यांच्यावर कारवाई केली होती. आणि त्यांना संचालक मंडळातून बाहेर पडावे लागले.

    आणखी वाचा

  • सततची टीका आणि मानसिक त्रासाला वैतागलेल्या उद्योजकांसाठी…

    सततची टीका आणि मानसिक त्रासाला वैतागलेल्या उद्योजकांसाठी…

    व्यवसाय का बंद केला विचारले तर म्हणाला, त्याच्या बरोबरचे मित्र चिडवतात. डिप्लोमा इंजिनियर असूनही कुरिअर चालवतो. वेळ पडली तर स्वतः डिलिव्हरी करत हिंडतो. मामा तर म्हणाला, “चांगली नोकरी करायची सोडून लोकांची दारं पुजत फिरतो. भिकेचे डोहाळे लागलेत याला.” आई काही बोलत नाही, पण नुसती रडत असते. मी व्यवसाय नाही, तर काही गुन्हा करतोय असे सगळे वागत होते. व्यवसायाच्या सुरुवातीच्या दिवसात कमावलेले सगळे पैसे पुन्हा व्यवसायातच पुन्हा गुंतवावे लागतात, पण हे सांगून कुणालाही कळत नव्हते. शेवटी बंद केले सगळं आणि सरळ ही नोकरी धरली. पण इथेही लक्ष लागत नाही. नुसती घुसमट होतेय. हे सगळ बोलताना अगदी गुदमरला होता तो. मी थोडा वेळ त्याची सांत्वना केली व निरोप घेतला. त्या रात्री मलाही झोप आली नाही. प्रताप सारखे असे अनेक युवक असतील. स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपडत असतील.

    5fea602f 91d0 42f4 8535 de04ed987ef9

    मोठ्ठा उद्योजक व्हायचे ध्येय उरी बाळगून प्रामाणिक प्रयत्न करत असतील. पण जवळच्या लोकांच्या टीका, उद्योगात सतत मिळणारे rejections आणि मानसिक त्रासाला वैतागून स्वतःचे स्वप्न विसरून समाजाला मान्य असणाऱ्या सरळ रस्त्याने आयुष्य जगायला लागत असतील.

    तसं टीका आणि नकार हे उद्योजकांसाठी काही नवी बाब नाही. अगदी प्रत्येक उद्योजकाला याला सामोरे जावे लागते, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. आणि अनेक उद्योजकांनी, व्यावसायिकांनी याला सामोरे जाण्याचे मार्ग ही शोधले आहेत. पण नवीन उद्योजकांना ते माहित नसतात आणि मग प्रताप सारखा अनेकांचा बळी जातो. प्रतापला टीकांना आणि नकाराला सामोरे कसे जावे सांगायचे होते, पण त्या वेळी तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि ते ठिकाणही नव्हते. वेळही निघून गेली होती. मला एका गोष्टीची खात्री मात्र आहे. प्रताप नोकरी जास्त दिवस करू शकणार नाही. त्याच्यातला उद्योजक पुन्हा उफाळून येईल आणि पुन्हा तो स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करेल. पण बराच वेळ आणि संधी या प्रवासात वाया जाईल. उद्योग, व्यवसाय करु पाहणाऱ्या अनेक प्रतापांचे नुकसान होऊ नये म्हणून हा एक छोटासा प्रयत्न.

    १. टीकेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला.

    f1c5b05750bb268f099363284743283d 1

    उद्योजक मित्रांनो शेजारील चित्रात कोणाला जख्ख म्हातारी दिसत असेल, तर कुणाला २० वर्षाची तरुणी. चित्र एकच आहे, पण आपण त्या चित्राकडे कसे पाहतो त्यावर आपल्याला काय बोध होतो ते ठरते. याचाच अर्थ असाही होतो की, आपण जे पाहतो ऐकतो, त्याचा आपण कसा अर्थ लावतो, त्यावर त्या घटनेचा आपल्यावर काय परिणाम होईल हे ठरते. उद्योग करत असताना आपल्यावर टीका करणारे बहुतेक आपले आप्तेष्ट किंवा मित्रपरिवारांपैकी असतात. या व्यक्ती जेव्हा तुमच्या स्थितीकडे पाहतात, तेव्हा ते बाहेरून स्थितीकडे पाहत असतात. तुमची आणि त्यांची परिस्थिती कडे पाहण्याची दिशा परस्पर विरोधी असल्याने, बाहेरून आत पाहणाऱ्यांना जे दिसते आणि तुम्ही ज्याठिकाणी उभे राहून पाहता तिथून तुम्हाला दिसणारे दृश्य (Vision ) यात बराच फरक असतो. आणि खरं म्हणजे तुमच्या स्वप्नाबद्दल सर्वात महत्वाच मत जर कुणाचं असेल, तर ते फक्त तुमचाच असू शकतं.

    इतरांच्या नकारार्थी टिप्पण्या ह्या त्यांच्या मर्यादांचे प्रतिबिंब असते, तुमच्या नव्हे. दुसरा महत्वाचा भाग असा की टीका टिप्पणी करणाऱ्यांचा हेतू काय आहे हे ही जाणून घेणे गरजेचे आहे. कुणी तुमच्यावरील अति लोभामुळे आणि काळजीपोटी बोलत असेल, तर कुणी तुमच्याबद्दल असणाऱ्या मत्सरामुळे बोलत असेल. इंग्रजीत एक नवीन शब्द आला आहे Frenimy म्हणजेच मित्राच्या रूपातील वैरी. दोन्हीही परिस्थितीत जर टीका टिप्पणीला घाबरून अथवा वैतागून, जर तुम्ही चुकीचे पाऊल उचलले, तर एक तर आप्तेष्टांचे व स्वतःचे नुकसान कराल किंवा वैऱ्याला अपेक्षित कृती कराल.

    f16f4603 1cff 41ad 9615 399fdf9077b9

    २. तुम्ही परिपूर्ण (perfect) नाही याची जाणीव बाळगा.

    “Nobody is perfect, if you think you are perfect then you are Nobody”

    प्रत्येक व्यक्ती मध्ये दोष असतात त्या प्रमाणे तुमचेही काही दोष असू शकतात. स्वप्नवेडे होऊन मार्गक्रमण करताना स्वतःच्या दोषांकडे दुर्लक्ष होण्याची दाट शक्यता असते. अशावेळेला आपल्यावर होणाऱ्या टीका आणि rejections आपणास आपल्या दोषांची जाणीव करून देऊ शकतात. थोडेसे सिंहावलोकन (Introspection) केल्यास आपणास हे दोष जाणवतात आणि एकदा जाणीव झाली की ते सुधारणे सोपे होते. त्यामुळे टीकांना नकारार्थी घेण्याऐवजी त्यातून सुधारण्याचे धडे शिकणे अधिक फायदेशीर ठरेल. बऱ्याचदा टीकांच्या रुपात आलेल्या सुधारणेच्या सूचना परिस्थितीमुळे लगेच अंगीकारणे शक्य नसते. पण आपणास या सुधारणा करायच्या आहेत हा विचार मनात ठेऊन केलेला प्रवास जास्त यशस्वी ठरतो.

    24cef172 2a8a 4db0 897b a080429edfa8

    ३. सगळ्याच गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नसतात.

    अनेकदा सिलेक्टिव्ह लिसनिंग चा वापर अनेक यशस्वी लोकं करतात. याचाच अर्थ आपणास उपयुक्त गोष्टी ऐकणे वर त्यावर अंमलबजावणी करणे आणि ज्या गोष्टी नको असतील त्यांना ऐकणे पण दुर्लक्षित करणे. या युक्तीचा वापर केल्याने आपण स्वतःला निराशेपासून तर वाचवतोच पण अनेक वेळा वादही टाळता येतात. निराशेत अथवा वादावादीत वाय जाणारा वेळ व शक्ती वाचते. अनेकदा एखादी टीका अथवा नकार आपणाला मिळाली की आपण लगेच त्यावर प्रतिक्रिया देतो अथवा तसा सातत्याने प्रयत्न करतो. अनेक अशा परिस्थिती असतात ज्यांचे उपाय काही वेळ जाऊ दिल्यास आपोआपच होतो.

    मित्रांनो या जगात काही वेगळं करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना नेहमीच टीकांना आणि नकारांना सामोरे जावे लागले.

    जे. के. रोलिंग, हॅरी पॉटरची सुप्रसिद्ध लेखिकेला पहिले पुस्तक प्रकाशित होण्याआधी १२ वेळा नाकारला सामोरे जावे लागले. संत ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना अनेक टीका सहन करतच जगाला ज्ञानेश्वरी द्यावी लागली. संत तुकारामांची गाथा इंद्रायणीत बुडवली गेली. त्यामुळे टीकांना आणि नकारांना घाबरून जाऊ नका. जागरूकपणे जर या टीकांचा स्वीकार करून सुधार घडवले, तर तुमचे स्वप्न सत्यात उतरवणे शक्य आहे

    तुमच्या स्वप्नांसाठी हार्दिक शुभेच्छा

    आणखी वाचा

  • ‘ज्या शेतात आई शेतमजूर म्हणून काम करत होती, ती शेती मी विकत घेतली’ : उद्योजक अशोक खाडे

    ‘ज्या शेतात आई शेतमजूर म्हणून काम करत होती, ती शेती मी विकत घेतली’ : उद्योजक अशोक खाडे

    वडील चर्मकार. आई, बहीण दुसऱ्याच्या शेतात काम करीत…कधी-कधी आम्हा भांवडांनाही कामाला जावं लागायचं…..आयुष्यानं दिलेल्या चटक्‍यांच्या आठवणी अशोक खाडे सांगत होते…””सातवीपर्यंत पेडला शिक्षण झालं. पुढील शिक्षणासाठी तासगावला बोर्डिंगमध्ये राहायला लागलो. मी शिकावं म्हणून वडील व मोठ्या भावाचा जीव तुटायचा. माझ्या शिक्षणासाठी घरचे किती कष्ट घेतायेत, याची जाणीव असल्यानं रात्र-रात्र झोप लागायची नाही. बोर्डिंगला पोटभरीचं जेवण मिळायचं नाही. पण मोठं व्हायचं स्वप्न असल्यानं कोणतीही तक्रार नव्हती.

    dalit articleLarge v2 1

    सन 1972 ला चांगल्या गुणांनी अकरावी झालो. त्या वर्षी मोठा दुष्काळ पडला. अंगात घालायला कपडेच नाही, तर पायताण कोठून येणार. आम्हाला शिकविणारे देसाई सर कळवळले. त्यांनी शर्ट व पायजमा घेऊन दिला. अकरावीच्या ऐन परीक्षेला पेनची निफ तुटली. जोशी सरांनी अडचण समजून घेत निफ आणून दिली. साठ टक्के गुण पडले. आज माझ्याकडे हजारो रुपयांचा पेन आहे; परंतु अकरावीतील “त्या’ पेनची किंमत कशालाही नाही. आजही माझ्याकडे तो पेन आहे. वडील बोर्डिंगवर आम्हाला भाकरी घेऊन यायचे आणि म्हणायचे, “राजांनो, गरिबी आणि दुष्काळ मी आणला नाही. तुम्ही धीर सोडू नका. माळावर जोपर्यंत पळस आहे तोपर्यंत आपल्याकडे गरिबी आहे, असे समजू नका. खूप शिका.’ वडिलांचे शब्द काळजाला भिडले,” खाडे म्हणाले.

    खाडे कुटुंबीयांनी सन 1975 ला मुंबई गाठली. वैद्यकीय शिक्षण घ्यावे अशी माझी इच्छा होती, असे सांगून खाडे म्हणाले, “”रोजीरोटीसाठी आम्ही तिघेही भाऊ माझगाव डॉकमध्ये नोकरी करायला लागलो. मी डिझाइन विभागात होतो. मोठ्या भावाच्या आग्रहामुळे इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. नोकरी आणि शिक्षण दोन्ही सुरू झाले. सन 1983 मध्ये कंपनीच्याच कामासाठी जर्मनीला जाण्याची संधी मिळाली. नवीन उमेद निर्माण झाली होती. गरिबी तर टोचत होतीच, स्वतःचे काही तरी करायचा ध्यास घेतला. त्यातून सन 1992 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला. अन्य भावांनीसुद्धा राजीनामा दिला. तिघेही एकत्र राहत होतो आणि घरात एक प्रकारचे इंजिनिअरिंगचेच वातावरण होते. गरिबीत आयुष्यभर जगण्यापेक्षा थोडेच आयुष्य जगू; परंतु ते चांगले असेल असा ध्यास घेऊन “दास ऑफशोअर‘ची निर्मिती झाली. मराठी माणूस, त्यातही खाडे आडनाव म्हटल्यावर कोण काम देणार, हा प्रश्‍न होताच. त्यामुळे तिघा भावांच्या नावांची आद्याक्षरे घेऊन (दत्तात्रय, अशोक आणि सुरेश) कंपनीला “दास’ नाव दिले. नावसुद्धा “के. अशोक’ असे सांगायचो. पहिले काम माझगाव डॉकमध्येच मिळाले. मुंबईतील पहिला स्कायवॉक बांधला. मग मागे वळून पाहिले नाही.”

    “दास’ कंपनीने ओएनजीसी, ब्रिटिश गॅस अशा नामवंत कंपन्यांसाठी भरसमुद्रात प्रकल्प बांधणीचे काम केलेय. या समूहाच्या इंजिनिअरिंग, डेअरी, ऍग्रो प्रॉडक्‍ट्‌स, रस्ते बांधणी, उड्डाणपूल अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत सात कंपन्या आहेत. अबुधाबीचे प्रिन्स शेख महमंद बिन खलिफा बिन झायर अल नयन यांच्याबरोबर व्यावसायिक भागीदारी केल्याचे खाडे अभिमानाने सांगतात.

    navbharat times 102749902 1

    वारकरी वृत्तीचे असलेले खाडे यांचा ज्ञानेश्‍वरीवर गाढा विश्‍वास. जमशेठजी टाटा, मदर तेरेसा हे त्यांचे आदर्श. एक रुपयातील एक भाग समाजासाठी, एक भाग देवासाठी, एक भाग कामगारांसाठी आणि उर्वरित भाग स्वतःसाठी अशी त्यांनी उत्पन्नाची वाटणी केलीय. वर्षभर बीएमडब्ल्यूमध्ये फिरणारे खाडे पंढरीची पायी वारी करतात. ज्या चित्रा टॉकीज जवळील झाडाला टेकून वडील गटई काम करत होते, त्या झाडाला समोरून जाताना न चुकता नमस्कार करतात. खाडे यांनी मास्टर इन फिलॉसॉफी पूर्ण केले असून, संत ज्ञानेश्‍वर महाराजांवर पीएचडी करण्याचा विचार आहे.

    “दुसऱ्यांवर केलेले उपकार तळहातावर लिहिण्यापेक्षा तळपायावर लिही, की जे फक्त मातीच वाचू शकते’ हे समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे शब्द खाडे यांनी मनात कोरले आहेत.

    मराठी असल्याचा त्यांना प्रचंड अभिमान आहे. ‘माझ्या कंपनीत चेहऱ्यावर चिंता असलेला एक ही कर्मचारी दिसणार नाही. ज्या शेतात माझी आई शेतमजूर म्हणून काम करत होती, ती शेती मी विकत घेतली आहे. ज्या गावात दगडू चांभाराचा मुलगा अशी ओळख होती, ते गाव आता “आबा’ म्हणून ओळखत आहे. आजही आम्ही भाऊ एकत्र कुटुंब म्हणून राहतो. एकत्र कुटुंबात जी ताकद आहे, ती कशातच नाही. त्या भक्कम आधारामुळेच आम्ही आयुष्यात काही तरी करू शकलो.”

    अशोक खाडेंचा “गुरुमंत्र’
    “जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट’ हे ब्रीद लक्षात ठेवा.
    कष्ट करा. प्रामाणिक कष्टांचे फळ नक्की मिळेल.
    आईवडिलांना, समाजाला कधी विसरू नका.

    आणखी वाचा