Tag: entrepreneurship

  • व्यवसायासाठी भगवद्गीतेतून शिकण्यासारखे धडे

    व्यवसायासाठी भगवद्गीतेतून शिकण्यासारखे धडे

    आज आपण या लेखात पाहूया की, भगवद्गीतेतील हे तत्त्वज्ञान आपल्याला व्यवसायाच्या यशासाठी कसे मार्गदर्शन करते.

    १) निष्काम कर्मयोग – कार्यावर लक्ष केंद्रित करा,

    भगवद्गीतेच्या अध्याय २, श्लोक ४७ मध्ये भगवान  श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात

    “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

    मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥”

    याचा अर्थ असा की, माणसाचा अधिकार फक्त कर्मावर असतो, फळावर नाही. आपण कर्म करताना फळाची अपेक्षा करू नये आणि फक्त आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडावे.

    व्यवसायाच्या संदर्भात, या श्लोकाचा असा अर्थ लागू होतो की उद्योजकाने नेहमी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावं, नफ्यावर किंवा यशावर नाही. जर एखादा उद्योजक नेहमी फक्त परिणामांवरच लक्ष केंद्रित करतो, तर तो आपल्या कामातून आनंद घेण्यास अपयशी ठरतो. उलट, जर आपलं ध्येय, उद्दिष्ट आणि कार्यप्रणाली यावर लक्ष केंद्रित केलं, तर यश नक्कीच प्राप्त होईल.

    २)  त्याग आणि नेतृत्व

    भगवद्गीतेत त्याग आणि नेतृत्व ह्या दोन्ही गोष्टींना खूप महत्त्व दिलेलं आहे. गीतेच्या १८व्या अध्यायातील श्लोक ९ मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात

    “कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन।

    सङ्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्त्विको मतः॥”

    याचा अर्थ असा आहे की, जे कर्म फक्त कर्तव्य म्हणून केलं  जातं , ज्यात फळाची आसक्ती नसते, तोच सात्त्विक त्याग मानला जातो.

    उद्योजकतेतही, त्याग हा फार महत्त्वाचा घटक आहे. उद्योजकाने केवळ नफ्यावर लक्ष केंद्रित न करता, कर्मचाऱ्यांचे कल्याण, सामाजिक जबाबदारी आणि भविष्यातील उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी समान वेतन धोरण, सामाजिक जबाबदारी कार्यक्रम राबवले आहेत, कारण त्यांनी स्वतःच्या फायद्यापलीकडे पाहण्याची वृत्ती स्वीकारली आहे.

    जेव्हा उद्योजकात त्यागाची वृत्ती निर्माण होते, तेव्हा त्याच्या नेतृत्वगुणांची देखील आपोआप वाढ होते. त्यागाच्या शक्तीमुळे नेतृत्वकर्त्याला केवळ स्वतःच्या लाभाची नव्हे, तर इतरांच्या हिताची देखील जाणीव होते, ज्यामुळे तो अधिक प्रभावी आणि संवेदनशील लीडर होतो. 

    ३)  बदल स्वीकारणे 

    भगवद्गीतेच्या अध्याय २, श्लोक १४ मध्ये, श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात

    “मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः।

    आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत॥”

    या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की, “हे कुंतीपुत्र, या जगात शीत-उष्णता, सुख-दुःख यासारख्या गोष्टी तात्पुरत्या आणि नाशिवंत आहेत. यांचा धैर्याने सामना करावा.”

    ही शिकवण आपल्या दैनंदिन जीवनात तसेच व्यावसायिक क्षेत्रातही महत्त्वाची आहे. कोविड-१९ महामारीसारख्या अनपेक्षित संकटांमुळे अनेक व्यवसायांना फटका बसला, ज्यामुळे त्यांना त्यांच्या  व्यवस्थापनात अनेक बदल करावे लागले. व्यवसायात बदल अपरिहार्य असतात आणि त्यांना सामोरे जाणे आवश्यक असते. जो व्यवसाय या बदलांना स्वीकारतो आणि नवीन संधींचा शोध घेतो, तोच यशस्वी होतो.

    उद्योजकाने नेहमीच नवीन तंत्रज्ञान, नवीन बाजारपेठा आणि बदलणाऱ्या ग्राहकांच्या गरजा यांना स्वीकारण्यासाठी सज्ज असले पाहिजे. जेव्हा आपण संकटांना धैर्याने तोंड देतो आणि त्यांच्यातून शिकतो, तेव्हा आपण यशस्वी होण्याची शक्यता वाढवतो.

    ४) भावनांवर नियंत्रण – शांत मनाने यशस्वी व्हा

    भगवद्गीतेच्या अध्याय ६, श्लोक ५ मध्ये श्रीकृष्ण सांगतात

    “उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्।

    आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः॥”

    या श्लोकाचा अर्थ असा आहे की, व्यक्तीने स्वतःचा आत्मविकास साधावा. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावं, इतरांना दोष देण्याऐवजी स्वतःच्या आत डोकावून पाहणं आवश्यक आहे, कारण सुख-दुःखाची खरी मुळं आपल्या आतच असतात. 

    उद्योजकांसाठी हे शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. व्यवसायात यश मिळवण्यासाठी त्यांना अनेक लोकांशी आणि परिस्थितींशी जुळवून घ्यावं लागतं. यशस्वी होण्यासाठी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. निर्णय घेताना शांत चित्त ठेवून प्रसंगानुरूप विचारपूर्वक पाऊल उचलणं उद्योजकाच्या प्रगतीसाठी उपयोगी ठरतं .

    राग, चिंता, असुरक्षितता यासारख्या भावना उद्योजकाने आपल्यावर हावी होऊ देऊ नयेत, कारण अशा परिस्थितीत घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. शांत आणि संयमी मनाने विचार केल्यास योग्य दिशा ठरवता येते, ज्यामुळे यश प्राप्त होण्याची शक्यता अधिक असते.

    ५) बुद्धीचा वापर 

    अध्याय ३, श्लोक ४३ मध्ये, श्रीकृष्ण सांगतात

    “एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना।

    जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्॥”

    या श्लोकात सांगितलं हे की, आपल्या बुद्धीच्या साहाय्याने कामरूपी शत्रूचा पराभव करावा. व्यवसायात, इच्छांचा प्रभाव अनेक वेळा बुद्धीवर होतो. एक उद्योजक म्हणून आपल्याला आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवून बुद्धीने योग्य निर्णय घ्यावा लागतो. चुकीच्या लोकांना कामावर ठेवणं, चुकीच्या गुंतवणूकदारांची निवड करणं यांसारख्या गोष्टींमुळे मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून, इच्छांवर नियंत्रण ठेवून सत्य आणि योग्य गोष्टींची निवड करणं  आवश्यक आहे.

    ६) निर्णयांवर ठाम रहा – आपल्या कर्तव्याचे पालन करा

    अध्याय १८, श्लोक ४८ मध्ये श्रीकृष्ण सांगतात

    “सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत्।

    सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः॥”

    याचा अर्थ असा आहे की, आपले सहज कर्म, जरी त्यात काही दोष असले तरी, त्याला नाकारता येत नाही. याचा अर्थ, आपल्याला आपल्या कर्तव्याचे पालन करताना किंवा निर्णय घेताना जरी काही अडचणी आल्या  किंवा दोष काही असले तरी त्यांना थांबवू नये.

    उद्योजकतेमध्ये प्रत्येक निर्णयावर काही ना काही दोष किंवा असहमती असू शकते. परंतु, जर तो निर्णय कर्तव्य म्हणून घेतला असेल आणि योग्य हेतूने करण्यात आलेला असेल, तर त्यावर ठाम राहणं आवश्यक आहे. यशस्वी उद्योजक कधीच स्वतःच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करून काम सोडत नाहीत. उलट ते आपल्या निर्णयांवर ठाम राहून आपल्या कर्तव्याचे पालन करतात.

    ७)  नैतिकता

    भगवद्गीतेच्या अध्याय १६, श्लोक ३ मध्ये श्रीकृष्ण सांगतात

    “तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता।

    भवन्ति सम्पदं दैवीमभिजातस्य भारत॥”

    या श्लोकात ‘तेज’, ‘क्षमा’, ‘धैर्य’, ‘शुद्धता’, ‘कोणाबद्दलही शत्रुत्व न बाळगणे’ आणि ‘स्वतःच्या मोठेपणाचा अभिमान न ठेवणे’ यांसारख्या गुणांची महत्ता सांगितली आहे. हे गुण प्रामाणिक आणि गुणी व्यक्तींची लक्षणे मानली जातात. 

    उद्योजकतेत नैतिकतेवर आधारित नेतृत्व असणं खूप महत्वाचं आहे, म्हणजे कर्मचार्‍यांशी आदराने वागणं , सामाजिक जबाबदारीचे पालन करणं आणि कंपनीच्या सर्व निर्णयांमध्ये पारदर्शकता राखणं हेचं यश मिळवण्याचं  मुख्य द्योतक आहेत. \

  • कमी खर्चात सुरू करता येणारे 10 व्यवसाय

    कमी खर्चात सुरू करता येणारे 10 व्यवसाय

    या लेखात आपण असे दहा व्यवसाय पाहणार आहोत, जे कमी गुंतवणुकीत सुरू करता येतात आणि योग्य व्यवस्थापन केल्यास उत्तम नफा मिळवून देऊ शकतात. या व्यवसाय कल्पना तुम्हाला तुमच्या उद्योजकीय प्रवासाला नवी दिशा देण्यास सहाय्यक ठरतील.

    १) फ्रीलान्सिंग

    फ्रीलान्सिंग व्यवसाय म्हणजे आपले कौशल्य आणि सेवांसाठी स्वतंत्रपणे काम करण्याचे तंत्र. यात आपल्याला एका निश्चित नोकरीची गरज नसते; आपण विविध कंपन्यांसाठी, क्लायंट्ससाठी किंवा व्यक्तींसाठी प्रोजेक्ट्स पूर्ण करतो. फ्रीलांसर म्हणून काम करताना, आपल्याला कामाचे वेळापत्रक आणि कामाचे प्रकार स्वतः ठरवता येतात, ज्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य मिळते.

    तंत्रज्ञानाच्या युगात फ्रीलान्सिंग ही एक मोठी संधी आहे. लेखन, ग्राफिक डिझाईन, डिजिटल मार्केटिंग, वेब डेव्हलपमेंट यांसारखी कौशल्ये वापरून आपण फ्रीलान्सिंगद्वारे पैसे कमवू शकतो. यासाठी आपल्याला इंटरनेट कनेक्शन आणि संगणक एवढीच गुंतवणूक लागते.

    २) घरगुती पदार्थ विक्री

    जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल, तर घरगुती पदार्थ विकणे हा उत्तम व्यवसाय ठरू शकतो. घरच्या घरी पदार्थ तयार करून ते ऑनलाइन किंवा ऑफलाइन विकता येतात. यासाठी कमी खर्चात व्यवसाय सुरू करता येतो.

    घरगुती पदार्थ विक्री व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रथम ठरवा की, कोणते पदार्थ विकायचे आहेत; जसे की, चटणी, लोणचं किंवा स्नॅक्स. नंतर FSSAI परवाना मिळवा आणि आवश्यक उपकरणे व कच्चे साहित्य तयार ठेवा. पॅकेजिंग आकर्षक ठेवा आणि उत्पादनांसाठी योग्य किंमत ठरवा. सोशल मीडियावर प्रमोशन करा आणि ऑनलाइन विक्री प्लॅटफॉर्मचा उपयोग करा. सतत गुणवत्ता राखा आणि ग्राहकांच्या फीडबॅकनुसार सुधारणा करा.

    ३) ऑनलाइन ट्यूशन किंवा क्लासेस

    आजकाल ऑनलाइन शिक्षणाची मागणी खूप वाढली आहे. तुमच्या विषयातील कौशल्ये आणि ज्ञानाचा उपयोग करून तुम्ही ऑनलाइन ट्यूशन किंवा कोचिंग क्लासेस घेऊ शकता. यासाठी जास्त खर्च करण्याची गरज नाही.

    या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या विषयांसाठी ट्युशन द्यायची आहे हे ठरवावे लागेल. यासाठी Zoom, Google Meet सारख्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून डिजिटल मटेरियल तयार करणे आवश्यक आहे. उच्च गुणवत्ता शिक्षण पुरवण्यासाठी सखोल विषयज्ञान आणि नियमित वेळापत्रक तयार करावे. व्यवसाय वाढवण्यासाठी सोशल मीडियावर प्रमोशन करणे, फी स्ट्रक्चर फ्लेक्सिबल ठेवणे, जेणेकरून विद्यार्थ्यांना सोयीनुसार फी भरता येईल, शैक्षणिक क्षेत्रातील नवीन ट्रेंड्सवर आधारित शिक्षण पद्धतीत सुधारणा करणे आणि निरंतर अद्ययावत राहणे आवश्यक आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याची क्षमता असलेल्या या व्यवसायात मोठ्या संधी आहेत.

    ४) ब्लॉगिंग आणि यूट्यूबिंग

    ब्लॉगिंग किंवा यूट्यूबिंग हे व्यवसाय आजच्या काळात लोकप्रिय झाले आहेत, ज्यामुळे अनेक लोक आपल्या आवडीनुसार आणि कौशल्यानुसार कमाई करू शकतात. ब्लॉगिंगमध्ये आपल्याला लेखन, माहितीपूर्ण पोस्ट्स, आणि SEO चा वापर करून आपल्या ब्लॉगची लोकप्रियता वाढवावी लागते, तर यूट्यूबिंगमध्ये व्हिडिओ निर्मिती, संपादन आणि सोशल मीडिया प्रमोशन हे महत्त्वाचे घटक आहेत. दोन्ही व्यवसायांमध्ये सातत्य, दर्जेदार कंटेंट, आणि प्रेक्षकांसोबत उत्तम संवाद आवश्यक असतो. कमी गुंतवणूक आणि स्वातंत्र्यामुळे हे व्यवसाय अनेकांसाठी आकर्षक ठरले आहेत, पण यामध्ये वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी मेहनत आणि चिकाटी लागते.

    5) हस्तकला उत्पादन विक्री

    हस्तकला उत्पादन विक्री व्यवसाय हा एक कल्पकता, कौशल्य आणि परंपरेचा संगम असलेला व्यवसाय आहे. या व्यवसायात हाताने तयार केलेली विविध प्रकारची कला आणि हस्तकला उत्पादने विकली जातात, ज्यामध्ये काठ्यांवरील नक्षी, धातू, माती, लाकूड आणि वस्त्रांवरील कलाकुसर अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. स्थानिक कारागीरांच्या कौशल्याचा उपयोग करून तयार करण्यात आलेली ही उत्पादने विशिष्ट ग्राहक वर्गाला आकर्षित करतात. हस्तकला उत्पादने विक्री व्यवसायातून न केवळ आर्थिक फायदा होतो, तर स्थानिक हस्तकला आणि संस्कृतीचा वारसा जपण्याचेही काम होते.

    ६) ऑफलाइन किराणा दुकान

    छोट्या स्तरावर घरगुती वस्तूंचे दुकान उघडून व्यवसाय सुरू करता येतो. आवश्यक वस्तूंची मागणी नेहमीच असते, त्यामुळे यामध्ये कमी गुंतवणुकीत चांगले उत्पन्न मिळू शकते.ऑफलाईन किराणा दुकान व्यवसाय हा एक पारंपारिक पण स्थिर व्यवसाय आहे, जो आपल्या स्थानिक समुदायातील आवश्यक वस्तूंचा पुरवठा करतो. ग्राहकांना दररोजच्या जीवनातील वस्तू सहज उपलब्ध होतात, त्यामुळे स्थानिक किराणा दुकानांना एक स्थिर ग्राहकवर्ग मिळतो. या व्यवसायात, विविध प्रकारच्या वस्तू जसे की अन्नपदार्थ, घरेलू आवश्यक वस्तूंचा समावेश असतो. दुकानातील मर्चेंडाईझिंग, ग्राहक सेवा आणि स्थानिक बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन व्यवसायाचा विकास करणे आवश्यक आहे. या व्यवसायातील यशासाठी, उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांची निवडकता, योग्य स्टॉक व्यवस्थापन, आणि ग्राहकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

    ७) फोटोग्राफी

    जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड आणि कौशल्ये असतील, तर हाही एक चांगला व्यवसाय आहे. सुरुवातीला एका चांगल्या कॅमेरासोबत ही सेवा देऊ शकता. इव्हेंट फोटोग्राफी, प्रोडक्ट फोटोग्राफी किंवा पोर्ट्रेट फोटोग्राफीद्वारे तुम्ही उत्पन्न मिळवू शकता. फोटोग्राफी व्यवसाय आपल्या क्रिएटिव्ह आणि तांत्रिक कौशल्यांचा उपयोग करून सुंदर आणि संस्मरणीय चित्रे टिपण्यासाठी समर्पित आहे. या व्यवसायात विविध प्रकारच्या फोटोग्राफी सेवांचा समावेश होतो, जसे की; वेडिंग फोटोग्राफी, पोर्ट्रेट फोटोग्राफी, कमर्शियल फोटोग्राफी आणि इव्हेंट फोटोग्राफी. प्रत्येक ग्राहकाच्या आवश्यकता आणि अपेक्षांनुसार, फोटोग्राफर विविध शैली आणि तंत्रांचा वापर करून त्यांच्या दृश्यांना प्रभावशाली आणि अनोख्या स्वरूपात टिपण्याचा प्रयत्न करतो. फोटोग्राफीच्या व्यवसायात क्रिएटिव्हिटी, अचूकता, आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान महत्वाचे असते, जे क्लायंट्सना अत्यंत उत्कृष्ट परिणाम देण्यास मदत करते.

    ८) ड्रॉपशीपिंग

    ई-कॉमर्समध्ये ड्रॉपशीपिंग हा कमी खर्चात केला जाणारा व्यवसाय आहे. यात तुम्ही कोणताही स्टॉक न ठेवता थेट सप्लायरकडून ग्राहकांपर्यंत उत्पादने पोचवता. यासाठी तुम्हाला ऑनलाइन स्टोअर आणि मार्केटिंगवर भर द्यावा लागतो. ड्रॉपशिपिंग व्यवसाय म्हणजे एक प्रकारची रिटेल पद्धत आहे, जिथे विक्रेते उत्पादनांचा स्टॉक ठेवत नाहीत. ग्राहक ऑर्डर दिल्यावर, विक्रेता थेट उत्पादक किंवा होलसेलरकडून उत्पादन खरेदी करतो आणि ते ग्राहकाच्या पत्त्यावर पाठवतो. यामुळे विक्रेत्याला मोठ्या प्रमाणावर स्टॉक खरेदीची आवश्यकता नसते.  .

    ९) फ्लॉवर बुकिंग आणि डेकोरेशन

    फुलांचे बुके तयार करणे, कार्यक्रमांसाठी डेकोरेशन करणे ही कामे कमी गुंतवणुकीत करता येतात. यासाठी सुरुवातीला काही मटेरियल आणि सजावटीच्या वस्तूंची आवश्यकता असते. हा व्यवसाय विशेषतः विवाह, समारंभ, आणि इतर खास प्रसंगांसाठी आकर्षक आणि कलेची भव्यता आणण्यासाठी प्रसिद्ध आहे. या व्यवसायात, विविध प्रकारच्या फुलांचे रंग आणि प्रकार निवडून ग्राहकांच्या अपेक्षांनुसार सुंदर आणि आकर्षक डेकोरेशन तयार केली जाते. या सेवेत फुलांच्या बुकिंगची प्रक्रिया, स्थानिक  फुलांची उपलब्धता, कस्टमायझेशनसाठी विविध पर्याय, तसेच देखावे सजवण्यासाठी आवश्यक सामग्री आणि व्‍यावसायिक अनुभव यांचा समावेश असतो. ग्राहकांच्या खास इच्छांना अनुरूप असलेल्या डेकोरेशनच्या योजना तयार करून, या व्यवसायाने मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे.

    १०) फूड स्टॉल व्यवसाय

    फूड स्टॉल व्यवसाय म्हणजे कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा एक उपयुक्त आणि फायदेशीर व्यवसाय. यामध्ये, स्ट्रीट फूड, फास्ट फूड आणि स्थानिक चव असलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवता येतात. व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य ठिकाण, स्वादिष्ट पदार्थ आणि ग्राहकांसोबत उत्तम संवाद या गोष्टींवर भर देणे आवश्यक असते. तसेच, स्वच्छता आणि आकर्षक स्टॉल व्यवस्थापनामुळे ग्राहकांचा विश्वास मिळवता येतो. मार्केटिंगसाठी सोशल मीडियाचा वापर करून व्यवसायाला अधिक प्रसिद्धी देता येते, ज्यामुळे व्यवसायाची वाढ जलद होऊ शकते.

    आणखी वाचा

  • उत्तुंग यश मिळवलेल्या नापास मुलाची गोष्ट !

    उत्तुंग यश मिळवलेल्या नापास मुलाची गोष्ट !

    हळूहळू बार्बराला काळजी वाटायला लागली. कसं होणार आपल्या या मुलाचं? अमेरिकेत म्हणजे, मुलानं लोटून घेतलेलं त्याच्या बेडरूमचं दार (त्याला न विचारता) उघडून आत शिरणं खुद्द त्याच्या आई-वडिलांसाठीही निषिद्ध! शेवटी एके दिवशी बार्बराने लेकाला विचारलं, ‘हे असे तासनतास आत बसून तू काय करतोस?’ तो म्हणाला, ‘लॅपटॉप!’ तेव्हा तिला काय ते कळलं. डेव्हिड रात्रंदिवस त्याच्या लॅपटॉपमध्ये बुडूनच गेला होता जणू. खरंतर त्याला शाळेत जाणंसुद्धा नको वाटे. लहानपणी बर्थडे गिफ्ट म्हणून मिळालेल्या लॅपटॉपशी एकट्यानं झगडून त्यानं बर्‍याच गोष्टी स्वत:च आत्मसात केल्या होत्या. जे समजतं आहे, आवडतं आहे, त्याचा हात धरून पुढे जात राहावं असं त्याला वाटू लागलं होतं. शाळेतल्या भाषा, गणित आणि शास्त्राच्या अभ्यासात त्याचा जीव रमेनासा झाला होता. बार्बरा आपल्या लेकावर लक्ष ठेवून होती. टीनएजर झाल्यावर डेव्हिड जरा खुलला. त्याला मुली आवडायला लागल्या. तो त्यांच्याबरोबर बाहेर जाऊ लागला. पण घरी आला की खोलीचं दार बंद! आणि आतला दिवा रात्रभर जळत!

    ‘टोस्टीटोज’ नावाच्या प्रसिद्ध अमेरिकन बिस्किटांचे पुड्यावर पुडे संपवीत डेव्हिड पहाटेपर्यंत आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनला चिकटलेला असे. बार्बराला आपल्या लेकाची तडफड समजत होती. शेवटी एका सकाळी डेव्हिडनं बार्बराला सांगितलं, ‘मॉम, मला शाळेत जाऊन वेळ वाया नाही घालवायचा. मी उद्यापासून जाणार नाही.’ बार्बरानं विचारलं, ‘मग काय करशील?’ तो म्हणाला, ‘मला आवडतं ते काम करीन.’ आपण आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा निर्णय घेतो आहोत, हे तेव्हा बार्बराला ठाऊक असणं शक्य नव्हतं, पण तिनं आपल्या मुलावर विश्‍वास टाकायचं ठरवलं. ती म्हणाली, ‘नको जाऊस शाळेत. तू घरीच कर अभ्यास.’ वयाच्या पंधराव्या वर्षी डेव्हिड ड्रॉप-आऊट झाला, आणि त्यानंतर दोनच वर्षांनी बार्बरा आणि मायकेल यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. एकटीनं दोन टीनएजर मुलांच्या संगोपनाची कसरत बार्बरानं हिमतीनं सुरू केली. तोवर डेव्हिड आसपासच्या छोट्या कंपन्यांच्या वेबसाइट्स डिझाइन करून द्यायला लागला होता. तो एकटाच बाहेर जाई, काम मिळवी आणि एकट्यानंच ते पूर्ण करी. तो झपाटून गेल्यासारखा त्याचं स्वप्न जगू लागला होता. एवढंच फक्त की, त्या स्वप्नात ‘शाळा आणि इतर मुलांसारखा अभ्यास’ या गोष्टींना जागा नव्हती. काय चाललं आहे, हे बार्बराला कळत नव्हतं, पण आपला मुलगा इतर मुलांपेक्षा वेगळा आहे आणि इतरांचं अनुकरण करण्यापेक्षा आपण आपला नवा रस्ता शोधण्यात तो बुडालेला आहे, हे तिला ठाऊक होतं. डेव्हिडनं घरी अभ्यास करून शाळेच्या परीक्षा देणं (होम स्कूलिंग) नाकारलं आणि तो छोट्या (इंटरनेट) स्टार्ट अप कंपन्यांमध्ये कामाला जाऊ लागला.

    एके दिवशी त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, तो म्हणाला, ‘मी जपानला चाललो.’ ’ बार्बरा म्हणाली, ‘तुझ्या आवडीचं काम आहे ना, जरूर जा!’ साठवलेले सगळे पैसे खर्चून त्यानं टोकियोमध्ये एका खोलीचं आगाऊ भाडं भरून टाकलं आणि सॅक पाठीवर मारून निघाला. हा मुलगा घरूनच काम करत असे, त्यामुळे तो कॅलिफोर्नियात नसून जपानमध्ये आहे, हे तो ज्या कंपनीत काम करत होता, त्यांना तब्बल तीन महिन्यांनी कळलं. भरपूर अनुभव कमावून आणि साठवलेले सगळे पैसे खर्च करून डेव्हिड परत आला, तेव्हा त्याच्या खिशात एकूण पंधरा कंपन्यांच्या ऑफर्स होत्या. त्याचं काम सुरू झालं, बार्बरा सांगते, रोज रात्री घरी येताना हा आमच्या अपार्टमेण्टच्या गेटपासूनच जोरात ओरडायला सुरुवात करी, ‘मॉमऽऽऽ यू नो व्हॉट हॅपण्ड टूडे?????’..मग डिनर टेबलवर त्याची बडबड सुरू होई. तो काय म्हणतो, हे मला काहीही कळत नसे, पण तो त्याच्या आवडीचं काहीतरी करतो आहे, हे दिसत असे त्याच्या चेहर्‍यावर आणि तेवढं पुरेसं होतं माझ्यासाठी.’ पालकांसाठी इंटरनेटवर मेसेज बोर्ड लाँच करणार्‍या अर्बनबेबी नावाच्या स्टार्ट अपमध्ये डेव्हिडनं भलतीच चमक दाखवली. त्या बदल्यात पगारासोबत त्याला कंपनीचे काही शेअर्स मिळाले. ही कंपनी टेकओव्हर केली गेली तेव्हा जवळचे शेअर्स विकून डेव्हिडनं पैसा उभा केला आणि आपली स्वत:ची स्वतंत्र कंपनी सुरू केली. त्या कंपनीच्या अनेक प्रॉडक्टमधले नावारूपाला आलेले एक म्हणजे ‘टम्बलर’ ही ब्लॉग्ज होस्ट करणारी साइट! हे चालू होतं तोवर पंचविशी उलटली तरी ग्रॅज्युएशन सोडा, साधं हायस्कूलही पूर्ण न केलेल्या आपल्या मुलाचं बरं चाललं आहे, इतपत खात्री बार्बराला वाटत होती. अन पंधरा दिवसांपूर्वी डेव्हिड आनंदानं उड्या मारत घरी आला आणि ओरडून म्हणाला, ‘मॉमऽऽऽ यू नो, व्हॉट हॅपण्ड टूडे?????’ बातमी होतीच तशी! याहू या बलदंड कंपनीनं डेव्हिडचे टम्बलर हे अत्यंत लोकप्रिय पोर्टल विकत घेण्यासाठी तब्बल १.१ बिलियन अमेरिकन डॉलर्स मोजले होते आणि त्यातले २५0 मिलियन डॉलर्स व्यक्तिगत डेव्हिडच्या खिशात पडले होते !!!!!

    ही बातमी जाहीर होताच डेव्हिड आणि त्याची मॉम एकदम प्रकाशात आले. ’आय अँम द प्राऊडेस्ट मॉम टूडे’ – न्यूयॉर्क टाईम्स या वर्तमानपत्राला मुलाखत देताना बार्बराला याहून वेगळं काही सुचतच नव्हतं,’’मी काही केलं नाही त्याच्यासाठी.. फक्त त्याला स्वत:ला जे करायचं होतं ते त्याला करू दिलं. त्याच्या वाटेत आले नाही, हेच काय ते माझे कर्तृत्व – बार्बरा पुन:पुन्हा हेच सांगते आहे सगळ्या प्रसारमाध्यमांना. तिचा डेव्हिड सव्वीसावे वर्ष ओलांडता ओलांडता केवळ मिलेनिअर बनला आहे एवढंच नव्हे, तर त्याच्या व्यावसायिक आयुष्यात त्यानं जगाला थक्क करून टाकणारं यशही मिळवलं आहे.

    हे नेमकं कसं झालं, हे बार्बराला अजूनही उमगत नाही….!

    • Gunvant Sarpate

    आणखी वाचा

  • १. नोकरी करावी की व्यवसाय?

    १. नोकरी करावी की व्यवसाय?

    वयाची १८-२२ वर्षे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी का व्यवसाय करावा हा कोड्यात टाकणारा प्रश्न सर्व तरुणांना पडत असतो, कारण आईवडिलांवर अवलंबून राहण्याचे सोडून स्वतःच्या कर्तृत्वाने जगात आपला ठसा उमटवण्याचे हे वय असते. उमेद असते, आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी हवे ते करण्याची तयारी असते; पण आपल्याला काय हवे हे मात्र समजत नाही.

    महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरुन एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर पुढे काय करणार? नोकरी की व्यवसाय? ह्या प्रश्नाला मिळालेली काही उत्तरे.

    • १. नोकरी करणार कारण घरची परिस्थिती व वातावरण व्यवसायाला अनुकूल नाही, शिवाय भांडवलसुध्दा नाही.
    • २. काही काळ नोकरी करणार, मग स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरु करणार आहे. काही दिवस नोकरी केली तर, भांडवल उभारणी करता येईल.
    • ३. व्यवसायच करणार आहे काहीतरी. काहीही झाले तरी व्यवसायच करायचा.

    आता वरील तीनही प्रकारच्या तरुणांच्या मताचे विश्लेषण करुया. पहिल्या प्रकारात एकतर त्या तरुणाला नोकरीच करायची असते, मात्र व्यवसाय न करण्याची काही कारणे तो पुढे करत असतो. नोकरीची सुरूवात सुध्दा अगदी तुटपुंज्या उत्त्पन्नावर होते, मग पुढे त्या उत्त्पन्नात फार वेगाने वाढ होते असेही काही नाही. असे तरुण जीवनभर rat race मध्ये अडकून पडतात. नोकरी, पगार, घर, घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण, आरोग्य असे नेहमीचे प्रश्न सोडवतंच आयुष्य पुढे सरकत असते, त्यात फार उल्लेखनीय असे काही घडत नाही, पण ह्या चक्रात अडकलेला माणूस सहजासहजी बाहेर पडत नाही. हा निर्णय घेण्याची काही कारणे आहेत, त्यामध्ये जोखीम घेण्याचे धाडस नसणे, इच्छाशक्तीचा अभाव व न्यूनगंड ही काही महत्वाची कारणे आहेत, यावर थोड्याफार प्रयत्नांनी मात करता येते.

    दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तींना काही काळ नोकरी करुन भांडवल उभे करायचे असते. काही प्रमाणात उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावायचा असतो. ह्या व्यक्तींना कमी प्रमाणात जोखीम घ्यायची असते. हेही थोड्याफार फरकाने पहिल्या प्रकारच्या व्यक्तीसारखी सुरवात करतात. मग पगार, संसाराचे प्रश्न व कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे rat race मध्ये अडकतात व बाहेर पडायची इच्छा असून बाहेर पडत नाहीत व पहिल्या प्रकारच्या व्यक्तीप्रमाणे यांचेपण आयुष्य फिरत राहते. स्वतः पैसे कमावणे हा भांडवल उभे करण्याचा केवळ एकमेव मार्ग नाही. इतर अनेक मार्गांनी भांडवल उभे करता येते. भांडवल निर्मितीचे इतर मार्ग पुढे आपण पाहणार आहोत. भांडवलाच्या इतर पर्यायांनी जीवनात वेगाने पुढे जाण्याचा मार्ग सापडेल.

    तिसऱ्या प्रकारचे तरुण हे काहीसे ठाम, पण द्विधा मनस्थितीत असतात. या तरुणांना अधिक खोलात जाऊन प्रश्न विचारले तेव्हा समजले की, काहीतरी व्यवसाय करायचा म्हणजे कोणता व्यवसाय करावा याचा पुसटसा अंदाजही यांनी बांधलेला नसतो. इच्छाशक्ती असते मात्र दिशा घ्यायला वेळ लागतो. सांगणारेही कुणी नसतात. मग स्वतःच्या अंदाजावर पुढे जाण्याचा प्रयत्न चालू होतो. हे तरुण खूप काही करण्याची उमेद ठेवतात. पुढे जाऊन त्यांना हवे करुनही दाखवतात.

    मी काही जणांना पाहिजे तेवढे भांडवल देतो, तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहात, असा प्रश्न विचारला की मग त्यांच्याकडे काही उत्तर नसते. भांडवल, मनुष्यबळ, प्रशिक्षण याचा पुरवठा बाहेरुन करता येतो. त्याचे असंख्य मार्गसुध्दा आहेत. व्यवसाय करण्यासाठी लागणारी वृत्ती स्वतःतच असायला हवी किंवा तिची जोपासना स्वतःहून करायला हवी, मग व्यवसाय यशाच्या शिखरावर नेता येईल.

    नोकरी करताना उत्पन्नाच्या, खर्चाच्या मर्यादा पडतात. त्याउलट व्यवसायामध्ये २४ तास झोकून देऊन काम करता येते. शेकडो माणसांना काम देता येते. ती माणसे तुमच्यासाठी काम करत असतात. सुरूवातीची काही वर्षे संघर्ष केला की, मनाप्रमाणे उत्पन्न व पाहिजे तेवढा वेळ व्यवसायातून प्राप्त करता येतो. उत्पन्नात होणारी वाढ ही बांबूच्या रोपट्याप्रमाणे वेगाने होत असते. मनसोक्त जगण्याचा, स्वतःच्या स्वप्नांसाठी काम करण्याचा आनंद घेत व्यवसाय करणे हे नोकरीपेक्षा सरसच.

    भारत हा तरुणांचा देश आहे. जगातील सर्वात जास्त तरुणांचा हा देश म्हणजे प्रत्येकाचे लक्ष आकर्षित करुन घेत असतो, पण इथल्या तरुणाईला या गोष्टीची कितपत जाणीव आहे हे जाणून घ्यावे लागेल. या तरुणाईची अवस्था कस्तुरीमृगासारखी आहे. कस्तुरी ही मृगाच्या नाभीत असते. मृग कस्तुरी शोधण्यासाठी सर्व जंगलभर सैरावैरा धावत असतो, पण त्याला स्वतःच्या नाभीत असलेल्या कस्तुरीची जाणीव कधीच होत नाही. आपल्यातल्या अपार शक्तीची जाणीव फार कमी तरुणांना आहे.

  • Success Story: एका भांडणानं बनवली कोट्यावधींची संपत्ती, वाचा ‘ओला’ कॅब मालकाची प्रेरक कथा

    Success Story: एका भांडणानं बनवली कोट्यावधींची संपत्ती, वाचा ‘ओला’ कॅब मालकाची प्रेरक कथा

    कामानिमित्त प्रवास करायचा तर ऑटो किंवा टॅक्सीने फिरणं आलंच. त्यातच रिक्शा आणि टॅक्सीने प्रवास करायचा तर खासकरून रिक्शा टॅक्सी चालक आणि प्रवासी यांच्यातली भांडणं आपण दररोज ऐकत असतो किंवा वाचत असतो. कधी आपल्याही वाट्याला असे प्रसंग येतात. आपलंही त्यावेळेस डोकं फिरतं, मात्र काही काळ गेला की आपण शांत होतो आणि मग इतरांना त्याचा कसा त्रास होतोय हे वाचतो आणि सोडून देतो. मात्र एका व्यक्तीने त्याला आलेल्या वाईट अनुभवातून योग्य तो धडा घेतला आणि त्यापासून प्रेरणा घेत त्याने चक्क कोट्यावधी रुपयांचं साम्राज्य उभं केलं. ऐकून थोडं विचित्र वाटेल मात्र आयआयटी पदवीधर भावेश अग्रवाल यांचा हा अनुभव तुम्हालाही इंटरेस्टिंग वाटेल.


    अनेकदा टॅक्सीचालक आपल्याला मनमानी भाडं सांगतात. आपण नाईलाज म्हणून ते भाडं देण्यासाठी तयारही होतो. आयआयटी पदवीधर भावेश अग्रवाल आपल्या कामानिमित्त असाच एकदा प्रवास करत असताना टॅक्सीचालकाशी त्यांचं भांडण झालं. भांडणाचं  प्रमुख कारण म्हणजे तो टॅक्सीचालक त्यांच्याकडून जादा भाड्याची मागणी करत होता. 


    मात्र हे भांडण झाल्यावर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं नाही तर देशात लो बजेट फेअर कॅब सर्व्हीसची किती नितांत गरज आहे हे त्यांनी ओळखलं. घरी आल्यावर त्यांनी आपला प्लान कुटुंबाला सांगितला. मात्र ‘आयटीत भरघोस पगाराची नोकरी असताना हे काय मध्येच?’ अशी कुटुंबाची भूमिका होती. भावेश मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी आपली योजना पूर्णत्वास न्यायची असा चंग बांधला. त्यांना त्यांच्या या बिझनेस प्लानमध्ये त्यांचा मित्र अंकीत भाटी यांची साथ मिळाली आणि मग काय, या दोघांनी मिळून बंगळूरूत ‘ओला’ या टॅक्सी व्यवसायाची सुरूवात केली.


    त्यांनी कायम एक खूणगाठ मनाशी पक्की केली होती की काहीही झालं तरीही प्रवाशांना सर्वोच्च सेवा उपलब्ध करून द्यायची. लो फेअर कॅब सर्व्हिसची मुहूर्तमेढ तिथेच रोवली गेली आणि देशात प्रवाशांना आरामदायी आणि खिशाला परवडणारी अशी ‘ओला’ सेवा मिळाली. आज आपल्यापैकी प्रत्येकानं किमान एकदा तरी स्मार्टफोनवरून ही कॅब बुक करून त्याचा आनंद घेतला असेलच.

    किती आहे ओला कॅबचं नेटवर्थ?

    ओलैा कॅबच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झाल्यास हा आकडा आजमितीला 4.8 अब्ज डॉलर्स म्हणजेच 39 हजार 832 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.याशिवाय आता कंपनीने ओला इलेक्ट्रिकल्सच्या नावाने सुरू केलेल्या इ टू व्हिलरलाही पसंती मिळतेय. आज याही कंपनीचं नेटवर्थ साधारणपणे 2 हजार 400 कोटी रुपयांच्या घरात पोहोचलं आहे.