भारतात अनेक उद्योगपती आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीने एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. काहींच्या हातात वारसा संपत्ती नसली तरी, त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कमावले आहे. अशाच एका यशस्वी उद्योगपतीची गोष्ट आज आम्ही सांगणार आहोत, जो मुंबईतील घाटकोपरच्या झोपडपट्टीत राहत होता आणि छोट्या-छोट्या नोकऱ्या करीत जीवनाची गाडी पुढे नेत होता. आज तो दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीयांमध्ये गणला जातो आणि त्यांचा व्यवसाय केवळ दुबईतच नाही, तर इतर अनेक देशांमध्येही पसरलेला आहे.
सुरुवातीचे दिवस आणि संघर्ष
रिझवान साजन यांचा जन्म मुंबईच्या घाटकोपरमधील एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांचं कुटुंब झोपडपट्टीत राहायचे. आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं फार कठीण होत होतं. त्यामुळे, साजन यांनी लहानपणापासूनच कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावण्याचं ठरवलं होतं. त्यांनी शाळेतील पुस्तकं विकणं, सणासुदीच्या वस्तू विकणं, घरोघरी जाऊन दूध विकणं अशी छोटी छोटी कामं लहानपणीच करण्यास सुरुवात केली.
वयाच्या अवघा १६व्या वर्षीच रिझवान साजन एक मोठा धक्का बसला,त्यांच्या वडिलांचं अचानक निधन झालं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण आर्थिक जबाबदारी साजन यांच्यावर आली आणि याचा परिणाम म्हणून त्यांना शिक्षण मधूनच सोडावं लागलं. काही काळ त्यांनी एक छोटा व्यवसाय सुरू केला, ज्यात ते फाईल बॉक्सेस बनवायचे. सुरुवातीला या व्यवसायात थोडंफार यश मिळाले, पण पुरेसं नव्हतं.
कुवेतमध्ये मिळाली सुवर्णसंधी
रिझवान साजन यांचे काका तेव्हा कुवैतमध्ये नोकरी करत होते, कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी साजन यांनी आपल्या काकांकडे कुवेतमध्ये नोकरीसाठी विचारणा केली. त्यांच्या काकांनी त्यांना एका बांधकाम साहित्याच्या दुकानात नोकरी मिळवून दिली. ही संधी साजन यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण वळण ठरली. त्यांनी या नोकरीत एक विक्रेता म्हणून काम सुरू केलं, आणि त्यांच्या मेहनतीने त्यांना त्या ठिकाणी लवकरच व्यवस्थापकाची पदवी मिळाली.
१९९० साली पुन्हा त्यांच्या जीवनाला एक जोरदार धक्का मिळाला . कुवेतमध्ये भीषण आखाती युद्ध सुरू झालं आणि त्यांना कुवेत सोडावं लागलं आणि पुन्हा भारतात परतावं लागलं. परत आल्यावर त्यांनी काही नोकऱ्या करून पहिल्या, पण यश मिळवण्यासाठी त्यांच्या मनात काहीतरी मोठं करण्याची इच्छा होती. काही काळ भारतात राहिल्यानंतर त्यांनी दुबईला जाण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना दुबईत बांधकाम उद्योगात मोठी संधी दिसत होती.
दुबईत ‘डॅन्यूब ग्रुप’ची स्थापना
१९९३ मध्ये दुबईला गेल्यावर रिझवान साजन यांनी ‘डॅन्यूब’ नावाची ट्रेडिंग फर्म सुरू केली. हि कंपनी कुवेतमधून बांधकाम साहित्य खरेदी करायची आणि दुबईमध्ये त्याची विक्री करायची. दुबईमध्ये बांधकाम उद्योगाची प्रचंड वाढ होत होती, आणि त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला जोरदार प्रतिसाद मिळाला. साजन यांच्या सर्जनशील स्वभावामुळे आणि मेहनतीमुळे ‘डॅन्यूब’ ने अवघ्या काही वर्षांतच मोठं यश मिळवलं.
१९९९ पर्यंत ‘डॅन्यूब’ चा वार्षिक महसूल १६ कोटी रुपये झाला होता, आणि ते १ कोटी रुपयांचा नफा मिळवत होते. पण साजन इथेच थांबले नाहीत. त्यांनी बांधकाम साहित्याबरोबरच गृहसजावट, सॅनिटरीवेअर, इलेक्ट्रिकल उपकरणे यांसारख्या विविध क्षेत्रांत विस्तार केला.
रिअल इस्टेटमध्ये पाऊल
२००८ मध्ये जागतिक आर्थिक संकट आलं , पण साजन यांच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही उलट त्यांनी आपला व्यवसाय वाढवण्याचं ठरवलं आणि २०१४ मध्ये ‘डॅन्यूब प्रॉपर्टीज’ नावाची रिअल इस्टेट कंपनी लाँच केली. त्यांचा उद्देश मध्यमवर्गीयांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा होता. ‘डॅन्यूब प्रॉपर्टीज’ ने बाजारात एक क्रांतिकारी योजना आणली — “1% मासिक पेमेंट योजना” या योजनेत खरेदीदारांना घर खरेदीसाठी फक्त 1% रक्कम दरमहा भरण्याची मुभा होती आणि त्यांना घरमालकीचा हक्क मिळत होता.
या योजनेने घर खरेदीदारांसाठी घरमालकीचा मार्ग सोपा केला आणि अल्पावधीतच ‘डॅन्यूब प्रॉपर्टीजचं नाव बाजारात लोकप्रिय झालं. या योजनेमुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळाले आणि २०१६ पर्यंत ‘डॅन्यूब’चा वार्षिक महसूल ९००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. साजन यांनी रिअल इस्टेटमध्ये आपले स्थान मजबुत केलं आणि आज ‘डॅन्यूब ग्रुप’ १६,७०९ कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळवणारी कंपनी आहे. रिझवान साजन यांनी आपल्या अपार मेहनत आणि हुशारीच्या जोरावर ‘डॅन्यूब’ला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं आणि त्यांची उपस्थिती जगभरातील ३० पेक्षा जास्त देशांत आहे.
रिझवान साजन यांची कहाणी ही एका सामान्य माणसाच्या असामान्य संघर्षाची आणि यशाची कहाणी आहे.
मुंबईच्या झोपडपट्टीतून सुरु झालेला हा प्रवास दुबईतील यशाच्या शिखरापर्यंत पोहोचला. त्यांनी कठीण परिस्थितीतही हार न मानता स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांच्या जिद्दीने, मेहनतीने बुद्धिमत्तेमुळे ते आज जागतिक स्तरावर यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात .
जसवंतीबेन जमनादास पोपट, पार्वतीबेन रामदास थोडानी, उमजाबेन नरनदास कुंडालिया, भानूबेन एन.टण्णा, लागूबेन अमृतलाल गोकणी, जयाबेन व्ही. विथालानी आणि दिवालीबेन लुक्का या मुंबईतील ७ बायकांनी एकत्र येत ८० रुपये उसने घेतले आणि सुरू झाला एक ध्येयवेडा प्रवास. स्वत:ला सिद्ध करण्याचा. त्याच प्रवासाची ही यशोगाथा.
साल १९५९. मुंबईतल्या गिरगावमधील एक गुजराती कॉलनी. कॉलनीतल्या ७ गृहिणी दुपारच्या फावल्या वेळेत बसल्या होत्या. वेळेचा सदुपयोग करून काहीतरी गृह उद्योग सुरु करावा असा विचार त्यांच्या डोक्यात सुरु होता. यामागे विचार फक्त एवढाच की वेळही निघून जाईल आणि घरखर्चाला हातभार देखील लागेल. कल्पना सुचली आणि तीला मूर्त रूप देण्यासाठी त्यांनी ठरवलं की घरी बसल्या-बसल्या पापड लाटण्याचा उद्योग सुरु करता येईल. उद्योग तर सुरु करायचा पण, त्यात गुंतवायला काही त्यांच्याकडे पैसे नव्हते.
शेवटी त्या मदतीसाठी ‘सर्वंटस ऑफ इंडिया’ सोसायटीचे अध्यक्ष छगनलाल पारेख यांच्याकडे गेल्या. पारेख यांनी देखील त्यांना निराश केलं नाही आणि त्यांनी या महिलांना ८० रुपये उसने दिले. या पासून त्यांनी तोट्यात गेलेल्या कंपनीकडून जुनी पापड बनवायची मशीन व काही साहित्य खरीदी केले.
यापासूनच १५ मार्च १९५९ रोजी सुरु झाला पापड बेलण्याचा उद्योग, जो पुढे चालून ‘लिज्जत पापड’ म्हणून प्रसिद्धीस पावला. आपल्याला आश्चर्य वाटेल पण उद्योगाची सुरुवात या ७ महिलांच्या घराच्या छतावर करण्यात आली होती. सर्वप्रथम त्यांनी विक्रीसाठी पापड उपलब्ध करून दिले. ते फक्त ४ पॅकेट होते. हळूहळू त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि मग आजूबाजूच्या अनेक महिला देखील त्यांच्या या गृहउद्योगात सामील होऊ लागल्या. तीन महिन्यातच ७ वरून कामगारांची संख्या २५ पर्यंत गेली. तुटलेले पापड या महिला शेजाऱ्यांना मोफत वाटप करत, त्यामुळे शेजारीही सहकार्य करत.
पाहता-पाहता वर्ष सरलं. पहिल्या वर्षांअंती त्यांची उलाढाल होती ६१९६ रुपये. या वर्षभराच्या काळात त्यांच्याशी अनेक महिला जोडल्या गेल्या होत्या. काम जोरात सुरु होतं.
पहिल्या वर्षभरात त्यांना एक महत्वाची अडचण समोर आली होती ती म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांत त्यांना काम बंद ठेवावं लागत असे, कारण पापड वाळतच नव्हते. दुसऱ्या वर्षी मात्र त्यांनी यावर उपाय शोधला. उपाय असा होता की एका पलंगावर त्या पापड वाळत घालत असत आणि खालून स्टोव्हच्या मदतीने उष्णता पुरवीत असत. त्यामुळे ही अडचण देखील दूर झाली होती.
दुसऱ्या वर्षी त्यांच्या सोबत १०० ते १५० महिला जुळाल्या आणि तिसऱ्या वर्षी हा आकडा ३०० पर्यंत पोहचला होता. जागा कमी पडू लागली. घरी बसायला देखील जागा नसे. त्यानंतर त्यांनी सहकारी महिलांना घरून काम करण्याचा सल्ला दिला आणि त्यांच्या पापडाचे वजन मोजून त्यांना पैसे देण्यात येत होते. आज आपण ज्याला ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणतो, म्हणजे घरी बसून काम करण्याच्या संस्कृतीची सुरुवात त्यांच्या उद्योगात झाली. एवढा मोठा महिलांचा गट तयार झाला होता. त्याची नोंदणी देखील करायची होती.
गटाला नेमकं नांव काय द्यावं हे सुचत नव्हतं. मग यावरही एक शक्कल लढविण्यात आली. महिला गटाचं नांव सुचविण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतूनच विजेत्या ठरलेल्या धीरजबेन रुपारेल यांनी सुचवलेलं ‘लिज्जत’ हे नाव गटाला देण्याचं ठरविण्यात आलं.
‘लिज्जत’ या गुजराती शब्दाचा अर्थ ‘चवदार किंवा स्वादिष्ट’ असा. विजेत्या धीरजबेन रुपारेल यांना ५ रुपयांचं बक्षिस देखील देण्यात आलं. जुलै १९६६ मध्ये ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’ हे नाव अधिकृतरीत्या नोंदविण्यात आलं. पापडाची गुणवत्ता उत्तम असल्याने मागणी मोठ्या प्रमाणात वाढत होती आणि प्रसिद्धी देखील मिळत होती. उद्योग भरभराटीस यायला लागला होता. यात भरीस भर म्हणजे खादी ग्रामोद्योग विभागाच्या अध्यक्षांनी या गृह उद्योगात ८ लाख रुपये गुंतविण्याचा निर्णय घेतला.
लिज्जतची गाडी वेगाने चालत होती, ती धावायला लागली. ८० च्या दशकात लिज्जतचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. भारतीय घरांमधल्या किचनमध्ये ‘लिज्जत’ हे न टाळता येण्यासारखं नाव झालं. लिज्जतने ९० च्या दशकात विदेशातही व्यवसाय विस्तारला आणि हि घोडदौड अजूनही सुरु आहे.
आज विदेशामध्ये देखील लिज्जतची वेगळी ओळख आहे. अनेक वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गटाच्या कामाचा गौरव करण्यात आलाय. सात मैत्रिणींनी एकत्र येत लावलेल्या रोपट्याचे रुपांतर आज लाखो महिलांना रोजगार देणाऱ्या वटवृक्षात झाले आहे. आज 45 हजार महिला कर्मचारी 4.8 अब्ज पापडाची निर्मिती करतात. लिज्जतच्या 17 राज्यात 82 शाखा आहेत. अमेरिका, जपान ते साऊथ आफ्रिका अशा 25 देशात लिज्जतची पापड आणि इतर उत्पादने निर्यात होतात. २००२ मध्ये लिज्जतचा निव्वळ फायदा वार्षिक १० करोड रुपये होता. २००२ साली त्यांना Economics Times तर्फे बिझनेस वूमन ऑफ द ईयर हा पुरस्कार मिळाला.
आज लिज्जतमध्ये काम करणाऱ्या अधिकतम महिला गरजू, निरक्षर आहेत. इथे सर्व महिला एकमेकांना बेहन (बेन) या नावाने संबोधतात. आता लिज्जत पापडा सोबतच अप्पालम, मसाला, गव्हाचे पीठ, चपाती, कपड्याची साबण, लिक्विड डिटर्जेंट इत्यादी उत्पादनेदेखील तयार करते.
आज कित्येक घरांत पापड म्हटलं कि लिज्जत सोडून दुसरीकडे पाहिलं देखील जात नाही. चव, दर्जा आणि गुणवत्तेसोबतच या महिलांनी केलेल्या मेहनतीलाही या यशाचं श्रेय द्यायला हवं. लिज्जतचा हा प्रवास कोणत्याही उद्योजकाला प्रेरणादायी असाच आहे.
स्वतःचं वेगळं अस्तित्व कोणाला नको असतं. कोणाला वाटत नाही, समाजात आपली वेगळी ओळख असावी. आपण नोकरी मागणारे नाही, तर चार लोकांना नोकरी देणार्यांच्या रांगेत यावे. आपल्या माध्यमातून लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा. समाजातील एखाद्या प्रश्नावर आपल्या माध्यमातून उत्तर शोधलं जावं. समाजाला भेडसावणारी एखादी समस्या आपण शोधलेल्या उत्तरानं दूर व्हावी, आपलं जगणं हे अनेकांच्या जगण्याचं कारण बनावं, आपलं अस्तित्व हे अनेकांच्या अस्तित्वाचं कारण बनावं, आपल्या नावाचा एक Brand तयार व्हावा, तो Brand सर्वत्र ओळखला जावा, आपला अनुभव हा अनेकांसाठी मार्गदर्शक ठरावा, आपला प्रवास हा इतरांसाठी आदर्श बनावा…
मग या सगळ्यासाठी काय करता येईल, कसं उत्तर शोधता येईल. तर मित्रांनो उद्योजक होता येईल, व्यवसायाच्या वाटेवर स्वतःचा एक वेगळा प्रवास सुरू करता येईल. परंतु उद्योजकता ही केवळ ठरवून करायची गोष्ट मुळीच नाही. आज जागतिक उद्योजक दिनाचे औचित्य साधून आपण या दिवसाच्या महत्त्वावर प्रकाश टाकणार आहोत.
खरंतर आजही अनेक ठिकाणी लोकांची अशीच मानसिकता आहे की, चांगलं शिक्षण घ्यायचं, चांगली नोकरी मिळवायची आणि आयुष्यात स्थिर व्हायचं. सहसा मला फक्त व्यवसाय करायचा आहे, मला उद्योजक व्हायचं आहे असे बोलणारे खूप अपवाद आहेत. गर्दीचा बऱ्यापैकी ओढा हा फक्त नोकरीच्या मागेच आहे, अनेक जण अपघाताने, अनावधानाने व्यवसायात पडतात आणि मग शिकत शिकत, अनुभव घेत, त्यांना त्यात यश मिळतं; पण फक्त मला व्यवसायच करायचा आहे, हा दृष्टिकोन मनात घेऊन व्यावसायिक होणारे उद्योजक हे फार तुरळक. खरंतर या मागची कारणं देखील अनेक आहेत. त्यात प्रामुख्याने सांगायचं झालं तर,
1. व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ नसणं.
2. कुटुंबाचा पाठिंबा नसणं.
3. नक्की कोणता व्यवसाय करायचा आहे याची स्पष्टता नसणं.
4. Risk घेण्याचं धाडस नसणं.
5. अनिश्चितता आणि अनुभवाचा अभाव
6. सामाजिक दबाव
या सगळ्या गोष्टींना समस्या समजून धाडस न करणारी संख्या मोठीच आहे ; परंतु याच्या विरुद्ध याच मुद्द्यांवर उत्तर शोधून व्यवसायाच्या वाटेवर चालणारे अपवाद हे कायम विलक्षणच ठरतात. जगातील यशस्वी संस्थापकांनी, लहान-मोठ्या उद्योजकांनी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी, स्वत:ची प्रतिभा जगापुढे आणताना काय बरं विचार केला असेल? मुळातच एक गोष्ट स्पष्ट आहे की, आव्हाने स्वीकारण्याची स्वेच्छा असणे आणि उद्योजक होणे या दोन गोष्टींतील सीमारेषा ही अत्यंत पुसट आणि कमी आहे. ही स्वेच्छाच तुमच्या मनातील सर्व भय नष्ट करते आणि त्याच वेळी आपण आकस्मिक संकटांना, अचानक येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी पूर्वतयारी करू शकतो, त्यांना भिडू शकतो.
असं म्हणतात की नोकरी हा आठ तासांचा व्यवसाय आहे आणि व्यवसाय ही २४ तासाची नोकरी आहे आणि हे खरंच आहे. परंतु नोकरी आणि व्यवसाय या दोन्हीमधून मिळून सरतेशेवटी मिळणारं समाधान यात कमालीचा फरक आहे हे मात्र विसरता कामा नये. नोकरी करून आपण आपल्या कंपनीच्या मालकाला मोठं करतो, तर तेच स्वतःचा व्यवसाय करून आपण स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या पुढच्या पिढीला अप्रत्यक्षरित्या मोठं करत असतो. फरक जरी एका वाक्यात असला तरी त्यातील गांभीर्य हे फार मोठं आहे. आज भविष्याचा विचार केला तर ८०% परंपरागत नोकरीच्या संधी ह्या एआय (artificial intelligence) व रोबोटमुळे संपणार आहेत. डॉक्टरच्या ऐवजी रोबोट सर्जरी करतील, तर मग कामगार वर्गाचे काय होईल ह्याचा विचार आपण न केलेलाच बरा.
बऱ्याच जणांचं असंही म्हणणं असतं की माझं वय कमी आहे किंवा आता वय निघून गेलं. अशा तक्रारी करणाऱ्यांना एकच सांगायचं आहे की, शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. संभाजी राजांनी वयाच्या 20व्या वर्षी औरंगजेबाला पाणी पाजलं होतं. बिल गेट्स वयाच्या ३०व्या वर्षी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. तर दुसरीकडे, आर. के. दमाणींनी ४८व्या वर्षी D-Martची, जॉन पेंबरटन यांनी ५५व्या वर्षी कोका-कोलाची सुरुवात केली, तर कर्नल सँडर्स यांनी ६२व्या वर्षी KFCची सुरुवात केली. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या समोर आहेत. उद्योजक बनण्याच्या या प्रवासात वय हा मुद्दा खूप दुय्यम आहे. करण्याची इच्छा असेल, मानसिक तयारी असेल, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जायची तयारी असेल. Roadmap तयार असेल, तर इतर समस्यांना आपण नक्कीच तोंड देऊ शकतो.
उद्योगाच्या अवकाशात गरुड भरारी घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक उद्योजकाला नवी अर्थक्रांतीचं हेच सांगणं आहे की, तुम्ही सुरुवात करा, रस्ता आपोआप दिसत जाईल; पण जर सुरुवातच केली नाही, तर तुम्हाला पुढील मार्गच दिसणार नाही आणि आहे त्या रटाळवाण्या जीवनात तुम्ही अडकून राहाल. मळलेल्या वाटेने जाणारे सगळेच असतात; पण स्वतःची वाट तयार करणारा एखादा असतो. हा एखादा आपल्याला बनायचे हे लक्षात ठेवा.
एका महाविद्यालयात व्यावसायिक मार्गदर्शनाच्या चर्चासत्रात भाग घेण्यासाठी गेलो असता मुलांनी काही प्रश्न विचारले. उद्याची स्वप्ने पाहणारी ही तरुण पिढी. “उद्योजक कसे होता येईल?” असा एक प्रश्न होता. त्यावेळी त्यांच्याशी झालेल्या संवादाचे हे संकलन.
आपण जेव्हा एखादे काम स्वीकारतो किंवा एखादी नोकरी स्वीकारतो तेव्हा आपणास त्या कामाचे जे पैसे मिळतात ते हवे असतात म्हणून आपण ते काम किंवा नोकरी स्वीकारतो. पण त्यामुळे आनंदी होतोच असे नाही. केवळ जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पैशासाठी आपण ती नोकरी स्वीकारतो. आणि आपले त्या कामात लक्ष लागत नसल्यामुळे दु:खी कष्टी होतो. तसेच एखादा व्यवसाय किंवा उद्योग करावयाचा असेल तर आपल्याला तो व्यवसाय/उद्योग आवडतो का? ह्या प्रश्नाचा विचार सुरुवातीला करणे आवश्यक आहे. “I am the Boss of Myself” असे ज्याला वाटते तोच उद्योजक होऊ शकतो. ९ ते ५ काम करणारी मंडळी, त्यांची मानसिकता अगदी वेगळी असते. ते धाडसी निर्णय घेऊ शकत नाहीत. ते उद्योगात यशस्वी होऊ शकत नाहीत.
व्यवसाय करण्यासाठी सिद्ध असलेल्या व्यावसायिकाने हे लक्षात घ्यावयास हवे की त्याला मार्केटिंग येणे आवश्यक आहे. मार्केटिंग हे शास्त्र नव्हे. त्यासाठी उपजत शहाणपण आणि अनुभव गाठीशी असावा लागतो. आपल्याबाबत लोकांना माहिती हवी. आपण विकणाऱ्या वस्तूची चांगली माहिती हवी. तुम्ही स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकले पाहिजे. तुम्हाला लोकांनी सहज ओळखले पाहिजे. इतरांच्या तुलनेत तुम्ही तुमची चमक दाखवली पाहिजे. अगदी तुम्हाला एस्कीमोलाही फ्रीज विकता आले पाहिजे किंवा केस नसणाऱ्याला कंगवा विकता आला पाहिजे. आपण जी वस्तू विकणार आहोत त्यात नाविन्य हवे. शक्यतो त्यासारखी दुसरी वस्तू बाजारात नसावी. नाविन्य आणि वेगळेपणा फार महत्वाचा आहे. तोच खरा व्यावसायिक/उद्योजक जो नाविन्यपूर्ण वस्तूंची निर्मिती करून त्यासाठी बाजार निर्माण करतो. उदा. स्टीव्ह जॉब्स. I-POD बाजारात आणला. लोकांना त्याची आवश्यकता होती का? तर नाही. तरीही लोकांना ती वस्तू हवी हवीशी वाटते आणि त्यातून पैसा कमविता येतो. नवीन ग्राहक निर्माण करणे व त्यासाठी बाजारपेठ निर्माण करणे हे फार महत्वाचे असते.
स्टीव्ह जॉब्स यशस्वी झाले त्याचे कारण त्यांनी नव्या वस्तू बाजारात आणल्या. लोकांना त्या हव्या हव्याशा वाटल्या. तुमची सेवा, ह्याबद्दल लोकांना विश्वास वाटायला हवा. जो हे करतो तो खरा व्यावसायिक/ निर्माता. त्या वस्तूची नुसती विक्रीच झाली पाहिजे असे नाही तर त्यामुळे समाज जीवनावर त्याचा प्रभाव पडला पाहिजे. त्यामुळे सामान्य माणसाचे आयुष्य बदलले पाहिजे. तुम्ही तुमची बाजारपेठ तयार केली पाहिजे. टिकवून ठेवली पाहिजे. तुमच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा तुम्ही उठून दिसणे आवश्यक आहे बिल गेट्स हे उत्तम विक्रेते आहेत. स्पर्धा ही महत्वाची असतेच. पण स्पर्धेत तुमचे लक्षणीय असणे महत्वाचे असते. स्पर्धा ही असणारच. स्पर्धेला टक्कर देत पुढे गेले पाहिजे. जे खूप लढाऊ असतात त्यांच्या मागेच यश धावत येते.
कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या नव्या पिढीच्या व्यावसायिकाकडे पाहिले असता हे सहज लक्षात येते की त्यांच्याकडे योग्य ते भांडवल नसते. त्यांच्याकडे नव्या नव्या कल्पना असतात, इच्छाशक्ती असते ,उत्साह असतो. ह्या नव्या कल्पनाशक्तीमुळेच ते वेगळे दिसून येतात. आपल्या डोक्यात एकाच वेळी अनेक कल्पना असतात. अनेक कल्पनांची गिरणी चालू असते. जेव्हा वेळ योग्य असते, जमीन सुपीक असते तेव्हा कल्पनेला उगवण्याची म्हणजे फुलण्याची संधी मिळते. आपले मन स्वप्नाळू हवे. विचारक्षमता तीव्र हवी आणि कामाचे योग्य नियोजन हवे. तरच कल्पना प्रत्यक्षात उतरू शकते. आर गोपीनाथ ह्यांनी सर्वात स्वस्त हवाई प्रवास ही कल्पना पुढे आणली व एक नवा प्रयोग यशस्वी करून दाखविला. आज सामान्य माणसांना हवाई प्रवास शक्य झाला आहे .
बहुतेक व्यवसाय अयशस्वी होतात त्याचे प्रमुख कारण म्हणजे व्यावसायिकांचा अहंगंड. दोन सहकारी व्यावसायिकांचा अहंगंड त्यांना अयशस्वी करतो. आयुष्यातील जगण्याचा अनुभव महत्वाचा असतो.
सर्वच माणसं स्वप्नं बघतात. सगळ्यांची स्वप्नं सारखी नसतात. काही व्यक्ती फक्त रात्री झोपेत असतानाच स्वप्नं बघतात व सकाळी त्या स्वप्नांना आठवून त्यांचा विचार करतात किंवा विसरून जातात. पण ज्या व्यक्ती फक्त दिवसाच स्वप्नं बघतात त्या खूप वेगळ्या असतात. त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीचा पाठलाग करावयाचा असतो. ते त्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करतात. मेहनत घेतात. ही ध्यास असलेली माणसेच खऱ्या अर्थाने यशस्वी होताना दिसतात. अशी स्वप्नं बघणे आणि प्रयत्नशील राहणे हे खऱ्या व्यावसायिकालाच जमते. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या माणसाचे काम करणारा धीरुभाई अंबानीसारखा साधा माणूस पुढे जगातील एका मोठ्या पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीचा मालक कसा झाला हे समजून घेतले पाहिजे. महाविद्यालयीन शिक्षण सोडून स्वतःचे छोटे उद्योग उभे करणारे बिल गेट्स किंवा स्टीव्ह जॉब्स स्वतःचे औद्योगिक साम्राज्य कसे उभे करू शकले हे शिकले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. THINK BIG AND START SMALL, हे सूत्र महत्वाचे.
तुम्ही तुमच्यापेक्षा हुशार व्यक्तींना तुमच्या व्यवसायात सहकारी म्हणून घेतले पाहिजे. तुमच्यापेक्षा कमी हुशार व्यक्तींना घ्याल, तर तुम्ही ज्यांचे नेतृत्व करणार आहात ते खुजे असल्यामुळे तुमचे नेतृत्व खुजेच असेल. तुमच्या कंपनीत जर जास्त कर्तृत्ववान माणसे असतील तर तुमची कंपनी उंचावर जाईल. नारायण मूर्तींना हे सहज जमले म्हणून त्यांचे नेतृत्व वादातीत आहे. तुमचे नेतृत्व निगर्वी हवे. त्यामुळेच रतन टाटा यशस्वी झाले. त्यांनी Nano कारचे स्वप्न पाहिले. ते प्रत्यक्षात उतरवून दाखविले. त्यामुळे सगळ्या कंपन्यांनी छोट्या कार बाजारात आणल्या. हा बदल घडून आणला तो Nano कारने. वेगळी अशी नवी वस्तू बाजारात आणणे हे महत्वाचे असते. नवी वस्तू पण सर्वात स्वस्त असा विचार त्यांनी दिला आणि सारे कार उद्योजक त्याच्या मागे धावत गेले कारण त्यांना नव्या बाजाराची जाणीव झाली.
तुमची इच्छाशक्ती, तुमची आत्यंतिक आवड, तुमची निर्मिती क्षमता, तुमची ध्येयपूर्ती किंवा स्वप्नपूर्ती यासाठी चाललेली धडपड, त्यासाठी तुमचे झोकून देणे, हेच तुमच्या यशस्वी होण्याचे खरे भांडवल आहे. तुमची विचार क्षमता व कल्पनाशक्ती हे महत्वाचे भांडवल आहे. निवडलेला व्यवसाय हे माध्यम आणि तुमचे कर्म हाच खरा मार्ग आहे. ज्या व्यक्ती ह्याचा सतत पाठलाग करतात त्यांच्यासाठी परमेश्वरही त्यांच्या पाठीशी उभा राहतो. जे नैसर्गिकदृष्ट्या अनुचित व पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे ते आर्थिक दृष्ट्या फार नुकसानीचे असते हे ही त्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
तुम्ही उडप्याचे हॉटेल पाहिले आहे काय? ते चालविणे महाकठीण काम आहे, हे माहित आहे का? ते हॉटेल चालविणे म्हणजे रोज तुमच्या मुलीचा लग्न समारंभ घडवून आणण्याइतके कठीण आहे. उद्योजक होणे असेच कठीण आहे असे गोपीनाथ ह्यांचे मत पटण्यासारखे आहे.
नुसते ध्येय समोर ठेऊन जगणे किंवा मार्ग क्रमणे महत्वाचे नाही. त्यासाठी आपणास दूरदृष्टी असावयास हवी. खरी दूरदृष्टी असते तीच माणसे व्यवसायात यशस्वी होतात. हेन्री फोर्ड , वॉल्ट डिस्ने, स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स यांनी उद्योगाला सुरुवात केली पण अनेकदा ते अयशस्वी झाले, पण त्यांना दूरदृष्टी होती. काय करावयाचे की ज्यामुळे बदल घडून येतील ह्याची त्यांना स्पष्ट जाणीव होती. अशीच मंडळी काहीतरी भव्य दिव्य करून दाखवितात. उद्योजकाला उद्योग उभारण्यासाठी दूरदृष्टी असावी लागते, नजीकच्या काळापेक्षा भावी काळात उद्योग कसा वाढेल ह्याचा विचार महत्वाचा असतो. नजीकच्या काळातील समस्या सोडवताना दूरच्या काळातील विचार तेवढाच महत्वाचा असतो.हे ज्यांना जमते तेच यशस्वी होतात.
व्यावसायिक म्हणजे तो माणूस, जो संपत्तीची निर्मिती करतो. नवी वस्तू, नवा गिऱ्हाईक, नवी सेवा, नवा ग्राहक. नवे असणे, उपयुक्त असणे व ग्राहकाला हवेहवेसे वाटणे, हे ज्याला सहज जमते तो खरा व्यावसायिक. नवी कल्पना, नवी वस्तू पण कमी पैशात निर्मिती, नवी सहज उपलब्ध होणारी सेवा ह्या त्रि-सूत्रीवर व्यवसाय अवलंबून असतो. स्टीव्ह जॉब्सने I-POD ची निर्मिती करून क्रांतीकारक बदल घडवून आणला. बिल गेट्सनी नवी क्रांती घडवून आणली अर्थात त्यासाठीचे आवश्यक असलेले मनुष्यबळ त्यांनी उभे केले.
थॉमस एडिसनने विद्युत दिव्याचा नुसता शोधच लावला नाही, तर निर्मिती करून जगाला विद्युतमय केले. सॅम वॉल्टनचे उदाहरण घ्या. “प्रत्येक दिवशी कमी किमतीत” ह्या संकल्पनेवर त्यांनी नवी बाजारपेठ उभी केली आणि खूप संपत्ती उभी केली. अंबानींनी “सारी दुनिया मुठ्ठीमे” अशी घोषणा देऊन सामान्य माणसाना मोबाईल विकला. ही सर्व उदाहरणे हे दर्शवितात की उद्योजक हा महाविद्यालयात व्यवस्थापकीय शिक्षण घेऊन तयार होत नाही. त्यासाठी त्याला तशी आतून उर्मी असावी लागते. त्यासाठी आपण खूप बुद्धिमान असले पाहिजे असे नाही, परंतु आजूबाजूचे सर्व जाणून घेण्यासाठी उत्सुक असले पाहिजे. तेच महत्वाचे ज्ञान आत्मसात करता आले पाहिजे .
बहुतेक धंदे किंवा व्यवसाय अगदी सुरुवातीच्या काळातच बंद पडतात. जेव्हा सहकारी एकमेकाला पूरक नसतात किंवा त्यांची विचार करण्याची पद्धती सारखी नसते व काम करण्याचे मार्ग भिन्न असतात तेव्हा व्यवसाय बंद पडतात. पूरक सहकारी निवडणे फार महत्वाचे असते . तरच तणाव मुक्त व्यवसाय करता येतो. दोन किंवा दोन पेक्षा अधिक पार्टनर असतील तर कोणातरी एकाचे नेतृत्व मान्य करून व्यवसाय करता आला पाहिजे. दोन दोन नेतृत्व असतील तर व्यवसाय चालू शकत नाही. एका जहाजाला दोन कप्तान असू शकत नाहीत.
बरेच जण व्यवसाय/उद्योग सुरु करतांना म्हणतात, “मला नवा व्यवसाय सुरु करावयाचा आहे. माझ्या वरिष्ठांना त्याची काहीच कल्पना नाही. जर व्यवसाय यशस्वी होण्याची चिन्हे दिसली तरच मी नोकरीचा राजीनामा देईल.” असा विचार करणारे लोक उद्योजक होऊ शकत नाहीत. तुम्हाला जर खरे उद्योजक व्हायचे असेल, तर हे लक्षात ठेवा की तुम्हाला स्वतःला झोकून देता आले पाहिजे. अर्थात त्यासाठी हालअपेष्टा सहन करण्याची तयारी हवी.
तुम्ही तुमच्या जागेचे भाडे वेळेवर देऊ शकणार नाहीत. कर्मचार्यांना पगार देताना तुमची तारांबळ होईल. बायकोला साडी घेण्यासाठी तुमच्याजवळ पैसे नसतील. मुलांची महागडी शिक्षण फी भरण्यासाठी त्रास होईल. अशा असंख्य अडचणीना तोंड द्यावे लागेल. ह्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी नवे मार्ग शोधावे लागतील. ते सहज जमते, प्रयत्न करावे लागतात . पण त्यासाठी तुमची झोप उडालेली असेल, असे जेव्हा घडेल तेव्हाच तुम्ही तावूनसुलाखून निघाल. निसर्ग जसा अडचणी निर्माण करतो तसाच अडचणीवर मात करण्यासाठी मेंदूला चालनाशक्ती देतो. त्या शक्तीचा उपयोग करता आला पाहिजे.
नवा उद्योग किंवा व्यवसाय उभा करतांना अडचणीचा डोंगर उभा राहणारच. त्या अडचणीवर मात करतानाच तुम्ही घडत जाल. नदीचा गुणधर्म वाहणे आणि समुद्राकडे धावणे. तुम्ही नदीसारखे असाल तर दगड धोंड्यावर मात करून वाहत राहणार व शेवटी समुद्राला मिळणार म्हणजेच यशस्वी होणार. यशाचा समुद्र तुमची वाट पाहत असेल हे लक्षात ठेवा. तुमच्यामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती हवी. प्रचंड उत्साह हवा. मग यशाची शिखरे तुमचीच.
सगळ्या लढाया ह्या प्रथम मनाच्या अवकाशात लढल्या जातात. हे लक्षात असू देणे महत्वाचे आहे. आपल्याला आजूबाजूच्या सिमीत अवकाशाची कल्पना असलेली बरी. जेव्हा आपण निर्णय घेत नाही, तेव्हाच आपण अपयशाच्या दिशेने वाटचाल करतो. हे ही लक्षात असू द्यावे.
धंदा करावयाचा असतो तो “नफा ” मिळवण्यासाठी. “नफा” हा धंदा करणाऱ्यासाठी पवित्र मंत्र आहे. ते मान्य नसेल तर ह्यात पडू नका. नफा असेल तरच धंदा जगेल. तोटा कमी करणे ही धंद्याची पहिली पायरी. सतत तोटाच होत असेल, तर धंदा बंद करणे ही महत्वाची दुसरी पायरी. आपल्याला यश मिळू लागले की लोक आपल्याला जेवायला या असे आमंत्रण देतात. तेव्हा हे लक्षात असू द्यावे की कोणीही, कधीही फुकट जेवायला बोलवीत नसते. लोकांना ओळखता आले पाहिजे.
कोणतीही गोष्ट पूर्ण करावयाची असेल, तर सर्वात प्रथम त्यासाठी कोणत्या दिवसापर्यंत पूर्ण करावयाची हे निश्चित करा. मनामध्ये तो दिवस पक्का करा. हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे. डेडलाईन महत्वाची असते . तरच गोष्टी साध्य होतील. व्यवस्थापकीय शिक्षण ठीक. पण जे शिकवले जाते ते सारेच उपयोगी पडते असे नाही. प्रत्यक्ष व्यावसायिक जीवनात वेगळेच मार्ग निवडावे लागतो. नुसत्या पुस्तकी शिक्षणाचा फारसा उपयोग होत नाही.
अंटार्टिका मोहिमेसाठी एक जाहिरात देण्यात आली होती. ती अशी …. “अतिशय धोकादायक मोहिमेसाठी माणसे हवीत. अर्ज करा. खूप कमी पगार, मरणाची थंडी असलेला प्रदेश, सहा सहा महिने रात्रीचे काम, सतत अडचणीशी सामना, निसर्गाशी युद्ध, जिवंत परत येण्याची कमी शक्यता परंतु यशस्वी झालात तर जागतिक सन्मान नक्कीच .” HAZARDOUS JOURNEY : ANTARCTICA
अशी जोखीम घेणारी माणसे किती असतात? उद्योगात किंवा व्यवसायात अशीच जोखीम असते. तशी जोखीम घेणार असाल तरच उद्योजक होता येईल. बघा जमते का?
राजस्थानातील एका छोट्याशा गावात जन्मलेल्या या मुलाने लहान असताना शिक्षक होण्याचे स्वप्न बाळगले होते, पण प्रत्यक्षात नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पुढे जाऊन त्याने औषध उद्योग क्षेत्रात नाव कमावणारी‘ल्युपिन’ ही नामांकित कंपनी स्थापन केली. ल्युपिन समूहाचे ते संस्थापक व अध्यक्ष. त्यांचे नाव डॉ. देशबंधू गुप्ता. ते‘डीबी’ या नावाने सर्वाना परिचयाचे होते.
२६ जून २०१७ रोजी त्यांचे निधन झाले. प्रकृती बरी नसल्याने त्यांनी पाच वर्षांपूर्वीच ल्युपिनची सूत्रे कन्या विनिता गुप्ता व पुत्र नीलेश गुप्ता यांच्याकडे सोपवली होती. ल्युपिनने गेल्या दशकात किमान १२ कंपन्या अधिग्रहित केल्या, त्यातील सहा कंपन्यांचे अधिग्रहण गेल्या दोन वर्षांत पूर्ण झाले.‘गॅव्हिस’ या ८८ कोटी डॉलर्सच्या अमेरिकी जेनरिक औषध कंपनीचे अधिग्रहण ल्युपिनने केले; ते कुठल्याही भारतीय औषध कंपनीने केलेले सर्वात मोठे अधिग्रहण.
‘डीबी’यांचा जन्म राजस्थानातील राजगडचा. रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर ते पिलानीच्या बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्राध्यापक होते. कालांतराने त्यांनी औषध उद्योगात उतरून मानवाला सतावणाऱ्या रोगांशी लढण्याचे ठरवले, त्यातूनच मुंबईत येऊन ‘ल्युपिन लिमिटेड’या कंपनीची स्थापना १९६८ मध्ये केली. पत्नीने वाचवलेल्या पैशातून त्यांनी पहिल्यांदा जीवनसत्त्व निर्मितीचा उद्योग सुरू केला. अवघ्या पाच हजार रुपये भांडवलातून सुरू केलेल्या या छोट्या उद्योगातून पुढे ४.८ अब्ज डॉलर्सची कंपनी साकारली. २००३ पर्यंत ते कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष होते. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात औषध निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणे हे तसे धाडसाचे; पण‘डीबीं’नी ल्युपिनमुळे औषधनिर्मितीत एक गतिशील वातावरण तयार केले.
त्याचबरोबर काही मूल्यांचा वारसा तयार केला. ही देशी औषध कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली. बीएसई सेन्सेक्स ३० कंपनी म्हणून ओळखली जाणारी ल्युपिन ही जेनरिक (प्रजातीय) औषध निर्मिती क्षेत्रातील बाजारपेठ भांडवलीकरणात जगातील दहाव्या क्रमांकाची कंपनी आहे. जागतिक महसुलाचा विचार करता ती भारतातील चौथ्या क्रमांकाची औषध कंपनी आहे.जपान व दक्षिण आफ्रिका या देशात ल्युपिन अनुक्रमे सहाव्या व चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या कंपनीची उलाढाल ४.८ अब्ज डॉलर्सहून अधिक असून ५० हजारांपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. अलीकडेच अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने त्यांच्या मध्य प्रदेशातील पिथमपूर येथील उत्पादन प्रकल्पाबाबत काही निरीक्षणे मांडली होती.
डॉ. गुप्ता यांनी १९८८ मध्ये ग्रामीण भागातील दारिद्रय़ दूर करण्यासाठी ल्युपिन ह्य़ूमन वेल्फेअर अॅण्ड रीसर्च फाउंडेशन ही संस्था स्थापन केली. त्यामुळे ३४६३ खेडय़ांतील २८ लाख लोकांना लाभ झाला. विपश्यनेचे ते साधक होते व त्यांनी ग्लोबल विपश्यना फाउंडेशनचे विश्वस्त, तसेच जुहूच्या इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. २०१५ मध्ये फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत त्यांचा २५४ वा क्रमांक होता. क्षयरोगावरील औषधांसाठी ल्युपिन कंपनी प्रसिद्ध आहे. पाच वर्षांपूर्वी कंपनीने या औषधांची निर्मिती सुरू केली, कालांतराने त्यातील नफा कमी झाला, तेव्हा नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या पत्नी मंजू यांचा सल्ला घेतला. त्यावर त्या म्हणाल्या की, ‘हमारी रोटी तो हमें मिल रही हैं ना’ त्यानंतर क्षयाच्या औषधांचे उत्पादन बंद करण्याचा विचार त्यांच्या मनाला शिवलाही नाही.
‘क्षयरोगाविरोधात लढाई सोडता कामा नये, कंपनीला खोट आली तरी बेहत्तर’ हा त्यांच्या पत्नीने दिलेला सल्ला मोलाचा ठरला, असे ते सांगत. आज क्षयाच्या जगातील औषध विक्रीत ल्युपिनचा वाटा तीन टक्के आहे. गरजूंना किफायतशीर किमतीत औषधे उपलब्ध करून देत मानवसेवेचे व्रत घेतलेले गुप्ता हे उद्योजकाइतकेच संवेदनशील माणूस म्हणूनही अनेकांच्या लक्षात राहतील.
कुठलाही व्यवसाय दीर्घकाळ चालवणे ही एक तारेवरची कसरत असते. या प्रवासात अनेक चढ-उतार हे येतंच असतात. कुठल्याही उद्योजकाचा सर्वसाधारण प्रवास कसा असतो याचे टप्पे आपण पाहूया.
पहिला टप्पा : स्टार्टअप! (शून्य – ५० हजार डॉलर्स)
जगभरात दरवर्षी सुमारे १० कोटी नवीन व्यवसाय सुरु होतात. दुर्दैवाने त्यातील ८० टक्के व्यवसाय ३ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकत नाहीत.
दुसरा टप्पा : लघुउद्योग (५० हजार ते ३ लाख डॉलर्स)
तुम्ही व्यवसाय सुरु केला आणि तो चांगला चालू लागला, तुम्हाला ग्राहक मिळू लागले, नवी उत्पादने तुम्ही बाजारात आणू लागलात. हा तुमचा संघर्षाचा काळ असतो. काहीजण आपला व्यवसाय स्वतःपुरता मर्यादित करून घेतात., तर काहीजण यातून पुढे जाऊन स्वतःची एक टीम बनवतात.
तिसरा टप्पा : यशस्वी व्यवसाय (३ लाख – २० लाख डॉलर्स)
आजवरचा तुमचा संघर्ष, तुमची मेहनत फळाला आली. आता तुमचा व्यवसाय एका शाश्वत गतीने चालू लागला आहे. आता तुम्ही तुमचे लक्ष तुमची टीम वाढवण्यावर द्यायला हवे. स्वतःसाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. तुमचा व्यवसाय आता तुमच्याशिवाय चालू लागला आहे. हे तुमच्या मेहनतीचे फळ आहे. आता आराम करायचा, फिरायचं, मौजमजा करायची, की आपला व्यवसाय पुढच्या टप्प्यावर न्यायचा?
जगातील पंधरा कोटी व्यवसायांपैकी ४ टक्क्यांहून कमी व्यवसाय ५ कोटी रुपयांपर्यंत आपला महसूल वाढवतात, तसेच ४ टक्क्यांहून कमी व्यवसाय १० वर्षांपेक्षा जास्त काळ टिकतात.
चौथा टप्पा : लघु व मध्यम उद्योग (२० लाख – १ कोटी डॉलर्स)
तुम्ही जसजसा व्यवसायाचा पसारा वाढवत जाता, नवनवीन आव्हाने तुमच्यासमोर उभी राहतात. या टप्प्यावर व्यवसायाचे नियोजन, व्यवस्था, बुद्धिमत्ता आणि प्रशिक्षण या गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासते आणि तुम्ही पुन्हा एकदा संघर्षमय अशा दुसऱ्या टप्प्यात जाता.
पाचवा टप्पा : मध्यम आणि मोठे उद्योग (१ कोटी – ५ कोटी डॉलर्स)
आता तुमचा व्यवसाय एवढा मोठा झालेला आहे, की तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रावर आणि जगावर प्रभाव पाडत आहात. तुमच्या व्यवसायाची एक वेगळी ओळख जगभर निर्माण झालेली आहे.
‘जुगार आणि विचार करून घेतलेली जोखीम यात फरक असतो.’ – एडमंड एच. नॉर्थ
हजारातील एक-दोन व्यवसाय ५ कोटी डॉलर्सचा टप्पा पार करून पुढे जातात. पण आजच्या जमान्यात तुम्ही भविष्यातील योग्य संधी ओळखल्या आणि नियोजनबद्ध पद्धतीने त्यावर काम केले, तर तुम्ही पूर्वी कधी नव्हे त्यापेक्षा जास्त वेगाने बाजारपेठ काबीज करू शकता. त्यामुळे आपले कामाची दिशा ठरवा, ध्येय निश्चिती करा आणि प्रवासाचा आनंद घ्या!!! आणि जर तुमचा व्यवसाय अयशस्वी ठरला तर? काळजी करू नका, पुन्हा सुरुवात करा…
उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी खालील १० गोष्टी लक्षात ठेवा.
१. आर्थिक सुरक्षिततेची योजना तयार करा.
२. पुढे कोणती पावले उचलायची आहेत याची माहिती मिळवा.
३. अशी बिझनेस आयडिया शोधून काढा जी यशस्वी होईल.
४. चांगल्या मार्गदर्शक किंवा सल्लागाराची मदत घ्या
५. यशस्वी होण्यासाठी ध्येयधोरणे आखा.
६. आत्मविश्वास वाढवा.
७. चांगले सहकारी तयार करा.
८. भविष्यातील ध्येय स्पष्ट असू द्या.
९. मोठी स्वप्नं बघा.
१०. संपूर्ण प्रवासाची ब्लूप्रिंट (आराखडा) बनवा.
या सर्व गोष्टींची गरज तुम्हाला सुरुवातीलाच पडणार नाही, पण उद्योजकतेचा प्रवास जसजसा पुढे सरकेल, यातील प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणे तुम्हाला गरजेचे आहे.
तथापि हा प्रवास तितकासा सोपा असणार नाही. तुम्हाला एकटं वाटू शकतं. तुम्ही रात्रंदिवस मेहनत करून छोट्या छोट्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करत असता, पण वारंवार येणाऱ्या अपयशामुळे मध्येच सोडून देण्याचा विचार तुमच्या मनात येऊ शकतो.
बरेच उद्योजक व्यवसायाच्या सुरुवातीलाच जोखीम घेतात. थोडेफार यशस्वी होतात, परंतु त्यानंतर व्यवसाय विकासासाठी जोखीम घेणं थांबवतात. नवीन संधींचा शोध घेत नाहीत. फक्त आहे तो व्यवसाय टिकवण्यावर भर देतात. कल्पना करा तुम्ही एखाद्या डोंगरावर गिर्यारोहणासाठी जात आहात. सुरुवातीला तुम्ही खूप आनंदात असता. आपण काहीतरी नवीन करतोय याची वेगळीच मजा आणि उत्सुकता तुमच्या मनात असते, पण चढण जशी अधिक कठीण होत जाते, तुम्ही चालताना मध्येच अडखळू लागता (बहुतांशी लोकांच्या बाबतीत हेच होतं). तुम्हाला पुढे जायचं असतं, पण जाता येत नाही आणि एवढ्या लांब जाऊन रिकाम्या हाताने परत आला म्हणून लोकं नावं ठेवतील या भीतीने माघारी जाऊ शकत नाही, अशा द्विधा मनस्थितीत तुम्ही अडकलेले असता.
या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि तुमच्या मदतीसाठी आणि तुम्हाला नवीन संधीचं दार उघडून देण्यासाठी एखादा चांगला मार्गदर्शक/प्रशिक्षक उपयुक्त ठरू शकतो.
हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या गोष्टी ऐकून आयुष्याचे धडे गिरवण्यासाठी चॅनेल आताच सबस्क्राईब करा.
ही गोष्ट आहे एका अशा मुलाची जो चॉकलेट गोळ्या विकून जगातील सगळ्यात मोठा तेलाचा व्यापारी बनला. काळ्या सोन्याचा राजा असणाऱ्या, या माणसाचं नाव आहे जॉन डी. रॉकफेलर.
जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचा जन्म १८३९ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे झाला. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या रॉकफेलर यांना लहानपणापासूनच घर चालवण्यासाठी काम करावं लागत होतं. त्यांच्या वडिलांचा औषधं विकण्याचा व्यवसाय होता; पण त्यात त्यांचा जम बसत नव्हता. त्यामुळं त्यांना अनेक शहरात फिरावं लागत होतं.
अखेरीस १८५४ मध्ये हे कुटुंब ओहिओ इथं येऊन स्थिरावले. जॉन यांना आपलं शालेय शिक्षण पूर्ण करायचं होत, पण परिस्थितीमुळं त्यांना ते करता आलं नाही. पोट भरण्यासाठी हाताला काम पाहिजे म्हणून त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी बुक किपिंगचा एक कोर्स केला आणि एका कंपनीमध्ये बुक किपर म्हणून रुजू झाले. लहानपानपासूनच त्यांना दानधर्म करायची भारी आवड होती. तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं कि आपण जितक कमावू त्याच्यातील १०% उत्पन्न हे दान करायचं.
२६ सप्टेंबर या दिवशी त्यांना नोकरी मिळाली होती, म्हणून ते हा दिवस “जॉब डे” म्हणून साजरा करत. सुरुवातील प्रतिमहिना १६ डॉलर्स आणि नंतर ३१ डॉलर्स प्रतिमहिना पगारावर दोन वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करायच ठरवलं. त्यांनी बँकेतून लोन घेऊन, आपल्या सहकाऱ्यांसोबत स्वतःची कंपनी चालु केली. ही कंपनी धान्य खरेदी विक्री करायचं काम करत होती. अमेरिकेतील १८५७च्या मंदीच्या काळातसुद्धा रॉकफेलर यांचा व्यवसाय जोमात चालू होता.
त्याच दरम्यान, म्हणजे १८५० ते १८६० मध्ये चालू झालं ते “पेनसिल्वनिया ऑईल रश”. पेनसिल्वनियामध्ये तेलाच्या खाणी सापडल्या. त्यामुळे सगळे व्यापारी तेल खणण्याच्या व्यवसायाकडे वळले. पण तेल खाणकाम व्यवसाय बऱ्यापैकी नशिबावर अवलंबून असल्याने त्या मार्गाने न जाता रॉकफेलर यांनी तेल शुद्धीकरणाचे कारखाने चालू केले. आणि यातूनच जन्म झाला तो “स्टँडर्ड ऑइल”चा. चोवीस वर्षीय रॉकफेलर यांच्यासाठी हा खरा टर्निंग पॉइंट होता आणि अमेरिकेसाठीसुद्धा.
रॉकफेलर यांचा रिफायनरी व्यवसाय उत्तरोत्तर वाढत होता. यातून मिळणारा नफाही तितकाच मोठा होता, पण प्रश्न होता तो ट्रान्सपोर्टचा. या काळात रेल्वे इंडस्ट्री ही काही ठराविक लोकांच्या अधिपत्याखाली होती. त्यांच्या मर्जीशिवाय वाहतूक करणे शक्य नव्हते, यावेळी व्यवहार चातुर्य वापरून रॉकफेलर यांनी या लोकांसोबत बोलणी करून फक्त स्टॅंडर्ड ऑइल कंपनीसाठीच कमी दरात वाहतूक करण्याची परवानगी मिळवली. यामुळे स्टँडर्ड ऑइलचे केरोसीन हे सर्वात कमी किमतीला लोकांना उपलब्ध झालं.
त्यानंतर त्यांनी ऑइल हे पाईपलाईनद्वारे कसं ट्रान्सपोर्ट केलं जाऊ शकतं हे पाहिलं. पाइपमधून ऑईल ट्रान्सपोर्ट करण्याचा हा जगातील पहिलाच प्रयोग होता. तेलाचं शुद्धीकरण करताना खूप तेल वाया जात होतं. यावेळी रॉकफेलर यांनी एक कमिटी बसवून वाया गेलेल्या तेलापासून पासून काय बनवता येईल हे पाहिलं आणि तेव्हा जन्माला आलं ते tar म्हणजेच डांबर, पेट्रोलियम जेली आणि पॅराफीन वॅक्स.
Pipeline of Standard Oil, Img. Source : Britannica
Horizontal Integration पद्धतीचा वापर करून छोट्या आणि डबघाईला जाणाऱ्या सगळ्या कंपन्या takeover करत रॉकफेलर आपला व्यापार वाढवत होते. त्यांचा टेकओव्हरचा वेग इतका होता की दर महिन्याला ३-४ कंपन्या विकत घ्यायचे. आलेला सगळा नफा पुन्हा व्यवसाय वाढवण्यासाठी वापरत होते. याचा परिणाम असा झाला की, १८९०च्या दशकात अमेरिकेतील ९०% ऑइल रिफायनरी या फक्त स्टँडर्ड ऑईल कंपनीच्या होत्या; तर अमेरिकेत पुरवठा होणाऱ्या एकूण केरोसीनपैकी ९८ टक्के केरोसीन हे स्टँडर्ड ऑइल विकत होतं.
अशाप्रकारे स्टॅंडर्ड ऑइलची अमेरिकेत मक्तेदारी तयार होत होती. ती इतकी झाली की, स्टँडर्ड ऑइल अंतर्गत वीस हजार तेलाच्या विहिरी, ४००० ट्रान्सपोर्ट पाईपलाईन, तर जवळपास एक लाख कामगार काम करत होते.
१९०२साली इडा डारबेल या महिलेने स्टॅंडर्ड ऑइलवर काही लेख लिहिले. त्याच पुढे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालं. यात तिने असा आरोप केला होता की, स्टँडर्ड ऑइलने अनेक कंपन्या जबदस्तीने विकत घेतल्या आहेत. यानंतर काही पत्रकारांनी सुद्धा रॉकफेलर यांच्यावर अनेक आरोप केले.
अखेरीस या मक्तेदारीला आळा घालण्यासाठी अमेरिका सरकारने “शेअरमन अँटी ट्रस्ट ऍक्ट” पारित केला. यामुळे स्टँडर्ड ऑइल ३४ वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभागली गेली. विभाजनानंतरही या कंपन्या प्रगती करत होत्या. पुढे या कंपन्या एकमेकात विलीन होत एकत्र येत गेल्या. या कंपन्या आजही अमेरिकन तेल उद्योगाचा गाभा आहेत. अमेरिकेतील शेवरॉन, एक्सॉन मोबिल, ब्रिटिश पेट्रोलियम, मॅरेथॉन पेट्रोलियम या कंपन्या त्याचाच एक भाग आहेत.
१८९३ मध्ये त्यांची भेट स्वामी विवेकानंद यांच्यासोबत झाली. स्वामी विवेकानंदांकडून त्यांनी दानधर्म करण्याबाबत चर्चा केली. पुढे १८९५ नंतर रॉकफेलर यांनी रिटायरमेंट घेतली आणि आपले उर्वरित आयुष्य दानधर्म करण्यात घालवले. त्यांनी युनिवर्सिटी ऑफ शिकागो उभारण्यात मदत केली. १९०९ मध्ये चालू झालेल्या रॉकफेलर सॅनिटरी कमिशनने अमेरिकेतून हुकवर्म हा रोग समूळ नष्ट होण्यासाठी प्रयत्न केले आणि पुढच्या वीस वर्षात त्यांनी आपले लक्ष्य साध्य देखील केले. रॉकफेलर फाउंडेशनमार्फत त्यांनी रिसर्च अँड डेव्हलपमेंटला प्रोत्साहन दिलं. अशा अनेक सामाजिक कार्यांसाठी लक्षावधी डॉलर्स रॉकफेलर यांनी दान केले.
१९१६ साली ते आधुनिक जगातील पहिले अब्जाधीश बनले. अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या २ टक्के इतकी एकट्या रॉकफेलर यांची संपत्ती होती. आजच्या मूल्यानुसार हा आकडा ४८० अब्ज डॉलर्स म्हणजे ३५ लाख कोटींहून अधिक होतो. म्हणजे सध्या जगात सर्वात श्रीमंत असलेल्या एलोन मस्कहुन दुपटीने अधिक.
पुढे त्यांनी स्टील उद्योग क्षेत्रात सुद्धा शिरकाव केला. पण लवकरच स्टील उद्योग सम्राट अँड्र्यू कार्नेगी यांनी ती कंपनी विकत घेतली आणि यामुळे युनायटेड स्टील जगातील सर्वात मोठी कंपनी बनली. पुढील लेखात आपण याच युनायटेड स्टीलचे संस्थापक अँड्र्यू कार्नेगी यांचा जीवनप्रवास जाणून घेणार आहोत.
रॉकफेलर यांच्या दोन महत्त्वाच्या इच्छा होत्या, त्यापैकी एक म्हणजे १ लाख डॉलर्स कमावणे आणि दुसरे होते शंभर वर्षे जगणे. त्यातली पहिली इच्छा त्यांनी पूर्ण केली, पण दुसरी मात्र होता होता राहिली. वयाच्या ९७व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गरीब म्हणून जन्माला आलो तरी गरीब म्हणून मरणार नाही, हेच रॉकफेलर आपल्याला शिकवून जातात.
तर ही होती जॉन डी. रॉकफेलर यांची जीवन कहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
कामानिमित्त प्रवास करायचा तर ऑटो किंवा टॅक्सीने फिरणं आलंच. त्यातच रिक्शा आणि टॅक्सीने प्रवास करायचा तर खासकरून रिक्शा टॅक्सी चालक आणि प्रवासी यांच्यातली भांडणं आपण दररोज ऐकत असतो किंवा वाचत असतो. कधी आपल्याही वाट्याला असे प्रसंग येतात. आपलंही त्यावेळेस डोकं फिरतं, मात्र काही काळ गेला की आपण शांत होतो आणि मग इतरांना त्याचा कसा त्रास होतोय हे वाचतो आणि सोडून देतो. मात्र एका व्यक्तीने त्याला आलेल्या वाईट अनुभवातून योग्य तो धडा घेतला आणि त्यापासून प्रेरणा घेत त्याने चक्क कोट्यावधी रुपयांचं साम्राज्य उभं केलं. ऐकून थोडं विचित्र वाटेल मात्र आयआयटी पदवीधर भावेश अग्रवाल यांचा हा अनुभव तुम्हालाही इंटरेस्टिंग वाटेल.
अनेकदा टॅक्सीचालक आपल्याला मनमानी भाडं सांगतात. आपण नाईलाज म्हणून ते भाडं देण्यासाठी तयारही होतो. आयआयटी पदवीधर भावेश अग्रवाल आपल्या कामानिमित्त असाच एकदा प्रवास करत असताना टॅक्सीचालकाशी त्यांचं भांडण झालं. भांडणाचं प्रमुख कारण म्हणजे तो टॅक्सीचालक त्यांच्याकडून जादा भाड्याची मागणी करत होता.
मात्र हे भांडण झाल्यावर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं नाही तर देशात लो बजेट फेअर कॅब सर्व्हीसची किती नितांत गरज आहे हे त्यांनी ओळखलं. घरी आल्यावर त्यांनी आपला प्लान कुटुंबाला सांगितला. मात्र ‘आयटीत भरघोस पगाराची नोकरी असताना हे काय मध्येच?’ अशी कुटुंबाची भूमिका होती. भावेश मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी आपली योजना पूर्णत्वास न्यायची असा चंग बांधला. त्यांना त्यांच्या या बिझनेस प्लानमध्ये त्यांचा मित्र अंकीत भाटी यांची साथ मिळाली आणि मग काय, या दोघांनी मिळून बंगळूरूत ‘ओला’ या टॅक्सी व्यवसायाची सुरूवात केली.
त्यांनी कायम एक खूणगाठ मनाशी पक्की केली होती की काहीही झालं तरीही प्रवाशांना सर्वोच्च सेवा उपलब्ध करून द्यायची. लो फेअर कॅब सर्व्हिसची मुहूर्तमेढ तिथेच रोवली गेली आणि देशात प्रवाशांना आरामदायी आणि खिशाला परवडणारी अशी ‘ओला’ सेवा मिळाली. आज आपल्यापैकी प्रत्येकानं किमान एकदा तरी स्मार्टफोनवरून ही कॅब बुक करून त्याचा आनंद घेतला असेलच.
किती आहे ओला कॅबचं नेटवर्थ?
ओलैा कॅबच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झाल्यास हा आकडा आजमितीला 4.8 अब्ज डॉलर्स म्हणजेच 39 हजार 832 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.याशिवाय आता कंपनीने ओला इलेक्ट्रिकल्सच्या नावाने सुरू केलेल्या इ टू व्हिलरलाही पसंती मिळतेय. आज याही कंपनीचं नेटवर्थ साधारणपणे 2 हजार 400 कोटी रुपयांच्या घरात पोहोचलं आहे.