रोज क्षणा क्षणाला आपली स्पर्धा सुरू असते. कधी इतरांबरोबर तर कधी स्वतःशीच. पण, प्रत्येक वेळी आपण जिंकूच असे नाही. कधी कधी पराभवही होत असतो. खचून न जाता प्रत्येक क्षणाला सामोरे जाण्यात जास्त यश असते. ‘अपयश ही यशाची पहिली पायरी असते’ याप्रमाणे आपले करिअर सुरू असते. आपण यशाचीच अपेक्षा जास्त ठेवत असतो आणि कधी कधी एखाद्या गोष्टीत मागे पडतो. आता हे मागे पडायचे नसेल, तर काही टीप्स
कामात परफेक्शन हवे
नेहमी आपण स्वतःला सगळ्यांपेक्षा खूप स्मार्ट समजत असतो. आपले शिक्षण सगळ्यांपेक्षा जास्त आहे, असं मानत असतो. जोपर्यंत आपण एखाद्या कामात परफेक्शन आणत नाही तोपर्यंत आपण स्वतःला स्मार्ट समजू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक कामावेळी ओव्हर कॉन्फिडन्स ठेवणे आपल्या नोकरीस घातक असू शकते.
प्रामाणिकपणा
नोकरीच्या ठिकाणी प्रमाणिकपणा असणे अत्यंत महत्त्वाचे असते. कामा संदर्भात नुसतीच आश्वासन नका देऊ, ती पूर्ण करा. कामाचे आश्वसन देऊन ते काम वेळच्या वेळी पूर्ण करून दाखवल्यास बॉसच्या आपल्याबद्दलची चांगली प्रतिमा निर्माण होते. नेहमी आपली बॉसच्या मनात चांगली प्रतिमा उमटवण्यासाठी प्रामाणिकपण गरजेचा असतो.
स्वतःला ठेवा अपडेट
काही वेळा आपण ज्या ठिकाणी काम करतो त्याच ठिकाणी कायस्वरूपी राहण्याचा विचार करत असतो. जरी हा विचार स्वतःला योग्य वाटत असला तरी तो आपल्या करिअरच्या दृष्टीने नुकसानकारक आहे. कारण एकाच जागी काम करत राहिलो तर नवीन गोष्टी कधी शिकता येणार नाही. सध्याच्या जगात स्वतःला अपडेट ठेवणे खूप महत्त्वाचे ठरत आहे.
आत्मविश्वास
आत्मविश्वास बाळगणे महत्त्वाचे ठरते. भले आपण कितीही पदव्या घेतल्या असो, कामाचा कितीही अनुभव असला आणि आपल्यात आत्मविश्वासच नसेल तर पदवीचा, अनुभवाचा काहीही उपयोग नाही. जे कोणते काम हाती घेणार आहोत ते काम पूर्ण करण्याचा आत्मविश्वासा आपल्यात असला पाहिजे. जर आत्मविश्वास नसेल तर, चांगले करिअर घडवता येणार नाही. न्युनंगड कधी बाळगू नये. स्वतःला कधी कोणत्या गोष्टीत कमी समजु नये.
गेल्या १५ वर्षात जेवढे बदल या जगाने पाहिले व अनुभवले तेवढे मानवजातीच्या कोट्यावधी वर्षात सुध्दा घडलेले नाहीत. जेव्हा असे मोठे बदल घडत असतात. तेव्हा जग वेगवान प्रगतीच्या उंबरठ्यावर उभे असते. हे एक युगांतर असते. अशी अनेक युगांतरे झाली. त्यापैकी काही उल्लेखनीय युगांतराचा आढावा घेऊनच आपण या नव्या बदलाला आत्मसात करण्यासाठी सिध्द होऊया.
अश्मयुगीन मानवाला आगीचा शोध लागला आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन आले. चाकाचा शोध लागल्यानंतर जीवन अधिक गतिमान झाले. त्यानंतर जवळजवळ हजार वर्षांनतर मुद्रणकलेचा शोध लागला व ज्ञानाचे, माहितीचे संकलन मोठ्या प्रमाणावर केले गेले आणि जगभर ज्ञानाचा प्रसार झाला. ज्ञानाची देवाणघेवाण सहज व सुलभ झाली.
युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीनंतर यंत्रांची निर्मिती व वापर सर्वत्र सुरु झाला. त्यांनतर अलिकडच्या काळात आईनस्टाईनने सापेक्षतावादाचा सिद्धांत शोधून काढला तेव्हा विज्ञान आणि तंत्रज्ञानात क्रांती झाली. संगणकाचा शोध हा माहिती तंत्रज्ञानाची पायाभरणी होती. आज माहिती तंत्रज्ञानाने संपूर्ण जगावर मोहिनी घातली आहे. कोणतेही क्षेत्र घ्या. माहिती तंत्रज्ञान वगळल्यास त्यातील जीवनदायी तत्त्वच नष्ट होऊन जाईल. आर्थिक, उद्योग, कृषी, शिक्षण, राजकारण, व्यापार, उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान हा आत्माच मानला जातो.
निवडणुका जिंकण्यासाठी, राजकीय कारभार सुरळीत चालवण्यासाठी, बँकिंग व्यवहारासाठी, प्रवासासाठी रस्ते शोधताना, घरपोच वस्तू व सेवा प्राप्त करण्यासाठी व अगदी काहीही करण्यासाठी आयटी क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे.
जगभरातील करोडो तरुण Social Media वर उपलब्ध आहेत. त्यांच्यापर्यंत आपला उद्योग पोहोचवणे सर्वात कमी किमतीत व कमी वेळेत सहजसाध्य झाले आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, गुगल प्लस, हाईक, टेलिग्राम असे अगणित मोबाईल ॲप्स सर्वांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेली पाहायला मिळतात. तुमच्या आमच्या सर्वाच्या मोबाईलमध्ये या social media उपकरणांचा समावेश हमखास असतो. जो कोणी समाज माध्यमाचा वापर करत नाही त्याला खचितच काही कळत नाही असा समज इतर लोकांचा होऊ शकतो.
दिवसेंदिवस स्वस्त होणारे नेटपॅक खिशाला परवडत असल्याने तरुणाई मोबाईलची बॅटरी संपेपर्यंत मोबाईल हातातून सोडत नाही. अवघे जग आभासी जगाला (Virtual World) वास्तव मानू लागले आहे. दिवसभरातला अधिकाधिक वेळ मोबाईलवर व्यस्त असलेल्या व्यक्ती सर्व काही गुगलला विचारतात. आजकाल रस्ता विचारावा लागत नाही. वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात जावे लागत नाही. पैशाचे व्यवहार करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. मोबाईल व टीव्हीचे रिचार्ज घरबसल्या होऊ लागले. कुठेही जाताना खिशात रोख मोठ्या प्रमाणावर ठेवण्याची पध्दत आता इतिहासजमा झाली आहे. प्रियजनांना वाढदिवस व इतर प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी आठवण करुन देणारे सहाय्यक (Reminder) तर साध्या मोबाईलमध्ये सुध्दा उपलब्ध आहेत. नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करता येतात. Video conferencing च्या माध्यमातून घरबसल्या मुलाखती देता येऊ लागल्या आहेत. परिक्षा व कितीतरी प्रशिक्षण क्रम घरबसल्या व्यक्ती शिकू लागला आहे. कर्जापासून अगदी आरोग्याचा सल्ला गुगल देऊ लागले आहे. स्वयंपाकघरातून बेडरुममध्ये व्हॉट्सॲपद्वारे संभाषण केले जाऊ लागले आहे. विनाचालक कार लवकरच बाजारात येतील. तुमचा पगार व इतर देणी-घेणी थेट तुमच्या खात्यात जमा होत आहेत. अशी न संपणारी उदाहरणांची यादी आहे. या सगळ्या गोष्टी आपले जीवन सुलभ व सोपे करण्यासाठी खूप सोयीस्कर झाल्या आहेत. ग्राहक म्हणून विचार केल्यास फायदेशीर ठरतातच.
जेव्हा आपण व्यावसायिक म्हणून किंवा उद्योजक म्हणून विचार करतो तेव्हा आपल्या दृष्टीने सोयीस्कर झालेल्या काही गोष्टींची यादी पाहू या. ज्याप्रमाणे ग्राहक घरबसल्या ऑर्डर देऊ लागला आहे, त्याप्रमाणे आपल्याला ग्राहकांकडून त्या ऑर्डरचे पैसे थेट खात्यात जमा होण्याची प्रक्रिया निर्माण झाली आहे. दुकानात येऊन ग्राहक वस्तूंची निवड करताना दाखवावे लागणाऱ्या varieties नुसार होणारा पसारा होत नाही. त्याशिवाय वेळ वाचतो तसेच ग्राहकाची मानसिकता जाणून घेण्याची गरज उरत नाही. ग्राहक स्वतःच्या आवडी निवडी, पाहिजे तेवढ्या varieties, त्याच्या गरजेनुसार व आर्थिक क्षमतेनुसार ऑर्डर करतो त्यामुळे ग्राहकाला झेलायची वेळ विक्रेत्यावर येत नाही. दरामध्ये घासाघीस करावी लागत नाही. आपल्याला परवडणारी सूट (Discount) देऊन ग्राहकाला आकर्षित करता येते. जगभरातल्या कोणत्याही ठिकाणाहून आपल्याला ग्राहक मिळू शकतात. वेगवेगळ्या परवानग्या काढण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत नाहीत. कंपनी नोंदणी (Company Registration) पासून कर भरणा (Tax Filing) करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी स्वतःहून बसल्या ठिकाणी करु शकतो. व्हर्च्युअल ऑफिसच्या माध्यमातून व्यवसायाच्या कक्षा रुंदावतात. २४ * ७ म्हणजे आठवड्याचे सातही दिवस दररोज २४ तास आपला व्यवसाय आपल्या प्रत्यक्ष सहभागाविना चालू राहतो. तुम्ही झोपलेले असताना, जेवताना, चहा पिताना, गप्पा मारताना, व्यायाम करताना तसेच अगदी सहलीला गेल्यावर सुध्दा व्यवसाय चालूच राहतो. असे कितीतरी चमत्कार होत असतात.
मात्र हे सगळं एवढं सोपं असूनही आपल्याला हे सर्व कसं साध्य करुन घेता येईल. आपल्या व्यवसायाची वेबसाईट असावी. त्या वेबसाईटला ऑनलाईन पध्दतीने ग्राहकांकडून पैसे येण्यासाठी पेमेंट गेटवे जोडलेला असावा. ग्राहकाला ऑर्डर करण्याची व्यवस्था असावी. व्यवसायाचे फेसबुक पेज असावे. सर्च इंजिन ऑप्टीमायझेशनच्या माध्यमातून आपली वेबसाईट गुगल शोधात पहिल्या क्रमांकावर कशी आणायची? बल्क मेसेज व बल्क Email काय आहे? त्याचा उपयोग करायचा कसा? फेसबुक पेज कसे तयार करावे? त्याचा प्रसार, प्रचार व प्रसिध्दी कशी करावी? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे साध्या भाषेत जाणून घेण्यासाठी एक महिनाभर आपण दररोज सकाळी दहा वाजता एक विषय घेऊन भेटू या.
तुम्हाला पडणारे प्रश्न विचारा. तुमच्याकडे असलेली माहिती आम्हाला द्या. त्यामुळे त्या माहितीचा फायदा जास्तीत जास्त उद्योजकांना होईल. चला तर उद्योजकता वाढीसाठी माहिती तंत्रज्ञान व समाज माध्यमाचा वापर करुन यशाच्या नव्या टप्प्यावर जाऊया.
स्पर्धेच्या युगात जागच्या जागी टिकून राहण्यासाठी प्रचंड वेगाने धावायची गरज आहे. आहे तिथे टिकून राहण्यासाठी प्रत्येकाला अतिशय वेगाने धावणे अपरिहार्य बनले आहे. कारण प्रत्येकाची स्पर्धा जगातील प्रत्येकाबरोबर आहे. अशा वेळी व्यवसायात उतरणाऱ्या प्रत्येक बिझनेसमनला स्मार्ट पध्दतीने जगाच्या पटलावर वावरावे लागत आहे.
सोशल मीडिया, वेबसाईट, डिजिटल प्रोग्रॅमिंग हे रोजच्या जीवनाचे भाग बनले आहेत. अशा काळात प्रत्येक उद्योजकाच्या पोटात भीतीचा गोळा आणणारी गोष्ट म्हणजे ज्याला डिजीटल जगाशी जोडता येणार नाही त्या उद्योजकाचा व्यवसाय कालबाह्य ठरणार आहे. पानपट्टी, टॅक्सी, रिक्षा, किराणा दुकाने सुध्दा ऑनलाईन व्हायला लागली आहेत.
डिजीटल उपकरणांमुळे जग एकदम जवळ आले. त्यात प्रचंड बदल झाले. या आभासी जगाशी आपल्याला जुळवून घेण्यासाठी तयार राहणे गरजेचे आहे. या नव्या डिजीटल जगात हौस – नवसे – गवसे यांची संख्या सुध्दा प्रचंड प्रमाणात वाढली आहे. म्हणून आपला व्यवसाय डिजीटल करण्याआधी आपल्याला डिजीटल मार्केटिंगची पायाभूत माहिती असणे गरजेचे आहे. आपण जर या क्षेत्राशी संपूर्णपणे अनभिज्ञ असू तर भरल्या बाजारात आपल्याला ठगवणाऱ्यांची संख्या कमी नाही. तेव्हा जाणकार बनण्यासाठी आपल्याला डिजीटल मार्केटिंग कळणे, त्याच्या सेवा कुणाकडून घ्यायच्या कोणावर विश्वास ठेवायचा हे शिकणे सुध्दा गरजेचे आहे.
काही महिन्यापूर्वी एका नवीन उद्योजकाने ई-कॉमर्स वेबसाईट बनवायला दिली. त्या कंपनीने त्या वेबसाईटवर काम करण्याचे ४० हजार रुपये प्रतिमहिना द्यावे लागतील असे सांगितले. आता हा उद्योजक नवीन होता. त्याला या वेबसाईट किंवा आयटी क्षेत्रातील काहीच माहिती नव्हती. तो कबूल झाला. साडेतीन महिन्यानंतर त्याचे बील १ लाख ४० रुपये झाले तरी सुध्दा त्या वेबसाईट १० टक्के काम सुध्दा झाले नव्हते. आता तो इतर सगळीकडे त्याच्या वेबसाईटची जाहिरात करुन बसला होता. आणि ती कंपनी केवळ डोमेनचे १ लाख चाळीस हजार मागत होती. अशा दुःखद कथा ऐकायला मिळतात. तेव्हा मन सुन्न होते. अजून कुणी या गर्तेत फसू नये म्हणून या पुस्तकाचा घाट घातला आहे.
गेल्या पाच वर्षात जेवढे बदल आपण पाहिलेले आहेत. तेवढे बदल संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात घडून आलेले नाहीत. गेल्या काही वर्षात आपल्याला वस्तू खरेदी करण्यासाठी किराणा दुकान, सुपर मार्केट व मॉलमध्ये जाणे भाग होते. आता मात्र घरबसल्या फ्लिककार्ट, स्नॅपडील सारख्या कंपन्यांना हव्या त्या वस्तूची ऑर्डर द्या. दुसऱ्या दिवशी ती वस्तू आपल्या दारात येऊन उभी असते. त्याचे पैसेसुध्दा वस्तू हातात मिळाल्यावरच द्यायचे आहेत. पैशासाठी नोटा किंवा रोख रक्कमेचे निम्याहून अधिक व्यवहार इतिहासजमा झाले आहेत. मोबाईलचा रिचार्ज करणारी दुकाने बंद व्हायला लागली आहेत. कारण प्रत्येकजण आपल्या मोबाईल मधून रिचार्ज करु लागला आहे.
सायबर कॅफेत बसण्यासाठी तरुणाई रांग लागलेली असायची त्या ठिकाणी आता सायबर कॅफे औषधाला सुध्दा सापडणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. डाटा सेवेवर पैसे कमावणाऱ्या टेलिकॉम कंपन्यामध्ये जास्तीत जास्त डाटा व इंटरनेट स्पीड देण्याची जणू काही स्पर्धाच चालू झालेली आहे. प्रत्येकाच्या हातात डिजीटल उपकरणे आलेली आहेत. ती कमालीची स्वस्त व खिशाला परवडणाऱ्या दरात तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. बातम्या वाचण्यासाठी वर्तमान पत्र किंवा टीव्ही वर अवलंबवून राहावे लागत नाही.
अशा परिस्थितीत जगाची विभागणी एका न दिसणाऱ्या रेषेने दोन भागात झाली आहे. त्यातील पहिल्या भागाला वास्तव जग (Real World) म्हणतात. तर दुसऱ्या भागाला आभासी जग (Virtual World) म्हणतात. खऱ्याखुऱ्या जगात जगण्यासाठी या आभासी जगाचा आधार घेणे अपरिहार्य आहे. म्हणून या नव्या जगाशी जोडून राहण्यासाठी डिजीटल मार्केटिंगची माहिती व त्याचा वापर करुन आपला व्यवसाय वाढवणे ही प्रत्येक लहान मोठ्या उद्योजकाची गरज बनली आहे. तेव्हा आपण या डिजीटल दुनियेत प्रवेश करण्यासाठी तयार होऊया.
तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला हे कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. लेख आवडला असेल तर लाइक आणि subscribe जरूर करा आणि हो अजून कोणत्या विषयाची माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.
वयाची १८-२२ वर्षे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी का व्यवसाय करावा हा कोड्यात टाकणारा प्रश्न सर्व तरुणांना पडत असतो, कारण आईवडिलांवर अवलंबून राहण्याचे सोडून स्वतःच्या कर्तृत्वाने जगात आपला ठसा उमटवण्याचे हे वय असते. उमेद असते, आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी हवे ते करण्याची तयारी असते; पण आपल्याला काय हवे हे मात्र समजत नाही.
वयाची १८-२२ वर्षे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी का व्यवसाय करावा हा कोड्यात टाकणारा प्रश्न सर्व तरुणांना पडत असतो, कारण आईवडिलांवर अवलंबून राहण्याचे सोडून स्वतःच्या कर्तृत्वाने जगात आपला ठसा उमटवण्याचे हे वय असते. उमेद असते, आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी हवे ते करण्याची तयारी असते; पण आपल्याला काय हवे हे मात्र समजत नाही.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरुन एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर पुढे काय करणार? नोकरी की व्यवसाय? ह्या प्रश्नाला मिळालेली काही उत्तरे.
१. नोकरी करणार कारण घरची परिस्थिती व वातावरण व्यवसायाला अनुकूल नाही, शिवाय भांडवलसुध्दा नाही.
२. काही काळ नोकरी करणार, मग स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरु करणार आहे. काही दिवस नोकरी केली तर, भांडवल उभारणी करता येईल.
३. व्यवसायच करणार आहे काहीतरी. काहीही झाले तरी व्यवसायच करायचा.
आता वरील तीनही प्रकारच्या तरुणांच्या मताचे विश्लेषण करुया. पहिल्या प्रकारात एकतर त्या तरुणाला नोकरीच करायची असते, मात्र व्यवसाय न करण्याची काही कारणे तो पुढे करत असतो. नोकरीची सुरूवात सुध्दा अगदी तुटपुंज्या उत्त्पन्नावर होते, मग पुढे त्या उत्त्पन्नात फार वेगाने वाढ होते असेही काही नाही. असे तरुण जीवनभर rat race मध्ये अडकून पडतात. नोकरी, पगार, घर, घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण, आरोग्य असे नेहमीचे प्रश्न सोडवतंच आयुष्य पुढे सरकत असते, त्यात फार उल्लेखनीय असे काही घडत नाही, पण ह्या चक्रात अडकलेला माणूस सहजासहजी बाहेर पडत नाही. हा निर्णय घेण्याची काही कारणे आहेत, त्यामध्ये जोखीम घेण्याचे धाडस नसणे, इच्छाशक्तीचा अभाव व न्यूनगंड ही काही महत्वाची कारणे आहेत, यावर थोड्याफार प्रयत्नांनी मात करता येते.
दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तींना काही काळ नोकरी करुन भांडवल उभे करायचे असते. काही प्रमाणात उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावायचा असतो. ह्या व्यक्तींना कमी प्रमाणात जोखीम घ्यायची असते. हेही थोड्याफार फरकाने पहिल्या प्रकारच्या व्यक्तीसारखी सुरवात करतात. मग पगार, संसाराचे प्रश्न व कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे rat race मध्ये अडकतात व बाहेर पडायची इच्छा असून बाहेर पडत नाहीत व पहिल्या प्रकारच्या व्यक्तीप्रमाणे यांचेपण आयुष्य फिरत राहते. स्वतः पैसे कमावणे हा भांडवल उभे करण्याचा केवळ एकमेव मार्ग नाही. इतर अनेक मार्गांनी भांडवल उभे करता येते. भांडवल निर्मितीचे इतर मार्ग पुढे आपण पाहणार आहोत. भांडवलाच्या इतर पर्यायांनी जीवनात वेगाने पुढे जाण्याचा मार्ग सापडेल.
तिसऱ्या प्रकारचे तरुण हे काहीसे ठाम, पण द्विधा मनस्थितीत असतात. या तरुणांना अधिक खोलात जाऊन प्रश्न विचारले तेव्हा समजले की, काहीतरी व्यवसाय करायचा म्हणजे कोणता व्यवसाय करावा याचा पुसटसा अंदाजही यांनी बांधलेला नसतो. इच्छाशक्ती असते मात्र दिशा घ्यायला वेळ लागतो. सांगणारेही कुणी नसतात. मग स्वतःच्या अंदाजावर पुढे जाण्याचा प्रयत्न चालू होतो. हे तरुण खूप काही करण्याची उमेद ठेवतात. पुढे जाऊन त्यांना हवे करुनही दाखवतात.
मी काही जणांना पाहिजे तेवढे भांडवल देतो, तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहात, असा प्रश्न विचारला की मग त्यांच्याकडे काही उत्तर नसते. भांडवल, मनुष्यबळ, प्रशिक्षण याचा पुरवठा बाहेरुन करता येतो. त्याचे असंख्य मार्गसुध्दा आहेत. व्यवसाय करण्यासाठी लागणारी वृत्ती स्वतःतच असायला हवी किंवा तिची जोपासना स्वतःहून करायला हवी, मग व्यवसाय यशाच्या शिखरावर नेता येईल.
नोकरी करताना उत्पन्नाच्या, खर्चाच्या मर्यादा पडतात. त्याउलट व्यवसायामध्ये २४ तास झोकून देऊन काम करता येते. शेकडो माणसांना काम देता येते. ती माणसे तुमच्यासाठी काम करत असतात. सुरूवातीची काही वर्षे संघर्ष केला की, मनाप्रमाणे उत्पन्न व पाहिजे तेवढा वेळ व्यवसायातून प्राप्त करता येतो. उत्पन्नात होणारी वाढ ही बांबूच्या रोपट्याप्रमाणे वेगाने होत असते. मनसोक्त जगण्याचा, स्वतःच्या स्वप्नांसाठी काम करण्याचा आनंद घेत व्यवसाय करणे हे नोकरीपेक्षा सरसच.
भारत हा तरुणांचा देश आहे. जगातील सर्वात जास्त तरुणांचा हा देश म्हणजे प्रत्येकाचे लक्ष आकर्षित करुन घेत असतो, पण इथल्या तरुणाईला या गोष्टीची कितपत जाणीव आहे हे जाणून घ्यावे लागेल. या तरुणाईची अवस्था कस्तुरीमृगासारखी आहे. कस्तुरी ही मृगाच्या नाभीत असते. मृग कस्तुरी शोधण्यासाठी सर्व जंगलभर सैरावैरा धावत असतो, पण त्याला स्वतःच्या नाभीत असलेल्या कस्तुरीची जाणीव कधीच होत नाही. आपल्यातल्या अपार शक्तीची जाणीव फार कमी तरुणांना आहे.
एका महाविद्यालयात व्यावसायिक मार्गदर्शनाच्या चर्चासत्रात भाग घेण्यासाठी गेलो असता मुलांनी काही प्रश्न विचारले. उद्याची स्वप्ने पाहणारी ही तरुण पिढी. “उद्योजक कसे होता येईल?” असा एक प्रश्न होता. त्यावेळी त्यांच्याशी झालेल्या संवादाचे हे संकलन.
आपण जेव्हा एखादे काम स्वीकारतो किंवा एखादी नोकरी स्वीकारतो तेव्हा आपणास त्या कामाचे जे पैसे मिळतात ते हवे असतात म्हणून आपण ते काम किंवा नोकरी स्वीकारतो. पण त्यामुळे आनंदी होतोच असे नाही. केवळ जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पैशासाठी आपण ती नोकरी स्वीकारतो. आणि आपले त्या कामात लक्ष लागत नसल्यामुळे दु:खी कष्टी होतो. तसेच एखादा व्यवसाय किंवा उद्योग करावयाचा असेल तर आपल्याला तो व्यवसाय/उद्योग आवडतो का? ह्या प्रश्नाचा विचार सुरुवातीला करणे आवश्यक आहे. “I am the Boss of Myself” असे ज्याला वाटते तोच उद्योजक होऊ शकतो. ९ ते ५ काम करणारी मंडळी, त्यांची मानसिकता अगदी वेगळी असते. ते धाडसी निर्णय घेऊ शकत नाहीत. ते उद्योगात यशस्वी होऊ शकत नाहीत.
व्यवसाय करण्यासाठी सिद्ध असलेल्या व्यावसायिकाने हे लक्षात घ्यावयास हवे की त्याला मार्केटिंग येणे आवश्यक आहे. मार्केटिंग हे शास्त्र नव्हे. त्यासाठी उपजत शहाणपण आणि अनुभव गाठीशी असावा लागतो. आपल्याबाबत लोकांना माहिती हवी. आपण विकणाऱ्या वस्तूची चांगली माहिती हवी. तुम्ही स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकले पाहिजे. तुम्हाला लोकांनी सहज ओळखले पाहिजे. इतरांच्या तुलनेत तुम्ही तुमची चमक दाखवली पाहिजे. अगदी तुम्हाला एस्कीमोलाही फ्रीज विकता आले पाहिजे किंवा केस नसणाऱ्याला कंगवा विकता आला पाहिजे. आपण जी वस्तू विकणार आहोत त्यात नाविन्य हवे. शक्यतो त्यासारखी दुसरी वस्तू बाजारात नसावी. नाविन्य आणि वेगळेपणा फार महत्वाचा आहे. तोच खरा व्यावसायिक/उद्योजक जो नाविन्यपूर्ण वस्तूंची निर्मिती करून त्यासाठी बाजार निर्माण करतो. उदा. स्टीव्ह जॉब्स. I-POD बाजारात आणला. लोकांना त्याची आवश्यकता होती का? तर नाही. तरीही लोकांना ती वस्तू हवी हवीशी वाटते आणि त्यातून पैसा कमविता येतो. नवीन ग्राहक निर्माण करणे व त्यासाठी बाजारपेठ निर्माण करणे हे फार महत्वाचे असते.
स्टीव्ह जॉब्स यशस्वी झाले त्याचे कारण त्यांनी नव्या वस्तू बाजारात आणल्या. लोकांना त्या हव्या हव्याशा वाटल्या. तुमची सेवा, ह्याबद्दल लोकांना विश्वास वाटायला हवा. जो हे करतो तो खरा व्यावसायिक/ निर्माता. त्या वस्तूची नुसती विक्रीच झाली पाहिजे असे नाही तर त्यामुळे समाज जीवनावर त्याचा प्रभाव पडला पाहिजे. त्यामुळे सामान्य माणसाचे आयुष्य बदलले पाहिजे. तुम्ही तुमची बाजारपेठ तयार केली पाहिजे. टिकवून ठेवली पाहिजे. तुमच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा तुम्ही उठून दिसणे आवश्यक आहे बिल गेट्स हे उत्तम विक्रेते आहेत. स्पर्धा ही महत्वाची असतेच. पण स्पर्धेत तुमचे लक्षणीय असणे महत्वाचे असते. स्पर्धा ही असणारच. स्पर्धेला टक्कर देत पुढे गेले पाहिजे. जे खूप लढाऊ असतात त्यांच्या मागेच यश धावत येते.
कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या नव्या पिढीच्या व्यावसायिकाकडे पाहिले असता हे सहज लक्षात येते की त्यांच्याकडे योग्य ते भांडवल नसते. त्यांच्याकडे नव्या नव्या कल्पना असतात, इच्छाशक्ती असते ,उत्साह असतो. ह्या नव्या कल्पनाशक्तीमुळेच ते वेगळे दिसून येतात. आपल्या डोक्यात एकाच वेळी अनेक कल्पना असतात. अनेक कल्पनांची गिरणी चालू असते. जेव्हा वेळ योग्य असते, जमीन सुपीक असते तेव्हा कल्पनेला उगवण्याची म्हणजे फुलण्याची संधी मिळते. आपले मन स्वप्नाळू हवे. विचारक्षमता तीव्र हवी आणि कामाचे योग्य नियोजन हवे. तरच कल्पना प्रत्यक्षात उतरू शकते. आर गोपीनाथ ह्यांनी सर्वात स्वस्त हवाई प्रवास ही कल्पना पुढे आणली व एक नवा प्रयोग यशस्वी करून दाखविला. आज सामान्य माणसांना हवाई प्रवास शक्य झाला आहे .
बहुतेक व्यवसाय अयशस्वी होतात त्याचे प्रमुख कारण म्हणजे व्यावसायिकांचा अहंगंड. दोन सहकारी व्यावसायिकांचा अहंगंड त्यांना अयशस्वी करतो. आयुष्यातील जगण्याचा अनुभव महत्वाचा असतो.
सर्वच माणसं स्वप्नं बघतात. सगळ्यांची स्वप्नं सारखी नसतात. काही व्यक्ती फक्त रात्री झोपेत असतानाच स्वप्नं बघतात व सकाळी त्या स्वप्नांना आठवून त्यांचा विचार करतात किंवा विसरून जातात. पण ज्या व्यक्ती फक्त दिवसाच स्वप्नं बघतात त्या खूप वेगळ्या असतात. त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीचा पाठलाग करावयाचा असतो. ते त्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करतात. मेहनत घेतात. ही ध्यास असलेली माणसेच खऱ्या अर्थाने यशस्वी होताना दिसतात. अशी स्वप्नं बघणे आणि प्रयत्नशील राहणे हे खऱ्या व्यावसायिकालाच जमते. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या माणसाचे काम करणारा धीरुभाई अंबानीसारखा साधा माणूस पुढे जगातील एका मोठ्या पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीचा मालक कसा झाला हे समजून घेतले पाहिजे. महाविद्यालयीन शिक्षण सोडून स्वतःचे छोटे उद्योग उभे करणारे बिल गेट्स किंवा स्टीव्ह जॉब्स स्वतःचे औद्योगिक साम्राज्य कसे उभे करू शकले हे शिकले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. THINK BIG AND START SMALL, हे सूत्र महत्वाचे.
तुम्ही तुमच्यापेक्षा हुशार व्यक्तींना तुमच्या व्यवसायात सहकारी म्हणून घेतले पाहिजे. तुमच्यापेक्षा कमी हुशार व्यक्तींना घ्याल, तर तुम्ही ज्यांचे नेतृत्व करणार आहात ते खुजे असल्यामुळे तुमचे नेतृत्व खुजेच असेल. तुमच्या कंपनीत जर जास्त कर्तृत्ववान माणसे असतील तर तुमची कंपनी उंचावर जाईल. नारायण मूर्तींना हे सहज जमले म्हणून त्यांचे नेतृत्व वादातीत आहे. तुमचे नेतृत्व निगर्वी हवे. त्यामुळेच रतन टाटा यशस्वी झाले. त्यांनी Nano कारचे स्वप्न पाहिले. ते प्रत्यक्षात उतरवून दाखविले. त्यामुळे सगळ्या कंपन्यांनी छोट्या कार बाजारात आणल्या. हा बदल घडून आणला तो Nano कारने. वेगळी अशी नवी वस्तू बाजारात आणणे हे महत्वाचे असते. नवी वस्तू पण सर्वात स्वस्त असा विचार त्यांनी दिला आणि सारे कार उद्योजक त्याच्या मागे धावत गेले कारण त्यांना नव्या बाजाराची जाणीव झाली.
तुमची इच्छाशक्ती, तुमची आत्यंतिक आवड, तुमची निर्मिती क्षमता, तुमची ध्येयपूर्ती किंवा स्वप्नपूर्ती यासाठी चाललेली धडपड, त्यासाठी तुमचे झोकून देणे, हेच तुमच्या यशस्वी होण्याचे खरे भांडवल आहे. तुमची विचार क्षमता व कल्पनाशक्ती हे महत्वाचे भांडवल आहे. निवडलेला व्यवसाय हे माध्यम आणि तुमचे कर्म हाच खरा मार्ग आहे. ज्या व्यक्ती ह्याचा सतत पाठलाग करतात त्यांच्यासाठी परमेश्वरही त्यांच्या पाठीशी उभा राहतो. जे नैसर्गिकदृष्ट्या अनुचित व पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे ते आर्थिक दृष्ट्या फार नुकसानीचे असते हे ही त्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
तुम्ही उडप्याचे हॉटेल पाहिले आहे काय? ते चालविणे महाकठीण काम आहे, हे माहित आहे का? ते हॉटेल चालविणे म्हणजे रोज तुमच्या मुलीचा लग्न समारंभ घडवून आणण्याइतके कठीण आहे. उद्योजक होणे असेच कठीण आहे असे गोपीनाथ ह्यांचे मत पटण्यासारखे आहे.
नुसते ध्येय समोर ठेऊन जगणे किंवा मार्ग क्रमणे महत्वाचे नाही. त्यासाठी आपणास दूरदृष्टी असावयास हवी. खरी दूरदृष्टी असते तीच माणसे व्यवसायात यशस्वी होतात. हेन्री फोर्ड , वॉल्ट डिस्ने, स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स यांनी उद्योगाला सुरुवात केली पण अनेकदा ते अयशस्वी झाले, पण त्यांना दूरदृष्टी होती. काय करावयाचे की ज्यामुळे बदल घडून येतील ह्याची त्यांना स्पष्ट जाणीव होती. अशीच मंडळी काहीतरी भव्य दिव्य करून दाखवितात. उद्योजकाला उद्योग उभारण्यासाठी दूरदृष्टी असावी लागते, नजीकच्या काळापेक्षा भावी काळात उद्योग कसा वाढेल ह्याचा विचार महत्वाचा असतो. नजीकच्या काळातील समस्या सोडवताना दूरच्या काळातील विचार तेवढाच महत्वाचा असतो.हे ज्यांना जमते तेच यशस्वी होतात.
व्यावसायिक म्हणजे तो माणूस, जो संपत्तीची निर्मिती करतो. नवी वस्तू, नवा गिऱ्हाईक, नवी सेवा, नवा ग्राहक. नवे असणे, उपयुक्त असणे व ग्राहकाला हवेहवेसे वाटणे, हे ज्याला सहज जमते तो खरा व्यावसायिक. नवी कल्पना, नवी वस्तू पण कमी पैशात निर्मिती, नवी सहज उपलब्ध होणारी सेवा ह्या त्रि-सूत्रीवर व्यवसाय अवलंबून असतो. स्टीव्ह जॉब्सने I-POD ची निर्मिती करून क्रांतीकारक बदल घडवून आणला. बिल गेट्सनी नवी क्रांती घडवून आणली अर्थात त्यासाठीचे आवश्यक असलेले मनुष्यबळ त्यांनी उभे केले.
थॉमस एडिसनने विद्युत दिव्याचा नुसता शोधच लावला नाही, तर निर्मिती करून जगाला विद्युतमय केले. सॅम वॉल्टनचे उदाहरण घ्या. “प्रत्येक दिवशी कमी किमतीत” ह्या संकल्पनेवर त्यांनी नवी बाजारपेठ उभी केली आणि खूप संपत्ती उभी केली. अंबानींनी “सारी दुनिया मुठ्ठीमे” अशी घोषणा देऊन सामान्य माणसाना मोबाईल विकला. ही सर्व उदाहरणे हे दर्शवितात की उद्योजक हा महाविद्यालयात व्यवस्थापकीय शिक्षण घेऊन तयार होत नाही. त्यासाठी त्याला तशी आतून उर्मी असावी लागते. त्यासाठी आपण खूप बुद्धिमान असले पाहिजे असे नाही, परंतु आजूबाजूचे सर्व जाणून घेण्यासाठी उत्सुक असले पाहिजे. तेच महत्वाचे ज्ञान आत्मसात करता आले पाहिजे .
बहुतेक धंदे किंवा व्यवसाय अगदी सुरुवातीच्या काळातच बंद पडतात. जेव्हा सहकारी एकमेकाला पूरक नसतात किंवा त्यांची विचार करण्याची पद्धती सारखी नसते व काम करण्याचे मार्ग भिन्न असतात तेव्हा व्यवसाय बंद पडतात. पूरक सहकारी निवडणे फार महत्वाचे असते . तरच तणाव मुक्त व्यवसाय करता येतो. दोन किंवा दोन पेक्षा अधिक पार्टनर असतील तर कोणातरी एकाचे नेतृत्व मान्य करून व्यवसाय करता आला पाहिजे. दोन दोन नेतृत्व असतील तर व्यवसाय चालू शकत नाही. एका जहाजाला दोन कप्तान असू शकत नाहीत.
बरेच जण व्यवसाय/उद्योग सुरु करतांना म्हणतात, “मला नवा व्यवसाय सुरु करावयाचा आहे. माझ्या वरिष्ठांना त्याची काहीच कल्पना नाही. जर व्यवसाय यशस्वी होण्याची चिन्हे दिसली तरच मी नोकरीचा राजीनामा देईल.” असा विचार करणारे लोक उद्योजक होऊ शकत नाहीत. तुम्हाला जर खरे उद्योजक व्हायचे असेल, तर हे लक्षात ठेवा की तुम्हाला स्वतःला झोकून देता आले पाहिजे. अर्थात त्यासाठी हालअपेष्टा सहन करण्याची तयारी हवी.
तुम्ही तुमच्या जागेचे भाडे वेळेवर देऊ शकणार नाहीत. कर्मचार्यांना पगार देताना तुमची तारांबळ होईल. बायकोला साडी घेण्यासाठी तुमच्याजवळ पैसे नसतील. मुलांची महागडी शिक्षण फी भरण्यासाठी त्रास होईल. अशा असंख्य अडचणीना तोंड द्यावे लागेल. ह्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी नवे मार्ग शोधावे लागतील. ते सहज जमते, प्रयत्न करावे लागतात . पण त्यासाठी तुमची झोप उडालेली असेल, असे जेव्हा घडेल तेव्हाच तुम्ही तावूनसुलाखून निघाल. निसर्ग जसा अडचणी निर्माण करतो तसाच अडचणीवर मात करण्यासाठी मेंदूला चालनाशक्ती देतो. त्या शक्तीचा उपयोग करता आला पाहिजे.
नवा उद्योग किंवा व्यवसाय उभा करतांना अडचणीचा डोंगर उभा राहणारच. त्या अडचणीवर मात करतानाच तुम्ही घडत जाल. नदीचा गुणधर्म वाहणे आणि समुद्राकडे धावणे. तुम्ही नदीसारखे असाल तर दगड धोंड्यावर मात करून वाहत राहणार व शेवटी समुद्राला मिळणार म्हणजेच यशस्वी होणार. यशाचा समुद्र तुमची वाट पाहत असेल हे लक्षात ठेवा. तुमच्यामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती हवी. प्रचंड उत्साह हवा. मग यशाची शिखरे तुमचीच.
सगळ्या लढाया ह्या प्रथम मनाच्या अवकाशात लढल्या जातात. हे लक्षात असू देणे महत्वाचे आहे. आपल्याला आजूबाजूच्या सिमीत अवकाशाची कल्पना असलेली बरी. जेव्हा आपण निर्णय घेत नाही, तेव्हाच आपण अपयशाच्या दिशेने वाटचाल करतो. हे ही लक्षात असू द्यावे.
धंदा करावयाचा असतो तो “नफा ” मिळवण्यासाठी. “नफा” हा धंदा करणाऱ्यासाठी पवित्र मंत्र आहे. ते मान्य नसेल तर ह्यात पडू नका. नफा असेल तरच धंदा जगेल. तोटा कमी करणे ही धंद्याची पहिली पायरी. सतत तोटाच होत असेल, तर धंदा बंद करणे ही महत्वाची दुसरी पायरी. आपल्याला यश मिळू लागले की लोक आपल्याला जेवायला या असे आमंत्रण देतात. तेव्हा हे लक्षात असू द्यावे की कोणीही, कधीही फुकट जेवायला बोलवीत नसते. लोकांना ओळखता आले पाहिजे.
कोणतीही गोष्ट पूर्ण करावयाची असेल, तर सर्वात प्रथम त्यासाठी कोणत्या दिवसापर्यंत पूर्ण करावयाची हे निश्चित करा. मनामध्ये तो दिवस पक्का करा. हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे. डेडलाईन महत्वाची असते . तरच गोष्टी साध्य होतील. व्यवस्थापकीय शिक्षण ठीक. पण जे शिकवले जाते ते सारेच उपयोगी पडते असे नाही. प्रत्यक्ष व्यावसायिक जीवनात वेगळेच मार्ग निवडावे लागतो. नुसत्या पुस्तकी शिक्षणाचा फारसा उपयोग होत नाही.
अंटार्टिका मोहिमेसाठी एक जाहिरात देण्यात आली होती. ती अशी …. “अतिशय धोकादायक मोहिमेसाठी माणसे हवीत. अर्ज करा. खूप कमी पगार, मरणाची थंडी असलेला प्रदेश, सहा सहा महिने रात्रीचे काम, सतत अडचणीशी सामना, निसर्गाशी युद्ध, जिवंत परत येण्याची कमी शक्यता परंतु यशस्वी झालात तर जागतिक सन्मान नक्कीच .” HAZARDOUS JOURNEY : ANTARCTICA
अशी जोखीम घेणारी माणसे किती असतात? उद्योगात किंवा व्यवसायात अशीच जोखीम असते. तशी जोखीम घेणार असाल तरच उद्योजक होता येईल. बघा जमते का?
एक लघु व्यवसाय मालक म्हणून, तुम्हाला तुमचे व्हिजन आणि योजना ही महत्त्वाची असते. यशस्वी व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला आर्थिक आणि विपणन (मार्केटिंग) योजना समाविष्ट असलेल्या बिझनेस योजनेची गरज भासते. जर तुम्ही लघु व्यवसाय मालक असाल, तर तुम्हाला माहिती आहे की, मार्केटिंग कठीण असू शकते.
सर्वत्र प्रत्येकजण लक्ष वेधण्यासाठी स्पर्धा करत असल्याचे चित्र आहे. अशात, या गर्दीत आपला पाय भक्कमपणे रोवून उभे राहणे कठीण आहे. मात्र, तुम्ही स्वतः मार्केटिंग करत असाल किंवा तुमच्याकडे मार्केटिंग विभाग असेल, तर काही धोरणे (स्ट्रॅटेजी) तुमच्या ब्रँडच्या जागरूकतेसाठी दृश्यमानता वाढवू शकतात. चला तर, लघु व्यवसाय मार्केटिंग स्ट्रॅटेजी पुढील 7 मुद्द्यांच्या आधारे जाणून घेऊयात…
१. प्रेक्षकांना कसे लक्ष्य करायचे?
जेव्हाही छोट्या व्यवसायाचे मार्केटिंग करण्याचा विचार येतो, तेव्हा योग्य प्रेक्षकांना लक्ष्य करणे जास्त गरजेचे असते. तुमच्या आदर्श ग्राहकावर लक्ष केंद्रित करणारी रणनीती विकसित करून, तुम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकता. या गोष्टी करण्यासाठी पुढील टिप्स पाहू शकता.
तुमचे टार्गेट मार्केट जाणून घ्या – तुमचा निश (ठरावीक लक्ष्य गट) स्पष्ट करा – तुमच्याशी स्पर्धा करणाऱ्या कंपनीचे संशोधन करा – सखोल लोकसंख्याशास्त्रीय (In-Depth demographic) डेटा वापरा – तुमच्या प्रेक्षकांचे वर्गीकरण करा – तुमचा मार्केटिंग संदेश तयार करा – ऑफलाईन मार्केटिंग करण्यास विसरू नका
२. कोल्ड ई-मेल मार्केटिंगचा फायदा घ्या
छोट्या व्यवसायाच्या मार्केटिंगमध्ये कोल्ड ई-मेलिंग हे सर्वात प्रभावी धोरणांपैकी एक आहे. संभाव्य ग्राहकासह कनेक्ट करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. संभाव्य ग्राहक जे कदाचित तुमच्या व्यवसायाशी परिचित नसतील. तुमच्या लहान व्यवसायाचे मार्केटिंग करण्यासाठी कोल्ड ई-मेल वापरण्यासाठी काही टिप्स-
संभाव्य ग्राहकांची यादी तयार करा
– तुम्हाला ज्या कंपन्यांना लक्ष्य करायचे आहे त्यांचे संशोधन करा आणि निर्णय घेणारे कोण आहेत ते शोधा. – वैयक्तिकृत ई-मेलचा ड्राफ्ट तयार करा, जो तुमच्या व्यवसायाची ओळख करून देतो आणि तुमच्या उत्पादनांसाठी किंवा सेवांसाठी संपर्क योग्य असेल असे तुम्हाला का वाटते, हे स्पष्ट करते. – ई-मेल पाठवा आणि आवश्यक असल्यास फोन कॉलसह पाठपुरावा करा. – आपल्या परिणामांचा मागोवा ठेवा आणि आवश्यकतेनुसार आपली रणनीती समायोजित करा.
३. तुमच्या व्यवसायाची ऑनलाईन जाहिरात करा
तुमच्या व्यवसायाची जाहिरात करताना, तुम्ही अनेक वेगवेगळी धोरणे वापरू शकता. मात्र, ही सर्व धोरणे तुमच्या व्यवसायासाठी प्रभावी ठरणार नाहीत. तुमच्या छोट्या व्यवसायासाठी सर्वोत्तम डिजिटल मार्केटिंग धोरण शोधण्यासाठी, तुम्हाला काही संशोधन करावे लागेल आणि काही भिन्न युक्त्या वापरून पाहाव्या लागतील.
सर्वात लोकप्रिय ऑनलाईन मार्केटिंग डावपेचांपैकी एक म्हणजे सोशल मीडिया जाहिरात. यामध्ये तुमच्या व्यवसायाचा प्रचार करण्यासाठी Facebook, Twitter आणि LinkedIn यांसारख्या प्लॅटफॉर्म्सचा वापर करू शकता. तुम्ही विशिष्ट टार्गेट ऑडियन्सला लक्ष्य करणाऱ्या जाहिराती तयार करू शकता किंवा तुम्ही तुमच्या सोशल मीडिया ॲप्सवर तुमच्या व्यवसायाबद्दल पोस्ट करू शकता. अनेकजण हल्ली मोबाईलचा वापर करतात, तेव्हा सोशल मीडिया पोस्ट किंवा गुगल जाहिरातींचा वापर करून तुमच्या ब्रँडचा प्रचार करणे ही चांगली मार्केटिंग आयडिया ठरू शकते.
४. ब्रँड जागरूकता निर्माण करण्यासाठी इन्फ्लुएन्सरचा वापर करा
तुमच्या छोट्या व्यवसायाचे मार्केटिंग करायचे असेल, तर तुम्हाला इन्फ्लुएन्सर्सकडे दुर्लक्ष करणे परवडणार नाही. इन्फ्लुएन्सर्स अशा प्रभावशाली व्यक्ती आहेत, ज्यांचे भरमसाठ फॉलोअर्स आहेत. इन्फ्लुएन्सर्स त्यांच्या चाहत्यांची मते बदलू शकतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झाल्यास, जर एखादा इन्फ्लुएन्सर तुमच्या उत्पादनाचा किंवा सेवेचा प्रचार करत असेल, तर त्याचे चाहतेही तुमच्या उत्पादनाची दखल घेतील.
५. स्थानिक व्यवसायाशी जोडले जा
तुमच्या छोट्या व्यवसायाचे मार्केटिंग करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे स्थानिक व्यवसायांशी जोडणे. तुम्ही तुमच्या क्षेत्रातील इतर व्यवसायांसह भागीदारी करता, तेव्हा तुम्ही संसाधने शेअर करू शकता आणि एकमेकांना तुमच्या ग्राहक बेसमध्ये प्रोत्साहन देऊ शकता. तुम्ही मार्केटिंग उपक्रम आणि इव्हेंटमध्ये देखील सहयोग (कोलॅबरेट) करू शकता.
स्थानिक व्यवसायांशी कनेक्ट होण्यासाठी, तुमच्या समुदायातील इतर व्यवसाय मालकांशी नेटवर्किंग करून सुरुवात करा. बिझनेस इव्हेंटला उपस्थित राहा आणि ऑनलाइन मंच तसेच गटांमध्ये सामील व्हा, जे स्थानिक व्यवसाय कोलॅबरेशनवर लक्ष केंद्रित करतात. तुम्ही स्थानिक व्यवसायांपर्यंत थेट पोहोचू शकता आणि कोलॅबरेट करण्याची ऑफर देऊ शकता.
६. इन्सेन्टिव्ह आणि सवलती ऑफर करा
इन्सेन्टिव्ह आणि सवलती या तुमच्या उत्पादने किंवा सेवांवरील टक्केवारी किंवा खरेदीसह मोफत आयटमच्या स्वरूपात असू शकते. तुम्ही लॉयल्टी प्रोग्राम देखील देऊ शकता, जे सतत संरक्षणासाठी ग्राहकांना बक्षीसे देतात. तुम्ही ऑफर करण्यासाठी ज्या कोणत्याही सवलती निवडाल, तुमच्या ग्राहकांना ते मौल्यवान वाटेल याची खात्री करा.
७. एसईओ (SEO) मध्ये गुंतवणूक करा
लोकांच्या आवडीची आणखी एक ऑनलाईन मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) होय. यामध्ये तुमची वेबसाइट ऑप्टिमाइझ करणे समाविष्ट आहे, जेणेकरून ती सर्च इंजिन परिणाम पृष्ठांवर वरच्या स्थानी दिसेल. SEO मध्ये गुंतवणूक करून, तुम्ही सर्च रिझल्ट्समध्ये तुमच्या वेबसाइटची रँकिंग सुधारू शकता आणि अधिक लोकांना आकर्षित करू शकता.
तुम्हाला वापरता येतील अशी अनेक भिन्न SEO तंत्रे आहेत आणि तुमच्या व्यवसायासाठी योग्य ती निवडणे महत्त्वाचे आहे. तुमचे बजेट मर्यादित असल्यास, तुम्ही Google AdWords किंवा Facebook जाहिरातींसारखी ऑनलाइन मार्केटिंग साधने वापरण्याचा विचार करू शकता. ही साधने तुम्हाला तुमच्या जाहिरातींसह विशिष्ट प्रेक्षकांना लक्ष्य करण्याची परवानगी देतात, जे तुम्हाला जाहिरात खर्चावर पैसे वाचवण्यात मदत करू शकतात.
कुठलाही व्यवसाय दीर्घकाळ चालवणे ही एक तारेवरची कसरत असते. या प्रवासात अनेक चढ-उतार हे येतंच असतात. कुठल्याही उद्योजकाचा सर्वसाधारण प्रवास कसा असतो याचे टप्पे आपण पाहूया.
पहिला टप्पा : स्टार्टअप! (शून्य – ५० हजार डॉलर्स)
जगभरात दरवर्षी सुमारे १० कोटी नवीन व्यवसाय सुरु होतात. दुर्दैवाने त्यातील ८० टक्के व्यवसाय ३ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकत नाहीत.
दुसरा टप्पा : लघुउद्योग (५० हजार ते ३ लाख डॉलर्स)
तुम्ही व्यवसाय सुरु केला आणि तो चांगला चालू लागला, तुम्हाला ग्राहक मिळू लागले, नवी उत्पादने तुम्ही बाजारात आणू लागलात. हा तुमचा संघर्षाचा काळ असतो. काहीजण आपला व्यवसाय स्वतःपुरता मर्यादित करून घेतात., तर काहीजण यातून पुढे जाऊन स्वतःची एक टीम बनवतात.
तिसरा टप्पा : यशस्वी व्यवसाय (३ लाख – २० लाख डॉलर्स)
आजवरचा तुमचा संघर्ष, तुमची मेहनत फळाला आली. आता तुमचा व्यवसाय एका शाश्वत गतीने चालू लागला आहे. आता तुम्ही तुमचे लक्ष तुमची टीम वाढवण्यावर द्यायला हवे. स्वतःसाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. तुमचा व्यवसाय आता तुमच्याशिवाय चालू लागला आहे. हे तुमच्या मेहनतीचे फळ आहे. आता आराम करायचा, फिरायचं, मौजमजा करायची, की आपला व्यवसाय पुढच्या टप्प्यावर न्यायचा?
जगातील पंधरा कोटी व्यवसायांपैकी ४ टक्क्यांहून कमी व्यवसाय ५ कोटी रुपयांपर्यंत आपला महसूल वाढवतात, तसेच ४ टक्क्यांहून कमी व्यवसाय १० वर्षांपेक्षा जास्त काळ टिकतात.
चौथा टप्पा : लघु व मध्यम उद्योग (२० लाख – १ कोटी डॉलर्स)
तुम्ही जसजसा व्यवसायाचा पसारा वाढवत जाता, नवनवीन आव्हाने तुमच्यासमोर उभी राहतात. या टप्प्यावर व्यवसायाचे नियोजन, व्यवस्था, बुद्धिमत्ता आणि प्रशिक्षण या गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासते आणि तुम्ही पुन्हा एकदा संघर्षमय अशा दुसऱ्या टप्प्यात जाता.
पाचवा टप्पा : मध्यम आणि मोठे उद्योग (१ कोटी – ५ कोटी डॉलर्स)
आता तुमचा व्यवसाय एवढा मोठा झालेला आहे, की तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रावर आणि जगावर प्रभाव पाडत आहात. तुमच्या व्यवसायाची एक वेगळी ओळख जगभर निर्माण झालेली आहे.
‘जुगार आणि विचार करून घेतलेली जोखीम यात फरक असतो.’ – एडमंड एच. नॉर्थ
हजारातील एक-दोन व्यवसाय ५ कोटी डॉलर्सचा टप्पा पार करून पुढे जातात. पण आजच्या जमान्यात तुम्ही भविष्यातील योग्य संधी ओळखल्या आणि नियोजनबद्ध पद्धतीने त्यावर काम केले, तर तुम्ही पूर्वी कधी नव्हे त्यापेक्षा जास्त वेगाने बाजारपेठ काबीज करू शकता. त्यामुळे आपले कामाची दिशा ठरवा, ध्येय निश्चिती करा आणि प्रवासाचा आनंद घ्या!!! आणि जर तुमचा व्यवसाय अयशस्वी ठरला तर? काळजी करू नका, पुन्हा सुरुवात करा…
उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी खालील १० गोष्टी लक्षात ठेवा.
१. आर्थिक सुरक्षिततेची योजना तयार करा.
२. पुढे कोणती पावले उचलायची आहेत याची माहिती मिळवा.
३. अशी बिझनेस आयडिया शोधून काढा जी यशस्वी होईल.
४. चांगल्या मार्गदर्शक किंवा सल्लागाराची मदत घ्या
५. यशस्वी होण्यासाठी ध्येयधोरणे आखा.
६. आत्मविश्वास वाढवा.
७. चांगले सहकारी तयार करा.
८. भविष्यातील ध्येय स्पष्ट असू द्या.
९. मोठी स्वप्नं बघा.
१०. संपूर्ण प्रवासाची ब्लूप्रिंट (आराखडा) बनवा.
या सर्व गोष्टींची गरज तुम्हाला सुरुवातीलाच पडणार नाही, पण उद्योजकतेचा प्रवास जसजसा पुढे सरकेल, यातील प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणे तुम्हाला गरजेचे आहे.
तथापि हा प्रवास तितकासा सोपा असणार नाही. तुम्हाला एकटं वाटू शकतं. तुम्ही रात्रंदिवस मेहनत करून छोट्या छोट्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करत असता, पण वारंवार येणाऱ्या अपयशामुळे मध्येच सोडून देण्याचा विचार तुमच्या मनात येऊ शकतो.
बरेच उद्योजक व्यवसायाच्या सुरुवातीलाच जोखीम घेतात. थोडेफार यशस्वी होतात, परंतु त्यानंतर व्यवसाय विकासासाठी जोखीम घेणं थांबवतात. नवीन संधींचा शोध घेत नाहीत. फक्त आहे तो व्यवसाय टिकवण्यावर भर देतात. कल्पना करा तुम्ही एखाद्या डोंगरावर गिर्यारोहणासाठी जात आहात. सुरुवातीला तुम्ही खूप आनंदात असता. आपण काहीतरी नवीन करतोय याची वेगळीच मजा आणि उत्सुकता तुमच्या मनात असते, पण चढण जशी अधिक कठीण होत जाते, तुम्ही चालताना मध्येच अडखळू लागता (बहुतांशी लोकांच्या बाबतीत हेच होतं). तुम्हाला पुढे जायचं असतं, पण जाता येत नाही आणि एवढ्या लांब जाऊन रिकाम्या हाताने परत आला म्हणून लोकं नावं ठेवतील या भीतीने माघारी जाऊ शकत नाही, अशा द्विधा मनस्थितीत तुम्ही अडकलेले असता.
या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि तुमच्या मदतीसाठी आणि तुम्हाला नवीन संधीचं दार उघडून देण्यासाठी एखादा चांगला मार्गदर्शक/प्रशिक्षक उपयुक्त ठरू शकतो.
हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या गोष्टी ऐकून आयुष्याचे धडे गिरवण्यासाठी चॅनेल आताच सबस्क्राईब करा.
THE IKEA Effect – मित्रांनो Zudio मध्ये कपडे इतके स्वस्त का मिळतात किंवा डी-मार्टवाले इतक्या कमी किमतीत वस्तू विकून Profit कसा कमावतात या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती आहेच. त्यामुळे त्या जरा बाजूला ठेऊया. मार्केटमध्ये सध्या IKEA हे नाव चांगलंच गाजतंय! कमी किमतीत मिळणारं Top Quality चं फर्निचर, कितीही मोठ्या फर्निचरला आपल्याच कारमध्ये टाकून घरी नेण्याची सोय, फर्निचरचे Simple आणि Unique Designs या सगळ्या गोष्टी IKEA ने कशा मॅनेज केल्या आणि लोकांना या सगळ्या गोष्टींची चटक कशी लावली; जाणून घेऊया आजच्या लेखामध्ये!
IKEA बद्दल तुम्हीसुद्धा कधी ना कधी ऐकलं असेलच, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी… IKEA ही जगातली सर्वात मोठी Furniture Manufacturing Company आहे, जिचा जन्म १९४३ साली स्वीडनमध्ये झाला. या कंपनीच्या नावाची स्टोरी पण मजेदार आहे. IKEA च्या I आणि K मध्ये दडलंय कंपनीच्या फाऊंडरचं नाव, म्हणजे Ingvar Kamprad (इंगवार कॅम्परड). E for Elmtaryd हे त्या फार्मचं नाव आहे, जिथं ते लहानाचे मोठे झाले आणि A for Agunnaryd जे की या फार्म जवळचं एक गाव आहे. अशा पद्धतीने बनलं ते IKEA. IKEA सुरुवातीला एकदम छोट्या Scale वर सुरु झालं होतं; पेन्सिल, पोस्ट कार्ड्स सारख्या छोट्या छोट्या गोष्टी आधी ते विकायचे. कंपनी सुरु केल्यानंतर ५ वर्षानंतर त्यांनी सुरुवात केली फर्निचर विकण्यासाठी आणि आज ४६० पेक्षा जास्त स्टोअर्सचं हे जाळं पसरलंय ६३ देशांमध्ये.
कुठल्याही फेमस स्टोअरमध्ये लोकं का गर्दी करतात? तिथल्या क्वालिटीमुळे? का त्याच्या प्राईम लोकेशनमुळे? नाही. तर तिथल्या Affordable Pricing मुळे. अर्थात क्वालिटी, लोकेशन या गोष्टी Matter करतातच, पण Pricing समोर कोणती गोष्ट टिकलीये का भाऊ? IKEA Effect च्या बाबतीत सुद्धा हीच गोष्ट लागू होते. इथं मिळणारं फर्निचर हे टॉप क्वालिटीचं तर आहेच, पण त्याचसोबत ते Affordable आहे. आणि Quality आणि Affordability एकत्र आली की होतो… धमाका!
आता येऊया यांच्या फर्निचरकडे. IKEA मध्ये आपल्याला एका सध्या चमच्यापासून ते एका रूमच्या अख्ख्या सेटअपपर्यंत सगळ्या प्रकारचं फर्निचर पाहायला मिळतं. स्टडी टेबल, स्टूल्स, लॅम्प्स, कार्पेट, डिशेस, बाऊल्स, कपाटं, सोफा, बेड, खुर्च्या,आरसे, टी-पॉय असे नाही नाही ते सगळे Product इथं पाहायला मिळतात. या सगळ्याचे डिझाइन्स, व्हरायटी, क्वालिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर बघून तुम्ही यातलं एखादं तरी Product होनाही करता करता घेताच.
फर्निचर तर घेतलं पण याची Delivery कधी मिळणार? कधी तो टेम्पो येणार? कधी त्याला आपल्या घराचा पत्ता सापडणार? बर परत फर्निचर आतमध्ये नेताना कशाला घासलं वगैरे तर? सोसायटीवाल्यांच्या नाहीतर घरात बायकोच्या शिव्या खायला लागणार! पण काळजी करू नका; असं काहीच होणार नाही. कारण हे फर्निचर तुम्ही तुमच्या कारमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. काय? तुम्हाला सुद्धा शॉक बसला असेल नाही तो वाला शॉक नाही. तर तुम्ही जे पण फर्निचर चूझ करता त्या फर्निचरला IKEA हे Dissemble करून देतं आणि इथंच येतो तो सगळ्यात महत्त्वाचा IKEA Effect. IKEA चा हा USP आहे म्हणा हवं तर.
आता हा IKEA Effect आपण समजून घेऊया आपल्या घराघरातल्या उदाहरणाने. समजा तुमच्या आईने तुमच्यासाठी उद्या मस्त इडली सांबार बनवण्याचा प्लॅन केलाय. तर त्यासाठी त्या माऊलीनं रात्री पीठ भिजवून ठेवलं, मग सकाळी लवकर उठून कांदा, टोमॅटो चिरून, खोबरं, कोथिंबीर घालून मस्त सांबार बनवलं. मग इडली पात्रात त्या इडल्या उकडल्या. मग एक एक इडली काढून ती तुमच्यासमोर ठेवली आणि हे सगळं करून झाल्यावर ती म्हणाली, “हूssश दमले बाबा खूप!” एवढं सगळं करून झाल्यावर इडल्या खाऊन तुम्ही तिला काय म्हणाले तर, “काय आई कशाला एवढा कुटाणा केला. मी तुला इन्स्टंट पीठ आणि इन्स्टंट सांबार मसाला आणून दिला असता ना!” खाल्ला का इन्स्टंट मार??? तर एवढं सगळं करून आई शेवटी काय म्हणाली दमले बाबा खूप! पण मित्रांनो या दमले बाबामध्येच आईचा खरा आनंद आहे, कारण हे सगळं करून तिला एक Sense of Achievement मिळतो, जो या इन्स्टंट पिठातून मिळणं कधीच शक्य नसतं. IKEA ने सुद्धा या Human Psychology ला ओळखलं आणि आपलं Furniture Dessemble करून देण्यास सुरुवात केली. ज्यामुळे झालं काय. जेव्हा Customer घरी जाऊन स्वतःच हे Furniture Assemble करायला लागला, तेव्हा त्याला एक Sense of Achievement मिळाला आणि यातूनच सुरुवात झाली IKEA च्या यशस्वी वाटचालीला.
तुम्हाला ही आजची IKEA स्टोरी कशी वाटली आम्हाला Comment मध्ये नक्की सांगा. जर लेख आवडला असेल तर लाईक करा Channel ला Subscribe करा जेणेकरून YouTube ला, पण कळेल Market मध्ये नवीन Brand आलाय ते. आणि हो तुम्हाला अजून अशा कोणकोणत्या ब्रॅण्डच्या केस स्टडीज जाणून घ्यायला आवडतील हेही नक्की सांगा. तो पर्यंत Bye Bye.
जेव्हा एखादा नवीन Customer तुमच्याकडे येतो, तेव्हा तो किती दिवस टिकेल, तो किती value generate करून देणार आहे, हे तुम्हाला माहितेय का? नाही ना? हा लेख वाचल्यावर सांगता येईल. चला सुरुवात करूया. तर आजची आपली टर्म आहे LTV.
LTV म्हणजे काय?
LTV चा full form आहे Life Time Value. काहीजण याला CLTV सुद्धा म्हणतात म्हणजेच Customer LifeTime Value, तर आधी म्हटल्याप्रमाणे एखादा नवीन Customer तुम्हाला किती value generate करून देणार आहे; हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर तुम्हाला त्या customer ची LTV calculate करणं गरजेचं आहे.
LTV का calculate केली पाहिजे?
तुमचा Business कितीही मोठा असो किंवा कितीही लहान असो त्यासाठी LTV काढणं हे खूप खूप गरजेचं असतं. कारण एखादा customer तुमच्यासाठी किती revenue generate करतो हे जर तुम्हाला समजलं, तर तुम्ही तुमच्या next business strategies व्यवस्थित implement करू शकता. भविष्यात कमीत कमी पैशांत तुम्ही customer acquire करु शकता, म्हणजे तुमची Customer Acquisition Cost सुद्धा कमी होईल. आता Customer Acquisition Cost म्हणजे काय? हे माहिती आहे का…? विसरलात ना! आम्ही आधीच त्यावर detail मध्ये लेख बनवलेला आहे, तर इन-शॉर्ट Customer Acquisition Cost आणि Customer LifeTime Value ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणा हवं तर. म्हणजे एक जर कमी-जास्त झाली, तर तिचा दुसऱ्यावर परिणाम होतो. त्यामुळं तुमची LTV ही नेहमी CAC पेक्षा जास्त हवी.
Life Time Value कशी calculate केली जाते?
LTV का calculate केली पाहिजे हे तुम्हाला समजलं असेलंच. आता ती कशी calculate केली जाते हे समजून घेण्यासाठी आपण Netflix चं उदाहारण पाहूया. तर Netflix चा जो Monthly Plan आहे तो २०० रुपयांचा आहे असं आपण समजू आणि एखादा customer Netflix चं subscription साधारण १२ महिन्यांसाठी घेत असेल.
तर LTV = Total Amount Customer Pays X Average Customer Life म्हणजे 200 X 12 = Rs. 2400/-
तर Netflix ची LTV आली Rs. 2400/-. म्हणजे एक customer त्याच्या life time मध्ये Neflix ला Rs. 2400/ मिळवून देतो.
LTV वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे?
Quality Service द्या –
तुम्ही तुमच्या customer ला जेवढी चांगली service द्याल तेवढे दिवस तो तुमच्याकडे टिकेल.
Average Order Value वाढवा
एखाद्या customer ला तुमच्याकडे रोजच्यापेक्षा जास्त खर्च करायला लावा. जसं की जर तुमचं छोटं हॉटेल असेल आणि एखादा customer तुमच्याकडे नाष्टा करण्यासाठी आला, तर तुम्ही त्याला चहा पिण्यासाठीसुद्धा convince केलं पाहिजे. कारण तुमच्या प्रॉडक्टवर जेवढा त्याचा खर्च वाढेल, तेवढी तुमची LTV वाढेल.
Subscription based service द्या –
तुमच्या बिझनेसमध्ये subscription based service model आणता येतंय का ते पहा. कारण यामध्ये फायदा दोघांचाही होतो. एक म्हणजे तुम्हाला एकदम महिन्याभराचे, वर्षभराचे पैसे मिळतात. दुसरं म्हणजे जर एखादा customer तुमच्याकडे वर्षभरासाठी आहे हे तुम्हाला माहिती असेल, तर तुम्ही त्याला discount सुद्धा देऊ शकता. ज्याचा फायदा त्या customer ला सुद्धा होतो. Amazon, Netflix यांसारखे OTT platforms तेच तर करतात.
Customer Retention वर भर द्या –
Customer Retention म्हणजे काय तर एखाद्या customer ला तुम्ही तुमच्याकडे किती काळ टिकवून ठेवता याचा rate. वेगवेगळ्या offers, discounts, rewards देऊन तुम्ही हा rate वाढवू शकता.
तर मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण LTV म्हणजे काय? LTV का calculate केली पाहिजे? ती कशी calculate केली जाते? ती वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर आत्ताच like करा आणि तुमच्या बिझनेस करणाऱ्या मित्रांना शेअर करा.