जॉब सर्च असो किंवा प्रोफेशनल जगाशी संबंध, कनेक्शन्स बनवणे असो किंवा स्वत:चे प्रोफेशनल विश्वातील यश या सर्वांसाठी एक उत्तम व्यासपीठ म्हणजे ‘LinkedIn.’ हा प्लॅटफॉर्म वापरण्याचे हे सोडून आणखीही फायदे आहेत. जसे की आपल्या जॉब स्किल्ससाठी फायदेशीर कोर्सेस करणे, स्वत:च्या अनुभवांविषयी किंवा इतर महत्त्वाच्या विषयांविषयी लिहून ते तिथे शेअर करणे आणि एकूणच तुम्ही कौशल्यपूर्ण आणि जॉबसाठी कसे पात्र आहात हे कृतींमधून सिद्ध करणे.
हा प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतरांशी तुलना केल्यास वेगळा आढळून येतो. काळाच्या ओघात याचे महत्त्व वाढतच चालले आहे. काय आहे यामागची स्टोरी आणि कशी झाली याची सुरुवात हेच जाणून घेऊयात या लेखाच्या माध्यमातून.
‘LinkedIn’ ची सुरुवात –
‘LinkedIn’ अधिकृतपणे 5 मे 2003 ला लाँच करण्यात आले, पण त्याची खरी सुरुवात 2002 मध्येच झाली होती. रीड हॉफमॅन यांनी आपल्या लिविंग रूम मध्ये LinkedIn ची सुरुवात केली. हॉफमॅन यांच्यासोबत त्यांचे पे-पल आणि सोशल नेट कंपनीतील सहकारी होते. त्यांचा हा प्लॅटफॉर्म सुरु करण्याचा मूळ उद्देश प्रोफेशनल विश्वातील लोकांची एकमेकांशी ओळख व्हावी, या माध्यमातून ते जोडले जावेत आणि त्यांचा एकमेकांना फायदा व्हावा असा होता.
LinkedIn ची सुरुवात केल्यानंतर पहिल्या महिन्यातच त्यांच्यासोबत 4,500 सदस्य जोडले गेले. 2005 ला त्यांनी जॉब्स आणि सबस्क्रीप्शन हा पर्याय उपलब्ध केला. यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. 2006 मध्ये ‘People you may know’ हे फिचर वापरात आणले.
चार वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर लिंक्डइनला हळूहळू ओळख मिळून प्रसिद्धी वाढू लागली. 2008 मध्ये लिंक्डइन स्पेन. यु.के आणि फ्रान्समध्ये वापरले जाऊ लागले. त्याच वर्षी त्यांच्या युजर्सच्या आकड्याने उच्चांक गाठला आणि तो 15 मिलियन पर्यंत (१.५ कोटींपर्यंत) पोहोचला. 2011 येईपर्यंत युजर्सचा हा आलेख वेगाने वाढतच गेला आणि कंपनीच्या युझर्सची संख्या 15 पासून 100 मिलियन (१० कोटींपर्यंत) पोहोचली. 2013 मध्ये LinkedIn सुरु करून 10 वर्षे पूर्ण झाली. युजर्सची होत जाणारी वाढ हा योग्य फीचर्स आणि वेळोवेळी केलेल्या बदलांचा परिणाम होता. त्यानंतर त्यांनी नुकतेच ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी आणि चांगल्या जॉब च्या शोधात असणारे तरूण यांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. यामुळे त्यांच्या यशात आणखी भर पडत गेली. 2016 मध्ये मायक्रोसॉफ्ट ने LinkedIn $26 बिलियन ला विकत घेतले. 2017 मध्ये LinkedIn ने डेस्क2 साठी नवीन फिचर सुरु केले आणि 2019 मध्ये आणखी काही फीचर्सची वाढ करून LinkedIn ने स्व त:ला परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न केला.
LinkedIn ची सध्याची परिस्थिती
LinkedIn च्या आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांत प्लॅटफॉर्मची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. हे जागतिक स्तरावर युझर्सच्या बाबतीत अव्वल आहे, त्यातले बहुतेक व्यावसायिक आहेत. आणि प्रत्येक आठवड्यात दहा लाखांहून अधिक नवीन वापरकर्ते सामील होत आहेत.
Linkedin बद्दल महत्त्वाच्या बाबी
70% पेक्षा जास्त युजर्स यूएस बाहेरील आहेत.
90 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते वरिष्ठ-स्तरीय आहेत आणि 63 दशलक्ष निर्णय घेण्याच्या पदांवर आहेत.
50% पेक्षा जास्त वापरकर्ते महाविद्यालयीन पदवीधारक किंवा सुशिक्षित तरूण आहेत.
24% युजर्स 18-24 वर्षे वयोगटातील लोक आहेत.
LinkedIn ची सुरुवात कठीण होती परंतु वरचेवर फीचर्स मध्ये बदल करून त्यांनी आपले महत्त्व वाढवले. नवीन संधींचा आणि भविष्यातील आव्हानांचा विचार करता येणाऱ्या काळात LINKEDIN चे महत्त्व वाढत जाणार आहे.
तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला हे कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. लेख आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि हो अजून कोणत्या विषयाची माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.
सध्या ब्रॅंडचा जमाना आला आहे, कपड्यापासून ते घरातील चिजवस्तूपर्यंत अनेकजन ब्रांडेड वस्तुच वापरतात. पण हे ब्रॅंड काही आत्ताचे नाहीत. अनेक वर्षांचा इतिहास त्यामागे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ब्रॅंडचा जमाना आहे. भारताला स्वतंत्र्य मिळण्याआधीच जागतिक स्तरावर आपल्या विश्वासाची मोहोर उमटविणारे नाव म्हणजे गोदरेज कंपनी. आणि या गोदरेजचे संस्थापक म्हणजे अर्देशीर गोदरेज.
चला तर आजच्या भागात जाणून घेऊ गोदरेजच्या कपाटबंद जन्माची ही कहाणी.
अर्देशीर गोदरेज यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच 1868 मध्ये मुंबई प्रांतात बुरजोरजी आणि दोसीबाई गुठरजी या पारशी दाम्पत्त्याच्या पोटी एका सधन कुटुंबात झाला. त्यांना सहा अपत्ये. अर्देशीर सगळ्यात मोठा मुलगा. बुरजोरजी आणि त्यांच्या वडीलांचा बांधकाम क्षेत्रात व्यवसाय होता. १८७१ साली या कुटुंबाने गोदरेज हे आडनाव स्वीकारले.
लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या अर्देशीरने पुढे जाऊन वकिलीचा अभ्यास केला. वकिलीची पदवी मिळाल्यानंतर त्यांनी अनेक खटले लढवले, अनेक केसेस सोडविल्या. मात्र झांझिबार येथील एका खटल्यादरम्यान त्यांनी आपली वकिली सोडली व ते परत मुंबईत आले.
इतर पारशी उद्योजकांप्रमाणे त्यांनाही व्यवसायात आपले नशीब आजमवायचे होतं. मात्र उपजीविकेसाठी त्यांनी एका फार्मसीत सहाय्यक म्हणून काम करायचे ठरवले. तिथे मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर शस्त्रक्रियेसाठी लागणारी सामग्री बनवण्याचा व्यवसाय करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. पारशी समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व “मेरवानजी कामा” यांच्याकडून त्यांनी व्यवसायासाठी कर्ज मागितले. मेरवानजींनी विचारले, “घरी वडिलांना पैसे मागायचे सोडून माझ्याकडे का आला?” त्यावर अर्देशीर म्हणाले, “मी घरी पैसे मागितले असते, तर वडिलांनी दिले नसते असे नाही, पण वडिलांनी कर्ज म्हणून पैसे दिले नसते, तर मुलासाठी द्यायचे म्हणून स्वखुशीने दिले असते आणि अर्देशिर यांच्या स्वाभिमानी मनाला ते काही पटणारे नव्हते. १९१८ साली वडिलांचे निधन झाल्यावर ‘त्यांच्या संपत्तीवर माझा हक्क नाही’ असं सांगताना अर्देशीर यांचा हाच करारीपणा पुन्हा एकदा दिसला.
मेरवानजी कामा यांच्याकडून घेतलेल्या ३००० रुपयांतून या स्वाभिमानी तरुणाने शस्त्रक्रियेसाठी लागणारी सामग्री बनवली. अपार मेहनत करून त्यांनी उत्पादनात वेगळेपणा आणून उत्पादने बनवली, ही सगळी उत्पादने जेव्हा कंपनीला विकायची वेळ आली, तेव्हा मात्र अर्देशिर यांच्या एका अटीमुळे व्यवहार फिस्कटला. ती अट म्हणजे प्रत्येक उत्पादनावर मेड इन इंडिया चा tag लावणे. समोरील कंपनीच्या मालकाने ‘मेड इन इंडिया’ टाकलं, तर सर्जिकल उत्पादनं खपणार नाहीत असं सांगून ही अट अमान्य केली. व्यवहार फिस्कटला आणि तो व्यवसायसुद्धा तिथेच बंद पडला.
एकदा असंच अर्देशिर वर्तमानपत्र वाचत बसले होते. आणि वर्तमानपत्रावरील एका बातमीने त्यांचे लक्ष वेधून घेतले. मुंबई इलाख्यात वाढलेल्या घरफोड्या आणि त्यावर सुरक्षेचे उपाय म्हणून पोलिसांनी योग्य सुरक्षा उपाय करण्याचे आवाहन केले होते. आणि त्याच क्षणी अर्देशिर यांच्या तल्लख मेंदूत बिझनेसची एक भन्नाट कल्पना आली, ती म्हणजे मजबूत आणि सहजासहजी फोडता न येणारी कुलुपं बनवणे. मात्र पुन्हा प्रश्न होता तो पैशांचा. त्यांच्या स्वाभिमानी वृत्तीने वडीलोपार्जित जमिनीचा हिस्सा नाकारला होता, जे करेन ते फक्त स्व-कर्तूत्वावरच करेन हेच त्यांच्या जीवनाचे मर्म होते.
व्यवसायासाठी लागणाऱ्या पैश्यांसाठी ते पुन्हा मेरवानजींकडे गेले. मेरवानजींनीसुद्धा ती बातमी वाचली होती. त्यांनी ही कल्पना आवडली त्यामुळे त्यांनी सुद्धा होकार दिला. मलबारच्या बॉम्बे गॅस वर्क्सच्या समोरील २१५ चौ. फुटाच्या एका छोट्याशा शेडमध्ये ७ मे १८९७ साली १२ कामगारांसोबत कारखाना सुरु करून त्यांनी कुलुपं बनवायला सुरुवात केली. अँकर या ब्रँड नेमखाली ही कुलुपं विकली जाऊ लागली. आधीच्या कुलूपांमध्ये फारशी अचूकता नसल्यामुळे ती सहज फोडता येत होती म्हणून त्यांनी आपल्या कुलूपात मजबूतपणा आणला. कोणतेही कुलूप त्याच्या चावीशिवाय दुसऱ्या कोणत्याही चावीने उघडणार नाही याची गॅरंटी ते देऊ लागले. गोदरेजच्या कुलूपांच्या रूपाने प्रत्येकाच्या घरावर एक भक्कम पहारेकरीच बसला. दोन चाव्यांची गार्डियन कुलुपे किंवा जगात प्रथमच तयार केलेली स्प्रिंगलेस कुलुपे यांनी कुलूपविश्वात आमूलाग्र बदल घडवून आणला.
Exciting part of the story
गोदरेजची ही गाडी केवळ कुलुपांवरच थांबली नाही, तर तिला खूप मोठा पल्ला गाठायचा होता. १९०१ साली अर्देशीर यांनी तिजोरी बनवायचा निर्णय घेतला. त्यांना इतकी सुरक्षित तिजोरी बनवायची होती कि, जी फोडता येणार नाही आणि आगीपासूनही ती सुरक्षित असेल. डझनभर डिझाइन्स बनवून झाल्यावर 1902 साली गोदरेजची पहिली तिजोरी बाजारात आली आणि प्रत्येक भारतीयाच्या घरात या तिजोरीच्या रूपाने एक सुरक्षारक्षकच अवतरला. मौल्यवान वस्तूंचा तो दणकट पहारेकरी बनला.
१९०५ मध्ये भारतभेटीवर आलेल्या इंग्लंडच्या राणीने देखील आपले मौल्यवान सामान सुरक्षित राहण्यासाठी गोदरेजच्या तिजोरीला प्राधान्य दिले आणि ही एक प्रकारे गोदरेजच्या दर्जाला मिळालेली पोचपावतीच ठरली. ही तिजोरी चोरांपासूनच नाही, तर आगीपासूनही सुरक्षित होती. १९४४ साली मुंबईच्या इतिहासातील सर्वात भीषण मुंबई गोदीतील आगीत प्रचंड वित्तहानी आणि जीवितहानी झाली, पण गोदरेज कपाटाच्या तिजोरीतील मौल्यवान वस्तू, कागदपत्रं मात्र आगीच्या झळांपासून सहीसलामत वाचले होते आणि ही घटना गोदरेजसाठी निर्णायक टप्पा ठरली. या घटनेनंतर गोदरेज कपाटांनी भारतीयांच्या मनात जे अढळ स्थान प्राप्त केले ते कायमचे. त्यामुळेच आज कपाट म्हटलं कि डोळ्यासमोर उभे राहते ते केवळ गोदरेजचेच. कपाटाला ‘गोदरेज’ हा जणू प्रतिशब्दच तयार झाला.
अर्देशीर गोदरेज यांचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंध होता. पण त्यांचे स्वदेशीबद्दलचे मत लक्षात घेण्याजोगे होते. केवळ वस्तू स्वदेशी आहे म्हणून तिला चांगले म्हणण्याची सक्ती नको. ती दर्जाच्या बाबतीतही उत्तम असली पाहिजे. असे त्यांचे मत होते. भारतीय घराघरांत दाराला गोदरेज कुलूप आणि आत गोदरेज कपाट हे समीकरण अभेद्य होते.
1910 मध्ये गोदरेजचा हा सगळा डोलारा धाकटा भाऊ पिरोजशा याला सांभाळायला सांगून अर्देशिर युरोप दौऱ्यावर गेले. युरोपातील नावीन्यपूर्ण गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी गोदरेजमध्ये बदल केले. 1928 साली अर्देशिर यांनी सगळा व्यवसाय धाकट्या पिरोजशाच्या हाती सोपविला आणि ते नाशिकला गेले.
त्यानंतर पिरोजशा यांनी देखील गोदरेजमध्ये क्रांती घडवली. गोदरेज फक्त कपाट आणि कुलूपातच अडकून बसले नाहीत, तर त्याने साबण, डिटर्जंट, टाईपरायटर, फ्रीज अशी अनेक उत्पादने तयार केली. १९१८ साली गोदरेजने साबण निर्मिती व्यवसायात पाऊल ठेवले. कंपनीने प्राण्यांच्या चरबीचा वापर न करता जगातील पहिला साबण बनवला. खुद्द रवींद्रनाथ टागोरांनी या साबणाची जाहिरात केली होती.
भारताच्या इतिहासातील अनेक घडामोडींचा अर्देशिर यांचा गोदरेज ब्रॅण्ड हा साक्षीदार आहे. १९५१ साली स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या लोकशाही निवडणुकांत मतदारांचं बहुमूल्य मत कोणाला मिळाले आहे हे पण सर्वात आधी गोदरेजलाच माहीत होते, कारण ती मते जपून ठेवणाऱ्या मतपेटय़ा गोदरेजच्याच होत्या. या साऱ्याचे रहस्य एकच होते, उत्तम दर्जा. १९५८ साली कंपनीने भारतातील पहिला फ्रिज सुद्धा बनवला होता.
अर्देशिर यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान हे खूप मोठे होते. स्वदेशी उत्पादनासाठी त्यांनी घेतलेली ठोस भूमिका महत्त्वाची होती. गोदरेजला केवळ कंपनी म्हणून नाही, तर भारतीय ग्राहकांच्या घराघरात नेऊन ठेवण्यापर्यंत विश्वास कमविणारा असा हा ब्रॅंडेड उद्योजक 1936 साली गोदरेजचा बलाढ्य कारभार वयाच्या 68 व्या वर्षी मागे सोडून जगातून निघून गेला.
बिझनेस महारथी या मालिकेत आम्ही जगातील महान उद्योजकांच्या जीवनप्रवास आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. आपल्याला हि मालिका कशी वाटतेय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कोणत्या उद्योजकांच्या कहाण्या तुम्हाला ऐकायच्या आहेत ते देखील सांगा. भेटूया पुढील रविवारी अजून एका बिझनेस महारथीची कहाणी घेऊन…!
युट्यूब हा सर्वांच्याच परिचयाचा प्लॅटफॉर्म. दिवसभरात आपल्यापर्यंत जी काही माहिती पोहोचते, त्यामध्ये युट्युबचा वाटा मोठा आहे. कित्येक व्यक्तींना युट्युबच्या माध्यमातून ओळख मिळाली. सप्टेंबर २०२३ च्या रिपोर्टनुसार युट्युबवर ११४ मिलियन (११.४ कोटी) ॲक्टिव्ह युट्युब चॅनल्स आहेत आणि १०० हून अधिक देशांमधील २.६ बिलियन (२६० कोटी) पेक्षा जास्त लोकांकडे यु-ट्युब आहे, डेली युजर्सच्या बाबतीत बोलायचं झालं, तर ते 122 मिलियन (12.20 कोटी) पेक्षा जास्त आहेत. यावर एक युजर 100 पेक्षा जास्त चॅनल्स बनवू शकतो.
संशोधनानुसार एक युजर यावर सरासरी दररोज 19 मिनिटे वेळ घालवतो. युट्युब ही गुगल पाठोपाठ जगातील दुसरी सर्वात जास्त पाहिली जाणारी साईट आहे. 2020 मध्ये युट्युब शॉर्ट्सची सुरुवात झाल्यानंतर अगदी थोड्या कालावधीत त्यांची लोकप्रियता वाढू लागली. आता या शॉर्ट्सना सरासरी 30 अब्ज डेली व्ह्यूज मिळतात. युट्युबवर दर मिनिटाला 2,500 पेक्षा जास्त व्हिडिओज अपलोड केले जातात. सध्याला यु -ट्युब वर 800 मिलियन किंवा कदाचित त्याहीपेक्षा जास्त व्हिडिओज असतील. 80 टक्यांहून अधिक लोक यु-ट्युबचा वापर मनोरंजनासाठी करतात. उर्वरित लोक ते अन्य कारणांसाठी वापरतात.
पहिला यु-ट्युबर हा ‘जावेद करीम’ नावाचा व्यक्ती होता ज्याने ‘Me at zoo’ या कॅप्शनसहित त्याने पहिला व्हिडीओ अपलोड केला. पण प्लॅटफॉर्म सुरु करण्याचा मूळ उद्देश हा नव्हताच. कोणी आणि कशी केली याची सुरुवात आणि कसा आहे यु-ट्युबचा प्रवास हेच आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
यु-ट्युब ची सुरुवात –
14 फेब्रुवारी 2005 मध्ये यु-ट्युबची सुरुवात करण्यात आली. स्टीव्ह चेन, हर्ले आणि जावेद करीम हे ‘पे-पाल’ या अमेरिकन ई-कॉमर्स कंपनीत नोकरी करत होते. त्यांनी ती कंपनी सोडली आणि यु-ट्युब सुरु केले.
जावेद करीम जो यु-ट्युबच्या निर्मात्यांपैकी एक आहे त्याने यु-ट्युब वरती पहिला व्हिडिओ शेअर केला आणि त्याला 277 मिलियन व्यूज मिळाले. सुरुवात केल्यानंतर पहिल्या महिन्यातच यु-ट्युब ने 30,000 व्युअर्स ना आकर्षित केले.
सुरुवातीला वर्षाच्या शेवटी यु ट्युब ला 25 मिलियन व्युज आणि 2,000 अपलोड्स मिळाले. त्यावर अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओज ची विविधता हेच यु – ट्युब हिट होण्याचे पहिले कारण ठरले. सध्या यु-ट्युब वर DIY ते प्रोफेशनल म्युझिक व्हिडिओज अपलोड केले जातात. यु ट्युब वरती म्युझिक व्हिडिओज जास्त प्रमाणात पाहिले जातात. 13 Nov 2006 रोजी गुगल ने 1.6 बिलियन डॉलर्सना यु- ट्यूब विकत घेतले .
काय होता यु-ट्यूबचा मूळ हेतू
2016 मध्ये यु-ट्यूब च्या निर्मात्यांपैकी एक असणारे स्टीव्ह चेन यांनी एका परिषदेत सांगितले की युट्युब सुरु करण्याचा मूळ उद्देश्य हा नव्हता.खरतर आमही तिघांनी यु -ट्यूब एक व्हिडिओ साईट म्हणून सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही ते यासाठी सुरु केले की लोक तिथे त्यांना कसा पार्टनर आहे हे सांगून व्हिडिओ डेटिंग करू शकतील. एवढाच काय तर ‘Tune in, hook up’ ही टॅगलाईन सुद्धा यु-ट्यूब ने वापरली. परंतु निर्मात्यांना जसे लक्षात आले की याने जास्त फायदा होऊ शकत नाही तेव्हा त्यांनी सर्व प्रकारच्या व्हिडिओजना प्लॅटफॉर्म खुला केला आणि त्याने यु-ट्यूब ला प्रचंड फायदा झाला.
तुम्हाला आजचा लेख कसा वाटला हे कंमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक करा.
‘यशस्वी कथा वाचू नका त्याने केवळ संदेश मिळतो, अपयशाच्या कथा वाचा त्याने यशस्वी होण्यासाठी प्रेरणा मिळते’ असं डॉ. एपीजे अब्दुल कलाम म्हणायचे. आज आपण अशा महारथीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने आयुष्यातील संकटांना घाबरून पळ काढला नाही, तर त्या संकटातून नवीन रस्ता निर्माण केला. १६० हून अधिक देशात लाखो लोकांच्या पसंतीस उतरलेली ‘यामाहा मोटारसायकल.’ चला तर जाणून घेऊया यामाहा कंपनीबद्दल आणि तिच्या निर्मात्याबद्दल.
तोराकुसू यामाहा. २० मे १८५१ साली जपानमधील वाकायामा येथे त्याचा जन्म झाला. त्याचे वडील किशू राजघराण्यातील ज्योतिषी होते. प्रत्येक वडिलांच्या आपल्या मुलाप्रती काही ना काही अपेक्षा या असतातच, आपला मुलगा यशस्वी व्हावा. चार चौघात त्याचं नाव व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. अगदी तुमच्या आमच्या आईवडिलांच्याही आपल्याकडून त्याच अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण होण्यासाठी आपल्या परीने ते पुरेपूर प्रयत्न करत असतात. तोराकुसूच्या वडिलांनाही वाटायचे की, आपल्या मुलाने आपल्याप्रमाणेच ज्योतिषी बनावे. लहानपणापासूनच अभ्यासात हुषार आणि नवीन काहीतरी निर्माण करण्याची इच्छा असलेल्या आपल्या मुलाची बौद्धिक क्षमता ओळखून त्याच्या वडिलांनी त्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. १८६८ साली तो नागसाकीला गेला. तिथे एका इंग्रज अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली घड्याळ दुरुस्तीचे शिक्षण त्याने घेतले. पुढे ओसाका या शहरात जाऊन वैद्यकीय उपकरण दुरुस्ती शिकून घेतली. वयाच्या ३५व्या वर्षी हमामात्सू या शहरात तो व्यवसाय सुरु केला. पण शहर लहान असल्यामुळे म्हणावी तेवढी मिळकत होत नव्हती. त्यामुळे जोडीला घड्याळ रिपेअरिंग आणि रिक्षा ड्रायव्हर म्हणूनसुद्धा त्याने काम केले.
एक दिवस जवळच्या एका शाळेने त्याला बोलावून त्यांचा तुटलेला ‘रीड ऑर्गन’ दुरुस्त करायला संगितले. आलेल्या कामाला नाही म्हणायचं नाही, हा स्वभाव असल्याने त्याने सुद्धा लगेच जाऊन त्यातील समस्या शोधली आणि तो दुरुस्त करून दिला. इथेच यामाहा ब्रांडचा पाया रचला गेला. हे काम आपल्याला जमतंय असं लक्षात आल्यावर दिवसभर कॉलेज आणि रिकाम्या वेळेत संगीतवाद्यं रिपेअर करण्याचे तो काम करत असे. हळूहळू त्या कामात त्याचा हातखंडा बसला. या कामातून त्याला बऱ्यापैकी फायदा होत असल्यामुळे तो स्वतःला update करत गेला.
सगळे आरामात चालू असताना एक दिवस अचानक त्याला पत्र आलं कि, त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण भेदरलेल्या अवस्थेत तो गावी परत आला. अखंड दुःखात बुडालेल्या आपल्या आईला आणि घरच्यांना सावरत त्याने घराची पूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्याने हमामात्सू मध्येच पाश्चिमात्य वाद्यांचे काम चालू केले. जेव्हा त्याच्या लक्षात आले की आपल्याला वाद्यांबद्दलची कामे बऱ्यापैकी जमातायेत, त्यावेळी त्याने स्वतःच्या या छोट्या बिझनेसला मोठे स्वरूप देण्याचे ठरवले आणि १८८७ साली ‘Nippon Gakki’ (नीपॉन गॅकी) नावाने कंपनी उभी केली. कंपनीत त्याने पाश्चिमात्य वाद्यांबरोबरच जपानी वाद्यं बनविण्यास देखील सुरुवात केली.
सुरुवातील त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. प्रथमच बनवलेल्या ऑर्गनमधून सूर नीट येत नसल्यामुळे त्यावर बरीच टीका झाली. त्यातून जपानमध्ये संगीतविद्या मोठ्या प्रमाणात विकसित झाली नव्हती, त्यामुळे पहिल्यांदा तेथील लोकांना संगीताचे महत्त्व पटवून द्यावे लागले. मात्र अल्पावधीतच तिथे संगीत शिक्षण घेणे बंधनकारक करण्यात आले आणि या निर्णयाचा फायदा त्याच्या कंपनीला झाला. आज बऱ्याच जणांना माहित नाही, पण यामाहा कंपनीचे पहिले प्रॉडक्ट ऑर्गन हे वाद्य होते. सुरुवात जरी सावकाश झाली असली, तरी काही दिवसांतच ग्राहक संख्या वाढू लागली. आज यामाहा ही संगीत वाद्यं बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे.
१९०२साली तोराकुसू यांना जपान सरकारचा मेडल ऑफ होनर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. १९११ साली शहर नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 8-ऑगस्ट 1916 रोजी वयाच्या ६५व्या वर्षी तोराकुसू यामाहा यांचे निधन झाले. कंपनीला वेगळ्या उंचीवर पोहोचवण्यासाठी तोराकुसू आयुष्यभर झटत राहिले.
पुढे १९३०-४० च्या दशकात व्यवसाय तेजीत असतानाच दुसऱ्या महायुध्दास प्रारंभ झाला आणि म्युजीकल इन्स्ट्रुमेंट बनवणाऱ्या या कंपनीला आपला व्यवसाय थांबवावा लागला. पण थांबणं यामाहाच्या धोरणांत बसतच नव्हतं. कंपनीने या काळात म्युजीकल इन्स्ट्रुमेंट सोडून शस्त्रास्त्रे बनवायला सुरुवात केली, कारण युद्धामुळे शस्त्रांचा साठा वाढविणे गरजेचे होते. त्यावेळी कंपनीने एअरक्राफ्ट, लढाऊ विमानं, टँक बनवले. कंपनीत त्यावेळेस एकूण तीनशेपेक्षा अधिक कामगार काम करत होते. या कंपनीचे प्रॉडक्ट इतके उत्कृष्ट होते की, विदेशातून देखील मागणी वाढली, अमेरिकेसारखे प्रगत राष्ट्र कंपनीकडून शस्त्रं घेत होते. पुढे युद्ध संपल्यावर शस्त्रात्रांची मागणी कमी होऊ लागली आणि कंपनी पुन्हा तोट्यात गेली. आता कंपनी टिकवून ठेवण्यासाठी काय करावे म्हणून कंपनीने पुन्हा म्युजीकल इन्स्ट्रुमेंट बनविण्यावर भर दिला.
कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष गेनीची हे जर्मन दौऱ्यावर असताना त्यांनी तेथील औद्योगिक प्रणाली जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेथील मोटारसायकलची फॅक्टरी पाहिल्यावर त्यांच्या मनात विचार आला की, आपण देखील मोटरसायकल तयार करू शकतो. जर्मनीहून परतल्यावर बराच वेळ त्यांनी यावर विचार करण्यात घालवला. मोटरसायकल बनविण्याची पद्धत, त्यासाठी लागणारे पार्टस या बाबत त्यांनी माहिती काढली आणि अनेक दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर १९५४ साली जन्मास आली, जगभरात आपल्या दमदार परफॉर्मन्सने धुमाकूळ घालणारी “यामाहा YA-1 मोटरसायकल.” ही बाईक इतकी लोकप्रिय बनली की कंपनीने यामाहा मोटर या नावाने स्वतंत्र कंपनीच सुरु केली. यामाहा पहिली अशी कंपनी आहे, जिला सुरुवातीच्या काळातच एकदम ३० हजार गाड्यांची ऑर्डर मिळाली होती आणि तिथून पुढे कंपनीने आपली वेगळी ओळख निर्माण केली.
YAMAHA YA-1 (1955)
“जीवनात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही, परंतु अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा ही करावीच लागते.” हे आपल्या कृतीतून दाखवून देणाऱ्या तोराकुसू यामाहा यांना जाऊन जवळजवळ १०६ वर्ष पूर्ण झाली, मात्र तरीही आज यामाहा कंपनी मोठ्या दिमाखात उभी आहे. त्यांच्या मृत्यूनंतरही आजतागायत यामाहा कंपनीने आपले सर्वोच्च स्थान अबाधित ठेवले यातच त्यांचे यश आहे.
एक सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा झालेला तरुण, पुण्याला आठ वर्षे नोकरी केली, कामाचा चांगला अनुभव घेतला. घेतलेला फ्लॅट ५० लाखांना विकला व नोकरीचा राजीनामा देऊन गावी जिल्ह्याच्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुरु केला. गोड बोलणे, अप्रतिम संवादकौशल्य, बांधकाम व्यवसायाचे चांगले ज्ञान याचा पुरेपूर वापर करून पहिला पाच गुंठ्याचा एक प्लॉट घेतला. मूळ मालकाला पैसे न देता २ बीएचके देऊन व्यवहार केला. उरलेले सात फ्लॅट जाहिरात करून विकले. बाकीचे बिल्डर्स १ बीएचके २० लाखाला द्यायचे व एका फ्लॅटमागे पाच लाख नफा काढायचे. याने मात्र १७ लाख दर लावला. पेमेंटमध्येही फ्लेक्झिबिलिटी (सुलभता) ठेवली. सात जणांनी ३०% भरून बुकिंग केले. त्यामुळे हातात २०-२५ लाखांचे खेळते भांडवल आले. शिवाय पुण्यातील फ्लॅटचे पैसे तसेच शिल्लक होते. ते नवीन प्लॉट खरेदीसाठी वापरले. पीडीसी चेक देऊन ६० दिवसांच्या क्रेडिटवर माल उचलू लागला.
हातात असणाऱ्या भांडवलावर त्याने ७ प्रकल्प पूर्ण केले. प्रत्येक प्रकल्पात ८ फ्लॅट आणि एका फ्लॅटमागे १-२ लाख रुपये एवढाच नफा ठेवला; पण उलाढाल मोठी झाली. त्यामुळे मार्केटमध्ये पत निर्माण झाली. माफक दरात व योग्य वेळेत घर देणारा बिल्डर म्हणून नावही झाले. केवळ दोन वर्षांत १०-१२ कोटींची उलाढाल खात्यावर दिसू लागली, त्यामुळे बँकेनेही १ कोटींचे बिझनेस लोन देऊ केले.
हे उदाहरण आहे, कमी भांडवलात जास्त टर्नओव्हर करण्याचे. हे मूळ व्यवसायातच गुंतवावे. लगेच फर्निचर, गाड्या, ऑफिस अशा अनुत्पादक बाबीत गुंतवू नये. उद्योजकाला कोणतेही अनुत्पादक ओव्हरहेड्स नसावेत. जर टर्नओव्हर वाढवायचा असेल, तर प्रॉफिट मार्जिन कमी ठेवावे. मार्केटिंगवर भर द्यावा. पर्चेसमध्ये क्रेडिट वाढवत ठेवावी. योग्य वेळेत पैसे व हमी दिली की पत वाढतच जाते. एकामागून एक माल विकणे किंवा दुसरे प्रोजेक्ट चालूच ठेवावेत.
तुम्ही तुमचे भांडवल कसे मॅनेज करता आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी नवी अर्थक्रांतीला फॉलो करा.
काही दिवसांपूर्वी आमच्या ऑफीसमध्ये व्यवसाय मार्गदर्शन घेण्यासाठी दोन शेतकरी आले होते, एक म्हणजे अनिलराव ते एक मोठे शेतकरी आहेत. तसेच त्यांच्याकडे मळणीयंत्र ट्रॅक्टर व अर्थमुव्हिंग वाहने म्हणजे जेसीबी आहेत. त्यांचे वय अंदाजे ५२ वर्ष आहे आणि गेली ३० वर्षे ते शेती व्यवसाय करतात. परंतु आज त्यांच्या खात्यावर एक रुपयाची सुध्दा बचत होत नाही. उलट त्यांच्या अंगावर जवळजवळ १० ते १२ लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याबाबत विश्लेषण केल्यावर मला असा निष्कर्ष मिळाला की, ते एकप्रकारे पांढरा हत्ती पाळताहेत. म्हणजे त्यांच्याकडील मोठी शेतजमीन, साधने, उपकरणे, यंत्रसामुग्री, वाहने अनेक आहेत परंतु त्यातून त्यांचा फायदाच निघत नाही, फक्त तोटेच होत आहेत. म्हणजे जे काही आहे ते सर्व दाखवण्यापुरतेच आहे.
तर दुसरा कॉल नितीन नावाच्या शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याचा होता. त्यांचे वय ४४ वर्ष आहे. त्यांच्याजवळ केवळ ३ एकरच शेतजमीन आहे, परंतु त्यांच्याजवळ स्वतःची कार आहे, तसेच मुलगा विदेशात चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. गेली १० वर्षे ते व्यवसाय करीत आहेत. यादोन्ही उदाहरणांचे निरीक्षण केल्यावर मला आश्चर्य वाटले. एकीकडे ज्याच्याजवळ मोठी शेतजमीन, अद्ययावत उपकरणे व यंत्रसामुग्री, वाहने आहेत तरीसुध्दा एक रुपयाही नफा नाही, उलट १०-१२ लाखांचे कर्ज आहे. तर दुसरीकडे ३-४ एकरांचीच शेतजमीन असलेला शेतकरी आहे, जो शेती व शेतीपूरक व्यवसाय करतो, परंतु त्यांच्याकडे चांगले उत्पन्न, संपत्ती, वैभव आहे आणि ते ही डोक्यावर एका रुपयाचेही कर्ज नसताना. या दोन्ही उदाहरणांमध्ये प्रचंड विरोधाभास दिसून येतो.
उत्पादकतेचे अर्थशास्त्र :
तुमचे शोरूम, दुकान, व्यवसाय, कारखाना किंवा शेतजमीन कितीही मोठी असली तरीही त्यातून तुम्हाला किती फायदा नफा मिळतो याला खरा अर्थ असतो. यालाच म्हणतात उत्पादकतेचे अर्थशास्त्र. तुमचे कुटुंब परिवार किती मोठा आहे हे महत्वाचे नाही, तर त्यातील किती लोक उत्पादनक्षम आहेत ते महत्वाचे आहे. तुमच्याकडे किती एकर जमीन आहे हे महत्वाचे नाही, तर त्यापैकी किती जमीन तुम्हाला उत्पन्न मिळवून देते याला महत्व आहे. म्हणजे तुमच्याकडे कितीही संसाधने म्हणजे मोठी जमीन, भांडवल आणि मनुष्यबळ इत्यादी गोष्टी असतील, तर त्या उत्पन्न देणाऱ्या असाव्यात. नाहीतर पांढऱ्या हत्तीसारख्या केवळ शोभेसाठी असतील तर तुम्ही कंगाल झाल्यातच जमा असे समजा.
उत्पादकता लेखापरीक्षण (Productivity Audit) :
ज्या ऑडिटमध्ये, मोजमापात्मक व तुलनात्मक मानके/मापदंड आणि वास्तविक घटकांची कार्यक्षमता यांची छाननी आणि मूल्यांकन केले जाते त्यास उत्पादकता लेखापरीक्षण (Productivity Audit) म्हणतात. म्हणजे आपल्या शेतीत किंवा व्यवसायात आपल्याकडील मनुष्यबळ, भांडवल, साहित्य, संसाधने, यंत्रसामुग्री, इ. मधून किती उत्पन्न मिळाले याचे मूल्यांकन आणि विश्लेषणात्मक अभ्यास म्हणजे उत्पादकता लेखापरीक्षण. यासाठी अनेक निकष पडताळून पाहावे लागतात.
i) Personal Audit:
Personal Audit
शेती म्हणा किंवा इतर व्यवसाय. त्यांचे लीडर म्हणून तुम्ही स्वतःचे मूल्यांकन केले पाहिजे. तुम्ही शेतात किंवा व्यवसायात किती काम करता व शेती/उद्योगातील उत्पादनक्षमतेत किती आणि कसे योगदान देता हे पाहणे म्हणजेच स्वतःच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. समजा तुमच्याकडे ३० एकर जमीन आहे, पण खरंच तुम्ही रोज ३० एकर जमिनीकडे जातीने लक्ष देता किंवा काम करता का? की मजुरांवर शेताचे काम सोपवून गावात पुढारीपण करता? एखाद्याने नोकरी सोडून व्यवसाय सुरु केला असेल, तर ज्याप्रमाणे नोकरी करताना १२-१२ तास काम करत होता, तसेच स्वतःच्या व्यवसायातही काम करता का ?
ii) Family Member Audit:
Family member audit
तुमचे सर्व कुटुंबीय तुमच्या शेतीत/व्यवसायात काय योगदान देतात? ते कोणते काम किंवा कोणती जबाबदारी हाताळतात याचे मूल्यांकन करावे. नाहीतर असे व्हायला नको की, तुमचा वेळ पोकळ मोठेपणा/पुढारपण गाजवण्यात जातोय; पोरगं तासनतास मोबाईलमध्ये डोकं घालून नाहीतर कुठल्यातरी पक्षाचा युवानेता बनून फिरतोय, बायको महिलामंडळाची अध्यक्ष म्हणून गजाली मारण्यात आणि चुगल्या करण्यात वेळ वाया घालवतेय आणि शेतात गुडघाभर तण आहे. तुमचा व्यवसाय असो वा शेती घरातल्या प्रत्येकाने त्यासाठी काम केले पाहिजे, आपापले ठळक योगदान दिले पाहिजे. काम न करणाऱ्या पोरांना कंबरड्यात लाथ घालून हाकलून दिले पाहिजे.
iii) Management Audit:
Management Audit
मॅनेजमेंट ऑडिट म्हणजे तुमच्या व्यवसायात अंतर्भूत व्यवस्थापनाच्या पद्धती आणि धोरणे, संसाधनांचा वापर, कामाचे नियोजन, कर्मचारी आणि संस्थात्मक सुधारणा यांचे मूल्यांकन. मानव संसाधनांचा अधिक चांगल्या उपयोग आणि उपलब्ध भौतिक सुविधांची खात्री करुन घेणे, उद्दिष्ट्ये, धोरण, कार्यपद्धती आणि नियोजनातील कमतरता पडताळणे, कार्यपद्धतीची सुधारित पद्धती सुचविणे. उदा. तुमचा जेसीबी ड्रायव्हर असेल, तर तो जेसीबी किती चांगल्या प्रकारे हॅण्डल करतो याची तपासणी करा. तुमची कार्यपद्धती व त्यांचे काम प्रभावी असायला हवे.
iv) Employee Audit:
Employee Audit
आपले कर्मचारी, मजूर आपल्या व्यवसायात/शेतात किती काम करतात आणि ते किती उत्पादनक्षम आहेत हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नाहीतर मालक गावभर फिरतोय आणि मजूर शेतावर टाईमपास करतायत अशी अवस्था नको. असेच चालत राहिले तर कर्ज होणार नाहीतर काय होणार? कोण काम करतो व कोण चुना लावतो याचा तपास करा.
v) Product Audit:
Product Audit
आपली उत्पादने/सेवा किती गुणवत्तापूर्ण आहेत, त्यांना बाजारात किती मागणी आहे आणि त्यांच्या खरेदीसाठी ग्राहक किती उत्सुक आहेत तसेच त्याचे मार्केटिंग कशा प्रकारे केले जात आहेत हे पाहणे महत्त्वपूर्ण आहे. नाहीतर तुम्ही आणि तुमचे कर्मचारी खूप मेहनत घेऊन उत्पादन घेत असाल, परंतु ते दर्जेदार नसेल तर काय फायदा? काय पिकतं यापेक्षा काय विकतं याचा तपास घ्या.
vi) Real Asset Audit:
Real Asset Audit
तुमची जितकी संपत्ती आणि संसाधने आहेत त्याच्या देखभालीसाठी, ती सांभाळण्यासाठी किती खर्च येतो आणि त्यापासून उत्पादन किती मिळते याला रिअल अॅसेट ऑडिट म्हणतात. म्हणजे तुमची १० एकराची जिरायती शेती आहे, ती सांभाळण्यासाठी ५ लाख रुपये खर्च येत असेल आणि त्यांतून १ लाखाचेही उत्पन्न मिळत नसेल तर काय फायदा? यामध्ये अधिक उप्पन्न देणारी, मध्यम उत्पन्न देणारी आणि उत्पन्न न देणारी शेतजमीन, असे तीन गट पडले पाहिजेत.
vii) Machinery Audit:
Machinery Audit
आपल्या व्यवसायात किंवा शेतीसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री आणि वाहने यांच्या खरेदीवर आणि त्यांच्या देखभालीवर (maintenance) एकूण किती खर्च येतो आणि एकूण किती उत्पन्न मिळते याचे ऑडिट केले पाहिजे.
viii) Working Capital Audit:
Working Capital Audit
शेतकरी किंवा व्यावसायिक भांडवल उभारणीसाठी कर्ज घेतात. बँक त्या कर्जाचे हफ्ते व्याजासहित वसूल करते. शेतकरी त्याच्या शेतीसाठी लागणारी यंत्रसामुग्री, वगैरे विकत घेण्यासाठी कर्ज काढतो, व्यावसायिक त्याच्या व्यवसायात भांडवल उभारणीसाठी कर्ज काढतो. आपण आपले भांडवल कशा प्रकारे वापरतो आणि त्या खेळत्या भांडवलातून आपल्याला कितपत फायदा होतो याचेही ऑडिट केले पाहिजे.
आपण काय करावे?:
वरील प्रत्येक लेखापरीक्षणाच्या विश्लेषणानंतर आपल्या व्यवसायाची/शेतीची उत्पादनक्षमता तपासून घ्यावी. तुम्ही शेती करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर त्यांचे अर्थशास्त्रीय विश्लेषण करा. तुमच्या एकूण शेतीपैकी किती जमीन नफा मिळवून देते किंवा व्यवसायाच्या कोणत्या घटकांमधून उत्पन्न मिळते यांचे विश्लेषण करा. नाहीतर पांढरा हत्ती पाळल्यासारखे करू नका. जे फक्त दिखाव्याप्रमाणे, बिनकामाचे ठरते.
जसा पांढऱ्या हत्तीचा उपयोग युध्द, खेळ, भारवहनासाठी करता येत नसतो. तो केवळ दिखाव्यासाठीच बाळगला जातो आणि हत्ती पाळल्याचा बडेजाव करता येतो, परंतु नुसता दिखावा करून उपयोग नाही. तोट्यातली जर्सी गाय पाळण्यापेक्षा, फायद्यातली शेळी कधीची चांगलीच.
तुम्ही आजवर अनेकदा कोका कोलाचा एक घोट तरी घेतला असेलच. इतकंच नाही तर तुमच्या आई बाबांनी, आज्जी आजोबांनी कोका कोला ब्रॅंड माहीत नाही ही शक्य नाहीच.चला तर जाणून घेऊ ह्या जगप्रसिद्ध कोका कोला विषयी बरचं काही…
प्रत्येक गोष्टीला एक इतिहास असतो. एकदा सुरू झालेली गोष्ट लगेच यश मिळवते असे नाही त्यासाठी संयम, कठीण परिश्रम आणि अपयश पचविण्याची ताकद असणे महत्वाचे असते.
तर झालं अस की, 8 जुलै 1831 रोजी जॉन पेंबरटण या अमेरिकन farmactis चा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना संशोधनात रस होता, नवनवीन आणि नावीन्यपूर्ण औषधे तयार करणे हाच त्यांचा छंद होता. 1860 च्या काळात अमेरिकेत Vin Mariani ही वाइन लोकांच्या पसंतीस उतरली होती. आणि जॉन पेंबरटण यांनी ठरवलं की, आपणसुद्धा असच काहीतरी नावीन्यपूर्ण बनवायच. कोला या झाडाच्या पानांपासून बनविलेली ही वाइन अनेक मोठ-मोठ्या उद्योगपतींच्या पसंतीस उतरली होती. एतकचं नाही तर थॉमस एडिसण देखील vin mariani चे सेवन करायचे.
8 मे 1886 रोजी पेंबरटण यांनी आफ्रिकन कोला फ्रूट आणि कोकेन वापरुन एक पेय बनवलं. आणि त्याचे नाव कोका कोला असे ठेवले. आणि कोका कोलाने जगात आपली एक वेगळी ओळख तयार केली. कोलाच्या पानांचा आणि फळांचा वापर हा शारीरिक थकवा घालविण्यासाठी केला जायचा.
शारीरिक आणि मानसिक आजारावरील रामबाण काढा अशी जाहिरात करून कोका कोला विकला जायचा. तो काढा अर्थातच कोका कोला लोकांच्या पसंतीस इतका आला की, कोका कोला शिवाय लोकांना काहीच दिसत नव्हत. अल्पावधीतच कोका कोला लोकांच्या पसंतीस उतरला. अनेकांना कोका कोलाचे व्यसन देखील लागले. त्यात जॉन पेंबरटण काही बाकी नव्हते. त्यांना देखील कोका कोलचे व्यसन लागले.
आणि त्यांनी एसा ग्रिग्स कॅडलर यांना केवळ 2300 डॉलर ने कंपनीचे सगळे हक्क विकले.
आणि त्यांनंतर एसा ग्रिग्स कॅडलर यांनी कोका कोलाची रेसीपी बदलली. कोकेन काढून त्यांनी त्यात साखरेचे प्रमाण वाढविले. आणि त्याचवेळी बाजारात कोका कोलाचा प्रतिस्पर्धी तयार झाला. तो म्हणजे पेप्सी. कोका कोलच्या मागून आलेला पेप्सी ब्रॅंड देखील लोकांच्या पसंतीस उतरला.
जगप्रसिद्ध कोका कोला अनेकदा वादाचा विषय ठरला. कधी अल्कोहोल मुळे तरी कधी प्लॅस्टिकच्या प्रदूषणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला कोका कोला लोकांच्या मनातून काही उतरला नाही
बिझनेस किंवा व्यवसाय हे शब्द कानावर पडले, तरी आपल्याला दोन गोष्टी सर्वात आधी आठवतात त्या म्हणजे नफा आणि तोटा. व्यवसायाचा नेमका ठोकताळा काढायचा तेव्हा नफा आणि तोटा मोजला जातो आणि त्यावर ठरवलं जातं, गणित फायद्याचे आहे कि तोट्याचे. व्यवसायात ही अशी गणितं महत्वाची असली, तरी सगळ्यात महत्वाची असते ती प्रोसेस म्हणजेच प्रक्रिया. व्यवसायाच्या शुभारंभापासून व्यवसाय संपूर्ण ताकदीने चालेपर्यंत जी प्रक्रिया किंवा प्रोसेस आपण राबवतो ती आपल्या व्यवसायाचे भविष्य ठरवते.
आता व्यवसाय किंवा बिझनेस म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्प्या भाषेत सांगायचं, तर आपण एखादी वस्तू किंवा सेवा तिच्या खरेदीच्या किंवा निर्मिती मूल्यापेक्षा जास्त किंमतीने बाजारात विकतो आणि त्यातून नफा मिळवतो तेव्हा या व्यवहाराला बिझनेस म्हणजे व्यवसाय असं म्हणतात. पूर्वीच्या काळी चलन म्हणून वस्तूंचा वापर व्हायचा. अजूनही काही गावांमध्ये अशी पद्धत आहे कि वस्तूच्या मोबदल्यात वस्तू दिली जाते. मग प्रश्न हा पडतो आपल्या आजूबाजूला इतके लोक व्यवसाय करताना दिसत असतात, त्यातले काही यशस्वी असतात आणि तर काहींचा व्यवसाय ठराविक काळापुरताच सुरु राहून नंतर बंद पडतो. असं का होत असेल? तर एक म्हणीमध्ये याचं सार लपलेले आहे, ते म्हणजे, ‘शेतात काय पिकतं, यापेक्षा बाजारात काय विकलं जातं’ हे महत्वाचं आहे. व्यवसाय म्हणून आपण ज्या गोष्टीचा किंवा प्रॉडक्टचा विचार करतो त्याचा आणि सध्याच्या बाजारात त्याची किती गरज आहे हा विचार फार महत्वाचा आहे.
व्यवसाय करताना अगदी सुरुवातीच्या टप्प्यात सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे मार्केट रिसर्च. आपण जे प्रॉडक्ट किंवा ज्या गोष्टीचा बिझनेस करणार असू त्याचे ठिकाण, त्याची ग्राहक संख्या आणि बाजारमूल्य इ. गोष्टींचा सखोल अभ्यास असणे महत्वाचे आहे. त्यानंतर आपण ज्या गोष्टीचा अथवा प्रॉडक्टचा व्यवसाय करणार आहोत ते आपण तयार स्वतः तयार करणार किंवा होलसेल मार्केटमधून मागवणार, त्याचा निर्मिती खर्च, विक्री किंमत, प्रवास खर्च आणि निव्वाळ नफा यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. हे सगळं झाल्यानंतर जर आपण हा व्यवसाय सुरु केला, तर साधारण वर्षभरापर्यंत अंदाजे आपल्याला किती नफा अथवा तोटा होऊ शकतो, त्याचे नेमके ठोकताळे काय असतील किंवा रिस्क फॅक्टर काय असेल याचा अंदाज येऊ शकतो.
या सर्व गोष्टींची तयारी झाल्यानंतर त्यासोबतच किंबहुना त्याआधीपासूनच विचार करावी अशी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निधी किंवा भांडवल. यामध्ये विचार करताना आपल्या व्यवसायाला किती पैसे आवश्यक आहेत हे तर महत्वाचे आहेच; पण त्यासोबतच व्यवसायातून नफा मिळेपर्यंत व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्यासाठी आवश्यक अतिरिक्त निधी आपल्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय असतात ते म्हणजे, आपण गुंतवणूकदारांकडून भांडवल घेऊ शकतो किंवा सरळ आपण बँकमधून कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो. नवीन उद्योजकांसाठी सरकारने उद्योजकता वाढीस लागावी यासाठी अनेक योजना देखील आणल्या आहेत आपण त्याचासुद्धा वापर करू शकतो.
या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर तुम्ही तुमचा लहान-मोठा बिझनेस नक्कीच सुरु करु शकता, पण तो पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी तुमच्याजवळ काही उत्तम सवयी असणे गरजेचे आहे. आता या नेमक्या सवयी कोणत्या? अगदी थोडक्यात सांगायचं तर धाडस, आत्मविश्वास, रिस्क घेण्याची तयारी, दूरदृष्टी, संयम, कष्ट, जिद्, मेहनत, सातत्य आणि चिकाटी. हो हे शब्द बोलायला जितके सोपे वाटतात तितकीच हे सर्व अमलात आणण्यासाठी खूप मोठी मानसिक तयारी असणे गरजेचे आहे. ही मानसिक तयारी तेव्हाच असू शकते, जेव्हा तुम्ही खूप जास्त महत्त्वाकांक्षी असता आणि तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सर्व प्रकारे तयार असता.
आपण एक गोष्ट नेहमी ऐकतो की यश मिळवणे जितके अवघड आहे, त्यापेक्षा यश टिकवणे जास्त अवघड असते. हे समीकरण व्यवसायाला सुद्धा लागू होते. व्यवसाय सुरु करणे जितके अवघड आहे, त्यापेक्षा सातत्याने तो चालवणे आणि त्याचा सर्वदूर प्रसार करणे अवघड आहे. अवघड असले, तरी अशक्य आजिबात नाही आणि हो शेवटी एवढं नक्की सांगता येईल की अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. जसा प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा त्याची पद्धत वेगळी अगदी तसेच प्रत्येकाचा अनुभव वेगळा आणि त्यातून आलेले शहाणपण हे त्याहून वेगळे. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेऊन पूर्व तयारी आणि पूर्ण तयारी करून नक्कीच आपण आपल्या स्वप्नातील व्यवसायच्या क्षेत्रात मैलाचा दगड पार करू शकू.
तुम्हाला आजचा लेख कसा वाटला हे कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि नवी अर्थक्रांतीच्या चॅनेलला आताच subscribe करा.
उंच उंच डोंगर, चहू बाजूंनी असलेली मोठी झाडी, स्लो मोशनमध्ये पडत असलेला बर्फ, अंग गोठवणारी थंडी अशा या गुलाबी थंडीत एक जोडपं वाफाळणाऱ्या चहाचा आस्वाद घेत आहे…. आहाहाऽऽ! पिक्चरमध्ये येणारे असे सीन्स पाहून तुम्हीसुद्धा हिरो हिरोईनच्या जागी स्वतःला imagine केलंच असेल. तुम्हालाही वाटत असेल की आपणसुद्धा जावं अशा ठिकाणी, आनंदाचे चार क्षण जगावे; पण परदेशी जाऊन एवढे पैसे घालवण्याऐवजी तुम्ही तो plan cancel करता आणि इथंच “The End” होतो! पिक्चरचा नाही ओ… तुमच्या फिरायला जायच्या plan चा! पण रील टू रिअल लाईफ मध्ये जर तुम्हाला हा सीन अनुभवायला मिळाला तर? आणि तेही आपल्या मायभूमीत… भारतात! आनंद होईल की नाही? चला मग उपजत निसर्गसौंदर्य लाभलेलं हे ठिकाण कोणतं आहे हे पाहूया आजच्या लेखात…
मित्रांनो आपल्याला माहितीच आहे हिमाचल प्रदेश हे आपल्याकडचं असं ठिकाण आहे जे लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत प्रत्येकालाच आकर्षित करत आलंय. इथलं निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक इथं येत असतात. इथं वेगवेगळे फेमस टूरिस्ट स्पॉट्ससुद्धा आहेत. रोजच्या गर्दीपासून दूर जाऊन शांत ठिकाणी निसर्गसौंदर्य अनुभवायला आपल्या प्रत्येकालाच आवडतं आणि अशाच शांततेचा जर तुम्हालाही अनुभव घ्यायचा असेल, तर हिमाचल प्रदेशातल्या खजियारला तुम्ही नक्कीच भेट द्यायला हवी. “मिनी स्वित्झर्लंड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खजियारला अलौकिक निसर्गसौंदर्य लाभलं आहे.
खजियार हा तलाव हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यामध्ये समुद्र सपाटीपासून 1,920 मीटर उंचावर आहे. याच्या चारही बाजूंना असलेल्या देवनार वृक्षांची तलावाच्या निळ्याशार पाण्यामध्ये सुंदरशी प्रतिमा उमटते. इथली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे, तलावामध्ये तरंगणारा गवताचा गुच्छ. निळ्याशार पाण्यामध्ये तरंगणारा हा गुच्छ पाहायला खूप सुंदर दिसतो. खजियारमध्ये गेल्यानंतर तेथील निसर्गसौंदर्य पाहून तुम्हाला एक क्षण खरंच वाटेल की तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये आला आहात की काय.
खजियारच्या या मखमली प्रदेशात एका बाजूला बाराव्या शतकातील लाकडातील कोरीव कारागिरीचं “खज्जिनाग मंदिर” असून, त्याच्या गर्भगृहात नागदेवतेची मूर्ती आहे. १६व्या शतकात राजा बलभद्र बर्मनने येथे पांडवांच्या लाकडातील मूर्ती उभारल्या. राजा पृथ्वीसिंग यांची धार्मिक प्रवृत्तीची दाई “बाल्टू” ने १७ व्या शतकात या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. “मिनी स्वित्झर्लंड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खजियारमध्ये तुम्ही adventure ही करू शकता. इथं तुम्ही Paragliding पासून ते Horse Riding पर्यंत अनेक वेगवेगळ्या activities करू शकता. एवढचं नाही तर खजियारमध्ये तुम्ही trekking चाही अनुभव घेऊ शकता. या ठिकाणी राहण्यासाठी अनेक गेस्ट हाउसही आहेत. इथं तुमच्या राहण्याची उत्तम सोय होऊ शकते.
खजियारला जाणार कसं?
चंबा किंवा डलहौसीपासून खजियार फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. खजियारला पोहोचण्यासाठी शिमलापर्यंत रेल्वे मार्गाने किंवा फ्लाइटने तुम्ही जाऊ शकता. यानंतर तुम्हाला बस किंवा टॅक्सी घेऊन खजियारपर्यंत पोहोचता येईल. याव्यतिरिक्त खजियारसोबतच हिमाचल प्रदेशातील इतरही अनेक वेगवेगळ्या ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता.
जगातील सर्वात महान वैज्ञानिक कोण असं म्हटल्यावर आपल्याला आठवतात ते; अल्बर्ट आईनस्टाईन, आयझॅक न्यूटन, हेन्री फोर्ड, थॉमस एडिसन, पण यातील अजून एक नाव ज्याने संपूर्ण पृथ्वीला प्रकाशाने सजविले, ज्याच्या नावाने अनेक वैज्ञानिकांना पुरस्कृत केले जाते, ज्याचे शोध हे आइन्स्टाईन आणि एडिसन यांच्या तोडीस तोड आणि तितकेच महत्वाचे होते… कोण होता तो?
पावसाळ्याचे दिवस होते. आकाशात वीजा कडाडत होत्या. सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. ऑस्ट्रिया-हंगेरी सीमेवरच्या लिका नावाच्या भागातील स्मिजन गावातील एका गर्भवती आईला गरोदारपणाच्या कळा सहन होत नव्हत्या. प्रसूतीची वेळ झाली होती. अखेरीस दाईच्या सहाय्याने आईने बाळाला जन्म दिला. बाळ जन्मल्यावर दाई म्हणाली की “एवढ्या घनघोर अंधारात जन्मेलेल्या या बाळाच्या आयुष्यात पण अंधार असेल का?” त्यावर आईने उत्तर दिले, “नाही हे बाळ संपूर्ण जगाला प्रकाशमान करेल.” १० जुलै १८५६ या दिवशी त्या वेळच्या ऑस्ट्रियामध्ये म्हणजे आजच्या क्रोएशियात जन्मलेल्या त्या बाळाचे नाव होते निकोला टेस्ला.
लहानपणी त्याची तब्येत अतिशय नाजूक असे. लहान असताना त्याला प्रकाश तसेच वेगवेगळ्या आकृत्यांचे भास व्हायचे. त्यामुळं त्याला बऱ्याच वेळा हे कळत नसे की आपण जे पाहतो आहे, ते खरं आहे की खोटं! कुठलीही गोष्ट एकदा पहिली की त्याच्या डोक्यात फिट्ट बसायची. त्याला जेव्हा एखादी आकृती दिसायची, तेव्हा ती त्याच्या पूर्णपणे स्मरणात रहायची. ती आकृती कागदावर काढायची सुद्धा त्याला कधी गरज पडली नाही. शिक्षकांनी दिलेली गणितं मुलं उतरवून घेईपर्यंत निकोलाने ती मनातच सोडवूनसुद्धा टाकलेली असायची! वयाच्या नवव्या वर्षी टेस्लानं उडणाऱ्या माश्यांच्या हालचालींमधून मिळणाऱ्या ऊर्जेच्या जोरावर चालणारी विजेची मोटार बनवली.
त्याचे वडील हे चर्चमध्ये धर्मगुरू होते आणि आपल्या मुलानेसुद्धा आपल्यासारखेच काम करावे असं त्यांना वाटायचं. पण मुलाचा विज्ञान आणि गणिताकडे असलेला कल पाहून त्यांनी निकोलाला इलेक्ट्रीकल Engineering ला प्रवेश घेण्यासाठी संमती दिली. गणित आणि विज्ञानात अत्यंत हुशार असलेल्या निकोलाने १८७५ मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेऊन ९ परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. कॉलेजमध्ये असताना टेस्ला फाटे ३ वाजता अभ्यासाला बसायचा आणि रात्री ११ वाजेपर्यंत त्याचा अभ्यास अखंड सुरु असायचा. झोपेत वेळ वाया जाऊ नये म्हणून तो फक्त ४ तास झोपायचा.
१८७५ला पॉलिटेक्नीकच्या द्वितीय वर्षाला असताना, अतिहुशारपणामुळे एका शिक्षकांसोबत त्याचे मतभेद झाले आणि त्या वर्षी तो नापास झाला. त्यातच त्याला जुगार खेळायची सवय लागली. अभ्यास झाला नाही आणि तो फायनल परीक्षेत नापास झाला. त्यामुळे तो त्यांचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण करू शकल नाही. एवढंच नाही तर त्यांने त्यांच्या कुटुंबियांशी आणि मित्रांशी असलेले संपर्क पूर्णपणे तोडले. १८८१ मध्ये टेलिग्राफ कंपनीमध्ये काम करून अनेक संप्रेषणात सुधारणा केली. टेलीफोन इम्प्लिफायरची नव्याने रचना केली, मात्र त्यावर स्वतःचे पेटंट घेतले नाही.
घडल्या प्रसंगातून स्वतःला सावरत, इकडे-तिकडे काम केल्यानंतर, त्याला एडिसन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. एडिसन यांनी त्याला त्यांनी बनविलेला डायरेक्ट करंट जनरेटर (DC Generator) जास्त प्रभावी करून द्यायचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी त्याला सांगितले की, “जर तो या कामात यशस्वी झाला, तर त्याला ५० हजार डॉलर बक्षीस म्हणून मिळतील.” मिळणारे बक्षीस ही त्याच्यासाठी खूप मोठी रक्कम होती, म्हणून त्याने ते आव्हान स्वीकारले आणि तो कामाला लागला. दिवस रात्र एक करून, १८-१८ तास काम करून त्याने डायरेक्ट करंट जनरेटर अधिक प्रभावी करून दाखविला. एडिसन यांना हवे तसे बदल त्याने करून दाखवले. परंतु एडिसन यांनी आपला शब्द पाळला नाही. आणि पैसे द्यायला नकार दिला. झालेल्या अपमानामुळे त्याने एडिसनची कंपनी सोडली. त्यानंतर मग त्या दोघांमधील कलह संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरला.
त्यानंतर टेस्ला यांचा काही काळ खूप खडतर गेला. पैसे नसल्याने त्यांनी काही दिवस खड्डे खणण्याचे काम केले. त्यात त्यांना दिवसाला २ डॉलर्स मिळायचे. पण काही दिवसांनंतर त्यांचे नशीब पुन्हा उजळणार होते, कारण १८८७ मध्ये टेस्ला यांनी Induction Motor चा शोध लावला, जी AC म्हणजेच Alternating Current System वर काम करायची. ही मोटर इतकी शक्तिशाली होती की Electric मार्केटमध्ये आघाडीवर असलेले उद्योगपती जॉर्ज वेस्टिंगहाऊस यांचं लक्ष त्याकडे गेलं. टेस्ला यांनी जॉर्ज वेस्टिंगहाऊस यांच्यासोबत Alternating Current सिस्टीमवर चालणारी ही मोटर जगासमोर ठेवली. मात्र त्याही वेळी एडिसन यांनी त्याचा विरोध केला, कारण त्यावेळी संपूर्ण अमेरिकेत एडिसन यांची DC म्हणजेच Direct Current System कार्यरत होती. एडिसन टेस्ला वाद इतक्या विकोपाला गेला होता, की जेव्हा रेडियोच्या शोधामुळे मार्कोनी आणि टेस्ला यांच्यात भयंकर वाद निर्माण झाले त्यावेळी एडिसनने मार्कोनीला पाठिंबा दिला.
टेस्ला यांनी केवळ Alternating Current System चाच शोध नाही लावला तर, त्याचबरोबर Electric Motor, पहिले Hydro Electric Power Station, Radio, Wireless Communication, Remote Control, Magnetic Power, रडारचा शोध लावला. तसेच 1895 मध्ये X-Ray Technologyवर प्रभुत्व मिळवून त्यात नवनवीन शोध लावले. ते फक्त संशोधक नव्हते, तर ते खूप चांगले वाचक होते. ते सबक्रोएशियन, झेक, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, हंगेरियन, इटालियन आणि लॅटिन अशा आठ भाषांमध्ये पारंगत होते.
संशोधनाचे अनेक यशस्वी प्रयोग पार पाडले असताना काही संशोधनामध्ये त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि त्यामुळे ते नैराश्याला बळी पडले. १८९३ साली टेस्लानी वायरलेस कम्युनिकेशन संदर्भात आपलं काम सुरू केलं, पण दोनच वर्षानी १८९५ साली त्यांच्या प्रयोगशाळेला आग लागून त्या सगळी उपकरणांची राख झाली. अनेक वर्षे एकटेच राहिल्यामुळे निकोला टेस्ला नैराश्येच्या आणखी गर्तेत ढकलले गेले. त्यांच्या जीवनातील शेवटचा १० वर्षांचा काळ सुद्धा त्यांनी एकट्यानेच एका हॉटेलमध्ये काढला. टेस्लांच्या नावे सुमारे ७०० पेटंट्स असूनसुद्धा ते शेवटपर्यंत कफल्लकच राहिले. जगातील सर्वात हुशार अशा या वैज्ञानिकावर अखेरच्या दिवसात कर्ज झाले होते.
शेवटी वयाच्या ८६व्या वर्षी आर्थिकदृष्ट्या पूर्ण बेजार झालेले निकोला टेस्ला न्यूयॉर्कच्या एका हॉटेलात 7 जानेवारी 1943 च्या रात्री झोपेतच कधी जग सोडून गेले हे सकाळपर्यंत कुणाला समजलं सुद्धा नाही! एडिसन, फॅरडे, मार्कोनी, आईनस्टाईन यांना जिवंतपणी जी प्रसिद्धी, जो मानसन्मान मिळाला तो टेस्ला यांना दुर्दैवाने मिळू शकला नाही. नाही म्हणायला या अवलियाच्या कामाची पोचपावती म्हणून, त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्ताने टाइम मासिकाने त्यांना front page वर स्थान दिले. यावेळी त्यांना ७० हून अधिक वैज्ञानिकांकडून कौतुकास्पद पत्रं आली. त्यावेळी त्यात आईनस्टाईन यांचेही पत्र होते. पण आज त्यांचा सन्मान म्हणून अमेरिकेमध्ये १० जुलै हा टेस्ला दिन म्हणून साजरा केला जातो. क्रोएशियातील १३०हून अधिक रस्त्यांना निकोला टेस्ला हे नाव दिले आहे. चंद्रावरील एका २६ किलोमीटर व्यासाच्या विवराला टेस्ला नाव देण्यात आले आहे. टेस्ला या इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीचं नाव सुद्धा त्यांच्या नावावरुनच ठेवलं आहे. मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये निर्माण झालेल्या एक लघुग्रहाचे नाव 2244 टेस्ला ठेवण्यात आले आहे आणि सर्बियाच्या १०० दिनारच्या नोटेवर टेस्ला यांचे चित्र आहे.
टेस्ला यांची आई म्हणाली होती की, “हे बाळ संपूर्ण जगाला प्रकाशमान करेल” आणि तिचं हे वाक्य टेस्ला यांनी आपल्या कर्तुत्त्वाने सार्थ ठरवलं. आता जेव्हा जेव्हा तुम्ही घरात लाईट सुरु करण्यासाठी स्विच वापराल तेव्हा तुम्हाला टेस्लाची आठवण नक्की येईल.
कुठलंही नाव ठेवताना त्यामागे काही ना काही कारण किंवा अर्थ असतो. जगप्रसिद्ध कार ब्रँड्सच्या नावामध्येसुद्धा काही रंजक गोष्टी लपल्या आहेत. पाहुया अशाच काही कंपन्यांबाबत.
BMW
जर्मनीचा BMW हा ब्रँड लक्झरी कोर्समध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. सुरूवातीला ही कंपनी दक्षिण जर्मनीच्या बव्हेरिया (Bavaria) या ठिकाणी विमानांचे इंजिन निर्मिती करत होती. त्यावेळी कंपनीचं नाव Bayerische Motoren Werke असं होतं. त्याचंच संक्षिप्त नाव हे BMW म्हणून ओळखलं जातं.
Fiat
फियाट ही इटलीची सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. कंपनीनं 1899 मध्ये ट्युरिन येथे वाहन उत्पादन सुरू केलं. या कारखान्याचं नाव इटालियन ऑटोमोबिल्स फॅक्टरी ट्युरिन या नावानं ओळखलं जातं. याला इटालियन भाषेत Fabbrica Italiana Automobili Torino या नावानं संबोधलं जायचं. याचंच संक्षिप्त रूप FIAT हे आहे. १९६०-८० अशी सलग २० वर्षं Fiatजगातील तिसरी सर्वात मोठी कार कंपनी होती.
Hyundai
दक्षिण कोरियाची ह्युंदाई हीदेखील भारतीय बाजारपेठेत सर्वांच्या परिचयाची कंपनी आहे. ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कार कंपनी आहे. कोरियन भाषेत Hyundai चा अर्थ ‘वर्तमान युग’ असा आहे. यावरच कंपनीचं नाव Hyundai असं ठेवण्यात आलं. १९६८ साली चुंग जु-युंग यांनी कोरियातील सेऊलमध्ये कंपनीची स्थापना केली होती.
KIA
किया मोटर्सनं नुकतीच भारतीय बाजारपेठेत एन्ट्री केली आहे. या कारचं नाव दक्षिण कोरियन भाषेतील दोन अक्षरं 起 (ki) और 亞 (a) यांनी बनलं आहे. यातील ‘कि’ चा अर्थ उदय होणं किंवा बाहेर येणं आणि ‘या’ चा अर्थ पूर्व अथवा एशिया असा आहे. कंपनीच्या नावाचा पूर्ण अर्थ Rising From the east असा वाचला जातो.
Rolls-Royce
Rolls-Royce ही ब्रिटिश वाहन उत्पादक कंपनी आहे आणि अनेक वर्षांपासून लक्झरी कार उत्पादनांसाठी ओळखीची आहे. या ब्रँडचं नाव कंपनीच्या दोन संस्थापकांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. 1884 मध्ये फेडरिक हेनरी रॉयस (rederick Henry Royce) यांनी एका इलेक्ट्रिक/मेकॅनिकल बिझनेसची सुरूवात केली होती त्यानंतर 1904 मध्ये त्यांनी पहिली कार तयार केली. ती कार त्यांनी आपले मित्र चार्ल्स स्टिवर्ट रोल्स (Charles Stewart Rolls) यांना दाखवली. त्यांना ती आवडलीही. त्यानंतर त्यांनी भागीदारी करून Rolls-Royce ही कंपनी सुरू केली. त्यानंतर 1904 मध्ये त्यांनी पहिली कार तयार केली. ती कार त्यांनी आपले मित्र चार्ल्स स्टिवर्ट रोल्स (Charles Stewart Rolls) यांना दाखवली. त्यांना ती आवडलीही. त्यानंतर त्यांनी भागीदारी करून Rolls-Royce ही कंपनी सुरू केली.
Mercedes-Benz
ऑटो सेक्टरमधील जुना ब्रँड म्हणून Mercedes-Benz ची ओळख आहे. यामध्ये त्यांच्या संस्थापकांचं नाव आहे. परंतु हे अर्धसत्य आहे. कार्ल बेंझ हे या ब्रँडचे संस्थापक होते. परंतु Mercedes हे नाव ऑस्ट्रियाचे बिझनेसमन एमिल जेलिनेक यांच्या मुलीच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. याबाबत सविस्तर आपण नंतर चर्चा करू.
Tesla
इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टेस्लाच्या तोडीस तोड देणारी सध्या दुसरी कंपनी नाही. या ब्रँडच्या नावामागेही एक गोष्ट आहे. याचं नाव सर्बियन शोधकर्ते निकोला टेस्ला यांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. त्यांनी 1884 च्या दरम्यान अमेरिकेत प्रवास केला होता. ते आपल्या उत्कृष्ट इलेक्ट्रिक वर्क्ससाठी प्रसिद्ध होते.
Datsun
Datsun ही निस्सान या कंपनीचाच एक ब्रँड आहे. यातील DAT हे नाव त्याचे फायनॅन्सर्स डेन, आओयामा आणि टेकूची यांच्या नावाच्या सुरूवातीच्या अक्षरापासून करण्यात आलं आहे. त्यानंतर कंपनीनं आपली छोटी कार SON च्या आधारावर याचं नाव DATSON हे ठेवलं. परंतु जपानी भाषेत SON चा अर्थ नुकसान असा होतो. म्हणून त्यानंतर त्यांनी या कारचं नाव DATSUN असं केलं.
Ford
फोर्ड या कंपनीची स्थापना 1914 मध्ये करणअयात आली. या कंपनीचं नाव त्यांचे संस्थापन Henry Ford यांच्या नावावर ठेवण्यात आलं. Henry Ford हे कंपनीच्या मालकाच्या रुपात जगातील सर्वात धनवान आणि परिचित लोकांपैकी एक होते.
Toyota
या ब्रँडचंही नाव कंपनीचे संस्थापन Sakichi Toyoda यांच्या नावावर ठेवण्यात आलं. टोयोडा हे वाल बोलण्यात आणि आधिक सुलभ होण्यासाठी याच्या स्पेलिंगमध्ये थोडे बदल करून ते टोयोटा असं करण्यात आलं.
Skoda
स्कोडा ही कंपनीदेखील आपल्या प्रिमिअम कार्ससाठी प्रसिद्ध आहे. या ब्रँडचं नाव कंपनीचे संस्थापक Emil Škoda यांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे.
Volkswagen
या कंपनीचं मुख्यालय जर्मनीतील वोल्फ़्सबर्ग येथे आहे. १९३७ मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. अडॉल्फ हिटलरनं सामान्य लोकांच्या गरजा पुरवणारी एखादी कार तयार करण्याचे आदेश दिले होते. या दरम्यान अनेक कंपन्या कार उत्पादन करत होत्या. परंतु Beetle नं एक स्वस्त मॉडेल सादर केलं होतं आणि ते हिटलरला आवडलंही. यानंतर या कंपनीला Volkswagen हे नाव देण्यात आलं. Volks आणि wagen याचा जर्मन भाषेत अर्थ जनता आणि वाहन म्हणजेच जनतेचं वाहन असा होतो.
सध्या लोकांचा कल या बिझनेस किंवा व्यवसाय या क्षेत्रात वाढताना जास्त दिसतोय. व्यवसाय करून स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्यावर अनेकांचा भर दिसून येतो आहे. उद्योजक व्हा आणि आपली स्वप्नं पूर्ण करा किंवा मोठी स्वप्नं पूर्ण करायची असतील, तर उद्योजक व्हावे लागेल असे मोटिव्हेशनल डायलॉग वाचून सध्याची तरुणाई मोठ्या प्रमाणात उद्योगाकडे वळताना आपल्याला दिसत आहे.
व्यवसाय किंवा उद्योग सुरु करताना तुमच्या पाठीशी अनुभवाची शिदोरी असणे गरजेचे आहे. आता हा अनुभव एकतर तुम्हाला तुमच्या घरातच परंपरेने चालत आलेल्या व्यवसायात मिळू शकतो किंवा त्यासाठी काही काळ एखाद्या ठिकाणी नोकरी करून तुम्ही तो मिळवू शकता. अनेक संस्थांमध्ये तुम्हाला व्यवसायाचे परिपूर्ण आणि शास्त्रशुद्ध शिक्षण देऊन तयार केले जाते. हे सर्व आजमावल्यानंतर तुम्ही नेमकी व्यवसायाला सुरुवात करता, तेव्हा मात्र तुम्हाला वेगळेच अनुभव येतात. एकाच आजारावरील औषधाची मात्रा सर्वांना एकसारखी लागू पडत नाही तसेच व्यवसाय किंवा उद्योग ठराविक अशा एकाच मार्गाने चालवता येत नाही. प्रत्येकाच्या अनुभवातून तो वेगवेगळ्या पद्धतीने फुलवता जरूर येतो. यासाठीच व्यवसाय करताना काही टिप्सची गरज पडते.
या टिप्स म्हणजे कोणतं व्यवसाय पुराण नसून अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला तुमचा व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी आणि त्याची व्यापकता वाढवण्यासाठी कामी येऊ शकतात.
व्यवसायाच्या अगदी सुरुवातीपासून बोलायचे झाल्यास व्यवसायाची सुरुवात करत असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा जो बिझनेस प्लॅन तयार करत असतो, तो बिझनेस प्लॅन इन डिटेल प्रत्येकासोबत शेअर करू नका. कदाचित तुमचा हा बिझनेस प्लॅन पूर्णपणे चोरीला जाऊ शकतो आणि त्याचा तुम्हाला नाहक मानसिक किंवा आर्थिक त्रास सहन करावा लागू शकतो. योग्य आणि भरवश्याच्या व्यक्तींना हा प्लॅन दाखवा आणि गरज असेल तर सुधारणा करा…
सुरुवातीला येणाऱ्या अनुभवांमध्ये निरीक्षणास येणाऱ्या चुका लक्षात घेऊन त्या चुका पुन्हा पुन्हा होणार नाहीत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सुरुवातीला तुमच्या पदरात अपयश आले, तर त्याला अनुभव म्हणून पाठीशी घ्या आणि चुकांची पुनरावृत्ती न करता, यशस्वी व्यवसाय करण्यासाठी सातत्य ठेवा.
एखादा व्यवसाय सुरु करत असताना आपल्या मित्रपरिवारामध्ये किंवा नातेवाईंकांमध्ये आपले अनेक हितचिंतक असतात ज्यांना आपल्यासोबत यायचे असते, अशा काही विश्वासू लोकांना भागीदार किंवा गुंतवणूकदार म्हणून सोबत घेऊ शकता. यामुळे तुमच्या व्यवसायाला अधिक बळ मिळू शकते. त्यासोबतच आपल्या व्यवसायात आपण एकटेच जर सगळ्या प्रकारची व्यवस्था आणि काम करत असू, तर त्यामुळे आपल्या व्यवसायाच्या प्रगतीची गती कमी होऊ शकते. एकाचवेळी व्यवसायाचा सर्वांगीण विकास घडवायचा असेल, तर एक ग्रुप म्हणून अनेक सभासदांना सोबत घेऊन तम्ही व्यवसाय सुरु ठेऊ शकता.
एकत्र येऊन एक ग्रुप म्हणून काम करत असताना संघटनात्मक वृत्तीतून व्यवसायातले अनेक विभाग एकाचवेळी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळले जाऊ शकतात. व्यवसाय सुरु केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय सुरु केला आहे, तेथील स्थानिकांना व्यवसायात सामावून घ्या. यामुळे व्यवसायाच्या अनेक लहान मोठ्या गरजांसाठी स्थनिकांच्या मदतीमुळे कमीतकमी खर्चात अनेक प्रकारची कामं पूर्ण होऊ शकतात. व्यवसायाच्या सुरुवातीला आणखी एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे, ती म्हणजे पैशांची आगाऊ व्यवस्था. अगदी सुरुवातीच्या काळात तुम्हाला अपेक्षित असा व्यवसाय किंवा नफा नाही झाला, तर तूट भरून काढण्यासाठी गाठीशी पैशांची व्यवस्था असणे अत्यंत गरजेचे असते. व्यवसाय सुरु केल्यानंतर ज्या नावाने आपण व्यवसाय सुरु केला आहे त्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. व्यवसायाने थोडीशी गती मिळवल्यानंतर आपण त्याचा ऑनलाईन मार्केटिंगचा उत्तम प्लॅन बनवणे हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी एखाद्या वेबसाईटचा तसेच सोशल मीडियाचा आपण चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याकडे आपण कळत नकळत दुर्लक्ष करू शकतो ती गोष्ट म्हणजे कायदेशीर बाबी. व्यवसाय सुरु होताच स्थानिक आणि राज्य यांचे कर कशापद्धतीने आहेत ते समजून घेऊन त्याप्रमाणे सर्व तरतूद करणे गरजेचे आहे.
तुमच्या उद्योगामध्ये तुम्ही काही कर्मचारी घेतले असतील, तर त्यांच्याकडे लक्ष देणे आणि त्यांच्या गरजा समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यांच्या जर काही समस्या असतील तर त्या आणि त्यांच्यासाठी योग्य व मूलभूत सुविधा देणे अत्यंत महत्वाचे आहे. अशा रीतीने अगदी सुरुवातीपासून व्यवसायाच्या लहान-लहान गोष्टींकडे अगदी बारकाईने लक्ष दिले तर व्यवसायाची प्रगती आणखी जोमाने नक्कीच होऊ शकते.
बाकी तुम्हाला आजचा आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर लेखला like आणि share करा channel ला subscribe करा.
व्यवसाय! हा शब्द उच्चारला की संपूर्ण सोशल मीडिया पटकन डोळ्यासमोरून तरळून जातो. व्यवसाय असा करा, तसा करा, तुम्ही अमकं केलं पाहिजे, तमकं केलं पाहिजे. अशा सतरा गोष्टी आणि या गोष्टी सांगणारे अठरा गुरु.
खरं सांगायचं झालं तर बिझनेस शिकवून किंवा वाचून शिकता येत नाही. तो करताना येणारे अनुभव आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जातात. अत्यंत समर्पित वृत्तीने झोकून देऊन बिझनेससाठी आपण मेहनत घेतली पाहिजे. बिझनेसची संपूर्ण रचना आणि व्यवस्था यावर नीट अभ्यास करून शुभारंभ केला की मागे वळून पाहण्याची गरज नाही.
जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात बिझनेस सुरू करता, तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळात तुमचा चांगला जम बसलेला असतो. तुम्ही मन लावून आणि लक्ष देऊन सगळ्या गोष्टी करत असता, पण जेव्हा तुमचा बिझनेस ग्रो होतो आणि तुम्हाला सगळेजण एक यशस्वी बिझनेसमन म्हणून बघायला लागतात, तेव्हा नेमकं असं होतं की; आपल्या बिझनेसपेक्षा आपण बाकीच्या गोष्टींवर जास्त लक्ष देतो. ते म्हणतात ना, यश मिळवण्यापेक्षा यश टिकवणं फार जास्त अवघड असते. अगदी याच म्हणीप्रमाणे बिझनेसचा जम बसायला लागल्यानंतर आपले लक्ष विचलित होते आणि कळत नकळत आपण रोज वेगवेगळ्या चुका करायला लागतो. या चुका जेव्हा एक मर्यादा गाठतात, तेव्हा तुमच्या बिझनेसला उतरती कळा लागली म्हणून समजा.
नेमकं याच विषयावर आपण या लेखामध्ये बोलणार आहोत. तुम्ही जेव्हा नुकताच बिझनेस सुरु केलेला असतो, तेव्हा तो तुमच्या ग्राहकांसाठीही नवीन असतो. अशावेळी तुमची आणि तुमच्या प्रॉडक्टची त्यांना आणि त्यांची तुम्हाला नुकतीच ओळख झालेली असते. सगळं नवीन नवीन असताना दोन्हीकडून समजुतदारपणा दाखवला जातो. पण जेव्हा हा सगळा नवा काळ ओसरून जातो, खरी मजा तेव्हा सुरु होते. बिझनेसमध्ये तोचतोचपणा येऊ नये यासाठी तुमची कसरत सुरु होते. त्यामधीलच एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रॉडक्टचा दर्जा कायम टिकवून ठेवणे.
उदाहरण म्हणून आपण एक गोष्ट घेऊ. गोपाळला खाद्यपदार्थांचा भलताच नाद होता. एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ तो नेहमीच सर्वांसाठी बनवायचा. हळूहळू त्याचे हे पदार्थ त्याच्या नातेवाईकांमध्ये बरेच लोकप्रिय झाले आणि त्यासोबत गोपाळसुद्धा लोकप्रिय होऊ लागला. अशातच त्याच्या सर्व मित्रांनी त्याला इडलीचा व्यवसाय सुरु करण्याचा आग्रह केला. स्वतःचे हे नवे स्वप्न आणि थोडाफार अनुभव घेऊन इडलीच्या व्यवसायात गोपाळने एन्ट्री केली. बघता बघता त्याचा व्यवसाय त्याच्या हाताच्या उत्कृष्ट चवीमुळे सर्वदूर प्रसिद्ध झाला. ज्यामुळे त्याच्याकडे ग्राहकांची संख्या प्रचंड वाढू लागली आणि त्याच्यावर कामाचा ताण वाढू लागला. या वाढत्या गर्दीबरोबर त्याने त्याच्या सोबतीला कामासाठी कोणीच व्यक्ती ठेवली नसल्यामुळे इडलीच्या चवीवर, सर्व्हिसवर प्रचंड परिणाम होऊ लागला. ज्यामुळे त्याचा व्यवसाय पूर्णपणे मोडकळीस आला.
गोपाळच्या या गोष्टीवरून आपण काय शिकलो? कळत नकळत चुका होत जातात, वेळीच त्या सुधारल्या जात नाहीत, त्याकडे पाहिलं जात नाही आणि या दुर्लक्षामुळे व्यवसाय कोलमडून पडू शकतो. म्हणजेच काय व्यवसायाची सुरुवात झाल्यांनतर एकदा जम बसला की त्याकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी गरजेनुसार जे बदल करणे महत्वाचे आहे, त्याकडे व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे.
गोपाळचे उदाहरण घेतले, तर नेमक्या कोणत्या चुका झाल्या ते आपण पाहूया. जेव्हा तुमचा बिझनेस वेगाने प्रगती करत असतो, तेव्हा बिझनेसच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अनेक प्रकारचे बदल अपेक्षित असतात, हे बदल करत असताना बिझनेसच्या प्रॉडक्टवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते. गरजेनुसार मनुष्यबळ वाढवणे, कामाची रचना नीट लावणे, सर्व कामं शिस्तीने पूर्ण होत आहेत ना याकडे लक्ष देणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःहून वैयक्तिकपणे याकडे नीट लक्ष देणे. हे सगळं जमून आलं की, दर्जा टिकून राहतो आणि ग्राहकांचा उत्साहदेखील.
थोडक्यात काय, तर तुमचा बिझनेस हा नेहमी updated असणे गरजेचे आहे. तुम्हाला काय वाटतं व्यावसायिक म्हणून किंवा ग्राहक म्हणून अजून कोणते बदल तुमच्या दृष्टीने करणे गरजेचे आहे. आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
मेहनत करूनही यश मिळत नाही म्हणून प्रयत्न सोडून देणारे जगात अनेकजण आहेत, पण आज आपण ज्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत ते व्यक्तिमत्व इतकं महान आहे, की हजारहून अधिक वेळा आपले प्रयत्न चुकले, तरी त्यात सातत्य ठेवून त्याने अखेरीस विजेच्या बल्बचा शोध लावला. लहानपणी ज्याला मतिमंद म्हणून शाळेतून काढून टाकलं, पण आज त्याच्या नावावर १०९३ पेटंट आहेत अशा त्या महान व्यक्तिमत्वाचं नाव आहे थॉमस अल्वा एडिसन.
नमस्कार! नवी अर्थक्रांतीमध्ये आपलं स्वागत आहे… स्टार्टअप आणि उद्योग क्षेत्रातील रंजक आणि उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत.
अमेरिकेतील ओहियो राज्यामधील मिलान या गावात सॅम्युअल आणि नॅन्सी नावाचे दाम्पत्य राहात होते. सॅम्युअल दुकानात काम करत, तर नॅन्सी घरी शिकवणी घेऊन संसाराला हातभार लावत असे. ११ फेब्रुवारी १८४७ रोजी या दाम्पत्याच्या पोटी एडिसनचा जन्म झ़ाला. लहानपणापासूनच एडिसनला प्रत्येक गोष्टीच कुतूहल होतं. एडिसनने एकदा आपल्या आईला विचारलं कि, ‘पक्षी हवेत का उडतात?’ यावर तिने सांगितलं कि, ‘ते किडे खातात ना, त्यामुळं हवेत उडतात.’ यावर एडिसन बागेत गेला. त्याने अनेक किडे जमा केले, त्याचा घोळ बनवला आणि आपल्या मित्राला म्हणाला की, ‘हे पिलं कि तू हवेत उडशील.’ त्याचा मित्र ते प्याला. तो हवेत काय उडाला नाही, पण एडिसनला दिवसा तारे मात्र नक्की दिसले. आपल्या कुतुहलामुळं असे अनेक वेडेवाकडे प्रश्न एडिसन विचारायचा. त्यामुळं त्याला सगळे निर्बुद्ध आणि मतिमंद म्हणायचे.
शाळेतून येताना एकदा एडिसन शिक्षकांची एक चिट्ठी घेऊन आला. जी त्याने आपल्या आईला दिली. ती वाचून त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. एडिसनने जेव्हा आपल्या आईला विचारलं की यात काय लिहिलंय, तेव्हा त्याची आई म्हणाली, त्यांनी लिहिलेलं आहे की, ‘तुमचा मुलगा खूप हुशार आहे. तो एक विद्वान आहे आणि आमची शाळा आणि शिक्षक त्याला शिकवण्यात कमी पडत आहेत.’ तेव्हापासून पुढं एडिसनचं घरातच शिक्षण चालू झालं. त्याची आई त्याला अनेक पुस्तक आणून द्यायची आणि एक पुस्तक वाचलं कि त्याला पैसे मिळायचे. एडिसन विज्ञानाची अनेक पुस्तकं वाचू लागला. त्यानं आपल्या घरातच एक लहान प्रयोगशाळा चालू केली. तो तिथं अनेक प्रयोग करू लागला. रसायनं घ्यायला पैसे कमी पडत, म्हणून तो पेपर टाकत असे, रेल्वेमध्ये चॉकलेट गोळ्या विकत असे. घरातील त्याच्या उपद्व्यापामुळे घरचे वैतागले. त्याच्या आईने चिडून त्याची प्रयोगशाळाच बंद केली. नंतर त्यानं रेल्वेच्या एका लहान डब्यात आपले प्रयोग चालू केले. तिथं देखील एक अपघात घडला आणि त्याच्या एका रसायनामुळं डब्याला आग लागली. यावर रेल्वेच्या टिसीने एडिसनच्या इतक्या जोरात कानफटात वाजवली कि, तेव्हापासून एडिसनला कमी ऐकू यायला लागलं. पुढं जेव्हा त्याला यावर प्रश्न विचारला. तेव्हा याकडं देखील सकारात्मक पाहत एडिसन म्हणाले कि, ‘बरं झालं मला कमी ऐकू येतं. त्यामुळे मला वायफळ बडबड ऐकून घ्यावी लागत नाही आणि माझं लक्ष फक्त कामावर असतं.’
हार न मानता लहान एडिसनने त्याचे प्रयोग चालू ठेवले. अशातच एकदा रेल्वेखाली येणाऱ्या एका लहान मुलाचा जीव एडिसनने वाचवला. तो लहान मुलगा स्टेशनमास्तर मॅकेंझीचा होता. याचं बक्षिस म्हणून त्याने एडिसनला टेलिग्राफ ऑपरेटिंग शिकवले. १५ वर्षाचा एडिसन टेलिग्राफ ऑपरेटर म्हणून काम करू लागला आणि सोबतच आपले प्रयोगही. दिवसभर प्रयोगात दंग असल्यामुळे त्याला रात्री झोप येई, म्हणून त्याने टेलिग्राफलाच घड्याळ बसवले. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी.
घरची परिस्थिती बिघडत चालली होती वडिलांची नोकरी सुटली, आई आजारी. यामुळं घरची आर्थिक जबाबदारी पेलण्यासाठी एडिसन बोस्टनला आला आणि वेस्टर्न युनियन कंपणीमध्ये नोकरी करू लागला. १८६९ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी तो न्यूयॉर्क मध्ये आला. तिथं त्यानं आपला पहिला यशस्वी प्रयोग केला युनिवर्सल स्टोक प्रिंटर बनवण्याचा. त्याने जेव्हा तो विकायचा ठरवलं तेव्हा त्याची किंमत ४हजार डॉलर्स लावली, पण एडिसनचा तो अविष्कार एक अमेरिकन माणसाने चक्क ४० हजार डॉलर्सला विकत घेतला. आता मात्र एडिसनकडे आपली स्वतःची प्रयोगशाळा उभारण्यासाठी पुरेसे पैसे होते.
या प्रयोगशाळेत त्यांनी अनेक प्रयोग केले. त्यांने ग्रामोफोनचा शोध लावला. त्याकाळी गाणी ऐकण्यासाठी वापरलं जाणारं हे मशीन अल्पावधीतच लोकप्रिय झालं. एडिसनचं पहिलं प्रेम इलेक्ट्रिसिटी होतं. खरंतर इलेक्ट्रिकं बल्बचा शोध वोडवॉर्ड आणि इवान यांनी लावला, पण अपुऱ्या पैशामुळं त्यांना तो पुढं नेता आला नाही. एडिसनने त्यांच्याकडून या साठीचे सगळे हक्क खरेदी केले आणि आपल्या प्रयोगशाळेत तो याचे प्रयोग करू लागला. अखेरीस २१ ऑक्टोबर १८७९ मध्ये दिवसभर म्हणजे जवळपास १३ तास चालणारा बल्ब बनवण्यात एडिसनला यश मिळालं. त्याचा हा अविष्कार पहाण्यासाठी माणसं येऊ लागली.
त्यांनी नंतर एडिसन एलुमनेटिंग कंपनी चालू केली. जिच्यासाठी फोर्ड यांनी मदत केली आणि ती बनली जनरल इलेक्ट्रिक कंपनी बनली. याच हेन्री फोर्ड यांची माहिती मागील व्हिडीओमध्ये आम्ही सांगितली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तो व्हिडीओ नक्की पहा.
एडिसन आपल्या अनेक प्रयोगात यशस्वी होत होते. घरातील कपाट आवरत असताना त्यांना एक पत्र सापडलं. हे ते पत्र होतं, जे त्यांच्या आईला त्यांच्या शिक्षकांनी दिलं होतं. त्यांनी ते उघडलं, तर त्यात लिहिलं होतं की, ‘तुमचा मुलगा मतिमंद आहे, निर्बुद्ध आहे. आम्ही त्याला शिकवू शकत नाही. त्याला शाळेतून काढून टाकण्यात येत आहे.’ हे पत्र वाचून एडिसन रडू लागले. आपल्या आईने आपल्यासाठी काय केलं आहे हे त्यांच्या लक्षात आलं. एडिसन यांनी लिहून ठेवलं आहे कि, ‘एका महान आईनं एका मतिमंद मुलाला अजरामर असा संशोधक बनवलं.’ मित्रहो आजकाल आपण पहातो की, आपल्या मुलाने अमुक एवढे मार्क्स मिळवलेच पाहिजेत म्हणून दबाव टाकणारे अनेक पालक आहेत. अशांसाठी एडिसनची आई बरंच काही शिकवून जाते.
आपल्याला माहित नसेल, पण मोशन पिक्चर म्हणजेच चलतचित्र, त्याचा शोध लावण्यात देखील एडिसन यांचा खूप मोठा वाटा आहे. फ्लोरोस्कोपी मशीन जे Xरे साठी वापरलं जात, ट्रान्समीटर, रिचार्जेबल बॅटरी, अनेक प्रकारचे केमिकल्स असे एक ना अनेक शोध एडिसन यांनी लावले आहेत. एडिसन हे संशोधकासोबतच एक गुंतवणूकदारसुद्धा होते. त्यांनी खाणकाम क्षेत्रातही गुंतवणूक केली होती. पहिल्या जागतिक युद्धात देखील अमेरिका सरकारला एडिसन यांची खूप मदत झाली.
जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडं सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला शिकवणाऱ्या या महान संशोधकाचा मृत्यू १८ ऑक्टोबर १९३१ मध्ये झाला. एडिसन यांनी पहिल्या बायकोच्या मृत्यनंतर दुसरं लग्न केलं. त्याना एकूण ६ मुलं आणि विशेष म्हणजे सहाही जण शास्त्रज्ञ होती. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा चार्ल्स एडिसन याने त्यांच्या कंपनीची घोडदौड सांभाळली.
माणूस सकारात्मक असला की त्याच्या हातून होणाऱ्या गोष्टीसुद्धा सकारात्मक आणि भव्यदिव्य असतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे थॉमस अल्वा एडिसन. शाळेतून काढलेल्या मुलाबाबत आजकालचे आईवडील, समाज कदाचित मानसिक खच्चीकरण करेल, पण एडिसनच्या आईच्या विश्वासाने याच मतिमंद समजल्या जाणाऱ्या मुलाला १०९३ पेटंट मिळवणारा संशोधक बनवलं. कमी ऐकू येण्याला जीवनातला अडथळा न मानता, उलट त्यामुळे आपण कामावर जास्त लक्ष केंद्रित करू शकलो, बल्ब बनवण्यात मला १००० वेळा अपयश आलं नाही, तर कोणत्या पद्धतीने बल्ब बनवला, तर तो बनत नाही याचे १००० मार्ग सापडले असा जगावेगळा विचार करणारे एडिसन.
अश्मयुगात मानवाने चाकाचा शोध लावला. जसजसा मानवाचा विकास होत गेला तसतसा तो नवीन गोष्टींचा अविष्कार करत गेला. कबुतरापासून ते निरोपाचा खलिता घेऊन निघालेल्या दूतापर्यंत संपर्क-संवादाची अनेक रूपे आपण पाहिली. आता आपला एखादा छोटासा msg सुद्धा काही क्षणात दुसऱ्यांपर्यंत पोहोचतो. पण आधी तसं नव्हतं. तेव्हा घोड्यावरून पत्र पोहोचवली जायची. मग हळूहळू घोडागाडी आली, बैलगाडी आली. त्यातून लोकांनी प्रवास करायला सुरुवात केली. प्रवास चालू होता पण सतत काहीतरी नवीन करण्याची इच्छा माणसाला स्वस्थ बसू देत नव्हती.
आपला प्रवास अजून सोपा आणि सुखकर कसा करता येईल याचे अनेक पर्याय मानव शोधत राहिला. वेगवेगळ्या संशोधकांनी आपल्या कारकिर्दीत प्रवास सुखकर करण्याचे अनेक अविष्कार करून दाखविले. यातल्याच एका आविष्काराची सुरुवात केली ती १८४४ मध्ये जन्मलेल्या जर्मन इंजिनिअर, कार्ल बेंझ यांनी. चला तर मग जाणून घेऊया कार विश्वात ज्यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं, अशा जगप्रसिद्ध कार्ल बेंझ यांच्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल!
“बायको गेली माहेरी आणि झाला गाडीचा जन्म” हे वाक्य कार्ल बेंझ यांच्याविषयी गमतीशीरपणे वापरलं जातं. कार्ल बेंझ यांचा जन्म २५ नोव्हेंबर १८४४ मध्ये जर्मनीतील कार्लसुरहे या शहरात एका लोहार कुटुंबात झाला. वडील Johann George Benz लोहारकाम करायचे, आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती आणि अश्यातच काही वर्षांत न्यूमोनियामुळे वडिलांचा मृत्यू झाला. घरची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवर आली. काबाडकष्ट करून आईने त्यांना शिकवले. आपल्या मुलाला शिक्षणात काहीच कमी पडता कामा नये, इतकंच तिला वाटायचं. लहानपणापासून कार्ल यांना नवीन गोष्टींचं प्रचंड कुतूहल. त्यात काहीतरी नवीन गोष्टींचा शोध घेणे, संशोधन करणे हे आवडीचे काम. शालेय शिक्षणानंतर त्यांनी वयाच्या 19व्या वर्षी 1864 ला मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी कार्लजरुह या यूनिवर्सिटीतून प्राप्त केली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका स्केल फॅक्टरीत draftsman आणि designer म्हणून काम केले. सुरुवातीपासूनच आपल्याला ज्या गोष्टी येत नाहीत त्याच करण्यात त्यांना जास्त रस होता. 1868 ला त्यांनी स्केल फॅक्टरीतलं काम सोडलं आणि ते फॉरझाईमला गेले. तेथे एका ब्रिज बिल्डिंग कंपनीसाठी काही काळ काम केलं. काही वर्षांनी त्यालाही रामराम ठोकून ते vienna च्या लोखंडी बांधकाम कंपनीत काम करू लागले. जवळ जवळ ७-८ वर्ष वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करून त्यांनी आपल्या अभ्यासात आणि अनुभवात भर टाकली. मात्र तरीही त्यांचे दुसरीकडे काम करण्यात मन काही लागेना.
१८७१ मध्ये त्यांनी ऑगस्ट रीटर यांची मेकॅनिकल कंपनी जॉइन केली. मात्र ती कंपनी पहिल्याच वर्षात डबघाईला आली. अशावेळी बेंझ यांनी त्यांची प्रेयसी बर्था रिंगरच्या मदतीने कंपनीला या अडचणीतून बाहेर काढले. बर्थाने लग्नात मिळालेल्या हुंड्यातून कंपनीचे शेअर्स विकत घेतले. २० जुलै १८७२ रोजी कार्ल बेंझने बर्था रिंगरशी लग्न केलं आणि बर्था रिंगरची बर्था बेंझ झाली.
Bertha Benz & Karl Benz
या कंपनीमध्ये त्यांनी नवीन इंजिनाच्या उत्पादनासाठी काम सुरू केले. अधिक दर मिळविण्यासाठी त्यांनी 1878 मध्ये नवीन पेटंटवर काम करण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी टू स्ट्रोक पेट्रोल इंजिन बनविण्यावर फोकस केला, खूप अभ्यासानंतर, परिश्रमानंतर त्यांनी ते इंजिन बनवलं, हे इंजिन बनवताना त्यांना अनेकदा अपयश आलं, मात्र त्यांनी हार मानली नाही. त्यांनी ते इंजिन बनवून पूर्ण केलं आणि त्यांना त्याचं पेटंट मिळाले ते २८ जून १८८० मध्ये.
टू स्ट्रोक इंजिनच्या यशानंतर स्पार्क प्लग, क्लच गियर, वॉटर रेडियटर speed regulation system, spark ignition चा शोध लावून त्यांनी त्याचे पेटंट मिळविले. मात्र समाजात एखादा जर चांगलं काम करत असेल, तर त्याचे पाय ओढणारे अनेक लोक असतात. प्रॉडक्टवरील High product cost मुळे मॅनहाइममधील बँकांनी कार्ल यांना joint stock company बनविण्यास भाग पाडले. या घटनेमुळे कार्ल नाखुश होते कारण इतकं जीव ओतून काम करूनही त्याच्याकडे फक्त पाच टक्के शेअर्स आणि संचालक म्हणून माफक पद शिल्लक होते. आणि सर्वात वाईट म्हणजे, नवीन उत्पादने तयार करताना त्याच्या कल्पनांचा विचार केला जात नव्हता, म्हणूनच कार्ल यांनी एका वर्षानंतर, 1883 मध्ये त्या कॉर्पोरेशनमधून माघार घेतली.
कार्ल यांची लहानपणापासूनची आणखी एक आवड म्हणजे सायकल repairing. ते मॅनहाइममधील मॅक्स रोझ आणि फ्रेडरिक एस्लिंगर यांच्या मालकीच्या सायकल दुरुस्तीच्या दुकानात काम करू लागले. तिघांनी industrial machines चे उत्पादन करणारी एक नवीन कंपनी स्थापन केली जिचं नाव होतं Benz & Cie.
कंपनीचे यश पाहता कार्ल आणखी जोमाने काम करू लागले. त्यावेळी सगळीकडेच carriages म्हणजेच बग्गीचा वापर केला जायचा पण कार्ल यांच्या तल्लख मेंदूत घोडाविरहित गाडी बनविण्याची कल्पना आली. सायकल रिपेअरिंगच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी ऑटोमोबाइल तयार करण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी फोर स्ट्रोक इंजिन, advanced coil ignition अशा अनेक गोष्टी वापरल्या आणि 1885 साली पहिल्या ऑटोमोबाईलची निर्मिती केली ज्याचं नाव होतं “बेंझ पेटंट-मोटरवॅगन”. २९ जानेवारी १८८६ रोजी जर्मनीमध्ये जगातील पहिल्या गाडीचा जन्म झाला. मात्र प्रदर्शनादरम्यान “बेंझ पेटंट-मोटरवॅगन” ची भिंतीशी टक्कर झाली आणि त्याचे हे मॉडेल अयशस्वी ठरले. या मॉडेलमध्ये काही त्रुटी आढळल्या म्हणून कार्लने मोटरवॅगन मॉडेल २ तयार केले, त्यात पहिल्या मॉडेलपेक्षा अनेक चांगले बदल केले. १८८९ मध्ये, त्याने मॉडेल क्रमांक ३ सादर केले, ज्याचे प्रदर्शन पॅरिसमध्ये भरवण्यात आले.
Benz Patent Motorwagen
जरी हे मॉडेल चांगले असले तरीही गाडीतून येणाऱ्या आवाजामुळे सरकारी अधिकारी बेंझ यांच्या गाडीकडे शंकेने पाहू लागले. इतका मोठा शोध लावूनही कार्ल यांनी गाडी बाहेर काढलीच नाही. गाडी सुरक्षित असू शकेल का? इतक्या लांब पल्ल्याचा रस्ता गाडी पार करू शकेल का? अशी भीती त्यांच्या मनात होती. गाडी तयार तर केली, मात्र ती अजून उजेडात आली नव्हती.
आपल्याकडे एक म्हण आह, “प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक ‘स्त्री’ असतेच”, या प्रयोगातदेखील बर्था बेंझ यांनी स्वतःकडचा सगळा पैसा खर्च केला केला होता. गाडीचं पेटंट मिळूनही कार्ल यांनी गाडी बाहेर काढली नव्हती म्हणून बर्था यांची खुप चिडचिड व्हायची. कार्ल यांच्या प्रवासात बर्था बेंज यांचा सहभाग खूप महत्वाचा होता, बर्था यांनी मनाशी पक्के केले की, आता ही गाडी आपणच बाहेर काढायची.
जेव्हा कार्ल बेंझ घरी नव्हते तेव्हा बर्था यांनी एक बेत आखला की, आपल्या मुलांसह गाडीतून प्रवास करायचा आणि ती आपल्या माहेरी निघाली. मॅनहाईम जिथे हे दाम्पत्य राहायचं तिथून फॉरझाईम म्हणजेच बर्था यांचं माहेर जवळपास ९७ किलोमीटर दूर होतं. आत्ता जरी आपल्याला हे अंतर जवळच वाटत असलं, तरी त्याकाळच्या ओबडधोबड रस्त्यावरुन एवढा प्रवास करणे सुद्धा कमी जिकरीचे काम नव्हते. मात्र त्यानी आपला प्रवास चालू ठेवला. बिना घोड्यांची ही गाडी बघून रस्त्यावरचे लोक घाबरू लागले. या आधी कधीच न पाहिलेलं काहीतरी ते पाहत होते. कोणी “चेटकीण आली, चेटकीण” म्हणून हिणवत होतं तर कोणी त्यांच्या अंगावर, त्यांच्या गाडीवर थुंकत होतं. इतकंच नाही तर काही अंतर कापल्यावर गाडीतील इंधन संपलं त्यावेळी मात्र पंचाईत निर्माण झाली. एका गावात जाऊन त्यांनी पेट्रोकेमिकल घेतलं ते वापरून त्यांनी आपला प्रवास सुरु केला, पण पुन्हा काही अंतर गेल्यावर त्या गाडीचा ब्रेक पूर्ण झिजून गेला. त्यावेळी जुगाड करून बर्था यांनी पहिले ब्रेक लायनर तयार केले; असं करत करत त्यांनी अखेर आपलं माहेर गाठलं. काही वेळ विश्रांती घेऊन त्या पुन्हा आपल्या घरी परतल्या. तेव्हा कार्ल यांना बायकोने केलेल्या या धाडसाची माहिती मिळाली आणि त्यांना आपण केलेल्या कामावर विश्वास बसला. बायकोच्या धाडसामुळे बेंझ यांची गाडी प्रकाशात आली. सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे बायको गेली माहेरी आणि झाला गाडीचा जन्म या वाक्याचा जन्म हा असा झाला.
Bertha Benz and the first road trip in history
Benz & Cie आता 50 कर्मचाऱ्यांवरून थेट 430 कर्मचाऱ्यांपर्यंत जाऊन पोहचली आणि अश्या पद्धतीने एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या वर्षांत, बेंझ ही जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी बनली होती. Benz & cie च्या व्यापकतेमुळे 1899 मध्ये फ्रेडरिक फॉन फिशर आणि ज्युलियस गॅन हे कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य बनले आणि बेंज यांची कंपनी joint stock कंपनी बनली. नवीन संचालकांनी शिफारस केली की बेन्झने मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी योग्य असलेली कमी खर्चाची ऑटोमोबाईल तयार करावी. 1894 ते 1902 पर्यंत, बेंझने 1,200 पेक्षा जास्त गाड्यांचे उत्पादन केले, ज्यात वेलोसिपेडचा देखील समावेश होता. नंतरच्या काळात कार्ल बेंझ यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत होत्या. अनेक नवनवीन शोध,संशोधनाचे कार्य ते अविरत करत होते. बेंझने इतिहासातील Internal combustion इंजिनसह पहिला ट्रक डिझाइन केला. इतकंच नाही, तर नेटफेनर बस कंपनीसाठी त्यांनी जगातील पहिली मोटार बसही तयार केली. या अभूतपूर्व कामाची पोचपावती म्हणजे 25 नोव्हेंबर 1914 रोजी त्यांच्या जन्मगावी कार्लजरुह येथे त्यांच्या सत्तराव्या वाढदिवसाच्या उत्सवादरम्यान, कार्ल बेंझ यांना कार्लजरुह विद्यापीठाने मानद डॉक्टरेट प्रदान केली.
1923 मध्ये जर्मनीवर आर्थिक संकट ओढवलं. अनेक business डबघाईला आले. इतरांवर आलेली वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून 28 जून 1926 रोजी Benz & Cie. त्यावेळेस जर्मनीच्या automobile क्षेत्रात नाव कमावलेल्या डेमलर मोटरेन गेसेलशाफ्ट या कंपनीत merge झाली. पुढे या कंपनीने आपले product ‘मर्सिडीज-बेंझ’ या नावाने बाजारात आणले आणि पुढे ते किती प्रसिद्ध झाले हे वेगळं सांगायलाच नको.
Automobile क्षेत्रातल्या या सम्राटाचा प्रवास ४ एप्रिल १९२९ रोजी वयाच्या ७० व्या वर्षी थांबला, पण आपल्या अतुलनीय कामगिरीमुळे त्यांना आजही the father of the car किंवा “father of the automobile industry” म्हणून ओळखले जाते.
तर ही होती कार्ल बेंझ यांची जीवन कहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि हो चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसल्यास लगेच सबस्क्राईबसुद्धा करा.