Tag: उद्योजकता विजडम

  • “अंधश्रद्धेला तिलांजली द्या… विवेक, ज्ञान आणि विज्ञानाचा पाठपुरावा करा…

    “अंधश्रद्धेला तिलांजली द्या… विवेक, ज्ञान आणि विज्ञानाचा पाठपुरावा करा…

    कष्ट करा, जोखीम उचला, ध्येये बाळगा…

    उद्योग करा, पैसा कमवा…!!!”

    एकदा एका दुकानदाराने ज्योतिष्याला विचारले की, “माझे दुकान चालत नाही, काय करू?” ज्योतिषी म्हणाला,”ही घे घोड्याची नाल, फक्त ५००० रुपयांना. दुकानावर लाव, मग बघ. दुकान चांगले चालेल.” दुकानदाराने थोडा विचार केला. नाल घोड्याची आहे मग आपण घोड्यालाच विचारले तर? मग तो घोड्याकडे गेला आणि त्याला विचारले,”तुझी नाल दुकानाला लावल्याने माझे दुकान चालेल का?” घोडा हसला आणि म्हणाला,”अरे बाबा, नाल लावून पैसा मिळत असेल तर मी कशाला दिवसभर टांगा ओढला असता? नाल हे प्रतीक आहे, घोड्यासारखं वेगवे धावत पळत राहण्याचं, काम करण्याचं.

    छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही अंधश्रद्धेला थारा दिला नव्हता.” कोणत्याही निष्पाप प्राण्याचा बळी न देता स्वतःची करंगळी कापून मंदीरात स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज… देवावर श्रद्धा असूनही महाराजांनी आपल्या गडकिल्ल्यांना कुठल्याही देवाचे नाव दिले नाही, गणपतीचे सुद्धा नाही… अंधश्रद्धेला कधीच प्रोत्साहन दिले नाही. शिवराय कुठेही लिंबू-मिरच्या बांधत बसले नाहीत, की देव-देवस्की करत बसले नाहीत. ज्या मनुस्मृतीने समुद्र ओलांडू नये असे बंधन घातले होते त्यांच्याविरूद्ध शिवाजी महाराजांनी जाऊन समुद्रात आरमार उभारले… कोणताही गड जिंकल्यावर तिथे कधीच सत्यनारायण घातला नाही… अमावस्या अशुभ मानली जाते. काही नकली लोकांच्या सांगण्यावरून आपण कुठलेही काम अमावस्याला सुरू करत नाही. पण महाराजांच्या लढाया या अमावस्येच्या रात्री व्हायच्या. कारण अंधाराचा फायदा घेण्यासाठी ते बहूतेक मोहिमा अमावस्येला घेत. गनिमी कावा पद्धतीने लढाया करायचे व जिंकायचे. शहाजीराजेंच्या मृत्युनंतर माँसाहेब जिजाऊ सती गेल्या नाहीत. तर त्यांच्या जाण्याने जी मार्गदर्शनाची ऊणीव शिवरायांना भासणार होती, ती भरून काढली. गुरू बनून शिवरायांना मार्गदर्शन देत राहिल्या. महाराजांचा स्वतःवर, स्वतःच्या बुद्धीवर व मनगटावर पूर्ण विश्वास होता… रायगडावर काम घेऊन आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जेवल्याशिवाय परत पाठवायचे नाही, हा नियम….

    हे वाचल्याने तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार होणार नाही, परंतु तुमच्या विचारात आणि जीवनात सकारात्मक बदल करू शकतात… मी आशा करतो की हा लेख वाचून समाजात अंधश्रद्धा निर्मूलन होण्यासाठी प्रबोधन होईंल, लोकं अंधश्रद्धा सोडून स्वावलंबी बनतील आणि खऱ्या श्रद्धेतून उघड्या डोळ्याने सत्य पाहतील. मी बऱ्याच लोकांना पहिले आहे की त्यांनी यशासाठी किंवा आपल्या समस्या सोडवण्यासाठी अंधश्रद्धेचा मार्ग अवलंबला आणि बरबाद झाले. असे तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या बाबतीत होऊ नये हीच माझी भावना आहे. त्यामुळे वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात कोणताही मोठा निर्णय घेताना एकट्याने निर्णय घेऊ नका. चर्चा होणे महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांशी चर्चा करा, सल्ला घ्या. तर्कशास्त्र सांगणार्‍या गोष्टी स्वीकारा आणि आपण स्वतःला व इतरांना दिलेल्या आश्वासनांवर ठाम रहा. देव माझ्यासाठी अस्तित्वात आहे. पण ती माझी श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. बरेचजण नकली ज्योतिष्यांकडे जाऊन फसताना मी पहिले आहे. मी या गोष्टीला विरोध करीत नाही परंतु आपले भविष्य सांगणारे लोकसुद्धा काही मोठे विचारवंत नाहीत, जर त्यांना खरोखर काय घडणार आहे हे माहित असते तर त्यांचे स्वतःचे जीवन वेगळे असते. कोणतीही ग्रहांची हालचाल किंवा स्थिती काय होणार आहे, ते ज्योतिषी ठरवू शकत नाही. आपली स्वतःची उर्जा, आपले विचार आणि आपले व्हाइब आपले जीवन बदलू शेतात. आज बाजारात बरेच लोक अंगठ्या आणि रंगीत खडे विकण्याचे धंदे करतात. पण तुमचे आयुष्य कोणतेही अंगठी किंवा खडा बदलू शकणार नाही, ते तुम्हीच बदलू शकाल. मूळ किंवा आधार नसलेल्या अंधश्रद्धांसाठी बळी पडण्याऐवजी आपल्याला आपल्या जीवनात जी ध्येये आणि लक्ष्ये आहेत त्यासाठी उघड्या डोळ्यांनी लढा देण्याची आवश्यकता आहे. आपल्याला लक्षाधीश व्हायचे आहे, जर आपण कठोर परिश्रम केले तरच..

    आपल्या आवडत्या मुलीशी लग्न करण्याची तुमची इच्छा आहे, पण जर तुम्ही तिच्या पाठीशी उभे राहून तिच्यासाठी जगाशी लढा देत असाल तरच… फक्त तुम्हाला तुमच्या प्रेमावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. संकटकाळात, अडचणींत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अपयश आल्यास स्वतःला दोषी समजण्यात आणि एकटेपणात आपला आपल्याच निर्णयावर विश्वास नसतो; म्हणून लोक केवळ ज्योतिष्यांनी सांगितलेल्या भविष्यवाणीवर निर्णय घेतात. भविष्यवाणी क्वचितच खरी ठरते; परंतु या नादात ज्या वाईट गोष्टींमुळे आपल्या मनात भीती निर्माण होते, त्या गोष्टींवरच आपले लक्ष केंद्रित केले जाते. भविष्य सांगणाऱ्या लोकांना आपल्याबद्दल किंवा आपल्या भूतकाळाबद्दल काहीच माहिती नसते. अंधश्रद्धांवर विश्वास ठेवणे थांबवा. लक्षात ठेवा, जगाचा विनाश होणार असा खूप वेळा दावा केला गेला होता, परंतु तसे झाले का कधी? आणि होणारही नाही हे तुम्हाला आणि मलाही माहिती आहे. शहाणपणाने आणि तार्किकदृष्ट्या विचार करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

  • Live and let live ‘जगा आणि जगू द्या’ हे जीवन, व्यवसायाचे मूलभूत तत्व

    Live and let live ‘जगा आणि जगू द्या’ हे जीवन, व्यवसायाचे मूलभूत तत्व

    Live and let live भगवान महावीरांच्या शिकवणीचा हा खूप महत्वाचा भाग आहे आणि तो पुढे अनेक संताच्या आचरणात व लेखनात सापडतो. संत तुकाराम त्यांच्या शेतामध्ये ज्वारीची राखण करायचे तेव्हा चिमण्यांनी दाणे खाल्यानंतर त्यांना पिण्यासाठी मडकी भरून पाणी शेतात ठेवायचे. तोच मार्ग पुढे मोठ्या कॉर्पोरेट ब्रँडनी अवलंबला. बिल गेट्स यांनी आतापर्यंत ९० अब्ज डॉलरचे दान विविध समाजजोपयोगी उपक्रमांना दिले.

    कायद्याने CSR (Corporate Social Responsibility) फायद्याच्या २-३% रक्कम अशा सामाजिक कामासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. पिकावर येणारे पाखरे, चिमण्या, फुलपाखरू इत्यादी १ ते २% धान्य खातील पण त्यामुळे परागीभवन होऊन पिकांचे उत्पन्नही वाढायचे, पण जेव्हापासून कीटकनाशके, फवारणी सुरू झाले व त्याचा अतिरेक झाला. तेव्हा कोणतेच पीक औषध फवारलेशिवाय येईना मग पराग संचयन करणार कोण? कीटकांची संख्या कमी झाली, खर्च वाढू लागला व उत्पन्न घटू लागले. आपण दुसऱ्यांना जगू नाही दिले तर आपण ही जगू शकत नाही हे भगवान महावीर, संत तुकाराम यांनी सांगितले. सगळंच १००% मीच खाणार, माझं एकट्याच राज्य असणार याला दुर्योधन प्रवृत्ती म्हणतात. ज्याने पांडवांना काही गाव तर सोडाच, पण सुईच्या टोकावर इतकी पण जमीन देण्यास नकार दिला त्यामुळेच महाभारत घडले.

    मोठी कार कंपनी अनेक लहान उद्योगांना स्पेअर पार्ट बनवायचे कॉंन्ट्रॅक्ट देते. कारण तेथे अनेक कामगारांना काम मिळते व त्यांचीही कामे सोपी होतात. जगात कोणतेही काम, उद्योग सगळं मीच खाणार व सगळं मीच कमविणार या प्रवृत्तीने कधीच मोठा होत नाही व टिकतही नाही. ‘जिओ और जीने दो!’(Live and let live) ही प्रवृत्ती जोपासणारे मोठे होतात. आपल्या सोबत इतरांना, प्राण्यांना, पशूंना, झाडांना सांभाळा. ते तुम्हाला सांभाळतील व तुम्हाला मोठे करतील. मुंबईत ठिकठिकाणी सकाळी दुकान उघडण्या अगोदर कबुतरांना धान्य, गाईला चारा टाकताना अनेक व्यापारी बंधू तुम्हाला दिसतील. हे ‘जिओ और जीने दो!’ या तत्वातूनच येते.

    दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर प्रत्येकाला वाटत असते कि लोकांनी आपल्याशी सन्मानपूर्वक वर्तणूक केली पाहिजे, इतरांनी आपल्याला इज्जत, मानसन्मान द्यावा, आपली प्रतिष्ठा निर्माण व्हावी. परंतु त्यासाठी आपणसुद्धा इतरांचा सन्मान केला पाहिजे, इतरांच्याही भावनांची कदर केली पाहिजे. इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल असे वर्तन करू नये. आपण इतरांना सुखी नाही करू शकलो तरी चालेल, परंतु आपल्यामुळे कोणी दुःखी होता काम नये याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे. आपण आणि भोवतालचा समाज यात सुसंवाद असेल तरच सामाजिक संतुलन अबाधित राहील.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

  • आपल्या ध्येयाची स्वत:ला सतत आठवण करून द्या…

    आपल्या ध्येयाची स्वत:ला सतत आठवण करून द्या…

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘आपल्या ध्येयाची स्वत:ला सतत आठवण करून द्या’ करायची सुरवात?

    गावाकडून शहरात व्यवसायासाठी आलेल्या जयसिंगने आपला व्यवसाय अजून वाढावा यासाठी बिझिनेस एक्सपर्ट असणाऱ्या कदमांना फोन करून आपल्या कारखान्यावर बोलावलं.

    मुंबईतील झोपडपट्टी एरियात, दोन खोल्यात त्याचा कारखाना. एक मोडका टेबल आणि खुर्ची म्हणजे त्याचं ऑफिस. चार पाच महिला, बॉक्स चिकटवणे, पॅकेजिंग करणे यांसारख्या गोष्टी करत होत्या. जयसिंग मूळचा राजस्थानचा. तिकडे तो अशा पद्धतीच्या कारखान्यात काम करायचा. तीन चार वर्षापूर्वी मुंबईत आला आणि ड्रायफ्रूटसाठी लागणाऱ्या डेकोरेटीव्ह पॅकेजिंग बॉक्स निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. जशी गावाकडे दिवाळीला एकमेकांना फराळ देण्याची जशी पद्धत आहे, तशी उच्चवर्गीय लोकांत सण, समारंभ इत्यादीसाठी ड्रायफ्रूट बॉक्स देण्याची पध्दत आहे. तळलेले पदार्थ, गोड बेकरीचे पदार्थ वगैरे देण्याचे आता प्रमाण कमी झालं. आता ड्रायफ्रूट्सना खूप मोठी मागणी आहे. अनेक उच्चभ्रू लोक विवाह समारंभांत किंवा लग्नाच्या पत्रिकेबरोबर ड्रायफ्रुटचा बॉक्स देतात. कॉर्पोरेट कंपन्यांमध्येसुद्धा हीच पध्दत वापरली जाते. हे सारं जयसिंग अगदी अचूक हेरत होता. हीच संधी ओळखून, आपलं शिकलेलं कौशल्य वापरून त्यानं हा व्यवसाय करायचं ठरवलं. पुठ्ठे, थर्माकोल, पेपर, चमकी कागद इत्यादी आकर्षक बाबी वापरून तो आपलं कौशल्य दाखवत होता. या पेपर-क्राफ्ट कलेत निपुण होऊन तो उत्पादन बनवत होता आणि आता त्याला ते बॉक्सेस विदेशात एक्स्पोर्ट करायचे होते म्हणून त्याला मार्गदर्शन हवं होतं.

    कारखान्यात आलेल्या कदमांना जयसिंगने आपला तो दोन खोल्यांचा कारखाना दाखवला आणि खुर्चीत बसायला सांगितले. खुर्चीत बसवून ते टेकतात, तोच त्यांच्या पाठीला एक खिळा टोचला. कदम म्हणाले, “अरे जयसिंग, इस कुर्सी में कील है, इसे ठीक करना पड़ेगा किसी से।” त्यावर त्याने जे उत्तर दिले ते थक्क करणारे होते. तो म्हणाला, “हाँ साहब, कील मैंने ही लगवाया है। मैं गांव से कुछ कमाने के लिए मुंबई आया था, वो मुझे हर वक्त याद रहना चाहिए। जब मैं इस कुर्सी पे बैठू, तो वो कील मुझे चुभती है और बताती है, जब तक तू कमायेगा नहीं, तब तक बैठ नहीं सकता। मैं यहाँ आया ही इसी सपने के साथ हूँ की, पाच सालों में कमसे कम एक करोड का धंदा करूंगा, तब तक चैन से नहीं बैठूंगा। ये कील इसीलिए लगायी है कि मुझे आराम से बैठने की आदत न लगे।”

    पुढे त्याचे बॉक्सेस एक्सपोर्ट करण्यासंबधीच्या चर्चा सुरू झाल्या. प्रत्येकाने आपल्याला ध्येय गाठायचे आहे याची आठवण प्रत्येक दिवशी व्हावी अशी काहीतरी गोष्ट करावी, जेणेकरून तुमच्या ध्येयाचा तुम्हाला कधीही विसर पडणार नाही. ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत राहाल.

    तुमचं ध्येय नेहमी लक्षात राहावं यासाठी तुम्ही अशी काही आयडिया वापरत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, नाहीतर पश्चाताप होईल…

    कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, नाहीतर पश्चाताप होईल…

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, नाहीतर पश्चाताप होईल…’ करायची सुरवात?

    काही व्यक्तींमध्ये रिस्क घ्यायची हिंमत नसते. अशी लोकं नेहमी आरामदायक, सुरक्षित व जोखीमरहित पर्यायांचा अवलंब करीत असतात. वैयक्तिक व प्रोफेशनल जीवनात ‘कम्फर्ट झोन’ ही अशा जागा आहे की त्यात अडकलेला माणूस कधीच आव्हांनाना सामोरे जाण्यास मानसिकदृष्ट्या तयार नसतो. त्यामुळे तो कायमच संभाव्य अडचणीबद्दल गाफील राहत असतो.

    कम्फर्ट झोनमध्ये अडकलेल्या व्यक्तींचा विकास हा खुंटलेला असतो. कम्फर्ट झोन त्यांना प्रगतीच्या संधीचा फायदा घेण्यापासून रोखत असतो. सतत कम्फर्ट झोनमध्ये राहिल्याने माणूस नवीन आव्हाने पेलण्यास असमर्थ ठरतो किंवा संभाव्य अडचणींबद्दल त्याच्यात जागरूकता निर्माण होत नाही. एक प्रयोग केला गेला होता. एका काचेच्या बरणीत धान्य भरून ठेवले होते. एक उंदीर त्यात सोडला. जेव्हा बरणी पूर्ण भरलेली होती तेव्हा उंदराला वाटले की, आता शांतपणे धान्य खाईन, काही अडचण नाही. त्यामुळे तो तिथेच राहिला व बरणीतील धान्याचा उपभोग घेऊ लागला. असे करता करता एक दिवस सर्व धान्य संपले. आता उंदीर बरणीत एकदम तळाला होता आणि दुर्भाग्य म्हणजे तो आता त्यातून बाहेरही पडू शकत नव्हता. फक्त बाहेर पाहून रडण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

    म्हणूनच तरुण वयात नवनवीन आव्हाने स्वीकारा, त्यातून बरेच काही शिकता येईल, परंतु केवळ आरामदायी सुरक्षित वाटणाऱ्या कम्फर्ट झोनमध्ये अडकू नका, कारण ते एक जाळे असते. त्यात दीर्घकाळ अडकाल, तर तुमच्या विकासाचे सर्व दरवाजे बंद होतील व वेळही निघून गेलेली असेल. जेव्हा तुम्ही मनातील भीती व चिंता बाजूला सारून नवीन आव्हानांचा सामना करता, तेव्हा तुमच्या यशस्वी वाटचालीस सुरुवात झालेली असते. दुर्दैवाने बरेच लोक कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यास मानसिकरित्या तयार नसतात. त्यांना आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असते; परंतु नवीन जोखिमा आणि आव्हानांना पेलण्यास ते घाबरत असतात. त्यांना जे सुरक्षित वाटते, त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात. कम्फर्ट झोन ही स्वतःला घातलेली मर्यादा असते; जिथे माणूस जीवनात पुढे जाण्याबाबत साशंक असतो, बऱ्याचदा नवीन आव्हानांबाबत चिंताग्रस्त व नर्व्हस असतो. उदाहरण घ्यायचे तर आपल्या लोकांचे घ्या. उद्योगात जोखीम घ्यावी लागते. त्यामुळे लोकांना उद्योग क्षेत्र असुरक्षित वाटते, परंतु नोकरी हा उत्पन्नाचा शाश्वत व सुरक्षित मार्ग म्हणून नोकरीसाठीच शिकतात. हा झाला कम्फर्ट झोन… मग सांगा आपल्यामध्ये उद्योजक कसे घडणार?

    तुम्ही केलात का कधी असा प्रयत्न तुमचा कम्फर्ट झोन सोडण्याचा? केला असाल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा