Category: लेख

  • मुंबई: स्वप्नांची नगरी, महाराष्ट्राच्या प्रगतीची राजधानी, आणि अर्थ व्यवस्थेचा श्वास – Mumbai Financial Capital

    मुंबई: स्वप्नांची नगरी, महाराष्ट्राच्या प्रगतीची राजधानी, आणि अर्थ व्यवस्थेचा श्वास – Mumbai Financial Capital

    आपला देश सध्या जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, आणि या अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणजे आपला महाराष्ट्र. १ मे रोजी जेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन स्वतंत्र राज्यं बनले, तेव्हा लोकांना प्रश्न पडला असावा — “आता महाराष्ट्राचं काय होणार?”  सगळे गुजराती व्यापारी आता गुजरातला जाणार, मग महाराष्ट्राचं भविष्य काय असेल? पण या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रातील लोकांनी केव्हाच दिलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या पुरोगामी विचारांचा वारसा आणि परंपरा जपत आलेला हा महाराष्ट्र आज भारत देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे. 

    महाराष्ट्राने — विशेषतः पुणे आणि मुंबईसारख्या शहरांनी आधीपासूनच सर्वांना सामावून घेतलं आहे. महाराष्ट्रातील लोकांची मनं जितकी मोठी, तितकीच हळवीसुद्धा. आरं, थोडी कुरबुर झाली तर लढायलाही तयार, पण कोणाचं दु:ख पाहून मनाने हळवं होणारे हेच लोक.गेल्या काही दशकांपासून महाराष्ट्राने अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे. आणि या प्रगतीच्या वाटचालीत सर्वांत पुढे आहे — स्वप्नांची नगरी, मुंबई.असं म्हणतात की इथे सगळी स्वप्नं पूर्ण होतात; जो मुंबईला येतो, तो कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही. 

    मुंबईने सर्वांना सामावून घेतलं आणि महाराष्ट्राची राजधानी म्हणून आपली ओळख निर्माण केली. याच मुंबईने अनेक उद्योगपती, अभिनेते आणि कलाकार घडवले.  मुंबई ही भारतीय चित्रपटसृष्टीची जननी आहे — दादासाहेब फाळकेपासून ते आजच्या रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणपर्यंत अनेक दिग्गज इथूनच उभे राहिले. केवळ अभिनेतेच नव्हे, तर दिग्दर्शक, संगीतकार, लेखक, आणि तंत्रज्ञ — या सगळ्यांच्या स्वप्नांना पंख याच मुंबईने दिले. 

    अनेक मोठ्या कंपन्याही मुंबईतच उभ्या राहिल्या. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) सुद्धा येथेच आहेत.महाराष्ट्रातील मराठी रंगभूमीचा जन्म झाला तो याच मुंबईत. प्रभात थिएटर, शिवाजी मंदिर, विविध नाट्यगृहं, कला महोत्सव — हे सर्व इथेच रंगतात. चित्रपटांपूर्वी नाटकांतूनच अनेक कलाकार घडले, आणि पटकथालेखनाच्या (स्क्रिप्ट रायटिंगच्या) दुनियेत अनेक अस्सल कलाकार मिळाले.जेव्हा ब्रिटिश भारतात आले, तेव्हापासून मुंबईचं व्यापारी बंदर लोकप्रिय होतं, आणि आजही तेवढंच महत्त्वाचं आहे.

    एकीकडे इमारतींच्या गर्दीत बालपण हरवत असल्याचं वाटतं, पण हाच महाराष्ट्र देशाला सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, रोहित शर्मा यांसारखे महान खेळाडू देतो. याच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अनेक विजयाच्या गाथा लिहिल्या गेल्या आहेत.असं म्हणतात की, “मुंबई कभी किसी के लिए नहीं रुकती.” जो इथे येतो, त्यालाच इथल्या धावत्या वेगाशी जुळवून घ्यावं लागतं.

    कित्येक वर्षांपूर्वी या मुंबईने एक वेग धरला होता, तोच वेग आजतागायत कायम आहे. तस, मुंबईकरांच्या  दुपारच्या जेवणाचा बेत ठरलेला असतो, आणि तो बेत त्यांच्या जवळ सुरक्षितपणे पोहोचवते. ती म्हणजेच ‘मुंबईची रक्तवाहिनी’. तुम्हाला याचा अंदाज लागलाच असेल.मुंबईकरांच्या दररोजच्या आयुष्यातील आणि मुंबईच्या   अर्थव्यवस्थेतील महत्वाचा भाग म्हणजेच मुंबईचे डब्बेवाले. मुंबईची शिस्त आणि वेळपालन याचं जिवंत उदाहरण. आर्थिक दृष्ट्या सुद्धा हे ‘रक्तवाहिनी’ तितकीच महत्वाची आहे.

     मुंबईतील लाखो कर्मचारी दररोज या डब्बेवाऱ्यांवर अवलंबून असतात. या क्षेत्राची वार्षिक आर्थिक उलाढाल सुमारे ₹७०–८० कोटी आहे, ज्यामुळे घरकाम करणाऱ्या अनेक महिलांना रोजगार मिळतो. सुरक्षित आणि वेळेवर जेवण मिळाल्यामुळे सर्व कामे सुरळीत पार पडतात. मुंबईच्या आरोग्य आणि आर्थिक धावत्या वेगाचं संतुलन या डब्बेवाऱ्यांनी कायम ठेवलं आहे. 

     मुंबई— ज्याची निव्वळ संपत्ती अंदाजे US$1 ट्रिलियन आहे, ज्यामध्ये 46,000 करोडपती आणि 92 अब्जाधीश आहेत. मुंबईचे सर्वात मोठे आर्थिक बळ महणजेच मुंबईची वित्तीय सेवा आणि बँका . या मुंबई मध्ये अनेक वित्तीय संस्था आणि बँका आहेत जे लोकाना कर्ज देतात ज्यामुळे छोटे उद्योग आणि मोठे उद्योग सुरू होतात . त्यातून रोजगार मिळतो आणि आर्थिक पाठभर महाराष्ट्राला मिळत 

    . मुंबई हे भारताचे वित्तीय केंद्र आहे. येथे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE), नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आहेत. हे शहर बँकिंग, विमा, गुंतवणूक, आणि वित्तीय सेवा क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मुंबईचे बंदर भारतातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक आहे. हे शहर व्यापार, शिपिंग, उत्पादन आणि छोटे-मोठे उद्योग यांचा श्वास आहे . जर हा श्वास थंबला तर हे उद्योग ही थांबू शकतात.  मुंबईचा gdp वाढण्याच एक महत्वच कारण म्हणजेच मुंबईमध्ये IT, सेवा, आणि व्यवसाय-सेवा क्षेत्रही प्रचंड विकसित झाले आहेत, जे शहराच्या GDP वाढवतात.मुंबई शहर देशाच्या GDP चा मोठा भाग तयार करते, अंदाजे 6–7% पेक्षा जास्त, जे एका शहरासाठी खूप मोठी संख्या आहे. मुंबई हे भारताचे मनोरंजनाचे केंद्र आहे आणि बॉलिवूड शहराच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावते. चित्रपट, टीव्ही, संगीत, रंगभूमी आणि डिजिटल मीडिया उद्योगातून मोठे उत्पन्न होते. 

    या उद्योगामुळे हजारो लोकांना रोजगार मिळतो – कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचारी या उद्योगावर अवलंबून आहेत. शिवाय, लोकप्रिय चित्रपट आणि कलाकार मुंबईला पर्यटनासाठी आकर्षित करतात, ज्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ट्रॅव्हल एजन्सींना फायदा होतो. चित्रपट उत्पादन कंपन्या आणि जाहिराती येथे गुंतवणूक करतात, ज्यामुळे आर्थिक क्रियाकलाप वाढतात. या सर्व कारणांमुळे बॉलिवूड मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे. आस म्हणतात की “मुंबई हर मेहनत करने वाले आदमी को सफ़लता जरूर देती है।” त्याच एक जीवंत उदाहरण म्हणजेच अभिनेता शहरुक खानने त्याच्या स्वप्नांची ‘’जन्नत’’ जी कमावली ती याच मुंबईतुन. मुंबईने शाहरुक खानसारख्या अनेक कलाकारांना त्यांच्या मेहनतीचे फळ दिले.

     शाहरुख खान सुरुवातीला फारसे ओळखले जात नव्हते, पण त्यांनी आपल्या चिकाटीने, मेहनतीने आणि स्वप्नांवर विश्वास ठेवून स्वतःचे स्थान निर्माण केले. आज शाहरुख खान फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे, मुंबई अनेक उद्योगपती, कलाकार, लेखक आणि तंत्रज्ञांना त्यांच्या कष्टाचे फळ देते. या शहराची खासियत म्हणजे येथे कोणालाही संधी मिळते, फक्त मेहनत आणि चिकाटी आवश्यक आहे. 

    पण मुंबईची खरी शक्ती तिच्या उंच इमारती किंवा मोठ्या उद्योगांमध्ये नाही, तर ती आहे येथील सामान्य माणसाच्या अदम्य इच्छाशक्तीमध्ये. रोज सकाळी लोकलची गर्दी झेलून कामावर जाणारा तो चाकरमानी, किंवा पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत घराचं स्वप्न पाहणारी ती आई. या शहराने अनेक संकटे पाहिली – मग ते बॉम्बस्फोट असोत, अतिवृष्टी असो किंवा जागतिक महामारी. पण प्रत्येक वेळी ही मुंबई अधिक मजबूत होऊन उभी राहिली. ‘मुंबई स्पिरिट’ हे फक्त एक वाक्य नाही, ती जगण्याची एक पद्धत आहे – हरलो तरी पुन्हा लढायचं, आणि जिंकलो तरी नम्र राहायचं. हाच महाराष्ट्राचा बाणा आहे, जो देशाला पुढे घेऊन जात आहे.

    म्हणूनच, महाराष्ट्र केवळ एक भौगोलिक प्रदेश नाही; ते एक ध्येय आहे, एक आशा आहे आणि एक अविरत प्रेरणा आहे. १ मे रोजी जेव्हा या राज्याच्या निर्मितीचा निर्णय झाला, तेव्हा ‘आता महाराष्ट्राचं काय होणार?’ या प्रश्नाऐवजी, ‘आम्ही घडवून दाखवणार’ हा आत्मविश्वास प्रत्येक मराठी मनात होता. आपल्या पुरोगामी विचारांचा, संस्कृतीचा, प्रगतीचा आणि माणुसकीचा हा वारसा घेऊन, मुंबई आणि महाराष्ट्र भारताच्या विकासाच्या या धावत्या वेगात नेहमीच सर्वात पुढे राहतील यात शंकाच नाही. महाराष्ट्राची ही भूमी, जिथे कष्टकऱ्यांच्या घामाला सन्मान मिळतो आणि प्रत्येक स्वप्नाला पंख लागावेत यासाठी प्रयत्न केले जातात, तिथेच आपला खरा अभिमान आहे.

    हे पण वाचा:

  • 25 लोकांची टीम ; phool.co चा यशस्वी स्टार्टप; आलिया भट ने केली गुंतवणूक

    25 लोकांची टीम ; phool.co चा यशस्वी स्टार्टप; आलिया भट ने केली गुंतवणूक

    भारत देश हा जगात त्याच्या धार्मिक, परंपरा, प्रगत विचारसरणी आणि विविधतेतील एकतेमुळे ओळखला जातो. भारताने अनेक वर्षे या परंपरा जपल्या आहेत. इथल्या लोकांची देवावर असलेली श्रद्धा, भक्ति आणि भाव हा अमर आहे; तो कधीच संपणार नाही. गंगा, यमुना, कृष्णा, कोयना, गोदावरी अशा अनेक नद्यांना लोक आई किंवा देवीचा दर्जा देऊन भक्तिभावाने पूजा करतात.

    लोकांची भक्ति विविध प्रकारची असते. काही लोक नवस बोलून पूजा करतात, काही ध्यान करून देवाचे स्मरण करतात, तर छटपूजा सारख्या अनेक परंपरा आहेत, ज्यामध्ये यमुना सारख्या नद्यांचे विशेष महत्त्व आहे. लोकांकडून नद्यांना फूल, दिवे आणि पूजासामग्री अर्पण केली जाते. जरी लोकांचा भाव श्रद्धापूर्ण असला तरी, यामुळे नदी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढते. देवाला अर्पण केलेली फुले किंवा फुलांचे हार नद्या किंवा जलाशयात टाकल्यामुळे प्रदूषण होत आहे.

    यावर उपाय शोधणारी कल्पना आली अंकित अग्रवाल आणि प्रतीक कुमार यांना, आपली जॉब सोडून जेव्हा हा स्टार्टप करण्याचा निर्णय त्यांनी घेतला तेव्हा सगळे चकीत होते . पण स्वताच्या त्या जिद्दी वर विश्वास ठेवला आणि मिळून Phool.co नावाचा स्टार्टअप उभारला. हा स्टार्टअप मंदिरातील फुले आणि नद्यांमध्ये फेकल्या जाणाऱ्या फुलांचा कचरा रीसायकल करून त्यापासून पर्यावरणपूरक उत्पादन तयार करतो. ही नवीन संकल्पना धर्म, पर्यावरण आणि उद्योग यांचा संगम ठरली आहे.

    या स्टार्टअपने मंदिरातील फुलांचा कचरा पुनर्वापर करून उत्पादन तयार करण्याची कल्पना साकार केली आणि जगभरात मान्यता मिळवली. Phool.co ने बायो‑लेदर (Fleather), नैसर्गिक अगरबत्त्या, सुगंधित उत्पादनं अशा पर्यावरणपूरक उत्पादनांची निर्मिती केली. त्यांच्या कार्यामुळे स्थानिक महिलांना रोजगार, नदी प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरण संवर्धन अशा तीन गोष्टी साध्य झाल्या.

    Phool.co ला Series A मध्ये $9.4 दशलक्ष निधी मिळाला असून, गुंतवणूकदारांमध्ये Sixth Sense Ventures, Indian Angel Network, तसेच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट यांचा समावेश आहे. IIT कानपूरच्या इनक्यूबेशनसह सुरू झालेल्या या स्टार्टअपने भारतातून जागतिक पातळीवर सस्टेनेबल उद्योगाच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. हे सिद्ध करते की, साधी कल्पना, धैर्य आणि नवकल्पकता एकत्र येऊन नुसते व्यवसायच नाही तर सामाजिक आणि पर्यावरणीय बदलही घडवू शकतात.

    या स्टार्टअपची सुरुवात झाली एका छोट्या कल्पनेपासून. अंकित अग्रवाल आणि प्रतीक कुमार यांनी लक्ष दिले की, मंदिरांमध्ये दररोज लाखो किलो फुलांचा कचरा टाकला जातो, जो नद्या आणि पर्यावरणासाठी हानिकारक ठरतो. त्यांनी ठरवले की हा कचरा वाया जाऊ न देता पर्यावरणपूरक उत्पादनांमध्ये रूपांतरित करावा. सुरुवातीला फक्त काही मंदिरांमधील फुलांचा संकलन करून छोटे उत्पादन तयार केले जात होते, पण हळूहळू हा प्रकल्प वाढत गेला. त्यांनी स्थानिक महिलांना कामावर घेतले, फुलांचा कचरा रीसायकल करून Fleather, इन्सेन्स स्टिक्स आणि गिफ्ट आयटम्स तयार केले. ही छोटी सुरुवात पुढे भारताच्या सस्टेनेबल स्टार्टअप क्षेत्रातील यशस्वी व्यवसायात रूपांतरित झाली, ज्यामुळे पर्यावरणाची काळजी घेतली जाते आणि समाजालाही फायदेशीर ठरते. 

    या स्टार्टअपची सुरुवात झाली एका छोट्या कल्पनेपासून. अंकित अग्रवाल आणि प्रतीक कुमार यांनी लक्ष दिले की, मंदिरांमध्ये दररोज लाखो किलो फुलांचा कचरा टाकला जातो, जो नद्या आणि पर्यावरणासाठी हानिकारक ठरतो. त्यांनी ठरवले की हा कचरा वाया जाऊ न देता पर्यावरणपूरक उत्पादनांमध्ये रूपांतरित करावा. सुरुवातीला फक्त काही मंदिरांमधील फुलांचा संकलन करून छोटे उत्पादन तयार केले जात होते, पण हळूहळू हा प्रकल्प वाढत गेला. त्यांनी स्थानिक महिलांना कामावर घेतले, फुलांचा कचरा रीसायकल करून Fleather, इन्सेन्स स्टिक्स आणि गिफ्ट आयटम्स तयार केले. ही छोटी सुरुवात पुढे भारताच्या सस्टेनेबल स्टार्टअप क्षेत्रातील यशस्वी व्यवसायात रूपांतरित झाली, ज्यामुळे पर्यावरणाची काळजी घेतली जाते आणि समाजालाही फायदेशीर ठरते.

    Phool.co चे काम केवळ आजच्या पर्यावरणासाठीच नाही तर भविष्यातील पिढ्यांसाठी देखील प्रेरणादायी ठरते. संस्थापकांचा उद्देश जास्तीत जास्त मंदिरांमधील फुलांचा कचरा वाया न जाण्याची व्यवस्था करणे आणि अधिक पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणे हा आहे. भविष्यात, हा स्टार्टअप देशभरात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तारून पर्यावरण आणि समाजाला फायदा पोहचवेल अशी अपेक्षा आहे. Phool.co ही कथा आपल्याला शिकवते की, एक साधी कल्पना, धैर्य आणि सातत्य जरी दिसायला छोटे असले तरी, ती जग बदलणाऱ्या उपक्रमात रूपांतरित होऊ शकते. हे उदाहरण तरुण उद्योजकांसाठी आणि पर्यावरण जपण्याच्या मोहिमेसाठी एक प्रेरणास्त्रोत आहे.

     Phool.co  चे संस्थापक संगतात की या Phool.co च्या या संकल्पनेतून त्यांनी अनेक उपक्रम राबवले.  आम्ही भारतातील मंदिरांमध्ये अर्पित केलेली 22,060+ टन पवित्र फुलं गोळा करून रीसायकल करतो. यामध्ये 300+ समाजातील मागासवर्गीय महिलांना रोजगार दिला जातो, जे या फुलांना हाताने प्रक्रिया करून जगातील पहिल्या प्रमाणित, हस्तनिर्मित अगरबत्तीच्या उत्पादनांमध्ये रूपांतरित करतात. यामुळे फुलांवरील 11+ टन कीटकनाशकांचा परिणामही कमी होतो. शिवाय, या उपक्रमामुळे 19+ मुलांना शाळेत जाण्याची संधी मिळाली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया केवळ पर्यावरणपूरक नाही, तर समाजात बदल घडवणारी आणि स्त्रियांचे सशक्तीकरण करणारी आहे.  आस त्याच मत आहे . त्यामुळे या सर्व प्रतीनंच यश येत आसत मात्र ते कोणत्या रूपात कधी आपल्या समोर येईल हे सांगता येत नाही . त्यामुळे प्रयत्न करत रहा 

    आणखीन वाचा:

     

  • जगातील शेवटचा रस्ता – नॉर्वेतील अद्भुत E-69 महामार्ग – E-69 Highway

    जगातील शेवटचा रस्ता – नॉर्वेतील अद्भुत E-69 महामार्ग – E-69 Highway

    नॉर्वेतील E-69: समुद्र, बर्फ आणि ग्लेशियरांच्या कुशीतला अद्भुत प्रवास

    जगभरात अनेक पर्यटनस्थळे आहेत. कुठे उंच डोंगर दिसतात, कुठे सुंदर आणि शांत समुद्रकिनारे, तर कुठे दाट हिरवीगार जंगलं किंवा मोठमोठी शहरे पाहायला मिळतात. प्रत्येक प्रदेशाची स्वतःची खास ओळख आणि आकर्षण असते. प्रवाशांना नवीन अनुभव मिळतात, निसर्गाची विविधता जाणवते आणि काही ठिकाणे तर पूर्णपणे अद्भुत आणि विस्मयकारक असतात. जगातील प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी वेगळं आहे, जे प्रवाशांना नेहमीच वेगळ्या अनुभवासाठी ओढतं.

    पण तुम्ही कधी विचार केला आहे का, जगात असा रस्ता आहे जो एका टोकाला पोहोचल्यावर थेट संपतो? असा रस्ता खरोखर अस्तित्वात आहे आणि तो पाहून प्रत्येकाला थोडासा आश्चर्य आणि कुतूहल वाटतं. या रस्त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, तो कुठे आहे आणि त्याचा इतिहास काय आहे, हे जाणून घेणं खूपच रोचक आहे. आज आपण या लेखात “जगातील शेवटच्या रस्त्याबद्दल” जाणून घेऊया . 

    जगातील शेवटचा रस्ता कुठे आहे?

    जगातील शेवटचा रस्ता आहे युरोपातील नॉर्वे या देशात. या रस्त्याचे नाव E-69 Highway आहे. हा रस्ता जगातील सर्वात उत्तरेकडील रस्ता मानला जातो, म्हणून त्याला ‘जगाचा शेवटचा रस्ता’ असेही म्हटले जाते. प्रवाशांसाठी हा रस्ता खूपच आकर्षक आहे कारण तो उंच पर्वत, निळसर समुद्रकिनारे आणि निसर्गाची अप्रतिम सुंदरता दाखवतो.

    या रस्त्याचा शेवट Nordkapp (नॉर्डकॅप) येथे होतो, जे युरोपचा सर्वात टोकाचा भाग मानला जातो. हे ठिकाण पाहताना तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खरोखर जगाच्या एका टोकावर पोहोचलात. E-69 Highway आणि Nordkapp हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमी प्रवाशांसाठी खूप खास अनुभव देणारे आहे, आणि या रस्त्यावरून प्रवास केल्यास नॉर्वेच्या अप्रतिम सौंदर्याचा आनंद घेता येतो. 

    रस्त्याचा शेवट कसा दिसतो?

    E-69 रस्त्याचा शेवट जवळ येताच, तुम्हाला एका अनोख्या आणि विस्मयकारक दृश्याचा अनुभव होतो. रस्त्याचा शेवट झाल्यावर समोर फक्त अथांग समुद्र, उंच हिमनदी (ग्लेशियर) आणि निळसर आकाश दिसतं. प्रवास करताना जाणवलेली गर्दी, रस्त्याची गती, आणि आसपासची निसर्गरम्यता अचानक थांबते आणि जणू काही तुम्ही एका शांत, वेगळ्या जागेत पोहचतात.

    या ठिकाणी उभं राहून तुम्हाला असं वाटतं की पुढे काहीच मार्ग नाही,जणू जगाचं शेवटचं टोक येथे आहे. समोर पसरलेली विशालता आणि निसर्गाची अप्रतिम सुंदरता पाहून प्रत्येकाला एक अनोखी भावना निर्माण होते. कितीही प्रवास केले तरी, काही गोष्टींना आपल्याला थेट अनुभवायला मिळतात आणि हा रस्ता त्यातील एक अप्रतिम उदाहरण आहे.

    E-69 महामार्गाची खास वैशिष्ट्यं

    जगातील शेवटचा रस्ता – नॉर्वेतील अद्भुत E-69 महामार्ग


    E-69 महामार्ग सुमारे १२९ किलोमीटर लांब आहे. जरी रस्ता मोठा नसला तरी, त्यावरचा प्रवास अत्यंत साहसी आणि रोमांचक मानला जातो. हा रस्ता युरोपच्या उत्तरेकडे असल्यामुळे हवामान खूप थंड असते. हिवाळ्यात रस्ता पूर्ण बर्फाने झाकला जातो, जोरदार बर्फवृष्टी होते आणि दृष्टीक्षेपही कमी होतो. अशा कठीण परिस्थितीत प्रशासन नेहमीच सुरक्षिततेची काळजी घेतं, त्यामुळे काही वेळा एकट्याने वाहन चालवण्यावर बंदी घालतात.

    E-69 महामार्गाची आणखी एक अद्भुत गोष्ट म्हणजे येथे सूर्यप्रकाशाचे  विचित्र वेळापत्रक. वर्षाच्या अर्ध्या काळात सूर्य उगवत नाही आणि संपूर्ण प्रदेश पूर्ण काळोखात बुडतो. उरलेल्या अर्ध्या काळात मात्र सूर्य २४ तास आकाशात असतो आणि रात्रीचं अस्तित्वच राहत नाही. म्हणजे या रस्त्यावर प्रवास करताना तुम्ही सहा महिने अंधारात आणि सहा महिने उजेडात जगण्याचा अनोखा अनुभव घेता. हा अनुभव जगात कुठेही सहज मिळत नाही आणि प्रवाशांसाठी खरोखरच अविस्मरणीय ठरतो.

    नॉर्वेचा हा रस्ता का खास?



    E-69 रस्ता पाहताना तुम्हाला अनेक अद्भुत अनुभव मिळतात. आर्क्टिक सरहद्दीजवळून प्रवास करताना हवामान कठीण आणि साहसी असते, तर दिवस-अंधाराचे अनोखे चक्र पाहायला मिळते. रस्त्याजवळ पसरलेला अथांग समुद्र, चमकणारा बर्फ आणि उंच ग्लेशियर यांचे निसर्गसौंदर्य या प्रवासाला अविस्मरणीय बनवते. हे सर्व घटक मिळून E-69 रस्ता जगातील सर्वात वेगळे आणि रोमांचक ठिकाण बनवतात.

    मित्रांनो, जगाचा शेवटचा रस्ता पाहण्याचा अनुभव प्रत्येक प्रवाशासाठी खूप खास आहे. नॉर्वेतील E-69 Highway फक्त एक रस्ता नाही, तर पृथ्वीच्या शेवटच्या टोकापर्यंतचा रोमांचक प्रवास आहे. जर तुम्हाला निसर्गाची मोहकता, साहसी प्रवास आणि जगातील अनोख्या ठिकाणांचा अनुभव घेण्याची आवड असेल, तर हा रस्ता नक्कीच तुमच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये असायला हवा.

    आणखी वाचा:

  • ₹50,000 पेक्षा कमी पगार असेल तर, या चुका कधीच करू नका – Salary Tips

    ₹50,000 पेक्षा कमी पगार असेल तर, या चुका कधीच करू नका – Salary Tips

    दरमहा ₹50,000 पेक्षा कमी पगार मिळणारे लाखो मेहनती भारतीय एका न संपणाऱ्या आर्थिक चक्रात गुरफटलेले असतात. सकाळपासून रात्रीपर्यंत कष्ट करूनही महिन्याच्या शेवटी हातात काहीच राहत नाही. महागाई, घरखर्च, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते आणि रोज वाढणारी जबाबदारी हे सर्व मिळून सामान्य माणसाचं आयुष्य जणू ताणांच्या वावटळीत अडकून जातं. स्वप्नं मोठी असतात, पण वास्तव नेहमी त्यापुढे भिंत उभी करतं. म्हणूनच गरीब आणि मध्यमवर्गीय लोक आयुष्यभर फक्त जगण्यासाठी पैसा कमवतात, तर श्रीमंत लोक पैसा त्यांच्यासाठी काम करेल अशी व्यवस्था तयार करतात.

    श्रीमंत आणि मध्यमवर्गीय यांच्यात सर्वात मोठा फरक पगारात नसतो तर आर्थिक सवयीत, निर्णयांमध्ये आणि पैशाचे योग्य नियोजन करण्याच्या क्षमतेत असतो. मध्यमवर्गीय लोक अनेकदा भावनिक खर्च, चुकीच्या कर्जसवयी, आणि सुविचारित गुंतवणुकीच्या अभावामुळे आयुष्यभर एका मर्यादित चौकटीत अडकून राहतात. पण हे दोष त्यांच्यात नाहीत त्यांना योग्य आर्थिक मार्गदर्शनच मिळालेले नसते. आर्थिक ज्ञान, जागरूकता आणि काही साधे बदल यामुळे छोट्या पगारातूनही मोठे आयुष्य उभे राहू शकते. महत्वाचं म्हणजे चुका ओळखून पुढचा पाऊल योग्य दिशेने टाकणे.  

    मध्यमवर्गीय लोकांच्या आर्थिक प्रवासात काही चुका वारंवार घडतात आणि ह्याच चुका त्यांना कधीच खऱ्या अर्थाने श्रीमंत होऊ देत नाहीत. पहिली मोठी चूक म्हणजे भावनेपोटी केलेला खर्च. सण, लग्न, फॅशन, मोबाईल, किंवा समाजाला दाखवण्यासाठी केलेला खर्च यामुळे पैसा भविष्यासाठी न साठवता क्षणिक समाधानासाठी उडवला जातो. दुसरी चूक म्हणजे गुंतवणुकीची भीती. अनेकांना जोखीमची भीती वाटत असल्याने ते पैसा बँकेत पडून ठेवतात, पण महागाईमुळे त्याची किंमत दिवसेंदिवस कमी होत जाते. तिसरी चूक म्हणजे कर्जाचा चुकीचा वापर क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन, आणि गरज नसतानाही घेतलेली EMI त्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग खाऊन टाकते.  

    चौथी महत्त्वाची चूक म्हणजे आर्थिक शिक्षणाचा अभाव; बहुतांश लोकांना बचत, गुंतवणूक, कर नियोजन किंवा संपत्ती निर्माण याबाबत तशी माहितीच नसते. आणि शेवटची चूक म्हणजे दीर्घकालीन नियोजनाचा अभाव ते आजचा दिवस सांभाळण्यात इतके गुंततात की भविष्यासाठी तयारीच होत नाही. या सर्व चुकांमुळे मध्यमवर्गीय लोक कष्ट करतात, पण संपत्ती निर्माण होत नाही. श्रीमंती हा नशिबाचा खेळ नसून योग्य निर्णय, योग्य सवयी आणि आर्थिक शिस्त यांचा परिणाम असतो.

    या सर्व आर्थिक चुका फक्त एका व्यक्तीपुरत्या मर्यादित राहत नाहीत; त्या हळूहळू संपूर्ण कुटुंबाच्या, विशेषत: मुलांच्या मानसिकतेचा भाग बनतात. मुलं ज्या वातावरणात वाढतात, तेच त्यांचं आर्थिक जग ठरतं. जेव्हा ते रोज घरात पैशांची सततची कमतरता, ताण, EMI ची धांदल, आणि “आपल्याला हे परवडणार नाही” हे वाक्य ऐकत वाढतात, तेव्हा त्यांचं मनही तेच सत्य मानायला सुरुवात करतं. पालक स्वतः जोखीम घेत नाहीत, गुंतवणूक करत नाहीत, बचत तुटपुंजी असते, आणि पैसा फक्त जगण्यासाठीच असतो तेच विचार मुलांच्या मनात खोलवर बसतात.

     अशा वातावरणात वाढलेली मुलं मोठी होताना पैशांकडे संधी म्हणून नव्हे तर अडचण म्हणून पाहतात. ते देखील त्याच चुका पुन्हा करतात: भावनिक खर्च, कर्जावर अवलंबून राहणे, गुंतवणुकीची भीती, आणि आर्थिक ज्ञानाचा अभाव. यामुळे एक अदृश्य चक्र निर्माण होतं पालक मध्यमवर्गीय राहतात, आणि त्यांच्या मुलांचं आयुष्यही त्याच चौकटीत अडकून जातं. त्यामुळे आर्थिक सवयी बदलणं हा फक्त स्वतःसाठी नाही, तर पुढील पिढीसाठी केलेला सर्वात मोठा गुंतवणुकीचा निर्णय ठरतो. 

    या सर्व समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी करोडो कमवण्याची गरज नाही; गरज असते ती योग्य सवयींची आणि शिस्तीची. दरमहा ₹50,000 पेक्षा कमी पगार असला तरी आर्थिक आयुष्य पूर्णपणे बदलता येऊ शकते. सर्वात पहिला उपाय म्हणजे जागरूक खर्च अनावश्यक EMI, फॅन्सी वस्तू, आणि भावनेपोटी होणारे खर्च यावर नियंत्रण ठेवणे. दुसरे मोठे पाऊल म्हणजे बचत आणि गुंतवणुकीची शिस्त; महिन्याच्या सुरुवातीलाच कमीत कमी 10–20% रक्कम SIP, RD, किंवा सुरक्षित गुंतवणुकीत वळवणे, जरी रक्कम लहान असली तरी. 

    तिसरा उपाय म्हणजे कर्जमुक्तीची योजना उच्च व्याजाचे कर्ज आधी फेडणे आणि क्रेडिट कार्डचा वापर मर्यादित करणे. चौथा उपाय म्हणजे स्किल डेव्हलपमेंट पगार कमी असला तरी अतिरिक्त कौशल्ये शिकून साइड इन्कम किंवा चांगल्या नोकरीची संधी वाढवता येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक शिक्षण पैशाबद्दल वाचा, शिका, तज्ज्ञांचे व्हिडिओ बघा, आणि मुलांनाही याच सवयी शिकवा. हे छोटे-छोटे बदल आजपासून केले, तर आर्थिक चक्र बदलायला जास्त काळ लागत नाही; आणि एकदा सवयी मजबूत झाल्या की, मध्यमवर्गातून बाहेर पडून आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल सुरू होते. 

    या चुकांमधून सुटका करण्यासाठी करोडो रुपयांची आवश्यकता नाही; गरज असते ती योग्य सवयींची. अनावश्यक खर्च थांबवणे, महिन्याच्या सुरुवातीला बचत व गुंतवणूक करणे, उच्च व्याजाचे कर्ज आधी फेडणे आणि स्वतःच्या कौशल्यांमध्ये वाढ करणे हे छोटे पण शक्तिशाली पाऊल आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग तयार करतात. आर्थिक शिक्षण सातत्याने घेतल्यास आणि मुलांमध्येही चांगल्या सवयी रुजवल्यास मध्यमवर्गातून बाहेर पडून उत्तम भविष्यासाठी मजबूत पाया रचता येतो.

    या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे करोडो रुपये नव्हे, तर योग्य सवयी आणि आर्थिक शिस्त. अनावश्यक खर्च टाळणे, महिन्याच्या सुरुवातीला बचत करणे, SIP मध्ये गुंतवणूक सुरू करणे, उच्च व्याजाचे कर्ज आधी फेडणे आणि स्वतःचे कौशल्य वाढवणे हीच खरी आर्थिक क्रांती आहे. सातत्य आणि जागरूकता असेल तर मध्यमवर्गातून बाहेर पडून आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे शक्य आहे आणि पुढील पिढीसाठी सुरक्षित भविष्य तयार होऊ शकतं. ही सवयी सातत्याने केल्यास मध्यमवर्गीय जीवन बदलू शकते. पैशावर ताण कमी होतो, भविष्य सुरक्षित होते आणि पुढील पिढीसाठी आर्थिक जागरूकतेचा पाया तयार होतो. छोट्या बदलांनी मोठा फरक पडतो आणि आर्थिक स्वातंत्र्याची वाटचाल सुरू होते.

    आणखी वाचा :

  • रेल्वे रुळांवर इतिहास घडवणारी मराठमोळी लेक | Surekha Yadav

    रेल्वे रुळांवर इतिहास घडवणारी मराठमोळी लेक | Surekha Yadav

    “महिलांना जगातली सर्व कठीण कामे जमतील, पण ड्रायव्हिंग हे त्यांचे काम नाही,” हे वाक्य आपण आजही अनेकदा ऐकतो. पण या पुरुषी मानसिकतेला खोटं ठरवत एका मराठमोळ्या लेकीने थेट रेल्वे इंजिनचं सारथ्य केलं. ती लेक म्हणजे साताऱ्याच्या कन्या, सौ.. सुरेखा यादव. भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक (लोको पायलट) होण्याचा मान मिळवून त्यांनी इतिहास घडवला. तब्बल ३६ वर्षांच्या शानदार सेवेनंतर त्या या नवरात्रोत्सवात  निवृत्त होत आहेत. चला, जाणून घेऊया रुळांवर आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या या असामान्य व्यक्तिमत्त्वाची प्रेरणादायी गोष्ट.

    जन्म आणि शिक्षण: साताऱ्याच्या मातीतील अंकुर

    सुरेखा यादव (Surekha Yadav) यांचा जन्म २ सप्टेंबर १९६५ रोजी महाराष्ट्राच्या साताऱ्यात एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील रामचंद्र भोसले आणि आई सोनाबाई. पाच भावंडांमध्ये सर्वात मोठ्या असलेल्या सुरेखा लहानपणापासूनच हुशार आणि महत्त्वाकांक्षी होत्या. त्यांचे शालेय शिक्षण साताऱ्यातील सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झाले. खरं तर, त्यांना शिक्षिका व्हायचे होते आणि त्यासाठी त्यांनी बी.एड. करण्याची योजनाही आखली होती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.

    शालेय शिक्षणानंतर त्यांनी तांत्रिक शिक्षणाची वाट धरली आणि कराड येथील सरकारी पॉलिटेक्निकमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. याच तांत्रिक ज्ञानाच्या जोरावर त्यांनी भविष्याची एक नवी दिशा निवडली.

    रेल्वे रुळांवरचा ऐतिहासिक प्रवास

    १९८६ साली रेल्वेमध्ये असिस्टंट ड्रायव्हर पदासाठी भरती निघाली. त्या काळात हे क्षेत्र पूर्णपणे पुरुषांची मक्तेदारी मानले जायचे. पण सुरेखा यांनी धाडसाने अर्ज केला. लेखी परीक्षा आणि मुलाखत यशस्वीपणे पार करत त्यांनी रेल्वेमध्ये प्रवेश निश्चित केला. कल्याणच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये सहा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून १९८८  साली त्या भारतीय रेल्वेमध्ये सहाय्यक चालक म्हणून रुजू झाल्या आणि एका नव्या इतिहासाला सुरुवात झाली.

    त्यांचा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीला त्यांनी मालगाडी चालवण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांची मेहनत, अचूकता आणि कौशल्य पाहून रेल्वे प्रशासनाचा विश्वास वाढत गेला.

    यशाचे एकेक शिखर

    • २०००: त्यांना ‘मोटरवुमन’ म्हणून बढती मिळाली.
    • २०१०: पश्चिम घाटासारख्या आव्हानात्मक आणि कठीण रेल्वे मार्गावर गाडी चालवण्याची जबाबदारी त्यांना मिळाली.
    • ८ मार्च २०११: ‘डेक्कन क्वीन’ अर्थात ‘दख्खनच्या राणी’ या प्रतिष्ठित गाडीचे पुणे ते मुंबई सारथ्य करण्याचा ऐतिहासिक मान त्यांना मिळाला. हा दिवस भारतीय रेल्वेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला.
    • २०११: त्यांची एक्सप्रेस मेल पायलट म्हणून नियुक्ती झाली, ज्यामुळे त्या आशियातील पहिल्या पूर्णवेळ महिला ड्रायव्हर ठरल्या.
    • १३ मार्च २०२३: त्यांनी सोलापूर ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) पर्यंत ‘वंदे भारत एक्सप्रेस’ चालवून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. वंदे भारत चालवणाऱ्या त्या पहिल्या महिला लोको पायलट ठरल्या.

    कुटुंबाचा भक्कम पाठिंबा

    सुरेखा यादव यांच्या या यशस्वी प्रवासात त्यांच्या कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे पती शंकर यादव हे महाराष्ट्र पोलिसात इन्स्पेक्टर पदावर कार्यरत आहेत. दोन मुलांची आई असलेल्या सुरेखा नेहमी सांगतात की, “कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते.” नोकरीची वेळ, जबाबदारी आणि ताण सांभाळून घराची जबाबदारी सांभाळण्यात त्यांच्या पतीने आणि कुटुंबाने दिलेली साथ मोलाची ठरली.

    सेवानिवृत्ती आणि प्रेरणादायी वारसा

    तब्बल ३६ वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर, सुरेखा यादव ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. आपल्या कारकिर्दीतील शेवटची फेरी त्यांनी हजरत निजामुद्दीन (दिल्ली) – CSMT राजधानी एक्सप्रेस चालवून पूर्ण केली.

    त्यांच्या सेवानिवृत्तीवर मध्य रेल्वेने अत्यंत भावनाप्रधान शब्दात म्हटले आहे, “श्रीमती सुरेखा यादव या एक खऱ्या अर्थाने पथप्रदर्शक (trailblazer) आहेत. त्यांनी अडथळ्यांना पार करून अगणित महिलांना प्रेरणा दिली आणि हे सिद्ध केले की परिश्रम घेण्याची तयार असेल तर कोणतेही स्वप्न अपूर्ण राहू शकत नाही. त्यांचा प्रवास भारतीय रेल्वेमध्ये महिला सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून सदैव स्मरणात राहील.”

    सुरेखा यादव यांची गोष्ट केवळ एका नोकरीची कहाणी नाही, तर ती स्वप्न पाहण्याचे आणि ते पूर्ण करण्यासाठी कोणत्याही मर्यादा न मानण्याची गाथा आहे. ‘चूल आणि मूल’ या चौकटीतून बाहेर पडून महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात, हे त्यांनी सिद्ध केले. त्यांचा हा प्रवास येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत आणि दीपस्तंभ म्हणून कायम प्रकाश देत राहील.

    आणखीन वाचा

  • Bhaurao Patil – एका सहावी पास माणसाची जगातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था उभारण्याची गोष्ट

    शिक्षण कोणत्याही राष्ट्राचा कणा असतो. शिक्षितांना शिक्षणाचे महत्त्व सांगण्याची गरज नाही, पण तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटला आहात जे स्वतः अशिक्षित असूनही शिक्षणाचे महत्त्व ओळखत असे आणि हजारो वंचित मुलांच्या शिक्षणाचे कारण बनला असे? आम्ही बोलत आहोत कर्मवीर भाऊराव पाटील (Bhaurao Patil) यांच्याबद्दल. त्यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

    कर्मवीर भाऊराव पाटील हे एक प्रख्यात शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी सातारा येथे ‘रयत शिक्षण संस्था’ची स्थापना केली. ग्रामीण भागात कोणतेही मुल अशिक्षित राहू नये या विचारधारेने त्यांनी ही संस्था उभी केली. ‘कमवा आणि शिका’ या आपल्या क्रांतिकारी तत्त्वज्ञानाद्वारे त्यांनी मुलांना काम करत शिक्षण घेण्यास प्रेरित केले. त्यांनी केलेल्या अशाच अनेक कार्याची माहिती आजच्या या लेखात जाणून घेऊया.

    प्रारंभिक जीवन 

    भाऊराव पाटील (Bhaurao Patil) यांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी कुंभोज येथे झाला, परंतु त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील आयतवाडे बुद्रुक होते. त्यांच्या आईचे नाव गंगाबाई आणि वडिलांचे नाव पायगोंडा देवगोंडा पाटील होते. मराठी जैन शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भाऊरावांना लहानपणी भाऊ असे संबोधत असत. मोठे झाल्यावर त्यांना आदराने भाऊराव म्हणत असत.

    Bhaurao Patil

    त्यांचे दोन पूर्वज नेमागोंडा आणि शांतनगोंडा हे नंदणी येथील जैन मठाचे पीठाचार्य आणि दिगंबरपंथी जैन मुनी होते. त्यामुळे भाऊरावांमध्येही लहानपणापासूनच तपस्वी वृत्ती आणि अन्यायाविरुद्ध बंडखोर वृत्ती होती. भाऊरावांचे शिक्षण दहीवाडी आणि विटे येथे झाले. १९०२ साली भाऊरावांना इंग्रजी शिक्षणासाठी कोल्हापूरच्या अजरा तालुक्यातील विटे येथे पाठवण्यात आले. त्यांनी राजाराम मिडल हायस्कूलमध्ये पहिलीपासून तिसरी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर राजाराम हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. शाहू महाराजांच्या राजवाड्यात असताना भाऊराव सहाव्या वर्गातील गणित विषयात नापास झाले. ही गोष्ट शाहू महाराजांना सांगितल्यावर महाराजांनी गणिताचे शिक्षक श्री. भार्गवराम कुलकर्णी यांना भाऊरावाला गणितात पास करून वरच्या वर्गात ढकलण्यास सांगितले.

    पण श्री. भार्गवराम हे अतिशय प्रामाणिक होते. त्यांनी शाहू महाराजांना म्हटले, “ज्या बाकावर भाऊ बसतो तो बाक पुढच्या वर्गात ढकलू शकतो, परंतु भाऊ नाही. शिवाय दोनशे गुणांपैकी सात गुण मिळवणाऱ्या मुलाला जास्ती गुण देऊन पास करणे माझ्या बुद्धीला मान्य नाही. आपली इच्छा असेल तर माझी बडतर्फी करा.” कुलकर्णी गुरुजींचे ते शब्द भाऊरावांना आयुष्यभर आठवत राहिले. नंतर भाऊरावांनी वसतिगृहातील मुलांना ही घटना सांगून त्यांना अभ्यासात मेहनत करायला लावली. सहावीत नापास झाल्यानंतर भाऊरावांच्या वडिलांनी त्यांना कोरेगावला परत बोलावले. हे भाऊरावांचे अपयश नव्हे तर  शाहू महाराजांच्या सहवासातील ही शेवटची वर्षे भाऊरावांच्या जीवनात एक वळण ठरली. महाराजांच्या उपस्थितीत त्यांना भावी समाजसुधारक म्हणून समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळाली.

    त्यांचा असा विश्वास होता की शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे आणि जात, पंथ किंवा सामाजिक स्थितीची पर्वा न करता ते सर्वांसाठी सुलभ असले पाहिजे. तसेच शिक्षण हे व्यावहारिक आणि समाजाच्या गरजांशी संबंधित असले पाहिजे आणि त्याद्वारे लोकांना स्वावलंबी आणि स्वतंत्र होण्याची शक्ती मिळली पाहिजे. त्यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समग्र आणि बहुविषयक होता. त्यांचा असा विश्वास होता की शिक्षणाने केवळ शैक्षणिक ज्ञान दिले पाहिजे असे नाही, तर जीवन कौशल्ये, मूल्ये आणि नैतिकताही शिकवली पाहिजे.

    रयत शिक्षण संस्था – एक आघाडीची शैक्षणिक संस्था

    १९१८ मध्ये भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. ही एक आघाडीची शैक्षणिक संस्था होती,आणि ‘स्वावलंबी शिक्षण, हेच आमचे ब्रीद’ या तत्वावर कार्यरत होती.संस्थेची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातील काले गावातील फक्त एका शाळेपासून झाली.पण लवकरच या संस्थेचा विस्तार महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये झाला. विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार मिळावा आणि त्यांनी आर्थिक स्वावलंबी व्हावे म्हणून संस्थेने अनेक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली.

    सध्या रयत शिक्षण संस्थेच्या एकूण ७७२ शाखा आहेत, ज्यामध्ये ४२ महाविद्यालये, ४४७ माध्यमिक शाळा, ७ प्रशिक्षण महाविद्यालये, ६२ प्राथमिक शाळा (२८ इंग्रजी माध्यम), ४७ पूर्व-प्राथमिक शाळा (२९ इंग्रजी माध्यम), ९१ वसतिगृहे (३५ मुलींसाठी), ७ प्रशासकीय कार्यालये, ८ आश्रम शाळा, ३ औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि ५७ इतर शाखांचा समावेश आहे.

    भाऊरावांनी भारतातील पहिले “कमवा आणि शिका” (Earn and Learn) वसतिगृह योजना सुरू केली. ‘स्वयंसेवेद्वारे शिक्षण’ हे कर्मवीर भाऊरावांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचे मूलभूत तत्त्व होते. या क्रांतिकारी योजनेअंतर्गत विद्यार्थी काम करत, एकत्र स्वयंपाक करत आणि समता व श्रमाचे महत्त्व शिकत असत. विविध पंथ आणि जातीचे विद्यार्थी एकत्र राहत असत, ज्यामुळे सामाजिक भेदभाव दूर होत असे. ही योजना मुख्यतः ग्रामीण भागातील, आर्थिकदृष्ट्या मागास, हुशार आणि गरजू पण उच्च शिक्षण घेण्यास असमर्थ विद्यार्थ्यांसाठी होती. या योजनेमुळे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण सुलभ आणि उपलब्ध होते.

    भाऊरावांची त्याग व समर्पण वृत्ती आपल्याला माहित आहेच पण त्यांच्या संपूर्ण कुटुंबानेच जणू समाजसेवेचा वसा घेतला. वसतिगृहाचा खर्च भागवण्यासाठी त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी आपला मंगळसूत्रही विकला होता. वंचित आणि पारंपरिक पार्श्वभूमीतून आल्या तरी त्यांनी वेगवेगळ्या जातींच्या मुलांची जणू स्वतःच्या मुलांसारखी काळजी घेतली.

    कर्मवीर भाऊराव पाटील हे एक दूरदर्शी शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होते, ज्यांच्या कार्याने भारताच्या इतिहासावर कधीही पुसली न जाणारी छाप सोडली आहे. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रात शिक्षणाची व्यापक क्रांती घडली आणि हजारो कुटुंबांचे जीवन बदलले. आजही त्यांची शिकवण आणि आदर्श शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारकांना प्रेरणा देत आहेत. त्यांच्या अतुलनीय कार्यास नमन !

    आणखी वाचा :

  • सरकारकडून देशवासियांना दिवाळी गिफ्ट 22 सप्टेंबरपासून ‘हे’ नवीन GST दर लागू होणार

    सरकारकडून देशवासियांना दिवाळी गिफ्ट 22 सप्टेंबरपासून ‘हे’ नवीन GST दर लागू होणार

    सर्वसामान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय – जीवनावश्यक वस्तूंवर GST कपात

    देशातील सर्वसामान्यांसाठी केंद्र सरकारकडून दिलासा देणारा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंवरील जीएसटी (GST) दर कमी होणार आहेत. या निर्णयामुळे थेट ग्राहकांना फायदा होईल आणि घरगुती बजेटला थोडा दिलासा मिळेल. 

    ही करकपात काही निवडक वस्तूंवर मर्यादित नसून रोजच्या जीवनात लागणाऱ्या अनेक वस्तूंवर लागू होणार आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंपासून ते घरगुती वापराच्या सामानापर्यंत बरीच उत्पादने आता कमी किमतीत मिळतील. थोडक्यात, या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना दररोजच्या खरेदीत बचत करता येणार आहे. आता नेमक्या कोणत्या वस्तूंवर किती टक्के करकपात झाली आहे आणि त्याचा थेट फायदा ग्राहकांना कसा होणार आहे, हे आपण या लेखात समजून घेऊया.

    दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर दिलासा

    सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर दिलासा देण्यासाठी सरकारने जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी मोठ्या प्रमाणात कमी केला आहे. याआधी १२% ते १८% जीएसटी भरावा लागणाऱ्या अनेक वस्तूंवर आता फक्त ५% जीएसटी लागू होणार आहे. 

    या यादीत केसांचे तेल, शॅम्पू, टूथपेस्ट, टूथब्रश, टॉयलेट सोप, शेव्हिंग क्रीम यांसारख्या वस्तूंवरचा कर १८% वरून ५% झाला आहे. तसेच लोणी, तूप, चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थ, प्री-पॅकेज नमकीन, भुजिया, मिश्रण, भांडी, बाळांच्या बाटल्या, नॅपकिन्स, क्लिनिकल डायपर यांसारख्या वस्तूंवरचा जीएसटी १२% ऐवजी आता फक्त ५% भरावा लागेल. शिलाई मशीन व त्याचे सुटे भाग यांनाही या दरकपातीचा लाभ मिळणार आहे.

     शेतकरी आणि शेती व्यवसायासाठी फायदा

    शेतकरी आणि शेती व्यवसायासाठीही सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. शेतीसाठी लागणाऱ्या अनेक साधनांवरील आणि उपकरणांवरील जीएसटी आता कमी करण्यात आला आहे. यामुळे शेतीचा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे.

    या यादीत ट्रॅक्टर टायर्स आणि सुटे भाग यांवरील कर १८% वरून ५% करण्यात आला आहे, तर ट्रॅक्टरवरचा जीएसटी १२% ऐवजी फक्त ५% आकारला जाणार आहे. याशिवाय जैव-कीटकनाशके, सूक्ष्म पोषक घटक, ठिबक सिंचन प्रणाली, स्प्रिंकलर तसेच माती तयार करणे, लागवड, कापणी आणि मळणीसाठी लागणाऱ्या यंत्रांवरही जीएसटी १२% वरून ५% इतका कमी झाला आहे. 

    आरोग्यसेवा क्षेत्रात मोठा दिलासा

    आरोग्यसेवा क्षेत्रातही सरकारने मोठ्या प्रमाणात कर कपात केली आहे. लोकांच्या आरोग्याशी थेट संबंधित अनेक वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे औषधोपचार आणि आरोग्य तपासणीसाठी लागणारा खर्च कमी होणार आहे. सर्वात मोठा फायदा म्हणजे वैयक्तिक आरोग्य व जीवन विमा आता १८% वरून थेट शून्य टक्के म्हणजेच पूर्णपणे करमुक्त करण्यात आला आहे.

    याशिवाय थर्मोमीटरवरील कर १८% वरून ५%, वैद्यकीय दर्जाचा ऑक्सिजन, निदानासाठी लागणारी सर्व किट, ग्लूकोमीटर व चाचणी पट्ट्या आणि डोळ्यांच्या तपासणीसाठी लागणारा चष्मा यांवरील कर १२% वरून ५% इतका करण्यात आला आहे. या निर्णयामुळे उपचार आणि आरोग्य तपासणीसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू सर्वसामान्यांना अधिक परवडतील. 

    परवडणाऱ्या दरात मोटारगाड्या

    वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवरील जीएसटीत मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मोटारगाड्या आणि इतर वाहने आता परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार असून ग्राहकांना थेट फायदा होईल. आधी २८% जीएसटी (GST) आकारला जाणाऱ्या वाहनांवर आता फक्त १८% जीएसटी (GST) लागू होणार आहे.

    या यादीत पेट्रोल, पेट्रोल-हायब्रिड, एलपीजी आणि सीएनजी कार (१२०० सीसी आणि ४००० मिमी पेक्षा कमी), डिझेल आणि डिझेल-हायब्रिड कार (१५०० सीसी आणि ४००० मिमी पेक्षा कमी), तीन चाकी वाहने, ३५० सीसी पर्यंतच्या मोटारसायकली तसेच मालवाहतूक मोटारगाड्या यांचा समावेश आहे. यामुळे वाहन खरेदीचा खर्च कमी होऊन सामान्य नागरिकांना वाहतुकीच्या सोयी अधिक सुलभ होणार आहेत.

    शिक्षण क्षेत्रात करमुक्ती 

    शिक्षण क्षेत्रालाही सरकारने मोठा दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या अनेक शैक्षणिक वस्तूंवरील जीएसटी पूर्णपणे हटवण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षणासाठी लागणारे साहित्य अधिक स्वस्त आणि परवडणारे होणार आहे.

    या यादीत नकाशे, चार्ट, पेन्सिल, शार्पनर, रंगीत खडू, व्यायाम पुस्तके, वह्या यांवरील १२% जीएसटी हटवून शून्य टक्के करण्यात आला आहे. तर खोडरबरवरील ५% करही रद्द करून ती वस्तू पूर्णपणे करमुक्त केली आहे. यामुळे शालेय साहित्य खरेदीत विद्यार्थ्यांना आणि पालकांना थेट बचत होणार आहे.

     इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बचत

    सामान्य कुटुंबाच्या घरगुती खर्चात मोठा वाटा असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरही सरकारने जीएसटी कपात जाहीर केली आहे. दैनंदिन जीवन अधिक सोयीस्कर करणारी मोठी घरगुती उपकरणे आता पूर्वीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. याआधी २८% जीएसटी लागू असलेल्या उपकरणांवर आता फक्त १८% जीएसटी (GST) आकारला जाणार आहे. 

    या यादीत एअर कंडिशनर, ३२ इंचांपेक्षा मोठे टेलिव्हिजन, मॉनिटर, प्रोजेक्टर आणि डिश वॉशिंग मशीन यांचा समावेश आहे. अशा प्रकारची उपकरणे आधी महागडी वाटत असली तरी करकपातीनंतर ती तुलनेने परवडणारी ठरणार आहेत. या निर्णयामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना घरात आवश्यक असलेल्या आधुनिक सुविधा आणणे सोपे होईल आणि बाजारातील विक्रीलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

    आणखी वाचा

  • Giorgio Armani : स्वप्नाला आकार देणारा कलाकार

    Giorgio Armani : स्वप्नाला आकार देणारा कलाकार

    इटली देशातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अब्जाधीश ब्रँड मालक जॉर्जिओ अरमानी यांचे दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांची अरमानी ही कंपनी गुच्ची आणि प्राडा नंतर इटलीतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा फॅशन समूह मानला जातो. या ब्रँडखाली शेकडो स्टोअर्स आणि 10 अब्जाहून अधिक डॉलर्सची वार्षिक उलाढाल आहे. मिलानच्या रेडी-टू-विअर फॅशनमध्ये अग्रणी ठरलेले अरमानी यांनी ‘अनस्ट्रक्चर्ड लुक्स’ द्वारे फॅशनमध्ये क्रांती घडवून आणली होती. ते इटालियन शैली आणि शालीनतेचे मूर्तिमंत स्वरूप होते.

    मिलानच्या रस्त्यावरून चालणाऱ्या एका साध्या मुलाने कधी कल्पनाही केली नव्हती की, एक दिवस तो जगभरातल्या फॅशनविश्वाला नवं रूप देईल. वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडलेला हा तरुण, थोडे दिवस सैन्यात आणि मग एका दुकानातल्या शोकेस सजवण्यात रमला. परंतु त्याच्या डोळ्यात मात्र कपड्यांच्या पलीकडचं स्वप्न होतं. अखेर सर्जियो गॅलोटी या मित्रासोबत १९७५ च्या दशकात त्याने स्वतःचा ब्रँड उभारला.

    पुढे काळ बदलत गेला आणि त्यांचे कष्ट आणि कल्पकता सतत वाढत राहिले. त्यांनी एम्पोरियो अरमानी, अरमानी ज्युनियर आणि एएक्स अरमानी एक्सचेंज यांसारख्या नव्या श्रेणींमधून जागतिक स्तरावर आपला ब्रँड विस्तारला. त्याचबरोबर सौंदर्यप्रसाधने, परफ्यूम तसेच होम फर्निशिंग क्षेत्रातही त्यांनी आपले स्थान निर्माण केले. हॉलीवूडमधील १९८० साली प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर गिगोला चित्रपटासाठी रिचर्ड गियरची वॉर्डरोब डिझाईन तयार करताच जगाने त्यांच्या नावाकडे गंभीरपणे पाहायला सुरुवात केली. चित्रपट उद्योगाशी असलेल्या या संबंधामुळे त्यांचे नाव आणि ब्रँड मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांसमोर आले. अरामानींनी शंभराहून अधिक चित्रपटांसाठी पोशाख डिझाइन केले.


    त्यानंतर जॉर्जिओ अरमानी (Giorgio Armani) फॅशनच्याही पलीकडे गेली. फॅशनच्या पलीकडे जाऊन त्यांनी हॉटेल्स, क्रीडा आणि संगीत क्षेत्रातही पाऊल ठेवले. दुबईतील अरमानी हॉटेल, ऑलिंपिक व विविध व्यावसायिक क्रीडा संघांसाठी गणवेश डिझाइन, तसेच एम्पोरियो अरमानी कॅफे संगीत संकलनांचे क्युरेशन हे त्याचे काही उल्लेखनीय उपक्रम ठरले. त्यांच्या नावावर उभं राहिलेलं साम्राज्य म्हणजे फक्त कपड्यांचं नव्हे, तर आज ते शालीनतेचं प्रतिक आहे.

    आज त्यांच्या जाण्याने जग शोकाकुल आहे, पण त्यांनी विणलेली शैली अजूनही जिवंत आहे. “खरा डिझायनर तोच, जो स्वप्नांना कृतीतून प्रत्यक्षात घडवतो“ हे त्यांनी जगाला दाखवून दिले. शून्यातून विश्व उभे करण्याचा त्यांचा प्रवास आज सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे.


    जॉर्जिओ अरमानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

    आणखी वाचा :

  • डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आदर्श शिक्षक ते भारताच्या  राष्ट्रपती पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

    डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आदर्श शिक्षक ते भारताच्या  राष्ट्रपती पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

    शिक्षक दिन आपल्याला त्या व्यक्तींच्या योगदानाची आठवण करून देतो, ज्यांनी ज्ञानाचा प्रकाश पसरवून आपल्या जीवनाला दिशा दिली. भारतात शिक्षक दिन 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस फक्त शिक्षकांचे कौतुक, त्यांचे स्मरण करण्यासाठीच नाही, तर शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव करून देण्यासाठी देखील असतो. या दिवसाची विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो, ज्यांनी शिक्षक आणि तत्त्वज्ञ म्हणून आपल्या देशाला गौरवान्वित केले. जाणून घेऊया त्यांच्या यशस्वी जीवनाची प्रवास. 

    भारताच्या आधुनिक  इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत ज्यांनी एकाच वेळी अनेक क्षेत्रात त्यांच्या विचारांची दीर्घकालीन छाप टाकली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ( Sarvepalli Radhakrishnan) हे असेच एक दीप्तिमान व्यक्तिमत्त्व. ते एकाच वेळी पूर्व-पश्चिम विचारांचा सुसंवाद घडवणारे तत्त्वज्ञ, विद्यापीठ प्रशासनात कर्तृत्व सिद्ध करणारे कुलगुरू, भारतीय संविधानिक लोकशाहीचा मान राखणारे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती आणि आदर्श पिढ्या घडवणारे आदर्श शिक्षक होते. 

    प्रारंभिक जीवन 

    डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म सर्वपल्ली राधाकृष्णय्या म्हणून सर्वपल्ली वीरस्वामी आणि सीथम्मा यांच्या तेलुगू हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण तिरुत्तानी येथील केव्ही हायस्कूलमध्ये झाले. त्यांच्या संपूर्ण शिक्षणात त्यांना सतत शिष्यवृत्ती मिळत राहिली. हायस्कूलसाठी त्यांनी वेल्लोरमधील वुरहीस कॉलेजची निवड केली. १६ व्या वर्षी त्यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजात प्रवेश घेतला.  १९०७ साली त्यांनी पदवी संपादन केली आणि त्याच कॉलेजमधून पुढे पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. त्यांचा “वेदांताचे नीतिमत्ता आणि त्याचे आधिभौतिक पूर्वग्रह” हा प्रबंध केवळ वयाच्या विसाव्या वर्षी प्रकाशित झाला. 

    शैक्षणिक कारकीर्द

    शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम सुरू केले आणि नंतर प्राध्यापक म्हणून पुढील पायऱ्या चढत गेले. १९१८ ते १९२१ दरम्यान त्यांनी म्हैसूर विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. यानंतर १९२१ मध्ये ते कोलकत्ता विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक बनले. येथे त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाच्या विचारसरणीला आधुनिक आणि जागतिक दृष्टिकोनातून मांडले.

    १९३१ – १९३६ दरम्यान त्यांनी आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यभार सांभाळला . त्यानंतर १९३९ मध्ये पंडित मदनमोहन मालवीय यांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू पदी विराजमान झाले आणि  १९४८ पर्यंत कार्यभार सांभाळले. खास गोष्ट म्हणजे, राधाकृष्णन यांनी कोलकत्ता आणि बनारस या दोन्ही विद्यापीठांमध्ये काम करताना प्राध्यापक पदाचा त्याग केला नाही.कोलकत्ता विद्यापीठात आठवड्याभराचे अध्यापनाचे दिवस सांभाळून शनिवार-रविवार बनारस विद्यापीठाचे प्रशासकीय काम पाहत असत.

    ऑक्सफर्ड विद्यापीठात १९३६ ते १९५२ दरम्यान त्यांनी पौर्वात्य धर्म आणि नीतिशास्त्राचे स्पाल्डिंग प्राध्यापक म्हणून २० वर्षे अध्यापन केले. येथे त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचे सखोल अध्ययन करून पाश्चात्य जगात त्याची महत्त्वपूर्ण ओळख करून दिली.

    साहित्यातील योगदान: विचारांचा विश्वकोश

    संस्कृत भाषेचा अभ्यास करून त्यांनी प्रस्थानत्रयी आणि समग्र भाष्यग्रंथ अभ्यासले. पश्चिमेकडचे तत्त्वज्ञानातील प्लेटो, प्लॉटनिस, कान्ट, ब्रॅडले यांच्यासारख्या तत्त्वज्ञांच्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. डॉ. राधाकृष्णन हे विपुल लेखन करणारे विद्वान. त्यांचे लेखन भारतीय तत्त्वज्ञान, धर्म, समाज आणि आधुनिक जगातील नैतिक मूल्यांवर आधारित होते. त्यांनी द फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर, इंडियन फिलॉसॉफी,द हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ,अँन आयडियलिस्ट व्ह्यू ऑफ लाइफ,ईस्टर्न रिलिजन्स अँड वेस्टर्न थॉट,ईस्ट अँड वेस्ट: सम रिफ्लेक्शन्स, असे २५ पेक्षा जास्त ग्रंथ लिहिले. या लेखनामुळे भारतीय तात्त्विक विचार पाश्चात्त्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आणि भारतीय संस्कृतीची खरी ओळख समजून घेण्यास मदत झाली.

    डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनातून एक महत्वाची बाब निदर्शनास येते की ‘शिक्षक हा राष्ट्रनिर्मातेपेक्षा कमी नसतो’. कारण गुरूशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय प्रगती नाही, आणि प्रगतीशिवाय राष्ट्र नाही.या एका विचारात शिक्षक दिनाचा संपूर्ण अर्थ दडलेला आहे. चला तर मग, या शिक्षक दिनी आपण आपल्या सर्व गुरुजनांना कृतज्ञतेने स्मरूया, त्यांच्या शिकवणुकीला कृतीत उतरवूया. 

    आणखी वाचा

  • सेकंड हँड गाड्यांचं मार्केट बदलणाऱ्या CARS24 च्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी

    सेकंड हँड गाड्यांचं मार्केट बदलणाऱ्या CARS24 च्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी

    आज टेक्नॉलॉजी आणि इंटरनेट मुळे वेगाने बदलणाऱ्या जगात, सगळं काही ऑनलाइन होत चाललं आहे. मग गाड्यांची खरेदी-विक्री कशी मागे राहील? पूर्वी वापरलेली गाडी विकायची म्हणजे डीलरकडे चकरा माराव्या लागायच्या, योग्य किंमत मिळेल की नाही याची चिंता, कागदपत्रांचं ओझं… पण या सगळ्याला पूर्णविराम देणारं एक नाव म्हणजे ‘CARS24’. या कंपनीने वापरलेल्या गाड्यांची खरेदी-विक्री सहज, सोपी आणि विश्वासार्ह करून दिली आहे.

    मात्र या यशामागे आहे एका छोट्या शहरातील तरुणाची मोठी स्वप्नं, अपयशातून शिकण्याची तयारी आणि अपार मेहनत. तो तरुण म्हणजे CARS24 चे संस्थापक आणि CEO विक्रम चोप्रा. छोट्याशा शहरातुन आलेल्या विक्रम यांचं स्वप्न होतं काहीतरी स्वतःचा व्यवसाय उभारायचं. हे स्वप्न पूर्ण करताना त्यांना अनेक अडथळे आले, अपयशं आली, पण त्यांनी हार न मानता पुन्हा नव्याने सुरुवात केली. आजच्या लेखात आपण या जिद्दी तरुणाचा प्रेरणादायक प्रवास पाहणार आहोत.

    सुरुवातीचं आयुष्य 

    उत्तर प्रदेशातील रायबरेली या छोट्या शहरात विक्रम चोप्रा यांचा जन्म झाला. ते एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात मोठे झाले. लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार असलेल्या विक्रम यांनी IIT बॉम्बेमधून बी.टेक आणि एम.टेक पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून MBA केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी McKinsey आणि Sequoia Capital सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलं आणि तिथे चांगला अनुभव मिळवला.

    पण मोठ्या पगाराच्या नोकरी असूनही त्यांच्या मनात सतत एक विचार चालू होता तो म्हणजे “स्वतःचं काहीतरी वेगळं करायचं आहे.” हीच कल्पना मनात ठेऊन त्यांनी नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयामुळे त्यांचा उद्योजकतेचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.

    पहिला प्रयत्न अपयशी

    विक्रम चोप्रा यांनी FabFurnish नावाचं ऑनलाईन फर्निचर विक्रीचं स्टार्टअप सुरू करून व्यवसाय क्षेत्रात पहिले पाऊल टाकलं. तीन वर्षं मेहनत करूनही हा व्यवसाय अपेक्षेप्रमाणे चालला नाही. त्यांच्या वाट्याला अपयश आलं .पण विक्रम खचले नाहीत. त्यांनी या अपयशातून शिकण्याचा मार्ग स्वीकारला आणि नव्याने विचार करायला सुरुवात केली.

    एकदा स्वतःची गाडी विकताना विक्रम चोप्रा यांना जाणवलं की भारतात सेकंड हॅन्ड गाडी विकणं खूपच कठीण आणि गुंतागुंतीचं आहे. एजंट्स, पेपरवर्क, योग्य किंमत मिळवणं आणि वेळेची अडचण. या अनुभवातूनच त्यांच्या मनात एक कल्पना उमटली ती म्हणजे अशी एक सुविधा तयार करावी जी गाडी खरेदी-विक्रीची प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि टेकनॉलॉजीवर आधारित करेल. आणि याच विचारातून जन्म झाला CARS24 या डिजिटल प्लॅटफॉर्मचा ,ज्याने भारतात वापरलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीला एक विश्वासार्ह नाव दिलं.

    CARS24 या स्टार्टअपची सुरुवात

    २०१५ साली विक्रम चोप्रा यांनी मेहुल अग्रवाल, गजेंद्र जांगिड आणि रुचित अग्रवाल या आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून Chttps://www.cars24.com/new-cars/ARS24 या स्टार्टअपची स्थापना केली. वापरलेल्या गाड्या विकणं ही भारतात एक कठीण आणि वेळखाऊ प्रक्रिया होती. हे लक्षात घेऊन त्यांनी C2B (Customer to Business) मॉडेलवर आधारित एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केलं, जिथे सामान्य ग्राहक आपल्या गाड्या थेट कंपनीकडे विकू शकतो आणि कंपनी त्या गाड्या तपासून विश्वासार्ह डीलर्सना पुढे विकते. यामुळे ग्राहकांना योग्य किंमत, आणि डीलर्सना खात्रीशीर गाड्या मिळतात यामुळे दोघांचाही वेळ, पैसा आणि त्रास वाचतो.

    सुरुवातीला लोकांचा विश्वास मिळवणं हे मोठं आव्हान होतं. पण CARS24 ने या आपल्या खरेदी विकीरच्या प्रक्रियेला पारदर्शक आणि सहज करण्यासाठी डिजिटल पेमेंट, मोफत RC ट्रान्सफर, एआय आधारित किंमत मूल्यांकन आणि ऑनलाइन डीलिंगसारख्या सुविधा दिल्या. पहिल्याच भेटीत गाडी विकण्याचं आश्वासन आणि कागदपत्रांचं सुलभ व्यवस्थापन यामुळे ग्राहकांचा हळूहळू विश्वास बसू लागला आणि तिथूनच CARS24 ने यशाच्या दिशेने वाटचाल सुरू केली.

    फंडिंग आणि झपाट्याने झालेली वाढ

    CARS24 ने सुरुवातीपासूनच गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं. २०१५ मध्ये SAIF Partners आणि Accel कडून तब्बल ३२ कोटींचं फंडिंग मिळालं. त्यानंतर २०१८ मध्ये Sequoia Capital ने मोठी उडी घेत ३४० कोटींची गुंतवणूक केली. यामुळे कंपनीचं व्हॅल्यूएशन थेट १७४० कोटींवर पोहोचलं. या फंडिंगमुळे CARS24 ला तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यास, सेवा सुधारण्यास आणि अधिक शहरांमध्ये विस्तार करण्यास मदत झाली.

    विक्रम चोप्रा आणि त्यांच्या टीमने एक महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे महेंद्रसिंग धोनीला त्यांनी कंपनीचा  ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवलं. त्याच्या विश्वासार्ह प्रतिमेमुळे ब्रँडची ओळख घराघरात पोहोचली. “एक भेटीत गाडी विकण्याची प्रक्रिया” ही CARS24 ची खासियत बनली. त्यामुळे OLX, Droom, Mahindra First Choice यांसारख्या मोठ्या स्पर्धकांमध्येही CARS24 ने स्वतःचं वेगळं आणि विश्वासार्ह स्थान निर्माण केलं.

    युनिकॉर्न स्टार्टअप

    CARS24 ने २०२० मध्ये मोठा टप्पा गाठला. डीएसटी ग्लोबल कडून १५१० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाल्यानंतर कंपनीचं पोस्ट-मनी व्हॅल्यूएशन १ अब्ज डॉलरवर पोहोचलं आणि CARS24 ही भारतातील युज्ड कार क्षेत्रातील पहिली युनिकॉर्न कंपनी ठरली. सुरुवातीला फक्त ३२ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळालेल्या या स्टार्टअपने सिकोइया कॅपिटल, एक्झॉर सिड्स, डीएसटी ग्लोबल यांसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करत हजारो कोटींची गुंतवणूक मिळवली.

    समोर आलेल्या यशाने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या सेवा फक्त कारपुरती मर्यादित न ठेवता, बाईक्स, कमर्शियल व्हेइकल्स, फायनान्सिंग, विमा यामध्येही विस्तार केला.२०२४ मध्ये कंपनीचं मूल्यांकन वाढून ३.२३ अब्ज डॉलर (सुमारे २५,००० कोटी रुपये) इतकं झालं आणि आज CARS24 हे नाव भारतातील युज्ड गाड्यांच्या क्षेत्रात एक भक्कम ओळख बनून उभं आहे.

    यशाच्या शिखरावर


    CARS24 ही आज भारतातील सर्वात मोठी युज्ड कार खरेदी-विक्रीची ऑनलाईन कंपनी बनली आहे. २०० हून अधिक शहरांमध्ये ही सेवा सुरू असून, दर महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त गाड्यांचे व्यवहार येथे होतात. १.५ कोटींहून अधिक लोकांनी त्यांचं अ‍ॅप डाउनलोड केलं आहे. वापरलेल्या गाड्यांच्या बाजारात ६५% पेक्षा जास्त मार्केट शेअर CARS24 च्या नावावर असून, हा त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेचा आणि यशाचा दाखला आहे.

    या यशामागे आहे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. कंपनीने AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाद्वारे गाडीच्या किमतीचं अचूक मूल्यांकन शक्य केलं आहे, ज्यामुळे व्यवहार अधिक पारदर्शक झाले. ग्राहकांना केवळ गाडी विकणे किंवा खरेदी करणेच नव्हे, तर फायनान्स आणि विमा या सेवा देखील एका क्लिकवर मिळतात. कारण CARS24 आता स्वतःची NBFC म्हणजेच बँकेशिवाय आर्थिक सेवा देणारी संस्था आहे. ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन, सहज प्रक्रिया आणि विश्वासार्ह सेवा  हाच त्यांच्या यशाचा खरा मंत्र आहे.

    मित्रांनो, विक्रम चोप्रा यांची प्रेरणादायी कहाणी आपल्याला हे शिकवते की अपयश ही यशाकडे नेणारी पहिली पायरी असते. योग्य कल्पना, सातत्याने केलेली मेहनत आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकते. मोठं स्वप्न आणि ठाम निर्धार असेल, तर CARS24 सारखी युनिकॉर्न कंपनी उभी राहू शकते  आणि त्या वाटचालीत तुमचंही नाव असू शकतं!