Category: बिझनेस महारथी

  • Vandana Luthra: २०,००० रुपयांतून सुरू केलेल्या व्यवसायाचं २५०० कोटी रुपयांचं साम्राज्य

    Vandana Luthra: २०,००० रुपयांतून सुरू केलेल्या व्यवसायाचं २५०० कोटी रुपयांचं साम्राज्य

    स्वप्नांना सत्यात उतरवण्याची मेहनत, चिकाटी आणि जिद्द आवश्यक असते ,असं आपण नेहमीच ऐकत आलो आहोत,आणि वंदना लुथरा यांचा यशस्वी प्रवास हे याच गोष्टींचं उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या प्रवासाने हे सिद्ध करून दाखवलं आहे की, एक स्त्री जी कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही, तिच्या परिश्रमाने VLCC सारख्या मोठ्या कंपनीचं साम्राज्य उभं करू शकते. त्यांच्या संघर्षाची, जिद्दीची आणि चिकाटीची कहाणी आज लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

    आजच्या लेखात आपण वंदना लुथरा यांच्या संघर्ष, जिद्द आणि चिकाटीच्या माध्यमातून उभं केलेल्या यशस्वी व्यवसायाचा प्रवास जाणून घेणार आहोत.

    प्रारंभिक जीवन आणि प्रेरणा

    वंदना लुथरा (Vandana Luthra) यांचा जन्म १२ जुलै १९५९ रोजी दिल्लीमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या आई, डॉ. अरुणा सप्रू, या एक समाजसेविका होत्या आणि गरीब, वंचित लोकांसाठी काम करत होत्या. त्यांनी ‘अमर ज्योती‘ नावाची एक आयुर्वेदिक संस्था स्थापन केली, जी गरजूंसाठी मदतकार्य करत होती . या समाजसेवेचा वंदनांच्या मनावर खोल परिणाम झाला आणि लहानपणापासूनच लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा त्यांना आपल्या आईकडून मिळाली.

    वंदना लुथरा यांना शाळेत असतानाच सौंदर्य, आरोग्य आणि फिटनेस या क्षेत्रांची विशेष आवड होती. या क्षेत्रात काहीतरी मोठं करण्याची त्यांची मनोमन इच्छा होती. मात्र, त्या काळात महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करणं आव्हानात्मक होतं . तरीही, वंदनाने कधीही हार न मानता आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचा निर्धार केला.

    दिल्ली विद्यापीठातून समाजशास्त्रात पदवी घेतल्यानंतर वंदनाने भारतात पोषण आणि कॉस्मेटोलॉजीबाबत असलेल्या उदासीनतेची जाणीव केली. यासाठी त्या पुढील शिक्षणासाठी जर्मनीला गेल्या. तिथे त्यांनी पोषणशास्त्र आणि कॉस्मेटोलॉजीचं सखोल शिक्षण घेतलं. जर्मनीत शिक्षण घेत असताना त्यांनी आरोग्य आणि वेलनेस क्षेत्राचं महत्त्व ओळखलं आणि भारतात या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला.

    व्यवसायाची सुरूवात 

    वंदना लुथरा यांनी १९८९ साली भारतात परतल्यावर  केवळ २०,००० रुपयांच्या भांडवलावर दिल्लीत VLCC (वंदना लुथरा कर्ल्स अँड कर्व्स) ची स्थापना केली. सुरुवातीला वजन कमी करण्याच्या उपचारांवर लक्ष केंद्रित करताना, त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आधुनिक उपकरणांचा वापर करून लोकांच्या आरोग्याला प्राधान्य दिलं .सुरुवातीला दिल्लीच्या सफदरजंग एन्क्लेव्हच्या गजबजलेल्या बाजारात पहिले सेंटर सुरू करताना त्यांनी अनेक आव्हानांचा सामना केला, पण त्यांच्या दृष्टिकोनामुळे लोकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी ठरल्या.

    VLCC ने वजन कमी करण्याच्या वैज्ञानिक पद्धतींबरोबर सौंदर्य सेवांची भर टाकून ग्राहकांची मने जिंकली. वेलनेस क्षेत्रात ग्लॅमरच्या पलीकडे जाऊन त्यांनी आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन दिलं . कठोर परिश्रम, नावीन्य, आणि उच्च गुणवत्तेमुळे VLCC आज एक मोठे नाव बनलं आहे, ज्याने देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपलं स्थान निर्माण केलं आहे.

    सुरुवातीचे आव्हान आणि संघर्ष

    वंदनाला सुरुवातीला त्यांच्या व्यवसायासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ९० च्या दशकात महिलांसाठी व्यवसायात यश मिळवणं अत्यंत कठीण होतं. समाजाच्या पुरुषप्रधान मानसिकतेमुळे, त्यांची कल्पनाही लोकांना आवडत नव्हती, आणि त्यातच डॉक्टरांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीला पाठिंबा देण्यास नकार दिला. मात्र वंदनाने हार मानली नाही, कारण त्यांचा विश्वास खूप दृढ होता.त्यांनी त्यांच्या  कामामध्ये सातत्य ठेवलं. त्यांचं ध्येय होतं एक असा व्यवसाय तयार करणं, जो वैद्यकीय दृष्टिकोनातून कार्यरत राहील, पण त्यासाठी वेळ लागणार होता.

    सुरुवातीला ग्राहक मिळवणं देखील त्यांच्यासाठी मोठं आव्हान होतं. पण त्या कधीही मागे ह्टल्या नाहीत . सतत मेहनत करत राहिल्या आणि आपल्या कल्पनांना प्रगल्भतेच्या दिशेने आकार देत राहिल्या . त्यांच्या या परिश्रमांमुळे त्यांनी एक नवा मार्ग तयार केला. याचा परिणाम त्यांच्या व्यवसायातील गुणवत्तेचा आणि कार्यपद्धतीचा विश्वास ग्राहकांमध्ये वाढला, ज्यामुळे त्यांना यश मिळण्यास सुरुवात झाली 

    यशाच्या शिखरावर 

    १९९० च्या दशकात VLCC चं नाव हळूहळू लोकप्रिय होऊ लागलं. २००० च्या दशकात, VLCC चा वार्षिक महसूल ५० कोटींवर पोहोचला. ग्राहक त्यांच्या उच्च दर्जाच्या सेवांसाठी अधिक पैसे देण्यास तयार होऊ लागले. २००५ मध्ये “जस्सी जैसी कोई नहीं” या मालिकेतील नायिका  जस्सीचं मेकओव्हर केल्यानंतर VLCC चं नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचलं आणि ब्रँड अधिक चर्चेत आला.

    २००५ पासून VLCC ने आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार सुरू केला. आज VLCC १२ देशांमध्ये कार्यरत आहे . २००९ मध्ये Shine या प्रसिद्ध  कंपनीने VLCC मध्ये १४.४ कोटींची गुंतवणूक केली, ज्यामुळे कंपनीचा महसूल १२५ कोटींवर पोहोचला. त्यानंतर VLCC ने २०१० मध्ये भारतात आणि भारताबाहेर  १०० सेंटर्स सुरू केले आणि महिलांना ब्युटी उद्योजक होण्यासाठी प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला.

    Vandana Luthra Success Storyy

    सप्टेंबर २०१३ मध्ये VLCC ने सिंगापूरमधील Gvig कंपनीचा ताबा घेतला आणि सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादन क्षेत्रात पाऊल ठेवलं . त्यानंतर त्यांच्या  हरिद्वार आणि सिंगापूर येथील GMP सर्टिफाइड प्लांट्समधून स्किन, केस आणि बॉडी केअर उत्पादने तयार होऊ लागली. 2023 पर्यंत, VLCC ने २१० सेंटर्स, १०० प्रशिक्षण संस्था आणि ११ देशांमध्ये विस्तार केला आहे . 

    पुरस्कार आणि सन्मान

     २०१० मध्ये वंदना यांना ‘एंटरप्राइझ एशिया वुमन आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं,, तसेच २०१३ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला. २०१६ मध्ये फोर्ब्स आशियाच्या “५० पॉवर बिझनेसवुमन” यादीत त्यांचं स्थान मिळवणं हे त्यांच्या यशाचं प्रतीक आहे.

    वंदना लुथरा यांनी महिलांच्या सशक्तीकरणावर विशेष लक्ष दिलं. आज VLCC मध्ये ७०% कर्मचारी महिला आहेत. त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन आणि आत्मनिर्भर बनवून, त्यांनी महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. या उपक्रमामुळे फक्त महिलांची आर्थिक स्थितीच  सुधारली नाही, तर कंपनीला देखील अधिक यश प्राप्त झालं.

    मित्रांनो ,वंदना लुथरा यांचा संघर्ष आणि यशाचा हा प्रवास आपल्यला शिकवतो  की, मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास असला की कोणतंही स्वप्न शक्य पूर्ण करता येतं . आणि सोबतच त्यांचा हा  प्रवास आपल्याला दाखवतो की, सुरुवात कितीही छोटी असली तरी प्रामाणिक प्रयत्नांनी मोठं यश नक्कीच मिळवता येतं.

    आणखीन वाचा:

  • Qimat Rai Gupta: फक्त १०००० रुपयांपासून व्यवसाय सुरू केला, ९७००० कोटी रुपयांचा ब्रँड बनवला…

    Qimat Rai Gupta: फक्त १०००० रुपयांपासून व्यवसाय सुरू केला, ९७००० कोटी रुपयांचा ब्रँड बनवला… 

    यश मिळवण्यासाठी मोठं शिक्षण, मोठं भांडवल किंवा मोठ्या ओळखीचं नेटवर्क लागतं, असं अनेकजण मानतात. पण काही लोक आपल्या मेहनतीच्या जोरावर हे चुकीचं ठरवतात. त्यापैकीच एक नाव म्हणजे ‘हॅवेल्स’ या जगभर प्रसिद्ध असलेल्या इलेक्ट्रिकल ब्रँडचे शिल्पकार किमत राय गुप्ता. 

    केवळ १०,००० रुपयांपासून सुरू केलेला हा व्यवसाय मेहनत, दूरदृष्टी आणि योग्य निर्णयांच्या जोरावर एका मोठ्या ब्रँडमध्ये रूपांतरित झाला. उत्कृष्ट उत्पादने, ग्राहकांचे समाधान आणि सुयोग्य व्यवस्थापन यामुळे हॅवेल्सने विश्वासार्हता मिळवली आणि आज तो जगभर लोकप्रिय ब्रँड म्हणून ओळखला जातो. मात्र, हे यश सहज मिळालं नाही. त्यामागे संघर्ष, कठोर मेहनत आणि ध्येयासाठी दिलेली अनेक वर्षे आहेत. या लेखात आपण त्यांचा हा शून्यातून शिखरापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत.

    बालपण आणि सुरुवातीचा प्रवास 

    किमत राय गुप्ता यांचा जन्म १९३७ साली तत्कालीन अविभाजित पंजाबमधील एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. लहानपणापासूनच भारतीय तत्त्वज्ञान, विशेषतः भगवद्गीतेच्या शिकवणींचा त्यांच्या विचारांवर खोल प्रभाव पडला. शिक्षण घेत असतानाच त्यांना जाणवलं की, परिस्थिती बदलायची असेल, तर स्वतःच स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागेल. घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी मोठं करण्याची जिद्द त्यांच्या मनात होती. त्यांनी निर्धार केला की केवळ शिक्षणावर अवलंबून न राहता, स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन करायचं.

    १९५८ साली, वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून दिल्ली गाठली. त्यांच्याकडे १०,००० रुपये होते आणि मनात असंख्य स्वप्नं आणि पुढे जाण्याची अपार जिद्द होती. दिल्लीत पोहोचल्यावर त्यांनी भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिकल मार्केट, भागीरथ पॅलेसमध्ये गुप्ताजी अँड कंपनी नावाने एक छोटंसं दुकान सुरू केलं. सुरुवातीला व्यवसाय छोटा होता, पण मेहनत, जिद्द आणि योग्य दृष्टिकोन यांच्या जोरावर त्यांनी हळूहळू बाजारात आपली ओळख निर्माण केली.

    व्यवसाय उभारणीची खडतर वाटचाल

    सुरुवातीला किमत राय गुप्तांनी छोटे-छोटे इलेक्ट्रिकल पार्ट्स विकण्यास सुरुवात केली. ते स्वतः दुकानात बसून ग्राहकांशी संवाद साधायचे, त्यांची गरज समजून घ्यायचे आणि अनेकदा त्यांच्यासाठी वस्तू दुरुस्तही करायचे. त्यांच्या मेहनतीमुळे ग्राहकांचा विश्वास वाढू लागला. त्यांनी केवळ व्यापार केला नाही, तर नातेसंबंध जपले आणि विश्वासार्हता निर्माण केली. सातत्यपूर्ण मेहनतीमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला, आणि त्यांचा व्यवसायही विस्तारू लागला.

    १९७१ हे वर्ष किमत राय गुप्ता यांच्या आयुष्याला एक महत्त्वपूर्ण वळण देणारं ठरलं. दिल्लीतील व्यापारी हवेली राम गांधी आर्थिक अडचणीत सापडले होते आणि त्यांना आपली ‘हॅवेल्स’ (Havells) कंपनी विकावी लागणार होती. ही संधी ओळखून किमत राय गुप्तांनी मोठ्या जिद्दीने ७ लाख रुपये उभे करून ‘हॅवेल्स’ विकत घेतली. मात्र, कंपनीची स्थिती अत्यंत खराब होती. उत्पादन, व्यवस्थापन आणि बाजारातील ओळख या सर्वच बाबतीत मोठ्या अडचणी होत्या. पण किमत राय गुप्ता हार मानणारे नव्हते. त्यांनी अपार मेहनत, योग्य नियोजन आणि चिकाटीच्या जोरावर ‘हॅवेल्स’ला पुन्हा उभं करण्याचा निर्धार केला.

    हॅवेल्सचं नव्या दमाचं नवं रूप! 

    किमत राय गुप्तांनी ‘हॅवेल्स’ विकत घेतल्यानंतर तिच्या प्रत्येक गोष्टीत सुधारणा करण्यासाठी अपार मेहनत घेतली. त्यांनी केवळ स्विचेसपुरते उत्पादन मर्यादित न ठेवता विविध उत्पादनांची भर घातली. केबल्स, फॅन्स, लाईटिंग, गिझर, किचन अप्लायन्सेस यांसारख्या अनेक इलेक्ट्रिकल वस्तूंचा समावेश करून कंपनीला नव्या उंचीवर नेलं.

    ते केवळ व्यवसाय वाढवत नव्हते, तर एक विश्वासार्ह ब्रँड तयार करत होते, जिथे गुणवत्ता, ग्राहक सेवा आणि इनोव्हेशन यांचा उत्तम समतोल होता. त्यांनी भारतभर उत्पादन केंद्रं स्थापन केली आणि प्रत्येक ठिकाणी जागतिक दर्जाचं उत्पादन हेच उद्दिष्ट ठेवलं. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे हॅवेल्सने इलेक्ट्रिकल क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. 

    हॅवेल्स भारतातील मार्केट लीडर बनली, पण हे फक्त उत्पादनामुळे झालं नाही. किमत राय गुप्तांनी ब्रँड बिल्डिंग आणि मार्केटिंगलाही तितकंच महत्त्व दिलं. प्रभावी जाहिराती, इनोव्हेटिव्ह कॅम्पेन्स आणि ग्राहकांशी थेट संवाद यामुळे हॅवेल्सची ओळख संपूर्ण देशभर पोहोचली. त्यांच्या योजनाबद्ध धोरणांमुळे हॅवेल्स केवळ एक उत्पादन करणारी कंपनी न राहता घराघरात विश्वासाने वापरण्यात येणारा ब्रँड बनली.

    आजचं हॅवेल्स (Havells)

    आज हॅवेल्स केवळ एक इलेक्ट्रिकल कंपनी नसून भारताच्या औद्यगिक विकासाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. ५०,००० हून अधिक डीलर नेटवर्क, १३ अत्याधुनिक उत्पादन केंद्रं आणि ७० पेक्षा जास्त देशांमध्ये आपली उपस्थिती ठेवत हॅवेल्सने जागतिक स्तरावरही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ग्राहकांचा विश्वास आणि सतत नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब या जोरावर हा ब्रँड प्रत्येक घरात पोहोचला आहे.

    Qimat Rai Gupta

    किमत राय गुप्तांनी आपल्या व्यवसायात कुटुंबालाही सहभागी करून घेतलं. १९९२ साली त्यांचा मुलगा अनिल राय गुप्ता कंपनीत सामील झाला. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसायाचे बारकावे शिकत त्याने हॅवेल्ससाठी नव्या युगाची वाट तयार केली. २००७ साली, अनिल राय गुप्तांनी जर्मनीतील प्रसिद्ध ‘सिल्व्हेनिया’ लाइटिंग कंपनीचं अधिग्रहण केलं. हा हॅवेल्सच्या आंतरराष्ट्रीय विस्तारातील सर्वात मोठा टप्पा ठरला. २००८ च्या जागतिक आर्थिक मंदीच्या काळातही त्यांनी हॅवेल्सला स्थिर ठेवत व्यवसाय अधिक मजबूत केला.

    २०१४ साली, वयाच्या ७७व्या वर्षी किमत राय गुप्तांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मात्र, त्यांनी मागे केवळ एक यशस्वी व्यवसाय नाही , तर एक मजबूत मूल्यव्यवस्था आणि लाखो लोकांसाठी प्रेरणादायी वारसा ठेवला. त्यांच्या मृत्युसमयी त्यांची संपत्ती २ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होती. 

    मित्रांनो, हॅवेल्स ही केवळ एक ब्रँडची गोष्ट नाही, तर ती एका सामान्य माणसाच्या स्वप्नाची, त्याच्या परिश्रमांची आणि अपार चिकाटीची कहाणी आहे. किमत राय गुप्ता यांनी एका छोट्याशा दुकानातून सुरू केलेला प्रवास, आज कोट्यवधी ग्राहकांच्या विश्वासाचा आधार बनला आहे. 

    आणखीन वाचा:

  • ॲपलची नोकरी सोडली, लोकांनी वेड्यात काढलं… आज उभा केलाय ९१०० कोटींचा व्यवसाय!

    ॲपलची नोकरी सोडली, लोकांनी वेड्यात काढलं… आज उभा केलाय ९१०० कोटींचा व्यवसाय!

    आजच्या काळात अनेक तरुण मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेत आहेत आणि त्यात मोठे यश मिळवत आहेत. नोकरीची सुरक्षितता सोडून व्यवसायात उतरणं म्हणजे मोठा धोका पत्करणं, पण ज्या लोकांकडे नवीन कल्पना आणि प्रबळ इच्छाशक्ती असते, ते या प्रवासात यशस्वी ठरतात. अशाच एका जिद्दी तरुणाची गोष्ट म्हणजे ‘अपना’ ॲप या कंपनीचे संस्थापक निर्मित पारेख यांची.

    व्यवसाय सुरू करणं सोपं नव्हतं, त्यात अनेक अडथळे होते. पण त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि “अपना” ही कंपनी सुरू केली. आज या कंपनीचं बाजारमूल्य ९१०० कोटी रुपयांपर्यंत वाढलं आहे. निर्मित पारेख यांचा हा प्रवास केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर हजारो तरुणांसाठीही प्रेरणादायी आहे. आजच्या लेखात आपण त्यांच्या या प्रवासाविषयी सविस्तर जाणून घेऊया.

    बालपणापासून तंत्रज्ञानाची आवड

    निर्मित पारेख यांचा जन्म मुंबईतील एका सर्वसाधारण व्यावसायिक कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना तंत्रज्ञानाची विशेष आवड होती. वयाच्या केवळ व्या वर्षीच त्यांनी एक डिजिटल घड्याळ तयार केले, तर १३ व्या वर्षी रोबोटिक्स प्रोग्रामिंग शिकण्यास सुरुवात केली. बालपणातच त्यांनी विविध तांत्रिक प्रयोग केले आणि तंत्रज्ञानाच्या गूढ विश्वात स्वतःला झोकून दिले. नवनवीन शोध लावण्याची त्यांची वृत्ती आणि तंत्रज्ञान समजून घेण्याची उत्सुकता यामुळे ते सतत काहीतरी नवीन शिकत राहिले.

    पुढे शिक्षणासाठी त्यांनी गुजरातमधील प्रसिद्ध निरमा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्रवेश घेतला आणि बी. टेक. पूर्ण केले. या काळात त्यांनी विविध प्रोजेक्ट्सवर काम केले आणि तंत्रज्ञानाचा अधिक मन लावून अभ्यास केला. शिक्षण संपल्यानंतर त्यांनी आपल्या करिअरची स्पष्ट दिशा ठरवली आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याचा निर्धार केला. 

    पहिले स्टार्टअप आणि व्यावसायिक सुरुवात

    निर्मित पारेख यांनी कॉलेजमध्ये असतानाच ‘इंकॉन टेक्नॉलॉजीज’ नावाचे स्टार्टअप सुरू केले, जे पूर व्यवस्थापनासाठी उपाययोजना विकसित करत होते. लहान वयातच मोठ्या समस्यांवर उपाय शोधण्याची त्यांची प्रवृत्ती होती. बी. टेक पूर्ण केल्यानंतर त्यांनी’“क्रक्सबॉक्स’ नावाची दुसरी कंपनी सुरू केली, जी डेटा अ‍ॅनालिटिक्स क्षेत्रात काम करत होती.

    त्यांची मेहनत, कल्पकता आणि तांत्रिक कौशल्य पाहून ‘इंटेल’ या आंतरराष्ट्रीय कंपनीने क्रक्सबॉक्स विकत घेतले आणि त्यांना नोकरीची संधी दिली. इंटेलमध्ये त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आणि डेटा अ‍ॅनालिटिक्स विभागाचे संचालकपद मिळवले. तिथे त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत कंपनीच्या वाढीमध्ये मोठा वाटा उचलला.

    उच्च शिक्षण आणि ॲपलमधील नोकरी

    निर्मित पारेख यांनी पुढे प्रसिद्ध स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले. या शिक्षणामुळे त्यांना जागतिक बाजारपेठ, व्यवसायातील नवे ट्रेंड्स आणि इनोव्हेशन यांचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळाली. एमबीएनंतर त्यांनी ॲपल  कंपनीत प्रवेश केला ,तिथे त्यांनी ‘आयफोन प्रॉडक्ट अँड स्ट्रॅटेजी टीम’ मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. 

    मुंबईतील एका साध्या कुटुंबात जन्मलेले निर्मित ॲपल सारख्या मोठ्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते. मोठ्या पगाराची नोकरी असूनही त्यांना समाधान नव्हते, कारण त्यांची खरी ओढ स्वतःचा व्यवसाय उभा करण्याकडे होती. 

    ‘अपना’ अ‍ॅपची संकल्पना आणि संघर्ष

    अ‍ॅपलमध्ये काम करत असताना, निर्मित पारेख यांनी असंगठित क्षेत्रातील मोठी अडचण ओळखली. ब्लू-कॉलर नोकऱ्यांसाठी कोणतेही प्रभावी व्यासपीठ नव्हते. त्यामुळे कामगार (employee) आणि नियोक्ते (employer) यांच्यात मोठी दरी निर्माण झाली होती. ही समस्या सोडवण्याचा निर्धार करत त्यांनी २०१९ मध्ये ‘अपना’ अ‍ॅप सुरू करण्यासाठी अ‍ॅपलसारखी मोठी नोकरी सोडली. त्यांच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली, काहींनी त्यांना वेड्यात काढले, पण त्यांनी कोणाच्याही मतांची पर्वा न करता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले.

    व्यवसाय सुरू करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मोठ्या कंपनीतील सुरक्षित नोकरी सोडून स्वतःचा मार्ग निर्माण करणे सोपे नव्हते. समाजातील अनेकांनी त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, पण त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ‘अपना’ ला यश मिळवून दिले. 

    यशाच्या शिखरावर 

    कोरोना काळात ‘अपना’ ॲपने मोठी झेप घेतली. अवघ्या २२ महिन्यांत ते १.१ अब्ज डॉलर (९१०० कोटी रुपये) बाजारमूल्य असलेलं युनिकॉर्न स्टार्टअप बनलं! आज अनअकॅडमी, बिगबास्केट, व्हाईटहॅट ज्युनिअर, फ्लिपकार्ट यांसारख्या १.५ लाखांहून अधिक कंपन्या यावर नोंदणीकृत आहेत. लाखो कामगारांना या प्लॅटफॉर्ममुळे रोजगाराच्या संधी मिळाल्या.

    निर्मित पारेख यांची कहाणी चिकाटी, मेहनत आणि दृढ निश्चयाचा एक उत्तम आदर्श आहे. त्यांच्या जिद्दीमुळे आज ‘अपना’ लाखो लोकांचे करिअर घडवत आहे. जर तुमच्याकडे कल्पना, जिद्द आणि मेहनतीची तयारी असेल, तर तुम्हीही मोठं यश मिळवू शकता! 🚀

    आणखीन वाचा:

  • Referrush Success Story: लकवा झाला… पण आज कमवतो रोज दीड लाख रुपये!

    Referrush Success Story: लकवा झाला… पण आज कमवतो रोज दीड लाख रुपये!

    यशाचा मार्ग कधीच सोपा नसतो. त्यात मेहनत, संघर्ष आणि जिद्द असते. प्रत्येकजण या मार्गावर यशस्वी होतोच असं नाही, पण काही जण अपयशाला न जुमानता पुढे जातात आणि स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात. विक्रम पै हे या गोष्टीचं उत्तम उदाहरण आहे.

    बंगळुरूमधील हा तरुण उद्योजक आज ReferRush या प्रसिद्ध ई-कॉमर्स रेफरल सेल्स प्लॅटफॉर्मचा संस्थापक आणि सीईओ आहे. पण त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. गेल्या सहा वर्षांत त्याने पाच व्यवसाय सुरू केले, पण त्यातला एकही यशस्वी झाला नाही. त्यामुळे त्याला तब्बल दोन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावं लागलं. तरीही त्याने हार मानली नाही. प्रत्येक अपयशातून शिकत, जिद्दीने पुढे जात अखेर ReferRush हा यशस्वी व्यवसाय उभारला. आज तो केवळ एक यशस्वी उद्योजक नाही, तर चिकाटी आणि मेहनतीचं उत्तम उदाहरण आहे. या लेखात आपण त्याच्या संघर्षमय प्रवासावर एक नजर टाकूया.  

    सुरुवातीचा संघर्ष आणि सलग अपयश

    बंगळुरूमध्ये जन्मलेल्या विक्रमने शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोठ्या आत्मविश्वासाने आणि उत्साहाने उद्योजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्याची स्वप्नं मोठी होती, यशस्वी होण्याची जिद्दही होती. मात्र, व्यवसायाच्या वाटचालीत अनेक अडथळे आले. अनुभव आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्याने सुरू केलेले एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच व्यवसाय अपयशी ठरले. सततच्या अपयशामुळे मोठं आर्थिक संकट कोसळलं. त्याला जवळपास दोन कोटी रुपयांचं नुकसान झालं. परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत गेली. मित्रांनी दुरावा निर्माण केला, नातेवाईक टीका करू लागले आणि आईचाही त्याच्यावरचा विश्वास कमी झाला. एका क्षणाला परिस्थिती अशी आली की, खिशात फक्त ४,००० रुपये उरले. कर्मचाऱ्यांना पगार देणेही शक्य नव्हते. काही जणांनी त्याची थट्टा केली. “एलन मस्क बनायचा प्रयत्न करतोय का?” असे टोमणे मारले.

    सततच्या तणावाचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर झाला. मानसिक तणावामुळे शरीर साथ सोडू लागलं. अखेर त्याला लकवा झाला आणि त्याचे चालणे, बोलणेही कठीण झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यासारखी वाटू लागली. तो खचला, रडला, पण हार मानली नाही. डोळ्यांतले स्वप्न जिवंत ठेवत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. या कठीण काळात स्वतःशीच लढण्याचा निर्धार केला आणि नव्या उर्जेने पुन्हा उभं राहण्याचा निश्चय केला.

    ReferRush ची स्थापना आणि पहिलं यश

    अनेक अपयशांनंतरही विक्रमने हार मानली नाही. नव्या उमेदीनं त्याने ReferRush या रेफरल मार्केटिंग प्लॅटफॉर्मची सुरुवात केली. सुरुवातीला हा व्यवसायही अपयशी ठरेल, असं अनेकांना वाटत होतं. पण यावेळी विक्रम मागे हटणार नव्हता. ReferRush व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांच्या माध्यमातून नवीन ग्राहक मिळवण्यासाठी मदत करतं. ग्राहक कंपनीच्या उत्पादनांची माहिती इतरांना सांगतात आणि त्याबदल्यात त्यांना कमिशन मिळतं. त्यामुळे कंपन्यांना विश्वासार्ह ग्राहक मिळतात, तर ग्राहकांनाही घरबसल्या कमाईचा पर्याय उपलब्ध होतो. हळूहळू हा व्यवसाय स्थिरावत गेला आणि ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला.

    सुरुवातीला पहिल्या एक लाख रुपयांसाठी तब्बल चार महिने लागले. पण विक्रमने मेहनत आणि जिद्द कायम ठेवली. त्याच्या प्रयत्नांचा परिणाम दिसू लागला आणि आज ReferRush दररोज १.५ लाख रुपये कमवतो. अपयशाच्या काळात खचून न जाता ज्या चिकाटीने विक्रमने प्रयत्न सुरू ठेवले, त्याच जिद्दीमुळे त्याला यशाचा हा टप्पा गाठता आला.

    निखील कामतकडून ReferRush ला फंडिंग – यशाच्या नव्या पर्वाची सुरुवात

    विक्रमच्या अथक मेहनतीला अखेर मोठं यश मिळालं. त्याच्या ReferRush या रेफरल मार्केटिंग स्टार्टअपने उद्योगविश्वात ठसा उमटवायला सुरुवात केली होती. याच प्रवासात, भारतातील नामवंत उद्योजक निखील कामत यांच्या कंपनीने ReferRush ला इनिशिएटिव्ह फंडिंगसाठी निवडलं. तब्बल २,४०० कंपन्यांमधून ReferRush ची निवड होणं हे विक्रमसाठी एका मोठ्या यशाचं प्रतीक होतं. यामुळे केवळ आर्थिक पाठबळच नाही, तर या प्लॅटफॉर्मच्या भविष्यासाठीही एक मजबूत दिशा मिळाली. आता त्याला ठाम विश्वास आहे की, लवकरच प्रत्येक ई-कॉमर्स ब्रँड आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी ReferRush चा वापर करेल.

    2

    विक्रमच्या मते, त्याचा संपूर्ण प्रवास हा शिकण्याचा होता. सुरुवातीची पाच वर्षं त्याने प्रयोग आणि चुका यातून शिकण्यात घालवली. अपयश आलं तरीही आत्मविश्वास कधीही गमावला नाही. व्यवसायात संकटं आली, आर्थिक तोटा सहन करावा लागला, शारीरिक आणि मानसिक त्रासही सोसावा लागला. पण तरीही तो जिद्दीने लढत राहिला. त्याच्या मते, “जर तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण होत असतील, तर तुम्ही तुमचं स्वप्न नक्कीच साकार करू शकता.”

    आज विक्रमच्या संघर्षाची कहाणी हजारो तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अपयशाला घाबरून थांबण्यापेक्षा त्यातून शिकून पुढे जाणं हेच यशाचं खरं रहस्य आहे. विक्रमने ते करून दाखवलं. 

    आणखी वाचा:

  • जाणून घ्या विमा क्षेत्रातील डिजिटल क्रांतीचे शिल्पकार वरुण दुआ यांचा प्रवास | Acko General Insurance

    जाणून घ्या विमा क्षेत्रातील डिजिटल क्रांतीचे शिल्पकार वरुण दुआ यांचा प्रवास | Acko General Insurance

    यश मिळवायचं असेल; तर जिद्द, मेहनत आणि योग्य दिशा असणं गरजेचं असतं. जिद्द मेहनतीला साथ देते, तेव्हा कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येतं. भारतीय विमा क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवणारे अग्रगण्य युवा उद्योजक वरुण दुआ हे या गोष्ट्टीचं उत्तम उदाहरण आहेत. पारंपरिक विमा क्षेत्रातील जटिल प्रक्रिया सोप्या आणि सुलभ करण्याचं त्यांनी स्वप्न पाहिलं. त्यांच्या दूरदृष्टीमुळे विमा घेण्याची संकल्पना आणि प्रक्रिया संपूर्ण बदलली.

    ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी Acko General Insurance या पूर्णतः डिजिटल विमा कंपनीची स्थापना केली. पारंपरिक विमा कंपन्यांमध्ये अनेक टप्पे, कागदपत्रांची आवश्यकता आणि वेळखाऊ प्रक्रिया असते. याउलट, Acko ने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विमा प्रक्रिया सुलभ केली. ग्राहकांना जलद आणि पारदर्शक सेवा मिळावी यासाठी कंपनीने डिजिटल माध्यमातून थेट विमा पॉलिसी देण्याचा निर्णय घेतला. 

    वरुण दुआ यांचा प्रवास संघर्ष, नाविन्य आणि चिकाटीने भरलेला आहे. त्यांनी कठोर परिश्रम, नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विमा क्षेत्रात नवी क्रांती घडवली. चला, त्यांच्या जीवनप्रवासाचा आणि उद्योजकीय यशाचा आढावा या लेखातून घेऊया.

    प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

    वरुण दुआ यांचा जन्म १९८१ मध्ये दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील चंदर मोहन दुआ हे सरकारी कंपनीत अधिकारी होते, तर आई रश्मी दुआ या सरकारी शाळेच्या प्राचार्या होत्या. शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या या कुटुंबात वरुण यांना लहानपणापासूनच नवीन गोष्टी शिकण्याची आवड होती, ज्यामुळे त्यांचा अभ्यासात चांगला सहभाग असायचा.

    त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील वांद्रे-जुहू परिसरातील शाळेत झालं. पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली आणि त्यानंतर MICA (Mudra Institute of Communications, Ahmedabad) मधून मार्केटिंग आणि कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. या शिक्षणामुळे त्यांना मार्केटिंग आणि ब्रँडिंग यांचं सखोल ज्ञान मिळालं, जे त्यांना पुढे विमा क्षेत्रात नवे प्रयोग करण्यासाठी उपयोगी ठरलं.

    करिअरची सुरुवात

    MICA मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वरुण दुआ यांनी आपल्या करिअरची सुरुवात Leo Burnett या जगप्रसिद्ध जाहिरात कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून केली. त्यांच्या कुटुंबाला नेहमीच त्यांच्यासाठी स्थिर आणि सुरक्षित नोकरी हवी होती, म्हणूनच त्यांनी सुरुवातीला नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मार्केटिंग आणि ब्रँडिंग क्षेत्रातील आपल्या ज्ञानाचा उपयोग करत त्यांनी पुढे टाटा AIG लाइफ इन्शुरन्स आणि फ्रँकलिन टेम्पलटन इन्व्हेस्टमेंट्स यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम केलं. या कंपन्यांमध्ये काम करत असताना त्यांना विमा उद्योगातील कार्यपद्धती, ग्राहकांच्या गरजा आणि उद्योगाच्या मर्यादा यांची सखोल माहिती आणि समज मिळाली.

    httpswww.google.comurlsaiurlhttps3A2F2Fwww.indiamart.com2Fproddetail2Facko insurance software 2854200953088.htmlpsigAOvVaw02JTUsY7hzvsu SuP8ItcNust1739698632479000sourceimagescdvfe

    या अनुभवातून त्यांना लक्षात आलं की विमा खरेदी प्रक्रिया अत्यंत जटिल, वेळखाऊ आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे ग्राहकांसाठी त्रासदायक आहे. अनेक ग्राहकांना विमा पॉलिसी समजण्यात अडचण येत होती, तर काहींना क्लेम प्रक्रिया खूप वेळ घेणारी आणि कठीण वाटत होती. ही समस्या सोडवण्यासाठी काहीतरी नवीन आणि ग्राहकांसाठी सुरळीत प्रक्रिया निर्माण करणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी परंपरागत विमा उद्योगाला डिजिटल युगाशी जोडण्याचा संकल्प केला आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा दृढ निश्चय केला.

    व्यवसायाची सुरुवात आणि सुरुवातीचा संघर्ष 

    २०१६ मध्ये वरुण दुआ यांनी ACKO General Insurance ची स्थापना केली. ही भारतातील पहिली पूर्णतः डिजिटल विमा कंपनी आहे. “शून्य कमिशन, शून्य कागदपत्रे” या संकल्पनेने सुरू झालेल्या ACKO ने “फुल पैसा वसूल” या मोहिमेच्या माध्यमातून लोकांचं लक्ष वेधून घेतलं.

    ACKO ने विमा क्षेत्रात एक नवा बदल घडवला. पारंपरिक विमा कंपन्यांच्या जटिल आणि वेळखाऊ प्रक्रियांमुळे ग्राहकांना अडचणी येत होत्या. मात्र, ACKO ने डिजिटल आणि सोपी विमा सेवा उपलब्ध करून हे आव्हान सोडवलं. मोठ्या खर्चाशिवाय, त्यांनी परवडणाऱ्या आणि सहज समजणाऱ्या विमा पॉलिसी ग्राहकांसाठी तयार केल्या. AI आणि डेटा-ड्रिव्हन तंत्रज्ञानाचा वापर करून, त्यांनी विमा मंजुरी आणि क्लेम प्रक्रिया जलद आणि पारदर्शक केली.

    ACKO ने ओला, अमेझॉन, रेडबस, बायजूस यांसारख्या मोठ्या ब्रँडसोबत भागीदारी करून विमा सेवा अधिक सोपी केली. त्यांच्या उत्तम ग्राहक सेवेमुळे, ACKO भारतातील युनिकॉर्न कंपन्यांपैकी एक बनली आहे. आज ACKO फक्त वाहन आणि आरोग्य विमाच नाही, तर जीवन विमाही प्रदान करते, त्यामुळे ग्राहकांचा विश्वास आणि कंपनीचा विस्तार सातत्याने वाढत आहे.

    ACKO चा यशस्वी प्रवास

    ACKO ने आपल्या अभिनव दृष्टिकोनामुळे कमी वेळात मोठं यश मिळवलं. २०१८ मध्ये IRDAI कडून अधिकृत परवानगी मिळवल्यानंतर, कंपनीने वेगाने विस्तार केला. २०२१ मध्ये $२५५ मिलियन गुंतवणूक फंड उभारून, त्यांनी डिजिटल विमा क्षेत्रात आपलं स्थान अधिक मजबूत केलं. या यशामुळे २०२४ मध्ये ACKOचे मूल्यांकन $१.१ अब्ज डॉलर्स (सुमारे ९,००० कोटी रुपये) ओलांडले आणि कंपनीने भारतातील टॉप युनिकॉर्न स्टार्टअप्समध्ये स्थान मिळवलं.

    ACKO चे संस्थापक वरुण दुआ यांनी २०२३ मध्ये शार्क टँक इंडिया या प्रसिद्ध रियॅलिटी शोच्या सीझन मध्ये परीक्षक म्हणून सहभाग घेतला. अनेक तरुण उद्योजकांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांना आर्थिक मदतही दिली. त्यांची व्यवसायवाढीतील दूरदृष्टी आणि ग्राहक-केंद्रितता ACKO च्या यशाचा मुख्य आधार आहे.

    आणखीन वाचा:

  • Shiv Nadar Success Story | केवळ लाखभर रुपये गुंतवून सुरु केलेला व्यवसाय आज पोहोचलाय सात समुद्रापार

    Shiv Nadar Success Story | केवळ लाखभर रुपये गुंतवून सुरु केलेला व्यवसाय आज पोहोचलाय सात समुद्रापार

    या जगात वावरणाऱ्या कुणालाही मेहनतीशिवाय फळ मिळालेलं नाही, त्यामुळे जर का कुणाच्या यशाकडे पाहत अचंबित होत असाल, तर त्यामागे असणाऱ्या खडतर वाटचालीकडे सुद्धा नक्कीच लक्ष द्या. आज आम्ही देखील अशाच एका खेडेगावातून आलेल्या बिझनेस महारथीची गोष्ट तुमच्यासमोर उलगडून दाखवणार आहोत… 

    शिव नादर : जन्म आणि शिक्षण

    तुम्ही HCL Technologies या कंपनीबद्दल ऐकून आहात का? याच कंपनीचे मालक म्हणजे शिव नादर, ज्यांचा जन्म १४ जुलै १९४५ रोजी तामिळनाडू मधल्या तुतीकुडी जिल्ह्यातील मूलयपोजी नावाच्या एका छोट्या गावात झाला. दक्षिण भारतातील एका लहानशा गावात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले शिव नादर हे आत्ताच्या घडीला भारतीय  IT क्षेत्रातील दिग्गजांपैकी एक बनले आहेत. बालपणापासूनच शिक्षणाची आवड असलेल्या शिव नाडार यांनी शिक्षणात बाजी मारत इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची (Electrical and Electronics Engineering) पदवी मिळवली. पदवी मिळवल्यानंतर आपण जसं नोकरी करण्याचा निर्णय घेतो, त्याप्रमाणेच  शिव नाडार यांनी देखील नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि वयाच्या २२व्या वर्षी पुण्यातील वालचंद ग्रुप ऑफ इंजिनियरिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. 

    नोकरी ते व्यवसायाचा प्रवास:

    अनेकवेळा आपण एखादं काम करत असतो, मात्र त्यात खुश असत नाही किंवा आपल्या इच्छा-आकांशा पूर्ण न झाल्याने केलेल्या कामातून म्हणावा तसा आनंद मिळत नाही. शिव नाडार यांच्या बाबतीतही काही अंशी असंच घडलं. त्यांना नेहमीच स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची तीव्र इच्छा होती. जेव्हा आपण मनात तीव्र इच्छा बाळगतो तेव्हा कितीही खडतर प्रवास करण्याची, मेहनत घेण्याची आपली तयारी असते. शिव नाडार याच विचारसरणीचे असल्याने कामाच्या अनुभवाची पुंजी सोबत घेऊन त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय पक्का केला. या प्रवासात त्यांना काही मित्रांची सोबत लाभली जे देखील चौकटीच्या बाहेर जात  काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात होते. समविचारी माणसांनी एकत्र येणं हा त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला आणि वर्ष १९७६ मध्ये पाच मित्रांनी सोबत येऊन मायक्रोकॉम्प नावाची कंपनी उभारली, ही कंपनी त्या काळात कॅल्क्युलेटर विकण्याचे काम करायची. 

    काही वर्षांच्या मेहनतीनंतर याच कंपनीचं  रूपांतर हिंदुस्थान कम्प्युटर्स लिमिटेडमध्ये (Hindustan Computers Limited) करण्यात आलं, ज्याला आपण HCL Technologies म्हणून ओळखतो. काही कारणास्तव त्यावेळी IMB सारख्या दिग्गज कंपनीला भारतातून काढता पाय घ्यावा लागला होता आणि हीच संधी नादरआणि समूहासाठी महत्वाची ठरली. व्यावसायिकाचे सर्व गुण घेऊन जन्मलेल्या नादर यांनी मिळालेल्या संधीचं सोन्यात रूपांतर केलं आणि IMB च्या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढली. केवळ १,८७,ooo रुपयांच्या गुंतवणुकीमधून सुरु झालेल्या HCL ला पुढे राज्य सरकारकडून २० लाख रुपयांची आर्थिक मदत पुरवण्यात आली आणि बदल्यात सरकारने कंपनीचा २६ टक्के वाटा मिळवला. 

    वर्ष १९७८ मध्ये HCL कडून पहिला वाहिला पर्सनल कंप्युटर (Personal Computer/ PC) बाजारात आणण्यात आला आणि हा अनोखा बदल संपूर्ण बाजारपेठेसाठी महत्वाचा ठरला. HCL Technologies यशाची शिखरं काबीज करत असतानाच शिव नादर यांनी फार इस्ट कम्प्युटर्स (Far East Computers) नावाची आणखीन एक कंपनी सुरु करत आंतराष्ट्रीय व्यवसायाचा श्रीगणेशा केला. १९८० मध्ये याच कंपनीच्या माध्यमातून नाडार सिंगापूरमध्ये IT Hardware विकायचे. तुम्हाला माहिती आहे का त्यावेळी फक्त एक वर्षाच्या व्यवसायातून शिव नादर यांच्या कंपनीचे मूल्य ३ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले होते. देशात आणि परदेशात नाव कमावत असलेल्या नादर यांनी इथून मात्र कधीच मागे वळून पाहिलं नाही. वर्षांची  मेहनत आणि कष्टांच्या जोरावर त्यांनी  जागतिक पातळीवरील ‘फोर्ब्स’ (Forbes) च्या यादीत अनेकवेळा नाव पटकावलं. शिव नादर यांची मेहनत आणि सोबत असेल्या मंडळींची साथ यामुळे आज HCL ला केवळ एक कंपनी म्हणून नाही, तर ब्रँड म्हणून ओळखलं जातं.

    फोर्ब्सच्या यादीनुसार शिव नादर हे भारतातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांची एकूण संपत्ती ३३.६ बिलियन डॉलर्सच्या घरात पोहोचली आहे. आशिया खंडात श्रीमंत व्यक्तींमध्ये नादर यांचा ९ वा, तर जागतिक स्तरावर ४५ वा क्रमांक लागतो म्हणूनच शिव नादर हे नाव आज केवळ भारताच्या व्यावसायिक क्षेत्रातच नाही, तर जगभरात पसरलं आहे. तसेच त्यांच्या नेतृवाखाली HCL ने जगभरातील ४४ विविध देशांमध्ये विस्तार केला आहे. कैक वर्ष मेहनत केल्यानंतर काही काळापूर्वीच त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र ते नेहमी म्हणतात की, “प्रत्येक माणसाने लक्ष ठरवण्यासाठी स्वप्न पाहिलं पाहिजे, कारण स्वप्न  पाहिल्याशिवाय लक्ष ठरवता येत नाही आणि ज्याने लक्षच ठरवलेलं नाही, तो यश संपादन करू शकत नाही.” नादर हे अध्यक्षपदावरून बाजूला झाल्यानंतर आता त्यांची मुलगी रोशनी नादर-मल्होत्रा कंपनीच्या अध्यक्षपदाची जवाबदारी सांभाळते, तसेच शिव नादर हे आजही व्यवस्थापकीय संचालक म्हणून कायम कार्यरत आहेत. 

    शिव नादर यांनी लहानपणी हलाखीचे दिवस सोसले होते, घरची आर्थिक परिस्थिती काही खास चांगली नव्हती.  मात्र कधीही त्यांनी स्वतःच्या परिस्थितीला दोष दिला नाही, याउलट सतत मेहनत करत परिस्थितीवर मात करण्याची जिद्ध उराशी बाळगली. शिक्षण घेत असताना त्यांना अनेक  हालअपेष्टा सोसाव्या लागल्या तरीही खचून न जाता एका शाळेतून दुसऱ्या शाळेत बदली करत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण संपलं तरीही समोर उभी ठाकलेली आव्हानं काही संपण्याचं नाव घेत नव्हती. हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करत इथवर आल्यांनतर, नोकरीमधून काहीशी रक्कम मिळायची. मात्र मिळणाऱ्या पैशांकडे दुर्लक्ष करत स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेणं देखील सोपं नव्हतं. सर्वात महत्वाचं म्हणजे त्याकाळात भारतात कम्प्युटर्स बद्दल अधिक माहिती उपलब्ध नव्हती,लोकांना माहिती नसलेल्या वस्तूची विक्री करणं आणि स्पर्धात्मक वातावरणात नवख्या माणसाने व्यवसाय सुरु करणं  ही वाटते तेवढी साधी आणि सोपी गोष्ट नाही. 

    शिशिव नादर यांचे सामाजिक कार्य:

    अझीझ प्रेमजी, कुमार मंगलम बिर्ला, मुकेश अंबानी यांच्यासोबत शिव नादर यांना आधुनिक भारतातील एक दानशूर व्यक्ती म्हणून ओळखलं जातं, कारण या दिग्गज उद्योगपतीने नेहमीच स्वतःजवळ असलेली धनाची पुंजी गरजू माणसांसाठी खुली केली आहे. विद्याज्ञान, शिव नादर युनिव्हर्सिटी, शिव नादरस्कुल, किरण नादर म्युझियम ऑफ आर्टस् अशा एक ना अनेक माध्यमांमधून त्यांनी समाजापर्यंत वेळोवेळी मदत पोहोचवली आणि म्हणूनच हुरून इंडिया फिलोनत्रोफीच्या (Hurun India Philanthropy List) यादीत शिव नाडर यांचं नाव पाहायला मिळतं. एवढंच नाही तर आत्तापर्यंत त्यांनी शिव नादर फाउंडेशनतर्फे शिक्षण तसेच आरोग्य क्षेत्रांना आर्थिक मदत पोहोचवून महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. 

    आणखीन वाचा:

  • Success Story: २००० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय, आज आहे २,६०,००० कोटींची कंपनी | Dilip Shanghvi

    Success Story: २००० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय, आज आहे २,६०,००० कोटींची कंपनी | Dilip Shanghvi

    असं म्हटलं जातं की, श्रीमंत घरात जन्मलेल्या लोकांना मोठा व्यवसाय उभारण्याची अधिक संधी असते, सर्वसामान्य लोकांना व्यवसाय उभा करणं अवघड जातं. अनेक व्यक्ती स्वप्नं पाहतात, मोठे विचार मनात ठेवतात, पण त्यांच्या वास्तविक गरजांनी ती स्वप्नं धूसर होत जातात. आपण हे लक्षात ठेवायला हवं की, जर तुमच्यात स्वप्नं पाहण्याची क्षमता आणि ती पूर्ण करण्याची मेहनत घेण्याची इच्छाशक्ती असेल, तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता.

    देशातील वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सन फार्माचे संस्थापक दिलीप संघवी यांचं जीवन हे याचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी सुरुवात केली इतरांच्या औषधांचा व्यवसाय करून आणि त्याच अनुभवातून त्यांनी स्वतःचा औषध व्यवसाय सुरू केला. ना त्यांच्यामागे व्यापाराची कौटुंबिक पार्श्वभूमी, ना त्यांच्याकडे मोठी आर्थिक ताकद होती. पण त्यांचं धाडस आणि जिद्द यामुळेच त्यांनी ‘फार्मा किंग’ म्हणून स्वतःचा ठसा निर्माण केला.

    प्रारंभिक जीवन

    दिलीप संघवी  यांचा जन्म १ ऑक्टोबर १९५५ रोजी गुजरातमधील अमरेली या छोट्या गावात एका मारवाडी कुटुंबात झाला. त्यामुळे व्यापाराची मूलभूत समज त्यांच्याकडे बालपणापासूनच होती. त्यांच्या वडिलांचा एक छोटा औषध विक्रीचा व्यवसाय होता आणि संघवी लहानपणापासूनच वडिलांना या व्यवसायात मदत करत असत. ही मदत त्यांच्यासाठी फक्त कुटुंबाला दिलेला हातभार नव्हता, तर औषध उद्योगातील प्राथमिक अनुभव घेण्याची एक महत्त्वाची संधी होती. वडिलांना व्यवसायात केलेल्या मदतीमुळे औषध विक्रीच्या विविध बाजू समजून घेण्याची क्षमता त्यांच्यात विकसित झाली. 

    संघवी यांनी कोलकात्यातील भवानी पूर एज्युकेशन सोसायटी कॉलेजमधून वाणिज्य विषयात पदवी प्राप्त केली. औषध निर्मितीचा कोणताही औपचारिक अभ्यास न करता, त्यांनी वडिलांच्या व्यवसायात काम करत करत औषध बाजारातील विविध संधींची जाण मिळवली. औषध विक्रीच्या व्यवसायात असताना संघवींना हे लक्षात आलं की जेनेरिक औषधांची मागणी भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यांनी विचार केला, की जर मी इतरांनी तयार केलेली औषधे विकू शकतो, तर मी स्वतःची औषधे का बनवू नये?

    या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी औषध निर्मिती क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, ज्यातून पुढे ‘सन फार्मास्युटिकल्स’ या यशस्वी कंपनीची स्थापना झाली. त्यांच्या लहानपणी घेतलेल्या अनुभवांनी आणि औद्योगिक दृष्टिकोनाने त्यांना औषध उद्योगात एक महत्त्वपूर्ण स्थान मिळवून दिलं

    सन फार्माची सुरुवात आणि विस्तार 

    १९८२ साली वडिलांकडून २००० रुपये उसने घेऊन सन फार्माची सुरुवात संघवींनी गुजरातमधील वापी येथे केली. सुरुवातीला कंपनीने मनोरुग्ण आणि हृदयविकाराशी संबंधित औषधे तयार करण्यावर लक्ष केंद्रित केलं. उत्पादनांची विविधता कमी होती, पण संघवी यांनी नेहमी गुणवत्तेला प्राधान्य दिलं,  ज्यामुळे कंपनीची औषधं बाजारात लोकप्रिय होऊ लागली.

    १९९७ मध्ये, कंपनीच्या स्थापनेनंतर १५ वर्षांनी, संघवी यांनी अमेरिकेतील कॅराको फार्मास्युटिकल्स नावाची एक फार्मा कंपनी विकत घेतली, ज्यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत प्रवेश मिळाला. यानंतर २००७ मध्ये, त्यांनी इस्रायलमधील टारो फार्मा ही कंपनी विकत घेतली, ज्यामुळे कंपनीचे जागतिक स्तरावरील स्थान आणखी बळकट झाले. त्यानंतर, २०१४ मध्ये त्यांनी रॅनबॅक्सी कंपनी विकत घेतली. हे अधिग्रहण भारतीय औषध उद्योगात एक मोठा टप्पा होता, कारण यामुळे सन फार्मा भारतातील सर्वात मोठी औषध निर्मिती कंपनी बनली. यामुळे जागतिक बाजारातही सन फार्माचे स्थान मजबूत झाले.

    संघवी यांनी केलेली या कंपन्यांची खरेदी फक्त व्यवसाय वाढवण्यासाठी नव्हे, तर संशोधन आणि विकास वाढवण्यासाठी देखील होती. त्यांनी अमेरिका, युरोप आणि इतर विकसित बाजारांमध्ये विस्तार केला, ज्यामुळे कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर एक विश्वासार्ह ब्रँड बनली.

    २००० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय आज आहे २६०००० कोटींची कंपनी 2 1

    यशाच्या शिखरावर 

    दिलीप संघवी यांनी भारतीय औषध उद्योगात केवळ व्यावसायिक यश मिळवलं नाही, तर औषध निर्मितीची गुणवत्ता वाढवून आणि किफायतशीर औषधांचा पुरवठा करून एक महत्त्वपूर्ण सामाजिक योगदान दिलं  आहे. त्यांचा दृष्टिकोन व्यावसायिकतेच्या पलिकडे जातो, जो समाजाभिमुख आहे, त्यांच्या या कार्यामुळे  अनेकांना योग्य आणि परवडणारी औषधे उपलब्ध झाली आहेत.

    संघवी यांनी फार्मास्युटिकल उद्योगाला नवी दिशा दिली, विशेषतः भारतात जेनेरिक औषधांची क्रांती आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. औषधांच्या किमती कमी करून त्यांनी केवळ भारतीय ग्राहकांना नाही, तर जागतिक स्तरावरही आरोग्यसेवा परवडणारी बनवली आहे.

    त्यांच्या उल्लेखनीय यशासाठी आणि योगदानासाठी दिलीप संघवी यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. २०१६ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार प्रदान केला, जो देशातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. याशिवाय, संघवी हे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सन्मानित झाले आहेत. फोर्ब्सच्या यादीत त्यांनी अनेक वेळा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून स्थान मिळवलं  आहे. २०१५ मध्ये त्यांना फोर्ब्सने भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित केलं, तेव्हा त्यांची संपत्ती $१७.५ बिलियन इतकी होती. सध्या फोर्ब्सनुसार, दिलीप संघवी यांची एकूण संपत्ती २९.८ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास २.५० लाख कोटी रुपये इतकी आहे. सन फार्मा जगातील पाचवी सर्वात मोठी जेनेरिक कंपनी असून कंपनीत जवळपास ४१००० कर्मचारी कार्यरत आहेत. 

    दिलीप संघवी यांचा जीवनप्रवास हा चिकाटी, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय यांचा अद्भुत संगम आहे. त्यांनी अत्यंत साध्या परिस्थितीतून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली आणि आज ते जागतिक स्तरावरील एक प्रमुख उद्योगपती म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जीवनातून शिकण्यासारखे खूप काही आहे – विशेषत: उद्योजकतेत टिकून राहण्यासाठी आणि सातत्याने नवनवीन संधी शोधण्यासाठीची त्यांची क्षमता प्रेरणादायी आहे.

    आणखी वाचा

  • मुंबईची झोपडपट्टी ते दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय | The richest Indian in Dubai – Rizwan Sajan’s

    मुंबईची झोपडपट्टी ते दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय | The richest Indian in Dubai – Rizwan Sajan’s 

    भारतात अनेक उद्योगपती आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीने एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. काहींच्या हातात वारसा संपत्ती नसली तरी, त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कमावले आहे. अशाच एका यशस्वी उद्योगपतीची गोष्ट आज आम्ही सांगणार आहोत, जो मुंबईतील घाटकोपरच्या झोपडपट्टीत राहत होता आणि छोट्या-छोट्या नोकऱ्या करीत जीवनाची गाडी पुढे नेत होता. आज तो दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीयांमध्ये गणला जातो आणि त्यांचा व्यवसाय केवळ दुबईतच नाही, तर इतर अनेक देशांमध्येही पसरलेला आहे.

    सुरुवातीचे दिवस आणि संघर्ष

    रिझवान साजन यांचा जन्म मुंबईच्या घाटकोपरमधील एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांचं कुटुंब झोपडपट्टीत राहायचे. आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं फार कठीण होत होतं. त्यामुळे, साजन यांनी लहानपणापासूनच कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावण्याचं ठरवलं  होतं. त्यांनी शाळेतील पुस्तकं विकणं, सणासुदीच्या वस्तू विकणं, घरोघरी जाऊन दूध विकणं अशी छोटी छोटी कामं लहानपणीच  करण्यास सुरुवात केली. 

    वयाच्या अवघा १६व्या वर्षीच रिझवान साजन एक मोठा धक्का बसला,त्यांच्या वडिलांचं अचानक निधन झालं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण आर्थिक जबाबदारी साजन यांच्यावर आली आणि याचा परिणाम  म्हणून त्यांना शिक्षण मधूनच सोडावं  लागलं. काही काळ त्यांनी एक छोटा व्यवसाय सुरू केला, ज्यात ते फाईल बॉक्सेस बनवायचे. सुरुवातीला या व्यवसायात थोडंफार  यश मिळाले, पण पुरेसं नव्हतं. 

    कुवेतमध्ये मिळाली सुवर्णसंधी

    रिझवान साजन यांचे काका तेव्हा कुवैतमध्ये नोकरी करत होते, कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी साजन यांनी आपल्या काकांकडे कुवेतमध्ये नोकरीसाठी विचारणा केली. त्यांच्या काकांनी त्यांना एका बांधकाम साहित्याच्या दुकानात नोकरी मिळवून दिली. ही संधी साजन यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण वळण ठरली. त्यांनी या नोकरीत एक विक्रेता म्हणून काम सुरू केलं, आणि त्यांच्या मेहनतीने त्यांना त्या ठिकाणी लवकरच व्यवस्थापकाची पदवी मिळाली. 

    १९९० साली  पुन्हा त्यांच्या  जीवनाला एक  जोरदार  धक्का मिळाला . कुवेतमध्ये भीषण आखाती युद्ध सुरू झालं आणि त्यांना  कुवेत सोडावं लागलं आणि पुन्हा भारतात परतावं  लागलं. परत आल्यावर त्यांनी काही नोकऱ्या करून पहिल्या, पण यश मिळवण्यासाठी त्यांच्या मनात काहीतरी मोठं करण्याची इच्छा होती. काही काळ भारतात राहिल्यानंतर त्यांनी दुबईला जाण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना दुबईत बांधकाम उद्योगात मोठी संधी दिसत होती.

    The richest Indian in Dubai - Rizwan Sajan's

    दुबईत ‘डॅन्यूब ग्रुप’ची स्थापना 

    १९९३ मध्ये दुबईला गेल्यावर रिझवान साजन यांनी ‘डॅन्यूब’ नावाची ट्रेडिंग फर्म सुरू केली. हि कंपनी कुवेतमधून बांधकाम साहित्य खरेदी करायची  आणि दुबईमध्ये त्याची विक्री करायची. दुबईमध्ये बांधकाम उद्योगाची प्रचंड वाढ होत होती, आणि त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला जोरदार प्रतिसाद मिळाला. साजन यांच्या सर्जनशील स्वभावामुळे  आणि मेहनतीमुळे ‘डॅन्यूब’ ने अवघ्या काही वर्षांतच मोठं यश मिळवलं.

    १९९९ पर्यंत ‘डॅन्यूब’ चा वार्षिक महसूल १६ कोटी रुपये झाला होता, आणि ते १ कोटी रुपयांचा नफा मिळवत होते. पण साजन इथेच थांबले नाहीत. त्यांनी बांधकाम साहित्याबरोबरच गृहसजावट, सॅनिटरीवेअर, इलेक्ट्रिकल उपकरणे यांसारख्या विविध क्षेत्रांत विस्तार केला.

    रिअल इस्टेटमध्ये पाऊल

    २००८ मध्ये जागतिक आर्थिक संकट आलं , पण साजन यांच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही उलट त्यांनी आपला व्यवसाय वाढवण्याचं ठरवलं आणि २०१४ मध्ये ‘डॅन्यूब प्रॉपर्टीज’ नावाची रिअल इस्टेट कंपनी लाँच केली. त्यांचा उद्देश मध्यमवर्गीयांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा होता. ‘डॅन्यूब प्रॉपर्टीज’ ने बाजारात एक क्रांतिकारी योजना आणली — “1% मासिक पेमेंट योजना” या योजनेत खरेदीदारांना घर खरेदीसाठी फक्त 1% रक्कम दरमहा भरण्याची मुभा  होती आणि त्यांना घरमालकीचा हक्क मिळत होता.

    या योजनेने घर खरेदीदारांसाठी घरमालकीचा मार्ग सोपा केला आणि अल्पावधीतच ‘डॅन्यूब प्रॉपर्टीजचं नाव बाजारात लोकप्रिय झालं. या योजनेमुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळाले आणि २०१६ पर्यंत ‘डॅन्यूब’चा वार्षिक महसूल ९००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. साजन यांनी रिअल इस्टेटमध्ये आपले स्थान मजबुत  केलं आणि आज ‘डॅन्यूब ग्रुप’ १६,७०९ कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळवणारी कंपनी आहे. रिझवान साजन यांनी आपल्या अपार मेहनत आणि हुशारीच्या जोरावर ‘डॅन्यूब’ला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं आणि त्यांची उपस्थिती जगभरातील ३० पेक्षा जास्त देशांत आहे.

    रिझवान साजन यांची कहाणी ही एका सामान्य माणसाच्या असामान्य संघर्षाची आणि यशाची कहाणी आहे.

    मुंबईच्या झोपडपट्टीतून सुरु झालेला हा प्रवास दुबईतील यशाच्या शिखरापर्यंत पोहोचला. त्यांनी कठीण परिस्थितीतही हार न मानता स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांच्या जिद्दीने, मेहनतीने बुद्धिमत्तेमुळे ते आज जागतिक स्तरावर यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात . 

    आणखी वाचा

  • ५,००० रुपये उसने घेऊन उभारली १७,००० कोटींची कंपनी: पी. रामचंद्रन यांचा संघर्ष आणि “उजाला” साम्राज्य.

    ५,००० रुपये उसने घेऊन उभारली १७,००० कोटींची कंपनी: पी. रामचंद्रन यांचा संघर्ष आणि “उजाला” साम्राज्य.

    प्रत्येक यशोगाथेमध्ये एक संघर्षाची कथा असते. अनेक वेळा मोठं यश मिळवण्यासाठी आयुष्यात चढ-उतार आणि अडचणी येतात. पण काही लोक असतात, जे या सर्व अडचणींवर मात करून आपला कर्तृत्वाचा ठसा उमटवतात. त्यांचा जीवन प्रवास आपल्याला हे शिकवतो की यश हे फक्त मेहनत, चिकाटी आणि नवकल्पना यावरच आधारित असतं . “उजाला सुप्रीम” या लोकप्रिय ब्रँडचे संस्थापक एम.पी. रामचंद्रन यांची कथा अशीच एक प्रेरणादायक आणि संघर्षपूर्ण गाथा आहे.

    या लेखात आपण त्यांच्या जीवनातील संघर्ष, कठोर परिश्रम, आणि एक मोठं व्यवसाय साम्राज्य उभारण्याचा प्रेरणादायक प्रवास जाणून घेणार आहोत.

    प्रारंभिक जीवन आणि संघर्ष 

    एम.पी. रामचंद्रन यांचा जन्म १९५० साली केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात झाला. त्यांचं बालपण आर्थिक संघर्षात गेलं , त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं . परंतु, त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट शिकली ती म्हणजे आयुष्य आपले  कष्ट आणि इच्छाशक्तीवर अवलंबून असतं .

    शाळेचं शिक्षण पूर्ण केल्यावर रामचंद्रन यांनी एका कंपनीत लेखापाल म्हणून नोकरी केली. मात्र, त्यांना स्वतःचं काहीतरी मोठं साध्य करायचं होतं. हा प्रवास सोपा नव्हता,  त्यांना यश मिळवण्यासाठी काहीतरी वेगळं करायचं होतं. लेखापाल म्हणून काम करत असताना, त्यांच्या मनात एक व्हाईटनर मिश्रण तयार करण्याची कल्पना आली. व्हाईटनर म्हणजे कपड्यांवरील डाग दूर करण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ. त्यांनी त्यांच्या स्वयंपाकघरातच या मिश्रणावर प्रयोग सुरू केले, मात्र त्यात अपेक्षित गुणवत्ता साधता येत नव्हती.

    एके दिवशी, त्यांनी एका रासायनिक उद्योगावरील मासिकात एक लेख वाचला ज्यामध्ये जांभळ्या रंगाच्या वापरामुळे कपडे अधिक स्वच्छ धुतले जाऊ शकतात, असं म्हटलं होतं. हा लेख वाचल्यानंतर त्यांच्या मनात नवीन कल्पना आली. त्यांनी या विचारावर प्रयोग सुरू केले, आणि त्यांना हवे तसे परिणाम मिळाले. स्वयंपाकघरात सुरू झालेला त्यांचा हा प्रयोग आता एका मोठ्या उद्योगात बदलू लागला होता. 

    व्यवसायाची स्थापना 

    १९८३ मध्ये रामचंद्रन यांनी आपल्या पहिल्या मुलीच्या नावावरून “ज्योती लॅबोरेटरीज” हा व्हाईटनर उत्पादन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांना असं वाटलं की एक संस्कृतीप्रधान नाव त्यांच्या व्यवसायाला एक वेगळा आणि भावनिक स्पर्श देईल . त्यामुळे त्यांनी आपल्या नव्या कंपनीचं नाव “ज्योती लॅबोरेटरीज” ठेवलं. आपला व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांनी आपल्या भावाकडून फक्त ५००० रुपयांचं कर्ज घेतलं आणि त्याच तुटपुंज्या भांडवलावर त्यांनी कारखाना सुरू केला.

    ज्योती लॅबोरेटरीजचं पहिलं उत्पादन “उजाला सुप्रीम” हे लिक्विड फॅब्रिक व्हाईटनर होतं. हे एक साधं पण प्रभावी उत्पादन होतं, जे कपड्यांना अधिक पांढरे, स्वच्छ आणि तेजस्वी बनवण्यासाठी वापरलं जातं. रामचंद्रन यांना समजलं होतं की गृहिणी हा त्यांच्या मुख्य ग्राहकवर्ग असेल. त्यामुळे त्यांनी उत्पादन विक्रीसाठी सहा महिलांना कामावर ठेवलं, ज्या घरोघरी जाऊन “उजाला” विकू लागल्या. त्यांच्या विक्रीसाठीचा संदेश सोपा आणि प्रभावी होता- तो म्हणजे “उजल्याचे फक्त चार थेंब वापरून तुमच्या  कपड्यांना चमकदार बनवा”.

    image

    रामचंद्रन यांची ही युक्ती ग्राहकांच्या मनात घर करू लागली, आणि “उजाला”ला पहिल्या वर्षातच चांगला प्रतिसाद मिळाला. वर्षाच्या अखेरीस, ज्योती लॅबोरेटरीजने १४४० रुपयांचा नफा मिळवला आणि विक्रीचा आकडा ४०,००० रुपयांपर्यंत पोहोचला. रामचंद्रन यांच्या दृढनिश्चयाने आणि कल्पकतेने ज्योती लॅबोरेटरीजला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या साध्या पण परिणामकारक मार्केटिंग पद्धतीमुळे, कंपनीला अल्पावधीतच मोठं यश मिळालं. “उजाला”च्या यशामुळे रामचंद्रन यांनी आपल्या व्यवसायाला पुढे नेण्याची प्रेरणा घेतली, आणि पुढील काळात ज्योती लॅबोरेटरीज अनेक यशस्वी उत्पादनांसह एक यशस्वी ब्रँड म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

    व्यवसायातील स्पर्धेवर मात 

    व्यवसाय करताना रामचंद्रन यांना मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागले. रेकिट बेंकीझर कंपनीच्या ‘रॉबिन ब्लू’ या उत्पादनाने भारतीय बाजारात आपली पायाभरणी केली होती. यशस्वी होण्यासाठी रामचंद्रन यांना काहीतरी वेगळं करण्याची गरज होती. त्यांनी पारंपरिक ‘पावडर ब्लू’ ऐवजी ‘लिक्विड ब्लू’ तयार केलं आणि हे उत्पादन फक्त १ रुपयांपासून ४५ रुपयांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध करून दिलं.

    त्यानंतर, त्यांनी “चार बूंदों वाला, आया नया उजाला” ही जाहिरात तयार केली, जी खूपच लोकप्रिय झाली. ही जाहिरात घराघरात पोहोचली आणि प्रत्येक गृहिणीची पसंद बनली. अल्पावधीतच ‘उजाला’ हा एक मोठा ब्रँड बनला, आणि १९९७ मध्ये ‘उजाला’ने १०० कोटी रुपयांच्या विक्रीची यशस्वी कामगिरी केली.

    यानंतर १९९६ मध्ये डेंग्यूच्या प्रादुर्भावामुळे रामचंद्रन यांना मच्छरांपासून संरक्षण देणाऱ्या उत्पादनाची आवश्यकता भासली. त्यामुळे त्यांनी ३५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून ‘मॅक्सो’ हे उत्पादन बाजारात आणले. हे उत्पादन देखील खूप लोकप्रिय ठरलं आणि पुढे ‘मॅक्सो’ हा ३०० कोटी रुपयांचा ब्रँड बनला.

    विस्तार आणि नवा टर्निंग पॉइंट: Henkel AG & Co.ची भागीदारी

    2011 मध्ये ‘ज्योती लॅबोरेटरीज’ने एक मोठं पाऊल उचलत जर्मन FMCG (Fast-moving consumer goods) कंपनी ‘Henkel AG’च्या भारतातील व्यवसायातील ५०.९७% हिस्सेदारी ६१७ कोटी रुपयांना खरेदी केली. ही खरेदी ज्योती लॅबोरेटरीजसाठी एक महत्त्वपूर्ण टर्निंग पॉइंट ठरली, ज्यामुळे कंपनीला भारतीय FMCG उद्योगात आपलं स्थान मजबूत करण्यासाठी भक्कम आधार मिळाला.

    ‘ज्योती लॅबोरेटरीज’ने या संधीचा लाभ घेत आपल्या उत्पादनांना वाढवलं, विक्रीत चांगली वाढ साधली आणि वितरण नेटवर्क अधिक विस्तारित केलं.  या विकासामुळे कंपनीने २०१३ मध्ये १०१७.३८ कोटी रुपयांची विक्री केली आणि ८३.१४ कोटी रुपयांचा नफा कमवला आणि  त्यांची उत्पादने भारतातील 29 लाख दुकांनांमध्ये उपलब्ध झाली.

    आज, ‘ज्योती लॅबोरेटरीज’चा वार्षिक महसूल २७५७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे आणि कंपनी ३६९ कोटी रुपयांचा नफा कमावते आहे. त्यांच्याकडे २३ कारखाने असून २५ हून अधिक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. उजला सुप्रीम, मॅक्सो, एक्सो डिश वॉश, प्रिल डिश वॉश, मिस्टर व्हाईट, आणि मार्गो बॉडी सोप ही त्यांची प्रमुख उत्पादने भारतीय ग्राहकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत.

    ‘ज्योती लॅबोरेटरीज’ने आता राष्ट्रीय स्तरावर आपला व्यवसाय स्थिर केला असून . ‘उजला’ आणि ‘मॅक्सो’ यांसारखी उत्पादने संपूर्ण भारतात लोकप्रिय झाली आहेत. मोठ्या FMCG कंपन्यांशी स्पर्धा करताना ‘ज्योती लॅबोरेटरीज’ने भारतातील FMCG क्षेत्रात आपली खास ओळख निर्माण केली आहे, आणि आता P&G व HUL सारख्या दिग्गज कंपन्यांना थेट स्पर्धा देत आहे.

  • “रंकाचा राजा’’ संघर्षातून उभारले यशस्वी साम्राज्य, लॅरी एलिसन यांचा प्रेरणादायी प्रवास

    “रंकाचा राजा’’ संघर्षातून उभारले यशस्वी साम्राज्य, लॅरी एलिसन यांचा प्रेरणादायी प्रवास 

    आज आपण अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यांच्यावर “रंकाचा राजा” ही म्हण तंतोतंत लागू होते. या व्यक्तीने आपल्या जीवनातील अनेक आव्हानांवर मात करून यश मिळवले आहे. ती व्यक्ती म्हणजे अमेरिकेचे प्रख्यात उद्योजक आणि ओरॅकल कॉर्पोरेशनचे संस्थापक, “लॅरी एलिसन”.

    लॅरी एलीसन आणि देव यांच्यात काय फरक आहे, यावर एक विनोदी प्रश्न विचारला जातो. उत्तर असं दिलं जातं की, “देवाला आपण लॅरी एलीसन आहोत असं वाटत नाही.” यावरूनच लॅरी एलीसन किती महत्वाकांक्षी व्यक्ती आहेत, याची कल्पना येते.लॅरी एलीसन हे तंत्रज्ञान क्षेत्रातील एक क्रांतिकारी नाव आहे. त्यांनी माहिती साठवणाऱ्या म्हणजेच डेटाबेस क्षेत्रात असा काही क्रांतिकारक बदल घडवला की, मायक्रोसॉफ्ट, आयबीएमसारख्या बलाढ्य कंपन्यांनाही त्यांची धडकी भरली होती. त्यांच्या नेतृत्वात, Oracle ने डेटाबेस व्यवस्थापनाच्या तंत्रज्ञानात अभूतपूर्व प्रगती केली. हे तंत्रज्ञान व्यवसायांच्या आणि उद्योगांच्या केंद्रस्थानी आलं, ज्यामुळे जगभरातील डेटा व्यवस्थापनाचा चेहरामोहरा बदलला.

    आज त्यांचा जन्मदिन… चला तर, त्यांचा आजवरचा जीवनप्रवास पाहूया. 

    बालपण आणि प्रारंभिक जीवन 

    लॅरी एलिसन यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. त्यांचे बालपण आणि प्रारंभिक जीवन संघर्षमयी होते. फ्लॉरेन्स स्पेलमन ही त्यांची १९ वर्षे वयाची आई अविवाहित होती. त्यांच्या जन्मानंतर काही दिवसातच त्यांच्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबाला सोडून दिले. लॅरी नऊ महिन्यांचे असताना त्यांना न्यूमोनिया झाला असताना आपल्याला आपल्या मुलाचा नीट सांभाळ करायला जमणार नाही असं वाटल्यामुळे त्यांच्या आईनं एलिसनला शिकागोमधल्या आपल्या लिलियन नावाच्या आत्याकडे सांभाळायला द्यायचं ठरवलं. लिलियन आणि लुईस एलिसन या नवरा-बायकोनं मग एलिसन नऊ महिन्यांचा असताना त्याला दत्तक घेतलं. त्याच्या नव्या आईने त्यांचं चांगल्या प्रकारे पालनपोषण केले. त्यांनंतर त्यांची खरी आई त्यांना कधीच भेटली नाही. ती त्यांना जेव्हा ते ४८ वर्षाचे झाले आणि जगात त्यांचे बर्‍यापैकी नाव झाले होते तेव्हाच भेटली. अगदी हिंदी सिनेमांत दाखवतात तशी स्टोरी आहे ही…

    लॅरींनी 1962 मध्ये अर्बाना-चॅम्पेन येथील इलिनॉय विद्यापीठात शिक्षणाला सुरुवात केली. मात्र, 1964 मध्ये त्यांच्या सावत्र आई म्हणजेच लिलियन याचं निधन झालं, आईच्या निधनानंतर लॅरी खूपच दुःखी झाले आणि त्यांनी  शिक्षण अर्धवट सोडले. लिलियनशी त्याचं  नातं खूप जिव्हाळ्याचं झालं होतं, परंतु लुई म्हणजेच त्यांचे सावत्र वडील यांच्यासोबत त्यांचे संबंध तणावपूर्ण होते. लुई त्यांना वारंवार म्हणत की, तू आयुष्यात कधीच काही साध्य करू शकणार नाही. त्यांच्या सावत्र वडिलांच्या अशा वागणुकीमुळे लॅरींचा स्वभाव हा लहानपनासुनच जिद्दी बनला आणि आता वडिलांना खोटं ठरवून काहीतरी करून दाखवायचा चंग त्यांनी लहापणापासूनच बांधला.

    कठीण परिस्थितीतही लॅरीने धैर्य आणि जिद्द दाखवून पुढे प्रचंड यश मिळवले,  ते म्हणतात ना परिस्थिती कितीही कठीण असली, तरीही स्वप्नांवर विश्वास ठेवणं महत्वाचं असतं. लॅरीनेही हार मानली नाही. 1966 मध्ये शिकागो विद्यापीठात थोडा काळ शिकून त्यांनी आपल्या इच्छाशक्तीने पुढे पाऊल टाकलं. 

    Larry Ellison

    सुरुवातीचा संघर्ष 

    1960 च्या दशकात संगणकाच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत होती. संगणकाविषयी सर्वत्र चर्चा सुरू झाली होती, आणि अनेक कंपन्यांना त्यांच्या कामांना सुलभ बनवण्यासाठी कुशल प्रोग्रामर्सची आवश्यकता होती. लॅरी यांनी शाळेत प्रोग्रामिंगचे धडे घेतले होते आणि त्यांच्या या आवडीमुळे त्यांनी त्या काळात १९६६ मध्ये, वयाच्या अवघ्या  २२ व्या वर्षी पहिला संगणक डिझाईन केला. त्या काळात संगणक आणि तंत्रज्ञान हे नवीन क्षेत्र होते, पण लॅरींनी याच क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्याचे ठरवले. कॅलिफोर्नियामध्ये येऊन त्यांनी संगणक डिझाईनशी संबंधित छोटे-मोठे काम करून आपले पोट भरायला सुरुवात केली. 

    1973 मध्ये ॲम्पेक्स या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत काम करायला सुरुवात केली, त्या ठिकाणी काम करत असताना त्यांना तेथे नवीन सहकारी एड ओट्स आणि बॉब मायनर भेटले, त्यांच्या सोबतचा त्यांचा अनुभव कमालीचा राहिला,  नवी शिकवण घेतली आणि अनुभव मिळवला. मात्र, त्यांच्या यशाची भूक थांबली नाही. 1976 मध्ये त्यांनी ॲम्पेक्स सोडून प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट्समध्ये काम करण्याचा निर्णय  घेतला आणि उपाध्यक्ष पदावर कार्यरत होत, कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागाचे नेतृत्व केले.

    व्यवसायाची सुरुवात (Oracle ची मुहूर्तमेढ)

    1977 मध्ये, एलिसन यांनी आपले सहकारी  मायनर आणि ओट्ससोबत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज (SDL) ची स्थापना केली, जी सुरुवातीला इतर कंपन्यांसाठी कॉन्ट्रॅक्ट प्रोग्रामिंग करण्यासाठी तयार करण्यात आली होती. मात्र, एलिसन यांना SDL द्वारे काहीतरी मोठं आणि क्रांतिकारक करायचं होतं. त्यांना ब्रिटिश संगणक शास्त्रज्ञ एडगर एफ. कॉड यांनी मांडलेल्या रिलेशनल डेटाबेस मॉडेलने खूप प्रेरणा दिली. या मॉडेलने मोठ्या प्रमाणात डेटाचे कार्यक्षम व्यवस्थापन आणि जलद रिकव्हरी करण्याचे मार्ग दाखवले. एलिसन, मायनर आणि ओट्स यांनी या क्षेत्रात मोठ्या व्यावसायिक संधी ओळखल्या आणि त्यांनी डेटाबेस विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले

    त्यांच्या या प्रयत्नांना अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएकडून (Central Intelligence Agency) करार मिळाला आणि त्यांनी व्यावसायिक रिलेशनल डेटाबेस प्रोग्राम विकसित करण्यास सुरुवात केली. अखेर 1979 मध्ये, रिलेशनल सॉफ्टवेअर इंक. (आता Oracle) ने स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज (SQL) वापरणारा पहिला व्यावसायिक रिलेशनल डेटाबेस प्रोग्राम लॉन्च केला. या अभिनव डेटाबेस प्रोग्रामने त्याकाळात लोकप्रियता मिळवली आणि उद्योगाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला.

    संकटांवर मात

    1982 मध्ये नाव बदलून ओरॅकल सिस्टिम कॉर्पोरेशन (नंतर ओरॅकल कॉर्पोरेशन) ठेवलेली कंपनी आपल्या नाविन्यपूर्ण आणि आक्रमक मार्केटिंगसाठी ओळखली गेली. 1980 च्या दशकात कंपनीची झपाट्याने वाढ झाली, आणि 1986 मध्ये कंपनीने सार्वजनिक होऊन यश मिळवलं. 1987 पर्यंत, ओरॅकल जगातील सर्वात मोठी डेटाबेस-व्यवस्थापन कंपनी म्हणून समोर आली. मात्र, 1990 मध्ये भागधारकाच्या खटल्यामुळे झालेल्या अंतर्गत ऑडिटमध्ये असं लक्षात आलं की कंपनीने आपल्या कमाईचा चुकीचा अंदाज वर्तवला होता, ज्यामुळे स्टॉक बाजारात (share market) मोठी घसरण झाली. ओरॅकलच्या शेअरचा भाव जवळपास ८० टक्क्याहून पडला. 

    संकटातून मार्ग काढण्यासाठी, लॅरी एलिसनने कंपनीच्या व्यवस्थापनाची पुनर्रचना केली आणि 1992 च्या अखेरीस ओरॅकल पुन्हा आर्थिक स्थिरतेत आली. 1990 च्या दशकाच्या मध्यात, एलिसनला नेटवर्क कॉम्प्युटर (NC) नावाचा डेस्कटॉप पीसीचा स्वस्त पर्याय विकसित करून मायक्रोसॉफ्टशी स्पर्धा करण्याची संधी मिळाली. NC ही कल्पना पुढे क्लाउड कॉम्प्युटिंगच्या सुरुवातीची चाचणी होती. परंतु, PC च्या सतत कमी होणाऱ्या किमती आणि NC च्या विकासातील विलंब यामुळे मायक्रोसॉफ्टने बाजारात वर्चस्व गाजवलं. 

    त्यांची ही गोष्ट दाखवते की अपयश ही यशाच्या प्रवासात एक पायरी असते. प्रत्येक आव्हानातून शिकून, नव्या उमेदीने पुढे जाणं हेच खऱ्या उद्योजकाचं वैशिष्ट्य असतं. एलिसनची दूरदृष्टी, त्यांची  चिकाटी आणि त्यांच्या चुका स्वीकारण्याची तयारी हेच त्यांच्या  यशाचं गमक ठरलं.

    412795243

    यशाच्या शिखरावर

    लॅरी एलिसनने इंटरनेटच्या प्रारंभिक काळात ओरॅकलला यशाच्या शिखरावर नेले. वर्ल्ड वाइड वेब (www) तंत्रज्ञानाशी सुसंगत उत्पादने विकसित करण्यावर भर देऊन, त्यांनी कंपनीची वाढ सुनिश्चित केली. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला, एलिसनने प्रतिस्पर्धी सॉफ्टवेअर कंपन्या खरेदी करण्याचे आक्रमक धोरण अवलंबले, ज्यामुळे ओरॅकलची ताकद अधिकच वाढली.

    पीपलसॉफ्ट (2005), सिबेल (2006), BEA (2008), आणि सन मायक्रोसिस्टम्स (2010) या मोठ्या कंपन्यासह अनेक कंपन्या ओरॅकलमध्ये विलीन झाल्या आणि आज  त्यांच्या दूरदृष्टी आणि धाडसी निर्णयांमुळे ओरॅकल जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात एक अग्रगण्य कंपनी बनली आहे.

    एलिसन हे सिलिकॉन व्हॅलीतील सर्वात विशेष आणि  वेगळ्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते, त्यांचे  उत्तुंग यश जगभरात कौतुकास पात्र ठरले. त्यांच्या व्यवसायातील धाडसी निर्णयांमुळे आणि प्रगतीशील दृष्टिकोनामुळे त्यांचे नाव आज अग्रगण्य उद्योजकांमध्ये गणले जाते. 2010 मध्ये प्रतिष्ठित अमेरिका चषक जिंकणारा संघ उभारून त्यांनी आपले नेतृत्व कौशल्य दाखवले. 2012 मध्ये, त्यांनी हवाईयन बेट लनाईचे 98 टक्के भाग विकत घेऊन, आपले भव्य स्वप्न साकार केले. त्या काळात त्यांची  वैयक्तिक संपत्ती सुमारे $40 अब्ज होती, ज्यामुळे ते  जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले. सप्टेंबर 2014 मध्ये, एलिसनने Oracle चे CEO पद सोडले, परंतु कंपनीच्या प्रगतीसाठी कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) म्हणून योगदान देत राहिले . 

    मित्रांनो, लॅरी एलिसन यांची जीवनकथा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अत्यंत गरिबीतून संघर्ष करत त्यांनी जगातील एक मोठं असणारं साम्राज्य उभं केलं. ‘अम्पॅक्स कॉर्पोरेशन’मध्ये काम करत असताना त्यांना ‘ओरॅकल’ची फक्त कल्पना सुचली होती आणि याच कल्पनेवर त्यांनी मेहनतीने कार्य केलं. आज ‘ओरॅकल’मध्ये १,२२,००० हून अधिक कर्मचारी काम करत असून कंपनीची एकूण संपत्ती ९१ बिलियन डॉलर्स आहे.

    लॅरी एलिसन यांची संपत्ती सुमारे ५६ बिलियन डॉलर्स एवढी असून त्यांनी आपला प्रवास खडतर परिस्थितीतून सुरू केला होता. त्यांच्या या यशस्वी प्रवासामध्ये त्यांनी अनेक आव्हानं पार केली. 

    जगातील सर्वाधिक डेटा साठवणारी कंपनी उभारणारे आणि प्रचंड संपत्तीचे मालक लॅरी एलिसन हे जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असून अमेरिकेत तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. परंतु, एवढी मोठी कंपनी उभी करणारे आणि अफाट संपत्ती कमावणारे लॅरी एलिसन यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. लहानपणी सोडून दिल्या गेलेल्या या मुलाने स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेट्स यांच्या बरोबरीने यश मिळवले. त्यांचा प्रवास हा आपल्यासारख्या लाखो तरुणांना स्वप्न पाहण्याची आणि ते प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा देतो.

    आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत यापेक्षा आपला दृष्टिकोन आणि मेहनत कशी आहे, हेच आपल्या यशाचं खरं कारण असतं, हे लॅरी एलिसन यांच्या जीवनातून शिकायला मिळतं. जर तुम्हाला काहीतरी नवीन वेगळे अविश्‍वसनीय करायचे असेल, तर त्याची तयारी आता आणि लगेच करा असं लॅरी नेहमी सांगत असतात, त्यांच्या या प्रवासातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करावा, कारण शेवटी  यश मिळवण्यासाठी चिकाटी आणि प्रयत्न यांचीच गरज असते.

    आणखीन वाचा: