Category: व्यवसायाच्या वाटेवर चालताना

  • भांडवल कसे उभे करावे ?

    भांडवल कसे उभे करावे ?

    भांडवल नसणे (३६६ मते)
    मार्गदर्शन नसणे (२१३ मते)
    कुटुंबातील व्यक्तीचा पाठिंबा नसणे (१२७ मते)
    मार्केटिंग न करता येणे (९३ मते)
    मानसिकता व यशाबाबत साशंकता (५५ मते)
    सरकारी अडथळे (४१ मते)
    चुकीचे निर्णय (२८ मते)

    म्हणजेच भांडवल नसणे ही समस्या सर्वाधिक उद्योजकांना जाणवत असल्याचे निदर्शनास आले आहे. तुम्हाला हवे तेवढे भांडवल मिळाले तर काय करणार? असा प्रश्न स्वतःला विचारा. तुमच्याकडे तुम्ही जो बिझनेस करणार आहात त्याचा बिझनेस प्लॅन बनविलेला आहे का? त्या व्यवसायासाठी कराव्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी करायला तुम्ही तयार आहात का? त्याची तुम्हाला पूर्ण माहिती आहे का? तुमच्याकडे या प्रश्नांची उत्तरे असली, तर लगेच तुम्हाला भांडवलदार उपलब्ध आहेत. नसतील तर आपण त्याची तयारी करुन घेऊ.

    भांडवल उभारणीचे काही पर्याय :

    📌 बँका – बँकेसाठी सर्वात महत्त्वाची माणसे असतात ती म्हणजे कर्जदार. ठेवीदारापेक्षा बँकांना कर्जदाराची गरज जास्त असते; कारण बँका चालवण्यासाठी लागणारा पैसा हा कर्जदाराकडून मिळालेल्या व्याजातूनच मिळत असतो. त्यामुळे बँका कर्ज देण्यासाठी उद्योजकांचा शोध घेत असतात. मात्र त्यांना कर्जाची रक्कम व व्याज योग्य वेळी आपण परत करु शकतो, या गोष्टीची खात्री पटवून देणे गरजेचे असते. एकदा आपण बँकेला कर्ज फेडण्याची खात्री पटवून देऊ शकलो की,० बँक आपल्याला लागेल एवढे कर्ज उपलब्ध करुन देते. आपणही आपला व्यवसाय अधिक जोमाने वाढवण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन ती पार पाडून व्यवसायाच्या वेगवान वृध्दीची गुरुकिल्ली प्राप्त करु शकतो.

    📌 HNI, NRI – एचएनआय म्हणजे High Networth Individual. काही भरपूर संपत्ती कमावलेली माणसे आपल्या समाजात असतात. त्यांना आपले पैसे काही नवीन व्यवसाय करणाऱ्या होतकरु तरुणांना मदत म्हणून द्यायचे असतात. यापैकी काही एचएनआय हे भागीदारी (Partnership) मागतात, तर काही लोकांना खात्रीशीर (fixed return) पैसे परत हवे असतात. ह्या लोकांपर्यंत आपली व्यवसायाची संकल्पना पोहोचवणे गरजेचे असते. अशा लोकांचे संपर्क क्रमांक, ईमेल असल्यास त्यांना आपला बिझनेस प्लॅन पाठवावा व नंतर त्यांना आपण बिझनेस प्लॅन पाठवल्याची व त्यांना तो पोहोचला असल्याची खात्री करुन घ्यावी.

    भारताबाहेर राहणारे अनिवासी भारतीय म्हणजेच NRI (Non Resident Indian) या लोकांकडे बऱ्यापैकी पैसे असतात. त्यांना भारताविषयी आस्था असते. ती व्यक्त करण्यासाठी व त्यातून ते गुंतवणूक करण्यास तयार असतात. त्यातून येणारी मिळकत ही रिटायरमेन्ट साठी वापरता यावी म्हणून जमा करुन ठेवतात; म्हणून हे पैसे दीर्घ कालावधीसाठी वापरता येतात. फक्त प्रत्येक प्रकारच्या गुंतवणूकदाराचे पैसे इमानेइतबारे परत करावेत. कारण आपल्याला वेळोवेळी व्यवसायवाढीसाठी लागणारे पैसे ते देऊ करतात, त्यामुळे वेळच्यावेळी परत पैसे दिल्यामुळे त्यांचा आपल्यावर विश्वास बसतो.

    📌 अँजेल इन्व्हेस्टर्स : अँजेल इन्व्हेस्टर्स म्हणजे अशी लोकं ज्यांच्याकडे भरपूर पैसे असतात आणि ते सुरुवातीच्या काळात नवउद्योजकांना पतपुरवठा करत असतात. त्याबदल्यात त्यांना कंपनीत भागीदारी द्यावी लागते. केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या लोकांचं नेटवर्क खूप मोठं असतं. त्याचा फायदा करून घेता येतो. दुसरा फायदा म्हणजे, जसे कर्ज घेतले की दुसऱ्या महिन्यापासून हप्ते सुरु होतात, तसं इथे होत नाही. इन्वेस्टर्सनी दिलेले पैसे परत करण्याची गरज नसते, कारण त्या बदल्यात तुम्ही कंपनीचे शेअर्स त्यांना विकलेले असतात. त्यामुळे व्यवसाय वाढला तर त्यांचा फायदा होतो आणि बुडाला तर त्यांचे पैसेही बुडतात.

    📌 *क्राउड फंडिंग – *आजूबाजूच्या सामान्य माणसांकडून कमी प्रमाणात व जास्तीत जास्त लोकांकडून पैसा उभा करुन मोठे भांडवल उभे करता येते. ५०० लोकांकडून १००० रुपये प्रत्येकी एक वर्षासाठी कर्जाऊ घेतल्यास ५ लाख रुपये सहज उभे करता येतात. आपला प्रस्ताव हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येतो. बल्क एसएमएस, सोशल मिडीया व बल्क ईमेल या माध्यमातून आपण हे जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवू शकतो. उत्पादने बाजारात आणण्यापूर्वी आगाऊ नोंदणी करणे हाही एक भांडवलनिर्मितीचा मार्ग आहे. काही वर्षापूर्वी रिलायन्स कंपनीने ५०० रुपयात मोबाईल देण्याची घोषणा करुन आगाऊ नोंदणी (Advance Booking) करुन लाखो रुपयांचे भांडवल उभे केले होते व नंतर काही महिन्यांनी ग्राहकांना मोबाईल दिले. टेस्ला इलेक्ट्रिक कारसाठी सुद्धा हाच मार्ग वापरला गेला आहे.

    मुक्त अर्थव्यवस्थेमुळे थेट परकीय गुंतवणूक हाही भांडवलनिर्मितीचा पर्याय उपलब्ध आहे. आपण जेवढी अधिक कल्पकता वापरु तेवढे अधिक पर्याय आपण स्वतःच निर्माण करु शकतो व त्यातून हवे तेवढे भांडवल उभे करता येते. त्यासाठी अतिशय उत्तम असा बिझनेस प्लॅन आपल्याकडे तयार असायला हवा.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती
  • व्यवसायासाठी किती भांडवल लागेल?

    व्यवसायासाठी किती भांडवल लागेल?

    हुशार व कल्पक उद्योजक अगदी कमी भांडवलात उत्तम प्रतीच्या सेवा व उत्तम प्रकारची गुणवत्ता असणारी उत्पादने बाजारात आणत असतो किंवा काही उद्योजक अगदी मुबलक प्रमाणात भांडवल उद्योगात गुंतवतात. ग्राहकांकडून ते हक्काने मागून घेतात व ग्राहकही स्वखुशीने त्या उत्पादनांची किंमत त्या उद्योजकाला देत असतात. उदाहरण द्यायचे झाल्यास मॅकडोनाल्ड ही कंपनी १०-१२ रुपयाला मिळणारा वडापाव (बर्गर) २७ रुपायांना विकते. त्याची उत्पादन किंमत अगदी २-३ रुपये इतकी कमी आहे, तरीही ग्राहक ती किंमत स्वखुशीने देतात.

    आपल्या व्यवसायाचे एक कार्यालय मुख्य शहरात असावे. एकापेक्षा अधिक शहरात व्यवसाय करु इच्छिणाऱ्या उद्योजकांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या शहरात एक एक कार्यालय चालू करावे. म्हणजे ६ उद्योजक एकत्र आले व त्या सहाही उद्योगांना नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे व मुंबई या ६ ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी प्रत्येकी ६-६ कार्यालये चालू करणे आवश्यक आहे. येथे ३६ कार्यालये सुरु करण्याऐवजी फक्त सहाच कार्यालये सुरु करावीत. प्रत्येकाने एक-एक कार्यालय सांभाळावे, म्हणजे प्रत्येकाच्या सहा शाखा होतील; मात्र खर्च एकाच कार्यालयाच्या खर्चाएवढा असेल.

    को-वर्किंग स्पेस हा एक खूप चांगला प्रकार आहे. Innov8, WeWork, 91Springboard, Awfis, Smartworks, Kafnu, myHQ अशा अनेक कंपन्या ही सुविधा पुरवतात. यामध्ये एका मोठ्या जागेत अनेक छोटे छोटे डेस्क बनवलेले असतात. इथे चहा-कॉफी, वायफाय, ऑफिस चेअर, डेस्क अशा सर्व सुविधा मिळतात. नाममात्र शुल्क देऊन यापैकी एक डेस्क तुम्ही घेऊ शकता आणि तिथून काम सुरु करू शकता. एखादी मिटिंग करायची असेल तर त्यासाठी वेगळी मिटिंग रूम असते. अनेक नवउद्योजक एकाच ठिकाणी त्यांच्या आयडियाजवर काम करत असतात त्याचा सुद्धा नेटवर्किंगसाठी फायदा होतो.

    Virtual Office (व्हर्च्युअल ऑफिस) ही संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. हे एक अशा प्रकारचे ऑफिस असते ज्यामध्ये जगभरातल्या सर्व मुख्य शहरात तुम्ही तुमचे कार्यालय अगदी कमी खर्चात सुरु करु शकता. उदा. मुंबईत नरीमन पॉईंट किंवा बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स सारख्या महागड्या ठिकाणी एक ऑफिस भाड्याने घ्यायचे झाल्यास दरमहा ६० हजार रुपये ते २ लाख रुपये भाडे लागते. त्याऐवजी virtual office चे भाडे हे केवळ ६-१० हजार एवढेच असते. Virtual office मध्ये असिस्टंटचा पगार देण्याची गरज नाही, फोनबिल व वीजबिल भरण्याची गरज नाही; तरीही या पत्यावर आलेली पत्रे व डॉक्युमेंट तुम्हाला मिळतात. तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर मिळतो. तो उचलण्यासाठी व फोन वर झालेल्या चर्चेच्या नोंदी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक यंत्रणा काम करत असते. ६-१० हजारात हे सर्व मिळत असते. इतर कोणतीही छुपी किंमत द्यावी लागत नाही. याचा फायदा नवीन ऑर्डर मिळवण्यासाठी होतो, समोरच्या व्यक्तीवर तुमचा चांगला प्रभाव पडतो.

    अशा कितीतरी गोष्टी आपल्याला ‘जुगाड’ या तत्त्वाचा वापर करुन कमी भांडवलात निर्माण करता येतात. आपली विचार करण्याची पध्दत थोडीशी बदलून फार काही साधता येते. अर्थात हे सर्व सुरुवातीच्या टप्प्यात करायचे आहे, त्यानंतर जसजसा व्यवसाय वाढत जाईल, तसतशा ह्या जुगाड केलेल्या गोष्टी बदलून गुणवत्ता असलेल्या (Standard) स्वरुपात स्थापित करणे चांगले. यामध्ये कुणालाही फसवण्याचा उद्देश नसावा. समोरुन जर विचारणा करण्यात आली, तर स्पष्ट शब्दात आपण केलेली तजवीज त्यांना सांगणे हितावह असते. विश्वास टिकवण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जर विचारले नाही तर आपणहून सांगणे गरजेचे नाही.

    जयहिंद!!!

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

    आणखी वाचा

  • व्यवसायाच्या वाटेवर चालताना – कशी करावी सुरुवात?

    व्यवसायाच्या वाटेवर चालताना – कशी करावी सुरुवात?

    आता ही सर्व उत्तरे सोडून व्यवसायाची सुरुवात कशी करता येईल याचे योग्य व सोपे असे उत्तर शोधून काढूया. नोकरी सोडून व्यवसाय करायचे ठरले. दुसऱ्या लेखाकांत व्यवसाय करण्याचे फायदे पाहिले. सुरुवात करण्याआधी काय करावे व मानसिकता कशी असावी याबाबत जाणून घेतले. कोणता व्यवसाय करावा व त्या व्यवसायाचे कार्यक्षेत्र कसे निवडावे हेही आपण ठरवले. बिझनेस प्लॅनची गरज जाणून घेतली. त्यातील महत्त्वाचे मुद्दे पाहिले. घरातील व्यक्ती पाठिंबा मिळवण्याची प्रक्रिया जाणून घेतली. अनुभवाबद्दल जाणून घेतले. हे सगळे केलेल्या व्यक्तीला व्यवसायाच्या सुरुवातीला करायच्या गोष्टींचा अंदाज आलेला असतो.

    व्यवसाय करण्यासाठी लागणारे भांडवल किती व ते कसे मिळवावे? भांडवल उभारणी करत असताना तारण नसल्यास काय करावे? भांडवल उभारणीचे पैसे परत कसे करावे? सरकारी परवानग्या कोणत्या व त्या कशा मिळवाव्यात? या परवानग्यांचा होणारा फायदा कोणता? या प्रश्नांची उत्तरे शोधणे बाकी असते. त्याआधी आपली उत्पादने (वस्तू/सेवा) निर्मितीसाठी लागणारी यंत्रे, अवजारे, मनुष्यबळ व जागा या सारख्या गोष्टी कुठे मिळतील याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे असते. म्हणजे भांडवल उभारणीनंतर आपला उद्योगाचा मार्ग सुकर होतो. व्यवसायाची वाढ अतिशय वेगाने होते

    तुम्ही भांडवल उभारणी करण्यासाठी लागणारे पैसे मिळवण्यासाठी पाठवलेला प्रत्येक ईमेल हा लेटरहेड वरच असावा. लेटरहेडचे एक module तुमच्या लॅपटॉपमध्ये जतन करुन ठेवलेले असावे. त्यामुळे आपण पाठवलेला प्रत्येक व्यवसाय प्रस्ताव गांभीर्याने वाचला जाण्याची शक्यता वाढते. तुम्ही कार्यालय/ऑफिस घेऊ शकत नसाल, तर घरचा पत्ता हा कार्यालयाचा पत्ता म्हणून प्रत्येक ठिकाणी वापरा. व्यवसायाचे फेसबुक पेज तयार करावे, त्यासाठी एकही रुपयाचा खर्च नाही, मात्र हजारो लोकांपर्यत व्यवसाय पोहोचवण्यास त्याची मदत होते.

    आपल्या व्यवसायात भागीदार घेणार की नाही? हा प्रश्न सोडवणे गरजेचे ठरते. भागीदार घेणार असल्यास त्याचे व तुमचे काम काय असेल? याची विभागणी करणे किफायतशीर ठरेल. एकाच व्यक्तीने सर्व काम करणे म्हणजे व्यवसायाला मिळालेली गती कमी करण्यासारखे ठरते. त्यामुळे व्यवसायाच्या प्रमुखाने स्वतःचा काही काळ रिकामा ठेवला पाहिजे, जेणेकरुन व्यवसाय वृध्दीसाठी इतर प्रयत्न करता येतील.

    लागणारी यंत्रे घेतलीच पाहिजेत किंवा नाही याचा विचार तुमच्या मूळ भांडवलाचा अंदाज घेऊन केला पाहिजे. फार कमी भांडवल असल्यास काही कामे outsourcing करणे हितावह ठरते. त्यामुळे जागा व पैशाची बचत, तर होतेच शिवाय आपल्याला थोडासा वेळही मिळतो.

    व्यवसाय करु इच्छिणारी काही हुशार माणसे आपल्या सोबत असल्यास त्यांच्याकडून आपण बनवलेली प्रत्येक गोष्ट तपासून घेतली पाहिजे व त्यात अपेक्षित असणारे बदल केले पाहिजेत. ही हुशार माणसे तुम्हाला कायमस्वरुपी मार्गदर्शकाच्या भूमिकेत भेटत असतात. त्यांचा आदर करणे व त्यांची मर्जी राखणे ही आपली प्राथमिकता असावी. मग काही कायदेविषयक, तर काही अर्थविषयक, काही लोकसंपर्क दांडगा असलेली अशी प्रत्येक प्रकारची माणसे तुमच्याकडे असली पाहिजेत. त्यांना पगार देऊन कामाला ठेवणे आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यात परवडण्यासारखे नसले, तरी अशा माणसांचे संपर्क आपल्या मोबाईलमध्ये कायम जतन करुन ठेवलेले असल्यास आपल्याला हवे तेवढे काम तेवढाच मोबदला देऊन करुन घेणे उत्तम ठरते.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

    आणखी वाचा

  • व्यवसायच का ? – नोकरदार आणि व्यावसायिक यातील फरक

    व्यवसायच का ? – नोकरदार आणि व्यावसायिक यातील फरक

    एके दिवशी कंपनीच्या मॅनेजरला (व्यवस्थापकाला) समोसावाल्याची खिल्ली उडवण्याची लहर आली. मॅनेजरने विचारले, “मित्रा तू तुझे हे समोश्याचे दुकान खूप चांगल्या प्रकारे चालवत आहेस. पण तू तुझा अमूल्य वेळ व हुशारी समोसे तळण्यात वाया घालवत आहेस, असे तुला कधीच वाटत नाही का? जरा विचार करुन बघ, जर तू सुध्दा माझ्यासारखा एखाद्या कंपनीत काम करत असता, तर कुठपर्यंत प्रगती करु शकला असता? कदाचित तू देखील माझ्यासारखाच मॅनेजर झाला असता.”

    या प्रश्नावर थोडासा विचार करुन शांतपणे हसत समोसावाल्याने उत्तर दिले, “साहेब माझे हे काम तुमच्यापेक्षा कैकपटीने चांगले आहे. १० वर्षांपूर्वी मी डोक्यावर टोपली घेऊन दारोदार फिरुन समोसे विकायचो. तेव्हा तुम्ही प्रथम नोकरीला लागला असाल. १० वर्षापूर्वी मला समोसे विकून दर महिन्याला एक हजार रुपये मिळायचे, तेव्हा तुमचा पगार १० हजार रुपये होता. १० वर्षात दोघांनी खूप कष्ट केले, मेहनत घेतली. तुम्ही सुपरवायझर पासून मॅनेजर पदापर्यंत मजल मारली व मी टोपली घेऊन फिरणारा समोसावाला ते एक स्थिरस्थावर दुकानदार असा प्रवास केला. आज तुमचा पगार ५० हजार रुपये आहे, तर मी महिन्याला दोन लाख रुपये कमावतो.”

    मॅनेजर साहेब ऐकत होते, “याउलट तुमचा मुलगा Direct (थेट) तुमच्या पदावर जाऊ शकत नाही. त्याला परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. त्याच्या मेहनतीचा फायदा या कंपनीच्या मालकाच्या मुलांना होईल. तो आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तुमच्या एवढाच किंवा फार तर दोन पावले पुढे जाईल, तर माझा मुलगा माझ्या फार पुढे निघून जाईल. तर साहेब आता सांगा, कुणाचा वेळ व हुशारी वाया जात आहे?” मॅनेजर साहेबांनी २ समोश्याचे २० रु. दिले व निरुत्तर होऊन निघून गेले.

    हा प्रसंग व्यवसाय का केला पाहिजे हे शिकवून जातो. तुमच्यानंतरही तुमचा वारसा केवळ मुलांनाच नाही, तर समाजाला, काम करणाऱ्या लोकांना व कितीतरी घटकांना मिळत असतो. जमशेदजी टाटांनी १८६८ मध्ये मुहूर्तमेढ रोवलेला टाटा समूह आज १५० वर्षांनीही यशस्वी घौडदौड करतो आहे. एडिसनने १८९२ मध्ये सुरू केलेली जनरल इलेक्ट्रिक कंपनी आज एडिसन नंतरही काम करत आहे. कोणतीही संकल्पना, विचार किंवा संस्था (मग तो व्यवसाय असो, सामाजिक संस्था असो की देश) ही तिला जन्म देणाऱ्या व्यक्तीहून फार मोठी असते. तिला जन्म देणाऱ्या मेंदूचा नाश झाला तरी ती वाढतच राहते. चिरकाल टिकते. फक्त सुरुवातीच्या टप्प्यात आपण तिची काळजी घ्यायची असते. एकदा ती स्वतःच्या ताकदीवर उभी राहिली, की आपले काम पूर्ण होते. व्यवसायामध्ये हा कालावधी सरासरी तीन वर्षाचा आहे. काही ठिकाणी तो कमीअधिक होऊ शकतो. नाउमेद होता हा व्यवसाय स्वतःच्या ताकदीवर उभा राहिपर्यंत कसा पुढे नेता येईल? यासाठी कोणती मानसिकता लागेल? या वर पुढील लेखात जाणून घेऊ.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

    आणखी वाचा

  • व्यवसायाच्या वाटेवर चालताना – अनुभवाची गरज आहे का?

    व्यवसायाच्या वाटेवर चालताना – अनुभवाची गरज आहे का?

    जगातले सर्वात मोठे Amusement Park वॉल्टला बनवायचे होते. त्यासाठी लागणारी अब्जावधीची संपत्ती वॉल्टने उभी केली व जगात त्याआधी कधीच झाले नाही ते घडवण्याचा प्रकल्प सुरु केला. त्याचा भाऊ रे डिस्ने त्याच्यासोबत होता. या प्रकल्पाचे काम चालू असतानाच वॉल्ट डिस्नेला या जगाचा निरोप घ्यावा लागला.

    रे डिस्नेने या प्रकल्पाचे काम पुढे चालू ठेवले. जगप्रसिध्द Disneyland तयार केले. तेव्हा पत्रकारांनी रे डिस्नेला एक प्रश्न विचारला तो म्हणजे, “हा प्रकल्प पूर्ण झालेला पाहायला वॉल्ट असायला हवा होता असे तुम्हाला वाटत नाही का?” त्यावेळी रे डिस्नेने पत्रकाराला दिलेले उत्तर हे आजच्या लेखाचे उत्तर आहे. रे या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाला, “मित्रहो, वॉल्टने हा प्रकल्प पूर्ण झालेला कित्येक वेळा पाहिला आहे. आज आपण जे पहात आहोत; ते वॉल्टने कित्येक वेळा पाहिले म्हणून हे साकारले.”

    खरोखरच डिस्नेलँडने पर्यटन व्यवसायातले सगळे विक्रम मोडून काढले. व्यवसाय करताना उद्योजक जे स्वप्न पाहतो, ते साकारण्यासाठी प्रयत्न करतो, तोच खरा अनुभव असतो. अनुभव हा विकत मिळत नाही किंवा तो इतरांकडून उसणवारही घेता येत नाही. तो मिळवावा लागतो. तो प्रत्यक्ष काम केल्यानेच मिळतो. अबांनींसारखे उद्योजकही त्यांच्या मुलांना त्यांचा अनुभव देऊ शकत नाहीत. ते फक्त मार्गदर्शन करु शकतात. त्यांच्या मुलांनाही अनुभव घ्यावाच लागतो.

    ठराविक कामाचा अनुभव घ्यायचा झाल्यास काही मार्ग अजून आहेत. त्यामध्ये वाण्याचा मुलगा दुकानात बसून आर्थिक व्यवहार त्याच्या सवयीचे करुन घेतो. वाण्याची गिऱ्हाईकांशी बोलण्याची कला आत्मसात करुन घेतो. मारवाडी, गुजराती माणसाला या गोष्टींचे निरीक्षण करण्याची व त्याचे आकलन करण्याची संधी घरातच मिळत असते. हा अनुभवाचाच भाग असतो, संपूर्ण अनुभव नव्हे. आता ज्याला हे वातावरण मिळत नाही. अशा आपल्यासारख्या मराठी माणसाला हा अंशत: अनुभव मिळवण्याचे काही मार्ग आहेत त्यावर एक नजर टाकूयात. या मार्गाचा अवलंब केल्यास आपण वर वर्णन केलेल्या मुलांपेक्षा काहीशा जास्त वेगाने तेवढाच अनुभव कमी वेळात प्राप्त करुन घेऊ शकतो.

    Youtube वर अशा अनेक उद्योजकांनी केलेली भाषण उपलब्ध आहेत, ती लक्षपूर्वक ऐकणे व त्यातील महत्वाच्या नोंदी करुन ठेवणे. काही भाषणं डाऊनलोड करून मोबाईलमध्ये घेऊन येताजाता प्रवास करताना ऐकल्यासही नवे अनुभव सहज घेता येतात. प्रत्येक उद्योजकांनी हे अनुभव मिळवण्यासाठी वाचावे असे एक पुस्तक म्हणजे – How I raised Myself from Failure to Success in Selling. हे पुस्तक फ्रँक बैटगर यांनी लिहलेले असून याची मराठी आवृत्ती (मी अपयशाच्या खाईतून यशोशिखरावर कसे पोहोचलो?) गोयल प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. याच बरोबर भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC of India) मध्ये एकदोन वर्षे काम करणेसुध्दा फायदेशीर ठरेल. कारण इथे कामाच्या वेळेची मर्यादा नसते व उत्तम उत्पन्न (चांगले पैसे) मिळते. आपल्याला व्यवसाय शिकण्यासाठी वेळ मिळतो.

    अनुभव घेण्याचा अजून एक मार्ग म्हणजे तुम्ही जो व्यवसाय करणार आहात त्या व्यवसायातील यशस्वी माणसाचा सहाय्यक (Assistant/Helper/Driver) म्हणून वर्षभर काम करणे हा होय. या माणसांचा सहवास लाभेल असे कोणतेही काम तुम्ही स्वीकारा. एका वर्षाने तुम्हाला जी अनुभवाची शिदोरी मिळेल ती एमबीए केलेल्या तरुणाहून सरसच असेल. या सर्व पध्दतीतून अनुभवसंपन्न झाल्यावर आपण प्रत्यक्ष व्यवसाय सुरु करण्याची प्रक्रिया सुरु करत आहोत.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती
  • कुटुंबीयांचा पाठिंबा की विरोध ? व उपाय

    कुटुंबीयांचा पाठिंबा की विरोध ? व उपाय

    उद्योगपती वालचंद हिराचंद, लोखंडी नांगरांना जन्म देणारे किर्लोस्कर बंधू, आबासाहेब गरवारे, भारत फोर्जचे बाबा कल्याणी, विकोचे पेंढारकर घराणे, कॅमलिनचे दांडेकर, आयफ्लेक्सचे दीपक घैसास, दास ऑफशोअरचे अशोक खाडे, घोडावत ग्रुपचे संजय घोडावत, व्हीआयपी कपड्यांचे सर्वेसर्वा पाठारे बंधू, सारस्वत बँकेचे एकनाथ ठाकूर, मराठी नाटक व्यवसायाला वेगळा आयाम देणारे विष्णुदास भावे, दाते पंचांग विकणारे दाते, पितांबरीचे प्रभुदेसाई, बीव्हीजीचे हणमंतराव गायकवाड, माने ग्रुपचे रामदास माने, हावरे ग्रुप अशी न संपणारी मराठी व्यावसायिकांची यादी आहे.

    मात्र या सर्व उद्योजकांचा विचार केला तर असे आढळून आले आहे, ते म्हणजे यातील बहुतांश उद्योजक हे पहिल्या पिढीचे उद्योजक आहेत. त्यांना आपला उद्योग वारसा पुढच्या पिढीकडे म्हणाव्या तशा प्रभावी पध्दतीने हस्तांतरीत करता आला नाही व या सर्व उद्योजकांच्या आधीच्या पिढीनेही कधी व्यवसाय केलेला नव्हता. त्यामुळे ओघानेच हे आले की, कोणालाही कुटुंबातून फारसा पाठिंबा मिळाला नव्हता. तरीही या उद्योजकांनी आपला उद्योग मोठा करण्याची स्वप्ने पाहिली. त्यासाठी लागेल ते कष्ट उपसले, आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला व अपेक्षित असणारे यश त्यांना मिळाले. त्यामुळे आपण खचून न जाता या उद्योजकांनी निर्माण केलेल्या वाटांवरून पुढे चालायचे आहे.

    घरातील व्यक्तींचा विरोध कमी करुन त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करण्याचे काही उपाय आपण पाहू या. घरातील व्यक्तींचा विरोध असणाची काही कारणे म्हणजे उत्पन्नाची अनिश्चितता, भांडवल लावण्यासाठी कमी पडणारी क्षमता, अनुभवाचा अभाव ही होत. एकतर तुम्ही भरपूर पैसा कमावून घरी द्यायला लागला की, घरच्यांचा व्यवसायाला असलेला विरोध सहज मावळून जातो. तुम्ही पैसे कमावावेत ही त्यांची माफक अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. आता घरातील सर्वात जिव्हाळ्याच्या व्यक्तीला विश्वासात घेऊन व्यवसाय पूर्ण समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. तुम्ही घरातील या व्यक्तीला तुम्ही व्यवसाय करु शकता ही खात्री पटवून देऊ शकलात, तर व्यवसायासाठी लागणारी मदतसुध्दा घरातल्या व्यक्तींकडून मिळते. जेव्हा तुम्ही घरातील या व्यक्तीचा विश्वास संपादन करता तेव्हा तुम्हाला कोणालाही व्यवसाय पटवून देण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. मग ती व्यक्ती हळूहळू घरातील इतर व्यक्तींना तुमच्या बाजूने करते.

    गुजराती, मारवाडी, पंजाबी व सिंधी कुटुंबामध्ये घरातील वातावरणच व्यवसायासाठी अनुकूल असते. त्यामुळे त्यांना जास्त संघर्ष करावा लागत नाही. म्हणून शक्यतो काहीजणांनी मिळून व्यवसाय चालू केला, तर प्रत्येकाने दुसऱ्याच्या घरात समजावून सांगावे म्हणजे ते पटकन समजून जातात व त्यांना विश्वास बसतो की हा शेजारचा/किंवा कॉलेजमधला मित्र व्यवसाय करतोय म्हणजे तुमच्याबरोबर कोणीतरी आहे व तुम्ही काहीतरी करु शकता.

    आणखी एक महत्त्वाची गोष्ट; कुटुंबातील व्यक्तीचा पाठिंबा असो किंवा विरोध असो आपले पूर्ण लक्ष व्यवसाय मोठा करणे, त्यासाठी लागेल त्या गोष्टी करणे यावरच असले पाहिजे. घरातील लोक तुम्हाला सुरवातीला पाठिंबा देत नसतील, तर कालांतराने का होईना ते तुमच्या बाजूने होतातच. हे सगळीकडे झाले आहे हा इतिहास आहे. परत या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा.

    अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

  • लेख ७.२ – बिझनेस प्लॅन कसा तयार करावा?

    लेख ७.२ – बिझनेस प्लॅन कसा तयार करावा?

    ५. स्पर्धक – आपण करत असलेल्या उत्पादनांची निर्मिती करणारे कितीतरी उद्योजक आपल्या कार्यक्षेत्रात असतात. त्यापैकी आपल्या उत्पादनांच्या किंमतीत व आपल्या ग्राहक वर्गाला आकर्षित करणारे कोण आहेत. त्या तीन–पाच स्पर्धकांची नावे यात समाविष्ट करायची आहेत. कारण आपल्याला आपल्या उत्पादनांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी हे माहिती असणे गरजेचे असते. याशिवाय गुंतवणूकदाराला हे समजते की आपला बाजाराविषयी (मार्केटचा) अभ्यास खूप चांगला आहे.

    ६. स्पर्धकाच्या तुलनेत असणारी तुमची वैशिष्टे – आपण ज्या प्रकारचा व्यवसाय करतो आहे, त्या प्रकारची उत्पादने निर्माण करणारे उद्योजक जर आधीच असतील तर आपण नवीन उद्योग सुरु का करतोय? किंवा आपल्या व्यवसायाची ग्राहकांना गरज काय? आपला व्यवसाय चालण्याची शक्यता काय? या प्रश्नांची उत्तरे देणारा हा टप्पा आहे. तर या प्रश्नांची उत्तरे अशी असतात; आधीचे उद्योजक ज्या सेवा देण्यात कमी पडतात, त्या सेवांची उपलब्धता करुन देण्याची क्षमता असणारी उत्पादने आपण तयार करत आहोत, त्याच किंमतीत चांगली गुणवत्तापूर्ण उत्पादने पुरवत आहोत.

    ७. लागणारे भांडवल व त्याचा उपयोग – आपण सुरु करत असणाऱ्या व्यवसायासाठी लागणारे अंदाजे भांडवल आणि त्याचा उपयोग आपण कोणत्या गोष्टींसाठी आणि कशा प्रकारे करणार आहोत याची माहिती गुंतवणूकदारांना द्यावी लागते.

    ८. विक्री व जाहिरात माध्यमे – या टप्प्यात आपण आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी आपण कोणते प्रयत्न करणार आहोत याची माहिती थोडक्यात द्यावी लागते. विक्री वाढवण्यासाठी कोणती पावले उचलणार आहोत तसेच आपले उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचं मार्केटिंग कसे करणार आहोत यासंदर्भात माहिती द्यावी.

    ९. उलाढाल, खर्च व नफा यांचा आलेख – उद्योगाला सुरुवात केल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज गुंतवणूकदारांना द्यावा लागतो. यात आपल्याला साधारणपणे पुढील तीन सहामाही (दीड वर्ष) किंवा तीन वर्षात उद्योगाचा होणारा विस्तार दाखवून द्यायचा असतो. यात आपल्या उद्योगाची होणारी एकूण उलाढाल, विक्री व जाहिरात माध्यमांवर होणारा तसेच इतर खर्च वजा करून निव्वळ नफा दाखवून द्यावा लागतो. ही सर्व माहिती एखाद्या तक्त्याच्या किंवा आलेखाच्या स्वरूपात दाखविल्यास त्याचे आकलन करणे सोपे जाते.

    १०. व्यवसायातील महत्त्वाचे टप्पे व त्याची कालमर्यादा – यामध्ये व्यवसायातील महत्त्वाचे टप्पे कोणते असतील आणि ते कधीपर्यंत पूर्ण होतील याची निश्चित कालमर्यादा सांगावी लागते. उदाहरणार्थ, सहा महिन्यात दोन नवीन शाखा काढणार (ठिकाणांसहित), स्वतःची वेबसाईट सुरु करणार, उद्योगातील एखादा विशिष्ट दर्जा/मानांकन प्राप्त करणार इत्यादी.

    ११. सोबत काम करणारे छोटेमोठे ब्रँड – आपल्या बरोबरीने काही छोटे मोठे ब्रँड काम करीत असतील किंवा काही सेवांसाठी आपण एखाद्या उद्योगाशी, संस्थेशी, व्यक्तीशी टायअप केलेले असेल, तर त्यांचासुद्धा उल्लेख आवर्जून करावा. याचा गुंतवणूकदारांवर सकारात्मक प्रभाव निर्माण होतो.

    १२. काम करणारी टीम फोटो व पदासहित – आपल्या व्यवसायामध्ये आपल्याबरोबर काम करणाऱ्या व्यक्तींविषयी आणि त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली आहे याची माहिती करून द्यावी. तसेच त्या व्यक्तींची शैक्षणिक अर्हता, कामाचा अनुभव किंवा एखाद्या विषयात विशेष प्राविण्य मिळवले असेल तर त्याचासुद्धा उल्लेख करावा.

    १३. व्यवसायाचा पत्ता, संपर्क, ईमेल व असल्यास वेबसाईट – यामध्ये आपल्या व्यवसायाचा पत्ता, संपर्क क्रमांक, व्यावसायिक ईमेल आयडी आणि वेबसाईट असल्यास तिचा उल्लेख करावा. तसेच सोशल मिडियावर तुमचे व्यावसायिक पेज किंवा अकाऊंट असल्यास त्याची माहिती द्यावी. तुम्हाला संपर्क करण्यासाठीची सर्व माहिती एकत्रित एकाच ठिकाणी देणे फायद्याचे ठरते.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती
  • बिझनेस प्लॅन कसा तयार करावा?

    बिझनेस प्लॅन कसा तयार करावा?

    बिझनेस प्लॅन हे दोन असतात. एक म्हणजे डीपीआर आणि दुसरा म्हणजे बी.पी. यापैकी जो स्वतःला मार्गदर्शन करणारा भाग असतो, त्याला संपूर्ण प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR (Detailed Project Report) म्हणतात. जो इतर कोणालाही सांगायचा नसतो. ते आपल्या व्यवसायाचे रहस्य असते. त्यातून आपला व्यवसाय चालवण्याची पूर्ण व इत्थंभूत माहिती आपल्याला मिळत असते. हे एक प्रकारचे व्यवसाय मार्गदर्शक असते. त्यानुसार आपल्या व्यवसायातील प्रत्येक पाऊल ठरत असते.

    बिझनेस प्लॅन हा स्वतःच बनवला पाहिजे, कारण आपल्या स्वतःइतका तो व्यवसाय कोणीही जाणत नसतो. या बनवलेल्या बिझनेस प्लॅनमध्ये मग सीए, व्यवसाय व्यवस्थापक, आर्थिक सल्लागार यांच्याकडून सुधारणा करुन योग्य ते बदल करावेत. बिझनेस प्लॅन हा व्यवसायाच्या सुरुवातीला बनवला जातो व त्यात वारंवार बदल केले जातात. उदाहरणाद्वारे समजून घ्यायचे असल्यास व्यवसाय हा एक क्रिकेटचा सामना आहे. त्याची वेळ ठरलेली आहे. मात्र सामना चालू झाला की आपण त्याचे धावते समालोचन (Live Commentary) करत/बघत असतो. धावफलक (Score Board) सतत बदलत असतो. हे सर्व बदल सामना चालू असताना त्या त्या वेळीच करायचे असतात. त्याचा आधी फक्त अंदाज लावला जातो व सामना पूर्ण झाल्यावर विश्लेषण (Analysis) केले जाऊ शकते. चालू सामन्यात त्या बदलाची दखल घेणे गरजेचे ठरते. व्यवसायाच्या सुरुवातीला ज्या उद्योजकांनी हा बिझनेस प्लॅन बनवलेला नसतो, त्यांनी आत्ता याक्षणी तो बनवला पाहिजे.

    यातील दुसरा भाग म्हणजेच बी.पी. अर्थात आपला बिझनेस प्लॅन, जो आपण आपल्या गुंतवणूकदारांना, भांडवल पुरवठादार व बँकांना सुरवातीच्या टप्प्यात देत असतो व भांडवल मिळण्याची खात्री देण्यासाठी पहिल्या भागातून म्हणजेच संपूर्ण प्रकल्प अहवालामधून सविस्तर महत्त्व पटवून देत असतो. बिझनेस प्लॅनमधून व्यवसायाची गरज, अपेक्षित ग्राहक, व्यवसायात मिळणारा नफा, होणारा खर्च, विक्री व विपणन (Sales & Marketing), काम करणारी यंत्रणा व मनुष्यबळ, या व्यवसायाशी संबंधित सर्वच बाबींचे चित्र स्पष्ट होत असते. आता प्रत्यक्ष बिझनेस प्लॅन बनवण्याची प्रक्रिया पाहू या.

    बिझनेस प्लॅनमधील पहिला व दुसरा भाग यापैकी आपल्या सोयीनुसार कोणताही भाग आधी बनवायचा. पण शक्यतो दुसरा भाग आधी बनवल्यास पहिला भाग म्हणजे दुसऱ्या भागातील प्रत्येक मुद्द्याचे सविस्तर वर्णन व अंमलबजावणीचे उपाय लिहले जातात किंवा पहिला भाग आधी बनवला तर दुसरा भाग म्हणजे पहिल्या भागाचा सारांश होय. बिझनेस प्लॅनचे टप्पे –

    १. व्यवसायाचे नाव, घोषवाक्य (tagline), संकेतचिन्ह (logo) याचा समावेश व व्यवसायाला साजेशे असे एक चित्र असावे. यामुळे आपल्या व्यवसायाची एक Image/प्रतिमा बिझनेस प्लॅन वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर उभी राहते. त्यामुळे हे बिझनेस प्लॅनचे जसे आपण फर्स्ट इम्प्रेशन म्हणतो तसेच हे सुरुवातीचे दर्शन आहे. यापुढील प्रत्येक टप्प्यात कमीत कमी २ मुद्दे व जास्तीत जास्त ४ मुद्दे लिहावेत.

    २. समस्या – कोणताही व्यवसाय म्हणजे वेळ, श्रम आणि पैसा या तीन गोष्टींची बचत आणि एखाद्या समस्येचे उत्तर यातूनच जन्माला येतो. जर समस्या नसतील तर व्यवसाय निर्माण होत नाही. उदा. चेहरा कोरडा/काळा असणे ही समस्या, तर त्यावर लावण्याचे मलम (cream) हा त्यावरचा उपाय झाला. म्हणजे एखाद्या समस्येचे उत्तर देणाऱ्या प्रक्रियेला व्यवसाय म्हणतात.

    ३. उपाय – समस्या ही जोपर्यंत समस्या आहे, तोपर्यंत तिचे व्यवसायात रुपांतर होत नाही. याउलट समस्येवरचा उपाय शोधून काढणे म्हणजे व्यवसाय होय. त्या समस्येचे कोणते उपाय आपल्या व्यवसायामुळे शोधले जातात. यावर दोन–चार मुद्दे यात समाविष्ट करावेत.

    ४. अपेक्षित ग्राहकवर्ग – प्रत्येक व्यवसायात (B2B किंवा B2C) ग्राहक असला तरच तो व्यवसाय चालतो. म्हणून आपल्याला आपला ग्राहक ओळखता आला पाहिजे. आपल्या कार्यक्षेत्रानुसार, ग्राहकाच्या खरेदीक्षमतेनुसार व आपल्या विक्री किंमतीनुसार आपला ग्राहक व त्यातून होणारी वर्षभराची अपेक्षित उलाढाल याचे गणित या टप्प्यावर केले जाते. महिलांसाठी सौंदर्यप्रसाधने बनवणाऱ्या उद्योगाचा अपेक्षित ग्राहक वर्ग हा ११-४५ वयाच्या महिला हा असतो.

    यात परत दोन उपप्रकार पडतात. आपण ज्या प्रकारची उत्पादने उत्पादित करत असतो, त्या सर्व उत्पादनासाठी उपलब्ध असलेल्या बाजारपेठेतील ग्राहकवर्ग हा पहिला अपेक्षित ग्राहकवर्ग आहे. मात्र हा एकूण मार्केटचा ग्राहकवर्ग असतो. त्या संपूर्ण मार्केटमधील आपल्या स्वतःच्या उत्पादनाचा ग्राहक वर्ग किती? त्यातून मिळणारा आपला मार्केटशेअर (बाजारातील वाटा) किती? व आपला नफा किती? आपली उलाढाल किती? हे यात दर्शविता आले पाहिजे. हे वेगवेगळ्या आलेखाच्या साहाय्याने दाखवता येते.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती
  • बिझनेस प्लॅन जरुरी आहे का?

    बिझनेस प्लॅन जरुरी आहे का?

    विकसनशील देशातील युवक हे व्यवसायासाठी मदत शोधण्यात आपली युवावस्था संपवून टाकतात, पण त्यांना अशा प्रकारची मदत मिळत नाही. मागास देशात युवकांकडे किंवा ४० वर्षे ओलांडलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या माणसांकडे पैसे व व्यवसाय करण्याची इच्छा नसते.

    तारुण्याच्या उंबरठ्यावर माणसाचे रक्त गरम असते. काहीतरी करुन दाखवण्याची इच्छा त्याला गप्प बसू देत नसते. त्याच्या डोक्यात सतत नवनवीन संकल्पनाचा जन्म होत असतो. त्या कल्पना साकारण्याची त्याची तयारी असते. त्यासाठी लागेल ती जोखीम पत्करण्यासाठी तो तयार असतो. या तारुण्यातील उर्जेला आपण ‘पतंगा’ची ऊर्जा म्हणू या. कारण दिव्याभोवती रात्रीच्या अंधारात पतंग फिरत असतात. त्या पतंगांना दिव्याच्या ज्योतीकडे झेप घेण्याची इच्छा अनावर होत असते. ते स्वतःला रोखू शकत नाहीत किंवा रोधू शकत नाहीत. त्यांना माहित असते की आपण दिव्याच्या ज्योतीवर झेप घेतल्यास आपले पंख जळून आपण मरणार आहोत.

    प्रसंगी हे पतंग त्या ज्योतीकडे झेपावतात व आपले पंख जाळून मरुन जातात. मृत्यूची भीती त्यांना शिवत नाही. त्याचप्रमाणे नव्या उमेदीचा तरुण ह्या पतंगासारखा संकटावर झेपावण्यासाठी आतुर झालेला असतो, आसुसलेला असतो. अशावेळी त्याच्या कल्पनेला साकार करण्यासाठी लागणारे भांडवल व बाकी गोष्टी मिळाल्या तर तो यशाच्या शिखरावर फार वेगाने आरुढ होतो.

    वयाची ४०-४५-५० वर्षे पार केलेली माणसे गाठीशी चांगला पैसा बांधून असतात. त्यांची उमेद कमी झालेली असते, जोखीम पत्करण्याची वृत्ती संपत आलेली असते. त्यांनी हे पैसे जर तरुण वर्गाला भांडवल म्हणून दिले, तर त्यांनाही त्याचा भरघोस फायदा होतो व नवे व्यवसाय वेगाने वाढतात. ज्यांच्याकडे (टाटा, अंबानी सारखे मोठे उद्योजक, सचिन सारखे खेळाडू व अमिताभ सारखे कलाकार) भरपूर पैसे असतात अशा लोकांना चांगल्या तरुणांची गरज असते. ते आपले पैसे नवीन व्यवसायात गुंतवण्यास उत्सुक असतात. मात्र त्यांच्याकडे फार कमी वेळ असतो. अशा लोकांना अगदी ५-७ मिनिटांत संपूर्ण व्यवसाय (गुंतवणूक, ग्राहक, नफा इ.) प्रभावीपणे समजावून सांगणारा तरुण बाजी मारुन जातो. त्याला भरपूर पैसे मिळतात. असे पैसे प्राप्त करण्यासाठी प्रभावी बिझनेस प्लॅन बनवणे अत्यंत महत्त्वाचे असते.

    प्रगत देशात (अमेरिका, इंग्लड, जर्मनी, फ्रान्स व जपान) युवक आपल्याकडे असलेल्या कल्पनेत उतरवण्यासाठी भांडवलाच्या शोधात असताना ते वर्तमानपत्रात त्यांच्या डोक्यात असलेल्या संकल्पनेबाबत जाहिरात देतात व ज्यांच्याकडे पैसा आहे अशा व्यक्तींनी ती संकल्पना विकत घ्यावी म्हणून लिलाव करतात किंवा त्या संकल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी लागणारे भांडवल मागण्यासाठी प्रस्ताव ठेवतात. त्यातून नवी भागीदारी व गुंतवणूक करवून घेतात.

    १. व्यवसायाचे नाव, घोषवाक्य (tagline), संकेतचिन्ह (logo) याचा समावेश व व्यवसायाला साजेसे असे एक चित्र असावे.
    २. समस्या
    ३. उपाय
    ४. अपेक्षित ग्राहकवर्ग
    ५. स्पर्धक
    ६. स्पर्धकाच्या तुलनेत असणारी तुमची वैशिष्टे (USP)
    ७. लागणारे भांडवल व त्याचा उपयोग
    ८. विक्री व जाहिरात माध्यमे
    ९. उलाढाल, खर्च व नफा यांचा आलेख
    १०. व्यवसायातील महत्त्वाचे टप्पे व त्याची कालमर्यादा
    ११. सोबत काम करणारे छोटेमोठे ब्रँड
    १२. काम करणारी टीम फोटो व पदासहित
    १३. व्यवसायाचा पत्ता, संपर्क, ईमेल व असल्यास वेबसाईट

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती
  • कार्यक्षेत्र कसे ठरवावे? – व्यवसाय लोकल ठेवायचा कि ग्लोबल करायचा हे कसं ठरवावं.

    कार्यक्षेत्र कसे ठरवावे? – व्यवसाय लोकल ठेवायचा कि ग्लोबल करायचा हे कसं ठरवावं.

    आपला व्यवसाय वस्तूवर आधारित असल्यास कार्यक्षेत्र ठरविण्याची पध्दत आपण पाहूया. उत्पादित केलेल्या वस्तूची टिकवणक्षमता म्हणजेच तिचा कार्यकाल पूर्ण होण्याच्या आत अंतिम ग्राहकाला त्या वस्तूचा वापर करण्यासाठी वेळ मिळावा याची दक्षता घेणे अत्यंत जरुरीचे असते किंवा त्या वस्तूंची टिकवणक्षमता वाढवण्याचे उपाय शोधून काढल्यास कराव्या लागणाऱ्या प्रक्रिया करणे गरजेचे ठरते. उदाहरण द्यायचे झाल्यास कच्चे दूध हे जास्तीत जास्त २४ तासाच्या आत ग्राहकापर्यंत पोहोचणे गरजेचे असते तरच ते वापरात आणता येते. याउलट या दूधाचे पाश्चरित दूधात रूपांतर केल्यास हा कालावधी १८० दिवसांपर्यत वाढवता येतो. या वाढलेल्या टिकवण क्षमतेमुळे ते अधिकाधिक दूरवरच्या ठिकाणांपर्यंत पोहोचवणे शक्य होते.

    वाहतूक व्यवस्थेच्या उपलब्धतेवरही वस्तूचे कार्यक्षेत्र ठरवले जाते. दूरवर ग्रामीण भागात वाहतूक व्यवस्था म्हणावी तेवढी सुलभ नसते किंवा परदेशात वस्तू पाठवण्यासाठी वाहतुकीवर होणारा खर्च हा प्रचंड असतो. अशावेळी आपल्या वस्तूंची वाहतुकीवर आधारित कार्यक्षेत्रे निवडणे आवश्यक आहे. वाहतुकीत उत्पादने खराब होण्याच्या प्रमाणावरुनही याचा अभ्यास केला जाऊ शकतो. वेगवेगळ्या प्रदेशातील ग्राहकांच्या अभिरुचीवरुनही कार्यक्षेत्रात बदल करणे आवश्यक असते. उदा. तलम कपडे तयार करणाऱ्या व्यवसायाची गरज उष्ण कटिबंधीय प्रदेशात, तर उबदार कपडे हे थंड प्रदेशात विकले जाऊ शकतात. कार्यक्षेत्र हे ऋतुमानानुसारही बदलते. सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असणारे मनुष्यबळ (Working force) हेही कार्यक्षेत्र ठरवताना लक्षात घेणे गरजेचे आहे.

    सेवा (services) साठी कार्यक्षेत्र हे फार व्यापक असू शकते. आयटी उद्योगातील सेवा जगातील सर्वठिकाणी घरबसल्या पोहोचवता येतात व त्याचे मूल्यही घरबसल्या मिळवता येते. तर कुरिअर सेवेसाठी वाहतूक व्यवस्थेशी असणारी आपली समरसता ही महत्त्वाची ठरते. हॉटेल उद्योगासारख्या सेवांसाठी जागेची गरज लागते म्हणून या सेवांचे कार्यक्षेत्र मर्यादित असते. यावर मात करण्यासाठी त्याच्या अनेकानेक शाखा उघडणे हे फायदेशीर ठरते. टेलिमार्केटिंग सारख्या सेवांवर अंतराचा काही परिणाम होत नाही.

    आपल्या उत्पादनानुसार (वस्तू/सेवा) टिकवणक्षमता, प्रक्रिया, वाहतूक, वाहतुकीदरम्यान होणरी नासाडी, ग्राहकांची अभिरुची, ऋतुमान, आपल्याकडे असणारे मनुष्यबळ व आपली उत्पादनक्षमता या गोष्टींचा सारासार विचार करुन गल्ली, प्रभाग, गाव-खेडे, शहर, तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, देश, खंड किंवा अगदी जगभरात सर्वत्र असे कार्यक्षेत्र ठरवणे आवश्यक असते. प्रत्येक उद्योजक हे कार्यक्षेत्र ठरवतो. माल उत्पादित करतो, ग्राहकांपर्यंत वेळेत पोहोचवतो व नफा मिळवतो. सुरुवातीच्या टप्प्यावर जे आपले कार्यक्षेत्र असते त्यापेक्षा ते वाढवत नेणे हे त्या उद्योगाच्या वाढीसाठी लागणारे इंधन आहे.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती