Tag: Rajasthan

  • बेअरफुट कॉलेज

    बेअरफुट कॉलेज

    barefoot-college-famous-for-women-empowerment-self-reliance

    दिल्लीत शिक्षण पूर्ण करून बंकर रॉय यांनी भारत भ्रमण करायचे ठरवले. ते राजस्थान मधल्या या गावात आले. ‘आपण खूप शिकलोय तेव्हा इथल्या अशिक्षित लोकांना आपण शिकवू’ असं त्यांच्या अहंकाराला वाटलं. जसजसा त्यांचा या लोकांशी संबंध वाढला, तसतसं बंकर यांच्या लक्षात येऊ लागलं की वरकरणी अडाणी दिसणाऱ्या मंडळींकडे अनेक ज्ञान-कौशल्ये आहेत. तेव्हा याच लोकांकडूनच आपण काहीतरी शिकलं पाहिजे. यातूनच जन्म झाला – बेअरफुट कॉलेजचा.

    barefoot-college-famous-for-women-empowerment-self-reliance

    १९७५-८० च्या काळात निर्मिती झालेली ही वास्तू पाहण्यास आता जगभरातून लोक येतात. या प्रयोगास अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. संपूर्ण वास्तू शून्य विजेवर आणि शंभर टक्के सौर उर्जेवर चालते. या वास्तूमधील जेवणासकट सर्व सेवा सुविधा कमालीच्या साध्या. वायफळ खर्च नाही. माणसं अतिशय लाघवी व नम्र. अतिशय साधे सुती कपडे घातलेली ही माणसे बोलू लागली की नुसतं ऐकत बसावसं वाटतं. मध्यंतरी एका नेत्याच्या मुलाखतीनंतर ‘Women Empowerment’ हा शब्द विनोदाचा विषय झाल्याचे अनेकांना आठवत असेल. ‘Women Empowerment’ म्हणजे काय हे अनुभवायचे असेल तर ‘बेअरफुट कॉलेज’ ला भेट द्यावी लागेल.दर वर्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ग्रामीण भागातील अशा सुमारे शंभर स्त्रियांना ‘सौरउर्जा उपकरणे’ बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हे शिक्षण देणाऱ्या सर्व महिला या त्याच गावातील ‘सहावी सातवी’ च्या पुढे न शिकलेल्या महिला आहेत. राजस्थानी पारंपारिक वेशातील त्या महिला शिक्षिका आफ्रिकन देशातील महिलांना शिकवताना पाहून आपण अक्षरशः अवाक होतो. 

    barefoot-college-famous-for-women-empowerment-self-reliance

    येस, नो, ओके या शब्दांच्या व्यतिरिक्त एकही ‘कॉमन’ शब्द माहित नसताना, केवळ खुणांच्या माध्यमातून आणि काही विशिष्ट संकेतांच्या माध्यमातून सुमारे सहा महिने हे शिक्षण चालू असतं. सोलर कुकर, सोलर हीटर, सोलर दिवे वगैरे उपकरणे महिलाच बनवतात आणि बाजारात यशस्वीपणे विकून दाखवतात. याच गावातील काही ‘कमी शिकलेल्या’ (?) महिला दंतवैद्यकशास्त्र शिकून ‘रूट कॅनल’ वगैरे करतात हे पाहून आपल्याला चक्कर यायची बाकी असते. या कॉलेजचं स्वतःचं एफएम रेडियो स्टेशन आहे. सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असे रोज कार्यक्रम असतात. ज्या लोकांकडे बघून ती धड बोलतील की नाही अशी शंका यावी अशी माणसे ते रेडियो स्टेशन अतिशय शिताफीने चालवतात.

    एक एक धक्के पचवत बेअरफुट कॉलेजची सैर चालली होती. शेवटचा षटकार अजून बाकी आहे, याची कल्पना नव्हती. एका संगणकासमोर काही उपकरणे घेऊन एक स्त्री बसली होती. वय अंदाजे पन्नास. डोक्यावर घुंघट. त्यातून डोकवणारे सगळे केस पिकलेले. मी विचारलं, ‘आप क्या कर रही हो?’ अतिशय आत्मविश्वासाने समोरून उत्तर आलं – ‘मै रेडियो एडिटिंग कर रही हुं’…मी विचारलं, ‘आपके सामने जो मशीन्स है, उसके बारे मे आपको सब मालूम है?’ त्या स्त्रीने जे उत्तर दिलं, ते केवळ बेअरफुट कॉलेजच्या तत्वज्ञानाचं एका वाक्यात सार नव्हतं, तर आपल्या सर्वांच्या ‘शैक्षणिक अहंकाराला’ मारलेली चपराक होती. ती स्त्री म्हणाली, ‘ये बटन पे क्या लिखा है वो मै पढ नही सकती | पर ये बटन दबाने के बाद क्या होता है, वो मुझे मालूम है !’

    barefoot-college-famous-for-women-empowerment-self-reliance


    आपण थोडंफार शिकलो, आता आपली पुढची पिढी शिकतेय. त्या स्त्रीने जे सांगितलं, नेमकं तेच आपल्या शिक्षणातून हरवून गेलंय. मार्क, टक्के, मेरीटलिस्ट, अॅडमिशन वगैरे बाजारू कल्लोळात ‘खरं शिक्षण’ बाजूलाच पडलंय. मार्क, टक्के वगैरे गोष्टींना कमी लेखायचा उद्देश नाही. पण त्यातच फार अडकून गेलोय आपण. इंग्रजी आलं पाहिजे ते शेक्सपिअर वाचायला नव्हे, तर नोकरीच्या इंटरव्ह्यूमध्ये उत्तरं द्यायला. विज्ञान आलं पाहिजे ते या विश्वातलं कुतूहल शमवायला नव्हे, तर माझं ‘अॅग्रीगेट’ वाढवायला. संस्कृत आलं पाहिजे ते माझ्या परंपरेच्या पाउलखुणा शोधायला नव्हे, तर ते स्कोरिंग आहे म्हणून. शिकायचं असतं ते जगण्यातलं ‘शहाणपण’ (wisdom) मिळवायला. हे सगळं विसरून आपण इतके हीन आणि दीन कधी झालो? शिकण्याला आत्मविश्वासाचे व रोकड्या व्यवहाराचे पंख फुटले की काय चमत्कार घडू शकतो हे सांगणारं बेअरफुट कॉलेजचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे.

    ‘बेअरफुट कॉलेज’ला जाण्यापूर्वी त्याविषयी अधिक जाणून घ्यायला मी ‘राजस्थान पर्यटन’ कचेरीत गेलो होतो. तिथल्या अधिकाऱ्यांकडे या जागेविषयी चौकशी केली. त्यांना कुणालाच ‘बेअरफुट कॉलेज’ माहित नव्हतं. त्यांनी माझ्यासमोर जयपूर येथील आपल्या स्वतःच्या मुख्यालयाला फोन लावला. त्यांनाही कुणाला स्वतःच्याच राज्यातील ‘तिलोनिया’ किंवा बेअरफुट कॉलेजविषयी काहीही माहिती नव्हती. या देशात काही भलं काम करायचं असेल तर कुठून सुरुवात करावी लागणार आहे, याची ही एक झलक होती. ‘बेअरफुट कॉलेज’च्या गेटमधून बाहेर पडलो तेव्हाच मनाशी पक्क ठरवलं – यापुढे या वास्तूचा प्रसार आणि प्रचार जमेल तसा आणि जमेल तिथे, आपण स्वतः करायचा. गेलं वर्षभर मी ते करतोय.

    – नविन काळे

    ( Courtesy Consu Preetam, Madhuri Purandare )

    आणखी वाचा

  • अवघ्या पाच हजार रुपये भांडवलातून सुरू केलेल्या उद्योगातून जगप्रसिद्ध ल्युपिन फार्मा कंपनी साकारणारे देशबंधू गुप्ता यांचा जन्मदिन

    अवघ्या पाच हजार रुपये भांडवलातून सुरू केलेल्या उद्योगातून जगप्रसिद्ध ल्युपिन फार्मा कंपनी साकारणारे देशबंधू गुप्ता यांचा जन्मदिन

    २६ जून २०१७ रोजी त्यांचे निधन झाले. प्रकृती बरी नसल्याने त्यांनी पाच वर्षांपूर्वीच ल्युपिनची सूत्रे कन्या विनिता गुप्ता व पुत्र नीलेश गुप्ता यांच्याकडे सोपवली होती. ल्युपिनने गेल्या दशकात किमान १२ कंपन्या अधिग्रहित केल्या, त्यातील सहा कंपन्यांचे अधिग्रहण गेल्या दोन वर्षांत पूर्ण झाले.‘गॅव्हिस’ या ८८ कोटी डॉलर्सच्या अमेरिकी जेनरिक औषध कंपनीचे अधिग्रहण ल्युपिनने केले; ते कुठल्याही भारतीय औषध कंपनीने केलेले सर्वात मोठे अधिग्रहण.

    ‘डीबी’यांचा जन्म राजस्थानातील राजगडचा. रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर ते पिलानीच्या बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्राध्यापक होते. कालांतराने त्यांनी औषध उद्योगात उतरून मानवाला सतावणाऱ्या रोगांशी लढण्याचे ठरवले, त्यातूनच मुंबईत येऊन ‘ल्युपिन लिमिटेड’या कंपनीची स्थापना १९६८ मध्ये केली. पत्नीने वाचवलेल्या पैशातून त्यांनी पहिल्यांदा जीवनसत्त्व निर्मितीचा उद्योग सुरू केला. अवघ्या पाच हजार रुपये भांडवलातून सुरू केलेल्या या छोट्या उद्योगातून पुढे ४.८ अब्ज डॉलर्सची कंपनी साकारली. २००३ पर्यंत ते कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष होते. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात औषध निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणे हे तसे धाडसाचे; पण‘डीबीं’नी ल्युपिनमुळे औषधनिर्मितीत एक गतिशील वातावरण तयार केले.

    How Deshbandhu Gupta Turned Rs. 5000 into a Global Pharma Company

    त्याचबरोबर काही मूल्यांचा वारसा तयार केला. ही देशी औषध कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली. बीएसई सेन्सेक्स ३० कंपनी म्हणून ओळखली जाणारी ल्युपिन ही जेनरिक (प्रजातीय) औषध निर्मिती क्षेत्रातील बाजारपेठ भांडवलीकरणात जगातील दहाव्या क्रमांकाची कंपनी आहे. जागतिक महसुलाचा विचार करता ती भारतातील चौथ्या क्रमांकाची औषध कंपनी आहे. जपान व दक्षिण आफ्रिका या देशात ल्युपिन अनुक्रमे सहाव्या व चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या कंपनीची उलाढाल ४.८ अब्ज डॉलर्सहून अधिक असून ५० हजारांपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. अलीकडेच अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने त्यांच्या मध्य प्रदेशातील पिथमपूर येथील उत्पादन प्रकल्पाबाबत काही निरीक्षणे मांडली होती.

    डॉ. गुप्ता यांनी १९८८ मध्ये ग्रामीण भागातील दारिद्रय़ दूर करण्यासाठी ल्युपिन ह्य़ूमन वेल्फेअर अ‍ॅण्ड रीसर्च फाउंडेशन ही संस्था स्थापन केली. त्यामुळे ३४६३ खेडय़ांतील २८ लाख लोकांना लाभ झाला. विपश्यनेचे ते साधक होते व त्यांनी ग्लोबल विपश्यना फाउंडेशनचे विश्वस्त, तसेच जुहूच्या इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. २०१५ मध्ये फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत त्यांचा २५४ वा क्रमांक होता. क्षयरोगावरील औषधांसाठी ल्युपिन कंपनी प्रसिद्ध आहे. पाच वर्षांपूर्वी कंपनीने या औषधांची निर्मिती सुरू केली, कालांतराने त्यातील नफा कमी झाला, तेव्हा नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या पत्नी मंजू यांचा सल्ला घेतला. त्यावर त्या म्हणाल्या की, ‘हमारी रोटी तो हमें मिल रही हैं ना’ त्यानंतर क्षयाच्या औषधांचे उत्पादन बंद करण्याचा विचार त्यांच्या मनाला शिवलाही नाही.

    The Life and Legacy of Deshbandhu Gupta, Founder of Lupin Pharma

    सौ. लोकसत्ता, व्यक्तिवेध

    आणखी वाचा